Monday, March 16, 2020

400 वर्षे जून्या दूर्लक्षीत मकबर्‍याच्या निमित्ताने !


उरूस, 16 मार्च 2020

जून्या ऐतिहासिक वास्तूंबाबत एक विचित्र असा गैरसमज आपल्याकडे पसरला आहे. एक तर हे सगळं शासनाचे काम आहे आपण काहीच करण्याची गरज नाही आणि दूसरं म्हणजे हिंदू म्हणवून घेणारे मुसलमानी वास्तूंकडे पाहण्यास तयार नाहीत. कट्टरपंथी इस्लाम मानणारे या इस्लामी वास्तूंकडे पहायलाही तयार नाहीत.

किमान काही हिंदू मंदिरे नदीकाठचे घाट किल्ले यांचा जिर्णाद्धार व्हावा म्हणून पुढाकार घेतला गेला आणि बर्‍याच ठिकाणी ही कामं मार्गीही लागली आहेत. सगळ्यात मोठी अडचण समोर येते आहे इस्लामीक वास्तुशास्त्रातील इमारती म्हणजेच जून्या कबरी, मजार, मकबरे, दर्गे यांच्या बाबतीत. मोडकळीस आलेल्या महत्त्वाच्या अशा या वास्तूंचा जिर्णाद्धार डागडुजी कुणी करायची? कशी करायची?

कुणी स्पष्टपणे कबुल करत नाही पण खरे कारण म्हणजे हिंदू कट्टरपंथीयांना हे करायचे नाही. याही पेक्षा आश्चर्य म्हणजे इस्लामी कट्टरपंथीयांनाही हे होवू द्यायचे नाही. हा यातील सगळ्यात मोठा अडथळा आहे.

औरंगाबाद शहरांत विद्यापीठ परिसरांत नाट्यगृहा पासून जरासे पुढे गेले तर रस्त्याला लागूनच डाव्या बाजूला जून्या पातळ विटांची सलग मोठी भिंत आणि दोन अष्टकोनी बुरूज दिसतात. मध्यभागी एक छोटा दरवाजाही आहे. बाहेरूनच भव्य चौथर्‍यावर जून्या काळातील दगडी बांधकामांतील चुनेगच्चीची एक भक्कम इमारत दिसते.

चौरस आकारांतील ही इमारत म्हणजे औरंगजेबाचा दख्खनचा सरदार सुलतान सलाबत अली याचा मकबरा आहे (याचा कालखंड अंदाजे इ.स.1640). मकबरा म्हणजे त्याचे दफन इथे केल्या गेले. बाजूलाच त्याच्या पत्नीचीही कबर आहे. मकबर्‍याच्या डाव्या बाजूला वरती जाण्यासाठी छोटासा जीना दगडी भिंतीतून कोरला आहे. वर गेल्यावर या वास्तूचा चौरस आकार स्पष्ट होतो. मकबर्‍याच्या चारही बाजूला सुंदर असे घुमट होते. ते आता कोसळून इतस्तत: विखूरले आहेत. संपूर्ण गच्चीला दगडी महिरप होती. तिच्या काही खुणा अजून दिसतात. बाकी दगड खाली कोसळून मातीत विखूरलेले आढळून येतात.

ही जागा खासगी मालमत्ता आहे. संपूर्ण जागेला भव्य अशी कमानी कमानीची वीटांची तटबंदी आहे. मकबर्‍याचा मुख्य दरवाजा दक्षिणेस आहे. मकबर्‍याच्या पश्चिम बाजूला एक मस्जिद आहे. तिची पडझड झाल्यावर नव्याने लोखंडी पत्रे टाकून दूरूस्ती केलेली दिसते आहे. या मस्जिदच्या पाठीमागे अष्टकोनी सुंदर अशी बारव आहे. आजही तिला डबडब पाणी आहे. या बारवेच्या पाण्यावर येथे अंजिराची बाग पोसली जायची अशी माहिती जागेच्या मालकाने दिली.

मकबर्‍याच्या चारही बाजूंनी हौद आहेत. या हौदांपासून पाणी झर्‍यासारखे कोरीव दगडांवरून मकबर्‍यां भोवतीच्या बागेत खेळवलेले आहे. कधीकाळी इथे कारंजेही होते. बिबी का मकबरा किंवा ताजमहाल मध्ये ज्या पद्धतीनं मुख्य इमारती भोवती बाग बगीचा कारंजे हौद पाणी वाहण्यासाठी केलेले पाट असतात त्याचीच छोटी आवृत्ती या मकबर्‍यातही पहायला मिळते.

आम्ही चौकशी केली तेंव्हा जागा मालकाने (हबीब पाशा जहागिरदार) दूरूस्ती करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. राजस्थानात अशा खासगी मालकीच्या ऐतिहासिक जागा दूरूस्त करून त्यांचा वापर पर्यटकनासाठी केला गेला आहे. मग महाराष्ट्रात हे का घडू शकत नाही? जागेची साफसफाई किमान दुरूस्ती मामुली रंगरंगोटी केली तरी ही एक अतिशय चांगली जागा पर्यटनासाठी सिद्ध होवू शकते.

