Monday, October 19, 2020

बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याची कुलदैवता तुळजा भवानी!

   


उरूस, 19 ऑक्टोबर 2020 

 नवरात्र उत्सव महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले ते अगदी अलीकडच्या काळात. गुजराती प्रभावातून सार्वजनिक देवीउत्सव आणि गरबे सुरू झाले. पण पूर्वीपासून महाराष्ट्रातील प्रथा घरोघरी देवीचे घट नवरात्रत बसविण्याची आहे. रोज संध्याकाळी देवीसमोर आरत्या अष्टके पदे म्हणण्याची प्रथा आहे. या आरत्यांना पारंपरिक चालीत बांधलेले असते. आरत्या म्हणजे लोकगीतेच आहेत.

तुळजापुरचे मंदिर हे वेगळ्या अर्थाने हिंदूंच्या अठरापगड जातीचे ऐक्य दर्शविणारे आहे. हे वैशिष्ट्य कधी फारसे लक्षात घेतले जात नाही. ही मुळात क्षत्रियांची देवता. 

तुळजापुरच्या देवीचे पुजारी भोपे हे 96 कुळी मराठा आहेत.  मुख्य पुजारी कदमराव पाटील हे असून त्यांच्या घराण्यात व्रतबंधाची परंपरा आहे. मौंज झाल्यानंतरच त्या मुलाला देवीचे पुजारीपण करता येते. हे भोपे ब्राह्मणांना देवीच्या मुर्तीस स्पर्शही करू देत नाहीत अशी तक्रार 1885 मध्ये प्रकाशीत झालेल्या पुस्तकांत लेलेशास्त्री यांनी केली आहे.

अहिल्याबाई होळकर यांनी आपली स्मृती तुळजापुरात रहावी म्हणून एक सुंदर दगडी बारव येथे बांधली आहे. 1785 मध्ये ही बारव बांधल्याचे तेथील शिलालेखात स्पष्ट होते. अहिल्याबाईंनी विविध शिवमंदिरांचा जिर्णोद्धार केला त्या प्रमाणेच देवी मंदिरांचाही केला. अहिल्याबाईंनी एक वेगळे उदाहरण जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजासमोर ठेवले आहे. मठ मंदिरे नदीवरील घाट बारवा ही सार्वजनिक ठिकाणं असून ती केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नाही. आज जी मांडणी केली जाते की हा सगळा मनुवाद आहे, ब्राह्मणी कट आहे ते पूर्णत: खोडण्याचे काम 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाईंनी केले. उलट ज्या ठिकाणी मंदिरे चांगली असतात, नदीवर घाट असतात, मठ बांधलेले असतात तेथे चोर्‍या मार्‍या लढाया होत नाहीत असा त्यांचा दावाच आहे. त्यांच्या भारतभरच्या मंदिर जिर्णाद्धार प्रकल्पाचे हे सारच आहे. (महादेव मंदिरात पुजारी हे गुरव असतात. ब्राह्मण नाही)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याची कुलदैवता तुळजाभवानी असल्याचे डॉ. रा.चि.ढेरे यांनी आपल्या पुस्तकांत नमुद केले आहे. कोकणातील बाबासाहेबांचे गाव म्हणजे आंबडवे. या गावी आपल्या घराशेजारीच तुळजाभवानीचे सुंदर मंदिर बाबासाहेबांचे आजोबा हवालदार मालोजी सकपाळ यांनी उभारले होते. 

महाराष्ट्रात देवीची पूजा दलितांमध्ये होते. मातंगी देवी हे त्याचेच प्रतिक. तूळजापुरात ईशान्येकडील द्वाराबाहेर आदिमाता मातंगीचे मंदिर आहे. तिचे पुजारी भोपे हे पूर्वाश्रमीचे महार होय. या देवीचे आधी दर्शन घ्यावे लागते मगच मुख्य देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. दलितांमध्ये प्रचलीत असलेल्या मरीआई, लक्ष्मीआईचे पुजारी मात्र मांग जातीचे असतात. मातंगीचे पुजारी आणि उपासक असलेले महार हे नाग जातीच्या क्षत्रियांचे वंशज असल्याचा निष्कर्षही अभ्यासकांनी लावला आहे. 

