Sunday, November 4, 2018

कन्फ्युजन ही कन्फ्युजन है । सोल्युशन कुछ पता नही ॥



‘थ्री इडियटस्’ मधील ‘ऑल इज वेल’ या गाजलेल्या गाण्यात ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है । सोल्युशन कुछ पता नही॥ अशी एक ओळ आहे. ही ओळ विद्यार्थी असलेले अमीर खान, आर.माधवन, शर्मन जोशी यांच्या तोंडी आहे. पुढची ओळ आहे ‘सोल्युशन जो मिला तो साला क्वेश्‍चन क्या था पता नही।’ नेमकी ही अशीच स्थिती कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची झाली आहे.

मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकांचा प्रचार करताना राहूल गांधी यांनी बिनधास्तपणे शिवराज सिंह चौव्हान यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. चौव्हान यांच्या मुलाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचे जाहिर करताच राहुल गांधी आणि मंडळींचे धाबे दणाणले. सारवा-सारव करताना राहूल गांधी यांनी आपली चुक मान्य केली आणि आपण कन्फ्युज असल्याचे कबुल केले. राहूल गांधी यांनी सार्वत्रिकरित्या हे कबुल केले ते फार बरं झालं. नसता त्यांचे समर्थन करणारे पत्रकार विचारवंत यांना राहूल गांधींचे गुणगान गाताना जास्तीचे भरते येत असते. तेंव्हा स्वत: राहूल गांधीच्यांच बोलाने या सर्वांची बोलती बंद झाली.

राहूल गांधी यांच्या बोलण्यातला दूसरा एक भाग आहे त्याची चर्चा झाली पाहिजे. खरं तर राहूल गांधी कन्फ्युज आहेत ते मध्यप्रदेश किंवा राजस्थान छत्तीसगढ इथे निवडणुका होत आहेत म्हणून नाही. ते एरव्हीच कन्फ्युज आहेत.

अगदी आत्ता एखाद्या पत्रकाराने त्यांना कॉंग्रेसच्या कार्यकारीणीतील महत्त्वाची नावे कोणती? मोठ्या राज्यांतील कॉंग्रेस अध्यक्षांची नावे कोणती? महाराष्ट्रात केवळ मुंबई प्रदेशासाठी वेगळा अध्यक्ष आणि उर्वरीत महाराष्ट्रासाठी वेगळा अध्यक्ष आहे हे माहित आहे का? असे विचारले तर राहूल गांधी उत्तर देवू शकतील का?

2014 च्या निवडणुका जाहिर झाल्यावर अर्णब गोस्वामी यांनी राहूल गांधी यांची एक मुलाखत घेतली होती. त्यांना प्रश्‍नच कळत नव्हते हे सगळ्या देशाने बघितले. आणि राहूल गांधी मंद विद्यार्थ्यासारखे वेगळीच उत्तरे देत होते.  गेल्या चार वर्षांत राहूल गांधी यांची राजकीय समज किती वाढली आहे?

यु.पी.ए.च्या 2004 ते 2014 या काळात राहूल गांधी यांच्याकडे पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ होता. केंद्रात सत्ता होती. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुरेसा आक्रमक झाला नव्हता. किंबहूना मोदींचे नावच पुढे आले नव्हते. मग या काळात सव्वाशे वर्ष जून्या असणार्‍या पक्षाच्या युवा नेत्याला सुवर्णसंधी असताना आपल्या पक्षाची संघटना भारतभर बळकट करावी असे का नाही वाटले?

सेवादल म्हटले की सर्वांना राष्ट्र सेवादल इतकीच माहिती असते. पण कॉंग्रेसचे पण एक सेवादल होते. हे सेवादल म्हणजे कार्यकर्ता प्रशिक्षण करणारी यंत्रणा होती. या यंत्रणेतून कार्यकर्ते तयार व्हायचे. पण हे आता बहुतांश कॉंग्रेस जन विसरूनच गेले आहेत. मोठमोठ्या नेत्यांची ही स्थिती असेल तर नवख्या राहूल गांधी यांना सेवादल नावाचे काही प्रकरण असेल हे माहित असण्याची शक्यता कमीच आहे. मग त्यांच्याकडून सेवादलाचे जाळे देशभर कॉंग्रेसने बळकट करावे ही अपेक्षा करणेही व्यर्थ.

सत्ता होती म्हणून काही एक कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षाला चिटकून राहिले. पण आता सत्ता नसण्याच्या काळात त्यांना टिकवायचे कसे? पक्षासाठी निधी गोळा करायचा कसा? काही एक निश्‍चित कार्यक्रम पक्षाला द्यायचा कसा? याचे काहीच नियोजन राहूल गांधींनी कधी कुठे मांडले नाही.

