Wednesday, October 18, 2017

हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?


 उरूस बुधवार 18 ऑक्टोबर 2017 

महाभारत युद्धातील  सतराव्या दिवसाचा प्रसंग आहे. कौरवांचा सेनापती कर्ण, त्याच्या रथाचे चाक चिखलात रूतून बसले आहे. हे चाक तो काढत असताना अर्जून त्याच्यावर शस्त्र उचलतो. ते पाहून कर्ण, ‘हा क्षत्रियाचा धर्म नाही’ असे म्हणत आक्षेप घेतो. तेंव्हा कृष्ण इतिहासातील विविध प्रसंगांचे दाखले देवून कर्ण कसा अधर्माने वागला हे सिद्ध करतो आणि कर्णाला विचारतो, ‘राधासुता, तेंव्हा कुठे गेला होता तूझा धर्म?’

आताचा प्रसंग आहे कलियुगातील. 2014 च्या निवडणुकीचे महायुद्ध होवून केंद्रात लोकशाही मार्गाने भाजपचे सरकार  सत्तारूढ झाले आहे. समाजमाध्यमावर (सोशल मिडीया) काही तरूणांनी (यात आशिष मेटे सारखे सरळ सरळ राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असलेले तरूणही आहेत) मोदींवर-भाजप संघावर जहरी टीका केली. त्यांच्या विरोधात पोलिसांनी कार्रवाई करण्याचे संकेत दिले (प्रत्यक्षात कार्रवाई अजून झालीच नाही) म्हणजे नोटीसा पाठवल्या. लगेच या तरूणांच्या पाठीशी आपण आहोत हे दर्शविण्यासाठी जाणते राजे मा. शरद पवार यांनी या तरूणांची एक बैठक मुंबईत बोलावली. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचे ठामपणे शरद पवारांनी या तरूणांना सांगितले. शिवाय या तरूणांना कायदेशीर लढाईसाठी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

ज्या सोशल मिडीयावर या तरूणांनी ही गलिच्छ शब्दांतील निंदानालस्ती केली होती त्याच सोशल मिडीयावर या तरूणांनी मा. शरद पवार यांच्या पाठिंब्याची टिमकीही जोरात वाजवायला सुरवात केली.

काय गंमत आहे पहा. प्रसंग आहे जून 1975 चा.  अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ज्या तरूणांच्या पाठिशी शरद पवार ठामपणे उभे राहिले नेमक्या या तरूणांच्या वयाचेच तेंव्हा शरद पवार होते. शरद पवारांचे वय होते केवळ 33 वर्षे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला  धोका नव्हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सरळ सरळ खुनच केला गेला होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी  यांनी देशात आणिबाणी लादली होती. तेंव्हा मा. शरद पवार कुठे होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने होते का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणार्‍यांच्या टोळीत होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून झाला त्या रक्ताचे डाग यांच्या स्वच्छ कपड्यांवर उडाले की नाही?

शरद पवार तेंव्हा कॉंग्रेसमध्येच सत्तेत होते. आणिबाणीच्या संपूर्ण कालखंडात हजारोंनी कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबल्या गेले. पवारांनी तेंव्हा चकार शब्दही काढला नाही. की सत्ताही सोडली नाही. महाराष्ट्रात आणिबाणीचा विरोध मोठ्या जोरकसपणे झाला. शरद पवार ज्या साहित्यीक कलावंत विचारवंत यांच्या पाठिशी सतत असल्याचा भास निर्माण करतात त्या सर्वांनी आणिबाणीचा विरोध केला होता. दुर्गा भागवत, नरहर कुरूंदकर आणीबाणी विरोधी  जाहिर भाषणं देत फिरत होते. अनंत भालेराव यांच्यासारखे लढवय्ये संपादक पत्रकारितेचे भिष्मपितामह तुरूंगात होते. वर्तमानपत्रांतून अग्रलेखाची जागा कोरी सोडून दिली जात होती. विनय हर्डीकरांसारखे पत्रकार लेखक केवळ तुरूंगात गेले असे नाही तर त्यांनी यावर ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे सविस्तर पुस्तकच लिहून काढले. या पुस्तकाला  जाहिर झालेला पुरस्कार शासनाने रद्द केला. तेंव्हा शरद पवार सत्तेतच होते. त्यांनी काय भूमिका घेतली?  लोकांनी वर्गणी करून या पुस्तकाचा गौरव केला. पुढेही शरद पवारांसारख्यांनी कशी भूमिका घेतली यावर ‘जन ठायी ठायी तुंबला’ या आपल्या दुसर्‍या पुस्तकांतही सविस्तर लिहीले.

शरद पवार यांनी आणिबाणी नंतर तर कळसच केला. इंदिरा कॉंग्रेसचा पराभव होवून दिल्लीत जनता पक्ष सत्तेत आला.  महाराष्ट्रात काही सत्ताबदल झाला नाही. इंदिरा गांधींचा गट व वसंतदादांचा गट या दोन कॉंग्रेसच्या गटांनीच मिळून सत्ता राखली. शरद पवारांनी आणिबाणी विरोधात आंदोलन करणार्‍या जनता पक्षाच्या 95 आमदारांच्या पाठिंब्यावर आणि आणिबाणीच्या बाजूनं असणार्‍या सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या 35 आमदारांना  सोबतील घेवून  सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पद पटकावले. म्हणजे आणिबाणीत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुन करणार्‍यांच्या टोळीत सामील झाले. आणि आणिबाणीनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा पाठिंबा घेवून मुख्यमंत्री झाले. अभिव्यक्ती  स्वातंत्र्याचे काहीही होवो पवारांनी आपल्या ‘सत्तावर्ती’ राजकारणारचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही ढोलकी दोन्ही बाजूने पवार वाजवत होते. विरोध करणार्‍यांसोबतही आणि पाठिंबा देणार्‍यांसोबतही.

