Tuesday, October 7, 2014

बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात


                    दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 ऑक्टोबर 2014 

औरंगाबाद शहरातील प्रसंग आहे. कवी वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सादर करीत असताना ‘बगळ्यांची माळ फुले’ हे गाणे मरावाड्यातील सुरेल गायक संजय जोशी यांनी गायला सुरवात केली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांतांना जावून 23 वर्षे उलटून गेली.  6 ऑक्टोबर 1913 हा कांतांचा जन्मदिवस. आज कांत असते तर ते 101 वर्षांचे असते. कांतांच्या कविता त्यांच्या 9 कवितासंग्रहातून मराठी वाचकांच्या समोर आहेत. पण त्यांची आठवण रसिकांना सारखी येत राहते ती ‘त्या तरूतळी विसरले गीत’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’, ‘सखी शेजारणी तू हसत रहा’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले’ आणि अर्थातच ‘बगळ्यांची माळ फुले’ सारख्या गीतांमुळे.

नांदेडात जन्मलेल्या कांतांनी निजामी राजवटीत शेतकी खात्यात साधा कारकून म्हणून आपल्या नौकरीची सुरवात केली. पुढे आकाशवाणीच्या मराठी विभागात हैदराबाद व नंतर औरंगाबाद येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कांत निवृत्त झाले. ही झाली त्यांची साधी व्यवहारीक माहिती. पण साहित्याच्या क्षेत्रात कविता, अनुवाद, नाट्य-काव्य अशी किमान 18 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शासनाचे पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरव वृत्ती, साहित्य-कवी संमेलनाची अध्यक्षपदे असे कितीतरी सन्मान कांतांच्या वाट्याला आले. सतत लिहीत राहिलेल्या या कविने एका ठिकाणी मोठं विलक्षण लिहून ठेवलं आहे. 

गाते कोण मनात कळेना 
गाते कोण मनात ॥
जरी शतावधि कविता लिहिल्या
शंभरदा वाचिल्या गाइल्या
शब्द कुणाचा सूर कुणाचा 
अजूनी मला अज्ञात ॥
अभिमानाने कधी दाटता
रचिले मी हे गाणे - म्हणतां
गीतच रचिते नित्य तुला रे - 
फुटे शब्द हृदयांत ॥
मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 58)

कलेच्या प्रांतातील एक शाश्वत सत्यच कांतांनी लिहून ठेवलंय. आपण कला निर्माण करतो असे नाही तर कलाच आपल्याला कलाकार म्हणून घडवित असते. कलेविषयी एक जाणिव कायम त्यांच्या मनात ताजी असायची. मावळते शब्द या आपल्या शेवटच्या काव्यसंग्रहात त्यांनी सुरवातीला ऋग्वेदातील एक ऋचेचा (ऋग्वेद, 2-28-5) भावार्थ दिला आहे.
 
मी विणितो गाणे तंतु नको रे तोडू
सम येण्याआधी ताल नको रे सोडू

कुठल्याही कलाकाराची परमेश्वराचरणी हीच प्रार्थना असते की मी विणित असलेल्या गाण्याचे धागे तुटू देऊ नकोस. सम येण्याआधी म्हणजेच परिपूर्तता होण्याआधीच हा जो ताल जुळून आला आहे तो सोडायला लावू नकोस. 

कांतांचे आयुष्य तसे परिपूर्ण होते. 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. (मृत्यू 8 सप्टेंबर 1991) त्यांचे कवितासंग्रह मौजेसारख्या मान्यवर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले. वसंतराव देशपांडे, अरूण दाते, सुधीर फडके सारख्यांनी त्यांच्या गीतांना स्वर दिला. यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यासारखे प्रतिभावंत संगीतकार त्यांना लाभले.

कुठलाही प्रतिभावंत निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने हरखून जातो. कांतही याला अपवाद नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता आजही किती ताजी टवटवीत वाटते. 

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हांत
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे  
(मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 33)

आभाळाचे गाणे झाल्याचा अनुभव आपलं काळीज कलाकाराचं असेल तरच येतो. बा.भ.बोरकर, पांडगांवर, महानोर यांच्यासारख्यांनी मराठीत खुप समृद्ध अशी निसर्ग अनुभवाची कविता लिहीली आहे. कांतांची ही कविता याच समृद्ध परंपरेतली आहे.

अनुवादाचे फार मोठे काम कांतांनी केले. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यशपाल शर्मा यांची  ‘मनुष्याची रूपं’  ही हिंदी कादंबरी, मौलना अब्दूल हलीम शर्र यांची उर्दू कादंबरी ‘कालचे लखनौ’, रफिक झकेरिया यांची इंग्रजी कादंबरी ‘सुलतान रझिया’, राजेंद्रसिंह बेदी यांची कादंबरी ‘एक चादर मैलीसी’असे महत्त्वाचे अनुवाद कांतांनी मराठीत केले. मिर्जा गालिबवरच्या हैदर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही त्यांनी मोठ्या रसाळतेने केला. गालिबच्या बर्‍याच कविता त्यांनी मराठीत आणल्या. नाट्यकाव्य हा एक अतिशय दुर्लक्षित काव्यप्रकार कांतांनी मोठ्या ताकदीने हाताळला. पंचेविसच्या जवळपास नाट्यकाव्य त्यांनी लिहीली. मराठीत इतकी नाट्यकाव्य कुणाच्याच नावावर नाहीत.

आज कांतांच्या माघारी आपल्या हातात आहे ती त्यांची कविता, गाणी, नाट्यकाव्य आणि त्यांचे अनुवाद. कुठल्याही कलाकाराला आपण आपल्या कलेच्या रूपाने रसिकांच्या स्मरणात राहू याचा विश्वास असतो. कांतांनीही आपल्या दोनुली या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ नावाने छोटेसे चिंतन या संदर्भात लिहून ठेवले आहे. ते मोठे समर्पक आहे. 

साठविता डोळा । सूर्यनारायण ।
उडावे हे प्राण । अचचित ॥
जळात उन्हात । पाखरांच्या माळा ।
बिंबाचा सोहळा । प्रतिबिंबी ॥
सहज गळावे । देहाचे या भान ।
पिकलेले पान । तळ्यामध्ये ॥
बिंबतात झाडे । तीरीची पाण्यात ।
तसे कवितेत । नांदो आम्ही ॥
(दोनुली, मौज प्रकाशन, पृ. 16)

त्यांच्या कवितेत कांत अजूनही नांदत आहेत. कांतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता एकत्रित प्रकाशीत होण्याचा संकल्प करण्यात आला होता. हे पुस्तक लवकरच प्रकाशीत होते आहे. 6 ऑक्टोबर या कांतांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे छोटेसे स्मरण. 
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात ।
अजूनही कांत तूम्ही आमच्या स्मरणात । 
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, September 30, 2014

संगीत बारी - ‘ती’ची कथाच न्यारी

 
दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 30 सप्टेंबर 2014 

मोहनाबाई म्हाळंग्रेकर, सानिया श्रीराम कोलते पाटील, इरफान अब्दूल सत्तार पठाण ही तीन नावं वेगवेगळी आहेत असं कुणालाही वाटू शकेल. प्रत्यक्षात मोहनाबाई या आईच्या पोटी जन्मलेले सानिया आणि इरफान ही सख्खी भावंडं आहेत. दोघांचेही वडिल एकच आहेत. असं सांगितलं तर ऐकणारा बावचळून जातो. पण हे वास्तव आहे. बीनकामी नवर्‍याला धिक्कारून स्वत:च्या जिवावर पोरं मोठं करणार्‍या, आपल्यासोबत कितीतरी नाचणार्‍या मुलींना पोटपाण्याला लावणार्‍या कळवातणी समाजात जन्मलेल्या मेहरून्नीसा उर्फ मोहनाबाई म्हाळंग्रेकर या लावणी कलावंतीणीची ही कहाणी भूषण कोरगांवकर या व्यवसायानं चार्टर्ड अकौंटंट असलेल्या तरूणानं तळमळीनं लिहीली. त्या निमित्तानं मोहनाबाई कार्यरत असलेल्या ‘संगीत बारी’ या कलाक्षेत्राबद्दल इतरही माहिती गोळा केली. कित्येक लावणी कलावंतीणीना ते भेटले. त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले. या सगळ्यातूनच ‘संगीत बारी’ या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

मोहनाबाईंच्या निम्मीताने भूषण कोरगांवकर यांनी संगीत बारीची सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती मराठी वाचकांना दिली आहे. लावणी, तमाशा, वेश्या व्यवसाय यांत नेहमीच गोंधळ घातला जातो. तमाशात नाचणारी बाई ही नक्कीच वेश्या व्यवसाय करणारी असणार असा समज सर्वत्र पसरलेला आहे. या स्त्रीयांनाही घरदार आहे, त्यांच्या जातीत (कळवातू, भातू कोल्हाटी, डोंबारी आदी..) त्यांना इज्जत आहे.  त्यांचे त्यांचे म्हणून काही नितीनियम आहेत (उदा. डोंबारी समाजातील मुलींना लग्न करता येते पण ते डोंबारी जातीतील माणसाशीच करावे लागते) हे फारसे कुणाला माहित नाही.

