Wednesday, November 11, 2020

नै.रा.द.गो.ब्रा.राहूल गांधींचा नैतिक विजय


 उरूस, 11 नोव्हेंबर 2020 

 नैतिक राजश्री दत्त गोत्री ब्राह्मण (नैरादगोब्रा) मा. राहूल गांधी यांचा प्रचंड नैतिक विजय झाला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात 10 नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे (‘सोन्याच्या अक्षरांत लिहीवा’ असे लिहीणार होतो पण काही क्षुद्र खर्‍या विजयाने या नैतिक विजयाला डाग लावला आहे). 

नै.रा.द.गो.ब्रा. मा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वात पुरोगाम्यांनी बिहार निवडणुक आणि भारतातील इतर राज्यांतील पोट निवडणुका लढवल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे आपले नैतिक नेतृत्व राहूल गांधी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. 

बिहार मध्ये 2015 मध्ये 40 जागा लढवित 27 जागी खरा विजय तर 13 जागी नैतिक विजय त्यांनी मिळवला होता. या वर्षी 70 जागा लढवित 19 जागी खरा क्षुद्र विजय तर 51 जागी दणदणीत नैतिक विजय मिळवून आपली नैंतिक विजयाची घोडदौड पुढे चालू ठेवली आहे. पुढच्या निवडणुकांत 100 जागा लढवून 10 जागी क्षुद्र खरा विजय आणि 90 जागी लखलखीत नैतिक विजय असे ध्येय ठरवले आहे.  

खरी कसोटी तर मध्यप्रदेश मध्ये लागली होती. 2018 च्या निवडणुकांत क्षुद्र खर्‍या विजयाच्या मागे लागून तेथील कार्यकर्त्यांनी सत्ता खेचून आणली. राहूल गांधी यांनी आधी कर्नाटक आणि मग मध्यप्रदेश मध्ये जोरदार प्रयत्न करून आपल्या आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडले. खर्‍या विजयाच्या क्षुद्र मोहातून त्यांना बाहेर काढण्याचा खुप प्रयत्न केला. पण ते सर्व पापी पामर भाजपच्या सत्ता मोहात अडकून परत निवडणुका लढवून आमदार बनले. पण मध्यप्रदेशांत 28 पैकी 19 जागी दणदणीत नैतिक यश पक्षाने मिळवले. 8 जागी सत्ता मोहात कार्यकर्ते निवडुन आले ही एक खंत राहूलजींना आहेच. 

उत्तर प्रदेश (8) गुजरात (8) कर्नाटक (2) तेलंगणा (1) मणिपुर (1) या जागी मात्र राहूल गांधी यांचे नैतिक नेतृत्व पूर्ण झळाळून उठले. पक्षाला 100 % नैतिक विजय त्यांनी मिळवून दिला. भाजप सारख्या पक्षाला क्ष्ाुद्र विजयाच्या मोहात पाडून आपला पक्ष संपूर्णत: नैतिक मार्गावर नेण्याचा आपला संकल्प दृढ केला. 

राहूल गांधी यांच्या या नैतिक विजयाचे पुरोगाम्यांनी आणि भाजपनेही मोठ्या मनाने अभिनंदन केले आहे. उत्तर प्रदेशातील अखिलेश प्रमाणेच राहूल गांधी यांनी तेजस्वी यादवांना नैतिक विजयाचे महत्त्व खुप समजावून सांगितले. पण तेजस्वी ऐकतच नव्हते. बरोबर सभा करू म्हणूनही सांगितले. त्या प्रमाणे 243 जागांसाठी प्रचंड अशा 9 सभा पाच दिवसांत घेवून मोठी मेहनत घेतली. त्यानंतर नैतिक तपश्‍चर्येसाठी आपल्यासोबत ‘दूर’ चलण्याचा खुप आग्रह धरला. पण तेजस्वी अजूनही खर्‍या यशाच्या सत्तेच्या मोहात दलदलीत अडकून पडले आहेत. त्यामुळे ते बिहारात प्रचार करत राहिले. केवळ आणि केवळ राहूल गांधी यांचेच नैतिक बळ होते म्हणून सत्तेचा मोहापासून ते तेजस्वी यांना दूर ठेवू शकले. अन्यथा तेजस्वी जवळपास त्यात अडकले होतेच. 

छत्तीसगढ येथील पोटनिवडणुकीत भुपेश बघेल या मुख्यमंत्र्याने क्ष्ाुद्रपणा करून एका जागी खरा विजय मिळवत नैतिक विजयाला काळे फासले आहे. झारखंड मध्येही अशीच एक जागा जिंकून कॉंग्रेस कार्यकर्ते सत्तेच्या दलदलीत अडकले आहेत. राहूल गांधी यांनी या प्रकरणांची गांभिर्याने दखल घेतली असून पुढच्या वेळी नैतिक विजय मिळवून चूक दुरूस्त  केली जाईल असे ठरविल्याचे कळते आहे. 

