Tuesday, July 14, 2020

पिंजर्‍यातील वाघाचा स्वतंत्र बाणा !


उरूस, 14 जूलै 2020 

झुंझार पत्रकार अनंत भालेराव यांनी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्यावर एक फर्मास अग्रलेख लिहीला होता. त्याचे शिर्षक होते, ‘घोड्यांचा खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा अडवणार कसा?’. दिल्ली श्रेष्ठींच्या समोर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते कसे लाचार होतात यावर हा टोला होता.

आताच्या काळात भाउ तोरसेकर वगळता महाराष्ट्रातील पत्रकार असं काही लिहीत नाहीत. सत्ताधार्‍यांवर टीका करणं म्हणजे कर्णकर्कश्शपणा वाटून ते सत्ताधार्‍यांची स्तूतीच करत चालले आहेत. ही स्तूती जरूर करावी पण ती किमान वस्तुनिष्ठ तरी असावी. आपल्या समतोल लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक लेख लिहीला, ‘उद्धव अन कळसुत्री बाहुले? मुळीच नाही’ (त्यांच्या ब्लॉगवर आणि अक्षरनामा या पोर्टलवर हा लेख उपलब्ध आहे). त्यांचा हा लेख वाचून माझ्यासारख्या त्यांच्या नियमित वाचकाला धक्काच बसला.

बर्दापुरकरांच्या अक्षरांवरची शाई वाळलीही नव्हती की तितक्यात बातमी आली 10 पैकी 9 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या त्या परत करण्यात आल्या आहेत. यातील 6 जणांची तर आधी केली होती त्याच जागी बदली करण्यात आली आहे. शिवाय हा लेख लिहीला त्याच्या दुसर्‍याच दिवशी अजीतदादा पवार यांनी पुण्यातील पाच उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.

मग आता ह्या बदल्या-रद्द बदल्या- परत बदल्या नेमक्या कसला पुरावा आहेत? उद्धव ठाकरे यांची प्रशासनावर पकड असल्याचे हे लक्षण आहे का?

कोरोनाला भिउन उद्धव ठाकरे मातोश्रीवर दडी मारून बसले आहेत. मुख्यमंत्र्याचे सरकारी निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला त्यांनी निवासासाठी स्विकारलाच नाही. शिवाय ते मंत्रालयातही जात नाहीत. परिणामी ‘मातोश्री’ हेच मंत्रालय होवून बसले आहे. मग स्वाभाविकच शरद पवारांना तिथेच चकरा माराव्या लागतात. शरद पवारांना मातोश्रीवर जावे लागते यातून उद्धव ठाकरे यांचे मोठेपण बर्दापुरकर सुचवतात. मग त्यांनी याचे उत्तर द्यावे की सरकार स्थापन करताना किंवा त्यानंतर कोरोना भितीने मातोश्रीच्या गुहेत दडी मारून बसेपर्यंत उद्धव ठाकरे यांनाच का बरे शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ वर चकरा माराव्या लागत होत्या? सत्तेत अर्धा वाटा मिळण्यासाठी ठाम असलेले आता सत्तेच्या चतकोर तुकड्यावर संतुष्ट होतात हा काय प्रकार आहे?

त्या काळात एकदाही शरद पवार मातोश्रीवर फिरकले नाहीत. अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत अर्धावाटा द्यावा, शिवाय मातोश्रीवर चकरा माराव्यात अशा अटी घालणारे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओकचे उंबरठे झिजवत राहिले हे कोणत्या स्वाभिमानाचे लक्षण होते?

