Thursday, July 30, 2020

‘उसवलेले दिवस’- बाबा आमटेंवर काही प्रश्‍न


उरूस, 30 जूलै 2020

दैनिक लोकसत्तामधून बाबा आमटेंच्या आनंदवनवर दोन भागाची लेखमाला प्रसिद्ध झाली. त्यावर आता बर्‍याच प्रतिक्रिया उमटत आहेत. परत एकदा सामाजिक चळवळींची चिकित्सा केली जात आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी अंतर्नादच्या दिवाळी अंकात, ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ हा लेख (अंतर्नाद दिवाळी 1999) लिहीला होता. त्यावरही तेंव्हा बरेच वादंग उठले होते.

यातले दोन उल्लेख इथे नमुनादाखल देतो आहे. शरद जोशी लिहीतात, ‘.. दुसर्‍याचा उद्धार करणयातली झिंग ही काही और असते. बर्‍याच स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांमध्ये मला एक आत्मकौतुकी भावना आढळते. स्वत:वरच ते कमालीचे खूश असतात. वरवर जरी त्यांनी आपण हे सर्व इतरांसाठी करतो असा आव आणला तरी प्रत्यक्षात मात्र आपल्या तोजोवलयात इतरांना सामील करून घ्यायची त्यांची अजीबात तयारी नसते. सामाजिहितापेक्षा आपल्या संस्थेची महती, प्रॉपर्टी व एकूण स्थान कसे उंचावेल याच्यावरतीच त्यांचे जास्त लक्ष असते. तुम्ही त्यांच्या विविध संस्थांची ट्रस्ट डिड एकवार बघा. यातल्या बहुतेक जणांनी विश्‍वस्त म्हणून आपणच तहहयात राहू याची तजवीज करून ठेवलेली असते. बाहेर यांनी लोकशाही मुल्यांचा कितीही गवगवा केला तरी स्वत:च्या संस्था मात्र ते ‘हम करे सो कायदा’ याच भूमिकेतून चालवीत असतात.’ (अंगारमळा, पृ. 167, प्रकाशक-जनशक्ती वाचक चळवळ)

शरद जोशींनी यांचे हे विचार इतर सामाजिक चळवळींना लागू पडतात. पण प्रत्यक्षात कुष्ठरोग निर्मुलनाला साठी लिहीलेले बघा, ‘,,, एकेकाळी कुष्ठरोग ही एक महाभयंकर समस्या होती. महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले. त्यातून अनेकांनी स्फुर्ती घेली. आपापले आश्रम, नगरे, वन स्थापली. उदंड सरकारी आणि खाजगी निधी मिळवले. पण कुष्ठरोग मुळातून नष्ट करण्यासाठी लागणारे संशोधनाचे कार्य कोणी हाती घेतले नाही. कोण्या अनामिक संशोकाने ते केले, त्यामुळे कुष्ठरोग आता साध्य बनला. त्याची किळसही फारशी राहिली नाही; पण तरी त्यांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या महात्म्यांच्या धुपारत्या शेजारत्या चालूच आहेत. कुष्ठरोग संपला तर दुसर्‍या कोणाच्या सेवेचे काम घेऊ. कोणा दुष्टाने हा कुष्ठरोग संपवला कोण जाणे. पण त्यामुळे आमच्या विभुतीतील ‘ज्वाला आणि फुले’ संपली नाहीत, असा त्यांचा निर्धार आहे.’ (अंगारमळा, पृ. 175) 

शाहू पाटोळे हे तरूणपणी बाबा आमटेंच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी शाहू पाटोळे यांचे वय 23 वर्षाचे होते. (शाहू पाटोळे सध्या नागालँड मध्ये कोहिमा आकाशवाणीच्या वृत्त विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकतीच मुंबई दूरदर्शन येथे त्यांची बदली झाली आहे)

भारत जोडो यात्रेच्या काळात त्यांना समाजवादी चळवळीबद्दल प्रश्‍न पडायला लागले. त्याची मर्यादा जाणवायला लागली. त्यांनी हे प्रश्‍न समोर मांडले तर त्यांना हळू हळू बेदखल करण्यात आले. नंतर तर त्यांना या संपूर्ण चळवळीतूनच बाहेरचा रस्ता दाखवला गेला. दुसर्‍या यात्रेत त्यांना सहभागी करून घेण्यात आले नाही.

या चळवळीबद्दल त्यांनी तेंव्हाही लेखन केले होते. लातूरच्या दै. राजधर्म शिवाय कुणीच त्यांचे हे परखड लिखाण छापले नाही. ‘जयकारा’ या पंजाबी साप्ताहिकानं, मराठी ब्लिट्झने, कोलकोत्याहून प्रकाशीत होणार्‍या हिदंीतील ‘रविवार’ या साप्ताहिकाने शाहू पाटोळे यांचे लेख तेंव्हा प्रकाशीत केले.

शाहू पाटोळे यांची तेंव्हाची भारत जोडो आंदोलनाची डायरी समाजवादी चळवळीत जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली. हीची दूसरी प्रत डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडे होती. त्यांचा मुलगा लेखक प्रा. श्रीरंजन आवटे याने घरातील जून्या सामानातून ही डायरी शोधून पाटोळे यांना आणून दिली.

‘भारत जोडो’ चा रौप्य महोत्सव साजरा होत असताना त्या निमित्ताने यावर वैचारिक चर्चा झाली पाहिजे हे जाणून आम्ही हे पुस्तक रूपाने प्रकाशीत करण्याचा निर्णय घेतला.  10 फेब्रुवारी 2012 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली. अल्पावधीतच दुसरी आवृत्ती 2015 मध्ये (शाहू यांच्या ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या दुसर्‍या पुस्तकासोबत’) प्रकाशीत झाली.

बाबा आमटेंवर लिहीताना शाहू पाटोळे यांनी आपल्या मनोगतात एक अतिशय प्रमाणीक भावना बोलून दाखवली आहे,

‘... बाबाही माणस होते. कधी-कधी बाबानंा वैचारिक बेस आहे की नहाी अशी शंका यायची. बाबांना असामान्य समजणारे बाबा सामान्य बोलल्यावरही कौतूक करायचे ! निव्वळ शब्दांचे बुडबुडे फोडण्यापेक्षा बाबा आनंदवनातच राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांची किंमत कमी झाली नसती. बाबांनी भारत जोडो यात्रा काढायला भरीला पाडणारांनी बाबांना ‘स्वस्त’ करून टाकलं. त्याचं लगेचचं उदाहरण म्हणजे बाबांचा नर्मदा बचाव आंदोलनातील सहभाग होय. जलसमाधीची जाहीर घोषणा करणारे बाबा शेवटी आनंदवनातच परतले ना!’

स्वत: शाहू पाटोळे यांनी समाजमाध्यमांवर लोकसत्तातील लेखावर एक पोस्ट लिहीली. या पुस्तकाबद्दल वाचकांना उत्सुकता निर्माण झाली. हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध आहे. खालील क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा. पुस्तक पाठविण्याची सोय केली जाईल. या निमित्ताने सविस्तर सखोल वैचारिक चर्चा व्हावी हा शुद्ध प्रमाणीक हेतू आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, July 27, 2020

वाङ्मयीन नियतकालिके : 'छापील' नव्हे 'डिजिटल'चे दिवस


दै. सामना सोमवार 27 जूलै 2020 विशेष पुरवणी

साधारणत: 2010 नंतर समाज माध्यमांचा (सोशल मिडिया)  बोलबाला वाढायला लागला तस तसे छापिल नियतकालिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दिवाळी अंक यांच्यावर गंडांतर यायला सुरवात झाली. मुळात संपूर्णत: व्यवसायिक असलेल्या वृत्तपत्रांचीच परिस्थिती गंभीर बनत चालली होती. त्यामुळे वाङ्मयिन/वैचारिक नियतकालिके यांच्याबाबत तर काही बोलायलाच नको. हा सगळा कारभार मुळातच हौशी पद्धतीनं महाराष्ट्रात चालत आलेला होता.

त्यातही परत आपण नको तेवढे सार्वजनिक वाचनालयांवर अवलंबून असलेलो. वैयक्तिक पातळीवरचा ग्राहक महाराष्ट्रात फार कमी. जो काही आहे तो प्रामुख्याने सार्वजनिक ग्रंथालये हाच. आणि यांचा प्राणवायू म्हणजे शासकिय अनुदान.

या सगळ्यांचा फटका 2010 नंतर बसायला लागला. या नियतकालिकांच्या वाटपाचा मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. सर्वच नियतकालिकांचा कारभार सरकारी पोस्ट खात्यावर अवलंबून होता. पण पोस्टाची व्यवस्था ढिसाळ बनली आणि त्याचाही एक मोठा फटका या नियतकालिकांना बसला.

आता कोरोनाच्या प्रचंड मोठ्या जागतिक आपत्तीत तर शेवटचा घाव बसावा आणि झाड कोसळून पडावे अशी अवस्था मराठी नियतकालिकांची झालेली आहे. ही आपत्ती दुसरीकडून एका मोठ्या संधीला जन्म देते आहे.
ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून ही नियतकालिके नविन आकर्षक स्वरूपात समोर येवू लागली आहेत. आता हाच एक योग्य पर्याय दिसतो आहे. ‘साधना’ साप्ताहिकाने आपला अंक ऑनलाईन देण्यास सुरवात केली आहे. पिडीएफ स्वरूपातील हा अंक मोबाईलवर सहज उपलब्ध आहे.

‘अक्षरनामा’ सारखे एक चांगले नियतकालिक ऑनलाईन चालवले जाते. त्याची मांडणी अतिशय चांगली आहे. मजकूर तपासलेला व्याकरणाच्या किमान चुका असलेला असतो.

ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा अंक ऍण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या कुणाही माणसापर्यंत तूम्ही ताबडतोब पोचवू शकता. लेखांची संख्या किंवा शब्दसंख्या यावरही कसले बंधन नाही. आधी ज्या प्रमाणे ठराविक तारखेला अंक निघायचा. म्हणूनच त्याला नियतकालिक संबांधले जायचे. तसंही आता करण्याची गरज उरलेली नाही. यावर कधीही कितीही मजकूर टाकता येवू शकतो.

आधीच्या व्यवस्थेत वाचकांचा प्रतिसाद कळायला वेळ लागायचा. बर्‍याचदा तर हा प्रतिसाद कळायचाही नाही. पण आता तो तातडीने मिळू शकतो. काही डिजिटल पोर्टलवर मोठ्या गंभीर मजकूरावरही लोक सविस्तर प्रतिसाद देतात. टीका केली जाते. समर्थन करतानाही सविस्तर केले जाते. हा एक फारच मोठा फायदा या नविन माध्यमाचा आहे. पूर्वीची माध्यमे एकतर्फा होती. पण आता ही नविन माध्यमे म्हणजे खर्‍या अर्थाने संवादी बनली आहेत.

विविध नियतकालिके जशी डिजिटल स्वरूपात येतात तसाच दुसरा पण एक प्रकार पहायला मिळतो आहे. वैयक्तिक पातळीवर काही लेखक आपले ब्लॉग तयार करत आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसादही अतिशय चांगला आहे. भाउ तोरेसकर सारख्या पत्रकाराच्या ब्लॉगला एक कोटी पेक्षा जास्त दर्शकसंख्या लाभते ही एक मराठी वाचन विश्वात आगळी वेगळी घटना आहे. प्रवीण बर्दापुरकर यांच्यासारखे पत्रकारही नियमित ब्लॉग चालवत आहेत. संजय सोनावणी, हरि नरके यांच्या ब्लॉगला नियमित वाचक लाभलेला दिसतो आहे. (मी स्वत:  गेली 10 वर्षे मराठी ब्लॉग लेखन करतो आहे. आणि वाचक संख्या अडीच लाखांपर्यंत पोचली आहे.)

अजून एक प्रकार आपल्याला पहायला मिळतो आहे तो म्हणजे फेसबुकवरील लिखाण. कविता, छोटे लेख, रसग्रहण. अतिशय चांगले परिणामकारक लिखाण समाज माध्यमांवर नियमित नाही पण अधून मधून काहीजण करत असतात. त्यांना प्रतिसाद देणार्‍यांचीही संख्या मोठी आहे. मी हे सगळं विवेचन समाज माध्यमांचा गांभिर्याने वापर करणार्‍यांना गृहीत धरूनच करतो आहे. या माध्यमांचा उठवळपणे वापर करणार्‍यांसाठी हे विवेचन नाही. शिवाय वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, घराचा वास्तु, स्वत:चे कुठले फोटो, कुठल्या कुठल्या नियुक्त्यांसाठीचे पुरस्कारांसाठीचे अभिनंदन या सगळ्या जवळपास 80 टक्के असणार्‍या पोस्टचा इथे विचार करत नाहीये. गलिच्छ असभ्य भाषा वापरणार्‍यांचाही इथे विचार केलेला नाही. त्यांना टाळूनच आपण विचार करूया.

कोरोना आपत्तीनंतर समोर येणारं वाङ्मयिन नियतकालिकांचे डिजिटल जग हे आकर्षक, सुटसुटीत, संवादी, सर्वस्पर्शी तळागाळापर्यंत पोचणारे असेल याची खात्री पटते आहे. पूर्वीची माध्यमे आपल्या मर्यादांमुळे जास्त पोचू शकत नव्हती. पण आताच्या नविन माध्यमांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कुठलीही कुंपणे त्यांना रोकू शकत नाहीत. मी स्वत: माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत एकूण प्रतिसादापैकी 28 टक्के देशाबाहेरील वाचकांचा अनुभवला आहे. ही एक मोठी उपलब्धी या नविन माध्यमाची आहे.

पूर्वी नियताकलिकांची निर्मिती मर्यादीत ठिकाणांहून होत होती. पण आता नविन माध्यमांनी हे कृत्रिम बंधन उडवून लावले आहे. कुठेही बसून आता डिजिटल स्वरूपातील अंक प्रकाशित होवू शकतो. आणि कुठूनही निघाला तरी तो वाचकांपर्यंत पोचण्यात कसलाही अडथळा येत नाही. हा एक प्रकारे मोठाच क्रांतिकारी बदल आता झालेला आहे. अन्यथा आधिच्या प्रकारांत मक्तेदारी निर्माण होवून काही एक विकृती तयार झाल्या होत्या. आणि त्यात बर्‍याच प्रतिभावंतांचे बळी गेले होते. पण नविन माध्यमांत अशा अन्यायाला जागा शिल्लक राहिलेली नाही.

नविन माध्यमांना दृकश्राव्य जोड पण देता येवू शकते. काही चांगल्या कवितांचे प्रभावी वाचनाचे प्रयोग होत आहेत. त्याचे व्हिडिओ सर्वत्र सहजपणाने फिरत आहेत. इंद्रजीत भालेराव यांच्या कविता मोठ्या प्रमाणात यु ट्यूब वर उपलब्ध आहेत. या नविन माध्यमांच्या महसुल व्यवस्थेची वाढ निकोप पद्धतीने झाली पाहिजे. यात काम करणार्‍यांना पुरेसा आणि योग्य मोबदला मिळाल पाहिजे. नसता केवळ फुकटा फुकटी ही माध्यमे आहे त्या स्वरूपात जास्त काळ चालू शकणार नाहीत. भविष्य काळात ही समस्याही सुटेल याची आशा वाटते.

श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ
औरंगाबाद मो. 9422878575

Sunday, July 26, 2020

राजस्थान कॉंग्रेस- ‘नवरा मेला तरी हरकत नाही सवत ... झाली पाहिजे!’


उरूस, 26 जूलै 2020 

राजस्थानमध्ये जे सत्तानाट्य रंगले आहे त्याची चर्चा केवळ दोनच पैलूंनी केली जात आहे. एक असं गृहीत धरलं जात आहे की अशोक गेहलोत काहीही करून आपली खुर्ची वाचवतील. दुसरी बाजू अशी आहे की भाजप सचिन पायलटच्या निमित्ताने हे सरकार पाडेल. गेहलोत यांची खुर्ची गोत्यात येईल.  न्यायालयात हे प्रकरण गेलं आहेच. ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा मागे लावून गेहलोत यांना जेरीस आणले जाईल.

यात एक महत्त्वाचा पैलू मागे पडत आहे. कॉंग्रेस पक्ष आणि एकूणच भाजपेतर स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे पक्ष आहेत त्यांच्या राजकारणाची एक मर्यादा या निमित्ताने स्पष्टपणे पुढे येत चालली आहे.

1989 ला विश्वनाथप्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आले त्याला एका बाजूने भाजप आणि दुसर्‍या बाजूने डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. आता ज्या राजस्थानात राजकीय संकट घोंगावत आहे त्याच राजस्थानात भाजपचे भैरौसिंह शेखावत हे मुख्यमंत्री बनले होते. पण त्यांना पाठिंबा कुणाचा होता?

