Thursday, April 30, 2020

पालघर बुलंदशहर तुलना- पुरोगामी गोत्यात!


उरूस, 30 एप्रिल 2020

पालघर प्रकरणात हळू हळू नव नविन बाबी समोर येत चालल्या आहेत आणि हे प्रकरण दाबू पाहणारे उघडे पडत चालले आहेत. बरं हे कमी म्हणून की काय पालघर प्रकरणात तीन दिवस आळीमिळी गुपचिळी करणारे पत्रकार यांच्या हाताशी बुलंदशहर प्रकरण लागलं. व्यक्त होण्याचा आळस झटकून तात्काळ प्रतिक्रिया देणं सुरू झालं.

खरं तर जरा शांत बसून बुलंदशहर प्रकरणातील काही एक बाजू समोर येण्याची वाट पहायची होती. पण तेवढा संयम यांना राहिला नाही. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाली ही बातमी समोर येताच जमात-ए-पुरोगामी एकदम उत्साहात आली. बघा भगवे वस्त्र परिधान करणार्‍या भाजपच्या योगी यांच्या राज्यातच साधूंची हत्या होते. आता कुठे गेले मोदी? कुठे गेले अमित शहा? आता कसे बिळात लपून बसले सगळे?
पालघर आणि बुलंदशहर यांची तूलना करणे अतिशय चुक होते. बुलंदशहर हत्याकांड घडो अथवा न घडो त्याने पालघरला काय फरक पडणार आहे? पण तेवढी सद्सद्विवेकबुद्धी हरवूनच बसल्यावर काय होणार?

जमात-ए-पुरोगामी आणि त्यांचे सोशल मिडियावरचे पाठिराखे केवळ 5 तासातच उघडे पडले. बुलंदशहर प्रकरण वैयक्तिक कारणाने घडले आणि ज्याने खुन केले तो आरोपी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून ताब्यात घेतला. तो सांधूंच्याच धर्माचा असून आणि त्याच धर्माचे मुख्यमंत्री असूनही कुणीही हे प्रकरण दाबले नाही. कुणीही आरोपीचे नाव लपवून ठेवले नाही.

एक तर पालघर प्रकरण हे झुुुंडबळीचे (मॉब लिंचिग) आहे बुलंदशहर तसे नाही. दुसरी गंभीर बाब म्हणजे पालघर झुंडबळी प्रकरण पोलिसांच्या उपस्थित झाले आहे. तसे काही बुलंदशहरला घडले नाही. पुरोगामी खोटं सांगत राहिले की पालघरला पोलिस नव्हतेच जो होता तो वन विभागाचा कर्मचारी होता. आता पुढे आलेल्या व्हिडिओत तीन पोलिस स्पष्ट दिसत असून त्यांना निलंबीतही केलं आहे.

पालघर प्रकरणांतील आक्षेपार्ह गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण 17,18 व 19 एप्रिल असे तीन दिवस दाबून ठेवण्याचा झालेला प्रयत्न. देभरांतील कुणाही नेत्याच्या ट्विटरवर या तीन दिवसांत पालघर बद्दल काहीही नाही. कुणीही यावर प्रतिक्रिया दिली नाही. असं काहीच बुलंदशहर बाबत घडले नाही. काही तासांतच हा हत्याकांडाला वाचा फुटली आणि त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटल्या.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणांत कुणीही मुस्लीम गुंतलेला नाही असा एक अजब खुलासा तातडीने केला. मग दुसरीकडून असा प्रश्‍न उपस्थित होतो की मग आहेत कोण ते तरी सांगा? पण ते सांगायला अनिल देशमुख किंवा अजून कुणीही पुढे आले नाही. 101 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पण किती जणांना प्रत्यक्ष अटक झाली? ही कोण माणसे आहेत? या बाबत संशय ठेवल्या गेला.

बुलंदशहर प्रकरणात असे काहीही घडले नाही. कुठलेही नाव लपवले गेले नाही. कारवाईत दिरंगाई झाली नाही.
मोठ मोठे पत्रकारही ‘मुलं पळविणारी टोळी या भागात फिरत होती. तसे मेसेज व्हॉटसअप वर फिरत होते’ अशी लोणकढी थाप मारत आहेत. आश्चर्य म्हणजे जर असे काही या भागात घडत होते तर त्यावर कसलीच कारवाई का केली गेली नाही? लॉकडाउनच्या काळात सोशल मिडियावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. व्हॉटसअप ग्रुप वर तातडीने कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रातच पालघरला लागून असलेल्या नाशिकलाच अशी कारवाई तबलिग प्रकरणी पोलिसांनी केली. तीन जणांना तुरंगवासही झाला आहे. मग पालघर मध्ये कसल्याही अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई झाल्याचे उदाहरण 16 एप्रिल पूर्वीचे काही आहे का? 

वांद्रे येथे जी गर्दी जमा झाली होती त्या बाबतही खोटी बातमी सोशल मिडियावरून पसरविणारा सध्या तुरूंगात आहे. त्यावर कारवाई झाली आहे. मग जे कुणी पालघर प्रकरणात मुलं पळविणार्‍या टोळीचा उल्लेख करत आहेत त्या बाबत कारवाई का नाही झाली?

मूळात लॉकडाडनमध्ये मुलं पळविणारी टोळी तरी कशी सक्रिय असेल? स्वत:च्या आवश्यक कामासाठी बाहेर पडणे मुश्कील असताना सामान्य लोकांचा तरी या मेसेजवर विश्वास कसा बसणार?

पालघर प्रकरणांतील संपूर्ण सत्य बाहेर निश्चितच येईल. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणांच्या तपासाबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. भीमा कोरेगांव सारखा हाही तपास केंद्रिय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी जोर धरत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदारकी आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारच संकटात सापडले आहे. वाधवान प्रकरणांतील ‘मानवतावादी’ दृष्टीकोन प्रचंड टीकेचा विषय होवून बसला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरण न्यायालयाात पोचले असून पोलिस आयुक्तांना वैयक्तिक शपथपत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींनी सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले आहेत. कोरोनामुळे आव्हाड सध्या दवाखान्यात आहेत. धारावीतील कोरोना संकट हाताबाहेर जात आहेत.

आधी सीएए, मग त्यातून शाहिनबाग, जामिया मिलीया व जेएनयु तील हिंसाचार, दिल्ली दंगल मग तबलिग प्रकरण, शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुुंबडे यांची अटक प्रत्येक वेळी पुरोगामी चुक बाजू घेवून अडचणीत सापडले आहेत. आताही बुलंदशहर-पालघर तुलना करून काय साधले?

बँक कर्ज प्रकरणी राहूल गांधींच्या ट्विटला रिट्विट करणे एकच दिवसांत या सर्वांना उघडे पाडणारे ठरले आहे.
जमात-ए-पुरोगामी असंच वागत राहिले तर हळू हळू नि:संदर्भ होवून बसतील. तसेही आज बर्‍याच प्रमाणात होवून बसलेच आहेत. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Tuesday, April 28, 2020

भाऊ तोरसेकरांनी काढले वागळेंचे वाभाडे !


उरूस, 28 एप्रिल 2020

पत्रकार निखिल वागळे यांना पालघर प्रकरणी केलेला व्हिडिओ आणि त्यानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी वर केलेली चिखलफेक महागात पडताना दिसत आहे. एक तर काहीच कारण नसताना वागळे पालघर प्रकरणांत वचावचा बोलून बसले. त्यात परत त्यांनी केलेले खोटे ट्विट त्यांना अडचणीत आणणारे ठरले. हे कमी होते म्हणून की काय त्यांनी लगेच अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका करणारा त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीवर ‘प्रकाश’ टाकणारा व्हिडिओ केला.

अर्णब गोस्वामी सोनिया गांधींवर केलेल्या टीकेसाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांची सरशी झाली असून न्यायालयाकडून त्यांना तीन आठवडे संरक्षणही मिळाले आहे. अर्णब यांनी वागळेंचा व्हिडिओ पाहिला असल्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी वागळे यांना उत्तर दिले नाही. मात्र ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी स्वत:चे नविन यु-ट्यूब चॅनेल प्रतिपक्ष यावरून निखिल वागळेंवर दोन व्हिडिओ काढून त्यांचे वाभाडे काढले आहेत. शिवाय पोस्टमन या दुसर्‍या चॅनेलवर पण एक व्हिडिओ टाकून वागळेंना अजूनच धूतले आहे.

पालघर प्रकरणापुरते स्वत:चे विवेचन वागळेंनी मर्यादीत ठेवले असते तर चालले असते. पण अर्णब गोस्वामीवर घसरण्याची वागळेंना काहीच गरज नव्हती. पण बुडत्याचा पाय खोलात तशी अवस्था वागळेंची झाली आहे.

आपल्या व्हिडिओत वागळेंनी काही चुका केल्या आहेत, खोटे संदर्भ सांगितले आहेत, घटनांची उलटा पालट केली आहे. वागळे स्वत:च्यात आधीच्या व्हिडिओत काय बोलतात हे ते स्वत:च लक्षात ठेवत नसावेत.

उदा. अर्णब गोस्वामी यांचा खटला तातडीने सर्वोच्च न्यायालयात कसा काय चालतो? गरिबांना सर्वोच्च न्यायालयात उभेही राहणे मुश्कील आहे. अर्णब यांच्यासाठी पैसे कोण उभे करतो? वगैरे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. वागळे हे विसरले की नुकतेच त्यांनी संशयीत शहरी नक्षलवादी म्हणून आरोपी असलेले आनंद तेलतुुंबडे यांच्यावर एक व्हिडिओ केला आहे. त्यात आनंद तेलतुंबडे हे गरिबांचे दलितांचे शोषितांचे कसे प्रतिनिधी आहेत वगैरे वगैरे त्यांनी प्रतिपादन केले. पण याच तेलतुंबडे यांना नोव्हेंबर 2018 मध्ये तातडीने सर्वोच्च न्यायालयाने जामिन प्रश्‍नी दिलासा दिला. एकदा नव्हे तर दोनदा त्यांची याचिका या दीड वर्षांत सर्वोच्च न्यायालया समोर आली. आणि इतर कुठल्याही सामान्य माणसाला उपलब्ध होणार नाही अशी संधी तेलतुुंबडेंना मिळाली व दीड वर्ष तपास यंत्रणांना हुलकावणी देत त्यांना अटक टाळता आली.

आता वागळे यांनी अर्णब यांना प्रश्‍न विचारताना याचेही उत्तर द्यावे की तेलतुंबडें यांच्यासाठी सर्वोच्य न्यायालयात खटला चालविण्यासाठी कोणी पैसा पुरवला?

अर्णब यांचे रिपब्लिक चॅनेल चालविण्यासाठी उद्योजक राजीव चंद्रशेखर यांचा पैसा असल्याचे वागळे सांगत आहेत. खरं तर हे भांडवल कुणाचे आहे हे नेटवरून कुणालाही शोधता येते. त्यासाठी वागळेंसारख्या पत्रकाराची गरज नाही. भाउ तोरसेकर यांनी वागळे यांची आत्तापर्यंतची पत्रकारिता कुणाच्या पैशावर चालली असा रोख सवाल विचारत काळ्या पैशावर चाललेल्या या पत्रकारितेचे ढोंग उघड केले आहे.

वागळेंच्या निमित्ताने भाउ कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, प्रणव रॉय सर्वच पुरोगामी पत्रकारांची पत्रकारिता कशी काळ्या पैशावर चालते याची कुंडली मांडत आहेत.

पुरोगामी म्हणवून घेणार्‍या पत्रकारांचे ढोंग भाउ उघड करत आहेत हे फार महत्त्वाचे आहे. आनंद तेलतुंबडे प्रकरणात त्यांची तपास यंत्रणेसमोर शरणागती प्रसंगी प्रकाश आंबेडकरांच्या बरोबरीने आमदार कपिल पाटील दिसत असतात. हेच कपिल पाटील निखिल वागळेंवर काय आरोप करत होते? वागळे-कपिल पाटील हे भांडण काय आणि कसे होते? पुरोगाम्यांचे वकिल कपिल सिब्बल आणि पुरोगामी पत्रकार बरखा दत्त यांचे तिरंगा चॅनेलवरून कसे वाजले, कपिल सिब्बल यांनी कर्मचार्‍यांचे पैसे कसे बुडवले आणि त्याबद्दल आरडा ओरड बरखा दत्त यांनीच कशी केली असे कितीतरी मुद्दे भाउंनी मांडले आहेत.

जे रविशकुमार जगाला तत्त्वज्ञान शिकवतात, वागळेंसारखे त्यांना आदर्श प्रमाणपत्र देतात त्या एनडिटिव्ही चे मालक प्रणव रॉय यांच्यावर सध्या आर्थिक कारवाई चालू आहे. कर बुडविल्या प्रकरणी एनडिटिव्ही गंभीर आरोपांना तोंड देतो आहे. याची कुठलीही वाच्यता हे इतरांना शहाणपण शिकवणारे पत्रकार करत नाहीत.

पालघर प्रकरणांत ज्या पद्धतीनं सोनिया गांधी, कॉंग्रेस आणि सर्वच पुरोगामी म्हणवून घेणारे पत्रकार बुद्धिजीवी विचारवंत वागले ते सर्वच संशयास्पद आहे. आता जी नावे या प्रकरणांत समोर येत आहेत ती ख्रिश्‍चन मिशनर्‍यांची आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी अजूनही या प्रकरणी चकार शब्द काढला नाही. पालघर आरोपींमध्ये एकही मुसलमान नाही हे वागळे सांगतात पण आहेत कोण ते सांगत नाहीत. भाजपच्या सरपंच यात आहेत असे खोटे ट्विट वागळे करतात पण त्यांचे नाव पोलिसांच्या यादीत नाही हे दिसताच वागळेंची बोबडी वळते व दोनच तासात ट्विट वरून ते नाव काढून टाकतात.

प्रस्थापित पत्रकार सत्याची बाजू दडपून टाकत आहेत. अर्णब गोस्वामी सारखा पत्रकार पालघर हत्याकांडाला वाचा फोडत आहे तर हे सर्व त्याच्यावर तुटून पडले आहेत. भाऊ तोरसेकरांनी या ढोंगी पुरोगाम्यांना उघडं पाडण्याची सरळ स्वच्छ भूमिका घेतली आहे. अर्णब सारखा पत्रकारही चुकेल तिथे त्यालाही उघडं पाडूत असंही त्यांनी म्हटलं आहे ही भूमिका अतिशय योग्य अशी आहे.

