Friday, September 4, 2020

मालोजी राजांची अतिक्रमणाने वेढलेली समाधी !


उरूस, 4 सप्टेंबर 2020 

 वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर टपर्‍यांनी वेढा घातलेली एक अतिशय जूनी दगडी समाशी आहे. ही समाधी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची असल्याचे सांगितले जाते. या शिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी संरक्षक भिंतीला लागून एक कबर आहे. कबरीच्या चार दरवाज्यांना लागून आठ कोरीव कातीव दगडी खांब आहेत. आतूनही ही कबर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पण इथे कुणाला पुरलेलं दिसत नाही. ती जागा रिकामी आहे. या कबरीला जायला जागाच नाही. गच्च रानगवताने झाडा झुडूपांनी वेढलेला आहे हा परिसर. याला लागूनच पुढे शांतिगिरी महाराजांच्या आश्रम परिसरांत अजून एक छत्री आहे. 

या तिनही वास्तु अतिशय उपेक्षीत अशा आहेत. मालोजी राज्यांची समाधीचा दरवाजा पुरातत्व विभागाच्या रक्षकाने कुलूप लावून बंद केल्याने आत स्वच्छता राखलेली आढळून येते. बाकी सर्व परिसरांत घाण केलेली दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येत आहेत. 


मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच मालोजी राजांची गढी आणि भव्य असा पुतळा नव्याने उभा केला गेला आहे. मग ही जूनी समाधी का अशी उपेक्षीत ठेवल्या गेली? ही समाधी मालोजी राजांची नसून त्यांचे वडिल बाबाजी भोसले यांची असल्याचे पण सांगितले जाते. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

मंदिरावर असलेले अप्रतिम असे कोरीवकाम, जून्या लाकडी वाड्यासारखी दगडावर कोरलेली नक्षी, सागवानी दरवाजे जसे असतात तसे तीन दगडी दरवाजे समाधीच्या तिन बाजूला आहेत. ते इतके हुबेहुब लाकडाचे वाटतात की आपण लाकूड समजून त्यांना ढकलू पाहतो. खिडक्यांच्या कमानी नक्षीच्या जून्या मंदिराच्या कमानींसारख्या वळणा वळणाच्या नक्षीने कोरलेल्या आहेत. 


लाकडी माळवदाला आधार देणारे खांब किंवा जून्या मंदिरावर यक्ष कोरले असतात तसे सुंदर अशी दगडी रचना समाधीच्या प्रदक्षिणा पथाला खालच्या बाजूने करण्यात आली आहे. समाधीच्या मुख्य घुमटाच्या भोवताली चारही बाजूने दोन दोन आणि कोपर्‍यावर एक असे एकूण बारा सुंदर छोटे मिनार आहेत.

हे सगळे बांधकाम निजामशाहीच्या काळातील आढळून येते. ही समाधी मालोजी राजांची असण्याची खात्री पटते कारण लखुजी जाधव यांची समाधी याच पद्धतीची सिंदखेड राजा येथे आहे. त्याच्या आधीचा कालखंड मालोजी राजांचा आहे. मालाजी राजांचा मृत्यू इंदपूरला झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून काही संशोधक ही समाधी मालोजी यांची नाही असे प्रतिपादन करतात. पण खुद्द लखोजी जाधव यांचाही मृत्यू देवगिरी किल्ल्यात झाला होता. त्यांची समाधी पण त्यांच्या मुळ गावी सिंदखेड राजा येथेच आहे. मालोजी राजांची गढी मंदिराच्या जवळच असल्याने ही समाधी त्यांचीच असण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय शंभू महादेव हे भोसल्यांच कुलदैवत. तेंव्हा मंदिरा समोर समाधी असण्यासही एक संयुक्त कारण आहे. बाजूची रिकामी कबर कुणा सरदाराची असावी. पण त्याचे निधन दुसरीकडे झाले आणि मृतदेह तिथपर्यंत आणता आला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. अशा पण काही कबरी याच परिसरांत आहेत. 


तिसरी जी समाधी आहे ती कुणाची आहे याची माहिती नाही. पायर्‍या नसल्याने गर्भगृहात जावून पहाता येत नाही. तिथे वटवाघुळांचा मुक्त संचार आहे. कसरत करत वर चढल्यावर गाभार्‍यात वटवाघूळांच्या विष्टेची प्रचंड घाण साठलेली दिसून येते. घाणीचा भपकारा इतका आहे की नाक झाकून घ्यावे लागते. ही समाधी आतून पूर्ण शाबूत आहे. बाहेरून बराचसा भाग ढासळला आहे. शिल्लक अवशेषांवरून मुळ समाधीची भव्यता आणि मुख्य म्हणजे नक्षीकामाचा दर्जा याची कल्पना येते.  


सुवर्णसिंहासनाचे पाय असतात तसे देखणे समाधीच्या चार कोपर्‍यात चार पाय कोरलेले आहेत. जे आजही संपूर्ण शाबूत आहेत. या समाधीला तळघर आहे. जे सध्या दगड लावून बूजून टाकलेले दिसते आहे. पश्चिमेच्या खिडकीला सुंदर नक्षीकाम केले असून राजस्थानी पद्धतीने समोर छज्जा काढला आहे. 


कबर, समाधी आणि छत्री असे तीनही प्रकार इथे आढळून येतात. इतिहास संशोधकांनी यावर अजून प्रकाश टाकायला हवा. मुळात घृष्णेश्वर परिसरांतील सर्व अतिक्रमणे हटवून तिथे स्वच्छता केली गेली पाहिजे. या जून्या वास्तूंभोवती संरक्षक भिंती उभारल्या गेल्या पाहिजेत. नुकतीच मलिक अंबर कबर आणि परिसराची ज्या प्रमाणे डागडुजी केली आहे तशी इथे करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

मुळात आपल्याला जून्या वास्तुंबाबत अनास्था का आहे? नविन तर आपण तसं बांधूच शकत नाही तर किमान जतन तर केलं पाहिजे. हा संपन्न असा वारसा आहे. पाश्चिमात्य पर्यटक आपल्या देशांत केवळ आपल्या संपन्न इतिहासाचा वारश्याचा अभ्यास करायला येतात. त्यांची अपेक्ष किमान स्वच्छता असावी ही पुरातन स्थळं सुरक्षीत असावीत इतकीच आहे. ती पण आपण पूर्ण करत नसूत तर कुणावर आणि किती टिका करायची? 

मालोजी राजे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यांच्या नावाने नविन गढी उभारण्याची पुतळा उभा करण्याची आपल्याला मोठी हौस. पण त्यांचीच समाधी मात्र घाणीत सापडलेली. हा नेमका काय विरोधाभास?

समाधी कोणाची यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण या समाधीची भव्यता, कारागिरी आणि तिचे स्थान भोसले घराण्यातीलच कुणा व्यक्तीची असल्याची ग्वाही देतात हे निश्चित.    

(फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Monday, August 31, 2020

अजिंठा डोंगरी सर्वदूर। हिरवाईचा पूर दाटलेला॥

 


उरूस, 31 ऑगस्ट 2020 

 औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला शंभर एक किलामिटर लांबीची अजिंठा डोंगरांची प्रचंड अशी नैसर्गिक संरक्षक भिंतच आहे. या डोंगरांतील अजिंठा लेणी देश विदेशात प्रसिद्ध आहे. पण याच अजिंठा डोंगरात पर्यटकांना आकर्षीक करणारी इतरही काही अप्रतिम अशी ठिकाणं आहे. त्यांची मात्र माहिती फारशी दिली जात नाही. या डोंगरांमधून नूसतं फिरलं तरी डोळे निवतील असा निसर्ग अनुभवास येतो. औरंगाबाद जळगांव रस्त्यांत अजिंठ्या जवळाचा घाट आणि औरंगाबाद चाळिसगांव मार्गावरील कालीघाट सर्व परिचित आहे. या महामार्गांवर भरपूर रहदारी असते. 

पण या शिवाय दोन अतिशय सुंदर निसर्गसंपन्न असे वळणावळणाचे घाट रस्ते या डोंगरात आहेत. पहिला रस्ता आहे हळदा घाटाचा. औरंगाबाद जळगांव रस्त्यावर अजिंठ्याच्या आधी गोळेगांवपासून डावीकडे जो छोटा रस्ता निघतो तो उंडणगाव वरून हळदा घाटात जातो. आणि दुसरा घाटनांद्रा जवळून डोंगरात उतरतो. 

पहिला रस्ता हळदा घाटाचा. याच रस्त्यावर अजिंठ्याचा प्रसिद्ध सुंदर धबधबा ज्या नदीवर आहे ती वाघूर नदी आडवी लागते. नदीचे पाणी अगदी रस्त्यावरून वाहत असताना त्या पाण्यांतून जाण्याची एक वेगळीच मजा आहे.  वाघूर नदी दगडांमधून वाट काढत वहात अजिंठ्या जवळ उंचावरून उडी घेते हे दृश्य फार नयनरम्य आहे. अजिंठ्याचा धबधबा खुपजण पाहातात पण या नदीचा मागोवा घेत जरा मागे गेले तर दगडांच्या खदाणीतून वाहणार्‍या प्रवाहाचे एक आगळे सौंदर्य पहायला मिळू शकते. श्रावण भाद्रपदात हा प्रवाह खळाळताना दिसतो.

हळदा घाटातील या रस्त्याने पुढे गेल्यावर यादवांच्या काळातील सुंदर भक्कम एकट्या डोंगरमाथ्यावरचा वेताळवाडीचा किल्ला दृष्टीस पडतो. हजार वर्षांपूर्वीचा हा किल्ला. याची संपूर्ण भक्कम तटबंदी दोन मुख्य दरवाजे सर्व शाबूत आहे. दक्षिणेकडे औरंगाबाद दिशेने एक दरवाजा आहे. दुसरा दरवाजा सोयगांवच्या दिशेने म्हणजेच उत्तरेला आहे. किल्ल्याच्या सर्वात उंचावर पडून गेलेल्या महालाच्या दोन कमानी शिल्लक आहेत. या कमानीतून उत्तरेची बाजू लांबवर अतिशय स्पष्ट दिसत राहते. ही जागा म्हणजे दख्खनच्या प्रवेशाचे ठिकाण. तिन्ही बाजूंनी घेरलेल्या डोंगररांगा आणि समोर दूर दूरवर पसरलेली सपाट जमिन, शेजारच्या तळ्यातून वहात निघालेली नदी असे एक जलरंगांतील चित्रच शेाभणारे दृश्य इथून दिसते. किल्ल्यावर कोठीघराची इमारत शाबूत आहे. महालाचे पडके अवशेष आहेत. एक तोफही आहे. आतल्या दुसर्‍या बुरूजाचे अवशेष आहेत. खालच्या मुख्य तटबंदीचे काही बुरूज नुकतेच दुरूस्तही केल्या गेले आहेत.



वेताळवाडीच्या किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्याची दिशा सोडून उजवीकडे वळल्यास ती वाट रूद्रेश्‍वर लेणीकडे जाते. काही अंतरापर्यंत चारचाकी वाहन जावू शकते. वाटेत ठिक ठिकाणी खळाळणार्‍या ओढ्यांनी रस्ता आडवला आहे. वाडीच्या किल्ल्यावरून दिसणारे सुंदर तळे या वाटेवर लागते. काठावरच्या मोठमोठ्या दगडीशिळा, काठावरची पळसाची झाडे यांनी या तळ्याचे सौंदर्य अजूनच वाढवले आहे. अनिलांच्या कवितेतील

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावेसे मला वाटते

जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते 

असे वर्णन आलेले आहे. ते या तळ्याला पूर्ण लागू पडते. हा भाग वर्दळी पासून पूर्णत: आतमध्ये आहे. परिणामी येथील शांतता भंग पावत नाही. वाहने सोडून पायी निघालो की काही अंतरावर मोराच्या केका कानावर पडायला लागतात. सागाच्या झाडांच्या तवराचा पिवळसर पांढरा, पळसाच्या पानांचा गडद हिरवा, लसलसणार्‍या गवताचा पोपटी अशा रंगांचा एक समुद्रच दरीत पसरलेला दिसून येतो. 

उंच कड्यावरून कोसळणार्‍या रूद्रेश्वर धबधब्याचा गंभीर नाद दरीत घुमत राहतो. याच धबधब्याखालून पलीकडे गेल्यावर छोटी गुफा लागते. या गुफेत रूद्रेश्वर महादेवाची पिंड, तिच्या समोर देखणा नंदी दिसतो. या लेणीतील मुख्य आकर्षण आहे ती म्हणजे गणेशाची सहा फुटी प्रचंड सुंदर सुबक मूर्ती. ही महाराष्ट्रात आढळलेली सर्वात प्राचीन मोठी मूर्ती आहे (याच ब्लॉगवर हा लेख आहे दि. 13 सप्टेंबर 2019).



सभोवताली प्रचंड असे काळे कातळ, त्यावर उगवलेले पोपटी हिरवे गवत, भिरभिरणारे तुषार असं सगळं भारावून टाकणारे हे ठिकाण. अध्यात्म वेगळं न राहता निसर्गात मिसळून गेलेलं किंवा निसर्ग म्हणजेच अध्यात्म आहे असं दर्शविणारे हे ठिकाण. 

रूद्रेश्वर परिसरांत फिरल्यावर पोटात कावळे ओरडत असतात. या परिसरांत खाण्यापिण्याची काही सोय नाही. पण वाटेवर प्रभाकर सोनावणे नावाचे शेतकरी आहेत. आम्ही त्यांनाच हात जोडून विनंती केली होती खायला द्याला का? त्यांनी आनंदाने मुगाची डाळ, पोळी भात असे साधे रूचकर चविष्ट जेवण दिले. निसर्गाच्या सान्नीध्यात वाडीच्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वनभोजनाची चव मी जन्मात विसरणार नाही. पावसाची रिमझिम सुरू झाली आणि आम्हाला उठून आत झोपडीत जावे लागले. सोबतचा फ्रेंच मित्र व्हिन्सेंटला या  अनुभवाने पागल व्हायची वेळ आली. इतकं सुंदर इतकं आगत्य आतिथ्य इतका आगळा वेगळा अनुभव त्याला फार मोलाचा वाटला. नाही नाही म्हणत असतानाही आम्ही सोनवणेंना जेवणाचे पैसे दिले. त्यांच्या मुलाला इथेच जरा मोठी झोपडी बांधून पर्यटकांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्याचे आम्ही सुचवले.  या भागात कुणी फिरणार असेल तर सांगा. त्यांच्या जेवणाखाण्याची सोय चांगली होईल याची हमी आहे. 



हळदा घाटाचा रस्ता पुढे सोयगांवला जातो. सोयगांवहून डावे वळण घेतले की 25 किलोमिटरचा सुरेख डोंगराच्या पासथ्याने जाणारा हमरस्ता आहे. या रस्त्यावरही जागजागी खळाळत वाहणारे ओढे अढळतात. कुठेही रस्त्याच्या कडेला उतरून नदीत पाय सोडून बसता येते. या रस्त्याला रहदारी फारशी नाही. 

