Friday, October 22, 2021

लखीमपुर खिरी - समज आणि गैरसमज !

 

साप्ताहिक विवेक १८-२४ ऑक्टोबर २०२१ 
 
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर आंदोलन करणार्‍या जमावाने दगडफेक केली. लाठ्यांनी हल्ला केला. या प्रकरणांत गाडीच्या काचा फुटल्या, चालकाला गंभीर मार लागला. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. गाडी गर्दीत घुसली. परिणामी गाडीखाली चार लोक चिरडले गेले.

संतप्त जमावाने गाडीवर हिंसक हल्ला केला. चालकासह चार लोकांची ठेचून हत्या केली. एकूण 8 लोकांचा मृत्यू या प्रकरणी घडला.

झाला तो प्रकार अगदी कमी शब्दांत इतकाच मांडता येतो. जी काही उपलब्ध पुरावे, व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती यातून जे चित्र समोर येते ते इतकेच आहे. पण मुळातच ही बाब इतकी सरळ सोपी घ्यायचीच नसल्याने यावर गोंधळ घालणे, आरडा ओरडा करून परिस्थिती पूर्णत: चिघळून टाकणे, आपलेच असत्य लपविण्यासाठी अजून जोरात गोंधळ करणे हे विरोधी पक्षांचे आणि कृषी आंदोलकांचे एक विशेष असे तंत्र तयार झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे लखीमपुरची घटना.

या पार्श्वभूमीवर काही मुद्दे तपासून पाहिले पाहिजेत. दिल्लीला चालू असलेले आंदोलन मुळात विविध राज्यांमध्ये का नेले गेले? मुळात 26 नोव्हेंबर 2020 ला जेंव्हा हे आंदेलन सुरू झाले तेंव्हापासून सांगण्यात आले होते की हे पूर्णत: अराजकीय आहे. प्रत्यक्षात पश्चिमबंगाल सारख्या राज्यांतील निवडणुक प्रचारांत किसान मोर्चाचे नेते ज्या पद्धतीने सहभागी झाले आणि आंदोलनाच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांच नेते ज्या मोठ्या प्रमाणात वावरले त्यावरून हा दावा अतिशय पोकळ आहे हे सिद्ध झाले आहेच. या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये हे पासून राजस्थान, मध्यप्रदेश येथे किसान मेळावे करण्याचे भरपूर प्रयत्न राकेश टिकैत आणि त्यांचे सहकारी यांनी केले. पण त्याही मेळाव्यांना प्रतिसाद फारसे मिळेनासा झाल्यावर तो मार्ग सोडून द्यावा लागला. विविध राज्यांतील भाजप विरोधी असलेल्या डाव्यांच्या शेतकरी संघटना, राजकीय पक्ष यांना हाताशी धरून बंद, मोर्चे, रेल रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. वारंवार बंदचे आवाहन करूनही असे प्रकारचे बंद यशस्वी होताना दिसले नाहीत.

या पार्श्वभूमीवर लखीमपुर खिरी येथे काय घडले ते समजून घ्या. येत्या 4 महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडुका होवू घातल्या आहेत. त्याची तयारी म्हणून विरोधी पक्ष विविध मुद्दे शोधत आहेत. किसान आंदोलनाचा मुद्दा त्यांच्या आयताच हाती लागला. या किसान मोर्चाच्या नेत्या कार्यकर्त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यांनी ‘दिल्ली के बाद लखनऊ घेर लेंगे’ अशी वक्तव्यं द्यायला सुरवात केली.

26 जानेवारी च्या लाल किल्ल्यावरील हल्ल्यांपासून किसान आंदोलनाचा हिंसक चेहरा लपून राहिलेला नाही. मुळात या आंदोलनात नक्षलवादी, पाकिस्तानवादी, खालिस्तानी, चीनचे छुपे समर्थन असलेले गट, इस्लामीक कट्टरपंथी या सगळ्यांचा शिरकाव झालेला आहे. याचे वारंवार पुरावेही मिळाले आहेत. जसे दिल्ली दंगे एक पूर्वनियोजीत कट होता आणि तसा निकालच आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे त्याच प्रमाणे किसान आंदोलनही आता एका पूर्व नियोजित कटाचा भाग असल्याचे सिद्ध होत आहे.

