Monday, March 7, 2016

समलैंगिकतेवरील चित्रपट : परदेशात पुरस्कार । भारतात तिरस्कार ।।



उरूस, दै. पुण्यनगरी, 7 मार्च 2016

सगळ्या जगभरात चित्रपट क्षेत्रात ज्या पुरस्कारांचा मोठा दबदबा आहे त्या ऑस्कर पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. ज्या चित्रपटाला उत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला तो ‘स्पॉटलाईट’ हा अतिशय वेगळ्या विषयावरचा चित्रपट. अमेरिकेतील बोस्टन शहरातील चर्चमधे लहान मुलांवर लैंगिकअत्याचार होत असल्याची कुणकुण कुणा पत्रकाराला लागते. तो सातत्याने त्याचा पाठपुरावा करून हे प्रकरण उघडकीस आणतो. 2002 मध्ये बॉस्टन ग्लॉब ह्या विख्यात वृत्तपत्रानं हा लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय उजेडात आणला. पत्रकारितेमधील पुलित्झर पुरस्कारही या वार्तांकनाला प्राप्त झाला. या घटनेवर चित्रपट मात्र लवकर बनू शकला नाही. शेवटी 2015 ला हा चित्रपट तयार झाला. आणि त्याला मानाचा ऑस्कर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

आपण समजतो सर्व परदेशी नागरिक म्हणजे मुक्त जीवन जगणारे, धर्माचा कुठलाही दबाव न मानणारे असे, ज्याला जे हवे ते त्याला करता येते असे काही नाही. तेथेही धार्मिक दबाव आहे. त्या ठिकाणीही धार्मिक दुष्कृत्ये दाबण्याकडे, लपविण्याकडे कल असतो. पण ही सारी दडपणं बाजूला सारून कुणी निर्माता या विषयावर चित्रपट काढतो. आणि तेथील व्यवस्थाही ही आपल्या समाजातील विकृती समजून घेते. अशा चित्रपटांना पुरस्कार देवून गौरविले जाते. त्यामागे जे काही घडले ते चुक होते, पुन्हा असे होणार नाही याचा एक संदेश हा समाज देतो.

ही झाली परदेशातील गोष्ट. आता आपल्याकडे काय घडले ते पाहू या. 2009 साली अलिगढ (उत्तर प्रदेश) विद्यापीठातील एका मराठीच्या प्राध्यापकावर समलैंगिक संबंधांबाबत खटला भरल्या गेला. या प्राध्यापक म्हणजे डॉ. श्रीनिवास सिरास. त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्या मित्रासोबत असलेल्या लैंगिक संबंधांचे चित्रिकरण करण्यात आले. त्यावरून अलिगढ विद्यापीठाने त्यांना विनाचौकशी निलंबीत केले. त्याविरोधात सिरास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. दीर्घकाळ लढून मोठ्या चिकाटीने त्यांनी न्याय मिळवला. शेवटी निकाल त्यांच्या बाजूने लागला. त्यांना आपल्या पदावर परत नियुक्ती देण्याचा आदेश न्यायालयाने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला दिला. हा निकाल हाती आल्यानंतर सिरास यांनी आत्महत्या केली. ही सत्य घटना आहे. 

या सत्य घटनेवर हंसल मेहता यांनी चित्रपट बनवला ‘अलिगढ’. मनोज वाजपेयी या ताकदीच्या नटाने सिरास यांची भूमिका अप्रतिम साकारली आहे. तरूण पत्रकाराची भूमिका राजकुमार राव या नविन नटाने समरसतेने रंगवली आहे. हा चित्रपट नुकताच 26 फेब्रुवारीला भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. ज्या गावात ही घटना घडली, त्या अलिगढ मध्ये मात्र हा चित्रपट प्रदर्शित होवू दिला गेला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील भाजपाचे खासदार आणि इतर पक्ष संघटना या सगळ्यांचा असलेला विरोध. हा विरोध का तर या चित्रपटामुळे त्या शहराची, विद्यापीठाची बदनामी होते. 

आपल्याकडे काही प्रकरणात दलित विरूद्ध सवर्ण किंवा हिंदू विरूद्ध मुस्लीम असे काही चित्र असले की सगळं कसं सोयीचं होवून जातं. बोंब मारता येते, मोठे लेख लिहीता येतात, टिव्ही चॅनेलवरून घसा कोरडा पडेपर्यंत चर्चा करता येतात. पण अशी सोयीची विभागणी नसेल तर काय करायचे? अलिगढ चित्रपटाबाबत हा एक मोठा घोळ होवून बसला आहे. प्रा. सिरास हे हिंदू ब्राह्मण आणि त्यांचा समलैंगिक जोडिदार इरफान हा मुसलमान. प्रा. सिरास हे मोठी नौकरी असलेले प्रतिष्ठीत गृहस्थ तर इरफान हा एक साधा रिक्शावाला. आता या सगळ्या प्रकरणात कुणी कुणाची बाजू घ्यायची? 

या चित्रपटात या प्रकरणाचा वेध घेणारा पत्रकार ख्रिश्‍चन दाखवला आहे. यात हिंदू-ख्रिश्‍चन-मुसलमान अशा विविध धर्माचे लोक गुंतलेले आहेत. ते सगळे मानविय पातळीवरून विचार करत आहेत. मग अशा चित्रपटाला विरोध कसा करायचा किंवा त्याला पाठिंबा तरी कसा द्यायचा? 

अख्ख्या चितत्रपटात कुठेही भडक चित्रण केलेले नाही. प्रा. सिरास यांच्यावर खटला चालविला जातो त्यासाठी ‘गे’ लोकांसाठी काम करणार्‍या संस्था पुढे येतात. त्यांची एक पार्टी चित्रपटात दाखवली आहे. त्यातही प्रा. सिरास अवघडून गेलेले आहेत. त्यांना आपली ही ओळख मुद्दाम होवून जिकडे तिकडे मांडण्यातही फार रस नाही. हे संबंध ही त्यांच्यासाठी एक अतिशय खासगी बाब आहे. सरकारी वकिल जी एक स्त्री दाखवली आहे ती अतिशय हीन भाषेत त्यांचा पाणउतारा करू पाहते. तूमच्या दोघात मर्द कोण आहे असले अभिरूचीहीन प्रश्न विचारते. पण या कशालाही सिरास उत्तर देत नाहीत. त्यांची बाजू त्यांच्या वतिने त्यांचे वकील मांडतात.

या सगळ्या प्रकरणाचा शोध घेणारा पत्रकार दिपू याला प्रा. सिरास आपले कवितेचे पुस्तक भेट देतात. ( प्रा. सिरास यांचा हा कवितासंग्रह ‘पायाखालची हिरवळ’ नावाने प्रसिद्ध आहे. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.) दिपूला मराठी येत नसते. तर त्यासाठी सिरास आपल्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करतात. कोर्टाच्या परिसरात, खटला चालू असताना सिरास शांतपणे आपल्याच कवितांचे इंग्रजी भाषांतर करत बसलेले असतात. त्यांचे खटल्याकडे लक्षच नसते. याचे कारण म्हणजे त्यांना भोगावा लागलेला मन:स्ताप. आपण समलैंगिक आहोत हे आजूबाजूच्या लोकांना पचत नाही. ते आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात. साधे रहायला घर मिळू देत नाहीत. जवळचे प्राध्यापक आपल्याला जाणिवपूर्वक या खटल्यात अडकतात. निवृत्तीसाठी अगदी दोनच महिने राहिले असताना हे मुद्दामहून घडविले जाते. याची खंत त्यांना आतल्या आत कुरतडत राहते. घरचे म्हणून काही बंध सिरास यांना शिल्लक राहिलेले नसतात. त्यांनी लग्न केलेले नसते. अशा परिस्थितीत ते एकाकी पडतात. त्यांच्या अगदी जवळ असलेले प्राध्यापक मित्रही त्यांची साथ सोडून देतात. अगदी त्यांना घरी आल्यावर जेवायलाही विचारत नाहीत. हॉटेलमध्येही राहू दिले जात नाही. न्यायालयाच्या निकालाची वाट पहात ते थांबतात. निकाल लागतो आणि सिरास आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतात.

या चित्रपटाचा तिरस्कार अलिगढ मध्ये केल्या गेला. खरे तर अजूनही आपल्याकडे घटनेचे 377 वे कलम रद्द झाले नाही. त्यासाठी समलैंगिकांच्या संस्था, संघटना रस्त्यावर उतरून लढत आहेत. न्यायालयाची दारे ठोठावत आहेत. 

महाराष्ट्रात बिंदू माधव खिरे यांचे समपथिक ट्रस्ट यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यांनी काही पुस्तकेही या विषयावरची लिहीली आहेत. त्यांचा अनुभवही मोठा दाहक आहे. ही पुस्तके विक्रीस ठेवण्यासही विक्रेते तयार नाहीत. अशी भयानक परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्राची आहे. मग मध्ययुगीन मानसिकता असणार्‍या अलिगढला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे. 

समलैंगिकता ही नैसर्गिक आहे. त्या बाबतचे गैरसमज दूर करणे अतिशय गरजेचे आहे. ‘अलिगढ’ सारखे चित्रपट आपण किमान समजून घेतले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या समलैंगिकांना धीर देण्याचे  भावनिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम आपल्याला करावे लागणार आहे. आपण पुरस्कार कधी देणार ही दूरची बाब आहे पण आधी तिरस्कार तर कमी करू.

(हा लेख वाचल्यावर ज्या कुणा समलैंगिकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील त्यांनी जरूर फोन करावा. त्यांच्याबद्दल माहिती गुप्त ठेवण्यात येईल. ही सगळी पुस्तकं कशी उपलब्ध होतील ही माहितीही दिली जाईल.) 

श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.


Monday, February 29, 2016

मराठी भाषा गौरव दिनाची 'शिवजयंती' झाली आहे का?

२७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा वाढदिवस. हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो. या दिवसाला काय म्हणावे याचा भरपूर घोळ सध्या घातला जात आहे. कुणी मराठी राजभाषा दिन म्हणतात, कुणी मराठी भाषा दिन म्हणतात, कुणी मातृभाषा दिन म्हणतात. महाराष्ट्र शासनाने जी पत्रिका सर्वांना पाठवलेली आहे त्यावरती 'मराठी भाषा गौरव दिन' असा उल्लेख आहे. मंत्री विनोद तावडे आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या नावाने ही पत्रिका काढण्यात आली आहे.

रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे २७ तारखेला संध्याकाळी मुख्य कार्यक्रम शासनाच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे वाड्मय पुरस्कार, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

हे सगळं वाचल्यावर असं वाटू शकत की, महाराष्ट्र शासन मराठी भाषेसाठी किती आणि काय करत आहे. गावोगावी मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम आखण्यात आले. सगळ्यांनी मिळून मराठीचा ढोल इतक्या जोरात बडवला की, कान फाटून जायची वेळ आली. आपल्याकडे ज्या पद्धतीने स्त्रीची उपेक्षा केल्या गेली आणि ते लपविण्यासाठी मग तिची 'मातृदेवो भव' म्हणून पूजा करण्यात येते, तिला महान मानले जाते. तसेच एखाद्या स्त्रीला पतिव्रता म्हणून गौरविले जाते आणि नवर्‍याच्या सोबत सती जाण्यास भाग पाडले जाते. त्यावेळी मोठमोठय़ाने ढोल बडवून तिचा आवाज दाबून टाकण्यात येतो. आज हाच प्रकार मराठी भाषेच्या बाबतीत होताना दिसत आहे. 

ज्या पद्धतीने मोठा गाजावाजा करून शिवजयंती साजरी केली जाते. मोठा भपका केला जातो आणि शिवाजी महाराजांचे विचार मात्र अडगळीत फेकले जातात. शेतीबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरण कुठेही राबविल्या जात नाही. तसेच भाषेचे झाले आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राजभाषा कोश तयार केला होता. मंत्रिमंडळाला मराठी नावं तयार करून दिल्या गेली होती. याची आठवण तरी आज राज्यकर्त्यांना आहे काय? 

'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करणो म्हणजे फक्त दिखावू स्वरूपाचे कार्यक्रम करणो, असे महाराष्ट्र शासनाला वाटते का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा शपथविधीचा कार्यक्रम झगमगाटी स्वरूपात घेतल्या गेला होता. अशोक हंडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम घेतला म्हणजे मराठी संस्कृतीची जपवणूक झाली, असा भ्रम तयार झाला आहे का? 

शिवजयंती १९ फेब्रुवारीला आणि मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीला साजरा होतो. नेमक्या याच काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रवेशाला सुरुवात होते. गावोगावी केशरी फेटे लावून मोठमोठे ढोल बडवत, नऊवारी घालून, धोतरं घालून मिरवणुका काढल्या जातात. आणि हाच ढोंगी मराठी माणूस इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून रांग लावून याच वेळी उभा राहतो. आता काय खरं मानायचं? 

मोठय़ा शहरांमधून मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. त्याबद्दल मराठीसाठी बोंब मारणारा हा मराठी माणूस काय करतो आहे? शासनाला प्रत्येक कामासाठी जाब विचारणो हे एक सोपे काम आहे. पण आपण स्वत: काय करत आहोत याचा जाब कोण आणि कोणाला विचारणार. ज्याप्रमाणो शिवजयंतीची मिरवणूक संपली की, आपली जबाबदारी झटकून आपण मोकळे होतो तसेच २७ फेब्रुवारीचा मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा संपला की, आपणही भाषेच्या जबाबदारीतून मोकळे होतो. पुन्हा वर्षभर मराठीचे नाव काढायची गरज नाही. एक दिवस 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे गाणो गायचे. आणि दुसर्‍या दिवसापासून मराठीच्या पाठीत काठी घालायची असेच आमचे धोरण आहे. एखादा पुतळा उभारल्यानंतर त्या नेत्याची जयंती—पुण्यतिथी सोडली तर बाकी दिवस पुतळय़ावरती कबुतरं आणि कावळे बसले तरी आम्हाला फिकीर नसते. उलट काही मोजके दिवस सोडून नेत्यांच्या विचारांपासून आम्हाला सुटका हवी असते असाच उलटा अर्थ त्याचा निघतो आहे. मराठी भाषेचेही असेच करायला आम्ही बसलो आहोत. 

एक दिवस गौरव 
आणि उरलेले दिवस लाथा । 
इतकीच सध्या उरली आहे 
मराठी भाषेची गाथा ।। 

अशी आपली परिस्थिती झाली आहे. 'मराठी भाषेसाठी काय करायला पाहिजे?' असा प्रश्न सगळेजण विचारत असतात. याचे अतिशय साधे, बालीश वाटणारे पण अमलात आणायला अतिशय अवघड उत्तर म्हणजे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. 

मोठी शहर सोडली तर आजही उर्वरित महाराष्ट्रात संपर्काची भाषा म्हणून मराठीचा वापर होतो. आजही महाराष्ट्रात एकूण शालेय विद्यार्थ्यांपैकी मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ९३ टक्के इतकी प्रचंड आहे. हे आपण लक्षात घेणार की नाही? मूठभर शहरी लोक आणि त्यांची इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं यांच्याकडे पाहून किती दिवस गळे काढत बसणार आहोत? आज जे कोणी लोक मराठी भाषेचा वापर शिक्षणासाठी, संपर्कासाठी, व्यवहारासाठी करत आहेत. त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणो मराठी भाषाविषयक धोरण आखले गेले पाहिजे. त्यांना गरज असेल ती पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचवली गेली पाहिजेत. महाराष्ट्रात बारा हजार सार्वजनिक ग्रंथालय आहेत. यांच्यामध्ये असलेली जवळपास सगळीच पुस्तके मराठी भाषेतील आहेत. त्यांच्याकडे येणारे वाचकही स्वाभाविकपणो मराठीच आहेत. मग त्यांना डोळय़ापुढे ठेवून काही पाऊले उचलायला नकोत काय? आज जी पुस्तके मराठीमध्ये प्रकाशित होतात त्यांना महाराष्ट्रात सर्वदूर पोहचवण्यासाठी काही प्रय▪ झाले पाहिजेत. हे काम मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अग्रक्रमाने झाले पहिजे. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १९६0 झाली. आज त्याला पन्नास वर्ष उलटून गेली आहेत. मग शासनाचा सर्व कारभार अजूनही पूर्णपणो मराठीत झालेला का दिसत नाही? विविध सरकारी कार्यालयांत जी मराठी वापरली जाते ती भयानक क्लिष्ट आणि न समजणारी आहे. सोप्या मराठी शब्दांचा वापर वाढला तर तो लोकांना सोईचा ठरू शकतो.

लहान मुले स्वाभाविकपणो मातृभाषेतून संवाद साधतात मग त्यांना जास्तीत जास्त माहिती मातृभाषेतून उपलब्ध करून दिली तर त्यांना फायदा होऊ शकतो. माहितीच्या पुढे जाऊन ज्ञान मराठीतून मिळायला हवे. या सगळय़ातून त्याची विचार करण्याची प्रक्रिया पूर्णपणो विकसित होऊ शकते. आणि ती झाल्याच्या नंतर तो जगातील कुठलीही भाषा शिकून घेऊ शकतो. त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. कुठल्याही माणसाची विचार करण्याची क्षमता केवळ त्याच्या मातृभाषेतूनच विकसित पाहू शकते. एकदा ही क्षमता विकसित झाल्याच्या नंतर इतर गोष्टींचे कलम त्याच्यावर करता येते. ज्याप्रमाणो गावठी आंब्याची कोय लावल्यानंतर ते झाड वाढले की, त्यावर इतर कुठल्याही आंब्याचे कलम करता येते. त्याचे कारण म्हणजे जमिनीत खोलवर मुळय़ा पसरून सत्व शोषूण घेण्याची जास्तीत जास्त क्षमता गावठी आंब्यामध्ये असते. तसेच जर मातृभाषेतून शिक्षण घेऊन विचार प्रक्रिया विकसित झाली तर त्यावर इतर कुठल्याही भाषेचे कलम करता येणो शक्य होते. 

मराठी भाषा गौरव दिन अर्थपूर्ण होण्यासाठी आपण सगळय़ांनी मिळून मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करणो गरजेचे आहे. 

Monday, February 22, 2016

शासकिय ग्रंथ महोत्सवाचे स्वरूप बदलायला हवे !

उरूस, पुण्यनगरी, 22 फेब्रुवारी 2016

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेली 5 वर्षे जिल्ह्या जिल्ह्यात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सुरवातीला हा ग्रंथ महोत्सव माहिती विभागा मार्फत आयोजित केला गेला. गेली दोन वर्षे ग्रंथालय संचालनालयाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एक अतिशय सकारात्मक गोष्ट म्हणजे जिल्हा ग्रंथालय संघाला व प्रकाशकांच्या प्रतिनिधींना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. 

मराठी पुस्तके सर्वदूर पोचत नाहीत ही तक्रार नेहमी केली जाते. ती पुष्कळशी खरीही आहे. गेली कित्येक वर्षे पुण्या-मुंबईच्या बाहेर मराठी पुस्तकांची बाजारपेठ आपण विकसित करून शकलो नाहीत. जेंव्हा जेंव्हा पुण्या मुंबई परिसराबाहेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होते त्या त्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनास मोठा प्रतिसाद लाभतो. कारण सध्या पुस्तके पुण्यात आणि वाचक सर्वदूर महाराष्ट्रात असा विरोधाभास पहावयास मिळतो. हा असमतोल दूर करावयाचा असेल तर पुस्तके दूर दूरपर्यंत पोचवली पाहिजेत यात काही वादच नाही. 

हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने जिल्हा ग्रंथ महोत्सव ही चांगली योजना सुरू केली. तिला छोट्या गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे असे चित्र महाराष्ट्रात सर्वत्र आहे. हे ग्रंथमहोत्सवाचे पाचवे वर्षे. आता काही बदल या महोत्सवात अपेक्षीत आहेत. ते झाले तर अतिशय चांगला परिणाम दिसेल.
पहिली गोष्ट म्हणजे या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन महिन्यातच झालेले योग्य. फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी बारावीच्या परिक्षा सुरू होतात. शैक्षणिक संस्थांमध्ये परिक्षांची घाई असल्याने त्यांचे सहकार्य मिळू शकत नाही. शिवाय पालकही या काळात पुस्तकांच्या खरेदीसाठी अनुकूलता दाखवित नाहीत. तेच जर हा महोत्सव दिवाळीच्या मागेपुढे आखल्या गेल्या तर त्याची उपयुक्तता वाढेल. 14 नोव्हेंबर या बालदिनाला जोडून नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने बाल पुस्तक सप्ताह साजरा केला जातो. त्यासाठी विशिष्ट निधी त्या संस्थेकडे राखिव ठेवलेला असतो. महाराष्ट्रात शाळांमध्ये जिल्हा ग्रंथ महोत्सव या बालदिनाला जोडून घेतल्यास त्याचा उपयोग होवू शकेल. 

तसेच स्थानिक पातळीवरील साहित्य संस्थांचा सहभाग यात वाढविला पाहिजे. जिल्हा साहित्य संमेलने, विभागीय साहित्य संमेलने, प्रकाशक परिषदांची अधिवेशने, जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक अधिवेशने, विभागीय अधिवेशने आदी कार्यक्रम जर या ग्रंथ महोत्सवाला जोडून घेतले तर त्याचा फायदा त्या त्या संस्थांना होईल शिवाय लोकांचा सहभाग वाढून ग्रंथ महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळू शकेल. 

महाराष्ट्रात 12 हजार सार्वजनिक वाचनालये आहेत. त्यांचा या ग्रंथ महोत्सवात सक्रिय सहभाग वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद या विभागीय पातळीवर काम करणार्‍या साहित्य संस्था आहेत. त्यांच्या सर्वांच्या मिळून एकत्र विचार केला तर किमान 100 शाखा महाराष्ट्रात सक्रियपणे चालू आहेत. यांचा सहभाग या ग्रंथमहोत्सवात आवश्यक आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे या ग्रंथ महोत्सवाच्या तारखा ठरविताना विभाग म्हणजे एक एकक गृहीत धरून नियोजन करण्यात यावे. उदा. मराठवाडा विभागात आठ जिल्हे आहेत. तेंव्हा या आठ जिल्ह्यात ग्रंथ महोत्सवाच्या तारखा ठरविताना एकाच वेळी दोन किंवा तिन जिल्ह्यांमध्ये ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात येवू नये. त्याचे साधे कारण म्हणजे या ग्रंथ महोत्सवाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात ग्रंथ पोचावेत हा आहे. त्यासाठी ग्रंथ विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी/प्रकाशकांनी आपली आपली ग्रंथ दालनं (स्टॉल्स) उभारले पाहिजेत. छोट्या गावांमध्ये विक्रेते नाहीत. ज्या वेळी ग्रंथ महोत्सव भरविला जातो त्यावेळी बाहेर गावाहून येवून विक्रेता आपले दालन उभे करतो. मग जर एकाच वेळी दोन तीन ठिकाणी ग्रंथ महोत्सव असेल तर तो आपल्या सोयीच्या ठिकाणीच दालन उभे करतो. परिणामी इतर ठिकाणी त्याला जाता येतच नाही. मग जर वाचकांनाच पुस्तके पहायला मिळाली नाहीत तर मुळ उद्देशच सफल होत नाही. तेंव्हा या बाबीचा गांभिर्याने विचार व्हावा. संपूर्ण विभागात ग्रंथ महोत्सवाच्या तारखा एका नंतर एक अशा असाव्यात.

