Wednesday, November 21, 2018

जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधले यांची उपेक्षीत समाधी


सा.विवेक, नोव्हेंबर  2018

औरंगाबाद जवळचा देवगिरीचा किल्ला देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी यांनी काम पाहिले होते. ज्ञानेश्वरीतील योगदूर्ग म्हणून जे वर्णन आलेले आहे ते याच किल्ल्याला पूर्णत: लागू पडते. या जनार्दन स्वामी यांचे गुरू चांद बोधले हे होते. हे चांद बोधले यांचे दूसरे शिष्य म्हणजे  मुस्लिम संत कवी शेख महंमद. 

संत जनार्दन स्वामी यांनी आपल्या या गुरूंची समाधी देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या बाजूस आज जो मुख्य रस्ता आहे त्याच्या उजव्या बाजूस पूर्वेला बांधली आहे. या समाधीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हमामखान्याची एक दूर्लक्षीत छोटी इमारत आहे. तिच्या बाजूने या समाधीचा रस्ता जातो. हमामखान्याची इमारत काहीशा पडक्या स्थितीत आहे. पण आतून भक्कम आणि उत्तम नक्षीकाम केलेल्या कमानींची आहे.

चांद बोधले यांनी कादरी परंपरेतील सुफी संप्रदायाचा स्वीकार केला. त्यांचे गुरू म्हणजे ग्वाल्हेर येथील सुफी संत राजे महंमद. याच राजे महंमद यांचे चिरंजीव म्हणजे शेख महंमद. आपल्या शिष्यालाच आपल्या मुलाचे गुरूपद स्वीकारण्याची आज्ञा राजे महंमदांनी दिली. आणि अशा प्रकारे शेख महंमद हे चांद बोधलेंचे शिष्य झाले. 

चांद बोधले यांनी ज्ञानेश्वरीची एक प्रत शेख  महंमद यांना दिली आणि त्या प्रभावातून त्यांनी आपली ग्रंथ रचना केली. दुसरे शिष्य जनार्दन स्वामी यांनाही चांद बोधल्यांनी अनुग्रह दिला. रा.चिं.ढेरे यांनी आपल्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या पुस्तकात (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) शेख महंमदांवर लिहीताना चांद बोधले यांची  ही माहिती दिली आहे. डॉ. यु.म.पठाण यांच्या ‘मुसलमान (सुफी) संतांचे मराठी साहित्य’ या पुस्तकांतही चांद बोधले यांच्याबाबत माहिती दिली आहे. (प्रकाशक- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे) 

जनार्दन स्वामींचे गुरू श्रीदत्तात्रेय समजले जाते. पण हे दत्तात्रय म्हणजेच चांद बोधले आहेत. दत्तात्रयांनी मलंग वेशात जनार्दन स्वामींना दर्शन दिले याचाच अन्वयार्थ मलंग वेशातील चांद बोधलंनी दर्शन दिले असा अभ्यासक लावतात. 

शेख महंमद यांचा ‘योगसंग्राम’ हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. या ग्रंथात त्यांनी 

ॐ नमो जी श्री सद्गुरू चांद बोधले ।
त्यांनी जानोपंता अंगीकारले ।
जनोबाने एका उपदेशिले । दास्यत्वगुणे ॥ (योगसंग्राम 15.1)

असे स्पष्ट लिहून ठेवले आहे. 

या चांद बोधल्यांची समाधी संत जनार्दन स्वामींनी बांधली. पण यात एक अडचण अशी की चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळे त्यांची समाधी म्हणजे दर्गा समजला जातो. रमजानच्या पवित्र महिन्यात या दर्ग्याचा उरूस भरतो. या निमित्ताने जो संदल निघतो (मिरवणूक) त्यावेळी वारकरी संप्रदायातील लोक भजनं म्हणतात आणि सुफी कव्वाल्या गायल्या जातात. भारतातीलच नव्हे तर जगातील हा एकमेव हिंदू संताचा दर्गा आहे. 


आज या समाधीची अवस्था अतिशय वाईट आहे. समाधीस्थळी जाण्यास चांगला रस्ता नाही. समाधीचे तीन कमानींचे भक्कम बांधकाम आता ढासळायला झाले आहे. या कमानींचे खांब कर्नाटकातील बेलूर हळेबीडू हिंदू मंदिरांतील खांबांसारखे आहेत. बाजूच्या जीन्यावर पानाफुलांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. ते दगड आता ढासळत आहेत. समाधी मंदिर हिंदू परंपरे प्रमाणे पूर्वेला तोंड करून आहे. या समाधीवर कायम स्वरूपी दिवा तेवत ठेवलेला असतो.

समाधीला लागूनच नमाज पढण्यासाठी एक छोटी सुंदर नक्षीकाम असलेली मस्जिद आहे. तिचेही बांधकाम आता ढासळत आहे. मलिक अंबरच्या सर्व बांधकामांवर त्याचे बोधचिन्ह असलेले साखळ्या आणि अधोमुखी कमळ या मस्जीदवर जरा वेगळ्या पद्धतीनं कोरलेलं आहे. यात साखळ्या तश्याच असून कमळ अधोमुखी नसून फुललेले आहे. याचा अर्थ ही मस्जिद निजामशाहने बांधलेली असावी. जनार्दन स्वामी याच निजामशाहीत किल्लेदार होते तेंव्हा त्यांनीच हे बांधकाम केले असावे असा कयास लावता येतो. 

चांद बोधले यांनी शेख महंमद या शिष्यास जो अध्यात्माचा धडा दिला त्यातून एक समन्वयवादी मांडणी पुढे चालून शेख महंमद यांनी केली. आपल्या या शिकवणुकीचा उल्लेख शेख महंमदांनी करून ठेवला आहे

अविंध यातीस निपजलो । 
कुराण पुरोण बोलो लागलो ।
वल्ली साधुसिद्धांस मानलो ।
स्वतिपरहिता गुणे ॥ (योगसंग्राम 16.66)

चांद बोधल्यांचे शिष्य शेख महंमद यांचा गुरूमंत्र शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी घेतला. या शेख महंमद यांना श्रीगोंदा (तेंव्हाचे नाव चांभार गोंदा) येथे मठ बांधून दिला. त्या मठासाठी इनाम जमिन दिली. इथून पुढे मुळचे बीड जिल्ह्यातील धारूर येथे जन्मलेले शेख महंमद श्रीगोंदा येथे मठ स्थापून राहू लागले. 

अशा या सिद्ध पुरूषाची समाधी हा एक मोठा अध्यात्मिक सामाजीक ऐतिहासीक वारसा आहे. पण तो जतन करण्याकडे आपले लक्ष जात नाही. आज तिथल्या स्थानिक भक्तांनी आपल्या परिने समाधीची देखभाल दुरूस्ती केली आहे. नियमित स्वरूपात तिथे आराधना केली जाते.

या सांस्कृतिक वारश्याची जाणीव आपण ठेवत नाही ही मोठी खंत आहे. मुख्य रस्त्यापासून जेमतेम दोनचारशे फुट अंतरावर असलेले हे ठिकाण. त्यासाठी जो कच्चा रस्ता आहे तो दूरूस्त करणे, त्या भागातील साफसफाई करणे ही कामे सहज करता येणे शक्य आहे. जवळ असलेला हमामखाना हे संरक्षीत स्मारक म्हणून शासनाने घोषित केले आहे. त्यासाठी एका चौकीदाराची नेमणुकपण केली आहे. त्या सोबतच या समाधीस्थळाची देखभाल व दुरूस्ती करता येणे शक्य आहे. 

या वास्तुची रचना ही देखील वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे. याचे जे वैशिष्ट्यपूर्ण खांब आहेत ते तसे दुसर्‍या दर्ग्यांमध्ये आढळत नाहीत. यांची रचना ज्या काळात केल्या गेली तो काळ शोधून त्या प्रमाणे कर्नाटकातील बेलूर-हळेबीडू येथील काळाशी कसा जूळतो हे सर्व संशोधन व्हायला पाहिजे. तसेच जे पानाफुलाचे नक्षीकाम आढळून येते त्याचेही संदर्भ शोधले पाहिजेत. दक्षिण भारतात ज्या मुसलमानी राजवटी होत्या त्यांच्या ठायी हिंदू बद्दल द्वेष नव्हता. उलट हिंदूंच्या कितीतरी चालिरीती या भागातील सुफी संतांनी कळत नकळतपणे अंगिकारल्या होत्या याचे कित्येक पुरावे जागाजागी आढळून येतात. उलट या सुफींचा मोठा द्वेष कट्टरपंथी इस्लामचे अनुयायीच करतात. 

पीराला नवस बोलण्याची परंपरा ही पूर्णत: हिंदू परंपरा आहे. याच चांद बोधलेंच्या समाधी जवळ खुलताबादहून वेरूळला जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूला दरिच्या पलीकडील डोंगरावर एक दर्गा आहे. या दर्ग्यात डोके टेकवून तेथील साखर चाटली तर मुल बोलायला लागते अशी श्रद्धा आहे. शक्कर चटाने की दर्गा असेच नाव या दर्ग्याला आहे. आता या श्रद्धा पसरल्या कशा? हे सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्या काळातील चिश्ती परंपरेतील संत होते असे मानले जाते. देवगिरी-खुलताबाद परिसरात अशा भरपूर ऐतिहासिक वास्तु आहेत. विखुरलेले काही जूनी बांधकामे आहेत. याच दर्ग्याच्या मागच्या बाजूस निजामाच्या राजकन्येच्या/सुनेच्या नावाने एक सुंदर पॅगोडा पद्धतीनं बांधलेली कबर आहे. पण तिचे अफगाणिस्तान येथे  निधन झाले. तिला परत इकडे आणले गेलेच नाही. आता ही कबर नसलेली जागा पडीक आहे. अतिशय सुंदर अशा कमानी, वरच्या घुमटाला जाळीची नक्षी जी कुठेच आढळत नाही, उंचच उंच कमानी दरवाजा असे बांधकाम आहे. मोठ्या भव्य चौथर्‍यावर ही इमारत आजही शाबूत आहे. या कबरीच्या आतील अष्टकोनी रचना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मोठी देखणी आहे. अष्टकोनी रचना या हिंदू वास्तुशास्त्राच्या प्रभावातून आल्याचे मानले जाते. हे सगळे त्या विषयातील तज्ज्ञांनी अभ्यासून मांडले पाहिजे. यावर लिहील्या गेले पाहिजे.    

देवगिरीच्या किल्ल्याची जी प्रचंड मोठी संरक्षक भिंत आहे तो सगळा परिसर अतिक्रमणे हटवून स्वच्छ करणे व तेथे बगिचा विकसीत करण्याची गरज आहे. या भिंतीमध्ये सुंदर बलदंड बुरूज आहेत. देखणे दरवाजे आहेत. हा सगळा परिसर म्हणजेच ऐतिहासीक ठेवा आहे. यांच्या बद्दल आपण अनास्था ठेवणार असूत तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.   

(फोटो सौजन्य आकाश धुमणे, AKVIN Tourism, औरंगाबाद.)

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment