Tuesday, November 28, 2017

गुजरातमध्ये उसाला भाव मग महाराष्ट्रात का अभाव?


उरूस, विवेक, 24 नोव्हेंबर 2017

महात्मा गांधी यांना असं विचारण्यात आलं होतं की गरीबी दूर करण्यासाठी काय करता येईल? महात्मा गांधी मोठे चतुर. त्यांना या प्रश्‍नातील खोच नेमकी कळली. गांधी म्हणाले तूम्ही गरीबांच्या छातीवर बसला अहात ते आधी उठा. गरीबी आपोआप दूर होईल. गरीबांसाठी म्हणून जे जे काही केलं जातं त्या सगळ्या उपद्व्यापातून गरीबी वाढत जाते हे कटू सत्य आहे. गांधी हे  अ-सरकारवादी होते. सरकार किमान असावं असा गांधींचा आग्रह. पण गांधींच्या शिष्याने म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी नेमके उलट केले. प्रचंड सरकारशाही नेहरूंनी तयार केली. त्याचे तोटे आपण सहन करतो आहोत.  

आज हे आठवायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेला उसाचा प्रश्‍न. शासनाने जी एफ.आर.पी. (फेअर ऍण्ड रिजनेबल प्राईस) कबूल केली आहे ती पण सहकारी साखर कारखाने देवू शकत नाहीत. आणि नेमकं याच काळात गुजरात मधील कारखाने थोडी थोडकी नव्हे तर महाराष्ट्रापेक्षा तब्बल हजार ते पंधराशे रूपये जास्त किंमत उसाला देत आहेत. मग साधा प्रश्‍न निर्माण होतो. शेतकर्‍यांचे भले व्हावे म्हणून निर्माण झालेला हा सहकार नावाचा सरकारी देखावा शेतकर्‍यांना चांगली किंमत का देवू शकत नाही? आणि ती जर देवू शकत नसेल तर हे सगळे सहकारी साखर कारखाने चालवायचेच कशाला? 

शरद पवार यांनी असं विधान केलं की जर जास्तीची किंमत उसाला द्यायची तर साखर कारखाने बंद पडतील. खरंच हा प्रश्‍न आहे की का चालवायचे हे कारखाने? शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी बंद पडलेलेच चांगले.

जेंव्हा शासन कापसाचा एकाधिकार चालवून खरेदी करत होते त्या प्रत्येक वर्षी कापसाला मिळालेली किंमत जागतिक बाजरपेठेपेक्षा कमीच राहिलेली आहे. जेंव्हा हा एकाधिकार उठला तेंव्हाच शेतकर्‍याला बर्‍यापैकी किंमत मिळायला लागली. दुसरे उदाहरण गहू आणि तांदळाचे आहे. महाराष्ट्रातील विदर्भाचे पाच जिल्हे तांदळाच्या एकाधिकार योजनेखाली येतात. इथे पिकलेला तांदळाचा दाणा न् दाणा सरकार ठराविक हमी भावाने खरेदी करते. तसेच पंजाब व हरियाणा येथे गव्हाच्या बाबतीत घडते. याचा परिणाम काय झाला? कृषी अर्थ तज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी आकडेवारीसह  सिद्ध केले आहे की तांदूळ आणि गव्हाचे भारतातील एकाधिकार खरेदीचे भाव सतत कमीच राहिले आहेत. अगदी आपले शत्रू राष्ट्र असलेले पाकिस्तान आणि चीन सुद्धा आपल्या भावाच्या दीड ते पावणेदोन पट भाव देत आले आहे. म्हणजे गहू तांदूळ पिकवणार्‍या शेतकर्‍यांनी काय देशद्रोह करून आपले धान्य बाहेर नेवून शत्रू राष्ट्राला विकावे? याच पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळणार आहेत. 

हीच वेळ आता साखरेवर आली आहे. शेतकर्‍यांची काळजी करायची म्हणून, शेतकर्‍याचे हित डोळ्यासमोर ठेवायचे म्हणून सरकार सहकारी साखर कारखानदारी चा खेळ खेळते. प्रत्यक्षात हा खेळ शेतकर्‍याच्या जीवावर उठतो. 

याचा अर्थच असा होतो की साखरेचा हा सहकारी खेळ काही विशिष्ट वर्गाला साखर स्वस्त मिळावी म्हणून खेळला जातो. याचा सामान्य शेतकर्‍यांच्या हिताशी काही एक संबंध नाही. 

आपण सगळी आकडेवारी बाजूला ठेवू. गरीबांसाठी म्हणून गहू, तांदूळ, साखर यांच्या किंमती स्वस्त राहिल्या पाहिजेत असं डावे विचारवंत घसा ताणून ताणून सांगतात. त्यांचे आपण क्षणभर खरेही मानू. नेहरूंच्या समाजवादी धोरणाचा शेतीचे शोषण हा पायाच राहिला आहे. जनतेला पोटभर खायला मिळावं म्हणून शेतीचे शोषण केले हेही मान्य करू.  

आता रेशनच्या दुकानावरून जो गहू स्वस्त भेटला तो सामान्य गोर गरीब माणसाने घरी आणला. तो हा गहू काय तसाच खातो? या गव्हाचे पीठ करावे लागते. दोन रूपये किलोच्या गव्हाला दळायला चार रूपये किलो दर द्यावा लागतो. मग हे समाजवादी विद्वान गिरण्यांचे दळणाचे दर कमी करा असे आंदोलन का नाही करत? असाच प्रश्‍न साखरेचा आहे. साखरेचे दर साधारणत: 30 वर्षांत केवळ 5 पट वाढले आहे. याच्या नेमके उलट पेढ्याचे दर किती वाढले? आयस्क्रिमचे दर किती वाढले? चहाचे दर किती वाढले? सरासरी असे लक्षात येते की या सगळ्या दरात किमान 12 ते 14 पट वाढ झाली आहे.

म्हणजे शेतकर्‍यांकडून घेतांना जो ऊस स्वस्त  भाव पाडून खरेदी केला जातो. त्याची साखर बनली की त्या किंमतीवर नियंत्रण ठेवले जाते. पण त्याची मिठाई बनली, त्याच्या मळीची दारू बनली, त्याच्या पासून औषधी तयार झाली की त्याचे भाव गगनाला भिडतात. तेंव्हा मात्र कुणालाही गरीबांची फिकीर नसते. आपल्याकडची दारू बहुतांश मळीपासून तयार केली जाते. मला सांगा असं एकतरी आंदांलन कुणी छेडलं आहे का दारूच्या किंमती स्थिर ठेवल्या पाहिजेत? दारूला उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव मिळालाच पाहिजे? 

उसापासून साखर तयार करायचा कारखाना सहकारी असतो. मग दुसरा प्रश्‍न असा तयार होतो. या कारखान्यात तयार झालेली मळी- तिच्यापासून तयार होणारी दारू. तिचा कारखाना का नाही सहकारी? या साखरेचा उपयोग करून औषधी तयार करतात. दारूचे जावू द्या. ही औषधी तर जिवनावश्यक आहे ना. मग औषधी तयार करण्याचा कारखाना का नाही सहकारी? सहकार का फक्त शेतकर्‍याच्याच हिताचा आहे? इतर समाजाच्या हिताचा का नाही? 