सोबतच बाजूच्या गुजरातमध्ये जनता दलाचे चिमणभाई पटेल हे मुख्यमंत्री बनले होते. त्यांना पाठिंबा कुणाचा होता? दिल्लीत सुषमा स्वराज आणि मध्यप्रदेशात सुंदरलाल पटवा हे भाजपचे मुख्यमंत्री बनले होते स्वत:च्या ताकदीवर. पण राजस्थान, गुजरात मध्ये भाजप आणि जनता दल यांनी आपसात तडजोड करून मुख्यमंत्री पद पटकावले. कारण कॉंग्रेसला सत्तेवरून हटवायचे होते.

पुढे 30 वर्षांतला इतिहास असे सांगतो की ज्या गुजरातमध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले चिमणभाई पटेल जनता दलाचे मुख्यमंत्री बनले होते भाजपच्या पाठिंब्यावर त्या राज्यातून जनता दल नेस्तनाबूत झाले. कॉंग्रेसची पण सत्ता काही दिवसांतच संपून गेली आणि तिथे भाजपने सगळी राजकीय जागा व्यापून टाकली. पण तिथे निदान अजूनही कॉंग्रेस विरोधात तरी शिल्लक आहे. आणि विरोधाभास म्हणजे या कॉंग्रेसचे नेतृत्व अगदी आत्ता आत्तापर्यंत भाजपमधूनच बंड करून बाहेर पडलेले शंकरसिंग वाघेला हे करत होते.

राजस्थानमध्ये जनता दलाची पार वाट लागली. कॉंग्रेसला आपली राजकीय स्थिती सुधारता आली. भाजप आणि कॉंग्रेस याच दोन प्रमुख राजकीय शक्ती शिल्लक राहिल्या.

आताच्या सचिन पायलट यांच्या बंडानंतर एक मोठा गंभीर प्रश्‍न समोर येतो आहे. गेहलोत जरी सत्ता राखण्यात यशस्वी झाले तरी पायलट यांचे राजकीय आव्हान शिल्लक राहणारच आहे. त्यांनी भाजपत न जाता एखादा प्रादेशीक पक्ष काढला आणि भाजप विरोधी असलेली राजकीय पोकळी भरून काढली तर कॉंग्रेसचे राजकीय भवितव्य काय?

पश्चिम बंगाल मध्ये असेच घडले होते. ममता बॅनर्जी कॉंग्रेसच्या दिल्लीस्थित दरबारी राजकारणाला कंटाळल्या. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. पुढचा इतिहास सर्वांसमोर आहे. शरद पवार यांच्याही बाबत हेच आहे. 1999 ला शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडले त्याला कारण सोनिया गांधींचे विदेशीपण असे जरी वरवर दिसत असले तरी खरे कारण सर्वच विश्लेषक सोयीस्करपणे विसरतात.

1999 ला वाजपेयींचे सरकार एक मताने कोसळले तेंव्हा पर्याय म्हणून राष्ट्रपतींकडे विरोधी पक्ष सत्ता स्थापनेचा दावा घेवून गेला होता. स्वाभाविकच कुणीही असे समजेल की तेंव्हा विरोधी पक्षाचा नेता हा प्रस्ताव घेवून गेला असेल. पण तसे घडले नाही. शरद पवार कॉंग्रेसचे नेते म्हणून लोकसभेत विरोधी पक्ष नेते होते. जे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींकडे गेले त्यात शरद पवार यांना का टाळल्या गेले?

लोकनेत्याला बाजूला टाकणे हे सोनिया कॉंग्रेसचे धोरण राहिले आहे. त्याचे दुष्परिणाम आत्ता राजस्थानात पहायला मिळत आहेत.

सोनिया गांधींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्विकारल्यावर लगेच दाखवून दिले होते की आपल्याला लोकनेत्याची किंमत नाही. जेंव्हा की 1998 ला महाराष्ट्रातून कॉंग्रेसला सर्वात मोठे यश पवारांनी मिळवून दिले होते. 48 पैकी 38 खासदार कॉंग्रेस व मित्रपक्षाचे (कॉंग्रेस 33, रिपाई 4, शेकाप 1) पवारांनी निवडून आणले होते.

याच्या पुढचे ठळक उदाहरण 2004 चे आहे. कॉंग्रेसला डाव्यांनी पाठिंबा दिल्यानंतर सोनिया गांधींनी एकाही लोकनेत्याची निवड न करता डॉ. मनमोहनसिंग यांना काय म्हणून पंतप्रधानपदावर बसवले? त्यांची विद्वत्ता जरी गृहीत धरली तरी त्यासाठी त्यांना पंतप्रधान करण्याची काय गरज होती? त्यांना आर्थिक सल्लागार किंवा अर्थमंत्रीच करता आले असते.  आपल्या आख्ख्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत एक नेता म्हणून त्यांची काय चमकदार कामगिरी करून दाखवली? भाजप नको या हट्टापोटी डाव्यांनी पाठिंबा दिला म्हणून हे सरकार अस्तित्वात आले नसता कॉंग्रेसचा पंतप्रधान होणेच मुश्किल होते.

परत 2009 मध्ये जनाधार नसलेल्या मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधान बनवण्यात आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांतून निवडून न गेलेला राज्यसभेवरचा खासदार इतकी वर्षे पंतप्रधान पदावर बसला. पण याचे कुणीही राजकीय दृष्टीने विश्लेषण करत नाही. लोकनेत्यांना बाजूला ठेवून दरबारी राजकारणाला प्रोत्साहन देण्याचे हे सोनिया गांधींचे धोरण राहिलेले आहे. आणि हे दरबारी राजकारणाचे धोरणच आता कॉंग्रेसच्या राजकीय नाशाला कारणीभूत ठरत आहे.

गेली पंधरा दिवस राजस्थानात घमासान चालू आहे. पण सोनिया, राहूल, प्रियंका कुठेही समोर आलेल्या नाहीत. एकही वक्तव्य यांच्याकडून दिले गेले नाही. यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात किंवा अगदी राजीव गांधींच्या काळात दिल्लीहून पक्षाचे प्रतिनिधी पाठवले जायचे तेंव्हा त्यांच्या शब्दाला एक मोठी किंमत होती. कारण त्यांच्या पाठिशी दिल्लीतील भक्कम श्रेष्ठी आहेत हा स्पष्ट संदेश असायचा. आता दिल्लीहून रणदीप सुरजेवाला, अजय माकन, अविनाश पांडे (हे गृहस्थ महाराष्ट्राचे आहेत. ते आपल्या मतदारसंघातून नगरसेवक तरी निवडुन आणू शकतात का?) हे प्रतिनिधी पाठवले गेले होते. राजस्थानचे संपर्क प्रमुख के. वेणुगोपाळ हे कधी लोकसभेवर निवडून आले? यांच्यापैकी एक तरी लोकनेता आहे का? किंवा यांच्या पाठिशी जे दिल्लीतील श्रेष्ठी असल्याचे सांगितले जाते त्यांचा जरा तरी प्रभाव प्रदेश कॉंग्रेसवर आहे का?

देशातील एकमेव मोठे राज्य असे राजस्थान हे कॉंग्रेससाठी राजकीय नंदनवन होते. पण त्याचा विसर खुद्द कॉंग्रेस श्रेष्ठींनाच पडला. नसता 2019 च्या लोकसभा निवडणुकांत सर्व 25 जागी हार पदरी पडल्यावर कॉंग्रेसमध्ये नेतृत्व बदल व्हायला हवा होता. जर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद संपणारच नव्हता तर या दोघांनाही बाजूला ठेवून तिसरा पर्याय पुढे आणायला हवा होता. कदाचित तो नेताही कॉंग्रेसच्या दृष्टीने भविष्यात काही एक आशा निर्माण करणारा ठरला असता. बिहार मध्ये चंद्रशेखर आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या वादात दोघांचेही उमेदवार बाजूला पडून लालू प्रसाद यादव यांचे नाव तडजोडीचे नाव म्हणून पुढे आले होते. लालूंनी पुढे 25 वर्षे राजकारण गाजवले हे सर्वांसमोर आहे.

याच पद्धतीनं एखादा तिसराच पर्याय राजस्थानात कॉंग्रेसचे भवितव्य ठरू शकला असता. आता कुणीही मुख्यमंत्री पदी राहो कॉंग्रेस पक्षाला त्याचा तोटाच होणार. गेहलोत राहिले तर पायलट आणि पायलट बनले तर गेहलोत त्यांच्यावर राजकीय हल्ले करत राहणार. यात तोटा होणार तो कॉंग्रेस पक्षाचाच. पायलट पक्षा बाहेर गेले तर मग राजस्थानात कॉंग्रेसचे भवितव्य पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा यांच्याच वाटेने जाणार. कॉंग्रेसच्या ट्विटरग्रस्त युवा नेतृत्वाला हे कोण समजावून सांगणार?

सत्यजीत राय यांचा हिंदी सिनेमा ‘शतरंज के खिलाडी’ आजच्या कॉंग्रेसच्या स्थितीला अगदी नेमका लागू पडतो. संजीव कुमार आणि सईद जाफरी हे हरलेले नवाब सरदार शेवटी आपसांतच मारामारी करतात. तसं यांचं चालू आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तिन्ही प्रदेशांतील कॉंग्रेस पक्षात एक साम्य आहे की यांच्या गटातटांचे आपसांतच प्रचंड मतभेद आहेत. इतके टोकाचे की ‘नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत रंडकी झाली पाहिजे’ या अस्सल इरसाल ग्रामीण भागांतील म्हणीसारखं यांचे झाले आहे. सत्ता गेली तरी हरकत नाही पण पायलटला धडा शिकवेनच. आणि तिकडे पायलट शांत बसून गेहलोत याची खुर्ची घालवेनच अशा खेळी करत आहेत. 

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, July 24, 2020

गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या !


काव्यतरंग, शुक्रवार 24 जूलै 2020 दै. दिव्यमराठी

गायी पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?

उष्ण वारे वाहती नासिकांत
गुलाबांला सुकविती कश्मिरांत
नंदनांतिल हलविती वल्लरीला
कोण माझ्या बोलले छबेलीला?

पंकसपर्के कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी
कशी तूंही मग मजमुळे भिकारी?

देव देतो सद्गुणी बालकांना!
काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावांस जाउनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसोनीया

‘‘गांवी जातो’’ ऐकतां त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टी गेली
गळां घालुनि करपाश रेशमाचा
वदे ‘‘येते मी’’ पोर अज्ञवाचा!

-बी. (फुलांची ओंजळ- ‘बी’ कवींची समग्र कविता, पृ. 58  प्रकाशक कॉन्टिनेन्टल प्रकाशन, आ.1986)

शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मुलांना त्यासाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल अशा सुविधा हव्या आहेत. मुख्यत: नेट कनेक्शनची आवश्यकता आहे. जिथे हे नाही तिथे शिक्षणाची मोठी हेळसंाड चालू आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला लॅपटॉप घेवून देता आला नाही म्हणून शेतकरी बापाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

ही कविता साधारणत: 1920 च्या सुमारास लिहील्या गेली. आज 100 वर्षांनी विद्यार्थ्यांत आर्थिक असमतोल दिसून त्यातून समस्या उत्पन्न होत आहेत. तेंव्हा काय वातावरण असेल?

आपल्या सोबत शिकणार्‍या इतर मुली चांगले कपडे दागिने घालून शाळेत येतात. या मुलीच्या अंगावर अगदी साधे कपडे असतात. हीला गरिब म्हणून भिकारी म्हणून त्या चिडवतात आणि या मुलीला रडू येते. तिचे हमसून हमसून रडणे पाहून बापाला कळत नाही काय करावे. गरिबी हा काही तिचा दोष नाही. दोन्ही डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत असल्याने ‘गंगा यमुना’ असा शब्द वापरला आहे. नाकांतून उष्ण श्‍वास वाहत आहेत. त्यामुळे गुलाबासारखे ओठ सुकून गेले आहेत.

कवितेचा आशय खुप साधा आहे. हा गरिब बाप मुलीला धुळीत सापडले म्हणून रत्न भिकारी नसते, चिखलात उगवले म्हणून कमळ भिकारी होते का? असे सांगत माझ्या गरिबाच्या पोटी जन्माला आली असली तरी तू एक रत्न आहे हे आपल्या लाडकीला समजावून सांगतो. शेवटी अशी सद्गुणी गोड बालके आमच्या सारख्यांच्या पोटी का जन्माला घालतोस? आम्हाला त्यांचे लाड पुरवता येत नाहीत अशी तक्रार देवाकडे करतो. आणि मुलीला सांगतो की मी देवाकडे जावून हा जाब देवाला विचारतो.

देवाच्या ‘गावाकडे’ जाण्याची गोष्ट काढताच ती मुलगी एकदम दचकते. आपले रडणे थांबवून बापाच्या गळ्याभोवती आपल्या रेशमी हाताचा विळखा घालते. मी पण तूमच्यासोबत येते असे अज्ञपणे बापाला सांगते. असा कवितेचा गोड शेवट आहे. मूळ 25 कडव्यांची असलेली ही कविता. यातील केवळ 5 कडवेच इथे घेतले आहेत.

बाप आणि मुलगी असा नातेबंध आपल्याकडे कवितेत फारसा विचारात घेतला गेलेला नाही. 1920 साली शिकणारी मुलगी आणि तिचा बाप यावर लिहीणे म्हणजे खरेच कमाल आहे. तेंव्हा मुळात शिक्षणाचाच फारसा प्रसार झाला नव्हता. आणि मुलींचे शिक्षण तर अजूनच दूर. अशा काळातही एक कवी या विषयावर गोड कविता लिहीतो.

बरं यात कुठेही मुलींचे शिक्षण, त्याचे महत्त्व असा आव आणत पांडित्य सांगितलेले नाही. गरिब बाप मुलीचे लाड पुरवू शकत नाही पण तिला शिकवतो ही एक छोटी पण महत्त्वाची बाब कवितेतून सौंदर्यपूर्ण रित्या आली आहे.
‘बी. रघुनाथ’ ज्यांच्या नावाचा गोंधळ नेहमी कवी ‘बी’ यांच्याशी केला जातो त्यांनीही एक फार गोड कविता मुलीवर लिहीली आहे.

चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली
पंढरी ही ओसरीची आज ओस झाली
कोनाड्यात उमडून पडे घरकुल
आज सत्य कळो येई दाटीमुटीतील
काही दिसे भरलेले रित्या बोळक्यात
गवसले आजवर जे न रांजणात

अंगणात बागडणारी, ओसरीत खेळणारी मुलगी सासरी निघून गेली आहे. तिचे खेळणे रक्तचंदनाची बाहुली म्हणजेच विठोबाची मुर्ती एकटी पडून आहे. तिच्या खेळण्यातल्या संक्रांतीच्या बोळक्यात खाउ शिल्लक आहे. असे एक गोड वर्णन बी. रघुनाथ यांनी केले आहे. या शिवाय बाप मुलगी या नात्यांवर फारसे त्या काळात आले नाही. आई मुलगा यांच्यावर आले आहे.

कवी ‘बी’ यांचे पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते. यांचा जन्म 1872 साली बुलढाणा जिल्ह्यात मलकापुरला झाला. गुप्ते यांचे वडिल यवतमाळ येथे वकिल होते. वडिलांच्या निधनानंतर शालेय शिक्षण अर्धवट सोडून कवी बी यांनी सरकारी खात्यात कारकुनीची नौकरी सुरू केली. वाशीम, मूर्तिजापूर, अकोला येथे त्यांना या निमित्त रहावे लागले. आपले बहुतांश आयुष्य बी कवींनी अकोला येथेच व्यतित केले. 

30 ऑगस्ट 1947 ला या कवीचे निधन झाले. त्यांच्या कवितांचा संग्रह ‘फुलांची ओंजळ’ नावाने 1934 मध्ये प्रकाशीत झाला होता. त्याला आचार्य प्र.के.अत्रे यांनी सुंदर सविस्तर प्रस्तावना लिहीली आहे. कमळा नावाने बी यांनी थोरांतांच्या मुलीवर एक सुंदर कविता लिहीली. शिवकालीन घटनेवरील ही कविता अतियश सुंदर अशी आहे. शिवाय बी कवींचे ‘चाफा बोलेना’ हे गाणे अतिशय गाजलेले आहे. त्यांची ‘डंका’ नावाची कविता पूर्वी अभ्यासाला होती. आचार्य अत्रे यांनी बी यांच्यावर लिहीताना असं म्हटलं आहे,

‘.. बी कवींची कविता ही सोन्याच्या साखळ्या पायांत घालून संगमरवरी जिन्यावरून उतरणारी एखाद्या  राजघराण्यांतील तेजस्वी राजकन्या आहे..’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Thursday, July 23, 2020

मोदी म्हणजे स्टेरॉईड घेतलेल्या इंदिरा गांधी: गुहा !


