Wednesday, April 28, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११

उरूस, 28 एप्रिल 2021 

उसंतवाणी-31

( बनारस घराण्याचे महान गायक पं. राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन झाले. राजन साजन मिश्रा हे बंधू जोडीने गायन करायचे. राजन मिश्रा गेल्याने साजन मिश्रा यांचा सुर एकाकी झाला. त्यातून या उसंतवाणीचे हे करूण सुर उमटले. )

राजन साजन । बाणे बहराचे ।
झोके हे सुराचे । झुलविले ॥
राजन स्वर्गात । पोचे दूर दूर ।
साजनचा सुर । एकाकी हा ॥
शंकराभरणं । केवढी आर्तता ।
भक्तीची पूर्तता । सुरांमध्ये ॥
जुगलबंदी हे । जरी नाव भासे ।
गोफ विणलासे । दोन सुरी ॥
काशी विश्वनाथ । आज शांत शांत ।
गंगेचा आकांत । ऐकवेना ॥
‘बिस्मिल्ला’‘गिरीजा’। पुरबी हे अंग ।
बडा ख्याल रंग । तैसाची हा ॥
कांत म्हणे देवा । तुला लाज थोडी ।
फोडिलीस जोडी । गंधर्वाची ॥
(26 एप्रिल 2021)

उसंतवाणी-32

(कोरोना लस बाबत महाराष्ट्र सरकारचे तीन मंत्री आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, नवाब मलिक यांनी भिन्न भिन्न मत प्रदशन करून गोंधळ उडवून दिला. लस मोफत की विकत याची कसलीच स्पष्टता त्यातून झाली नाही. )

विकत फुकट । कोरोनाची लस ।
चाले जोरकस । चर्चा ऐसी ॥
सोनिया मातेचा । आदेश जोरात ।
बोलले थोरात । मुफ्त वाटा ॥
बोले आदुबाळ । चिमखडे बोल ।
किमतीचा घोळ । कळेचीना ॥
कोण बोलते हे । हड्डी मे कबाब ।
मलिक नवाब । कडाडले ॥
कशाचा ना मेळ । गावची रे जत्रा ।
कारभारी सत्रा । मनमानी ॥
टोपे बोले नाही । नॅशनल न्युज ।
सत्तेची ही सुज । जाणवते ॥
कांत पंक्चरली । तिघाडीची रिक्क्षा ।
रूग्ण सोसे शिक्षा । मरणाची ॥
(27 एप्रिल 2021)


उसंतवाणी-33 

(ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याचे उत्पादन या बाबत प्रचंड असा गदारोळ खरा खोटा प्रचार बातम्या यांना मोठा ऊत आला. यातच पुरोगामी मोदी सरकारच्या नावाने बोंब ठोकायला पुढे सरसावले. बंगालात मतदानाची सातवी फेरी पार पडली. तिच्याच 78 टक्के इतके विक्रमी मतदान शहरी भागात झाले. 4 दिवसांपासून कोरोनाचा आलेख उतरायला सुरवात झाली. )  

किती केली बोंब । वाजविले ढोल ।
मौत का माहोल । म्हणू म्हणू ॥
देश ढकलला । मृत्यूच्या खाईत ।
घेतले घाईत । मतदान ॥
गद्दार निघाले । परी लोक सारे ।
देईनात नारे । विरोधाचे ॥
बंगालात वाढे । मतदान टक्का ।
लिब्रांडूंना धक्का । जोरदार ॥
कोरोना हरामी । देईना रे साथ ।
ग्राफ उतारात । निघालेला ॥
प्राणवायु सोय । लागे हळू हळू ।
धैर्य लागे गळू । पुरोगामी ॥
खाण्यासाठी लोणी । कोरोना टाळूचे ।
कपट टोळीचे । कांत म्हणे ॥
(28 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, April 26, 2021

माधुरी : आधार देणारी मैत्रिण


  

उरूस, 25 एप्रिल 2021 

मधुरी टाकळीकर गौतम गरूड ऍडची संचालक आमची मैत्रिण नातेवाईक हीचा आज वाढदिवस. माझ्यापेक्षा जेमतेम चार पाच वर्षांनी मोठी असलेली माधुरी ताईपणाची एक भूमिका नेहमीच निभावत आली आहे. गोविंद देशपांडे यांच्या निधनानंतर माधुरीने गरूडचा कारभार मोठ्या धैर्याने निष्ठेने चिवटपणे नामदेव च्या सहाय्याने सांभाळला. खरं तर जाहिरात क्षेत्रात कुणाही स्त्रीला पाय रोवून उभं राहणं अवघड. पण माधुरीने हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं.

2007 मध्ये काकांचे निधन झाले तेंव्हा पासून म्हणजे जवळपास 14 वर्षे भरताने सिंहासनावर रामाच्या पादूका ठेवून कारभार करावा असंच हे उदाहरण. बरोबर 14 वर्षे होत आहेत माधुरी गरूड सांभाळत आहे. जाहिरात कंपनीचे कार्यालय म्हणजे तिथे झकपक असावी, चकचकीतपणा असावा, बोलण्यात चापलुसी विविध मार्केटिंग फंड्यांच्या कारंजी उडत असावी असा समज असतो. यातला काहीच गरूड मध्ये आढळत नाही. या क्षेत्रात टिकण्यासाठी आकर्षक भाषाशैली, बोलूनच माणसाला पटवणे वगैरे वगैरे, धाडस, महत्वाकांक्षा असावी लागते असं म्हणतात. यातलं काहीच माधुरीपाशी आढळत नाही. मला कुसुमाग्रजांची कविता माधुरीला गरूड मध्ये पाहताना नेहमी आठवते

नवलाख तळपती दिप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परते स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात

माधुरी अशीच शांतपणे गरूडमध्ये काम करत बसलेली असते. आज जवळपास 25 वर्षे होत आहेत ती या क्षेत्रात आहे. गोविंद देशपांडे काकांच्या जाण्याने जी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचे फार मोठे काम माधुरीने केले. आजही या क्षेत्रातले विविध वयोगटाचे लोक थकून गरूडमध्ये दुपारी येवून बसतात तेंव्हा त्यांना आधार असतो काकांच्या सुंदर तैल चित्राचा. गरूडमधील शांत वातावरणाचा. आणि माधुरीच्या चेहर्‍यावरील आश्वासक मंद स्मिताचा. माठातले थंड पाणी पिताना आपण शांत होवून जातो ते त्या सगळ्या वातावरणाने आणि मुख्यत: माधुरीच्या अस्तित्वाने. 

ती कधीच फार आकर्षक असे काही बोलते किंवा फार अलंकारिक भाषा वापरते किंवा जिव्हाळ्यानं शब्द ओतप्रेत भरलेले असतात असं नाही. पण तिच्या साध्या भाषेत माणसाला दिलासा देण्याची एक मोठी ताकद आहे. काकांच्या सर्व व्यवसायीक पुण्याईचा अर्क तिच्यात उतरला आहे. जाहिरात क्षेत्रात माझ्या पाहण्यात खुप संस्था आल्या, झगमगल्या, त्यांचा चमचमाट डोळे दिपवून गेला. पण काही काळातच त्या विझुन गेल्या. व्यवहारिक मोठी धाडस करणारे बहुतांश तोट्यात जावून हद्दपार झाले. दिवाळखोरीत निघाले. पण ससा आणि कासवाच्या शर्यतीमधील गरूड हे कासव माधुरी आणि नामदेव यांनी शांतपणे आपल्या गतीने चालवले आणि विजयी करून दाखवले. गोदावरी काठचे पूर्णे जवळचे दाजी महाराजांची टाकळी हे तिचे गांव. त्याच दाजी महाराजांच्या मठाजवळ हीचे घर आहे. गोदावरीने एक मोठे सुंदर वळण या गावाजवळ घेतले आहे.  

तिच्या मोठेपणाची गंमत करत मी आवर्जून सर्वांसमोर तिच्या पाया पडतो. तिही मस्त आशीर्वाद वगैरे देते. पण तिच्यात एक अंगभूत मोठेपण खरंच आहे. तिने ज्या पद्धतीनं आपले वृद्ध आईवडिल सांभाळले, घर वर आणलं, मुलीचं करिअर घडवलं, स्वत:चा व्यवसाय चिकाटीने सांभाळला, संसार फुलवला हे पाहता तिच्या या गुणाची दखल घ्यावीच लागते. 

माधुरीशी जवळीक वाटायचे कारण म्हणजे कला साहित्य संगीत चित्रं पत्रकारिता याबाबत ती मला सहप्रवासी वाटते. गोविंद देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली 13 वर्षे आम्ही कार्यक्रम करतो आहोतच पण या सोबतच शहरांतील विविध सांस्कृतिक चळवळीत ती आवर्जून सहभागी होते. होईल ती सर्व मदत करते. 

सध्या लॉकडाउनच्या काळात सगळंच ठप्प झालेलं असताना माधुरी शांतपणे दुपारी गरूड च्या कार्यालयात बसून साडीवर पेंटिग करताना दिसते हे चित्र मोठे छान वाटतं. कला माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देते असं जे पुलं नी म्हटलं आहे त्याचं एक प्रात्यक्षिक मला माधुरीत आढळून येतं.

आपल्या रोजच्या विवंचनेत आपण काही आधार शोधत असतो. काही माणसं वडिलकीच्या नात्यानं हा आधार आपल्याला देतात. काही आपल्यापेक्षा अगदी वयाने लहान असलेले आपल्या एखाद्या कृतीने आपल्याला आधार देतात. पण मित्रासारखी पण जराशी मोठी असलेली अशी एक व्यक्ती जी आपल्याला सांभाळून घेते  ती म्हणजे माधुरी. तिच्या अस्तित्वानेच एक मोठा मैत्रीचा आधार माझ्या सारख्याला मिळत आलेला आहे.

खुप झगमगाट आपण पाहतो. तो विझल्यावर डोळ्यांसमोर अंधारी येते. आणि मग अशावेळी तुळशी जवळच्या दिव्याची मंद वात आणि तिचा उबदार शांत प्रकाश आपल्याला खुप काही देवून जातो. कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णन केलेली शांतपणे जळणारी ही वात खुप आश्वासक असते. माधुरीचे अस्तित्व असेच आहे.
माधुरीला खुप खुप शुभेच्छा!    
                 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 25, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग 10

    
उरूस, 25 एप्रिल 2021 

उसंतवाणी-28

( नाशिकला ऑक्सिजन गळतीने 24 रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नेमकी राम नवमीलाच घडली. देशभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे असे एक चित्र उभं केल्या गेले. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. आणि तिकडे लोकांचे जीव जात आहेत. )

प्राणवायु भरे । सृष्टीत सजीव ।
तरी गेले जीव । त्याच्यावीना ॥
राम नवमीला । राज जन्मावेळी ।
‘रामनाम’ पाळी । मुखी आली ॥
होतील बदल्या । येती अहवाल ।
जनतेचे हाल । पाहवेना ॥
लोकांसाठी म्हणे । राबते यंत्रणा ।
तरी हा ठणाणा । नशीबात ॥
विरोधक आणि । मत्त सत्ताधारी ।
आरोपाच्या फैरी । झाडतात ॥
बेपर्वाईचे हे । बळी नव्हे खून ।
करीती मिळून । भ्रष्ट सारे ॥
कांत म्हणे शोधू । व्यवस्थेचे भोक ।
बंदोबस्त चोख । करू त्याचा ॥
(23 एप्रिल 2021)

उसंतवाणी-29

(कोरोना काळात कुंभमेळ्यावर बंदी आली. पश्चिम बंगालातील शेवटच्या तीन टप्प्यातील प्रचारात सभा रॅली मेळावे यांवर रोक लावण्यात आली. पण इतकं असतानाही किसान आंदोलन सुरूच होते. कोरोना बिरोना सब झुठ है असले बेजबाबदार वक्तव्य राकेश टिकैत यांनी केले. दिल्ली कोरोना रूग्णांसाठी नेण्यात येणार्‍या ऑक्सिजनची वाहनंही या आंदोलना मुळे अडल्या गेली. त्यांना लांब वळसा घालून न्यावे लागत आहे. )

बंगालात बंद । रॅली सभा मेळा ।
थांबे कुंभमेळा । कोरोनात ॥
कृषी आंदोलनी । इफ्तारचा थाट ।
रोकलेली वाट । दिल्लीची ही ॥
कोरोना बिरोना । सब है ये झुठ ।
बोले अडमुठ । टिकैत हा ॥
ऑक्सिजन नेण्या । झाला अडथळा ।
आवळला गळा । आरोग्याचा ॥
संसदेने केला । कायदा संमत ।
आम्ही ना मानत । ऐसी भाषा ॥
जाणून ना घेती । संकट देशाचे ।
हाणा कायद्याचे । फटकारे ॥
नव्हे हे किसान । आडते दलाल ।
कोरोनाचा काळ । कांत म्हणे ॥
(24 एप्रिल 2021)


उसंतवाणी-30 

(23 एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन. या निमित्ताने समाज माध्यमांवर पुस्तक प्रेमींच्या विविध पोस्ट पाहण्यात आल्या. याच व्यवसायातला असल्या कारणाने मला यातल्या खाचाखोचा माहित आहेत. कागदावरील पुस्तकांचा काळ आता सरला आहे. आता नविन डिजिटल माध्यम वापरावे लागणार आहे हे निश्‍चित. नविन तंत्रज्ञानाचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे.)  

