Monday, February 15, 2016

गरज बरस प्यासी धरती को फिर ‘निदा फाजली’ दे मौला

उरूस, पुण्यनगरी, 15 फेब्रुवारी 2016

जगजित सिंग यांनी गायलेली निदा फाजली यांची एक गझल मोठी सुंदर आहे. 

गरज बरस प्यासी धरती को
फिर पानी दे मौला
चिडीयों को दाने बच्चों को
गुडधानी दे मौला

आज निदा फाजली (8 फेब्रुवारी) यांचे दु:खद निधन झाल्यानंतर त्यांचे सर्व चाहते रसिक देवाकडे त्यांच्या शब्दांत थोडासा बदल करून अशी प्रार्थना करत असतील, ‘गरज बरस प्यासी धरती को फिर निदा फाजली दे मौला.’

निदा फाजली यांची शायरी उच्च दर्जाची होती यात काही वादच नाही. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, पद्मश्री सारखा गौरव प्राप्त झाला. मुळचे कश्मिरी असलेले फाजली यांचे बालपण ग्वाल्हेरला गेले. पुढे फाळणीनंतर त्यांचे पालक पाकिस्तानात गेले पण फाजली यांनी मात्र भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात गेलेल्या आपल्या आई वडिलांबद्दल एक मऊ कोपरा त्यांच्या हृदयात कायमचा होता. आईवरची एक सुंदर गझल ‘खोया हुआ सा कुछ’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रहात  आहे

बेसन की सोंधी रोटी पर
खट्टी चटनी जैसी मां
याद आती है चौका-बासन
चिमटा, फुकनी जैसी मां

बान की खुर्री खाट के ऊपर
हर आहट पर कान धरे
आधी सोयी आधी जागी
थकी दोपहरी-जैसी मां

निदा फाजली यांच्या कवितांची दखल चांगल्या पद्धतीनं घेतल्या गेली. पाकिस्तानातून परतल्यावर त्यांनी एक गझल लिहीली होती. त्याचा एक शेर खुप गाजला.

हिंदू भी मजे मे है
मुसलमां भी मजे मे है
इन्सान परेशान 
यहा भी है वहां भी

या निदा फाजली यांनी काही मोजक्या चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. त्यातील काही गाणी आजही सर्वांच्या तोंडावर आहेत. ही गाणी निदा फाजली यांची आहेत हे रसिकांना माहित नसतं. पण गाण्याला मात्र लोकप्रियता मिळालेली असते.

‘आप तो एैसे न थे’ (1980) या चित्रपटाला उषा खन्ना यांचे संगीत आहे. त्यातील निदा फाजली यांचे गीत ‘तू इस तर्‍हा से मेरी जिंदगी मे शामील है, जहां भी जाओ ये लगता है मेरी मंझिल है’ खुप लोकप्रिय झाले होते. मनहर उधास मोहम्मद रफी आणि हेमलता या तिघांच्याही आवाजात हे गाणं वेगवेगळं गायल्या गेलं आहे. बीनाका गीतमालाच्या 1981 च्या यादीत हे गाणं 23 व्या क्रमांकावर होतं.

खय्याम हा एक अतिशय प्रतिभावंत संगीतकार. फार मोजकी पण दर्जेदार गाणी त्यांनी दिली. आहिस्ता आहिस्ता (1981) या चित्रपटात भुपेंद्रच्या आवाजात फार गाणं आहे. ‘कभी किसी को मुक्कम्मल जहां नही मिलता, कही जमी तो कही आसमां नही मिलता’ हे गाणं आशा भोसलेच्या आवाजातही आहे. पण जास्त प्रभावशाली वाटतो तो भुपेंद्रचाच आवाज. ही गझल निदा फाजली यांची आहे.

जिसे भी देखीये वो 
अपने आप मे गुम है 
जूबा मिली है मगर
हमजुबा नही मिलता

किंवा याच गझलेतील सर्वात सुंदर शेर

बुझा सका है भला कौन
वक्त के शोले
ये एैसी आग है जिसमे
धुआं नही मिलता

कन्नड चित्रपट ‘गिज्जे पुजे’ चा ‘आहिस्ता आहिस्ता’ हा हिंदी रिमेक़ होता. याच चित्रपटात ‘नजर से फुल चुनती है नजर आहिस्ता आहिस्ता, मुहोब्बत रंग लाती है मगर आहिस्ता आहिस्ता’ हे आशा भोसले आणि अन्वर यांनी गायलेले गोड गाणेही आहे. जे की निदा फाजली यांचेच आहे. 

