Thursday, February 20, 2014

माध्यमांनी केले भाषेचे वाट्टोळे

मासिक "लोकराज्य" फेब्रुवारी २०१४  मधील लेख

मराठी भाषेची मोठ्या प्रमाणात मोडतोड माध्यमांतून केली जाते असा आरोप केला तर काही जणांना आश्चर्य वाटेल. ज्यांनी भाषा सांभाळायची तेच कसे काय भाषेचे नुकसान करणार? म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले असं होणार नाही का? पण हे खरे आहे. याचे साधे सरळ कारण म्हणजे माध्यमांना म्हणजे वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यांना भाषेचे जे बलस्थान आहे तेच उमगत नाही. ज्यांना भाषेचे सामर्थ्य कळत होते ते लोक सध्या माध्यमांतून हद्दपार झाले आहेत.
बातमीचे जाऊ द्या पण जिथे प्रचंड पैसा ओतला जातो त्या जाहिरातींमधील वाक्य पहा, ‘‘माझ्या यशात सर्वांच्या वाटा...’’ वर्तमानपत्राच्या  पूर्ण पान रंगीत जाहिराती मध्ये  असलेले  हे वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो? 'सगळ्यांच्या वाटा' म्हणजे रस्ते माझ्या यशात आहेत. मी तसे संपादकाला विचारले की हे कसे? त्याला काहीच सांगता येईना. सुदैवाने त्याला चुक काय झाली ते कळाले होते. "माझ्या यशात सर्वांचा वाटा" असं हे वाक्य हवं होतं. यामुळे वाटा याचा अर्थ रस्ता असा नसून हिस्सा असा होतो. व्याकरणाची ही मोडतोड कशामुळे? आणि असं केल्याने काम सोपं होणार आहे का अवघड होणार आहे?
दुसरा विषय नेहमी चर्चेचा असतो आणि तो म्हणजे दुसर्‍या भाषेतील शब्द वापरायचे नाहीत का? आणि वापरले तर काय होते. आपल्या भाषेत पुरेसे शब्द नसतील तर दुसर्‍या भाषेतील शब्द जरूर वापरले पाहिजेत. किंवा आपल्या भाषेतील शब्द सोपे नसतील तरी दुसर्‍या भाषेतील सोपे शब्द वापरले पाहिजेत. खरं तर लोक असेच शब्द वापरत असतात. पण असे शब्द वापरण्याने जर आशयच बदलत असेल तर ते कसे काय वापरता येतील? एक साधा शब्द आहे ‘व्यस्त’. हा शब्द हिंदी मध्ये कामात व्यग्र असण्यासाठी वापरला जातो. मराठीत त्याचा अर्थ सम च्या विरूद्ध असा तो व्यस्त असा आहे. म्हणजे ‘मी कामात फार व्यस्त आहे’ असा उपयोग मराठीत करता येत नाही. पण असाच उपयोग वर्तमानपत्रात हमखास केला जातो. आता याला काय म्हणणार? काही वेळा दुसर्‍या भाषेतला शब्द योग्य वापरला जातो पण त्याचे व्याकरण मात्र त्याच भाषेतले ठेवले तर पंचाईत होते. मध्ये एका वाहिनीवर "त्याचा लाईफ अतिशय धावपळीचा बनला आहे" असे वाक्य निवेदिकेने वापरले. आता अडचण अशी आहे की जीवनला लाईफ हा शब्द तूम्ही वापरा पण त्याचे व्याकरण बदलण्याचे काय कारण? म्हणजे हे वाक्य ‘त्याचे लाईफ अतिशय धावपळीचे बनले आहे’ असे होईल.
एका भाषेत दुसर्‍या भाषेतून शब्द येतच असतात. शिवाय काही न वापरातले शब्द बादही होत जातात. पण भाषेचे म्हणून जे व्याकरण असते ते बदलत नाही. भाषेची खरी ओळख ही त्या भाषेचे व्याकरण असते. त्या भाषेतील शब्दालंकार, म्हणी, वाक्प्रचार यातून भाषा समृद्ध होते. त्यावर आघात घातला तर कसे होणार?
