Tuesday, January 12, 2021

मूर्ती मालिका - २४


 
नृत्यमग्न शिव
वेरूळला (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) लेणी क्र.१३ ते २९ या हिंदू लेण्या आहेत. यात प्रामुख्याने शिवाची शिल्पे आहेत. यातही परत नृत्य करणार्या शिवाची शिल्पे खुप वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
इथे घेतलेले छायाचित्र लेणी क्र. १४ मधील आहे. मुर्ती आता खंडित झालेली आहे. पण अगदी पहिल्याच दर्शनात मुर्तीकाराने शिल्पबद्ध केलेली लयबद्धता डोळ्यात ठसते. प्रत्यक्ष शिवतांडव चालू असताना कॅमेर्याने शुटींग करावे आणि त्यातील एक फ्रेम स्थिर करून ठेवावी अशी एक विलक्षण गती या शिल्पात जाणवते. मुर्ती खंडित असल्याने इतर बारकावे तज्ज्ञ नजरेने शोधावे लागतात. उजव्या बाजूला खाली पखवाज सारखे वाद्य उभे ठेवून ड्रम सारखे वाजशिणारे तीन वादक आहेत. बाजूला कृश देहाची भृंगी आहे. पाठीमागे गणांसह पार्वती आहे. ब्रह्मा विष्णु आहेत. ऐरावतावर बसलेला इंद्र आहे. एडक्यावर बसलेल्या अग्निचिही मुर्ती कोरलेली आहे. पार्वती डावे कोपर टेकवून आरामात उभं राहून नृत्य करणार्या शिवाकडे कौतूकाने पहात आहे. आठ हातांचा हा नृत्यमग्न शिव विलक्षण कलात्मक उर्जेने भारलेला भासतो. शिल्पकाराने मुर्तीचा तोल साधण्यासाठी हातांची रचना, बाजूच्या शिल्पांची रचना, अगदी पायाच्या पंज्याची रचना विलक्षण सुंदर पद्धतीने केली आहे. मुख्य डाव्या उजव्या दोन हातांची बोटं एकमेकांत गुंतवून एक सुंदर नृत्यमुद्रा साकार झाली आहे. यातील बारकावे अभ्यासक अजून नेमके सांगु शकतील. पण एका सामान्य दर्शकाच्या डोळ्यात विलक्षण ऊर्जापूर्ण नृत्यआवेश ठसून राहतो. आता लगेच ही मुर्ती जिवंत होउन डावा टेकवलेला पंजा कायम ठेवून उजवा पाय फिरवत गिरकी घेईल की काय असेच वाटते.
Travel Baba Voyage
do u remember we watched shiv tandav dance at
Mahagami Gurukul
. u may have pic of that.



महिषासुर मर्दिनी - निलंगा
निळकंठेश्वर मंदिर (निलंगा, जि. लातुर) मंदिराच्या मंडोवरावरील देवकोष्टकात ही मूर्ती आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने नउ दिवस उपासना केली. देवीला सर्व देवांनी आपली शस्त्रे बहाल केली. मग ती युद्धावर गेली अशी कथा आहे. या मूर्तीतील वेगळेपण माझ्या डोळ्यात चटकन भरले ते म्हणजे देवीच्या हातातील शंख व चक्र ही विष्णुची आयुधे. अभ्यासकांना (
Dr-Arvind Sontakke
आणि
Maya Shahapurkar Patil
) मी विचारले की ही महिषासुर मर्दीनीच आहे का? चक्र धरण्याची पद्धतही जरा वेगळी आहे.
शिल्पकाराने चारच हात दाखवले आहेत. सहसा आठ किंवा जास्त हात दाखवले जातात. महिषासुर केवळ डोके न दाखवता पूर्ण दाखवला आहे. खाली रेडाही पूर्ण आहे. डाव्या बाजूला सिंह आहे पण तो नीट दिसत नाही.
देवीचा त्रिशुळ जो भंगला आहे तो जोरकसपणे तिरका महिषासुराच्या देहात घुसवला आहे. देवीचा एक पाय महिषासुराच्या देहावर एक तिरका जमिनीवर. अतिशय सुरेख कलात्मक असा तोल साधलेले शिल्प. तिचे किमान दागिने, चेहर्यावरचे ठाम भाव, नाजूकता स्त्रीची स्वाभाविकता न सोडता शक्ती प्रकट करायची मोठं अवघड कसब इथे साधल्या गेले आहे. किमान अलंकरण आणि कमाल परिणाम असे हे शिल्प आहे.
छायाचित्र सौजन्य दत्ता दगडगावे लातूर.



