Tuesday, August 27, 2013

भारतीय आशयाचा चीनी चित्रपट - ‘रोड होम’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 27 ऑगस्ट 2013

चीन म्हटलं की आपलं डोकं उठतं. त्यात परत आपल्या राजकीय नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे तर ही भावना अजूनच वाढीला लागली आहे. मग चीनवरची यशवंतरावांनी केलेली कॉमेंट ‘तो चीन असला तर आम्ही प्राचीन आहो’ वगैरे वगैरे आठवत आम्ही मनात उत्साह भरून घेतो. पण या चीनशी आपलं सांस्कृतिक नातं आहे हेच आजकाल आपण विसरलो आहोत. चीनचा सामान्य माणूस, त्याच्या परंपरा, रीतीरिवाज यात आपल्याशी जूळणारं खुपकाही आहे हे लक्षात येत नाही.

‘रोड  होम’ नावाचा एक सुंदर चीनी चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चीनच्या खेड्यातील एक साधी प्रेमकथा रंगवणारा हा चित्रपट त्याचे शब्द काहीही न कळता फक्त खाली येणार्‍या इंग्रजी उपशिर्षकांवरून जवळपास पूर्णपणे समजून येतो आणि बघता बघता भारतीय मनाला हात घालतो.

या चित्रपटातील काळ हा 1919 चा आहे. 100 वर्षांपूर्वीचे ते चीनी खेडे पाहताना आपल्या खेड्यांची आठवण येत राहते. आपल्या रिती- परंपरांना, मतांना चिकटून राहिलेली म्हातारी माणसे पाहताना त्यांच्याशी आपले नाते सहज जूळून येते. चीनमधील त्या खेड्यात शिक्षेचा भाग म्हणून एका शिक्षकाला नौकरीवर पाठवले जाते. तो येतो तेंव्हा त्याला पाहणारी एक 16 वर्षांची मुलगी त्याच्या प्रेमात पडते. शाळेचे बांधकाम चालू असताना सगळे पुरूष त्यावर काम करत असतात. आणि स्त्रिया  त्यांना जेवणखाण बनवून आणून देतात. एका टेबलावर स्त्रीया सुंदर चिनीमातीच्या भांड्यांमधून शिजवलेले सुग्रास अन्न मांडून ठेवतात. पुरूष येवून ते बाऊल उचलून घेवून जातात. या मुलीला आपण शिजवलेले अन्न या शिक्षकाने खावे असे वाटत असते. पण नेमका हाच बाउल त्याने उचलला की नाही हे कळत नाही. या शिक्षकाला रोज एका घरी जेवायला बोलावले जाते. जेंव्हा या मुलीच्या घरची पाळी येते तेंव्हा तीची आई या शिक्षकाला हे सगळे सांगते. ही कशी तूमच्यासाठी शाळेचे बांधकाम चालू असताना जेवण पाठवायची वगैरे वगैरे. त्या बिचार्‍या शिक्षकाला हे काहीच माहित नसते. पण तोही मग हीच्या हळू हळू प्रेमात पडतो. सुट्ट्यांमध्ये तो वापस जाताना केसांना लावायची एक छोटी पिन तीला भेट देवून जातो. त्याला जाताना जेवण द्यायचे म्हणून ही धावतपळत त्याच्या गाडीमागे जाते. पण गाडी निघून जाते आणि हीच्या हातातील भांडी खाली पडतात. चीनीमातीचा तो बाउल पडतो आणि त्याचे तुकडे होतात. ही ते तुकडे तसेच रूमालात बांधून परत आणून घरी कपाटातील त्या बाउलच्या जागेवर ठेवून देते. तिच्या आंधळ्या आईला चाचपडताना हे तुकडे हाती लागतात. ती त्यावरून आपली मुलगी प्रेमात पडल्याचे ओळखते.

हा प्रसंग तर इतका सुंदर आहे. ती आंधळी म्हातारी बाउलचे तुकडे कसे जोडावेत याचा विचार करत बसते. एके दिवशी तीला दुरूस्ती कामे करणार्‍या म्हातार्‍या सुताराचा आवाज येतो. ती त्याला आत बोलावून घेते. आता मातीचा बाउल परत जोडायचा कसा? मला मोठी उत्सूकता होती की 100 वर्षांपूर्वी जेंव्हा फेव्हिकॉल सारख्या कुठल्याही साधनांचा शोध लागलेला नव्हता अशा काळात आता हा दिग्दर्शक काय दाखवतो. तो सुतार हातानं  चालवायचे एक छोटं ड्रिल मशीन काढतो. अतिशय नाजूकपणे बारीक छिद्र पाडून त्यात तार ओवून घेतो. त्या ड्रिल मशीनला गती देताना तो जी छोटी काठी फिरवतो त्यावरून तर मला सारंगीवर नजाकतीने फिरणार्‍या गजाचीच आठवण झाली.

दुसर्‍या दिवशी ती मुलगी तो जोडलेला बाउल त्या जागी पाहते आणि आपलं प्रेम आपल्या आईलाही कळल्याचं तिला उमगतं. अशा कितीतरी सुंदर साध्या साध्या प्रसंगातून दिग्दर्शकाने आपल्या कलासक्त दृष्टीचे दर्शन घडवले आहे. त्या शिक्षकानं भेट दिलेली ती पीन धावळीत पडणं आणि थकून घरी परत आल्यावर घराच्या कुंपणापाशीच ती सापडणे असे काही प्रंसग फार भावनोत्कट झाले आहेत.

खरं तर ही कहाणी फ्लॅशबॅक पद्धतीनं चालू आहे. वडिल वारल्याची खबर मिळते म्हणून तरूण मुलगा गावात आला आहे. त्याची आई वडिलांचा अंत्यविधी पारंपारिक पद्धतीनं व्हावा म्हणून हट्ट धरून बसली आहे. आणि या तरूण मुलाला आपल्या आईवडिलांची प्रेमकथा आठवत चालली आहे. या 17 वर्षांच्या तरूण मुलीचे त्या 20 वर्षीय शिक्षकाशी लग्न होते. त्या शिक्षकाचा वृद्धापकाळाने मृत्यू झालेला असतो. या प्रेमी जोडप्याचा हा तरूण मुलगा आईला समजावतो की आता थंडीच्या काळात माणसं मिळणं शक्य नाही तेंव्हा आपल्या जन्मगावी वडिलांची अंत्ययात्रा पायी घेवून जाणं शक्य नाही. पण आई तयार होत नाही. शवावर पांघरायचे वस्त्र स्वत: पत्नीने विणायची एक प्रथा त्या समाजामध्ये आहे. पण आई हे वस्त्र वीणण्याचा हट्ट धरून बसलेली.  आता हे वस्त्र विणण्यासाठी हातमाग शोधणं आलं. हा तरूण मुलगा हातमाग आणतो. घरात तो बसवतो. आणि त्याची म्हातारी आई रात्रभर कष्ट करून ते सुंदर वस्त्र विणते.

थंडीच्या काळात अंत्ययात्रेसाठी लोकांना आणायचं म्हणजे त्यांना मजूरी देणं, त्यांच्या बिड्यांची दारूची व्यवस्था करणं यासाठी पैसे लागणार. हा तरूण मुलगा आईच्या समाधानासाठी हे सगळं करायला तयार होतो. गावच्या सरपंचाला पुरेशी रक्कम देतो व आईच्या मनाप्रमाणे सारं काही करायला सांगतो. आश्चर्य म्हणजे जेंव्हा अंत्ययात्रा सुरू होते तेंव्हा अपेक्षेपेक्षा आणि सांगितलेल्या लोकांपेक्षा भरपूर लोकं गोळा होतात. कारण हे सगळे त्या शिक्षकाचे विद्यार्थी असतात. शिवाय ते पैसेही घ्यायला तयार होत नाहीत.