एक काळ असा होता की पोटनिवडणुका सत्ताधारी हरत असत. पण राहूल गांधी यांनी आपल्या नैतिक बळाच्या ताकदीने यात बदल घडवून आणला आहे. सत्ताधार्‍यांना अजून सत्तेच्या मोहात अडकवत त्याच दलदलीत रूतून बसण्याची चाल राहूल गांधी यांनी खेळली आहे. 

राहूल गांधी यांच्या नैतिक  घोडदौडीच्या विजय मार्गात पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ हे मोठे अडथळे आहेत. कर्नाटक आणि मध्यप्रदेश प्रमाणेच राजस्थानात त्यांनी खुप प्रयत्न केले. पण सचिन पालयट हा कच्चा खेळाडू निघाला व सत्ता मोहात अडकून पडला. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या सत्ता लालसेमुळे महाराष्ट्र, झारखंड येथे महागठबंधनात रहावे लागते आहे. हा क्ष्ाुद्र सत्ता मोह जावून कार्यकर्त्यांना नैतिक विजयाचे खरे मोल कळून येईल यासाठी काय करावे लागेल? याचे चिंतन करण्यासाठी राहूल गांधी बँकॉंग थायलंड पट्टाया का आणखी कुठल्या अनोळख्या जागी तपश्चर्येला गेले असल्याचे आतल्या गोटातून सांगण्यात आले आहे. 

लोकसभेचे अधिवेशन चालू असताना देशाबाहेर जावून तपश्चर्येची आपली प्रा‘चीन’ परंपरा राहूल गांधी यांनी पाळली. तेजस्वी आणि अखिलेश यांना अजून राहूल गांधी यांच्या नैतिकतेचे महत्त्व तेवढे कळलेले नाही. पण शरद पवारांसारख्या वयोवृद्ध जाणत्या नेत्याला या नैतिक विजयाचे महत्त्व कळले आहे. उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांना वचन दिले होते. त्यांनीही बिहारात नैतिक विज़य मिळवत ते पाळले आहे. या दोघांनीही राहूल गांधी यांच्याही एक पाउल पुढे टाकले आहे. विविध आपत्तीत सर्व देश सापडलेला आहे. अशावेळी सरकारी निधी अपुरा पडतो. त्या निधील दान देण्याची नैतिकता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जपली. बिहार निवडणुकीत त्यांच्या सर्व उमेदवारांनी उदार मनाने आपली सर्व अनामत रक्कम शासनाला दिली.

राहूल गांधी यांच्या नैतिक विजयाचे कौतुक पुरोगामी रवीश कुमार, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, गिरीश कुबेर, विनोद दुआ, सबा नकवी, अरफा खानूम शेरवानी हे पत्रकार नेहमीच करत असतात. 

फक्त अडचण एकच आहे की कुमार केतकर म्हणतात तसा मोदी निवडुन येण्याचा आंतरराष्ट्रीय कट जो काही आहे तो मात्र यशस्वी होतो आहे. खरं तर आता सर्वांनी मिळून कुमार केतकरांना समजावून सांगायला पाहिजे एम.एस.ए.बी. (मोदी-संघ-अमित शहा-भाजप) यांना सत्तेच्या मोहात अडकवून टाकणे हाच खरा आपला उलटा नैतिक कट आहे. तो आपण छुपे पणाने यशस्वी करत आहोतच. तूम्ही त्यावर बोलू नका. अमेरिकेतही ट्रंप तात्यांना असेच अडकवायचे होते. पण बीडेन बापूंनी ऐकले नाही. आणि त्यांना सत्तेचा क्ष्ाुद्र मोह पडला. 

असो नैरादगोब्रा (नैतिक राजश्री दत्त गोत्री ब्राह्मण) मा. राहूल गांधी यांचे नैतिक विजयासाठी मन:पूर्वक अभिनंदन. असाच विजय त्यांना मिळत राहो. 

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

2 comments:

  1. एकदम झकास,,,
    नैतिक विजय जिंदाबाद 😂🙏

    ReplyDelete
  2. शुभ दुपार. नमस्ते, महोदय उमरीकर भाऊ. शुभ दिपावली. राहुल गांधी विषयी कटाक्ष लेख आवडला. कुमार केतकरानां चांगली तंबी दिली आहे.

    ReplyDelete