उरूस, 23 जूलै 2020 

जमात ए पुरोगामी यांच्या संगतीत राहून राहूल गांधी यांच्या बुद्धिचा विकास झाल्याचा काही पुरावा मिळत नाही पण उलट पुरोगाम्यांच्याच बुद्धिला गंज चढलेला दिसून येतो आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे महान विचारवंत अभ्यासक इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी नुकताच लिहीलेला लेख. एनडिटिव्ही च्या संकेतस्थळावर हा लेख उपलब्ध आहे. (The Gutting of Indian Democracy By Modi-Shah. Dt. 14 July 2020) या लेखाचा मराठी अनुवाद ‘नरेंद्र मोदी लोकशाही संस्थांच्या स्वावलंबनाबाद्दल इंदिरा गांधींपेक्षाही अधिक संशयी आणि कठोर असल्याचे दिसते’ अशा लांबलचक शिर्षकाखाली अक्षरनामा या न्यूज पोर्टलने 22 जूलै 2020 ला प्रसिद्ध केला आहे.

एक तर मुळ इंग्रजी लेखात मोदी शहा यांची नावे असताना मराठी शिर्षकात केवळ मोदींचेच नाव का घेतले कळत नाही. दुसरी अडचण इंदिरा गांधींचे नाव मुळ शिर्षकात नाही. मराठी वाचकांना आपण किती समतोल काही छापत आहोत असा भास निर्माण करण्यासाठी कदाचित असा बदल अक्षरनामा ने केला असावा. कारण आजकाल केवळ मोदींना शिवीगाळ केलेले छापले तर त्याला फारसा वाचकवर्ग भेटणार नाही अशी शंका वाटत असावी.

जमात ए पुरोगामी यांची रेकॉर्ड तर 2014 लाच अडकलेली असते. जे काही खराब आहे, जी काही हानी आहे ती 2014 नंतरच आहे. त्याआधी तसं काही नव्हतं. किंवा असलं तरी इतकं हानीकारक नव्हतं. शिवाय या सर्व पुरोगामी विचारवंतांनी शब्दच्छल करत बुद्धिभ्रम तयार करण्याचे नविन कसब अंगीकारले आहे. काही गैरसोयीचे संदर्भ गाळून आपल्या सोयीचा निष्कर्ष काढण्याची यांची खोड आता जास्तच उघडी पडत चालली आहे.

‘जून 1975 ते मार्च 77 भारतीय लोकशाही मृतवत होती. लोकशाहीचे पुनरूज्जीवन झाले ते इंदिरा गांधींनी जाहिर केलेल्या निवडणुकीच्या निर्णयाने, त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या पराभवाने. 1977 नंतर लोकशाही संस्थांचे स्वावलंबन पुन्हा बळकट होण्यास सुरुवात झाली. विशेषत: वर्तमानपत्रा समुहांच्या बाबतीत हे अधिक सत्य आहे.’... रॉबिन जेफ्फरी  यांच्या ‘इंडियाज न्यूज पेपर रिव्हॉल्युशन’ या पुस्तकाचा हा संदर्भ देत गुहा यांनी असे लिहीले आहे.

यानंतर म्हणजेच 1977 नंतर न्यायालयाची पुन:स्थापना झाली (म्हणजे काय तेच जाणो. किंवा मराठी अनुवादाचा हा दोष असेल). ‘संसदीय चर्चा 80 आणि 90 च्या दशकात पूर्वीसारख्याच म्हणजेच 50 च्या दशकांतील चर्चांसारख्याच दर्जेदार होउ लागल्या. या काळात स्वावलंबन मिळाले नाही ते प्रशासनाला.’

म्हणजे गुहा यांना असे सुचवाचे आहे की प्रशासन हे सत्ताधारी पक्षाच्या  हातचे खेळणे बनले.  बाकी लोकशाही संस्थांचे स्वावलंबन परत स्थापित होईल अशी आशा गुहा यांना वाटत होती. पण ..

हा ‘पण’च मोठा घातक आहे. 2014 मध्ये मोदी आले आणि गुहा यांना असे जाणवले ‘.. मोदी म्हणजे स्टेरॉईड घेतलेल्या इंदिरा गांधीच म्हणजे इंदिरा गांधीपेक्षा वरचढ, असेच त्यांचे वर्णन करता येईल.’

ज्या लोकशाही संस्थांचे स्वावलंबन धोक्यात आल्याची ओरड गुहा करत आहेत ते एकदम 90 च्या दशकानंतर 2014 चा उल्लेख करतात. मग मधला 2004 ते 2014 चा संदर्भ का गाळतात? या काळात भारतीय संविधानात अस्तित्वात नसलेले राष्ट्रिय सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असे पद तयार करून त्याच्यावर अवैध रित्या सोनिया गांधी 10 वर्षे कब्जा करून बसून राहिल्या हे गुहा का नोंदवत नाहीत? राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासारखा राजशिष्टाचार या पदाला देण्यात आला होता. सर्व जाहिरातीतून सोनिया गांधी यांची छबी पंतप्रधानासोबत प्रसिद्ध होणे अनिवार्य होते.  याच काळात पंतप्रधानांच्या कार्यालयातील फाईलींना कसे पाय फुटायचे आणि त्या कुठे जायच्या? सीबीआय पोपट आहे हा आरोप कुणी केला होता या काळात?याकडे डोळेझाक करून गुहा यांना 2014 नंतर या विविध संस्थांचे स्वावलंबन धोक्यात आल्याचे दिसते म्हणजे काय?

काही संदर्भ गुहा कसे सोयीने वापरत बुद्धिभ्रम करतात बघा.

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थान येथील राजकीय उलथापालथीवर टिपणी करताना गुहा लिहीतात, ‘... या  प्रत्येक राज्यात मतदारांनी दिलेला बहुमताचा कौल उधळून लावण्यासाठी भाजपने सत्तेतील आमदारांना पक्ष सोडण्यास किंवा पदाचे राजीनामे देण्यास प्रवृत्त केले...’

कर्नाटकांत कॉंग्रेसला बहुमत मिळाले होते का? कॉंग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे एकमेकांच्या विरूद्ध लढले होते. कुणालाही स्पष्ट बहुमत नव्हते. भाजप सर्वात मोठा पक्ष होता. कॉंग्रेस आणि जनता दलाने एकत्र येवून सरकार स्थापन करावे असा जनतेने कौल दिला होता का?

मध्यप्रदेशांत कॉंग्रेसला बहुमत मिळाले नव्हते. अपक्ष समाजवदी पक्ष आणि बहुजन समाजपक्षाचे आमदार सोबत घेवून कमलनाथ यांनी सरकार बनवले. हेच आमदार जर भाजप सोबत गेले असते तर त्यांना सरकार बनवता आले असते.कारण दोघांच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. मग गुहा काय म्हणून कॉंग्रेसला बहुमत मिळाले असे खोटे लिहीतात?

राजस्थानातही कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुजन समाज पक्षाचे 6 आमदार फोडून गेहलोत यांनी आपल्या  पक्षात म्हणजेच कॉंग्रेसमध्ये सामील केले. तेंव्हा कुठे त्यांचा आकडा स्पष्ट बहुमताची रेषा पार करता झाला. भाजपने आमदारांना रजीनामा द्यायला लावून परत जनतेच्या दरबारात जावून कौल घ्यायला लावणे म्हणजे लोकशाहीची हत्या आणि कॉंग्रेसने मध्यप्रदेशांत आणि राजस्थानात दुसर्‍या पक्षाचे आमदार आपल्या पक्षात घेणे म्हणजे लोकशाहीची पूजा अशी व्याख्या गुहांची आहे काय?

गुहांसारख्या विद्वानांनी कॉंग्रेस असो की भाजप कुणीही लोकशाहीच्या दृष्टीने गैर वर्तन केले तर त्यावर टीका जरून करावी. पण जर तूम्ही जाणिवपूर्वक टीकाच करायची म्हणून करणार असाल तर ते कसे काय लोकशाहीला पुरक वर्तन असेल? हा तर वैचारिक क्षेत्रातला भ्रष्टाचार झाला.

इंदिरा गांधींशी मोदींची तुलना करताना गुहा लिहीतात, ‘इंदिरा गांधी केलेल्या एखाद्या कृतीबद्दल पुनर्विचार करायच्या, आणीबाणी ही त्यापैकीच एक, मोदींच्या स्वभावात पश्चाताप आणि अपराधीपणाच्या भावनेला थारा नाही.’

गुहांचा खरा आक्षेप पुढेच आहे, ‘.. याशिवाय इंदिरा गांधींसाठी त्यांची धार्मिक बहुजिनसीपणाशी समर्पित वृत्ती त्यांच्या अनेक दोषांवर उपाय म्हणून महत्त्वाची होती. दुसरीकडे मोदी म्हणजे हुकुमशाही वृत्तीचे आणि बहुमत असलेल्या सरकारचे नेते आहेत.’ गुहांची तक्रार आहे की इंदिरा गांधींच्या काळातील लोकशाहीचा र्‍हास भरून निघाला. पण मोदी-शहांच्या काळातील र्‍हास भरून निघेल का?

म्हणजे इंदिरा गांधींच्या पाठिशी भक्कम बहुमत होते, त्या प्रत्यक्ष हुकुमशाही पद्धतीनं वागल्या तरी त्यांना उजवा कौल. आणि अजहूनही त्यांच्या इतके बहुमत मोदींना मिळवता आले नाही. मोदींच्या हुकुमशाहीचा कुठलाही स्पष्ट पुरावा नाही पण मोदी शहा यांच्या अदृश्य हुकुमशाहीचीच भिती हे भारतीयांना दाखवत सुटले आहेत.

‘ध्यानीमनी’ नावाच्या नाटकांत नीना कुलकर्णी यांना त्यांचा अकाली मृत्यू पावलेला मुलगा जिवंत आहे असे भास होत राहतात आणि त्या तो जिवंत आहे असे समजूनच वागत राहतात. हा एक मानसिक रोगच असतो. तसे गुहा सारख्या पुरोगामी विद्वानांना याच्या उलट जिवंत असलेली भारतीय लोकशाही मेलीच आहे असा मानसिक रोग झालेला आहे. आपण त्यांना कितीही समजावून सांगत बसलो, कितीही पुरावे दिले तरी ते त्यांना मंजूर होणे शक्य नाही. तेंव्हा त्यांना समजावून सांगण्यापेक्षा त्यांचे वाचून कुणाच्या मनात भारतीय लोकशाही बद्दल शंका राहू नये म्हणून या लेखाचा प्रपंच.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, July 21, 2020

राहूल गांधींचे देशविरोधी ट्विट


उरूस, 21 जूलै 2020 

राहूल गांधी यांचे ट्विट ते स्वत:ही वाचत नसतील याची पूर्ण खात्री आहे. त्यांच्या ट्विटची दखल घेण्याची गरज त्यांनी स्वत:च संपवून टाकली आहे. खरंचच त्यांच्या ट्विटमध्ये काहीएक मुद्दा असला असता तरी त्यासाठी त्यांचे ट्विटर हाताळणारे निखील अल्वा (कॉंग्रेसनेत्या मार्गारेट अल्वा यांचे चिरंजीव) यांच्याकडे विचारपूस करता आली असती. त्यांच्याशी काही वाद करता आला असता.

राहूल गांधी यांचे ताजे ट्विट आणि त्यासोबतचा त्यांचा व्हिडिओ यात काही देशविरोधी बाबी आल्याने तेवढ्यापुरता त्याचा विचार करावा लागेल. इच्छा नसताना त्याची दखल घेणे भाग आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मे महिन्यापासून गलवान खोरे आणि परिसरांत चीनी सैनिकांसोबतचा संघर्ष धुसफुस मारामारी चालू आहे. अशा प्रसंगी कुठल्याही जबाबदार नेत्याने परराष्ट्र धोरण, सुरक्षा यंत्रणा, सीमाविवाद, संरक्षण नीती या बाबत जपून बोलले पाहिजे. राहूल गांधी जबाबदार नाहीतच. पण एका जून्या पक्षाचे खासदार आहेत. माजी अध्यक्ष आहेत. शिवाय याच प्रश्‍नावर त्यांच्या पक्षाची सत्ता असताना विविध भूमिका ठरवल्या गेल्या विविध निर्णय घेतल्या गेलेले आहेत.

भारताच्या सध्याच्या कारभारावर टीका करण्याचा त्यांचा हक्क लोकशाहीत अबाधीत आहे. पण परराष्ठ्र धोरणावर संरक्षण नीतीवर त्यांनी टीका केली ती पूर्णत: अस्थानी आणि चुक आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी त्यांच्या ट्विटला सविस्तर उत्तर दिले आहे. एक दोन नाही तर दहा ट्विट करून (एका पेक्षा जास्त सलग ट्विटला ‘थ्रेड’ असा शब्द आहे). खरं तर इतक्या जबाबदार मंत्र्याने शिवाय असा मंत्री जो की पूर्वी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्याच खात्यात कार्यरत राहिलेला आहे.  तेंव्हा एस. जयशंकर यांच्या मतांना फार महत्त्व आहे.

अपेक्षा अशी होती की राहूल गांधींनी आता या ट्विटला उत्तर द्यावे. पण राहूल गांधी यांची खासियत म्हणजे  बेजबाबदार मुला सारखे दगड मारायचा आणि पळून जायचे. त्यांनी एस. जयशंकर यांच्या ट्विटला काहीही उत्तर दिले नाही. गप्प न बसता परत आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग ट्विटला जोडून प्रसिद्ध केला.

गलवान खोर्‍यातील चकमकीबाबत सातत्याने राहूल गांधीं खोटे ट्विट करत आले आहेत. त्यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर देत उघडे पाडण्यात आले आहे. अगदी सैन्याच्या जबाबदार अधिकार्‍यांनी अधिकृतपणे खुलासे करत राहूल गांधींना निरूत्तर केले आहे.  आताही एस. जयशंकर यांनी गेल्या सहा वर्षांतील (राहूल गांधींनी तेवढ्याच कालावधीतील धोरणावर टिका केली आहे) भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय कमी शब्दांत राहूल गांधींची कानउघडणी करत सत्य समोर मांडले  आहे. अगदी सामान्य माणसालाही समजेल अशी भाषा एस. जयशंकर यांनी वापरली आहे.

आपल्या ट्विट सोबत जो कश्मिरचा नकाशा राहूल गांधींनी जोडला आहे तोही आक्षेपार्ह असा आहे. 5 ऑगस्ट 2019 ला 370 कलम हटवल्यानंतर जम्मु आणि कश्मिर व लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. त्याप्रमाणे या प्रदेशाचा नविन नकाशाही सरकारने जाहिर केला आहे. तेंव्हापासून ज्याला कुणाला या प्रदेशाचा नकाशा वापरायचा असेल तर नविन नकाशा वापरणे बंधनकारक आहे. पण राहूल गांधी मात्र जूनाच नकाशा वापरतात.

बरं यातही काही एक अज्ञान असेल तर आपण समजू शकतो. जणिवपूर्वक पाक व्याप्त कश्मिर, आझाद कश्मिर, सियाचीन, अक्साई चीन हा भूभाग नावासगट दाखविण्याची विकृती कशामुळे?  ही देशविघातक वृत्ती कशी काय बाळगली जाते? सामान्य भारतीयाने जर असा नकाशा वापरला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होवू शकते. मग राहूल गांधींवर का नाही?

मोदिंच्या परराष्ट्र धोरणावर राहूल गांधी यांनी टिका केली आहे. नेमके हेच राहूल गांधी आणि सर्व पुरोगामी आत्ता आत्ता पर्यंत मोदिंच्या परराष्ट्र दौर्‍यांची टिंगल करत आले आहेत. एनआरआय पंतप्रधान अशी मोदींची संभावना करत आले आहेत. अगदी ढोबळमानाने बघितले तरी असे लक्षात येते की भारत विषयक इतर देशांत एक आस्था निर्माण झालेली दिसून येते आहे. याचे अगदी वरवरचे कारण म्हणजे मोदींनी सातत्याने साधलेला संपर्क व त्यातून निर्माण झालेला संवाद. तसेच भारताची विस्तारणारी मध्यमवर्गीय ग्राहकांची बाजारपेठ. भारतात लाख समस्या असल्या तरी आपल्या देशाने जपलेली लोकशाही मुल्ये. परदेशांतील भारतीय ही त्या त्या देशांसाठी एक उत्सुकतेची बाब आहे. कारण या बुद्धिमान भारतीयांनी परदशांत मोठे योगदान दिले आहे.

गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांसोबत जी धुसफुस झाली त्यानंतर लगेच अमेरिका, रशिया, फ्रांस,  इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आदी बलाढ्य देश भारताच्या बाजूने तातडीने उभे राहिलेले दिसले.  चीनच्या विरोधात एक मोठं जनमत जागतिक पातळीवर तयार होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चीनी व्हायरस असे सर्रास संबोधले जावू लागले आहे. नेमके अशा काळातच राहूल गांधी मात्र बेजबाबदारपणे भारताची परराष्ट्र नीती कमजोर पडली/ चुक ठरली अशी भूमिका मांडत आहेत.

काही गोष्टी कुठल्या वेळी मांडावे याचेही काही औचित्य पाळावे लागतात. राहूल गांधींना तेही नाही.

खरं तर राजस्थानात त्यांच्या पक्षात घमासान चालू आहे. त्याकडे अजूनही राहूल गांधींनी लक्ष दिलेले नाही. पक्षाचे मोठे नेते माजी अध्यक्ष आणि भावी अध्यक्ष म्हणूनही राहूल गांधींची ही जबाबदारी आहे पक्षातील पेच सोडवला पाहिजे. पण त्याकडे ढुंकूनही न बघता हे मोदी विरोधात म्हणत म्हणत देश विरोधात ट्विट करण्यात मग्न आहेत.

भाउ तोरसेकरांनी अशी टीका केली आहे की रोम जळत असताना तिथला सम्राट नीरो हा फिडल वाजवत होता. तसे राहूल गांधी पक्ष जळत असताना ट्विटर वाजवत बसले आहेत.

राहूल गांधींना कुणी समजावून सांगू शकत नाही. पण देशविरोधी त्यांच्या कृतीची यथोचित दखल घेवून त्यावर कारवाई मात्र आवश्यक आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, July 20, 2020

‘महाभारताचे वास्तव दर्शन’ आणि कुरूंदकर!


उरूस, 20 जूलै 2020 

नरहर कुरूंदकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांची चिकित्सा व्हावी असा विचार पुढे आला. यावर एक चांगली चर्चा महाराष्ट्रात आता घडताना दिसत आहे. माझ्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिय व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मी साधार आपली टीका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. खरे तर माझा स्वत:चा कुरूंदरकर गुरूंजींच्या विचारांचा सखोल अभ्यास नाही. माझी मर्यादा मी मान्यही केली. पण विश्वंभर यांनी व्यक्त केलेली अपेक्षा एका अतिशय जबाबदार ज्ञानी विद्वान माणसाने आधीच पूर्ण केलेली आहे. त्याचीच एक तोंड ओळख वाचकांना करून देण्यासाठी या लेखाचा प्रपंच.

माझ्या जन्माच्याही आधी 1970 सालीच प्राचार्य अनंत महाराज आठवले यांनी ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ हे पुस्तक लिहीले. या पुस्तकांत महाभारत आणि विशेषत: कर्णावर जे लिखाण मराठीत झाले त्या प्रमुख पुस्तकांचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यातील दोष पुराव्यासह दाखवून दिलेले आहेत.

ज्या पुस्तकांची चिकित्सा या ग्रंथांत करण्यात आली आहे त्यात प्रमुख आहेत, 1. हा जय नावाचा इतिहास आहे- आनंद साधले, 2. युगांत- इरावती कर्वे 3. महाभारतातील व्यक्तिदर्शन- शं.के.पेंडसे 4. व्यासपर्व- दुर्गाबाई भागवत या शिवाय ज्या ललित कलाकृती महाभारतावर आधारीत आहेत त्यांचाही आढावा एक परिशिष्ट जोडून घेतला आहे. त्यात 1. मृत्यूंजय-शिवाजी सावंत 2. महापुरूष-आनंद साधले 3. कौन्तेय- वि.वा. शिरवाडकर  या तीन कलाकृतींचा समावेश आहे. या शिवाय माधव मनोहर यांनी या पुस्तकावर घेतलेले आक्षेप आणि त्याला दिलेले उत्तर शिवाय वा.वि.भागवत यांनी महाभारतावर जे लेख 1984 साली पैंजण दिवाळी अंक व सोबत साप्ताहिकांत लिहीले त्याचेही खंडन एका परिशिष्टांत केले आहे. या शिवाय ज्याची फारशी चर्चा झाली नाही असे विद्यावाचस्पती प्रा. श्रीराम पंडित यांचे ‘शोध कर्णाचा’ हे पुस्तक पण अनंत महाराज यांनी विचारार्थ घेतले आहे.

पुस्तकाची दुसरी आवृत्ती 1993 मध्ये तर तिसरी आवृत्ती 2000 मध्ये प्रकाशीत झाली आहे.

पुस्तकाची पहिली आवृत्ती कुरूंदकर गुरूजींच्या हयातीतच प्रकाशीत झाली. स्वत: गुरूजींचे पुस्तक ‘व्यासांचे शिल्प’ हे नंतर प्रकाशीत झाले. हे पुस्तक म्हणजे गुरूजींच्या महाभारत विषयक स्फुट लेखांचा संग्रह आहे. कुरूंदकर गुरूजींनी  महाभारत हा एकच विषय घेवून सविस्तर असे लिखाण केले नाही. हे त्यांच्या बर्‍याच पुस्तकांबाबत दिसून येते. त्यांचे विविध लेख विविध निमित्ताने लिहीलेले एकत्र करून त्याची पुस्तके बनवलेली आहेत.

या पुस्तकांत एक उल्लेख अतिशय स्पष्ट असा आहे की ज्यामुळे कुरूंदकर गुरूजींच्या महाभारत अभ्यासावर प्रश्‍नचिन्ह उभे राहते. त्याचा कुठलाही खुलासा गुरूजींनी आपल्या हयातीत केला नाही. इरावती बाईंनी आपल्या पुस्तकाच्या निवेदनात लिहीलं आहे की प्रा. कुरूंदकर, प्रा. मेहंदळे, प्रा. कालेलकर, प्रा. पुंडलीक, श्री. डिंगरे, प्रा. मंगळूरकर यांनी लिखाणातील चुका काढून टाकण्यात मदत केली. त्यासाठी बाईंनी त्यांचे आभार मानले आहेत. यावर आठवलेंनी असा आक्षेप घेतला आहे, ‘या सर्व विद्वानांनी पुस्तकाचे जे परीक्षण केले ते केवळ स्पेलिंगदुरुस्ती आणि शुद्धलेखनाच्या चुका दूरुस्त करणे एवढ्यापुरतेच होते काय?’

आता गुरूजींचे काम होते की हे पुस्तक 1970 ला प्रकाशीत झाल्यावर त्यात जे आक्षेप आधीच्या अभ्यासकांच्या लिखाणावर घेण्यात आलेले आहेत त्याचे खंडन करावे. यातील ‘युगांत’ सारख्या अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथाशी तर गुरूजींचा सरळच संबंध होता.

योगेश काटे यांनी या संबंधात एक आठवण लिहीली आहे. ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ प्रकाशीत झाल्यावर रणजीत देसाई यांची ‘राधेय’ कादंबरी प्रकाशीत झाली. तिचे हस्तलिखीत घेवून ते गुरूजींच्याकडे चर्चेसाठी आलेले होते. यावर गुरूजींनी रणजीत देसाईंना दिलेला सल्ला असा. कादंबरीच्या सुरवातीला एक टीप तूम्ही टाका. ही कादंबरी प्रत्येकाच्या मनातील कर्णावर आहे. हा कर्ण महाभारताच्या पानांमध्ये शोधू नये.

गुरूजींनी असा सल्ला रणजीत देसाईंना देण्याचे कारण म्हणजे ‘राधेय’ प्रकाशीत झाल्यावर अनंत महाराजां सारखे अभ्यासक तिच्यातील अवास्तव मांडलेले विचार साधार सप्रमाण खोडून काढतील. त्यापेक्षा आधीच तूम्ही ही भूमिका घ्या. म्हणजे टीकेपासून सुटका होईल. आता ही पळवाट ललित लेखकाला उपलब्ध आहे. पण कुरूंदकरांसारख्या वैचारिक लेखकाला नाही. त्यामुळे अपेक्षा अशी होती की गुरूजींनी या पुस्तकाची दखल घेवून सविस्तर लिहायला हवे होते. पण तसे घडले नाही.

बरं अनंत महाराज आठवले असं नाव उच्चारलं की कुणी तरी एक सांप्रदायिक व्यक्ती आहे. तिने केलेला अभ्यास आणि त्यांचे विचार एका सश्रद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या भक्ताचे असणार. आपण त्याची दखल घ्यायची गरज नाही. पण असं म्हणायची काही सोय अनंत महाराजांनी शिल्लक ठेवलेली नाही. कारण त्यांनी सुरवातीलाच एक भूमिका स्पष्ट केली आहे की भांडारकर संशोधन संस्थेची चिकित्सक आवृत्तीच त्यांनी आपल्या विवेचनासाठी वापरली आहे. हीच आवृत्ती बहुतेक विद्वानांनी वापरली आहे. आणि आपली मांडणी तर्काच्याच आधारावर घासून तपासून घ्या असा आग्रह अनंत महाराजांचा आहे. ‘... महाभारत एक धर्मग्रंथ आहे व आठवले धर्मनिष्ठ असल्याने आम्ही सुधारक म्हणून आमचे खंडन करतात असा अपसमज कुणी करून घेऊ नये. घटनेकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन संभवत असतील कदाचित, पण महाभारतातील घटना शब्दबद्ध झालेल्या असल्याने त्यांचाच विचार लेखनसमयी करावयाचा आहे. त्यामुळे तेथील शब्दातून अमुक अर्थ काढता येईल की नाही हा वादाचा विषय संभवतच नाही. कोणाच्याही दृष्टीने संभवत नाही. महाभारतातील विधाने आपल्या सोयीने ग्राह्य वा अग्राह्य ठरवणे उचित नाही. माझ्या लेखनाच्या मूल्यमापनात हा विचार ध्यानात ठेवावा ही विनंती.’

कर्णाच्या बाबतीतले केवळ एकच उदाहरण आठवलेंच्या पुस्तकातले माहितीस्तव देतो. द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग आहे. कर्ण धनुष्याला बाण लावतो आणि तो सोडणार तोच द्रौपदी उच्चारते की मी सूतपूत्राला वरणार नाही. या श्‍लोकावर कर्णाची कशी अवहेलना झाली याची कथा रचली जाते. पण महाभारताच्या संशोधीत आवृत्तीत मात्र हा श्लोकच नाही. त्याचे कारण म्हणजे कर्णाला मुळात धनुष्य वाकवताच आलेले नाही. तेंव्हा त्याला प्रत्यंचा जोडणे आणि पुढे बाण सोडणे शक्य नाही. कर्णच नाही तर शल्यालाही हे करता आलेले नाही. भांडारकर संशोधन संस्थेने जी प्रत सिद्ध केली आणि सर्वच विद्वान जी प्रत प्रमाण म्हणून मानतात त्यात पुढचा श्लेाक आला आहे ज्याचा मराठी अनुवाद असा, ‘अरे ! जे धनुष्य कर्ण, शल्य, यांच्यासारख्या बलवान आणि धनुर्वेद-निष्णात म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रमुख राजांनाही नुसते वाकविता आले नाही ते या ब्राह्मण बटूला कसे सज्ज करता येईल?’

पुढचा हा श्लोक संशोधीत आवृत्तीत स्विकारला तर आपोआपच मागचा संदर्भ प्रक्षिप्त ठरतो. जर कर्णाला धनुष्य वाकविताच आले नाही. तर त्याचा पुढे अपमान द्रौपदीने केला याला काही अर्थच शिल्लक राहत नाही.

कर्णाच्या पराक्रमाबाबत अखेरच्या महायुद्धाच्या आधी किमान दोन प्रसंगांत कर्णाला अर्जूनासमोर पराभव स्विकारावा लागल्याचे स्पष्ट उल्लेख आणि पुरावे महाभारतात आहेत. दुर्योधनाला वनविहार करताना गंधर्वांनी पकडले आणि बंदिस्त केले त्यावेळी कर्ण पळून गेला. अर्जूनाने तेंव्हा दुर्याधनाला वाचविले. दुसर्‍यांदा तर प्रत्यक्ष मैदानावर कर्णाचा पराभव झालेला आहे. विराटाच्या गोग्रहणाच्या वेळच्या युद्धात सर्वांचा पराभव अर्जूनाने केला. कर्णाचाही पराभव केला शिवाय कर्णाचा एक भाऊही यात ठार झाला.

असे कितीतरी तर्कसंगत श्‍लोक संशोधीत आवृत्तीतलेच घेवून त्यातून अनंत महाराज आठवले यांनी महाभारताचा अन्वयार्थ लावून दाखवला आहे. यासाठी त्यांनी भांडारकर संशोधन संस्थेचीच प्रत वापरली आहे. ही वापरत असताना त्याही प्रतीतील मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत.

विश्वंभर चौधरी यांनी एक अपेक्षा व्यक्त केली म्हणून ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ या ग्रंथाचा मी छोटा परिचय करून दिला. कुरूंदकर गुरूजींच्या आणि त्या काळातील इतर विद्वानांच्या वैचारिक ललित पुस्तकांतून येणार्‍या महाभारताच्या दर्शनावर साधार आक्षेप घेणारा हा सविस्तर ग्रंथ आहे. हा ग्रंथच मुळात ‘आक्षेपाच्या संदर्भात’ असा लिहीला गेलेला आहे. याच पद्धतीचे विचारांचे खंडन मंडन कुरूंदकर गुरूजींना अपेक्षीत होते. ते आज होताना दिसत नाही ही खंत आहे.

मी स्वत: या विषयाचा अभ्यासक नाही. ज्या कुणी हे लिहीलं आहे ते फक्त मी वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहे.  कुरूंदकर गुरूजींनी ज्या ज्या विषयावर लेखन केले त्या त्या विषयावर अभ्यास संशोधन करणार्‍यांनी त्याची दखल घेत त्या विषयाचे नविन आकलन समोर मांडावे. लक्षात न आलेले पैलू उलगडून दाखवावेत. गुरूजींच्या ज्या पैलूं कडे लक्ष वेधले आहे त्या दिशेने अभ्यास करून विस्तार करावा. असे करणार असू तरच आपण गुरूजींचा वारसा चालवत आहोत असे सिद्ध होईल. अन्यथा  ‘आरती ओवाळण्याचे’ आरोप होत राहतील.

अनंत महाराज आठवले यांनी सन्यास घेतल्यानंतर त्यांची ओळख श्री स्वामी वरदानंदभारती अशी बनली. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत कुरूंदकर गुरूजींना अपेक्षीत असलेल्या ज्ञानयज्ञात आपण सहभागी झालो तर उत्तमच. हे पुस्तक कुणाला हवे असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

(स्वाती  शिरडकर, औरंगाबाद मो. 9890898078, देबडवार पुस्तक भांडार नांदेड 9423615127, यशवंत प्रकाशन पुणे  8766980160, नेर्लेकर बुक सेलर्स पुणे 9422323600 web site www.santkavidasganu.org )

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

(या लेखावर प्रा. डाॅ. श्रीनिवास पांडे यांनी एक आक्षेप घेतला. नरहर कुरूंदकर गुरूजींनी 'महाभारताचे वास्तव दर्श' रा पुस्तकावर लेख लिहील्याचे लक्षात आणून दिली. ही दूरूस्ती मी करतो.
याला योगेश काटे यांनी जे उत्तर दिले तेही वाचकांसाठी देत आहे- -  जी  वाचाला लेख तो अभिवादन मधील.
खंडन नाही करु शकले कै. कुरुंदकर गुरुजी  मतभेद आहे. एवढच म्हणाले  व का मतभेद आहेत याची. कारणमीमांसा    नाही केली. नेहमी प्रमाणे शब्दच्छल केला. कर्णावरचे मत मान्य केले त्यांनी त्यात.  कुरुंदकर म्हणतात अनंत महाराज व त्यांचा (कुरुंदकरां)  महाभारतकडे बघण्याचा परिपेक्ष्य वेगळा आहे. श्री अनंत महाराज यांचा परिपेक्ष हा.सांस्कृतिक आहे अस म्हणतात व त्यांचा ऐतिहासिक आहे म्हणतात. इथेच सगळी मेख आहे.आणि कलमंदीर येथील वादविवाद सभेत  अनंत महाराज यांनी प्रश्न विचारला तेंव्हा महाभारत इतिहास नाही तर कल्पना आहे अस सांगितलं.
रुक्मिणी या शब्दाचा विपर्यस्त अर्थ काढला तो कसा चुकीचा आहे ते श्री प्रा.आठवले यांनी महाभारताच्या त्यांच्या ग्रंथात सिध्द केलय.व्यासांचे शिल्प मध्ये  बाळशास्त्री हरदास व अनंतराव आठवले हे सांस्कृतिक नजरेतुन पाहतात एवढच लिहलं. एक एक मुद्दा घेवुन खंडन नाही केलं. दखल घेतली हे म्हणणं बरोबर आहे पण म्हणजे उपरोक्त लेखकाचे म्हणण्या प्रमाणे चिकीत्सा नाही केली. अस आहे व ते खर आहे. आतापर्यंत श्री प्रा.आठवले यांच्या ग्रंथाचे खंडन मराठी साहित्य विश्वात कोणही करु शकले नाही.)

Friday, July 17, 2020

नभात जल ते जलात नभ ते संगमुनी जाई !


काव्यतरंग, शुक्रवार 17 जूलै 2020 दै. दिव्यमराठी

सुनील नभ हे, सुंदर नभ हे,
नभ हे अतल अहा
सुनील सागर सुंदर सागर
सागर अतलचि हा

नक्षत्राही तारांकित हे
नभ चमचम हासे
प्रतिबिंबाही तसा सागरहि
तारांकित भासे

नुमजे लागे कुठे नभ कुठे
जलसीमा होई
नभात जल ते जलात नभ ते
संगमुनी जाई

खरा कोणता सागर यातुनि
वरती की खाली?
खरे तसे आकाश कोणते
गुंग मती ंझाली

-वि.दा.सावरकर (समग्र ़सावरकर वाङ्मय- खंड 8 काव्य, प्रकाशक स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

या कवितेच्या खाली सावरकरांचे नाव टाकले नसते तर ही कविता बालकविंची म्हणून सहज खपून गेली असती. इतकी तरल इतकी निसर्गप्रेमी इतकी सुंदर ही कल्पना सावरकरांनी मांडलेली आहे. (सावरकर आणि बालकवी यांचा जन्मही सोबतचाच आहे.) 

‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या कवितेचे गाणे बनले आणि त्याला अफाट लोकप्रियता लाभली. त्या कवितेत जी भावना आहे ती मातृभूमीविषयी वाटणारी तळमळ व्यक्त करणारी आहे. दूर गेल्यावर सगळ्याचीच किंमत कळते असं म्हणतात.

पण ही कविता मात्र त्यापासून जरा वेगळी आहे. 90 ओळींची ही दीर्घ मोठी कविता आहे. त्यातील सुरवातीचा हा तुकडा आहे. 1906 असे वर्ष या कवितेखाली लिहीलेले आहे. बोटीवरून जात असताना जे अफाट आभाळ आणि समुद्र असे निसर्गसौंदर्य सावरकरांना अनुभवायास मिळाले त्यातून ही कविता त्यांना स्फुरली.

या कवितेत कसला संदेश कविला द्यायचा नाही, कसली विशिष्ट भूमिका नाही, विशुद्ध अशी भावना या कवितेत सावरकरांनी मांडून आपल्यातील उच्च प्रतिभेचा पुरावा दिला आहे.

‘सुनील नभ’  असं म्हणत असताना त्या निळ्या रंगाचे एक वेगळेपण सांगितलं आहे. बोरकरांनी आपल्या निळ्या रंगाच्या कवितेत निळ्याच्या विविध छटा सांगितल्या आहेत

आभाळाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा

आता निळा हा रंग आहे मग तो गोल चौकोनी त्रिकोणी कसा असू शकेल? पण त्या निळ्याचे वेगळेपण सांगण्यासाठी हा शब्द येतो. तसेच सावरकर याला नुसता निळा न म्हणता ‘सुनील’ म्हणतात.
निळ्या रंगाचे वैशिष्ट्य सांगताना ‘असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे, त्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे’ असंही बोरकर सांगून जातात. या निळ्या रंगाच्या अफाटपणामुळेच कदाचित या रंगाला देवाचा रंग समजला जातो.

नभात जल आणि जलात नभ संगमुनी जाते हे सांगताना समुद्राच्या प्रवासातील एक सुंदर असे दृश्य सावरकर वाचणार्‍यांच्या डोळ्यात ठसवतात. किनार्‍यापासून खुप आत मध्ये गेल्यावर अथांग पाणी आणि अपार नभ यांच्या निळाईशिवाय डोळ्यासमोर काहीच नसते. ही एक अतिशय सुंदर अशी अनुभूती आहे.

‘कोलंबसचे गर्वगीत’ नावाची एक कुसुमाग्रजांची कविता आहे. त्यात खलाश्यांचे शौर्याचे वर्णन आहे, त्यांना प्रोत्साहन देणार्‍या कोलंबसचे वीर रसात भिजलेले शब्द आहेत, धीर देणारे शब्द आहेत. पण त्याच कवितेत एक ओळ मात्र अशी काही येवून जाते

सहकार्‍यांनो, का ही खंती जन्म खलाशांचा
झुंझण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरि असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

आपल्या शुर सहकार्‍यांना कोलंबस इतर सर्वकाही सांगत असताना नक्षत्रापरि असीम नीळ्या रंगात आपला संचार आहे अशी ओळ कुसुमाग्रज लिहून जातात.

ना.धो. महानोर यांच्या वही कविता संग्रहात समुद्राबाबत अशाच सुंदर ओळी आलेल्या आहेत.

गडद निळे आकाश उतरते गदड समुद्री निळ्या
क्षितीज कोठले वाटा कुठल्या दिशात रातांधळ्या
जशी भूलावण व्हावी अवघे  लीन असावे जिणे
शब्दांमधले अर्थांमधले  एकसंध चांदणे

सावरकरांच्या याच कवितेच्या पुढील तुकड्यांत खुप सुंदर कल्पना आल्या आहेत. हे तारे म्हणजे काय आहे, ‘थवे काजव्यांचे की नंदनवनिच्या चकचकले, तयांसि तारे म्हणूनि ज्यांतिषी भले भले चकले!’ किंवा अजून एक सुंदर कल्पना म्हणजे गौरीच्या गळ्यातील मोत्याचा हार हिसका बसून तुटला, ‘त्या हारातील मोती सैरा वैरा ओघळले, तयांसि तारे म्हणूनि ज्योतिषी भले भले चकले’ अशा काही कल्पना कवितेत पुढे आल्या आहेत.

सावरकरांचा अभ्यास करताना त्यांच्या कवितेचा विचार केला जात नाही ही खरी शोकांतिका आहे.

स्वत: सावरकरांनी पण जी भूमिका नंतर घेतली ‘लेखणी सोडून बंदूका हाती घ्या’ ही त्यांच्या विशुद्ध साहित्याला मारक ठरली. त्यांना समजून घेताना त्यांच्याच भूमिकेची अडचण येते हे पण लक्षात घेतले पाहिजे.
आपल्याकडे राजकीय नेत्यांच्या कलेविषयक भूमिकांना समजूनच घेतले जात नाही. ज्यांची जन्मशताब्दि चालू आहे ते माजी पंतप्रधान पी.व्हि. नरसिंहराव हे साहित्याचे चांगले रसिक अभ्यासक लेखक होते, समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा शेक्सपिअरच्या नाटकांचा गाढा अभ्यास होता, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी भारतीय संस्कृतीवर अतिशय सुंदर लिहून ठेवले आहे.

बाबासाहेब आंबेडकर डफ चांगला वाजवायचे असा उल्लेख त्यांच्या चरित्रात सापडतो. महात्मा गांधींची भाषा खादीच्या सुतासारखीच सरळ सोपी सुंदर होती. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आत्मचरित्रपर जे लिखाण केले, काही व्यक्तिरेखा लिहील्या त्या ‘अंगारमळा’ पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार लाभला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र मराठीतील उत्कृष्ट वाङ्मयीन नमुना आहे.
अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. सावरकरांच्या या कवितेत एका राजकीय नेत्याच्या आतील खर्‍या प्रतिभावंत लेखकाचे दर्शन होते.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Thursday, July 16, 2020

कुरुंदकरांच्या आरत्या, चिकित्सा आणि आपण


उरूस, 16 जूलै 2020 

काल (15 जूलै) महान विचारवंत लेखक नरहर कुरूंदकर यांची जयंती होती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कुरूंदकर हयात असते तर आज 88 वर्षांचे असले असते. त्यांच्या जयंती निमित्त समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) दिवसभर त्यांच्यावर आरत्या ओवाळलेल्या पाहण्यात आल्या. न राहवून रात्री मी त्यावर एक पोस्ट टाकली, ‘आज दिवसभर कुरूंदकरांच्या आरत्या ओवाळणे चालू होते. त्यांच्या विचारांची कठोर चिकित्सा होणार कधी?’.

याने कुरूंदकर भक्त दुखावल्या गेले. आणि तशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरच उमटल्या.
एक प्रा. संतोष शेलार यांचा अपवाद वगळता कुणीही कुरूंदकर गुरूजींच्या लिखाणाची चिकित्सा करणारे काही लिहीलेले काल माझ्या वाचनात आले नाही. हा नेमका काय प्रकार आहे?

कुरूंदकर हे ज्या वैचारिक परंपरेत येतात त्यात चिकित्सेला अतोनात महत्त्व आहे. इतरांच्या विचारांची चिकित्सा कुरूंदकरांनी केली आहे. स्वत: कुरूंदकरही आपल्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे याच मताचे होते.
त्यांच्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे असं म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान अवहेलना होते असं मुळीच नाही. चिकित्सेने केवळ विचारांचे खंडन होते असेही नाही. त्यांनी दाखवलेल्या विचारांच्या दिशेने पुढचा प्रवास करून पुढचा टप्पा गाठण्यासाठीही चिकित्सा होणे गरजेचे असते.

कुरूंदकरांना बाबत जो अभिमान माझ्या प्रदेशात (मराठवाडा आणि त्यातही परत परभणी नांदेड जिल्हा) आहे तो आहेच. अगदी मलाही आहे. कुरूंदकरांवर काही जणांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी जयंत पुण्यतिथी साजरी होणे, त्यांच्या आठवणी जागवल्या जाणे, त्यांचे पुतळे उभारणे, स्मारक होणे हे सगळं घडतं. पण याचा कुरूंदकरांच्या वैचारिकतेही  काहीच संबंध नाही.

जागजागो ग्रामदैवतं असतात तशी ही साहित्यिक सांस्कृतिक दैवतं असू शकतात. भारतीय मानसिकता याला पोषक आहे. (आम्हीही परभणीला बी. रघुनाथ यांच्या स्मृतीत याच पद्धतीनं कार्यक्रम करतो. बी. रघुनाथ यांचे एक भव्य स्मारकही उभारल्या गेले आहे.) पण त्यामुळे त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा विचार पुढे आला तर त्यावर टीका का केली जाते?

खरं तर आपल्या विचारांची पुरेशी चिकित्सा होत नाही हे पाहून स्वत: कुरूंदकरच अस्वस्थ झाले असते. आरती ओवाळणे हा जो शब्द मी वापरला तो नेमका चिकित्सेच्या उलट आहे. श्रद्धा असते तिथे आरती ओवाळली जाते. आणि श्रद्धा बाजूला ठेवून तर्ककठोर विचार असतो तिथेच चिकित्सा होवू शकते.

म्हणजे मुळात या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना नरहर कुरूंदकर यांना दैवत बनवून त्यांची आरती ओवाळायची आहे, आठवणींची पोथी लिहून ठेवायची आहे, तिची पारायणे करायची आहेत तो एक स्वतंत्र श्रद्धेशी निगडित प्रकार आहे. ही ज्यांची भावनिक गरज आहे त्यांनी ते करावे. पण जे वैचारिक श्रेत्रातील आहेत, ज्यांना विचारांचे आणि त्या अनुषंगाने होणार्‍या चिकित्सेचे महत्त्व आहे त्यांच्यासाठी हा आरतीचा कार्यक्रम अनावश्यक आहे.

इंद्रजीत भालेराव यांनी आरती आणि चिकित्सा सोबत असु शकते असं एक समतोल वाक्य वापरलं आहे. ते खरं आहे. खंत आहे ती अशी की केवळ आरतीच होते आहे. त्या मानाने चिकित्सा होत नाही.

उदा. म्हणून कुरूंदकरांचे एक पुस्तक आपण घेवू. त्याचे नाव आहे, ‘हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन’. हे पुस्तक  1985 मध्ये म्हणजेच कुरूंदकर गुरूजींच्या मृत्यूनंतर प्रकाशीत झाले. हे पुस्तक म्हणजे वेळोवेळी गुरूजींनी लिहीलेले लेख (कुरूंदकर ‘गुरूजी’ याच संबोधनाने आमच्या मराठवाड्यात आजही परिचित आहेत) आणि सेलू येथे भांगडिया व्याख्यान मालेतील तीन व्याख्याने यांचा समावेश असलेला संग्रह आहे.

या पुस्तकाची 13 वर्षांनी दुसरी आवृत्ती प्रकाशीत झाली 1998 मध्ये. अपेक्षीत असे होते की या पुस्तकाला सविस्तर अशी प्रस्तावना जोडली जावी. जागजागो टीपा देण्यात याव्यात. काही नविन संदर्भ उपलब्ध झाले त्यांचा उल्लेख व्हावा. तशी अपेक्षा संपादक द.पं.जोशी यांनी व्यक्त केलेली आहे. पण असं काहीच घडलं नाही. या दुसर्‍या आवृत्तीलाही आता 22 वर्षे उलटून गेली आहेत. आपण गुरूजींच्या नावाने नुसतेच गळे काढत आहोत. पण या पुस्तकाची चिकित्सक प्रस्तावना, टीपांसह नविन आवृत्ती काढायला तयार नाहीत ही खंत आहे.

अनंत भालेराव यांनी उतारवयात मोठी मेहनत घेवून ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम आणि मराठवाडा’ हे पुस्तक 1987 मध्ये सिद्ध केले. या पुस्तकांत जागजागी टीपा दिल्या आहेत. संदर्भ ग्रंथांची यादी जोडली आहे. संशोधनाची शिस्त सांभाळत हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. मग हीच बाब गुरूजींच्या विचारांचे अभ्यासक, चाहते का करत नाहीत?

शेषराव मोरे यांनी गुरूजींचे आशिर्वाद घेतले आणि आयुष्य सावरकर, मुस्लिम प्रश्‍न याच्या अभ्यासावर खर्च केले. आपल्या चिकित्सक अभ्यासातून मोठे ग्रंथ सिद्ध केले. या पद्धतीचे काम हीच खरी गुरूजींना श्रद्धांजली असू शकते. बाकी आपण जे काही कर्मकांड दरवर्षी पुण्यतिथी जयंतीला करत आहोत तो वेगळा भाग आहे. त्यावर मला काही टिका करायची नाही. अशा समारंभांमध्ये मीही सहभागी झालो आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा तो भाग आहे. पण म्हणून वैचारिक पातळीवर होत असलेली हानी न पाहता समाधान व्यक्त करत कसे काय स्वस्थ बसून राहू?

असे काही प्रश्‍न उपस्थित केले की लगेच प्रतिक्रिया उमटते. तूम्हाला कुणी रोकले आहे? तूम्ही करा काय करायचे ते. आमच्या आरत्या ओवाळणे आम्ही करत राहू. जो काही उरूस भरवायचा आहे, संदल काढायचा आहे तो आम्ही काढत राहू. जी काही ‘कुरूंदकर जत्रा’ भरवायची आहे ती भरवत राहू.

आता असल्या पोरकट वादाला काही उत्तर नसते. स्वत: गुरूजी वैचारिक क्षेत्रातील खंडन मंडन मानणारे होते. त्यांनाही त्यांच्या विचारांचे ‘भजन’ वैचारिक पातळीवरच अपेक्षीत होते. असले कर्मकांडवाले ‘भजन’ आपली खरी वैचारिक प्रतिमा ‘भंजन’ करू शकते याची त्यांनाही नक्कीच जाणीव असणार.

महाभारतावर इरावती कर्वे, दुर्गा भागवत, आनंद साधले, दाजी पणशीकर यांच्या सोबतच कुरूंदकरांनीही ‘व्यासांचे शिल्प’ नावाचे पुस्तक लिहीले आहे. पण त्यांनी मांडले त्याच्या पुढे जावून नंतर रविंद्र गोडबोले, विश्वास दांडेकर यांनी लिहीले आहे आणि गुरूजींचे प्रकाशक असलेल्या देशमुख आणि कंपनीनेच ती पुस्तके  प्रकाशित केले आहे. खुद्द नांदेडातच अनंत महाराज आठवले यांनी ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ सारखा अप्रतिम ग्रंथ पूर्वासूरींना खोडून काढणारा प्रतिवाद करणारा लिहीला आहे. कुरूंदकर हयात असले असते तर त्यांनी या ग्रंथाची योग्यता आपल्याच शब्दांत मांडली असती.