पहिला मुद्दा ज्या कृषी कायद्यांना विरोध आहे हे सांगितले जात आहे त्यांच्या बद्दल हे सर्व विरोधी पक्ष आणि राकेश टिकैत यांची किसान युनियन यांनी आधी काय वक्तव्य केली, मांडणी केली ते तपासून पहा म्हणजे हा विरोधी भास लगेच समोर येईल. हे सर्व लोक या कृषी कायद्याच्या पूर्णत: बाजूने होते. पण आता मात्र हे ‘कनून वापीस लो’ इतक्या एकाच मुद्द्यावर अडून बसले आहेत. त्यातूनच यांना केवळ आणि केवळ गोंधळ अस्वस्थता निर्माण करायची आहे हे लक्षात येते.

दुसरा मुद्दा कृषी कायद्याशी काहीही संबंध नसलेली एम.एस.पी. प्रमाणे खरेदी आणि एम.एस.पी. चा कायदा करण्याची मागणी यांनी लावून धरली आहे. ज्याचा कुठेच कसलाच उल्लेख तिनही कृषी कायद्यांत येत नाही.
तिसरा मुद्दा जो जास्त गंभीर आहे. कारण तो विषय कायद्याशी निगडीत आहे. सर्वौच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती देता येईल का अशी विचारणा केंद्र सरकारपुढे केली होती. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने ती सुचना स्विकारली आणि कायद्याला स्थगिती दिली. शिवय सर्वौच्च न्यायालयाने या कायद्यांबाबत शिफारस करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीसमोर विविध शेतकरी संघटना, संस्था, तज्ज्ञ यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. या समितीने आपला अहवाल न्यायालयाला सादरही केली. पण चुकूनही संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी या समितीसमोर हजर झाले नाहीत. सर्वौच्च न्यायालयातही हे लोक हजर झाले नाहीत. वारंवार विचारणा करण्यात येवूनही यांनी तिकडे पाठ फिरवली. यातून या किसान आंदोलन वाल्यांचे हेतू शुद्ध नाहीत हे सिद्ध झाले.
न्यायालयाने यावर सक्त भाषेत टिप्पणीही केली आहे. शिवाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आंदेालन करत असताना इतर नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर तूम्ही घाला का घालत अहात हेही विचारले. अजूनही संयुक्त किसान मोर्चाने यावर उत्तर दिले नाही. आता तर 43 संघटना आणि त्यांचे नेते यांना सर्वौच्च न्यायालयाने नोटिस पाठवली आहे.

केंद्र सरकारने कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नेमून त्यांची शेतकरी नेत्यांशी चर्चा घडवून आणली. चर्चेच्या 11 फेर्‍या पार पडल्या. पण शेतकरी नेत्यांच्या अडमुठपणाने हा सगळा प्रयास वाया गेला. आजही हे आडमुठ शेतकरी नेते ‘कनून वापस लो’ यावरच अडून बसले आहेत.

लखीमपुर खिरी प्रकरणाने हे परत एकदा सिद्ध होते आहे की वैध मार्गाने चर्चा,  कृषी समस्येचे निराकरण करून सकारात्मक पद्धतीने मार्ग काढणे, शेतकर्‍याच्या खात्यात सरळ पैसे जमा होवून त्याला लाभ मिळणे हे काहीच या शेतकरी नेत्यांना नको आहे. त्यांना फक्त गोंधळ निर्माण करायचा आहे. देशाच्या लोकशाहीला धक्के देण्याचे, तिच्यावर हल्ले करण्याचे एक आंतरराष्ट्रीय कारस्थान असून त्याचा हे एक भाग आहेत हेच आता पटत चालले आहे. कारण लखीमपुर येथे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या मोटारींच्या ताफ्यावर निदर्शनाच्या नावाने हल्ला करण्याचे कारणच काय? या सगळ्या प्रकरणांत उत्तर प्रदेश सरकारचा नेमका काय कुठे संबंध येतो?

जर मंत्र्याच्या मुलाच्या गाडीने आंदोलकांना चिरडले असा आरोप केला जातो आहे तर या कथीत आंदोलकांनी हे आधी स्पष्ट करावे की गाडीवर दगडफेक का झाली? काचा कशा फुटल्या? चालकाला जखमा कशा झाल्या?
आणि एक तर साधा व्यवहारिक मुद्दा आहे की जर गाडीने चिरडूनच टाकायचे होते तर कुणी काही माजक्या लोकांच्या अंगावर गाडी घालेल. 100-150 चा मोठा जमाव रस्त्यावर, बाजूला उभा होता त्याच्या अंगावर गाडी घालणे म्हणजे आत्मघाती हल्ला होय आणि असा उद्देश सत्ताधार्‍यांचा कसा काय असू शकेल?

