Friday, March 5, 2021

आणीबाणी | ‘राहूल’वाणी | ‘कुमार’वस्था | केविलवाणी ||


     

उरूस, 5 मार्च 2021 

असं म्हणतात की खुद्द मार्क्ससुद्धा इतका मार्क्सवादी नसेल जितके की त्याचे अनुयायी आहेत. त्याच प्रमाणे खुद्द कॉंग्रेसजन करत नसतील इतके आणीबाणीचे समर्थन कुमार केतकर आत्तापर्यंत करत आलेले आहेत. आता तर कमालच झाली. कुमार केतकर ज्या पक्षाचे राज्यसभेत खासदार आहेत त्या पक्षाचे माजी आणि भावी अध्यक्ष. मा. राहूल गांधी यांनीच वक्तव्य केलं आहे की देशावर आणीबाणी लादणे ही त्यांच्या आजीची मोठी चुक होती. 

आता पंचाईत अशी आहे की कुमार केतकरांनी आत्तापर्यंत आणीबाणीचे समर्थन केले, त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांना राज्यसभेत खासदारकी मिळाली. तीच आणीबाणी म्हणजे आमच्या पक्षाची चुक आहे असं जर राहूल गांधी जाहिर म्हणत असतील तर कुमार केतकरांनी करायचे काय? 

राहूल गांधी यांना आपल्याच पक्षाची सत्ता असताना, आपल्याच पक्षाचा पंतप्रधान असताना सरकारी अध्यादेश भर पत्रकार परिषदेत फाडून टाकायची सवय आहे. राहूल गांधी यांना संसदेत भाषण करताना अचानक वेगवेगळे विषय आठवतात. ते त्यांच्या मनात येईल त्या विषयावर अचानक संसदेत बोलू लागतात. त्यांना लोकसभा अध्यक्षांनी टोकले तरी ते ऐकत नाहीत. आपले भाषण चालू असताना अचानक ते कृषी आंदोलन काळात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची बात करतात. आपल्या खासदारांना इशारा करून सर्व दोन मिनीटं उभं राहतात. अशा राहूल गांधींना कुमार केतकर काय समजावून सांगणार?

आत्तापर्यंत कसे सगळं सुखेनैव चालू होते. कुमार केतकर जोर जोरात सांगत होते की देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. 2019 च्या निवडणुकाच होणार नाहीत. झाल्यातरी मोदी अमितशहा सत्ता सोडणार नाहीत. प्रचंड दंगे होतील. हे सगळं बोलणं राहूल गांधी यांनाही आवडत असणार. कारण राहूल गांधी पण असंच काही बाही बोलत होते. आत्ताही तसंच ते बोलत असतात. देशात लोकशाही राहिलेली नाही असाच त्यांचा आरोप आहे. हा सगळा आंतर राष्ट्रीय कट कसा आहे अशी मांडणी कुमार केतकर करत होते.

पृथ्वीवर राम जरी अवतरला तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असेही वक्तव्य कुमार केतकर यांनी नांदेड येथे केले होते.  वर्तमानपत्रांनी त्याला मोठी प्रसिद्धी दिली होती. हा सगळा आंतरराष्ट्रीय कट असल्याने त्याला जगभरच्या वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली की नाही ते मात्र कळायला मार्ग नाही. कदाचित याला बाहेर प्रसिद्धी न मिळणे हा पण एक आंतरराष्ट्रीय कटाचाच भाग असावा. 

कुमार केतकर तसे खरेच द्रष्ट्ये विचारवंत. त्यांना माहित होते की मोदी पंतप्रधान होण्यासाठी रामाला पृथ्वीवर यावे लागेल. त्याप्रमाणे खरंच मोदी पंतप्रधान झाल्यावर लांबलेला राम मंदिराचा निकाल त्वरीत लागला. रामाचे भव्य मंदिर आयोध्येत बांधण्याचा निर्णय झाला. त्याचे भूमिपूजनही मोदींच्या हस्तेच पार पडले. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी भारतभरातून सामान्य जनतेने 1150 कोटींची गरज असताना 2100 कोटी इतकी प्रचंड रक्कम गोळा करून दिली. 

कुमार केतकर खरेच फार मोठे विचारवंत आहेत. त्यांना मोदी पंतप्रधान होणार नाहीत हे वाटत होते कारण पृथ्वीवर राम प्रत्यक्ष अवतरायला हवा होता. पण राम मंदिराच्या रूपाने तो अवतरत आहे तेंव्हा मोदींचा पंतप्रधान पदाचा रस्ता मोकळा झाला. केतकरांचे वक्तव्य खरे होण्यासाठी सगळे कसे धडपडत असतात बघा. 