‘‘संत कान्होपात्रा, मस्तानी या सार्‍यांचे आम्ही वंशज, आम्ही कळवात समाजातले. आम्ही धर्मानं मुसलमान असलो तरी हिंदू धर्माचे सगळे रीतिरिवाज पाळतो. रोजची देवपुजा, श्रावणातली पुजा, गणपती सगळं करतो सोबत दर्ग्यात जावून नमाज बी पढतो. नऊवार नेसून टिकली लावून नाचतो. दर 7-8 हिंदू मुलीमागं एक आमची मुलगी आहे. पण आमच्यात तसे भेदभाव नाहीत. ’’ मोहनाबाईंच्या या साध्या शब्दांमध्ये मोठ मोठ्या समाजसुधारकांना जे व्यक्त करता आलं नाही ते सांगायची ताकद आहे. 

आपले वडिल अब्दूल सत्तार पठाण यांनी कव्वाली शैलीत बांधलेली गझल मोहनाबाई सादर करतात

मुझे फुंकने से पहले 
मेरा दिल निकाल लेना
ये किसी और की है अमानत 
कही साथ जल ना जाये..

श्रोत्यांना वाहवा, माशाअल्लाह अशी दाद देताच त्या थांबतात, ‘‘मला जाळणार नाहीत, दफनच करणार हैत, तरीसुद्धा तूम्हाला सांगते..’’

संगीत बारी म्हणजे स्वत: गाऊन त्यावर नाच करणे. आर्यभुषण थिएटर, पुणे येथे मोहनाबाईंची पार्टी नियमित नाचण्यासाठी असायची. तेथे वेगवेगळ्या संगीत पार्ट्या आपली कला सादर करतात. तिकीट काढून येणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी जशी ही कला खुली आहे तशीच छोट्या बैठकासुद्धा येथे होतात. त्यासाठी ठराविक रक्कम मोजली जाते. त्या बैठकी मर्यादित लोकांनाच प्रवेश असतो. या सगळ्या प्रकारात कुठेही शरिरविक्रीचा व्यवसाय केला जात नाही. शिवाय एखादा ‘मालक’ ठेवला तर त्याशिवाय दुसर्‍या कुठल्याही पुरूषाशी त्या स्त्रीचा संबंध येत नाही. अशा कितीतरी स्त्रियांनी आपल्या आपल्या पुरूषासोबत संबंध ठेवून आपली कला जपली आहे. 
लावणी नृत्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते. कुठल्याही कलाकाराला रियाजासाठी जे काही करावं लागतं तसंच लावणीसाठीही करावं लागतं. मोहनाबाईंनी आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना लालबागच्या हनुमान थिएटरच्या आठवणी सांगितल्या आहेत. ‘‘त्या काळी कलेला किंमत होती. त्यामानाने रूपाला कोणी फारसे मोजीत नव्हते. मधु कांबीकरचा अपवाद वगळात या क्षेत्रातील बाकी स्त्रीया यमुनाबाई, ताराबाई, लक्ष्मीबाई, सरोजाबाई, शोभाबाई या काही फार सुंदर वगैरे नव्हत्या. पण एकदा का त्या गायला, नाचायला उतरल्या की त्यांचं रूपच पालटून जायचं.’’

नाचणार्‍या मुली म्हणजे स्वत:ची काळजी घेत नाहीत, काहीही खातात, त्यांना कसलेली रोग होतात आणि त्या हलाखीत मरून जातात असे एक चित्र रंगवलेले असते. याला  कोरगांवकरांच्या लिखाणाने तडा दिला आहे. त्वचा, केसांची निगा या मुली कशा उत्तम घेतात, वैयक्तिक स्वच्छता उत्तम राखतात हे त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा हवाला देवून लिहीलं आहे. भाकरी, चपाती, भात, डाळ, दोन भाज्या, उसळी, कोशिंबिर, चटणी असं चारीठाव साधं पण सकस जेवण या मुली नियमित घेतात. अन्यथा दारू, मांसाहार, तिखट आणि मसालेदारच त्या खात असतील असा गैरसमज पसरलेला आहे.

नाचगाणी करणार्‍या मुलींची लग्न होतात का? त्यांचे संसार सुखाचे होतात का? असला प्रश्न सामान्य माणसांना नेहमीच पडतो. वर्षा संगमनेरकर यांचे ठसठशीत उदाहरण या पुस्तकात सांगितलं आहे. सीआयडी ऑफिसरचा मुलगा असलेला पराग चौधरी या युवकाशी त्यांचे प्रेम जुळले. त्याने घरच्यांशी वर्षाबाईंशी लग्न करण्याचा निश्चय सांगितला. त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं रहायचं ठरवलं. गेली पंचेवीस वर्षे वर्षाताई वैवाहिक आयुष्य जगत आहेत शिवाय कलेची सेवाही करत आहेत. 

लावणी कुठे कुठे सादर केली जाते? संगीत बारी, ढोलकी फडाचा तमाशा, बॅनर शो आणि टीव्ही-चित्रपटात अशा चार ठिकाणी लावणी सादर होते. ढोलकी फडाचा तमाशा हा सर्वात जुना प्रकार. त्याला एक मोठी परंपरा आहे. शहरी प्रेक्षकांसाठी बॅनर शो हा सोयीचा प्रकार आहे. जगदीश खेबुडकरांनी गावरान मेवा नावाने बंदिस्त सभागृहात लावणीचे कार्यक्रम सुरू केले 1970 मध्ये. त्यातूनच बॅनर शो हा प्रकार सुरू झाला. मीना नेरूरकर यांनी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नावाने लावणीचे भरपूर प्रयोग करून लावणी लोकप्रिय केली. ‘नटरंगी नार’, ‘सोळा हजारात देखणी’, ‘ढोलकीच्या तालावर’ अशा कार्यक्रमांतून सुरेखा पुणेकर, माया जाधव यांना अफाट लोकप्रियता मिळाली. 

या क्षेत्रातील मुली आता कलाक्षेत्रात स्थिरावू लागल्या आहेत. लावणी म्हणजे गायन आणि नृत्याचे अप्रतिम मिलन.  नुसतं गाणं येवून किंवा नुसता नाच येवून भागत नाही. पण आजकाल गाणं आणि नृत्य वेगवेगळं होवू पहात आहे. नाचणार्‍या मुलींना चांगली प्रतिष्ठा मिळू लागली आहे. आरती अंकलीकर सारख्या शास्त्रीय संगीतातील प्रतिष्ठीत गायिका ‘उगवली शुक्राची चांदणी’ म्हणतात तेंव्हा लावणीच्या प्रतिष्ठेत भरच पडते असे निरिक्षण कोरगांवकर यांनी नोंदवले आहे.

संगीत बारी पुस्तकात पारंपरिक लावण्यांची काही उदाहरणं दिली आहेत. मारूबिहाग रागावर आधारीत 

पाहूनिया चंद्रवदन 
मला साहेना मदन
ओळखली खचित खचित 
खूण तुमच्या नेत्राची

किवा मिश्र पिलू रागावर आधारलेली साध्याभोळ्या मराठा शिपायाचं वर्णन करणारी ही लावणी

पंचबाई मुसाफिर अलबेला
भरजरी पोषाख हातामधी भाला
शिपाई सजला, रंगिला फाकडा, 
शोभे गुलाबी पटका

शाहिर परशुराम यांची अध्यात्मिक लावणीही यात दिलेली आहे. 

दहा शिंदळक्या करीन परंतु 
एक लग्नाचा नको नवरा 
माहेरी माझे चितमन रमले
माहेरचा नलगे वारा

कोरगांवकर यांनी पारंपरिक लावण्यांसोबत आधुनिक लावण्याही आवर्जून दिल्या आहेत. 
कुठलीही शब्दबंबाळ भाषा न वापरता अतिशय वस्तुनिष्ठपणे कोरगांवकर यांनी संगीत बारी मराठी वाचकांसमोर शब्दांतून उभी केली आहे. अकलूजची लावणी स्पर्धा या क्षेत्रात मोठी मानाची समजली जाते. मंदाकिनीबाई डिंगोरेकरांनी आपल्या या कलेबद्दल एक मोठी सुंदर लावणीच सादर केली होती. 

मराठमोळी कला ही न्यारी
बिचकून जाऊ नका
लावणी विसरू नका हो पाव्हणं
लावणी विसरू नको

मराठी माणूस लावणी कला विसरणार नाही याची खात्री या क्षेत्रातील नविन कलाकारांना पाहून वाटते असे निरिक्षण भूषण कोरगांवकरांनी मांडले आहे. संगीत बारी हे पुस्तक वाचून लक्षात येते, ‘संगीत बारी... ‘ती’ची कथाच न्यारी !’

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Tuesday, September 23, 2014

प्लॅस्टिकचा कचरा... परत वापरा !!


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 23 सप्टेंबर 2014 

एक तिशीतला तरूण मोटारसायकलवरून चालला आहे. मागे त्याची बायको बसली आहे. समोर छोटे मुल आहे. आपली गाडी तो थोड्याश्या मोकळ्या जागी थांबवतो. एक प्लॅस्टिकची खच्चून भरलेली पिशवी मोकळ्या जागेत फेकून देतो आणि वेगाने निघून जातो. या प्लॅस्टिकच्या पिशवीत काही नाही निव्वळ कचरा भरलेला असतो. एका साध्या कृतीने पुढे न सुटणारी प्लॅस्टिकच्या कचर्‍याची समस्या तयार होते हे त्या तरूणाच्या किंवा आपल्या कुणाच्याच गावी नसते.

आज जगभरात आणि विशेषत: भारतात कचरा ही एक फार मोठी समस्या होवून बसली आहे. आणि त्यातही परत प्लॅस्टिक हा विषय जास्त गंभीर आहे. पर्यावरणवादी तर प्लॅस्टिक हे नाव जरी काढले तरी डोक्याला हात लावून बसतात. या प्लॅस्टिकचे काय करावे हे भल्या भल्या माणसांना उमजेनासे झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य माणसाला परवडते म्हणून त्याचा वापर वाढतो आहे हे खरे आहे. आणि दुसरीकडे या प्लॅस्टिकचे कचर्‍यात रूपांतर झाले की त्याची न सुटणारी समस्या तयार होते हेही खरे आहे. 

छोट्या गावांमध्ये त्या मानाने प्लॅस्टिकचा कचरा कमी तयार होतो. शिवाय गावची एकूण लोकसंख्या, रहदारी, सांड पाण्याचे मर्यादीत प्रवाह हे सारे पाहता कचर्‍याची समस्या तेवढी गंभीर बनतही नाही. पण शहरांमधून मात्र चित्र भयावह बनत चालले आहे. जाग-जागी कचर्‍याचे ढिग साठलेले. प्लॅस्टिच्या पिशव्यांमुळे अडून बसलेले सांडपाणी, मोठ्या नाल्यांचा प्रवाह तुंबून पाणी पुलावरून वहात आहे, नाक आणि जीव मुठीत घेवून लोक आपल्या गाड्या असल्या रस्त्यांवरून नेत आहेत. या कचर्‍यामुळे डासांचे प्रमाण वाढणार आणि डेंग्यूसारखे रोग होणार. औरंगाबादसारख्या शहरातील रूग्णालये डेंग्यूच्या रोग्यांनी तुडूंब भरली आहेत.

आपली एक साधी कृती आपल्याला भयानक समस्येच्या कडेवर नेऊन उभी करते. प्लॅस्टिकचा वापर कमी करा म्हणत सर्वचजण कानीकपाळी ओरडत असतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जर वापर कमी होत नसेल तर निदान निर्माण होणारा कचरा तरी कमी करा. त्याचे नीट व्यवस्थापन करा इतकाच उपाय हाती उरतो. 

अतिशय भयानक समस्या निर्माण करणार्‍या या प्लॅस्टिकचा एक गुणधर्म म्हणजे त्याचा पुनर्वापर करता येवू शकतो. याबाबीकडे औद्यागीक विश्वाने लक्ष दिले आणि आपल्या क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा परत वापरायला सुरवात केली आहे. मोठ मोठ्या उद्योगांमधून कचर्‍याचा, भंगाराचा लिलाव केला जातो. त्याची वर्गवारी करून त्यातून प्लॅस्टिक वेगळे काढले जाते. या प्लॅस्टिकचे बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यांना वितळून त्याचे दाणे बनविले जातात. या दाण्यांपासून परत प्लॅस्टिकच्या हव्या त्या वस्तू साच्याचा वापर करून बनविल्या जातात. एक्सट्रूजन (extrusion) असे नाव या प्रक्रियेचे आहे. 

सार्वजनिक पातळीवर मात्र या प्रक्रियेचा फारसा विचार केला गेला नाही. आपल्या घरातील कचरा आपण दारात नेवून ठेवतो. तो महानगर/नगर पालिका/पंचायत जसा जमेल तसा उचलते. नाही कोणी उचलला तर आपण दुसरीकडे नेवून टाकतो. कचरा उचलणार्‍या बायका/मुले अशा कचर्‍यातून आपल्या कामाचे काय सापडते याचा शोध घेतात.

कचर्‍यातील वस्तूंची कागद, धातूचे तुकडे, काच आणि प्लॅस्टिक अशी वर्गवारी केली जाते. या सगळ्याला छोटी मोठी किंमत देवून भंगार व्यापार करणारे विकत घेतात. त्यांच्यातही गट पडलेले असतात. प्लॅस्टिकचा व्यापारी, पुठ्ठ्यांचा व्यापारी, खताच्या पिशव्यांचा व्यापारी, कागदाचे व्यापारी, लवालोखंडवाले असे प्रकार आहेत.

कचर्‍याला जर किंमत आहे, त्याची खरेदी होते तर मग कुणालाही साधा प्रश्न पडेल- रस्त्यांवर कचर्‍याचे ढिग तेही विशेषत: प्लॅस्टिकच्या पिशव्या का दिसतात? याचे साधे कारण म्हणजे त्यांना लागलेली घाण. प्लॅस्टिकची भंगारमध्ये खरेदी केली जाते हे खरे आहे. पण हे अर्धसत्य आहे. स्वच्छ केलेले कोरडे प्लॅस्टिक असेल तरच ते स्विकारले जाते. खराब प्लॅस्टिक आणि तेही विशेषत: पिशव्या गोळा करून त्यांना स्वच्छ करून मग ते भंगारवाल्यांना विका इतका वेळ कचरा वेचणार्‍यांजवळ नसतो.  ते सारे झेंगट गळ्यात घेण्यापेक्षा तसेच टाकून दिलेले बरे म्हणून त्याला कोणी हात लावित नाहीत. 

यासाठी एक साधी वाटणारी पण कोणीच न करणारी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. आपल्या घरातील बाकीच्या कचर्‍याचे जे करायचे ते करा. तो कचरा कुजतो, त्याचे विघटन होते त्यामुळे ती समस्या तेवढी गंभीर नाही. पण प्लॅस्टिक जे आपल्या घरात आपण वापरून फेकून देतो त्याची जरा काळजी घेतली पाहिजे. विशेषत: प्लॅस्टिकच्या पिशव्या स्वच्छ कोरड्या करून घडी करून ठेवून द्याव्यात. प्लॅस्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात घरात येतात. त्याही नीट विसळून एखाद्या पोत्यात घालून ठेवल्या पाहिजेत. असा स्वच्छ आणि कोरड्या प्लॅस्टिकचा कचरा एका गल्लीमधून, अपार्टमेंटमधून, सोसायटीमधून एकत्र गोळा करण्यात यावा. हे करण्यासाठी जो माणूस काम करतो त्याचा वर्षाचा पगार निघावा इतकी किंमत वर्गवारी केलेल्या स्वच्छ कोरड्या कचर्‍याला मिळू शकते. हे सांगायची गरज आहे. कारण जोपर्यंत एखाद्या बाबीचे अर्थचक्र फिरत नाही तोपर्यंत असे उपाय तात्पुरते बनतात. एकदा का त्याचा खर्च निघावा इतका जरी पैसा मिळू लागला की तो उपक्रम आवर्जून टिकतो. साधं उदाहरण आहे. गावो-गावी, शहरो-शहरी छोटी मोठी मंदिरं उभी राहीली आहेत. त्यासाठी पैसा गोळा होतो. तिथे पुजा करायला पुजारी मिळतो, तिथे गोळा होणारे भाविक आपल्या आपल्यापरीने देणग्या देवून ही सगळी व्यवस्था चालवितात. लोकांची भावनिक अध्यात्मिक गरज आहे म्हणून मग स्थानिक पुढारीही मागे पुढे न पाहता अशा उपक्रमांमध्ये पैसे ओतायला तयार होतात. आजतागायत महाराष्ट्रातील एकही मंदिर पैसे नाहीत, पुजारी नाहीत म्हणून बंद पडलं नाही. याला जसं भावनिक कारण आहे तसेच आर्थिक कारणही आहे हे आपण नजरेआड करतो. 

याचप्रमाणे एकदा का प्लॅस्टिक कचर्‍याचे आर्थिक गणित बसले की ती समस्या सुटायला सुरवात होईल. आज प्लॅस्टिक पिशवी शिवाय इतर भंगार वस्तुंचे गणित बर्‍यापैकी बसले आहे. हे गोळा करणारी, वर्गवारी करणारी, किरकोळ आणि घावूक व्यापार करणारी आणि प्रक्रिया करणारी अशी सगळी यंत्रणा गावोगावी सिद्ध झाली आहे. आपल्या भागात कचरा भंगार गोळा करणार्‍या कुणाही फाटक्या माणसाशी किमान पाच मिनीटं बोलून पहा तूम्हाला लक्षात येईल की ही यंत्रणा कुठल्याही सरकारी मदतीशिवाय कशी सक्षमपणे काम करत आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणून स्वत:ची टिमकी गाजवून घेणार्‍या पुढार्‍यांना, नेत्यांना, बोलघेवड्यांना कल्पनाही नाही की भंगार/कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आजच्या काळात जवळपास सगळेच मुस्लिम आणि दलित आहेत. 

दलितांच्या नावानं गळे काढणारे आणि मुसलमानांना निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचे गाजर दाखविणारे भंगार गोळा करणारे आणि त्यावर प्रक्रिया करून जनतेची सेवा करणारे यांच्यासाठी मदतीची काहीच योजना का राबवित नाहीत? मला तर उलट असे वाटते की आत्तापर्यंत सरकारने यात लक्षच न घातल्यामुळे जे काही काम चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. एकदा का यात सुट सबसिडीचा कली शिरला की याही क्षेत्राची वाट लागायला काही उशीर नाही. 

सरकारने नाही पण लोकांनी छोटे छोटे गट करून यात लक्ष देण्याची नितांत गरज आहे. निदान आपल्या घरातील कचरा व्यवस्थित वेग-वेगळा करून आणि कोरडा ठेवून आपण त्यांना मदत करू शकतो. भंगार प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणार्‍या उद्योगावर लक्ष दिले गेलं पाहिजे. रिसायकल प्लॅस्टिक उद्योगाला करमुक्त करून त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कचरा गोळा करणार्‍यांना किमान सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि हे लोकांच्या पातळीवर व्हावे, सरकारच्या नव्हे. यात जिथे कुठे सरकार अडथळा बनून पुढे येईल त्याविरूद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. 

पूर्वीच्या काळी आपल्या शेतातील करडी देवून तेल काढून आणायचे. घरातील जुने  कपडे देवून बोहारणी कडून भांडे घेतले जायचे. आताही जुने कपडे देवून संतरंजा घेतल्या जातात. तसं आता प्लॅस्टिकचा कचरा देवून एखादी वस्तू घेण्याची व्यवस्था तयार व्हायला पाहिजे. 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, September 16, 2014

बी. रघुनाथांची सरकारी उपेक्षा !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 16 सप्टेंबर 2014 

ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांचा 7 सप्टेंबर हा स्मृतिदिन. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दि साजरी झाली. गेली 12 वर्षे परभणी शहरात गणेश वाचनालय ‘बी. रघुनाथ महोत्सव’ साजरा करीत  आहे. गेली 25 वर्षे औरंगाबाद शहरात ‘नाथ संध्या’ साजरी केली जाते आहे. बी रघुनाथ यांच्या नावे साहित्य पुरस्कार दिला जातो आहे. बी. रघुनाथ यांच्या मृत्यूनंतर लगेच तीनच वर्षात परभणी शहरात सामान्य नागरिकांनी त्यांची आठवण जपण्यासाठी 1957 साली बी.रघुनाथ हॉल बांधला. या वेळी त्यांचे सुरेख तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार त्र्यंबक वसेकर यांनी काढले होते. कार्यक्रमासाठी ते नांदेडहून आणायचे तर चित्राचे रंग ताजे होते. मग थोर विचारवंत नरहर कुरूंदकर यांनी दुसर्‍या कुणाच्या हाती ते न सोपवता स्वत: ओल्या रंगांना जपत नांदेडहून परभणीला आणले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्याचे अनावरण झाले. 

परभणीला 1995 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. बी. रघुनाथांचे दुर्मिळ झालेले सर्व साहित्य  सव्वाशे कविता, एकोणसाठ कथा आणि सात कादंबर्‍या तीन खंडांत प्रकाशित करण्यात आल्या. मग बी. रघुनाथांच्या सहित्यावर एक परिसंवाद घेवून मराठीतील मान्यवर समिक्षकांकडून लेख लिहून घेण्यात आले. त्या सर्वाचे एक संदर्भ पुस्तकही तीन वर्षांनी प्रकाशित झाले. परभणी शहरात बी रघुनाथ यांच्या नावे महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. 

बी. रघुनाथ मेळ्यांसाठी गाणी लिहून देत. गानमहर्षि अण्णासाहेब गुंजकर त्याला चाली लावून देत. ही गाणी परभणी परिसरात मोठी लोकप्रिय होती. आजही सुरमणी कमलाकरराव परळीकर यांनी बी. रघुनाथांच्या कवितांना दिलेल्या चाली  परभणीचे गायक मोठ्या उत्साहाने गातात. 

हे सगळं घडले आणि पुढेही घडत राहिल ते सामान्य रसिकांनी आपल्या काळजात बी. रघुनाथांना स्थान दिले म्हणून.  म्हणजे बी. रघुनाथांना या रसिकांनीच खर्‍या अर्थाने जतन करून ठेवले. पण शासकीय पातळीवर काय घडले? 

2002 साली बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारण्यात आले. बी. रघुनाथांचा पुतळा, त्या भोवती आकर्षक बाग, कारंजे, छोटेखानी सभागृह आणि वाचनालयासाठी इमारत अशी रचना करण्यात आली होती. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशी अमावस्या होती. बी. रघुनाथ गेले त्या दिवशीही अमावस्याच होती. कवी बा.भ.बोरकर यांनी आपल्या एका कवितेत लिहीले होते

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरिती प्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री

बी. रघुनाथ यांच्या स्मारकावर धुळीत विखुरल्या त्यांच्या कवितांनी चंद्रफुलांची छत्री धरली असे चित्र 7 सप्टेंबर 2002 साली होते. आता मात्र परिस्थिती बिकट झाली आहे. पुतळ्या मागच्या भिंतीच्या फरश्या निखळुन पडल्या आहेत. कारंजे तर केंव्हाचेच बंद पडले आहे. ज्या इमारतीत वाचनालय व्हावे असे अपेक्षित होेते तिथे आजतागायत एकाही पुस्तकाला कुठल्याच निम्मित्ताने प्रवेश मिळाला नाही. पहिले वर्ष स्थानिक संस्था आणि प्रकाशक यांनी एक पुस्तक प्रदर्शन त्या इमारतीत भरवले होते. आजही एक कायमस्वरूपी प्रदर्शन त्या परिसरात चालू आहे. पण ते पार्किंगच्या चिंचोळ्या गैरसोयीच्या जागेत. 

सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळत नाही कारण सरकारी बैठका तिथे होतात. तारीख रिकामी असेल तर जागेचे भाडे सांस्कृतिक उपक्रमांना परवडणे शक्य नाही. स्वत: महानगरपालिकेने काही उपक्रम घ्यावा तर राजकीय इच्छाशक्तिचा पूर्णपणे अभाव. महापौर किंवा कुणीतरी सरकारी प्रतिनिधी 7 सप्टेंबरला आठवण झाली तर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. जे कोणी सोबत त्यांचे सगे सोयरे दोस्त मंडळी असतील त्यांना चहा पाजविला जातो. इतर राजकीय कार्यक्रमाच्या घाईने आणि ओढीने महापौर किंवा इतर कुणी राजकीय नेते निघून जातात. बी. रघुनाथांवर प्रेम करणारे मोजके साहित्यप्रेमी आपले काही तरी हरवले असावे अशा अविर्भावात पुतळ्या भोवती काही काळ रेेंगाळत राहतात. शेवटी उन चढत जाते तशी माणसे पांगतात. त्या परिसरातील शिपाई मुख्य दरवाजा लावून घेतो. परत बी. रघुनाथ वाळत चाललेल्या हिरवळीकडे पहात विमनस्कपणे बसून राहतात. नाही तरी त्यांनीच आपल्या कवितेत लिहीले होते

राउळी जमतो भाविक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

बी. रघुनाथांना केवळ मठ मंदिरांमधील भक्त अपेक्षित नव्हते. साहित्याचा मंदिरातील भक्तही अपेक्षीत होते. आणि त्यांचेही वर्तन आज तसेच आढळते.

