Saturday, March 27, 2021

'राष्ट्रवादी' शादी मे संजू है दिवाना !




उरूस, 27 मार्च 2021 

सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कमालीची अस्वस्थ अस्थिर आहे.  पाच राज्यांतील निवडणुकांची रणधुमाळी उडालेली आहे. अशा वेळी शिवसेनेत असलेले कट्टर राष्ट्रवादी सैनिक शरद पवारांचे खास आणि सामनाचे कास (कार्यकारी संपादक, कारण मुख्य संपादक महान पत्रकार रश्मी ठाकरे या आहेत) खा.संजय राऊत यांनी एक विनोदी वक्तव्य करून धमाल उडवून दिली आहे. 5 खासदारांचे नेते असलेले मा. शरद पवार यांना युपीए चे अध्यक्ष केले पाहिजे अशी मागणी राउत यांनी केली आहे.

संजय राउत नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत? युपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीचा शिवसेना घटक तरी आहे का? आत्ता ही मागणी पुढे करण्याचे कारण काय? आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर याचा काय परिणाम होईल?

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे तिघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे. अशावेळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ज्या की युपीएच्याही अध्यक्षा आहेत त्यांना हाकला अशी मागणी करून काय मिळणार? समजा यावर संतापून (जे होणे शक्य नाही कारण कॉंग्रेस सत्तेला चिटकून राहू इच्छिते) कॉंग्रेसने पाठिंबा काढून घेतला. तर महाराष्ट्रातले सरकार पडेल. पण याचा तोटा सर्वात जास्त कुणाला होईल? राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाच ना? कारण भाजप कॉंग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांच्या राजकारणाला देशात इतरत्र पुरेशी जागा आहे संधी आहे. पण आजतागात शिवसेना आणि राष्ट्रवादीला राज्याबाहेर जराही विस्तारता आलेले नाही. 

युपीए बाहेरील पक्ष सोनियांच्या नेतृत्वाखाली यायला तयार नाहीत. पण ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मात्र येवू शकतात असा दावा संजय राउत यांनी केला आहे. सध्याच्या लोकसभेत एकूण काय पक्षीय बलाबल आहे ते आकड्यांत आपण पाहू. कॉंग्रेस खालोखाल जो पक्ष मोठ्या संख्येने आहे तो म्हणजे एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालचा द्रमुक. त्यांचे 24 खासदार आहेत. येत्या निवडणुकांत तोच पक्ष तामिळनाडूत स्वबळावर सत्तेवर येवू शकतो. ओपिनियन पोलचे अंदाज तसेच आहेत. मग हे एम.के. स्टॅलिन शरद पवारांना आपला नेता काय म्हणून मानतील? 

दुसरा मोठा पक्ष म्हणजे ममता बॅनर्जी यांचा तृणमुल कॉंग्रेस. त्यांचे 22 खासदार आहेत. त्यांचा पक्षही बंगालात सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ममता शरद पवारांसारख्याच कॉंग्रेस मधूनच बाहेर पडल्या होत्या. आपला पक्ष त्यांनी 12 वर्षांत स्वबळावर सत्तेवर आणला. हे काम 22 वर्षे झाली तरी अजूनही शरद पवारांना जमले नाही. मग त्या पवारांचे नेतृत्व कशासाठी मानतील? त्या कॉंग्रेस विरोधात लढत आहेत. 

तिसरा मोठा पक्ष आहे जगनमोहन रेड्डी यांचा वाए.एस.आर.कॉंग्रेस. त्यांचे 22 खासदार लोकसभेत आहेत. आंध्र प्रदेशांत तो पक्ष स्वबळावर सत्तेत आहे. गरजे प्रमाणे ते सत्तेवर असलेल्या भाजपशी जवळीक साधून असतात. गरजे प्रमाणे अंतर राखून असतात. त्यांना शरद पवारांच्या नेतृत्वाची गरजच काय? हा पक्षही सोनिया कॉंग्रेसचा कट्टर विरोधक आहे. तो युपीए तर येईलच कशाला? त्यांच्या विरोधी असलले चंद्राबाबू नायडू हे शरद पवारांच्या गळाला लागू शकतात. पण सध्या त्यांची राजकीय किंमत शुन्य आहे. त्याचा पवारांना काय फायदा?

चौथा मोठा पक्ष आहे शिवसेना. त्यांचे 18 खासदार आहेत. त्यांना आपली पुण्याई पवारांच्या पाठीशी उभी करण्यात रस आहे कारण पवारांच्या दयेवरच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद पटकावले आहे. पण हा पक्षही निवडणुकीच्या राजकारणात  कॉंग्रेस सोबत जाईल का? कॉंग्रेस वगळून युपीए होणार असेल तरच शिवसैनिक त्यात सहभागी होतील असे वाटते.   

