Sunday, April 25, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग 10

    
उरूस, 25 एप्रिल 2021 

उसंतवाणी-28

( नाशिकला ऑक्सिजन गळतीने 24 रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नेमकी राम नवमीलाच घडली. देशभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे असे एक चित्र उभं केल्या गेले. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. आणि तिकडे लोकांचे जीव जात आहेत. )

प्राणवायु भरे । सृष्टीत सजीव ।
तरी गेले जीव । त्याच्यावीना ॥
राम नवमीला । राज जन्मावेळी ।
‘रामनाम’ पाळी । मुखी आली ॥
होतील बदल्या । येती अहवाल ।
जनतेचे हाल । पाहवेना ॥
लोकांसाठी म्हणे । राबते यंत्रणा ।
तरी हा ठणाणा । नशीबात ॥
विरोधक आणि । मत्त सत्ताधारी ।
आरोपाच्या फैरी । झाडतात ॥
बेपर्वाईचे हे । बळी नव्हे खून ।
करीती मिळून । भ्रष्ट सारे ॥
कांत म्हणे शोधू । व्यवस्थेचे भोक ।
बंदोबस्त चोख । करू त्याचा ॥
(23 एप्रिल 2021)

उसंतवाणी-29

(कोरोना काळात कुंभमेळ्यावर बंदी आली. पश्चिम बंगालातील शेवटच्या तीन टप्प्यातील प्रचारात सभा रॅली मेळावे यांवर रोक लावण्यात आली. पण इतकं असतानाही किसान आंदोलन सुरूच होते. कोरोना बिरोना सब झुठ है असले बेजबाबदार वक्तव्य राकेश टिकैत यांनी केले. दिल्ली कोरोना रूग्णांसाठी नेण्यात येणार्‍या ऑक्सिजनची वाहनंही या आंदोलना मुळे अडल्या गेली. त्यांना लांब वळसा घालून न्यावे लागत आहे. )

बंगालात बंद । रॅली सभा मेळा ।
थांबे कुंभमेळा । कोरोनात ॥
कृषी आंदोलनी । इफ्तारचा थाट ।
रोकलेली वाट । दिल्लीची ही ॥
कोरोना बिरोना । सब है ये झुठ ।
बोले अडमुठ । टिकैत हा ॥
ऑक्सिजन नेण्या । झाला अडथळा ।
आवळला गळा । आरोग्याचा ॥
संसदेने केला । कायदा संमत ।
आम्ही ना मानत । ऐसी भाषा ॥
जाणून ना घेती । संकट देशाचे ।
हाणा कायद्याचे । फटकारे ॥
नव्हे हे किसान । आडते दलाल ।
कोरोनाचा काळ । कांत म्हणे ॥
(24 एप्रिल 2021)


उसंतवाणी-30 

(23 एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन. या निमित्ताने समाज माध्यमांवर पुस्तक प्रेमींच्या विविध पोस्ट पाहण्यात आल्या. याच व्यवसायातला असल्या कारणाने मला यातल्या खाचाखोचा माहित आहेत. कागदावरील पुस्तकांचा काळ आता सरला आहे. आता नविन डिजिटल माध्यम वापरावे लागणार आहे हे निश्‍चित. नविन तंत्रज्ञानाचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे.)  

तेवीस एप्रिल । विश्व ग्रंथ दिन ।
परिस्थिती दीन । मराठीत ॥
प्रकाशकाकडे । पुस्तकांचे गठ्ठे ।
पाठीवर रट्टे । व्यवहारी ॥
टक्केवारीमध्ये । ग्रंथालये गुंग ।
चळवळीचे बिंग । फुटलेले ॥
झाली सोय खरी । डिजिटल आता ।
नको जून्या बाता । ग्रंथप्रेमी ॥
नव्या स्वरूपात । येवू दे पुस्तक ।
गुंगेल मस्तक । वाचकाचे ॥
नव्या माध्यमाची । दूरवर खेप ।
विदेशात झेप । त्वरे घेई ॥
डिजीटल स्क्रिन । वाचे नवी पिढी ।
नको मना आढी । कांत म्हणे ॥
(25 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, April 24, 2021

पुस्तकांचा कागदी अवतार समाप्त होणार..


    

उरूस, 24 एप्रिल 2021 

काल 23 एप्रिल. जागतिक ग्रंथ दिन. या निमित्ताने समाज माध्यमांवर विविध पोस्ट टाकल्या गेल्या. पुस्तकांच्या बाबत कितीतरी जण नॉस्टेलजिक झालेले दिसून आले. पुस्तकं म्हणजे त्यांच्या लेखी कागदावर छापलेली पुस्तके. नॉस्टेलजिक ला मराठी शब्द आहे गतकातरता. हा खरं तर एक मानसिक रोग आहे. एका मर्यादेपर्यंत जून्या आठवणीं काढत राहणं आपण समजू शकतो. ती आपल्या मनाची गरजही असते. पण त्यातच अडकून पडले की त्याचा रोग बनतो. तो एक आजार म्हणून त्याकडे मग पहावं लागतं.  