मोदी लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. त्यांचा विरोध लोकशाही मार्गानेच करता येवू शकतो. किंवा तो तसाच केला पाहिजे. उद्या मोदी हुकूमशाहीच्या मार्गाने गेले तर त्यांनाही कडव्या विरोधाला तोंड द्यावेच लागेल. आत्ता पंजाबातील  गुरूदासपूरची लोकसभेची पोटनिवडणूक आणि  महाराष्ट्रात  नांदेडमध्ये महानगरपालिकेची निवडणुक कॉंग्रेसने लोकशाही मार्गानेच जिंकली आहे. पवारांचा पक्ष तिथे सपशेल पराभूत झाला. सोबतच ग्रामपंचायतीची निवडणुक झाली. त्यातही पवारांच्या राष्ट्रवादीला  विशेष यश मिळवता आले नाही. पवारांनी आपला पक्ष लोकशाही मार्गाने सत्तेत आणावा. त्यांना कुणीही रोकले नाही.

पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचा दाखला त्यांनी कृतीतून द्यावा. ज्या भाषेत सोशल मिडीयावर या तरूणांनी मोदी-भाजपवर टिका केली आहे तशी भाषा पवारांच्या विरोधात इतर तरूणांनी वापरली तर पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्या तरूणांशी कसा व्यवहार करतील?

स्वत: पवारांनी निवडणुकांत राजू शेट्टी यांची जात काढली होती, ‘अर्ध्या चड्डीची’ भाषा केली होती, पेशवाईचा उल्लेख केला होता हे कोणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य? हे पण पवारांनी देशातील जनतेला जाहिरपणे सांगावे.

पवारांच्या 50 वर्षांच्या सांसदिय कारकिर्दीतील जेमतेम 10 वर्षे सोडल्यास 40 वर्षे ते सत्तेत राहिले आहेत. केवळ राज्यच नव्हे तर केंद्रिय मंत्रीमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली आहेत ते पवार मुठभर तरूणांच्या सोशल मिडीयावरील पोस्टच्या प्रकरणात स्वत: लक्ष घालतात हे कशाचे लक्षण आहे? हे काम तर सुप्रियाताई, धनंजय मुंडे किंवा त्यांचा पक्षाच्या कुणाही तरूण/विद्यार्थी नेत्याला करता आले असते.

बरं इकडे या तरूणांच्या पाठिशी उभे राहिल्याचा देखावा आणि तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत पायघड्या हे नेमके काय धोरण आहे? इकडे पवार तरूणांची बैठक घेतात आणि तिकडे अजीतदादा नितीन गडकरींच्या दिल्लीतील ‘वाड्यावर’ जातात ही राष्ट्रवादीची नेमकी कोणती अभिव्यक्ती आहे? 

महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल पुरते लागायच्या आतच पवारांनी भाजप सरकारला  न मागताही बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता.  मग आता हा बिनशर्त पाठिंबा न सांगता तातडीने परत का नाही घेतल्या जात?

भारतभर डाव्या चळवळीतील लेखकांनी पुरस्कार वापसीचे आंदोलन छेडले होते. मग पवारांनी त्यांच्या सुरात सुर मिसळून आपला पद्मविभुषण पुरस्कार का नाही वापस केला?

म्हणजे जेंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, असहिष्णुतेबाबत भाजप सरकार विरोधी आंदोलन भरात होते, लेखक पुरस्कार वापस करत होते, कन्हैय्याकुमार सारखे विद्यार्थी ‘आझादी’च्या घोषणा देत होते, रोहित वेमुलासारखे विद्यार्थी आत्महत्या करत होते. शेतकरी तर लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतच आहेत. नोटाबंदी मग नंतर जी.एस.टी. ने सगळे हैराण आहेत असे चित्र सगळे विरोधी पक्षाचे लोक डाव्या चळवळीतील लोक रंगवत असताना पवार काय करत होते? ते राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत ‘पद्मविभुषण’ पुरस्कार स्विकारत होते.

सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने जेंव्हा पवार तरूणांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र जाणिवपूर्वक रंगविल्या जाते आणि त्याच वेळी त्याचवेळी स्वत: पवार याच सरकारकडून पद्मविभुषण पुरस्कार स्विकारतात...   म्हणूनच विचारावे वाटते, ‘हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?’ 
 
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

2 comments:

  1. आपण लिहिलेल्या पूर्ण ब्लोग्शी सहमत आहे ,मनातल्या मनात (अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही )साहेबाना आम्ही हे ईश्वरा याना सद्बुद्धी दे अशी प्राथना करतो,पण पापाचा डोंगर इतका मोठा आहे कि कुठल पाप लहान कुठल मोठ हे ठरवण चीत्रगुप्त्ताला सुद्धा अवघड आहे.ते अर्थात देव धर्म लोकाना दाखवण्या साठी तरी मानत नाहीत ,तरी तो न्याय करीलच ,या माणसा चे भाषण एकण्या साठी पहाटे ३ /४ वाजे पर्यंत जागलो,पण पुरता ,भ्रम निरास झाला ,.....यांच्या लिंक बाहेर का काढल्या जात नाहीत हा मोठा क्वेश्चन मार्क आहे .थोडीही द्या न दाखवता सरकारने सगळ्या कारवाया उघड कराव्या ही अपेक्षा आहे पण हे सरकार पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे .हा हन्त हन्त

    ReplyDelete
  2. अप्रतिम....मुद्देसूद....!
    वंदे मातरम..!

    ReplyDelete