Tuesday, September 8, 2020

नीमा तेन्जिंग : भारतासाठी शहिद झालेला तिबेटी !


उरूस, 8 सप्टेंबर 2020 

 लेह-लदाख मध्ये चीनची लष्करी धुसफुस चालूच आहे. 29 ऑगस्टच्या रात्री पेन्गॉंग त्से तळ्याजवळ मोठी चकमक उडाली. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला पिटाळून लावले. यात तिबेटी सैनिकांच्या एस.एफ.एफ. (स्पेशल फ्रंटियर फोर्स) तुकडीने मोठी कमाल केली. या तुकडीचा अधिकारी नीमा तेन्जिंग याचा पाय चीनने पेरलेल्या भूसुरूंगावर पडला. त्यावेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात हा तिबेटी अधिकारी भयानक जखमी झाला. आठ दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिल्यानंतर शनिवारी उपचार चालू असताना त्याचे निधन झाले. 

नीमा यांचा अंत्यविधी संपूर्ण शासकिय इतमामात लेहमध्ये करण्यात आला. यावेळी हजारो तिबेटी निर्वासित तिथे गोळा झाले होते. शोकाकुल अवस्थेत त्यांनी आपल्या या वीराला अखेरचा निरोप दिला. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या.

तिबेटी सैनिक भारतासाठी कसे काय लढत आहेत? असा प्रश्‍न कुणाही भारतीयाला पडू शकतो. चीनने जबरदस्ती तिबेटवर ताबा मिळवल्यावर तिबेटींचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह भारताता आश्रय मागितला. या सर्व शरणागतांना आपण हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे राहण्यास जागा दिली. दलाई लामांसोबत त्यांचे असंख्य तिबेटी अनुयायी तेंव्हा भारतात आले. आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याची त्यांनी शपथ घेतली. महात्मा गौतम बुद्धाच्या वास्तव्याने पावन झालेली भारत भूमी त्यांच्यासाठी अतीव श्रद्धेचा विषय आहे. आपल्याला आश्रय देणार्‍या आणि आपल्यासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या या भारतमातेसाठी हे तिबेटी अगदी जीवही द्यायला तयार आहेत. नीमा तेन्जिंग यांच्या वीर मरणाने हे परत एकदा सिद्ध केले आहे. 

1971 च्या बांग्लादेश युद्धाच्यावेळेस आणि 1999 च्या कारगीलच्या युद्धाच्या वेळेसे या सैनिकांनी आपले शौर्य दाखवले होते. आताही आघाडीवर जावून ते संघर्ष करत आहेत. 

नीमा यांच्या वीर मरणाने भारतात राहून चीनचे गोडवे गाणार्‍यांच्या तोंडावर चांगलीच चपराक दिली आहे. तिबेटी निर्वासित सैन्यात भरती होवून भारतासाठी कडवा संघर्ष करत आहेत. हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात लढत आहेत. आणि हे भारतात सुरक्षीत राहून नागरि स्वातंत्र्याचे सगळे फायदे उपटून चीनचे गोडवे गात आहेत. 

हिमालयाच्या बर्फाळ डोंगररांगांत विरळ हवेत मुळात वावरणेच मुश्किल. त्यात युद्ध करणे तर अजूनच कठिण. चीनी सैनिकांसमोर हीच मोठी अडचण आहे. भारतीय सैन्यात लेह लदाखचे निवासी, गुरखा आणि तिबेटी असे अतिशय काटक कष्टाळू आणि  या वातावरणाला सरावलेल्या लोकांची मोठी भरती आहे. यांना तोंड देता देता चिनी सैनिकांच्या नाकीनऊ येत आहेत. आत्तापर्यंत युद्धाच्या नुसत्या धमक्या देवून भागत होते. या भागात जसे चीनने मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं केली. पुल बांधले. हेलीपॅड तयार केले. तसे भारताने फारसे केले नव्हते. तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी लोकसभेत 2013 मध्ये सीमेवर रस्ते न बांधण्याचे आपले धोरणच असल्याचे जाहिर केले होते. 

