Tuesday, March 11, 2014

मराठी-हिंदी साहित्यातील ‘पाटील’की

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 मार्च 2014


ज्येष्ठ मराठी साहित्यीक डॉ. चंद्रकान्त पाटील यांना मराठवाडा साहित्य परिषदेने आपला सर्वोच्च सन्मान ‘‘जीवनगौरव’’ देऊन गौरविले. प्रा.निशिकांत ठकार यांनी हा सन्मान करताना ‘‘सेतू चंद्रकान्त पाटील’’ असा त्यांचा उल्लेख केला. आपल्या एका शब्दातूनच ठकारांनी पाटीलसरांचे नेमके वैशिष्ट्य सांगितले.
सारा भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे असं आपण म्हणतो; पण आपल्या शेजारच्या राज्यात काय लिहिलं जातंय याची आपल्याला खबर नसते. मराठीमध्ये इंग्रजीतून मोठ्या प्रमाणात साहित्य अनुवादित झाले; पण त्याच्या दसपटही इतर भारतीय भाषांमधून आले नाही. जे आले त्यातही परत अडचण म्हणजे विविध भारतीय भाषांमधून आधी सर्व साहित्य इंग्रजीमध्ये येणार. मग इंग्रजीतून मराठीत किंवा इतर भारतीय भाषांमध्ये जाणार. ही एक मोठीच त्रुटी आहे. खरं तर दोन भारतीय भाषा चांगल्या जाणून त्यातील साहित्य दोन्ही दिशांनी अनुवादित होण्याची गरज आहे. अशा वेळी मराठी-हिंदी हा सेतू चंद्रकान्त पाटील यांनी बांधला. म्हणून त्यांच्या गौरवार्थ इतर बाबींवर बोलत असताना ठकार सरांनी या कामाचा आवर्जून उल्लेख केला.
स्वत: एक अव्वल दर्जाचे कवी असताना, समीक्षेची चिकित्सक दृष्टी असताना अनुवादासारख्या ‘हमाल्या’ सरांनी केल्या हे महत्त्वाचे आहे. अन्यथा हे आपले काम नाही म्हणत मोठमोठे साहित्यिक जबाबदारी झटकताना आढळतात. खरं तर ‘चंदू म्हणे उरलो फक्त अनुवादापुरता’ अशी त्यांची टिंगलही झाली; पण सरांनी हिंदीपुरतंच स्वत:ला मर्यादित न ठेवता जागतिक कविता इंग्रजीतून समजून घेत ‘कवितान्तरण’ नावाचा सव्वापाचशे पानाचा भलामोठा ग्रंथच सिद्ध केला.  भारतासह जगभरातल्या 29 देशातील शंभर कवींच्या चारशे कविता मराठीत अनुवादित केल्या. या अनुवादाची दखल घेत साहित्य अकादमीने या ग्रंथाला पुरस्कार प्रदान केला. सरांची टिंगल करणार्‍यांची दातखिळीच बसली. अनुवाद करताना सरांनी नोंदविलेली निरीक्षणेही मोठी विलक्षण आहेत. ‘ज्या प्रदेशातील सामाजिक-सांस्कृतिक विकास तुलनेने कमी, तिथल्या समकालीन स्त्रीकवितेत विद्रोहाची तीव्रता अधिक असल्याचे जाणवते.’ किंवा ‘जगभरच पुरुषांची कविता भावनिकतेकडून बौद्धिकतेकडे प्रवास करताना दिसते. याउलट स्त्रीकवितेला अजूनही हा प्रवास पारखाच आहे.’ अशा नेमक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सरांनी नोंदवल्या आहेत. ‘अनुवाद म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आवश्यक अशी तडजोड’ म्हणत सरांनी त्यांच्यावरील टीकेला सडेतोड उत्तर देऊन ठेवले आहे.
अनुवादाच्या बाबतीतही आपल्याकडे सहसा इतर भाषांमधून मराठी असाच ‘वन वे’ प्रवास आढळतो; पण सरांनी ‘सूरज के वंशधर’ या नावाने 21 दलित कवींच्या 50 कवितांचे हिंदी अनुवाद करून पुस्तक सिद्ध केले. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या इंग्रजी पुस्तकाचा तसेच गो.पु.देशपांडे यांच्या दोन नाटकांचा हिंदी अनुवाद केला. शिवाय कित्येक मराठी कवितांचे हिंदी अनुवाद केले. यामुळेही मराठी कविता हिंदी आणि मग त्या माध्यमातून इंग्रजीत पोहोचली.
समकालीन तसेच नंतरच्या पिढीच्या लेखकांसाठी अपार कष्ट सोसून त्यांच्या वाङ्मयाची योग्य दखल घेण्याचे महत्त्वाचे आणि वेगळे कामही सरांनी मोठ्या निष्ठेने पार पाडले. ना.धों.महानोर यांच्या कवितांचा नीट क्रम लावून, पुस्तकाची सगळी आखणी करून ते पॉप्युलरच्या भटकळांकडे पोहचविण्याचा तरुणपणीचा सरांचा उत्साह अगदी आजही ट़िकून आहे. म्हणूनच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार पटकाविणारा रवी कोरडे असो की शासनाचा पुरस्कार मिळवणारा अभय दाणी असो, यांच्या कवितांसाठीही तीच मेहनत सर आजही घेताना दिसतात.
लघु अनियतकालिकांची चळवळ मोठ्या निष्ठेने समकालीन मित्रांसोबत सरांनी चालविली. चळवळ चालवताना हळूहळू माणसं प्रस्थापित होत जातात. श्री.पु.भागवत यांनी मोठं बोलकं निरीक्षण नोंदवलं होतं, ‘‘सत्यकथेची होळी करणारे हळूच मागच्या दाराने आपली कविता आमच्याकडे पाठवायचे.’’  सर याला अपवाद राहिले. लघु अनियतकालिकांची चळवळ चालविताना अलगदपणे ‘भागवत संप्रदायात’ शिरण्याचा दुट्टपीपणा त्यांनी केला नाही . त्यांनी आपली पुस्तके पॉप्युलर नंतर इतर अगदी नवख्या प्रकाशकांनाही दिली.
मराठी-हिंदी नियतकालिके/अनियतकालिके ,वर्तमानपत्रांच्या वाङ्मयीन पुरवण्या यांची बाळंतपणं सरांनी मोठ्या उत्साहानं केली. प्रकाश घोडकेच्या कवितेत एक ओळ आहे, ‘येणा काळजाला गेल्या कशा पांगल्या सुईणी’. पाटील सरांच्या बाबतीत उलट घडलं आहे. या नियतकालिकांना विशेष अंकाच्या ‘येणा’ सुरू झाल्या, की सगळ्यांना सरांसारख्या सुईणीची आठवण येते. अशा वेळी हक्काची मोठी माणसे पांगतात; पण सर मात्र मदतीला धावून येतात असाच सगळ्यांचा अनुभव आहे.
सरांचे वाचन हे एक स्वतंत्र प्रकरण होईल. ‘विषयांतर’ या त्यांच्या पुस्तकात स्वत:च्या वाचनावर दीर्घ लेख आहे. ‘‘मानवी सभ्यतेच्या इतिहासात वाचन ही गोष्ट बरीच उशिरा आली आणि मानवाच्या बौद्धिक विकासातला तो टप्पा झाल्यामुळे वाचन ही सांस्कृतिक प्रक्रिया झाली. त्यामुळे वाचन हे बौद्धिक उन्नयनाशी जोडता आलंच पाहिजे, असं मला वाटतं.’’ अशा स्पष्ट शब्दांत सरांनी आपली भूमिका मांडली आहे.
निशिकांत ठकारांनी म्हटलं त्याप्रमाणे हिंदी-मराठी असा सेतू बांधण्याचे काम सरांनी केलं हे खरं आहे; पण त्याहीपेक्षा जास्त लेखक-वाचक-साहित्य संस्था-नियतकालिके या सगळ्यांना जोडणारे सेतू ते बांधत राहिले. एक सर्जनशील कवी म्हणून त्यांनी आपल्या कवितेत लिहून ठेवलंय

अंगभूत आकार टाकून
आखडून बसणारी अक्षरं नकोत
अनुभवाचं ओलेपण न चिकटताच
उमटलेले शब्द नकोत
आतलं आत बाहेरचं बाहेर
मधोमध पहारा देणारी भाषा नकोय
आजूबाजूचा उजेड ओरबाडून
काळवंडलेली कविता नकोय
असण्यात फसून नसणं नाकारणारं
अनाठायी जगणं नकोय

चांगलं साहित्य टिकावं यासाठी विविध मार्गांनी सरांनी धडपड केली, सेतू बांधले, ही फार मोठी गोष्ट आहे; पण हे सगळं होताना स्वत:ला प्रस्थापित करणं त्यांनी नाकारलं. त्यांच्या आवडत्या चंद्रकांत देवतालेंच्या भाषेत सांगायचं तर...