तिसरा मुद्दा जिल्हा ग्रंथ महोत्सव फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच भरवला पाहिजे असे कशामुळे? एका जिल्ह्यात दरवर्षी वेगवेगळ्या तालूक्याच्या गावी हा ग्रंथ महोत्सव भरवला तर त्या त्या भागातील रसिक वाचकांना त्याचा फायदा होवू शकेल. मराठवाड्याचा जर विचार केला तर जिल्हा नसलेली पण सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेली उदगीर, अंबाजोगाई, माजलगांव, वसमत, सेलू, उमरगा, अंबंड, पैठण, निलंगा अशी बरीच गावं आहेत. या ठिकाणी जर ग्रंथ महोत्सव भरविला तर त्याला अतिशय चांगला प्रतिसाद वाचकांकडून मिळू शकतो. 

चौथा मुद्दा ग्रंथ प्रदर्शनात स्टॉल्सची जी रचना आहे त्या बाबत आहे. पुस्तकांसाठी ही रचना त्रासदायक आहे. पुस्तकांचे प्रदर्शन भरवायचे असेल तर त्यासाठी वाचकांना मोकळं फिरून पुस्तकं बघता आली पाहिजे अशी जागा हवी. प्रदर्शनाची जागा रात्री पुर्णपणे बंदिस्त करून घेता आली पाहिजे. कारण पुस्तकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. रोज रात्री उघड्यावरची पुस्तके आवरून घ्यायची व सकाळी परत मांडायची ही सर्कस प्रदर्शनाच्या तीन चार दिवस कशी करणार?

अवकाळी पावसाची सतत भिती असल्याने हे स्टॉल्स पत्र्याचे करायला हवेत. शिवाय ग्रंथ प्रदर्शनाचे स्थळ धूळमुक्त हवे. नसता पुस्तके खराब होतात. हे जे नुकसान होते त्याला जबाबदार कोण? विक्रेत्याने पुस्तके प्रकाशकाकडून जोखिमेवर आणलेली असतात. धूळीने खराब झालेली पुस्तके प्रकाशक परत घेत नाही. मग अशी पुस्तके त्या विक्रेत्याच्या अंगावर पडतात. 

शेवटचा मुद्दा ग्रंथ महोत्सवात घेण्यात येणार्‍या कार्यक्रमांबाबत. या कार्यक्रमांचा दर्जा काय असावा आणि कसा असावा यावर चर्चा करण्याची ही जागा नाही.  ही पूर्णपणे स्थानिक बाब आहे. त्यात कमीजास्त होणारच. पण या कार्यक्रमांचे आयोजन करत असताना दिवसभर थोड्या थोड्या अंतराने कार्यक्रम आखलेले असावेत कारण त्यामुळे या परिसरात लोकांची गर्दी कायम राहते. रात्री 10 वाजेपर्यंत जर प्रदर्शन उघडे राहणार असेल तर रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आखले जावेत. विशेषत: संध्याकाळच्या वेळी स्थानिक कलाकारांचे गाण्याचे कार्यक्रम ठेवले जावेत. आज महाराष्ट्रात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना अतिशय चांगला प्रतिसाद ठिक ठिकाणी भेटतो आहे. लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. प्रत्येक गावात नाटक-संगीत-साहित्य यांना जाणणारा एक ठराविकच वर्ग असतो. त्यांना जर आपण या निमित्ताने एकत्र करू शकलो तर एक मोठेच सांस्कृतिक पाऊल उचलले असे होईल. पूर्वी गावो गावी जत्रा/उरूस भरायचे. तेंव्हा त्याचे स्वरूप हे सांस्कृतिकच होते. 

महाराष्ट्रातील प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या मराठी प्रकाशक परिषद आणि मराठी प्रकाशक संघ या दोन संस्थांना तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांना या नियोजनात सहभागी करून घेण्यात यावे. कारण हे दोन महत्त्वाचे घटक अखिल भारतीय साहित्य संमेलनाने आत्तापर्यंत उपेक्षीत ठेवले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देखील ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. असे दोन दोन वेळा दोन वेगवेगळ्या विभागाच्या वतीने ग्रंथ महोत्सव न घेता हा निधी एकत्र करून एकच मोठा ग्रंथ महोत्सव शासनाच्यावतीने जिल्ह्यात एका ठिकाणी घेण्यात यावा. शासनाच्यावतीने जी पुस्तके प्रकाशीत केली जातात. ती सर्व पुस्तकेही या ग्रंथमहोत्सवात उपलब्ध झालेली दिसली नाहीत. ही त्रुटी पुढच्यावर्षी दूर करण्यात यावी. शासनाची सर्व प्रकाशने शासकीय ग्रंथ महोत्सवात उपलब्ध करून देण्यात यावीत.    
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, February 15, 2016

गरज बरस प्यासी धरती को फिर ‘निदा फाजली’ दे मौला

उरूस, पुण्यनगरी, 15 फेब्रुवारी 2016

जगजित सिंग यांनी गायलेली निदा फाजली यांची एक गझल मोठी सुंदर आहे. 

गरज बरस प्यासी धरती को
फिर पानी दे मौला
चिडीयों को दाने बच्चों को
गुडधानी दे मौला

आज निदा फाजली (8 फेब्रुवारी) यांचे दु:खद निधन झाल्यानंतर त्यांचे सर्व चाहते रसिक देवाकडे त्यांच्या शब्दांत थोडासा बदल करून अशी प्रार्थना करत असतील, ‘गरज बरस प्यासी धरती को फिर निदा फाजली दे मौला.’

निदा फाजली यांची शायरी उच्च दर्जाची होती यात काही वादच नाही. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, पद्मश्री सारखा गौरव प्राप्त झाला. मुळचे कश्मिरी असलेले फाजली यांचे बालपण ग्वाल्हेरला गेले. पुढे फाळणीनंतर त्यांचे पालक पाकिस्तानात गेले पण फाजली यांनी मात्र भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात गेलेल्या आपल्या आई वडिलांबद्दल एक मऊ कोपरा त्यांच्या हृदयात कायमचा होता. आईवरची एक सुंदर गझल ‘खोया हुआ सा कुछ’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रहात  आहे

बेसन की सोंधी रोटी पर
खट्टी चटनी जैसी मां
याद आती है चौका-बासन
चिमटा, फुकनी जैसी मां

बान की खुर्री खाट के ऊपर
हर आहट पर कान धरे
आधी सोयी आधी जागी
थकी दोपहरी-जैसी मां

निदा फाजली यांच्या कवितांची दखल चांगल्या पद्धतीनं घेतल्या गेली. पाकिस्तानातून परतल्यावर त्यांनी एक गझल लिहीली होती. त्याचा एक शेर खुप गाजला.

हिंदू भी मजे मे है
मुसलमां भी मजे मे है
इन्सान परेशान 
यहा भी है वहां भी

या निदा फाजली यांनी काही मोजक्या चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. त्यातील काही गाणी आजही सर्वांच्या तोंडावर आहेत. ही गाणी निदा फाजली यांची आहेत हे रसिकांना माहित नसतं. पण गाण्याला मात्र लोकप्रियता मिळालेली असते.

‘आप तो एैसे न थे’ (1980) या चित्रपटाला उषा खन्ना यांचे संगीत आहे. त्यातील निदा फाजली यांचे गीत ‘तू इस तर्‍हा से मेरी जिंदगी मे शामील है, जहां भी जाओ ये लगता है मेरी मंझिल है’ खुप लोकप्रिय झाले होते. मनहर उधास मोहम्मद रफी आणि हेमलता या तिघांच्याही आवाजात हे गाणं वेगवेगळं गायल्या गेलं आहे. बीनाका गीतमालाच्या 1981 च्या यादीत हे गाणं 23 व्या क्रमांकावर होतं.

खय्याम हा एक अतिशय प्रतिभावंत संगीतकार. फार मोजकी पण दर्जेदार गाणी त्यांनी दिली. आहिस्ता आहिस्ता (1981) या चित्रपटात भुपेंद्रच्या आवाजात फार गाणं आहे. ‘कभी किसी को मुक्कम्मल जहां नही मिलता, कही जमी तो कही आसमां नही मिलता’ हे गाणं आशा भोसलेच्या आवाजातही आहे. पण जास्त प्रभावशाली वाटतो तो भुपेंद्रचाच आवाज. ही गझल निदा फाजली यांची आहे.

जिसे भी देखीये वो 
अपने आप मे गुम है 
जूबा मिली है मगर
हमजुबा नही मिलता

किंवा याच गझलेतील सर्वात सुंदर शेर

बुझा सका है भला कौन
वक्त के शोले
ये एैसी आग है जिसमे
धुआं नही मिलता

कन्नड चित्रपट ‘गिज्जे पुजे’ चा ‘आहिस्ता आहिस्ता’ हा हिंदी रिमेक़ होता. याच चित्रपटात ‘नजर से फुल चुनती है नजर आहिस्ता आहिस्ता, मुहोब्बत रंग लाती है मगर आहिस्ता आहिस्ता’ हे आशा भोसले आणि अन्वर यांनी गायलेले गोड गाणेही आहे. जे की निदा फाजली यांचेच आहे. 

उषा खन्नाचाच दुसरा चित्रपट ‘स्वीकार किया मैने’ (1983) मध्ये किशोर कुमार व लता मंगेशकरचे एक छान गाणे आहे. ‘चांद के पास जो सितारा है’ याचे गीतकारही निदा फाजलीच आहेत.

कमाल अमरोही यांनी ‘रझिया सुलतान’ (1983) या चित्रपटासाठी जां निसार अख्तर यांना गाणे लिहीण्यासाठी निमंत्रित केले होते. जां निसार अख्तर यांनी सुंदर गाणी दिलीही. खय्याम यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. पण जां निसार अख्तर यांचे अचानक निधन झाले तेंव्हा उर्वरीत दोन गाणी लिहीण्यासाठी अमरोही यांनी निदा फाजली यांना गळ घातली. निदा फाजली यांचे या चित्रपटातील गाणे ‘हरियाला बन्ना आया है’ खुप श्रवणीय आहे. आशा भोसले आणि खय्याम यांची गायक पत्नी जगजीत कौर यांचा आवाज या गाण्याला आहे. दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेली रझिया सुलतान हीची आनंदी मनोवृत्ती दाखविणारे हे गाणे. याचे शब्दही मोठे समर्पक आहेत. 

1981 मध्येच ‘नाखुदा’ या चित्रपटात खय्याम यांनी नंतर प्रसिद्धीस आलेल्या नुसरत फतेह अली यांच्या आवाजात एक सुफी कव्वाली रेकॉर्ड केली होती. ‘हक अली मौला अली’ ही ती कव्वाली निदा फाजली यांनीच लिहीली होती.

जगजित सिंग यांनी निदा फाजली यांच्या शब्दांना अतिशय योग्य तो न्याय दिला. त्यांच्या गझलांचे स्वतंत्र अल्बम जगजित सिंग यांनी संगीतबद्ध केले. पण निदा फाजली यांची जगजित सिंग यांनी गायलेली सर्वात जास्त गाजलेली गझल ही ‘सरफरोश’ चित्रपटातील आहे. जतिन ललित यांचे संगीत असलेली ही गझल अमिर खांन, सोनाली बेंद्रे, नसिरूद्दीन शहा यांच्यावर चित्रित  आहे.

होशवालों को खबर क्या
बेखुदी क्या चिज है
इश्क किजीये और समझिये
जिंदगी क्या चिज़ है

ही गझल आजही तरूणांमध्ये प्रेमगीत म्हणून लोकप्रिय आहे. नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. या काळात ही गझल फार जास्त वेळा ऐकली, गुणगुणली जाते. निदा फाजली यांचे साधे शब्द जगजित सिंगच्या आवाजात रसिकांच्या मनात घर करून आहेत.

अतिशय मोजक्या अशा 30 चित्रपटांत निदा फाजली यांनी गीतलेखन केलं. त्यांचा मुळचा पिंड हा कवीचाच. त्यामुळे गीतकार म्हणून येणारी बंधनं स्विकारणं अवघडच होतं. भारतीय संस्कृतीत फाजली पुर्णपणे मिसळून गेले होते. याचा पुरावा म्हणजे त्यांनी उर्दूत लिहीलेले दोहे. 

सातो दिन भगवान के
क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक
भुखा रहे फकिर.

