Monday, February 29, 2016

मराठी भाषा गौरव दिनाची 'शिवजयंती' झाली आहे का?

२७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा वाढदिवस. हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो. या दिवसाला काय म्हणावे याचा भरपूर घोळ सध्या घातला जात आहे. कुणी मराठी राजभाषा दिन म्हणतात, कुणी मराठी भाषा दिन म्हणतात, कुणी मातृभाषा दिन म्हणतात. महाराष्ट्र शासनाने जी पत्रिका सर्वांना पाठवलेली आहे त्यावरती 'मराठी भाषा गौरव दिन' असा उल्लेख आहे. मंत्री विनोद तावडे आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या नावाने ही पत्रिका काढण्यात आली आहे.

रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे २७ तारखेला संध्याकाळी मुख्य कार्यक्रम शासनाच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे वाड्मय पुरस्कार, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

हे सगळं वाचल्यावर असं वाटू शकत की, महाराष्ट्र शासन मराठी भाषेसाठी किती आणि काय करत आहे. गावोगावी मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम आखण्यात आले. सगळ्यांनी मिळून मराठीचा ढोल इतक्या जोरात बडवला की, कान फाटून जायची वेळ आली. आपल्याकडे ज्या पद्धतीने स्त्रीची उपेक्षा केल्या गेली आणि ते लपविण्यासाठी मग तिची 'मातृदेवो भव' म्हणून पूजा करण्यात येते, तिला महान मानले जाते. तसेच एखाद्या स्त्रीला पतिव्रता म्हणून गौरविले जाते आणि नवर्‍याच्या सोबत सती जाण्यास भाग पाडले जाते. त्यावेळी मोठमोठय़ाने ढोल बडवून तिचा आवाज दाबून टाकण्यात येतो. आज हाच प्रकार मराठी भाषेच्या बाबतीत होताना दिसत आहे. 

ज्या पद्धतीने मोठा गाजावाजा करून शिवजयंती साजरी केली जाते. मोठा भपका केला जातो आणि शिवाजी महाराजांचे विचार मात्र अडगळीत फेकले जातात. शेतीबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरण कुठेही राबविल्या जात नाही. तसेच भाषेचे झाले आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राजभाषा कोश तयार केला होता. मंत्रिमंडळाला मराठी नावं तयार करून दिल्या गेली होती. याची आठवण तरी आज राज्यकर्त्यांना आहे काय? 

'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करणो म्हणजे फक्त दिखावू स्वरूपाचे कार्यक्रम करणो, असे महाराष्ट्र शासनाला वाटते का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा शपथविधीचा कार्यक्रम झगमगाटी स्वरूपात घेतल्या गेला होता. अशोक हंडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम घेतला म्हणजे मराठी संस्कृतीची जपवणूक झाली, असा भ्रम तयार झाला आहे का? 

शिवजयंती १९ फेब्रुवारीला आणि मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीला साजरा होतो. नेमक्या याच काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रवेशाला सुरुवात होते. गावोगावी केशरी फेटे लावून मोठमोठे ढोल बडवत, नऊवारी घालून, धोतरं घालून मिरवणुका काढल्या जातात. आणि हाच ढोंगी मराठी माणूस इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून रांग लावून याच वेळी उभा राहतो. आता काय खरं मानायचं? 

मोठय़ा शहरांमधून मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. त्याबद्दल मराठीसाठी बोंब मारणारा हा मराठी माणूस काय करतो आहे? शासनाला प्रत्येक कामासाठी जाब विचारणो हे एक सोपे काम आहे. पण आपण स्वत: काय करत आहोत याचा जाब कोण आणि कोणाला विचारणार. ज्याप्रमाणो शिवजयंतीची मिरवणूक संपली की, आपली जबाबदारी झटकून आपण मोकळे होतो तसेच २७ फेब्रुवारीचा मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा संपला की, आपणही भाषेच्या जबाबदारीतून मोकळे होतो. पुन्हा वर्षभर मराठीचे नाव काढायची गरज नाही. एक दिवस 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे गाणो गायचे. आणि दुसर्‍या दिवसापासून मराठीच्या पाठीत काठी घालायची असेच आमचे धोरण आहे. एखादा पुतळा उभारल्यानंतर त्या नेत्याची जयंती—पुण्यतिथी सोडली तर बाकी दिवस पुतळय़ावरती कबुतरं आणि कावळे बसले तरी आम्हाला फिकीर नसते. उलट काही मोजके दिवस सोडून नेत्यांच्या विचारांपासून आम्हाला सुटका हवी असते असाच उलटा अर्थ त्याचा निघतो आहे. मराठी भाषेचेही असेच करायला आम्ही बसलो आहोत. 

