Saturday, May 23, 2020

भाउ तोरसेकरांची 50 हजारी मनसबदारी!


उरूस, 23 मे 2020

एक पंच्याहत्तरीला पोचलेला वृद्ध पत्रकार डिजिटल माध्यमाचा वापर करून एक ब्लॉग सुरू करतो. त्याला कधीच  माध्यमांच्या मुख्य प्रवाहानं सामावून घेतलेलं नसतं. त्याच्यापाशी कसलीही साधनं नसतात. सामान्य वाचकांची नाडी त्याला समजते आणि त्याचे हेतू शुद्ध असतात इतक्या किमान भांडवलावर त्याची पत्रकारिता सुरू आहे. अशा या भाउ तोरसेकर नावाच्या वृद्ध पत्रकाराला सामान्य वाचक/श्रोते/दर्शक यांनी डोक्यावर घेतले आहे.

भाउंनी 2012 मध्ये ‘जागता पहारा’ नावाचा ब्लॉग सुरू केला. आज त्याला भेट देणार्‍यांचा आकडा 1 कोटी 73 लाख 89 हजार, 29 इतका आहे (सकाळी 11.21 वाजेपर्यंत, शनिवार दिनांक 23 मे 2020). मराठीतील किती पत्रकारांनी ब्लॉग चालवले? (अपवाद प्रवीण बर्दापूरकर).  लॉकडाउनच्या काळात भाउंनी ‘प्रतिपक्ष’ नावाचा यु ट्यूब चॅनेल सुरू केला. त्याला केवळ 50 दिवसांत 50 हजार सदस्य मिळाले.

आपल्याला मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल भाउंनी सामान्य वाचकांपोटी कृतज्ञता व्यक्त करून सगळे श्रेयही या सामान्य वाचकांनाच दिले आहे.

लॉकडाउनच्या काळात पत्रकारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. छापील स्वरूपातील वृत्तपत्रे संकटात सापडली आहे. बहुतांश वृत्तपत्रांनी पाने कमी केली आहेत, कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे, जिल्हा कार्यालये बंद केली आहेत, आवृत्त्या बंद केल्या आहेत.  मूळात जी काही पत्रकारीता कोरोनाच्या आधीपर्यंत चालू होती ती सामान्य वाचकांशी कितपत बांधीलकी राखून होती? भाउ आरोप करतात तशी ही अजेंडा पत्रकारीताच होती. मग आता कोरोनाच्या धक्क्यात या पत्रकारितेची पडझड होत असेल तर त्याची खंत कशाला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारे यातील किती लोक आणीबाणीत तुरूंगात होते? भाउंनी आदराने उल्लेख केला आहे ते दै. मराठवाड्याचे संपादक अनंत भालेराव यांचा खणखणीत अपवाद वगळता कोणता मोठा संपादक आंदोलन करून तुरूंगात गेला होता? मोठा संपादक तर सोडाच मूळात किती पत्रकार या आंदोलनात तुरूंगात गेले?

इतरांचे घोटाळे उघडकीस आणणारे पत्रकार स्वत:च्या क्षेत्रातील घोटाळे उघड करतात का? निखील वागळेंच्या निमित्ताने भाउंनी उपस्थित केलेल्या या जळजळीत वास्तवाला उत्तर द्यायला कुणी पत्रकार तयार नाही. अगदी आत्ताची ताजी घटना आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे लेखन चौर्य उघडकीस आल्यावर किती पत्रकारांनी त्यावर टीका केली?

भाउंचे यश या पार्श्वभूमीवर समजून घेता येवू शकते. सामान्य वाचक/दर्शक/श्रोता यांना प्रस्थापित माध्यमांतून त्यांच्या अवतीभवतीचे वास्तव-विश्लेषण- खरी माहिती मिळेनाशी झाली आहे. म्हणून या लोकांना भाउंसारखा पत्रकार आपलासा वाटतो जवळचा वाटतो. त्याच्यावर त्यांचा विश्वास बसतो.

2014 च्या मोदींच्या लोकशाहीच्या मार्गाने मिळवलेल्या यशावर 2019 च्या अजूनच उज्ज्वल यशानंतरही जमात-ए-पुरोगामी टिकेचे शिंतोडे उडवत राहतात तेंव्हा हा सामान्य वाचक भाउ सारख्यांकडेच आशेने पाहतो. तो काही मोदींचा भक्त नसतो. त्याला फक्त वास्तव समजून घ्यायचे असते. पण बातमी देण्यापेक्षा बातमी दाबण्याला महत्त्व आल्याने सामान्य वाचकांचा/दर्शकांचा प्रस्थापित माध्यमांवरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे त्यांना आता समाज माध्यमं (सोशन मिडिया) जवळची वाटू लागली आहेत. अजूनही याचे भान प्रस्थापित पत्रकारितेला आले नाही.

टिव्हीवरच्या चर्चेत कोण लोक बोलावले जातात? वर्तमानपत्रांत कुणाचे लेख सतत छापले जातात? हे सगळं सामान्य माणूस डोळसपणे पहात असतो ऐकत असतो. कालपर्यंत त्याला प्रस्थापित माध्यमांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आता त्याला समाज माध्यमांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. भाउंसारखे अजून पत्रकार समोर यायला हवेत. केवळ याच क्षेत्रात नव्हे तर इतरही क्षेत्रात प्रस्थापितांची दादागिरी बाजूला सारून नविन मंडळी पुढे येताना आता दिसू लागली आहेत. याचं एक मोठं श्रेय आधुनिक तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाची भाषा जाणणार्‍या नविन पिढीला द्यावे लागेल. त्यांनी प्रस्थापितांचे किल्ले सुरूंग लावून परास्त केले आहेत. (उदा. म्हणून गावाकडच्या गोष्टी ही मराठी वेब मालिका किंवा इंदूरीकर महाराजांवरचे टिक टॉक व्हिडिओ पहा.)
सुरेश भटांच्या शब्दांत सांगायचे तर

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

फक्त यात जरासा फरक करून साधी माणसे म्हणजे श्रोते/वाचक/प्रेक्षक. पण जे प्रतिभावंत आहेत, बुद्धीमान आहेत ज्यांना या व्यवस्थेने दाबले होते ते तशा अर्थाने ‘साधे’ नाहीत. त्यांना हा एक मोठा मंच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता ‘अजेंडा’ पत्रकारिता किंवा आपल्या गावठी भाषेत सांगायचे तर ‘सुपारी’ पत्रकारिता गोत्यात आली आहे.

भाउंनी अजून एक सणसणीत थप्पड प्रस्थापित पत्रकारिता व्यवस्थेवर लावली आहे ती कुणी समजून घ्यायला तयार नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पत्रकारिता करणारा सोडून व्यवस्थापनाच्या नावाखाली भलत्याच माणसांना महत्त्व प्राप्त होवून बसले होते. संपादक म्हणजे त्या त्या वर्तमानपत्राचा चेहरा असं वर्णन एकेकाळी केले जायचे. आणि आता काय परिस्थिती आहे? जाहिरात विभागाला आतोनात महत्त्व आले. मार्केटिंग विभागाचा माज सुरू झाला. प्रत्यक्ष लिहीणारा आणि तो वाचणारा या दोघांनाही दुय्यम तिय्यम ठरवल्या जावू लागले. जसं की शेतीत झालं. पिकवणारा आणि सामान्य ग्राहक दोन्ही बिनमहत्त्वाचे ठरून मधलीच माणसे मोठी होत गेली. साहजिकच यामूळे विकृती तयार झाल्या.

हेच पत्रकारितेत घडत आहे. विविध स्किमला महत्त्व आलं, जाहिरातदारांच्या हितासाठी बातमीचा बळी सुरू झाला,  चांगल्या मजकुराला जागा मिळेनाशी झाली, वाचक हाच मूळात महत्त्वाचा उरला नाही. मग हा पोकळ डोलारा टिकणार कसा? मूळात ज्या वाचकांसाठी पत्रकारिता सुरू झाली होती तोच नकोसा वाटू लागला की काय?