इंधन ही मोठी जागतिक समस्या आहे. सतत आपल्याला आयात केलेल्या खनिज तेलावर अवलंबून रहावं लागतं. मग उसापासून तयार होणारे इथेनॉल मोठ्या प्रमाणात वापरण्याचे धोरण का नाही ठरवले जात? केवळ ऊसच नव्हे तर इतरही बायोमास जे शेतात तयार होते त्यापासून इथेनॉल तयार करता येवू शकते. याचा वापर करून आपले खनिज तेलावरचे अवलंबित्व कमी करता येवू शकेल. किंवा केवळ इथेनॉल असाच विचार न करता या उसापासून वीज निर्मिती करता येवू शकेल. पण हे सगळे बाजूला ठेवून केवळ साखरच तयार करायची. ती साखर केवळ सहकारी साखर कारखान्यांतच तयार करायची, तिच्यावर शासनाने नियंत्रण ठेवायचे हे नेमके काय धोरण आहे? 

साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशी मूलभूत मागणी शेतकरी नेेते शरद जोशी यांनी आजपासून 25 वर्षे पूर्वी केली होती. साखर सरकारच्या नियंत्रणात आहे तोपर्यंत शेतकर्‍याचे नुकसान होतच राहणार आहे. जर शेतकर्‍याचे भले करायचे असेल तर साखर उद्योग तातडीने नियंत्रण मुक्त केला पाहिजे. 

सरकारला गोर गरिबांची जी काळजी वाटते, त्यासाठी आवश्यक तेवढा साखरेचा साठा शासनाने स्वत:जवळ करून ठेवावा. तो गोरगरिबांना वाटावा. एक काळ महाराष्ट्रात असा होता की गोर गरीबच काय पण मध्यमवर्ग सुद्धा रेशनवर साखर खरेदी करत असे. कारण त्याला खुल्या बाजारात साखर मिळत नव्हती. आता तयार साखरेचा बाजार खुला झाला आणि या लोकांनी रेशनवरून साखर खरेदी बंद केली. आज कुणीही रेशनवर साखर खरेदी करत नाही. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून कांदा-बटाटा-फळे-भाजीपाला यांची मुक्तता शासनाने केली आहे. हळू हळू त्याची चांगली फळे पहायला भेटत आहेत. डाळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध हटवले आहेत. तेलबियांच्या आयातीवर जास्तीची ड्युटी लावली आहे. याच मालिकेत आता साखरेवरील निर्बंध शासनाने उठवले पाहिजेत. 

दर वर्षी दिवाळी झाली की ऊस आंदोलनाची नौटंकी करणे म्हणजे काही व्यावसायीक शेतकरी नेत्यांचा धंदा होवून बसला आहे. आमच्या आंदोलनाने दोनशे आणि शंभर रूपये जास्तीचे मिळाले असे नाक वर करून सांगणारे हे शेजारच्या राज्यापेक्षा हजार ते पंधराशे कमीच भेटत आहेत हे मात्र विसरतात. 

तेंव्हा तातडीने साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशीच मागणी शेतकर्‍यांच्या आणि सामान्य माणसांच्या हितासाठी केल्या गेली पाहिजे.  
    
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Wednesday, October 25, 2017

रस से भरी तेरी आवाज गिरीजा देवी


उरूस बुधवार 25 ऑक्टोबर 2017

बनारस घराण्याच्या ठूमरी गायिका गिरीजा देवी यांचे वृद्धापकाळाने 24 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ठुमरीची साम्राज्ञी निवर्तली.

12 वर्षांपूर्वी मुुबईला षण्मुखानंद सभागृहात पंचम निषाद संस्थेच्या शशी व्यास यांनी एक अप्रतिम योग घडवून आणला होता. गानसरस्वती किशोरी आमोणकर, ठुमरी सम्राज्ञी गिरीजा देवी, गानहिरा परवीन सुलताना या तिघींना एक मंचावर आणले होते. पहिल्यांदा मंचावर आल्या परवीन सुलताना. त्या अप्रतिम गाऊन गेल्या. दुसर्‍यांदा मंचावर आल्या गिरीजा देवी. त्यावेळी त्या पंच्च्याहत्तरीत होत्या. फिक्या पिवळ्या रंगाची बनारसी त्या नेसल्या होत्या. शुभ्र केसाची भलीमोठी वेणी खांद्यावरून पुढे ओढून घेतली. कसलाही विलंब न करता आवाज लावला. एका सेकंदात त्यांचा आवाज असा काही लागला की सभागृहाने पहिल्याच सूराला कडाडून टाळी दिली. अतिशय रसरशीत असं ते गाणं. त्यांच्यासोबत त्यांची शिष्या मागे बसून गात होती. एका जागी तिने इतकी सुंदर हरकत घेतली की रसिकांनी तिलाही प्रचंड टाळ्या वाजवून मनसोक्त दाद दिली. गिरीजा देवींनी गाणं क्षणभर  थांबवलं, ‘हमारी बेटीको आपने तालिया दी.. एक गुरू के लिये और क्या चाहिये की लोग उनके शिष्योंको उनके सामने नवाजे... इन्ही के जरिये हमारे घरानेकी ये गायकी आगे जायेगी..’ लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.

ठुमरी सारख्या गानप्रकाराला दुय्यम समजल्या जातं. स्वातंत्र्योत्तर काळात या ठुमरीला सिद्धेश्वरी देवींपासून बेगम अख्तर, निर्मला देवी, लक्ष्मी शंकर, शुभा गुर्टू, गिरीजा देवी यांनी मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीत तज्ज्ञ अशोक दा. रानडे यांनी आपल्या पुस्तकात एक प्रसंग नमुद करून ठेवला आहे. केसरबाई मुंबईला एका कार्यक्रमात ठुमरी गात होत्या.  त्या सभागृहात सिद्धेश्वरींचे  आगमन झाले. लगेच केसर बाईंनी आपलं गाणं थांबवलं. सिद्धेश्वरी म्हणाल्या "क्यू बंद किया? आच्छा तो चल राहा था."   पण केसरबाई जे बोलल्या ते फार महत्त्वाचे होते. ‘ठुमरी की तालिम पाती तो सर पे बैठ के गाती.’ मला ठुमरीची तालिम भेटली नाही म्हणून गात नाही असं सांगत केसरबाईंनी सिद्धेश्वरींच्या ठुमरीचा गौरवच केला.

‘रस के भरे तोरे नैन’ ही गिरीजा देवींची अतिशय गाजलेली भैरवी ठुमरी. सत्याग्रह (२०१३) चित्रपटात ही ठुमरी वापरली आहे. त्यांच्या आयुष्याची भैरवी झाली आहे.. आज  त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘रस से भरी तोरी अवाजा..’ अशीच भावना दाटून आली आहे.. गिरीजा देवींना विनम्र श्रद्धांजली.

(रस के भरे तोरे नैन या ठुमरीची link)

https://www.youtube.com/watch?v=HJS6Em8y3VU

Wednesday, October 18, 2017

हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?


 उरूस बुधवार 18 ऑक्टोबर 2017 

महाभारत युद्धातील  सतराव्या दिवसाचा प्रसंग आहे. कौरवांचा सेनापती कर्ण, त्याच्या रथाचे चाक चिखलात रूतून बसले आहे. हे चाक तो काढत असताना अर्जून त्याच्यावर शस्त्र उचलतो. ते पाहून कर्ण, ‘हा क्षत्रियाचा धर्म नाही’ असे म्हणत आक्षेप घेतो. तेंव्हा कृष्ण इतिहासातील विविध प्रसंगांचे दाखले देवून कर्ण कसा अधर्माने वागला हे सिद्ध करतो आणि कर्णाला विचारतो, ‘राधासुता, तेंव्हा कुठे गेला होता तूझा धर्म?’