उषा खन्नाचाच दुसरा चित्रपट ‘स्वीकार किया मैने’ (1983) मध्ये किशोर कुमार व लता मंगेशकरचे एक छान गाणे आहे. ‘चांद के पास जो सितारा है’ याचे गीतकारही निदा फाजलीच आहेत.

कमाल अमरोही यांनी ‘रझिया सुलतान’ (1983) या चित्रपटासाठी जां निसार अख्तर यांना गाणे लिहीण्यासाठी निमंत्रित केले होते. जां निसार अख्तर यांनी सुंदर गाणी दिलीही. खय्याम यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. पण जां निसार अख्तर यांचे अचानक निधन झाले तेंव्हा उर्वरीत दोन गाणी लिहीण्यासाठी अमरोही यांनी निदा फाजली यांना गळ घातली. निदा फाजली यांचे या चित्रपटातील गाणे ‘हरियाला बन्ना आया है’ खुप श्रवणीय आहे. आशा भोसले आणि खय्याम यांची गायक पत्नी जगजीत कौर यांचा आवाज या गाण्याला आहे. दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेली रझिया सुलतान हीची आनंदी मनोवृत्ती दाखविणारे हे गाणे. याचे शब्दही मोठे समर्पक आहेत. 

1981 मध्येच ‘नाखुदा’ या चित्रपटात खय्याम यांनी नंतर प्रसिद्धीस आलेल्या नुसरत फतेह अली यांच्या आवाजात एक सुफी कव्वाली रेकॉर्ड केली होती. ‘हक अली मौला अली’ ही ती कव्वाली निदा फाजली यांनीच लिहीली होती.

जगजित सिंग यांनी निदा फाजली यांच्या शब्दांना अतिशय योग्य तो न्याय दिला. त्यांच्या गझलांचे स्वतंत्र अल्बम जगजित सिंग यांनी संगीतबद्ध केले. पण निदा फाजली यांची जगजित सिंग यांनी गायलेली सर्वात जास्त गाजलेली गझल ही ‘सरफरोश’ चित्रपटातील आहे. जतिन ललित यांचे संगीत असलेली ही गझल अमिर खांन, सोनाली बेंद्रे, नसिरूद्दीन शहा यांच्यावर चित्रित  आहे.

होशवालों को खबर क्या
बेखुदी क्या चिज है
इश्क किजीये और समझिये
जिंदगी क्या चिज़ है

ही गझल आजही तरूणांमध्ये प्रेमगीत म्हणून लोकप्रिय आहे. नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. या काळात ही गझल फार जास्त वेळा ऐकली, गुणगुणली जाते. निदा फाजली यांचे साधे शब्द जगजित सिंगच्या आवाजात रसिकांच्या मनात घर करून आहेत.

अतिशय मोजक्या अशा 30 चित्रपटांत निदा फाजली यांनी गीतलेखन केलं. त्यांचा मुळचा पिंड हा कवीचाच. त्यामुळे गीतकार म्हणून येणारी बंधनं स्विकारणं अवघडच होतं. भारतीय संस्कृतीत फाजली पुर्णपणे मिसळून गेले होते. याचा पुरावा म्हणजे त्यांनी उर्दूत लिहीलेले दोहे. 

सातो दिन भगवान के
क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक
भुखा रहे फकिर.

आपल्या भाव भावना कवी नेहमी आपल्या शब्दांत व्यक्त करत राहतो. पण त्यासोबतच न बोलल्या गेलेले बरंच काही आहे याची जाणीव त्याला असते. किंबहुना जे काही आपण बोललो, लिहीलं त्यापेक्षा शिल्लक राहिलेलं जास्त आहे. निदा फाजली यांच्या निधनानंतर त्यांचे शब्द शांत झाले. आता त्यांची नविन कविता ऐकायला/वाचायला मिळणार नाही. या कवीनं याच जाणिवेनं एक ओळ लिहून ठेवली होती

मुंह की बात सुने हर कोई
दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाजारों मे
खामोशी पहचाने कौन

अनंताच्या ‘खामोशी’त विलीन झालेल्या या प्रतिभावंत शायराला आदरांजली. 

  



       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment