Sunday, August 23, 2020

जयदेव जयदेव (डोळे) (द्वेष)आरती ओवाळू !


उरूस, 23 ऑगस्ट 2020 

 जयदेव डोळे हे सातत्याने भाजप संघ विरूद्ध गरळ ओकत असतात. त्यावर मी जेंव्हा जेंव्हा लिहीले त्यावर एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने मलाच उलट प्रश्‍न केला, ‘आम्ही त्यांच्या संघद्वेषाने पछाडलेल्या लिखाणाची दखलही घेत नाही. तूम्ही कशाला लिहीता?’. स्वत: जयदेव डोळे आणि ज्यांच्यासाठी ते लिहीतात त्या पुरोगाम्यांनाही काही सांगण्यात अर्थ नाही. कारण त्यांना समजून घ्यायचेच नाही. शिवाय हे ते मूद्दामच करत आहेत. तेंव्हा माझा हेतू केवळ तटस्थ असे जे वाचक आहेत त्यांच्या समोर वस्तुस्थिती ठेवण्याचा आहे.

मेघा मुजूमदार या मूळच्या बंगाली आणि आता अमेरिकेत असलेल्या लेखिकेची ‘अ बर्निंग’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशीत झाली आहे. तिच्यावर लिहीताना जयदेव डोळे यांनी परत आपल्या संघ भाजप द्वेषाची आरती ओवाळली आहे. (‘अ बर्निंग : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका, अक्षरनामा पोर्टल, दिनांक 22 ऑगस्ट 2020) खरं तर यातील संघ भाजप विरोधाचा मुद्दा बाजूला ठेवूत. कारण मग माझ्यावर पुरोगामी ‘चड्डीवाला’ म्हणून शिक्का मारायला ते मोकळे होतील. आणि विषय दूसरीकडे भरकटेल.

या कादंबरीची जी नायिका आहे तिचे नाव ‘जीवन’ असे आहे. मग डोळे शिर्षकात ‘मुस्लिम तरूणी’ असा उल्लेख कशाच्या आधारावर करतात? 

जो प्रसंग प्रत्यक्ष कादंबरीतील डोळे यांनी आपल्या लेखात सांगितला आहे तो असा,  एक बाई त्वेषाने सागत आहे ‘ रेल्वे स्थानकापाशीच एक जीपभर पोलीस होते. त्यांना विचारा की माझा नवरा जळत असताना ते तसेच उभे का होते? तो डब्याचे दार उघडू पहात होतो. आमची मुलगी वाचू पाहता होता. तो खूप झटला.’

आता या प्रसंगातून डोळे यांना काय सुचवायचे आहे? मुळात गोध्रा प्रकरणात आधी जो रेल्वेचा डबा जाळला गेला तो कुणी जाळला? आणि जे जळाले ते कोण होते? मुसलमानांनी आयेध्येहून परतणार्‍या हिंदूं कारसेवकांना जिवंत जाळले असा तो प्रसंग आहे. मग हा मुस्लिम विरोधी कसा काय? आणि ती बाई जी त्वेषाने बोलत आहे त्यावरून पोलिस हिंदूंना मरू देत होते, जळू देत होते असा अर्थ निघतो. 

मग जर पोलिस व्यवस्था हिंदूंना मारत होती तर मग  पोलिस प्रशासन मुख्यमंत्री मुस्लिम विरोधी होते असा निष्कर्ष कसा काय निघतो?

बरं स्वत: डोळे यांनीच आपल्या लेखात असं लिहीलं आहे, ‘... वाचक सारे काही जाणतात असे गृहीत धरून लेखिका पक्ष, संघटना, धर्म असे कोणलाही थेट समोर  आणत नाही. पण वाचक समजतो. मुस्लीम नागरिक किती असहाय व उपेक्षित होऊन गेलाय हे मात्र लेखिका जाणीवपूर्वक ठसवते.’

जर कुठला धर्म पक्ष संघटना नावानिशी समोर येत नाही मग डोळे असा दावा का करतात की हे सगळे मुस्लिम विरोधी आहे? लेखिकेने नेमका कुठे तसा उल्लेख केला आहे? कोणता प्रसंग आहे की ज्यातून धर्म स्पष्ट व्हावा?