आताचा प्रसंग आहे कलियुगातील. 2014 च्या निवडणुकीचे महायुद्ध होवून केंद्रात लोकशाही मार्गाने भाजपचे सरकार  सत्तारूढ झाले आहे. समाजमाध्यमावर (सोशल मिडीया) काही तरूणांनी (यात आशिष मेटे सारखे सरळ सरळ राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असलेले तरूणही आहेत) मोदींवर-भाजप संघावर जहरी टीका केली. त्यांच्या विरोधात पोलिसांनी कार्रवाई करण्याचे संकेत दिले (प्रत्यक्षात कार्रवाई अजून झालीच नाही) म्हणजे नोटीसा पाठवल्या. लगेच या तरूणांच्या पाठीशी आपण आहोत हे दर्शविण्यासाठी जाणते राजे मा. शरद पवार यांनी या तरूणांची एक बैठक मुंबईत बोलावली. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचे ठामपणे शरद पवारांनी या तरूणांना सांगितले. शिवाय या तरूणांना कायदेशीर लढाईसाठी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

ज्या सोशल मिडीयावर या तरूणांनी ही गलिच्छ शब्दांतील निंदानालस्ती केली होती त्याच सोशल मिडीयावर या तरूणांनी मा. शरद पवार यांच्या पाठिंब्याची टिमकीही जोरात वाजवायला सुरवात केली.

काय गंमत आहे पहा. प्रसंग आहे जून 1975 चा.  अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ज्या तरूणांच्या पाठिशी शरद पवार ठामपणे उभे राहिले नेमक्या या तरूणांच्या वयाचेच तेंव्हा शरद पवार होते. शरद पवारांचे वय होते केवळ 33 वर्षे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला  धोका नव्हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सरळ सरळ खुनच केला गेला होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी  यांनी देशात आणिबाणी लादली होती. तेंव्हा मा. शरद पवार कुठे होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने होते का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणार्‍यांच्या टोळीत होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून झाला त्या रक्ताचे डाग यांच्या स्वच्छ कपड्यांवर उडाले की नाही?

शरद पवार तेंव्हा कॉंग्रेसमध्येच सत्तेत होते. आणिबाणीच्या संपूर्ण कालखंडात हजारोंनी कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबल्या गेले. पवारांनी तेंव्हा चकार शब्दही काढला नाही. की सत्ताही सोडली नाही. महाराष्ट्रात आणिबाणीचा विरोध मोठ्या जोरकसपणे झाला. शरद पवार ज्या साहित्यीक कलावंत विचारवंत यांच्या पाठिशी सतत असल्याचा भास निर्माण करतात त्या सर्वांनी आणिबाणीचा विरोध केला होता. दुर्गा भागवत, नरहर कुरूंदकर आणीबाणी विरोधी  जाहिर भाषणं देत फिरत होते. अनंत भालेराव यांच्यासारखे लढवय्ये संपादक पत्रकारितेचे भिष्मपितामह तुरूंगात होते. वर्तमानपत्रांतून अग्रलेखाची जागा कोरी सोडून दिली जात होती. विनय हर्डीकरांसारखे पत्रकार लेखक केवळ तुरूंगात गेले असे नाही तर त्यांनी यावर ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे सविस्तर पुस्तकच लिहून काढले. या पुस्तकाला  जाहिर झालेला पुरस्कार शासनाने रद्द केला. तेंव्हा शरद पवार सत्तेतच होते. त्यांनी काय भूमिका घेतली?  लोकांनी वर्गणी करून या पुस्तकाचा गौरव केला. पुढेही शरद पवारांसारख्यांनी कशी भूमिका घेतली यावर ‘जन ठायी ठायी तुंबला’ या आपल्या दुसर्‍या पुस्तकांतही सविस्तर लिहीले.

शरद पवार यांनी आणिबाणी नंतर तर कळसच केला. इंदिरा कॉंग्रेसचा पराभव होवून दिल्लीत जनता पक्ष सत्तेत आला.  महाराष्ट्रात काही सत्ताबदल झाला नाही. इंदिरा गांधींचा गट व वसंतदादांचा गट या दोन कॉंग्रेसच्या गटांनीच मिळून सत्ता राखली. शरद पवारांनी आणिबाणी विरोधात आंदोलन करणार्‍या जनता पक्षाच्या 95 आमदारांच्या पाठिंब्यावर आणि आणिबाणीच्या बाजूनं असणार्‍या सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या 35 आमदारांना  सोबतील घेवून  सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पद पटकावले. म्हणजे आणिबाणीत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुन करणार्‍यांच्या टोळीत सामील झाले. आणि आणिबाणीनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा पाठिंबा घेवून मुख्यमंत्री झाले. अभिव्यक्ती  स्वातंत्र्याचे काहीही होवो पवारांनी आपल्या ‘सत्तावर्ती’ राजकारणारचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही ढोलकी दोन्ही बाजूने पवार वाजवत होते. विरोध करणार्‍यांसोबतही आणि पाठिंबा देणार्‍यांसोबतही.

मोदी लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. त्यांचा विरोध लोकशाही मार्गानेच करता येवू शकतो. किंवा तो तसाच केला पाहिजे. उद्या मोदी हुकूमशाहीच्या मार्गाने गेले तर त्यांनाही कडव्या विरोधाला तोंड द्यावेच लागेल. आत्ता पंजाबातील  गुरूदासपूरची लोकसभेची पोटनिवडणूक आणि  महाराष्ट्रात  नांदेडमध्ये महानगरपालिकेची निवडणुक कॉंग्रेसने लोकशाही मार्गानेच जिंकली आहे. पवारांचा पक्ष तिथे सपशेल पराभूत झाला. सोबतच ग्रामपंचायतीची निवडणुक झाली. त्यातही पवारांच्या राष्ट्रवादीला  विशेष यश मिळवता आले नाही. पवारांनी आपला पक्ष लोकशाही मार्गाने सत्तेत आणावा. त्यांना कुणीही रोकले नाही.

पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचा दाखला त्यांनी कृतीतून द्यावा. ज्या भाषेत सोशल मिडीयावर या तरूणांनी मोदी-भाजपवर टिका केली आहे तशी भाषा पवारांच्या विरोधात इतर तरूणांनी वापरली तर पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्या तरूणांशी कसा व्यवहार करतील?

स्वत: पवारांनी निवडणुकांत राजू शेट्टी यांची जात काढली होती, ‘अर्ध्या चड्डीची’ भाषा केली होती, पेशवाईचा उल्लेख केला होता हे कोणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य? हे पण पवारांनी देशातील जनतेला जाहिरपणे सांगावे.

पवारांच्या 50 वर्षांच्या सांसदिय कारकिर्दीतील जेमतेम 10 वर्षे सोडल्यास 40 वर्षे ते सत्तेत राहिले आहेत. केवळ राज्यच नव्हे तर केंद्रिय मंत्रीमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली आहेत ते पवार मुठभर तरूणांच्या सोशल मिडीयावरील पोस्टच्या प्रकरणात स्वत: लक्ष घालतात हे कशाचे लक्षण आहे? हे काम तर सुप्रियाताई, धनंजय मुंडे किंवा त्यांचा पक्षाच्या कुणाही तरूण/विद्यार्थी नेत्याला करता आले असते.