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच ग्रंथ व्यवहाराला गळती लागायला सुरवात झाली. त्याचं कारण म्हणजे समाज माध्यमं सशक्त होत चालली होती. छापील स्वरूपांतील मजकूर सर्वत्र पोचवणे दिवसेंदिवस अवघड होवू लागलं होतं. भौतिकदृष्ट्या पुस्तके एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं त्रासदायक होतं. जे प्रत्यक्ष या ग्रंथ प्रकाशन वितरण विक्री प्रदर्शन व्यवहारात काम करतात त्यांना याची अगदी स्पष्ट जाणीव होवू लागली होती. महाराष्ट्रभर गावोगाव ग्रंथ प्रदर्शन भरवणारी ढवळे ग्रंथ यात्रा बंद पडली होती आणि अक्षर धारा ने आपला पसारा आवरत आवरत केवळ पुण्यापूरता मर्यादीत करत आणला होता. मोठ्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी आपली आवृत्ती मर्यादीत संख्येची काढायला सुरवात केली होती. (मी स्वत: ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ वितरण, प्रदर्शनं, अक्षर जूळणी-डिटीपी ही कामं केलेली आहे. अजूनही करतोच आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष यातला अनुभव नाही त्यांनी टीका टिप्पणी करताना जरा भान राखावे ही नम्र विनंती). टक्केवारीच्या गणितात सार्वजनिक ग्रंथालयांचा संपूर्ण व्यवहार गोत्यात अडकला होता. वर्तमानपत्रांनाही मर्यादा याच काळात पडायला सुरवात झाली.  

अशा वेळी हळू हळू छापील मजकूराची जागा डिजिटल माध्यमांतील अक्षरांनी घ्यायला सुरवात केली. 2010 नंतर समाज माध्यमं अजूनच व्यापक बनली. त्यांचा परिघ वाढला. त्यांचा वापर करणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली. यात इतर ज्या बाबी आहेत मनोरंजनाशी संबंधीत त्या आपण बाजूला ठेवू. पण याच माध्यमांत कागदावरच्या मजकुराला पर्याय म्हणून मजकुर फिरायला लागला. त्याला मोठा प्रतिसाद मिळायला लागला. जो मजकूर एरव्ही छापील पुस्तकांची सद्दी असण्याच्या काळात अगदी मोजक्या हजार पाचशे लोकांपर्यंतही पोचत नव्हता तो आता सहजच पाच दहा हजारांची संख्या पार करायला लागला. (मी गंभीर मजकुराबाबत बोलतोय. छचोर मजूकराबाबत नाही.) 

काही जणांचा गैरसमज असा होता की दीर्घ असे लिखाण जे की पुस्तकांतून समोर येत होतं, त्याच्या वाचनाने जिज्ञासा पूर्ती होत होती, ज्ञान मिळाल्याचे समाधान मिळत होते, रंजनाचेही काम शब्दांतून केले जात होते, दीर्घ असा हजार पाचशे पानांचा मजकूर वाचताना मिळणारा एक आनंद विलक्षण होता हे सर्व या नविन माध्यमांत कसे काय साध्य होणार आहे? आणि जर या नविन चवचाल उथळ माध्यमांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले तर मग दीर्घ मोठ्या पल्ल्याचा मजकूर वाचणार कोण? त्याचे होणार तरी काय आणि कसे? वैचारिक लिखाणाला नविन माध्यमांत स्थान मिळणार तरी कसे? शेवटी पुस्तकांची ती मजा डिजिटल पडद्यावर येणार तरी कशी.

हा खरं तर एक मोठा गैरसमजच आहे. किंबहुना तंत्रज्ञान समजून न घेता केली जाणारी टिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल हे एक तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. मजकूर कागदावर छापायचा मग त्याचे पुस्तक करायचे. मग ते वितरीत करायचे. मग ते दुकानात जावून कुणी खरेदी करायचे. आणि मग ते घरी सांभाळून ठेवायचे. त्यासाठी मोठी जागा अडवली जाणार. हे सगऴं साधारणत: गेली 100 वर्षे घडत आलेलं आहे. यात मोठ्या अडचणी येत आहेत हे मी अनुभवावरून सांगतो. याचा व्यवहार आतबट्ट्याचा बनत चालला आहे. भांडवली गुंतवणूक परत मिळणे कठीण होवून बसले आहे (मी स्वत: ग्रंथ व्यवहारातील देणी गेली 5 वर्षे फेडतोच आहे).