आपल्या व्हिडिओला उत्तर देण्याचे तोरसेकरांचे आव्हान वागळे स्विकारतील असे दिसत नाही. भाउंचे तीन व्हिडिओ आले आहेत पण वागळेंचे अजून एकही उत्तर नाही. आपण वाट पाहू वागळे काय आणि कसे उत्तर देतात याची.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, April 24, 2020

अर्णब यांचा आक्रस्ताळेपणा पुरोगामी ढोंगाची प्रतिक्रिया!


उरूस, 24 एप्रिल 2020

पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी  बुधवारी रात्री 12.30 वा. स्टुडिओतून कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दोन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तशी रीतसर तक्रार अर्णब यांनी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली.

या प्रकरणांवर जशी प्रतिक्रिया पुरोगामी गँग कडून उमटायला हवी होतीच तशीच ती उमटली. बहुतांश जणांनी अर्णब यांच्या आक्रस्ताळेपणावर टीका केली. पण ही टीका करत असताना त्यांनी उपस्थित केलेल्या मुळ प्रश्‍नाला मात्र सोयीस्करपणे बगल दिल्या गेली. अर्णब आक्रस्ताळे आहेत यात काही वाद नाही. त्यांचा कार्यक्रम त्यामुळे बघवला जात नाही. मी स्वत: हा कार्यक्रम फारसा पहात नाही. यु-ट्यूबवर रात्री उशीरा या कार्यक्रमातील इतरत्र न आलेला एखादा मुद्दा असेल तर तेवढं कधी कधी पाहतो. अर्णब यांच्यावर कालपासून जी टीका होते आहे त्याच्या मुळाशी आहे पालघर हत्याकांड.

दोन साधूंची 200 जणांच्या जमावाकडून क्रुर हत्या होते आणि हे प्रकरण दाबल्या जाते. याची कुठलीही दखल महत्त्वाच्या वाहिन्या अथवा वृत्तपत्रांकडून घेतली जात नाही. कुठल्याही मॉब लिंचिंगवर आकांडव तांडव करणारे पुरोगामी या प्रकरणी चिडीचूप आहेत. अर्णब यांनी विचारलेला प्रश्‍न हा सोनिया गांधींवर आहे. कॉंग्रेस आणि सोनिया गांधी यांनी या प्रकरणात निषेध का केला नाही असा अर्णब यांचा साधा प्रश्‍न आहे.

अर्णबवर टीका करणारे नेमके याच प्रश्‍नाचे कसलेही उत्तर द्यायला तयार नाहीत. सोमवारी दुपारी 2 वा. 40 मि. निखील वागळे सारखे पत्रकार खोटे ट्विट करतात, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, कम्युनिस्ट सुधीर सुर्यवंशी त्याला प्रतिसाद देतात. मग जेंव्हा हा खोटेपणा उघड होतो त्यावर मात्र काहीही प्रतिक्रिया यांच्याकडून येत नाहीत. माध्यमे यावर चुप बसतात.

हे जे पुरोगामी ढोंग आहे त्या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी यांचा आक्रस्ताळेपणा उफाळून येतो. हे समजून घ्यायला हवे.  इतर मॉब लिंचिंगच्या प्रसंगी सोनिया गांधींना दु:ख होते. कॉंग्रेसकडून याचा निषेध केला जातो. मग आता हे सगळे मौनात का जातात? असा हा प्रश्‍न आहे. आणि याचे उत्तर पुरोगामी द्यायला तयार नाहीत.

गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणाचे राजकारण करून नका असे सांगत आहेत. पत्रकार भाउ तोरसेकर यांनी एक प्रश्‍न अनिल देशमुखांच्या या उद्गारावर उपस्थित केला आहे. दिल्लीच्या तबलिग मरकज प्रकरणी परवानगी कुणी दिली असा गैरलागू प्रश्‍न उपस्थित करून राजकारण कुणी सुरू केलं? जाणते राजे शरद पवार यांनीही हा परवानगीचा अनावश्यक अनाठायी प्रश्‍न उपस्थित केला होता. केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्‍न विचारणारे एक खोटे पत्र सोशल मिडियात व्हायरल केल्या गेले. मग जर हे राजाकरण शरद पवार आणि अनिल देशमुख करत असतील तर पालघर प्रकरणी हेच लोक चुप्पी साधून का आहेत?

सरकारच्या वतीने गृहमंत्री यांनी खुलासा केला की पालघर आरोपी पैकी कुणीही मुसलमान नाही. या खुलाश्याने गैरसमजात अजूनच  भर पडली आहे. जर कोण नाही हे आवर्जून सांगितल्या जाते तर कोण आहे हे का नाही सांगितल्या जात? पालघर हत्याकांडातील आरोपी कोण आहेत ही नावे समोर का नाही आणली जात? अखलाख, तबरेज यांच्या मॉबलिंचिंग बाबत अशीच भूमिका तेंव्हा घेतल्या गेली होती का?

केवळ महाराष्ट्राचाच विचार केला तर एक दोन नव्हे तर तीन घटना या आधी लॉकडाउनच्याच काळात घडल्या आहेत. कपिल वाधवान प्रकरणी सरकारी पातळीवर असेच घडले. हे प्रकरण दाबण्याचाच प्रयास झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे बाहेर पडले. स्थानिक लोकांनी वाधवान यांच्या गाडीच्या ताफ्यावर प्रचंड आक्षेप घेतला. मग अपरिहार्यपणे सरकारला कारवाई करणे भाग पडले. त्यातही परत अमिताभ गुप्ता हा अधिकारी कसा संघाचाच माणूस आहे. आणि ही चुक कशी भाजपचीच आहे असाही खोटा आरोप केला गेला. दुसरे प्रकरण वांद्रे येथे जमा झालेल्या दोन एक हजाराच्या जमावाचे. या बाबतही अतिशय खोटे अविश्वसनीय वक्तव्य सत्ताधारी पक्षाकडून आणि पुरोगामी पत्रकारांकडून समोर आले. युपी बिहारचे मजूर आहेत असं म्हणायचं तर दुसरीकडून त्यांच्या हातात सामान दिसत नाही, हे सगळे जमा होतात ते मस्जिद समोर आणि सांगितलं जातं की स्टेशनवर गाडीसाठी जमा झाले आहेत. बातमी मराठी वाहिनीवर येते आणि जमा झालेले सगळे अमराठी. तिसरं प्रकरण अनंत करमुसे या अभियंत्याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाणीचे आहे. सातत्याने अशा विविध  प्रकरणांत पुरोगामी ढोंगाचे पुरावे समोर येत जातात. यामुळे अर्णब गोस्वामी सारख्यांनी अक्रस्ताळेपणा केल्यावर तो सामान्य लोकांना खटकत नाही उलट योग्यच वाटतो.

आचार्य विनोबा भावे यांनी ‘जशास तसे’ याचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. जशास तसेचा अर्थ तलवारीला उत्तर तलवारीने द्यावे असा होत नाही, तलवारीला ढालीने उत्तर द्यायचे असते, अंधाराला प्रकाशाने उत्तर द्यायचे असते. जसे आव्हान समोर उभे राहते त्याला त्याप्रमाणे उत्तर देणे म्हणजे जशास तसे असे विनोबा सांगतात. लॉकडाउन काळात महाराष्ट्रात ज्या तीन घटना घडल्या त्यावर पुरोगाम्यांच्या समंजस उचित प्रतिक्रिया आल्या असत्या तर चौथ्या पालघर प्रकरणी अर्णब सारख्यांचा आक्रस्ताळेपणा असा उफाळून वर आला नसता. जशी समस्या आहे तशी त्यावरची समंजस प्रतिक्रिया उमटायला हवी होती.

आज अर्णबवर टीका करताना मुळ कारणाकडे मात्र लक्ष दिल्या जात नाही. यामुऴे पुढेही यावरच्या प्रतिक्रिया अशाच उमटू शकतात. सामान्य माणसांना आधी याची फारशी दखल घ्यावी वाटत नसायची. पण परत परत पुरोगामी त्याच पद्धतीनं वागणार असतील तर मग मात्र सामान्य मतदार अजूनच मोदींकडे झुकत जाईल. 2014 मधील 272 जागा 2019 मध्ये 303 वर पोचल्या. 2024 मध्ये मग त्या 350 झाल्यातर आश्चर्य वाटायला नको. मग पुरोगामी अजूनच छाती बडवत बसतील.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 22, 2020

पालघर झुंडबळी। आळीमिळी गुपचिळी॥


उरूस, 22 एप्रिल 2020

शुक्रवारी 17 एप्रिल रोजी रात्री 200 लोकांचा जमाव मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर पालघर मध्ये तीन लोकांची हत्या करतो. आणि ही बातमी दोन दिवस कुणाला कळतही नाही. कायद्याचे संरक्षक समोर असताना कायदा हातात घेवून हत्या केली जाते आणि याची जराही चाहूल कुणाला लागत नाही. कोरोनामुळे लॉकडाउन चालू आहे. अशा वेळी 200 चा जमाव गोळा होतोच कसा? आणि हे सगळं चालू असताना पोलिस बघ्याची भूमिका घेवून शांत बसतात कसे काय?

तिसर्‍या दिवशी या हत्याकांडाला वाचा फुटली ती सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे. कुठल्याही जागृत पत्रकाराने ही बातमी समोर आणली नाही. कुठल्याही छोट्या मोठ्या माध्यमांना याची दखल घ्यावी वाटली नाही. जेंव्हा समाजमाध्यमांतून ही बातमी समोर आली तेंव्हा अपरिहार्यपणे सर्वांना तिकडे वळावे लागले.

पुरोगामी पत्रकार माध्यमे विचारवंत चित्रपट कलावंत यांची तर कमाल आहे. उशीरा का होईना ही बातमी बाहेर आली तरी यापैकी कुणीच यावर काही बोलायला तयार नाही. तातडीने निखिल वागळें सारखे पत्रकार या प्रकरणी भाजपच्या सरपंचाला अटक़ असे खोटे ट्विट करून मात्र मोकळे होतात. यातील खोटेपणासाठी त्यांच्यावर तक्रार दाखल होते तेंव्हा ते माघार घेतात.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेबाबत तातडीने पत्रक काढणार्‍या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला या हत्याकांडाबाबत चकार शब्दही काढावा वाटत नाही. जे मुख्य 6 आरोपी या प्रकरणांत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यातील 5 तर प्रत्यक्ष कम्युनिस्टच आहेत. आणि एक राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधीत आहे.

यथावकाश याचा तपास पूर्ण होईल. कायदेशीर कारवाई होईल. सत्य बाहेर येईल. पण या प्रकरणांत पुरोगाम्यांचे मौन भयानक आहे. जर तूम्हाला एखाद्या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर येईपर्यंत बोलणे उचित वाटत नाही तर मग इतर वेळी तातडीने निषेध का केला जातो? आनंद तेलतुुंबडेंवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाते तरी त्या विरोधात मोठा आरडा ओरडा केला जातो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच कशी अटक करतात? असे प्रश्‍न उद्धटपणे विचारले जातात. पोलिस, सरकार, न्यायालय यांच्यासाठी अपशब्द वापरले जातात. पण हेच पुरोगामी पालघर हत्याकांडाबाबत मात्र आळीमिळी गुपचिळी बाळगतात. हे नेमके काय गौडबंगाल आहे?

मुख्यमंत्री दोन दिवस उशीरांनी तोंड उघडतात आणि सांगतात याला कसलाच सांप्रदायिक पैलू नाही. जाणते राजे शरद पवार सांगातात पालघर प्रकरणी राजकारण करू नये. गृहमंत्री अनिल देशमुख तर गायबच आहेत. या सगळ्यांनी याचे उत्तर द्यावे की हे प्रकरण तीन दिवस दाबून का ठेवल्या गेले?

मुंबईहून सूरतच्या दिशेने अंत्ययात्रेसाठी निघालेले दोन साधू रात्रीच्यावेळी 200 जणांच्या जमावात सापडतातच कसे? ही माहिती कुणी कुणाला दिलेली असते? आणि हे सगळे झाल्यानंतर माध्यमं, सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा हे सगळे मौनात कसे काय जातात?

या निमित्ताने पुरोगामी विचारवंत आणि माध्यमांतील तथाकथित  पुरोगामी पत्रकार यांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याची आत्महत्या ही या लोकांना हत्याच वाटते आणि त्याचे देशभर भांडवल केले जाते. दादरी येथील अखलाख याची हत्या तातडीने देशव्यापी विषय बनतो. पुरस्कार वापसी अभियान सुरू होते.

या उलट दोन साधूंची 200 च्या जमावाने केलेली हत्या मात्र यांना दखल न घेण्याची बाब वाटते. हे भयानक बौद्धिक कारस्थान आहे. मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या त्या सर्वांच्या मुळाशी काही एक सकृत दर्शनी दिसणारे कारण तरी होते. त्या त्या व्यक्तीची काही एक कृती इतरांना पसंद नाही असे समोर आले होते. पण या प्रकरणांत तर असे काहीही नाही. या साधूंचा त्या गावातील लोकांशी काहीही संबंध नाही.

शहरी नक्षलवादाचा इथे परत एकदा संबंध येतो. कुठल्या तरी कारणाने लोकांमधील अस्वस्थता हेरून त्याचा वापर करून हिंसाचार घडवून आणायचा. एल्गार परिषद, भीमा कोरेगांव दंगल, शाहिनबाग आंदोलन, जेएनयु व जामिया मिलीयांतील हिंसाचार, दिल्ली जाफराबाद दंगल या सगळ्यांतून नागरी भागांत कसल्यातरी कारणांनी हिंसाचार पेटविणे हा एक सामायिक अजेंडा समोर येतो आहे. आता पालघर प्रकरणांतही असलेच काही तरी शहरी नक्षलवादाचे कारस्थान आहे का याचा शोध घेतला गेला पाहिजे. कारण या प्रकरणांत पकडल्या गेलेले आरोपी कम्युनिस्ट पक्षांशी संबधीत आहेत.

