Monday, August 10, 2020

ऐतिहासिक स्थळांबाबत अनास्थेचा रोग !


उरूस, 10 ऑगस्ट 2020 

 औरंगाबाद परिसरांतील एका पुरातन बारवेचा फोटो काल फेसबुकवर टाकला. हे ठिक़ाण कोणते ओळखा? असा प्रश्‍न विचारला. शंभर जणांनी तो फोटोला लाईक केले, 16 जणांनी कॉमेंट केल्या. पण कुणालाच ती जागा ओळखता आली नाही. केवळ दोन जणांना नेमके त्याच दिवशी तेही आमच्या मागेपुढे तिथे गेले होते म्हणून ओळखता आले. 

एखादी जागा परिचित नाही हे पण एकवेळ आपण समजू शकतो. पण सोबत दुसरा एक अनुभव फार खंत वाटावी असा होता. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मागच्या बाजूला एक मजबुत दगडी महाल आहे. त्या ठिकाणाची दुरवस्था पाहून मन हेलावून गेले. त्यामुळे ऐतिहासिक वास्तुंबाबत काही एक अनास्थेचा रोग आपल्याला जडला आहे की काय असे वाटायला लागले. वर्षाच्या सुरवातीलाच चारठाण गावात एक ‘हेरिटेज वॉक’ आम्ही  डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी आणि डॉ. प्रभाकर देव यांच्या उपस्थितीत व त्या परिसराचे अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केला होता. त्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यात देगलुर जवळ होट्टल येथे होट्टल महोत्सवा निमित्त जाणं झालं होतं. तेंव्हाही तिथे असल्या मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराची अवस्था पाहून मन हेलावले. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे इंटॅकने तिथे चालू केलेले काम प्रा. डॉ. सुरेश जोंधळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. 

औरंगाबाद पासून दौलताबाद कडे जाताना देवगिरी किल्ल्यासाठी वळताना अगदी अलिकडेच मुख्य रस्ता सोडून डावीकडे एक वाट कमनीतून गावात शिरते. त्या वाटेने  केसापुरी रस्त्याला पुढे जाताना फतियाबाद नावाचे एक छोटे गाव लागते. या गावाच्या पाटीपाशीच मुख्य रस्त्यापासून जेमतेम 200 मिटर अंतरावर शेतात वर छायाचित्र दाखवले आहे ती दगडी बारव आहे. या बारवेला ‘खुफिया बावडी’ असे म्हणतात. डॉ.दुलारी गुप्ते कुरेशी यांच्या ‘दौलताबाद फोर्ट’ या इंग्रजी पुस्तकात हीचा उल्लेख आहे. त्या भागात बोली भाषेत या बारवेला ‘चोर बावडी’ असे म्हणतात. हीची रचना संपूर्णपणे जमिनीच्या आतच असल्याने हीचे कसलेच अस्तित्व दुरून ओळखू येत नाही. दगडी पायर्‍या उतरून आत उतरतो तेंव्हा पाताळात उतरतो आहोत असेच भासते. अर्ध्या पायर्‍यांवर आल्यावर दोन्ही बाजूच्या ओवर्‍यांवर कडे जाणार्‍या दोन दिशांच्या पायर्‍या लागतात. आणि मुख्य पायर्‍या खाली पाण्याकडे उतरत जातात. बारवेच्या तिन्ही बाजूला तीन कमानींच्या भक्कम सुंदर ओवर्‍या आहेत. पाण्यात उतरणार्‍या पायर्‍यांच्या विरूद्ध दिशेला ज्या तिन ओवर्‍या आहेत त्या कमानी बाकी दोन पेक्षा जास्त मोठ्या आहेत. त्यामुळे त्या भागात कमानंींचा एक टुमदार छोटा महालच तयार झाला आहे. 

बारवेचे सगळे बांधकाम भक्कम आहे. भरपूर पाण्याने ही बारव भरलेली आहे. बारवेच्या काठावर सुगरणीचे सुंदर खोपे आहेत. आम्ही जेंव्हा ही बारव पाहण्यास गेलो होतो, (रविवार 9 ऑगस्ट 2020) तेंव्हा सुगरण पक्षाचा  गोड किलबिलाट विहीरीत भरून राहिला होता. (फोटो .सौजन्य:आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किलीनी) खुफिया बावडी ही जागा सोमनाथ मुळे आणि स्वप्नील चक्रे यांच्यामुळे आमच्या दृष्टीपथात आली.   

केसापुरी रस्त्याला लागताना सुरवातील देवगिरी किल्ल्याची मजबुत तटबंदी आणि भक्कम दरवाजा ओलांडला की डाव्या बाजूला दोन जून्या इमारती व संरक्षक भिंतीची रस्त्याकडेची बाजू दिसायला लागते. 

यातील एक इमारत म्हणजे हाथीमहाल. म्हणजेच हत्ती बांधायची जागा. ही इमारत संपूर्ण मजबूत अवस्थेत आजही उभी आहे. रस्त्याच्या बाजूने तिची भक्कम दगडी भिंत दिसते. त्यात भरीव अशा तीन कमानी दिसतात. आतल्या बाजूला इमारतीचे भव्य प्रवेशद्वार आहे. हा भाग झाडींनी संपूर्ण वेढलेला आहे. अगदी दरवाज्या समोरही दाट झाडी आहे. आत शिरायचा प्रयत्न केला तर काटे ओरबाडून घेत जावू लागते. आत भव्य अशी रूंदीच्या तिप्पट लांबी असलेला महाल आहे. हत्ती बांधता याव्यात अशा लोखंडी कड्या भिंतीत आहेत. जमिनला फरशी केलेली नाही. एरव्ही अशा मोठ्या भक्कम इमारतींना उंचावरचे जोते आणि जमिनीला घडीव दगडाची फरसबंदी असतेच. इमारतीच्या पूर्वेकडच्या भिंतीतून गच्चीवर जाण्यासाठी भक्कम दगडी जिना आहे. महालाच्या पश्चिमेला मोठी कमानेदार खिडकी किंवा छोटा दरवाजाच शोभावा अशी रचना आहे. (हाती महालाचा फोटो सोबतच आहे.)

याच हाथी महालाच्या पूर्वेला काटकोनात मुसाफिरखाना किंवा रंगमहाल नावाची वास्तु उभी आहे. तिच्या पहिल्या मजल्याची संपूर्ण पडझड झालेली आहे. पण तळमजला मात्र भक्कम आहे. तळमजल्याला केवळ दोनच दरवाजे आहेत. आणि तेही छोटे. तेंव्हा हा भाग धान्य साठवणुकीसाठी, स्वयंपाकघरासाठी, नौकरांच्या राहण्यासाठी असावा. 

हाथी महाल, रंगमहाल हा सगळा परिसर बेवारश्यासारखा आहे. मोकाट जनावरांचा वावर, बेफाम वाढलेल्या जंगली काटेरी वनस्पती, वटवाघळांनी केलेली घाण, गायी म्हशींच्या शेणांनी इमारतींत झालेली दलदल, चिखल पाहून मन सुन्न होते. या महत्त्वाच्या वास्तुंची डागडुजी आपण जेंव्हा करू तेंव्हा करू. पण जागेची किमान साफसफाई, तारांचे संरक्षक कुंपण, देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एखाद्या कर्मचार्‍यांची नेमणुक या साध्या गोष्टी का केल्या जात नाहीत? 

15 ऑगस्टला आपण 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देवगिरीचा पराभव झाला आणि आपल्या देशावर परकियांचे हल्ले सुरू झाले. आणि तेथपासून पराभवाची एक मालिकाच  सुरू झाली. 15 ऑगस्टला आपण निर्णायकरित्या  स्वांतत्र्य मिळवले. आपल्या पराभवाची देवगिरी ही खुण होती जी आपण 15 ऑगस्टला बदलून टाकली. मग या परिसरांत किमान साफसफाई आणि सौंदर्यदृष्ट्या काही एक रचना बाग बगीचा करण्याचे आपल्याला 15 ऑगस्टच्या निमित्ताने का सुचत नाही? 

याच परिसरांत पुढे केसापुर तांडा या गावाजवळ सुंदर असा धबधबा आहे. निसर्ग संपन्न, ऐतिहासिक महत्त्व असलेला हा सगळा परिसर पाहण्यासारखा आहे. 

शासकीय पातळीवर जे काही करता येण्यासारखे आहे त्यासाठी आपण दबाव निर्माण केला पाहिजे. पण त्या सोबतच आधी स्थानिक पातळीवरील पर्यटन प्रेमी, इतिहास प्रेमी, निसर्ग प्रेमी यांनी एकत्र येवून जनजागृती केली पाहिजे. स्थानिक प्रशासनाला विनंती करून किमान सोयी साफसुफ येणार्‍या पर्यटकांसाठी चहा नाश्ता याची सोय कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. महिलांसाठी स्वच्छतागृहे फार आवश्यक आहेत. स्थानिक लोकांना आम्ही बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी सगळे सहकार्य देण्याची तयारी दर्शवली. व्हिन्सेंट हा आमचा फ्रेंच मित्र अश्या फारश्या परिचित नसलेल्या ठिकाणाबाबत सदैव उत्सुक असतो. त्याचा उत्साह बघून मला स्वतःलाच लाज वाटत राहते. कारण त्यामानाने आपण आपल्याच अश्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारश्याबाबत जागरूक नसतो. 

15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूची जी ऐतिहासिक स्थळे असतील त्यांची किमान माहिती घेवू. तिथे भेटी देवू. सगळ्यांनी मिळून कोरोना सोबतच ऐतिहिासिक स्थळांबाबतची ‘अनास्था’ या संसर्गजन्य रोगाच्या निवारणासाठी काम करण्याची शपथ घेवू.     

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


4 comments:

  1. इतिहासाच्या साक्षीदारांची ही विपन्नावस्था पाहून इतिहासप्रेमींना नक्कीच दु:ख होईल.
    इतिहासाच्या या अवशेषांचे जतन व्हायला हवे.
    छान माहिती 👌🙏

    ReplyDelete
  2. माहिती वाचून खुप छान वाटले छान वाटले सर...

    ReplyDelete
  3. Kon parkiye hote? Konacha parabhav jhala... Itka vakya zara awadla nahi... Devgiri parabhut jhala mhanun Akhand Bharatacha nirman jhala... Khilji la ya baddal hazar salam... Dilli saltanat parkiye nahoti.... Baqui sampurn nibandh changla aahe sir... Thank u for sharing...

    ReplyDelete
  4. खुप छान माहिती मिळाली

    ReplyDelete