बी. रघुनाथांचे शासनाच्या साहित्य पुरस्काराला देण्यात आले होते. नंतर पुरस्कारांची संख्या कमी झाली. तसे ते नावही उडाले. बी. रघुनाथांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा जन्मशताब्दि वर्षात परभणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. आता तीचाही सोयीस्कर विसर सगळ्यांना पडला. बी. रघुनाथांच्या कन्या सुधा नरवाडकर यांनी साहित्य परिषदेला काही देणगी उपक्रमासाठी दिली होती. त्याचेही पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. 

मराठवाड्यात दोन विद्यापीठं अस्तित्वात आहेत. 1995 नंतर बी. रघुनाथ यांचे समग्र साहित्य चांगल्या स्वरूपात उपलब्ध झाले. नंतर 2005 साली नांदापुरकरांचे साहित्य उपलब्ध झाले. पण एकाही विद्यापीठाला ते अभ्यासक्रमाला लावावे वाटले नाही. आता अभ्यासक्रमाला जे काही लावले गेले आहे ते पाहता जे झाले ते बरेच झाले म्हणावयाची पाळी आहे. 

या सरकारी अनास्थेच्या उलट सामान्य रसिकांच्या पाठिंब्यावर आजही बी. रघुनाथ महोत्सव साजरा होतो आहे. एक चांगला पायंडा या निमित्ताने पडला आहे त्याचा विचार केला पाहिजे. साहित्यकी सांस्कृतिक उपक्रमांमधील राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून निखळ वाङ्मयीन स्वरूपात साधेपणात हे उपक्रम साजरे केले पाहिजेत. महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अ वर्ग वाचनालय आहेत. किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृपेने महाविद्यालयांच्या इमारती बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. या ठिकाणी जिल्ह्याभरच्या साहित्यप्रेमी रसिकांच्या आश्रयाने हे उत्सव, उपक्रम साजरे होवू शकतात. यासाठी लागणारा निधीही सामान्य रसिकांमधून, प्रस्थापित संस्थांमधून सहज उभा राहू शकतो. प्रत्येकवेळी मोठ मोठ्या रकमा उभ्या करायच्या. त्या खर्चाच्या ओझ्याने साहित्यीक कार्यकर्ते बाजूला पडतात. आणि भलतेच उपटसुंभ पुढे येतात. ते मग त्या उपक्रमाचा काय बट्ट्याबोळ करतात हे परत वेगळे सांगायची गरज नाही. खरं तर कुठलाच राजकीय पुढारी साहित्यीक संस्थांच्या दाराशी येवून लुडबूड करू इच्छित नसतो. साहित्य क्षेत्रातील सामान्य कुवतीचे साहित्याची खरी जाण नसणारे गणंगच राजकीय नेत्यांच्या दाराशी पडून असतात. मग स्वाभाविकच या क्षेत्राचा वापर करण्याची राजकीय नेत्यांची वृत्ती बळावते. यात त्यांचा दोष कमी आणि साहित्यीकांचा दोष जास्त आहे.

साधेपणाने साजरा होणार्‍या बी. रघुनाथ महोत्सवाने एक आदर्श समोर ठेवला आहे. त्याचे डोळसपणे अवलोकन या क्षेत्रातील मान्यवरांनी रसिकांनी करावे ही अपेक्षा.    

   


     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, September 11, 2014

उंडणगाव : रसिकता जपणारे गाव !

दै. पुण्यनगरी, उरूस, गुरुवार ११ सप्टेंबर २०१४ 


अजिंठ्याच्या डोंगरातील जगप्रसिद्ध लेण्या तर सर्वांनाच माहित आहेत. त्या डोंगररांगांमध्ये इतरही काही रम्य ठिकाणं आहेत हे मात्र बर्‍याच जणांना माहित नाही. अंतूर, वाडी, जंजाळा असे ऐतिहासिक किल्ले आहेत. रूद्रेश्वर सारखी सुंदर पुरातन मंदिरं आहेत. हळद्याचा निसर्ग सुंदर घाट आहे. याच परिसरात टुमदार संपन्न गावं वसलेली आहेत. या परिसरातील पाच गावं पाच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. पालोद राजकारणासाठी, भराडी व्यापारासाठी, अन्वा शेतीसाठी, सोयगाव नाटकासाठी आणि पाचवं गाव उंडणगाव. ते प्रसिद्ध आहे रसिकतेसाठी. कला साहित्य संस्कृतीची जोपासना या गावानं मोठ्या रसिकतेनं केली आहे. साहित्यक्षेत्रातील ना.धो.महानोर, अनुराधा पाटील, भगवानराव देशमुख, सरदार जाधव  नाट्य क्षेत्रातील गुरूवर्य असे कमलाकर सोनटक्के ही सगळी माणसं याच परिसरातील. मराठवाड्यातील पहिले एफ.आर.सी.एस. डॉक्टर म्हणून नावाजल्या गेलेले डॉ. शांताराम महाजन याच गावचे. नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एम.नाईक असो की प्रा. अविनाश महाजन, पत्रकार सुधीर महाजन असो ही सगळी विद्वान मंडळी याच गावची.   

बारा तेरा हजार लोकवस्तीचं उंडणगाव मोठं समृद्ध असं गाव आहे. या गावातील महाजनांचे जुने सागवानी वाडे अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. आख्खी घोड्याची बग्गी आत यावी अशा उंच कमानी आणि बग्गीतुन घरात सरळ उतरता यावे असे उंच ओटे या वाड्यांना आहेत. 

गावातील तीनशे वर्षांच्या पुरातन बालाजी मंदिरात गणपतीच्या काळात व्याख्यानमाला चालते. मोठ मोठ्या शहरांमधुनही आजकाल सांस्कृतिक उद्बोधनपर कार्यक्रम घेणं मुश्किल होवून बसलं आहे. अशावेळी जुनी रसिकतेची परंपरा पुढे नेत या गावाने ‘मित्रसंघ गणेश मंडळा’च्या माध्यमातून आपली रसिकता जपली आहे. 2007 साली याच गावाने मराठवाडा साहित्य संमेलन मोठ्या झोकात भरवून दाखवले. अखिल भारतीय संमेलनास शोभावी अशी गर्दी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी केली होती. 

मंदिराच्या ओवर्‍यातच एका बाजूला रंगमंच केला जातो. समोरच्या मोकळ्या जागेत, बाजूच्या ओवर्‍यांवर, मागच्या ओट्यावर गावकरी बाया बापडे बसतात. कविसंमेलन, व्याख्यान, कथाकथन अशा कार्यक्रमांना मोठा बहर या ठिकाणी येतो. भगवानराव देखमुख सारखा गोष्टीवेल्हाळ कथाकार, कवी जो की याच परिसरातला आहे त्याच्या वाणीला मोठा बहर या मंचावर उभं राहिला की येतो. तासं न् तास भगवानराव लोकांना खिळवून ठेवतात. आता प्रकृती फारशी साथ देत नसल्यामुळे त्यांचे येणे होत नाही. आता मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे. नविन स्वरूपात मंदिर नव नविन सांस्कृतिक आवष्किारासाठी सज्ज होते आहे. 

लोटू पाटीलांनी सोयगावला जी नाट्यचळवळ चालवली त्याचं मोठं कौतुक या गावाला आहे. या परिसरातही नाटकं साजरी व्हायची. अगदी पार 1949 ला साजर्‍या झालेल्या नाटकाची तेंव्हाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आजही सार्थक खुल्लोडकर सारख्या तरूण कार्यकर्त्याने मोठ्या उत्साहात जपून ठेवली आहे.

या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव थकतच नाही. जुनी लोकं बाजूला बसून सल्ला देतात आणि नविन पिढी पुढे येते. या प्रक्रियेतून उपक्रमांची परंपरा पुढे चालू राहते. जुन्या काळातील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवावी म्हणून 1982 साली ‘मित्रसंघ गणेश मंडळाची’ स्थापना करण्यात आली. रमेश नाईक, कमलाकर खोंडे, भगवान तबडे, सुधीर दाणेकर, डॉ. सतिष खुल्लोडकर या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी हे रोपटे वाढावे म्हणून अपार मेहनत घेतली. त्यावेळपासून काम करणारे प्रकाशराव कुलकर्णी आजही त्या आठवणी सांगतात आणि तरूणाच्या उत्साहाने कार्यक्रमांत वावरतात. पुढे 1998 मध्ये रमेश नाईकांच्या दुर्देवी निधनानंतर त्यांचे नाव या व्याख्यानमालेला देण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. ऍड. किरण नाईक, मिलींद महाजन, अनिल लांडगे आणि अनिरूद्ध नाईक या तरूणांनी मागच्या पिढीपासून प्रेरणा घेत व्याख्यानमालेची धुरा पुढे चालविली. डॉ. खुल्लोडकर दरवर्षी शाडुच्या मातीची गणेशमुर्ती स्वत: तयार करतात. अजूनही डॉक्टरांचा उत्साह टिकून आहे. महानोरांसारख्या मोठ्या कवीने इथे हाजेरी लावण्यात नेहमीच धन्यता मानली आहे. या मातीमुळे माझ्यातल्या कवीची निकोप वाढ झाल्याचा सार्थ अभिमान त्यांनी इथेच प्रकट केला. 

