Wednesday, October 16, 2019

‘दिशा’ साप्ताहिकाचा वाचन कुपोषणामुळे बालमृत्यू !


१६ ऑक्टोबर २०१९ 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या गदारोळात एक बातमी दबून गेली. बातमी प्रत्यक्ष माध्यमांशी संबंधीतच आहे. झी. समुहाने दोन वर्षांपूर्वी ‘दिशा’ नावाचे साप्ताहिक मोठा गाजावाजा करून सुरू केले होते. सकाळचे माजी संपादक विजय कुवळेकर यांना या साप्ताहिकाच्या संपादकपदी नेमले होते. या महिन्यात हे साप्ताहिक अधिकृत रित्या बंद करत असल्याचे ‘दिशा’च्या अंकात छापून आले. आणि या साप्ताहिकाचा अवतार संपूष्टात आला.
15 ऑक्टोबर भारतरत्न अब्दूल कलाम यांची जयंती ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच ऑक्टोबर महिन्यात ‘दिशा’ बंद पडल्याची बातमी यावी हे दुर्दैव आहे. दैव हा शब्द यासाठी वापरला की त्याशिवाय दुसरे काही कारण दिसत नाही. आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले म्हणून बंद पडले हे खरे असले तरी खुप वरवरचे कारण आहे.

सार्वजनिक ग्रंथालये सर्वात जास्त असलेले महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे  राज्य आहे. दहा हजार सार्वजनिक ग्रंथालये, दहा हजार महाविद्यालयीन ग्रंथालये आणि 5 हजार शालेय ग्रंथालये म्हणजे एकूण 25 हजार इतकी किमान दखल घ्यावीत अशी मोठी ग्रंथालये महाराष्ट्रात शासनाच्या अनुदानावावर चालत आहेत. आणि तरी ‘दिशा’ सारख्या साप्ताहिकाचा असा दोनच वर्षात अकाली मृत्यू व्हावा?

‘दिशा’ बाबत त्यांच्या काय आणि कशा चुका झाल्या हा मुद्दा स्वतंत्र आहे. त्यावर टिका करताना किंवा त्यांची बाजू घेताना काही मुद्दे हिरीरीने पुढे केले जातील. मला त्यात पडायचे नाही. वाचन संस्कृती रूजविण्यासाठी आपण जे काही म्हणून प्रयत्न करतो आहोत त्यांचीच ‘दिशा’ चुकत आहे असा माझा आरोप आहे.

गॅसची सबसिडी जशी खातेदारांच्या खात्यात सरळ जमा होते आहे तसे आता वाचकांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी का? सार्वजनिक ग्रंथालयांमुळे वैयक्तिक खरेदी बंद झाली. आणि दुसरीकडे सार्वजनिक ग्रंथालयांचा दर्जा ढासळत गेला. या दुहेरी कात्रीत आज मराठी ग्रंथ व्यवहार सापडला आहे. मराठीत साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, द्वैमासिके, त्रैमासिके, दिवाळी अंक, वार्षिक अंक असे कितीतरी प्रकाशीत व्हायचे. या सगळ्यांतून वाचकांच्या किमान तीन चार पिढ्या गेल्या शतकभरात समृद्ध झाल्या. हळू हळू नियतकालीके बंद पडायला लागली. ‘अंतर्नाद’ मासिक भानु काळे यांनी नुकतेच बंद केले. त्यांचा केवळ दिवाळी अंक आता निघणार आहे. (माझ्या स्वत:च्या गाठीशी ‘ग्रंथसखा’ मासिक पाच वर्षे  आणि ‘शेतकरी संघटक’ पाक्षिक 5 वर्षे चालविण्याचा अनुभव आहे. दोन्हीही बंद पडली आहेत.)

परत परत वाचन संस्कृतीचा प्रश्‍न येतो तेंव्हा या समस्येवर वरवरचे उपाय शोधले जातात. दूरगामी विचार करायचा असेल तर काही गोष्टी सगळ्यांनी मिळून करण्याची नितांत गरज आहे. ते नाही केलं तर अजून काही नियतकालिके, प्रकाशनं बंद होत जातील.

‘किशोर’ मासिक बालभारतीच्या वतीने म्हणजेच शासनाच्या वतीने प्रकाशीत केले जाते. 1971 पासून हे प्रकाशीत होते आहे. आज किती शाळांपर्यंत किशोर पोचते? 48 वा दिवाळी अंक नुकताच प्रकाशीत झाला. किती पालकांना माहित आहे की असा काही अंक निघतो म्हणून? या मासिकाला शासनाचे पूर्ण पाठबळ आहे म्हणून निदान अंक सातत्याने निघत तरी आहे. ‘लोकराज्य’ हे साप्ताहिक शासनाच्या वतीने प्रकाशीत होते. तेही असेच शासनाचा संपूर्ण आर्थिक पाठिंबा आहे म्हणून प्रकाशीत होवू शकते आहे. पण या दोन्ही शासकिय नियतकालीकांचा किती प्रभाव मराठी वाचकांवर आहे?