आपल्या भाव भावना कवी नेहमी आपल्या शब्दांत व्यक्त करत राहतो. पण त्यासोबतच न बोलल्या गेलेले बरंच काही आहे याची जाणीव त्याला असते. किंबहुना जे काही आपण बोललो, लिहीलं त्यापेक्षा शिल्लक राहिलेलं जास्त आहे. निदा फाजली यांच्या निधनानंतर त्यांचे शब्द शांत झाले. आता त्यांची नविन कविता ऐकायला/वाचायला मिळणार नाही. या कवीनं याच जाणिवेनं एक ओळ लिहून ठेवली होती

मुंह की बात सुने हर कोई
दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाजारों मे
खामोशी पहचाने कौन

अनंताच्या ‘खामोशी’त विलीन झालेल्या या प्रतिभावंत शायराला आदरांजली. 

  



       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, February 8, 2016

कृषी उत्पन्न बाजार समितीचा काळा कायदा संपणार?



उरूस, पुण्यनगरी, 8 फेब्रुवारी 2016

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने नुकत्याच पार पडलेल्या आपल्या बैठकीत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याची बातमी माध्यमांनी दिली. शेतकर्‍याला आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फतच विकण्याचे बंधन आत्तापर्यंत कायद्याने घालून दिले होते. ही अट शिथिल करण्याची शिफारस मंत्रीमंडळाने केली केली आहे. कुठल्या पक्षाचा नतद्रष्टपणा आड आला नाही तर येत्या अधिवेशनात कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात रितसर दुरूस्ती होऊन हा निर्णय प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.

शेतकर्‍याच्या नावाने गळे काढत राज्य करणारे समाजवादी विचारसरणीचे सर्व राज्यकर्ते आवर्जून सांगतात की शेतकर्‍यांच्या भल्यासाठीच सहकार निर्माण करण्यात आला होता. शेतकर्‍यांच्या भल्यासाठीच त्याच्या शेतमालाला भाव मिळावा, विक्रीची सोय व्हावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. 

मूळ अपेक्षा अशी होती की शासनाने विविध ठिकाणी शेतमाला खरेदी करण्यासाठी बाजापेठा उभाराव्यात. या बाजारपेठांमध्ये शेतकर्‍यांनी आणून टाकलेला माल योग्य पद्धतीने मोजून, त्याची प्रतवारी (ग्रेडेशन) करून, स्वच्छता करून, मालातील आर्द्रता कमी करून, त्याचे चांगले पॅकिंग करून तो बाजारात आणल्या जावा. जेणे करून शेतकर्‍याला चार पैसे जास्त मिळतील. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुरेशी जागा, निधी, तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता याची कमतरता शेतकर्‍याकडे असते. शेतकर्‍याचे भले आपणच केले पाहिजे असा समाजवादी कळवळा सरकारला आला आणि त्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन केल्या. 

आज महाराष्ट्रात कुठल्याही बाजार समितीत कुणीही सहज चक्कर मारली तर काय चित्र दिसते? 
पहाटे पहाटे शेतकर्‍याच्या मालाच्या गाड्या बाजार समितीच्या आवारात येऊन धडकतात. प्रचंड गर्दी जमा झालेली असते. गाडीतील शेतमाल शेतकरी स्वत:च आपल्या पाठीवरून अडत्याच्या दुकानासमोर आणून ठेवतो. त्याने आणलेल्या मालाचे वजन साध्या वजन काट्यावर केले जाते. ज्यात अचूकपणा नसतो. भाज्या आणि फळांच्याबाबत तर मोजमाप होत नाही. त्यांचे ढिग लावले जातात. या ढिगाचे जागीच लिलाव बोलले जातात. जो काही भाव ठरतो त्या प्रमाणे त्या मालाची एकूण किंमत मोजली जाते. या किंमतीमधून हमाली, तोलाई, समितीचा कर वजा करून ही रक्कम शेतकर्‍याच्या हाती दिली जाते. 

जर शेतकर्‍याने हा माल स्वत:च उचलून आणला असेल. तर त्याच्या बीलातून हमालीचे पैसे का वजा केले? 
हा प्रश्न करायचा नाही. तूम्ही मजूर विरोधी अहात. तूम्ही कष्टकर्‍यांच्या विरोधात आहात. ज्याने हमाल म्हणून पितळेचा लखलखीत बिल्ला नोंदणी करून मिळवलेला आहे. त्याच्याकडे तो एक नोंदणी क्रमांक शासनाने दिला आहे. मग त्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत. त्यासाठी त्याने काम केले पाहिजे अशा क्ष्ाुद्र अपेक्षा करणारे तूम्ही कोण? शेतकरी हा प्रचंड पैसे कमावतो. तो शोषण करतो. मग त्याची बाजू घ्यायची नाही.

दुसरा प्रश्र उभा राहतो तो म्हणजे जून्या वजनकाट्यांवर वजन करणार्‍या बाजार समितीने ‘तोलाई’च्या नावाने पैसे कापायचे काय कारण? महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाला मोजण्याचे तंत्र विकसित केले नाही. मग त्यांना कर द्यायचा कशाला? 

शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला शेतमाल लगेच हे व्यापारी विकतात. किंवा तिथून आपल्या गोदामात नेतात. मग साधा प्रश्न आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीची जी जबाबदारी होती की या मालाची स्वच्छता केली पाहिजे, त्यांची प्रतवारी केली पाहिजे, त्यांची चांगली पॅकिंग केली पाहिजे. मग हे सगळे कुठे घडले? आणि नसेलच घडले तर मग ही कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिजेच कशाला? 

जर सर्व शासकीय कर्मचार्‍यांना शासनाने अट घातली की तूम्हाला जर शासनाची नौकरी करायची आहे तर तूम्हाला तूमची मुलं जिल्हा परिषदेच्या, नगर पालिकांच्या शाळेतच घालावी लागतील. तर हे कर्मचारी ऐकतील का? सातवा वेतन आयोग जरूर देतो पण तूमच्या बायकोचे बाळांतपण शासकीय रूग्णालयातच करावे लागेल? सर्व भत्ते नक्की मिळतील पण तूम्हाला लाल डब्याच्या शासकीय एस.टी.नेच प्रवास करणे अनिवार्य आहे. 

मग जर शासनाचे जावाई असलेले हे कर्मचारी शासकीय सेवांबाबत जबरदस्ती केलेली सहन करू शकत नाहीत तर मग शेतकर्‍यांच्या माथ्यावर शासकीय खरेदीचा बडगा कशामुळे? 

भारत हा खेड्यांचा देश आहे हे म्हणत असताना यातील अजून एक छूपं वाक्य विसरलं जातं. ते म्हणजे या खेड्यांमध्ये आठवडी बाजारांची एक व्यवस्था आहे. भारतात ज्यांची किमान दखल घेतली जावी असे खेडोपाडी पसरलेले दहा हजार आठवडी बाजार आहेत. या बाजारात शेतकरी आपल्या जवळचा माल आठवड्याच्या ठराविक दिवशी घेवून येतो. तो विकून आलेल्या पैशातून आपल्याला आवश्यक असणारे समान खरेदी करतो. संध्याकाळी आपल्या गावाकडे परत जातो. हे सगळे बाजार कुठल्याही शासकीय अधिनियमाने सुरू झालेले नाहीत.  आजपर्यंत ते अव्याहतपणे चालू आहेत. 

जर शासनाला शेतकर्‍यांचे भले करायचे तर या आठवडी बाजारांच्या गावी किमान सोयी पुरवाव्यात. याच गावांमध्ये पत्र्याचे शेड असलेली मोठी जागा शेतकरी व व्यापारी यांना सौदे करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यांना शेतमाला साठविण्यासाठी गोदामं उपलब्ध करून द्यावेत. यासाठीची किंमत मोजण्यास शेतकरी तयार आहेत. भारतात भरणार्‍या दहा हजार मोठ्या आठवडी बाजारांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की शेतकर्‍यांची बुद्धी एम.बी.ए. करणार्‍यांपेक्षाही कशी आणि किती जास्त चांगली चालते ते. 

भारत परदेशाशी काय व्यापार करेल तो पुढचा प्रश्न आहे. शेतमालाचा विचार करता 125 कोटींंचा आपला देश हाच आपल्या कृषी मालासाठी एक मोठी बाजारपेठ आहे. त्याचा विचार कधी करणार? उसापासून गुळ तयार होतो. या गुळाचा वापर जास्त करून भारतातच होतो. भारताबाहेर (पाकिस्तान, बांग्लादेश वगळता) गुळाची मागणी तुलनेने कमी आहे. मग या गुळाची भारतीय बाजारपेठ का विकसित केली जात नाही? 

अंब्यांच्या एकुण व्यापारात हापुसचा वाटाच मुळात 8 टक्के इतका कमी आहे. बाकी आहे तो सगळा आपण ज्याला गावठी अंबा म्हणतो तो अंबा. हा सगळा आंबा स्थानिक बाजारपेठेतच खपतो ना. त्याची बाजारपेठ विकसित कधी होणार? 

सीताफळाचा गर कसा काढायचा आणि त्यापासून पुढे काय करायचं अशा मोठ मोठ्या गप्पा मारणारे डोंगरातून काढलेलं हे सीताफळ डोक्यावरच्या टोपलीत टाकून बाजाराच्या गावापर्यंत कसं आणायचं हे सांगतच नाहीत. कारण रस्त्यांच्या किमान सोयी आम्ही करू शकलो नाहीत हे वास्तव आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचा काळा कायदा रद्द झाला तर आनंदाने गुंतवणुकदार बाजारपेठेत गुंतवणुक करतील आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा शेतमाला खरेदीच्या बाजारपेठा उभ्या राहतील. सोयाबीनच्या/कापसाच्या खरेदीचा खासगी अनुभव शासकीय खरेदीपेक्षा चांगलाच राहिला आहे. उन्हाळ्यात शासकीय फेडरेशनच्या कापसाला नेहमी आगी लागायच्या. आता खासगी खरेदी सुरू झाल्यापासून अशा आगी लागल्याच्या बातम्या वाचायला मिळत नाहीत. सरकारी कापुस खासगी झाला की आगीपासुन मुक्त व्हावा ही काय जादू आहे? आणि जर असे असेल तर शेतमाला खरेदीच्या एकाधिकार धोरणालाच आग लागलेली बरी. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, February 1, 2016

प्रकाशकांनीच भरविला ग्रंथ महोत्सव

उरूस, पुण्यनगरी, 1 फेब्रुवारी 2016

साहित्य संमेलनात दोन गोष्टींना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. एक म्हणजे कवी संमेलन आणि दुसरे म्हणजे ग्रंथ प्रदर्शन. ग्रंथ प्रदर्शनात जे विक्रेते प्रकाशक सहभागी असतात त्यांच्या काही तक्रारी संमेलन संपले की ऐकायला मिळतात. स्टॉल्सची रचनाच सदोष होती. सुरक्षा व्यवस्था नव्हती. चोर्‍याच झाल्या. स्टॉल्सचा आकारच लहान होता.

साहित्य संमेलनावर पुस्तकांच्या प्रकाशकांच्या दृष्टीने जो महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो तो म्हणजे संमेलने पुस्तक केंद्री नसतात. अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचीही पुस्तके खपतात असे नाही. ही संमेलने व्यक्ती केंद्री असतात. 

हे सगळे दोष दूर करण्यासाठी आता मराठीतील प्रकाशकच पुढे सरसावले आहेत. ‘चार दिवस पुस्तकांचे’ या नावाचे चार दिवसीय ग्रंथमहोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रात ठिक ठिकाणी करण्याचा निर्णय प्रकाशक परिषदेने घेतला. गोरेगाव येथे हा उपक्रम राबविल्यानंतर आता औरंगाबाद शहरात अश्या प्रकारचे आयोजन नुकतेच यशस्वीरीत्या करण्यात आले होते. 