वास्तुरचनाकार असलेल्या अनरिूद्ध नाईक यांनी एक वेगळा प्रयोग या परिसरात केला आहे. डोंगरात जमीन घेवून तेथे एक कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. गणपतीच्या मुर्तीची स्थापना करून यास परिसराला गणेशवाडी हे नाव दिले आहे. उंडणगावला भेट देणार्‍या कवी साहित्यीक कलाकारांना बालाजी मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमाइतकीच गणेशवाडीची ओढ लागून राहिलेली असते. धनंजय चिंचोलीकर सारखा लेखक आवर्जून आपल्या बागेत जोपासलेले रामफळाचे झाड इथे लावण्यासाठी घेवून येतो. रमेश इंगळे उत्रादकरसारखा मोठा कवी पाहुणा म्हणून बोलावून सन्मान केलात त्यापेक्षा झाड लावण्याचा सन्मान मोठा वाटतो हे मन:पुर्वक सांगतो.

गेली तीन वर्षे एक पायंडा या गावाने पाडला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेल्या साहित्यीक कलावंत ज्यांचा इतरत्र पुरस्कार देवून गौरव केला गेला त्यांना बोलावून ‘माहेरचा आहेर’ इथे दिला जातो. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीचे असलेले धनंजय चिंचोलीकर यांना बी. रघुनाथ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना पहिला माहेरचा आहेर सन्मान देवून गौरविण्यात आले. दुसर्‍या वर्षी फुलंब्री तालुक्यातील जळगाव (मेटे) गावचे रवी कोरडे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. त्यांचा गौरव करण्यात आला. यावर्षी फुलंब्री मधीलच गणोरीचे पद्मनाभ पाठक यांची निवड करण्यात आली. व्यावसायिक नाट्य निर्माता संघाने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील स्पर्धेत दासू वैद्य लिखीत ‘रिअल इस्टेट’ या दीर्घांकासाठी पद्मनाभ पाठक यांना दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले. प्रसिद्ध नाटककार अजीत दळवी यांच्या हस्ते हा ‘माहेरचा आहेर’ सन्मान पद्मनाभ पाठक यांना प्रदान करण्यात आला.

उंडणगावचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच गावकरी हा आपला कार्यक्रम आहे, हा आपला पाहुणा आहे अशा रितीने निमंत्रीत पाहुण्यांची बडदास्त ठेवत असतात. गणेशवाडीत मुक्कामाला असलेल्या कवीला पहाटे वयस्क बापुकाका नाईक मोठ्या उत्साहाने आपल्या हातचे चविष्ट मक्याचे वडे करून घावू घालतात. त्यात एक जिव्हाळा दडलेला असतो. 

विजय नाईक, सार्थक खुल्लोडकर या तरूण मुलांनी मोठ्या उत्साहाने ही धुरा आता आपल्या खांद्यावर घेतली आहे.

हा सगळा परिसर मोठा नयनरम्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी कलाकारांनी अजिंठा लेणी निर्माण केली ती केवळ इथे चांगला दगड सापडला म्हणून नाही. या परिसराचे गारूड त्यांच्यावर निश्चितच झाले असणार. म्हणून तर ही लेणी इतकी सुंदर रंगवली गेली. याच मातीतील सरदार जाधव सारख्या चित्रकाराने आपल्या चित्रातून हा परिसर जिवंत करण्याची गरज आहे. 

इथले किल्ले दुर्लक्षीत राहिले आहेत. त्यांची किमान डागडुजी केली पाहिजे. वाडिच्या किल्याच्या टोकावरून कमानीमधून दिसणारे दृश्य हा एक विलक्षण अनुभव आहे. या परिसरातील तळे तर अप्रतिम सौंदर्याने नटलेले आहेत. निळी, जांभळी, लालसर पिवळी अशी सुंदर गवत फुलं गणेशवाडीच्या पठारावर आहेत. मोर फार मोठ्या संख्येने या परिसरात आहेत.मागच्यावर्षी वाडीच्या किल्ल्याजवळ एका वस्तीत आम्हाला कोंबड्यांसोबत मोर पाळलेला आढळून आला. माणसाळलेल्या या मोराने अप्रतिम असे नृत्य करूत आपल्या डौलदार पिसार्‍याचे मनोहारी दर्शन घडविले. दासू वैद्य सारखा लोकप्रिय कवी, शशांक जेवळीकर सारखा उच्चपदस्थ अभियंता, श्रीकृष्ण उमरीकरसारखा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार आपली व्यवधानं बाजूला सारून या परिसरात गुुंगून जातात. या परिसरातील सौंदर्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.  

या परिसरातील रसिकता गावकरी मोठ्या निष्ठेने जपत आहेत. गरज आहे ती साहित्यीक कलाकारांनी त्यांना प्रतिसाद देण्याची.
              
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Tuesday, September 2, 2014

शरद जोशी तुमच्या वाढदिवसाच्या जाहिराती कुठे आहेत ?




                           दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 2 सप्टेंबर 2014 

आदरणीय शरद जोशी, सा.न.

उद्या (3 सप्टेंबर) तुमचा 79 वा वाढदिवस आहे. हे आमच्या लक्षातच नाही. कारण तूमच्या वाढदिवसाच्या जाहिरातींचे फ्लेक्स कुठे दिसले नाहीत. आहो गल्लीबोळातील टिनपाट पुढार्‍याचा जरी वाढदिवस असला तरी किमान पाच पंचेविस अनधिकृत फ्लेक्स झकळतात जिकडे तिकडे. साहेबांची उजळलेली म्हणजे संगणकाचा वापर करून उजवळलेली छबी चमकत असते त्या जाहिरातीमधून. ती सामान्यांच्या डोळ्यात भरते आणि लक्षात येते की हे आपले महान  समाजसेवक उर्फ पुढारी आहेत. पण तसं काहीच तुमचं दिसलं नाही. मग सांगा नं कसं कळणार?

तुमच्यावर आरोप झाला होता की तुम्ही कॉंग्रेस विरोधी असून भाजपाला धार्जिण आहात. खरं तर तुमच्या आंदोलनाची सुरवातच मुळी आणिबाणीनंतरच्या जनता राजवटीच्या काळात झाली होती. कांद्याचे भाव पडले आणि त्यावेळी व्यापार मंत्री होते मोहन धारिया. इतकंच कशाला आत्ता मोदिंचे सरकार येवून जेमतेम 100 दिवसही नाही झाले. कांद्याचे निर्यात शुल्क वाढविणे, कांदा-बटाटा यांचा समावेश जिवनावश्यक वस्तूंच्या यादीत करणं, जनुकिय बियाणांच्या चाचण्यांना विरोध करणं या केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात तूम्ही रस्त्यावर उतरलात. वयाच्या 80 व्या वर्षीही चक्क रेल्वेसमोर रूळांवर ठाण मांडून बसलात. आता तुम्हीच सांगा ही काय रीत झाली समाजसेवा करायची? आहो आजकालचे नेते तरूण वयातही रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. गल्ली बोळातील का होईना सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळाली की कशी उत्तम समाजसेवा करता येते. हे तुम्हाला कुठून आणि कसे कळणार?

तुमच्या शेतकरी संघटनेत अशी घोषणा आहे, ‘शेतकरी संघटनेचा विजय असो !’ आहो असे कुठे असते का? घोषणा कशी नेत्याच्या नावाने पाहिजे. म्हणजे ‘शरद जोशी यांचा विजय असो !’ असं जर कुणी म्हटलं असतं तर किती सोय झाली असती. एकदा का वरच्या साहेबांनी स्वत:पुढे दिवे ओवाळले की गल्ली बोळातील लहानमोठे साहेब तोच कित्ता गिरवतात. मग त्यांचाही उदो उदो स्थानिक पातळीवर होतो. किंवा स्थानिक पताळीवर त्यांचा उदो उदो व्हावा म्हणूनच ते वरच्या साहेबांचा उदो उदो करतात. आता तुमच्या संघटनेचे सगळेच उलटं. गल्ली बोळातील शेंबड्या पुढार्‍यांचा दादांचा तुम्ही फायदा करून दिला असता, त्यांचे ‘हित’ चांगल्या पद्धतीने सांभाळले असते तर त्यांनी तुमचेही फ्लेक्स गल्लीबोळात लावले नसते का?