याच्या नेमके उलट नविन डिजिटल माध्यमं सोपी सुटसुटीत परवडणारी स्वस्त सहज होवून गेली आहेत. 2010 पासून मी ब्लॉग चालवतो आहे. त्याची वाचक संख्या 3 लाखाचा टप्पा ओलांडून गेली आहे. हाच मजकूर मला एरव्ही जून्या माध्यमांतून तीन लाख लोकांपर्यंत कसा पोचवता आला असता? नेमक्या वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग छापील पुस्तकांना कितीतरी अवघड राहिलेला आहे. अगदी आजही तूम्ही आठवून पहा एखादे हवे असलेले पुस्तक जून्या व्यवस्थेत मिळणे किती कठीण असायचे. आता तेच छापील पुस्तक जर कुठे उपलब्ध असेल तर याच नविन तंत्राज्ञानाने लवकर माहित होते आणि त्याची उपलब्धता आधीपेक्षा सोपी होवून गेलेली दिसून येते. 

सगळ्यांना नविन स्वरूपातील मजकूर म्हणजे फक्त समाज माध्यमांवर आलेला मजकूर इतकंच दिसते. खरं तर डिजिटल पुस्तके अजून चांगल्या स्वरूपात येतील हे लक्षातच घेतले जात नाही. खुप जूनी इंग्रजी पुस्तके आता किंडलवर उपलब्ध आहेत. ज्यांना आजही कागदावरचे पुस्तक हवे आहे त्यांच्यासाठी काही मोजक्या प्रतीत ते तसे उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. जे पुस्तक पुन्हा पुन्हा हातात घेवून वाचावे वाटते. त्याच्याशी एक धागा आपला जूळलेला असतो त्यासाठी छापील प्रतींची मागणी नोंदवावी. पण एकूणच सर्व विचार करता व्यवहारिक पातळीवर आता डिजिटल माध्यमांतूनच पुस्तक सर्वांपर्यंत पोचवणे सोपे झाले आहे. 

वयस्क पलंगावर पडून असलेल्या आजारी माणसांना जाड पुस्तक हातात धरून वाचता येत नाही. ज्येष्ठ मराठी लेखक पद्ममाकर दादेगांवकर यांच्या बाबतीत एक अनुभव माझ्या गाठीशी आहे. माझ्या ब्लॉगवरच्या एका लेखावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि मी जरा शरमलो. कारण त्यांच्यासारख्या अभ्यासक समिक्षकासाठी हा मजकूर फारच प्राथमिक स्वरूपाचा होता. त्यांना शेवटच्या आजारपणात त्रास होत होता. फारसे बोलता येत नव्हते. वाचणे अवघड जायचे. मग मी उमा दादेगांवकर यांना फोन करून बोललो. त्या म्हणाल्या अरे त्यांना आता मोबाईलवरच वाचणे सोयीचे जाते. कारण अक्षरं मोठी करून वाचता येतात. पुस्तक हाती धरता येत नाही. आता जर अशा लोकांचा विचार करून त्यांच्यासाठी महत्वाची पुस्तके या स्वरूपात आली तर किती चांगले होईल.   

आज जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे. आकर्षक स्वरूपात चांगली मांडणी, चांगला टंक (फॉण्ट), ओळींमध्ये योग्य ते अंतर राखलेले, शीर्षकं आकर्षक पद्धतीनं दिलेली, काही रेखाटनांचा वापर केलेला हे सर्व छापील पुस्तकांसारखेच इथेही विचारात घेतले पाहिजे. अन्यथा आजकाल पीडीएफ म्हणजे अगदी गदळ असा कसाही टाईप केलेला मजकूर अतिशय अनाकर्षक स्वरूपात समोर येतो आणि डिजिटल माध्यमांची एक चुक प्रतिमा आपल्या मनात उतरते.  

किंडलवर अगदी छान मृखपृष्ठ असलेलं, समर्पक रेखाचित्र असलेलं, पुस्तकांचे पान उलटावे अशा पद्धतीनं पान उलटता येईल अशी रचना असलेलं पुस्तक का नाही दिलं जात? आणि ते मिळालं तर कुणाला नको आहे? जागा व्यापणारी भली मोठी पुस्तकं घरात ठेवण्यापेक्षा अगदी सुटसुटीत अशी हाताच्या तळव्यावर मावणार्‍या एखाद्या साधनांत पुस्तकं साठवता आली तर कुणाला नको आहे? 