बरं इकडे या तरूणांच्या पाठिशी उभे राहिल्याचा देखावा आणि तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत पायघड्या हे नेमके काय धोरण आहे? इकडे पवार तरूणांची बैठक घेतात आणि तिकडे अजीतदादा नितीन गडकरींच्या दिल्लीतील ‘वाड्यावर’ जातात ही राष्ट्रवादीची नेमकी कोणती अभिव्यक्ती आहे? 

महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल पुरते लागायच्या आतच पवारांनी भाजप सरकारला  न मागताही बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता.  मग आता हा बिनशर्त पाठिंबा न सांगता तातडीने परत का नाही घेतल्या जात?

भारतभर डाव्या चळवळीतील लेखकांनी पुरस्कार वापसीचे आंदोलन छेडले होते. मग पवारांनी त्यांच्या सुरात सुर मिसळून आपला पद्मविभुषण पुरस्कार का नाही वापस केला?

म्हणजे जेंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, असहिष्णुतेबाबत भाजप सरकार विरोधी आंदोलन भरात होते, लेखक पुरस्कार वापस करत होते, कन्हैय्याकुमार सारखे विद्यार्थी ‘आझादी’च्या घोषणा देत होते, रोहित वेमुलासारखे विद्यार्थी आत्महत्या करत होते. शेतकरी तर लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतच आहेत. नोटाबंदी मग नंतर जी.एस.टी. ने सगळे हैराण आहेत असे चित्र सगळे विरोधी पक्षाचे लोक डाव्या चळवळीतील लोक रंगवत असताना पवार काय करत होते? ते राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत ‘पद्मविभुषण’ पुरस्कार स्विकारत होते.

सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने जेंव्हा पवार तरूणांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र जाणिवपूर्वक रंगविल्या जाते आणि त्याच वेळी त्याचवेळी स्वत: पवार याच सरकारकडून पद्मविभुषण पुरस्कार स्विकारतात...   म्हणूनच विचारावे वाटते, ‘हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?’ 
 
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

Thursday, October 5, 2017

लेखकाच्या स्मृतीत सांस्कृतिक सोहळे


उरूस, विवेक, 24 सप्टेंबर 2017

काळ अतिशय प्रतिकूल असा स्वातंत्र्यापूर्वीचा, जात्यांध-सरंजामदारी निजामी राजवटीचा. एक लेखक अतिशय हलाखीच्या स्थितीत हैदराबाद या राजधानीच्या गावापासून मैलो दूर परभणी सारख्या तेंव्हाच्या खेडेवजा शहरात राहून वाङ्मय निर्मिती करतो. एक दोन नाही तर तब्बल सात कादंबर्‍या, पाच कथा संग्रह, सव्वाशे कविता इतकी निर्मिती अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात करतो. ओढग्रस्तीत त्याची तब्येत खालावत जाते. शेवटी नोकरीच्या ठिकाणीच 7 सप्टेंबर 1953 ला हृदय बंद पडून त्याचा करूण देहांत होतो. तो दिवस असतो पोळ्याचा. अमावस्येचा. 

बरोबर पन्नास वर्षांनी 7 सप्टेंबर 2002 साली अमावस्याच असते. या लेखकाच्या स्मृतीत एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारल्या जाते. ग्रेस सारख्या प्रतिभावंत कविच्या हस्ते त्या स्मारकाचे उद्घाटन होते. 
कविवर्य बोरकरांनी असं लिहून ठेवलं होतं

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्र फुलांची छत्री

ओळी लिहिल्या बोरकारांनी. पण अगदी शब्दश: त्या खर्‍या ठरल्या या लेखकाच्या बाबतीत. अमावस्येलाच या कविच्या कवितांनी त्याच्या साहित्यानेच त्याच्यावर चंद्र फुलाची छत्री धरली. त्याचे सुंदर स्मारक साकार झाले. या कविचे नाव आहे बी. रघुनाथ. 

भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्या लेखकाचे मूळ नाव.  निजामी राजवटीत तेलगू पद्धतीप्रमाणे त्यांनी लेखक म्हणून टोपण नाव स्विकारले ‘बी. रघुनाथ’.

या लेखकाच्या नावाने परभणीत स्मारक उभारल्या गेले आहे. त्यांच्या स्मृतीत एक सभागृह त्यांच्या मृत्यूनंतर लगेच 1956 ला भर गावात उभारण्यात आले होते. नंतर 2002 मध्ये नविन स्मारक पुतळ्यासह उभारण्यात आले. इतकेच नाही तर गेली 15 वर्षे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सप्टेंबर महिन्यात चार दिवसांचा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरविला जातो.  बी. रघुनाथांच्या नावाने मोठे महाविद्यालय परभणी शहरातच सुरू करण्यात आले आहे. 

औरंगाबादला गेली 28 वर्षे ‘बी. रघुनाथ स्मृती संध्येचे’ आयोजन करण्यात येते. त्यांच्या नावाने एक मोठा वाङ्मयीन पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार प्रा. नितीन रिंढे यांच्या ‘लिळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाला प्रख्यात नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते देण्यात आला आहे. 

एखाद्या लेखकाचे स्मारक उभारणे आणि त्याच्या स्मृतीत असे सोहळे साजरे करणे हे महाराष्ट्रात फार दूर्मिळ आहे. केशवसुतांचे मालगुंडला देखणे स्मारक उभे आहे.  पु.ल.देशपांडे यांच्या नावाने एक अकादमी मुंबईला स्थापन करण्यात आली आहे. पु.लं.चा पुतळाही रविंद्र नाट्य मंदिराच्या परिसरात आहे. कुसूमाग्रजांच्या स्मृती नाशिककर सतत जागवत असतात. कुसूमाग्रज प्रतिष्ठानने मोठे कामही उभे केले आहे. नांदेडला प्रा. नरहर कुरूंदकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. जळगांवला ‘काव्य रत्नावली’ चौक उभारून कविंची स्मृती जागविली गेली आहे. हे ठळक अपवाद वगळले तर लेखकाची स्मृती जपण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. उलट विखारी जातीय भूमिका घेत लेखकांचे पुतळेच उखडून टाकण्याची मात्र उदाहरणे आहेत. 

साहित्य संमेलनांची मोठी परंपरा महाराष्ट्रात असताना लेखकांची मात्र उपेक्षा कशामुळे केली जाते? 

 सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या लेखकाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व साहित्याचे पुनर्मुद्रण झाले पाहिजे. जे लिखाण प्रसिद्ध झाले नसेल ते प्रकाशात आले पाहिजे.  दूसरं महत्त्वाचे काम म्हणजे त्या लेखकाच्या महत्त्वाच्या कलाकृतींवर आधारीत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण. रविंद्रनाथ टागोरांवर आजही बंगालात विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. रविंद्र संगीताचे सादरीकरण आजही तरूण कलाकार मोठ्या उत्साहने करतात.
पण मराठीत हे होताना दिसत नाही. आधुनिक काळातील लेखक तर नंतरची बाब आहे. पण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखा मेळा, महदंबा, सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या समग्र लिखाणाची अर्थासह स्पष्टीकरण देणारी सटीप आवृत्ती आहे का?

अण्णाभाऊंचे पुतळे जातिय राजकारणाच्या सोयीसाठी गावोगाव उभारलेले दिसतात. पण त्याचा साहित्य प्रेमाशी काडीचाही संबंध आढळून येत नाही. 

