Tuesday, June 9, 2020

केतकर : सोनियानिष्ठ भ्रमिष्टाचा जाहिरनामा!

   
उरूस, 9 जून 2020

‘भ्रमिष्टाचा जाहिरनामा’ नावाची संतोष पद्माकर पवार यांची अप्रतिम दीर्घ कविता आहे. कुमार केतकर यांनी मोदी सरकार-2 च्या वर्षपूर्ती निमित्त एक व्हिडिओ ‘मॅक्स महाराष्ट्र’ या यु ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलाय. तो ऐकल्यावर   हा तर ‘सोनियानिष्ठ भ्रमिष्टाचा जाहिरनामा’ असल्याचे लक्षात येते.

व्हिडिओत सुरवातीलाच केतकर असं सांगतात की सगळे सर्वेक्षण असं म्हणत होते की भाजपला 200 पेक्षा जास्त जागा भेटणार नाहीत. पराभवाची खात्री होती म्हणून ते निकालाच्या आधी केदारनाथला जावून बसले.

जे कुणी हा लेख वाचत असतील त्यांनी स्वत:लाच विचारून पहावे की केतकर सांगत आहेत हे वास्तव आहे का? केतकरांच्या भाषेत ‘सर्वच सर्वेक्षणं सांगत होती’ म्हणजे कोण? इथपासूनच केतकरांचा भ्रम सुरू होतो. बरं केतकरांचाच शब्द प्रमाण मानायचा तर 145 खासदार निवडून आले असतनाही कॉंग्रेसचे मनमोहनसिंग पंतप्रधान झाले होतेच की. किंवा दुसर्‍या वेळेसही केवळ 208 खासदारांच्या बळावर पंतप्रधानपद त्यांनी पटकावले होते. मग सर्वेक्षणांत 200 च्या जवळपास जागा मिळत असताना मोदी भाजप किंवा संघ भितील कशाला? प्रत्यक्षात काय घडले किंवा केतकरांच्या भ्रमाच्या बाहेर वास्तवात इतरही काही सर्वेक्षणकर्ते काय म्हणत होते हे सर्वांनाच माहित आहे.

आपल्या बोलण्यात केतकर संघाचे ‘नेते’ राम माधव यांचा संदर्भ देतात. एक तर राम माधव हे संघाचे प्रवक्ते आहेत. संघात कुणालाच ‘नेते’ ही उपाधी लावली जात नाही. इतकी वर्षे पत्रकारिता केलेले केतकर हे जाणत नाहीत काय? राम माधव यांना पत्रकारांनी मुलाखतीत बहुमत मिळाले नाही तर काय करणार? विचारले तेंव्हा त्यांनी ठासून 300 पेक्षा जास्त जागा मिळणारच असे प्रतिपादले होते. पण नाहीच मिळाले बहुमत तर काय करणार असे परत विचारल्यावर अशा प्रसंगी आम्हाला साह्य करणारे आमच्या सोबतच निवडणुका लढवणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष यांचा पाठिंबा आम्हाला मिळेल. त्या शिवायही गरज पडली तर इतर पक्षही जे आधी आमच्या बरोबर नव्हते तेही सोबत येतील असे ते म्हणाले. पण केतकर यातील अर्धवटच वाक्य उचलून राम माधव यांनाही म्हणजेच संघालाही कशी विजयाची खात्री वाटत नव्हती असे प्रतिपादन करत आपला भ्रम पसरवत जातात.

केतकर सुरवात कशाने करतात आणि पुढे चालून ते काय बोलून जातात याची त्यांची त्यांनाच आठवण रहात नाही. आधी केतकर सांगतात बहुमत मिळणार नाही सत्ता जाणार म्हणून मोदी भाजप अस्वस्थ होते. मग आपल्या बोलण्यात शेवटी ते सांगतात की पुलवामा हल्ला कसा ‘घडवून’ आणला गेला. त्याला उत्तर म्हणून बालाकोट चा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून देशप्रेमाची लाट उसळली. मग 200 च्या आसपास राहणारा भाजप एकदम 300 च्या पुढे गेला. बघा केतकर आधी म्हणत आहेत की मोदी भिवून केदारनाथ गुहेत जावून बसले आहेत. देवाला साकडे घालत आहेत. आणि नंतर म्हणत आहेत की पुलवामा हल्ला मुद्दाम घडवून आणला होता. मग जर एम.एस.ए.बी. (मोदी संघ अमितशहा भाजप) हे पुलवामा-बालाकोट अशा जय्यत तयारीत होते, कट कारस्थान करत होते तर मग ते भितील कशाला? बहुमत गमावण्याची शंका त्यांच्या मनात राहिलच कशाला?