पुढे तिडका गावापासून उजवीकडे घाटनांद्र्याला जाणारा रस्ता लागतो. हा रस्ता म्हणजे अजिंठ्याच्या डोंगरातील  अनवट अतिशय सुंदर असा वळणावळणाचा घाटरस्ता आहे. रस्ता चांगला मोठा आहे. या वाटेवर माकडांची संख्या भरपूर आहे. गाडी थांबवली तर आपल्या गाडीच्या टपावर येवून माकडे खेळतात. 

डोंगरातील उंचच उंच धिप्पाड काळे कातळ घाटाचे सौंदर्य अजूनच खुलवतात. घाटावर वरच्या बाजूला गेल्यावर पश्चिमेकडे एक उंच उंच काळ्या पाषाणात कोरल्यासारखी वाटावी अशी नैसर्गिक कमान दिसते. ही कमान पाहून अजिंठा डोंगरातील लेणीची आठवण येते. सारखं वाटत राहतं की इथे कुठेतरी अजून काही लेण्या लपलेल्या असाव्यात.

घाटनांद्रा-शेलगांव-नाचनवेल-बाबरा-फुलंब्री असा एक चांगला रस्ता औरंगाबादला परतण्यासाठी आहे. हा वेगळा आणि छान छोट्या मोठ्या टेकड्यांमधून भरल्या शेतांमधून जाणारा रस्ता आहे. 

भाद्रपदात या भागातील निसर्ग सौंदर्य विशेष खुललेले असते. या हिरवाईनेच डोळ्यांचे पारणे फिरते. जागजागी सुंदर अशी तळी या काळात साठलेली आढळून येतात. तसा हा खात्रीच्या पावसाचा प्रदेश. अगदीच पावसाने ओढ दिलेला काळ वगळला तर दरवर्षी हा परिसर असाच फुलून येतो. अजिंठ्याची लेणी सगळ्यांना माहित आहे. पण ही निसर्गाची लेणी मात्र फारशी डोळ्यांखालून घातली जात नाही.

(अजिंठा परिसरांत अजिंठा व्ह्यु पॉईंट, अन्व्याचे 1000 वर्षांपूर्वीचे महादेव मंदिर, रूद्रेश्वर लेणी, घटोत्कच लेणी, जंजाळा किल्ला, वाडीचा किल्ला, अंभईचे वडेश्वर मंदिर, मुर्डेश्वर, अंबऋषीची गुफा व आमसरी धबधबा अशी सुंदर ठिकाणं आहेत. या परिसरांत भटकंती करणार्‍यांसाठी निवासाची व्यवस्था उंडणगाव येथे अनिरूद्ध नाईक, मिलिंद महाजन, सुधीर महाजन, निलेश महाजन, विजय नाईक ही मंडळी उत्साहाने करतात. या भागातील शाश्‍वत पर्यटनासाठी सगळ्यां मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.)   (फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, August 28, 2020

शर्जील इमाम - कायद्याने केले काम तमाम

 


उरूस, 28 ऑगस्ट 2020 

 दोन दिवसांपूर्वी दिल्ली दंग्यातील आरोपी विद्यार्थी नेता शर्जील इमाम याला पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. हा तोच शर्जील इमाम आहे ज्याने इशान्य भारताचा मूख्य भूमीपासून वेगळा तुकडा पाडण्याचे भडक विधान केले होते, दिल्ली दंगे भडकविण्यास आपल्या भाषणांनी मोठे योगदान दिले होते. 

‘पाच लाख लोक आपल्या सोबत असतील तर आपण ईशान्य भारताला मुख्य भूमीपासून कायमचे तोडू शकतो’ शर्जीलच्या मुळ वक्तव्याचे हे मराठी भाषांतर. ‘आसाम को काटना हमारी जिम्मेदारी है’ हे त्याचे पुढचे वाक्य. आता यात नेमकं कुणाला काय संदिग्ध दिसतं आहे? सरळ सरळ देश तोडण्याची ही भाषा आहे (हे भाषण अलीगढ मध्ये 16 जानेवारी 2020 चे आहे).

बरं हे भाषण म्हणजे याचे हे एकमेव वक्तव्य आहे असेही नाही. यापूर्वीही त्याने अशीच विधाने केली होती. 13 डिसेंबर 2019 ला याने जामिया मिलिया मध्येही असेच भडक भाषण केले होते. हा तोच शर्जील आहे ज्याने रस्ता पूर्णत: बंद करण्याची कल्पना मांडली होती. आणि त्यातूनच पुढे 15 डिसेंबरला पहिल्यांदा शाहिनबाग रस्ता रोको सुरू झाले. 

ज्याला चिकन नेक म्हणतात ती एक चिंचोळी पट्टी आहे भारत आणि ईशान्य भारताला जोडणारी. तेंव्हाच्या बंगाल प्रांताचा मोठा हिस्सा पाकिस्तानात निघून गेल्यामूळे हा भूभाग चिचोळा बनला.

हा शर्जील बिहारच्या जेहानाबादचा आहे. पुढे पटनाच्या सेंट झेवियर शाळेत तो शिकला. हा अतिशय हुशार विद्यार्थी आयआयटी पवई मधून कम्प्युटर इंजिनिअर बनला. देश विदेशात मोठ्या कंपन्यांत काम केल्यावर तो आता जेएनयुमध्ये पीएचडी करत आहे. म्हणजे अविकसित मागास भागातील अशिक्षीत मुसलमान तरूण  नौकर्‍या नसल्याने सामाजिक दृष्ट्या मागे पडल्याने अशी पावले उचलतात अशी जी एक बनावट गोष्ट सांगितली जात होती ती शर्जील सारख्या तरूणांनी खोटी ठरवली आहे.  इतके उच्च शिक्षण मिळालेला, देश विदेशात मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये काम करण्याची संधी मिळालेला हा तरूण या वाटेने का गेला? 

त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर हा गायब झाला होता. 23 जानेवारी 2020 रोजी बिहारमध्ये गयेत एका सभेत तो भाषण करताना आढळला. तेंव्हा त्याने काय भाषण केले तेही उपलब्ध आहे. ‘मामला कोर्ट मे दर्ज है. मॅटर अर्जंट है. हमारे पास 4 हफ्ते याने 28 दिन है. अगले हेअरिंग तक सरकार को छोडो कोर्ट को नानी याद आ जायेगी.’ या भाषणांत तो मुसलमांनाना सरकार विरोधी न्यायालयाविरोधी भाषेतून उकसत आहे. 

शर्जीलची भाषणे आत्ताही युट्यूबवर उपलब्ध आहेत. विविध वाहिन्यांनी त्यावर तेंव्हा सविस्तर कार्यक्रम केले होते. आज जेंव्हा त्याला प्रत्यक्ष अटक करण्यात आली तेंव्हा मात्र पुरोगामी पत्रकारांनी शर्जीलला बातम्यातून गायब करून टाकले.

त्याच्यावर रितसर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याच्या पहिल्या जाहिर भडकावू भाषणापासून ते आजपर्यंत जवळपास 8 महिने कालावधी लोटला आहे. पोलिसांनी सखोल तपास केला. त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले. 

शर्जील, उमर खालीद, शेहला रशिद, कन्हैय्या कुमार, आयेशी घोष, सफुरा झरगर, देवांगना कालिता, नताशा नरवाल ही सगळी अतिशय बुद्धीमान उच्च शिक्षीत अशी तरूण मंडळी आहे. यांच्यावर रितसर खटले भरून कायदेशीर प्रक्रियेद्वारे शिक्षा कशी देता येईल हे प्रयत्न होत आहेत. आणि हे नेमके चालू असताना याला विरोध करणारे कोण आहेत? या मार्गात अडथळा कोण आणत आहेत? हे पाप करणारी जमात म्हणजे पुरोगामी. 

याच पठडीत एक नाव होते शाह फैजल. हा तरूण स्पर्धा परिक्षांत देशांत 2010 मध्ये पहिला आला. एक मुस्लिम तरूण आणि तोही परत कश्मिरचा म्हणून त्याचे विशेष कौतुक झाले. या तरूणाचे डोके कुणी फिरवले? याच पुरोगाम्यांनी. 2018 मध्ये हा तरूण सरकारी मोठ्या पदाची नौकरी सोडून मोदी भाजप सरकार विरोधी चळवळीत उतरला. 

देशाच्या हितासाठी कुठल्याही पक्षाचा सदस्य होवून रितसर निवडणुका लढवणे यात काहीच गैर नाही. उलट ते सामाजिक पातळीवर खुप काही करू पाहणार्‍यांनी केलेच पाहिजे. लोकशाही बळकटीसाठी सक्षम विरोधी पक्ष हवाच आहे. 

पुरोगामी बहकाव्यात येत त्याने राजकीय पक्ष स्थापन केला. कश्मिरमध्ये निवडणुका लढविण्याचे ठरविले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकात त्याला काहीही प्रभाव पाडता आला नाही. पुढे 370 हटल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यात शाह फैजल सारख्यांची नाव पुरती बुडून गेली. त्याला उकसवणारे सगळे कसे भंपक आहेत हे खुद्द त्यालाच उमजले. त्याने आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो आता परत सरकारी नौकरीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपालांच्या सल्लागार मंडळात त्याचे नाव येणार असल्याचे बोलले जात आहे.

ज्या शेहला रशिदचे नाव मोठ्या उमेदीने पुरोगामी गाजवत होते तीनेही राजकीय संन्यास घेतला आहे. गुजरातचा जिग्नेश मेवाणी आठवतो का? गुजरात विधानसभा निवडणुक काळात त्याला माध्यमांच्या वतीने गाजविण्यात आले होते. मोदींचे वय झाले तेंव्हा त्यांनी राजकीय सन्यास घेवून ‘हिमालय मे जाके हड्डीया गलानी चाहिये ’अशी भाषा त्याने वापरली होती. तो आता कुठे संन्यास घेवून बसला आहे? याच गुजरात मध्ये हार्दिक पटेल याला पटेल आरक्षण आंदोलनात मोठी प्रसिद्धी दिल्या गेली. तो आता कॉंग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. त्या सोबतच याच गुजरातमध्यले अजून एक नाव तेंव्हा चर्चेत आले होते. ते नाव म्हणजे अल्पेश ठाकुर. तो तर सरळ सरळ भाजपातच चालला गेला आहे. 

ज्या कन्हैय्या कुमारने कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून बिहारमध्ये निवडणुक लढवली होती त्याच्या विरोधात लालू प्रसाद यादवांच्या पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला होता. त्याला कन्हैय्यापेक्षा लाखभर मते जास्त मिळाली. भाजपचे मंत्री गिरीराज सिंह तर या दोघांच्या बेरजेपेक्षा जास्त मतांनी निवडुन आले. मग हे पाप पुरोगाम्यांचे नाही का?

आता सामान्य माणसांना असा प्रश्‍न पडतो हे जे भाजप मोदी विरोधी आघाडीचे स्टार म्हणून तयार करण्यात आलेले तरूण यांची अशी वाट का लागली? ज्या माध्यमांनी यांना गाजवले होते तीच माध्यमे आणि उठवळ पुरोगामी याला जबाबदार आहेत. ते आता अडचणीत आले आहेत. शर्जील इमामच्या बातम्या दाबून टाकल्या जात आहेत. कारण आपलेच पाप त्यातून उघड होणार हे पुरोगाम्यांच्या हातातील खेळणं बनलेल्या माध्यमांना माहित आहे. 

कायद्याची लढाई लढताना पुरोगामी मागे पडताना दिसत आहेत. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शाहिनबाग प्रकरणापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, सीसीटिव्ही कॅमेरे यांच्या आधाराने वस्तुनिष्ठ पुरावे गोळा करता आले आहेत. मोबाईलवरची भाषणे, व्हाटसअप वरील चॅटिंग या सगळ्यांतून मोठे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. याचा विचारच कधी पुरोगाम्यांनी केला नव्हता. पूर्वीची आपल्या कृत्यांकडे काणा डोळा करणारी सुरक्षा यंत्रणा आता बदलली आहे. अर्बन नक्षल, पुरोगामी यांची सुटका व्हावी अशा कायदेशीर फटी यांना आता सापडत नाहीत.

शर्जीलच्या बातम्या पुरोगामी माध्यमांनी दाबल्या पण सोशल मिडियात त्यांना वाचा फुटत आहे. काही छोटे यु ट्यूब चॅनेल पुराव्यासह या बातम्या वाचकांसमोर आणत आहेत. इतरांना ‘गोदी’ मिडिया म्हणणारा पुरोगामी मिडिया स्वत:च  पुरोगाम्यांच्या अर्बन नक्षलींच्या टूकडे टूकडे गँगच्या ‘गोदीत’ कसा आणि केंव्हा जावून बसला हे त्यांनाही कळायला मार्ग नाही. हे तर इतके टोकाला गेले आहेत की सुशांतसिंह प्रकरणांतील संशयीत आरोपी रिया चक्रवर्ती हीची मुलाखत दाखणारे पत्रकारही यांना जवळचे वाटायला लागले आहेत. प्रशांत भुषण यांना सत्यासाठी लढणारा गांधींचा आधुनिक वाटतो आहे.  


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Thursday, August 27, 2020

शेंदूरवादा : मध्वमुनीश्वरांचे पवित्र ठिकाण



उरूस, 27 ऑगस्ट 2020 

औरंगाबाद लेण्याजवळ उगम पावणारी खाम नदी मकबर्‍यापासून पाणचक्की जवळून वहात पूढे शहराबाहेर पडते. वाळूज जवळून ही नदी पुढे शेंदूरवादा गावा जवळ जाते (औरंगाबादपासून अंतर 30 किमी. बीडकिनजवळूनही या गावाला जायला चांगला रस्ता आहे). या गावी नदीच्या काठावर शेंदूरवदन गणेशाचे सुंदर दगडी अष्टकोनी छोटेसे मंदिर आहे. मंदिराला छानसा दगडी चौथरा आहे. तिथेच एक दगडी कुंडही आहे. 

हे मंदिर जागृत गणेशस्थळ म्हणून परिसरांत प्रसिद्ध आहे. पण मंदिराला लागूनच संतकवी मध्वमुनीश्वरांची (जन्म 1640-मृत्यू 1731) समाधी आहे त्याची फारशी माहिती कुणाला नाही. मूळचे नाशिकचे असलेले त्र्यंबक नारायण हे  औरंगाबादला आले.  या ठिकाणी त्यांना योगानंद मौनपुरी, निपट निरंजन, अमृतराय यांचा सहवास लाभला. अमृतराय यांनी तर त्यांचे पुढे शिष्यत्वच स्विकारले. मध्वमुनीश्वरांनी शेंदूरवादा गावी गणेश मंदिराजवळ एका अश्‍वत्थ वृक्षाखाली मुक्काम केला. तिथेच आजचा मध्वमुनींचा आश्रम आहे. त्यांची समाधी आहे. जहागिरदार कुटूंबाच्या मालकीची ही जागा त्यांनी एक आश्रम म्हणून सुंदर बांधून काढली. भक्कम दगडी कमानी ओवर्‍या असलेली ही सुंदर इमारत वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. 