छापील पुस्तकांचा आग्रह धरणारी त्यासाठी हट्टी असलेली माणसे मला जून्या गावगाड्यांत रमणार्‍या नॉस्टेलजीक म्हातार्‍यांसारखी वाटतात. त्यांचं जग अजूनही 15 पैशाच्या पोस्ट कार्डात, बैलाच्या गळ्यांतील घागरमाळांत, गायीच्या शेणांत, चुलीवरच्या रटरटणार्‍या कालवणांत, आहारावर भाजल्या जाणार्‍या टंब फुगलेल्या भाकरीतच अडकून पडले आहे. ते बाहेर यायला तयारच नाहीत. जमिनदारी संपलेली माणसे कशी जून्या पडक्या वाड्याच्या ढासळत्या कमानीत उभी राहून वर्तमानाऐवजी इतिहासाकडे डोळे लावून बसलेली असतात तशी ही माणसं मला वाटतात.
बदल हे स्विकारावेच लागतील. आज कितीही गोडवे गायले तरी कुणीही घोड्यावर बसून प्रवास करायला तयार नाही. बैलगाडीत बसून कुणी एका गावाहून दुसर्‍या गावात जात नाही. कागदावरची पुस्तके ज्यांना हवी वाटतात त्यांच्याबद्दल मला आत्मियता आहे. माझ्यापाशी सध्या वैयक्तिक हजारो पुस्तके आहेत. आजही मला हातात पुस्तक घेवून वाचायला आवडतं. पण सोबतच किंडलवर जूनी पुस्तकं त्याच सुंदर स्वरूपात मिळाली तर मला हवी आहेत. बोरकरांच्या कवितेत जरा बदल करून मला असे म्हणावे वाटते

जूने हवे सारेच परंतु  
नाविन्याचा ध्यास हवा ।
काळाच्या खळखळ धारेतून 
सळसळता उल्हास हवा ॥

माझा मराठी रसिकांवर विश्वास आहे. माध्यम बदलले म्हणून त्यांचे अक्षर वाङ्मयावरचे प्रेम अटणार नाही. ते तसेही कधी अटले नव्हते. ज्ञानेश्वरांच्या काळापासून अठराव्या शतकापर्यंत छापील पुस्तके नव्हते तरी मराठी माणसाने आपले ओवी अभंगावरचे प्रेम अटू दिले नव्हते. उलट माझा तर आरोपच आहे की नंतरच्या काळात सशक्त अशी छापील माध्यमं आली पण त्यांच्याही वाट्याला नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम यांच्या रचनांना लाभले तितके प्रेम आले नाही. नविन माध्यमांची भिती बाळगु नका. त्यावर अविश्वास दाखवू नका. सहर्ष मनाने खुल्या दिलाने त्यांचा स्विकार करा. शक्य तितकी छापील पुस्तकं मिळवा वाचा जतन करा जीव लावा. पण डिजिटल माध्यमांचा दुस्वास करू नका.  
                 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, April 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९

   
उरूस, 19 एप्रिल 2021 

उसंतवाणी-25

(पाहता पाहता उसंतवाणीच्या अभंगांची संख्या 25 झाली. रसिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद चकित करणारा आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा अभंग लिहिला.) 

‘उसंतवाणी’ची । झाली पंचविशी ।
कौतुकाच्या राशी । पदरात ॥
आप्त मित्र सारे । सांगती प्रेमाने ।
लिहावे नेमाने । एैसे सदा ॥
चालू घडामोडी । मांड अभंगात ।
येवू दे रंगात । शब्द खेळ ॥
राजकिय किंवा । सामाजिक बरा ।
मिश्किल हा जरा । उपहास ॥
शब्दांचा आसुड । प्रबोधनासाठी ।
कडाडू दे पाठी । असत्याच्या ॥
तुळशीच्या पाशी । पेटविली वात ।
करण्यास मात । तमावरी ॥
कांत म्हणे माझी । छोटी ही ओंजळ ।
भावना प्रांजळ । काठोकाठ ॥
(20 एप्रिल 2021)

उसंतवाणी-26

(कुंभ मेळ्याची सुरवातच अकबराने केली. त्याने पहिले स्नान केले आणि मग साधुंनी स्नान केले म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात असा अफलातून शोध ऍड. असीम सरोदे यांनी एका ट्विट द्वारे लावला. त्यावर त्याला प्रचंड ट्रोल केल्या गेले. इतके की त्याला आपले ट्विटर बंद करावे लागले. एक दिवसांनी त्याने ते परत सुरू केले. त्यावरची ही रचना. )

अकबरे केला । कुंभमेळा सुरू ।
बोले चुरू चुरू । ‘अफिम’ हा ॥
लाविता डुबकी । गंगेच्या पाण्यात ।
झाली सुरूवात । शाही स्नाना ॥
औरंग्या करितो । आषाढीची वारी ।
चातुर्मास धरी । जहांगीर ॥
बाबराच्या कडे । देवी नवरात्र ।
घरी अग्निहोत्र । निजामाच्या ॥
अफजल खान । थोर देवी भक्त ।
म्हणूनीच रक्त । सांडियले ॥
खोडसाळ चाले । ट्विटर ट्विटर ।
हाणावे खेटर । पुराव्याचे ॥
जयाची ना श्रद्धा । बसावे की शांत ।
काढू नये वांत । कांत म्हणे ॥
(21 एप्रिल 2021)