पुस्तकांची दालनं कशी उभारावीत याचे प्रात्यक्षीकच प्रकाशक परिषदेने सिद्ध करून दाखवले. सर्व स्टॉल्सची रचना मुख्य मंडपाला सामोरी जाणारी होती. जेणे करून कुणावर अन्याय झाला असे म्हणायला नको. प्रदर्शनाची वेळ संपल्यावर रात्री पुस्तकांची सुरक्षा ही प्रत्येक प्रदर्शनात अतिशय चिंतेची बाब असते. औरंगाबाद येथे भरलेल्या ग्रंथ महोत्सवात सगळे स्टॉल्स व्यवस्थित पत्र्यांनी झाकलेले होते. शिवाय हा सगळा परिसर बंदिस्त करून एकच प्रवेश द्वार ठेवण्यात आले होते. परिणामी रात्री हे द्वार लावून घेतले त्यावर रखवालदार बसविला की सर्व स्टॉल्सची सुरक्षा सहज होवून जात होती. परिणामी ज्या विक्रेत्यांनी प्रकाशकांनी स्टॉल्स उभारलेे त्यांना रात्री पुस्तकांच्या सुरक्षेची काही काळजी शिल्लक राहिली नाही. 

पुस्तक प्रदर्शनात समोरा समोर स्टॉल्स उभारले तर फिरण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहत नाही. परिणामी नुस्ती गर्दी होते. हे टाळण्यासाठी या प्रदर्शनात सर्व स्टॉल्स खुल्या मैदानाकडे तोंड करून उभारल्यामुळे फिरायला मोकळी जागा भरपुर उपलब्ध होती. 

साहित्य संमेलनात ज्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यात पुस्तकांना फारसे स्थान भेटत नाही. या ग्रंथ महोत्सवात या त्रुटीवर विचार करून ती दूर करण्यात आली. पुस्तकांचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयेजित करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशनही या सोहळ्यात घेण्यात आले. परिणामी वाचनाचा प्रसार होण्याच्या मुळ उद्देशाला चालना मिळाली. 

सरस्वती भुवन सारख्या शंभर वर्षे जून्या शिक्षण संस्थेने आपल्या परिसरात हा ग्रंथ महोत्सव घेण्यास सहकार्य केले होते. याही गोष्टीला विशेष महत्त्व आहे. मुलांवर वाचनाचा संस्कार शालेय वयातच झाला पाहिजे. शालेय शिक्षणासाठी प्रमाणिकपणे धडाडीने काम करणार्‍या हेरंब कुलकर्णी यांच्या ‘बखर शिक्षणाची’ या पुस्तकाचे प्रकाशक दहावीच्या वर्गातील उत्कृष्ट वाचक असलेल्या मुलीच्या हस्ते करण्यात आले. नुसतेच पुस्तक प्रदर्शन भरवून उपयोग नाही. पालकांनी शिक्षकांनी काय वाचावे हेही सांगितले पाहिजे. या भावनेतून हेरंब कुलकर्णी यांनी बखर शिक्षणाची हे पुस्तक लिहीले. त्यात शिक्षक पालकांनी कोण कोणती पुस्तके वाचली पाहिजे हे सांगितले आहे. अशा पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. 

वाचनाच्या संदर्भात नुस्ती बडबड फार केली जाते. पण प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. मराठी भाषेची चिंता करणारे ठराव साहित्य संमेलनात सतत मांडले जातात. पण नेमके करायचे काय हे सांगितले जात नाही. हे टाळण्यासाठी प्रकाशक परिषदेने प्रत्यक्ष ग्रंथ महोत्सव भरवून दाखवला. त्यातही मुलांनी पालकांनी काय वाचावे अशी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. जेणे करून वाचकांना त्याचा उपयोग होवू शकेल. 
शासकिय प्रकाशनांचे दालनही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. शासकिय पुस्तके गोदामात धूळ खात पडतात. ती लोकांपर्यंत पोचत नाहीत. असा आरोप केला जातो. मग यासाठी प्रकाशक परिषदेने पुढाकार घेवून शासकीय कार्यालयाला विनामुल्य स्टॉल उपलब्ध करून दिला. जेणे करून ही अतिशय स्वस्त आणि महत्त्वाची पुस्तके सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध होतील. भारतीय घटनेची नविन आवृत्ती शासनाने प्रकाशीत केली आहे. बर्‍याच दिवसांपासून ती उपलब्ध नव्हती. शब्दकोशाचे खंड आता उपलब्ध झाले आहेत. आंबेडकरांच्या समग्र वाङमयाच्या खंडांना नेहमीच मागणी असते. विविध जिल्ह्याचे गॅझिटियर लोकांना हवे असतात. ही सगळी पुस्तके या ग्रंथ महोत्सवामुळे चार दिवस लोकांना उपलब्ध झाली.

मुलं वाचत नाहीत असा सरधोपट आरोप केला जातो. पण त्याचे मुळ कारण त्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाहीत. शालेय ग्रंथालयात आता नविन पुस्तकेच खरेदी केली जात नाहीत. शिवाय विद्यार्थ्यांची संख्या वाढली त्या प्रमाणात पुस्तकांची संख्या शालेय ग्रंथालयात वाढली नाही. निधी अभावी शालेय ग्रंथालयांची खरेदी मर्यादीत होवून बसली आहे. पालक स्वत:च वाचत नाहीत मग विद्यार्थ्यांवर आरोप करण्यात काय मतलब.
या ग्रंथ महोत्सवात ज्योत्स्ना प्रकाशन नवनीत प्रकाशन सारख्या मुलांची पुस्तके आवर्जून प्रकाशीत करणार्‍या संस्थांनी आपली दालनं उभारली होती. परिणामी मुलांना अतिशय चांगली दर्जेदार रंगीत चित्रांनीयुक्त अशी पुस्तके पहायला मिळाली. याचाच परिणाम म्हणजे ती त्यांना घ्यावीशी वाटली. 
बाल भारती अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबतच इतरही पुस्तके प्रकाशीत करतं. पण ही पुस्तके फारशी मुलांपर्यंत पोचतच नाहीत. बालभारतीची ही अभ्यासक्रमाव्यतिरिक्तची पुस्तके या ग्रंथ महोत्सवात मांडण्यात आली होती. ज्याला बालवाचकांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला. 

या ग्रंथ महोत्सवात जे सांस्कृतिक कार्यक्रम योजले होते त्यांतही वाङमयीन दृष्टी राखण्यात आली होती. सावरकरांच्या कविता व गीतांवर आधारीत ‘शुरा मी वंदिले’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कलाकारांनी सादर केला. महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगांवकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रथम मासिक स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कविता व गीतांवर आधारीत कार्यक्रम ‘आनंदयात्री’ या महोत्सवात सादर झाला. 

गंभीर वैचारिक पुस्तके म्हणजे निव्वळ कपाटाचे धन. त्यांना कोण वाचणार असा सार्वत्रिक समज आहे. हा दूर करण्यासाठी या महोत्सवात रावसाहेब कसबे यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या हजार पानाच्या जाडजूड गंभीर पुस्तकावर चर्चा घडवून आणण्यात आली. 

एक मोठं विचित्र दृश्य या ग्रंथ महोत्सवात पहायला मिळलं. तथाकथित साहित्यीक, मराठीचे प्राध्यापक हे पुढाकार घेवून काही करताना दिसत नव्हते. इतकेच नव्हे तर पुस्तक खरेदी करतानाही ते फारसे दिसत नव्हते. उलट सामान्य वाचक ज्याला कुठलाही चेहरा नाही असे आपण म्हणतो तो मोठ्या उत्सुकतेने पुस्तक पाहताना खरेदी करताना दिसत होता. हे कशाचे लक्षण मानायचे? शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन झाले त्यात एका विद्यार्थ्याने 

दर्ग्यावर चढवली जाते 
चादर मोठ्या श्रद्धेने
बाहेर त्याच देवाची लेकरे
कुडकुडतात थंडीने

अशी वरवर  साधी वाटणारी पण या व्यवस्थेलाच प्रश्‍न करणारी कविता सादर केली. ही संवेदनक्षमता छोटी मुलं दाखवत आहेत. शब्दकोश खरेदी करण्यासाठी एखादी छोटी मुलगी आईपाशी हट्ट करत आहे. चित्रांच्या पुस्तकात कुणी लहान मुलगा हरवून गेला आहे. त्याला आजूबाजूचे भानच नाही. शासनाने नामदेव गाथा प्रकाशीत केली पण ती सटीप नाही. या ग्रंथ महोत्सवात नमादेवांची सटीप गाथा उपलब्ध होताच एका म्हतार्‍या आजोबांना विलक्षण आनंद झाला. त्यांनी तातडीने खिसे चाचपून पैसे काढले व ती गाथा खरेदी केली. 

प्रकाशकांनी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने भरविलेल्या या ग्रंथ महोत्सवाचा उद्देश सफल झाल्याचा पुरावा या छोट्या छोट्या घटना देतात. हा ग्रंथ महोत्सव नियमित भरत राहिला तर वाचनाबाबत एक चांगले चित्र निर्माण झालेले दिसेल. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 25, 2016

साहित्य कोकिळांचे डि‘पियू’ डि‘पियू’



उरूस, पुण्यनगरी, 25 जानेवारी 2016

वसंंत ऋतूत आंबराईतून कोकिळेचा मधुर असा स्वर उमटतो त्याला कुहू कुहू म्हणतात. हिंदीत हा उच्चार पियू पियू असाही केला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा वसंत ऋतू. हे संमेलन पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे भरले होते. या संमेलनातून एकच नाद सर्वत्र उमटत होता. तो म्हणजे डि‘पियू’ डि‘पियू. 

डिपियू म्हणजे डि.वाय.पाटील युनिव्हर्सिटी. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डि.पाटील यांचे सासरे श्री. डि.वाय.पाटील यांचे हे विद्यापीठ. त्यांनीच हे सगळे संमेलन व्यापून टाकले होते. 
संतोष पद्माकर पवार याची कविता आहे (पचायला जड असे काही शब्द बदलले आहेत.)

लोकांना मुर्ख बनवून 
विजयी झालेल्यांच्या मिरवणुकीत
हजार नालायक नाचले 
तरी हरकत नाही
पण एका विवेकी माणसाचा पाय
थिरकला नाही पाहिजे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन नावाच्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करणार्‍या प्रचंड मोठ्या जत्रेत कितीतरी प्रतिभावंत भान हरपून नाचत सुटले. पण असा कोणी निपजले नाही  की जो ठणकावून म्हणेल, ‘मला निमंत्रण आपण दिले हरकत नाही. पण अशा संमेलनात मी येणार नाही.’ काही जणांनी परस्परच जाणे टाळले. पण त्यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. ते आपल्या घरातच चुप बसून राहिले. यामुळे घडले काय की सर्वसामान्य रसिकांपर्यंत हा संदेश गेला की थोड्याफार पैशाचे आमिष दाखविले की भले भले साहित्यीकही चळायला लागतात. त्यांची काही फार मोठी पत्रास ठेवण्याची गरज नाही. 

या साहित्य संमेलनात ठळकपणे स्वागताध्यक्षाचे फोटो जिकडे तिकडे झळकत होते. बाकी कोण अध्यक्ष, कोण उद्घाटक, कोण समारोपाचा पाहूणा हे कोणाच्याही समोर ठळकपणे आले नाही. हे संमेलन साहित्य महामंडळाच्या हातून केंव्हाच सुटून गेले. पतंगाची दोरी आमच्या हातात असते असं म्हणणारे महामंडळ. प्रत्यक्षात या महामंडळाच्या हातात दोरीही उरली नाही. पतंग गेला दोरी सुटली केवळ चरखीच यांच्या हाती राहिली. 