पाचवा मोठा पक्ष आहे नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड. त्यांचे लोकसभेत 16 खासदार आहेत. ते एनडीए चा घटक आहेत. भाजप सोबतच ते बिहारात सत्तेवर देखील आहेत. त्यामुळे त्यांचा युपीएत येण्याचा काही विषयच नाही.

सहावा मोठा पक्ष आहे नविन पटनायक यांचा बिजू जनता दल. या पक्षाचे 12 खासदार लोकसभेत आहेत. नविन स्वत:च्या बळावर ओरिसात सत्तेवर आहेत. त्यांनी जगन मोहन रेड्डी प्रमाणेच गरजेनुसार भाजपशी जवळीक किंवा अंतर राखलेले आहे. तिसर्‍या आघाडीचे फुटीरतवादी अवसानघातकी राजकारण त्यांनी आपल्या वडिलांच्या काळापासून नीट समजून घेतलेले आहे. त्यामुळे संजय राउतांच्या प्रस्तावाला ते काडीचेही महत्त्व देणार नाहीत. शिवाय ते युपीए चे घटक नाहीतही. कॉंग्रेसशी विरोध करूनच त्यांनी ओरिसात आपले बस्तान बसवले आहे. 

सातवा मोठा पक्ष आहे मायावती यांना बहुजन समाज पक्ष. त्यांचे 10 खासदार आहेत. मायावती यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक इथे कॉंग्रेस आघाडीचा वाईट अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्या आपला राजकीय पत्ता स्वतंत्र चालविण्याच्या खेळातच असतात. संजय राउतांच्या प्रस्तावाला त्या पाठिंबा देण्याची शक्यता नाही. 

भाजप कॉंग्रेस शिवाय केवळ सात पक्ष असे आहेत की ज्यांचे दोन आकडी खासदार लोकसभेत आहेत. मग यातील शिवसेना वगळता कुणाच्या आधारावर संजय राउत असे म्हणत आहेत की शरद पवारांच्या नेतृत्वाची मागणी होते आहे? 

बाकी पक्ष म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती (9), लोकजनशक्ती (6), समाजवादी पक्ष (5), डावे पक्ष (5), राष्ट्रवादी (5 महाराष्ट्रात 4 आणि लक्षद्वीप मध्ये 1) मुस्लीम लीग (3), नॅशनल कॉन्फरन्स (3), अकाली दल (2), आम आदमी पक्ष (1), एआययुडिएफ (1) , अपना दल (1), जनता दल -सेक्युलर (1) , झामुमो (1), केरळा कॉंग्रेस-मणी (1), नॅशनल पीपल्स पार्टी (1), नागा पिपल्स फ्रंट (1) आदी पक्ष निव्वळ एक आकडी संख्या असलेले आहेत.

मग आता शरद पवारांनी युपीए चे अध्यक्षपद भुषवावे अशी मागणी यातील कोण कोण करणार आहे? यातूनही लोकजनशक्ती हा पासवानांचा पक्ष भाजप बरोबर आहे. जेमतेम 40 खासदारांचा गट असा तयार होतो आहे. यांना शिवसेनेच्या 18 खासदारांनी पाठिंबा दिला तरी ही संख्या 58 इतकीच होते आहे. अजून काही अपक्ष हाताशी धरले तरी ही संख्या साठी ओलांडत नाही. मग कशाच्या आधारावर संजय राउत ही मागणी करत आहेत? 

राजपुत्र उत्तर कौरवांनी केलेल्या हल्ल्याला तोंड देण्याची राणीवशात बडबड करतो असे एक वर्णन महाभारताचे मराठी काव्यात येवून गेले आहे. ती ओळ अशी आहे ‘बालीश बहु बायकांत बडबडला’. तसे हे संजय राउत यांचे बडबडणे आहे. 

संजू म्हणे करा । अध्यक्ष काकाला ।
झोंबू दे नाकाला । मिर्ची कुणा ॥
सोनिया मातेची । वाया घुसळणी ।
सत्तेचे ना लोणी । दिसे कुठे ॥
राहूल प्रियंका । झाला पोरखेळ ।
कशाना ना मेळ । पक्षामध्ये ॥
‘नॅनो’ पक्षाचे हे । पाच खासदार ।
तरी काका फार । ‘पवार’फुल ॥
काका जाणतात । सगळ्यांचा ‘भाव’ ।
म्हणून प्रभाव । पडे त्यांचा ॥
संजू नाचतोय । बेगान्या शादीत ।
नाव ना यादीत । ‘कांत’ म्हणे ॥
  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment