Thursday, July 30, 2020

‘उसवलेले दिवस’- बाबा आमटेंवर काही प्रश्‍न


उरूस, 30 जूलै 2020

दैनिक लोकसत्तामधून बाबा आमटेंच्या आनंदवनवर दोन भागाची लेखमाला प्रसिद्ध झाली. त्यावर आता बर्‍याच प्रतिक्रिया उमटत आहेत. परत एकदा सामाजिक चळवळींची चिकित्सा केली जात आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी अंतर्नादच्या दिवाळी अंकात, ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ हा लेख (अंतर्नाद दिवाळी 1999) लिहीला होता. त्यावरही तेंव्हा बरेच वादंग उठले होते.

यातले दोन उल्लेख इथे नमुनादाखल देतो आहे. शरद जोशी लिहीतात, ‘.. दुसर्‍याचा उद्धार करणयातली झिंग ही काही और असते. बर्‍याच स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांमध्ये मला एक आत्मकौतुकी भावना आढळते. स्वत:वरच ते कमालीचे खूश असतात. वरवर जरी त्यांनी आपण हे सर्व इतरांसाठी करतो असा आव आणला तरी प्रत्यक्षात मात्र आपल्या तोजोवलयात इतरांना सामील करून घ्यायची त्यांची अजीबात तयारी नसते. सामाजिहितापेक्षा आपल्या संस्थेची महती, प्रॉपर्टी व एकूण स्थान कसे उंचावेल याच्यावरतीच त्यांचे जास्त लक्ष असते. तुम्ही त्यांच्या विविध संस्थांची ट्रस्ट डिड एकवार बघा. यातल्या बहुतेक जणांनी विश्‍वस्त म्हणून आपणच तहहयात राहू याची तजवीज करून ठेवलेली असते. बाहेर यांनी लोकशाही मुल्यांचा कितीही गवगवा केला तरी स्वत:च्या संस्था मात्र ते ‘हम करे सो कायदा’ याच भूमिकेतून चालवीत असतात.’ (अंगारमळा, पृ. 167, प्रकाशक-जनशक्ती वाचक चळवळ)

शरद जोशींनी यांचे हे विचार इतर सामाजिक चळवळींना लागू पडतात. पण प्रत्यक्षात कुष्ठरोग निर्मुलनाला साठी लिहीलेले बघा, ‘,,, एकेकाळी कुष्ठरोग ही एक महाभयंकर समस्या होती. महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले. त्यातून अनेकांनी स्फुर्ती घेली. आपापले आश्रम, नगरे, वन स्थापली. उदंड सरकारी आणि खाजगी निधी मिळवले. पण कुष्ठरोग मुळातून नष्ट करण्यासाठी लागणारे संशोधनाचे कार्य कोणी हाती घेतले नाही. कोण्या अनामिक संशोकाने ते केले, त्यामुळे कुष्ठरोग आता साध्य बनला. त्याची किळसही फारशी राहिली नाही; पण तरी त्यांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या महात्म्यांच्या धुपारत्या शेजारत्या चालूच आहेत. कुष्ठरोग संपला तर दुसर्‍या कोणाच्या सेवेचे काम घेऊ. कोणा दुष्टाने हा कुष्ठरोग संपवला कोण जाणे. पण त्यामुळे आमच्या विभुतीतील ‘ज्वाला आणि फुले’ संपली नाहीत, असा त्यांचा निर्धार आहे.’ (अंगारमळा, पृ. 175) 

शाहू पाटोळे हे तरूणपणी बाबा आमटेंच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी शाहू पाटोळे यांचे वय 23 वर्षाचे होते. (शाहू पाटोळे सध्या नागालँड मध्ये कोहिमा आकाशवाणीच्या वृत्त विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकतीच मुंबई दूरदर्शन येथे त्यांची बदली झाली आहे)

भारत जोडो यात्रेच्या काळात त्यांना समाजवादी चळवळीबद्दल प्रश्‍न पडायला लागले. त्याची मर्यादा जाणवायला लागली. त्यांनी हे प्रश्‍न समोर मांडले तर त्यांना हळू हळू बेदखल करण्यात आले. नंतर तर त्यांना या संपूर्ण चळवळीतूनच बाहेरचा रस्ता दाखवला गेला. दुसर्‍या यात्रेत त्यांना सहभागी करून घेण्यात आले नाही.