आज कुठल्याही चांगल्या मजकुराला सोशल मिडियावर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. आपली मतेही वाचक व्यक्त करतात. फार मोठा संवाद लेखक वाचकांत प्रस्थापित होतो. पण हे सगळं प्रस्थापित वर्तमानपत्रांत होताना दिसत नाहीत. चॅनेलवरच्या चर्चांत निव्वळ बाष्कळपणा सुरू झाल्यावर दर्शक आता त्यांना हव्या त्या छोट्या युट्यूब चॅनेलकडे वळताना दिसत आहेत. अर्बन नक्षलवाद प्रकरणांत प्रस्थापित माध्यमांनी बोटचेपेपणा केल्यावर दर्शक कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्या शांत वक्तव्यानं भरलेल्या यु ट्यूब चॅनेलकडेच वळणार ना? जे सत्य तूम्ही लपवून पहात आहेत ते दुसरं कुणी शांतपणे तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कमी खर्चात (जवळपास शुन्यच) दाखवत असेल तर लोक ते पाहतीलच ना? आणि ही आधुनिक माध्यमं खर्‍या अर्थानं लोकशाहीवाली आहेत. इथे कुणालाही व्यक्त होण्यास बंधन नाही.

सोशल मिडियाचे नेमकं हेच बलस्थान भाउंनी ओळखलेलं आहे.

भाउंपासून प्रेरणा घेवून महाराष्ट्रातील सत्याची चाड असलेल्या विद्वान पत्रकारांनी या माध्यमात प्रवेश करावा. सामान्य वाचकांना आजही चांगला मजकूर हवा आहे. चांगलं काही पहायचे आहे. कसलाही पूर्वग्रह न बाळगता विविध विषय समजून घ्यायचे आहेत.

ही सुपारी पत्रकारिता आपल्या मरणाने मरत असेल तर तीला मरू द्या.

जूने जावू द्या मरणा लागोनी
जाळूनी अथवा पुरून टाका
सावध ऐका पुढल्या हाका

असे केशवसुतांन म्हणून ठेवलेच आहे. भाउंनी हे ऐकले यासाठी त्यांना धन्यवाद! त्यांच्या चॅनेलला अजून मोठा प्रतिसद मिळो. भाउंसोबत त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर अतिशय सुंदर नेमके मोलाचे विश्लेषण करतात. त्यांचाही आदराने उल्लेख करावा लागेल. त्यांचाही स्वतंत्र ब्लॉग आहे. त्यांचे जास्त व्हिडीओ इथून पुढे अपेक्षीत आहेत. (छायाचित्र सौजन्य नेट)     

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Friday, May 22, 2020

मजूरांच्या प्रश्‍नांवर कॉंग्रेसी नौटंकी !


उरूस, 22 मे 2020

अजीत नेनन याचे एक गाजलेले व्यंगचित्र आहे. खेडेगावात झोपडीसमोर एक एनजीओवालं जोडपं उभं आहे. झोपडीतला पोरगा बापाला विचारत आहे
‘हे काय करतात?’
‘ते गरिबांसाठी काम करतात.’
‘अशानं काय होतं?’
‘त्यांची गरिबी दूर होते..’

त्या खेडूत बापाच्या या एका उत्तरात इंदिरा गांधींपासूनच्या कॉंग्रेसी राजकारणाचे सार दडलेले आहे. गरिबीचे भांडवल करून राजकारणी आणि नौकरशहा, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते यांनी आपली गरिबी दूर करून घेतली. गरिबी दूर करण्यात यांना काडीचाही रस नाही.

लॉक डाउनमध्ये आता स्थलांतरित मजूरांच्या नावाने गळे काढणे सुरू झाले आहे. तो याच ‘गरिबी हटाव’ नाटकाचा एक अंक आहे. आधी सोनिया गांधींनी मजूरांच्या तिकीटाचे पैसे कॉंग्रेस देईल असे सांगितले. नंतर राहूल गांधी स्वत: दिल्लीच्या फुटपाथवर स्थलांतरीत मजूरांसोबत जावून बसले. आणि आता प्रियंका गांधी यांनी हे ‘बस’कांड चालवले आहे.  यांचे हे ढोंग लगेच उघडे पडले. त्यावर भरपूर माहिती उपलब्ध झाली आहे.

या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. शेतीविरोधी धोरणे राबविण्यातून आपण ग्रामिण भारत शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करतो आहोत हे नेहरू काळात समाजवादी पांघरूण घालून लपविले गेले. शहरांचे, उद्योगांचे फाजिल लाड केल्या गेले. अनुत्पादक अशा सगळ्य व्यवस्था मोठ्या केल्या गेल्या. त्यांना सगळ्या सोयी सवलती पुरविणे त्यांना सगळ्या संधी अग्रक्रमाने उपलब्ध करून देणे औद्योगिक धोरणाच्या नावाने चालविले गेले.

शेतीची उपेक्षा होत गेली, कृषी उत्पादनातील नफा संपून भांडवल खावून जगणे सुरू झाले तसे तसे या स्थलांतराने वेग पकडला. 1960 नंतरचे औद्योगिकीकरण याला कारणीभूत ठरले. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात सर्व क्षेत्र खुले करत असताना शेतीला मात्र जखडून ठेवल्या गेले. परिणामी मजूरांच्या स्थलांतराने अजूनच गती पकडली.

आज कोरोना महामारीत केवळ दोन/तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये या शहरी व्यवस्थेचे पितळ उघडे पडले. इतकी वर्षे ज्यांच्या श्रमावर आपण आपले इमले उभे केले त्या मजूरांना सांभाळण्यात खावू घालण्यात शहरं अपशयी ठरली.

आणि याही संकटाच्या काळात सर्वांना पुरेल एवढं अन्नधान्य पुरवून शेतकर्‍यांनी हे सिद्ध केले की इतकी उपेक्षा झाली तरी आम्ही आमच्या बाजूने कसलीही कसर सोडली नाही. आमची नैंतिक जबाबदारी पार पाडली आहे. आजही आपल्या आपल्या जागी मजूर शांत बसून राहीले तर कुणीही भूकं राहणार नाही इतकं अन्न धान्य देशात उपलब्ध आहे. अस्वस्थतेतून हे मजूर स्थलांतर करत आहेत. त्यांना समजावून सांगणे त्यांना थोपवून ठेवणे हे आपले सर्वांचे काम आहे.

प्रियंका गांधी यांचे नाटक या पार्श्वभूमीवर समजावून घेतले पाहिजे. खरं तर शांतपणे संयमाने हा विषय हाताळला तर बहुतांश मजूरांना हवे तिथे पोचवता येणे शक्य आहे. कॉंग्रेस आणि इतरही विरोधी पक्षांनी त्यांच्या अखत्यारीतील राज्यांमध्ये स्थलांतरित मजूरांच्यासाठी एखादी योजना बनवून यशस्वीरित्या राबविण्याची गरज होती. महाराष्ट्रातून राजस्थानात, पंजाबातून केरळात, महाराष्ट्रातून पश्चिम बंगालात अशी वाहन व्यवस्था करून भाजपेतर राज्यांनी आदर्श समोर ठेवायला पाहिजे होता. सामान्य जनतेपर्यंत हा एक चंागला संदेश पोचला असता.

पण असे काहीच सोनिया-राहूल-प्रियंका यांनी केले नाही. महात्मा गांधींना एकदा पत्रकारांनी विचारले होते, ‘गरिबी दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे?’ गांधींनी दिलेले उत्तर आजच्या या नकली गांधींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गरिबी दूर करण्यासाठी काहीच करू नका. आधी गरिबांच्या छातीवर बसला अहात ते उठा.’ मूळात नेहरूंचे समाजवादी धोरण हाच  गरीबी तयार करणारा सगळ्यात मोठा कारखाना आहे. आजही हे धोरण कमीजास्त प्रमाणात राबविले जाते. हा कारखाना आधी बंद पडला पाहिजे.