इस्लामी कट्टरपंथी अतिरेकी असे आत्मघाती हल्ले करतात. सत्ताधारी भाजपचे नेते कार्यकर्ते असे आत्मघाती हल्ले जमावावर काय म्हणून करतील? चिडलेल्या जमावाने चार जणांची ठेचून हत्या केली त्यातून उलट हेच सिद्ध होते की जमाव हिंसक होता. त्याला चिरडण्यासाठीच जर गाडी चालवली गेली असती, गाडीतील लोकांजवळ बंदुका होत्या, गोळीबार झाला असे असते तर मृत्यूमुखी पडलेल्या एका तरी व्यक्तीच्या शरिरांतून बंदुकीच्या गोळ्या शवविच्छेदनानंतर मिळायला हव्या होत्या. पोस्टमोर्टम रिपोर्ट तसं सांगत नाही. एकही मृत्यू गोळी लागून झालेला नाही. मुळात गोळीबार झाल्याचाच पुरावा समोर आलेला नाही.

लखमीपुर हिंसाचारा नंतर ज्या पद्धतीनं विरोधकांनी राजकारण केलं, मृताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे सप्रमाण सिद्ध केलं त्यातून त्यांचे हेतू दिसून येतच आहेत. गाडीखाली चिरडल्या गेले नेमक्या तेवढ्याच 4 जणांचा हे वारंवार उल्लेख करत राहिले. त्यांच्याच नातेवाईकांना भेटी दिल्या. पंजाब सराकरने त्या कुटूंबियांना 50 लाखाची मदत जाहिर केली. पण चुकूनही ज्या 4 जणांची लिचिंग करून ठेवून हत्या केल्या गेली त्यांच्या कुटूंबियांना यांनी भेटी दिल्या नाहीत. माणुसकी म्हणून त्यांना कसलीही मदत जाहिर केली नाही. उलट त्या मृत्यूचे तर हे चक्क समर्थन करत आहेत. ‘ऍक्शन की रिऍक्शन तो होगीही’ असा उद्धट प्रतिवाद राकेश ट़िकैत यांनी केला. रस्ता रोकून का बसले तर असे विचारले तर ‘हम कहा रास्ता रोक के बैठे है, रास्ता तो पुलिस ने रोका है’ असली अजब तर्क ही माणसं मांडत आहेत. यातून सिद्ध एकच होते की यांना कायद्याने जे स्वातंत्र्य दिले आहे त्याचा गैर वापर करून इतर सामान्य जनतेला वेठीस धरायचे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्या तव्यावर विरोधी पक्षांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे. त्यासाठी कृषी आंदोलनचा वापर विरोधी पक्ष करून घेत आहेत. भारतात लोकशाही विरोधी वातावरण वाढावे म्हणून जॉर्ज सॉरोस सारखे अमेरिकन उद्योगपती डाव्यांना हातात धरून काही एक खेळी करत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांनी अशा खेळी केल्या आहेत. अमेरिकेतही अध्यक्षीय निवडणुकांत मोठ्या प्रमाणांत हिंसाचार करून लोकशाही ला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला होता.

कुमार केतकर वारंवार आंतरराष्ट्रीय कटाचा उल्लेख करतात. मोदी त्याच कटाचा भाग म्हणून देशाचे पंतप्रधान झाले असा युक्तीवाद ते मोदी संघ भाजप द्वेषांतून मांडत असतात. पण इथे तर ते ज्या पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत तो पक्षच लोकशाही विरोधी आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे याचे पुरावे समोर येत आहेत. चीनशी ज्या पद्धतीने राहूल गांधी सोनिया गांधी यांनी हातमिळवणी केली तो प्रकार अतिशय गंभीर आणि देशविरोधी आहे. आणि नेमका आरोप मात्र कुमार केतकर अगदी उलटा करत आहेत.

दिल्ली दंगे, शाहिनबाग आंदोलन, भीमा कोरेगांव दंगल, जामिया मिलिया- जेएनयु-अलिगड या विद्यापीठांतील दंगे, 26 जानेवारीचा लाल किल्ल्यावरील हल्ला, बेंगलोर दंगे ही सगळी एक मालिकाच आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कृषी आंदोलनात असे हिंसाचार घडवून आणले जात आहेत. कश्मिरमध्ये 370 हटल्यापासून आणि सुरक्षा दलाने अतिशय कडक कारवाई केल्याने हिंसक कारवाया करणार्‍यांची मोठी कोंडी झाली आहे. पाकिस्तानवादी-चीनवादी-नक्षली- खालिस्तानी हे सगळे आता कश्मिर शिवाय भारतात कुठे कुठे काय काय करता येईल यासाठी संधी शोधत आहेत. विविध निमित्ताने असे हिंसाचार घडवून आणले जात आहेत. दलित, स्त्रीया, मुसलमान, विद्यार्थी, शेतकरी यांच्यातील अस्वस्थता विविध निमित्ताने शोधून त्यांचा वापर या हिंसात्मक कारवायीसाठी केला जातो आहे.