शहरी नक्षलवादावर कडक कारवाई सुरू झालेली आहे. कायद्याचा मार्ग अवलंबून एक एक संशयीत ताब्यात घेणं चालू आहे. 14 तारखेला आनंद तेलतुुंबडे व गौतम नवलखा हे दोन संशयीत शहरी नक्षलवादी तपास यंत्रणेला शरण येतात आणि  लागलीच दोन दिवसांत हे हत्याकांड घडते हा योगायोगही तपासून घ्यावा लागेल. कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर सुर्यवंशी, पत्रकार निखिल ळागळे, काॅग्रेसचे सचिन सावंत यांनी खोट्या बातम्या ट्विट केल्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही अशीच दिशाभुल केली गेली आहे.

पालघर भागात आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या आदिवासींमध्ये कम्युनिस्टांची दादागिरी प्रचंड आहे. एखाद्या विषयात बुद्धीभेद करून लोकांचे लक्ष वळविण्याचे उद्योग दोनच वर्षांपूर्वी ‘किसान लॉंग मार्च’ या नावाने पालघर नाशिक या आदिवासी पट्ट्यातूनच झाले होते. आदिवासी प्रश्‍नावर प्रचंड जनमत तयार होवू शकत नाही म्हणून त्याला शेतकर्‍यांच्या हिताचा मुद्दा जोडला गेला. एक वर्ष हा लॉंग मार्च निघाला. दुसर्‍या वर्षी जागच्या जागीच जिरला. नंतर परत कुणी किसान लॉंग मार्चचा विषयच काढला नाही. शेतकर्‍यांचा संप घडवून शेतकरी व शहरी ग्राहक यांच्यातील कटूता याच डाव्यांनी वाढविण्याची खेळी केली होती.

पालघरच्या आदिवासी पट्ट्यात अफवा पसरवून हे हत्याकांड घडवून आणले गेले असा निष्कर्ष काढला जातो आहे. हीपण एक दिशाभूलच आहे. हे हत्याकांड अफवा पसरवून नव्हे तर जाणिवपूर्वक घडवून आणलेले आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून हे भीषण हत्याकांड समोर आले. सर्वसामान्य जनतेने सोशल मिडियाची ताकद लक्षात घ्यावी. आणि हीचा वापर सत्यसंशोधनासाठी करावा. प्रस्थापित माध्यमे जनसामान्यांच्या व्यथांना न्याय देतीलच असे नाही. नक्षलवादी कारस्थानाची पाळेमुळे कायद्याच्या आधाराने उखडली जात आहेतच. आपण सोशल मिडियाच्या सहाय्याने या अभियानात सरकारला मदत करू.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, April 21, 2020

कोरोना आपत्तीत वृत्तपत्रांना डिजीटल संधी !


उरूस, 21 एप्रिल 2020

कोरोना आपत्तीत वृत्तपत्रांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एरव्ही वृत्तपत्रे कागदावर छापून ग्राहकापर्यंत पोचविणे हे एक किचकट, वेळखावू, पैसेखावू काम होवून बसले होते. कोरोनात वृत्तपत्रांच्या वितरणावर बंदी आली आणि हीच वृत्तपत्रे डिजिटल स्वरूपात कुठल्याही मोबाईलवर मोफत पाठवायला सुरवात झाली.
यामुळे एक नविन संधी आता वृत्तपत्रांना उपलब्ध झाली आहे. काही इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांच्या डिजीटल आवृत्त्या सशुल्क उपलब्ध करून दिल्या आहेत. मराठीत मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. आता कोरोनात ही संधी आहे. वृत्तपत्रांची छपाई, तो मोठा खर्च, वितरणातील प्रचंड अडचणी, वितरणासाठी मनुष्यबळाची कमतरता या सगळ्यांवर मात करणे आताच शक्य आहे.

ही सेवा मोफत असावी का सशुल्क यावर मतमतांतरे असू शकतात. पण ही सेवा मोफत असावी अशा मताचा मी आहे. तसेही सध्या वृत्तपत्रांचा सगळ्यात मोठा महसुल जाहिरातीतूनच येतो आहे. वृत्तपत्रांचे वितरण करण्यासाठी येणारा खर्चही खुप मोठा आहे. तेंव्हा महसुल सगळा जाहिरांतीतून गोळा करणे आणि ही वृत्तपत्रे डिजीटली मोफत उपलब्ध करून देणे हे व्यवहार्य वाटत आहे.

दुसरा एक फायदा डिजीटल किंवा ऑन लाईन आवृत्तीला मिळू शकतो. व्हिडिओंची जोड या बातम्यांना देता येवू शकते. किंवा खरे म्हणजे या संधीचा फायदा घेवून एका वेगळ्यात स्वरूपात वृत्तपत्रे देता येवू शकतात.
तंत्रज्ञानाचा फायदा घेवून तळागाळापर्यंत पोचण्याची हीच संधी आहे. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात जगभरातील व्यापार खुला होण्यास सुरवात झाली, जगभरांतील तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचण्यास सुरवात झाली. भारतात दोन ठळक उदाहरणं याची आपण अनुभवतो आहोत. पहिलं उदाहरण मोबाईलचे. 2010 नंतर मोबाईलचे सार्वत्रिकीकरण होण्यास सुरवात झाली. ऍण्ड्रॉइड मोबाईलने तर मोठी क्रांतीच केली. अगदी छोट्यातल्या छोट्या गावात जिथे जिथे नेटवर्क आहे तिथपर्यंत या मोबाईलच्या माध्यमातून आपण जग हाताच्या  तळव्यावर आणून ठेवू शकलो. भारतासारख्या देशात जिथे संपर्क हीच मोठी अडचण होती तिथे किमान तेवढे एक काम या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाले.

दुसरे उदाहरण छोट्या लोडिंग ऍटो आणि दुचाकी मोटारसायकलचे आहे. गेल्या 20 वर्षांत यांचे सार्वत्रिकीकरण झाले व किमान रस्ता जिथे आहे तिथपर्यंत आपण ही वाहने पोचवू शकलो. अगदी दुर्गम भागांतील आदिवासी वस्ती वगळ्यास सर्वत्र (जवळपास 130 कोटी लोकसंख्या) ही सुविधा आता उपलब्ध आहे.

त्यामुळे ग्रामीण भागांतील माल बाजारपेठेत पोचविणे सुलभ झाले. छोटी वाहने आणि दुचाक्या यांच्यामुळे अगदी छोट्या गावांतून वस्त्यांमधून मोठ्या गावांना प्रवास करणे तुलनेने सोपे आणि स्वस्त झाले.

ऑनलाईन बँकिंगचे पण असेच उदाहरण आहे. अगदी छोट्या भागांत जिथून पैशाचे व्यवहार करणे अवघड असायचे तिथे डिजिटल बँकिंगने खुप मोठे काम केले आहे. विशेषत: ग्रामीण भागात या सुविधेचा लाभ मोठा झाला आहे.

याच पद्धतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेवून तळागाळापर्यंत वृत्तपत्र पोचविले पाहिजे. अगदी छोट्या गावात वृत्तपत्रांचे प्रतिनिधी कधी नेमले जायचे नाहीत. या निमित्ताने ही पण एक संधी आता उपलब्ध आहे. थोडेफार शिकलेला आणि चांगला मोबाईल हाती असणारा आता वृत्तपत्रांचा प्रतिनिधी बनू शकतो. वेब मालिकांच्या माध्यमांतून ग्रामिण भागांतील प्रतिभा समोर येते आहे. तिला मोठा प्रेक्षकवर्गही लाभतो आहे. हेच वृत्तपत्रांच्या बाबतीत पण घडू शकते. अगदी छोट्या भागांतील वाचक यापूर्वी गृहीत धरला गेलाच नव्हता. तिथपर्यंत वृत्तपत्रे पोचविणे व्यवहार्य नव्हते. पण आता डिजिटल माध्यमांतून हे सहज शक्य आहे.

परदेशस्थ भारतीयांचाही एक फार मोठा वर्ग जो संपूर्णत: या डिजिटल आवृत्त्यांवरच अवलंबून आहे. आजही हा वर्ग ही वृत्तपत्रे ऑनलाईनच वाचतो. त्याच्यापर्यंत पोचायला दुसरा सक्षम व व्यवहार्य पर्याय नाही. माझा स्वत:चा असा अनुभव आहे की गेली माझ्या ब्लॉगच्या 1 लाख 85 हजार दर्शकांपैकी 35 हजार इतकी मोठी संख्या ही परदेशी वाचकांची आहे. म्हणजे हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळ जाते. आपण मराठी वृत्तपत्रांचा विचार करू. परदेशातील सोडा पण भारतात सर्वत्र पसरलेली जी मराठी माणसे आहेत त्यांच्यापर्यंत आपण छापील वृत्तपत्र पोचवू शकतो का?

डिजिटल तंत्रज्ञान एक मोठे वरदान आहे. आपत्ती जशी आली आहेत तसेच त्यातून बाहेर पडण्याची पण संधी आहे. एरव्ही पर्यावरणवादी कागद वाचवा पर्यावरण वाचवा असा नारा देतातच. या डिजिटल माध्यमामुळे पर्यावरणाची हानी पण होणार नाही.

केवळ वृत्तपत्रेच नाहीत तर इतरही बर्‍याच क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर कोरोना नंतर वाढलेला दिसून येईल. त्यामुळे कितीतरी पैशांची बचत, वेळेची बचत पर्यावरणाचे रक्षण अशा बाबी घडून आलेल्या दिसतील. यासाठी आपण या तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. यावर नकारात्मक दृष्टीकोनातून शंका उपस्थित करत राहिलो तर हाती काही लागण्याची शक्यता नाही.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Sunday, April 19, 2020

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!


काव्यतरंग, रविवार १९ एप्रिल २०२०  दै. दिव्य मराठी

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!

कोणते आकाश हे? तू आम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे.. पिंजरे गेले कुठे?
या भरार्‍या आमुच्या.. ही पाखरांची वंदना!

कालचे सारे मुके आज बोलू लागले
अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले
हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!

तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना!

धम्मच्रकाची तुझ्या वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा अम्ही घेतलेला सोबती
ऐक येणार्‍या युगांच्या आदरांची वंदना!
-सुरेश भट

(एल्गार, पृ. 17, सुपर्ण प्रकाशन, आवृत्ती 2)
(मूळ कविता 7 कडव्यांची आहे.)

14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी झाली. लॉकडाऊनमुळे ही जयंती सार्वजनिक रित्या समारंभपूर्वक साजरी करण्यास बंदी होती. त्यामुळे घरोघरीच लोकांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन केले.  

सुरेश भटांची कविता या पार्श्वभूमीवर समजून घेतली पाहिजे. लाखो कराडो दीन दलितांच्या मनात बाबासाहेब आज देव बनून राहिले आहेत. भटांनी ही नेमकी भावना ओळखून त्या अनुषंगाने हे गीत लिहीले.
गुलामांना गुलामिची जाणीव करून द्यावी लागते. ‘कोणते आकाश हे?’ या ओळीत आम्हाला स्वातंत्र्य माहितच नव्हते. तू पंख दिल्यावर आम्हाला कळले आपल्याला पण उडता येते. आणि आजच्या दुबळ्या दीन दलितांच्या या उंच आकाशातील भरार्‍या तूला वंदना करत आहेत. ही भावना व्यक्त होते.

पुढच्या कडव्यात सुरेश भटांनी दलितांची मानसिकता कशी बदलत गेली याचे वर्णन केले आहे. ‘कालचे मुके आज बोलू लागले’ हे खरं आहे. पण हे बालणे म्हणजे साधेसुधे नव्हे. बाबासाहेबांनी दाखविलेल्या ‘सत्यासवे शब्द तोलू लागले’ या ओळीमध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे. 

बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्विकारला तो आंधळेपणाने नाही. जशाचा तसा बुद्ध त्यांनी स्विकारला नाही. बाबासाहेबांचा बुद्ध धम्म जरा वेगळा आहे. उदा. पूनर्जन्म बाबासाहेब नाकारतात. ‘बुद्धा ऍण्ड हिज धम्मा’ या पुस्तकात राजपुत्र गौतमाच्या आयुष्यातील तीन प्रसंग वृद्ध दिसणे, प्रेतयात्रा दिसणे, रोगी दिसणे हे सगळे बाबासाहेबांनी कठोरपणे नाकारले आहे. अतिशय प्रखर बुद्धिवादी तर्क करून गौतमाच्या सन्यासाची चिकित्सा केली आहे. आठ वर्षे प्रस्थापित राज्यव्यवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर राजपुत्र गौतम सन्यास घेवून बाहेर पडतो याची त्यांनी केलेली मिमांसा अपुर्व अशी आहे. त्यामुळे सुरेश भटांनी ‘अन् तूझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले’ अशी ओळ लिहीली आहे. 

बाबाहसोबांचा जन्म 14 एप्रिलचा. हा काळ वसंत ऋतूचा. हा संदर्भ कसा काय कळत नाही पण बहुतेक लेखकांच्या  लिहीण्यात येत नाही. पण सुरेश भटांनी मात्र याचा अतिशय चपखल उपयोग या कवितेत करून घेतला आहे. वसंत ऋतूत बाबासाहेबांचा जन्म आहे. सोबतच या काळात सर्वत्र झाडांच्या मोहराचा घमघमाट पसरलेला असतो. दलितांच्या मोहरलेल्या मनांची सुंदर प्रतिमा इथे येते. शिवाय दुसराही एक अर्थ आहे. बाबासाहेब नावाचा वसंत आयुष्यात प्रवेशल्याने ही सर्व झाडं मोहरली आहेत. 