तेवीस एप्रिल । विश्व ग्रंथ दिन ।
परिस्थिती दीन । मराठीत ॥
प्रकाशकाकडे । पुस्तकांचे गठ्ठे ।
पाठीवर रट्टे । व्यवहारी ॥
टक्केवारीमध्ये । ग्रंथालये गुंग ।
चळवळीचे बिंग । फुटलेले ॥
झाली सोय खरी । डिजिटल आता ।
नको जून्या बाता । ग्रंथप्रेमी ॥
नव्या स्वरूपात । येवू दे पुस्तक ।
गुंगेल मस्तक । वाचकाचे ॥
नव्या माध्यमाची । दूरवर खेप ।
विदेशात झेप । त्वरे घेई ॥
डिजीटल स्क्रिन । वाचे नवी पिढी ।
नको मना आढी । कांत म्हणे ॥
(25 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, April 24, 2021

पुस्तकांचा कागदी अवतार समाप्त होणार..


    

उरूस, 24 एप्रिल 2021 

काल 23 एप्रिल. जागतिक ग्रंथ दिन. या निमित्ताने समाज माध्यमांवर विविध पोस्ट टाकल्या गेल्या. पुस्तकांच्या बाबत कितीतरी जण नॉस्टेलजिक झालेले दिसून आले. पुस्तकं म्हणजे त्यांच्या लेखी कागदावर छापलेली पुस्तके. नॉस्टेलजिक ला मराठी शब्द आहे गतकातरता. हा खरं तर एक मानसिक रोग आहे. एका मर्यादेपर्यंत जून्या आठवणीं काढत राहणं आपण समजू शकतो. ती आपल्या मनाची गरजही असते. पण त्यातच अडकून पडले की त्याचा रोग बनतो. तो एक आजार म्हणून त्याकडे मग पहावं लागतं.  

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच ग्रंथ व्यवहाराला गळती लागायला सुरवात झाली. त्याचं कारण म्हणजे समाज माध्यमं सशक्त होत चालली होती. छापील स्वरूपांतील मजकूर सर्वत्र पोचवणे दिवसेंदिवस अवघड होवू लागलं होतं. भौतिकदृष्ट्या पुस्तके एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं त्रासदायक होतं. जे प्रत्यक्ष या ग्रंथ प्रकाशन वितरण विक्री प्रदर्शन व्यवहारात काम करतात त्यांना याची अगदी स्पष्ट जाणीव होवू लागली होती. महाराष्ट्रभर गावोगाव ग्रंथ प्रदर्शन भरवणारी ढवळे ग्रंथ यात्रा बंद पडली होती आणि अक्षर धारा ने आपला पसारा आवरत आवरत केवळ पुण्यापूरता मर्यादीत करत आणला होता. मोठ्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी आपली आवृत्ती मर्यादीत संख्येची काढायला सुरवात केली होती. (मी स्वत: ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ वितरण, प्रदर्शनं, अक्षर जूळणी-डिटीपी ही कामं केलेली आहे. अजूनही करतोच आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष यातला अनुभव नाही त्यांनी टीका टिप्पणी करताना जरा भान राखावे ही नम्र विनंती). टक्केवारीच्या गणितात सार्वजनिक ग्रंथालयांचा संपूर्ण व्यवहार गोत्यात अडकला होता. वर्तमानपत्रांनाही मर्यादा याच काळात पडायला सुरवात झाली.  

अशा वेळी हळू हळू छापील मजकूराची जागा डिजिटल माध्यमांतील अक्षरांनी घ्यायला सुरवात केली. 2010 नंतर समाज माध्यमं अजूनच व्यापक बनली. त्यांचा परिघ वाढला. त्यांचा वापर करणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली. यात इतर ज्या बाबी आहेत मनोरंजनाशी संबंधीत त्या आपण बाजूला ठेवू. पण याच माध्यमांत कागदावरच्या मजकुराला पर्याय म्हणून मजकुर फिरायला लागला. त्याला मोठा प्रतिसाद मिळायला लागला. जो मजकूर एरव्ही छापील पुस्तकांची सद्दी असण्याच्या काळात अगदी मोजक्या हजार पाचशे लोकांपर्यंतही पोचत नव्हता तो आता सहजच पाच दहा हजारांची संख्या पार करायला लागला. (मी गंभीर मजकुराबाबत बोलतोय. छचोर मजूकराबाबत नाही.) 

काही जणांचा गैरसमज असा होता की दीर्घ असे लिखाण जे की पुस्तकांतून समोर येत होतं, त्याच्या वाचनाने जिज्ञासा पूर्ती होत होती, ज्ञान मिळाल्याचे समाधान मिळत होते, रंजनाचेही काम शब्दांतून केले जात होते, दीर्घ असा हजार पाचशे पानांचा मजकूर वाचताना मिळणारा एक आनंद विलक्षण होता हे सर्व या नविन माध्यमांत कसे काय साध्य होणार आहे? आणि जर या नविन चवचाल उथळ माध्यमांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले तर मग दीर्घ मोठ्या पल्ल्याचा मजकूर वाचणार कोण? त्याचे होणार तरी काय आणि कसे? वैचारिक लिखाणाला नविन माध्यमांत स्थान मिळणार तरी कसे? शेवटी पुस्तकांची ती मजा डिजिटल पडद्यावर येणार तरी कशी.

हा खरं तर एक मोठा गैरसमजच आहे. किंबहुना तंत्रज्ञान समजून न घेता केली जाणारी टिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल हे एक तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. मजकूर कागदावर छापायचा मग त्याचे पुस्तक करायचे. मग ते वितरीत करायचे. मग ते दुकानात जावून कुणी खरेदी करायचे. आणि मग ते घरी सांभाळून ठेवायचे. त्यासाठी मोठी जागा अडवली जाणार. हे सगऴं साधारणत: गेली 100 वर्षे घडत आलेलं आहे. यात मोठ्या अडचणी येत आहेत हे मी अनुभवावरून सांगतो. याचा व्यवहार आतबट्ट्याचा बनत चालला आहे. भांडवली गुंतवणूक परत मिळणे कठीण होवून बसले आहे (मी स्वत: ग्रंथ व्यवहारातील देणी गेली 5 वर्षे फेडतोच आहे).

याच्या नेमके उलट नविन डिजिटल माध्यमं सोपी सुटसुटीत परवडणारी स्वस्त सहज होवून गेली आहेत. 2010 पासून मी ब्लॉग चालवतो आहे. त्याची वाचक संख्या 3 लाखाचा टप्पा ओलांडून गेली आहे. हाच मजकूर मला एरव्ही जून्या माध्यमांतून तीन लाख लोकांपर्यंत कसा पोचवता आला असता? नेमक्या वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग छापील पुस्तकांना कितीतरी अवघड राहिलेला आहे. अगदी आजही तूम्ही आठवून पहा एखादे हवे असलेले पुस्तक जून्या व्यवस्थेत मिळणे किती कठीण असायचे. आता तेच छापील पुस्तक जर कुठे उपलब्ध असेल तर याच नविन तंत्राज्ञानाने लवकर माहित होते आणि त्याची उपलब्धता आधीपेक्षा सोपी होवून गेलेली दिसून येते. 

सगळ्यांना नविन स्वरूपातील मजकूर म्हणजे फक्त समाज माध्यमांवर आलेला मजकूर इतकंच दिसते. खरं तर डिजिटल पुस्तके अजून चांगल्या स्वरूपात येतील हे लक्षातच घेतले जात नाही. खुप जूनी इंग्रजी पुस्तके आता किंडलवर उपलब्ध आहेत. ज्यांना आजही कागदावरचे पुस्तक हवे आहे त्यांच्यासाठी काही मोजक्या प्रतीत ते तसे उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. जे पुस्तक पुन्हा पुन्हा हातात घेवून वाचावे वाटते. त्याच्याशी एक धागा आपला जूळलेला असतो त्यासाठी छापील प्रतींची मागणी नोंदवावी. पण एकूणच सर्व विचार करता व्यवहारिक पातळीवर आता डिजिटल माध्यमांतूनच पुस्तक सर्वांपर्यंत पोचवणे सोपे झाले आहे. 

वयस्क पलंगावर पडून असलेल्या आजारी माणसांना जाड पुस्तक हातात धरून वाचता येत नाही. ज्येष्ठ मराठी लेखक पद्ममाकर दादेगांवकर यांच्या बाबतीत एक अनुभव माझ्या गाठीशी आहे. माझ्या ब्लॉगवरच्या एका लेखावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि मी जरा शरमलो. कारण त्यांच्यासारख्या अभ्यासक समिक्षकासाठी हा मजकूर फारच प्राथमिक स्वरूपाचा होता. त्यांना शेवटच्या आजारपणात त्रास होत होता. फारसे बोलता येत नव्हते. वाचणे अवघड जायचे. मग मी उमा दादेगांवकर यांना फोन करून बोललो. त्या म्हणाल्या अरे त्यांना आता मोबाईलवरच वाचणे सोयीचे जाते. कारण अक्षरं मोठी करून वाचता येतात. पुस्तक हाती धरता येत नाही. आता जर अशा लोकांचा विचार करून त्यांच्यासाठी महत्वाची पुस्तके या स्वरूपात आली तर किती चांगले होईल.   

आज जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे. आकर्षक स्वरूपात चांगली मांडणी, चांगला टंक (फॉण्ट), ओळींमध्ये योग्य ते अंतर राखलेले, शीर्षकं आकर्षक पद्धतीनं दिलेली, काही रेखाटनांचा वापर केलेला हे सर्व छापील पुस्तकांसारखेच इथेही विचारात घेतले पाहिजे. अन्यथा आजकाल पीडीएफ म्हणजे अगदी गदळ असा कसाही टाईप केलेला मजकूर अतिशय अनाकर्षक स्वरूपात समोर येतो आणि डिजिटल माध्यमांची एक चुक प्रतिमा आपल्या मनात उतरते.  

किंडलवर अगदी छान मृखपृष्ठ असलेलं, समर्पक रेखाचित्र असलेलं, पुस्तकांचे पान उलटावे अशा पद्धतीनं पान उलटता येईल अशी रचना असलेलं पुस्तक का नाही दिलं जात? आणि ते मिळालं तर कुणाला नको आहे? जागा व्यापणारी भली मोठी पुस्तकं घरात ठेवण्यापेक्षा अगदी सुटसुटीत अशी हाताच्या तळव्यावर मावणार्‍या एखाद्या साधनांत पुस्तकं साठवता आली तर कुणाला नको आहे? 