उद्धव ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांच्या खासगी सचिवाचे नाव उभ्या महाराष्ट्राला ठळकपणे माहित आहे. चहापेक्षा किटली गरम असे जे वर्णन नितिन गडकरी यांनी केलेले आहे ते सगळ्यात जास्त मिलिंद नार्वेकर यांनाच लागू पडते. सामनाचे संपादकपद रश्मी ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर बहाल केले. तसेही ठाकरेंचे निर्णय ‘आतल्या स्वारी’च्या प्रभावाने होतात हे उघड गुपित आहे. युवराज आदित्य यांचे हट्ट उद्धवजींना काय काय करायला लावतात हे पण सर्वांना माहित आहेच. या शिवाय निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांना ठाकरेंनी आपला प्रशासकीय सचिव म्हणून नेमले. म्हणजेच आधीच या चौकडीत उद्धवजी बंदिस्त आहेत. ही चार बोटे कमी पडली म्हणून की काय काकांचा ‘अंगठा’ पण यांना लागतोच. अशा पाच बोटांवर नाचणारे हे नेतृत्व नेमके कुठल्या अंगाने ‘कळसुत्री बाहुले नाही’ असे बर्दापुरकरांना वाटते? खरं तर मला अशीही शंका येते आहे की बर्दापुरकर हे उपहासाने तर लिहीत नाहीत ना?

उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांचीच तक्रार असली असती तर त्याकडे राजकारण म्हणून दुर्लक्ष करता येईल. पण त्यांचेच मंत्रीमंडळातील सहकारी ही तक्रार करतात, प्रत्यक्ष शिवसैनिकच तक्रार करतात याचे काय करायचे? कोरोना काळात शिवसैनिकांचेच मृत्यू होत आहेत अगदी शिवसेनेचा गढ असलेल्या मुंबईत आणि त्यांच्या घरच्यांना एक दिवसा नंतर कळवले जाते हा नेमका कशाचा पुरावा आहे?

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाचा धोका असतानाही संपूर्ण महाराष्ट्रात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आवश्यक त्या सुचना करत आहेत. आणि या काळात कळसुत्री बाहुले नसलेले स्वतंत्र बाण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करत आहेत? मातोश्रीवर बसून कोमट पाणी पीत आहेत. डिझास्टर टूरिझम (आपत्ती पर्यटन) म्हणून युवराज आदित्य ठाकरे हे देवेंेद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना उडवून लावू शकतील. कारण ‘नया है वह’. पण उद्धव ठाकरे पण असंच समजत आहेत का?

कोरोना संकटाच्या काळातील मुंबईत प्रवासी मजदुरांच्या रेल्वे प्रवासावरून उडालेला प्रचंड गोंधळ, पालघर येथील पोलिसांच्या उपस्थितीत दोन साधुंचा जमावाने घेतलेला बळी, वाधवान प्रश्‍नी सरकारची झालेली प्रचंड नामुष्की, अर्णब गोस्वामी प्रकरणांत दाखल करण्यात आलेले खोटे एफआयआर आणि त्यावर न्यायालयाने निकालात मारलेली थप्पड, मुुंबईमध्ये कोरोना बाधितांच्या हाताळणी मृतदेहांची झालेली हेळसांड या सर्व नजिकच्या काळात घडलेल्या घटना आहेत. या सगळ्यांतून उद्धव ठाकरे यांची नेमकी कुठली प्रशासनिक पकड दिसून येते?

आपल्या लेखात बर्दापुकर असं लिहीतात, ‘...इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाट्याला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणातले एकमेव नेते आहेत.’ हा लेख वाचणार्‍या कुणाही वाचकाने गेल्या पाच वर्षांतली समाज माध्यमांवरची भाषा बघितली तर देवेंद्र फडणवीस यांना जातीवरून, पत्नीवरून आणि देहावरून  ज्या घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल केल्या गेले तेवढे कुणालाच केल्या गेले नाही हे सहज लक्षात येते. अगदी हेलीकॉप्टरच्या अपघातात ते बचावले तर ‘टरबुज्या मेला का नाही’ असेही बोलल्या गेले. मग हे ढळढळीत समोर असताना बर्दापुरकरांना खोटे का लिहावे वाटते?