प्रखर बुद्धीवादी असा एक धम्म बाबासाहेबांना अपेक्षीत होता. भारतीय दर्शन परंपरेत एकूण 9 प्रमुख दर्शनं मानली गेली आहेत. सहा दर्शनं ही आस्तिक  (न्याय, योग, वैशेषिक, पुर्व मिमांसा, उत्तर मिमांसा, सांख्य) तर उर्वरीत 3 दर्शनं ही नास्तिक (जैन, बौद्ध, चार्वाक) मानली गेली आहेत. वेद मानतो तो आस्तिक आणि वेद नाकारतो तो नास्तिक असा हा दर्शन परंपरेतील अर्थ आहे. (देव मानतो तो आस्तिक आणि न मानणारा नास्तिक अशा चुक पद्धतीनं हे शब्द आपण वापरतो). बाबासाहेबांना नास्तिक दर्शनांची परंपरा पुढे न्यायची आहे. म्हणून ते बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. बुद्धीचा वापर करून हाती येणारे ज्ञान हे प्रखर सुर्यासारखे तेजस्वी आहे. नविन पिढीवर आपली बुद्धी वापरण्याचा संस्कार होवो. केवळ वाडवडिलांनी सांगितलं म्हणून त्यांनी ऐकू नये. यासाठी ‘तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा?’ ही ओळ येते. ‘मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना’ ही ओळ पुढच्या प्रखर बुद्धिवादी पिढीसाठी आहे. 

भारतात एक मोठी बुद्धीवादी परंपरा राहिलेली आहे. या सगळ्याचे प्रतिक म्हणून धम्मचक्र हा शब्द येतो. तो केवळ बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठीच येतो असे नाही. भारतीय परंपरेतील सर्वात मोठा शेवटचा दार्शनिक म्हणून गौतम बुद्ध येतो. तर्काची ही परंपरा अजूनही पुढे चालू राहिली पाहिजे. परंपरेने चालत आले आहे म्हणून पुढे चालू ठेवायचे हे आपल्या वैचारिक विश्वात अपेक्षीत नाही. जो काही विचार ज्याने कुणी मांडला त्याची दखल घेत पुढे पुढे जाणे ही आपली परंपरा राहिली आहे. 

बाबासाहेब या परंपरेचे निष्ठावान पाईक होते. सुरेश भटांनी हे ओळखून केवळ दलितांसाठीच नव्हे तर बुद्धीचा वापर करू पाहणार्‍या सर्वच दबल्या गेलेल्या पिचल्या गेलेल्यांसाठी ही रचना केली आहे. आपण दुर्दैवाने त्याला केवळ निळ्या रंगात रंगवून टाकतो आणि आपला काहीच संबंध नाही अशा आविर्भावात राहतो. 

श्री.दि. इनामदार यांनी अतिशय प्रसादिक शैलीत बाबासाहेबांवर लिहीताना असे शब्द वापरले होते

ग्रंथ थकले गे माय, संत थकले ग माय
नाही थकला भीमाचा काटे तुडविता पाय

दीन दलितांच्या उद्धाराचा हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. हा मार्ग कठिण आहे. मोठं अंतर कापायचे आहे. यासाठी थकून चालणार नाही. हे अंतर कापण्यासाठी धम्मचक्राची गती वाढविली पाहिजे.
14 एप्रिल बाबासाहेबांची तर 15 एप्रिल सुरेश भटांची जयंती. या महाकवीने बाबासाहेबांसारख्या महामानवाला वाहिलेली ही श्रद्धांजली. बाबासाहेबां सोबतच आपण रसिक सुरेश भटांनाही श्रद्धांजली अर्पण करू.

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Saturday, April 18, 2020

मौलाना मिर्झा तबलिगवर टिका करून देशप्रेम सिद्ध करा!


उरूस, 18 एप्रिल 2020

तबलिग आणि शाहिनबाग यावर टीका केली की आमचे औरंगाबादचे मित्र मौलाना मिर्झा अब्दूल कय्युम नदवी हिंदूंच्या विविध बातम्यांची कात्रणं क्लिप फेसबुक पोस्ट टाकून याचा तूम्ही निषेध करणार का असा प्रश्‍न विचारत होते. त्यांनी पाठवलेल्या बातम्यांत बहुतांश फेक न्युज असल्याने त्याची दखल घेण्याची मला कधी आवश्यकता वाटली नाही.

पण काल दोन मोठ्या हिंदूंशी निगडीत घटनांची सत्यता पटली. त्यावर बहुतांश हिंदू पत्रकारांनीही टीका केली. पहिली घटना होती माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाच्या लग्नाची. ज्याला किमान 200 ते 250 लोक जमा झाले होते. दुसरी घटना कर्नाटकातीलच आहे. कलबुर्गी येथील सिद्धलिंगेश्वर स्वामी रथयात्रेत मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. या दोन्ही घटनांचा निषेध मी स्वत: केला. माझ्या फेसबुक पोस्टवर तात्काळ निषेध करण्यासाठी बहुतांश हिंदू मित्र तातडीने पुढे आले. 

कुणीही या देशविघातक कृत्याला पाठीशी घालू पहात नव्हता. कुणीही याची वकिली केली नाही. माझ्या मित्र यादीतील आणि त्यांच्याही यादीतील कुणीही या दोन घटनांचे समर्थन करण्यासाठी पुढे आला नाही. सर्वांनीच एकजात निषेध केला.

मौलाना मिर्झा यांनी आवाहन केले होते की तूम्ही हिंदूंच्या अशा घटनांचा निषेध करून दाखवा. तो आम्ही करून दाखवला. आता मौलाना अब्दूल कय्युम नदवी यांना आवाहन आहे की त्यांनी तबलिगचा जाहिररित्या निषेध करून दाखवावा. त्यांना मी रात्रीच मेसेज पाठवला. त्यांनी अजूनही त्याची दखल घेतली नाही. 12 तास त्यांच्या उत्तराची मी वाट पाहून ही फेसबुक पोस्ट टाकत आहे.

काही पुरोगामी मुसलमान मित्रांनी तबलिगचा निषेध केला आहे. आपल्या कृतीतून आपण कधीच असल्या कट्टरपंथीयांच्या पाठीशी नाहीत हा स्पष्ट संदेश दिला आहे. पण ही संख्या अतिशय अल्प आहे. बहुसंख्य मुसलमान हा शांत बसून या तबलिगी कट्टरवादाला पाठीशी घालत आहे.

याचा सगळ्यात मोठा तोटा मुसलमानांनाच होणार आहे. तबलिगी प्रवृत्तीमुळे मुसलमान जगाच्या मागे पडत जातील. विज्ञान तंत्रज्ञान विरोधी ठरतील. त्यांच्या विकासाचा मार्ग खुंटून जाईल. आज तबलिगींनी पसरवलेल्या कोरोना महामारीचा धोका तर मुस्लीम वस्त्यांनाच जास्त आहे. कुठलाच तबलिगी काही मंदिरात जावून लपून बसणार नाही. तो लपतो आहे तो मस्जीदमध्येच अथवा मुस्लीम वस्तीमध्येच. तेंव्हा हा धोका ओळखून सारासार विचार करणार्‍या मुसलमान बंधू भगिनींनी पुढे यावे. या सगळ्या लपलेल्या तबलिगींना समोर आणावे. त्यांची वैद्यकिय तपासणी करून घ्यावी. स्वत:ला असलेला धोका दूर करावा. तसेच देशाला असलेला धोकाही दूर करावा.

आम्ही कायम तबलिगी जमात असाच शब्द वापरत आलो आहोत. तबलिगींमुळे सर्व मुसलमान बदनाम होत आहेत. आणि ही चूक त्यांचीच आहे. तेंव्हा आता या धोक्यापासून देशाला वाचविण्यासाठी विवेकी मुसलमानांनी पुढे येण्याची गरज आहे.

मौलाना मिर्झा अब्दूल कय्युम नदवी तबलिगचा जाहिर निषेध करून तूमचे देशप्रेम सिद्ध करा.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Thursday, April 16, 2020

तेलतुंबडे शरणागती । पुरोगामी गुंग मती॥


उरूस, 16 एप्रिल 2020

संविधान बचाव म्हणून आंदोलन करत असताना पुरोगामी स्वत: मात्र कायद्यातील पळवाटा शोधून मार्ग काढत राहिले आहेत. याचे अतिशय ताजे उदाहरण म्हणजे आनंद तेलतुंबडे यांची राष्ट्रीय शोध यंत्रणेसमोर शरणागती. (शरणागती असाच शब्द आहे. अटक नाही.)

शहरी नक्षलवाद हा विषय 2005 पासून अधिकृतरित्या पोलिस खात्यात ऐरणीवर आला. म्हणजे प्रत्यक्षात ही ‘फाईल’ तयार झाली आणि शोध सुरू झाला. त्यावेळी कुठले लोक सत्ताधारी होते दिल्लीत आणि महाराष्ट्रात हे समजून घ्या. म्हणजे या विषयात सध्या निखील वागळे सारखे पत्रकार जो आरडा ओरडा करत आहेत तो किती निष्फळ आणि चुक आहे हे सहजच लक्षात येईल. मुळात हा शब्दच पहिल्यांदा कुणी वापरला? तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘अर्बन नक्षलवाद’ हा शब्द संसदेत वापरला. त्यानंतर गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनीही हा शब्द वापरला. आणि तेंव्हापासून हा शब्द सर्वत्र वापरण्यात आलेला आढळतो आहे.

आंबेडकर जयंतीच्या दिवशीच बाबासाहेबांच्या नात जावायाला अटक असला तर्कही वागळे आणि तेलतुंबडे यांचे समर्थक हितचिंतक वापरत आहेत.

मुळात तेलतुुंबडे यांच्यावर प्रत्यक्ष खटला उभा राहिला नोव्हेंबर 2018 मध्ये. तेंव्हापासून सर्वोच्च न्यायालयात दोन वेळा, उच्च न्यायालयात दोन वेळा आणि जिल्हा न्यायालयात एक वेळा अशी पाच वेळा तेलतुंबडेंना स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली. जी एरव्ही कुठल्याही सामान्य माणसाला मिळणे अवघड असते. दीन दलित दुबळ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे तेलतुंबडे ही दीर्घ न्यायालयीन लढाई कुणाच्या पैशावर लढले हे पण एकदा त्यांच्या पाठिराख्यांनी दीन दलित दुबळ्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे.

6 एप्रिल 2020  रोजी सर्वोच्च न्यायालयाने शेवटची एक आठवड्याची मुदतवाढ तेलतुंबडे यांना दिली. या नंतर शोध यंत्रणेसमोर शरणागती पत्करण्यास सांगितले. आता सर्वच मार्ग खुंटले असल्या कारणाने तेलतुुंबडे आणि त्यांच्या सोबतचे दुसरे संशयीत आरोपी गौतम नवलखा यांना शरणागती पत्करावी लागली.

यांना नेमकी 14 एप्रिललाच अटक करण्यात आली असा कांगावा वागळे प्रभृती करत आहेत. मुळात दीड वर्षांपासून तेलतुंबडे शोध यंत्रणेशी कायदेशीर लपंडाव खेळत आहेत. त्यांना दिलेली मुदत 13 एप्रिलला संपली. त्यांना जर 14 एप्रिल या बाबासाहेबांच्या जयंतीचे इतके पावित्र्य होते तर त्यांनी ही शरणागती आधीच पत्करायची. त्यांना कुणी रोकले होते?

जनतेला एक पत्र लिहून त्यांनी आवाहनही केले आहे. शिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सी.पी.आय.) यांनी 11 एप्रिलला पत्रक काढून यांना अटक करू नये अशी मागणी केली आहे.

आता या पूर्वी ज्या कुणा तथाकथित हिंदूत्ववादी नेत्यावर न्यायालयाने अशी कारवाई केली तेंव्हा कायदेशीर प्रक्रियेत कुणी बाधा आणली होती का? अगदी शंकराचार्य यांना भर दिवाळीत हिंदूंच्या मोठ्या सणाच्या वेळी अटक करण्यात आली तेंव्हा कुणी आक्षेप घेतला होता का? राम जन्मभूमी प्रकरणात 28 वर्षे इतकी दीर्घ न्यायालयीन लढाई चालली. अगदी ताजे उदाहरण साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांचे आहे. त्यांची कायदेशीर लढाई ते लढले. 8 वर्षांनी त्यांना जामिन मिळाला. यासाठी कुणी अशी पत्रकबाजी करून आकांडव तांडव केले होते का?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावेच लागले होते. ज्या पद्धतीनं नजिकच्या काळात पी. चिदंबरम, कन्हैया कुमार आणि आता तेलतुंबडे आदींनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत तपास यंत्रणेसमोर अडचणी उभ्या केल्या तशा इतर कुणीही केल्या नाहीत. म्हणजे एकीकडे संविधान बचाव असे आंदोलन करायचे आणि दुसरीकडे आपल्यावर कायद्याला सामोरे जायची वेळ आली की होईल तेवढ्य पळवाटा शोधून अडथळे निर्माण करायचे. ही नेमकी कुठली प्रवृत्ती आहेत?

बर जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोर येतो तेंव्हा हे पुरोगामी तो मोकळ्या मनाने स्विकारतात का? राम जन्मभुमी  प्रकरणात यांचे पितळ उघडे पडले आहे. न्याय मिळाला नाही म्हणून ओवेसी यांनी ओरड केली आणि त्यांच्या सुरात सर्व पुरोगाम्यांनी सूर मिसळला.

तेलतुंबडे बाबासाहेबांचे जावाई आहेत हा शोध आत्ताच नेमका कसा काय लागतो? मग ते फरार असलेल्या जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडे याचे भाउ आहेत हे का नाही सांगितले जात?

गोरगरिबांचा कळवळा असणारे कामगारांच्या हितासाठी काम करणारे तेलतुंबडे परराष्ट्रीय कंपन्यांत उच्च पदस्थ अधिकारी कसे काय असतात? मग हेच पुरोगामी भांडवलदार म्हणून टीका कशी काय करतात? तेलतुुंबडे स्वत:ला कम्युनिस्ट मानतात की नाही? का विचार वेगळा आणि व्यवहार वेगळा असंच त्यांना सुचवायचं आहे?
 यवतमाळ जिल्ह्यांत वणीमध्ये शाळेत जात असतांना अंगात घालायला कपडे नसणारे तेलतुंबडे सिनेमाचे पोस्टर रंगवून पैसे गोळा करतात आणि खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून शाळेत जाणार्‍या दलित मुलांसाठी निळ्या टोप्या तयार करून आणतात व बंड करतात. कारण काय तर तथाकथित संघावाल्यांनी इतर कांही मुलांना काळ्या टोप्या घालायला लावल्या असतात. आता साधा प्रश्‍न आहे की शाळेचा गणवेश खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असेल तर तेलतुुंबडे पांढरी टोपी का नाकारतात? संघाच्या लोकांनी काही मुलांना काळी टोपी घालायला लावली म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी पांढर्‍या टोप्यांची संख्या वाढविण्याऐवजी तेलतुंबडे निळ्या टोपीचा वेगळा मार्ग का स्विकारतात? गणवेशचा भाग असलेली पांढरी टोपी का नको? (सुषमा अंधारे यांनी याबबत एक तयार व्हिडीओ करून यु ट्यूबवर टाकला आहे. इच्छुकांनी तो पहावा.)