पायपीट करणार्‍या मजूरांचे फोटो भरपूर किंमतीत माध्यमांना विकले जात आहेत. मजूरांच्या फोटोच्या नावाखाली दूसर्‍या देशातले फोटो वापरले जात आहेत. इतकेच काय पण प्रियंकांच्या या ‘बस’कांडात एनडिटिव्हीचा पत्रकारही सामील झाला. योगी सरकारने कुंभ मेळ्यासाठी वापरलेल्या बसच्या रांगांचा फोटो प्रियंकांच्या 1000 बस म्हणून यांनी वापरला. नेपाळमधील फोटो सुरजेवालांनी वापरले. पाकिस्तानातल्या, बांग्लोदशाच्या फोटोंचा वापर मजूरांच्या वेदनेचे भांडवल म्हणून करण्यात आला.  म्हणजे या मजूरांच्या वेदनांचाही बाजार कॉंग्रेसवाले आणि जमात-ए-पुरोगामी यांनी सुरू केला आहे.

आज तातडीने काय केले पाहिजे हे सर्वजण विचारत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शक्य तेवढ्या मजूरांना जागेवरच रोकून धरले पाहिजे. लॉकडाउन उघडून सारं परत सुरू करावं लागणार आहे. त्यासाठी मजूरांची नितांत गरज आहेच. तेंव्हा मजूरांची अडचण जाणून त्यावर मात करून उपाय शोधून त्यांना आपल्यातच सामाविष्ट करून घेणे शहरी व्यवस्थेची नैतिक जबाबदारी आहे. दूसरं म्हणजे याउपरही ज्यांना जायचेच आहे त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था करून दिली पाहिजे.

तिसरे जे काम तातडीने करावयाचे आहे ते म्हणजे शेती धोरण अमुलाग्र बदलावे लागणार आहे. 70 वर्षात आपण केलेले नाटक ढोंग उघडे पडले असून शेतीच जास्तीत जास्त माणसांना सांभाळू शकते, रोजगार देवू शकते. 13 टक्के इतकाच देशाच्या जीडिपीत हिस्सा असताना ही शेती 60 टक्के जनता सांभाळत आहे.  तेंव्हा शेतीच्या मार्गातील अडथळे दूर केलेच पाहिजेत. आवश्यक वस्तू कायदा सारख्या जूलमी कायद्यात बदल करून  मोदी सरकारने  आशावाद जागवला आहे. याच्या पुढे जावून जमिन धारणा, जमिन अधिग्रहण सारखे कालबाह्य कायदे रद्द बादल झाले पाहिजेत. घटनेच्या 9 व्या परिशिष्टाचा फास शेतीच्या गळ्याभोवती पडला आहे. तो सोडवला पाहिजे. तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य या दोन बाबींवर तातडीने विचार झाला पाहिजे.

सोनिया-राहूल-प्रियंका (एस.आर.पी.) या तिन तिघाडा काम बिघाडापासून कॉंग्रेसची सुटका झाली तर विरोधी पक्ष म्हणून काही एक चांगले चित्र देशासमोर येईल. अन्यथा कॉंग्रेसचा नाद पूर्णत: सोडून इतर विरोधी पक्षांनी स्वतंत्र सक्षम अशी आघाडी उभारली पाहिजे. आताच्या गांधी घराण्याची ही ‘आंधी’ म्हणजे वादळ नसून आंधी म्हणजे आंधळेपणाने  चालवलेला कॉंग्रेसचा पक्षाचा खड्ड्यात जाणारा प्रवास आहे. त्यातून कपाळमोक्षच होणार हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही. कॉंग्रेसवाल्यांनी यांना दूर करावं तरच पक्षाला भवितव्य आहे. विरोधी पक्षांनी यांचा नाद सोडला तरच उत्तम.

बाकी सामान्य देशवासियांनी सत्ताधार्‍यांवर शेतीविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी दबाव वाढवला पाहिजे. तरच आपण या मजूरांच्या गंभिर समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधू शकू.

जमात-ए-पुरोगाम्यांची पायाचे, सायकलवरून जाणार्‍या मजूर कुटूंबाचे, म्हातार्‍या आईला पाठीवर घेतलेल्या मुलाचे हवे तेवढे फोटो कुठून कुठून आणून ढापून छापावेत त्याने काहीच फरक पडणार नाही. बाकी समाजवादी पद्धतीनं हा प्रश्‍न कितीही सोडवायचा प्रयत्न करा त्यातून ‘त्यांची गरिबी दूर होते’ गरीबी हटत नाही हेच कटू सत्य समोर येत जाणार आहे. 
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, May 18, 2020

युट्यूब- टिकटॉक वादात गे, मुसलमान कशासाठी?


उरूस, 18 मे 2020

गेली काही दिवस नेटवर यु-ट्यूब आणि टिकटॉक कलाकरांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. युट्यूबचा स्टार कॅरि मिनाटी (खरे नाव अजय नागर) आणि टिकटॉक स्टार अमीर सिद्दीकी यांच्यातील हे भांडण शिवीगाळ गलिच्छ भाषेत सुरू आहे. यातील काही व्हिडिओ या समाज माध्यमांनी उडवून टाकले आहेत. पण तरी यांचे समर्थक आपसांत घाणेरड्या भाषेत वाद करतच आहेत. अगदी मुलीसुद्धा अश्‍लिल बिभत्स भाषा वापरत आहेत त्यावरून हा मुद्दाम केलेला बनाव आहे की काय अशी पण शंका येते. कोरानाच्या काळात सगळेच रिकामे बसून आहेत. त्यातल्या त्यात या कलाकरांचे चाहते असलेली तरूण पिढी (वय वर्षे 14 ते 30) यांना भरपूर वेळ आहे आणि हातात मोबाईल आहे. बाकी काही नसले तरी सध्या नेटवर्क चंागले उपलब्ध आहे. म्हणूनच ही शंका येते की हा वाद जाणिवपूर्वक उफाळून आणला गेला आहे की काय?

ज्यांना या विषयाचे बाकी बारकावे समजून घ्यायची उत्सूकता आहे त्यांनी नेटवर जरासा शोध घ्यावा. शेकडो व्हिडीओ उपलब्ध आहेत. सामजिक दृष्ट्या आक्षेपार्ह असे काही उल्लेख या वादांत समोर आले आणि ते माझ्या दृष्टीने घातक आहेत. तेवढ्यापुरतेच मी लिहीतो आहे.

यातला पहिला संदर्भ येतो तो इस्लामचा. टिकटॉकचे जे कलाकार आहेत जे या वादात ट्रोल होत आहेत ते मुसलमान आहेत. त्यांनी एके ठिकाणी तबरेज अन्सारीच्या झुंडबळीचा (मॉब लिंचिंगचा) उल्लेख केला.  पुढे चालून त्याचा मुलगा मोठा होवून सूड उगवेल तर त्यावेळी ‘मुसलमान अतिरेकी असतात’ असं म्हणून नका असे सांगितले. शिवाय वारंवार रमझानचा महिना असल्याने शिवीगाळ आम्ही करणार नाही असं म्हणत शिव्याही देवून घेतल्या आहेत.

दुसरीकडे युट्यूबच्या कॅरिमिनाटीच्या पाठिराख्यांनी या टिकटॉक कलाकरांना रोस्टींग (हा खास इंग्रजी शब्द टर्र उडवणे मजा घेणे चिडवणे यासाठी वापरल्या जात आहे) करताना ‘गे’, ‘छक्का’, ‘मिठा’, ‘दिदी’, ‘लौंडी’ अशी विशेषणं वापरून नामोहरम करण्याचा प्रकार केला आहे.

व्यवसायासाठी या कलाकारांचा वापर करून घेतला जात आहे हे तर उघडच आहे. यांना यासाठी जे काही पैसे मिळत असतील हा त्यांचा त्यांचा प्रश्‍न आहे. काही कलाकारांना स्वत:ला ‘रोस्ट’ करून घेण्यात रस आहे कारण आपल्याला रोस्ट करा असा आग्रहच हे कलाकार उघडपणेच करत आहेत त्यावरून लक्षात येतेच.

पण यात कारण नसताना इस्लामला कशाला ओढल्या जाते आहे? मुळातच इस्लामला प्रतिमा महिमा मंजूर नाही. कलाकाराचा चेहरा सतत लोकांसमोर येत राहतो, यातील बहुतांश टिकटॉक व्हिडीओत गाण्यांचा वापर केला जातो जेंव्हा की इस्लामला संगीतच मंजूर नाही, मग हे टिकटॉक कलाकार जे स्वत:ला स्टार मानतात ते इस्लामच्या आड का लपत आहेत?  तसेही ते आधीपासूनच इस्लमाबाह्य कृत्य करत आले आहेत.
आता त्यांच्यावर टिका करणार्‍या यु-ट्यूब कलाकारांनी या टिकटॉक कलाकारांवर ‘गे’ असण्याचे आरोप करत गलिच्छ बिभत्स अश्‍लिल भाषा वारंवार वापरण्याचे काय कारण?

ज्या मुख्य टिकटॉक कलाकारांना टार्गेट केले जात आहेत ते आमीर सिद्दीकी, फैजल शेख, रियाज, आवेज, अदनान हे सर्वच मुसलमान आहेत. इस्लामला समलैंगिकता मंजूर नाही. तशी ती कुठल्याच धर्माला मंजूर नाही. पण इस्लामिक देश या बाबत कट्टर आहेत.

भारतीय कायद्याने नुकतेच 377 कलम शिथिल करून या संबंधांना गुन्हेगारी कलम लावले जाणार नाही असं घोषित केले आहे. मग अशा वातावरणात जेंव्हा की एल.जी.बी.टी. समुदायाने एक मोकळा श्‍वास नुकताच घेतला आहे. त्यांच्या हक्कासाठी काही सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती  मोठ्या कष्टाने चिवटपणे चळवळ चालवित आहेत या सगळ्यांना अशा वादांमुळे किती हानी पोचत आहे याचा विचार झाला पाहिजे.

कोरोनाच्या या भयानक संकटाला तोंड देताना औरंगाबादेतील तृतियपंथी, गे, लेस्बियन यांना अन्नधान्य मिळायची मारामार झाली. गैरसमजातून एका कॉलनीतल्या लोकांनी यांच्यावर बहिष्कारच टाकला. मी स्वत: या संघटनांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना इतर काही सामाजिक संस्थांशी जोडून दिले. या लोकांना धान्य मिळून त्यांची उपासमार थांबली. जिल्हाधिकारी, शांतिगिरी महाराज यांनी यात लक्ष घालून आणखी काही मदत मिळवून दिली.

म्हणजे एका साध्या कृतीने समाजात या समुदायाबाबत तेढ निर्माण होते. ती दुरूस्त करायला इतरांना किती कष्ट करावे लागतात हा माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याचा ताजा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर यु-ट्यूब कलाकारांकडून ‘गे’वर गलिच्छ टिप्पणी दुखावून जाते. मजा करणे चिडवणे टर्र उडवणे वेगळे आणि किमान सभ्यतेचा पायाच उखडून टाकणे वेगळे.

सामान्य मुसलमान या संकटात होरपळून निघाला आहे. तबलिगींमुळे सगळ्यात मोठा धोका मुसलमांनानाच झाला आहे. या वातावरणात कलेच्या वादात नाहक हिंदू-मुसलमान तेढ निर्माण करून आापण किती मोठे नुकसान देशाचे करतो आहोत याचा अंदाज तरी या कलाकारांना आहे का?

अशा व्हिडिओजना डिस्लाईक करून तूम्ही त्यांची तक्रार करू शकता. त्यामुळे हा वाद वाढणार नाही. तसेही जाणकार लोकांमुळे यातील बहुतांश व्हिडिओ काढून टाकल्या गेले आहेतच.

तृतियपंथि कलाकारांना ‘किन्नर’ संबोधून आपल्या समाजाने हजारो वर्षांपासून व्यवस्थेत समाविष्ट करून घेतले आहेच. शिवाय त्यांना एक विशिष्ट स्थानही दिल्या गेले आहे. कुंभमेळ्यातही आता लक्ष्मी त्रिपाठी हिला महामंडलेश्वर बनवून ‘किन्नर’ आखाड्याला मान्यता देवून आपल्या समाजाने उदारतेचा परिचय दिला आहे. दिशा शेख सारख्या किन्नरला वंचित बहुजन आघाडीने आपला प्रवक्ता नेमून सामाजिक अभिसरणाला मोठीच मदत केली आहे.

वाद कलेच्या पातळीवरच रहावेत. समाजात हिंदू विरूद्ध मुसलमान, स्टे्रट विरूद्ध गे अशा छटा उमटू नयेत.
टिकटॉक हे चायनीज ऍप आहे. त्याचा विरोध करोनाच्या पातळीवर होतो आहे आणि तो योग्यच आहे. काही देशांत टिकटॉक बॅन झाले आहेच. आपल्याकडेही हे बॅन झाले पाहिजे. आणि आता चीनला नामोहरम करायच्या धोरणाचा भाग म्हणून तर जरूरच या प्रस्तावाचा विचार झाला पाहिजे.     
 
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, May 17, 2020

वैशाखाच्या फांदीवरती आषाढाची गाजरपुंगी !


काव्यतरंग, 17 मे रविवार 2020 दै. दिव्यमराठी

अभ्रांच्या ये कुंद अफुने,
पानांना ह्या हिरवी गुंगी
वैशाखांतिल फांदीवरती
आषाढाची गाजर-पुुंगी

मिटून बसली पंख पाखरे
पर्युत्सुक नच पीसहि फुलते
मूक गरोदर गाईची अन्
गळ्यांतली पण घंटा झुरते

तिंबून झाली कणीक काळी
मऊ मोकळी ह्या रस्त्याची
उष्ट्या अन्नामध्ये थबकली
चोंच कोरडी बघ घरीची

ब्रेक लागला चाकांवरती
श्वासहि तुटला आगगाडीचा
ऊन उसासा धरणीच्या अन्
उरांत अडला इथे मघाचा

शिरेल तेंव्हा शिरो बिचारे
हवेत असल्या पाऊस-पाते
जगास तोंवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजल चढते !

-बा.सी. मर्ढेकर, (मर्ढेकरांची कविता, मौज प्रकाशन, आ.1 पुनर्मुद्रण 1991, पृ. 78)

हे दिवस नेमके वैशाखाचे आहेत. मर्ढेकरांनी हे जे वर्णन केलं आहे ते कविता निर्मिती प्रक्रियेबाबत आहे असं एक वेगळं महत्त्वाचं विश्लेषण विनय हर्डिकर यांनी ‘कारूण्योपनिषद्’ या मर्ढेकरांच्या कवितेवरील पुस्तकांत केले आहे. अनिलांची ‘श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला, पंखी खुपसून चोंच एक पक्षी निजलेला’ या ओळीही कविता निर्मितीची गोष्ट सांगतात. 