तहान देवता - पैठण
पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील ज्ञानेश्वर उद्यानात (जे की आता पूर्णत: उद्ध्वस्त आहे) बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या अंगणात काही प्राचीन शिल्प अवशेष मांडून ठेवले आहेत. यात शेषशायी विष्णु, शिवपार्वती, सुरसुंदरी, कोरीव दगडी रांजण अशी शिल्पं आहेत. त्यातील हे एक शिल्प. प्रथमदर्शनी जलकुंभ घेतलेली सुरसुंदरी असावी असे वाटले. पण बारकाईने बघितल्यावर खालच्या आकृतीकडे लक्ष गेले. पाण्यासाठी ओंजळ पसरलेली एक व्यक्ती आढळून येते. ती पाहताच शिल्पाचा अर्थच बदलून जातो. तहानलेल्यांना पाणी देण्याचा शांत भाव स्त्रीच्या चेहर्यावर झळकायला लागतो. तहानेची कासावीस पसरलेल्या ओंजळीमागच्या चेहर्यावर दिसायला लागते. या शिल्पाला नाव काय द्यावे? सुरसुंदरी शोभत नाही. जलदेवता म्हणावं तर त्याला वेगळा अर्थ आहे. शिल्पशास्त्रात याला वेगळे नाव नाही. मुळात हे शिल्प केवळ शास्त्र म्हणून किंवा सौंदर्य म्हणून निर्माण झालेलं वाटतच नाही. तहानेने व्याकुळलेला माणुस आणि त्याची तहान भागवणारी स्त्री असं हे शिल्प आहे. म्हणून मी याला "तहान देवता" असं नाव देतो.
जागते रहो चित्रपटात राज कपुर रात्रभर पाण्यासाठी वणवण भटकतो. पहाटे पहाटे त्याला तुळशीची पुजा करून पाणी घालणारी सुस्नात नर्गीस दिसते. तिच्यासमोर तो ओंजळ पसरतो आणि ती वरतुन पाण्याची धार ओतते. "जागो मोहन प्यारे" हे लताच्या आवाजातील गाणं पार्श्वभुमीवर वाजत रहातं. सलील चौधरीच्या या अवीट गाण्याचे सुर हे शिल्प पाहताना माझ्या मनात घुमत होते.
Travel Baba Voyage
total credit goes to u friend.
Akash Dhumne
मित्रा तू या उद्ध्वस्त बगीचाकडे मागच्या दारानं नेलं नसतं तर माझेही लक्ष इकडे गेलेच नस्ते. तूम्हा दोघांचे धन्यवाद.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका - २३