आता परत विषय आजच्या शरणागतीपाशी येवून थांबतो. अहिंसेच्या मार्गाने आपले आदांलन चालविणार्‍या मेधा पाटकर या तेलतुंबडे यांच्यावरील कारवाई विरोधात आवाज उठवतात. त्यांनी हे जाणून घेतले का की तेलतुंबडे गांधींची टोपीच काय पण अहिंसा हे तत्त्व मानत नाहीत?

बाबासाहेबांच्या विचारापेक्षा माओच्या विचारांची आज जास्त गरज आहे हे तेलतुंबडे यांचे प्रतिपादन त्यांची भलावण करणार्‍या आंबेडकरवाद्यांना मंजूर आहे का? महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलना नंतर सवर्णांनी दलितांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दलितांनाही हिंसेचाच मार्ग हाताळायचा होता हे तेलतुंबडे सांगतात. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना हा मार्ग हाताळण्यापासून रोकले ही चुकच झाली अशी मांडणी ते करतात. हे आजच्या तेलतुंबडेंसाठी आरडा ओरड करणार्‍या पुरोगाम्यांना मान्य आहे का?

आंबेडकरवादी, गांधीवादी, समाजवादी पुरोगामी या सर्वांनी हे स्पष्ट ध्यानात घ्यावे की तेलतुुंबडे कितीही आव आणत असले तरी ते या मार्गाने जाणारे नाहीत. त्यांचे सर्व लिखाण आणि आता तपास यंत्रणेनेने गोळा केलेले पुरावे पाहता त्यांचे नक्षलवादाला असलेले समर्थन स्पष्ट दिसून येते.

तेलतुंंबडे यांनी कायदेशीर प्रक्रियेत दीडवर्ष तपास यंत्रणेला झुलवले. पण बाबासाहेबांच्या जयंतीलाच नेमकं शरणागती पत्करण्याची वेळ तेलतुंबडे यांच्यावर आली. जे लेाकशाहीला मानत नाहीत, अहिंसेला मानत नाहीत अशा नक्षलवादी आंदोलनाचे पाठिराखे कायद्याच्या बळकट पकडीत सापडतात हेच आपल्या संविधानाचे मोठे यश आहे.

तेलतुुंबडे यांचे जे पाठिराखे संविधान लोकशाही मानतात त्यांनी हे ध्यानात घ्यावे प्रक्रियेचा भाग म्हणून तेलतुंबडेंना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून कायदेशीर लढाई लढण्यास कुणीही रोकलेले नाही. आजही त्यांना त्यासाठी पूर्ण मोकळीक आहे. तसेही त्यांनी दोनदा सर्वोच्च न्यायालयात केवळ अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी धडपड करून आपले कायदेशीर हात किती ‘वर’ पर्यंत पोचले आहेत हे सिद्ध केलंच आहे. चिदंबर, कन्हैय्या कुमार प्रकरणीही पुरोगाम्यांनी कायदेशीर लढाईतील आपली कालव्यय करण्याची ताकद दाखवून दिली आहेच.

तेलतुुंबडेंसोबत गौतम नवलखाही दिल्लीत शरण झाले आहेत. आधीच तुरूंगात असलेल्या त्यांच्या इतर सहकार्‍यां सोबत आता यांनाही गजाआड रहावे लागणार आहे.

बाबासाहेबांच्या संविधानापुढे आपली सगळी शस्त्रं बनावट ठरल्याने पुरोगाम्यांची मती गुंग झाली आहे. नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याची तपास यंत्रणेचे एक पाउल पुढे पडले आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 12, 2020

माझी माय सरसोती | माला शिकविते बोली ||



दै. दिव्य मराठी काव्य तरंग रविवार १२ एप्रिल २०२० 

माझी माय सरसोती | माला शिकविते बोली ||
लेक बहिनाच्या मनी |  किती गुपितं पेरली ||

माझ्यासाठी पांडुरंगा | तुझं गीता भागवत ||
पावसात सामावतं |  माटीमधी उगवतं ||

अरे देवाचं दर्सन | झालं झालं आपसुक ||
हिरिदात सूर्यबापा | दाये अरूपाचं रूप ||

तुझ्या पायाची चाहूल | लागे पानापानांमधी ||
देवा तुझं येनं जानं | वारा सांगे कानामधी ||

फुलामधी सामावला | धरत्रीचा परिमय ||
माझ्या नाकाले इचारा | नथनीले त्याचं काय? ||

किती रंगवशी रंग | रंग भरले डोयात ||
माझ्यासाठी शिरिरंग | रंग खेये आभायात ||

धर्तीमधल्या रसानं | जीभ माझी सवादते ||
तव्हा तोंडातली चव |  पिंडामधी ठाव घेते ||

-बहिणाबाई चौधरीे
(पृ. 113, बहिणाईची गाणी, सुचित्रा प्रकाशन, 16 वी आवृत्ती)

अनाम बायाबापड्यांच्या जात्यावरच्या ओव्यांनी मराठी कविता संपन्न केली आहे. इंद्रजीत भालेराव यांनी या जात्यावरच्या ओव्यांबाबत असं लिहीलं आहे
... अशा पुरूषांपासूनच इतिहासात
कवितेला कायम भीती होती
म्हणून सातशे वर्ष कविता फक्त
जात्याभोवतीच जीती होती

संत जनाबाईंपासून ठळकपणे मराठी कवितेची परंपरा दाखवता येते (महदंबेचे धबळे त्याआधी आहेत.) या जनाबाईच्या रचना म्हणजे जात्यावरच्या ओव्यांचंच एक रूप आहे. आधुनिक काळात याच परंपरेतील कवयत्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई या वेगळ्या. काही जणांना हा गैरसमज होतो की या दोन्ही बहिणाबाई एकच आहेत की काय.

जात्यावर बसल्यावर ओवी सुचत जाते असा बापा बापड्यांचा अनुभव आहे. बहिणाबाईंची कविता तर त्याचा जिता जागता पुरावाच आहे.

जात्या इसवरा तू रे कोन्या डोंगराचा ऋषी
माईवानी उकलीते काळीज हे तूझ्यापाशी

अशी एक गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड परिसरात जात्यावरची ओवीच आहे.

बहिणाबाईंनी आपल्या या कवितेत आपल्या काव्यनिर्मितीचं रहस्य अतियश सोपं करून उलगडून दाखवलं आहे. सरस्वती असा शब्दही जिला नीट उच्चारता येत नाही ती आपल्या प्रतिभेनं कवितेचं महावस्त्र विणत जाते या मागे ही माय ‘सरसोती’च कशी आहे हे त्यांनी सांगितलं आहे. बहिणाबाईंनी संतांच्या रचनांमधला सगळा वेदांत आजूबाजूच्या निसर्गात शेतीत शोधला आणि शब्दांतून मांडून दाखवला.
बोली भाषेतील एक गोडवा, निसर्गदत्त अशी लय बहिणाबाई नेमकी पकडतात. बोरकरांची एक प्रमाण भाषेतील ओळ आहे

होउ आपणही निळ्या घेउ त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग

आणि हीच ओळ बहिणाबाईंच्या कवितेत किती सहजतेने येते. ‘श्रीरंग’ सोपा असा ‘शिरीरंग’ होवून जातो. बोरकरांना तरी निळ्या होवून श्रीरंगाकडे जाण्याची आवश्यकता वाटते पण बहिणाबाईंना मात्र त्याच्याकडे न जाताच ‘माझ्यासाठी शिरीरंग रंग खेये आभायात’ असा ठाम विश्वास आहे.  

माणूस निसर्ग आणि शेती अशा त्रिसुत्रात बहिणाबाई आपलं सगळं जगण्याचं अध्यात्म बांधतात. या तिनही घटकांचा आपसांतला संबंध जितका सुंदर बहिणाबाईंनी मांडला तो तसाच कुणाला लिहीता आला नाही. आणि परत ही सगळी रचना अतिशय कलात्मक अशा अष्टाक्षरी छंदात आहे. म्हणजे छंदशास्त्राला कुठेही धक्का लावला नाही. अन्यथा लोकगीतांमध्ये हे स्वातंत्र्य घेतलं जातं.

शेवटच्या कडव्यात एक मोठं सत्य त्या कलानिर्मितीबाबत सांगून जातात. धरतीमधल्या रसाचा जीभेला अनुभव येतो मगच त्याची चव पिंडाला कळते. अनुभवातूनच शब्दकळा समृद्ध होते. रोजच्या जगण्याचा निसर्गाचा समृद्ध असा अनुभव घेतल्याशिवाय कळणार कसं आणि मग ते सारं आपल्या शब्दांत उतरणार कसं?

जगण्याच्या अनुभवांतून संतांची रचना जशी सोपी साधी शब्दवेल्हाळ झालेली आहे तशी बहिणाबाईंची आढळते. सोपानदेव चौधरी यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. त्यावरून कळते बहिणाबाईंचे जिवनविषयक तत्त्वज्ञान सोप्या भाषेतले पण किती पक्की वैचारिक बैठक असलेले होते. त्या बोलतात ‘जो असतो परंतू दिसत नाही तो देव आणि जे दिसतं पण कधीच नसतं ते भेव’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुकनायक’ आणि ’बहिष्कृत भारत’ या आपल्या नियतकालिकांवर बोधवाक्य म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचना वापरल्या आहेत.  शिवाय हे नियतकालीकं चालू करताना सहा महिने आधी सर्व संत वाङ्मय आणून वाचून काढले. त्यांचा अभ्यास केला.  त्यांच्या एका कार्यकर्त्याला याचं मोठं आश्वर्य वाटलं की हिंदू धर्मातील या संतांच्या रचना कशाला? त्याला उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं, ‘आपल्या निरक्षर अडाणी लोकांना समजून सांगण्याची भाषा ही साधी सोपी असली पाहिजे. संतांनी अशी भाषा शेकडो वर्षे वापरली. या भाषेचा अभ्यास केल्या शिवाय आपल्यालाही कळणार नाही सामान्य लोकांशी कसा संवाद साधावा.’  
बहिणाबाई कुणी सामाजिक राजकीय आंदोलनातील नेत्या नव्हत्या. त्या संतही नव्हत्या. पण त्यांना सामान्यांच्या हृदयाची भाषा नेमकी कळली होती म्हणून त्यांची कविता आज इतक्या वर्षांनीही संतांच्या रचनांसारखी लोकांच्या ओठांवर खेळते आहे. हृदयात ठसून बसली आहे.

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

तबलीग-निजामुद्दीन दर्गा विरूद्ध आहेत !


दै. महाराष्ट्र टाईम्स संवाद रविवार १२ एप्रिल २०२० 


तबलीगच्या विघातक हरकतींमुळे देशभर सध्या मोठ्या प्रमाणात संताप आहे. चर्चा चालू आहे. तबलीगच्या दिल्लीतील मरकज (मरकजचा मुळ अर्थ केंद्र, उद्दीष्ट, ध्येय) चा उल्लेख करताना वारंवार निजामोद्दीन औलियाचा उल्लेख येतो आहे. त्याचे कारण म्हणजे तबलिगच्या या मरकजची घटना घडली तो परिसर निजामोद्दीन नावाने ओळखला जातो. आणि त्याचे कारण म्हणजे सुफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांचा दर्गा याच भागात आहे. 

तबलीग आणि निजामोद्दीन ही दोन नावे सोबत घेतली जात असल्याने निजामोद्दीन औलियावरही टीका होवू लागली आहे. 

नेमकं इथेच गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कारण तबलीग ही कट्टरपंथी इस्लामची शिकवण देणारी चळवळ असून हीचा मुळातच सुफी पंथाला विरोध आहे. किंबहुना भारतातील दोन प्रमुख सुफी दर्गे ख्वाजा गरीब नवाज मोईनोद्दीन चिश्ती (अजमेर) आणि ख्वाजा हजरत निजामोद्दीन औलिया (दिल्ली) यांच्या वाढत चाललेल्या भक्तवर्गामुळे, या दर्ग्यांच्या लोकप्रियतेमुळे याला विरोध करण्यासाठी 1926 ला तबलीगची सुरवात भारतात झाली.

तबलीगवर मोठ्या प्रमाणावर आता लिहून येतं आहे पण ही ज्याची प्रतिक्रिया होती त्या सुफी दर्ग्यांबद्दल मात्र अजूनही फारशी माहिती नाही. गैरसमजच फार आहेत. मुळात इस्लामला गाणं बजावणं प्रतिकांची पूजा मंजूर नाही. पण हिंदू प्रभावात भारतीय उपखंडात इथल्या मुसलमानांना सुफी संप्रदाय जवळचा वाटला. मग संतांच्या पूण्यतिथीला उत्सव साजरा करणे ही हिंदू परंपरा उचलून सुफी संतांचे ‘उरूस’ सुरू झाले. दर्ग्यावर चादर चढवणे, फुले वाहणे, उदबत्ती लावणे, नवस बोलणे (मन्नत), गंडा बांधणे, स्त्रीयांचे गळ्यात काळी पोत बांधणे, भजनं गावून परमेश्वराला आळवणे हे सगळे सुफी दर्ग्यात वाढत गेले.