कुरूंदकरांनी समाजवादावर केलेले भाष्य, नेहरूंच्या विचारांची केलेली मांडणी आजच्या काळात तपासून पाहण्याची गरज आहे. स.रा. गाडगिळांच्या ‘लोकायत’ला लिहीलेली प्रस्तावना- नंतर झालेल्या संशोधनांत अजून हा विषय पुढे गेलेला आहे. अशी काही वैचारिकतेच्या क्षेत्रातील चिकित्सेची चांगली उदाहरणे सांगता येतील. हे सगळं सकोप निरोगी वैचारिक वातवरणाला पोषक असं लिखाण कुरूंदकरांना आवडले असते.

आज ‘आरती’ संप्रदायापासून कुरूंदकरांना वाचवायची गरज निर्माण झाली आहे असे मला प्रमाणिकपणे वाटते. कुरूंदकरांचे कुटूंबिय, मराठवाड्यातील त्यांचे चाहते, शिष्य यांच्याशी माझे वैयक्तिक पातळीवर अतिशय चंागले संबंध आहेत. गुरूजींच्या प्रखर बुद्धीमत्तेबद्दल प्रतिभेबाबत माझ्या मनात कुठलीच शंका नाही म्हणूनच त्यांच्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे असं मी म्हणून शकतो. किमान वैचारिक पाया असणारे हे समजून घेतील याची खात्री आहे.

माझ्या शब्दांनी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्या सर्वांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, July 14, 2020

पिंजर्‍यातील वाघाचा स्वतंत्र बाणा !


उरूस, 14 जूलै 2020 

झुंझार पत्रकार अनंत भालेराव यांनी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्यावर एक फर्मास अग्रलेख लिहीला होता. त्याचे शिर्षक होते, ‘घोड्यांचा खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा अडवणार कसा?’. दिल्ली श्रेष्ठींच्या समोर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते कसे लाचार होतात यावर हा टोला होता.

आताच्या काळात भाउ तोरसेकर वगळता महाराष्ट्रातील पत्रकार असं काही लिहीत नाहीत. सत्ताधार्‍यांवर टीका करणं म्हणजे कर्णकर्कश्शपणा वाटून ते सत्ताधार्‍यांची स्तूतीच करत चालले आहेत. ही स्तूती जरूर करावी पण ती किमान वस्तुनिष्ठ तरी असावी. आपल्या समतोल लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक लेख लिहीला, ‘उद्धव अन कळसुत्री बाहुले? मुळीच नाही’ (त्यांच्या ब्लॉगवर आणि अक्षरनामा या पोर्टलवर हा लेख उपलब्ध आहे). त्यांचा हा लेख वाचून माझ्यासारख्या त्यांच्या नियमित वाचकाला धक्काच बसला.

बर्दापुरकरांच्या अक्षरांवरची शाई वाळलीही नव्हती की तितक्यात बातमी आली 10 पैकी 9 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या त्या परत करण्यात आल्या आहेत. यातील 6 जणांची तर आधी केली होती त्याच जागी बदली करण्यात आली आहे. शिवाय हा लेख लिहीला त्याच्या दुसर्‍याच दिवशी अजीतदादा पवार यांनी पुण्यातील पाच उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.

मग आता ह्या बदल्या-रद्द बदल्या- परत बदल्या नेमक्या कसला पुरावा आहेत? उद्धव ठाकरे यांची प्रशासनावर पकड असल्याचे हे लक्षण आहे का?

कोरोनाला भिउन उद्धव ठाकरे मातोश्रीवर दडी मारून बसले आहेत. मुख्यमंत्र्याचे सरकारी निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला त्यांनी निवासासाठी स्विकारलाच नाही. शिवाय ते मंत्रालयातही जात नाहीत. परिणामी ‘मातोश्री’ हेच मंत्रालय होवून बसले आहे. मग स्वाभाविकच शरद पवारांना तिथेच चकरा माराव्या लागतात. शरद पवारांना मातोश्रीवर जावे लागते यातून उद्धव ठाकरे यांचे मोठेपण बर्दापुरकर सुचवतात. मग त्यांनी याचे उत्तर द्यावे की सरकार स्थापन करताना किंवा त्यानंतर कोरोना भितीने मातोश्रीच्या गुहेत दडी मारून बसेपर्यंत उद्धव ठाकरे यांनाच का बरे शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ वर चकरा माराव्या लागत होत्या? सत्तेत अर्धा वाटा मिळण्यासाठी ठाम असलेले आता सत्तेच्या चतकोर तुकड्यावर संतुष्ट होतात हा काय प्रकार आहे?

त्या काळात एकदाही शरद पवार मातोश्रीवर फिरकले नाहीत. अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत अर्धावाटा द्यावा, शिवाय मातोश्रीवर चकरा माराव्यात अशा अटी घालणारे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओकचे उंबरठे झिजवत राहिले हे कोणत्या स्वाभिमानाचे लक्षण होते?

उद्धव ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांच्या खासगी सचिवाचे नाव उभ्या महाराष्ट्राला ठळकपणे माहित आहे. चहापेक्षा किटली गरम असे जे वर्णन नितिन गडकरी यांनी केलेले आहे ते सगळ्यात जास्त मिलिंद नार्वेकर यांनाच लागू पडते. सामनाचे संपादकपद रश्मी ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर बहाल केले. तसेही ठाकरेंचे निर्णय ‘आतल्या स्वारी’च्या प्रभावाने होतात हे उघड गुपित आहे. युवराज आदित्य यांचे हट्ट उद्धवजींना काय काय करायला लावतात हे पण सर्वांना माहित आहेच. या शिवाय निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांना ठाकरेंनी आपला प्रशासकीय सचिव म्हणून नेमले. म्हणजेच आधीच या चौकडीत उद्धवजी बंदिस्त आहेत. ही चार बोटे कमी पडली म्हणून की काय काकांचा ‘अंगठा’ पण यांना लागतोच. अशा पाच बोटांवर नाचणारे हे नेतृत्व नेमके कुठल्या अंगाने ‘कळसुत्री बाहुले नाही’ असे बर्दापुरकरांना वाटते? खरं तर मला अशीही शंका येते आहे की बर्दापुरकर हे उपहासाने तर लिहीत नाहीत ना?

उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांचीच तक्रार असली असती तर त्याकडे राजकारण म्हणून दुर्लक्ष करता येईल. पण त्यांचेच मंत्रीमंडळातील सहकारी ही तक्रार करतात, प्रत्यक्ष शिवसैनिकच तक्रार करतात याचे काय करायचे? कोरोना काळात शिवसैनिकांचेच मृत्यू होत आहेत अगदी शिवसेनेचा गढ असलेल्या मुंबईत आणि त्यांच्या घरच्यांना एक दिवसा नंतर कळवले जाते हा नेमका कशाचा पुरावा आहे?

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाचा धोका असतानाही संपूर्ण महाराष्ट्रात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आवश्यक त्या सुचना करत आहेत. आणि या काळात कळसुत्री बाहुले नसलेले स्वतंत्र बाण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करत आहेत? मातोश्रीवर बसून कोमट पाणी पीत आहेत. डिझास्टर टूरिझम (आपत्ती पर्यटन) म्हणून युवराज आदित्य ठाकरे हे देवेंेद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना उडवून लावू शकतील. कारण ‘नया है वह’. पण उद्धव ठाकरे पण असंच समजत आहेत का?

कोरोना संकटाच्या काळातील मुंबईत प्रवासी मजदुरांच्या रेल्वे प्रवासावरून उडालेला प्रचंड गोंधळ, पालघर येथील पोलिसांच्या उपस्थितीत दोन साधुंचा जमावाने घेतलेला बळी, वाधवान प्रश्‍नी सरकारची झालेली प्रचंड नामुष्की, अर्णब गोस्वामी प्रकरणांत दाखल करण्यात आलेले खोटे एफआयआर आणि त्यावर न्यायालयाने निकालात मारलेली थप्पड, मुुंबईमध्ये कोरोना बाधितांच्या हाताळणी मृतदेहांची झालेली हेळसांड या सर्व नजिकच्या काळात घडलेल्या घटना आहेत. या सगळ्यांतून उद्धव ठाकरे यांची नेमकी कुठली प्रशासनिक पकड दिसून येते?

आपल्या लेखात बर्दापुकर असं लिहीतात, ‘...इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाट्याला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणातले एकमेव नेते आहेत.’ हा लेख वाचणार्‍या कुणाही वाचकाने गेल्या पाच वर्षांतली समाज माध्यमांवरची भाषा बघितली तर देवेंद्र फडणवीस यांना जातीवरून, पत्नीवरून आणि देहावरून  ज्या घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल केल्या गेले तेवढे कुणालाच केल्या गेले नाही हे सहज लक्षात येते. अगदी हेलीकॉप्टरच्या अपघातात ते बचावले तर ‘टरबुज्या मेला का नाही’ असेही बोलल्या गेले. मग हे ढळढळीत समोर असताना बर्दापुरकरांना खोटे का लिहावे वाटते?

उद्धव ठाकरे यांचे जे काही गुण असतील त्यावर जरूर लिहावे पण नसलेल्या गोष्टी त्यांना चिटकवून काय होणार आहे? उद्धव ठाकरेंनी शिवसेना ग्रामीण भागात पोचवली असं एक विधान बर्दापुरकर करतात हे एकवेळ ठीक. पण त्यापुढे जावून ‘... या काळात शेतकर्‍यांचे प्रश्‍न राजकीय पटलावर विविध मार्गांनी उचलून धरणारा शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष महाराष्ट्रात दिसत होता.’ असं लिहीलं आहे. फार खोलात न जाता मी केवळ एकच विचारू इच्छितो, उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या कुठल्याही प्रमुख नेत्याने शेतकर्‍यांची ‘कर्जमुक्ती’ आणि ‘कर्जमाफी’ या दोन शब्दांतला फरक समजावून सांगावा. खरीप आणि रब्बीच्या पाच पाच पिकांची नावे सांगून त्यांच्यासाठी काय धोरण असावे हे किमान शब्दांत अगदी ढोंबळपणे मांडून दाखवावे. साखर उद्योग, त्यावरचे नियंत्रण, उसाच्या उपपदार्थांची विक्री आणि त्याचे धोरण याबाबत अगदी ढोबळ वाटावी अशी 200 शब्दांत मांडणी करून दाखवावी.

उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत त्या शिवसेनेच्या शाखा 1988 च्या दरम्यान आमच्या औरंगाबादेत (शिवसैनिकांच्या भाषेत संभाजीनगरात) सुरू झाल्या तेंव्हा न त्यांचा कुणी आमदार होता न मंत्री होता ना खासदार होता. सगळ्यात जास्त नगरसेवक निवडुन येवून त्यांचा कुणी महापौरही झाला नव्हता. पण त्यांच्या शाखा गल्लो गल्ली निघाल्या होत्या. त्यावर भगवा झेंडा आणि  डरकाळी फोडणार्‍या वाघाचे चित्र ठळकपणे असायचे. त्याची एक दहशत सर्वत्र होती.  महाविद्यालयातील विद्यार्थी गाड्यांमध्ये भरभरून जावून शिवसेनेसाठी बोगस मतदान करायचे. तेंव्हा तर धनुष्यबाण हे चिन्हही सेनेच्या उमेदवाराला मिळाले नव्हते. मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर पहिल्यांदा खासदार बनले. पण त्या मशालीची धग प्रचंड होती.

आजचा शिवसेनेचा वाघ हा सर्कशीतला वाघ बनला आहे. तो बारामतीच्या रिंगमास्टरच्या तालावर नाचतो. आणि खेळ संपला की पिंजर्‍यात (मातोश्री) जावून बसतो. शिकार करायचे विसरून आयते कुणी आणून दिलेले मटण खातो.

बर्दापुरकर ज्या मराठवाड्यात आहेत तिथे मोहरमचे ताबुत बसवले जातात. आणि त्या मिरवणूकीत कागदी वाघ नाचवले जातात. तसा हा मोहरमचा कागदी वाघ आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, July 13, 2020

कॉंग्रेसचा पोपट मेला आहे !


उरूस, 13 जूलै 2020   

राजस्थानमध्ये गंभीर राजकीय संक़टाची छाया पसरली आहे. अशोक गेहलोत सरकार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण या निमित्ताने जी चर्चा चालू आहे वाहिन्यांवर ती पाहिली की अकबराची एक गोष्ट आठवते. अकबराचा लाडका पोपट मरण पावतो. पण ते बादहशाला सांगायचे कसे? कारण बादशहा आपल्यालाच शिक्षा करेल. मग पंख कसे मिटले आहे, तोंड वासले आहे, डोळे पांढरे पडले आहेत, श्‍वास कसा बंद आहे, मान टाकली आहे असं सगळे सांगत राहतात. पण कुणी कबुल करत नाही की पोपट मेला आहे. मग वास सुटतो आणि पोपट मेल्याचे सत्य समोर येतेच.

कॉंग्रेस पक्षाची अवस्था तशीच झाली आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थान. एक संयुक्त आघाडी सरकार (कर्नाटक), एक बहुमत नसलेले पण अपक्षांच्या पाठिंब्यावरचे सरकार (मध्य प्रदेश) आणि आता एक पूर्ण बहुमताचे  स्थिर सरकार (राजस्थान) पत्त्याचा बंगला कोसळावा तसे कोसळत चालले आहेत. याची कुठलीच वस्तुनिष्ठ कारणमिमांसा कॉंग्रेसवाले किंवा त्यांचे हितचिंतक जमात-ए-पुरोगामी करायला तयार नाहीत ही खरी शोकांतिका आहे.

राजस्थान सरकार मधील असंतोष ही काही नविन गोष्ट नाही. सचिन पायलट प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी निवडणुक प्रचारात भरपूर मेहनत घेतली होती, त्यांना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मात्र अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हाच प्रकार मध्यप्रदेशातही करण्यात आला. तिथेही ज्योतिरादित्य शिंदे यांना डावलून कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्या गेले.

दिल्लीत बसलेली पक्षश्रेष्ठी नावाची संस्था मख्ख बसून राहते आपले काही ऐकत नाही ही तक्रार कित्येक वर्षांपासून सातत्याने केली गेली आहे. कंटाळून काही तरूण नेत्यांनी बाहेरचा रस्ता पकडला. राज्या राज्यांतील तरूण नेत्यांना भेटण्या बोलण्याऐवजी राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं खावू घालणं पसंद करतात ही वस्तुस्थिती आहे. हा आरोप कुण्या सामान्य माणसाने किंवा राजकीय विरोधकाने केला नव्हता. तर हेमंत बिस्वशर्मा या असम मधील तरूण कॉंग्रेस नेत्यानेच केला होता. शेवटी त्याने कॉंग्रेसचा त्याग केला. परिणामी असम मधून कॉंग्रेसची सत्ता गेली. भाजपला स्वत:च्या बळावर बहुमत तिथे मिळाले. याच असम राज्यांतून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेवर निवडुन जायचे. त्यांचा तो रस्ताही बंद झाला. आणि हे घडलं ते केवळ माणसं सोडून कुत्र्याला महत्व देणार्‍या नेतृत्वामुळे.

टी. अंजय्या हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजीव गांधी तेंव्हा कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाची ही गोष्ट. हैदराबादच्या विमानतळावर टी. अंजय्या यांनी राजीव गांधी यांच्या चपला उचलल्या. राजीव गांधी त्यांना काहीतरी अपमानास्पद बोलले होते. ही बातमी इतकी वार्‍यासारखी पसरली आंध्रप्रदेशांत की पुढे केवळ 9 महिन्यात तेलगु अस्मितेच्या नावाखाली एन.टी.रामाराव यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना करून कॉंग्रेसचा पराभव घडवून आणला व एन.टी. रामाराव आंध्राचे मुख्यमंत्री बनले.

पण यापासून काही शिकेल ती कॉंग्रेस कुठली. पुढे चालून ज्या कॉंग्रेस नेत्याने चंद्राबाबूंच्या हातातून मेहनत करून राज्यभर फिरून सत्ता हिसकावून घेतली त्याचे नाव वाय.एस. राजशेखर रेड्डी (वायएसआर नावाने ते लोकप्रिय होते). याच रेड्डी यांचा मुलगा म्हणजे जगन मोहन रेड्डी. त्यानेही असेच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी सतत संपर्क करायचा प्रयत्न केला. रेड्डी यांच्या निधनानंतर त्याला मुख्यमंत्री करा अशी आमदारांची मागणी होती. पण सोनिया गांधी- राहूल गांधी आपल्याच मस्तीत राहिले. उलट त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्याला तुरूंगातही जावे लागले. अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे दरबारी राजकारणी त्यांना सतत घेरा घालून बसलेले. परिणामी जगनमोहन रेड्डीला पक्षातून बाहेर पडावे लागले. त्याने वेगळा पक्ष स्थापन केला आणि आंध्रप्रदेशांतून तेलगु देसमचा नाही तर कॉंग्रेसचा समुळ नायनाट करून दाखवला.