छापील पुस्तकांचा आग्रह धरणारी त्यासाठी हट्टी असलेली माणसे मला जून्या गावगाड्यांत रमणार्‍या नॉस्टेलजीक म्हातार्‍यांसारखी वाटतात. त्यांचं जग अजूनही 15 पैशाच्या पोस्ट कार्डात, बैलाच्या गळ्यांतील घागरमाळांत, गायीच्या शेणांत, चुलीवरच्या रटरटणार्‍या कालवणांत, आहारावर भाजल्या जाणार्‍या टंब फुगलेल्या भाकरीतच अडकून पडले आहे. ते बाहेर यायला तयारच नाहीत. जमिनदारी संपलेली माणसे कशी जून्या पडक्या वाड्याच्या ढासळत्या कमानीत उभी राहून वर्तमानाऐवजी इतिहासाकडे डोळे लावून बसलेली असतात तशी ही माणसं मला वाटतात.
बदल हे स्विकारावेच लागतील. आज कितीही गोडवे गायले तरी कुणीही घोड्यावर बसून प्रवास करायला तयार नाही. बैलगाडीत बसून कुणी एका गावाहून दुसर्‍या गावात जात नाही. कागदावरची पुस्तके ज्यांना हवी वाटतात त्यांच्याबद्दल मला आत्मियता आहे. माझ्यापाशी सध्या वैयक्तिक हजारो पुस्तके आहेत. आजही मला हातात पुस्तक घेवून वाचायला आवडतं. पण सोबतच किंडलवर जूनी पुस्तकं त्याच सुंदर स्वरूपात मिळाली तर मला हवी आहेत. बोरकरांच्या कवितेत जरा बदल करून मला असे म्हणावे वाटते

जूने हवे सारेच परंतु  
नाविन्याचा ध्यास हवा ।
काळाच्या खळखळ धारेतून 
सळसळता उल्हास हवा ॥

माझा मराठी रसिकांवर विश्वास आहे. माध्यम बदलले म्हणून त्यांचे अक्षर वाङ्मयावरचे प्रेम अटणार नाही. ते तसेही कधी अटले नव्हते. ज्ञानेश्वरांच्या काळापासून अठराव्या शतकापर्यंत छापील पुस्तके नव्हते तरी मराठी माणसाने आपले ओवी अभंगावरचे प्रेम अटू दिले नव्हते. उलट माझा तर आरोपच आहे की नंतरच्या काळात सशक्त अशी छापील माध्यमं आली पण त्यांच्याही वाट्याला नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम यांच्या रचनांना लाभले तितके प्रेम आले नाही. नविन माध्यमांची भिती बाळगु नका. त्यावर अविश्वास दाखवू नका. सहर्ष मनाने खुल्या दिलाने त्यांचा स्विकार करा. शक्य तितकी छापील पुस्तकं मिळवा वाचा जतन करा जीव लावा. पण डिजिटल माध्यमांचा दुस्वास करू नका.  
                 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, April 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९

   
उरूस, 19 एप्रिल 2021 

उसंतवाणी-25

(पाहता पाहता उसंतवाणीच्या अभंगांची संख्या 25 झाली. रसिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद चकित करणारा आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा अभंग लिहिला.) 

‘उसंतवाणी’ची । झाली पंचविशी ।
कौतुकाच्या राशी । पदरात ॥
आप्त मित्र सारे । सांगती प्रेमाने ।
लिहावे नेमाने । एैसे सदा ॥
चालू घडामोडी । मांड अभंगात ।
येवू दे रंगात । शब्द खेळ ॥
राजकिय किंवा । सामाजिक बरा ।
मिश्किल हा जरा । उपहास ॥
शब्दांचा आसुड । प्रबोधनासाठी ।
कडाडू दे पाठी । असत्याच्या ॥
तुळशीच्या पाशी । पेटविली वात ।
करण्यास मात । तमावरी ॥
कांत म्हणे माझी । छोटी ही ओंजळ ।
भावना प्रांजळ । काठोकाठ ॥
(20 एप्रिल 2021)

उसंतवाणी-26

(कुंभ मेळ्याची सुरवातच अकबराने केली. त्याने पहिले स्नान केले आणि मग साधुंनी स्नान केले म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात असा अफलातून शोध ऍड. असीम सरोदे यांनी एका ट्विट द्वारे लावला. त्यावर त्याला प्रचंड ट्रोल केल्या गेले. इतके की त्याला आपले ट्विटर बंद करावे लागले. एक दिवसांनी त्याने ते परत सुरू केले. त्यावरची ही रचना. )

अकबरे केला । कुंभमेळा सुरू ।
बोले चुरू चुरू । ‘अफिम’ हा ॥
लाविता डुबकी । गंगेच्या पाण्यात ।
झाली सुरूवात । शाही स्नाना ॥
औरंग्या करितो । आषाढीची वारी ।
चातुर्मास धरी । जहांगीर ॥
बाबराच्या कडे । देवी नवरात्र ।
घरी अग्निहोत्र । निजामाच्या ॥
अफजल खान । थोर देवी भक्त ।
म्हणूनीच रक्त । सांडियले ॥
खोडसाळ चाले । ट्विटर ट्विटर ।
हाणावे खेटर । पुराव्याचे ॥
जयाची ना श्रद्धा । बसावे की शांत ।
काढू नये वांत । कांत म्हणे ॥
(21 एप्रिल 2021)

उसंतवाणी-27

(कोरोनाच्या उदास निराश काळात वसंत ऋतुत निसर्ग बहरून आलेला माझ्या आजूबाजूला दिसायला लागला. या निसर्ग किमयेने मी चकित झालो. अगदी माझ्या आजूबाजूला जी सुंदर झाडे आहेत त्यावरचा वसंत ऋतू पाहून हा अभंग रचला. बहाव्यावर एक स्वतंत्र कविता आधी मला सुरली होती. )

नसर्गाला कुठे । करोना कळतो ।
फुलतो फळतो । वसंत हा ॥
खुलतो बहावा । धम्मक पिवळा ।
पळसाची कळा । निराळीच ॥
गुलमोहरा ये । लाल लाल पुर ।
कोकिळेचा सुर । अंब्यावरी ॥
लिंब मोहोराचा । भारणारा गंध ।
श्‍वास झाला धुंद । मोगर्‍याचा ॥
चालताना वाटे । वाटसरू फसे ।
पानाआड हसे । सोनचाफा ॥
आठवण दाटे । तान्हुल्या बाळाची ।
पर्ण पिंपळाची । कोवळीक ॥
कांत म्हणे घ्यावा । वसा फुलण्याचा ।
सोसून उन्हाचा । बाण उरी ॥
(22 एप्रिल 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

    

Monday, April 19, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८

   
उरूस, 19 एप्रिल 2021 

उसंतवाणी-22

(दहावी बारावीच्या परिक्षा रद्द करून सर्व विद्यार्थी पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला. आधीच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना तसेच पुढे ढकला असा निर्णय घेण्यात आला होताच. त्यावरची ही प्रतिक्रिया) 

ढकला पुढती । न घेता परिक्षा ।
उतराला रिक्षा । शिक्षणाची ॥
ज्ञान नी परिक्षा । बसतो ना मेळ ।
सारा पोरखेळ । ज्ञानमार्गी ॥
पदवी धारक । जे जे ‘मार्क्स’वादी ।
होई बरबादी । त्यांच्यामुळे ॥
परिक्षा ही सोय । आहे घेणार्‍यांची ।
नाही देणार्‍यांची । कदापिही ॥
दाबातून करा । विद्यार्थी मोकळा ।
ज्ञान भेटो गळा । आनंदाने ॥
जूने ते शिक्षण । बाद झाले नाणे ।
सुचो नवे गाणे । गळ्यातून ॥
ऑन लाईनचा । ऑफ कारभार ।
ब्रेक फेल कार । कांत म्हणे ॥
(17 एप्रिल 2021)

उसंतवाणी-23

(हरिद्वारला भरलेला कुंभमेळा त्वरीत रद्द करा अशी मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली होती. खरं तर ही परवानगी द्यायलाच नको होती. पण उत्तराखंड मध्ये कोरोनाचा प्रकोप फारसा नाही हे जाणून हा निर्णय घेतल्या गेला होता. पण नंतर विदारक झालेली परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींनी सर्व साधुसंतांना आवाहन केले. त्यानुसार कुंभमेळा आवरता घेण्यात आला. साधु संतांनी कुठलाच आक्रस्ताळेपणा न करता या आवाहनाला प्रतिसाद दिला.)

मोदी विनवती । आवरा कुंभाला ।
थारा ना दंभाला । हिंदू धर्मी ॥
देवुनीया मान । आखाडे वागती ।
वेगे आवरती । कुंभमेळा ॥
धर्म हा टीकेची । देतो मोकळीक ।
वाटे जवळीक । त्यामुळेच ॥
टीकेच्या अग्नीत । निघतो तावून ।
येतो उगवून । राखेतून ॥
करिती तुलना । तब्लीगी मर्कज ।
मेंदूची उपज । तपासावी ॥
खुलेपणे साधु । देती प्रतिसाद ।
लपे कुठे साद । मौलाना हा ॥
कांत म्हणे हिंदू । नित्य हा नुतन ।
त्याचे धर्म मन । आधुनिक ॥
(18 एप्रिल 2021)

उसंतवाणी-24

(पश्चिम बंगाल मध्ये मतदानाच्या 5 फेर्‍या आटोपल्या आहेत. आणि आता तीन फेर्‍या शिल्लक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सभांवर बंधने घाला अशी मागणी केल्या गेली. निवडणुक आयोगाने नियमांचे काटेकोर पालन करा असे सांगितले. प्रचाराचा अवधी कमी केला. पण सभा होणारच आहेत. राहूल गांधींनी सभा घेणार नाही असं सांगितलं. डाव्यांनी पण सभा न घेण्याचा निर्णय जाहिर केलाय. खरं तर भाजप आणि तृणमुलनेही हा निर्णय घ्यायला हवा होता. पण अजूनही तसा निर्णय घेतला गेला नाही.  )

थांबवा आता या । प्रचाराच्या सभा ।
दैत्य दारी उभा । कोरोना हा ॥
नको वाचाळता । दिसू द्यावी कृती ।
सांभाळा प्रकृती । जनतेची ॥
कशासाठी हवी । प्रचाराची राळ ।
जनतेशी नाळ । जोडा जरा ॥
पाच वर्षे तूम्ही । रहा लोकांपुढे ।
वाजवा चौघडे । हवे तसे ॥
मतदानापूर्वी । मतदार चित्ता ।
लाभू दे शांतता । विवेकाची ॥
कोरोनामुळे हा । पडू दे पायंडा ।
सभा रॅली फंडा । बंद करा ॥
मतदान टक्का । गाठू दे शंभरी ।
कांत म्हणे खरी । लोकशाही ॥
(19 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, April 16, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७

     
उरूस, 14 एप्रिल 2021 

उसंतवाणी-19

(ममता बॅनर्जी यांची केलेली भडकावू भाषणे, हिंसक होवून जमावाने सुरक्षा दलावर केलेला हमला आणि त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू पावलेले 4 मुसलमान हा प्रकार खुप भयानक आहे. याच दिवशी आनंद देवबर्मन नावाच्या एका भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. अश्‍विनीकुमार नावाचा पोलिस अधिकारी गुन्हेगाराच्या शोधात बिहारमधून बंगालच्या सीमावर्ती भागात आला असता त्याची जमावाने ठेचून हत्या केली. हे प्रकरणही याच काळात घडले ) 