हजरत मोहम्मद पैंगबरांपासून सुफींची परंपरा सांगण्यात येते. सुफींचे पमुख पाच पंथ आहेत. 1. चिश्ती 2. कादरी 3. फिरदौसी 4. सुर्‍हावर्दी 5. शत्तारी. यातील ज्या दर्ग्याची चर्चा तबलीग प्रकरणा निमित्त होते आहे तो निजामोद्दीन औलिया हा दर्गा चिश्ती संप्रदायाचा आहए. भारतातील प्रमुख चिश्ती सुफी संत म्हणजे अजमेरचे ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती. यांना 17 वे ख्वाजा म्हणतात.  त्यांच्यानंतर 18 वे ख्वाजा बख्तीयार काकी (दिल्ली), 19 वे ख्वाजा बाबा फरीद गंजेशक्कर (पाकपत्तन पंजाब). यानंतर ज्यांना 20 वे ख्वाजा म्हणून ओळखले जाते ते म्हणजे निजामोद्दीन औलिया. पुढे 21 वे ख्वाजा म्हणजे बुर्‍हानोद्दीन गरिब. यांचा दर्गा औरंगाबाद जवळ खुलताबाद येथे आहे. याच दर्ग्यात पहिले निजाम मीर कमरोद्दीन असफजहा यांची कबर आहे. या परंपरेतील शेवटचे म्हणजेच 22 वे ख्वाजा म्हणून जैनोद्दीन चिश्ती हे ओळखले जातात. यांचा दर्गा खुलताबादलाच आहे. याच दर्ग्यात सम्राट औरंगजेबाची कबर आहे. 

सुफी दर्ग्यात जावून नवस बोलणे ही परंपरा इस्लामला मंजूर नाही. सम्राट अकबराने पुत्रप्राप्तीसाठी आग्र्याचे ख्वाजा सलिमोद्दीन चिश्ती दर्ग्यात मन्नत मागितली होती (कांही जण हाच संदर्भ अजमेरच्या दर्ग्यात जोडतात. जोधा अकबर आणि मोगल ए आजम चित्रपटांत याचे चित्रण आहे.) आणि पुढे पुत्र प्राप्ती झाल्यावर हा नवस पायी जावून फेडला.   मुलाचे नाव सलिम ठेवले. हाच पुढे जहांगीर या नावाने गादीवर बसला. (सलीम अनारकली या काल्पनिक प्रेम कहाणीने हा बादशहा परिचित आहे.) शाहरूख खान याच्या बंगल्याचे नावही ‘मन्नत’ असेच आहे.

आजही हिंदू मुसलमान सुफी दर्ग्यात नवस बोलतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी पुत्रप्राप्तीसाठी नगरच्या शाहशरिफ दर्ग्याला नवस बोलला होता. म्हणूनच पुढे मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. 

दर्ग्याला नवस बोलणे हे एक वेळ ठीक आहे. त्या संतांच्या नावाप्रमाणे मुलांची नावे ठेवणे ठीक आहे. पण हैदराबादचे दिवाण महाराजा किशनप्रसाद यांनी आपल्या मुलाचे नावच 6 वे निजाम मेहबुबअली पाशा यांच्या नावावरून मेहबुबप्रसाद असे ठेवले होते. 

हजरत निजामोद्दीन औलिया यांचे शिष्य म्हणजे प्रसिद्ध संगीतज्ज्ञ कवी अमीर खुसरो. आपल्या शास्त्रीय संगीतात अमीर खुसरो यांचे योगदान मोठे आहे. आजही हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या नावाने कित्येक बंदीशी गायल्या जातात. अमीर खुसरो यांनी आपल्या गुरूचे वर्णन करताना येशू ख्रिस्त आणि ख्वाजा खिज्र यांचे सर्व गुण शेख निजामोद्दीन औलियात एकवटले असल्याचे नमुद करून ठेवले आहे. मुहम्मद इकबाल यांनी यामुळेच या निजामोद्दीन औलिया यांचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे.

तेरी लहद की जियारत है जिंदगी दिल की
मसीह व खिज्र मे ऊंचा मुकाम है तेरा ॥
(तुझ्या समाधीचे दर्शन करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आकांक्षा आहे. कारण तुझे स्थान हे खिज्र आणि मसीह यांच्यापेक्षा कितीतरी अधिक उंच आहे.)

तबलीग आणि सुफी यांचा विरोध असण्याचे कारण केवळ वरवर नसून मुळात जे इस्लामी तत्त्वज्ञान आहे त्याला छेद देत काही गोष्टी सुफींनी स्विकारल्या ज्या की वेदांतापासून घेण्यात आल्या आहेत यामुळे आहे. डॉ. आजम यांनी असे नमुद केले आहे की, ‘...उपरोक्त तथ्यांच्या आधारावर असे म्हणता येऊ शकते की सूफींच्या परम उद्दिष्टासंबंधी धारणेस बौद्धांच्या निर्वाण आणि उपनिषदांच्या मोक्ष या धारणेशी जोडले जाऊ शकते आणि याची शक्यता अधिक आहे की या दोहोंचा प्रभाव या दृष्टीकोनातून सूफींवर पडलेला असावा.’ (पृ. 262, ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’- डॉ. मोहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, आ.1)

सुफी एक भारतीय पंथ आहे असे समजून त्याचा विचार झाले तर आपल्याला भारतीय मुसलमानांच्या मानसिकतेचा उलगडा होवू शकतो. हा मुसलमान कव्वाली- दर्गे- उरूस-मजारी-नवस-गंडे-चादर चढवणे यांच्या
  माध्यमांतून आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित करू पाहतो आहे. आणि ही परंपरा किमान 800 वर्षांची वारकरी संप्रदाया सारखीच प्राचीन आहे. (ख्वाजा मोईनोद्दीच चिश्ती यांनी 1192 मध्ये या संप्रदायाची भारतीय उपखंडात स्थापना केली.)

भारतातील सर्वात मोठा उरूस हजरम ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांचा अजमेरला भरतो. दसर्‍या क्रमांकाचा उरूस महाराष्ट्रात परभणीला कादरी परंपरेतील सुफी संत तुरतपीर यांचा भरतो. यांनी रामदासांच्या दासबोधाचा ‘मन समझावन’ नावानं उर्दूत अनुवाद केला आहे. तिसर्‍या क्रमांकाचा उरूस खुलताबादला जरजरी बक्ष यांचा भरतो. े

तबलीग चळवळ ही या सुफींच्या विरोधातील आहे. हे कट्टरपंथी देवबंदवाले इतर सुफी मानणार्‍या बरेलवी मुसलमानांना आपले समजत नाहीत. तबलीगचा पहिला विरोध हा हिंदूंना नसून हिंदू प्रभावातील सुफी मानणार्‍या मुसलमानांना आहे हे लक्षात घेतले तर आपल्याला या संघर्षाला समजून घेणे सुलभ होईल. 

(या लेखनासाठी डॉ. मोहम्मद आजम, डॉ. यु.म. पठाण, रा.चि. ढेरे, डॉ. श्रीधर कुलकर्णी यांच्या पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Saturday, April 11, 2020

वाधवान वाधवान। कायद्याची धुळधाण ॥


उरूस 11 एप्रिल 2020

सोशल मिडिया हे असे माध्यम आहे की ते कधी तूमच्यावर उलटेल हे सांगता येत नाही. तेंव्हा याचा वापर जपूनच करायला पाहिजे. जाणते राजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तबलिग प्रश्‍नी फेसबुक लाईव्ह करताना हा विचारच केला नसावा. तबलिगवर बोलताना कारण नसतांना त्यांनी महाराष्ट्रात आम्ही तबलिग मेळाव्यांना कशी परवानगी दिली नव्हती मग दिल्लीला कशी देण्यात आली? दिल्लीचे पोलिस केंद्रीय गृहखात्याच्या ताब्यात आहेत. मग ही जबाबदारी गृहमंत्री अमित शहांवरच येते असा मुद्दा उपस्थित केला.

खरं तर हा विषय इथेच संपलाही असता. पण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचे हेच प्रश्‍न विचारणारे एक पत्र सोशल मिडीयात व्हायरल झाले आणि चर्चेला अजूनच तोंड फुटले. इथे पर्यंतही या विषयाची व्याप्ती फारशी नव्हती. कारण हे पत्र कितपत सत्य आहे हे समोर आले नव्हते. पण असं म्हणतात ना ज्यानं चोरी केली त्याला राहवतच नाही. तसं झालं.

राष्ट्रवादीचे अनिल देशमुख जे की महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत यांनी पत्रकारांसमोर येवून हेच प्रश्‍न केंद्रिय गृह मंत्र्यांबाबत विचारले आणि शरद पवारांचेच मुद्दे परत समोर आणले.

याच्या काही वेळातच महाराष्ट्र सरकारचे गृहखात्याचे सचिव अमिताभ गुप्ता यांचे एक पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले. त्यात त्यांनी उद्योगपती येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटूंबातील 22 जणांना खंडाळा ते पाचगणी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असे नमूद केले आहे. यासाठी कायदा धाब्यावर बसवला गेला.135 कोटी लोक स्थानबद्ध असताना  23 श्रीमंत राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना नियम तोडून प्रवासाची परवानगी देण्यात आली.

न्यूज चॅनेलच्या पत्रकारांनी त्वरीत या प्रकरणातील सत्य समोर आणले. खरोखरच उद्योगपती कपिल वाधवान आपल्या कुटूंबांतील 22 सदस्यांसह पाच एसयुव्हि वाहनांमधून पाचगणीला लॉकडाउन काळात कायदा मोडून गेल्याचे सिद्ध झाले.

तबलिग प्रश्‍नी हवेत गोळीबार करणारे शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणी प्रचंड अडचणीत सापडले. तातडीने सचिव अमिताभ गुप्ता यांना दीर्घ मुदतीच्या रजेवर पाठविण्यात आले.  प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे घोषित करण्यात. माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली सोबतच या पाठीमागे असलेल्या मंत्र्यांवरही संशयाचे बोट ठेवले. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला.

राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री नवाब मलिक यांनी यात पडण्याचे खरं तर काहीच कारण नव्हते. पण त्यांनी आय.ए.एस. व आय.पी.एस. अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा राज्याला अधिकार नाही. भाजपाची मागणी असेल तर त्यांनीच केंद्राला सांगावे आणि या अधिकार्‍यांवर कारवाई करावी असे सांगून हात झटकले.

आता परत एकदा राष्ट्रवादीवाले स्वत: होवून गोत्यात अडकले. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी इ.स. 2017 मधील मोदी सरकारचा जी.आर.च सोशल मिडीयातून समोर आणला. ज्यात हे अधिकार राज्याला देण्यात आल्याचे स्वच्छ नमूद केले आहे. आता नवाबांची पंचाईत झाली.

यावरही कडी केली ती माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी. अमिताभ गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसे आहेत. ते फडणवीसांच्या काळातच कसे मुख्य सचिव बनले होते. हे कारस्थान संघाचेच कसे आहे हे सोशल मिडियात लिहीले. आता प्रत्यक्षात गुप्तांवर कारवाई करा ही मागणी देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा करत आहेत. जे की संघाचे स्वयंसेवक स्वत:ला म्हणवून घेतात. आणि अमिताभ गुप्तांना वाचवू पहाणारे सर्व राष्ट्रवादीचे लोक आहेत. अशी कारवाई करता येते हे सांगणारे पत्रकार प्रवीण बर्दापुरकर हे पण संघाचे आहेत असा आरोप खुद्द खोपडेच सोशल मिडियावर करत आहेत. आणि हे सगळे ‘संघवाले’ गुप्तांवर कारवाई करा, अशी कारवाई करता येते, राज्य सरकारला हे अधिकार आहेत हे सांगत आहेत. आणि दुसरीकडे खोपडे मात्र हे संघाचे कारस्थान आहे असं म्हणत आहेत. हे काय गौडबंगाल आहे हे आता याच लोकांनी स्पष्ट करावे.

याच पद्धतीनं राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री जितेंद्र आव्हाड हे करमुसे प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्या विरोधात पोस्ट लिहीली म्हणून अनंत करमुसे यांना पोलिसांनी उचलून आव्हाडांच्या बंगल्यावर नेले. त्यांच्या समोर करमुसेंना प्रचंड मारहाण केली. या मारहाणीची तक्रारच अधिकृतरित्या करमुसे यांनी पेालिसांत केली. सरकार काही कारवाई करत नाही हे पाहून विरोधी पक्ष नेते राज्यपालांना जावून भेटले. राज्यपालांनी संबंधित अधिकार्‍यांना कारवाई करण्याबाबत विचारले. राज्यपालांचा तो अधिकार आहे. पोलिसांना राज्यपालांनी विचारल्यावर कारवाई करावी लागली. आव्हाडांचे सचिव व इतर चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. याही प्रश्‍नावर राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली.

दिल्ली सरकारने 10 मार्चलाच जमावबंदी लागू केली होती. मग दिल्ली मरकजच्या मेळाव्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. मरकजच काय पण कुठलाच मेळावा, कार्यक्रम आपोआप अनधिकृत ठरतो. हे माहित असताना शरद पवार आणि त्यांची री ओढणारे अनिल देशमुख परवानगीचे तुणतुणे का वाजवत आहेत?

याचा दुसरा अर्थ असा निघतो की यांना माहित असून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे. पत्रकार भाउ तोरसेकर आरोप करत आहेत त्याप्रमाणे चुकीचा संदेश दिला जातो असं म्हणून ठरवून ठरवून पवार चुकीचाच संदेश देत आहेत.

एकेकाळी जास्त माध्यमं नव्हती तेंव्हा 12 वा बॉम्ब स्फोट मस्जीद बंदरला झाला ही पवारांची थाप धकून गेली. पण आता सोशल मिडियाच्या काळात अशा थापा धकून जावू शकत नाहीत. तबलिग मरकज प्रकरणात पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिशाभूल करणारे प्रश्‍न उपस्थित केले. आणि बघता बघता त्यांचेच मंत्री याच सोशल माध्यमांतून उपस्थित झालेल्या प्रश्‍नांनी अडकले आहेत. आव्हाडांच्या 5 कार्यकर्त्यांवर कारवाई झाली आहे. मुख्य सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई झाली आहे. उद्योगपती वाधवान आणि त्यांचे 22 कुटूंबिय क्वारंटाईन करून पाचगणीला अलगीकरणासाठी शासनाच्या निगराणीखाली ठेवल्या गेले आहेत. 14 दिवसांचे हे क्वारंटाईन संपल्यावर त्यांची रवानगी तुरूंगात करावी लागणार.