या कादंबरीवर लिहीत असताना डोळे सुरवातीलाच असे लिहून जातात, ‘फेसबुकचा भाजपने कसा वापर केला, त्याच्या बातमीने या कंपनीला आता आपला ‘फेस’ मास्कमध्ये लपवावा लागतोय. कितीही खुलासे केले तरी केलेले गैरकृत्य सार्थ ठरवता येईनासे झालेय. भाजपच्या नादी जो जो जागला, त्याचा कारभार आटोपलाय. कोणी खालसा झाले, तर कोणी बेईज्जत! पण फेसबुकवरची एक पोस्ट थेट फासावर नेऊन जीव घेते. ती कहाणी त्या बातमीच्या आशयाची जवळपास पुष्टी करते. म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष व संघटना फेसबुकवरच्या एका बेसावध अजाणत्या प्रतिक्रियेचा वापर करून कसा डाव साधतात, त्याची ही कहाणी आहे.’

एका फेसबुक पोस्टमुळे थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाते असे भारतात 2014 नंतर कधी घडले आहे? डोळे हा आरोप कशाच्या आधारावर करतात? उलट याकुब मेमन याची फाशी टळावी म्हणून रात्री 2 वाजता न्यायालयाचे दरवाजे भारतात उघडले गेले आहेत. कसाबवर खटला दाखल करून संपूर्ण कारवाई लोकशाही पद्धतीनं कायद्याप्रमाणे होउन फाशी सुनावल्या गेली आहे. भाजपवर आरोप करताना डोळे काय म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेवर शिंतोडे उडवत आहेत?

बरं जो संदर्भ डोळे देत आहेत तो आत्ताचा सोशल मिडियाचा वापर भाजप आपल्यासोयीने करत आहे. हा सोशल मिडिया भाजपच्या कह्यात आहे. आणि कादंबरी गुजरात दंग्यांच्या काळातील आहे. 2003 मध्ये सोशल मिडियाचा वापर कसा आणि किती केला जात होता? 

शिवाय 2002 मध्ये मुळातच सोशल मिडिया भारतात इतका सर्वव्यापी होता का? डोळे कशाचा संदर्भ कशाचीही का जोडत आहेत? आज फेसबुकचे 34 कोटी वापरकर्ते आहेत. तेंव्हा किती होते? मुळात फेसबुकच त्या काळात होते का? ज्या फेसबुकची सुरवात 2004 मध्ये झाली त्याचा वापर 2002 च्या गुजरात दंग्यांच्या काळात प्रभावीपणे मुस्लिमविरोधासाठी केला गेला हा डोळे यांचा शोध कोणत्या पातळीवरचा आहे?   

डोळेंना गुजरात दंगल जिवंत ठेवायची आहे का? राम मंदिर प्रकरणी निकाल आल्यानंतर आणि आता राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यानंतर परत एकदा जून्या सगळ्या आठवणी काढून दोन समाजात तेढ निर्माण करावयाची आहे का? आणि तेही परत कसलाही आधार नसताना. एका कादंबरीतील काल्पनिक पात्राचा आधार घेवून?

मेघा मुजूमदार यांना काय म्हणायचे आहे, त्यांनी कादंबरीत काय मांडलंय हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्याचा आधार घेवून जयदेव डोळे विनाकारण तेढ निर्माण करत आहेत हे गंभीर आहे. ही एक प्रकारची विकृतीच आता पुरोगाम्यांमध्ये वाढत चालली आहे. हे आक्षेपार्ह आहे कारण याने समाजात अस्वस्थता निर्माण होवू शकते. 

या प्रकारच्या लिखाणासाठी अशा लेखकांना देशहित लक्षात घेवून सामान्य नागरिक म्हणून आपण जाब विचारला  पाहिजे. 

 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


4 comments:

  1. ताथाकथित समाजवादि व डावे आता खरच काल व समाज बाह्य झाले आहेत!यांचे लेख साहित्य छापणारे संंपादक तरि वाचत असतिल का?

    ReplyDelete
  2. ही याची जनुकीय खोडी आहे. यांचे पिताश्री ना य डोळे देखील समाजवादी आणि सतत हिंदुद्वेषी लिखाण करायचे. अतिशय भंपक लोक आहेत हे.

    ReplyDelete
  3. चांगली चिरफाड केली आहे.
    ढोंगी पुरोगाम्यांना आता कोणीही विचारत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. नाव डोळे पण हिंदू द्वेषाने आंधळे.ही व्यक्ती विद्यापीठात शिकवत होती हे खरे दुर्दैव.

      Delete