ज्या शाळेत आपल्या नवर्‍यानं शिकवलं त्या जागेवर या म्हातारीचा भलताच जीव असतो. तीला आपल्या नवर्‍याचा आवाज त्या परिसरात सतत कानावर येतो आहे असे भास होत राहतात. त्यामुळे ती गावातून हलायला तयार नसते. मुलगा तीला आता आपल्याबरोबर चल असा आग्रह करत असतो. वडिलांच्या अंत्यविधीनंतरच्या सकाळी म्हातारी उठते तर तिला गावच्या शाळेतून नवर्‍याच्या आवाजासारखा आवाज यायला लागतो. ती इतक्या वयातही धावत सुटते. तिला वाटतं हा नेहमीसारखा आपला भास असेल. पण प्रत्यक्ष जावून बघते तर तिचा मुलगा वडिलांच्या जागी उभं राहून मुलांना वडिलांनी शिकवलेलंच जुनं पुस्तक शिकवत असतो. त्यानं एक दिवस तरी शिववावं अशी या म्हातार्‍या जोडप्याची इच्छा असते. आणि तो मुलगा ती पूर्ण करतो. ही म्हातारी जवळची रक्कम नवर्‍याच्या स्मरणार्थ शाळेच्या बांधकामासाठी म्हणून देणगी देते. इथेच हा सुंदर चित्रपट संपतो.

पूर्ण चित्रपटात दाखवलेलं खेडं, मातीच्या सारवलेल्या भिंती, सकाळी दारापुढे सडा टाकायची पद्धत, चुलीवर अन्न शिजवणे, आपल्या माणसांसाठी हट्टाने परंपरांचे पालन करत त्यांना चिकटून राहणे, गावच्या सरपंच/प्रमुखाला मृत्यू सारख्या प्रसंगी स्वत:च्या जबाबदारीचे आलेले भान, आपल्या मुलांकडून पालकांच्या अपेक्षा अशा कितीतरी गोष्टी या पूर्णपणे भारतीय मानसिकतेशी जुळणार्‍या वाटत होत्या.

पूर्णचित्रपटभर शाळेच्या, गावाच्या सभोवतालचा निसर्ग हा एक अविभाज्य घटक म्हणून येतो. लसलसणारी पिके, बर्फाळ रस्त्यांनी गोठवून टाकलेले चलनवलन, लख्ख उन्हानं प्रज्वलीत केलेली जीवन आशा, नायिकेच्या मानसिकतेप्रमाणे बदलत जाणारा सभोवताल ही योजना तर केवळ अप्रतिम.

या चित्रपटाला कुठल्या महोत्सवात कुठला पुरस्कार मिळाला मला माहित नाही. या चित्रपटाचे जागतिक चित्रपटात काय स्थान आहे मला माहित नाही, नागपुरच्या अंजली करंजकर या चित्रपटप्रेमी मैत्रिणीने हा चित्रपट आम्हा काही पागलांना औरंगाबादला प्रसाद कोकीळ यांच्या घरी सहज म्हणून दाखवला. त्याचा साधा सुंदर आशय कुणी काहीही न सांगता आम्हा पाच दहा जणांच्या मनात अलगद उतरत गेला. कलेचे यापेक्षा वेगळे काय प्रयोजन असे शकते?    

 श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,
औरंगाबाद.
 मो. 9422878575.
     

3 comments:

  1. http://en.wikipedia.org/wiki/The_Road_Home_%281999_film%29

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अप्रतिम समिक्षा...
    कालच हा चित्रपट जळगावात पाहिला...
    चित्रपटावरील अजुन काही मिळत का..? हे बघत असतांना आपला लेख वाचायला मिळाला..
    पुनश्च धन्यवाद...!

    ReplyDelete