मूळात केतकरांनी एक भ्रम आधीपासूनच पसरवला होता की निवडणूकाच होणार नाहीत. मोदी सत्ता सोडणारच नाहीत. निकाल विरोधात गेला तर दंगे घडवून आणले जातील. मग ही जर मांडणी केतकर आधीपासून करत होते तर मग हे दंगेखोर, बदमाश, कपटी लोक निवडणुक निकालाच्या आधी साध्या भोळ्या सरळमार्गी कॉंग्रेस राहूल सोनिया प्रियंका केतकर यांच्यासारखं भित कसे असतील?

भाजपचे जे दोन ज्येष्ठ नेते या वर्षभरात मृत्युमुखी पडले त्या अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्याबद्दल केतकरांना आता गहिवर येतो आहे. याच जेटलींचा उल्लेख वारंवार जमात-ए-पुरोगामी जेटली कसे मास लिडर नाहीत, ते कधीच कसे लोकसभेत निवडून आले नाहीत, त्यांचा वावर कसा उच्चभ्रू लोकांमध्येच (इलाईट क्लास) थोडक्यात ल्युटन्स दिल्लीतच होता असा आरोप करायचे. या जेटलींची आठवण मोदींना कशी होत नाही असं म्हणून केतकर गळे काढत आहेत.

दुसरं नाव सुषमा स्वराज यांचे. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुुंडन करेन या त्यांच्या वाक्यावरून याच सर्व पुरोगाम्यांनी सुषमा स्वराज यांना भयंकर ट्रोल त्या काळात केले होते. हा आक्रस्ताळेपणा कसा संघा भाजपचा स्थायी भाव आहे हे मांडणार्‍यात केतकर आघाडीवर होते. हीच संघाची शिकवण संस्कार का? असंही हे जमात-ए-पुरोगामी विचारायचे. पण आता सुषमा स्वराज यांची मृत्यूनंतर कशी उपेक्षा झाली म्हणून हे गळे काढत आहेत. शिवाय सुषमा स्वराज  कशा मुळच्या संघाच्या नाहीत. त्या समाजवादी चळवळीतून कशा आलेल्या आहेत हे पण केतकर आज आवर्जून सांगत आहेत. मग भ्रमीत केतकरांना असे विचारावे वाटते की सुषमा स्वराज यांचे हे ‘समाजवादी’पण तूम्हाला आधी का नाही कधी दिसले? त्यांचा आक्रस्ताळेपणा हा समाजवादी संस्काराचा भाग होता असा जर कोणी पलटवार केला तर केतकरांकडे काय उत्तर आहे? सोनिया गांधींच्या परदेशी जन्मावर आक्षेप घेत कॉंग्रेसमधून हाकलले गेलेले शरद पवार (शरद पवार यांनी कॉंग्रेस सोडलेली नाही. कॉंग्रेस कार्यकारिणीने त्यांना निलंबीत केले आहे.) यांच्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगणारा केतकरांचा कॉंग्रेस पक्ष सुषमा स्वराज यांच्यावर मात्र तेंव्हा आगपाखड करायचा. याच विषयावर शरद पवारांना चार खडे बोल केतकर का नाही आता सुनवत? शरद पवार यु टर्न घेवून सोनियांबरोबर आले की लगेच केतकरांच्या बुद्धीनेही यु टर्न घेतला का?

अरूण जेटली आणि सुषमा स्वराज केंद्रिय मंत्री पातळीवर काम केलेली व्यक्तिमत्वे होती. पण पी.व्हि.नरसिंहराव हे तर सर्वात मोठ्या अशा पंतप्रधान पदावर होते. पक्षाचे अध्यक्ष होते. मग यांची आठवण सोनिया-राहूल-प्रियंका-केतकर किंवा इतर कुणीही कॉंग्रेसजन चुकूनही का काढत नाहीत? आठवण तर सोडाच या नरसिंहराव यांचे निधन झाल्यावर त्यांचा मृतदेह कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्तेकर्त्यांसाठी अंत्यदर्शनाला पण ठेवू दिला नाही. हा मृतदेह घेवून शववाहिका दोन तास कॉंग्रेस कार्यालयाच्या दारावर उभी होती. पण सुरक्षा रक्षकांनी मुख्य दरवाजाही उघडला नाही. कारण सोनिया गांधींचा तसा आदेशच होता. आणि अशा कॉंग्रेसचे खासदार माजी पत्रकार कुमार केतकर अरूण जेटली आणि सुषमा स्वराज या दिवंगत नेत्यांची आठवण मोदी भाजप काढत नाहीत म्हणून तक्रार करत आहेत?

अरूण जेटली, सुषमा स्वराज यांच्यामुळे भाजपला मध्यमवर्गीयांत प्रतिष्ठा होती. त्यांना अभिजन वर्गात मान्यता होती. हे इंग्रजी बोलायचे, शहरी वातावरणात हे वाढले होते, यांचा संबंध शैक्षणिक संस्थांशी होता. त्यामुळे जी प्रतिष्ठा यांना लाभली ती अमित शहा, मोदी किंवा इतर कुणालाच  नाही. असं केतकर म्हणतात. आता मुळात भाजप हा ‘शेटजी भटजींचा’ पक्ष होता असा आरोपच ही मंडळी करतात. आता हा आरोप म्हणजेच केतकरांच्या भ्रमभाषेत ‘गुणगौरव’ ठरतो आहे का? सुषमा स्वराज यांना परराष्ट्र मंत्री करूनही मोदी त्यांना कवडीचीही किंमत देत नव्हते. त्या एकट्या पडल्या होत्या. आणि या एकटेपणाच्या दडपणातच त्यांनी प्राण सोडला. असाही भ्रमीत शोध केतकरांनी लावला आहे.

सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यातील भाषणं आजही युट्यूबवर उपलब्ध आहेत. ती कुणीही पहा. म्हणजे केतकरांच्या भ्रमाचे पुरावे मिळतील. राहता राहिला एकटेपणाचा प्रश्‍न. परराष्ट्र धोरणांत किंवा इतरही वेळी सुषमा स्वराज यांचे पक्षात काय आणि कसे स्थान होते हे त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्या मृत्यूनंतर दिलेल्या प्रतिक्रियांत आलेले आहे. तो सगळ्यात मोठा पुरावा आहे.

आता केतकरांनी याचा खुलासा करावा. परराष्ट्र धोरणांत मोदी स्वराज यांना कवडिचीही किंमत देत नसल्याचे ‘कुसळ’ यांना दिसते. मग कॉंग्रेसचे ‘मुसळ’ दिसत नाही का?

वाजपेयी सरकार 1 मताने कोसळल्यावर राष्ट्रपतीकडे सोनिया गांधी सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर तेंव्हा कोण होते? त्या वेळी लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदी कॉंग्रेसचे (तेंव्हा ते कॉंग्रेसमध्येच होते) शरद पवार होते. सत्ताधारी मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव विरोधीपक्ष नेता मांडत असतो. तो मंजूर झाल्यानंतर संकेताप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याला राष्ट्रपती आमंत्रण देतात. मग अशावेळी राष्ट्रपतीकडे जे शिष्टमंडळ जाते त्यात विरोधी पक्ष नेते असलेल्या शरद पवारांचा समावेश असावा की नाही? उलट हे शिष्टमंडळ मुळातच विरोधी पक्षनेत्याच्या नेतृत्वाखालीच जायला हवे. सत्ता स्थापन करायचा दावा कुणाच्या नावाने करायला हवा? सोनिया गांधींच्या का विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवारांच्या?

सुषमा स्वराज यांना मोदी विचारत नाहीत असा निष्कर्ष काढणारे केतकर कॉंग्रेस तेंव्हा अधिकृतरित्या त्यांच्याच पक्षाच्या असलेल्या विरोधी नेतेपदी बसलेल्या शरद पवारांना का विचारत नव्हती याचा विचार का करत नाहीत? का त्यांच्या ‘भ्रमपुराणात’ हे बसत नाही?

केतकर गहन कायदेशीर विषयातही वैचारिक भ्रम पसरवत आहेत. सी.ए.ए. या नावाने नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेने बहुमताने मंजूर केलेला असताना केतकर सर्रास एन.पी.आर. आणि एन.आर.सी. ज्यांचा अधिकृत रित्या काहीही संदर्भ अजून शासकिय पातळीवर आलेला नसताना यामुळे अस्वस्थता आहे असं म्हणत आहेत. सी.ए.ए.मुळे देशातील कुठल्याही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही किंवा देशातील कुठल्याच नागरिकाचा याच्याशी काहीच संबंध नाही हे वारंवार स्पष्ट केले गेले. केतकर ज्या सदनाचे खासदार आहेत त्याच राज्यसभेत त्यांच्याच जवळ उभं राहून माजी मंत्री ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनीपण कबुल केलंय की सी.ए.ए.चा भारतीय मुसलमानांशी काहीही संबंध नाही. ते सांगत असताना केतकरांनी कान बंद केले होते का?

वर्षभरात देशाचे वाट्टोळे झाले आहे असा केतकरांचा निष्कर्ष आहे. भाउ तोरसेकरांनी केतकरांची त्यांच्या व्हिडिओत मस्त उडवली आहे. खरं तर देशाचे वाट्टोळे 2016 मध्येच नोटबंदीने झाले असे राहूल गांधी सांगत होते. मग केतकर आता परत नव्याने वाट्टोळे झाले कसं काय सांगत आहेत? असा तिरकस टोला भाउंनी मारला आहे.

सगळी आर्थिक आरिष्टं कोरोनामुळे आहेत असं मोदींनी सांगायला सुरवात केली अशी एक लोणकढी केतकरांनी ठोकून दिली आहे. माझे सामान्य वाचकांना एक साधे आवाहन आहे. तूम्ही तूमच्या हातात असलेले मोबाईचे इंटरनेटचे साधे साधन वापरून कोरोना आल्यापासूनचे मोदींचे कुठलेही सार्वजनिक भाषण संबोधन काढून आत्ताही ऐका. आणि त्यात केतकर म्हणतात ते कधी आणि कुठे सांगितले आहे हे तपासा. केतकरांचा भ्रमिष्टपणा तूमच्या लक्षात येईल.

गुजरातमध्ये नमस्ते ट्रंप कार्यक्रमासाठी पाच ते सहा हजार अमेरिकन युरोपियन भारतात आले आणि त्यांच्यामुळे कोरोना पसरला असाही एक भ्रमित मनाने शोध केतकरांनी लावला आहे. आता यावर जास्त काही बोलायची गरजच नाही. असं असलं असतं तर आज अहमदाबादेत आणि एकूणच गुजरातेत कोरोना बाधीत आणि मृतांची संख्या सर्वात जास्त असायला हवी होती. ती दिल्लीच्या तबलिगी मरकजमुळे कशी आहे याचे स्पष्ट पुरावे समोर आलेले आहेत.

केतकर ज्या मुंबईचे कौतूक करत आहेत, उद्धव ठाकरेंना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणत आहेत जेंव्हा की मुंबई ही कोरोनाची राजधानी बनली आहे. तबलिगींमुळे कोरोना सर्वात जास्त वेगाने पसरला याचे पुरावे असताना केतकर मात्र ट्रंपच्या कार्यक्रमातून कोराना पसरला असे प्रतिपादन करत आहेत.