वैशाखा नंतर येणारा ज्येष्ठ जेंव्हा मृगाचा पाउस येतो. पण हा पाउस नियमित पडतो असे नाही. आषाढाचा पाउस मात्र हक्काचा नियमित पडणारा असा मानला जातो. कालिदासाने आपला निरोप सांगण्यासाठी ज्येष्ठाच्या ढगांवर विश्वास नाही ठेवला. आषाढाच्या पहिल्या दिवशी जो ढग दिसतो जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे आणि जास्त अंतर कापू शकतो, हक्काने पाउस पाडू शकतो. त्यामुळे मर्ढेकरही वैशाखाच्या फांदीवरती ज्येष्ठाची गाजरपूंगी असं म्हणत नाहीत. आषाढाचीच म्हणतात.

हे वर्णन लॉकडाउनच्या दिवसांनाही लागू पडतं. सगळं ठप्प आहे. वैशाखातील हे जे वातावरण आहे ते सामाजिक पातळीवरही तसेच आहे. सगळा व्यवहार ठप्प होवून बसला आहे. कुणाला काहीच सुचत नाहीये. पुढे काय होणार काहीच कळत नाहीये. ‘शिरेल तेंव्हा शिरो बापडे हवेत असल्या पाउसपाते’ ही जी विलक्षण ओळ मर्ढेकरांच्या कवितेत आली आहे तशीच सगळ्यांची मानसिकता होवून बसली आहे. काही तरी बदल होवो. तो जेंव्हा होईल तेंव्हा होवो पण तोवर ‘मृगाविनाही मृगजळ चढते’ अशीच स्थिती आहे.

कवितेचा एक साधासा अर्थ आहे. जमिन तयार होवून पावसाची वाट पहाते आहे. पेरणी होण्यासाठी आधीची जी मशागत करावी लागते ती झाली आहे. ‘तिंबून झाली कणिक काळी’ यातून निर्मिती आधीच्या सगळ्या त्रासातून जातो आहे हे सुचित होते. एक विलक्षण तगमग या काळात अनुभवायला येते आहे. 

‘ब्रेक लागला चाकांवरती अन् श्वासही तुटला आगगाडीचा’ या ओळींतून आता घरंगळत काही जात नाही. सगळं थांबलं आहे. एरव्ही पुढे काहीच घडणार नाही हा निराशावाद असता तर हे थांबणं शक्य नव्हतं. या थांबण्यातूनच पुढचं काही घडण्याची शक्यता सिद्ध होते आहे. या कवितेला लागून पुढची कविता ‘आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी’ ही आहे कारण निर्मिती घडून गेल्यानंतरचा जो आनंद आहे त्याची आहे असे अप्रतिम विवेचन विनय हर्डीकर यांनी केले आहे.

विविध समिक्षकांनी मर्ढेकरांची ही आणि इतर अशाच कविता खुप चांगल्या पद्धतीने उलगडून दाखवल्या आहेत. या कवितेचा एक लोभसपणा तिच्या सहज लक्षात येणार्‍या साधेपणात आहे. जो कुणाही रसिकांना एकदम आपलासा वाटतो. खुप मोठा अर्थ लक्षात येण्याआधी कुणालाही एखादं काही घडण्यापूर्वीची विलक्षण तगमग यात दिसते. काही वेळेला आपल्या हातात काहीच नसते. आपण मग शांतच बसून रहातो. ‘पर्युत्सूक नच पिसही फुलते’ अशी ती अवस्था असते. आताही कोराना काळात सगळेच अस्वस्थपणे शांत बसून आहेत. काय करावे काहीच सुचत नाही. काही करताही येत नाही. एक आशावाद तेवढा मात्र आहे की कधीतरी हा होईना पाउस यईल, उशीरा येईल पण येईल नक्की. 

मर्ढेकर सहजपणे भारतीय मानस या कवितेतून मांडत आहेत. उकिरड्याचे पण पांग फिटतात, दिवस पालटतात, दू:ख काही घर बांधून रहात नाही, आपण दू:ख दळून खाणारी माणसं आहोत असे कितीतरी दाखले आयाबायांच्या बोलण्यातून आढळून येतात. जात्यावरच्या ओव्यांतूनही हा आशावाद आपण जपलेला आहे.

कुखू राहू दे कपाळी, मान राहो आहेराला
ऊन तापता इखारी, सावली दे माहेराला

कोरोनाच्या उदास काळातही गुलमोहर फुलला आहे, पिंपळाची कोवळीलूस पानं वैशाखी पौर्णिमेला चांदण्यात चमचमत आहेत, बहाव्याच्या पिवळसर फुलझुंबरांनी डोळ्यात, मोगऱ्याच्या गंधाने  श्वासात, कोकळीच्या स्वरांनी कानांत चैतन्य निर्माण केले आहे. 

‘ब्रेक लागला चाकांवरती, श्‍वासही तुटला आगगाडीचा’ यातून एक वेगळा अर्थ या कोरोनाच्या काळात निघतो आहे. सगळं मानवनिर्मित यांत्रिक जग कोरोनासमोर ठप्प झालं आहे. एकदम ब्रेकच लागला आहे. आणि आशा दिसते आहे ती निसर्गातूनच. 
(छायाचित्र श्रीकृष्ण उमरीकर)
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, May 14, 2020

मौ. सादच्या बचावासाठी ‘फेक’न्यूजचा वापर!


उरूस, 14 मे 2020

तबलिग प्रकरणी मौलाना सादला आता पुरते घेरल्या गेले आहे. तबलिगी मरकजसाठी परदेशांतून मोठ्या प्रमाणात पैसा जो तबलिगच्या खात्यांवर आला त्याचीही चौकशी सक्त वसूली संचालनालय (ई.डि.) ने सुरू केली असून हा फासही साद भोवती आवळला गेला आहे.

सुरवातीला तबलिगचे प्रवक्ते ऍड. मुजीबूर रेहमान सांगत होते की साद फरार झाला नसून कोरोनामुळे सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. क्वारंटईनचा 14 दिवसांचा काळ तर लोटलाच पण अजून दोन क्वारंटाईनचा 28 दिवसांचा काळही संपला. पण फरार साद समोर आला नाही. मग मुजीबूर रेहमान यांनी जाहिर केले की सादने कोरोना टेस्ट केली आहे. पण त्याचा अहवाल देण्यास ते तयार झाले नाहीत. मग तबलिगने जाहिर केले की मुजीबूर रेहमान आमचा प्रवक्ताच नाही. केवळ एक कार्यकर्ता आहे. आताही चॅनेलवरील चर्चेत साद तपास यंत्रणांना केंव्हा शरण येणार हे नेमके न सांगता मुजीबूर रेहमान बाकी वेळ घालविण्याच्या गोष्टी करत राहतात.

अशातच इंडियन एक्सप्रेसने मागील आठवड्यांत साद बाबत एक बातमी प्रकाशीत करून जमात-ए-पुरोगांमींना सादच्या बचावासाठी एक आधार तयार करून दिला. दिल्ली गुप्त पोलिसांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने अशी बातमी दिली की सादच्या बाबतीत ज्या ऑडिओ क्लिप सुरवातीला समोर आल्या त्या खोट्या आहेत. सोशल डिस्टसिंगचे पालन मुसलमानांनी करू नये. मस्जिदम मध्ये या. इथे मृत्यू आला तर चांगलेच आहे. असे त्या ऑडिओत सांगितले होते.

हे सगळे खोटे आहे. हा ऑडिओ तूकडे तूकडे जोडून संदर्भ तोडून तयार केलेला आहे. त्यामुळे सादवरचे सर्व आरोप खोटे ठरतात.

ही बातमी आली की जमात-ए-पुरोगामी खुश झाली. तिला पाठिंबा देणारा सर्व लष्कर-ए-मिडिया एकदम उत्साहात आला. अल्ट न्यूज, द वायर, द प्रिंट, पुरोगाम्यांचे शिरोभूषण ऍड. प्रशांत भुषण, मोहम्मद जुबेर, रविशकुमार फॅन्स क्लब या सर्वांनी आपल्या न्यूज पोर्टलवर, ट्विटरवर ही बातमी जोशात चालवली.