उसंतवाणी-27

(कोरोनाच्या उदास निराश काळात वसंत ऋतुत निसर्ग बहरून आलेला माझ्या आजूबाजूला दिसायला लागला. या निसर्ग किमयेने मी चकित झालो. अगदी माझ्या आजूबाजूला जी सुंदर झाडे आहेत त्यावरचा वसंत ऋतू पाहून हा अभंग रचला. बहाव्यावर एक स्वतंत्र कविता आधी मला सुरली होती. )

नसर्गाला कुठे । करोना कळतो ।
फुलतो फळतो । वसंत हा ॥
खुलतो बहावा । धम्मक पिवळा ।
पळसाची कळा । निराळीच ॥
गुलमोहरा ये । लाल लाल पुर ।
कोकिळेचा सुर । अंब्यावरी ॥
लिंब मोहोराचा । भारणारा गंध ।
श्‍वास झाला धुंद । मोगर्‍याचा ॥
चालताना वाटे । वाटसरू फसे ।
पानाआड हसे । सोनचाफा ॥
आठवण दाटे । तान्हुल्या बाळाची ।
पर्ण पिंपळाची । कोवळीक ॥
कांत म्हणे घ्यावा । वसा फुलण्याचा ।
सोसून उन्हाचा । बाण उरी ॥
(22 एप्रिल 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

    

Monday, April 19, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८

   
उरूस, 19 एप्रिल 2021 

उसंतवाणी-22

(दहावी बारावीच्या परिक्षा रद्द करून सर्व विद्यार्थी पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला. आधीच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना तसेच पुढे ढकला असा निर्णय घेण्यात आला होताच. त्यावरची ही प्रतिक्रिया) 

ढकला पुढती । न घेता परिक्षा ।
उतराला रिक्षा । शिक्षणाची ॥
ज्ञान नी परिक्षा । बसतो ना मेळ ।
सारा पोरखेळ । ज्ञानमार्गी ॥
पदवी धारक । जे जे ‘मार्क्स’वादी ।
होई बरबादी । त्यांच्यामुळे ॥
परिक्षा ही सोय । आहे घेणार्‍यांची ।
नाही देणार्‍यांची । कदापिही ॥
दाबातून करा । विद्यार्थी मोकळा ।
ज्ञान भेटो गळा । आनंदाने ॥
जूने ते शिक्षण । बाद झाले नाणे ।
सुचो नवे गाणे । गळ्यातून ॥
ऑन लाईनचा । ऑफ कारभार ।
ब्रेक फेल कार । कांत म्हणे ॥
(17 एप्रिल 2021)

उसंतवाणी-23

(हरिद्वारला भरलेला कुंभमेळा त्वरीत रद्द करा अशी मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली होती. खरं तर ही परवानगी द्यायलाच नको होती. पण उत्तराखंड मध्ये कोरोनाचा प्रकोप फारसा नाही हे जाणून हा निर्णय घेतल्या गेला होता. पण नंतर विदारक झालेली परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींनी सर्व साधुसंतांना आवाहन केले. त्यानुसार कुंभमेळा आवरता घेण्यात आला. साधु संतांनी कुठलाच आक्रस्ताळेपणा न करता या आवाहनाला प्रतिसाद दिला.)

मोदी विनवती । आवरा कुंभाला ।
थारा ना दंभाला । हिंदू धर्मी ॥
देवुनीया मान । आखाडे वागती ।
वेगे आवरती । कुंभमेळा ॥
धर्म हा टीकेची । देतो मोकळीक ।
वाटे जवळीक । त्यामुळेच ॥
टीकेच्या अग्नीत । निघतो तावून ।
येतो उगवून । राखेतून ॥
करिती तुलना । तब्लीगी मर्कज ।
मेंदूची उपज । तपासावी ॥
खुलेपणे साधु । देती प्रतिसाद ।
लपे कुठे साद । मौलाना हा ॥
कांत म्हणे हिंदू । नित्य हा नुतन ।
त्याचे धर्म मन । आधुनिक ॥
(18 एप्रिल 2021)