लोभस बाळं व सप्तमातृका
वेरूळ (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) मधील कैलास लेणं वगळलं तर इतर लेण्याकडं पर्यटकांचे पाउल वळत नाही. "रावण की खाई" नावाने ओळखले जाणार्या १४ व्या क्रमांकाच्या लेण्यातील या सप्त मातृका. बसलेल्या सात स्त्रीया आणि त्यांच्या भोवती बागडणारी मुलं असा हा सुंदर लोभस शिल्पपट आहे. मुल आईच्या पायाशी घोटाळत असून मांडीवर घेण्याचं आर्जव करत आहे, कुठे मांडीवर बसून स्तनांना तोंडात घेवू पहात आहै, कुठे मांडीवर उभं राहून आईच्या कानातल्यां आभुषणाशी खेळत आहे, या सातही मातृका अलंकाराने नटलेल्या आहेत. पुत्रवल्लभेचं एक अतीव समाधान या मूर्तींच्या चेहर्यावर आहे. स्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणतात हे तंतोतंत सिद्ध करणारं हे शिल्प. ही बाळं नग्न आहेत. यातूनही परत एक निर्व्याजता दाखवली आहे. बोरकरांच्या पाणी कवितेत एक ओळ अशी आलेली आहे
खोल काळ्या बावडीचे
पारदर्शी मग्न पाणी
कोकरूसे नाचणारे
खेळणारे नग्न पाणी
तशी ही बाळं आई भोवती नागव्याने बागडत आहेत. देवदेवतांची शिल्पं पाहताना त्यातील स्वाभावीक मानवी भाव भावनांचे जे दर्शन होते त्याकडे आपले दूर्लक्ष होते. सप्तमातृका खुप ठिकाणी कोरलेल्या आढळून येतात. पण अशी लोभसता कुठे नाही. या शिल्पाचा कुणी फारसा उल्लेख करत नाही याची खंत वाटते. "वेरूळ लेणी" याच नावाने मधुसूदन नरहर देशपांडे यांचे सुंदर पुस्तक अपरांत प्रकाशनाने प्रकाशीत केले आहे. त्यात यावर लिहिले आहे. वेरूळ लेणी पाहायला येणार्यांनी या पुस्तकाचा वापर जरूर करावा.
Travel Baba Voyage
मित्रा तूझे छायाचित्रासाठी आभार. आम्हा भारतीयांना आमच्या संस्कृतीची ओळख करून देणार्या तूझ्या सुसंस्कारीत फ्रेंच मानसिकतेला लाख लाख प्रणाम.



द्वारशाखेवरील 3D शिल्प

होट्टल मंदिरातील गर्भगृहाच्या तोरणावरील 3D शिल्पाचा उल्लेख यापूर्वी या मालिकेत आला आहे. हे आताचे शिल्प आहे अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) येथील महादेव मंदिराच्या द्वारशाखेचे. अतिशय आकर्षक अशी ही द्वारशाखा. एकुण पाच द्वारशाखा या मंदिराला आहेत. शार्दूल शाखा, पुष्प शाखा, स्तंभ शाखा, पुष्प शाखा अशा क्रमाने चार शाखा आहेत आणि पाचवी छायाचित्रात दिसणारी विद्याहार शाखा. गायन वादन नृत्य करणारे स्त्री पुरूष यावर कोरलेले आहेत. यात मध्यभागी पुरूष आहेत आणि आजू बाजूला छोट्या आकारात स्त्रीया आहेत.
कोपर्याचा वापर करून त्यावर अशी नक्षी कोरायची हे आवाहन शिल्पकाराने लिलया पेलले आहे. आश्चर्य म्हणजे यातील प्रत्येक शिल्प वेगळे आहे. एकच आकृती परत परत डिझाईनचा भाग म्हणून काढलेली नाही. प्रत्येक शिल्पाचा वेगळा विचार केला आहे हे विशेष. या द्वारशाखांवर एका बाजूला विष्णु आणि एका बाजूला लक्ष्मी कोरलेली आहे. आपण ज्याला एकसारखे बारीक डिझाईन समजतो ते एकसारखे नसते. जवळून बारकाईने निरिक्षण केल्यास त्यातील फरक लक्षात येतात आणि थक्क व्हायला होतंं. एका पुष्पशाखेत कळी पासून अर्ध उमलले, पुर्ण उमललेले, कोमेजलेले अशा सर्व अवस्था दाखवलेल्या आहेत. एक एक मंदिर पहायचे तर किमान एक दिवस तरी पूर्ण घालवला पाहिजे. ज्या अनाम शिल्पकारांनी आयुष्य खर्च करून हे निर्माण केलं त्यांच्यासाठी किमान दिवस तर खर्च करून कलेला दाद द्यावी.



द्वारपाल - वालूर
वालूर (ता. सेलु, जि. परभणी) हे अतिशय प्राचीन वारश्याने संपन्न असे गाव.
Malharikant Deshmukh
या मित्राने याच गावावर लिहिलं आहे. या गावातील सिद्धेश्वर मंदिरावरील हे द्वारपाल. वेरूळच्या कैलास लेण्यांतील द्वारपालांवर नुकतंच लिहिलं होतं. त्याच्या साधारण ५०० वर्षानंतरचा या मंदिराचा कालखंड असावा. द्वारपालांचे मुकुट, पाठीमागची प्रभावळ, अलंकरण यादवांच्या काळातील समृद्धी दर्शवते. उत्तर यादवांच्या काळातील मंदिरं आणि बारवा या परिसरांत प्रामुख्याने आढळतात. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालूक्य आणि यादव या राजघराण्यांची समृद्धी या भागातील प्राचीन वारशावरून स्पष्ट होते.
या दोन्ही द्वारपालांचे दरवाजाच्या दिशेचे पायाचे पंजे आत वळलेले आहेत आणि विरूद्ध दिशेचे सरळ समोर आहेत. म्हणजे आतून काही आज्ञा आली की आत वळायचेच आहे. या शिल्पांत उभं राहण्याची ललित मूद्रा मोहक आहे. मंदिराचा जो भाग शिल्लक आहे त्यावर फारसे शिल्पांकन नाही. इथेच एक मैथून शिल्पाची शिळा निखळून पडली आहे. त्यावरून आणि या द्वारपालांवरून कोसळलेल्या भागात काही शिल्पे असावीत याचा अंदाज येतो.
या मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर वाळवणं घातली आहेत. भिंतींना खिळे ठोकून दोर्यांवर कपडे वाळत घातले आहेत. मंदिराच्या बाजूने गटार वहाते आहे. मंदिराच्या भिंतीला लागुन चुली मांडल्या आहेत पाणी तापविण्यासाठी. त्याची काजळी भिंतींवर चढत आहे. मंदिराच्या छतावर गवत वाढले आहे. काय अनास्था आहे कळत नाही. अशा उकिरड्यात हे शिल्पसौंदर्य पडलेलं आहे.

- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

Friday, January 8, 2021

कृषी कायदे: अदानीं संदर्भातील भिती निराधार

 


उरूस, 7 जानेवारी 2021 

मिलिंद मुरूगकर यांनी लोकसत्ता (7 जानेवारी 2021) मध्ये एक लेख लिहून सध्या चालू असलेल्या कृषी आंदोलनाबाबत काही भितीचे मुद्दे समोर मांडले आहेत. 

पहिला मुद्दा समोर आणला जातो आहे तो आहे कृषी बाजार समिती बरखास्त करून राज्याचे नियमनाचे अधिकार केंद्राने स्वत:कडे घेतले आहेत. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त केलेली नाही. ती चालूच राहणार आहे. शिवाय आजही केरळ सारख्या राज्यात जिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच अस्तित्वात नाही तिथे राज्याची काय भूमिका आहे?  मुरूगकर विनाकारण बुद्धिभेद का निर्माण करत आहेत? 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जे व्यवहार होतील ते मुक्त असतील यात नेमकी टिका करण्यासारखे काय आहे? याचे कराबाबतचे जे नियम असतील त्यावर चर्चा करण्याची तयारी केंद्रिय कृषी मंत्र्यांनी दाखवलेली आहेच. इतर उत्पादनांच्या व्यापाराबाबत जीएसटी जी भूमिका निभावत आहे तशीच शेतमालाच्या बाबतीत पण निर्माण करता येईल. यावर गदारोळ करण्याची काहीच गरज नाही. एक देश एक बाजारपेठ हे इतर औद्योगिक उत्पादनाबाबत शक्य असेल तर शेतमाला बाबत का शक्य नाही? रस्ते, बाजारपेठ, रेल्वे, पाणी, वीज या बाबत काही समान धोरणे देश पातळीवर एकत्रितपणे ठरविली गेली तर त्यात गैर ते काय आहे? 

सध्या पेट्रोल आणि अल्कोहल हे दोन जीएसटीच्या बाहेर आहेत. बाकी सर्वांना जीएसटीच्या परिघात घेण्यात आले आहे. यातच आता शेतमालाचा समावेश करता येईल. तेंव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्याचे अधिकार या बाबत इतके हळवे होण्याची काहीच गरज नाही.

अगदी आत्ता या क्षणालाही कितीतरी शेतमाल जो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच आहे, एमएसपी च्या बाहेरच आहे त्याचा व्यवहार कसा चालू आहे? तो शेतकरी सरकारच्या गळ्यात पडून आम्हाला भीक वाढा म्हणून रडत बसला आहे काय? 