जो रास्ता भुलेगा
मै उसे भटकावों वाले रास्ते ले जाऊँगा


जो रास्ता नही भुलते
उनमें मेरी कोई दिलचस्पी नही

मराठी साहित्यातील प्रस्थापित रस्ते सरांनी नाकारले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी लेखन, वाचनाचे संस्थात्मक कामाचे ‘भटकाव वाले’ रस्ते दाखवून दिले. वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या सरांनी वनस्पतींच्या पेशींसोबतच वाङ्मयीन पेशींचा सुक्ष्म अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा, प्रतिभेचा गौरव मराठवाडा साहित्य परिषदेने ‘‘जीवनगौरव’’ देऊन केला हे अतिशय योग्य झाले.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, March 4, 2014

मराठी भाषा दिन तुपाशी । मराठी ग्रंथालये उपाशी

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 मार्च 2014


मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रजांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार या दिवशी मुंबईमध्ये वितरीत करण्यात आले.  सगळ्यांनी मराठीचे गोडवे गायले. हे एक बरं असतं एखादा दिवस शोधून काढायचा आणि तेवढ्या दिवसापुरतं ‘‘मराठी मराठी’’ करायचं. बाकी मग ‘मराठीच्या पाठीत घाला काठी’.
मराठी दिनाचा समारंभ साजरा होताना मराठी पुस्तकांची काय अवस्था आहे? ही पुस्तके बारा हजार ग्रंथालये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील वचकांपर्यंत नेतात त्यांची काय अवस्था आहे? अतिशय किरकोळ कारणे सांगून पाच हजार ग्रंथालयांचे अनुदान शासनाने रोकून ठेवले आहे. दहा हजार कर्मचार्‍यांचे पगार थांबले आहेत. पटपडताळणी महसुल विभागाने केली. त्यांना या विषयाची काही फारशी माहिती नाही. त्यांनी जी ग्रंथालये बंद करा अशी शिफारस केली त्यांच्याबद्दल कोणी आक्षेप घेणार नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण जी ग्रंथालये एक दोन नाही तर शंभर शंभर वर्षे झाली चालु आहेत. त्यांच्यावर किरकोळ चुका दाखवत कारवाईचा दंडा का उगारला गेला?
माजी आमदार गंगाधर पटणे यांनी मुंबईला उपोषण केलं. राष्ट्रवादीचे राजेश टोपे हे या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी पाच फेब्रुवारी रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवून प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले व पटणे यांना उपोषण सोडावे लागले. पटणे पडले परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते. आमदार राहिले तरी त्यांना राजकीय कावा कुठून कळणार. आज महिना उलटून गेला पण कुठेच काही हालचाल झाली नाही. आता सगळ्यांच्या पायात निवडणुकांची घुंगरं वाजायला लागली. त्यात ग्रंथालय चळवळीचा क्षीण आवाज ऐकू येणार कसा.
महाराष्ट्रात बारा हजार सार्वजनिक ग्रंथालये आहेत. वीस पंचेवीस वर्षापुर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की गावोगावचे ग्रंथप्रेमी निष्ठेने पदरमोड करून ग्रंथालये चालवायचे. बघता बघता ग्रंथालयांची मान्यता हा राजकीय चळवळीत कार्यकर्ता जगविण्याचा एक मार्ग झाला आणि चळवळीची पुरती वाट लागली. जे लोक निष्ठेने हे काम करत होते ते बाजूला राहिले. आज राजकीय वजन वापरून आपले वाचनालय सोडवून घेण्यात बरेचसे राजकीय कार्यकर्ते यशस्वी ठरले. आणि निष्ठेने काम करणार्‍या कित्येक वर्षांची परंपरा असलेल्या ग्रंथालयांवर मात्र कारवाईची कुर्‍हाड कोसळली.
आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की शासनाची स्वत:ची म्हणजेच जिल्हा ग्रंथालये, नगर पालिका, महानगर पालिका यांची ग्रंथालये आहेत. त्यांच्या कर्मचार्‍यांना शासकीय नियमाप्रमाणे व्यवस्थित पगार मिळतो. या ग्रंथालयात ग्रंथ खरेदी होत नाही. कारण काय तर सगळा पैसा पगारात आणि आस्थापनेच्या इतर बाबींवरच खर्च होऊन जातो. या ग्रंथालयातील वाचन कक्ष शासकीय वेळेप्रमाणे म्हणजे दहा ते पाच चालू असतो. शिवाय सुट्ट्यांच्या काळात तो बंदच असतो. शासकीय ग्रंथपालाचा किमान पगार छत्तीस हजार आहे. याच्या नेमके उलट सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती आहे. येथील वाचन कक्ष जास्तीत जास्त काळ चालू ठेवला जातो. मुलांना हवं ते पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथपालाला झटावे लागते. सर्वात मोठ्या जिल्हा ‘अ’ वर्ग ग्रंथालयाच्या ग्रंथपालाला दहा हजार मानधन (पगार नाही) मिळते. म्हणजे शासकीय ग्रंथपालाच्या एक चतुर्थांश पगार घेवून हा ग्रंथपाल त्याच्या कित्येकपट काम करतो. आपल्याकडे एक म्हण आहे ‘‘सतीच्या घरी बत्ती आणि शिंदळीच्या दारी हत्ती ’’ अशीच ही स्थिती आहे.
शासकीय ग्रंथालयांमध्ये वाचन कक्ष लावयचा असेल तर राजपत्रित अधिकार्‍याची सही लागते, शिवाय हवे ते पुस्तक मिळत नाही. या सगळ्यातून त्रस्त झालेला सामान्य माणुस आपल्या मुलाला सार्वजनिक ग्रंथालयांकडे पाठवितो. आश्चर्य म्हणजे शासकीय कर्मचार्‍यांची मुलंही अभ्यासासाठी शासकीय ग्रंथालयात जात नाहीत. ती येतात परत याच सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये.
शासनाने सामान्य लोकांसाठी शाळा काढल्या, दवाखाने उभारले, वाहतुकीची व्यवस्था केली, सहित्य संस्कृती मंडळ काढले, वाचनालयांना अनुदान द्यायला सुरवात केली. आज या सगळ्याची काय परिस्थिती आहे? जगदिश भगवती सारख्या अर्थतज्ज्ञांने असा आरोप केला होता की ‘‘गरीबांसाठी चालविल्या गेलेल्या सुविधा या कालांतराने गरीब सुविधा बनतात.’’ आज शासनाने इतर गोष्टींसारखीच सार्वजनिक ग्रंथालयांचीही स्थिती अशीच करून ठेवली आहे.
आज हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सार्वजनिक ग्रंथायाच्या पाठीशी सामान्य जनता उभी राहणार आहे का? हा प्रश्न सोडविण्याची राज्यकर्त्यांची मुळीच इच्छा नाही हे तर स्पष्ट आहे. फक्त देखावा करण्यात सरकारला रस आहे. एकीकडे वाङ्मयीन पुरस्काराची रक्कम वाढवायची. दुसरीकडे 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचा. प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथ महोत्सव भरवायचा. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत वेगळा ग्रंथ महोत्सव भरवायचा. आणि हे सगळं चालु असताना सार्वजनिक ग्रंथालये मात्र अनुदानाअभावी उपाशी ठेवायची.
अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. की एक शेळी महिनाभर सांभाळायची. पण अट अशी की तीचे वजन वाढले नाही पाहिजे. शिवाय कमीही झाले नाही पाहिजे. मग नेहमीप्रमाणे बिरबल युक्तिने ते घडवून आणतो. तो काय करतो तर शेळीला भरपुर खाऊपिऊ घालतो पण तिच्या समोर वाघाचे चित्र टांगून ठेवतो. परिणामी तिचे वजन वाढतही नाही किंवा कमीही होत नाही.
सार्वजनिक ग्रंथालयाबाबत शासनाने बिरबलाची युक्ति केली आहे. पण त्यात एक साधी माणुसकीही दाखविण्यास शासन विसरले. वाघाचे चित्र समोर ठेवले तरी बिरबलाने शेळीला चारा घातला होता. इथे नियमांचे उग्र चित्र नसून प्रत्यक्ष कृतीच आहे.  शिवाय ग्रंथालयांचे अनुदानही बंद करून टाकले आहे. म्हणजे उपासमारी व समोर प्रत्यक्ष वाघ-मग शेळी हमखास मरणारच.
ग्रंथालय टिकावीत ही तळमळ सर्वांना वाटली तरच ती टिकतील. काही मोजक्या कार्यकर्त्यांनी धडपड केली म्हणजे पुरेसे आहे असे नाही. पूर्वी मराठी शाळांमध्ये ग्रंथालय असायचे. शाळांचे वेतनोत्तर अनुदान बंद झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा या शालेय ग्रंथालयांना घरघर लागली. आज तर महाराष्ट्रातील कुठल्याही माध्यमिक शाळेत जा. त्यांच्या ग्रंथालयात जुनीपुराणी पुस्तके आढळतील. कारण नवीन पुस्तके घ्यायला पैसाच नाही. शालेय ग्रंथालय चळवळ शासनाने पुर्णपणे मारून टाकली. महाविद्यालयातील ग्रंथालये एकेकाळी ललित-वैचारिक साहित्याने समृद्ध होती. पण विद्यापीठ पातळीवरच्या राजकारणाने अभ्यासक्रम सतत बदलत राहतो. मग ग्रंथालयांचा पैसा अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यातच खर्च होतो. परिणामी त्यांच्याकडेही ललित-वैचारिक साहित्याच्या खरेदीला निधी उरत नाही. म्हणजे हाही मार्ग गेल्या काही वर्षांत बंद झाला आहे.
सार्वजनिक ग्रंथायांमधुन ललित- वैचारिक साहित्याची भुक काही प्रमाणात भागविली जात आहे. आणि आज शासन या ग्रंथालयांची उपेक्षा करते आहे. हागणदारी मुक्त महाराष्ट्र लवकरच ग्रंथमुक्त महाराष्ट्र होईल असे प्रयत्न शासनाचे चालू आहेत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, February 25, 2014

गाव बुद्रुक चिचोंडी । ग्रंथ ज्याच्या त्याच्या तोंडी ।

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 25 फेब्रुवारी 2014

एका खेड्यात तिशीच्या आतबाहेरचे काही तरुण गोळा होतात. त्यांना वाटते की आपल्या हातात कांद्याचे किंवा इतर पिकांचे जे थोडेफार रोख पैसे आले आहेत त्यातून व्यावहारिक बाबींशिवाय अजून काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. सप्ते तर कुणीही घालतं. आपल्या गावासाठी आपल्याला वेगळं असं काय करता येईल? मग वाचनालयाची कल्पना पुढे येते. साने गुरूजींच्या नावानं एक वाचनालय सुरू करण्यात येतं. त्यासाठी जागा कोण देणार? एक पडकी जागा मिळते. मग हे तरुण स्वत: तिथे  बांधकाम करतात आणि वाचनालय सुरू होतं. ही काही कोण्या चित्रपटाची कथा नाही. नाशिक जिल्ह्यातील, पैठणीसाठी आणि छगन भुजबळांसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक गावाची ही कथा आहे.
या गावातील साने गुरुजी वाचनालयाने नुकतेच नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन घेतले. ज्या गावाची लोकसंख्याच जिथे जेमतेम दोन हजार आहे तिथे तीन हजार लोक ग्रंथालय संघाच्या अधिवेशनासाठी जमा होतात हा एक खरंच चमत्कार होता.
सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात सांप्रदायिक पद्धतीनं वारकरी मंडळी अभंग गात होती. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा अभंग आळवत असताना माझ्या मनात मात्र वेगळेच शब्द उमटत होते. मला वाटत होते की हे वारकरी गात आहेत ते शब्द ‘सुंदर ते ध्यान । बैसे खुर्चीवरी । ग्रंथ हातावरी । घेवुनिया ॥ असे आहेत की काय. दिंडीत सहभागी शाळकरी मुलांचा उत्साह कमालीचा दांडगा होता. एरवी असे वाटू शकते की ही ग्रंथ दिंडी मुलांना सक्तीची केल्यामुळे मुलं आली असतील. मी मुलांना विचारले तेव्हा कळलं की ही सगळी मुलं स्वेच्छेनं आणि पुस्तकांवरच्या प्रेमापोटी आपणहून दिंडीत सहभागी झाली होती. गावातील आया बायांनी आपापल्या घरासमोर शेणाचा सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. एखाद्या सणासाठी तयार करावं तसं आया आपल्या लेकरांना न्हाऊ माखू घालून तयार करत होत्या. माणसे गावातून बाहेर निघून गेलेली, शेतावर राहायला गेलेली, शहरात परागंदा झालेली. त्यामुळे गावातील घरे रिकामी, त्यांना कुलूपं, वाडे पडलेले. पण आज उत्साहानं शक्य होईल ती घरं उघडली गेली होती. साफसफाई झाली होती. कारण काय तर वाचनाचा उत्सव लोकांना साजरा करायचा होता.
ग्रंथालय संघाच्या या अधिवेशनात विविध सत्कार करण्यात आले, त्यात दोन सत्कार मोठे विलक्षण होते. प्रदीप पाटील  या ग्रंथपालाचा सत्कार करण्यात आला. या मुलाने साने गुरुजी वाचनालयाची धुरा तर सांभाळली आहेच. पण संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या ग्रंथपालन परीक्षेत याला पहिला क्रमांक मिळाला. सर्वांच्याच चेहर्‍यावर या तरुण मुलासाठी कौतुक झळकत होते. दुसरा सत्कार होता दिंडोरीच्या ऐंशी वर्षे वयाच्या वृद्ध रतनबाई पारिख यांचा. वयाच्या 14 व्या वर्षीच वैधव्य प्राप्त झालेल्या या बालविधवेने उर्वरित आयुष्यात पुस्तकांशीच संसार मांडला आणि त्या अर्थाने तो यशस्वी करून दाखवला. या महिलेला मंचावर चढणेच शक्य नव्हते. मग पाहुण्यांनीच खाली उतरून त्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्रातील ग्रंथालयाची चळवळ ही तळमळीच्या कार्यकर्त्यांनी वाढविली/जोपासली आहे. ज्यावेळी अनुदानही मिळत नसायचं अशावेळी गावोगावी निष्ठावान लोकांनी पदरमोड करून या संस्था स्थापन केल्या. मधल्या काळात सर्वांना असे वाटत होते की आता वाचनाचे काही खरे नाही. लोकांना मुळीच वाचायचे नाही. पण चिचोंडीसारख्या गावानं वाचनाचे महत्त्व ओळखले आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी तरुण पिढी सज्ज आहे हेही सिद्ध करून दाखवले.
 येवल्याला एक संपन्न साहित्यिक वातावरण आहे. गो.तु.पाटील यांच्या सारख्यांनी हे वातावरण जपलं आहे. अनुष्टुभ सारखं नियतकालिक इथून निघतं हे एक मोठं योगदान मराठी वाङ्मयविश्वात आहे. भाऊसाहेब गमेंसारखे तरुण कार्यकर्ते आता ‘अनुष्टुभची’ धुरा सांभाळत आहेत. आमच्या शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष कै. मोहन गुंजाळ यांच्यामुळे माझा येवल्याशी पहिला संबंध आला. अर्जुन कोकाटेंसारखे ज्येष्ठ पत्रकार,बाबासाहेब शिंदे, गोरख खराटे, शिवाजी निमसे सारखे तरुण धडपडत आहेत म्हणून या संस्था बाळसे धरत आहेत. प्रमोद पाटीलसारख्या तरुण पत्रकाराने पुढाकार घेऊन हे अधिवेशन आणि एकूणच सांस्कृतिक वातावरण जोपासण्याचे मोठे काम या परिसरात केले आहे.
ग्रंथालय संघाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्या मोठ्या तळमळीनं या अधिवेशनात मांडल्या. ‘गाव तेथे ग्रंथालय’ अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती. आज महाराष्ट्राच्या स्थापनेला पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. पुरोगामी म्हणविल्या गेलेल्या महाराष्ट्रात चाळीस हजार खेड्यांपैकी जेमतेम दहा हजार खेड्यातच वाचनालयं स्थापन करता आली आहेत. जी वाचनायं चालू आहेत त्यांच्या पायातही विविध नियमांच्या बेड्या अडकवून त्यांना काम करणं अशक्य करून टाकलं आहे. अनुदानाची बोंब आहे. इकडे शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायचं आणि जिथे बहुजन समाज मोठ्या संख्येनं राहतो त्या खेड्यापाड्यांतून वाचन संस्कृतीची पूर्ण राखरांगोळी करायची असंच धोरण या महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या पोटी जन्मलेल्या राज्यकर्त्यांनी अवलंबले आहे असं दिसतं आहे.
चिचोंडीसारख्या दोन हजार वस्तीच्या गावानं वाचनसंस्कृतीसाठी जी धडपड केली त्याची यथार्थता लहान पोरांच्या डोळ्यात दिसत होती. इंद्रजित भालेराव यांचा ग्रंथावरचा अभंग मंडपात उच्चारताच लहान मुलांनी
हात जोडले. तो अभंग असा होता

ग्रंथ माझे गुरू । ग्रंथ मायबाप
निवविती ताप । हृदयाचे ॥
ग्रंथ माझे सखे। जीवन सांगाती ।
आयुष्या ये गती । ग्रंथामुळे ॥
ज्ञानेश तुकोबा । फुले बाबासाब ।
ग्रंथातून आज । भेट देती ॥
ग्रंथांनी ठेविली । संस्कृती जिवंत ।
म्हणुनीच ग्रंथ । नित्य घ्यावे ॥
ग्रंथ खरिदावे । ग्रंथ उरी घ्यावे ।
ग्रंथ भेट द्यावे । वेळोवेळी ॥
घरात असावे । ग्रंथांचे कपाट ।
देवा जसा पाट । देव्हार्‍यात ॥
ग्रंथ ज्याचा जीव । ग्रंथ ज्याचा श्वास ।
त्याच्या आसपास । देव राहे ॥

चिचोंडीहून येताना रस्त्यात कोटमगावला देवीचे दर्शन घेतले पण देवत्वाचा भास मला चिचोंडीच्या परिसरातच लहान मुलांच्या आणि तरुणांच्या सहवासात झाला. 
 येवला येथे नामदार छगन भुजबळ यांचे कार्यालय असलेल्या विंचुर रोडपासून डावीकडे वळले की चिचोंडीला जाणारी वाट सापडते आणि खरंच भुजबळ साहेबांचा रस्ता सोडून दुसरीकडे वळल्याशिवाय वाचन संस्कृती जोपासणारे चिचोंडीसारखे गाव सापडणारही नाही.     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Thursday, February 20, 2014

माध्यमांनी केले भाषेचे वाट्टोळे

मासिक "लोकराज्य" फेब्रुवारी २०१४  मधील लेख

मराठी भाषेची मोठ्या प्रमाणात मोडतोड माध्यमांतून केली जाते असा आरोप केला तर काही जणांना आश्चर्य वाटेल. ज्यांनी भाषा सांभाळायची तेच कसे काय भाषेचे नुकसान करणार? म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले असं होणार नाही का? पण हे खरे आहे. याचे साधे सरळ कारण म्हणजे माध्यमांना म्हणजे वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यांना भाषेचे जे बलस्थान आहे तेच उमगत नाही. ज्यांना भाषेचे सामर्थ्य कळत होते ते लोक सध्या माध्यमांतून हद्दपार झाले आहेत.
बातमीचे जाऊ द्या पण जिथे प्रचंड पैसा ओतला जातो त्या जाहिरातींमधील वाक्य पहा, ‘‘माझ्या यशात सर्वांच्या वाटा...’’ वर्तमानपत्राच्या  पूर्ण पान रंगीत जाहिराती मध्ये  असलेले  हे वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो? 'सगळ्यांच्या वाटा' म्हणजे रस्ते माझ्या यशात आहेत. मी तसे संपादकाला विचारले की हे कसे? त्याला काहीच सांगता येईना. सुदैवाने त्याला चुक काय झाली ते कळाले होते. "माझ्या यशात सर्वांचा वाटा" असं हे वाक्य हवं होतं. यामुळे वाटा याचा अर्थ रस्ता असा नसून हिस्सा असा होतो. व्याकरणाची ही मोडतोड कशामुळे? आणि असं केल्याने काम सोपं होणार आहे का अवघड होणार आहे?
दुसरा विषय नेहमी चर्चेचा असतो आणि तो म्हणजे दुसर्‍या भाषेतील शब्द वापरायचे नाहीत का? आणि वापरले तर काय होते. आपल्या भाषेत पुरेसे शब्द नसतील तर दुसर्‍या भाषेतील शब्द जरूर वापरले पाहिजेत. किंवा आपल्या भाषेतील शब्द सोपे नसतील तरी दुसर्‍या भाषेतील सोपे शब्द वापरले पाहिजेत. खरं तर लोक असेच शब्द वापरत असतात. पण असे शब्द वापरण्याने जर आशयच बदलत असेल तर ते कसे काय वापरता येतील? एक साधा शब्द आहे ‘व्यस्त’. हा शब्द हिंदी मध्ये कामात व्यग्र असण्यासाठी वापरला जातो. मराठीत त्याचा अर्थ सम च्या विरूद्ध असा तो व्यस्त असा आहे. म्हणजे ‘मी कामात फार व्यस्त आहे’ असा उपयोग मराठीत करता येत नाही. पण असाच उपयोग वर्तमानपत्रात हमखास केला जातो. आता याला काय म्हणणार? काही वेळा दुसर्‍या भाषेतला शब्द योग्य वापरला जातो पण त्याचे व्याकरण मात्र त्याच भाषेतले ठेवले तर पंचाईत होते. मध्ये एका वाहिनीवर "त्याचा लाईफ अतिशय धावपळीचा बनला आहे" असे वाक्य निवेदिकेने वापरले. आता अडचण अशी आहे की जीवनला लाईफ हा शब्द तूम्ही वापरा पण त्याचे व्याकरण बदलण्याचे काय कारण? म्हणजे हे वाक्य ‘त्याचे लाईफ अतिशय धावपळीचे बनले आहे’ असे होईल.
एका भाषेत दुसर्‍या भाषेतून शब्द येतच असतात. शिवाय काही न वापरातले शब्द बादही होत जातात. पण भाषेचे म्हणून जे व्याकरण असते ते बदलत नाही. भाषेची खरी ओळख ही त्या भाषेचे व्याकरण असते. त्या भाषेतील शब्दालंकार, म्हणी, वाक्प्रचार यातून भाषा समृद्ध होते. त्यावर आघात घातला तर कसे होणार?
एक नेहमी वाद घातला जातो की बहुजन समाजाची भाषा दुय्यम समजली जाते. तीचा अपमान केला जातो. अशी भाषा आम्ही वापरली तर काय बिघडले? खरं तर बहुजन समाज भाषेचा अतिशय सुक्ष्म आणि चांगला वापर करत असतो. विशेषत: बायका तर भाषेचा वापर अप्रतिम करतात. यात कुठेही व्याकरणाची मोडतोड केलेली नसते. उलट बहुजन समाजाने आणि तथाकथित खालच्या समजल्या जाणार्‍या जातींनी आणि त्यातही परत स्त्रीयांनी भाषा अतिशय समृद्ध केली आहे. हे समजून न घेता आजची माध्यमे ओरड करतात. ते जी मोडतोड आज करत आहेत त्याचा बहुजन समाजाच्या भाषेशी काहीही संबंध नाही. माध्यमांमधली भाषेची मोडतोड ही त्यांच्या अज्ञानातून आळसातून विचार न करण्याचे वृत्तीतून आली आहे. त्यांना भाषा समजून घ्यायची नाही.
जात्यावर ओव्या म्हणताना भाषेची, कलेची अप्रतिम जाण बायकांनी व्यक्त केली आहे. शिवाय त्यात काव्यही ठासून भरलेले आहे. हे सगळे बहुजन समाजातील बायकांनी केले आहे हे विशेष- 
दाण्याच्या जोडीने जीण्याचा रगडा । 
गाण्याच्या ओढीने तूला ओढीते दगडा ॥ 
आता अशी संपृक्त भाषा आज माध्यमं वापरतात का? स्त्री जन्माचे दु:ख जनाबाईने आपल्या अभंगातून मांडले आहे. याच जनाबाईच्या काळात आणि त्याच परिसरात (गंगाखेड जि. परभणी) जात्यावरच्या ओव्यांत मांडताना ही अज्ञात बाई म्हणते,
गायीवर गोन्या लादल्या ग लमान्याने। 
सवतीवर लेक  दिली कोन्या ग बेमान्याने ॥
ही भाषेची संपृक्तता, अप्रतिम लय आजची बहुजनांसाठी म्हणवून घेणारी माध्यमं वापरतात का?
बहुजन समाज भाषेचा वापर त्यांच्या अभिव्यक्तीसाठी करतो कारण भाषा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भिंतीत वस्तू ठेवण्याच्या एकाच बाबीसाठी कोनाडा, देवळी, फडताळ अशा तिन शब्दांचा वापर केला जातो. कारण त्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत. फुलपात्र, गडु, तांब्या, पेला, चंबु, कलश, ग्लास हे इतके सगळे शब्द केवळ पाणी पिण्याच्या भांड्यासाठी आहेत. कारण त्यांचा वापर वेगवेगळा आहे.  इतकंच काय तर पुष्कळ या एकाच अर्थाचे मायंदळ, गज, ढीग, बखळ, लई, फार, मोप, बहुत, उमोप, गडगंज, सुरवाड, बंबाड, दन्ना, रेटून, ठेस, मस आणि पुष्कळ असे 16 शब्द डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी लोकभाषा व बोलीच्या अभ्यासात नोंदवले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व शब्द बहुजनांच्या वापरातले आहेत. आजची माध्यमं हे समजून घेणार आहेत का?
मराठी भाषा ही कशी विकसित होत गेली याचे सुंदर वर्णन डॉ. नांदापुरकरांनी मायबोलीची कहाणी या गद्य कवितेत केले आहे. 
धरणीमातेने साज केला. आभाळाने मांडव घातला. क्षितिजाने त्याला झालर लावली. वार्‍याने दवंडी पिटवली ‘मराठी आली’,  ‘मराठी आली’. गावच्या गावकर्‍यांना आनंद झाला. पाटलांनी चावडीवर रामराम घेतले. पांड्यांनी देशाचा पट्टा करून दिला. वेसकराने खुळखुळा वाजविला. जोशाने पत्रिका लिहीली. वाण्याने साखरपाने वाटली. जनलोक म्हणून लागला, ‘आमची मराठी आली‘, ‘आमची मराठी आली.’
नव्या मनूची पहाट झाली. नव्या दमाने दमकत आली. महाराष्ट्रीने दोरा भरला. प्राकृताची अंगी ल्याली. अपभृंशाची कुंची घाली. कानडीचे कसे केले. तेलंगीचे गोंडे लावले. संस्कृताचे बाळसे अंगावर खेळते. संस्कृतीचे वारे मनात घोळते. दिवसामासा वाढू लागली. एकेक गुण काढू लागली. लोकांचे मन ओढू लागली. पोर आता उफाड्याची दिसू लागली. सार्‍या महाराष्ट्राची हिने अंगण ओसरी केली. चहूकडे हिची फेरी होऊ लागली. देशाचे दळण दळू लागली. दळता दळता गाऊ लागली; गाता गाता कांडू लागली. वैर्‍याशी भांडण भांडू लागली.

ग्रंथिक भाषा ही संस्कृत होती. तिच्यापासून वेगळं होवून बोली भाषेत तेंव्हाचे तत्त्वज्ञान लिहीण्यास चक्रधर, संत ज्ञानेश्वर यांनी कष्ट केले. आजच्या माध्यमांचेही हेच काम आहे. उलट तेच जेंव्हा भाषेच्या बाबतीत गंभीर बनत नाहीत तेंव्हा खरी समस्या निर्माण होते. प्रस्थापित संस्कृत पंडितांची यथेच्छ टिंगल नांदापुरकरांनी उडवली आहे.

पंडितांनी मराठीचा तिरस्कार केला; पण मराठीने उलट त्यांचा सत्कार केला. तिने पंडितांचे पाणी जोखून पाहिजे. पंडितांचे घाव हसून साहिले. पंडितांच्या वर्तनावरून तिने ओळखले की वठला वासा वांकता वाकत नाही, किरणाचा दोर कातता कात नाही. पंडितांचे गाणे जुने नाणे, हाटांत काही विकत नाही, कामात काही टिकत नाही. पंडितांची वाणी मोत्याचे पाणी, पण त्याने भांडे काही भरत नाही, तहान काही हरत नाही. पंडितपोरे पिकली बोरे, पण त्यांना किड लागण्याचा संभव होता. मराठी मावली सगळ्यांची सांवली. अवघ्यांच्या सुखाची तिने सोय लावली.

मराठीला सोपे करण्याचे काम संतांनी केले. आज भाषा लोकांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम माध्यमं करीत आहेत. जोपर्यंत लेखी स्वरूपात भाषा फारशी नव्हती तोपर्यंत तिचे दोष जास्त पसरत नसत. आता जेंव्हा पासून लेखी स्वरूपात भाषा उपलब्ध होते आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी रेकॉर्डिंग करून ठेवायची मोठी सोय करून ठेवली आहे. मग आता तर उलट जबाबदारी वाढली आहे.
नविन भाषा जी मोबाईलवर विशेष: एसएमएस ची भाषा म्हणून ओळखली जाते तिचाही वापर वर्तमानपत्रांमध्ये दिसून येतो आहे. पण यातील अडचण हीच आहे की ही भाषा सार्वत्रिक आहे का? काही जणांनी वापरली म्हणून ती सगळ्यांची भाषा होत नसते. शिवाय नविन शब्दांनाही काही एक नियम असावेच लागतात. त्यालाही व्याकरणात बसवावेच लागते. पण हे करताना कोणी दिसत नाही.
व्याकरणाचे नियम सगळ्यांना डोकेदुखी वाटते. खरं तर हे नियम सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणूनच करण्यात आले आहेत. भाषेचा वापर सोपा व्हावा, सर्वांना सारखा समजून यावा यासाठी हे नियम करण्यात आले. आणि म्हणूनच ते आचरणातही येत गेले. माध्यमांमध्ये नेहमीच आवाज उठतो की हे नियम आम्ही पाळणार नाही. मग  दुसरा प्रश्न असा आपोआपच निर्माण होतो की मग तूम्ही भाषा जी काही वापरणार आहात ती इतरांना नाही समजली तर काय करणार? एकीकडे जागतिकीकरणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरीकडे भाषेच्या बाबतीत मात्र संकुचित होत जायचे हे मोठे विचित्र आहे.
भाषा, व्याकरण तिचे नियम आणि मग त्या विरूद्ध बंडखोरी हे सगळे कशामुळे होते? याचे साधे कारण म्हणजे अमेरिकेत जी भाषा बोलली जाते तिने इंग्लंड मधल्या इंग्रजीविरूद्ध बंडखोरी केली. जुन्या इंग्रजीची मिजास उतरवली. हे सगळं पाहिलं की आपल्यालाही वाटायला लागलं की आपणही भाषेच्या नियमांविरूद्ध बंडखोरी करू. पण खरी गोष्ट ही आहे की इंग्लंड आणि युरोपात राजशिष्टाचाराची जी भाषा होती तिच्या विरोधात बंडखोरी करून साधी सोपी वापरायला उपयुक्त अशा बोली इंग्रजीकडे अमेरिकेतील जनतेचा कल निर्माण झाला. मराठीच्या बाबतीत उलट परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांपर्यंत कोणीच आपली राजभाषा म्हणून मराठी वापरली नव्हती. मुळात संस्कृत, फारसी , उर्दू आणि शेवटी इंग्रजी अशा राजभाषांना तोंड देत देतच आमची मराठी वाढली.
मराठ्यांचा भाला सरळ घुसतो । मराठीचा बोल सरळ असतो ॥ 
असे त्यामुळेच म्हटले गेले आहे. खर्‍या अर्थाने व्यापक पातळीवर 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर बेळगांव वगळता सर्व मराठी प्रदेशाची कारभाराची भाषा ही मराठी झाली. म्हणजे मुळात राजभाषांच्या विरोधातील बंड म्हणजेच मराठी. आणि आता परत तिच्याच विरूद्ध बंड करण्याची नियम न पाळण्याची आरडा ओरड करणारी भाषा कोण काढतो आहे?
माध्यमांमधील भाषेच्या वापरासंबंधी अनास्था संपली तर फार मोठी अडचण दुर होईल. नविन व्यवस्थापन शास्त्रात इतकी मोठ मोठी पदे निर्माण केली जातात, दर्जाच्या बाबतीत जागरूकता दाखवली जाते मग भाषेच्या बाबतीत दर्जा राखण्याची काळजी का नाही घेतली जात? यासाठी का नाही पदे निर्माण केली जात? माणसे नेमली जात?

Tuesday, February 18, 2014

फँड्री-रोखठोक ओवी । देते व्यवस्थेला शिवी ॥


दैनिक पुण्य- नगरी "उरूस" १८ -२-१४

जात्यावरच्या ओव्या हा मराठीतील एक मोठा लक्षणीय असा सांस्कृतिक ठेवा आहे. या  ओव्यांमधून स्त्री मनाचा हळवेपणा जसा प्रकट होतो तसा रोखठोक ठावही समोर येतो. रामाची पूजा करणारी बाई ओवीत सहज लिहून जाते

राम म्हणून राम नाही सीतेच्या तोलाचा ।
सीतामाई हिरकणी राम हलक्या दिलाचा ॥

गंगाखेडच्या परिसरात जनाबाईवर भरपूर ओव्या सापडतात. विठ्ठलाचे जनीवरचे प्रेम पाहुन रूक्मिण विठ्ठलाला थेट विचारते

रूक्मिन म्हणे देवा तुम्हा लाज थोडी ।
गादी फुलाची सोडून वाकळाची काय गोडी ॥

हा रोखठोकपणा जनाबाईने उचलला आणि आपल्या रचनांमधुन देवाला म्हणजेच व्यवस्थेला शिव्या घातल्या.