केतकरांच्या मताची भाजप मोदी आणि त्यांचे मतदार अतिशय काळजी करतात हेच यातून सिद्ध होते. पण केतकरांची अडचण आता त्यांच्याच नेत्याकडून होते आहे. राहूल गांधी आणीबाणीला चुक म्हणत असतील तर आता काय करावे हा खरा प्रश्‍न आहे.  बरं भारतात लोकशाही नसल्या कारणाने फक्त पंतप्रधान मोदी किंवा भाजप संघ अमित शहा यांच्यावर टीका करता येते. पण आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करता येत नाही. पूर्वी भारतात जेंव्हा इंदिरा गांधींच्या काळात ‘प्रचंड’ अशी मोकळी ढाकळी लोकशाही होती तेंव्हा कसे ‘इंदिरा इज इंडिया’ असे उदात्त उदगार काढता येत होते.

आता मोदींच्या काळात प्रचंड दडपशाही आहे. हिटलरच्या पलीकडची दहशत आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाला काही बोलता येत नाही. यालाही परत मोदीच जबाबदार आहेत.  गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपील सिब्बल, संजय झा असे सगळे नेते जरा जरी आपल्या नेत्या विरोधात बोलले तर काय होते हे कुमार केतकरांना माहित आहे. हे सगळे मोदींमुळेच घडत आहे. आयोध्येत बनणारे राम मंदिरच याला जबाबदार आहे. देशातील सर्वसामान्य अतिशय मुर्ख असलेला मतदारच जबाबदार आहे. हा सगळा आंतरराष्ट्रीय कटाचा भागच आहे. 

खरं तर कुमार केतकर यांना आता पक्की खात्री झालेली आहे की राहूल गांधी यांचे वक्तव्य हा पण एक आंतर राष्ट्रीय कटाचा भाग आहे. त्यांच्या एकट्यावर भारतातील लोकशाही वाचवायची जाबाबदारी आलेली आहे. ती कशी वाचवायची याचे काटेकोर नियोजन ते अमेरिकेतील विद्यापीठांत बसून करू इच्छित होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी त्यांना मदत करण्याचेही पूर्ण आश्वासन दिले होते असं म्हणतात.

पण हुकूमशाही मोदी सरकारने कोरोनाची भिती घालून विमान प्रवास करू दिला नाही. आता कुमार केतकर भारतात अडकून पडले आहेत. आणि भारतातील लोकशाही वाचवायची कशी याची चिंता करत आहेत. 

कुमार केतकरांना लोकशाही वाचविण्यासाठी कुणास काही मदत करता आली तर त्यांनी ती जरूर करावी. मी काही सुचवले असते पण माझे लिखाणही आंतरराष्ट्रीय कटाचाच भाग असल्याने कुमार केतकर आणि त्यांचे भक्त यावर विश्वास ठेवणार नाहीत याची मला खात्री आहेत.

आज्जीची ती चुक । लादे आणीबाणी ।
राहूलची वाणी । उमटली ॥1||

कुमार अवस्था । हो केविलवाणी ।
गावी कशी गाणी? । आणीबाणीची॥2||

गाउन आरती । जीभेला ना हाड ।
कौतुकाचे झाड । ओठांवर ॥3||

आंतर राष्ट्रीय । कटाचा हा भाग ।
नशिबात भोग । काय आला ॥4||

राहूलही त्यात । अडकला असा ।
फेकला हा फासा । कसा कुणी ? ॥5||

परदेशी जावे । कराया चिंतन ।
विचार गहन । लोकशाहीचा ॥6||

हूकुमशहा तो । अडवितो मोदी ।
पत्रकार गोदी । भंडावती ॥7||

उतार वयात । अवस्था सुमार ।
बेजार कुमार । कांगरेसी ॥8||

दास‘कांत’ म्हणे । मारतो हा बाता  ।
बुद्धिवंत माथा । कुजलेला ॥9||


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

 

7 comments:

  1. बुद्धीवंत माथाl कुजलेलाl
    हे एकदम बरोबर.

    ReplyDelete
  2. सुपर धुलाई केली 😂🙏

    ReplyDelete
  3. काहीही भकता येत या भारतात आणि विरोधासाठी विरोध करणारी या जातीची मंडळी तग धरून रहातात

    ReplyDelete
  4. मजकूर वाचला .
    हे रेकॉर्डसाठी मुद्दाम नोंदवत आहे !
    -प्रब

    ReplyDelete
    Replies
    1. सर तशी काही गरज नाही..

      Delete
  5. पण या बातमीला मीडिया ने फारसे मनावर घेतले नाही. बाय द वे कुमार केतकर यांचा सध्या पत्ता काय?

    ReplyDelete
    Replies
    1. केतकर दिल्लीत असतात. मुंबईत त्यांचे घर आहे..

      Delete