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचेही उदाहरण असेच आहे. जनतेचे समर्थन असणार्‍या तरूण लोकनेत्यांची उपेक्षा करणे हा कॉंग्रेसचा एक कलमी कार्यक्रम राहिला. समोर सक्षम पर्याय नव्हता तो पर्यंत सत्तेच्या लोभाने कॉंग्रसची सर्कस कशीबशी चालू राहिली. पण हळू हळू स्थानिक पातळीवर प्रादेशीक पक्षांचे पर्याय उभे राहत गेले, देश पातळीवर भाजप सारखा सक्षम पर्याय उभा राहिला आणि कॉंग्रेसचा किल्ला ढासळायला सुरवात झाली. आता तर धक्का मारायचीही गरज उरलेली नाही. एखाद्या पावसात भक्कम गढीची मातीची भिंत कोसळावी तशी अवस्था झालेली आहे.

राजस्थानमध्ये बाहेरून कुणीही हे सरकार पाडण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. सचिन पायलट यांना जास्तीचे दुखावण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांच्याकडून पक्षाध्यक्षपद काढून घ्यायची हालचाल अशोक गेहलोत यांनी का सुरू केली? सरकारविरोधी कारवाया केला म्हणून आपल्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यावर पक्ष अध्यक्षावर देशद्रोहाचे कलम लावावे हे नेमके काय धोरण आहे?

कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्याला भाउ तोरसेकर यांनी नेमके नाव दिले आहे, ‘बोलसेनारो व्हायरस बाधा’. म्हणजे असा रोग ज्यात रोगी आपल्याला रेाग आहे हेच कबुल करत नाही. आपलं सगळं ठीकच चालू आहे असंच कॉंग्रेसवाले सांगत राहतात. कॉंग्रेसचे जे हितचिंतक आहेत ते सर्व जमात-ए-पुरोगामी हे भाजपला आंधळा विरोध करत कॉंग्रेसची पाठराखण करत आहेत. त्यांना भाजप नको म्हणू कॉंग्रेस हवी आहे. पण तेही कॉंग्रेसच्या समस्येचे नेमके रोगनिदान करायला तयार नाहीत.

खरं तर कॉंग्रेसचा आणि त्यातही सोनिया-राहूल-प्रियंका या गांधी घराण्याच्या नेतृत्वाचा पोपट मेला आहे आणि हे कबुल करण्याची कुणाची हिंमत नाही. कॉंग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी आत्मचिंतनाचा आवाज उठवला की लगेच त्यांना पक्ष प्रवक्तेपदावरून हटवले. काल माजी मंत्री व राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी ट्विट करून पक्षाविषयी चिंता जाहिर केली. तबेल्यातून सर्व घोडे पळून गेल्यावर आम्ही जागे होणार का? इतक्या दाहक शब्दांत नेतृत्वावर टीका केली. पण हे ऐकणार कोण?

आता दोनच पर्याय शिल्लक राहतात. एक तर राहूल-सोनिया-प्रियंका यांना बाजूला सारून इतर कर्तबगार कॉंग्रेस नेत्यांनी (असे कुणी आहे का? हाच प्रश्‍नच आहे) पुढे यावे. यांना बाजूला सारून पक्ष हाती घ्यावा. सगळी सुरवात पहिल्यापासून करावी. तळापासून पक्षसंघटना बांधत यावे. पक्षातून बाहेर गेलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना परत पक्षात आणावे. उदा. शरद पवार, जगन मोहन रेड्डी, ममता बॅनर्जी इ. लोक चळवळ असलेल्या कॉंग्रेसचे मुळ स्वरूप परत प्रकट करावे. त्याला एक  वर्ग निश्‍चितच प्रतिसाद देईल.

याच्या उलट कॉंग्रेसला पूर्णत: बाजूला सारून देशपातळीवर भाजपेतर पक्षांची एक स्वतंत्र आघाडी तयार करण्यात यावी. त्या आघाडीने प्रादेशिक पक्षांना सोबत घेताना देशपातळीवर एक पर्याय उभा करावा. यासाठी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि आताही बाहेर पडू पाहणार्‍या सर्वांना सोबत घ्यावे. आत्तापासून प्रयत्न केले तर 2024 च्या निवडणुकांत एक राजकीय आव्हान उभे करता येईल.

ही चर्चा कितीही केली तरी ती कुणी कॉंग्रेसवाले मनावर घेणार नाहीत याची मला खात्री आहे. पण राजकीय क्षेत्रात काम करू पाहणारे जे कुणी नविन तरूण कार्यकर्ते असतील त्यांनी लक्षात घ्यावे की राहूल सोनिया प्रियंका यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमध्ये काम करणे म्हणजे राजकीय आत्महत्या आहे. त्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग अवलंबावा. अगदी स्थानिक पातळीवर स्वत:पुरता एखादा गट स्थापन करून काम केलं तरी फायदा मिळेल. पण कॉंग्रेसमध्ये जाण्याचा फायदा नाही.

राजस्थान मध्ये काही तडजोडी होवून सचिन पायलट परतले किंवा त्यांना आता कॉंग्रेसने मुख्यमंत्री बनवले तरी हा प्रश्‍न सुटणार नाही. कारण या दुखण्याचे मुळ दिल्लीत 24 अकबर रोड (कॉंग्रेसपक्षाचे मुख्यालय) इथे राहूल प्रियंका सोनिया यांच्यापाशी आहे. अंगठी जंगलात हरवली आहे. सोयीसाठी आपल्या घरच्या अंगणात कितीही शोधली तरी सापडणार नाही. 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Thursday, July 9, 2020

या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया !


काव्यतरंग, १० जुलै शुक्रवार २०२०,  दै. दिव्यमराठी

या बालांनो, या रे या !

या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या
मजा करा रे ! मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे । तोचि फसे ।
वनभूमी । दाविन मी ।
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया ॥ 1 ||

खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुळे फळे
सुवास पसरे रसहि गळे
पर ज्यांचे । सोन्याचे ।
ते रावे । हे रावे ।
तर मग कामे टाकुनिया
नवी बघाया ही दुनिया ॥ 2 ||

पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरे मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना
चपलगती । हरिण किती ।
देखावे । देखावे ।
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया ॥ 3 ||

-भा.रा.तांबे (तांबे यांची समग्र कविता, पृ. 32, व्हिनस प्रकाशन, आ.11, 2004)

तांब्यांची ही कविता प्रसिद्ध असे बालगीत आहे. पूर्वी अभ्यासक्रमात ही कविता हमखास असायची. रॉबर्ट ब्राउनिंग याच्या ‘पाईड पायपर’ या सुप्रसिद्ध कवितेचे हे भाषांतर आहे.

एक दोन नव्हे तर तब्बल 110 कडव्यांची ही कविता आहे. तांबे हे मध्य प्रदेशातील धार संस्थानचे युवराज खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून नेमले गेले होते. त्यांना शिकवत असताना ही कविता 1895 साली त्यांनी लिहीली. या कवितेतील 91,92,93 क्रमांकाची कडवी म्हणजे ही कविता. 

स्वातंत्र्यपूर्व कालातील अगदी पहिल्या पिढीचे केशवसुतांचे समकालीन कवी म्हणजे भा.रा.तांबे. तांबे ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते. (जन्म 27 नोव्हेंबर 1874, मृत्यू 7 डिसेंबर 1941)

ही कविता बालगीत म्हणून प्रसिद्ध असली तरी बारकाईने वाचल्यास लक्षात येते की ही केवळ बालकविता नाही. लहान मुलांना अदभूताचे वेड असते. कल्पनेच्या जगात रमायला मुलांना आवडते. तसेच कलेची निसर्गाची आवड मुलांना मुलत: असतेच. आपण पुढे ‘कथित’ संस्कार करून ही आवड घालवतो.

नगरात उंदीर फार झाले. त्यावर काही उपाय सुचत नाही. तेंव्हा आपल्या बासरीच्या/पुंगीच्या नादाने उंदरांना पळवणारा एक जादूगर आहे. त्याला बोलावले तर हे उंदीर तो आपल्यामागे घेवून जाईल असे समजते. तेंव्हा गाव प्रमुख त्या जादूगाराला बोलावून आणतात. तो पुंगी वाजवून सगळे उंदीर आपल्या मागोमाग घेवून जातो. नदीच्या काठावर जो जातो आणि त्याच्या इशार्‍यावर सर्व उंदीर नदीत उडी मारतात. मग हा जादूगार आपली बिदागी गावाला मागतो. त्याने मागितलेली रक्कम देण्यास गाव कां कू करते. उंदीर तर मेले आता कशाला याला पैसे द्यायचे. हे समजल्यावर तो जादूगर रागाने निघून जातो पण जाताना आपल्या पुंगीच्या नादात गावातील सगळ्या मुलांना मोहित करून घेवून जातो. अशी ही कथा आहे. 

ताब्यांनी ही कविता मराठीत आणताना महेश्वर हे अहिल्याबाईंचे राजधानीचे किल्ला मंदिरे नदीवरील घाट असलेले सुंदर शहर, खळखळा वाहणारी नर्मदा नदी असे सगळे संदर्भ घेतले आहेत. या कवितेतील हा छोटासा तुकडा आहे.

ही कविता मोठ्यांसाठी पण आहे. किंबहुना ही मोठ्यांसाठीच आहे. आज आपण लहान मुलांना शिक्षण म्हणजे चार भिंतीत कोंडून ठेवतो. तसं न करता त्यांना निसर्गाच्या जवळ नेल्यास खुप शिकवता येते. म्हणूनच पहिल्या कडव्यात शब्द येतात, ‘स्वस्थ बसे । तोची फसे। वनभुमी । दाविन मी।’. व्यंकटेश माडगुळकर यांची ‘शाळा’ नावाची फार अप्रतिम अशी कथा आहे. मुले शाळेला जाण्यासाठी निघतात आणि दप्तरं नदीकाठी झाडाखाली झुडपात वाळूत पुरून ठेवतात. दिवसभर रानात हिंडतात. हवं ते खातात. नदीत डुंबतात. निसर्गाच्या बिनभींतीच्या शाळेतच खुप काही शिकतात. भिंतीच्या शाळेत जातच नाहीत. संध्याकाळी दिवस मावळताना दप्तरं शोधून परत घराकडे फिरतात अशी ही गोष्ट आहे. 

दुसर्‍या कडव्यात तांब्यांनी निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. मंजूळ गाणारे झरे आहेत, पाखरे गोड आवाजात किलबिल करत आहेत, फुले फुलली आहेत, फळं रसाळ पिकली आहेत, या सगळ्याचा एक सुवास सर्वत्र भरून राहिला आहे. फळं इतकी पिकली आहेत की त्यांतून रस गळत आहे. आणि हे सगळं का आहे तर तिथे माणसाने कसलाही हस्तक्षेप केला नाही. सध्याच्या कोरोनाच्या काळात वाहने कमी झाली, त्यामुळे प्रदुषण कमी झाले, हवा शुद्ध झाली पाखरांचे आवाज घराघरांत ऐकू येवू लागले आहेत.  

तिसर्‍या कडव्यांत मुलांना आवडणार्‍या अदभूत रसात भिजलेले वर्णन आहे. मोरांना पाचुंचे पंख आहेत, पाखरे दाणे नाही तर मोती टिपत आहेत, घोडे पंख लावून उडत आहेत. 

मोर नेहमी मानवी वस्तीजवळ राहतो. अजिंठ्याच्या डोंगरात वाडीच्या किल्ल्याजवळ एका झोपडीच्या अंगणात अगदी पोज देवून नाचणारा मोर आम्ही बधितला होता. अगदी जवळ जावून त्याचे फोटो काढता आले. त्या झोपडीत राहणार्‍याला विचारले तेंव्हा कळले की कोंबडीच्या अंड्यासोबतच हे मोराचे अंडे उबवल्या गेले. कोंबडीच्या पिल्लांसोबतच हे मोराचे पिल्लू वाढले. तेंव्हा आता ते इतर कोंबड्यांसारखेच त्या मालकाच्या झोपडीच्या जवळपास खेळत असते. मोर पाळायची हीच पद्धत आहे. मोराचे अंडे कोंबडीच्या अंड्यांसोबत उबवले जाते. माणसाने निसर्गाच्या जवळ जायला शिकले पाहिजे.  

तांबे या नगराला लागूनिया सुंदर ती दुसरी दुनिया म्हणतात त्याचा अर्थ इतकाच की आपल्या या व्यवहारी जीवनाला लागूनच आनंदाचा ठेवा असणारे एक जग आहे. त्यासाठी आपण आपली सर्व व्यवधाने विसरून तिथे गेले पाहिजे. ‘तर मग कामे टाकूनिया’ हे म्हणण्या मागे हाच अर्थ दडला आहे. 

निसर्ग, कला यांचे जग आपल्या व्यवहारी जगाला खेटूनच असते. पण आपण तिथपर्यंत पोचत नाही. एक अदृश्य अशी भिंत आपण उभी केलेली आहे. या व्यवहारी तटबंदीत बाहेरून कुणी येवू शकत नाही अशी तजवीज आपण करतो पण सोबतच आपणही बाहेर पडत नाही. परिणामी आनंदाच्या एका मोठ्या ठेवल्याला आपण मुकतो. 

राजशेखर रेड्डी याचा एक फार सुंदर शेर आहे.

मेरे दिल के किसी कोने मे एक मासुम सा बच्चा
बडों की देखकर दुनिया बडा होने से डरता है ।

आणि इथे तर तांबे या आपल्या मनात दडलेल्या लहान मुलाला ‘या बालांनो या रे या’ म्हणून बाहेर बोलावत आहेत. या व्यवहाराच्या नगराला लागून जी दुसरी सुंदर दुनिया आहे तिच्यात खेळायला बोलावत आहेत.

शतकोत्तर रौप्यमहोत्सव (125 वर्षे) वय असलेली ही कविता. रॉबर्ट ब्राउनिंगने दुसर्‍या भाषेत दुसर्‍या प्रदेशात वेगळ्या काळात लिहीली ही कविता. आज इतक्या वर्षांनी आपल्यापर्यंत हीच्यातील भाव सहज पोचतो आहे. अगदी एक शब्दही शिळा झालेला नाही. ही ताकद आहे ब्राउनिंगच्या आणि भा रा तांब्यांच्या प्रतिभेची.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, July 5, 2020

रूग्ण सैनिक आणि मनोरूग्ण पुरोगामी


उरूस, 5 जूलै 2020 

‘दर्द जब हद से गुजर जाये तो दवा होता है’ अशी उर्दू कवितेतील एक ओळ आहे. एका मर्यादेच्यापलीकडे दुखणे हेच औषध बनून जाते. सध्या पुरोगाम्यांसाठी मोदींवर टीका हेच औषध बनून गेले आहे. ही टीका केली नाही तर त्यांना जगणेच अवघड आहे. 

शुक्रवारी 3 जूलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहच्या लष्करी तळाला भेट दिली. 15 जूनच्या चीनसोबतच्या संघर्षात जखमी झालेल्या जवानांची रूग्णालयात जावून विचारपुस केली. सैनिकांना संबोधीले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. बासरी वाजविणारा कृष्ण जसा आम्हाला आठवतो तसाच सुदर्शनधारी कृष्णही आम्हाला कसा वंदनीय आहे हे सांगून भारत कुठल्याही कठोर सैनिकी कारवाईसाठी सज्ज असल्याचे सैन्यासमोर ठामपणे सांगितले.

याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि लगेच जमाते ए पुरोगामींनी हल्लकल्लोळ सुरू केला. ही टीका नेमकी केंव्हा सुरू झाली? चीनचे अधिकृत एकमेव वार्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्सने’ पहिल्यांदा यावर टीका केली. ही टीका वाचताच 50 वर्षांचे तरूण तडफदार राजकुमार राहूल गांधी यांना योग्य ती बत्ती मिळाली. लगेच त्यांची ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. त्यांनी ते तसे सोडताच सगळ्या पुरोगाम्यांना इशारा मिळाला. दिवाळीत फटाक्याची लड पेटवताच एका पाठोपाठ एक जसे फटाके फुटत जातात. तसे इकडे सुरू झाले. सर्व पुरोगाम्यांनी मोदींच्या या दौर्‍यावर टीका करायला सुरवात केली.