जनी म्हणे देवा मी झाले वेसवा । रिघाले केशवा घर तुझे ॥

हा रोखठोकपणा नागराज मंजुळे सारख्या तरूण दिग्दर्शकाला भावला असावा. म्हणूनच त्यानं फँड्री या आपल्या अप्रतिम चित्रपटातून व्यवस्थेला फँड्री म्हणून शिवी घातली आहे.
जब्या नावाचा सातवीतला छोटा पोरगा. त्याचा पिर्‍या म्हणून जिवलग दोस्त. ते विकत असलेल्या पेप्सी गारेगारच्या रंगीबेरंगी कांड्यासारखीच त्याची छोटी रंगीत स्वप्ने असतात. त्याची पेप्सीचा डबा असलेली सायकल ज्या मोठ्या गाडीला टेकून उभी असते ती गाडी मागे सरकते आणि याच्या पेप्सीच्या कांड्यांचा, सायकलचा चुराडा होतो. जब्याच्या छोट्याशा स्वप्नांचाही असाच चुराडा समाज करू पाहतो. जब्या सारं सहन करत जातो. पण जेंव्हा त्याच्या विधवा बहिणीला गावातील टारगट तरूण टोमणे मारतात मग मात्र जब्या भलामोठा दगड त्यांच्यावर भिरकावतो. बस्स इतकी छोटीशी या चित्रपटाची कहाणी आहे.
नागराज मंजुळेच्या चित्रपटावर भरपूर लिहिलं जाईल. या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे. याचं साधं कारण म्हणजे नागराजने मातीतला चित्रपट बनवला आहे. आपण चित्रपट पाहतो आहे असं वाटतच नाही. आपण त्या अकोळनेर गावात कॅमेर्‍याच्या पाठीमागे उभे आहोत आणि कॅमेरा नव्हे तर आपला डोळाच सारे टिपत चालला आहे. 
शाळेची वेळ झाली आहे. सगळी पोर/पोरीं अंघोळी करून गणवेश घालून शाळेत चालली आहेत आणि जब्या त्याची आई, दोन बहिणी, बाप यांच्या सोबत डुक्कर पकडण्याच्या मोहिमेवर उकिरडे धुंडाळतो आहे. एक तर प्रसंग अगदी अंगावर येतो. डुक्कर जवळ आलं आहे. त्याला पकडणार की इतक्यात शाळेत राष्ट्रगीत  सुरू होते. जब्याचा बाप, जब्याची  आई सगळेच ताठ उभे राहतात. डुक्कर आरामात त्यांच्यासमोरून निघून जाते. 
दुष्यंतकुमार या हिंदी कवीची मोठी सुंदर कविता आहे

कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए ।
मैने पुछा नाम तो बोला के हिंदुस्थान है ॥
 

खाने को कुछ नही है फटेहाल है मगर ।
झोले मे उसके पास कोई संविधान है ॥ 
 

व्यवस्थेवर इतकं अप्रतिम भाष्य आणि तेही केवळ दृश्यातून. कोणताही संवाद या ठिकाणी नाही. हे दिग्दर्शकाचे यश आहे. 
मुळात नागराज मंजुळे याने सोमनाथ अवघडे या मुलाला निवडूनच प्रेक्षकांना जिंकले आहे. या लहान मुलाने जब्याची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याची मुलाखत पाहत असताना असे जाणवले की नागराजला हा जब्या 100 % या मुलात दिसला  म्हणून त्याच्या तीन महिने मागे लागून त्याने त्याला चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले. त्याच्या दोस्ताची भूमिका सुरज पवार या मुलानेही अप्रतिम केली आहे. या मुलाने नागराजच्या ‘पिस्तुल्या’ नावाच्या माहितीपटात यापूर्वी काम केले आहे. खरं तर नागराजने स्वत:च या मुलात आपली स्वप्नं पाहिली आहेत. प्रेमात हरलेला व्यवस्थेने नाकारलेला चक्या नावाचा वाया गेलेला तरूण जब्या या मुलाच्या स्वप्नात रंग भरायचा प्रयत्न करतो. त्याला उर्जा पुरवतो हे फार कलात्मक पद्धतीने आलेलं आहे.  
देवाच्या जत्रेत पालखी मिरवताना जब्या मोठ्या उत्साहाने नाचतो आहे. त्याला चक्या खांद्यावर घेवो. जब्याची मैत्रीण शालू पाहते म्हणून जब्याला जोर चढतो. पण त्याचा बाप कचरू- जी भूमिका   किशोर कदम याने अतिशय अप्रतिम साकारली आहे- बोलावतो. नंतरचे दृश्य तर केवळ अप्रतिम. डोक्यावरची बत्ती दिसत राहते. वरतून कॅमेरा खाली खाली येतो आणि शेवटी ती बत्ती धरणारा चेहरा दिसतो. तो असतो जब्याचा. नाचणार्‍या जब्याच्या डोक्यावर बत्ती धरायचे काम येते व त्याच्या बरोबरचे मित्र त्याच्यासमोर खुन्नसने नाचतात. जब्याचे डोळे नुसते वाहत राहतात. असे कित्येक प्रसंग कुठल्याही संवादाशिवाय पडद्यावर जिवंत होतात. उदा. बाजारात वेताच्या टोपल्या विकत बसलेला जब्या शालू दिसताच एका टोपलीच्या खालीच लपतो. किंवा जत्रेत जब्याला त्याचा बाप एक शर्ट विकत घेऊन देतो आणि तो शर्ट घालून तो फिरतो. पेप्सी विकताना जब्याला व्हॅन हुसेनच्या जाहिरातीतील तरूणाच्या सरळ नाकाचा हेवा वाटतो. तो घरी आल्यावर रात्री अभ्यास करताना आपल्या नाकाला कपड्यांचा चिमटा लावतो.
चित्रपटातील व्यक्तीरेखा ओळखीच्या चेहर्‍यांना न घेता सामान्य लोकांना घेवून साकारल्यामुळे सहज आणि स्वाभाविक झाल्या आहेत. आज मराठी चित्रपटांची एक वेगळी वाट श्‍वास, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी, देऊळ, विहीर, गाभ्रीचा पाऊस, तुकाराम यांनी तयार केली आहे. हे चित्रपट काहीतरी अस्सल काहीतरी वेगळं मराठी मातीतील देऊ  पाहात आहे. 
चित्रपटात नसलेले पण  थिम म्हणून यु ट्यूबवर गाजत असेलेले गाणे अस्सल मराठी मातीतले आहे. या गाण्याला हलगी जब्याने म्हणजेच सोमनाथ अवघडे यानेच वाजविली आहे. दलित-सवर्ण असा संघर्ष साहित्यात चित्रपटात रंगविल्या जातो. पण कैकाड्यांसारख्या भटक्या जमातीची वेदना नागराजने या चित्रपटातून दाखवून दिली. 
‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ या कवितासंग्रहात नागराजने लिहून ठेवले होते-

माझ्या हाती
नसती लेखणी
तर...
तर असती छिन्नी सतार बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला

त्यावेळी कदाचित नागराजच्या हाता कॅमेरा नसेल. कारण लेखणी, छिन्नी, सतार, बासरी, कुंचला हे काहीच हाती न घेता कॅमेर्‍याच्या साहाय्याने फँड्रीमधून नागराज मंजुळेने आपल्या मनातला कोलाहल उपसलेला आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Tuesday, February 11, 2014

हैदराबादी फुलांचा मराठी सुगंध

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 फेब्रुवारी 2014 

एक 75 वर्षांची म्हातारी सायकल  रिक्शात
(हैदराबादच्या भाषेत सैकील) बसून गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर, गर्दीने ओसंडून वाहणार्‍या किराणा दुकानाच्या मालकाला शुद्ध मराठीत ‘‘जरा पोहे दाखव रे’’ म्हणत आहे. दुकानदाराचा नोकर तिच्या रिक्शाजवळ येऊन  ‘‘अम्मा ! अटकुलू मंची उंटूनदी. (अम्मा हे पोहे चांगले आहेत)’’ सांगतो आहे आणि ही पंच्चाहत्तर वर्षांची अम्मा रिक्शातच बसून, ‘‘हे नको रे! पातळ आहेत. जरा जाड दे की.’’ त्याला व्यवस्थित मराठी कळतं आणि हिलाही व्यवस्थित तेलगू कळतं. पण दोघंही बोलताहेत आपापल्याच भाषेत. हा काही काल्पनिक प्रसंग नाही.  हैदराबादच्या सुलतान बाजारसारख्या सर्वात गजबजलेल्या भागातील भर रस्त्यावरील किराणा दुकानातील खराखुरा प्रसंग आहे. दहा वर्षांपूर्वी माझ्या पंच्याहत्तर वर्षांच्या आत्याच्या बाबतीत घडलेला !  
हैदराबाद (हैदराबाद असाच शब्द आहे. ‘हैद्राबाद’नाही. हैदरअलीने आबाद केलेले म्हणून हैदराबाद) या शहराचे एक वैशिष्ट्य आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर सर्वात जास्त मराठी माणसे असलेले हे शहर. पाच लाख लोकसंख्या असेल तर त्या शहरात महानगरपालिका बनवली जाते. हैदराबादमध्ये मराठी माणसांची लोकसंख्या 9 लाख इतकी प्रचंड आहे. म्हणजे मराठी माणसांचीच एक महानगरपालिका हैदराबाद शहरात तयार करता येईल.
मुंबईवर बाहेरच्यांनी आक्रमण केलं म्हणून आक्रमक रूप धारण करत आपण पक्ष काढले, अस्मितेचे राजकारण केले, खळ्ळ खट्ट्याक केले. पण याच मराठी माणसाला हैदराबादने मोठ्या सन्मानाने आपल्यात सामावून घेतले. काचीगुडा, सुलतान बाजार, बरकतपुरा, नल्लाकुंटा, नारायणगुडा, शालीबंडा या भागात आजही मराठी माणसांची मोठमोठी घरं आहेत. बर्‍याच दुकानदारांना मराठी बर्‍यापैकी समजतं. सुलतान बाजारच्या मुख्य चौकात गजानन निमकर या मराठी माणसाचे भले मोठे कापडाचे दुकान आहे. महेश्वरी-परमेश्वरी या प्रसिद्ध सिनेमागृहाच्या चौकात सावरकरांचा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागच्या रस्त्यावर भर चौकात महाराष्ट्र मंडळाची इमारत उभी आहे. त्या रस्त्याला लोकमान्य टिळकांचे नाव आहे. टिळकांचा पुतळा कोठीच्या मुख्य चौकात आहे. याच चौकात मराठी साहित्य परिषदेची भलीमोठी तीन मजली इमारत आहे. हरिद्वार हे इडलीसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल मराठी माणसाचे आहे. अशा कितीतरी गोष्टी हैदराबादला सहज आढळतात. नुकतेच स्वामी रामानंद तीर्थांच्या पुतळ्याचेही उद्घाटन करण्यात आले. हैदराबादला मराठवाड्यातील मराठी, कर्नाटकातून आलेले मराठी आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील मराठी अशा तीन मराठी भाषिकांची मोठी सुंदर सरमिसळ झालेली आहे.
हैदराबाद शहर 1591-92 मध्ये उभारले गेले. चारमिनार ही जगप्रसिद्ध इमारत व भोवतालची वस्ती या काळातील आहे. गुलबर्ग्याच्या राजवटीत सुभेदार असलेल्या सुलतान कुली कुतुबशहाने कुतुबशाही राजवटीचा प्रारंभ केला. त्याचा मुलगा मोहंमद कुतुबशहा याला अंतर्गत कलहामुळे विजयनगरच्या हिंदू राजाचा आश्रय घ्यावा लागला. त्याच्यावर बालपणीचे सर्व संस्कार विजयनगरच्या राजवटीत झाले.  याच राजाने पुढे दखनी भाषेत आपली काव्य रचना केली. त्यात लोकभाषा आणि लोकसंस्कृतीचे मोठे लोभस दर्शन घडते. ‘गर्ज्या मिरग खुशियोंसे सिंगारे आव सकियॉं‘ (मृग गरजला, आनंदाने शृंगार करूया सख्यांनो) ही त्याची कविता मोठी सुंदर तर आहेच. पण मराठीशी नाते जोडणारी आहे. हैदराबादची म्हणून जी भाषा आहे ती उर्दू नसून ‘दखनी’ आहे. तिचे व्याकरण मराठीप्रमाणे चालते असे श्रीधरराव कुलकर्णी यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या हैदराबादची चित्तरकथा या पुस्तकात हैदराबादी संस्कृतीबद्दल मोठं सुंदर लिहून ठेवलं आहे.
हैदराबाद मुक्तिचा लढा या संस्थानातील तेलगू, कानडी आणि मराठी माणसांनी स्वामी रामानंद तीर्थ या कर्नाटकात जन्मलेल्या मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली लढला. हैदराबादचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू हे नांदेडमधील भोकरचे. पहिले शिक्षणमंत्री केशवराव कोरटकर, पहिले विधानसभा अध्यक्ष काशीनाथराव वैद्य, देवीसिंह चौहान, फुलचंद गांधी अशी कितीतरी मराठी माणसं हैदराबादच्या राजकारणात हिरीरीने पुढे होती.
केवळ इतिहासातच नाही तर आजही मराठी माणसे हैदराबादच्या संस्कृतीत मिसळून गेलेली दिसतात. सध्या हैदराबादमध्ये सर्वत्र मेट्रो रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते उखडलेले, अतिक्रमणं पाडलेली दिसत आहेत. वाहतुकीला होणार्‍या प्रचंड त्रासाला वैतागणार्‍या लोकांच्या डोळ्यात मात्र मेट्रोचे सुंदर स्वप्न चमकत आहे. हे स्वप्न साकारणारा विवेक गाडगीळ एक मराठी माणूस आहे. औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेला हा अभियंता हैदराबादच्या गळ्यात मेट्रोचा दागिना घालण्यासाठी धडपडतो आहे.
नुकतेच हैदराबादला ‘युवा कला व साहित्य संमेलन’ घेण्यात आले. ज्या शिक्षण संस्थेच्या परिसरात हे संमेलन घेण्यात आले ती ‘केशव मेमोरिअल ट्रस्ट’ ही संस्था न्यायमूर्ती केशवराव कोरटकर या मराठी माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य स्थापन करण्यात आली आहे. याच संस्थेच्या परिसरात नील गोगटे या मराठी माणसाने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे.
शाळकरी पोरं ‘मराठी बाणा’ गाण्यावर नाच करताना बघून खरंच फार आनंद होत होता. इथल्या मराठी माणसांना आपल्या मुलांनी मराठीची जोपासना करावी असं मनापासून वाटतं आणि ते त्यासाठी धडपडतात हे कौतुकास्पद आहे. या साठी पुढाकार घेणार्‍या विद्या देवधर आणि सरोज घरीपुरीकर या दोन महिलाच असाव्यात हेही अभिमानास्पदच आहे.
आपल्या स्त्रियांच्या पाठीशी इथले मराठी पुरुष ठामपणे उभे राहतात. हैदराबादमधील सर्वात प्रसिद्ध महिलांचा दवाखाना ‘शांताबाई नर्सिंग होम’ हा शांताबाई किर्लोस्कर या मराठी स्त्रीचा आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मालिनी राजूकर याही हैदराबादच्याच. वसंतराव राजूरकरांनी त्यांना केवळ शिकवलंच असं नाही तर ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
हैदराबादच्या मराठी माणसांनी स्थानिक लोकांमध्ये मिसळून संस्कृती संवर्धनाचे मोठेच काम केले आहे आणि आजही करताहेत. परदेशात गेलेली माझी भाची नंदिनी कल्लापूर मुलं शाळेत घालायची वेळ आली की हैदराबादला परतली. आपल्या मुलांना मराठी यावे या सोबतच त्यांना स्थानिकही भाषा यावी हा ध्यास तिनं बाळगला. तिचा मुलगा अनिष तेलगू शिकू पाहतो, बोलतो याचा मोठा अभिमान तिला वाटतो. हे इथल्या मराठी माणसांचे वैशिष्ट्य आहे. वैद्यकीय व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात मोठ्या प्रमाणात मराठी माणसं हैदराबादमध्ये काम करत आहेत.
फक्त हैदराबादच नव्हे तर तेलंगणातील निजामाबाद-बोधन, अदिलाबाद या परिसरातही मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. नांदेड ते चंद्रपूर या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना जोडणारी वाट (रेल्वेची आणि रस्त्याचीही) अदिलाबादवरून जाते.  इतकंच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा  विदर्भातील एकमेव तालुका असा आहे की, मराठवाड्यासोबत पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. विदर्भात केवळ या एका तालुक्यात 17 सप्टेंबरला सुटी असते आणि झेंडावंदन होते. चंद्रपूर ते किनवट या पट्ट्यातील अदिलाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं आहेत. त्यांच्या संस्था आहेत. ते तिथल्या समाजजीवनात सक्रिय आहेत.
हैदराबादचा निर्माता मोहंमद कुलीशहाच्या कबरीच्या मध्यघुमटाचा आकार व त्याखाली पना-पाकळ्यांची आरास पाहिली की मराठी माणसे पूजेच्या कलशाभोवती पानाची आरास करतात त्याचीच आठवण येते हे धनंजय कुलकर्णी यांचे निरीक्षण फारच बोलके आहे. मोहंमद कुली कुतुबशहानं या शहराची स्थापना करताना ‘मेरा शहर लोगा सूं मामूर कर। रखमां जूं तूं दर्या मे मीन ।’ (हे अल्ला, नदीतील माशांप्रमाणं माझं शहरही असंख्य प्रकारांच्या माणसांनी भरून जाऊ दे) अशी अल्लाकडे प्रार्थन करतो आणि हैदराबाद असे आहेही. यामुळेच या शहराला ‘छोटा भारत’ असं पं. नेहरूंनी म्हटलं होतं.
एक युवा कला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हैदराबादचं नव मराठमोळं रूप बघायला मिळालं. मराठी कवितेचा कार्यक्रम सादर करताना नेमकी संध्याकाळ झाली होती. हैदराबादला शिकलेले बी. रघुनाथ यांच्या
‘गाऊलीच्या पावलात सांज घरा आली ।
तुंबलेल्या आचळांत सांज भरा आली ।’

या ओळी त्या वातावरणात जास्तच जिवंत वाटत होत्या. हैदराबादचे महान साहित्यिक डॉ. ना.गो.नांदापूकरांचे शब्द 
‘माझी मराठी मराठाच मीही ।
हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे ।
गोडी न राही सुधेमाजी आता ।
पळाली सुधा स्वर्गलोकांकडे॥

येथील मराठी तरुणांच्या कोवळ्या ओठांवर आहेत हे किती आश्वासक चित्र आहे!!
हैदराबाद शहराला फुलांचे आतोनात वेड आहे. गल्लीच्या टोकाटोकावर फुलवाल्या बसलेल्या दिसतात. पांढर्‍या, अबोली, पिवळ्या फुलांच्या आणि हिन्याच्या गडद हिरव्या पानाच्या गंधात मराठी माणसाने आपलाही गंध मिसळून टाकला आहे.     
         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Tuesday, February 4, 2014