एक नेहमी वाद घातला जातो की बहुजन समाजाची भाषा दुय्यम समजली जाते. तीचा अपमान केला जातो. अशी भाषा आम्ही वापरली तर काय बिघडले? खरं तर बहुजन समाज भाषेचा अतिशय सुक्ष्म आणि चांगला वापर करत असतो. विशेषत: बायका तर भाषेचा वापर अप्रतिम करतात. यात कुठेही व्याकरणाची मोडतोड केलेली नसते. उलट बहुजन समाजाने आणि तथाकथित खालच्या समजल्या जाणार्‍या जातींनी आणि त्यातही परत स्त्रीयांनी भाषा अतिशय समृद्ध केली आहे. हे समजून न घेता आजची माध्यमे ओरड करतात. ते जी मोडतोड आज करत आहेत त्याचा बहुजन समाजाच्या भाषेशी काहीही संबंध नाही. माध्यमांमधली भाषेची मोडतोड ही त्यांच्या अज्ञानातून आळसातून विचार न करण्याचे वृत्तीतून आली आहे. त्यांना भाषा समजून घ्यायची नाही.
जात्यावर ओव्या म्हणताना भाषेची, कलेची अप्रतिम जाण बायकांनी व्यक्त केली आहे. शिवाय त्यात काव्यही ठासून भरलेले आहे. हे सगळे बहुजन समाजातील बायकांनी केले आहे हे विशेष- 
दाण्याच्या जोडीने जीण्याचा रगडा । 
गाण्याच्या ओढीने तूला ओढीते दगडा ॥ 
आता अशी संपृक्त भाषा आज माध्यमं वापरतात का? स्त्री जन्माचे दु:ख जनाबाईने आपल्या अभंगातून मांडले आहे. याच जनाबाईच्या काळात आणि त्याच परिसरात (गंगाखेड जि. परभणी) जात्यावरच्या ओव्यांत मांडताना ही अज्ञात बाई म्हणते,
गायीवर गोन्या लादल्या ग लमान्याने। 
सवतीवर लेक  दिली कोन्या ग बेमान्याने ॥
ही भाषेची संपृक्तता, अप्रतिम लय आजची बहुजनांसाठी म्हणवून घेणारी माध्यमं वापरतात का?
बहुजन समाज भाषेचा वापर त्यांच्या अभिव्यक्तीसाठी करतो कारण भाषा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भिंतीत वस्तू ठेवण्याच्या एकाच बाबीसाठी कोनाडा, देवळी, फडताळ अशा तिन शब्दांचा वापर केला जातो. कारण त्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत. फुलपात्र, गडु, तांब्या, पेला, चंबु, कलश, ग्लास हे इतके सगळे शब्द केवळ पाणी पिण्याच्या भांड्यासाठी आहेत. कारण त्यांचा वापर वेगवेगळा आहे.  इतकंच काय तर पुष्कळ या एकाच अर्थाचे मायंदळ, गज, ढीग, बखळ, लई, फार, मोप, बहुत, उमोप, गडगंज, सुरवाड, बंबाड, दन्ना, रेटून, ठेस, मस आणि पुष्कळ असे 16 शब्द डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी लोकभाषा व बोलीच्या अभ्यासात नोंदवले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व शब्द बहुजनांच्या वापरातले आहेत. आजची माध्यमं हे समजून घेणार आहेत का?
मराठी भाषा ही कशी विकसित होत गेली याचे सुंदर वर्णन डॉ. नांदापुरकरांनी मायबोलीची कहाणी या गद्य कवितेत केले आहे. 
धरणीमातेने साज केला. आभाळाने मांडव घातला. क्षितिजाने त्याला झालर लावली. वार्‍याने दवंडी पिटवली ‘मराठी आली’,  ‘मराठी आली’. गावच्या गावकर्‍यांना आनंद झाला. पाटलांनी चावडीवर रामराम घेतले. पांड्यांनी देशाचा पट्टा करून दिला. वेसकराने खुळखुळा वाजविला. जोशाने पत्रिका लिहीली. वाण्याने साखरपाने वाटली. जनलोक म्हणून लागला, ‘आमची मराठी आली‘, ‘आमची मराठी आली.’
नव्या मनूची पहाट झाली. नव्या दमाने दमकत आली. महाराष्ट्रीने दोरा भरला. प्राकृताची अंगी ल्याली. अपभृंशाची कुंची घाली. कानडीचे कसे केले. तेलंगीचे गोंडे लावले. संस्कृताचे बाळसे अंगावर खेळते. संस्कृतीचे वारे मनात घोळते. दिवसामासा वाढू लागली. एकेक गुण काढू लागली. लोकांचे मन ओढू लागली. पोर आता उफाड्याची दिसू लागली. सार्‍या महाराष्ट्राची हिने अंगण ओसरी केली. चहूकडे हिची फेरी होऊ लागली. देशाचे दळण दळू लागली. दळता दळता गाऊ लागली; गाता गाता कांडू लागली. वैर्‍याशी भांडण भांडू लागली.