हे आंदोलन चालू आहे तेच मुळी गहू आणि तांदूळ या दोनच शेतकर्‍यांचे. आणि तेही पंजाब आणि हरियाणातील. त्यात बाकी इतर कुठलाच शेतकरी सहभागी नाही. जर चालू व्यवस्थेचा लाभ मिळतच असेल तर या दोनच पीकांच्या शेतकर्‍याला आणि या दोनच राज्यांतील शेतकर्‍यांना प्रामुख्याने मिळत आलेला आहे. तेंव्हा त्यांची वकिली करत मुरूगकर संबंध देशातील शेतकरी आणि संबंध शेतमाला बाबत बोलतच कशाला आहेत? 

पहिला मुद्दा इथेच निकाली निघतो सध्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आणि एमएसपीच्या बाहेर जो काही शेतमालाचा व्यापार चालू आहे त्याचे आकारमान प्रचंड आहे. त्याचा या आंदोलनाशी तसाही काही संबंध नाहीच. 

दुसरा मुद्दा अदानी उद्योग समूहाबाबत मुरूगकर यांनी पुढे आणल आहे. देशात कुठलाही उद्योगपती किंवा सरकार कुणाचीही मक्तेदारी नसावी अशीच मागणी सातत्याने शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना करत आलेली आहे. उलट आत्तापर्यंत नेहरूंच्या समाजवादी नियोजन व्यवस्थेने सरकारी लायसन कोटा परमिट राज्य भक्कम केले. त्यामुळे सरकार किंवा सरकारी पिद्दू असलेल्या उद्योगपती व्यापार्‍यांची मक्तेदारी निर्माण झाली. परकिय गुंतवणूक मोठ्या मॉल्स मध्ये येवू देण्यापासून कुणी अडथळे निर्माण केले होते? 2004 नंतर या क्षेत्रात रिलायन्स सारख्या कंपन्यांना फायदा पोचावा म्हणून कोणते सरकार काम करत होते? आणि आरोप मात्र आता खुला बाजार होत असताना मोदी सरकारवर केला जात आहे. अदानी समुहाची धान्य साठवणुकीची गोदामे ही जर यांच्या डोळ्यात भरत असतील तर त्याच्या बाहेरचा जो शेतमाल आहे जो की नाशवंत आहे त्याचा व्यापार प्रचंड आहे. गहू तांदूळ आणि मका यांची एकत्रित खरेदी गृहीत धरली तरी त्या पेक्षा एकट्या दुधाची उलाढाल जास्त आहे. फळे आणि भाजीपाल्याची बाजारपेठ मोठी आहे. अगदी धान्यांचाही विचार केला तरी स्थानिक बाजारपेठ आणि लोकांच्या खाण्याच्या सवयी यात भरपुर विविधता आहे. अगदी महाराष्ट्रात मका बाजरी गहु ज्वारी तांदूळ या पाच धान्यांचा विचार केला तर यांचा वापर विविध भागात वेगवेगळा आहे. गहू तांदूळ ज्वारी यांच्या तर इतक्या जाती वापरल्या जातात की त्यावर कुणी एक माणूस एक उद्योग समूह नियंत्रण मिळवेल याची जराही शक्यता नाही. शिवाय स्थानिक पातळीवर उत्पादन, साठवणुक व विक्री ही पण एक साखळी आख्ख्या भारतभर कार्यरत आहे. काही भाज्या विशिष्ट परिसरांतच तयार होतात आणि तिथेच खाल्ल्या जातात. 

संपूर्ण भारत खाद्या पदार्थांच्याबाबत कमालीचा स्थानिक आहे. सगळ्या भारताचा लसावी काढून एक दोनच धान्यांचा विचार केल्यास गहू आणि तांदूळ यांच्या दोन तीन सामान्य जातीच त्या काय सगळीकडे फार तर आढळून येतात. या शिवााय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जातींचा वापर खाद्य पदार्थात होतो. मग यावर कुणी एकच नियंत्रण मिळवू पहात असेल तरी कसे शक्य आहे? अदानींची भले खुप इच्छा आहे किंवा मोदी सरकार भले त्यांना खिशात घेवून फिरत आहे. पण भारतीय ग्राहक एकाच पद्धतीचे धान्य खरेदी कसा करेल?