उसंतवाणी-24

(पश्चिम बंगाल मध्ये मतदानाच्या 5 फेर्‍या आटोपल्या आहेत. आणि आता तीन फेर्‍या शिल्लक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सभांवर बंधने घाला अशी मागणी केल्या गेली. निवडणुक आयोगाने नियमांचे काटेकोर पालन करा असे सांगितले. प्रचाराचा अवधी कमी केला. पण सभा होणारच आहेत. राहूल गांधींनी सभा घेणार नाही असं सांगितलं. डाव्यांनी पण सभा न घेण्याचा निर्णय जाहिर केलाय. खरं तर भाजप आणि तृणमुलनेही हा निर्णय घ्यायला हवा होता. पण अजूनही तसा निर्णय घेतला गेला नाही.  )

थांबवा आता या । प्रचाराच्या सभा ।
दैत्य दारी उभा । कोरोना हा ॥
नको वाचाळता । दिसू द्यावी कृती ।
सांभाळा प्रकृती । जनतेची ॥
कशासाठी हवी । प्रचाराची राळ ।
जनतेशी नाळ । जोडा जरा ॥
पाच वर्षे तूम्ही । रहा लोकांपुढे ।
वाजवा चौघडे । हवे तसे ॥
मतदानापूर्वी । मतदार चित्ता ।
लाभू दे शांतता । विवेकाची ॥
कोरोनामुळे हा । पडू दे पायंडा ।
सभा रॅली फंडा । बंद करा ॥
मतदान टक्का । गाठू दे शंभरी ।
कांत म्हणे खरी । लोकशाही ॥
(19 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, April 16, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७

     
उरूस, 14 एप्रिल 2021 

उसंतवाणी-19

(ममता बॅनर्जी यांची केलेली भडकावू भाषणे, हिंसक होवून जमावाने सुरक्षा दलावर केलेला हमला आणि त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू पावलेले 4 मुसलमान हा प्रकार खुप भयानक आहे. याच दिवशी आनंद देवबर्मन नावाच्या एका भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. अश्‍विनीकुमार नावाचा पोलिस अधिकारी गुन्हेगाराच्या शोधात बिहारमधून बंगालच्या सीमावर्ती भागात आला असता त्याची जमावाने ठेचून हत्या केली. हे प्रकरणही याच काळात घडले ) 

मतदान चाले । शिस्तीत सरळ ।
दिली खळबळ । करू लागे ॥
घेराव घालून । जवान कोंडावे ।
कर्कश्श भांडावे । सगळ्यांशी ॥
गोळीबार होता । बळी मग जाती ।
त्यांची धर्म जाती । तपासावी ॥
धर्म पाहूनिया । ठरवावी निती ।
कुणासाठी किती । रडायाचे ॥
जमाव ठेचतो । पोलिस जवान ।
घटना लहान । संबोधावी ॥
भाषणावरती । येता मग बंदी ।
साधावी ती संधी । नौटंकीची ॥
कांत म्हणे एैसे । लोकशाही वाटे ।
पसरले काटे । दूर सारा ॥
(14 एप्रिल 2021)

उसंतवाणी-20

(राहूल गांधी यांनी बंगालातील आपल्या पहिल्याच प्रचार सभेत असे काही तारे तोडले की विचारायची सोयच नाही. शिवाय सभेला अगदी जेमतेम गर्दी. या सभेचा व्हिडिओ कॉंग्रेसनेच अधिकृत पेजवरून सोशल मिडियात टाकला. तो जरूर पहा म्हणजे परत कुणी अशी टिका करायला नको की हे जाणीवपूर्वक पुर्वग्रह दुषीत लिहितात.  )
बंगाल प्रचार । आली असे आंधी ।

प्रकटले गांधी । दर्जिलिंगी ॥
भाजप तंबुत । हर्ष उडे फार ।
प्रचारक स्टार । आला आला ॥
कॉंग्रेसी लावती । कपाळाला हात ।
पनौतीने घात । केला असे ॥
सभेला ना गर्दी । चित्र स्पष्ट नीट ।
पूर्वीच्याही सीट । हारणार ॥
राहूल उवाच । मला भितो मोदी ।
लागू नका नादी । कॉंग्रेसच्या ॥
अवेशात देई । शालेय भाषण ।
सखोल ना जाण । काही दिसे ॥
नौका बुडविण्या । घेतली सुपारी ।
कॉंग्रेसची खरी । कांत म्हणे ॥
(15 एप्रिल 2021)

उसंतवाणी-21

(कोरोनामुळे परिस्थिती फारच भयानक बनली आहे. रूग्णांना बेड मिळत नाहीयेत. सामान्य रूग्णांनाही भिती दाखवून लूटले जात आहे. लॉकडाउन किती आणि कसे याची स्पष्ट काहीच माहिती दिली जात नाही. महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणा अपशयी ठरताना दिसत आहे. )