मतदान चाले । शिस्तीत सरळ ।
दिली खळबळ । करू लागे ॥
घेराव घालून । जवान कोंडावे ।
कर्कश्श भांडावे । सगळ्यांशी ॥
गोळीबार होता । बळी मग जाती ।
त्यांची धर्म जाती । तपासावी ॥
धर्म पाहूनिया । ठरवावी निती ।
कुणासाठी किती । रडायाचे ॥
जमाव ठेचतो । पोलिस जवान ।
घटना लहान । संबोधावी ॥
भाषणावरती । येता मग बंदी ।
साधावी ती संधी । नौटंकीची ॥
कांत म्हणे एैसे । लोकशाही वाटे ।
पसरले काटे । दूर सारा ॥
(14 एप्रिल 2021)

उसंतवाणी-20

(राहूल गांधी यांनी बंगालातील आपल्या पहिल्याच प्रचार सभेत असे काही तारे तोडले की विचारायची सोयच नाही. शिवाय सभेला अगदी जेमतेम गर्दी. या सभेचा व्हिडिओ कॉंग्रेसनेच अधिकृत पेजवरून सोशल मिडियात टाकला. तो जरूर पहा म्हणजे परत कुणी अशी टिका करायला नको की हे जाणीवपूर्वक पुर्वग्रह दुषीत लिहितात.  )
बंगाल प्रचार । आली असे आंधी ।

प्रकटले गांधी । दर्जिलिंगी ॥
भाजप तंबुत । हर्ष उडे फार ।
प्रचारक स्टार । आला आला ॥
कॉंग्रेसी लावती । कपाळाला हात ।
पनौतीने घात । केला असे ॥
सभेला ना गर्दी । चित्र स्पष्ट नीट ।
पूर्वीच्याही सीट । हारणार ॥
राहूल उवाच । मला भितो मोदी ।
लागू नका नादी । कॉंग्रेसच्या ॥
अवेशात देई । शालेय भाषण ।
सखोल ना जाण । काही दिसे ॥
नौका बुडविण्या । घेतली सुपारी ।
कॉंग्रेसची खरी । कांत म्हणे ॥
(15 एप्रिल 2021)

उसंतवाणी-21

(कोरोनामुळे परिस्थिती फारच भयानक बनली आहे. रूग्णांना बेड मिळत नाहीयेत. सामान्य रूग्णांनाही भिती दाखवून लूटले जात आहे. लॉकडाउन किती आणि कसे याची स्पष्ट काहीच माहिती दिली जात नाही. महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणा अपशयी ठरताना दिसत आहे. )

लॉकडाउन हे । लागलंय घेरू ।
बंद काय सुरू । कळेची ना ॥
रस्त्यात माणसं । हिंडती मोकाट ।
मोडती पेकाट । व्यवस्थेचे ॥
जिण्याचे हे हाल । मरणाचा वांधा ।
तिरडीला खांदा । लाभेची ना ॥
हॉस्पिटल फुल्ल । रिकामे ना बेड ।
शहाण्याला वेड । लागु पाहे ॥
उपचारा नावे । मांडिला बाजार ।
खिशाला आजार । ज्याच्या त्याच्या ॥
मनुष्य पचवी । कित्येक आपत्ती ।
झुंजार ही वृत्ती । अबाधीत ॥
न्यायचे तेवढे । उचल त्वरीत ।
सुखे उर्वरीत । कांत म्हणे ॥
(16 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 14, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६

    
उरूस, 14  एप्रिल 2021 

उसंतवाणी-16

(ममता बॅनर्जी यांचे स्ट्रॅटजीस्ट प्रशांत किशोर यांच्याशी पुरोगामी पत्रकारांनी ज्या गप्पा मारल्या ती चॅट लीक झाली. हे प्रकरण खुप गाजले. त्यात त्यांनी मोदींचा प्रभाव मान्य केला. नेमकी हीच गोष्ट पुरोगाम्यांची पोटदुखी ठरत आहे.) 

प्रशांत किशोर । लीक झाल्या गप्पा ।
माथी आता ठप्पा । मोदीभक्त ॥
मोदी विरोधात । का नाही लहर?।
उगाळी जहर । रविश हा ॥
करी ममतांच्या । ‘न्हाणी’ची चौकशी ।
ऐसी साक्षी जोशी । पत्रकार ॥
कितीही पेटवा । विरोधात रान ।
मोदी भगवान । लोकांसाठी ॥
ममता विरोधी । अँटिइन्कंबन्सी ।
नाही एकजिन्सी । काही इथे ॥
ऐसे कैसे बोले । प्रशांत किशोर ।
लिब्रांडूंना घोर । लागलेला ॥
धंदेवाईक हे । स्ट्रॅटजिस्ट खोटे ।
हाणा दोन सोटे । कांत म्हणे ॥
(11 एप्रिल 2021)

उसंतवाणी-17

(पहिल्या तीनही चरणांत असम प. बंगालमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आढळून आला आहे. शिवाय केरळ आणि तामिळनाडूतही चांगले मतदान झाल्याची खबर आहे. सामान्य लोकांनी लोकशाहीवर टाकलेला हा विश्वासच आहे. पण पुरोगामी विद्वान हे मान्य करत नाहीत. लोकशाही मेली अशीच राहूल गांधींसारखी भाषा त्यांच्या तोंडात असते. )

मतदानाचा हा । वाढलाय टक्का ।
झाले हक्का बक्का । बुद्धीवंत ॥
रांगेत माणसे । टाकतात व्होट ।
मनी नाही खोट । त्यांच्या काही ॥
लोकशाही मेली । बोलतो शहाणा ।
शोधतो बहाणा । हारण्याचा ॥
सेफॉलॉजिस्टांचा । आकड्यांचा घोळ ।
जनतेची नाळ । कळेची ना ॥
मतदाने बने । माणूस अंगार ।
करितो भंगार । विद्वानांना ॥
पाच वर्षांची ही । लोकशाही वारी ।
धावे वारकरी । मतदार ॥
कांत म्हणे जाणा । सच्चा हा ची भाव ।
फुका नको आव । पांडित्याचा ॥
(12 एप्रिल 2021)

उसंतवाणी-18

(सचिन वाझेचा साथीदार रियाज काझी यालाही तुरूंगात टाकण्यात आले आहे. हरिश साळवे यांनी अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या अंडर वर्ल्ड बाबत अतिशय सूचक अशी विधानं केली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या मोठ्या नेत्याकडे हा इशारा आहे. )

काझी पकडला । वाझे पाठोपाठ ।
भरे काठोकाठ । पापघडा ॥
छोटे छोटे मासे । लागती गळाला ।
धुंडती तळाला । यंत्रणा ही ॥
येतसे वरती । जग हे ‘अंडर’।
घोंगावे थंडर । गुन्हेगारी ॥
हरिश साळवे । कायदे पंडित ।
गाठतो खिंडित । भले भले ॥
साळवे सांगतो । दाउद गतीने ।
चालतो ‘मती’ने । राजकिय ॥
व्होरा कमिटीचा । शोधा अहवाल ।
त्याची करा चाल । कायद्याची ॥
अर्णवला देई । साळवे इशारा ।
सुरू खेळ न्यारा । कांत म्हणे ॥
(13 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 11, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५

     
उरूस, 11 एप्रिल 2021 

उसंतवाणी-13

(सचिन वाझे यांच्या पत्रात विविध मंत्र्यांचे उल्लेख आले आहेत. त्याने महाविकास आघाडी सरकार भयंकर अडचणीत आले आहे. या सरकारचे चाणक्य भाग्यविधाते खुद्द शरद पवार यांचेच नाव वाझेने घेतले आहे. न्यायालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, सीबीआय अशा विविध संस्थांनी या प्रकरणाभोवती फास आवळल्याने राजकीय कोंडी सत्ताधार्‍यांची झाली आहे.) 

वाझेच्या पत्राचा । फिरे दांडपट्टा ।
मंत्रीपद थट्टा । महाराष्ट्री ॥
भाजपचे म्हणे । आहे षडयंत्र ।
बारामती मंत्र । चालेची ना ॥
राजीनामे तेंव्हा । शोभती खिशात ।
आता प्रकाशात । येती कसे? ॥
किंगमेकर हो । होण्यापरी किंग ।
शाबूत हे बिंग । राहतसे ॥
बरा होता हाची । व्यवहार्य सल्ला ।
दादरचा किल्ला । सुरक्षीत ॥
‘कुट’ बारामती । संजू करामती ।
नासवली मती । मातोश्रीची ॥
फोटोग्राफी जैसे । नाही सत्ता विश्व।
उधळले अश्व । कांत म्हणे ॥
(8 एप्रिल 2021)

उसंतवाणी-14

(सर्वौच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळण्यात आली. आणि सीबीआय चौकशी चालूच राहिल असे सांगितल्या गेले. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी सारखे वकिलही कामा आले नाहीत. महाराष्ट्र सरकारने नेमलेली चांदीवाल समितीही अर्थहीन होवून गेली. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी हास्यास्पद अशी भूमिका पत्रकार परिषदेत घेतली. स्व. बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेवून मी सांगतो की मी सचिन वाझे आरोप करत आहेत तसे काही केले नाही. यात परत एबीपी माझा सारख्या मविआ ची बाजू घेणार्‍या चॅनेलची वेगळीच गोची झाली. त्यांनी जाहिर केलेले कोराना लसीचे आकडे खोटे असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. त्यांना केंद्र सरकारने या प्रकरणी नोटीस पाठवली. )

मुंबईत उच्च । दिल्लीत सर्वौच्च ।
पाचरही गच्च । बसते ॥
वकिल तगडे । सिंघवी सिब्बल ।
झाले हतबल । कोर्टापुढे ॥
समिती नेमली । आम्ही ‘चांदीवाल’ ।
कुणी तिचे हाल । विचारीना ॥
सीबीआय चा हा । तपास कडक ।
बसली धडक । आघाडीला ॥
परब घे आण । बायको पोरीची ।
खंडणीखोरीची । झाकपाक ॥
मातोश्रीला धावू । का सिल्व्हर ओक ।
जहाजाला भोक । भलेमोठे ॥
दूजा अनिलाचा । कटणार पत्ता ।
पचते ना सत्ता । अनैतिक ॥
कांत म्हणे चळे । पुरोगामी ‘माझा’ ।
खोटा गाजावाजा । आकड्यांचा ॥
(9 एप्रिल 2021)

उसंतवाणी-15

(प.बंगालच्या निवडणुकांत मोदींचा एका मुसलमान तरूणाबरोबरचा फोटो व्हायरल झाला. मोदी भाजप विरोधकांना वाटले हा काहीतरी डाव असणार. पण प्रत्यक्षात झुल्फीकर अली या नावाचा हा मुलगा खराच निघाला. त्यानं ज्या पद्धतीनं राष्ट्रीय माध्यमांना मुलाखती दिल्या त्यानं तर पुरोगाम्यांचे पितळ अजूनच उघडे पडले. याच काळात काशीच्या ग्यानवापी मस्जिद प्रकरणांत जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानं तर पुरोगामी अजूनच बावचळले.)

बंगालात झुल्फी । मोदींच्या गळ्याला ।
पुर ये डोळ्याला । पुरोगामी ॥
छाती पिटूनिया । म्हणती ‘या अल्ला’।
सेक्युलर कल्ला । करितसे ॥
झुल्फीकार पोट्टा । बोले चुरू चुरू ।
मरे झुरू झुरू । व्होट बँक ॥
आब्बास सिद्दीकी । ममता ओवैसी ।
मते ऐसी तैसी । विखुरली ॥
रोहिंग्यांचा प्रश्‍न । कोर्ट यांना झापी ।
त्यात ग्यानवापी । सुरू चर्चा ॥
मस्जिद खोदता । लागेल मंदिर ।
भितीने बधीर । पुरोगामी ॥
कांत म्हणे खोदा । ढोंगाची कबर ।
बरी ही खबर । देशकाळी ॥
(10 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, April 8, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४

   
उरूस, 8 एप्रिल 2021 

उसंतवाणी-10

(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह हा एक चेष्टेचा विषय होवून बसले आहे. शिवसैनिकांत आणि ज्येष्ठ नेत्यांत कशी नाराजी आहे हे वारंवार समोर आले आहे. शिवसेनेच्या वाट्यांतील 9 पैकी पाच मंत्री मुळचे शिवसेनेचे नसलेले असे आहेत. दोन तर खुद्द ठाकरे घराण्यांतीलच सदस्य आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांच्या वाट्याला केवळ 2 मंत्रीपदे आली. त्यावरून जी अस्वस्थता आहे त्याचा संदर्भ या अभंगांत आहे.

घरात बसून । करतो लाईव्ह ।
शाब्दिक ड्राईव्ह । मनसोक्त ॥
पत्नी संपादक । मंत्रीपदी पोर।
नाचे बिनघोर । कार्यकर्ता ॥
बाहेरचे पाच । दोन ‘गृह’ मंत्री ।
वाजवा वाजंत्री । सैनिकहो ॥
राज्य ना पक्षाचा । घरचा शीऐम ।
काका करी गेम । माझ्यासाठी ॥
होवू दे बेजार । कितीही जनता ।
राजकीय सुंता । केली आम्ही ॥
फक्त झेंडा हाती । सैनिक कट्टर ।
चाटतो खेटर । मातोश्रीचे ॥
फोडी कधी काळी । वाघ डरकाळी ।
सत्ता लाळ गाळी । ‘कांत’ म्हणे ॥
(3 एप्रिल 2021)


उसंतवाणी-11

(उच्च न्यायालयात जयश्री पाटील यांची याचिका सुनावणीस आली आणि त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली. स्वाभाविकच यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही जिथे अनिल देशमुख कसे स्वच्छ पारदर्शी कारभार करतात त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगत होते त्याच गृहमंत्र्यांना न्यायालयाच्या दणक्याने पद सोडावे लागले.)

कोर्टाचा आदेश । रंगले श्रीमुख ।
देती देशमुख । राजीनामा ॥
सीबीआय चौकशी । बसला दणका ।
तुटला मणका । सत्ताधारी ॥
आघाडीचा घडा । भरला पापाचा ।
साधूंच्या शापाचा । तळतळाट ॥
वाटला नरम । निघाला गरम ।
करतो ‘परम’ । कायदाकोंडी ॥
सचिन हा वाझे । भामटा जोडीला ।
त्यानेच फोडिला । कट सारा ॥
काका घाली जन्मा । अनौरस सत्ता ।
तिच्या माथी लत्ता । प्रहार हा ॥
झाली सुरवात । नाही ही इतिश्री ।
गोत्यात मातोश्री । ‘कांत’ म्हणे ॥
(5 एप्रिल 2021)


उसंतवाणी-12

(अनिल देशमुखांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री करण्यात आले. जाणते राजे शरद पवार यांचे अवघे राजकारण जे की अतिशय धोरणी म्हणून ओळखले जाते तेच गोत्यात आले आहेत. कॉंग्रेस शिवायची तिसरी आघाडी देशभर उभी करावी हे पवारांचे राजकारण ही फसताना दिसत आहे.)

गेले देशमुख । आलेत वळसे ।
खोटेच बाळसे । अब्रुवरी ॥
वाझे उसवतो । रोज एक टाका ।
करणार काका । काय आता? ॥
सत्ता डळमळे । तरी करू चर्चा ।
तिसरा हा मोर्चा । कोलकत्ता ॥
कॉंग्रेसच्या माथी । बंगालात लाथ ।
राज्यामध्ये साथ । काकानिती ॥
तिसरी आघाडी । सदाची बिघाडी ।
काकाला ना नाडी । गवसली ॥
काकांचे आयुष्य । तळ्यात मळ्यात ।
पक्षीय खळ्यात । काही नाही ॥
कांत म्हणे गाठा । संन्यास आश्रम ।
राजकिय श्रम । पेलवेना ॥
(6 एप्रिल 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 7, 2021

उसंतवाणी -राजकीय उपहास- भाग ३

उरूस, 7 एप्रिल 2021 

उसंतवाणी-7

(कॉंग्रेसची मोठी गोची महाराष्ट्राच्या राजकारणात झाली आहे. एक तर महाविकास आघाडीत त्यांची आमदार संख्या सगळ्यात कमी. त्यांना सातत्याने दुय्यम वागणुक मिळत आहे अशी तक्रार ज्येष्ठ मंत्री करतात. जे घोटाळे समोर आले त्यातही आपले नाव नाही याची खंत कॉंग्रेस नेत्यांना वाटत असवी असा उपहास करत या ओळी लिहिल्या. बाळासाहेब थोरात त्यांचे महसुल मंत्री आहेत. त्यांना हाताशी धरून शरद पवारांनी सगळी बोलणी केली असं सांगितलं जातं.)

घोटाळ्यांची इथे । साजरी दिवाळी ।
आम्हाला वेगळी । वागणुक ॥
सेना राष्ट्रवादी । मलिद्याची खाती ।
करवंटी हाती । आमच्याच ॥
सोनिया मातेला । सांगतो रडून ।
घ्यावा हा काढून । पाठिंबाच ॥
राठोड मुंढेच्या । चारित्र्याची धुणी ।
आमचा ना कुणी । सापडला ॥
कॉंग्रेस निवांत । बाकीचे जोरात ।
बोलती ‘थोरात’ । काय करू ?॥
दास ‘कांत’ म्हणे । त्याला मिळे हूल ।
राशीला ‘राहूल’ । ज्यच्या ज्याच्या ॥
(21 मार्च 2021)

उसंतवाणी-8

(शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अचानक रात्री 2 वा. विमानाने अहमदाबादला गेले आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट गौतम अडानी यांच्या घरी झाली. त्यांना 45 मि. शहांनी वाट पहायला लावली. अशा बातम्या पसरल्या. याची अधिकृत कसलीच पुष्टी कोणी केली नाही. आणि नकारही दिला नाही.)

साबरमतीला । गेली बारामती ।
काय करामती? । कोण जाणे ॥
गुप्तभेटीसाठी । मध्यरात्री वेळ ।
राजकीय खेळ । रंगतसे ॥
गुजरात दौरा । संजय उवाच ।
बोलतो उगाच । मूढमती ॥
येवुनिया काका । जाती ब्रीचकँडी ।
उद्धवासी थंडी । उन्हाळ्यात ॥
परम वादाची । पडलिया चीर ।
सरकार स्थिर । प्रवक्ता म्हणे ॥
तिघांचा हा खेळ । कडी वरकडी ।
कॉंग्रेस कोरडी । ‘कांत’ म्हणे ॥
(29 मार्च 2021)

उसंतवाणी-9

(बंगाल निवडणुकांत ममता दिदींनी हिंदूंना खुश करण्यासाठी म्हणून आपणही कसे देवी कवच म्हणतो, चंडीपाठ करतो, आपले गोत्र शांडिल्य आहे असे सांगितले. बरोबर हाच मुद्दा मग भाजपने उचलला. राहूल गांधींनी तर आधीच शर्टावर जानवे घालून मंदिरांचे उंबरे झिजवालया सुरवात केली होती.)

रेड्यामुखी वेद । जूनी झाली कथा ।
ऐका नवी गाथा । बंगालात ॥
कुठे चंडी पाठ । कुठे मंत्र स्तोत्र ।
प्रकटले गोत्र । ‘दिदी’ मुखी ॥
सदर्‍या वरून । घाली जो जानवे ।
त्याला ना जाणवे । आत काही ॥
जामा मशिदीत । इमाम बुखारी ।
फतवे पुकारी । कधी काळी ॥
मतांसाठी ढोंगी । पढले नमाज ।
सरे त्यांचा माज । राम नामे ॥
व्यर्थ मिरवून । दावी जो ब्राह्मण्य ।
नासे त्याचे पुण्य । ‘कांत’ म्हणे ॥
(31 मार्च 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, April 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २

     
उरूस, 6 एप्रिल 2021 

उसंतवाणी-3

(परमवीर सिंह यांनी आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. अपेक्षा अशी होती की गृहमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेवून ते काही कार्रवाई करतील. पण तसे काही घडले नाही. याची कल्पना असल्यानेच परमवीर सिंह सर्वौच्च न्यायालयात गेले. पुढे ते उच्च न्यायालयात गेले आणि आता तर अनिल देशखुख यांचा राजीनामाच आला आहे.) 
‘परम’ स्फोटाचा । जाहला आवाज ।
हादरला आज । महाराष्ट्र ॥
महिन्याला फक्त । शंभरच कोटी ।
बाब आहे छोटी । ‘काका’ म्हणे ॥
शंभराचे वाटे । करताना तीन ।
कोण मारी पीन । दिल्लीतून ॥
सिंहासनाखाली । लागला सुरूंग ।
दाखवी तुरूंग । देवेंद्र हा ॥
राजकारण्यांनी । सोडलीय लाज ।
दिसे मज आज । ‘कांत’ म्हणे ॥
(21 मार्च 2021)

उसंतवाणी-4

(सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची मोठी गोची झाली. अनिल देशमुख राजीनामा देणार नाही असे मोठ्या आवेशात सांगितले जात होते. पण प्रत्यक्ष काय घडले ते सर्वांच्या समोरच आहे.) 
दाण्याच्या मोहात । मुठ उघडेना ।
बाहेर निघेना । ‘हात’ कसा ॥
माकडासारखी । राजकीय स्थिती ।
गुंग बारामती । महाराष्ट्री ॥
‘परम’ गाठतो । पायरी सर्वौच्च ।
हालवतो गच्च । व्यवस्था ही ॥
राजीनामा नाही । भाषेचा हा दर्प ।
सत्ता वीष सर्प । वळवळे ॥
दास ‘कांत’ म्हणे । झाली सुरूवात ।
राजकिय वात । विझु लागे ॥
(22 मार्च 2021)


उसंतवाणी-5

(रश्मी शुक्ला या पोलिस खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी. त्यांनी बदल्यांचे रॅकेट आणि त्यासाठी होत असलेला पैशाचा व्यवहार यावर एक अहवाल तयार केला. आणि तो ऑगस्ट मध्येच मुख्यमंत्र्यांना सादर केला. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच हालचाल केली नाही. शेवटी हा अहवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवला. त्याला वाचा फोडली.)
आधीच नशिबी । देवेंद्र हा खाष्ट ।
त्यात ‘शुक्ला’ काष्ठ । मागे लागे ॥
‘रश्मी’ दोरखंड । आवळतो गळा ।
बदल्यांची ‘लीळा’ । दावी जगा ॥
एकाला झाकता । दूजे हो उघडे ।
संजू बडबडे । हकनाक ॥
बरा होता गप्प । जितेंद्र आव्हाड ।
जिभेला ना हाड । त्याच्या जरा ॥
सत्तेच्या गाडीचे । उधळले बैल ।
कासरा हो सैल । ‘कांत’ म्हणे ॥
(25 मार्च 2021)

उसंतवाणी-6

(आघाडी सरकारच्या अडचणी कमी पडल्या होत्या म्हणून की काय संजय राउत यांनी अशी बडबड केली. त्यांनी मागणी केली की युपीए च्या अध्यक्षपदी शरद पवारांना बसवा. वास्तवात पवारांचे लोकसभेत खासदार किती? शिवसेनेचाच मुळात युपीए शी काय सबंध? असे प्रश्‍न मग विचारले जावू लागले. राज्य कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी  राउतांना चांगले टोले लगावले आहे.)
संजू म्हणे करा । अध्यक्ष काकाला ।
झोंबू दे नाकाला । मिर्ची कुणा ॥
सोनिया मातेची । वाया घुसळणी ।
सत्तेचे ना लोणी । दिसे कुठे ॥
राहूल प्रियंका । झाला पोरखेळ ।
कशाना ना मेळ । पक्षामध्ये ॥
‘नॅनो’ पक्षाचे हे । पाच खासदार ।
तरी काका फार । ‘पवार’फुल ॥
काका जाणतात । सगळ्यांचा ‘भाव’ ।
म्हणून प्रभाव । पडे त्यांचा ॥
संजू नाचतोय । बेगान्या शादीत ।
नाव ना यादीत । ‘कांत’ म्हणे ॥
(27 मार्च 2021)
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, April 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास - भाग १

उरूस, 5 एप्रिल 2021 

मराठवाडा ही संतांची आणि उसंतांची भूमी आहे असं फ.मुं.शिंदे गंमतीत म्हणायचे. त्यांच्या या शब्दाचा पुढे आम्हाला एक अतिशय चांगला उपयोग झाला. रविंद्र तांबोळी हा मित्र उपहास अतिशय चांगला लिहायचा. शेतकरी संघटक या पाक्षिकासाठी एखादे असे उपहासात्मक सदर चालव असं त्याला सुचवले. त्यात संत ठोकाराम नावाने त्याने काही अभंग लिहिले. त्या लेखांचे पुस्तक झाले तेंव्हा त्याचे नावच आम्ही ‘उसंतवाणी’ असे ठेवले. 