एक अतिशय साधी योजना आखता येवू शकते. त्या त्या परिसरातील दिवंगत साहित्यीकाच्या स्मारकासाठी त्या  त्या परिसरातील ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयाला विशिष्ठ निधी देवून त्यांना- पुतळा उभारणे, पुस्तके प्रकाशीत करणे, स्मृती सोहळे साजरे करणे - यासाठी प्र्रोत्साहित केल्या जावू शकते. महाराष्ट्रात 235 जिल्हा ‘अ’ दर्जाची शासनमान्य ग्रंथालये आहेत. यांना नियमित अनुदानही दिले जाते. सर्व ग्रंथालयांना स्वत:ची छोटी मोठी इमारत आहे, सभागृह आहे, पुतळाच उभारायचा असेल तर जागाही उपलब्ध होवू शकते. काही ठिकाणी नगर पालिका महानगरपालिकेची खुली जागा ग्रंथालयांला लागून असेल तर तीपण पुतळ्यासाठी उपलब्ध होवू शकते. काही लेखकांचे नातेवाईक जे की आर्थिक दुष्ट्या सुस्थितीत असतील ते देणगीही देवू शकतात. (औरंगाबादला पत्रकार अनंत भालेराव यांच्या कुटूंबियांनी त्यांचा पुतळा साहित्य परिषदेला देणगी दाखल दिलेला आहे.) 

काही शैक्षणिक संस्थाही यासाठी पुढाकर घेवू शकतात. नांदेडला असा पुढाकार नरहर कुरूंदकर स्मारकासाठी तेथील शैक्षणिक संस्थेने घेतलाही आहे. 

प्रत्येक वेळी शासनाची मदत पाहिजे, अनुदान पाहिजे असेही नाही. गावोगावी विविध उत्सव दणक्यात साजरे होतच असतात. अगदी खेड्यागावातही हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह होतात. त्यावर प्रचंड खर्चही होतो. मग काही ठिकाणी अशा संस्थांनी पुढाकार घेवून हेच सोहळे त्या त्या भागातील प्रतिभावंतांच्या स्मृतीत साजरे केले तर कुठे बिघडले? 

हे का करायचे? तर हे प्रतिभावंत काळाच्या पुढचे पहात असतात. ज्यांची प्रतिभा काळावर टिकते त्यांची दखल आपण घ्यायलाच हवी. बी. रघुनाथ यांनी 1945 मध्ये असं लिहीलं होतं

राऊळी जमतो भावूक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

संन्याश्याच्या छाटीत चोळी
मुमुक्षु  फिरतो गल्ली बोळी
विविधरंगी या शुका-बकातील 
नितळ कसे निवडावे
आज कुणाला गावे

आज जिकडे तिकडे सामान्य भक्तांची दिशाभूल करणार्‍या बाबा/बुवा/बापुंचा विषय चर्चेत आहे. आणि सत्तर वर्षांपूर्वी एक कवि नेमकं हेच टिपून ठेवतो हे त्याच्या प्रतिभेचे मोठेपण नाही का?

बी. रघुनाथांच्या स्मृतीत सामान्य रसिक एकत्र येवून सोहळा साजरा करतात हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फुर्तता आहे. 

आषाढीला महाराष्ट्राभरातून विविध संतांच्या नावाने दिंड्या निघतात. आणि त्या सगळ्या मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरला जमा होतात. या प्रमाणेच विविध साहित्यीकांच्या नावाने महाराष्ट्रभर वर्षभर सोहळे साजरे व्हावेत. आणि या सगळ्यांची ‘वाङ्मयीन एकादशी’ साहित्य संमेलनाच्या रूपात साजरी व्हावी.  
 
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, September 19, 2017

ललीमावशी गेली......



(लेख श्रीकृष्णचा माझ्या मोठ्या भावाचा, कविता माझी)
 
ललीता कमलाकरराव  भंडारी, माझ्या आईची मावशी काल (१८ सप्टेंबर) वयाच्या ८२ व्या वर्षी गेली. असामान्य कर्तुत्वाची स्त्री होती ती. आजोबा लवकर गेले. त्यांच्या माघारी हिने दोन मुली आणि एक मुलगा वाढवले, शिकवले, मोठे केले. तिची नातवंडे, सुना, नातसुना, जावाई, लेक, लेकी सगळे उच्चशिक्षित उच्च पदस्थ आहेत. 

ती छोट्या खेड्यात ग्रामसेविका होती. अंधूक होत होत तीची दृष्टी गेली. तेव्हा मामा, मावशी शिकत होते. हिने न डगमगता तशाही परिस्थितीमधे नोकरी चालूच ठेवली. ईतर कर्मचारी रिपोर्ट्स वाचायचे. ते हिला पाठ असायचे. स्वतःच्या कामाचे अहवाल ती म्हणून दाखवायची. तिच्या गावात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकित तिने कोण कुठे बसले आहे याची चौकशी करून रिकाम्या खुर्चीत जावून बसली आणि तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बैठकिचे काम पार पडले. तिला दिसत नाही अशी शंकाही कुणाला आली नाही!

ती दिसत नसले तरी सगळा स्वैपाक करायची. तिच्या हातून कधी तिखट मिठ कमी जास्त झाले नाही ना कधी सांडलवंड झाली ना दुध उतू गेले.

मी तीच्या घरी गेलो की तीच्या बाजूला न बोलता बसून रहायचो. ती विचारायची कोण आहे म्हणून. मी उत्तर देत नसे. ती चाचपडून पहायची. माझा हात सापडला की तो हातात घेवून स्पर्शावरून ओळखायची. जाड झालास, बारीक झालास म्हणायची. निघताना हातात पैसे ठेवायची. मला मुले झाली तरीही. 'अगं मी काय लहान आहे का आता?' असं म्हटलं तर म्हणायची माझ्यापेक्षा मोठा झालास? तीने कधिच मला शिरा न खाउ घालता वापस पाठवले नाही! 

अद्वितिय जिद्द तिच्या अंगी होती. त्या जिद्दीमुळेच ती ईथवर आली. तीचे पाठांतर, तीची स्वच्छता, काय काय सांगू? स्वतःच्या शारिरिक मर्यांदांवर मात करून संपन्न, समृध्द, समाधानी जिणे जगली ती.

गेली अनेक महिने ती अंथरूणावर होती. समज नव्हती. नूसता श्वास चालू होता. बाकी त्रास असा नव्हता काही. मामालाच ओळखायची शेवटी शेवटी. दिवाळीत तीच्या घरी गेलो तर तीच्या खोलीत गेलोही नव्हतो. त्या करारी जिद्दी आज्जीला अंथरूणावर गोळा होवून पडलेलं पहावत नव्हतं. तिचे आयुष्य केंव्हाच संपले असावे. केवळ जिद्दीपोटी ती जगत होती. मला खात्री आहे शेवटी आसपास घोटाळणार्‍या यमाची दया येवून तीने जगण्याची जिद्द सोडली असावी. आणि मगच त्याला तीचे प्राण ताब्यात घेता आले असतील.
त्या असामान्य आज्जीला तीच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम


तू अष्टभुजा

परिस्थितीचा कठीण  कातळ फोडून तू
सळसळत्या उर्मीचा 
जगण्याचा जिवंत झरा शोधून काढलास बाई
आयुष्याच्या  छोट्या छोट्या लढाईत 
आम्ही हतबल होवून बसतो
सगळी शस्त्र बोथट झाली
असं मानतो
अन् तू तर काहीच हाती नसताना
अक्राळ विक्राळ काळाशी
दोन हात करत गेलीस

तूझे दोन आणि तूझ्या तीन लेकरांचे सहा हात
तू अष्टभुजा बनून 
समस्येच्या  महिषासुराचा वध केलास बाई
 
शंकर तर निघून गेला होता अर्ध्यातूनच
तू महाकाली बनून पचवलेस सगळे विष
आणि हसत राहिलीस 
बोळक्या झालेल्या चेहर्‍याने
निरागसपणे

बये तूझी ही चिवट झुंजणारी वृती
दे थोडी थोडी 
आम्हा नातवंडांमध्ये वाटून

आता घटस्थापनेला 
तूझाच बनवून चांदीचा टाक
पूजा करावी म्हणतो आहे..