महाराष्ट्र सरकारची आणि विशेषत: मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची सर्वोत्तम कामगिरी पाहून अमित शहा भाजपच्या तोंडचे पाणी पळालं असल्याचे केतकर सांगत आहेत. आपण 2024 ला निवडून येणार नाही याची खात्री पटल्याने काहीही करून हे सरकार  पाडायचा असा मोदी भाजपचा कट आहे.  केतकरांचे हे विवेचन ऐकल्यावर भ्रमाची एक उच्चकोटीची सिद्धी त्यांनी प्राप्त केली असल्याची खात्री पटते. अगदी आत्ता विधानपरिषद निवडणुकांत केतकरांच्या कॉंग्रेसपक्षानेच जास्तीचा उमेदवार देवून कशी अस्वस्थता निर्माण केली होती आणि शेवटी त्यांना तो उमेदवार परत घ्यावा लागला. शिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केतकरांचे लाडके नेते मा. राहूल गांधी यांनी महाराष्ट्र सरकार बद्दल जी काही उद्दात्त विधाने केली त्याने सरकारचे ‘स्थिरत्व’ किती पक्के झाले हे पण आपण तपासू शकता.

केतकर सांगत आहेत की कोरोना काळात स्थलांतरीत मजूरांची संख्या 14  कोटी इतकी होती. त्यांचे कसे हाल झाले वगैरे वगैरे. प्रत्यक्षात मजूरांचे काय आणि कसे हाल झाले हा किंवा दाखवले गेले हा स्वतंत्र विषय आहे. केतकरांनी सांगितलेला आकडा आपण समजून घेवू.  आता जर 14 कोटी हा आकडला पकडला तर साधारणत: 4 माणसांचे एक कुटूंब असते तेंव्हा ही लोकसंख्या 56 कोटी इतकी होते. आपण  सोयीसाठी हा आकडा 50 कोटी इतका गृहीत धरू. मग केतकरांच्या भाषेत 1 मे पासून 50 कोटी इतकी म्हणजे 45 टक्के इतकी प्रचंड लोकसंख्या भारतात रस्त्यावरून इकडून तिकडे कोरोनाच्या काळात जात होती?

एक आण्याची भांग पिली तर वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्या धर्तीवर नेमका कुठला गांजा किंवा त्यांचें नेते राहूल गांधींच्या सोयीच्या भाषेत म्हणायचे तर कोकेन ओढले तर असा भ्रम तयार होतो? इतकाच साधा सोपा सामान्य माणसाला कळणारा खुलासा केतकरांनी करावा. बाकी त्यांचे ‘भ्रमपुराण’ तेच जाणो.

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

12 comments:

  1. केतकर कुबेर ऐकाच माळेचे!

    ReplyDelete
    Replies
    1. आहेत खरे... पण आपल्याला त्यांची दखल घेवून मुद्दे खोडावे लागतील ना...

      Delete
    2. साठी बुद्धी नाठी झाली केतकर यांची

      Delete
  2. खूपच भारी केतकरा सारख्याना मोदी कावीळ झाली आहे ती लवकर जात नाही

    ReplyDelete
  3. कुमार केतकर ह्यांना जवळपास 2 वर्षांपूर्वी मोदी पंतप्रधान झाले ह्या जागतिक कट आहे हा जावई शोध लागला होता पण त्या बद्दल चे पुरावे आजून सुद्धा त्यांनी पोलीसांना दिले नाहीत.

    कुमार केतकरांच्या मते तर 2019 च्या निवडणूका पण होणार नव्हत्या पण ह्या बद्दल पण ते काही बोलत नाहीत.

    त्यांच्या बोलण्यातच किती विसंगती आहे हे आपण पाहू शकतो, ते म्हणतात की भाजपाला 200 जागा पण मिळणार नाहीत म्हणून निकाला पूर्वी मोदी केदारनाथ ला जाउन बसले पण जर मतदान झाले असेल तर मग मोदींचा केदारनाथ ला जाण्याने निकालावर काहीच फरक पडणार नव्हता. पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण कसा करायचा हे त्यांना अचूक जमते.

    राम माधव काय म्हणाले ह्यांचे दाखले आज कुमार केतकारांना द्यावे लागत आहेत . स्वतःला पत्रकार म्हणणारे हे वाक्यांची अशी मोडतोड करून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरत आहेत. खरंच ह्यांना पत्रकार तरी म्हणावे का??

    पुलवाम हल्ल्याबद्दल चे पुरावे सध्या पोलीसांनी सादर केले आहेत. जे लोक ह्याला काट म्हणत होते त्यांचा भांडाफोड आधीच झाला आहे. केतकर आता ह्या बद्दल बोलून लोक तुमच्या दुष्प्रचाराला बळी पडणार नाहीत( पडले पण नाहीत).

    जर निवडणुका होणार नाहीत हे आधीच ठरले होते केतकर म्हणतात तसे तर मग भाजपाला घाबरण्याची काहीच गरज नव्हती. मोदींना केदारनाथ ला जाण्याची पण गरज नव्हती. पण आपण आधी काय बोललो आणि आता काय बोलत आहोत ह्याचे काहीच तारतम्य केतकारांना नसते.

    आधीचे तर खूप उदाहरणे आहेत पण सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे CAA बद्दल पसरवला जाणारा भ्रम. ह्या लोकांमुळेच शाहीनबाग सारखे बिनकामाचे आंदोलन करण्यात आले. तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार आहे पण मग तुम्ही तो संविधानिक मार्गानेच करावा. तेथील हमरस्ता रोखून धरताना दुसऱ्याच्या अधिकाराची तुम्ही गळचेपी करत होतात त्याचे काय??

    दिल्ली दंगल मध्ये शाहीनबाग कणेशन आता समोर येत आहे.
    महाराष्ट मधील सरकार बद्दल तर केतकारांनी काहीच बोलू नये . कारण त्यांचे मुख्य नेते (खरे तर आता त्यांच्या कडे कोणतेही पद नाही) तरी पण सर्वोच्य नेते राहुल गांधी काय विधान करत आहेत ते पाहावे.

    कुमार केतकारांना सरकार मूळे मजुरांचे हाल झाले वाटत आहे तर मग प्रियांका गांधी यांनी पाठवलेल्या 1000 बस चे काय झाले ते पण त्यांनी सांगावे.

    सोनिया गांधी यांनी घोषणा केली होती की मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे काँग्रेस भरेल. कोण कोणत्या प्रदेश काँग्रेसनी पैसे भरले आहेत त्याची यादी त्यांनी जाहीर करावी.

    पण ह्या गोष्टी होणार नाहीत फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम फक्त ह्यांना जमते. अविरतपणे त्यांनी हे आपले काम करत राहावे कारण जनता आता हुशार झाली आहे ह्या दुष्प्रचाराला जनता बळी पडणार नाही. 2019 मध्ये पडली पण नाही.

    कुमार केतकर ह्यांचा पूर्णपणे भांडाफोड केलात सर. अनेक नवीन गोष्टी माहित झाल्या आणि ह्या लोकांचा खरा चेहरा समोर आला. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. खूप छान विश्लेषण..👌

    ReplyDelete
  5. केतकरांच्या सुमार भविष्यवाणीबद्दल आणखी काय बोलणार? शिवाय त्यांच्या बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कटाचा अजूनही खुलासा व्हायचा आहे

    ReplyDelete
  6. अगदी मुद्दसुदपणे समाचार घेतला आहे केतकरांच्या भ्रमिष्टपणाचा ! केतकर हे धूर्त आहेत. त्यांना यातले काही कळत नाही असे नाही. पण दांभिक पुरोगामीपणा एकदा अंगात भिनला की यापेक्षा वेगळे वागता येत नाही.

    ReplyDelete
  7. अडचण अशी आहे की पुरोगामी मित्र माझ्यावर संघवाला म्हणून टीका करत आहेत. मी म्हणालो की आधी मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा. मी कोण आहे ही दूय्यम बाब आहे. असे काही बोलले की काहीच उत्तर देत नाहीत.

    ReplyDelete
  8. केतकरांचा आता वय झाले आहे. भ्रम होतातच या वयात. परत संगती संग दोषः प्रमाणे ते सध्या नशेडी लोकांच्या कळपात असल्याने आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था आहे त्यांची. म्हातारचळाला आपण काय करणार.

    ReplyDelete
  9. त्यांचे बारसे अगदी योग्यच केलं होतं त्यांच्या पालकांनी......
    "सुमार".....

    ReplyDelete