गेल्या 20 वर्षांमध्ये संमेलनाचे स्वरूप प्रचंड पालटून गेले. 1995 मध्ये मराठवाड्यात परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते. गोळा झालेली एकूण रक्कम होती 40 लाख आणि खर्च झाला होता 32 लाख रूपये. उरलेल्या 8 लाखांचा ‘अक्षर प्रतिष्ठा’ नावाचा एक ट्रस्ट स्थापन झाला होता आणि त्यामाध्यमातून दिवाळी अंकाचे प्रकाशन, जिल्हा संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रम असे 10 वर्षे चालले. आज संमेलनाचा खर्च 5 कोटीच्या पुढे गेला आहे. पंधरापट किमान खर्च वाढला आहे. मग साधा प्रश्न आहे की 1995 मध्ये मराठी ललित वैचारिक साहित्याच्या (ज्यासाठी हे साहित्य संमेलन भरविले जाते) पुस्तकाची आवृत्ती 1100 निघत होती. ती आज कितीवर आली आहे?  सर्वसाधारणपणे आज मराठी ललित वैचारिक पुस्तकाची आवृत्ती फक्त 300 किंवा 500 ची निघते. म्हणजे एकीकडे संमेलनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. साहित्यीकांचे मानधनही यावेळेस भरपूर दिल्या गेले. मग पुस्तकांची आवृत्ती का कमी निघते आहे? याचे उत्तर कोण देणार? 

कुसुमाग्रजांच्या एका कवितेत ‘मंदिर सलामत तो मूर्ती पचास’ असा उपहास केलेला आहे. मग आपण तसं म्हणायचं का की संमेलनत सलामत तो पुस्तक पचास? पुस्तकांचा विचार करायचाच कशाला. साहित्यीकांना विचारतोच कोण. संमेलन म्हणजे एक भलामोठा इव्हेंट आहे. त्या निमित्ताने मोठी उलाढाल होते आहे. केटरिंग वाल्यांना धंदा मिळतो आहे. मंडपवाले खुश आहेत. शुटिंग करणार्‍यांची चांदी झाली आहे. हॉटेलवाले उत्साहात आहेत. 

इतकंच कशाला पुस्तकांचे जे प्रदर्शन भरलं होतं ते विक्रेते प्रकाशकही  खुश आहेत. कारण पुस्तकांची उलाढाल प्रचंड झाली. आता कोणती पुस्तके विकली गेली ते विचारू नका. यश कसे मिळवावे, लठ्ठपणा कसा कमी करावा, मधुमेहावर नियंत्रण कसे मिळवाल? माणसं जोडावी कशी? इंटरनेटचा वापर कसा करावा, संगणक शिकण्याची सोपी युक्ती, पुरूषांनी करावयाच्या सोप्या पाककृती,  बाळाची चाहूल अर्थातच आजीबाईचा बटवा, चित्रे रंगवा, ओरिगामी वगैरे वगैरे. 

गेली काही वर्षे संमेलनात जी पुस्तके विकली जातात त्यांचा साहित्याशी काहीही संबंधच उरला नाही. मुळात साहित्य संमेलनाचा आणि साहित्याचाच काही संबंध उरला नाही. परिसंवादात बोलणारे बरेच वक्ते  असे निर्माण झाले आहेत की ते कोणत्याही संमेलनात कुठेही कोणत्याही विषयावर किमान अर्धा घंटा बडबड करू शकतात. 

संमेलनाचा अध्यक्ष, त्याला कुणी  विचारायला तयार नाही. तो काही महत्त्वाचे साहित्यीक विषय मांडतो आहे असंही नाही. तो काही फार मोठा दर्जेदार वाचकप्रिय साहित्यीक आहे असेही नाही. वक्ते काय बोलतात त्याचेही काही कुणाला फारसे महत्त्व शिल्लक नाही. कविसंमेलनातील कवितांच्या आठवणी आजकाल मनात दरवळत नाहीत. साहित्य महामंडळ स्वागताध्यक्षाच्या दावणीला पूर्णपणे बांधलेले आहे हे या संमेलनाने सिद्ध झाले. सर्वसामान्य वाचकांबाबत बोलावे तर आलेल्या कित्येकांना ते कशासाठी आले तेच माहित नसते. केवळ मोठी जत्रा आहे. भरपूर लोक गोळा झाले आहेत. अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, मकरंद अनासपुरे, आशा भोसले, लता मंगेशकर, शाहरूख खान वगैरे वगैरेसाठी आलो असेच जास्तीत जास्त लोक सांगतिल. ज्या प्रतिभावंत साहित्यीकांसाठी हे संमेलन आहे असं म्हणावं तर त्यांनी केंव्हाच आपले सारे सत्व स्वागताध्यक्षाच्या पायी गहाण ठेवले आहे. मग हे संमेलन हवेच कशाला? 

संमेलनाच्या एकूण खर्चापैकी किती रक्कम साहित्यीकांवर प्रत्यक्ष खर्च झालेली आहे? ठाण्याच्या साहित्य संमेलनात पाच वर्षांपूर्वी एक कोटी बारा लाखांपैकी केवळ साडेचार लाख रूपये साहित्यीकांच्या मानधन व प्रवासखर्चावर झाल्याचे समोर आले होते. या संमेलनातही सगळी मिळून ही रक्कम दहा पंधरा लाखाच्या पुढे जात नाही. मग हे बाकीचे पैसे खर्च झाले कशावर? गाडीखालून चालणार्‍या कुत्र्याला वाटते की आपण गाडी चालवतो. हळू हळू कुत्राच इतका मोठा झाला की गाडीचा बैल त्याच्यापुढे लहानच झाला इतकेच नाही तर तो केविलवाणा झाला. गाडीतली माणसेही हतबल झाली. गाडीवानाने तर केंव्हाच कासरा सोडून दिला. कुत्र्याने शेपटी हलवली की त्या प्रमाणे आपण हलायचे इतकेच आता गाडी-बैल-गाडीवान-गाडीतील माणसं यांच्या हातात उरलं असं दिसतं आहे.

कुसुमाग्रजांचीच विशाखातील एक कविता आहे

नवलाख तळपती दिप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणि करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्यांची वात

आजही छोट्या छोट्या गावात पहाटे आलेले वृत्तपत्र एखादा म्हातारा उन्हात बसून डोळे फोडून वाचत बसतो. त्यातील एखादा लेख आवडला तर त्या लेखकाला आवर्जून फोन करून आपली भावना साध्या शब्दांत व्यक्त करतो. आजही शाळेत एखादा पोरगा सुट्टीच्या वेळात डबा खाणं झाल्यावर शाळेच्या भंगार झालेल्या वाचनालयातून एखादे फाटके पुस्तक घेवून वाचत बसतो. आजही एखादी म्हातारी दुपारी खिडकीजवळ बसून पोथी वाचत काहीतरी पुटपुटत राहते. आजही छोट्या गावातील एखादा उमेदीचा कवी आपली नवी कविता उत्साहाने फेसबुकवर टाकतो आणि तथाकथित मोठ्या म्हटल्या जाणार्‍या एखाद्या साहित्यीकाची त्यावर काय प्रतिक्रिया येईल याची वाट पहात बसतो. आजही तालूक्याच्या गावी निवृत्त झालेला एखादा शिक्षक गावच्या वाचनालयात व्याख्यानाचा कार्यक्रम होण्यासाठी धडपड करतो. आलेल्या व्याख्यात्याला प्रेमानं घरी नेवून जेवू खावू घालतो... अशा मंद दिव्यांच्या वाती उजळत आहेत. तेवढीच आशा आहे. बाकी संमेलन नावाचा झगमगाट ज्यांना छान वाटतो त्यांना वाटत राहो. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Monday, January 18, 2016

चली चली रे पतंग मेरी चली रे

उरूस, पुण्यनगरी, 18 जानेवारी 2016

निळ्याभोर आभाळात मुक्तपणे उडणारा पतंग स्वातंत्र्याचे आनंदाचे प्रतीक नेहमीच वाटत आलेला आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या काळात आभाळात डोलणारे पतंग मनाला उत्साही करतात. गुजरातमध्ये पतंगाचे अतोनात वेड आहे. संक्रांतीचे तीन दिवस (भोगी, संक्रात, कर) अक्षरश: लाखो पतंग आभाळात उडताना अख्ख्या गुजरातमध्ये आढळतात. अहमदाबादला मोठा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव भरतो. 

जुन्या हिंदी चित्रपटात पतंगावरचे एखादे गाणे हमखास असायचे. पतंगावरचे सगळ्यात सुंदर गाणे भाभी (1957)  चित्रपटात आहे. चित्रगुप्त या गुणी पण काहीसा बाजूला राहिलेल्या संगीतकाराचा हा सगळ्यात ‘हिट’ चित्रपट. यातील ‘चल उड जा रे पंछी’ या गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवली होती. पतंगाचे हे सुंदर गाणे लता आणि रफीच्या आवाजात आहे. राजेंद्रकृष्ण सारख्या गीतकाराने मोठ्य नजाकतीने हे गाणे लिहीले आहे. 

चली चली रे पतंग मेरी चली रे
चली बादलों के पार
हो के डोर पे सवार
सारी दुनिया ये देख देख जली रे

या गाण्यात एक अतिशय चपखल शब्द राजेंद्रकृष्ण यांनी वापरला आहे. 
रंग मेरे पतंग का धानी
हे ये नील गगन की रानी
याओळी मध्ये धानी हा शब्द आला आहे. ‘धानी’ रंगाला मराठीत जो पर्यायी शब्द आहे तो आहे ‘आनंदी’. बायका साड्यांचा बाबतीत हा शब्द नेहमी वापरतात. आनंदी रंगाची साडी म्हणजे निळ्यातील उजळ छटेची साडी. इंग्रजीत कॉपर सल्फेट ब्लु असा शब्द यासाठी आहे. हा पतंगाचा रंग त्या निळ्या आभाळाचेच प्रतिक आहे. आनंदाचे प्रतिक आहे. असंच राजेंद्रकृष्ण यांना सुचवायचे आहे. हे गाणे जगदीप आणि नंदावर चित्रित आहे. गाण्याचे अतिशय साधे पण लयदार शब्द आणि चित्रगुप्तचे मधुर संगीत अगदी जुळून आले आहे. या एका चित्रपटाने चित्रगुप्तला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामानाने त्याच्या इतर चित्रपटांना ती लाभली नाही. निळ्या रंगावर बोरकरांनी लिहीताना 
असे नाना गुणी निळे
किती सांगू त्यांचे लळे
त्यांच्यामुळे नित्य नवे 
गडे तूझे माझे डोळे
अशा फारच सुंदर ओळी लिहील्या आहेत. 

दुसरं गाणं प्रत्यक्ष पतंगावरचे नाही. पतंगाचे प्रतिक वापरलेले आहे. रागिणी (1958) या चित्रपटात  किशोर कुमार पद्मिनीवर यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. आशा भोसले गाण्याचे सुरवात करते
पिया मै हू पतंग तू डोर
मै उडती चारो ओर
मेरा दिल ये जवा
रहे बस मे कहा 
जब छायी घटा घनघोर
आता खरं तर पतंगाचा आणि पावसाळी हवेचा काही संबंध आहे का? पण हिंदी चित्रपट गीतांमध्ये अशा काही प्रश्नांना जागाच नाही. किशोरकुमार आशा भोसलेच्या सुरांना साद घालतो
बांकी अदा नैना मतवाले
चाल नयी अंदाज निराले
प्यार का जादू दिल पर डाले
आंख मिला कर निंद चुरा ले
पतंग राहिला बाजूला आणि प्रीतीचा पतंगच डोलत राहतो

तिसरे गाजलेले गाणे नागिन (1954) चित्रपटातील आहे. हेमंत कुमारच्या संगीतातील बीन या चित्रपटानंतर विलक्षण लोकप्रिय झाली होती. ‘मन डोले मेरा तन डोले’ ने अजूनही रसिक डोलतात. यात हेमंत कुमार लताच्या आवाजात मोठं गोड गाणं आहे
अरी छोड दे सजनीया
छोड दे पतंग मेरी छोड दे
एैसी छोडू ना बलमवा
नैनवा के डोर पहले छोड दे
हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांनीच लिहीले आहे. रागिणी सारखेच या गाण्यात पतंगाला प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरले आहे.

'पतंग' नावाचा एक चित्रपट 1960 मध्ये आला होता. राजेंद्रकुमार माला सिन्हाच्या यात भूमिका आहे. अंधळ्या मुलीची भूमिका माला सिन्हाने केली आहे. ओमप्रकाशवर चित्रित रफीच्या आवाजातील पतंगावरचे गाणे यात आहे. 
ये दुनिया पतंग
नीत बदले ये रंग
कोई जाने ना 
उडानेवाला कौन है
साध्या गाण्यातून जगण्याचं तत्त्वज्ञान समोर उलगडत गेलं आहे. गाणं फारसं लोकप्रिय झालं नाही. चालही फार काही वेगळी नाही. पण यात पतंगाचे जे रूपक जिवनासाठी वापरले ते मोठे मस्त आहे.
सब अपनी उडाये ये जान न पाये
कब किसकी चढे किसकी कट जाये
ये है किसको पता कब बदले हवा
और डोर इधर से उधर हट जाये
हो वो डोर या कमान
या जमिन आसमान
कोई जाने ना बनाने वाला कौन है
अगदी साध्या शब्दात जगण्याचे तत्त्वज्ञान आले आहे.

हिंदी चित्रपट गाण्यातील माधुर्य 1970 नंतर संपत गेलं. मग बहुतांश सख्येने आलेली गाणी निव्वळ गोंगाट होती. कल्याणजी आनंदजी यांनी ‘5 राइफल्स’  (1974) मध्ये एक गाणं दिलं आहे. ‘प्यार की पतंग डोर जिसके हाथ है, किस्मत भी उसके साथ है, जो ले उडा लो ले उडा’. राजेंद्रकृष्ण यांनीच हे गाणं लिहीलं आहे. पण त्याचे चिज़ करणारे संगीतकार नंतर उरले नाहीत. किशोरकुमार सारखा चांगला आवाज आहे. पण गाणं मात्र कानाला गोड वाटत नाही. 

बाकी काही गाण्यांमध्ये पतंगाचा उल्लेख शम्मा परवाना मधला पतंग म्हणून आहे. स्वतंत्र पतंगावर गाणे नाही.


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 11, 2016

शारंगदेव महोत्सव पार्वती दत्ता आणि महागामी

उरूस, पुण्यनगरी, 11 जानेवारी 2016


तेराव्या शतकात काश्मिरमधील संगीत विद्वान शारंगदेव यास देवगिरीच्या यादवांनी सन्मानाने आपल्या दरबारात बोलावून घेतले. त्याला राजाश्रय दिला. याच शारंगदेवाने ‘संगीत रत्नाकर’ या शास्त्रीय संगीतातील पायाभूत ग्रंथाची निर्मिती देवगिरीच्या परिसरात केली. सातशे वर्षानंतर एका नृत्य कलाकाराला या भूमिचे आकर्षण वाटले. तेंव्हा जसे देवगिरीच्या यादवांनी शारंगदेवाला आमंत्रित केले होते तसेच महात्मा गांधी मिशन संस्थेने या नृत्यांगनेला आमंत्रित केले. संस्थेचे आमंत्रण तिने स्विकारले आणि महात्मा गांधी मिशन संस्थेच्या रम्य आवारात ‘महागामी’ या कला अकादमीची स्थापना केली. कलकत्त्यात जन्मलेल्या, भोपाळमध्ये वाढलेल्या, दिल्लीत शिकलेल्या या नृत्यांगनेचे नाव आहे सुश्री पार्वती दत्ता. 

जानेवारी महिना म्हटलं की संक्रांतीचा तिळगुळ आणि निळ्या आभाळात विहरणारे हजारो पतंग सगळ्यांना आठवतात. पण गेल्या सहा वर्षांपासून औरंगाबादकरांना यासोबत अजून एका गोष्टीची आवर्जून आठवण येते. ती म्हणजे महागामीच्या वतीने भरविण्यात येणारा ‘शारंगदेव महोत्सव’. हा महोत्सव सुरू करणे आणि आजपर्यंत ती परंपरा यशस्वीरित्या संपन्न करणे यामागे उभी असलेली नृत्यांगना म्हणजे गुरू पार्वती दत्ता.

मुळच्या कलकत्त्याच्या असलेल्या पार्वती दत्ता आई वडिलांसोबत पुढे भोपाळमध्ये आल्या. उच्च पदावर काम करणार्‍या अभियंता आई वडिलांच्या पोटी जन्मलेली ही मुलगी स्वाभाविकच अभियंताच होईल असे नातेवाईक मित्रमंडळींना वाटायचे. पण नृत्याची असलेली अंगभूत ओढ तिला शांत बसू देईना. भोपाळ शहरापासून दूर औद्योगिक वसाहतीत राहतानाही सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी शहरात या कुटूंबांच्या नियमित चकरा व्हायच्या. नृत्याशिवाय पुढे काहीच दिसेना तेंव्हा भोपाळ सोडून दिल्लीत जायचा निर्णय त्यांनी स्वबळावर घेतला. जून्या काळातही अभियांत्रिकी पदवी मिळवून मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या आईने त्यांना पाठबळ दिले. आत्मविश्वास दिला. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या त्यांच्या वडिलांना या कलेचे महत्त्व माहित होते. त्यांनी प्रोत्साहन दिले.   

गुरू बिरजू महाराज व गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडे गुरूकुल परंपरेने त्यांनी कथ्थक व ओडिसीचे शिक्षण घेतले. शिकत असतानाच्या त्यांच्या लक्षात येत गेले की आधुनिक काळात ज्या पद्धतीनं कलेचे शिक्षण दिल्या-घेतले जाते ते कामाचे नाही. शिष्य म्हणजे मुलासारखा आहे असं समजून गुरूकुल परंपरेत शिकवले तरच नृत्यासारखी कला पुढे नेता येईल. मोठ्या शहरांमध्ये जाण्यापेक्षा कलेचे कुठलेही फारसे वातावरण नसलेल्या गावात काम करणे हे खरे आवाहन असेल असे मानून त्यांनी औरंगाबादहून आलेले महात्मा गांधी मिशन संस्थेचे आमंत्रण स्विकारले.

महागामी गुरूकुलची सुरवात झाली तेंव्हा फक्त 10 विद्यार्थी होते. गेल्या 20 वर्षांत 2000 पेक्षा जास्त शिष्य इथे शिकले. अनुभूती या उपक्रमा अंतर्गत विविध रसिकांसमोर ही नृत्यकला रसग्रहणासाठी सादर केली जाते. जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रसिकांनी यात आपला सहभाग आत्तापर्यंत नोंदवला आहे. 

केवळ नृत्य शिकविणारी एक संस्था असे स्वरूप न राहता महागामी म्हणजे कला संस्कृतीचे एक केंद्र म्हणून विकसित झाले पाहिजे असा दृष्टीकोन पार्वती दत्ता यांनी सुरातीपासून ठेवला. या परिसरात काम करत असताना या प्रदेशाचे सांस्कृतिक वैभव, येथील परंपरा याचाही शोध त्या घेत गेल्या. औरंबादला आल्यावर त्यांच्या या क्षेत्रातील कितीतरी स्नेह्यांनी त्यांना चिडवायला सुरवात केली की ‘तूम उस औरंगजेब की गांव मे बस चुकी हो जो संगीत के बारे मे क्या जानता था!’ पार्वती दत्ता यांना देवगिरी परिसर आणि त्या परिसरातील वेरूळ अजिंठा लेण्यांमधील कलेने कायमच आकर्षित केले होते. शारंगदेव, गोपाल नायक सारखे महान कलाकार विद्वान याच परिसरात घडले. तेंव्हा परत एकदा या जून्या लोकांच्या रचनांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यांचे स्मरण झाले पाहिजे याची तीव्र जाणीव पार्वती दत्ता यांना झाली. 

इ.स. 2011 पासून शारंगदेव महोत्सवाची सुरवात झाली. भारतात संगीत विषयक खुप महोत्सव आहेत. पण त्यात कुठेही संगीतावर चर्चा, निबंध प्रस्तूती, संगीत संशोधनासाठी प्रोत्साहन, संगीताचे रसग्रहण हा भाग फारसा येत नाही. शारंगदेव महोत्सवात मात्र आवर्जून यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. दरवर्षी संगीतात महत्त्वाची कामगिरी करणार्‍या एका कलाकाराला ‘शारंगदेव सन्मान’ प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत धृपद गायक उस्ताद झिया फरिदउद्दीन डागर, कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, बांसरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम, विदुषी कपिला वात्सायन, कथ्थक गुरू कुमुदिनी लाखिया यांना हा सन्मान देवून गौरविण्यात आले आहे.

शारंगदेव महोत्सवात कितीतरी दुर्मिळ वाद्य, संगीत प्रकार यांचे दर्शन रसिकांना झाले. सुरबहार सारखे वाद्य जे की फारसे प्रचलित नाही, रूद्रवीणा तर ऐकायलाच भेटत नाही. धृपद गायकीही फारशी कानावर पडत नाही. यांचा आवर्जून समावेश या महोत्सवात पार्वती दत्ता यांनी केला आहे. शास्त्रीय नृत्यासोबत कितीतरी लोकनृत्याचे प्रकार भारतात आढळतात. लोकसंगीतानेही आपला देश संपन्न आहे. राजस्थानातील मांगनियार संगीत असो, इम्फाळ मधील पुंग चोलम असो, पुरूलिया जिल्ह्यातील छाऊ नृत्यप्रकार असो यांचाही आस्वाद शास्त्रीय नृत्य, वाद्यासोबत रसिकांना शारंगदेव महोत्सवात घेता आला आहे. यावर्षी पंडवानी गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगढच्या पद्मभुषण तिज्जनबाई आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. 
अनेक मोठमोठ्या कलाकारांनी आपली कला समर्पित भावनेने या महोत्सवात सादर केली आहे. प्रचंड मोठ्या छगमगाटी महोत्सवात हजारो प्रेक्षकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करताना समाधान भेटत नाही ही खंत अनेक कलाकार जाहिरपणे व्यक्त करत आहेत. अशा कलाकारांसाठी शारंगदेव महोत्सव हे एक आशादायी असे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महात्मा गांधींच्या नावामुळे या परिसराला एक तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. अमजद अलि सारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा सरोदवादक या मंचावर आपली कला सादर करतो तेंव्हा त्याच्याही नकळतपणे त्याच्या सरोदमधून ‘रघुपती राघव राजाराम’ सारखी धुन निघते आणि रसिकही त्यावर डोलायला लागतात. 

‘ऑरा औरंगाबाद’ नावानं एक उपक्रम महागामीने चालविला आहे. परदेशी पर्यटक औरंगाबादला मोठ्या संख्येने येतात. त्यांना या परिसरात वास्तव्य असताना आपल्या कला परांपरांची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. तरूण प्रतिभावंत कलाकार आपली कला या पर्यटकांसाठी सादर करतात. पार्वती दत्ता यांनी याबाबत माहिती देताना मोठी कलात्मक बाब समोर आणली आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात शिवतांडव मुद्रेतील मुर्ती पाहिल्यावर पर्यटकांना जर परत संध्याकाळी शहरात आल्यावर शिवतांडव नृत्य प्रत्यक्ष पाहिला मिळाले तर त्यांना किती आनंद वाटेल. हे प्रत्यक्ष त्यांनी घडवून आणले आहे. वेरूळ अजिंठा पाहणारे पर्यटक संध्याकाळी महागामी परिसरात त्याच मुद्रा कलेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवतात. 

लहान मोठी अनेक मुले मुली या परिसरात ओडिसी, कथ्थकचे शिक्षण घेतात. खरं तर शिक्षण घेतात असं म्हणण्यापेक्षा जीवनाकडे कलेच्या दृष्टीने कसे पहावे हे समजून घेतात असं म्हणावे लागेल. 

स्वत: एक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कथ्थक व ओडिसी नृत्यांगना असलेल्या पार्वती दत्ता यांनी आपले आयुष्यच महागामी साठी समर्पित केले आहे. आपल्या आईसोबत त्या जेंव्हा या परिसरात आल्या तेंव्हा अगदी परिसराची स्वच्छताही आपणच कशी केली हे सांगताना त्यांना कुठे कमीपणा वाटत नाही. गांधीजींच्या तत्त्वाने या संस्थेचे कामकाज आपण कसे चालवतो हे सांगताना त्यांचे डोळे उजळून निघतात. त्यांच्या बोलण्यातला खरेपणा जाणवतो कारण त्यांनी स्वत: खादीचे सुती वस्त्रच नेसलेले आपल्या डोळ्यांना दिसत असतात. त्यांच्या गुरूकुलात स्वच्छता करणार्‍या महिलेची ओळखही त्या ‘मेरी सबसे पुरानी कलिग है !’ अशी करून देतात. जन्माने बंगाली असलेल्या पार्वती दत्ता यांनी विशेष मेहनत करून आपली भाषा बनवली. त्यांची हिंदी भाषा ऐकून मी त्यांना गमतीनं ‘ऐसी हिंदी को हम आयुर्वेदिक हिंदी बोलते है !’ म्हणालो तेंव्हा त्या लहान मुलासारख्या खळखळून हसल्या. त्यांची इंग्रजीही अतिशय डौलदार आहे. चांगला कलाकार हा चांगला प्रशासक असतो असे नाही. पार्वती दत्ता यांच्यात हा दुर्मिळ  योग जुळून आला आहे. 

येत्या 15 ते 17 जानेवारी दरम्यान 6 वा ‘शांरगदेव महोत्सव’ औरंगाबाद येथे संपन्न होत आहे. शारंगदेवाच्या भुमीत सांस्कृतिक बीजांची जी पेरणी पार्वती दत्ता करत आहेत त्याला चांगली फळं येवोत हीच कलेची देवता नटराजाच्या चरणी प्रार्थना.  
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, January 3, 2016

‘रंगीला प्यार का राही’ सुबीर सेन काळाच्या पडद्याआड


उरूस, 3 जानेवारी 2016

टांग्यात काळी टोपी घातलेला हास्य अभिनेता मेहमुद आणि साध्या साडीतील शुभा खोटे ही जोडी, पार्श्वभूमीला टांग्याचा ठेका सुरू होतो आणि पुढच्या गाण्यावर सगळं थिएटर नाचत उठतं. 

मै रंगीला प्यार का राही 
दूर मेरी मंझिल 
शौक नजर का तीर तूने मारा
दिल हुआ घायील.
तेरे लिये ही संभाल के रखा था
प्यार भरा ये दिल
तेरे इशारोंपे चलता रहेगा
ओ मेरे कातिल

हे गाजलेलं गाणं होतं 1959 च्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील हसरत जयपुरीने लिहीलेले. लताचा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा आणि आवडता होता. पण सोबतचा नवखा आवाज जो आजही रसिकांच्या कानात आहे, जो आवाज हेमंतकुमार सारखा वाटायचा पण हेमंतकुमारचा नव्हता. तो होता सुबीर सेन या बंगाली गायकाचा. कलकत्यात मंगळवार 29 डिसेंबर 2015 सुबीर सेनचे वयाच्या 81 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले.
अतिशय मोजकी पण लक्षात राहणारी गाणी हे सुबीर सेनचे वैशिष्ट्य. 1950 ते 1980 या काळात त्याची गाणी बंगालीत खुप गाजली. त्यामानाने त्याला हिंदीत फार थोडी गाणी मिळाली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेमंतकुमारशी मिळता जुळता त्याचा आवाज. त्यामुळे त्याची वेगळी छाप हिंदी चित्रपट सृष्टीत पडू शकली नाही.

’कठपुतली’ (1957) हा शंकर जयकिशन चा राज कपुर प्रॉडक्शन शिवायचा एक गाजलेला चित्रपट. या चित्रपटात सुबीर सेनचे गाणे ‘मंझिल वोही है प्यार की, राही बदल गये, सपनोंके महफिल मे हम तूम रहे’ आहे. पियानोवर बसलेला बलराज साहनी आणि सहज सोप्या हालचालींतून नृत्यविभ्रम करणारी वैजयंतीमला. सुबीर सेनेचे एकट्याचे त्याच्या हिंदी गाण्याच्या कारकीर्दीतील हे सगळ्यात सुंदर गाणे. त्यानंतर वर उल्लेखिलेले त्याचे लता सोबतचे सगळ्यात सुंदर गाणे ‘मै रंगीला प्यार का राही’. 

1959 मध्ये अर्धांगिनी नावाचा एक मीनाकुमारी राजकुमार यांचा चित्रपट आला होता. त्याला वसंत देसाईचे संगीत होते.  ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये लता-हेमंत च्या आवाजात नैन से नैन नाही मिलावो’ हे गाणे वसंत देसाई यांनी दिले होते. त्याच गाण्याची छाया वाटणारे अर्धांगिनी मध्ये सुबीर सेन आणि लताच्या आवाजात ‘प्यार मे मिलना सनम’ हे गोड गाणे त्यांनी दिले आहे. 

पुढे 1960 मध्ये मोहिंदर ने महलों के ख्वाब मध्ये राजा मेहंदी अली खान च्या ‘गर तूम बुरा ना मानो’ या गाण्याला गोड चाल बांधली आहे. ठोकळा प्रदीप कुमार आणि खट्याळ मधुबाला साठी सुबीर सेन आणि आशा भोसलेचा आवाज आहे. 

देव आनंद वहिदा रहमानच्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ मध्येही सुबीर सेनचा आवाज आहे. शंकर जयकिशनचे हे धार्मिक गाणे गंगेच्या काठावर चित्रित आहे. ‘आ जा रे आ जा रे आजा नैन दुलारे’ हे गाणे सुबीर सेन शिवाय आशाच्या आवाजातही आहे. गंगेत स्नान करून पुण्य मिळते या भावनेने आलेले भाविक, त्यांच्या गंगास्नानाच्या पार्श्वभूमीवर सुबीर सेनचा भारदस्त पण भावून आवाज उठून दिसतो. शंकर जयकिशनने याला संगीतही वेगळे दिले आहे.

राजेंद्रकुमार वैजयंतीमाला यांचा ‘आस का पंछी’ हा चित्रपट 1961 मध्ये आला. शंकर जयकिशनचे संगीत या चित्रपटाला होते. या चित्रपटाचे शिर्षक गीतच मुळी सुबीर सेनच्या आवाजात आहे. एनसीसी कॅडेटच्या वेशातील राजेंद्रकुमार हातातील कबुतर हवेत सोडून सायकलवर बसून हसरत जयपुरीचे शब्द आणि सुबीर सेनचा आवाज घोळवत निघाला आहे. मागे मोकळे आभाळ आणि त्यात उडणारे पक्षी. 
दिल मेरा एक आस का पंछी 
उडता है उंची गगन पर 
पहुंचेगा एक दिन कभी तो 
चांद की उजली जमीन पर 
(पुढे 1969 मध्ये माणसाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले). याच चित्रपटात ‘धिरे चलाओ जरा’ हे लतासोबतचे सुबीर सेनचे गाणेही छान आहे. 

शंकर जयकिशनशी सुबीर सेनचे सुर चांगलेच जुळले होते. पुढे 1964 मध्ये ‘अपने हुऐ पराये’ या चित्रपटात ‘गगन के चंदा न पुछ मुझको’ हे लता सोबतचे गोड गाणे सुबीर सेनचे शंकर जयकिशनने दिले आहे. मनोज कुमारच्या अगदी सुरवातीच्या चित्रपटांपैकी हा चित्रपट. 

शंकर जयकिशन शिवाय इतरही संगीतकारांनी सुबीर सेनचा आवाज वापरला. दत्तराम वाडकरने ‘जबसे तूम्हे देखा है’ (1963) सुबीर सेन सुमन कल्याणुरच्या आवाजात ‘चांद तले झुम झुम थिरक रही है घुंगरवालीया’ हे ठेकेदार गाणे दिले आहे. ठेकेदार यासाठी की दत्तराम त्याच्या तबल्याच्या बेहतरीन ठेक्यासाठी प्रसिद्ध होता. ठोकळा प्रदीप कुमार आणि नटखट गीताबाली वर हे गाणे चित्रीत आहे. कराचीचा सिंधी संगीतकार बुलो सी रानी यानेही सुबीर सेनचा आवाज आपल्या अनारबाला (1961) मध्ये ‘बहारे लुटा के’ या गाण्यात सुमन कल्याणपुर सोबत वापरला आहे.

‘हसता हुआ नुरानी चेहरा’ या गाजलेल्या गाण्यात लता सोबत जो आवाज होता तो कमल बारोट हीचा. कल्याणजी आनंदजी हे आधी कल्याणजी वीरजी शहा नावाने एकटेच संगीत द्यायचे. त्यांनी कमल बारोट आणि सुबीर सेन यांना घेवून ‘ओ तेरा क्या कहना’ (1959) चित्रपटात एक गाणे दिले आहे. मेहमुदवरचे हे गाणे ‘दिल लेके जाते हो कहा’ बर्‍यापैकी गाजले होते. 

हिंदी चित्रपटांत एक काळी गाण्याची अतिशय निकोप अशी स्पर्धा होती. त्यामुळे हेमंत कुमार सारखा आवाज म्हणून असलेल्या सुबीर सेनला खुद्द हेमंत कुमार यांनीच आपल्या चित्रपटात गायल्या लावल्याची दुर्मिळ घटनाही घडली आहे. लता, आशा, सुमन या त्यावेळच्या महत्त्वाच्या गायिकांसोबत गाणे गाणार्‍या सुबीर सेनच्या वाट्याला गीता दत्त सोबतही गाणे गायची संधी मिळाली आहे. ‘गोरी तोरे नटखट नैना, वार करे छूप जाये’ या सुबीर सेनच्या ओळींना ‘सैंय्या तेरे रसभरे बैना, सारी सारी रात जगाये’ असं सुंदर उत्तर गीता दत्त देते. शैलेंद्रच्या शब्दांना दोघांनीही अतिशय योग्य न्याय दिला आहे. 

बॉयफ्रेंड (1961) सं. शंकर जयकिशन, मासुम (1960)सं. रॉबीन बॅनर्जी, पासपोर्ट (1961) सं.कल्याणजी आनंदजी, जादू महल (1962) सं. बुलो सी रानी, रूप सुंदरी (1964) सं. सरदार मलिक. असे काही मोजके चित्रपट सुबीर सेनला मिळाले. पण त्याची छाप पडू शकली नाही. नंतर तो जास्त करून बंगाली संगीताकडेच वळला. त्याची बंगाली गाणी बरीच लोकप्रियही झाली. मोठ्या गायकांची छाप पडून त्या प्रभावाखाली येवून गाण्याची पद्धत हिंदीत आहे. सैगलच्या प्रभावात किशोर कुमार मुकेश होते याची साक्ष त्यांची सुरवातीची गाणी देतात. मोहम्मद रफी जी.एम. दुर्रानीच्या प्रभावात गायचा. लतावर नुरजहांचा प्रभाव होता. लताच्या आवाजाची छाया सुमन कल्याणपुरवर होती. रफीच्या छायेत तर महेंद्र कपुर, शब्बीर कुमार असे बरेच गायक होते. ज्यांना या प्रभावातून आपला वेगळा सुर गवसला ते टिकले. ज्यांना गवसला नाही ते काळाच्या ओघात लुप्त झाले. 

हेमंत कुमार गेल्यानंतर धर्मवीर भारती यांनी लिहीलं होतं ‘शोर और सुर मे येही फर्क होता है. शोर खत्म हो जाता है. और सुर खो जाता है. हेमंत कुमार का सुर आज खो गया.’ हेमंत कुमारची छाया असणारा सुबीर सेन आपल्यातून निघून गेला. त्याच्याही बाबतीत हेच म्हणावे लागेल. सुबीर कुमार का सुर आज खो गया. 
स्वर्गात बसून सुबीर सेन हेमंत कुमार समोर बसून गीता दत्त सोबत त्यांचेत गाणेख ‘गोरी तेरे नटखट नैना’ गात असेल.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575