सांस्कृतिक समारंभ उत्सव मोठ्या प्रमाणात विविध संस्था साजरे करतात. त्यासाठी लाखो रूपये खर्च करून तात्पुरते शामियाने उभारले जातात, भव्य असा मंच उभारला जातो, भव्य देखावे तयार केले जातात. मग हाच पैसा जर अशा काही जून्या जागांवर खर्च करून त्यांची डागडुजी केली तर नाही का जमणार?

औरंगाबाद-खुलताबाद परिसरांत सुफी संगीताची परंपरा 700 वर्षांपासून  चालत आली आहे. खुलताबाद मधील बुर्‍हानोद्दीन गरीब दर्ग्यात कव्वाली गायनाची परंपरा आजही पाळली जाते. याच दर्ग्यात पहिले निजाम मीर कमरूद्दीन असफजाह यांची कबर आहे. खुलताबादला जो जरजर्री बक्ष दर्गा आहे तिथे फार मोठा उरूस भरतो. त्या दर्ग्यातही रात्र रात्र जश्‍न ए कव्वाली होत असते. सलाबत अली मकबर्‍यातही संगीत विषयक काही चांगले उपक्रम चालवता येतील. याच परिसरांत सुफी संगीतावर संशोधन करणारी एखादी संस्था सुरू करता येवू शकते. नियमित स्वरूपात इथे संगीताचे कार्यक्रम घेता येवू शकतात. आणि या सगळ्यांतून हा परिसर परत एकदा सांस्कृतिकदृष्ट्या जिवंत करता येवू शकतो.

परदेशी पर्यटक आपल्याकडच्या हजारो वर्षांच्या परंपरा सण उत्सव यांच्याबाबत अतिशय आस्था बाळगून असतात. त्यांना हे सगळं समजून घेण्याची उत्सुकता असते. अशी सास्कृतिक केंद्रं आपण विकसित केली तर या पर्यटकांचा मोठा प्रतिसाद त्याला मिळू शकतो.

कर्नाटकांत हंपी परिसरांत परदेशी पर्यटक महिनो न महिने येवून मुक्काम करून राहतात. औरंगाबाद परिसरांत अशी सांस्कृतिक केंद्र आपण चांगल्या पद्धतीनं विकसित केली तर तिथेही पर्यटक मुक्काम ठोकून राहू शकतात. निपट निरंजन, औरंगाबाद लेणी परिसर आणि हा सलाबत मकबरा हा सगळा हिंदू बौद्ध सुफी परंपरांनी समृद्ध असा परिसर आहे.

समृद्ध अशा सांस्कृतिक वारश्याबाबत हिंदू मुस्लीम बौद्ध जैन असा भेद करून भागणार नाही. सांस्कृतिक दृष्ट्या मोठीच गुंतागुुंत आपल्याकडे आहे. येथील वास्तुशास्त्र हे हिंदू इस्लाम जैन बौद्ध असे वेगवेगळे प्रभाव पचवत समृद्ध झाले आहे. सलाबत अली मकबर्‍याची सगळीच रचना अष्टकोनी आहे. अष्टदिशांना सनातन हिंदू संस्कृतित अतोनात महत्त्व आहे. इस्लाम मध्ये या ऐवजी सहा दिशा मानल्या जातात. पण हा मकबरा बांधत असताना वास्तुतज्ज्ञांनी आठ हा शुभ आकडा गृहीत धरून बांधकाम केले.

खरं तर कमानींचे तंत्रज्ञान अरबांनी सोबत आणले आणि भारतीय वास्तुकलेला एक नवा आयाम मिळाला. त्याचा वापर करून त्या नंतरच्या काळात आपल्याकडे अतिशय भव्य अशा सौंदर्यपूर्ण वास्तु दिमाखात उभ्या राहिल्या. अहिल्याबाई होळकर यांनी मध्ययुगीन कालखंडात भारतभर केलेली देखणी बांधकामं याचा सज्जड पुरावा आहे.
खुद्द औरंगाबाद परिसरांत मलिक अंबर कालीन कितीतरी देखण्या वास्तू आहेत.

तेंव्हा या सगळ्या संपन्न वारश्याकडे धर्माच्या संकुचित दृष्टीनं न पाहता विस्तृत दृष्टीनं बघितलं पाहिजे. आणि हा वारसा जनत केला पाहिजे. 
 
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

2 comments:

  1. खूप महत्वाचा मुद्दा मांडलात सर ... आपल्याकडे प्रत्येक ऐतिहासिक वास्तू कडे धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे यामुळे खूप मोठा वारसाला आपण मुकणार आहोत ... ही बाब लक्षात घेणे अगत्याचे आहे ...

    ReplyDelete
  2. आहो काही प्रतिक्रिया तर अतिशय वाईट आहेत. मी काहींचे screen shot काढून ठेवले आहेत. समजूनच घेत नाहीत..

    ReplyDelete