टीकेचे मुद्दे तर फारच अफलातून होते. ज्या जखमी सैनिकांना मोदी भेटायला गेले ते ठिकाण म्हणजे चित्रपटाचे शुटिंग वाटावे असा सेट लावलेला वाटत होते, जखमी सैनिकांच्या पलंगाजवळ कुठेही सलाईनचे स्टँड कसे नव्हते, औषधाच्या बाटल्या नव्हत्या, पाण्याच्या बाटल्या दिसत नव्हत्या, चादरी अगदी स्वच्छ कशा होत्या वगैरे वगैरे तारे सर्व ‘आरोग्य तज्ज्ञांनी’ तोडायला सुरवात केली. हे रूग्णालय नसून थेएटर कसे आहे. इथे प्रोजेक्टर कसा दिसतो आहे. वगैरे वगैरे टीका होत राहिली.

खरं तर या बाबत काही एक अधिकृत खुलासा सैन्याधिकार्‍यांकडून येईपर्यंत थांबायला हवे होते. चीनच्या ग्लोबल टाईम्स ने केलेली टीका वाचून आपण टीका करू नये इतके तरी शहाणपण यायला हवे होते. राहूल गांधी यांच्या ‘हो मध्ये हो’ मिसळत राहिलो तर नेहमीच तोंडावर आपटावे लागते हा मागचा अनुभव होता. पण तरी यातून काही शिकायला पुरोगामी तयार नाहीत.

एकाच दिवसांत सैन्याच्या प्रसिद्धी आधिकार्‍यांनी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. आणि सर्व टीकाकार तोंडावर पडले. हा जो हॉल होतो तो ऑडिओ व्हिज्यूअल प्रशिक्षणासाठी वापरल्या जाता होता. कोव्हिड-19 चा धोका असल्याने बाकी रूग्णांपासून हे नविन आलेले रूग्ण विलगीकरणात ठेवले असल्याने त्यांना त्याच सभागृहात ठेवण्यात आले होते.  हे नियमित रूग्णालय नसून तात्पुरती तयार केलेली व्यवस्था आहे. जे गंभीर रूग्ण आहेत त्यांना अजून वेगळीकडे ठेवण्यात आले आहे. त्यांना कुणालाच भेटू दिले जात नाही. सर्व सविस्तर खुलासा सैन्याच्या प्रसिद्धी खात्याकडून देण्यात आला.

या शिवाय राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून ज्या लदाखी नागरिकांचे व्हिडिओ दिले आहेत ते चारही जण कॉंग्रेस पक्षाचेच पदाधिकारी आहेत. त्यातील एक तर लदाखी नागरिक नसून हिमाचल प्रदेशचा नागरिक असून तोही युवक कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. राहूल गांधींच्या ट्विटरचाही भांडाफोड लगेच झाला.

राहूल गांधी संसदेच्या सुरक्षाविषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत. सप्टेंबरमध्ये तयार झालेल्या या समितीच्या आत्तापर्यंत ११ बैठका झाल्या. यातील एकाही बैठकीला राहूल गांधी हजर नव्हते. शेखर गुप्तांच्या "द प्रिंट" या न्युज पोर्टलने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. पण हेच राहूल गांधी चीनवरून रोज ट्विटर ट्विटर खेळून मोदींवर टीका करत असतात.

या सगळ्या टीकेच्या आरडा ओरडोची एक विशिष्ट पद्धत आहे. सध्याच्या प्रकरणांत चीनचे ग्लोबल टाईम्स वापरले जाते आहे इतर प्रकरणी परदेशी वृत्तसंस्थांचा (बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट वगैरे) वापर केला जातो. यातील अर्धवट बातम्या अर्धवट संदर्भात वापरल्या जातात. स्पष्ट पुरावे समोर आले की काही दिवसांत हा आरडा ओरड बंद होवून जातो. मग त्या बाबत सर्व पुरोगामी ‘आळीमिळी गुपचिळी’ धोरण अवलंबितात.

रोहित वेमुलाच्या प्रकरणात सध्या काय चालू आहे किंवा पुढे काय झाले तूम्ही कुणाही पुरोगाम्याला विचारा ते काहीच सांगू शकणार नाहीत. ज्या हैदराबाद विद्यापीठांत हा प्रसंग घडला त्याच विद्यापीठाच्या नंतरच्या निवडणुकांत कोण दलित मुलगी निवडुन आली? ती कोणत्या विद्यार्थी संघटनेची होती? याची कसलीही उत्तरे हे आता देवू शकणार नाहीत. रोहित वेमुलाच्या आईचे काय झाले? तिला घर घेण्यासाठी कोण्या पक्षाने धनादेश दिला होता? तो कसा बाउंस झाला वगैरे वगैरे सर्व गोष्टी पुरोगाम्यांनी विस्मरणात ढकलून दिल्या आहेत.

ही एक टीका सुरू होते आणि अगदी खालच्या पातळीवर ती झिरपत येते. अगदी काही वेळातच सर्वत्र हा ‘कोरोना’ पसरतो. विद्यापीठात शिकणार्‍या एका तरूणाने तातडीने मोदींच्या लेह दौर्‍यावर टीका केलेली मी फेसबुकवर पाहिली. त्याला या बाबत विचारलेही. पण तो आपल्याला सत्य कसे कळले आहे या आविर्भावात ठाम. नंतर जेंव्हा खुलासे आले तेंव्हा मात्र हे कुणीच काही उत्तर द्यायला तयार होत नाहीत. पक्षाचे प्रवक्ते निदान भाडोत्री आहेत असं म्हणता येतं. पण हे काही सामान्य नागरिक ज्यांचा कशाशी काहीच संबंध नसतो, तेही या प्रचाराला बळी पडतात आणि आपली विवेक बुद्धी हरवून बसतात. हे फार घातक आहे. जी अगदी सामान्य माणसे आहेत त्यांची विवेक बुद्धी शाबूत असते. पण थोडेफार शिकले सवरलेले स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारेच या ‘पुरोगामी बौद्धिक कोरोना’ संक्रमणाला बळी पडतात असे दिसून येते.

ज्या गलवान घाटीत संघर्ष झाला तिथे तपमान उणे असते शिवाय प्राणवायु विरळ आहे हे सामान्यांना कळते. पण पुरोगामी मात्र मोदी प्रत्यक्षात गलवानला का गेले नाहीत? असा प्रश्‍न विचारण्यात धन्यता समजतात.

आता काही दिवसांत चीनचा विषय मागे पडला की हे सगळे पुरोगामी विसरून जातील. मग बिहारच्या निवडणुका समोर येतील. मग परत एक वेगळीच चर्चा चालवली जाईल. मागच्या निवडणुकांत भाजप विरोधात नितीशकुमार लालू यांची युती होती. या युतीने भाजपचा पराभव करताच कम्युनिस्ट नेत्यांनी आनंद साजरा केला. स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांना मी विचारले की ‘तूम्ही तर नितिश लालू यांच्या सोबत नव्हते. तूम्ही स्वतंत्र लढले होता. तूमचा पण दारूण पराभव झाला आहे. मग तूम्ही आनंद कसला साजरा करता अहात?’ त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

आपलं काहीही होवो पण भाजपचा पराभव झाला ना यातच यांचे समाधान. मग पुढ वैतागुन नितिश लालूंच्या पक्षाला सोडून भाजप सोबत निघून गेले आणि सर्व पुरोगाम्यांची तोंडे कायमची कडू झाली.

संघ मोदी भाजप अमित शहा यांचा विरोध करता करता आपण सैन्यावर टीका करत देशद्रोही बनत चालला आहोत  याचाही अंदाज पुरोगाम्यांना येत नाहीये.

2014 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने कॉंग्रेंसचा पराभव करून दाखवला होता. कॉंग्रेसच्या अडून वावरणार्‍या जमात ए पुरोगाम्यांचा वैचारिक पराभव राम मंदिर प्रकरणी उत्खननात सापडलेल्या पुरातन अवशेषांनी करून दाखवला. अपेक्षा अशी होती की रोमिला थापर सारखे विद्वान समोर येवून सर्वांची माफी मागतील. हे जे अवशेष सापडले आहेत त्याबाबत काही एक सविस्तर लेख जमात ए पुरोगामींकडून प्रसिद्ध होईल अशी वैचारिक क्षेत्रात प्रमाणीक काम करणार्‍यांची अपेक्षा होती. पण तसे काही घडले नाही. यातूनच यांचे ढोंग उघडे पडले.

आता मोदींच्या लेह दौर्‍यावर टीका कर, अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूवर लेख लिही, प्रवासी मजदूरांच्या प्रश्‍नांवर खोट्या माहितीच्या आधारे छाती बडवून घे, पुलित्झर पुरस्कारांचे कौतूक कर, डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांवर टीका कर असली कामे करताना हे दिसून येत आहेत.

पुरोगाम्यांच्या दिवंगत विवेक बुद्धीला परमेश्वर शांती देवो. 
   
      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, July 3, 2020

एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण !



काव्यतरंग, शुक्रवार ३ जुलै  २०२० दै. दिव्यमराठी

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण

व्हावे एव्हढे लहान;
सारी मने कळो यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी.

सर्व काही देता यावे
काही राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती

फक्त मोठी असो छाती
दु:ख सारे मापायला;
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायाला

राहो बनून आकाश
माझा शेवटचा श्‍वास
मनामनांत उरावा
फक्त प्रेमाचा सुवास !

-म.म.देशपांडे (अंतरिक्ष फिरलो पण.., संपा. द.भि. कुलकर्णी, पृ. 33, पद्मगंधा प्रकाशन, आ.1, 2006)

‘गांधी’ चित्रपटांत एक अप्रतिम प्रसंग रिचर्ड ऍटनबरो यांनी रंगवला आहे. लोकांनी हिंसा केली म्हणून महात्मा गांधी उपोषणाला बसले आहेत. सगळा देश चिंतित आहे. एक वयस्क फाटका माणूस आपल्या खिशातून रोटी काढून गांधीसमोर करून ‘आम्ही करत नाही हिंसा, खा आता ही रोटी गुमान’ असं म्हणतोय जणू असा तो विलक्षण प्रभाव प्रसंग आहे. 

सामान्य माणसे आंदोलनासाठी उभी करणं हे महात्मा गांधींचे स्वातंत्र्यलढ्यातील फार मोठे योगदान आहे. त्यांना लढण्यासाठी ‘असहकार, सविनय कायदेभंग’ असली साधी वाटणारी पण फार प्रभावी हत्यारे त्यांनी दिली. 

म म देशपांडे यांच्या या कवितेत असा एक सुर सापडतो, ‘एका साध्या सत्यासाठी’ त्या काळात लोक पंचप्राण अर्पायला तयार झाले. म म देशपांडे हे जून्या पिढीतील कवी. महात्मा गांधींना त्यांनी केवळ बघितलं असं नाही तर त्यांच्या तरूणपणीच्या आठणीच त्यांच्याशी निगडीत असणार. ‘सारा अंधारच प्यावा’ म्हणत असताना सर्व वाईट वृत्ती नकारात्मकता संपविण्याची एक विलक्षण ताकद सामान्य माणसांत असते हे पण सुचवले जाते.   

‘व्हावे एव्हढे लहान’ म्हणत असताना लहान मुलाचे मन जसे अपेक्षीत आहे तसेच आपला सगळा अहंकार बाजूला सारून कुणाच्याही मनात शिरता यावे इतके लहानपण लाभावे हाही अर्थ इथे निघतो. याच ओळींसारख्या ओळी बोरकरांनी लिहील्या आहेत

उन्हासारखा हर्ष माझा असावा
घरातून बाहेर यावी मुले
नभासारखा शोक माझा असावा
तृणांतून देखील यावी फुले

पाषाणांची फुले व्हावी ही एक सुंदर कल्पना आहे. ग्रेस यांनीही एके ठिकाणी असं लिहून ठेवले आहे, 

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल

तिसर्‍या कडव्यात मातीचा संदर्भ येतो. आज शहरी व्यवस्थेत राहणार्‍या आणि शहरांतच जन्मल्या वाढलेल्या लोकांना कदाचित कल्पना येणार नाही की गावगाड्यांत ‘माती’ला किती अतोनात महत्त्व असते. मातीची शपथ घेतली जाते, मातीत नाळ पुरली असल्याने मातीचा जिव्हाळा जन्मभर जपला जातो, अगदी आयुष्याचा शेवटही गावच्या मातीतच व्हावा असा ध्यास असतो. शहरात राहणार्‍या काही लोकांच्या बाबतीत तर आजही असं घडतं की अंत्यविधी गावाकडेच केले जावे असा त्यांचा अट्टाहास असतो. 

इंद्रजीत भालेराव यांच्या ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दीर्घ कवितेत मातीसंबंधी एक फार सुंदर तुकडा आलेेला आहे

भन उन्हात जल्मला 
माती तोंडात घेवून
वाढलास एवढा तू 
धान मातीचे खावून

मातीसाठीच जगावं 
मातीसाठीच मरावं
बाळा माती लई थोर 
तिला कसं इसरावं

विठ्ठलाच्या काळ्या रंगात या मातीचे काळेपणही अंतर्भूत आहे. त्यामुळे ‘यावी लाविता कपाळी भक्तिभावनेने माती’ असे शब्द उमटतात. सृजनाचे प्रतिक म्हणूनही ही माती ओळखली जाते. ज्ञानेश्वरीतील ओवी प्रसिद्ध आहे, ‘मातीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव॥

सामान्य माणूस काय मागणे मागतो? पसायदान ही तर फार मोठी गोष्ट झाली. ‘विश्वात्मके देवे’ ही प्रार्थना संतांना शोभून दिसते. सामान्य माणूस मात्र 

पुसता येईल इतकंच पाणी
डोळ्यामध्ये हलू दे
गाता येईल इतकं तरी
गाणं गळ्यात खुलू दे

इतक साधं पसायदान मागत असतो. म म देशपांडे, ‘फक्त मोठी असो छाती दु:ख सारे मापायाला’ म्हणतात तेंव्हा सामान्य माणसांसाठीचे एक पसायदानच सामान्यांच्या शब्दांत मागत असतात. 

मातीच्या नंतर शेवटी संदर्भ येतो तो आकाशाचा. आकाशाचा निळा रंग स्वातंत्र्याचे प्रतिक समजले जाते. मुक्त होवून कुठे जायचे तर आकाशात अशी एक समजूत आहे. ‘माझा शेवटचा श्‍वास राहो बनून आकाश’ ही अगदी साधी सर्वव्यापी अशी संकल्पना आहे. आपली राख बनून आपण मातीत मिसळून जातो पण आपले श्‍वास कुठे जातात? तर ते आकाश बनून राहतात.

भारतीय परंपरंतील जगण्याचे तत्त्वज्ञान अगदी साध्या शब्दांत मांडणारी ही कविता. ‘एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण’ असं ती म्हणते तिथे मात्र खुप वेगळी ठरते आणि फार उंचीवर जावून पोचते. सध्या चालू असलेल्या लदाखमधील चिनसोबतच्या संघर्षात जखमी झालेल्या आणि चिन्यांच्या कैदेतून सुटून आलेल्या सैनिकांनी काय भावना व्यक्त केली आहे, ‘आम्हाला परत युद्धावर पाठवा. आम्ही लढायला पंचप्राण देण्यासाठी तयार आहोत.’

देशासाठी लढणे, आपल्या भूमीसाठी लढणे ही संकल्पना फार आधीपासून आपल्या मनांत रूजविल्या गेली आहे. पण म म देशपांडे यांनी ‘साध्या सत्यासाठी’ असे शब्द वापरून संघर्षाचे रूपच पालटले आहे. रोजच्या जीवनातही संघर्ष असतो. त्यासाठी अगदी प्राण पणाला लावून लढायला आपण तयार असतो का? 

रोज आपल्यासमोर काही ना काही गैर प्रकार घडताना दिसतात त्याला आपण कसा प्रतिसाद देतो? ‘साध्या सत्यासाठी’ लढणं हे वाटतं तसं सोपं नाही. त्यामुळे म म देशापांडे यांना देशासाठी त्याग करणार्‍यांसोबतच ‘साध्या सत्यासाठी’ पंचप्राणाची बाजी लावणारा पण फार महत्त्वाचा वाटतो. 

मनोहर महादेव देशापांडे हे स्वातंत्र्योत्तर काळातील कविंच्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी (जन्म23 ऑक्टोबर 1929, मृत्यू 25 डिसेंबर 2005). मुळचे यवतमाळचे असलेले देशपांडे ग्वाल्हेर येथून ते लेखा परिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले. उतारवयात त्यांचा निवास नाशिक येथे होता. ‘वनफूल’, ‘अंतर्देही’, ‘अपार’ हे त्यांचे कविता संग्रह त्यांंचे प्रसिद्ध झाले. त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह ‘अंतरिक्ष फिरलो पण’ हा 2006 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575