पण गेल्या काही वर्षांत विशेषत: मोदी सरकारच्या कारकिर्दीत या धोरणात मोठे बदल करण्यात आले. सीमेवर फार मोठ्या प्रमाणावर रस्ते पुल धावपट्ट्या हेलीपॅड यांची कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे सैन्याची वाहतूक, शस्त्रांची वाहतूक आधीपेक्षा सुकर झाली आहे. आणि या जोडीला आहे तो तिबेटी गुरखा सैनिकांचा चिवटपणा त्यांचा अदम्य असा उत्साह त्यांची अखंड लढाऊ उर्जा. शिवाय पाठीशी दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांचा संपूर्ण पाठिंबा.  चीनविरोधी हे असे  ‘डेडली कॉम्बीनेशन’ पूर्वी कधी जूळून आले नव्हते. 

आश्चर्य म्हणजे या नीमा तेन्जिंग यांच्याबद्दल बोलायला भारतातील डावी माध्यमं तयार नाहीत. आपण चालवत असलेल्या खोट्या विचारसरणीचा धडधडीत पराभव होताना दिसत आहे. मग ते कशाला तोंडातून ब्र काढतील.

भाजप नेते राम माधव हे नीमा यांच्या अंत्यविधीला हजर राहिले होते. त्यांनी त्या संदर्भात एक ट्विटही केले. पण नंतर लगेच हे ट्विट काढून टाकण्यात आले. कदाचित राजकीय धोरणाचा भाग म्हणून ही खेळी खेळली गेली असावी. पण यातून एक खणखणीत संदेश चीनला दिला गेला आहे. तिबेटचा प्रश्‍न चीनसाठी ‘गलेकी हड्डी’ बनला आहे. शेकडो वर्षे ज्यू आपल्या मायभूमीसाठी लढत राहिले. आणि शेवटी त्यांनी आपली मायभूमी स्वतंत्र करून दाखवली. याच धर्तीवर आता तिबेटी आपल्या मायभुमीसाठी लढत आहेत. भारताचा यासाठी नेहमीच नैतिक पाठिंबा राहिलेला आहे. 

पण आधीच्या सरकारांनी नेहमीच तिबेटबाबत बोटचेपे धोरण अवलंबिले. एकीकडून दलाई लामांना आसरा देणे आणि दुसरीकडून चीनने डोळे वटारताच शांत बसणे असला भारताचा विचित्रपणा जगाने पाहिला. पण आता चीनविरोधी एक कणखर असे धोरण आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती समोर येते आहे. 

पहिल्यांदाच चीनची भयंकर अशी कोंडी या विषयावर झाली आहे. कश्मीरचा अक्साई प्रदेश चीनने बळकावला होता त्यावर दादागिरी करणे हेच आत्तापर्यंत चीनला सोयीचे होते. पण आता प्रत्यक्ष चीनच्या तिबेटमधील जनता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. भारतात राहणारे तिबेटी प्रत्यक्ष रणांगणावर आपल्याच विरोधात समोर पाहून चीनी सैन्याची पाचावर धारण बसली आहे. केवळ शत्रूशी लढाई एक वेळ ठीक होती. पण आपलेचे नागरिक आपल्याच विरोधात असल्यावर करायचे काय? हा पेच आहे. 

दुसरीकडे तैवान मधील वातावरण पेटले आहे. नुकतेच चीनचे एक लढाउ विमान तैवानने पाडले. हॉंगकॉंग प्रश्‍नी तेथील चीनी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.  दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन आरमार उतरले आहे. रशियन सीमेवर वाद नहेमीच चालू असतो. गलवान खोर्‍यातील चकमकीनंतर रशियाने उघडपणे भारताची बाजू घेतली आहे. कोरोना महामारीमुळे आपले प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तेंव्हा त्याची भरपाई चीनने द्यावी असे दावे जर्मनी इटली फ्रांस या युरोपीय देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लावले आहेत. 

त्यामुळे चीन सर्वच बाजूंनी घेरल्या गेला आहे. तिबेटी सैनिकांनी चीनविरूद्ध एल्गार पुकारून शेवटचा घाव घालण्याचे काम केले आहे. चुकून माकून चीनने युद्धाचा निर्णय घेतलाच तर तिबेटी सैनिक भारताच्या बाजूने प्रचंड त्वेषाने लढतील आणि या निमित्ताने आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याची स्वप्न पुर्ण करतील याची शक्यता जास्त आहे.  याच धामधुमीत तैवान, हॉंगकॉंगही आपले स्वातंत्र्य प्राप्त करतील. हीच चीनला भिती आहे.  

भारतासाठी लढलेल्या नीमा तेन्जिंग या तिबेटी वीरला यांना विनम्र श्रद्धांजली. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

No comments:

Post a Comment