उसंतवाणी हा शब्द तेंव्हापासून माझ्या डोक्यात ठसून बसला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत एका लेखात मी उपहासात्मक अभंग लिहिला. पुढे मग असे अभंग गेले काही दिवस समाज माध्यमांवर लिहित आहे. आपसुकच उसंतवाणी हेच नाव त्या मालिकेला द्यावे असे सुचले. 

राजकिय उपहास मराठीत अतिशय चांगला लिहिला गेला आहे. पण सातत्याने राजकिय उपहासाची कविता मात्र लिहिल्या गेली नाही. रामदास फुटाणे यांनी आपल्या वात्रटिकांच्या माध्यमांतून हा विषय जिवंत ठेवला. त्याचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. ब्रिटीश नंदी (प्रविण टोकेकर) आणि तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांच्या उपहासात काही अतिशय सुंदर अशा कविता येवून गेलेल्या आहेत. संजय वरकड या माझ्या पत्रकार मित्राने ‘वरकडी’ हे राजकिय विडंबनाचे सदर दीर्घकाळ चालवले. या कविताही मला आवडत आलेल्या आहेत.

समाज माध्यमांवर त्या त्या वेळी घडलेल्या प्रसंगांवर मी अशा विडंबन कविता अशात लिहितो आहे. त्या एकत्रित स्वरूपात दिल्या तर वाचायला बरे अशी काही वाचका मित्रांनी मागणी केली. त्यानुसार या कविता एकत्रित काही भागात देतो आहे. या कवितेचे आयुष्य फार अल्प असते. त्या त्या वेळचे ते संदर्भ असतात. काही काळांनी या कविता कुणी वाचेल तर त्याला सगळेच संदर्भ लागतील असे नाही. म्हणून त्या खाली तारीख देत आहे. म्हणजे संदर्भच शोधायचे असतील तर ते सोयीचे पडेल. शिवाय प्रत्येक कवितेच्या सुरवातीला थोडक्यात ते प्रसंग आणि त्यावेळची परिस्थिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे वाचकांना हे आवडेल. सोशल मिडियावर याला मोठा प्रतिसाद मिळाला आहेच. या विडंबनांना कसा प्रतिसाद मिळतो आहे याचीच एक बातमी फोकस इंडिया या पोर्टलने केली होती. संपादक संतोष कुलकर्णी यांचे आभार.  (यातील काही रचना पूर्वी लेखात आलेल्या आहेत)

उसंतवाणी-1

(राहूल गांधी यांनी ऑनलाईन एका मुलाखतीत आणीबाणी ही चुक असल्याचा उच्चार केला. मग कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर जे आजतागायत आणीबाणीचे समर्थन करत आले आहेत यांची पंचाईत झाली. त्या संदर्भातील हे विडंबन. केतकर परदेशी विद्यापीठांत आमंत्रित प्राध्यापक म्हणून जायचे. पण भारत सरकारने अशा काही व्यक्तींवर बंधने आणली. अर्थात त्यात केतकरांचे नाव नाही. पण तोही एक संदर्भ आहे. शिवाय अशा वेबिनारमध्ये कुणाला बोलवायचे यावरही काही नियम मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घातले आहेत. त्यावरही ओरड पुरोगाम्यांनी सुरू केली आहे.)

आज्जीची ती चुक । लादे आणीबाणी ।
राहूलची वाणी । उमटली ॥
‘कुमार’ अवस्था । हो केविलवाणी ।
गावी कशी गाणी? । आणीबाणीची॥
गाउन आरती । जीभेला ना हाड ।
कौतुकाचे झाड । ओठांवर ॥
आंतर राष्ट्रीय । कटाचा हा भाग ।
नशिबात भोग । काय आला ॥
राहूलही त्यात । अडकला असा ।
फेकला हा फासा । कसा कुणी ? ॥
परदेशी जावे । कराया चिंतन ।
विचार गहन । लोकशाहीचा ॥
हूकुमशहा तो । अडवितो मोदी ।
पत्रकार गोदी । भंडावती ॥
उतार वयात । अवस्था सुमार ।
बेजार ‘कुमार’ । कांगरेसी ॥
दास‘कांत’ म्हणे । हाणा दोन लाथा ।
बुद्धिवंत माथा । कुजलेला ॥
(5 मार्च 2021)

उसंतवाणी-2

(ओवैसींचा पक्ष बंगालात निवडणुक लढवणार अशी हवा आधीपासून केल्या गेली. पण प्रत्यक्षात त्यांच्या बंगाल शाखेत फुटाफुट झाली. अध्यक्ष जमीर-उल-हसन यांनीच पक्ष सोडला. ज्या पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्यावर भरोसा ठेवून ओवैसींनी राजकिय डावपेच आखले होते त्यांनी आपला स्वतंत्र पक्षच स्थापन केला आणि कॉंग्रेस डाव्यांसोबत स्वतंत्र आघाडी करून निवडणुक लढवत आहेत.)

ओवैसींचा पक्ष । बंगालात फुटे ।
राजकीय तुटे । स्वप्न सारे ॥
बंगाली भाषेने । उतरीला आज ।
उर्दूचा हा माज । हुगळीकाठी ॥
हैदराबादेत । बिर्याणीची सत्ता ।
तिला कोलकोत्ता । ओळखेना ॥
ओवैसी काढतो । हिरवे फुत्कार ।
त्याचा ना सत्कार । बंगालात ॥
बक बक इथे । करू नको जादा ।
बोले पीरजादा । फुर्फुराचा ॥
दास ‘कांत’ म्हणे । गाठू नये टोक ।
पदराला भोक । राजकीय ॥
(8 मार्च 2021)
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 4, 2021

अमेरिकेपुढे राहूल गांधींचे रडगाणे

    


उरूस, 4 एप्रिल 2021 

आपल्याच पक्षाची स्थिती जरा कुठे चांगली होताना दिसली की राहूल गांधी अस्वस्थ होतात. मी इतका प्रयत्न करतो आहे पण तरी लोक आम्हाला मतदान करतातच कसे? मग ते एकापेक्षा एक भन्नाट अशा आयडिया काढतात. आणि मनापासून पक्ष पूर्ण खड्ड्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात.

केरळ जिथे त्यातल्या त्यात कॉंग्रेसची चांगली स्थिती आहे असे पत्रकार निरीक्षक अभ्यासक सर्वेक्षण करणारे सांगत आहेत. तिथे दोन दिवसांत मतदान होणार आहे (6 एप्रिल 2021, 140 जागांसाठी). नेमक्या या मतदानाच्या तीनच दिवस आधी राहूल गांधी यांनी एक मुलाखत अमेरिकेचे माजी राजदूत उच्चपदस्थ अधिकारी आणि हॉर्वर्ड विद्यापीठांत राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या निकोलस बर्न यांना दिली. यात त्यांनी नेहमी प्रमाणे भारतात लोकशाही राहिली नाही हे रडगाणे तर गायले आहेच. पण शिवाय अमेरिका कशी काय गप्प बसून आहे? असं म्हणत याचनाही केली आहे. ही मुलाखत यु ट्यूबवर उपलब्ध आहे. जरूर पहा. नसता परत कॉंग्रेसचे प्रवक्ते अर्वाच्चपणे राहूल गांधी असे बोललेच नाहीत. माध्यमं भाजपला विकली गेली आहेत. गोदी मिडिया म्हणत आरडा ओरड करतात. तूम्ही शब्द तोडून मोडून दाखवत आहेत असा आरोप परत माध्यमांवरच करतात. 

यातील सर्वात आक्षेपार्ह मुद्दा असा की चीन आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून बसला आहे याचा त्यांनी केलेला उल्लेख. ही बाब वारंवार आपल्याकडे चर्चेत स्पष्टपणे समोर आली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांनी प्रत्यक्ष संसदेत स्पष्ट खुलासे केले आहेत. सैन्याधिकार्‍यांनी सर्व मुद्दे समोर ठेवले आहेत. विविध पत्रकारांनी यातील अगदी बारकावे सर्व देशवासियांना दाखवले आहेत. इतके असतानाही परत परत राहूल गांधी हे एकच तुणतुणं का लावून धरतात? आणि तेही परत परदेशी उच्चपदस्थ अधिकारी विचारवंत प्राध्यापक यांच्या समोर. 

आमचा पक्ष निवडणुका कशा लढू शकत नाही असेही एक रडगाणे त्यांनी गायले आहे. सत्ताधारी भाजप मोदी अमित शहा यांनी सर्वच यंत्रणा कशा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत हे मांडले.  याचे उदाहरण देताना राहूल गांधी यांनी नेमके असम मधील एका मतदान केंद्रावरील ई.व्हि.एम. मशिन कशी भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळली हे सांगितले. 

यातील खरा प्रकार काय आहे हे माध्यमांनी लगेच समोर आणला होता. निवडणुक आयोगाने त्यावर त्वरीत कार्रवाई केली. शंकेचे निराकरण केले. अजूनही ते एव्हिएम सीलबद्धच आहे. त्या केंद्रावर आता परत मतदान होत आहे. असं असतनाही राहूल गांधी हीच एक घटना परदेशी तज्ज्ञासमोर सांगतात. बरं त्यांना निवडणुकीतील गैर प्रकारांबाबतच बोलायचे होते तर प.बंगाल मधील ममतांच्या पक्षाने ज्या तक्रारी आयोगा समोर मांडल्या त्याचा उल्लेख का करावा वाटला नाही?

राहूल गांधी यांनी नेमकी असम मधील हीच घटना उचलली याचा एक वेगळाच अर्थ आता लावला जात आहे. नेमकी ते ईव्हिएम घेवून जाणारी गाडी बंद पडणे, रस्त्यात ती गाडी थांबवून दुसर्‍या गाडीला हात करून त्यात ती मशिन घेवून जाणे. ही गाडी दुसर्‍या मतदारसंघातील का असेना पण भाजप उमेदवाराशी संबंधीत आहे हे कळले की लगेच थोड्या अंतरावर  कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी ती रोकणे. गाडीची मोडतोड करणे. लगेच यावर लोकशाही धोक्यात आली म्हणून गोंधळ घालणे. अगदी माध्यमांनाही धारेवर धरणे. जेंव्हा की पत्रकार कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांना समजावून सांगत आहेत की आम्हीच हा प्रकार उघडकीस आणला. तूम्ही आमच्यावर का आरोप करत आहात? म्हणजे या सर्वातच कॉंग्रेसचे खासदार महान पत्रकार कुमार केतकर म्हणतात तसा काही कट आहे की काय असा वास येतो आहे. 

