Monday, January 4, 2021

मूर्ती मालिका -२१



लाकुड नव्हे हा दगड आहे
वेरूळ लेण्यातील ३२ क्रमांकाच्या लेणीत स्तंभावरील हे नक्षीकाम नजरेस पडले आणि पाय अक्षरश: थिजलेच. पर्णयुक्त घटाचे शिल्प खुप ठिकाणी पहायला मिळते. त्यावर उत्तम नक्षीकामही केलेले असते. पूर्ण कलशास स्त्री गर्भाचे प्रतिक मानले जाते. हे मंगल प्रतिक आहे. पूर्ण कलश म्हणजेच पाण्याने भरलेला, त्यावर पर्ण आणि या कलशास हार, रत्नांच्या माळांनी शृंगारलेले असते.

वेरूळच्या या स्तंभावर प्राचीन मांगल्य संकल्पना प्रमाणे शिल्पांकन आहेच. पण मुख्य म्हणजे शिल्पकाराने कलाविष्कारासाठी स्वातंत्र्य घेत ज्या अप्रतिम पद्धतीने बारकावे कोरले आहेत ते थक्क करणारे आहेत. कलशाच्या मुखातून खाली लोंबलेली पाने आणि त्यांना समतोल करण्यासाठी सोन्याचा मोत्याचा गोफ अशा माळा बघत रहाव्यात अशा आहेत.

कलशावर पण नक्षी कोरलेली आहे. हे सगळं एका अखंड स्तंभाचा भाग आहे. सगळं दालनच एका दगडात कोरलेलं. चुकीला जागाच नाही. मंदिराच्या उभारणीत तरी एखादा दगड शिल्पकामात डावा वाटला तर बाजूला काढता येतो. लेणीत म्हणजेच लयन स्थापत्यात चुकीला जागाच नाही. हे लक्षात घेतलं म्हणजे या कामाचे मोल कळते. कलशाच्या चारही बाजूला खाली यक्ष किन्नरही कोरलेले आहेत. वेरूळचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यता. पण कुठेही बोजडपणा नाही. कवेत येणार नाहीत असे रूंद आणि उंच खांबही विलक्षण सुंदर आहेत. कलात्मक दृष्ट्या नाजूक कलाकुसरीने मढलेले आहेत.
या लेण्यांच्या शिल्पकलेने वेडे होवून परत परत भेट देणार्यांची संख्या प्रचंड आहे. वेरूळ अजिंठ्याचा नाद लागला की माणूस "आषाढी कार्तिकी" वार्या करत राहतो.
Vincent Pasmo
हा आमचा वेडावलेला फ्रेंच मित्र वर्षातून किमान एकदा तरी वेरूळची वारी करतोच. काही परदेशी पर्यटक तर तिथेच मुक्काम ठोकुन असतात. भारतीय भावा बहिणींना हात जोडून विनंती तूम्ही कैलास लेण्याशिवाय बाकीच्या सुंदर लेण्यांना किमान एकदा भेट द्या. शांतपणे लेण्या बघा. कुठून कुठे जाताना रस्त्यात वेरूळ लागलं म्हणून वचावचा पाहून पळून जावू नका.

छायाचित्र
Travel Baba Voyage




विष्णुचे शक्तीरूप - शांती

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्तीरूपे विशेष आहेत. मुर्तीशास्त्र अभ्यासकांत या मंदिराची ओळखच त्यामुळे आहे. या पूर्वी या सदरांत काही शक्तीरूपांचा परिचय दिला होता. सोबतच्या छायाचित्रात जे शक्तीरूप आहे त्याच्या हातातील आयुधांचा क्रम उजव्या खालच्या हातात चक्र, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात पद्म आणि डाव्या खालच्या हातात गदा असा आहे. अशा विष्णुला मधुसूदन संबोधले जाते. मधुसूदन विष्णुच्या या शक्तीरूपाला शांती म्हणतात. (देगलुरकरांच्या पुस्तकांत santi असे लिहिले आहे. सांती असाही याचा उच्चार होतो. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा)

शास्त्राप्रमाणे मुर्ती कोरल्यावर शिल्पकाराने पुढे जावून जो कलाविष्कार घडवला आहे तो विलक्षण आहे. चक्र असलेला हात आणि गदेवरचा हात यात नृत्याची मुद्रा वाटावी असा समतोल आहे. शंख व पद्म धारण केलेल्या हातांची बोटे विलक्षण कलात्मक अशी वळवलेली आहेत. दोन्ही पाय दूमडलेले वक्राकार आहेत. डाव्या पायाचा तळवा संपूर्ण मुडपून समोरच्या बाजूला दिसतो आहे. गदाही सरळ नसून तिरपी आहे. कानातील कुंडले चक्राच्या आकाराची आहेत. गळ्यात एक हार मानेजवळ तर दूसरा दोन वक्षांच्या मधुन कलात्मकरित्या खाली ओघळला आहे. ठाम सरळ रेषा शिल्पात कुठेच नाही. अगदी बाजूच्या नक्षीतही नाही. मुर्तीच्या बाजूचे दोन उभे भक्कम स्तंभ जन्म आणि मृत्युचे प्रतिक मानले तर बाकी सगळ्याच शिल्पात लालित्य भरून राहिले आहे. कदाचित जन्म आणि मृत्यु या दोन बिंदूमध्य लालित्यपूर्ण आयुष्य जगले तर "शांती" लाभते असंही शिल्पकाराला सुचवायचे असेल.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



भैरव मूर्ती - वालूर
वालूर (ता. सेलू जि. परभणी) येथे वाल्मिकेश्वर मंदिर आहे. मंदिर आता नव्याने बांधलेले आहे पण हा परिसर प्राचीन अवशेषांनी भरलेला आहे. शेषशायी विष्णु, हात जोडलेला गरूड, आसनस्थ शिव पार्वती, विष्णुच्या हातातील चक्र, रिद्धी सिद्धीसह गणेश असे कैक अवशेष या परिसरात विखुरलेले मंदिरा समोरच्या वडा खाली आढळून येतात. एक प्राचीन बारव आहे जी आता जवळपास बुजली आहे.

मंदिराच्या भिंतीला टेकून ही भैरवाची मूर्ती ठेवलेली आहे. याच्या वरच्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू आहे. डोक्यावरचे केस मुंड माळेने बांधलेले आहेत. मस्तकामागे ज्वालेप्रमाणे गोलाकार प्रभा मंडळ आहे. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात नरमुंड आहे. डाव्या बाजूला खाली या नरमुंडातून टपकणारे रक्त चाटणारा कुत्रा आहे. नग्न भैरवाच्या कमरेला साखळी असून मांड्यांवर घंटा लोंबत आहेत. डाव्या बाजूला गण आहे. उजव्या बाजूस भुतनाथ आहे. गुडघ्यावरून खाली मुंडमाला लोंबते आहेत.

ललित मुद्रेत भैरव उभा आहे. एरव्ही उग्र दाखवला जाणारा हा भैरव इथ शांत चेहर्याचा दाखवलेला आहे.
या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

No comments:

Post a Comment