वाधवान वाधवान जप करत कायद्याची धुळधाण करणार्‍या कायद्याच्या रक्षकांच्या गळ्यात त्यांच्याच कारनाम्याचा फास आवळला गेला आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, April 9, 2020

कोरोना आपत्तीत तुटताहेत भाजी बाजाराच्या बेड्या!


उरूस 8 एप्रिल 2020

कोरोनाच्या आपत्तीत एक मोठं आशादायक चित्र समोर आलं आहे. भाजी आणि फळांची बाजारपेठ मुक्त होवू पहात आहे. ही बाजारपेठ आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजारपेठ कायद्याच्या बेडीत अडकून पडलेली होती. शेतकरी संघटनेनं कायमच हा जाचक कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीतमुळे तयार झालेली व्यापार्‍यांची एकाधिकारशाही शेतमालाच्या मुळावर उठली होती.

कोरोनाच्या निमित्ताने घरोघरी जावून भाजी विक्रीची संधी निर्माण झाली. याचा फायदा घेत चांगल्या भावात काही शेतकर्‍यांनी घरोघरी जावून भाजी विक्रीस सुरवात केली आहे.

या आपत्तीनं समोर आणलेला हा विषय ग्राहकांनी नीट समजून घेतला पाहिजे. शेतकर्‍यांचा खरा शत्रू हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील दलाल व्यापारी नसून त्यांची एकाधिकारशाही निर्माण करणारे धोरण हा आहे. काय म्हणून ठराविक व्यापार्‍यांनाच खरेदीचा परवाना मिळतो? काय म्हणून ठराविकच ठिकाणी हा घावूक बाजार भरतो? शेतकर्‍याला आपला माल विकाण्यासाठी विविध पर्याय का उपलब्ध असत नाहीत? प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या बांधावर येवून माल खरेदी करण्यासाठी व्यापार्‍याला का प्रोत्साहन दिले जात नाही?

असे कितीतरी प्रश्‍न निर्माण होतात. मुळात शेतकर्‍याच्या मालाला ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी जी व्यवस्था आहे ती अशी एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देणारीच का निर्माण झाली? या मार्गाने शेतीचे शोषण करण्याचे धोरण कुणी ठरवले?

आज शेतकरी सरळ ग्राहकाला नेवून भाजी फळं विकतो आहे. मग हेच नियमित स्वरूपात करण्यास कसला अडथळा आहे? सगळेच शेतकरी आपला माल ग्राहकापर्यंत नेवू शकत नाहीत. विक्रीकौशल्य ही स्वतंत्र बाब आहे. अगदी टाटा सारखा बलाढ्य उद्योगपतीही आपली गाडी स्वत: विकत नाही. त्यासाठी डिलर नेमले जातात. तेंव्हा सर्व शेतकरी स्वत:च्या मालाची विक्री करतील ही भाबडी आशाही चुक आहे. विक्री करणार्‍याला भाजीचे उत्पादन घेता येतेच असे नाही.

या सगळ्याची निकोप वाढ विकास व्हावा यासाठी शेतमाल बाजार हा खुला पारदर्शक असणे आवश्यक आहे. तो तसा नसला की एकीकडून शेतकर्‍याचे शोषण होते आणि दुसरीकडे ग्राहकही नाखूश असतो. आणि यातील खलनायक म्हणून व्यापारी दलाल हा समोर दिसायला लागतो. प्रत्यक्षात हा व्यापारी किंवा दलाल हाही या व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. तो त्याचे कौशल्य वापरून शेतकर्‍याचा माल घावूक पद्धतीनं खरेदी करतो. तेवढे एकगठ्ठा पैसे शेतकर्‍याला देतो. या मालाची वर्गवारी साफसुफ पॅकिंग स्टोरेज हे सगळं त्यानं करावं असं अपेक्षीत असतं. या मालावर प्रक्रिया करून तो ग्राहकाला हव्या त्या स्वरूपात आणणे ही त्याची जबाबदारी असते. पण दूर्दैवाने आपल्याकडे शेतमालाच्या बाबत हे घडले नाही. शेतकर्‍यांनी मजबूरीत आपला माल बीटावर आणणे. परवाना असलेल्या दलालांनी व्यापार्‍यांनी त्याची अडवणूक करून कमी भावात तो खरेदी करणे. या मालाचे मोजमापही नीट न करणे. आणि मधल्या मधे काहीच व्हॅल्यू ऍडिशन न करतो लगेच त्याचा लिलाव करून छोट्या विक्रेत्यांना तो विकून टाकणे. म्हणजे हा दलाल केवळ दोन तासांत उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यापेक्षा जास्त प्रमाणात नफा कमावतो आणि मरमर करून हे सगळं कमावणारा नफा तर सोडाच प्रसंगी तोटा सहन करून आपला माल विकतो. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंवा काहीवेळा तर अशी भयानक स्थिती झाली आहे की वाहतूकीचा खर्चही भरून निघू नये इतकी कमी किंमत मिळालेली आहे.

दुसरीकडून भाजी फळं विकणारा कष्टाळू गाडेवाला छोटा किरकोळ व्यापारी दिवसभर विक्री करून किमान पैसे कमावतो. तिसरीकडे हवं तसा माल हव्या त्या पैशात मिळाला नाही म्हणून ग्राहकही फारसा खुश नसतो.
धुमीलची प्रसिद्ध कविता आहे

एक आदमी रोटी सेकता है
एक आदमी रोटी खाता है
एक तिसरा भी आदमी है
वो न रोटी सेकता है
न रोटी खाता है
वो सिर्फ रोटीसे खेलता है
ये तिसरा आदमी कौन है
मेरे देश की संसद मौन है

नेमकी हीच शेती धोरणाची स्थिती बनली आहे.

शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीची जाचक अट उठवली पण ही समिती बरखास्त नाही केली. शिवाय लोकांची मानसिकताही आठवडी बाजारात जावून स्वत: खरेदी करण्याची असल्याने तोही एक अडथळा गाड्यावर घरोघरी जावून विक्री करताना येत होता. कारण आठवडी बाजारातील भाव आणि गाड्यावरील भाव यात मोठा फरक असायचा. या सगळ्याच्या मुळाशी रेाटीशी खेळणारा ‘तिसरा आदमी’ आहे.

कोरोनाच्या निमित्ताने शेतमाल सरळ ग्राहकांपर्यंत पोचवणारी व्यवस्था निकोप पद्धतीनं वाढीस लागली पाहिजे. गावातील बेरोजगार तरूणांनी आपल्या बापाच्या शेतातील माल, दुध विक्रीसाठी छोटी मोठी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. यासाठी येणारे सर्व अडथळे दूर करणे हेच शेतकरी आंदोलन यापुढचे असणार आहे. खुला बाजार मागितल्यानंतर हीच आंदोलनाची भविष्यातील दिशा असू शकते. जी शेतकर्‍यांसाठी आणि समान्य ग्राहकांसाठीही हितावह आहे. नसता परत एकदा सुट सबसिडीच्या भिकारी मागण्या आपण करू लागलो तर शेतकरी आंदोलन काळाच्या मागे पडेल.

शेतकर्‍याच्या बांधावर जावून माल खरेदी करून तो ग्राहकाच्या दारात आणणारी पारदर्शी खुली बाजार व्यवस्था आम्हाला हवी आहे. या व्यवस्थेत जो आपले योगदान देईल त्याचे स्वागत आहे. काहीच न करता केवळ लायसन आहे म्हणून मलिदा खाणारी दलालांची आयतखावू व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची हीच मोठी संधी आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ यशस्वी होतं आहे असं दिसलं तर कंपन्या मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याचा आग्रह धरतील. आणि एकूणच व्यवस्थेवरील ताण कमी होईल. खर्चाची बचत होईल. त्याप्रमाणेच ग्राहकाच्या दारापर्यंत शेतमाल ही योजना दोन्ही बाजूंनी फायदेशीर बनू शकते.

बेरोजगारी वाढली म्हणत असताना आपण रोजगाराच्या संधी दाबून टाकतो आहोत हे लक्षात घ्या. सेवा व्यवसायात मोठ्या संधी कोरोनाच्या निमित्ताने समोर आल्या आहेत. या आपत्तीचा आपण फायदा घेवू. एक नविन स्वच्छ पारदर्शी स्पर्धात्मक अशी शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था उभी करू.

परभणीला माझ्या भावाने भाजी उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना गोळा करून हा ताजा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा उपक्रम चालवला आहे. (लेखात वापरलेला फोटो त्याच उपक्रमाचा आहे.) औरंगाबादला माझे आईवडिल राहतात (नारायणी अपार्टमेंट, 200 ज्योती नगर, औरंगाबाद) त्या अपार्टमेंटचा वॉचमन राजू याचा मोसंबी ज्यूसचा गाडा होता. त्याने लॉकडाउन च्या काळात भाजी आणून जवळच्या लोकांना देण्याची सोय केली. बघता बघता भाजीचा त्याचा व्यवसाय वाढत चालला आहे.

तूमच्या आजू बाजूच्या ‘राजू’ला असेच प्रोत्साहन द्या. तूमच्या माहितीतील शेतकर्‍यांना विचारा. आपण सगळे मिळून या केरोना संकटातून शेतमालाच्या मुक्त पारदर्शी व्यापाराची संधी निर्माण करू. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 8, 2020

तबलीग व आव्हाड प्रश्‍नी मौनाचा पुरोगामी कट !


उरूस 8 एप्रिल 2020

शाहिनबाग आंदोलनातील लोकांनी अवैध (या आंदोलकांना रस्त्यावर बसण्याची परवानगी नव्हती. त्यांची बाजू घेणार्‍यांनी नीट अभ्यास करावा.) पद्धतीनं लाखो लोकांचा रस्ता 100 दिवस अडवून ठेवला होता. त्या आडमुठपणाला ‘तमाशा’ शब्द उपहासाने वापरला तर बर्‍याच पुरोगाम्यांना तो झोंबला होता. या शब्दामुळे माझ्यावर तिखट टीका केली गेली. भयंकर ट्रालिंग झाले. आता हेच सगळे पुरोगामी तबलीगचे कोरोना पसरविण्याचे भयानक घातक प्रकरण समोर आल्यावर मात्र मिठाची गुळणी धरून गप्प आहेत. पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अंगरक्षकांनी विरोधात फेसबुक पोस्ट टाकल्याने अनंत करमुसे यांना प्रचंड मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले आहे. याही बाबतीत ही सगळी जमात-ए-पुरोगामी आळीमिळी गुपचिळी बाळगून शांत आहे.

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होण्याच्या आधी कॉंग्रेस खासदार माजी पत्रकार (आता कॉंग्रेसच्या अधिकृत दावणीला बांधल्या गेल्यावर त्यांना माजी पत्रकार असेच म्हणावे लागेल ना) मा. कुमार केतकर यांनी असा आरोप केला होता की मोदी  शहा निवडणुकाच होवू देणार नाहीत. झाल्यातरी सत्ता सोडणार नाहीत. दंगे होतील. मुळात मोदी पंतप्रधानपदी येणे हाच कसा आंतरराष्ट्रीय कट आहे हे केतकर आवर्जून सांगत होते. भगवान राम जरी पृथ्वीवर अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असंही ते बोलले होते. केतकरांना या आंतरराष्ट्रीय कटाची इतकी माहिती होती तर आंतरराष्ट्रीय पोलिसांना त्यांनी का नाही दिली?

2019 च्या निवडणुका पार पडल्या. आधीपेक्षा जास्त जागा निवडून येउन मोदीच परत पंतप्रधान झाले. त्यामुळे केतकरांची भविष्यवाणी खोटी ठरली. कुठेही निकालावर दंगे झाले नाहीत. मग हा कट असल्याची अफवा केतकर का पिकवत होते? हेच केतकर आता तबलीग आणि जितेंद्र आव्हाड प्रकरणी कुठे आहेत?

कलम 370, ट्रिपल तलाक, राम जन्मभूमी निकाल, सीएए कायदा आणि त्याच्या विरोधातील शाहिनबाग आंदोलन या सर्वांवर जमात-ए-पुरोगामी सगळे तुटून पडले होते. राम जन्मभुमी प्रकरणांत तर रोमिला थापर सारख्या पुरोगाम्यांनी लिहीलेली इतिहासाची पुस्तकेही खोटी असल्याचे सिद्ध झाले.

माझ्यासारखा एक सामान्य माणूस जेंव्हा शाहिनबागेला ‘तमाशा’ हा शब्द उपहासाने वापरतो तेंव्हा तुटून पडण्याची उबळ यांना येते. जे कधी नियमित माझ्या ब्लॉगवर कधी व्यक्त होत नाहीत. विरोध दर्शविण्यासाठी का होईना ज्यांना काही लिहीण्याची उसंत नसते. ते सगळे महाराष्ट्रातले पुरोगामी मित्र एका शब्दावर आक्रमक होवून शब्दबाण बरसू लागतात.

आणि आज भारताला इतका मोठा धोका तबलीगींनी दिला तेंव्हा मात्र शांत बसतात. महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपमाळ ओढणारे एका सामान्य माणसाला महाराष्ट्राचा मंत्री आपल्या बंगल्यावर आणून प्रचंड मारहाण करतो आणि इथेही हे शांत बसतात?

आता मात्र मला वेगळीच शंका येउ लागली आहे. लहान मुलांच्या भांडणात ज्याची चुक असते ज्याने मारहाण केली असते तोच मोठ्यानं ओरडायला लागतो रडायला लागतो. तसेच कुमार केतकरांना हा सगळा जमात-ए-पुरोगाम्यांचा कट माहित होता. ते स्वत:ही याच कटात सहभागी आहेत.  म्हणून त्यांनीच आधीच आरडा ओरड सुरू केली. प्रत्यक्षात ते म्हणाले तसे काहीही झाले नाही. निवडणुक शांततेत पार पडली. नविन सरकारने सत्ताग्रहण केले. या निवडणुकीत हिंसाचारही अतिशय कमी झाला. म्हणजे या जमात-ए-पुरोगामींचेच ढोंग उघडे पडले.

आव्हाडांच्या प्रकरणांतही मारहाणीची माहिती समोर आली आणि या सगळ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यातला ढोंगीपणा उघड झाला.