तुमची चळवळ अर्थवादी विचारांवर आधारलेली चळवळ आहे. चळवळीची मांडणी करताना कुठलीही भावनीक भाषा तुम्ही केली नाही. शेतकर्‍याच्या जातीत तुम्ही जन्मले नाही, शेतकर्‍याचा वेष तुम्ही परिधान केला नाही, शेतकर्‍याची भाषा तुम्ही बोलत नाही. तरी शेतकरी लाखोंच्या संख्येने तुमच्यावर प्रेम करतात. ते असु द्या. पण जर कार्यकर्त्याच्या ‘अर्था’चा विचार केला नाही तर बाकी अर्थवादी विचारांचा काय फायदा हो? आहो आधी कार्यकर्त्याला सोसायटी, पंचायत समिती, झेडपी, आमदारकी, खासदारकी काही तरी भेटलं पाहिजे की नाही? मग चळवळी कशा ‘भक्कम’ होतात. 

हजारो शेतकर्‍यांनी तुमचे फोटो देवाच्या बरोबरीने आपल्या देवघरात लावले असतील. ते असू द्या हो. ते काही कामाचं नाही. गल्लीबोळात तुमचे फ्लेक्स लागणं आणि त्यावर गल्लीबोळातील नेत्यांच्या बारक्या बारक्या छब्या असणं हे जास्त महत्त्वाचे. 

तुम्ही ‘स्वतंत्र भारत पक्ष’ नावानं राजकीय पक्ष काढला. खरं तर तुम्ही तुमच्या पहिल्या अधिवेशनापासून शेतकरी चळवळीला सर्व राजकीय पर्याय खुले आहेत असं म्हणाला होता. तसे ठराव तुमच्या संघटनेच्या अधिवेशनात मंजूर झाले आहेत. लेखी स्वरूपात ते उपलब्धही आहेत. पण ते वाचतो कोण? तुम्ही म्हणाला होतात ना, ‘शेतकर्‍याच्या भावाचा प्रश्न इतर राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहिरनाम्यात घेतला आणि त्यासाठी प्राण पणाला लावले तर मला निवडणुक लढवायची गरजच नाही. अशावेळी जर मी मत मागायला आलो तर मला जोड्यानं मारा!’  इतकं मोठं वाक्य कोण लक्षात ठेवणार जोशी साहेब? आमच्या मोठ्या मोठ्या पुढार्‍यांनी जाणत्या राजांनी शेवटचं अर्धवट वाक्य उचललं आणि तुम्हाला ठोक ठोक ठोकलं. तुम्हीही पडलात सज्जन. निर्लज्जपणे त्यावर काहीतरी अर्वाच्च बोलायचं सोडून तूम्ही आपले प्रामाणिकपणे शेतकर्‍यांची बाजू मांडत बसलात. 

चार वर्षांपूर्वी तुमचा अमृतमहोत्सव शेगाव येथे साजरा झाला. ‘शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही!’  असे उद्गार तुम्ही लाखो शेतकर्‍यांसमोर काढले. शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून कुठलाही सत्कार, शाल, श्रीफळ तुम्ही कधीच  स्विकारले नाही. मग आता तरी कसे स्विकारणार? मग शेवटी सोलापुर जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी जोडप्याच्या हस्ते तूम्ही एक मानपत्र तेवढं स्विकारलं. त्या मानपत्रावर  शेतकर्‍यांची वेदना शब्दबद्ध करणारे तुमचे आवडते कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता कोरलेली होती. आपल्या शब्दाला जागून उतारवयात आजारपण असताना तुम्ही शेतकर्‍यांसाठी रेल्वेच्या रूळांवर उतरलात. अशानं तुमच्या जाहिरातींचे फ्लेक्स शहरो शहरी गावो गावी कसे लागणार? 

"शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळाला पाहिजे",  असल्या शुद्ध अर्थवादी घोषणा नाही चालत आपल्याकडे. शेतकर्‍यांच्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे असली मागणी केली असती तर तुम्हाला कितीतरी राजकीय फायदा झाला असता. शेतकर्‍याला पेन्शन मिळालं पाहिजे, रेशन कार्डावर फुकट अन्नधान्य मिळालं पाहिजे, धान्य दळून मिळाला पाहिजे, ते धान्य खावून पचवून रक्त बनवून मिळाले पाहिजे, नौकर्‍या मिळाल्या पाहिजेत, अनुदान-सुट-सबसिडी मिळाली पाहिजे अशा भिकमाग्या मागण्या केल्या असत्या तर ‘आमचे भाग्यविधाते’ म्हणून तुमचे फ्लेक्स गल्ली बोळातील पंटर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लावले असते. पण तुम्ही तर ‘सुट सबसिडीचे नाही काम। आम्हाला हवे घामाचे दाम॥ असल्या घोषणा सामान्य शेतकर्‍यांना शिकवल्या. अशानं कसं होणार शरद जोशी तुमचे आणि तुमच्या संघटनेचे?

बरं नाहीतरी तुम्हाला कॉंग्रेसविरोधी म्हटलं गेलं होतंच. मग आता कॉंग्रेसविरोधातील मोदींचे सरकार सत्तेवर आले आहे. मग अशावेळी कशाला आंदोलन करण्याच्या भानगडीत पडला? शिवाय तुमचे आता वय झालेले. गप्प बसला असतात तर पाच पंचेविस जीवन गौरव पुरस्कार, एखादा पद्मश्री पद्मभुषण काही तरी पदरात पडण्याची शक्यता होती. पण तुम्ही आंदोलन करून तेही दोर कापुन टाकले.

हे बघा शेतकरी जर स्वत:च्या पायावर उभा राहिला तर मग आमच्या या जाणत्या राजांचे, शेतकर्‍यांचे कैवार घेणार्‍या पुढार्‍यांचे, शेतकर्‍याच्या पोटी जन्मुन त्याचा गळा कापणार्‍या सत्ताधार्‍यांचे कसे होणार? तेंव्हा जितका परिस्थितीने शेतकरी गांजलेला, जितका आस्मानी सुलतानीने पिडलेला, जितका तो कर्जाच्या रूपाने बँकेकडे गहाण तितके आमचे शेतकर्‍यांच्या पोटी जन्मलेले सत्ताधारी नेते महान !!

तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाडोत्री विद्वानांनी लिहीलेले लेखही कुठे दिसत नाहीत. भाडोत्री गुंड परवडले पण हे भाडोत्री विद्वान फार भयानक. पैसे घेवुन दहशत गुंडगिरी करणे सोपे आहे पण बुद्धी गहाण ठेवणे फार घातक. आता तुमचे ते भोळे भाबडे शेतकरी निष्ठावान कार्यकर्ते आपल्या सदसदविवेक बुद्धीला प्रमाणिक राहून

शरद जोशी हृदयात । 
कशाला करू जाहिरात ॥

असं म्हणताना आम्ही ऐकलं आहे. म्हणो बापडे आम्हाला काय!  फ्लेक्स दिसले नाहीत, जाहिराती नाहीत, लेख नाहीत म्हणजे तुमचे मोठेपण आम्हाला तरी माहित नाही. 

तुमचा नम्र 
एक कार्यकर्ता......

              
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, August 26, 2014

बैलाचे कौतुक शेतकर्‍याच्या शहरी पोरांनाच जास्ती !!


                             दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 26 ऑगस्ट 2014 


ठाण्याजवळ मुलूंड उपनगरात रविवारी प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. सकाळची गर्दीची वेळ. रविवार मुळे थोडी कमी असली तरी महानगराची ती गर्दी. रेल्वेस्टेशनच्या पादचारी पुलावरून माणसे झपाझपा इकडून तिकडे चाललेली. इतक्यात पायर्‍यांवरून गायीच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज आला. सगळे वळून पाहताहेत तोवर एका माणसाने धरलेल्या कासर्‍यासोबत एक गायही रेल्वे पुलावरील पायर्‍या चढून येत होती. आता मुंबईमध्ये या गायीचे काय काम? गायीला चारा घालण्याचे पुण्य भक्तांना भेटावे या उद्दात (!) हेतूने पलिकडच्या एका मंदिरासमोर ही गाय घेवून हा माणूस बसतो. यासाठी 300 रूपये रोजाने गाय भाड्याने मिळते. लोकांकडून पैसे गोळा करायचे. भक्तांच्या खात्यात दिवसभर पुरेसे पुण्य आणि याच्या खिश्यात पुरेसे पैसे गोळा झाले की गाय मालकाकडे वापस. 