धर्मांतरापूर्वी बाबासाहेबांच्या लेटरहेडवर ‘भवानीदेवी प्रसन्न’ किंवा भवानीदेवीचे चित्र आढळून येते. बाबासाहेबांना धर्मांतराचा निर्णय घेतला. हिंदू धर्मात मी जन्मलो तरी त्या धर्मात मरणार नाही या आपल्या ठाम मतालाअनुसरून त्यांनी 1956 ला धर्मांतर केले. पण तो पर्यंत बाबासाहेब आपल्या गावाकडील भवानी मंदिरासाठी नित्यनेमाने देणगी देत होते. 

बाबासाहेबांचे आजोबा हवालदार मालोजी हे रामानंदी संप्रदायाचे तर त्यांचे पिताजी सुभेदार कबीर संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांना मांस मद्य वर्ज्य होते. पण देवीच्या नवरात्रोत्सवात सामिष भोजन म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविण्या येत असे व तो प्रसाद सर्वांना वाटप केला जाई. भवानी मंदिरात होणार्‍या नित्य उपासना, आरत्या, भुपाळ्या, गोंधळ यात सुभेदार रामजी अगत्याने सहभागी होत. 

बाबासाहेबांच्या घराण्याने आपली देवीनिष्ठा जोपासली होती. धर्मांतर झाल्यानंतर ही देवीची मुर्ती, देवीची पालखी, पुजेचे साहित्य, दागिने इतर सर्व सरंजाम गावातील तिलोली कुणबी वाडीकडे सोपावला. हे देवीचे मंदिर आता बुद्ध विहार म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी बाबासाहेबांचा अस्थिकलशही ठेवण्यात आला आहे.

बहुजनांचा देव इतका पवित्र आहे की त्याच्या पायाशी ब्राह्मणही लोळण घेतो असे वर्णन वारकरी संप्रदायातले चांद बोधले यांचे शिष्य संत शेख महंमद यांनी करून ठेवले आहे. (शेख महंमद यांची समाधी श्रीगोंद्याला आहे.) अनामिक म्हणजे पूर्वास्पृश्य समाज. 

स्वये जातीचा विप्र शुद्ध म्हणवी । अनामिकाची पूजा चालवी ॥

सटवीची भक्तिण मांगिण असे । तयेच्या चरणांला ब्राह्मण विश्वासे ॥

देवीची उपासना ही आदिम शक्तीची आदिमायेची उपासना होय. अगदी आर्यपूर्व देवता म्हणून ज्यांना संबोधले जाते त्यात देवीची उपासना येते. आज ज्या जातीव्यवस्थेवर चातुर्वण्यावर कठोर टिका होते ती व्यवस्था रूढ होण्या आधीपासून हा समाज देवीची उपासना करत आला आहे. देवी उपासनेचा अभ्यास करणार्‍या बहुतांश अभ्याकांनी ही अतिशय वेगळी मांडणी समोर आणून सामान्य वाचकांना चकित केले आहे. 

(पुस्तकासाठी संदर्भ श्रीतुळजाभवानी या रा.चिं. ढेरे यांच्या पुस्तकांतून घेतले आहेत. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे, आ. जानेवारी 2012)े

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

6 comments:

  1. खुप सुंदर, रोचक माहिती 👍🙏

    ReplyDelete
  2. व्वा छान!नवीनच माहिती मिळाली.

    ReplyDelete
  3. This is true but now nobody wants to accept. I had severe debates with my students.

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही असाच अनुभव आहे. असो आपण सत्य मांडत जावं..

      Delete
  4. Nice information about goddess तुलजा भवानी, and बाबा साहेब आबेडकर.

    ReplyDelete
  5. लेख वाचून नवीन माहिती मिळाली. धन्यवाद..

    बुद्धाची एक भिक्षूनी शिष्या होती प्रकृती जी अस्पृश्य होती जीला मतंगी पण म्हणायचे...

    ReplyDelete