ज्या अश्वत्थ वृक्षाखाली मध्वमुनीश्वरांनी मुक्काम केला त्या वृक्षाला चांगला दगडी चौथरा बांधला असून त्या भोवती  भक्कम दगडी कमानींच्या ओवर्‍यांची रचना केलेली आहे. 

पाच कमानींच्या दर्शनी ओवर्‍या या वास्तूचे खरे सौंदर्य दर्शवतात. समोर खुले पटांगण असून त्याच्या चारही बाजू बंदिस्त आहेत. एका बाजूला ओवर्‍या आजही सुस्थितीत आहे. त्याखाली तळघरही आहे.

दर्शनी भिंतीला दोन मोठे बुरूज आहेत. त्यांची दुरूस्तीही करण्यात आली आहे. गणपती मंदिराला लागून असलेली ही देखणी वास्तू लगेच नजरेला भरते.

या आश्रमाला लागूनच हनुमानाचे छोटे दगडी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कळस नाही. या मंदिराला लागूनच एक मस्जिद आहे. तिथे मध्वमुनीश्वरांचे शिष्य सुभानशा यांची कबर आहे. या सुफी शिष्याला मध्वमुनीश्वरांनी आपल्या जवळ जागा दिली. मध्वमुनीश्वरांच्या समाधीजवळही सुभानशांची समाधी प्रतिकरूपात आहे. 

शेंदूरवादा गावात अजून एक महत्त्वाची मुर्ती आहे. मध्वमुनीश्वरांनी आयुष्यभर नियमित पंढरपुरची वारी केली. ते जेंव्हा थकले आणि वारी थांबली तेंव्हा त्यांनी व्याकुळ होवून विठ्ठलाला पत्र लिहीले. विठ्ठलाने त्यांना सांगितले की तू माझ्यापाशी येवू नकोस. मीच तुझ्यापाशी येतो. आणि तिथे एक विठ्ठलमुर्ती प्रकट झाली. ही विठ्ठलमुर्ती गावातच एका वाड्यात स्थापन केलेली आहे. इतकी सुंदर विठ्ठल मुर्ती अतिशय क्वचित पहायला मिळते. तुकाराम महाराजांनी याच मुर्तीकडे पाहून ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ हा अभंग लिहीला असावा. मूर्तीचे पाय तर इतके देखणे आहेत की संतांना विठ्ठल चरणाचे इतके का आकर्षण असते ते लक्षात येते. या मूर्तीच्या शेजारी गरूडाचे आणि हनुमानाच्या देखण्या सुबक मुर्ती आहेत. विठ्ठल हे विष्णूचेच रूप आहे. पण विठ्ठल मंदिरात सहसा विष्णुचे वाहन असलेला गरूड आढळत नाही. पंढरपुरला गरूड खांब आहे. पण गरूडाची मुर्ती नाही (कुठे असल्यास अभ्यासकांनी सांगावे). उत्सव काळात ही मुर्ती मध्वमुनींच्या आश्रमात आणली जाते.



हे गाव गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. ते मंदिर छोटेखानी अष्टकोनी असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आठही दिशांना त्याला कमानी आहेत. आता इथे जाळी बसवली आहे पण मुळचे मंदिर आठही दिशांना खुले असे आहे. गणपतीची मुर्ती शेंदूर फासलेली पुरातन असून वालूकामय दगडाची आहे. सिंधूसुराचा वध गणेशाने केला व त्याचे रक्त गणेशाच्या तोंडावर उडाल्याने तो लाल भासू लागला. त्यामुळे त्याला सिंधूरवदन असे म्हटल्या जाते. अशी एक पुराणातील अख्यायिका  सांगितली जाते. या सिंधूरवदन गणेशामुळेच गावाला शेंदूरवादा असे नाव पडले असावे. सिंधूरासुराचा वध केला म्हणूनही नावाची व्युत्पत्ती शेंदूरवादा झाली असावी. 

गावात भटकत असताना एका पडक्या वाड्याचा दरवाजा आणि त्याची कोरीव दगडी चौकट दृष्टीस पडली. चौकटीवर दोन बाजूला सुंदर फुल कोरले आहे. जे तसे सर्वत्रच आढळते. पण या फुलावर बसलेला एक पोपट कोरलेला आढळला. एरव्ही समतोल अशा भौमितिक रचना सहसा आढळतात. ज्याचे एक ठराविक सुत्र असते. पण पोपटासारखा आकार कोरायचा असेल तर ते कसब कारागिराचे नसून कलाकाराचेच असावे लागते. 



मध्वमुनीश्वरांना संगीताची खुप चंागली जाण होती. त्यांची पदे आजही लोकांच्या ओठी आहेत. ‘उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचे’ ही त्यांची रचना पूर्वी अभ्यासक्रमात असायची. ‘पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर’ ही त्यांची रचना अतिशय गोड आवाजात आजही गायली जाते.  

मध्वमुनीश्वरांमुळे हे गाव संगीत साहित्य संस्कृतीचे हे केंद्र बनले होते. गणेश स्थानामुळे एक अध्यात्मिक धार्मिक अधिष्ठान या गावाला लाभले आहे. अशा छोट्या गावांनी आपल्या परंपरा जतन करत सांस्कृतिकदृष्ट्या फार मोठे काम केले आहे. हौशी पर्यटकांनी अशा जागी आवर्जून गेले पाहिजे. ही सांस्कृतिक केंद्रं परत गजबजली पाहिजेत.  

(छायाचित्रांसाठी सौजन्य आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किलीनी)


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Monday, August 24, 2020

‘दिल्ली दंगे’ । पुरोगामी नंगे ॥


उरूस, 24 ऑगस्ट 2020 

 भारतातील पुरोगाम्यांनी अगदी शपथच घेतली आहे. काहीही झाले तरी पुढच्या निवडणुकीत भाजपच्या 350 पेक्षा जास्त जागा आल्याच पाहिजेत. त्यासाठी कोणतीही कसर सोडायला हे तयार नाहीत. 

ऍड. मोनिका अरोरा हा सर्वोच्च न्यायालयातील वकिल आहेत. त्यांनी दिल्ली दंग्यावर एक पुस्तक लिहीले ‘दिल्ली रॉयटस 2020 द अनटोल्ड स्टोरी’(सहलेखिका-सोनाली चितळकर, प्रेरणा मल्होत्रा). या पुस्तकाचा अभासी प्रकाशन समारंभ दिल्लीत 22 ऑगस्टला आयोजीत केला होता. प्रकाशन समारंभाच्या अर्धाघंटा आधीच ब्लुम्स बेरी या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने हे पुस्तक आपण प्रकाशीत करणार नसल्याचे सांगितले आणि समारंभ रद्द करण्याची सुचना लेखिकेला केली.

अपेक्षेप्रमाणेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे पुरस्कार वापसीवाली टूकडे टूकडे गँग यांनी पुस्तक प्रकाशीत होवू नये यासाठी दबाव आणायला सुरवात केली.  जागतिक पातळीवर सुत्र हालली आणि अगदी शेवटच्या क्षणी हे पुस्तक प्रकाशीत करण्यास प्रकाशक संस्थेने नकार दिला. एखादे पुस्तक ज्याच्या मजकुराची चर्चा झालेली असते, मजकुर पूर्ण तपासला गेलेला असतो, मजकुरावर मान्यवरांचे अभिप्राय घेतलेले असतात मगच पुस्तक प्रकाशनासाठी अंतिम केले जाते. मग जर दिल्ली दंग्यांवरचे हे पुस्तक प्रकाशन संस्थेला आक्षेपार्ह आता वाटत असेल तर याची जाणीव मजकुर हाती आला तेंव्हाच का झाली नव्हती? किंवा मजकुर तपासत असताना त्यांच्या दृष्टीने जे काही आक्षेपार्ह आहे ते जाणून नकार का दिला गेला नाही? 