आत्ता जिथे निवडणुका होत आहेत त्यापैकी तामिळनाडू आणि केरळात भाजपचे अस्तित्व जवळपास शुन्य आहे. आणि हे आजचेच नाही तर आधीपासून आहे. अगदी मोदी अमित शहा यांनी सुत्रे हाती घेतली तेंव्हापासून आजपर्यंत 7 वर्षांत फारसा फरक पडला नाही. अजूनही डिएमके आणि डावेच इथे निवडून येतील अशी शक्यता सर्वेक्षणांत समोर आली आहे. पण तरीही राहूल गांधी बिनधास्त आरोप करत आहेत की देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही.

कोरोना काळात देशाच्या आर्थिक विकासाची गती खुुंटली आहे. अर्थक्षेत्रात आपण पिछाडीवर पडलो आहोत हे खरे आहे. वास्तविक सर्वच जग अडचणीत आहेत. तरीही आपला विकासदर बर्‍यापैकी आहे. आणि राहूल गांधी या मुलाखतीत बिनधास्त जीडीपी महत्त्वाचा नसून नौकर्‍या निर्माण करण्यासाठी या सरकारने काही केले नाही असले आरोप करत आहेत. आमच्या सरकारच्या काळात मनरेगा सारखी योजना आम्ही कशी राबवली आणि त्याचे किती अप्रतिम असे परिणाम समोर आले असली शेखी मिरवत आहेत.

वास्तविक संरचनात्मक बाबींमध्ये (इन्फ्रा) जास्तीत जास्त पैसा गुंतवला तर त्याचा परतावा जास्त चांगल्या प्रमाणात होतो शिवाय रोजगार (नौकरी नव्हे) निर्मितीची गती संख्या वाढते हे पण जगभरांत पुढे आलेले आहे. अमेरिकन तज्ज्ञ प्राध्यापक तेच राहूल गांधींना सांगू पहात आहेत आणि हे मात्र इतरच बाबींवर बोलत आहेत. मनरेगा कशी फसली याचे पुरावे देशातील सोडा पण परदेशी अर्थतज्ज्ञांनी पण मांडले आहेत. आता तर मजूरांच्या खात्यात सरळ पैसे जमा करतो म्हटले तर गुत्तेदार ही कामेच करायला तयार नाहीत. शेतकर्‍यांच्या खात्यात सरळ पैसे देतो म्हटले तर अडते दलाल भडकले आहेत. आणि अशा अडत्यांच्या आंदोलनाला राहूल गांधींचा पक्ष पाठिंबा देत आहेत. प्रा. निकोलस बर्न या प्रश्‍नावर जेंव्हा विचारत आहेत तेंव्हा राहूल गांधी खोटं बोलत आहेत की सरकार शेतकर्‍यांचे ऐकायलाच तयार नाहीत म्हणून. ज्या अकरा चर्चेच्या फेर्‍या झाल्या त्या काय होत्या? सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे, त्यासमोर विविध  शेतकरी संघटनांनी आपली बाजू मांडली आहे. पण यातले काहीच बर्न यांना सांगितले जात नाही. आपल्याच पक्षाने निवडणुक जाहिरनाम्यात काय कबुल केलं होतं हे राहूल गांधी निकोलस यांना का सांगत नाहीत?

माझा तर निकोलस यांच्यावरही आक्षेप आहे. ते का राहूल गांधींना विचारत नाहीत की तूमचा पक्ष तर याच कृषी कायद्यांच्या बाजूने होता. तसे स्पष्ट तूमच्या जाहिरनाम्यात लिहीले आहे.

मला वाटते आहे की आपल्या लोकशाहीची बदनामी करण्याची ठरवून ठरवून केलेली खेळी आहे. आणि तीही नेमकी पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका चालू असताना. यातही परत असममधील प्रकरण झाल्या बरोबर एकच दिवसांत ही मुलाखत झाली आहे. 

बाकीही अकलेचे तारे राहूल गांधींनी काय तोडलेत ते तूम्ही जरूर पहा. सोनिया आजारी आहेत. प्रियंका यांनी कोरोना मुळे प्रचारात सहभागी होणार नाही असे जाहिर केले आहे. उरले सुरले राहूल गांधी. त्यांनीही प्रचाराकडे दुर्लक्ष करून असल्या मुलाखतींचा पोरखेळ चालवला आहे. दिसतं असं आहे की जर चुकून माकून केरळात आपला पक्ष जिंकला तर काय करायचे? खरंच काठावरची का असेना असम मध्ये सत्ता आलीच तर कसं होणार? या चिंतेने राहूल गांधी हैराण झाले होते. त्यांनी हा मुलाखतीचा फार्स घडवून आणला. आणि आपल्या पक्षाची विश्वासार्हता पुरती मातीत मिसळवून घेतली. स्वत:चे तर ते नेहमी हसे करून घेत आलेले आहेतच. 

                

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Saturday, April 3, 2021

विरोधक लागता हरू । ‘ईव्हिएम’ रडणे सुरू ॥



उरूस, 3 एप्रिल 2021 

स्वत: भाजप जेंव्हा विरोधात होता तेंव्हा त्यांनी ईव्हिएम विरोधात प्रचंड आरडा ओरडा केला होता. हे आधीच सांगितलेले बरे. कारण लेखाचे शिर्षक ‘विरोधक’ लागता हरू असे आहे. तेंव्हा ते सर्वांना लागू पडते. नुकतेच ईव्हिएम बाबत जे प्रकरण असम मध्ये घडले ते पाहू या (या प्रदेशाचे नविन बदलले नाव ‘असम’ असेच आहे. पूर्वी आपण उच्चार करायचो तसे ‘आसाम’ असे नाही).

असममध्ये 1 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्याचे मतदान पार पडले. एका मतदारसंघातील एका बुथवरील ईव्हिएम मशीन तहसील मुख्यालयात घेवून जात असताना निवडणुक आयोगाची गाडी बंद पडली. रात्र वाढत चालली होती. ईशान्य भारतात अंधार लवकर पडतो. त्याने दुसरी गाडी मागवली. ती यायला उशीर होत होता. तोपर्यंत जास्त उशीर नको म्हणून त्याने रस्त्यावरून जाणार्‍या एका गाडीला हात केला आणि लिफ्ट देण्यास सांगितले. नेमकी याच ठिकाणी निवडणुक अधिकार्‍याची चुक झाली.  ही गाडी काही अंतरावर जाताच लोकांनी अडवली. कारण ही गाडी त्या मतदार संघातील नव्हे पण शेजारच्या भाजप उमेदवाराची गाडी होती. तिच्यात ईव्हिएम मशिन पाहून लोकांचा संताप झाला. गाडीवर हल्ला झाला. 

झाल्या प्रकाराची निवडणुक आयोगाने तातडीने दखल घेतली. जे ईव्हिएम मशीन गाडीत होते त्याचे सील शाबूत होते. पण तरीही या मतदान केंद्रावरचे मतदान रद्द करून तातडीने परत मतदान घेण्यात येईल हे जाहिर केले. ज्या उमेदवाराची ही गाडी होती (त्याच्या बायकोच्या नावावर होती. त्याचा मोठा भाउ ही गाडी चालवत होता.) त्याने आपली गाडी असल्याची कबुलीही दिली. निवडणुक आयोगाने चार अधिकार्‍यांना या प्रकरणांत निलंबीत केले. 

खरं तर प्रकरण इथेच संपायला हवे होते. पण तसे झाले तर त्याला राजकारण कोण म्हणेल? लगेच कॉंग्रेसने याला मोठा भडक रंग दिला. सर्वच निवडणुक रद्द करा, निवडणुका मतपत्रिकांवरच घ्या, सर्वच ईव्हिएम च्या व्हिव्हिपॅटची मोजणी करा अशा अतर्क्य मागण्या केल्या. झाला प्रकार गंभीरच होता. पत्रकारांनी वास्तव तातडीने समोर आणले. याला कुठलाही भडक रंग निदान पत्रकारांनी तरी येवू दिला नाही. आयोगानेही तातडीने कारवाई केली. 

या सोबतच प.बंगाल मध्ये ईव्हिएम बाबत तक्रारी करायला तृणमुलने सुरवात केली. पण मशिन खराब बसल्याचा प्रत्यक्ष पुरावा ते देवू शकले नाहीत. ज्या काही केंद्रांवर किरकोळ बिघाड असल्याचे सांगितले जात होते तिथे दुरूस्ती केल्या गेली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. 

2014 नंतर वारंवार समोर येणारा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष ईव्हिएम वर आक्षेप घेत आहेत. आधीही हे होतच होते. म्हणूनच सुरवातीलाच मी भाजपने पण हे केल्याचे नमुद केले आहे. पण हे प्रमाण 2014 नंतर वाढले. आपले राजकीय अपयश झाकुन विरोधी पक्ष ईव्हिएम वर खापर फोडत आहेत हे कुणाही सामान्य माणसाला सहज लक्षात येते.

आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विरोधी भूमिका घेणे हे अतिशय चुक आहे. ज्या कुणी जून्या कागदांवरच्या मतदान प्रक्रियेत काम केले आहे त्यांना तो काळ आठवला तरी अंगावर काटा येतो. त्या मतपत्रिकांची मोजणी किती किचकट होती. त्यासाठी किती मनुष्यबळ खर्ची पडायचे. हे सर्व देशाने अनुभवले आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया किती वेळखावू होती. आज ईव्हिएम च्या वापराने किती तरी प्रकारे मनुष्यबळ वाचले पैसा वाचला. आणि तरीही हे विरोधी पक्ष मध्ययुगीन कालखंडातील मानसिकतेत जात ‘पूर्वीची पाटीलकीच बरी होती. गावगाडा कसा चांगला चालू होता. बैलगाडीतला प्रवास किती सुखकर होता. पोहर्‍याने आडातून पाणी शेंदणे किती मस्त होते. बैलाच्या मदतीने नांगरट करणेच किती सोयीस्कर होते’ म्हणणार असतील तर त्यावर काही न बोललेलेच बरे. 

यातील सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की ज्याच्या अंगावर जबाबदारी नसते तो असली विधानं बिनधास्त करू शकतो. म्हणूनच मी ‘विरोधक’ असा शब्द वापरला आहे. कारण प्रत्यक्ष सरकार चालविण्याची प्रचंड अशी जबाबदारी त्यांच्यावर नसते. हे सर्वच क्षेत्रात घडताना दिसते (ईव्हिएमचा पहिला निर्णय राजीव गांधी पंतप्रधान असताना झाला होता हे लक्षात घ्या.) 

ईव्हिएम तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केले. प्रत्यक्ष वापरात आणून दाखवले. गेली 20 वर्षे भारतात आपण हे तंत्रज्ञान वापरत आलेलो आहोत. तरी त्यावर शंका वारंवार उपस्थित करणे ही नेमकी कोणती मानसिकता आहे? 

बरं गेल्या 30 वर्षांत भारतातील सगळ्याच प्रमुख पक्षांना केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त करता आलेली आहे. कॉंग्रेस, भाजप आणि डावे हे देशभर पसरलेले तीन राजकीय विचार प्रवाह.1989 पासून तूम्ही तपासून पहा 15 वर्षे कॉंग्रेसचा पंतप्रधान आहे त्याला डावे व इतर पक्षांचा पाठिंबा आहे, 12 वर्षे भाजपचा पंतप्रधान आहे त्यालाही इतर पक्षांचा पाठिंबा आहे. 4 वर्षे विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, एच.डि.देवैगौडा, आय.के. गुजराल असे विविध छोट्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पंतप्रधान पदावर बसून गेले आहेत. विविध राज्यांतील स्थिती तपासली तर अगदी आत्ताही ईव्हिएम च्या काळात प्रमुख बलदंड राजकीय पक्षां व्यतिरिक्त उद्धव ठाकरे (48), ममता बॅनर्जी (42) , नितीश कुमार (40), इ.पलानीस्वामी (39), जगन मोहन रेड्डी (25) , नविन पटनायक (21),  पी.विजयन (20),  टी.एस.चंद्रशेखर राव (17) ,  हेमंत सोरेन (14), अरविंद केजरीवाल (7) हे विविध राज्यांत मुख्यमंत्री आहेत. कंसातील आकडे त्या राज्यांतील लोकसभा मतदारसंघाचे आहेत. यांची बेरीज केल्यास 273 भरते. अगदी आजही भारतात लोकसभेत बहुमत मिळावे इतक्या जागांवर भाजप आणि कॉंग्रेस या बलदंड पक्षांशिवाय अगदी छोट्या प्रादेशीक पक्षांचे नेते सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेले आहेत.  

जर भाजप किंवा पूर्वी कॉंग्रेस हे सत्ताधारी ईव्हिएम त्यांच्या सोयीप्रमाणे हॅक किंवा आता हायजॅक करत होते असा आरोप खरा मानला तर याचे काय उत्तर आहे? केवळ तंत्रज्ञानाचा विचार केल्यास ईव्हिएम अगदी उत्तम आहेत असाच निर्वाळा या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वारंवार दिला आहे. अगदी यासाठी सर्वौच्च न्यायालयापर्यंत याचिका गेल्या होत्या. 

या यंत्राला जोडून आता VVPAT यंत्र पण जोडले जाते. आपण कोणाला मत देत आहोत त्याची खातरजमा प्रत्यक्ष कागदावर करता येते. अश्या कागदावरची माते मोजून प्रत्यक्ष यांत्रावरच्या आकड्यांशी तपासून पहिले गेले आहे. त्याही अग्निपरीक्षेतून हे यंत्र गेले आहे. तरी संशयी आत्मे शांत होत नाहीत. कारण त्यांचा विरोध यंत्राला नसून सत्तेवर येण्याच्या राजकीय तंत्राला आहे. जे विरोधकांना जमत नाही तिथे ते ओरड करतात. सत्ता मिळाली की शांत बसतात.  

तेंव्हा ईव्हिएम बाबतचे आक्षेप राजकीय आहेत. धुळफेक करणारे आहेत हे सामान्य मतदारांनी लक्षात घ्या. ज्या त्रुटी निर्माण होतात जाणवतात त्यांचे निराकरण लगेच केले जाते. बॅटरीवर चालणारे हे अतिशय उपयुक्त उपकरण आहे. त्यामुळे कागदाची बचत होते आहे. पर्यावरणवाद्यांनी तर यावर आनंद व्यक्त करायला पाहिजे. शिवाय एकच मशिन परत परत वापरता येते. पूर्वीच्या काळी प्रत्येक वेळी मतपत्रिका छापाव्या लागायच्या. शिवाय या मतपत्रिकांना वाहून नेण्यासाठी अवजड अशा मतपेट्यांचीही मोठी समस्या होती. आपण काही श्रीमंत देश नाहीत. आपल्याला आपला निधी काटकसरीनेच वापरावा लागतो. अशा काळात ईव्हिएम एक मोठे वरदान आहे (हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांत मतपत्रिकांवर मतदान होवूनही कॉंग्रेस पराभूत झाला याची कॉंग्रेस समर्थकांनी घ्यावी). 

राजकीय लोक आणि त्यांची डफली वाजवणारे बाजारू विचारवंत पत्रकार यांना बाजूला ठेवा. एक सामान्य मतदार पूर्वग्रह दुषीत नसलेली कुणीही खुल्या विचाराची व्यक्ती म्हणून आपण ईव्हिएम वर संशय घेवू नये. या यंत्राची उपयुक्तता वारंवार सिद्ध झाली आहे. आपली लोकशाही सुदृढ करण्यात या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग झाला आहे. मतदानाचा टक्का वाढणे, मतदानाची गती वाढणे, मतमोजणी अचुक व कमी वेळात होणे अशा कितीतरी बाबींचा लाभ या तंत्रज्ञानाने आपल्याला दिला आहे. 

           

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Friday, April 2, 2021

ममता दिदींचा खोटारडेपणा !



उरूस, 2 एप्रिल 2021 

प.बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक चालू आहे. दुसर्‍या टप्प्याचे मतदान 1 एप्रिलला पार पडले. यात ममता दिदी उभ्या आहेत तो नंदीग्राम विधानसभा मतदारसंघही होता. ममतांनी शेवटचे तीन दिवस प्रत्यक्ष त्याच मतदार संघात ठिय्या देवून होत्या. अगदी मतदान चालू होते तेंव्हाही त्या एका बुथवर बसून होत्या. मतदान चालू असतानाच त्यांनी आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी कांगावा करायला सुरवात केली. त्यातला पहिला आरोप होता की आमच्या माणसांना मतदानच करू दिले गेले नाही. 

हा आरोप खोटा होता हे काही वेळातच हाती आलेल्या आकडेवारीने सिद्ध केले. मागील निवडणुकीत मतदाराची आकडेवारी 79.45 % अशी होती. यावेळी जो अंतिम आकडा निवडणुक आयोगा कडून आला आहे तो आहे 84.54 %. या वेळेला एकूण मतदारांत वाढ झालेली होती. शिवाय हा आकडा सरासरीतही 5 % नी वाढलेला आहे. म्हणजेच मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदरांनी मतदान केले. मग आता प्रश्‍न असा निर्माण होतो की ममता दिदी कुणाला मतदान करू दिले गेले नाही म्हणून ओरड करत आहेत? 

रोहिंग्या मुसलमानांना मतदान करू दिले गेले नाही, बांग्लादेशी घुसखोरांना मतदान करू दिले गेले नाही, खोटे ओळखपत्र ज्यांच्या जवळ होते त्यांना मतदान करू दिले गेले नाही म्हणून तक्रार आहे का? तसे असेल तर खरंच भारतातील पुरोगाम्यांची लोकशाही धोक्यात आली आहे. आम्हाला बोगस मतदानही करण्याचे स्वातंत्र्य नाही. तेंव्हा खरंच ममता म्हणतात तसा अन्याय या परदेशी घुसखोरांवर झालेला आहेच. 

दुसरा आरोप दिदींनी केला की युपी बिहारचे गुंडे भाजपने इकडे आणले आहेत. ते यांच्या मतदरांना त्रास देत आहेत. धरात घुसून धमकावत आहेत. सीआरपीएफ चे जवान आमच्या मतदारांना धमकावत आहेत. भाजपला मतदान करण्यास भाग पाडत आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे ते त्याच्या कपड्यांवरून टोपीवरून गळ्यातील रूमालावरून झेंड्यावरून ओळखू येते. पण मतदार कोणाचा आहे हे कसे ओळखणार? मग ममतांच्या या आरोपाची शाहनिशा कशी करायची? यांचा हा आरोप तेंव्हाच खोटा ठरला जेंव्हा याचे कुठले फुटेज उपलब्ध आहे का असे पत्रकारांनी विचारायला सुरवात केली. आणि ममता किंवा तृणमुलच्या प्रवक्ते नेते कार्यकर्ते कुणालाच त्याचा पुरावा देता येईना. उलट पत्रकारांवर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला इंडिया टिव्हीवर प्रत्यक्ष दाखवला गेला. त्या पत्रकाराने स्वत:ला जखम झालेली असतानाही रिपोर्टिंग केले. कारच्या काचेवर झालेली दगडफेक दाखवली. तृणमुलच्या कार्यकर्त्यांना कुणी धमकावले त्यांच्यावर हल्ला केला याचा एकही दृश्य पुरावा कालच्या दिवसभरात समोर आला नाही. 

मोदी काल मदुराई मंदिरात गेले त्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यावरून एक मोठा गदारोळ झाला. खरं तर तामिळनाडूत मोदिंच्या मंदिर भेटीने मतदारांवर परिणाम होईल अशी शक्यता नाही. मग हा आरोप ममता आणि तमाम पुरोगाम्यांनी करायचे काय कारण? याच वेळी ममता मंचावरून चंडीपाठ करत आहेत, आपले गोत्र सांगत आहेत, देवी कवच म्हणत आहेत. मग यावर हे पुरोगामी काही टिका करत आहेत का?  बंगालच्या निवडणुका चालू झाल्या आणि याच काळात तेथील सर्वात मोठ्या फुर्फुरा शरिफ दर्ग्याचा उरूस भरला (6 ते 8 मार्च). तिथे सगळ्या पुरोगाम्यांनी जावून दर्ग्यावर चादर चढवली. तिथले मौलाना पीरजादा आब्बास सिद्दीकी आयएसएफ नावाचा पक्ष स्थापून कॉंग्रेस आणि डाव्यांसोबत निवडणुक लढवत आहेत. त्यावर कुण्या पुरोगाम्याने टिका केल्याचे एकही उदाहरण समोर आले नाही. 

वास्तविक कसलाच आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे ममता दिदींनी प्रचार चालवला असता तर त्यांच्या पक्षाची जिंकण्याची सगळ्यात जास्त शक्यता होती. तसेच अंदाज निवडणुकपूर्व सर्वेक्षणांतून समोर आलेही होते. पण ममतांनी आपला तोल ढासळल्याचे पुरावे दिले आणि त्याचा एक विपरीत परिणाम आता होताना दिसतो आहे. 

इंडिया टिव्हीच्या पत्रकारांनी काही गावांत लोकांना मतदानापासून कसे वंचित ठेवल्या जात आहे. केंद्रिय राखीव दलाचे जवान (सी.आर.पी.एफ.) आल्यावरच त्यांना हिंमत झाली आणि हे लोक मतदानाला आले ही बातमी सविस्तर दाखवली. मग याच्या उलट तृणमुलवर होणारा अन्याय यांच्या कुणा कार्यकर्त्यांनी का दाखवून दिला नाही? हे इतरांवर अत्याचार करत आहेत त्याचेच पुरावे समोर आले आहेत. 

तृणमुलची होत असलेली घसरण आणि त्यातून ममतांची दिसून येणारी अस्वस्थता सत्य सांगते आहे. ही स्थिती ममतांनी स्वत: होवून करून घेतली आहे. उद्या निकालात ममतांचा पक्ष सत्तेपासून परावृत्त राहिला तर त्याचे मोठे श्रेय भाजपच्या धोरणापेक्षा ममतांच्या या आक्रस्ताळेपणालाच असेल. हातात आलेली सत्ता त्यांनी गमावली असाच त्याचा अर्थ निघेल. 

सलग दोन टप्प्यांत मतदानाचे पूर्वीचे विक्रम मोडत समोर आलेल्या सामान्य बंगाली मतदाराचे अभिनंदन केले पाहिजे. याच साध्या लोकांनी लोकशाही टिकवून ठेवली आहे. याही टप्प्यात हिंसाचाराच्या अतिशय तुरळक घटना घडल्या. या सोबतच असम मध्येही मोठ्या प्रमाणात मतदान झाले. लोक उत्सहात मतदानाला बाहेर पडले. तेथील आकडेवारीही (78.04 %) उत्साहवर्धक आहे. पूर्वीपेक्षाही हा आकडा 4 % नी जास्त आहे.

निवडणुकीच्या आकडेवारीसाठी निवडणुक आयोगाने ‘व्होटर टर्नओव्हर’ नावाचे फार चांगले ऍप तयार केले आहे. दर दोन तासांनी त्यावर ताजी आकडेवारी मतदान चालू असताना मिळत असते. सगळ्यात शेवटची आकडेवारी दुसर्‍या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध होते. या पुढील मतदानाच्या टप्प्यांसाठी इच्छुकांनी अभ्यासकांनी याचा वापर जरूर करावा. म्हणजे ममता किंवा कुणीही राजकीय कार्यकर्ता नेता प्रवक्ता मतदाना विषयी किती खरं बालतो खोटं बोलतो याची शहानिशा लगेच होउन जाईल.    

           

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575