ग्रंथिक भाषा ही संस्कृत होती. तिच्यापासून वेगळं होवून बोली भाषेत तेंव्हाचे तत्त्वज्ञान लिहीण्यास चक्रधर, संत ज्ञानेश्वर यांनी कष्ट केले. आजच्या माध्यमांचेही हेच काम आहे. उलट तेच जेंव्हा भाषेच्या बाबतीत गंभीर बनत नाहीत तेंव्हा खरी समस्या निर्माण होते. प्रस्थापित संस्कृत पंडितांची यथेच्छ टिंगल नांदापुरकरांनी उडवली आहे.

पंडितांनी मराठीचा तिरस्कार केला; पण मराठीने उलट त्यांचा सत्कार केला. तिने पंडितांचे पाणी जोखून पाहिजे. पंडितांचे घाव हसून साहिले. पंडितांच्या वर्तनावरून तिने ओळखले की वठला वासा वांकता वाकत नाही, किरणाचा दोर कातता कात नाही. पंडितांचे गाणे जुने नाणे, हाटांत काही विकत नाही, कामात काही टिकत नाही. पंडितांची वाणी मोत्याचे पाणी, पण त्याने भांडे काही भरत नाही, तहान काही हरत नाही. पंडितपोरे पिकली बोरे, पण त्यांना किड लागण्याचा संभव होता. मराठी मावली सगळ्यांची सांवली. अवघ्यांच्या सुखाची तिने सोय लावली.

मराठीला सोपे करण्याचे काम संतांनी केले. आज भाषा लोकांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम माध्यमं करीत आहेत. जोपर्यंत लेखी स्वरूपात भाषा फारशी नव्हती तोपर्यंत तिचे दोष जास्त पसरत नसत. आता जेंव्हा पासून लेखी स्वरूपात भाषा उपलब्ध होते आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी रेकॉर्डिंग करून ठेवायची मोठी सोय करून ठेवली आहे. मग आता तर उलट जबाबदारी वाढली आहे.
नविन भाषा जी मोबाईलवर विशेष: एसएमएस ची भाषा म्हणून ओळखली जाते तिचाही वापर वर्तमानपत्रांमध्ये दिसून येतो आहे. पण यातील अडचण हीच आहे की ही भाषा सार्वत्रिक आहे का? काही जणांनी वापरली म्हणून ती सगळ्यांची भाषा होत नसते. शिवाय नविन शब्दांनाही काही एक नियम असावेच लागतात. त्यालाही व्याकरणात बसवावेच लागते. पण हे करताना कोणी दिसत नाही.
व्याकरणाचे नियम सगळ्यांना डोकेदुखी वाटते. खरं तर हे नियम सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणूनच करण्यात आले आहेत. भाषेचा वापर सोपा व्हावा, सर्वांना सारखा समजून यावा यासाठी हे नियम करण्यात आले. आणि म्हणूनच ते आचरणातही येत गेले. माध्यमांमध्ये नेहमीच आवाज उठतो की हे नियम आम्ही पाळणार नाही. मग  दुसरा प्रश्न असा आपोआपच निर्माण होतो की मग तूम्ही भाषा जी काही वापरणार आहात ती इतरांना नाही समजली तर काय करणार? एकीकडे जागतिकीकरणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरीकडे भाषेच्या बाबतीत मात्र संकुचित होत जायचे हे मोठे विचित्र आहे.
भाषा, व्याकरण तिचे नियम आणि मग त्या विरूद्ध बंडखोरी हे सगळे कशामुळे होते? याचे साधे कारण म्हणजे अमेरिकेत जी भाषा बोलली जाते तिने इंग्लंड मधल्या इंग्रजीविरूद्ध बंडखोरी केली. जुन्या इंग्रजीची मिजास उतरवली. हे सगळं पाहिलं की आपल्यालाही वाटायला लागलं की आपणही भाषेच्या नियमांविरूद्ध बंडखोरी करू. पण खरी गोष्ट ही आहे की इंग्लंड आणि युरोपात राजशिष्टाचाराची जी भाषा होती तिच्या विरोधात बंडखोरी करून साधी सोपी वापरायला उपयुक्त अशा बोली इंग्रजीकडे अमेरिकेतील जनतेचा कल निर्माण झाला. मराठीच्या बाबतीत उलट परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांपर्यंत कोणीच आपली राजभाषा म्हणून मराठी वापरली नव्हती. मुळात संस्कृत, फारसी , उर्दू आणि शेवटी इंग्रजी अशा राजभाषांना तोंड देत देतच आमची मराठी वाढली.
मराठ्यांचा भाला सरळ घुसतो । मराठीचा बोल सरळ असतो ॥ 
असे त्यामुळेच म्हटले गेले आहे. खर्‍या अर्थाने व्यापक पातळीवर 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर बेळगांव वगळता सर्व मराठी प्रदेशाची कारभाराची भाषा ही मराठी झाली. म्हणजे मुळात राजभाषांच्या विरोधातील बंड म्हणजेच मराठी. आणि आता परत तिच्याच विरूद्ध बंड करण्याची नियम न पाळण्याची आरडा ओरड करणारी भाषा कोण काढतो आहे?
माध्यमांमधील भाषेच्या वापरासंबंधी अनास्था संपली तर फार मोठी अडचण दुर होईल. नविन व्यवस्थापन शास्त्रात इतकी मोठ मोठी पदे निर्माण केली जातात, दर्जाच्या बाबतीत जागरूकता दाखवली जाते मग भाषेच्या बाबतीत दर्जा राखण्याची काळजी का नाही घेतली जात? यासाठी का नाही पदे निर्माण केली जात? माणसे नेमली जात?

3 comments:

  1. सुंदर लेख आणि विश्लेषण. भाषेबद्दलची अनास्था आणि मोडतोड पाहिली की बेचैन व्हायला होतं.

    ReplyDelete
  2. मला आजतागायत कळले नाही की इतके पैसे विविध बाबींवर खर्च करणारी ही वृतपत्रे भाषे संबंधी मात्र इतकी अनास्था का बाळगतात? यांच्याकडे संदर्भ पुस्तके का नसतात? काचेचे दरवाजे, हसतमुख स्वागतिका, चहा पाणी, सुरक्षा व्यवस्था, सगळीकडे आतिशय चांगले फर्निचर, वातानुकुल यंत्रणा पण भाषेच्या बाबत मात्र काहीच करायचे नाही... हे कशामुळे? का यांना भाषा महत्वाची वाटत नाही? का भाषेची तज्ञ मंडळी नेमावी आसे वाटत नाही?....

    ReplyDelete
  3. याबाबतीत मला अंतर्नाद मासिकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो आणि कौतुकही वाटते.
    अंतर्नाद मधे खास व्याकरण सल्लागार नेमलेल्या आहेत.

    भाषेची जाण, भाषेचे महत्त्व आणि भाषेची ताकद आपल्याला कळलेलीच नाही.

    भाषा ही आपल्याला मिळालेला ठेवा आहे, तो जबाबदारीने सांभाळून (भर घालून) पुढच्या पिढीपर्यंत पोचवला पाहिजे.

    पुष्कळ या अर्थी दिलेले सारे शब्द पुर्वी ऎकण्यातले होते, पण माध्यमांमुळेच की काय त्यातला एखादाच शब्द पृष्ठभागावर येतो आणि लोक तोच ऎकतात आणि वापरतात.
    हे लिहिता लिहिता मला असं वाटू लागलंय की जग हे एक खेडे झाल्याने कोसा कोसावर बदलणारी भाषा आता बदलेनाशी झाली आहे की काय!

    ReplyDelete