अगदी वेळेवर समारंभाच्या आधी प्रकाशन रद्द करण्याचा निर्णय कसा काय होतो? बरं यावर आवाजही उठवायला प्रस्थापित माध्यमं तयार नाहीत. (मराठीत या विषयावर अनय जोगळेकर यांनी आपल्या MH48 या  यु ट्यूब चॅनेल वर या विषयाला वाचा फोडली आहे. जिज्ञासूंनी तो व्हिडिओ जरूर पहा)

लोकसत्ताच्या आपल्या सदरात चिनेश सरलष्कर (लाल किल्ला, दि. 24 ऑगस्ट 2020) यांनी असे तारे तोडले आहेत की हा प्रकाशन समारंभ पुढच्या महिन्यात ठरला होता. पण लेखिकेला घाई होती म्हणून त्यांनी तातडीने अभासी प्रकाशन समारंभ ठरवला. त्यात कपिल मिश्रांसारख्या भडकावू भाजप नेत्यांना बोलावल्याने प्रकाशन संस्थेने पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा निर्णय रद्द केला. लेखिकेला ही घाई कशासाठी होती? तर बिहारच्या निवडणुकीत याचा फायदा भाजपला मिळावा म्हणून. 

आता हा तर्क तर अगदी सामान्य माणसालाही पटणार नाही. बिहारच्या 7 कोटी मतदारांपैकी कितीजण गंभीर इंग्रजी पुस्तके वाचतात? आणि जे काही अगदी तुरळक वाचत असतील त्यांच्यावर याचा परिणाम होवून निवडणुकीचे निकाल पलटावे असं शक्य आहे का? 

‘26/11 आरेसेस साजिश’ या नावाचे पुस्तक उर्दू सहाराचे संपादक अजीज बर्नी यांनी लिहीले होते. हे पुस्तक वाचून भाजपचा 2009 मध्ये लोकांनी पराभव केला असे मानायचे का? मराठीत या पुस्तकाचा अनुवाद झाला. त्यावर जागजागी चर्चा घेतल्या गेल्या. तेंव्हा कुणी हा आरोप केला नाही की या पुस्तकामुळे भाजपेतर पक्षांना फायदा होईल आणि भाजपचा पराभव होईल. मग आता हा दावा का केला जातोय? 

दिल्ली दंग्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात माध्यमांमधून लिहीलं गेलंय सांगितलं गेलंय की आता नव्यानं कुणी दोन चारशे पानांच्या पुस्तकांत काही संागेल आणि त्याचा परिणाम होईल ही शक्यताच नाही.

ब्लुम्स बेरी प्रकाशन संस्थेने नकार देताच गरूडा नावाची दुसरी प्रकाशन संस्था पुढे आली. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच करण्याची घोषणा केली आहे. गरज पडली तर पुस्तकाच्या प्रती मोफत वाटण्याचीही तयारी काही संस्थांनी दाखवली आहे. 

आता मुद्दा हा येतो की या पुस्तकाला विरोध करून याचे महत्त्व पुरोगाम्यांनी का वाढवले? एक तर दिल्ली दंग्यांचे जे काही सत्य बाहेर येते आहे ते स्विकारल्या गेले पाहिजे. त्याला नाकारून कुणाचेच भले होणार नाही. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात असल्याने पुस्तकाला विरोध करणे उचित नाही.

गुजरात दंग्यांवर कितीतरी पुस्तके डाव्यांनी लिहीली. अजूनही त्यावर खुसपटं काढली जातात. अगदी आत्ता मेघा मुजूमदार यांची कादंबरी ‘अ बर्निंग’ आली आणि त्यावर लिहीताना जयदेव डोळे सारखे पत्रकार भाजपवर घसरले (याच सदरातील कालचा लेख). परत एकदा हिंदू मुस्लिम दुही पेटती रहावी यासाठी प्रयत्न केल्या गेले. 18 वर्षांपूर्वीचे सगळे उकरून काढण्याचे स्वातंत्र्य आहे आणि अगदी आत्ता सहा महिन्यांपूर्वी जे घडले त्यावर लिहिले तर ते छापू नका म्हणून पुरोगामी दबाव आणतात? 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता करणारे, संविधान बचाव अशी ओरड करणारे आपल्या अशा कृतीने सामाजिक दृष्ट्या उघडे पडले आहेत. 

दिल्ली दंगे आणि नुकतेच घडवून आणलेला बंगलोर हिंसाचार यातून देशविघातक कारवाया करणारे चव्हाट्यावर आले आहेत. यांच्या विरोधात कायदेशीर कार्रवाई होत असल्याने पुरोगामी अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात भीमा कोरेगांवला जो हिंसाचार उसळला होता त्या गुन्हेगारांभोवतीही कायद्याचा पाश आवळला गेला आहे. शाहिनबाग प्रकरणांत जिथे जिथे दंगे झाले त्यावरही कडक कारवाई होताना दिसत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपण बोलू तेवढेच. इतरांनी काही बोललं तर त्यावर दबाव टाकायचा आणि आवाज बंद करायचा असा काही वेगळा अर्थ पुरोगाम्यांच्या शब्दकोशात आहे का?

कुमार केतकर असे म्हणाले होते की 2019 ची निवडणुकच होणार नाही, झाली तरी भाजप पराभव स्विकारणार नाही सत्ता सोडणार नाही, दंगे होतील. कुमार केतकरांनी अर्धच सत्य सांगितले. भाजप जिंकला तर काय होईल हे त्यांनी नाही सांगितलं. दंगे होतील हे बरोबर सांगितले पण ते पुरोगामीच घडवून आणतील असं नाही कबुल केलं. आधी कश्मिर मग सीएए नंतर शाहिनबाग नंतर बंगलूरू सातत्याने निमित्त शोधून दंगे घडवून आणले जात आहेत. देशातील विषय कमी पडतील की काय म्हणून अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीच्या पोलिस कस्टडीतील मृत्यूचे भांडवल करूनही इथे भडकावू ट्विट्स केले, लेख लिहीले. अजून आपण शांत कसे? लोक रस्त्यावर कसे उतरत नाहीत? असे विचारले गेले. ही काय भाषा होती?

वैचारिक पातळीवर, राजकीय पातळीवर पुरोगाम्यांची जबरा पिछेहाट होत चालली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हे चालू आहे. आता सोशल मिडिया भाजपच्या कह्यात गेले असा आरोप पुरोगामी करत आहेत तेंव्हा इथूनही त्यांची सद्दी संपत चालली याची ही कबुलीच आहे.

मोनिका आरोरा यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने पुरोगाम्यांनी आपण नंगे आहोत याचीच कबुली दिली आहे. 

   

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Sunday, August 23, 2020

जयदेव जयदेव (डोळे) (द्वेष)आरती ओवाळू !


उरूस, 23 ऑगस्ट 2020 

 जयदेव डोळे हे सातत्याने भाजप संघ विरूद्ध गरळ ओकत असतात. त्यावर मी जेंव्हा जेंव्हा लिहीले त्यावर एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने मलाच उलट प्रश्‍न केला, ‘आम्ही त्यांच्या संघद्वेषाने पछाडलेल्या लिखाणाची दखलही घेत नाही. तूम्ही कशाला लिहीता?’. स्वत: जयदेव डोळे आणि ज्यांच्यासाठी ते लिहीतात त्या पुरोगाम्यांनाही काही सांगण्यात अर्थ नाही. कारण त्यांना समजून घ्यायचेच नाही. शिवाय हे ते मूद्दामच करत आहेत. तेंव्हा माझा हेतू केवळ तटस्थ असे जे वाचक आहेत त्यांच्या समोर वस्तुस्थिती ठेवण्याचा आहे.