ज्यानं आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली त्याच्यावर कायद्यान्वये जी काही कारवाई अपेक्षीत ती झालीच पाहिजे. त्याबाबत मला कसलीही सहानुभूती नाही. तो कुणाही पक्ष संघटनेचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कायद्याद्वारे शिक्षा मिळावी. पण एखाद्या राज्यात कायदा करणारे मंत्रीच जर कायदा स्वत:च्या हातात घेत असतील तर सामान्य माणसांनी करायचे काय?

हेच आव्हाड आणि त्यांचे नेते शरद पवार मोदी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍यां बाबत कसे वागले होते? मुुंबईला सोशल मिडीयावर ट्रोल होणार्‍या मोदी भाजप विरोधी तरूणांची बैठक घेवून शरद पवारांनी या तरूणांच्या पाठिशी आपण असल्याचे सांगितले होते. शिवाय त्यांना लागणारी कायदेशीर मदतही करणार असल्याचे घोषित केले होते.

मग आता फेसबुक पोस्टवरून ज्याला मारहाण झाली त्याला शरद पवार कायदेशीर मदत करणार का? शरद पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूचे आहेत ना? म्हणजे त्यांनीच तशी घोषणा केली होती.

शिवाय मा. जितेंद्र आव्हाड हे महान गांधीवादी आहेत. ते गांधींची अहिंसा मानतात असं त्यांच्याच ट्विटरवरून दिसून येतं. मग आता त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या बंगल्यावर कुणाला मारहाण होते तो भाग अहिंसेच्या कक्षेत येत नाही का? का त्यांचा गांधीवाद त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पडल्यावर सुरू होतो आणि बंगल्याच्या आत येताना चपलीसारखा ते गांधीवादही बाहेरच सोडून टाकतात?

पुरोगामी माध्यमांची भूमिका तर अजूनच विचित्र. कुठलेच वर्तमानपत्र या बातमीची दखल घेण्यास तयार नाही. सोशल मिडियातून यावर आवाज उठवला जात आहे. पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी आपल्या ऍनालायझर या वेब चॅनलवरून याला वाचा फोडली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनंत करमुसे या अभियंत्याला मारहाण झाली त्याची बाजू घेतली की लगेच हे भाजप संघवाले आहेत, भिडेंच्या आंबराईतील हे नासके आंबे आहेत, नथुरामाच्या अवलादी आहेत असली टीका सुरू होते.

मला स्वत:ला करमुसे यांची जात काय हे माहित नाही आणि समजून घेण्यात रस नाही. ते कोणत्या संघटनेचे आहेत याचाही पत्ता नाही. त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टवर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली तरी मी त्यासाठी बचावार्थ पुढे येणार नाही.

अनंत करमुसेला जितेंद्र आव्हाडांच्या समोर मारहाण झाली. त्यांच्या निवास्थानी मारहाण झाली. हे निषेधार्ह आहे. आव्हाडांना मंत्री मंडळातून काढून टाकले पाहिजे. आव्हाडांच्या समर्थनार्थ सोयीचा बुद्धीवाद करणार्‍यांचाही मी निषेध करतो.

देशपातळीवरील भयानक घातक प्रकरण तबलीग असो की महाराष्ट्रातील एका व्यक्ती पुरते आव्हाड प्रकरण जमात-ए-पुरोगामी ही एका आंतरराष्ट्रीय कटात सहभागी आहेत की काय अशी शंका आता येत चालली आहे. नसता ते असे मौन  बाळगून चुप्प बसले नसते.


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Sunday, April 5, 2020

गाउलीच्या पावलात सांज घरा आली !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी 5 एप्रिल 2020

सांज

गाउलीच्या पावलात सांज घरा आली
तुंबलेल्या आचळांत सांज भरा आली
शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली
आतुरल्या हंबराचा सांज कान झाली

माउलीच्या वातीतून सांज तेज ल्याली
माउलीच्या गीतातून सांज भाव प्याली
माउलीच्या अंकावर सांज मुल झाली
मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली

वहिनीच्या हातासाठी सांज क्ष्ाुधा झाली
वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली
वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली
वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली

-बी. रघुनाथ
(समग्र बी. रघुनाथ खंड 1 कविता, प्रकाशक गणेश वाचनालय परभणी.)

संध्याकाळी घराकडे परत निघालेल्या गायी, त्यांच्या खुरांमुळे उडालेली धूळ, त्या धुळीत मिसळलेली मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे, ओढ, हुरहुर, अंगणात तुळशीसमोर लावलेला दिवा, अंगणार आजीच्या मांडीवर पहूडलेला तान्हूला, आत चुलीपाशी भाकरी करणारी घरची गृहीणी अशा वातावरणाला शब्दबद्ध करते बी. रघुनाथांची ही कविता.

काळ कितीही आधुनिक होत जावो अगदी पहाटेचा सुर्य उगवतानाचा प्रहर आणि सुर्य मावळतानाची सांजवेळ या दोन्ही प्रसंगी सारं विसरून माणूस पार अगदी आदिम काळात जावून पोचतो. संध्याकाळी हळू हळू वातावरण गडद होत जातं. अगदी दाट अंधार पडतो. तुळशीसमोरच्या दिव्याचा छोटासा प्रकाश मनात आशेचा किरण जागवतात. 

1940 च्या दरम्यान कधीतरी बी. रघुनाथांनी लिहीलेली ही कविता. आज 80 वर्षांनंतरही अगदी ताजी वाटत राहते. पहिल्या कडव्यात घराकडे परतणार्‍या गायी आणि त्यांची हंबरणारी वासरं येतात. त्यांच्या निमित्ताने ताटातुट झालेल्या सगळ्यांच जीवांचे प्रतिक कवितेत प्रकट होते. 

दुसरं कडवं मोठं विलक्षण आहे. काळवंडत चाललेली सांज आपल्या मायमाउल्यांनी तुळशीसमोरच्या छोट्याशा दिव्याच्या तेजाने उजळून टाकली आहे. ही एक फार मोठी आशादायी बाब बी. रघुनाथ लिहून जातात. सगळ्या कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी या आपल्या बायाबापड्या नेहमीच सज्ज राहिल्या आहेत. संध्याकाळी तुळशीसमोर अंगणात दिवा लावणे असो की अमावस्येला पणत्या लावून सण साजरा करणं असो. अंधारावर मात करण्याची अदम्य अशी इच्छाशक्ती बायाबापड्यांच्या या कृतीतून सतत दिसत आली आहे. 

मांडीवरच्या तान्ह्यासाठी ती स्तोत्र, अंगाई काहीतरी गात आहे. त्यामुळे ‘माउलीच्या गीतातून सांज भाव प्याली’ असे जे शब्द येतात ते फार अर्थपूर्ण आहे. केवळ अंधारावर मातच केली जाते असे नाही तर तिच्या गीतातून एक सुंदर असा भाव व्यक्त होतो आहे. 

स्त्रीयांचे हे एक वैशिष्ट्य आहे. कष्ट करताना त्यांनी जो कलाविष्कार प्रकट केला आह तो मोठा विलक्षण राहिलेला आहे. भुपाळ्या, आरत्या, ओव्या, स्तोत्रं या सगळ्यांतून बाईने सामान्य कष्टकरी आयुष्याला भावात्मक सौंदर्य बहाल केलं आहे. रांगोळीतून कलात्मक दृष्टी बहाल केली आहे. जात्यावरच्या ओवीतून तर ही कलात्मकता ठसठशीतपणे समोर येते. म्हणूनच एका जात्यावरच्या ओवीत बाईने जे जीवन आणि कला याबद्दलचे वैश्‍वीक सत्य सांगितले आहे ते तसे त्या भाषेत आणि इतक्या साध्या पद्धतीनं आजतागायत कुणालाच लिहीता आले नाही.

दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा
गाण्याच्या ओढीने ओढीते दगडा

बाईच्या आविष्कारातील हे सौंदर्य बी. रघुनाथ नेमके टिपतात. गाय, माय या नंतरचे तिसरे कडवे घरी कष्ट करणार्‍या प्रौढ गृहीणीला समर्पित आहे. सावरकरांच्या शिवाय या पद्धतीनं वहिनीला काव्यात कुणी स्थान दिलेलं नाही. 

घरातील ही मोठी वहिनी सगळ्यांसाठी जेवण बनवते आहे. तिच्या हाताला चव आहे. तीच्या हातचं खाण्यासाठी सांज ‘क्ष्ाुधा’ झाली आहे. भूक लागली आहे. आणि ती जे काही ताटात वाढते त्याची गोडी अविट आहे. ‘वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली’ अशी ओळ त्यासाठीच येते.

शेवटच्या दोन ओळी तर अतिशय सुंदर आहेत. दिवसभराची घाई कामाची गडबड आता शांत झाली आहे. सुर्य मावळून चंद्र उगवला आहे. दिवसभराचा कामाचा ‘तीव्र’ सप्तक संपून सांज ‘मंद्र’ झाली आहे. अगदी शेवटच्या ओळीत वहिनीच्या मुखासाठी चंद्राची उपमा येते. आणि कवितेचा कलात्मक शेवट होतो. 

मराठी नव कथेची पायवाट ज्यांनी घालून दिली असे कथाकार बी. रघुनाथ, निजामकालीन मराठवाड्याच्या जनजीवनाचा आडचा छेद आपल्या लेखनातून दाखवून देणारे बी. रघुनाथ, ‘आज कुणाला गावे’ अशी तीव्र सामाजिक भाष्य करणारी कविता लिहीणारे बी. रघुनाथ मोजक्या शब्दांत गाउली, माउली आणि घरावरची साउली (वहिनी) अशा तिन स्त्री प्रतिकांतून ‘सांज’ ही कविता रसिकांच्या ओंजळीत टाकतात. हा नाजूक कलाविष्कार मोठा विलक्षण आहे. 

एखाद्या संगीतकाराने मारवा अथवा पुरिया धनाश्री रागाच्या सुरावटीत या कवितेची चाल बांधून हीचे सौंदर्य अजून वाढवावे असे मला फार वाटत रहाते.

(बी रघुनाथ रेखाटन ल. म. कडू यांचे आहे)

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Wednesday, April 1, 2020

जिथल्या तेथे पंख मिटूनियां निमूट सारी घरेपाखरे


उरूस, 1 एप्रिल 2020

शिशासारखी भरली मळभट
मृत्यूची चाहूल सुरूंना
अवचित हबकुनि थबके वारा
वाळूंतुन पाऊल सुटेना

घळींघळींतुन अडेआदळे
उजेड वेडा दिसांधळासा
मुकी जखम झाल्या हृदयाचा
तटून आहे एक उसासा

जिथल्या तेथे पंख मिटुनिया
निमूट सारी घरेपांखरे
राख माखुनी पडून आहे
लूत लागले सुणे बिचारे

त्रिशूळसा अन् कुणी कावळा
अवकाशाला कापित येतो
जातां जातां या जखमेचा
झटकन् लचका तोडुन नेतो
-बा.भ.बोरकर
(गितार पृ.44, मौज प्रकाशन. बोरकरांची समग्र कविता, खंड 2, पृ. 41. देशमुख आणि कंपनी)

सध्या लॉकडाउन मुळे बोरकरांच्या या ओळी ‘निमूट सारी घरेपाखरे’ सर्वत्रच लागू पडत आहेत. सारं कांही ठप्प आहे. नेमके हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. सर्वत्र एक करडा राखेसारखा रंग जाणवतो आहे. बोरकरांनी जी पहिली ओळ लिहीली त्यालाही हा काळ अनुकूल आहे.

ही शांतता आहे पण भयाण आहे. कोरोनाच्या भयाचे सावट सार्‍या जगावरच पसरले आहे. रातअंधळा असा शब्द आपण नेहमी वापरतो. पण ‘दिसांधळा’ असं काही नाही. बोरकरांनी नेमका हा नविन शब्द तयार करून कवितेत चपखल वापरला आहे. सध्याची परिस्थिती मुकी जखम झाल्यागत आहे. भळभळ काही वहात नाही. काही व्यक्त करता येत नाही. पण सारे काही ठप्प असल्याने मनाची विचित्र अशी घालमेल होते आहे.

पंख मिटून पाखरे रात्री झाडावर शांत बसून असतात हे आपल्याला माहित आहे. पण इथे लॉकडाउन मुळे घरेही पंख मिटून आहेत. तेंव्हा बोरकरांच्या कवितेतील ही ओळ इथेही लागू पडते आहे.  तिसर्‍यात जो ‘सुणे’ हा शब्द आला आहे त्याने बर्‍याच जणांचा गोंधळ होतो. एक तर हा शब्द कोकणी आहे. मराठी नाही. सुणे याचा अर्थ कुत्रा. लूत लागलेले कुत्रे जसे पडून असते तसे सगळे जगणे पडून आहे असा अर्थ इथे आहे. बोरकरांच्या प्रतिभेचा कस या शब्दावर लागलेला आहे. एक तर सुणे हा कुत्र्यासाठी आहे पण त्यातून ‘जिणे’ असाही ध्वनीत अर्थ निघतो. दुसरा एक अर्थ सुने म्हणजे एकटे असाही निघतो. या सगळ्यामुळे या शब्दाचे सौंदर्य अजूनच वाढले आहे.

शेवटच्या ओळीत ‘त्रिशुळसा कुणी कावळा’ अशी प्रतिमा येते. इथे कावळ्याला त्रिशूळसा म्हटलेले नसून तो आभाळातून खाली उतरताना तिरका येतो म्हणजेच जमिनीशी जवळपास 60 अंशाचा कोन करतो. आणि नेमका हा कोन त्रिशुळाचा दैत्याला मारतानाचा आहे. देवीच्या हातातील त्रिशुळाने ती दैत्याचा वध करते तो कोन आहेच तसाच कावळ्याचा जमिनीवर झेपावण्याचा कोन आहे.

कोरोनामूळे मृत्यूच्या भयानक बातम्या कानावर येत आहेत. या बातम्या म्हणजे कावळ्याने जखमेचा लचका तोडून न्याव्या तशाच वेदनादायी आहेत.

बोरकरांनी ही कविता 8 एप्रिल 1962 ला लिहीली. आज 58 वर्षांनी बरोबर एप्रिल महिन्यातच आपल्याला हाच अनुभव येतो आहे. हा एक विलक्षण योग आहे. बोरकरांची प्रतिभेला सलाम.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575