सोशल मिडियावर सादचे पंटर लागली तयारच होते. त्यांनीही ही पोस्ट सर्वत्र फिरवायला सुरवात केली. पण या जमात-ए-पुरोगामींना हे लक्षातच आले नाही की तंत्रज्ञानाचा वापर करून सत्य शोधणे आणि ते सर्वत्र पोचवणे आता सहज शक्य आहे. पूर्वीसारखे असत्य फार काळ लोकांवर थोपवता येत नाही.

दिल्ली पोलीसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या बातमीच्या खोटेपणाचा पुरावा लगेचच समोर आला. ही बातमी खोटी असल्याचे समोर आल्यावर प्रशांत भूषण सारख्यांनी लगेच माफी मागत ट्विट काढून टाकले. मोहम्मद जूबेरसारख्यांनी आपल्या ट्विटवरून लगेच ही बातमी उडवली. पण याचे फोटो इतरांनी घेवून ठेवले असल्याने हे सर्व आता तोंडघशी पडले आहेत.

आश्चर्य याचे वाटते की तथाकथित बुद्धीवादी विचारवंत पत्रकार हे सगळे असल्या खोट्या प्रचाराला बळी का पडतात? इंडियन एक्सप्रेसने ही बातमी चालविण्या आधी दिल्ली पोलिसांकडून याची खातरजमा करून घ्यायला हवी होती. दुसरी गोष्ट म्हणजे मौलाना सादचा बचाव कशासाठी? कोरोना पसरविण्याचा भयंकर गुन्हा त्याने केला आहे. त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण हे त्याला वाचवायला का निघाले आहेत?

तबलिगची बाजू घेणारे एक मुद्दा सारखा मांडतात की विशिष्ट समाजाला कारण नसताना टार्गेट केले जात आहे. खरं तर अगदी पहिल्या दिवसांपासून कुणीही मुसलमान असा शब्द वापरला नाही. केवळ तबलिगींवरच टिका होत आली आहे. सर्व साधारण मुसलमांनावर नाही. याच काळात कर्नाटकांत माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाच्या लग्नासाठी गर्दी जमा झाली, कर्नाटकातच एका यात्रे निमित्त लोकांनी गर्दी केली. या दोन्ही बाबींचा बहुतांश हिंदूंनी निषेध केला.

मला स्वत:ला औरंगाबादच्या मौलाना मिर्झा नदवी यांनी आवाहन केले होते की तूम्ही कोरोना काळातील हिंदूंच्या गैर वर्तनाचा निषेध करून दाखवा. मी दाखवला शिवाय त्याला बहुतांश हिंदू मित्रांचा पाठिंबाही आहे हे सोशल मिडियावर सिद्ध करून दाखवले. उलट जेंव्हा मी त्यांना आवाहन केले की तूम्ही आता सादचा आणि तबलिगींचा निषेध करून दाखवा. पण ते तयार झाले नाहीत. आताही जेंव्हा साद बाबतची ही बातमी फेक असल्याचे समोर आल्यावर कुणी ती शेअर करून आम्ही चुकल्याचे कबुल करायला तयार नाही. ही बाब आक्षेपार्ह आहे.

हिंदूंमधील गैर रूढी परंपरा त्रूटी यांसाठी टिका सुधारकांकडून होते आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा हिंदू देतातही. या उलट इस्लामधील गैर परंपरा रूढी यांबाबत असं काही घडत नाही. बहुतांश मुसलमान सुधारक म्हणवून घेणारे हिंदूंची जात काढतील, त्यांच्यावर टीका करतील (एक सुधारक म्हणूवन घेणार्‍या मुसलमान मित्राने हे फेसबुकवर माझ्या बाबत केले आहे.) पण खुद्द त्यांच्याच इस्लामधील सुधारणांबाबत चकार शब्द काढणार नाहीत.

आता मौलाना साद बाबत ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत आहेत हे चित्र धोकादायक आहे. गुन्हेगार असूनही पाठिशी घातलं जातं आहे. खोटेपणाचे पुरावे समोर आले तरी ते मान्य करायचे नाहीत. उलट खोटीच का असेना पण सादला सोयीची बातमी समार आली की ती शेअर करण्यात मोठा उत्साह दाखवला जातो आहे.

कायद्याने सादर सारख्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

पुलित्झर पुरस्कारामागचे भारत विरोधी कारस्थान अभ्यासकांनी उघड करून दाखवल्यावर हे जमात-ए-पुरोगामी मौनात गेले आहेत. शाहिनबाग, तबलिग, पुलित्झर या सर्वांबाबत सत्य समोर आले की पाठ फिरवली जात आहे. म्हणजे जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या. जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणल्या गेली. दुसरी बाजू समोर येताच आता याकडे दुर्लक्ष करून नविन विषय हाती घेतले जात आहेत.

हा कट ओळखायची आणि तो हाणून पाडायची गरज आहे. यात सगळ्यात एक कलात्मक नक्षलवाद दिसून येवू लागला आहे. तो ओळखता आला पाहिजे.   
 
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, May 13, 2020

पुलित्झर फोटोमागचे दाहक सत्य!


उरूस, 13 मे 2020

पुलित्झर पुरस्काराचे रामायण सुरू असताना आता अजून काही बाबी स्पष्टपणे समोर येत चालल्या आहेत. जमात-ए-पुरोगामींचा हा भारत विरोधी कट आहे हे आता लपून राहिलं नाहीये. याला मानावाधिकार, कलेचे स्वातंत्र्य असे कितीही गोंडस नाव दिले तरी सत्य लपत नाही.

पार्थ परिहार या प्रिन्सटन विद्यापीठातील पीएच.डि. करणार्‍या (पॉलिटीकल इकॉनॉमी अँड गेम थिअरी) भारतीय विद्यार्थ्याने पुलित्झरचे कटू सत्य बाहेर आणायला सुरवात केली आहे. त्याने एक मोठा लेखच यावर लिहीला आहे.

लेखात वापरलेला फोटो आपण उदा. म्हणून समजून घेवू. 11 वर्षीय आतिफ मीर या मुलाच्या शवाभोवती शोक करणारे कश्मिरी यात आपल्याला दिसत आहेत. दार यासिन याच्या या फोटोतून असा संदेश जातो की बघा भारतीय सेना किती क्रुर आहे. कोवळ्या 11 वर्षीय मुलाचा बळी यांनी घेतला. यावर तारीख आहे 22 मार्च 2019. या गावाचे नाव आहे  हाजिन. श्रीनगरच्या उत्तरेला हे गांव असून हे ‘इंडियन कंट्रोल्ड कश्मिर’ मध्ये आहे. असा उल्लेख या फोटो खाली आहे.

जमात-ए-पुरोगामींचे पितळ उघड पडायला सुरवात होते ती या घटनेच्या तारखेपासून. आधी सांगितलं गेलं होतं की 370 हटवल्यानंतर कश्मिरात जनजिवन विस्कळीत झाले, सेनेने मुस्कटदाबी केली, इंटरनेट बंद केले वगैरे वगैरे. सामान्य कश्मिरी नागरिक खुप अस्वस्थ, प्रचंड ताणाखाली आहेत.

370 हटवले ती तारीख कोणती होती? 5 ऑगस्ट 2019. पण हा फोटो तर 22 मार्चचा आहे. मग या दिवशी नेमकी काय घटना घडली होती? कुणाला असे सहज वाटू शकेल की सैन्याने केलेल्या गोळीबारात हा निष्पाप मुलगा मारला गेला.