उद्धव ठाकरे यांचे जे काही गुण असतील त्यावर जरूर लिहावे पण नसलेल्या गोष्टी त्यांना चिटकवून काय होणार आहे? उद्धव ठाकरेंनी शिवसेना ग्रामीण भागात पोचवली असं एक विधान बर्दापुरकर करतात हे एकवेळ ठीक. पण त्यापुढे जावून ‘... या काळात शेतकर्‍यांचे प्रश्‍न राजकीय पटलावर विविध मार्गांनी उचलून धरणारा शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष महाराष्ट्रात दिसत होता.’ असं लिहीलं आहे. फार खोलात न जाता मी केवळ एकच विचारू इच्छितो, उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या कुठल्याही प्रमुख नेत्याने शेतकर्‍यांची ‘कर्जमुक्ती’ आणि ‘कर्जमाफी’ या दोन शब्दांतला फरक समजावून सांगावा. खरीप आणि रब्बीच्या पाच पाच पिकांची नावे सांगून त्यांच्यासाठी काय धोरण असावे हे किमान शब्दांत अगदी ढोंबळपणे मांडून दाखवावे. साखर उद्योग, त्यावरचे नियंत्रण, उसाच्या उपपदार्थांची विक्री आणि त्याचे धोरण याबाबत अगदी ढोबळ वाटावी अशी 200 शब्दांत मांडणी करून दाखवावी.

उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत त्या शिवसेनेच्या शाखा 1988 च्या दरम्यान आमच्या औरंगाबादेत (शिवसैनिकांच्या भाषेत संभाजीनगरात) सुरू झाल्या तेंव्हा न त्यांचा कुणी आमदार होता न मंत्री होता ना खासदार होता. सगळ्यात जास्त नगरसेवक निवडुन येवून त्यांचा कुणी महापौरही झाला नव्हता. पण त्यांच्या शाखा गल्लो गल्ली निघाल्या होत्या. त्यावर भगवा झेंडा आणि  डरकाळी फोडणार्‍या वाघाचे चित्र ठळकपणे असायचे. त्याची एक दहशत सर्वत्र होती.  महाविद्यालयातील विद्यार्थी गाड्यांमध्ये भरभरून जावून शिवसेनेसाठी बोगस मतदान करायचे. तेंव्हा तर धनुष्यबाण हे चिन्हही सेनेच्या उमेदवाराला मिळाले नव्हते. मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर पहिल्यांदा खासदार बनले. पण त्या मशालीची धग प्रचंड होती.

आजचा शिवसेनेचा वाघ हा सर्कशीतला वाघ बनला आहे. तो बारामतीच्या रिंगमास्टरच्या तालावर नाचतो. आणि खेळ संपला की पिंजर्‍यात (मातोश्री) जावून बसतो. शिकार करायचे विसरून आयते कुणी आणून दिलेले मटण खातो.

बर्दापुरकर ज्या मराठवाड्यात आहेत तिथे मोहरमचे ताबुत बसवले जातात. आणि त्या मिरवणूकीत कागदी वाघ नाचवले जातात. तसा हा मोहरमचा कागदी वाघ आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

7 comments:

  1. अत्यंत परखड विश्लेषण
    भाऊ तोरसेकर आणि तुरळक अपवाद वगळता पत्रकार आणि लेखकांमध्ये राज्यकर्त्यांची तळी उचलायची चढाओढ लागली असते.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर विश्लेषण

    ReplyDelete
  3. छान!बर्दापुरकर लिहीतात चांगल पण आता निव्रत्तिमुळे समाजाशि नाळ तुटली असावि किंवा वयाचा परिणाम!सुरक्षितता महत्वाची ना!
    ऐखादा पुरस्कार वगैरे!

    ReplyDelete
  4. केवढे अचूक चित्रण!

    ReplyDelete
  5. वाह!बार्दापूरकर,you too?

    ReplyDelete
  6. अचूक व परखण विश्लेषण !

    ReplyDelete