मला खात्री आहे
तू पावशील नक्की...

- श्रीकांत उमरीकर 

Sunday, September 17, 2017

ना टिळकांचा ना रंगारींचा! गणेशोत्सव फक्त बुंगारींचा !


उरूस, विवेक, 17 सप्टेंबर 2017

सार्वाजनिक गणेश उत्सव कुणी सुरू केला? टिळकांनी का भाऊ रंगारींनी? असा एक क्षुल्लक  वाद उकरून काढण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या तो भाऊ रंगारींनी सुरू केला हे जरी मान्य केले तरी त्याचा प्रचार आणि प्रसार टिळकांमुळेच झाला यात चर्चा/वाद करण्याचे काही कारणच नाही. 

ज्ञानेश्वरांच्यापेक्षा नामदेव वयाने मोठे होते. ज्ञानेश्वरांचे गुरू असलेले निवृत्तीनाथ तर त्यांचे थोरले बंधुच होते. ज्ञानेश्वरांच्याही आधी मुकूंदराजांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथ लिहीला. असे असले तरी सर्वांनी वारकरी संप्रदायाचे आद्यत्व आणि मोठेपण ज्ञानेश्वरांनाच बहाल केलेले आढळते. त्यामुळे गणेश उत्सवाचे श्रेय जास्त टिळकांनाच जाते. पण आज जे स्वरूप सार्वजनिक गणेश उत्सवाला आले आहे ते पाहता टिळक म्हणाले असते आमचे चुकलेच.

हा महोत्सव पूर्णत: राजकीय नेत्यांनी कब्ज्यात घेतला आहे. 1990 पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. प्रचंड मोठे गणपती, त्यांच्यासमोर दिमाखदार मांडव, रोषणाई, खर्चिक आकर्षक देखावे असला प्रकार नव्हता.  या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. शालेय पातळीवर विविध स्पर्धा व्हायच्या. व्याख्यानं, गाण्याचे कार्यक्रम असायचे. बर्‍याच ठिकाणी या निमित्ताने नाटकं व्हायची. एरव्ही ज्या गावात नाटक पहायला मिळायचे नाही त्या गावात गणपतीच्या काळात होणारे नाटक ही पर्वणी असायची. काही मोठे गायक नेमके याच काळात सर्वसामान्य रसिकांना ऐकायला मिळायचे. 

गल्लीच्या पातळीवरील कलाकारांना आपली कला दाखवायला संधी याच व्यासपिठांवर मिळायची. 

1990 नंतर दोन गोष्टीत बदल झाला. कॉंग्रेसची एकाधिकारशाही संपून विविध पक्षांना छोटे मोठे सत्तेचे तुकडे अनुभवायला मिळू लागले. परिणामी विविध स्तरातील विविध गटांतील लोकांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांना सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वव्यापी स्वरूप खुणावायला लागले. 

1990 नंतर जागतिक पातळीवर व्यापार खुला होण्यासोबत भारतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक वाढवायला सुरूवात केली. या मोठ्या कंपन्या जाहिरात म्हणून गणेश उत्सवांना प्रायोजकत्व द्यायला तयार व्हायला लागल्या. परिणामी कालपर्यंत सर्वसामान्यांच्या जेमतेम वर्गणीवर चालणार्‍या गणेश मंडळांना जास्तीचा पैसा मिळायला लागला. 

चित्रपटांमध्ये 1991 नंतर कार्पोरेट पातळीवर भांडवल यायला लागले. याचा परिणाम म्हणजे करमणुक उद्योग हा लॉटरी/मटक्या सारखा नशिबाचा खेळ न राहता हक्काची गुंतवणूक आणि हक्काचे उत्पन्न असा उद्योग म्हणून वाढत गेला. याचा परिणाम असा झाला की कलाकारांना स्थिर उत्पन्न सुरू झाले. मग या कलाकारांचे भाव प्रचंड वाढत गेले. असे कलाकार गणेश उत्सवात बोलवायचे म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणात करणे सुरू झाले. असे कलाकार आले की गर्दी गोळा होते हे पाहून प्रायोजकही हात सैल सोडवायला लागले. 

गर्दी गोळा होते म्हणून राजकीय नेत्यांचा रस वाढत गेला. त्यांची पकड घट्ट होत गेली. 

बघता बघता समाज प्रबोधनाचा स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश मागे पडला. स्वातंत्र्योत्तर काळातील माफक करमणुक, स्थानिक कलाकारांना संधी, मान्यवर कलाकारांची कला ऐकण्याची पाहण्याची संधी हे सगळे मागे पडले. आता गणेश उत्सव मोठा ‘इव्हेंट’ बनत गेला. 

‘लालबागचा राजा’ गणपतीचे प्रस्थ तर इतके वाढले की त्याच्या दर्शनाचा ‘व्हि.आय.पी.’ पास मिळावा म्हणून आमदार खासदार मंत्र्यांपर्यंतची शिफारस लागू लागली. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येवू लागले. त्यातून इतरही काही विकृती तयार झाल्या. याच काळात पुणे-मुंबई सारख्या शहरात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून यायला लागला. 

गणेश उत्सवात रस्त्यावर मांडव टाकून रस्ता अडवणे, मोठ्या आवाजात डिजे लावून धांगडधिंगा घालणे, विसर्जनाची मिरवणून म्हणजे तर धिंगाण्याला अधिकृत परवानगीच असे स्वरूप सध्या आले आहे. कार्यकर्ते सांभाळायचे तर हे सगळं करावेच लागते असं राजकीय नेते सर्रास सांगतात. औरंगाबादला तर खा. चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांमधून उघडपणे गणपतीच्या मूर्तीसमोर कार्यकर्त्यांना पत्ते-जुगार खेळू देण्याचे समर्थन केलं आहे. 

गणेश उत्सवाचा एक विचित्रच परिणाम टिव्ही मालिकांमधून पहायला भेटत आहे. जसे की हिंदी चित्रपटात एकेकाळी ‘सरसों का साग, मक्केदी रोटी, गाजर का हलवा’ म्हणजे राष्ट्रीय पदार्थ असावेत अशी वर्णनं असायची. जसे काही भारतातील लोक केवळ इतकेच खातात. तसे आता गणेश उत्सवाच्या काळात प्रत्येक मालिकांमधून गणपतीची पूजा, आरती, मोदक यांचा मारा सुरू झालेला आढळून येतो. जसे की मराठी माणूस म्हणजे गणेश उत्सवच केवळ. 

नुकतेच जिकडे तिकडे गाजणारे वरूण धवन या हिंदी अभिनेत्याचे गाणे तर कमाल आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरिया’ आता हे काय बोल झाले? नशिब ऍनिमेशन केलेला गणपती वरूण धवन सोबत नाचताना दाखवला नाही.