लॉकडाउन हे । लागलंय घेरू ।
बंद काय सुरू । कळेची ना ॥
रस्त्यात माणसं । हिंडती मोकाट ।
मोडती पेकाट । व्यवस्थेचे ॥
जिण्याचे हे हाल । मरणाचा वांधा ।
तिरडीला खांदा । लाभेची ना ॥
हॉस्पिटल फुल्ल । रिकामे ना बेड ।
शहाण्याला वेड । लागु पाहे ॥
उपचारा नावे । मांडिला बाजार ।
खिशाला आजार । ज्याच्या त्याच्या ॥
मनुष्य पचवी । कित्येक आपत्ती ।
झुंजार ही वृत्ती । अबाधीत ॥
न्यायचे तेवढे । उचल त्वरीत ।
सुखे उर्वरीत । कांत म्हणे ॥
(16 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 14, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६

    
उरूस, 14  एप्रिल 2021 

उसंतवाणी-16

(ममता बॅनर्जी यांचे स्ट्रॅटजीस्ट प्रशांत किशोर यांच्याशी पुरोगामी पत्रकारांनी ज्या गप्पा मारल्या ती चॅट लीक झाली. हे प्रकरण खुप गाजले. त्यात त्यांनी मोदींचा प्रभाव मान्य केला. नेमकी हीच गोष्ट पुरोगाम्यांची पोटदुखी ठरत आहे.) 

प्रशांत किशोर । लीक झाल्या गप्पा ।
माथी आता ठप्पा । मोदीभक्त ॥
मोदी विरोधात । का नाही लहर?।
उगाळी जहर । रविश हा ॥
करी ममतांच्या । ‘न्हाणी’ची चौकशी ।
ऐसी साक्षी जोशी । पत्रकार ॥
कितीही पेटवा । विरोधात रान ।
मोदी भगवान । लोकांसाठी ॥
ममता विरोधी । अँटिइन्कंबन्सी ।
नाही एकजिन्सी । काही इथे ॥
ऐसे कैसे बोले । प्रशांत किशोर ।
लिब्रांडूंना घोर । लागलेला ॥
धंदेवाईक हे । स्ट्रॅटजिस्ट खोटे ।
हाणा दोन सोटे । कांत म्हणे ॥
(11 एप्रिल 2021)

उसंतवाणी-17

(पहिल्या तीनही चरणांत असम प. बंगालमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आढळून आला आहे. शिवाय केरळ आणि तामिळनाडूतही चांगले मतदान झाल्याची खबर आहे. सामान्य लोकांनी लोकशाहीवर टाकलेला हा विश्वासच आहे. पण पुरोगामी विद्वान हे मान्य करत नाहीत. लोकशाही मेली अशीच राहूल गांधींसारखी भाषा त्यांच्या तोंडात असते. )

मतदानाचा हा । वाढलाय टक्का ।
झाले हक्का बक्का । बुद्धीवंत ॥
रांगेत माणसे । टाकतात व्होट ।
मनी नाही खोट । त्यांच्या काही ॥
लोकशाही मेली । बोलतो शहाणा ।
शोधतो बहाणा । हारण्याचा ॥
सेफॉलॉजिस्टांचा । आकड्यांचा घोळ ।
जनतेची नाळ । कळेची ना ॥
मतदाने बने । माणूस अंगार ।
करितो भंगार । विद्वानांना ॥
पाच वर्षांची ही । लोकशाही वारी ।
धावे वारकरी । मतदार ॥
कांत म्हणे जाणा । सच्चा हा ची भाव ।
फुका नको आव । पांडित्याचा ॥
(12 एप्रिल 2021)

उसंतवाणी-18

(सचिन वाझेचा साथीदार रियाज काझी यालाही तुरूंगात टाकण्यात आले आहे. हरिश साळवे यांनी अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या अंडर वर्ल्ड बाबत अतिशय सूचक अशी विधानं केली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या मोठ्या नेत्याकडे हा इशारा आहे. )

काझी पकडला । वाझे पाठोपाठ ।
भरे काठोकाठ । पापघडा ॥
छोटे छोटे मासे । लागती गळाला ।
धुंडती तळाला । यंत्रणा ही ॥
येतसे वरती । जग हे ‘अंडर’।
घोंगावे थंडर । गुन्हेगारी ॥
हरिश साळवे । कायदे पंडित ।
गाठतो खिंडित । भले भले ॥
साळवे सांगतो । दाउद गतीने ।
चालतो ‘मती’ने । राजकिय ॥
व्होरा कमिटीचा । शोधा अहवाल ।
त्याची करा चाल । कायद्याची ॥
अर्णवला देई । साळवे इशारा ।
सुरू खेळ न्यारा । कांत म्हणे ॥
(13 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 11, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५

     
उरूस, 11 एप्रिल 2021 

उसंतवाणी-13

(सचिन वाझे यांच्या पत्रात विविध मंत्र्यांचे उल्लेख आले आहेत. त्याने महाविकास आघाडी सरकार भयंकर अडचणीत आले आहे. या सरकारचे चाणक्य भाग्यविधाते खुद्द शरद पवार यांचेच नाव वाझेने घेतले आहे. न्यायालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, सीबीआय अशा विविध संस्थांनी या प्रकरणाभोवती फास आवळल्याने राजकीय कोंडी सत्ताधार्‍यांची झाली आहे.) 

वाझेच्या पत्राचा । फिरे दांडपट्टा ।
मंत्रीपद थट्टा । महाराष्ट्री ॥
भाजपचे म्हणे । आहे षडयंत्र ।
बारामती मंत्र । चालेची ना ॥
राजीनामे तेंव्हा । शोभती खिशात ।
आता प्रकाशात । येती कसे? ॥
किंगमेकर हो । होण्यापरी किंग ।
शाबूत हे बिंग । राहतसे ॥
बरा होता हाची । व्यवहार्य सल्ला ।
दादरचा किल्ला । सुरक्षीत ॥
‘कुट’ बारामती । संजू करामती ।
नासवली मती । मातोश्रीची ॥
फोटोग्राफी जैसे । नाही सत्ता विश्व।
उधळले अश्व । कांत म्हणे ॥
(8 एप्रिल 2021)

उसंतवाणी-14

(सर्वौच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळण्यात आली. आणि सीबीआय चौकशी चालूच राहिल असे सांगितल्या गेले. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी सारखे वकिलही कामा आले नाहीत. महाराष्ट्र सरकारने नेमलेली चांदीवाल समितीही अर्थहीन होवून गेली. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी हास्यास्पद अशी भूमिका पत्रकार परिषदेत घेतली. स्व. बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेवून मी सांगतो की मी सचिन वाझे आरोप करत आहेत तसे काही केले नाही. यात परत एबीपी माझा सारख्या मविआ ची बाजू घेणार्‍या चॅनेलची वेगळीच गोची झाली. त्यांनी जाहिर केलेले कोराना लसीचे आकडे खोटे असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. त्यांना केंद्र सरकारने या प्रकरणी नोटीस पाठवली. )

मुंबईत उच्च । दिल्लीत सर्वौच्च ।
पाचरही गच्च । बसते ॥
वकिल तगडे । सिंघवी सिब्बल ।
झाले हतबल । कोर्टापुढे ॥
समिती नेमली । आम्ही ‘चांदीवाल’ ।
कुणी तिचे हाल । विचारीना ॥
सीबीआय चा हा । तपास कडक ।
बसली धडक । आघाडीला ॥
परब घे आण । बायको पोरीची ।
खंडणीखोरीची । झाकपाक ॥
मातोश्रीला धावू । का सिल्व्हर ओक ।
जहाजाला भोक । भलेमोठे ॥
दूजा अनिलाचा । कटणार पत्ता ।
पचते ना सत्ता । अनैतिक ॥
कांत म्हणे चळे । पुरोगामी ‘माझा’ ।
खोटा गाजावाजा । आकड्यांचा ॥
(9 एप्रिल 2021)

उसंतवाणी-15

(प.बंगालच्या निवडणुकांत मोदींचा एका मुसलमान तरूणाबरोबरचा फोटो व्हायरल झाला. मोदी भाजप विरोधकांना वाटले हा काहीतरी डाव असणार. पण प्रत्यक्षात झुल्फीकर अली या नावाचा हा मुलगा खराच निघाला. त्यानं ज्या पद्धतीनं राष्ट्रीय माध्यमांना मुलाखती दिल्या त्यानं तर पुरोगाम्यांचे पितळ अजूनच उघडे पडले. याच काळात काशीच्या ग्यानवापी मस्जिद प्रकरणांत जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानं तर पुरोगामी अजूनच बावचळले.)

बंगालात झुल्फी । मोदींच्या गळ्याला ।
पुर ये डोळ्याला । पुरोगामी ॥
छाती पिटूनिया । म्हणती ‘या अल्ला’।
सेक्युलर कल्ला । करितसे ॥
झुल्फीकार पोट्टा । बोले चुरू चुरू ।
मरे झुरू झुरू । व्होट बँक ॥
आब्बास सिद्दीकी । ममता ओवैसी ।
मते ऐसी तैसी । विखुरली ॥
रोहिंग्यांचा प्रश्‍न । कोर्ट यांना झापी ।
त्यात ग्यानवापी । सुरू चर्चा ॥
मस्जिद खोदता । लागेल मंदिर ।
भितीने बधीर । पुरोगामी ॥
कांत म्हणे खोदा । ढोंगाची कबर ।
बरी ही खबर । देशकाळी ॥
(10 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575