तत्कालीन कॉंग्रेस पंतप्रधान नरसिंहराव यांना जागतिक दबावामुळे खुली धोरणे राबवावी लागली असा आरोप केला जातो. तो आपण क्षणभर खरा मानू. पण त्यानंतर त्यांनी सरकार अल्पमतात असतानाही सक्षमपणे चालवून दाखवले या सरकारची आर्थिक धोरणे काही एक सुसंगत पद्धतीनं चालत होती. याच सरकार मधील बुद्धीवान अर्थमंत्री मनमोहनसिंग पंतप्रधान म्हणून नंतर सोनिया गांधींनी आणून खुर्चीवर बसवले. ज्या माणसाची विद्वत्ता जगानं मान्य केलेली होती. त्याच्या बुद्धीमत्तेचा फायदा घेत ज्या नरसिंहराव यांना कारभार करता आला होता. मग याच माणसाचा सकारात्मक उपयोग सोनिया-राहूल यांना का नाही करता आला?  सोनियांनी त्यांच्या पद्धतीनं करून घेतला आणि दहा वर्षे सत्ता राबवून दाखवली असे तरी म्हणता येईल. पण राहूल गांधींचे काय? या सगळ्या काळात पक्ष संघटनेसाठी राहूल गांधींनी काय केले? कॉंग्रेस पक्षाची आर्थिक धोरणे काय आहेत? असे जर राहूल गांधींना विचारले तर ते काय उत्तर देतील? किंवा मुळात उत्तर तरी देवू शकतील का?

भाजप राज्यसभेतील खासदार राकेश सिन्हा यांनी राममंदिर प्रकरणी खासगी विधेयक संसदेत मांडण्याची तयारी चालविली आहे. यावर राहूल गांधी काय भूमिका घेणार? मंदिरात जानवे घालून सोवळे नेसून गेल्याने, कैलास-मानसरोवराची यात्रा केल्याने हिंदूंच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट होते असे नाही. त्यासाठी काही एक ठामठोक धोरण ठरवावे लागेल आणि ते राबवावे लागेल. पण या बाबत राहूल गांधी अतिशय संभ्रमित असतात. आणि ते सर्वांसमोर स्पष्टपणे आलेलेच आहे.

31 ऑक्टोबर हा इंदिरा गांधींचा स्मृती दिन. हा दिवस भाजप-मोदी यांनी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या निमित्ताने खावून टाकला. सगळी चर्चा त्या भोवतीच फिरती ठेवली. मग कॉंग्रेसच्या पातळीवर इंदिरा गांधींचा स्मृती दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करून वल्लभभाई पटेलांच्या पावलावर पाउल ठेवूनच कठोरपणे भूमिका घेणार्‍या इंदिरा गांधी होत्या हे सामान्यांच्या किंवा निदान कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या तरी मनात का नाही ठसविल्या गेले?  जी संस्थाने पटेलांनी खालसा केली त्या सगळ्या संस्थानिकांचे तनखे इंदिरा गांधींनी रद्द करून दाखवले. मग ही मांडणी राहूल गांधींनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर 31 ऑक्टोबरला का नाही केली?

1990 पासून सतत राम मंदिराचा विषय भाजपने लावून धरला. त्याचा सुरवातीला तोटा झाला. पण हिंदू मतदार संपूर्णत: आपल्याकडे फिरवून त्या मतांचे विजयात परिवर्तन करण्यात धोरणात्मक पातळीवर त्यांनी यश मिळवले. मग याच्या नेमके उलट भाजपेतर मतदारांना आपल्याकडे वळवण्यात राहूल गांधींनी काय योजना मांडली? डिसेंबर पर्यंत ते पक्षाचे उपाध्यक्ष होते आणि आता तर प्रत्यक्ष अध्यक्षच आहेत. जगात कुठे घडली नाही अशी (मोतिलाल-जवाहरलाल नेहरू- इंदिरा - राजीव-सोनिया-राहूल गांधी) एकाच घरातील पाच पिढ्यांत मिळून सहा व्यक्तींना पक्षाचे अध्यक्षपद मिळण्याची घटना भारतात घडली आहे. ज्याला आपण जॉब सिक्युरिटी म्हणतो अशी मिळालेली आहे. 2014 च्या वाईट स्थितीतही पक्षाला 19 टक्के इतकी मते मिळालेली आहेतच. असे असताना कॉंग्रेस नावाच्या या उद्ध्वस्त पण भव्य असलेल्या इमारतीची किमान डागडुजी, स्वच्छता, रंगरंगोटी ही कामे का केली जात नाहीत?

भारतात रहायचे म्हणजे इथल्या जनमानसाचा अंदाज किमान पातळीवर घेता आला पाहिजे. इंदिरा गांधी आपल्या गळ्यातील रूद्राक्षाचे धोरणीपणाने प्रदर्शन करत आपली हिंदूत्वापोटीची निष्ठा सिद्ध करून द्यायच्या. संस्थानीकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयकरण करणे यातून त्यांनी आपली डावी धोरणे धुळफेक करण्यासाठी का असेना पण सिद्ध करून दाखवली होती. 1978 चा पराभाव झाल्यावर पक्ष संघटनेत प्राण फुंकण्यासाठी देशभर प्रवास केला. मेहनत घेतली. जनता राजवटीत बिहारमध्ये वेलची येथे दलित हत्याकांड झाले होते. तिथे भेट देण्यासाठी गेलेली पहिली व्यक्ती म्हणजे इंदिरा गांधी. तेंव्हा त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदसुद्धा नव्हते. त्या खासदार सुद्धा नव्हत्या. नदीला पुर आलेला होता. पलीकडे जाण्यासाठी हत्तीशिवाय दुसरे वाहन नव्हते. हत्तीवर माहूत आणि अंबारीत एकट्या इंदिरा गांधी. जर पुरात तो हत्ती वाहून गेला असता तर? पण तसा काहीच विचार न करता बेधडक इंदिरा गांधी हत्तीवरून पलीकडे पोचल्या. ही धमक राहूल गांधी कधी दाखवतील का? आज तर त्यांच्याकडे त्यामानाने प्रचंड अनुकूलता आहे.

भारतीय राजकारणात नेहमीच अर्ध्यापेक्षा जास्त मते सत्तेच्या विरोधात राहिलेली आहेत. नेहरू-इंदिरा-मोदि हे तीन लोकप्रियता लाभलेले आणि त्याचे मतात रूपांतर करणार- प्रत्यक्ष खासदार निवडून आणणारे नेते मानले तर त्यांच्याही काळात सत्ताधार्‍यांना कधीच 40-45 टक्केपेक्षा जास्त मते   मिळवता आली नाहीत. हे सगळे गणित समोर असताना राहूल गांधी नेमके कन्फ्युज कशामुळे आहेत?

आजही राहूल गांधी यांना कुणी पूर्णवेळ राजकारणी मानत नाही. ते पार्ट टाईम राजकारण करतात असाच आरोप विरोधक करतात. आणि राहूल गांधीही या आरोपाच्या समर्थनार्थ सतत नव नविन पुरावे उपलब्ध करून देतात.

आत्ताही शक्यता अशी आहे की पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या की क्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी राहूल गांधी आजोळी निघून जातील. पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल, तोंडावर असलेली लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक याचे कसलेही गांभिर्य त्यांच्या कृतीतून वक्तव्यांतून दिसणार नाही. अगदी कॉंग्रेसचा विजय झाला तरी. आंध्र प्रदेशात कॉंग्रेसशी युती करण्याची धडपड चंद्राबाबू करत आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस सोबत 40 जागांवर समझोता झाल्याचे शरद पवार सांगत आहेत. देवेगौडा राहूल गांधींच्याच नेतृत्वाखाली येणारी लोकसभा लढवण्याचे संकेत देत आहेत. पण राहूल गांधी स्वत:हून काहीही या संदर्भात बोलत नाहीत. त्यांचे एकही वाक्य त्यांच्या धोरणीपणाचा पुरावा देण्यासाठी उपलब्ध होत नाही.

कॉंग्रेसला सत्ता मिळाली नाही तर काही प्रश्‍नच नाही पण मिळाली तर काय? राहूल गांधी यांचे नेतृत्व त्यासाठी सक्षम आहे का? याचे उत्तर निदान राहूल गांधींच्या कृती-उक्तीतून मिळत नाही. बड्या घरच्या एखाद्या हौशी गुलछबू पोराने राजकारण राजकारण म्हणून काही खेळ करावा तसेच त्यांचे सध्याचे वर्तन आहे.

                     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

2 comments:

  1. इंदिराजींच्या कर्तृत्वाची किंवा राजकीय स्टंटची आपण जी उदाहरणे दिली आहेत तसेच स्टंट युवराजही करतात परंतु आता social media मुळे लोकजागृती झालेली असल्याने राजकीय धोरण आणि राजकीय स्टंट यांच्यातला फरक लोकांना कळतो आहे. इंदिराजींच्या काळातही social media आजच्या एवढा प्रभावी असता तर त्या आणीबाणीनंतर एकतर सत्तेवर आल्या नसत्या किंवा त्यांना जे प्रचंड बहुमत मिळाले ते तरी मिळाले नसते.

    ReplyDelete
  2. इंदिरा गांधी यांनी पूर्वीही १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फुट पडल्यावरही संसदेत बहुमत जमवून सरकार चालवले होते.. १९७१ ला मध्यावधी निवडणूका घेवून स्वत:च्या काँग्रेसला बहुमत मिळवून दाखवले होते.. यातलं काहीच सोनिया आणि राहूल यांना जमले नाही... केंद्रातच नाही तर विविध राज्यातही काँग्रेसला दणकावून पराभव सोनिया राहूलच्या काळात घडला आहे...

    ReplyDelete