 काय विरोधाभास आहे पहा. महाराष्ट्रभर गणपतीच्या नावाने दहा दिवस रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळ घातला जातोय. लाखो करोडो रूपयांची वर्गणी/खंडणी गोळा होते आहे. आणि नेमके याच्या काही दिवसच आधी सुमीत राघवन सारख्या अभिनेत्याने नाट्यगृहांची अवस्था कशी वाईट झाली याची चित्रफित काढून सर्वत्र फिरवली होती. म्हणजे रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळासाठी आम्ही दौलतजादा उधळत आहोत आणि आमची रंगमंदिरं मात्र निधी अभावी मोडक्या तुटक्या अवस्थेत हलाखीचे जिणे जगत आहेत. 

आता लगेच नवरात्रात सर्वत्र दांडिया/गरबा असाच रस्त्यावर खेळला जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. नोटाबंदीचे सगळे दडपण आता संपले आहे. तेंव्हा नविन कोर्‍या करकरीत नोटा बाहेर येतील. 200 ची नविन नोटही आता बाजारात येते आहे. 

नवरात्र संपल्यावर आपल्या लक्षात येईल की नाट्यगृहांची अवस्था तशीच बिकट आहे. नगर पालिका, महानगरपालिका, राज्य सरकारचे सांस्कृतिक खाते यांच्या नावाने माणसे बोटे मोडताना दिसतील. पण ते हे कबूल करणार नाहीत की गणेश उत्सव किंवा नवरात्रात जी उधळपट्टी झाली ती यांच्याच खिशातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झाली होती. हाच सगळा पैसा सलग 2 वर्षे महाराष्ट्रभरच्या रसिकांनी नाट्यगृहांच्या दूरूस्तीसाठी द्यायचे ठरवले तर सांस्कृतिक क्षेत्रात भरिव अशी कामगिरी ठरू शकेल. 

महाराष्ट्रभरच्या कलाकारांसाठी ही नाट्यगृहं अतिशय महत्वाची आहेत. गणपती व नवरात्रीचे 20 दिवसच नाही तर वर्षभर सांस्कृतिक उपक्रम इथे चालविता येऊ शकतात. रस्त्यावर तात्पुरता मंच उभारणे, ध्वनी-प्रकाश व्यवस्था यांची सोय करणे, खुर्च्या मांडणे यापेक्षा कायमस्वरूपी अशी व्यवस्था कलेच्या विकासासाठी नेहमीच पोषक असते. 

टिळकांच्या काळातला गणेश उत्सव विविध संस्थांना जन्म देणारा ठरला. पुणेच काय पण महाराष्ट्रभर विविध संस्था या निमित्ताने उभ्या राहिल्या. मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते परभणी गाव आणि संपूर्ण मराठवाडा 1948 पर्यंत निजामी (निजामशाही नाही) राजवटीत होते. या गावच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य टिळकांची इ.स. 1900 मध्ये लातूर येथे भेट घेतली. त्यांना टिळकांनी राजकिय सामाजिक कार्य करण्यासाठी गणेश उत्सवाच्या काळात वाचनालयाची स्थापना करण्याचा सल्ला दिला. 1901 मध्ये ‘गणेश वाचनालय’ याच नावाने हे वाचनालय तेंव्हा स्थापन झाले. आज 117 वर्षांचे हे ग्रंथालय शहराचे सांस्कृतिक भुषण म्हणून कार्यरत आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. 

याच्या उलट आत्ताचे गणेश उत्सव पाहता अशा काही कायमस्वरूपी संस्था, सभागृहे, उपक्रम चालताना दिसतात का? म्हणूनच वैतागून म्हणावेसे वाटते की हा गणेश उत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. हा उरला फक्त बुंगारींचा!! 

  
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, September 4, 2017

आठवण द्रष्ट्या शेतकरी नेत्याची शरद जोशींची !


उरूस, विवेक, 10 सप्टेंबर 2017

स्व.शरद जोशी यांचा 3 सप्टेंबर हा जन्मदिवस. आज शरद जोशी हयात असते तर ते 82 वर्षांचे झाले असते. पण शरद जोशींची आठवण येण्याचे कारण त्यांची जयंती नाही. तर नुकतेच झालेले शेतकरी आंदोलन आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात आत्तापर्यंत कधी शेतकर्‍यांकडे ढुंकूनही न पाहिलेल्या डाव्या समाजवादी चळवळीतील नेत्यांनी शेतकरी संपाची हाक दिली. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेपासून फुटून निघालेल्या काही लोकांनीही त्या लोकांच्या सुरात सूर मिसळला. शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्‍नापासून दिशाभूल करत हे आंदोलन छेडण्यात आले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला अपशकून नको म्हणून शरद जोशींना मानणारी शेतकरी संघटना सावधपणे या आंदोलनात उतरली. आणि मतभेदाचे मुद्दे समोर येताच तातडीने बाजूलाही सरकली.  सुकाणू समिती सोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तोडगा काढला. पण त्यावर मतभेद होत संप चालू ठेवण्याचे काही लोकांनी ठरवले. काहींनी संप मागे घेतला. काहींना इतरांनी काळे फासले. काही सत्तेच्या मोहात फुटले. बघता बघता शेतकरी आंदोलनाचा पोरखेळ होवून गेला. 

सगळ्यांनाच शरद जोशींची आठवण झाली. शरद जोशी असते तर असला विचका झाला नसता यावर शेतीशी संबंधीत नसलेल्यांचेही एकमत झाले. आंदोलनाचा असा विचका का झाला? 

त्याला मुख्य कारणीभूत म्हणजे शेती प्रश्‍न न समजणारे डावे समजावादी नेते आणि त्यांच्या वळचणीला आलेले इतर सर्व. मूळात शेतकर्‍यांचा संप कधीही पेरणीच्या काळात म्हणजेच जून जूलै मध्ये करायचा नाही असे तत्त्व शरद जोशींनी पाळले होते. 

कारण भारतात मूख्य शेती आहे तीच मूळी खरीपाची. ही पेरणी हातची गेली तर वर्षभर हात हलवत रहावं लागतं. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातला दाखला शरद जोशी यांनी आपल्या ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ या पुस्तकात दिला आहे. मिर्जा राजे जयसिंग यांच्यासोबत जो तह झाला तो जूनचा महिना होता. आधी दोन वर्षे दुष्काळ होता. आता चांगला पाऊस सुरू झाला होता. तेंव्हा जर आपले मावळे युद्धात अडकून पडले तर त्यांना पेरणी करता येणार नाही. परिणामी खायला भेटणार नाही. महाराजांनी धोरणीपणाने शेतकर्‍यांचे सगळ्या रयतेचे हित डोळ्यापुढे ठेवून तह केला. परिणामी पेरणीसाठी मावळ्यांना उसंत भेटली. 

अस्मिता म्हणून सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे मात्र आजच्या काळात शिवाजी महाराजांची ही शिकवण विसरले. आणि यांनी नेमका पेरणीच्या काळातच संप पुकारला. सततच्या दुष्काळातून आत्ताच कुठे जरा परिस्थिती सावरत होती. मागच्या वर्षीच्या पावसातून जरा तरी आशा निर्माण झाली होती. आणि त्याच काळात नेमका हा चुकीचा निर्णय घेतला गेला. 

खरं तर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता तुरीचा. आणि आंदोलन केल्या गेले ते मुंबई सारख्या शहराचा फळे-दुध-भाजीपाला रोकण्याचे. आता याला काय म्हणावे? फळे-दुध-भाजीपाला यांच्यासाठी कधीही हमीभाव ठरत नाहीत. हमीभाव आणि त्याप्रमाणे खरेदी हे अन्नधान्याच्या बाबतीत आहे. 

शरद जोशींनी जेंव्हा कांद्याचे आंदोलन केले, मुंबई आग्रा रस्ता बारा दिवस रोकून धरला त्यामागे एक तत्त्व होते. की कांद्याची बाजारपेठ ही संपूर्णत: नाशिक परिसरातील शेतकर्‍यांच्या उत्पादनावर अवलंबून होती. निपाणीला तंबाखूचे उत्पादन सगळ्यात जास्त होते म्हणून तिथे आंदोलन केल्या गेले. अंबाजोगाईला ज्वारी परिषद घेतली. पंढरपुरला दुधाचे आंदोलन केले. परभणी-हिंगोली पट्ट्यात कापसाचे आंदोलन केल्या गेले. हे सगळे करण्यात एक विशिष्ट परिस्थिती, त्या पिकाचा अभ्यास, राजकीय स्थिती, जागतिक बाजारपेठेचा अभ्यास होता. एका एका पिकात आंदोलन करून शक्ती खर्च करायची नाही म्हणून मग हमी भावाचा आणि नंतर खुल्या बाजारपेठेचा विषय लावून धरला. 

पण असला काहीच विचार न करता अतिशय वेडगळ पद्धतीनं शेतकर्‍यांचा संप जून महिन्यात पुकारला गेला. हा संप फसला तेंव्हा सगळ्यांना शरद जोशींची आठवण तीव्रतेनं आली.

शरद जोशींची हमी भावाची मागणी 1980 ते 1990 या काळात सातत्याने पुढे रेटली. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात जागतिक बाजरपेठेत संधी मिळण्याची शक्यता निर्माण होताच हमी भावाची मागणी बाजूला ठेवून खुल्या बाजारपेठेची मागणी लावून धरली. त्यातील द्रष्ट्येपण आताही अनुभवायला मिळत आहे. कांद्याचे भाव मागच्या वर्षी कोसळले होते. शासनाने कृषी उत्पन्न बाजार नियमन मुक्ती केली. केवळ एका वर्षातच त्याचे परिणाम कांद्याच्या शेतकर्‍याला पहायला भेटत आहेत. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात निर्यात कांद्याला जास्तीचा 10 रू. भाव भेटला. 20 लाख टन कांद्याचे जास्तीचे 2 हजार कोटी रूपये कृषी बाजारात आले. 

शरद जोशींनी हमी भावा ऐवजी खुला बाजार मागितला होता. याचा शेतकर्‍याला कसा फायदा होवू शकतो याचा अजून एक पुरावाही हाती आला आहे. तुरीला हमीभाव सरकारने जाहिर केला होता 5050 रू. त्यात 50 टक्के नफा मिळवला तर त्याची किंमत जाते 7525 रूपये. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीला जो भाव मिळाला तो होता 10 हजार रूपये. मग आता सांगा शेतकर्‍याला काय परवडेल हमी भाव की खुला बाजार? 

हमी भाव देवून सगळी तूर खरेदी करणं शासनाला शक्य नाही हे कुणीही सांगू शकतं. किंबहूना जगातले कुठलेच शासन ठराविक भाव देवून सगळा शेतमाल खरेदी करू शकत नाहीत. मग अशावेळी हमी भाव मागायचाच कशाला? 

शरद जोशींच्या द्रष्टेपणाचा अजून एक पुरावा कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी नुकत्याच आपल्या मांडणीतून आकडेवारीसगट पुढे ठेवला आहे. 

2014-15 या काळात गहू आणि तांदूळ यांच्यासाठी जगभरातील सगळ्यात कमी हमी भाव (एम.एस.पी.) भारत सरकारने दिले. ज्या चीनशी उठसूट आपली तुलना चालते त्या चीननेही भारताच्या दीडपट भाव दिले होते. समजण्यासाठी हे आकडे असे आहेत- जर भारतात तांदळाला 330 रूपये मिळत असतील तर तेवढ्याच तांदळाला चीनमध्ये 504 रूपये मिळतात. गव्हाच्या बाबतीतही हे आकडे भारत 226 रूपये तर चीन 384 रूपये आहे. अगदी आपले शत्रू राष्ट्र पाकिस्तानही गव्हाला 319 रूपये देते. म्हणजे आपला शेतकरी आतंकवादी दहशतवादी बनून त्याने आपला गहू आणि तांदूळ देशद्रोह करून चीन-पाकिस्तान सारख्या देशाला विकण्याचे आंदोलन केले असते तर त्याला फायदा मिळाला असता. 

आता साखरेचा प्रश्‍न गंभीर आहे. ‘ऊस नव्हे काठी आहे, कारखानदारांच्या पाठी आहे’ म्हणत आता आंदोलन केल्या जाईल. परत ऊसवाले शेतकरी रस्त्यावर उतरतील. परत उसाचा भाव काय असावा याची चर्चा करण्यासाठी शासनाची समिती बसेल. पण या सगळ्या समस्येच्या मूळाशी जो तिढा आहे तो काही सोडवला जाणार नाही. 

शरद जोशींची स्वच्छपणे मागणी केली होती की साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला पाहिजे. त्याशिवाय साखरेचा प्रश्‍न सुटणार नाही. घरगुती वापरासाठी जी साखर वापरली जाते तिचे प्रमाण केवळ 32 टक्के इतकेच आहे. इतर सर्व साखर औद्योगिक वापरासाठी (औषधी -मिठाया- आईसक्रिम-शीतपेये) वापरली जाते. मग अशा परिस्थितीत ही साखर काय म्हणून कृत्रिमरित्या स्वस्त करायची? साखर काही जीवनावश्यक वस्तू नाही. साखर खायला भेटली नाही म्हणून शेकडो लोकांचा मृत्यू अशी बातमी आजतागायत वाचायला भेटली नाही. 

शरद जोशींची तीव्र आठवण समृद्धी महामार्गावरील जमिनींचे अधिग्रहण करताना निर्माण झालेला गोंधळ, अधिकार्‍यांचे निलंबन या प्रसंगी झाली. शेतजमिनी बाबत जमिन अधिग्रहण कायदा, जमिन धारणा कायदा हे सगळे जाचक कायदे इंग्रज काळांपासून आहेत. हे सगळे तातडीने बरखास्त केले पाहिजेत. शेत जमिनीची बाजारपेठही खुली केली पाहिजे असे शरद जोशींनी आग्रहाने सांगितले होते. समृद्धी महामार्गाबाबत असे लक्षात आले की बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळाली की लगेच शेतकरी जमिनी विकायला तयार झाले. म्हणजे उद्योगांना ज्या प्रमाणे शेकडो एकर जमिन बाळगता येते किंवा गरज नसेल तर विकता येते तर याच पद्धतीनं शेतकर्‍याला का करता येवू नये? आणि जर ही संधी त्याला मिळाली तर तोही खुशीनं शेती करू शकेल किंवा शेतीतून बाहेर पडू शकेल. जबरदस्तीनं शेतीशी बांधील राहण्याचे काही कारण नाही. 

शरद जोशी काळाच्या पुढचे पाहणारा नेता होता हे परत परत सिद्ध होते आहे. शेतमालाला जस जसा खुला बाजार मिळत जाईल तस तसा शरद जोशींचा आत्मा स्वर्गात सुखी होईल.         
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575