Sunday, March 28, 2021

28 मार्च - गोविंद स्मृती !



उरूस, 28 मार्च 2021 

आषाढी एकादशीची जशी वारकर्‍यांना वर्षभर ओढ लागलेली असते त्यांची पावले जशी पंढरपुरकडे धाव घेतात तशी आम्हा काही जणांना 28 मार्चची ओढ लागलेली असते. आमची पावले कलश मंगल कार्यालय येथे धाव घेतात. या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम जाहिर रित्या करता आला नाही. म्हणून गरूड ऍडच्या कार्यालयात गोविंद देशपांडे यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कोण हे गोविंद देशपांडे? त्यांचा आमचा काय संबंध? आज त्यांची जयंती. त्यांना जावूनही आता 14 वर्षे झाली. अजूनही तो दिवस आठवला की मला काबरं बावरं व्हायलं होतं. औरंगाबादला येवून मी स्थाईक झालो होतो. दोनचारच वर्षे झाली होती स्थिरस्थावर होवून. काकांसारख्याचा (मी त्यांना काका म्हणायचो. अनिल पाटील मामा म्हणायचे, काकांचे सहकारी माधुरी गौतम आणि नामदेव शिंदे सर म्हणायचे) फार मोठा वडिलकीचा आधार मला या शहरात झाला. 

मी दशमेशनगरला माझ्या मामाच्या घरात रहात होतो. तिथेच तळघरात पुस्तक व्यवसायाचे कार्यालय थाटले होते. काकांना लक्षात आले की याला जागेची गरज आहे. त्यांनी समर्थ नगरची सध्या माझे ऑफिस आहे ती जागा मला एकदा दाखवली. तेंव्हा ती धुळखात अर्धवट बांधलेल्या अवस्थेत पडलेली होती. जागा मला आवडल्याचे समजल्यावर जागेची बोलणी माझ्या माघारीच त्यांनी उरकली. आणि संध्याकाळी मी त्यांच्या समर्थनगरच्या ऑफिसला गेल्यावर मला सांगितलं घेतली जागा तुझ्यासाठी. मी एकदम आवाकच. मी त्यांना म्हणालो पण काका माझ्याकडे आत्ताच पैसे नाही देवू शकत . ते म्हणाले मग कधी देउ शकतोस? मी म्हणलो डिसेंबर मध्ये. मग ते म्हणाले मग दे मला डिसेंबर मध्ये. मी दिले माझ्याकडून. मला काही बोलताच येईना. काय म्हणून हा माणूस आपल्यावर इतके प्रेम करतो माया लावतो.

माझ्या सारखी कित्येकांची अशीच भावना होती. काकांच्या अचानक जाण्याने आम्ही जवळचे असे सगळेच हबकून गेलो. काकांना संसार मुलबाळ काहीच नव्हते. आई वडिल आणि तिघे भाउ हाच त्यांचा संसार. काकांच्या जाण्याने आम्हाला झालेले दु:ख पाहून जवळपासच्या लोकांना कळेचना की यांना इतकं वाईट वाटायला काय झालं?

काकांचे निकटवर्तीय राम भोगले, माजी आमदार कुमुदीनी रांगणेकर, आर्किटेक्ट पाठक, डॉ. सोमण यांनी सुचवले की दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम करण्यात यावा. आम्हाला आमच दु:खातून बाहेर पडायला खरेच एक वाट सापडली. काका गेल्यावर तीन महिन्यांनी 3 ऑगस्ट 2007 मध्ये त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही कार्यक्रम सादर केला. त्यांच्या व्यक्तीचित्रांचे एक पुस्तक ‘अशी माणसं’ नावाने प्रकाशीत केले. दरवर्षी काकांच्या जन्मदिनी म्हणजेच 28 मार्च रोजी कार्यक्रम घेण्याचे ठरवले. पहिला कार्यक्रम 28 मार्च 2008 रोजी साजरा झाला. तेंव्हा पासून न चुकता गेली 13 वर्षे हा कार्यक्रम सातत्याने होत आलेला आहे. कार्यक्रम कलश मंगल कार्यालय, उस्मानपुरा, औरंगाबाद येथेचे घेण्यात येतो. हे पण याचे एक वैशिष्ट्य. काकांचे नातेवाईक, त्यांचे स्नेही आणि नंतर आता आमच्याशी संबंधीत लोक याला आवर्जून गोळा होतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम घेता आलेला नाही. याची एक खंत आम्हाला आहे.

आज काकांची जयंती. त्यांचे एक सुंदरसे तैलचित्र सरदार जाधव या चित्रकार मित्राने काढून दिले. या सोहळ्याला दहा वर्षे पुर्ण झाली तेंव्हा दशकपूर्तीचा मोठा सोहळा आम्ही कलश मंगल कार्यालयात केला होता. त्याच कार्यक्रमात या चित्राचे अनावरण चित्रकार दिलीप बढे यांच्या हस्ते करण्यात आले. गोविंद देशपांडे यांचे सर्व लिखाण (गद्य) एकत्र करून त्याचे सुंदर पक्क्या बांधणीतील पुस्तक ‘गोविंदाक्षरे’ नावाने प्राचार्य रा.रं.बोराडे यांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले.

‘गोविंद सन्मान’ हा पुरस्कार सोहळ्याच्या आठव्या वर्षांपासून दिला जातो आहे. पत्रकार गोपाळ साक्रीकर, नागनाथ फटाले, कादंबरीकार बाबू बिरादार, पक्षीतज्ज्ञ दिलीप यार्दी, दखनीचे अभ्यासक लेखक ऍड. अस्लम मिर्झा यांना दिल्या गेला. मागील वर्षी नकाशाकार पंडितराव देशपांडे यांना पुरस्कार जाहिर झाला पण कोरोनामुळे प्रदान सोहळा घेता आला नाही. तसेच या वर्षी पुरातत्त्व अभ्यासक डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी यांना जाहिर करण्यात आला. कोरोना आपत्तीत हा सोहळा स्थगित ठेवण्यात आला आहे. 

काकांच्या तैलचित्राला आज गरूडच्या कार्यालयात नामदेव शिंदेने हार घातला. माधुरी गौतम, लोकसत्ताचे अनिल पाटील, सिद्धकला फायनान्शीएल ओपीडीचे धनंजय दंडवते आणि मी अशा पाच जणांनी काकांच्या आठवणी जागवल्या. आश्चर्य याचेच वाटते की आजही हा माणूस आमच्या आठवणीत ताजा आहे. सार्वजनिक क्षेत्रात आमच्यासारख्या कित्येकांना त्यांनी निस्वार्थपणे मदत केली. निरसलपणे सामाजिक क्षेत्रात काम केले. अशा वृत्तीची आठवण जागवणे हे आपले कर्तव्यच आहे. काकांच्या स्मृतीला आदरांजली. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा यथायोग्य प्रयास आम्ही करत राहू. मागील वर्षीचा आणि या वर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळा कोरोना निर्बंध उठल्यानंतर घेतला जाईल.    

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


No comments:

Post a Comment