मेघा मुजूमदार या मूळच्या बंगाली आणि आता अमेरिकेत असलेल्या लेखिकेची ‘अ बर्निंग’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशीत झाली आहे. तिच्यावर लिहीताना जयदेव डोळे यांनी परत आपल्या संघ भाजप द्वेषाची आरती ओवाळली आहे. (‘अ बर्निंग : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका, अक्षरनामा पोर्टल, दिनांक 22 ऑगस्ट 2020) खरं तर यातील संघ भाजप विरोधाचा मुद्दा बाजूला ठेवूत. कारण मग माझ्यावर पुरोगामी ‘चड्डीवाला’ म्हणून शिक्का मारायला ते मोकळे होतील. आणि विषय दूसरीकडे भरकटेल.

या कादंबरीची जी नायिका आहे तिचे नाव ‘जीवन’ असे आहे. मग डोळे शिर्षकात ‘मुस्लिम तरूणी’ असा उल्लेख कशाच्या आधारावर करतात? 

जो प्रसंग प्रत्यक्ष कादंबरीतील डोळे यांनी आपल्या लेखात सांगितला आहे तो असा,  एक बाई त्वेषाने सागत आहे ‘ रेल्वे स्थानकापाशीच एक जीपभर पोलीस होते. त्यांना विचारा की माझा नवरा जळत असताना ते तसेच उभे का होते? तो डब्याचे दार उघडू पहात होतो. आमची मुलगी वाचू पाहता होता. तो खूप झटला.’

आता या प्रसंगातून डोळे यांना काय सुचवायचे आहे? मुळात गोध्रा प्रकरणात आधी जो रेल्वेचा डबा जाळला गेला तो कुणी जाळला? आणि जे जळाले ते कोण होते? मुसलमानांनी आयेध्येहून परतणार्‍या हिंदूं कारसेवकांना जिवंत जाळले असा तो प्रसंग आहे. मग हा मुस्लिम विरोधी कसा काय? आणि ती बाई जी त्वेषाने बोलत आहे त्यावरून पोलिस हिंदूंना मरू देत होते, जळू देत होते असा अर्थ निघतो. 

मग जर पोलिस व्यवस्था हिंदूंना मारत होती तर मग  पोलिस प्रशासन मुख्यमंत्री मुस्लिम विरोधी होते असा निष्कर्ष कसा काय निघतो?

बरं स्वत: डोळे यांनीच आपल्या लेखात असं लिहीलं आहे, ‘... वाचक सारे काही जाणतात असे गृहीत धरून लेखिका पक्ष, संघटना, धर्म असे कोणलाही थेट समोर  आणत नाही. पण वाचक समजतो. मुस्लीम नागरिक किती असहाय व उपेक्षित होऊन गेलाय हे मात्र लेखिका जाणीवपूर्वक ठसवते.’

जर कुठला धर्म पक्ष संघटना नावानिशी समोर येत नाही मग डोळे असा दावा का करतात की हे सगळे मुस्लिम विरोधी आहे? लेखिकेने नेमका कुठे तसा उल्लेख केला आहे? कोणता प्रसंग आहे की ज्यातून धर्म स्पष्ट व्हावा?

या कादंबरीवर लिहीत असताना डोळे सुरवातीलाच असे लिहून जातात, ‘फेसबुकचा भाजपने कसा वापर केला, त्याच्या बातमीने या कंपनीला आता आपला ‘फेस’ मास्कमध्ये लपवावा लागतोय. कितीही खुलासे केले तरी केलेले गैरकृत्य सार्थ ठरवता येईनासे झालेय. भाजपच्या नादी जो जो जागला, त्याचा कारभार आटोपलाय. कोणी खालसा झाले, तर कोणी बेईज्जत! पण फेसबुकवरची एक पोस्ट थेट फासावर नेऊन जीव घेते. ती कहाणी त्या बातमीच्या आशयाची जवळपास पुष्टी करते. म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष व संघटना फेसबुकवरच्या एका बेसावध अजाणत्या प्रतिक्रियेचा वापर करून कसा डाव साधतात, त्याची ही कहाणी आहे.’

एका फेसबुक पोस्टमुळे थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाते असे भारतात 2014 नंतर कधी घडले आहे? डोळे हा आरोप कशाच्या आधारावर करतात? उलट याकुब मेमन याची फाशी टळावी म्हणून रात्री 2 वाजता न्यायालयाचे दरवाजे भारतात उघडले गेले आहेत. कसाबवर खटला दाखल करून संपूर्ण कारवाई लोकशाही पद्धतीनं कायद्याप्रमाणे होउन फाशी सुनावल्या गेली आहे. भाजपवर आरोप करताना डोळे काय म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेवर शिंतोडे उडवत आहेत?

बरं जो संदर्भ डोळे देत आहेत तो आत्ताचा सोशल मिडियाचा वापर भाजप आपल्यासोयीने करत आहे. हा सोशल मिडिया भाजपच्या कह्यात आहे. आणि कादंबरी गुजरात दंग्यांच्या काळातील आहे. 2003 मध्ये सोशल मिडियाचा वापर कसा आणि किती केला जात होता? 

शिवाय 2002 मध्ये मुळातच सोशल मिडिया भारतात इतका सर्वव्यापी होता का? डोळे कशाचा संदर्भ कशाचीही का जोडत आहेत? आज फेसबुकचे 34 कोटी वापरकर्ते आहेत. तेंव्हा किती होते? मुळात फेसबुकच त्या काळात होते का? ज्या फेसबुकची सुरवात 2004 मध्ये झाली त्याचा वापर 2002 च्या गुजरात दंग्यांच्या काळात प्रभावीपणे मुस्लिमविरोधासाठी केला गेला हा डोळे यांचा शोध कोणत्या पातळीवरचा आहे?   

डोळेंना गुजरात दंगल जिवंत ठेवायची आहे का? राम मंदिर प्रकरणी निकाल आल्यानंतर आणि आता राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यानंतर परत एकदा जून्या सगळ्या आठवणी काढून दोन समाजात तेढ निर्माण करावयाची आहे का? आणि तेही परत कसलाही आधार नसताना. एका कादंबरीतील काल्पनिक पात्राचा आधार घेवून?

मेघा मुजूमदार यांना काय म्हणायचे आहे, त्यांनी कादंबरीत काय मांडलंय हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्याचा आधार घेवून जयदेव डोळे विनाकारण तेढ निर्माण करत आहेत हे गंभीर आहे. ही एक प्रकारची विकृतीच आता पुरोगाम्यांमध्ये वाढत चालली आहे. हे आक्षेपार्ह आहे कारण याने समाजात अस्वस्थता निर्माण होवू शकते. 

या प्रकारच्या लिखाणासाठी अशा लेखकांना देशहित लक्षात घेवून सामान्य नागरिक म्हणून आपण जाब विचारला  पाहिजे. 

 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, August 21, 2020

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक


काव्यतरंग, शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 दै. दिव्यमराठी


आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक

देई ठेवुनि ते कुठें अजुनि हे नाही कुणा ठाउक

त्याची टिक् टिक् चालते न कधिंही, आहे मुके वाटते

किल्ली देई न त्यास ती कधिं, तरी ते सारखे चालते ॥


‘‘अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,’’

जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी

साडेपांचहि वाजतात न कुठे तो हांक ये नेमकी

बाळा झांजर जाहले, आरवले तो कोंबडा, ऊठ की’’ ॥


आजीला बिलगुन ऐकत बसूं जेव्हां भुतांच्या कथा

जाई झोप उडून, रात्र किति हो ध्यानी न ये ऐकतां

‘‘अर्धी रात्र किं रे’’ म्हणे उलटली, ‘‘गोष्टी पुरे! जा पडा! ’’

लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा ॥


सांगे वेळ, तशाच वार-तिथिही आजी घड्याळांतुनी

थंडी पाउस ऊनही कळतसे सारे तिला त्यांतूनी !