लष्कर-ए-तोयबा च्या आतंकवाद्यांनी आतिफ आणि त्याचा काका अब्दूल हमीद यांना त्यांच्याच घरात ओलिस ठेवले होते. सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करताना आतंकवाद्यांनी या घराचा आश्रय घेतला. आणि या दोघांना बांधून ठेवले. सुरक्षा दलांनी त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून या निष्पाप कश्मिरी नागरिकांना वेठीस धरले होते. कसा बसा अब्दूल हमीद या कैदेतून सुटका करून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण हा कोवळा पोरगा आतिफ मीर मात्र तसाच आतंकवाद्यांच्या ताब्यात अडकून पडला. सुरक्षा दलाच्या जवांनानी आतिफची आई आणि इतर कुटूंबियांना आणि गावकर्‍यांना विनंती केली की तूम्ही आतंकवाद्यांना आतिफला सोडून द्यायला सांगा. या गोळाबारीत निष्पाप लोकांचा बळी जायला नको. दोन दिवस सुरक्षा दलाच्या जवानांनी वाट पाहिली. आतंकवाद्यांनी आतिफला सोडण्याची तयारी दाखवली नाही. सुरक्षा दलांनी ते घर स्फोटात उडवून दिले. तीन वेळा झालेल्या गोळाबारीत 5 आतंकवाद्यांचा खात्मा झाला पण सोबतच हा कोवळा पोरगा मारला गेला.

ही सगळी कथा आपल्याला समजावून सांगितली जात नाही. केवळ वरचा फोटो दाखवून असा समज करून दिला जातो की सैन्यदल कशा प्रकारे निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत.

असा एक प्रकारे बुद्धिभेद सामान्य भारतीयांचा केला जातो आहे. असे चित्र उभे केले जात आहे की कश्मिरचा सामान्य माणूस शांततेच्या मार्गाने त्यांचे स्वातंत्र्य आंदोलन चालवत आहे. आणि त्यांच्यावर भारतीय लष्कराकडून प्रचंड अत्याचार केले जात आहेत. टुकडे टुकडे गँगचा पोस्टर बॉय कन्हैय्या कुमार याने असा आरोपच केला आहे की सैनिक कश्मिरात सामान्य जनतेवर आत्याचार करत आहेत.


आता दुसरा फोटो बघू. एक कश्मिरी नागरिक हातात दगड घेवून पोलिसांच्या गाडीवर फेकत आहे शिवाय लाथ मारत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य रंगवताना जमात-ए-पुरोगामी असं सांगतात की सामान्यांना चिरडून टाकणार्‍या सुरक्षा दलांच्या वाहनांवर सामान्य नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत.

आता या फोटोखालची तारखी पहा. ती आहे 31 मे 2019. या दिवशी नेमके काय घडले होते? या दिवशी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन आतंकवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलांनी केला होता. त्याच्या विरोधात भारतविरोधी भावना उचंबळून आली व लोकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. या वाहनाच्या समोरचे चाक जरा वळलेले आहे. यात चालक दिसत नाही. याचा अर्थ ही काही चालू असलेली गाडी नाही. ही बंद पडलेली किंवा एका जागी उभी असलेली गाडी आहे. शिवाय गाडीच्या पलीकडे अजून दोन पाय दिसत आहेत. म्हणजेच एकट्या दुकट्या सामान्य नागरिकांना चिरडणारी गाडी आणि तिच्यावर संतापून दगड फेकणारा सामान्य नागरिक असं हे चित्र नाही. तर हिजबुल मुजाहिदीनच्या आतंकवाद्यांचा खात्मा केला म्हणून पोलिस दलाच्या उभ्या असलेल्या बंद गाडीवर दगड फेकणारा क्रुर जमाव असे हे चित्र आहे. बागी जमाव पाठीमागे असणार हा समोर आलेला केवळ एक नागरिक आहे.

परत या तारखेकडे लक्ष द्या. 31 मे म्हणजे याचा 370 हटविल्याशी काहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्यासाठी या फोटोंचे कौतूक केले जात आहे.

पार्थ परिहार यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे. या लेखाची लिंक खाली देत आहे. तो जरूर वाचा. मी यातील केवळ 10 टक्के भागच सांगितला आहे. पुलित्झर पुरस्कारामागचे बाकी राजकारण खुप मोठे आहे.

https://medium.com/@parihar.parth/the-pulitzer-is-a-portal-b157bc0f6850
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, May 12, 2020

संघद्वेषी जयदेव डोळेंचा वैचारिक आंधळेपणा !


उरूस, 12 मे 2020

सराईत गुन्हेगार गुन्हा केल्या शिवाय राहूच शकत नाहीत किंवा पट्टीचा व्यसनी माणूस व्यसनाशिवाय राहू शकत नाही. तसेच प्रा. जयदेव डोळे यांचे वैचारिक पातळीवर झालेले दिसत आहे. मोदी-संघ-अमितशहा-भाजप या एम.एस.ए.बी. ला शिव्या दिल्या शिवाय यांना राहवतच नाही. एकदा का ही वैचारिक गरळ अधून मधून ओकली की यांची तबियत बहुतेक चांगली रहात असावी.

लॉकडाउन च्या गंभीर परिस्थितीत कामगारांची स्थिती फारच भयानक झाली आहे. अस्वस्थेतून हे कामगार आपल्या गावी परत जावू पहात आहेत. वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे काही पेचप्रसंग उभे रहात आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्था सगळेच प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी हे प्रयत्न अपुरे पडतात आणि जालन्या जवळ करमाडला घडली तशी दुर्घटना घडते. मजूरांचा रेल्वेखाली जीव जातो. हा अपघात आहे.  यात कुठला पक्ष संघटना व्यक्ती यांच्यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. पण शांत बसतील ते जयदेव डोळे कसले.

‘अक्षरनामा’ नावाच्या पोर्टलवर त्यांनी 11 मे 2020 रोजी एक लेख लिहीला. त्याचे शिर्षक आहे, ‘ते अटळ विहारी पायी पायी, हे सुखी निलाजरे भाजपाई’.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावांतील शब्दांचा वापर करत असला शाब्दिक खेळ त्यांनी केला आहे. मुळात हे कामगार जे बिचारे पायी पायी निघाले आहेत त्यांची वेदना अपार आहे. या त्यांच्या चालण्याला  डोळे ‘विहार’ कसे काय म्हणू शकतात? एम.एस.ए.बी. वर टीका करताना कामगारांच्या वेदनेचा उपहास कशासाठी?

या कामगारांचा मृत्यू झाला त्या स्थळी जालन्याचे खासदार असलेले केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे का नाही गेले असा ‘खडा’ सवाल करणारे डोळे याच जालन्याचे राज्य मंत्रीमंडळात मंत्री असलेले राजेश टोपे यांना मात्र सोयीस्करपणे विसरून जातात. म्हणजेच यांचा आंधळेपणा विशिष्ट लोकांसाठीच आहे का? बाकी यांना काही दिसतच नाही? केंद्रावर टिका करताना कुठेच राज्य सरकारचा उल्लेख नाही. जसं काही जालना जिल्हा सरळ दिल्लीला जोडला आहे. मध्ये महाराष्ट्र राज्य नावाची काही यंत्रणा अस्तित्वातच नाही. (पत्रकार मित्र सारंग टाकळकर यांनी लेख लिहील्यावर माहिती पुरवली की रावसाहेब दानवे अपघातस्थळी गेले होते. डोळे यांच्या खोटारडेपणाचा अजून एक पुरावा.)

डोळेंच्या लेखावर टीका करण्याचे तसे काही कारण नव्हते. पण  वैचारिक भ्रष्टाचाराचे पुरावे लेखात असल्याने त्याची दखल घेणे भाग पडले. सदसद्विवेक बुद्धीने विचार करणारा जो वाचक वर्ग आहे त्याच्या समोर हा भ्रष्टाचार येणे मला आवश्यक वाटते. बाकी डोळे आणि जमात-ए-पुरोगामी यांच्याशी मला काही कर्तव्य नाही.