एक दिवस गौरव 
आणि उरलेले दिवस लाथा । 
इतकीच सध्या उरली आहे 
मराठी भाषेची गाथा ।। 

अशी आपली परिस्थिती झाली आहे. 'मराठी भाषेसाठी काय करायला पाहिजे?' असा प्रश्न सगळेजण विचारत असतात. याचे अतिशय साधे, बालीश वाटणारे पण अमलात आणायला अतिशय अवघड उत्तर म्हणजे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. 

मोठी शहर सोडली तर आजही उर्वरित महाराष्ट्रात संपर्काची भाषा म्हणून मराठीचा वापर होतो. आजही महाराष्ट्रात एकूण शालेय विद्यार्थ्यांपैकी मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ९३ टक्के इतकी प्रचंड आहे. हे आपण लक्षात घेणार की नाही? मूठभर शहरी लोक आणि त्यांची इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं यांच्याकडे पाहून किती दिवस गळे काढत बसणार आहोत? आज जे कोणी लोक मराठी भाषेचा वापर शिक्षणासाठी, संपर्कासाठी, व्यवहारासाठी करत आहेत. त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणो मराठी भाषाविषयक धोरण आखले गेले पाहिजे. त्यांना गरज असेल ती पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचवली गेली पाहिजेत. महाराष्ट्रात बारा हजार सार्वजनिक ग्रंथालय आहेत. यांच्यामध्ये असलेली जवळपास सगळीच पुस्तके मराठी भाषेतील आहेत. त्यांच्याकडे येणारे वाचकही स्वाभाविकपणो मराठीच आहेत. मग त्यांना डोळय़ापुढे ठेवून काही पाऊले उचलायला नकोत काय? आज जी पुस्तके मराठीमध्ये प्रकाशित होतात त्यांना महाराष्ट्रात सर्वदूर पोहचवण्यासाठी काही प्रय▪ झाले पाहिजेत. हे काम मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अग्रक्रमाने झाले पहिजे. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १९६0 झाली. आज त्याला पन्नास वर्ष उलटून गेली आहेत. मग शासनाचा सर्व कारभार अजूनही पूर्णपणो मराठीत झालेला का दिसत नाही? विविध सरकारी कार्यालयांत जी मराठी वापरली जाते ती भयानक क्लिष्ट आणि न समजणारी आहे. सोप्या मराठी शब्दांचा वापर वाढला तर तो लोकांना सोईचा ठरू शकतो.

लहान मुले स्वाभाविकपणो मातृभाषेतून संवाद साधतात मग त्यांना जास्तीत जास्त माहिती मातृभाषेतून उपलब्ध करून दिली तर त्यांना फायदा होऊ शकतो. माहितीच्या पुढे जाऊन ज्ञान मराठीतून मिळायला हवे. या सगळय़ातून त्याची विचार करण्याची प्रक्रिया पूर्णपणो विकसित होऊ शकते. आणि ती झाल्याच्या नंतर तो जगातील कुठलीही भाषा शिकून घेऊ शकतो. त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. कुठल्याही माणसाची विचार करण्याची क्षमता केवळ त्याच्या मातृभाषेतूनच विकसित पाहू शकते. एकदा ही क्षमता विकसित झाल्याच्या नंतर इतर गोष्टींचे कलम त्याच्यावर करता येते. ज्याप्रमाणो गावठी आंब्याची कोय लावल्यानंतर ते झाड वाढले की, त्यावर इतर कुठल्याही आंब्याचे कलम करता येते. त्याचे कारण म्हणजे जमिनीत खोलवर मुळय़ा पसरून सत्व शोषूण घेण्याची जास्तीत जास्त क्षमता गावठी आंब्यामध्ये असते. तसेच जर मातृभाषेतून शिक्षण घेऊन विचार प्रक्रिया विकसित झाली तर त्यावर इतर कुठल्याही भाषेचे कलम करता येणो शक्य होते. 

मराठी भाषा गौरव दिन अर्थपूर्ण होण्यासाठी आपण सगळय़ांनी मिळून मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करणो गरजेचे आहे. 

2 comments:

  1. अप्रतीम कळकळ अभिनंदन !

    ReplyDelete
  2. shri Umarikar
    Atishay chhan likhan ahe. Mnala kholwar bhidtay.

    sadanand JOshi

    ReplyDelete