मौजेच असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?

गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलों ! तरी ना मिळे ! ॥


-केशवकुमार (आठवणीतील कविता 1, पृ.15, प्रकाशक ‘आठवण’, आ.2008)


13 ऑगस्ट हा दिवस म्हणजे आचार्य अत्र्यांची 123 वी जयंती होती. वर्षभरातच त्यांच्या स्मृतीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव सुरू होतो आहे. आचार्य प्र.के. अत्रे यांचा मराठी माणसाला त्यांच्या विविध पैलूंनी परिचय आहे. सिद्धहस्त लेखक, प्रभावी वक्ते, यशस्वी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक निर्माते, ‘मराठा’ सारख्या लोकप्रिय दैनिकाचे संपादक मालक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील झुंझार नेते राजकारणी. पण कवी म्हणून त्यांची ओळख मात्र फारशी समोर येत नाही. अत्र्यांनी ‘केशवकुमार’ या नावाने कविता लिहील्या. तसेच अतिशय फर्मास अशी विडंबनेही लिहीली. ‘झेंडूची फुले’ या नावाने त्यांचा विडंबन कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. 

आता जसे ‘बालभारती’ अभ्यासक्रमाची पुस्तके प्रकाशीत करते तसे पूर्वी नसायचे. काही प्रकाशक चांगला मजकुर संपादीत करून ती पुस्तके शिक्षणखात्याकडून मंजूर करून घ्यायचे. नंतर ही पुस्तके शालेय अभ्यासासाठी लावली जायची. आचार्य अत्र्यांनी अशी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके संपादीत केली. त्यांच्यातील शिक्षणतज्ज्ञाला लहान मुलांची मानसिकता चांगली समजत होती. या पुस्तकांत ज्या कविता असायच्या त्यांची निवड अतिशय अचूक केलेली असायची.

अत्र्यांनी आपण स्वत: संपादीत केलेल्या पूर्वीच्या अभ्यासक्रमांतील पुस्तकांत काही कविता लिहील्या आहेत. त्यातीलच ही एक सुंदर शार्दूलविक्रिडीत छंदातील कविता. मुळात आजी आणि नातवंडे यांचे एक अतिशय वेगळे वैशिष्ट्यपूर्ण नाते भारतीय  कुटूंबसंस्थेत आहे. घराचा कारभार सांभाळणारी, सगळ्यांना माया लावणारी, घर सावरून धरणारा बळकट खांब  म्हणजेच आजी. हीच्या भोवतीच सगळा गोतावळा जमा होता.

साधारणत: 1920 च्या काळातील ही कविता. तेंव्हा आताच्यासारखी घड्याळं सार्वत्रिक झाली नव्हती. मनगटी घड्याळं अजून आली नव्हती. लहान मुले आजीला दिवसभर वेळ विचारायची. पहाटे अभ्यासाला उठवणे, शाळेची वेळ होताच आठवण करून देणे, संध्याकाळी खेळात गुंगल्यावर अभ्यासासाठी घरात बोलावणे आणि रात्री गोष्टी सांगून झोपवणे या दिवसभराच्या सर्व प्रहरात ही आजी नातवंडांना वेळेची आठवण करून देई. 

एकीकडून अत्र्यांनी आपण कसे काळाशी जोडले गेलो आहोत हे सांगताना आजीशीही त्यासारखेच जोडले गेलो आहोत असंही संागितलं आहे. शांता शेळक्यांनी आजीसाठी नावतंडे म्हणजे ‘दुधावरची साय’ असे वर्णन केले आहे. या आजीलाही ही नातवंडे परंमप्रिय आहेत. स्वयंपाक आणि घरच्या रगाड्यात आई गुंतलेली असते. वडिल बाहेरचे व्याप सांभाळत असतात. आजोबांचा एक धाक असतो. मग मुलांच्या वाट्याला येते ती हक्काची आज्जीच. 

ही आज्जी संध्याकाळी मुलांना खेळातून बोलावून घेते. देवासमोर बसवून त्यांना स्त्रोत्र श्‍लोक पाढे म्हणावयास लावते. त्यांचा अभ्यास घेते. तान्ह्या लहान मुलास मांडीवर घेवून जोजवते. बी. रघुनाथ यांच्या ‘सांज’ या कवितेत या आजीचे म्हणजेच माउलीचे वर्णन मोठे सुंदर आलेले आहे

माऊलीच्या वातीतून सांज तेज ल्याली

माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली

माऊलीच्या अंकावरी सांज मुल झाली

मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली

ही आजी मुलांना जेवणं खाणं झाल्यावर गोधडीत पहुडतांना गोष्टी सांगते. गोधडीच्या ऊबेसोबतच आजीच्या गोष्ट सांगणार्‍या वेल्हाळ आवाजाचीही एक ऊब नातवंडांच्या भोवती पसरते. भूताखेताच्या गोष्टी ऐकताना झोप कशी उडून जाते आणि मग आजी दटावते मध्यरात्र झाली आहे. पहाटे शाळा आहे आता झोपा. 

सुदर्शन फाकिर यांच्या एका कवितेत आजीच्या गोष्टींचा संदर्भ फार सुरेख आला आहे. जगजित-चित्रा सिंग यांनी गायलेलं हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे. ‘ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो’. यातील एक कडवं असं आहे

मुहल्ले की सबसे निशानी पुरानी

वो बुढिया जिसे बच्चे केहते थे नानी

वो नानी के बातों मे परियां डेरा

वो चेहरे की झुरियों मे सदियां का फेरा

भुलाये नही भूल सकता है कोई

वो छोटीसी राते वो लंबी कहानी

आपल्या कुटूंबव्यवस्थेचा कणा असणारी अशी आजी. या आजीचा घड्याळाशी संबंध जोडताना अत्र्यांनी नकळतपणे काळाला बांधून ठेवणारी किंवा काळावर विजय मिळवणारी ती आजी अशी पण एक व्याख्या करून ठेवली आहे. गावाकडच्या भाषेत चिवटपणे परिस्थितीशी दोन हात करत जगणार्‍या लोकांना ‘दु:ख दळून खाणारी माणसे’ म्हटलं जातं. तशी ही आजी काळाला कनवटीला बांधून ठेवणारी आहे. 

गो.नि.दांडेकरांची ‘पडघवली’, श्री.ना.पेंडश्यांची ‘रथचक्र’, अरूण साधूंची ‘मुखवटा’ या कादंबर्‍या आणि महेश एलकुंचवारांचे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ या महान कलाकृतींमधून ही आजी मध्यवर्ती पात्र म्हणून ताठपणे उभी राहते. महाभारताचा बारीक विचार केल्यास आधी सत्यवती आणि मग कुंती या दोन आज्ज्याच सर्व कथेच्या केंद्रभागी आहेत किंबहुना सर्व महाभारत त्यांच्यामुळेच घडले  हे लक्षात येते.

(लेखासोबत वापरलेले चित्र जून्या पाठ्यपुस्तकांतील आहे. हे चित्र सुप्रसिद्ध चित्रकार दलाल यांनी काढलेले आहे. आठवणीतील कविता या सुंदर संपादीत पुस्तकांत अशी काही जूनी अभ्यासक्रमांतील चित्रे कवितेसोबत दिलेली आहे.  या संपादकांचे, प्रकाशकाचे, चित्रकाराचे मन:पूर्वक धन्यवाद.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575