डोळे लिहून जातात, ‘श्रमामधून संपत्ती निर्माण होते हा सिद्धांत संघ मानत नाही.’ आता मुळात डोळे हा आरोप कशाचा जोरावर करतात? डोळे यांचा हाच लेख नाही तर त्यांचे इतरही संघद्वेषी लिखाण वाचून आम्ही हा प्रश्‍न विचारतो आहोत. यात अजून एक वैचारिक भ्रष्टपणा आहे. कारखान्यात मजूरांच्या श्रमाचे शोषण होते व त्यातून नफा निर्माण होतो हा मार्क्सचा सिद्धांत मांडत असताना डोळे मुळात कारखाना कुणाच्या शोषणातून उभा राहिला? त्यासाठी शेतकर्‍यांची बचत लुटल्या गेली हे लपवून ठेवतात.

मुळात संपत्तीची निर्मिती केवळ आणि केवळ शेतीतच होते. एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा चमत्कार फक्त शेतीतच होतो. बाकी ठिकाणी फक्त स्वरूप बदलते किंवा सेवा देवून त्याचे मुल्य घेतले जाते. पण मार्क्सची मर्यादा दाखवणार्‍या शेतकरी चळवळीतील या वैचारिक मांडणीकडे डोळे डोळेझाक करतात.

शेतीची उपेक्षा झाली म्हणून तर शेतीमधून मनुष्यबळ शहराकडे स्थलांतरीत होत गेले. आणि शेतीची ही उपेक्षा करणारे डोळेंचे लाडके समाजवादी नियोजनाचे कट्टर पुरस्कर्ते जवाहरलाल नेहरू हे होते. डोळेंना हे सगळं झाकून ठेवायचं असतं.

संघाला हे मान्य नाही हे म्हणत असताना डोळे गोळवळकर गुरूजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या एकमेव पुस्तकाचा आधार घेतात. वस्तूत: या पुस्तकांतील अप्रत्यक्ष चातुर्वर्ण्य समर्थक वाटणारा उल्लेख आम्ही अमान्य करतो आहोत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषद घेवून दिल्लीत विज्ञान भवन येथे सांगितले.  (मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून ओरडणारे सगळे जमात-ए-पुरोगामी मोहन भागवतांच्या पत्रकार परिषदांकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात) पण डोळे मात्र त्याचाच आधार घेवून आपला बडावा बडवीचा  वैचारिक उपद्व्याप करत राहतात. अमान्य केलेल्या अथवा नाकारलेल्या विचारांचा आधार प्रतिवादासाठी घेता येत नाही हे आपल्या दार्शनिक परंपरेतील महत्त्वाचे गृहीतक डोळेंच्या गावीही नाही. यालाच वैचारिक भ्रष्टाचार म्हणतात.

डोळेंचा राग उत्तर प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांवर आहे. मुळात कामगार कायदे बदलायला केंव्हा सुरवात झाली? भारतात जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कायदे नियम बदलायला सुरवात झाली. तंत्रज्ञान क्रांतीमुळे कामगारांच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. हे सगळे ज्यांच्या काळात झाले तेंव्हा पंतप्रधान पदावर कोणता निलाजरा भाजपायी होता? नरसिंहराव व त्यांचे अर्थमंत्री मनमोहनसिंग, देवेगौडा, गुजराल आणि पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यात कोण निलाजरा भाजपेयी आहे?

डोळेंचा वैचारिक भ्रष्टाचार उघड होतो तो इथे.

वैचारिक भ्रष्टाचारासोबत डोळे खोटारडेपणा करतात. डोळे बिनधास्त लिहून जातात, ‘कॉंग्रेसने रेल्वेचे भाडे चुकते करण्यापासून आरंभ केलेलाय.’ कुठेही रेल्वेची तिकीटे मजूरांसाठी ज्या गाड्या सोडल्या त्यात विकली गेली नाहीत. या तिकीटाचा 85 टक्के हिस्सा केंद्र सरकारने व 15 टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलला आहे. यात कुठल्याही पक्ष संघटना व्यक्ती यांचा संबंधच नाही. ही सगळ्यात जमात-ए-पुरोगामीची मोडस ऑपरेंडी होवून बसली आहे. आत्ताही मोठ्या उद्योगपतींचे 65 हजार करोड रूपयांचे कर्ज माफ केले असा खोटा आरोप असो की मौलाना साद बाबतीतल्या इंडियन एक्सप्रेसने छापलेल्या खोट्या बातम्या असो. यांचे पितळ काही काळातच उघडे पडले आहे.

या कामगारांचे वर्णन करताना डोळे काय लिहीतात ते बघा...

रस्त्यारस्त्यांवरून चालत निघालेल्या त्या लाखो भारतीयांना समजा एक काळी टोपी घातली. चॉकलेटी पँट आणि पांढरा शर्ट घालून तीत खोचला. काळ्या रंगाचे कातडी बूट आणि हातात एक दंडही दिला. कसे दिसतील सगळे कष्टकरी त्या गणवेशात? राष्ट्रवादी वाटतील की राष्ट्रसेवक? शिस्तीत घरांकडे निघालेले राष्ट्रवीर स्वयंसेवक की, या हिंदूराष्ट्राची उभारणी करणारे श्रमिक? पण स्वयंसेवक असा रिकामपोटी, भकास चेहऱ्याने अन हजारो किलोमीटर्सची फालतू पायपीट करणारा कसा असेल? तो तर गोबरे गाल, तकाकलेले शरीर, छोटीशी ढेरी, तेल लावून चोपलेले केस, त्या आधी सुस्नात होऊन कपाळावर गंध लावलेले आणि हिंदूराष्ट्राचे भव्य स्वप्न पुरे केल्याचे तुपकट समाधान तरळणारा चेहरा घेऊन हिंडणारा पराक्रमी पुरुष! हायवेवर काय काम त्याचे? अजून हायवे शाखा क्रमांक १०१ निघालेल्या नाहीत…

द्वेषाने आंधळे झालेल्या नजरेला हे असेच दिसणार.

विरोधाभास असा आहे की डोळेंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार्‍या घटना घडत आहेत. सरकार शिवाय लॉकडाउनच्या काळात सर्वात जास्त सेवाकार्य ‘तुपकट चेहर्‍याच्या गोबरे गालाच्या छोट्या ढेरीच्या’ संघ कार्यकर्त्यांकडूनच चालविले जात आहे.

(संवैधानिक इशारा : एम.एस.ए.बी. (मोदी-संघ-अमितशहा-भाजप) द्वेषाने पछाडलेल्या डोळेंसारख्या असहिष्णू जमात-ए-पुरोगामी लोकांनी हे वाचू नये. त्यांच्या रोगावर आमच्याकडे इलाज नाही. ट्रंपमुळे यांना आता अमेरिकेतही जायची सोय नाही. रशिया तर यांचा उरलाच नाही. चीनचा आसरा होता पण आता जा म्हटले तरी हे जाणार नाही. जमात-ए-पुरोगामींनी अंदमानवर जावून रहावं असा सल्ला दिला तर तो रोगापेक्षा भयंकर. कारण अंदमान म्हटलं की सावरकर आठवतात. आणि मग तर यांची वेदना दुप्पट वाढते. तेंव्हा जमात-ए-पुरोगामींनो माफ करा. सध्या काहीच उपाय नाही. बरं मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडणारे कुठे गेले तेही कळेना. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर  बाटलेली या देशाची भूमी मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यावर जमात-ए-पुरोगामींसाठी पावन झाली असेल तर मला कल्पना नाही.)

लॉकडाउनच्या काळात हा मूळ लेख वाचून स्वत:वर अत्याचार करून घेण्याची काडीचीही गरज नाही. ज्यांना स्वत:चा आनंद सुख समाधान धोक्यात घालायचे आहे त्यांच्यासाठी लेखाची लिंक खाली देत आहोत.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4255
 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575