या चळवळीबद्दल त्यांनी तेंव्हाही लेखन केले होते. लातूरच्या दै. राजधर्म शिवाय कुणीच त्यांचे हे परखड लिखाण छापले नाही. ‘जयकारा’ या पंजाबी साप्ताहिकानं, मराठी ब्लिट्झने, कोलकोत्याहून प्रकाशीत होणार्‍या हिदंीतील ‘रविवार’ या साप्ताहिकाने शाहू पाटोळे यांचे लेख तेंव्हा प्रकाशीत केले.

शाहू पाटोळे यांची तेंव्हाची भारत जोडो आंदोलनाची डायरी समाजवादी चळवळीत जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली. हीची दूसरी प्रत डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडे होती. त्यांचा मुलगा लेखक प्रा. श्रीरंजन आवटे याने घरातील जून्या सामानातून ही डायरी शोधून पाटोळे यांना आणून दिली.

‘भारत जोडो’ चा रौप्य महोत्सव साजरा होत असताना त्या निमित्ताने यावर वैचारिक चर्चा झाली पाहिजे हे जाणून आम्ही हे पुस्तक रूपाने प्रकाशीत करण्याचा निर्णय घेतला.  10 फेब्रुवारी 2012 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली. अल्पावधीतच दुसरी आवृत्ती 2015 मध्ये (शाहू यांच्या ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या दुसर्‍या पुस्तकासोबत’) प्रकाशीत झाली.

बाबा आमटेंवर लिहीताना शाहू पाटोळे यांनी आपल्या मनोगतात एक अतिशय प्रमाणीक भावना बोलून दाखवली आहे,

‘... बाबाही माणस होते. कधी-कधी बाबानंा वैचारिक बेस आहे की नहाी अशी शंका यायची. बाबांना असामान्य समजणारे बाबा सामान्य बोलल्यावरही कौतूक करायचे ! निव्वळ शब्दांचे बुडबुडे फोडण्यापेक्षा बाबा आनंदवनातच राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांची किंमत कमी झाली नसती. बाबांनी भारत जोडो यात्रा काढायला भरीला पाडणारांनी बाबांना ‘स्वस्त’ करून टाकलं. त्याचं लगेचचं उदाहरण म्हणजे बाबांचा नर्मदा बचाव आंदोलनातील सहभाग होय. जलसमाधीची जाहीर घोषणा करणारे बाबा शेवटी आनंदवनातच परतले ना!’

स्वत: शाहू पाटोळे यांनी समाजमाध्यमांवर लोकसत्तातील लेखावर एक पोस्ट लिहीली. या पुस्तकाबद्दल वाचकांना उत्सुकता निर्माण झाली. हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध आहे. खालील क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा. पुस्तक पाठविण्याची सोय केली जाईल. या निमित्ताने सविस्तर सखोल वैचारिक चर्चा व्हावी हा शुद्ध प्रमाणीक हेतू आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

3 comments:

  1. बाबा आमटे यांची वेगवेगळे नाटकी प्रयोग आणि त्यात भर म्हणून नाना पाटेकर सरख्यानी तिथे जाऊन केलेले तमाशे,माध्यमांनी त्यांचे केलेले कौतुक...सगळेच अनाकलनीय

    ReplyDelete
  2. कुष्टरोग्याची सेवा करणारे महात्मा झालेत. परंतु कुष्टरोग् होणारच नाही म्हणून लस शोधून काढणारे शास्त्रज्ञाचा कुठे उल्लेख होत नाही.

    ReplyDelete
  3. तीच तर खंत आहे...

    ReplyDelete