म्हणजे एकीकडे ‘दिशा’ सारखे साप्ताहिक बंद पडत आहे आणि दुसरीकडे शासनाचे जे चालू आहे त्याचा काहीही प्रभाव पडत नाही. हे कशाचे द्योतक आहे?

शालेय पातळीवर ग्रंथालये पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना सक्षम करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट सार्वजनिक ग्रंथालयांबाबत धोरण बदलले गेले पाहिजे. वाचन प्रेरणा दिवसाचे कार्यक्रम ठेवले जातात पण या सोबतच पुस्तकं वाचकांपर्यंत पोचविण्यातल्या अडचणी दूर झाल्या तरच काहीतरी अर्थ या उपक्रमाला शिल्लक राहिल. नसता तो एक नुसता उपचार ठरेल.

मध्यंतरी विनोद तावडे यांनी शिक्षण मंत्री असताना जाहिर केले की बुके नव्हे बुक द्या. किमान शासकीय पातळीवर तरी ही योजना राबवायला हवी होती. त्यासाठी शासकीय प्रकाशने तरी उपलब्ध व्हायला हवी होती. रा.रं. बोराडे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार नावाने एक चरित्रात्मक पुस्तकांची मालिकाच प्रकाशीत केली होती. या पुस्तकांची किंमत अतिशय कमी (रू. 50 च्या आसपास) ठेवण्यात आली होती. मग ही पुस्तके पुष्पगुच्छा ऐवजी शासकीय पातळीवर उपयोगात आणता आली असती. पण तसं काहीच घडलं नाही. आजही कुठल्याही शासकीय कार्यक्रमांत साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, बालभारती, तंत्रशिक्षण विभाग, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांनी प्रकाशीत केलेली पुस्तके सप्रेम भेट दिली जात नाहीत.

एखादे साप्ताहिक मासिक बंद पडले की उसासे निघतात, अश्रु ढाळले जातात, वाचन संस्कृतीची चिंता केली जाते.  काही लेख छापून येतात. ते कुणी वाचतं की नाही माहित नाही. पुढे काही घडत नाही.

मी स्वत: गेली 20 वर्षे जनशक्ती वाचक चळवळीच्या माध्यमांतून पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, पुस्तकांवर विविध प्रकारचे कार्यक्रम (प्रकाशन समारंभ, अभिवाचन, एक पुस्तक एक दिवस, लेखकाच्या मुलाखती) करत आलेलो आहे.  ‘दिशा’ साप्ताहिकाचा अकस्मिक मृत्यू मला अस्वस्थ करतो आहे. पुढील असे मराठी नियतकालिकांचे बालमृत्यू (वयाच्या हिशोबाने, आशयाच्या नव्हे) टाळायचे असतील तर वाचनाचे कुपोषण थांबवणे गरजेचे आहे.

एक छोटा संकल्प करायची मी विनंती आपणाला करतो. मोठ्यांसाठी काय आणि कसे करता येईल तो मोठा विषय आहे. पण लहान मुलांसाठी किमान ‘किशोर’ मासिक खरेदी करा. पोस्टाने येण्यात अडचणी असतील तर माझ्याकडे संपर्क करा मी जरूर सहकार्य करावयास तयार आहे.

महाराष्ट्रभरच्या अ वर्ग ग्रंथालयांमधून ‘एक पुस्तक एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. कृपया ग्रंथालयांशी संबंधीत ग्रंथपाल, संस्थेचे विश्वस्थ, जागरूक वाचक, लेखक, रसिक यांनी संपर्क करावा.

प्रकाशक परिषद, ग्रंथ विक्रेते, साहित्य संस्था, शाळा महाविद्यालये यांच्या सहकार्याने ‘ग्रंथ प्रदर्शने’ भरवू या. आम्ही हात पुढे केला आहेच. तूम्ही पण पुढे या.

केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण सकारात्मक कृती करू या. वाचन संस्कृती जोपासू या.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळे,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575 ˆˆ   

2 comments:

  1. दिशा हे आठवडापत्र सुरू झाल्यापासून प्रत्येक अंक मी घेत होतो. टीका करता येण्यासारखं खूप काही आहे, पण ते महत्वाचं नाही. हा मुद्दा रास्त आहे.
    महाविद्यालयीन मुले इंटरनेटवर वाटतात, हे कारण मला तरी खरं वाटत नाही. त्यांना रस असेल अशी खूप माहिती दिशा मध्ये येत होती.

    ReplyDelete
  2. अतिशय महत्त्वाचा व राजकारणाच्या धामधुमीत दुर्लक्षीत मुद्दा आपण उपस्थित केला. दिशा मासिक बंद होणे ही खरोखरच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.

    ReplyDelete