कवितेसाठी जपलेली ओल- ‘आवानओल’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 फेब्रुवारी 2014

कोकणची लालमाती तशी भलतीच कलासक्त. म्हणूनच इथे गायक, कलाकार, नट, कवी जन्मले आणि त्यांची कदरही झाली. अगदी आजच्या काळातही अजय कांडर सारखा मराठीतील एक महत्त्वाचा कवी वसंत सावंत या कविच्या नावाने  पुरस्कार देतो आणि तोही परत कविच्याच हाताने. ज्या प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम होतो त्याचे नाव आहे ‘आवानओल’. कोकणात भातपेरणीच्यावेळी भरपुर पाऊस आवश्यक असतो. त्यात रोपं लावली जातात. मग ती उचलून दुसरीकडे पेरणी केली जाते. जर पुरेसा पाऊस आला नाही तर ही रोपं जमेल तेवढ्या पाण्यात कसंही करून जगवली जातात. अशी अपुर्‍या पाण्यावरची रोपं जगवण्याला ‘आवान’ असा शब्द आहे. कवी मित्र अजय कांडर याने यापासून 'आवानओल' असा शब्द तयार केला. त्याच्या कवितासंग्रहालाही हेच नाव आहे. आणि याच नावाचे प्रतिष्ठानही आहे.
‘आवानओल’ हा शब्द अगदी सार्थ ठरावा अशीच धडपड अजय कांडर आणि त्याच्या सहकार्‍यांची कवितेसाठी कोकणात चालू आहे. या वर्षी हा पुरस्कार अभय दाणी या कवीला ‘एरवी हा जाळ’ या कवितासंग्रहासाठी देण्यात आला. हा पुरस्कार कवी वीरधवल परब याच्या हस्ते देण्यात आला. एरवी कुठलाही साहित्यीक पुरस्कार म्हणजे गावातला एखादा राजकारणी पकडणे. त्याची संस्था असतेच. अंबाजोगाईच्या श्रीरंगनाना मोरे यांनी ठेवलेल्या ज्ञानश्री पुरस्कारावर लिहीताना याबद्दल लिहीले होतेच.
'आवानओल' प्रतिष्ठानचा हा पुरस्कार मात्र याला अपवाद आहे. काही साहित्यीक कवी कलाकार मित्र मिळून अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम करतात. कोकण गांधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेले नगर वाचनालय कणकवलीला आहे. या वाचनालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पाहुण्यांची व्यवस्था अजय कांडर हा कविमित्र स्वत:च्या घरीच अगत्याने करतो. हे एक मोठंच वैशिष्ट्य या उपक्रमाचे आहे. त्याला साथ देणार्‍या घरच्या माऊलीचे खरंच कौतुक करायला पाहिजे.
या निमित्ताने एक विचार आता सगळ्यांनीच करायची गरज आली आहे. प्रचंड मोठ्या खर्चाची संमेलने आयोजीत केली जातात. त्यातील राजकारण्यांचा हस्तक्षेप किती आणि कसा आहे हे न बोललेलेच बरे. यातून काही निष्पन्न होते आहे असेही नाही. नुसतीच भपकेबाज जत्रा पार पडते. यावर टिका करत असताना नेहमी हा प्रश्न विचारला जातो की मग करायचे ते काय? याला उत्तर म्हणजे ‘आवानओल’ प्रतिष्ठान हे आहे.
हा उपक्रम अजय कांडर  कवी वीरधवल परब, प्रवीण बांदेकर किंवा नामानंद मोडक सारख्या चित्रकार मित्रांच्या साहाय्याने पार पाडतो यालाही एक महत्त्व आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी हे भारतभर गाण्याचे कार्यक्रम करत फिरायचे. तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी आपल्या गुरूच्या नावाने पुण्यात ‘सवाई गंधर्व महोत्सव’ सुरू केला. आज तो शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मोहत्सव होऊन बसला आहे. याच पद्धतीनं स्वत: साहित्यीकांनी पुढाकार घेवून वाङ्मयीन उपक्रम आपआपल्या गावी निष्ठेने पार पाडायला पाहिजेत. त्यांची प्रतिष्ठा जपायला पाहिजे. त्यांचे गांभिर्य लोकांना जाणवून द्यायला पाहिजे. साहित्यीकांनी चालविलेल्या अशा उपक्रमांना सर्वोच्च प्रतिष्ठा मिळायला हवी.
हा उपक्रम एका वाचनालयात होतो हेही महत्त्वाचे आहे. अन्यथा आजकाल होतं असं की साहित्यीक कार्यक्रम आणि पुस्तके एकमेकांशी फटकूनच असतात. एखादा मोठा कवी गावात येवून जातो, त्याची जोरदार कविता लोक ऐकतात आणि निघून जातात. त्याच्या कवितेचे पुस्तक कुठे मिळेल का? कोणी ते वाचले का? याचे कोणालाच काही गांभिर्य नसते. एखादा मोठा व्याख्याता चांगले भाषण करून जातो. पण त्याचे पुस्तक त्या गावात उपलब्ध असण्याची शक्यता फारच कमी. मग असे उपक्रम वाङ्मयीन दृष्ट्या अपुरे ठरतात. त्यांचा अपेक्षीत परिणाम साधल्या जात नाही.
परभणीला, नाशिकला, औरंगाबादला, बुलढाण्याला, वाशिमला असे काही प्रयोग वाचनालयांनी केले आहेत.
हा उपक्रम करणारे अजय कांडर सगट त्याचे सगळे सहकारी हे सर्वसामान्य घरातले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेतास बात आहे. केवळ कवितेच्याप्रेमापोटी पदराला खार लावून ते हा उपक्रम साजरा करतात. ज्या अभय दाणी या कविला हा पुरस्कार यावर्षी दिला त्यानेच एका कवितेत लिहून ठेवले आहे,

केस सावरलेला
अलिशान कपड्यांमधला
गरम खिशाचा कवी अजून जन्माला यायचाय

कोकणातील लोकांना खरंच कलेची कदर आहे. नामानंद मोडक या चित्रकार मित्राने आपला छोटासा कलात्मक स्टुडीओ कणकवली सारख्या छोट्या गावात थाटला आहे. महाराष्ट्रातल्या कितीतरी मोठमोठ्या शहरांत अजूनही असा स्टुडीओ आढळणार नाही. तबला वादक वसंतराव आचरेकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची मोठी संस्था इथे चालविली जाते. पं. जितेंद्र अभिषेकींच्या नावाने त्यांचे शिष्य दरवर्षी इथे संगीत महोत्सव भरवितात. समीर दुबळे हा अभिषेकी बुवांचा शिष्य आणि आजचा आघाडीचा शास्त्रीय गायक योगायोगाने त्याच दिवशी मला कणकवलीत संगीत कार्यशाळेच्या निमित्ताने भेटला.
इथली मालवणी बोली तर काय सांगावी. सोबतच्या विनायक सापळे या मित्राची गोड मालवणी मी एखादं गाणं ऐकावं तशी लक्ष देऊन ऐकत होतो.
बोरकरांसारख्या कवीने गोवा आणि कोकण परिसराला आपल्या कवितेतून जिवंत केले. त्यांच्या कविता बहुतेक मराठी वाचकांना माहित आहेत. पण विजय चिंदरकर नावाचा 1936 ला जन्मलेला जेमतेम 26 वर्षे जगलेला कवी फारसा कुणाला माहित नाही. त्याची एक कविता अजय कांडरकडून माझ्या हाती लागली. कवितेला पुरस्कार देताना जुन्या कवीला त्याच्या कवितेला जपुन ठेवण्याची ओल या अजय सारख्या कवी मित्राने दाखवून दिली.

पानावरती भात हवा पण
हवाच उकडा कठिण तांबडा
सोबतिला अन् हवा भाजुनी
दरवळलेला सुका बांगडा

गडग्यापाशिल फणसाची अन्
हवीच भाजी गोडुस पिवळी
हवी आणखी तिखट तांबडी
चटणी थोडी भाजीजवळी

हा सारा हा थाट हवा अन्
हवीच सगळी अंवतीभंवती
सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती

खूप दिसांनी भूक शमावी
त्या प्रेमाच्या शब्दावरती
आईने अन् चिडून जावे
माझ्या थोड्या खाण्यावरती
सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मुं.शिंदे यांची एक सुरेख ओळ आहे (ते आपल्या चांगल्या ओळी सोडून नको त्याच म्हणतात हीच तर तक्रार आहे)

देश म्हणजे
नुसता भुगोल
की माणसा माणसांतील ओल

कोकणात कणकवलीला कवितेसाठी ओल जपणारी माणसं सापडली. अशी माणसं जगात जिथे जिथे मराठी बोलली जाते, जिथे जिथे मराठीवर प्रेम केले जाते तिथे तिथे सापडो हीच पसायदान आपण मागुयात.
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575