या सगळ्या प्रकाराला काय म्हणणार? काल पोळ्याचा सण सर्वत्र साजरा झाला. शहरातदेखील हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे प्रत्यक्ष खरे जातीचे बैल असण्याचा प्रश्नच नाही. मग मातीचे बैल बाजारातून खरेदी केले जातात. (हो आजकाल घरी कोणी बैल बनवत नाही. शाळेत पोरांना हस्तकला म्हणून कौतुकानं बैल बनवायला सांगतात ती गोष्ट वेगळी.) मातीचा संबंध तुटलेली माणसे मोठ्या उत्साहाने, ‘आमच्या घरी आजही कशी बैलाची पुजा होते’ हे कौतुकाने एकमेकांना दाखवून देतात. शिवाय चुकून माकून कुणी बैलजोडी सजवून शहरात रस्त्यावरून मिरवायला आणली तर काही विचारू नका. सगळ्यांना त्या बैलांना ओवाळणे, त्यांच्या पायाखाली काकडी फोडणे, बैलाला पुरणपोळी खावू घालणे याचा नको तेवढा उत्साह येतो. 

शहराचे सोडा खेड्यात काय परिस्थिती आहे? गाय, बैल, शेळ्या आदी जनावरे सांभाळणे मोठी कटकट होवून बसली आहे. आधी चराईसाठी गायरानं असायची, माळ असायचे. आता तसे काही उरलं नाही. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी दुध काढण्यासाठी माणसं होती. चरायला न्यायला गुराखी असायचे. या जनावरांना खायला जसं बाहेर उपलब्ध होतं त्याप्रमाणेच शेतातील ज्वारीचा किंवा मक्याचा कडबा (पिकाचा कणीस सोडून उरलेला जैविक भाग- कडबा म्हणजे काय हे आजकाल सांगावं लागतं) असायचा.  लसूण गवत, कडूळ किंवा अजून काही जनावरांना उपयुक्त चारा शेतकरी आवर्जून लावायचे. पण दिवसेंदिवस शेतीची बिकट अवस्था होत चालली आहे आणि हे सगळं नाहिसं होत आहे. दुष्काळात जनावरांचे मोठे हाल होतात. परिणामी ट्रॅक्टरने शेतीची कामं झपाट्याने उरकून शेतकरी मोकळा होत आहे. जनावरांचे झेंगट त्याला परवडेनासे झाले आहे. 

मग पोळ्याचे- बैलाचे कौतुक कोणाला? शेतीसोडून शहरात येवून नोकरी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पोरांना! जसे पन्नास शंभर वर्षांपूर्वी  कोकणातील बहुतांश लोक पोटपाण्यासाठी मुंबई पुण्याला स्थलांतरीत झाले. गावच्या आठवणी त्यांच्या मनात जिवंत असायच्या.  त्यामुळे कोकणातील लेखकांनी लिहीलेली वर्णनं वाचताना त्यांना मोठं छान वाटायचं. परिणामी मराठीत कोकणातील लेखकांच्या पुस्तकांची मोठी चलती निर्माण झाली. तसं आता या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पोरांनी केलं आहे. यांनी शेती सोडली. पण शेतीचे वर्णन करणारे, काळ्या मातीचे गुणगान करणारे, बैलाचा, गायीचा लळा वर्णन करणार्‍या साहित्यकृतीचे मोठे कौतुक सुरू झाले. एकीकडे गावाकडून शहरात स्थलांतरीतांचा ओघ सुरू राहिला. शेती विकून नौकर्‍या स्विकारल्या आणि दुसरीकडे गावच्या वर्णनाचा पुर मराठी साहित्यात निर्माण झाला. हा एक विरोधाभासच होता. 

बैल हा विषय तर फार पुरातन. अगदी ऋग्वेदात गायीचे बैलाचे संदर्भ आहेत. स्वाभाविकच आहे कारण मानवी संस्कृतीची सुरवातच शेतीपासून झाली. मारून खाणारा म्हणजे शिकार करणारा माणूस पेरून खायला लागला म्हणजे शेती करायला लागला आणि हजारो लाखो वर्षांनंतर पहिल्यांदाच तो स्थिर झाला. स्थिर झाला म्हणूनच संस्कृती निर्माण झाली. वेदांतील कृषीसुक्तात 

कल्याण बैलांचे तसे माणसांचे,
कल्यण करो या शेताचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ
नांगर्‍ये चालोत बैलांच्या संगती
कल्याण पाऊस बरसो पाण्याने
आम्हां सुख द्यावे शेतीजी-सीतने ॥ 
(वेदांतील गाणी-विश्वानाथ खैरे, पृ. 18, मंडल 4,  ऋचा 57, संमत प्रकाशन)

असे असल्यावर बैलाचे स्थान आपल्या परंपरेत असणारच. तेंव्हा बैलाची पुजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं स्वाभाविकच आहे. श्रावण अमावस्येला पोळ्याचा सण साजरा करावा. हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण प्रत्यक्ष खर्‍याखुर्‍या बैलाची आता उपयुक्तता किती उरली आहे? असा प्रश्न विचारला तर भले भले दचकतात. खरं तर प्रत्यक्ष कृतीतून आपण बैलाची उपयुक्तता संपली हे दाखवून दिले आहे. गायीचे बैलाचे कौतुक करणारे कोण आहेत? ज्यांनी शेती सोडली आहे किंवा ज्यांचा आता शेतीशी काही संबंध नाही ते.

आमचे एक ज्येष्ठ कवीमित्र मोठे चांगले चित्रकार आहेत. ते बांगड्याच्या तुकड्याच्या मोठ्या सुंदर कलाकृती भिंतीवर चितारतात. यात प्रामुख्याने मोर आणि बैल असतात. बर्‍याच ग्रामीण सहित्यीकांनी आपल्या घरात भिंतीवर हा बैल काढून घेतला आहे. पण प्रत्यक्षात कोणाच्याच शहरातील घरात गोठा आढळणार नाही. गायी बैलावर फार गहिवरून कोणी बोलू लागला तर त्याला फक्त इतकेच विचारावे की तुझ्या घरात आत्ता जनावरं आहेत का? फार पैसा आला तर तू गाडी घेतोस, घराला दुसरा मजला बांधतोस, पोराला महागडा मोबाईल घेवून देतोस मग जास्तीचा प्लॉट घेवून त्यावर गोठा बांधून गायी बैल का नाही सांभाळत? खरं कारण म्हणजे आता गायी बैल पाळणं सांभाळणं हा आतबट्ट्याचा व्यवहार कोणालाच नको आहे. पण तसं कोणी कबुल करत नाही. आपल्या संस्कृतीत एक विकृती आहे. ज्यावर अन्याय करायचा, ज्याला दुय्यम स्थान द्यायचं त्याचा वरवर अवास्तव वाटावा असा गौरव आम्ही करतो. स्त्रीयांना दुय्यम मानायचं आणि मातृदेवता म्हणून तिची पुजा करायची, शेतकर्‍याची शेतीची माती करायची आणि बळीराजा म्हणून त्याचं कौतुक करायचं, शहरात येवून स्थायीक व्हायचं आणि गावगाड्याची रम्य वर्णन एकमेकांना सांगायची. हे सगळं ढोंग आहे. जनावरांच्या श्रमावर आधारलेली व्यवस्था कधीच संपली आहे. यंत्रयुग आलं आहे आणि आपण त्याचा लाभ घेतो आहोत. त्या अनुषंगाने मानवाने आपली प्रगती साधली आहे. घोड्यांचे कौतुक आहे म्हणून कोणी घोडागाडी वापरत नाही. तसेच बैलाचे कौतुक आहे म्हणून त्याला नांगराला जोडणे, बैलगाडीचा वापर करणे आता शक्य नाही. ते त्रासदायक ठरतं आहे. अगदी जवळच्या गावाला जायलाही आता छोट्या गाड्यांचा वापर होतो बैलगाडीचा नाही.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो 
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो 

हे फक्त लहानमुलांच्या कवितेतच उरलं आहे. 
ज्यांना म्हणून वृषभ संस्कृतीचे गोडवे गायचे असतील त्यांच्या घरातील स्वयंचालित गाड्यांची संख्या आधी मोजून घ्या. हे ढोंग आपण आता सोडून दिलं पाहिजे. पुजेत इतके सारे देव आपण पुजतो त्याप्रमाणे आता एक बैलाचीही मुर्ती करून पुजूत. ऋषी पंचमी हा सण म्हणजे बैलाचा शेतीत वापर झाला त्याच्या आधीच्या काळातील सण आहे. आपण तो आजतागायत साजरा करतो आहोत.  या दिवशी बैलाच्या श्रमाने पिकवलेले धान्य खात नाहीत. तसे आता वर्षातून एक दिवस तरी बैलाच्या श्रमाचे खायचा सण साजरा करावा लागेल. तो सण आपण कृषी पंचमी किंवा वृषभ पंचमी म्हणून साजरा करू. बाकी बैलाचे जास्तीचे गोडवे गायची काही गरज नाही  (हे वाचून कोणा बैलप्रेमी मानवाच्या भावना दुखावल्या तर मी क्षमा मागतो. बैलाच्या भावना दुखावणार नाहीत उलट त्यांना आनंदच होईल याची मला खात्री आहे !!) 
             
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575