हे सर्व विचारी राष्ट्रप्रेमी भारतीयांनी गांभिर्याने समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं याचा कडाडून विरोध केला पाहिजे. यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामील असणार्‍यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे. गरज असेल तिथे कायदेशीर कारवायी करून यांना अडकवून टाकले पाहिजे. जसे की एल्गार परिषद प्रकरण महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी न्यायालयात लावून धरले आणि या अर्बन नक्षलवाद्यांना तुरूंगात धाडले.

विरोधकांनी केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे चिरंजीव आशिष मिश्रा यांच्यावर एफआयआर दाखल झाला. त्यात त्यांचे नाव असल्याने त्यांना अटक ही करण्यात आली. आधी त्यांना अटक होणारच नाही, हे सरकार गुन्हेगारांना लपवत आहेत अशी ओरड करणारे सर्व विरोधक तोंडावर पडले. आता केंद्रिय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातून त्यांना केवळ आणि केवळ गोंधळच घालायचा आहे हे सिद्ध होते. या पूर्वीही पेगासेस प्रकरण, सेंट्रल विस्टा प्रकरण यातून हे दिसून आले आहेच. चौकीदार चोर है असं फक्त ओरडायचे. प्रत्यक्ष न्यायालयात या विरोधात खटला उभा राहिला तेंव्हा राहूल गांधींना लेखी स्वरूपात माफी मागवी लागली हे प्रकरण सर्वांच्या समोर ताजे आहे.  

कृषी आंदोलनात हिंसा पसरविणार्‍यांवरही अशीच कडक करवायी कशी होईल हे पाहिले पाहिजे. लखीमपुर खिरी चा हाच संदेश आहे की यांना वेळीच आवरले नाही तर हा कॅन्सर देश व्यापत जाईल.    
                   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, October 7, 2021

उसंतवाणी-भाग ६५

 

उरूस, 7 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 193

(उत्तर प्रदेशात लखीमपुर येथे मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीचे नियंत्रण सुटले. गार्डी गर्दीत घुसली. पाच लोकांचा मृत्यू झाला. जमावाने चार लोकांना बाहेर काढून ठेचून मारले. एकूण 9 मृत्यू झाले. यावरही विरोधी पक्ष मृत्यूचे भांडवल करून राजकारण करत आहेत.)

लखीमपुरात । हिंसेचे तांडव ।
मृत्युचा मांडव । घातला हा ॥
कृषी आंदोलन । पूर्ण भरकटे ।
हिंसा खरकटे । सांडलेले ॥
कराया बसले । लोकशाही खुन ।
घ्यावी ओळखून । चाल ऐसी ॥
शेतकरी सच्चा । राबतो शेतात ।
कुणाच्या हातात । दंडुके हे ॥
आंदोलनजीवी । घेतात हे जीव ।
माणसे सजीव । का म्हणावे ॥
विरोधी पक्षांचे । बबली नी बंटी ।
नौटंकीची घंटी । वाजविती ॥
मेलेल्या जीवांवे । लावुनी कातडे ।
वाजते डफडे । कांत म्हणे ॥
(5 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 194

(4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली. मुला मुलींच्या डोळ्यांत अतोनात आनंद दिसून आला. सांग सांग भोलानाथ शाळा भरेल का? असं म्हणायची पाळी आली होती. )

वाजतसे घंटा । सुरू झाली शाळा ।
पोरं झाली गोळा । उत्साहाने ॥
घरी बसुनिया । सुट्टीचे अजीर्ण ।
मन हे विदीर्ण । निराशेने ॥
जुने भेटताच । मैत्रिणी व मित्र ।
डोळ्यामध्ये चित्र । फुललेले ॥
ऑनलाईनचा । सुका ज्ञान घास ।
लाभो सहवास । गुरूजींचा ॥
पोरांच्या मनीचा । भाव जाणा भोळा ।
मनातुन शाळा । हवी वाटे ॥
भोलानाथ भरो । नियमित शाळा ।
गळ्यामध्ये गळा । मित्र मित्र ॥
कांत माणसाचा । माणसांत जीव ।
तयावीण कीव । स्वत:चीच ॥
(6 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-195

(आज घटस्थापना. देवीने महिषासुराचा वध केला तसाच आपण सगळे मिळून कोरोनासूराचा वध करूया. )

देवीने वधिले । महिषासूराला ।
कोरोनासूराला । गाडू तैसे ॥
सार्‍या देवता दे । आपापले शस्त्र ।
मंत्रुनिया अस्त्र । देवी हाती ॥
सगळे मिळून । लावू शक्ती आता ।
सारी बद्धीमत्ता । पणाला ही ॥
कोरोनासूराचा । करण्या नि:पात ।
सारे देवू साथ । अभियाना ॥
करू ‘जागरण’ । घालूया ‘गोंधळ’ ।
वाजवू ‘संबळ’ । मनोभावे ॥
आपत्ती विरूद्ध । लढण्याचे मात्र ।
आहे नवरात्र । प्रतिक हे ॥
कांत निवारण्या । कोरोना आपत्ती ।
बुद्धी आणि शक्ती । आई तू दे ॥
(7 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, October 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६४



उरूस, 4 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 190

(पावसाने शेतीचे आतोनात नुकसान केले आहे. नेहमी ओला असो की सुका दुष्काळाचा फटका ग्रामीण भागालाच का बसतो? शहरी भागाला दुष्काळाने पूर्णत: उद्ध्वस्त व्हावे लागले असे घडत नाही. आणि तशी परिस्थिती आली की लगेच विम्याचे पैसे मिळतात, नुकसान भरपाई मिळते, मदत उभी राहते. शेतकरी मात्र वार्‍यावर सोडला जातो. हे भारत- इंडिया शरद जोशींनी लक्षात आणून दिले. आजही हा सापत्न भाव तसाच आहे.)

पाउस कोसळे । आडवा तिडवा ।
मिटवी गोडवा । जगण्याचा ॥
सर्वदूर रानी । पाणी साचलेले ।
मन खचलेले । कुणब्याचे ॥
कोरडा असो वा । असूदे रे ओला ।
दुष्काळाने डोळा । भरलेला ॥
फायदा घेवुन । ‘इंडिया’ मोकळा ।
‘भारता’च्या गळा । फास दोर ॥
‘इंडिया’च्या साठी । मोकळा बाजार ।
‘भारता’आजार । बंधनाचा ॥
नवे तंत्रज्ञान । ‘इंडिया’च्या साठी ।
फाटक्याच गाठी । ‘भारता’च्या ॥
कुणबी म्हणजे । सावत्र लेकरू ।
धोरणाने मारू । कांत म्हणे ॥
(2 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 191

(30 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर शिवाय गांधींचा संदर्भ येत नाही. ज्या कॉंग्रेसचे गांधी सर्वेसर्वा होते त्या कॉंग्रेसने तर गांधींचे ‘कॉंग्रेस विसर्जीत करा’ हे वक्तव्य प्रत्यक्षात उतरविण्याचा चंग बांधला आहे.)

30 जानेवारी । 2 ऑक्टोबर ।
बापुंची खबर । एवढीच ॥
जनता विसरे । महात्म्याचे धडे ।
पळाली माकडे । जंगलात ॥
अहिंसेचे नको । आम्हाला टिचिंग ।
मॉब हे लिंचिंग । रोज सुरू ॥
कशाला हवी ही । सत्याची झंझट ।
नको ते झेंगट । गळ्यामध्ये ॥
सत्याचे नको हेे । सत्तेचे प्रयोग ।
खुर्चीचा वियोग । सोसवेना ॥
बापु नको आता । जुने उपोषण ।
सत्ता कुपोषण । चालु येथे ॥
बापु तुम्ही आता । आउट डेटेड ।
व्हा अपडेटेड । कांत म्हणे ॥
(3 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-192

(शाहरूख खानचा पोरगा आर्यन खान रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन करताना सापडला. त्याला एनसीबी ने ताब्यात घेतले व अटक केली. )

दोस्तासंगे मस्त । करी रेव्ह पार्टी ।
अडकली कार्टी । बॉलीवुडी ॥
गांधी जयंतीचा । दिवस हा ड्राय ।
करीती एंजॉय । सुखेनैव ॥
तरंगते सारे । क्रुझ पाण्यावर ।
पोरं नशेवर । मदमस्त ॥
एन्सीबीला कुणी । दिली याची टीप ।
उघडली झीप । इज्जतीची ॥
जरा उचलता । शारूखने डोळा ।
तोंडामध्ये बोळा । मिडियाच्या ॥
सोशल मिडिया । काढतोय पिसे ।
लिब्रांडुंचे हसे । होई पहा ॥
पद वा पदार्थ । नशेला कारण ।
पेटविती रण । कांत म्हणे ॥
(4 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६३



उरूस, 4 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 187

(कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यासाठी भगतसिंग जयंतीचा मुहूर्त निवडला होता. पण नेमकं त्याच दिवशी सिद्धूनी राजीनामा देवून सर्व उत्साहावर पाणी फिरवले.)

बुडवाया पार । कॉंग्रेसची नैय्या ।
जिग्नेश कन्हैय्या । प्रवेशती ॥
देतो राजीनामा । नवज्योत सिद्धु ।
कॉंग्रेसला बुद्धु । बनवुनी ॥
सोनिया राहूल । मस्त सुट्टीवर ।
नेते कट्टीवर । राज्योराज्यी ॥
गांधी जयंतीला । स्वप्न करू पुरे ।
पक्ष संपवु रे । आपुलाची ॥
मुख्यमंत्रीपदी । दलित चेहरा ।
कावरा बावरा । सिद्धुपायी ॥
देती राजीनामा । पाठोपाठ मंत्री ।
नाराज वाजंत्री । अंगणात ॥
कांत ढासळतो । कॉंग्रेसचा किल्ला ।
राहुलला सल्ला । कोण देतो ॥
(29 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 188

(कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, मनिष तिवारी सर्वच ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात सुर लावला आहे. राज्यांराज्यांतील भांडणी संपायला तयार नाहीत.)

आम्ही जी-तेवीस । नाही जी-हुजूर ।
सिब्बलचा सुर । आक्रमक ॥
‘आझाद’ होवुनी । ‘गुलाम’ बोलतो ।
शब्दांनी सोलतो । चिठ्ठीतुनी ॥
व्याकुळ ‘तिवारी’ । विचारतो प्रश्‍न ।
पाकमध्ये जश्‍न । कशासाठी ॥
कार्यकर्ता सच्चा । पंजाबात दु:खी ।
शिवी त्याच्या मुखी । नेत्यांसाठी ॥
छत्तीसगडात । अस्वस्थ ‘बघेल’ ।
किती ही टिकेल । खुर्ची माझी ॥
‘पायलट’ विना । ‘अशोक’ विमान ।
चाले घमासान । राजस्थानी ॥
मतदारे दिले । सत्तापद ओटी ।
त्याची करी माती । कांत म्हणे ॥
(30 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-189

(माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर फरार घोषित करावे लागले. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महा संचालक यांना सीबीआय ने नोटिसा पाठवल्या आहेत.)

कुठे गेला शोधा । मंत्री देशमुख ।
लपवे श्रीमुख । कोण्या घरी ॥
सीबीआय पुसे । मुख्य सचिवाला ।
कुठे लपविला । माजी मंत्री ॥
नोटिस जाताच । उतरे जरब ।
हबके ‘परब’ । मनोमनी ॥
बोलके प्रवक्ते । आता गप्प कसे ।
काकांचीही बसे । दातखीळ ॥
‘परम’ पळाला । लावुनिया काडी ।
अडके आघाडी । कायद्यांत ॥
सेनेची ‘भावना’ । जाहला ‘आनंद’ ।
सीबीआय छंद । छापामारी ॥
घोटाळ्यांची धुणी । बडवे परीट ।
सोमय्या किरीट । कांत म्हणे ॥
(1 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, September 29, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६२



उरूस, 28 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 184

(संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी ज्यो बायडेन यांच्यासाठी एक ट्विट केले. त्यात भारतातील किसान आंदोलनाची दखल घेवून मोदींना समजावून सांगा असा आग्रह धरला आहे.)

टिकैत करतो । बीडेनला ट्विट ।
नवे टूलकिट । जाणा जरा ॥
बायडेन तुला । घालतो साकडे ।
सांग बोल खडे । मोदीसाठी ॥
‘कनुन वापसी’ । अडकली गाडी ।
गवसेना नाडी । किसानांची ॥
बोलभांड खुप । पुरोगामी दर्दी ।
शेतकरी गर्दी । जमेचीना ॥
सर्वौच्च कोर्टात । आता आहे चेंडू ।
कोणाशी मी भांडू । कळेचीना ॥
पत्रकार आता । पाहतात टाळू ।
कुणासाठी गाळू । अश्रु दोन ॥
परक्या दाराशी । घरचे भांडण ।
बुद्धीचे कांडण । कांत म्हणे ॥
(26 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 185

(संजय राउत नेहमीप्रमाणे बेताल बोलले आहेत. 2024 पर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार, राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांना त्यांनी इशारा दिला आहे की मुख्यमंत्री अमित शहांना भेटले आहेत तेंव्हा लक्षात घ्या. नाना पटोले यांनी दादापेक्षा नाना मोठा असा चिमटा अजीत दादांना काढला आहे.)

नेहमीप्रमाणे । संजय उवाच ।
बोलतो उगाच । काही बाही ॥
आवेश तो पहा । ‘आता दिल्लीवर ।
आमची नजर । सज्ज रहा’ ॥
बेडकी फुगुन । होईल का बैल ।
जीभ जरी सैल । सोडली ही ॥
बोलभांड नाना । बोललेत ज्यादा ।
नानापेक्षा दादा । धाकलाच ॥
अजीत दादांची । उगा काढी खोडी ।
मित्रपक्ष फोडी । आघाडी ही ॥
राजकारण ना । स्टँडप कॉमेडी ।
जनताच वेडी । पाहणारी ॥
घालविली पत । नको ते बोलुन ।
इज्जत खोलुन । कांत म्हणे ॥
(27 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-186

(संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदचे आवाहन केले. त्याला लोकांनी अतिशय अल्प असा प्रतिसाद दिला. कांही जागी जाणीवपूर्वक मोठे ट्रक लावून रस्ता अडवला गेला. परिणामी 5/10 किमी लांब चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी सामान्य लोकांना अतिशय अडचणीला तोंड द्यावे लागले. )

‘भारत बंद’चा । केला ऐसा खेळ ।
कुणाचा न मेळ । कुणापाशी ॥
कृषी आंदोलन । राहिला न मुद्दा ।
जनतेला गुद्दा । बसतसे ॥
अडवले रस्ते । वाहनांच्या रांगा ।
अरेरावी नंगा । नाच चाले ॥
संचार स्वातंत्र्य । आणले धोक्यात ।
टिकैत झोक्यात । सत्ताकांक्षी ॥
कृषी आंदोलन । राहिले न ‘कृषी’ ।
राजकीय उशी । सोयीची ती ॥
सामान्य जनता । धरली वेठीला ।
देशाच्या गाठीला । गोंधळ हा ॥
कांत कायद्याने । शोधावे तत्पर ।
प्रश्‍नाला उत्तर । आडमुठ ॥
(29 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, September 26, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६१


 
उरूस, 25 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 181

(महालक्ष्म्या गणपती हे सण झाले. कोरोना आपत्तीतही लोकांनी सण साजरे केले. अपार श्रद्धेच्या बळावर हा समाज इतकी वर्षे टिकला आहे. सातत्याने आघात होवूनही आपली श्रद्धा त्यांनी जतन केली.)

महालक्ष्म्या झाल्या । गणपती गेले ।
श्रद्धावंत डोळे । ओले ओले ॥
जगण्यावरती । कोरोनाचे वण ।
तरी केला सण । साजरा हा ॥
शतकांपासुनी । झेलुनी आघात ।
जपलेली वात । अस्मितेची ॥
बदलाची ऐसी । कित्येक वादळे ।
श्रद्धेचिया बळे । पचविली ॥
भोगल्या वेदना । पापण्याला पुर ।
सोसल्याचा सुर । होतो इथे ॥
गोदेचा गंगेचा । प्रदेश सुपीक ।
तरारले पीक । संस्कृतीचे ॥
दु:ख दळुनिया । खाती ही माणसे ।
विश्वावर ठसे । कांत म्हणे ॥
(23 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 182

(राज्यपालांनी पत्र लिहून राज्यातील महिलांवरील आत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आणि विधीमंडळाचे अधिवेशन बोविण्याची सुचना मुख्यमंत्र्यांना केली. याला उत्तर देतांना आधी भारतातील इतर राज्यांतील स्त्री अत्याचारांची दखल घ्या आणि संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा सल्ला राष्ट्रपतींना द्या असा अगोचरपणा मुख्यमंत्र्यांनी केला.)

बाण प्रती बाण । रामायणी जैसे ।
पत्रापत्री तैसे । चाले इथे ॥
कोशियारी लिही । उद्धवासी पत्र ।
स्त्री दु:खाचे सुत्र । सांगतसे ॥
उद्धवाचे आले । रागात उत्तर ।
चालवा थुत्तर । केंद्राकडे ॥
संसदेचे आधी । बोलवा की सत्र ।
मग लिहा पत्र । आम्हाला हे ॥
उच्चपदी चाले । लेटरा लेटरी ।
खेटरा खेटरी । सामान्यांना ॥
पिडीत स्त्रियांचा । उमटे आक्रोश ।
बेधुंद बेहोश । सत्तांध हे ॥
स्त्रीच्या प्रतिष्ठेला । तुडवी जो पायी ।
रसातळा जाई । कांत म्हणे ॥
(24 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-183

(अमेरिकेत क्वॅड परिषदेसाठी पंतप्रधान मोदी गेलेले आहेत. तिथे त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. दोन मोठे लोकशाहीवादी देश एकमेकांना भेटत आहेत. त्यातून जगात सर्वत्र विकासात्मक कामासाठी लोकशाही मुल्ये रूजविली जावीत अशी अपेक्षा. )

लोकशाहीवादी । दोन मोठे देश ।
जगाला संदेश । काय देती ॥
एक लोकशाही । ज्येष्ठ जी वयाने ।
दुजी आकाराने । मोठी असे ॥
एक आधुनिक । दुसरा प्राचीन ।
भेटीमुळे चीन । चिंताग्रस्त ॥
चीन नियमांची । करी मोडतोड ।
जिरवाया खोड । सज्ज सारे ॥
अमेरिका आणि । सज्जन भारत ।
मिळविती हात । जगासाठी ॥
जग विकसेल । लोकशाहीमुळे ।
युद्ध हेच खिळे । उपटा की ॥
अमेरिका करी । शस्त्राचा बाजार ।
मुख्य तो आजार । कांत म्हणे ॥
(25 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, September 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६०



उरूस, 22 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 178

(किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यावर उलट त्यांच्यावरच कोल्हापुर जिल्हाबंदीचा आदेश लागू करण्यात आला. )

रोज पोलखोल । आणतोय झीट ।
सोमय्या किरीट । महाराष्ट्री ॥
कोल्हापुरामध्ये । प्रवेशाला बंदी ।
आरोपाची बुंदी । रोज पाडे ॥
पन्नास शंभर । कोटींचे आरोप ।
बदनामी खुप । होत आहे ॥
हजारो कोटींत । आमचा नंबर ।
पन्नास शंभर । शोभेची ना ॥
एकट्याच्या नको । उखाळ्या पाखाळ्या ।
पकडा महाळ्या । मुख्य तोची ॥
सेना राष्ट्रवादी । आरोपात बाजी ।
प्रकटे नाराजी । कॉंग्रेसची ॥
सत्ता म्हणजेच । भ्रष्टाचार गंगा ।
हर एक नंगा । कांत म्हणे ॥
(20 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 179
(राजस्थानमध्ये मुस्लिम जमावाने दलित तरूणांची मारहाण करून हत्या केली. यावर आता सर्व पुरोगामी चुप्प आहेत. पंजाबमध्ये दलित चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवला म्हणून स्वत:ची पुरोगामी आरती ओवाळणारे याच कॉंग्रेसची राजवट असलेल्या राजस्थानमध्ये दलितांच्या ‘लिंचिंग’बद्दल मौन बाळगतात हा दुट्टप्पीपणा आहे.)

राजस्थानमध्ये । दलिताची हत्या ।
पंजाबात सत्ता । देखावा तो ॥
दलित वापरू । इलेक्शन तोंडी ।
बाकी त्यांची कोंडी । सदोदीत ॥
जगजीवनांना । सदा वापरले ।
नाही बसवले । उच्च पदी ॥
निवडणुकीत । सुशील कुमार ।
निकाला नंतर । देशमुख ॥
हरियाणामध्ये । शैलजा कुमारी ।
सत्तेची पायरी । दुय्यमच ॥
कॉंग्रेस धोरण । बाबासाहेबांना ।
भारतरत्न ना । कधी दिले ॥
कांत राजकिय । वेशीच्या बाहेर ।
मानाचा आहेर । दलितां ना ॥
(21 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-180

(सेनेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार हे कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणारे आहेत. ते आमचे नेते कसे काय होवू शकतील? असा सवाल करून मोठा गदारोळ उठवून दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत असा सुर त्यांनी आपल्या भाषणात लावला होता.)

गीतेमुळे तेंव्हा । अर्जून पेटला ।
शत्रुला खेटला । जोरदार ॥
‘गीते’मुखी आता । शब्दबाण सुटे ।
सैनिक हा पेटे । मनोमन ॥
खुपसून ज्यांनी । पाठीत खंजीर ।
सत्तेचा अंजीर । मिळविला ॥
आमुचा तो नेता । कशास म्हणता ।
राजा हा जाणता । म्हणो कुणी ॥
बाळासाहेबांचे । आम्ही निष्ठावंत ।
नाही सत्ताजंत । लाचार जे ॥
‘अनंत’मुखाने । प्रगटली वाणी ।
विद्रोहाची गाणी । ‘गीते’तुनी ॥
कांत सत्तेसाठी । असंगाशी संग ।
उडू लागे रंग । आघाडीचा ॥
(22 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575