आणि परदेशी बाजारपेठेचा विचार केल्यास ती अतिशय चोखंदळ आहे. त्यांच्या अटींची पुर्तता केवळ कुणी साठवणुकदार कसा काय पूर्ण करू शकेल? त्याला उत्पादकांना विचारात घ्यावेच लागेल. अदानींनी गहू आणि तांदळाची बाजारपेठ साठवणुकीसाठी पूर्णत: खावून टाकली असे एकवेळ वादासाठी मान्य करू. पण या अदानीला गहू आणि तांदळाच्या शेतकर्‍याचे पाय धरावेच लागतील ना. या गहू आणि तांदळाच्या विशिष्ट प्रकारच्या जाती, चव, रंग, गंध यासाठी उत्पादकाला विश्वासात घेतल्या शिवाय तो दर्जा राखता येणारच नाही. 

उलट रेशन सारख्या सरकारी बिनडोक बिनदर्जाच्या खरेदी वितरणाबाबतच एकाधिकार निर्माण होणे शक्य आहे. खुल्या बाजारात अशा पद्धतीने धान्य खरेदीचा एकाधिकार हे दिवास्वप्न आहे. विरोधकांच्या आरोपाप्रमाणे या शासनाची इच्छा असली तरी ते वास्तवात शक्य नाही. 

शेवटचा मुद्दा मुरूगकर आपल्या लेखात मांडतात तो अदानी उद्योग समूहाची गेल्या सहा वर्षांत कशी वाढ झाली. त्यांचा फायदा व्हावा म्हणून सरकारने घाईघाईने हे विधेयक आणले व मंजूर करून घेतले.

ही भिती तर इतकी हास्यास्पद आहे की त्यावर काय बोलावे लिहावे हेच कळत नाही. फोर्ब्स मासिकात कोणता उद्योगपती कोणत्या क्रमांकावर आहे आणि त्याची वाढ इतक्या काळात कशी आणि काय झाली या आधारावर आपण जर एखाद्या शासनाच्या धोरणाची चिकित्सा करणार असू तर कमाल झाली. 

मुळात अदानी उद्योग समुह काय आणि कसा वाढला यावर अर्थशास्त्रज्ञांनी अभ्यास करावा. ज्या डॉ. सुधा नारायण यांच्या सारख्यांचे संदर्भ मुरूगकर देत आहेत ते अर्धवट आणि दिशाभूल करणारे आहेत. राज्यांना बेदखल करत केंद्राने नियमनाचे अधिकार आपल्याकडे घेतले हा आरोपच मुळात चुक आहे. शेतमालाची बाजारपेठ देशपातळीवर एक असावी असं धोरण म्हणजे राज्यांचे अधिकार केंद्राने आपल्याकडे घेणे नव्हे. पहिल्या मुद्द्यात स्पष्टीकरण आले आहे त्या प्रमाणे जीएसटी सारखंच शेतमाल व्यापाराचे धोरण देशपातळीवर ठरविण्यात येते आहे. त्यात काहीच गैर नाही किंवा राज्याचा अधिकार संकोच करणे असे नाही. 

सुधा नारायण सारखे अर्थशास्त्रज्ञ जेंव्हा ‘डेटा तंत्रज्ञान’ मक्तेदारी निर्माण करते असे विधान करतात हे तर हास्यास्पद आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात माहिती गोळा करणे म्हणजे फार काही कष्टाचे भांडवली गुंतवणुकीचे काम आहे असे नाही. अगदी एखाद्या हॉटेलात तूम्ही जेवणासाठी गेलात आणि त्याला तुमचा मोबाईल नं. प्राप्त झाला तर तो त्याच्या परिसरांतून तूमची गाडी गेली तरी तूमच्या मोबाईलवर त्याच्या हॉटेलच्या जेवणाचा मेसेज करतो आणि तूमचे स्वागत करतो. त्यात काय विशेष? माहिती कुणीही गोळा करू शकतो. अगदी आत्ताच्या काळातही तूमच्या गावातला सोनार तूमच्या चार पिढ्यांपासून संबंधीत असतो. 20 वर्षांपूर्वी तूमच्या आईने दोन तोळ्याचे गळ्यातले करून नेले होते तेच तूम्ही आता मोडून नविन करून पहात अहात. हे सोने चांगले आहे. मोडू नका डाग लागेल. त्यापेक्षा नविन करा. किंवा यालाच उजळून देतो वापरा असा सल्ला देतो ते केवळ त्याच्यापाशी मेंदूत तूमची माहिती असते म्हणून. या ऐवजी ही सगळी माहिती कुणी दुकानदार व्यापारी संगणकावर व्यवस्थीत नोंदवून ठेवणार असेल तर त्याची भीती कसली? 

माझ्या मराठवाडा परिसरात कापसाचा जीनिंग प्रेसिंग उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. या उद्योजकांनी आपल्या परिसरांतील कापसाच्या शेतकर्‍यांची माहिती, त्यांचा एकरी पेरा, त्यांचे आलेले उत्पादन, त्याला मिळालेला भाव, त्याला वाहतूकीत आलेल्या अडचणी, मजूरीचे दर आदीबाबत माहिती संकलीत करून त्याचा वापर करून उद्योग वाढवला तर त्यात शेतकर्‍याचे नुकसान कसे काय होईल? किंवा हीच माहिती दुसर्‍या कुणी वापरली तर त्याचा तोटा काय आहे? 

माहिती गोळा करणे, तिचा वापर करणे यात भिती कशाची आहे? सरकारने माहिती गोळा करून ती खासगी उद्योजकांना उपलब्ध करून दिली तर कसे? अशी एक भिती मुरूगकर व्यक्त करत आहेत. मुळात आजतागायत सरकारने विविध माहिती विविध मार्गाने गोळा केलेली आहेच ना. त्याने शेतकर्‍याचे काय नुकसान झाले? 

जवळपास सर्वच शेतकरी कुठल्या ना कुठल्या बँकेचे खातेदार आहेतच. सर्वच शेतकर्‍यांचे बँकेत खाते आहे. हे खाते सुरू करताना शेतकर्‍याला माहिती भरून द्यावीच लागते. ती बँकेकडे आहे. त्याचा नेमका काय तोटा शेतकर्‍यांना झाला आहे? आपण आजकाल जिथे कुठे जातो, जे काही डिजिटल वापरतो तिथे माहिती गोळा होतच असते. समाज माध्यमं (सोशल मिडिया) आपली माहिती आपोआपच संकलित करत जातात. याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर शहरी मध्यमवर्ग करतो. हे किमान 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग याचा काय तोटा या मध्यमवर्गाला झाला? 

ज्याची आर्थिक स्थिती मुळातच हालाखीची आहे त्या शेतकरी वर्गाला ही भिती दाखवण्यात मुरूगकरांना काय समाधान मिळत आहे? गावोगावच्या पतपेढ्या, दुधसंघ, सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुत गिरण्या या सगळ्यात शेतकर्‍यांची माहिती गोळा झालेली आहेच ना.

माहिती गोळा करण्याची म्हणजेच डेटा तंत्रज्ञानाची भिती अतिशय व्यर्थ आहे. 

प्रत्यक्षात एक एक मुद्दा कृषी कायद्यातील घेवून त्यावर चर्चा करण्याची आंदोलक, विरोधक, अभ्यासक कुणाचीच तयारी नाही. हे हवेतच भितीचा गोळीबार करून शेतकर्‍यांना घाबरून सोडत आहेत.        

  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

 

Monday, January 4, 2021

मूर्ती मालिका -२२


शिव पार्वती पाणिग्रहण

कैलास लेणं हे केवळ अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले आहे, वास्तुशास्त्राचा अद्वितिय नमुना आहे इतकंच नव्हे. तर या लेण्यात संस्कृतीक चालीरिती कोरलेल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी आजही सनातन पद्धतीने जो विविहसोहळा पार पडतो त्यात "पाणिग्रहण" असा विधी आहे. तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेण्यांत हाच विधी अशाच पद्धतीने शिल्पांकित केला आहे.

हा प्रसंग शिव पार्वती विवाह सोहळ्याचा आहे. शिवाचा डावा हात पार्वतीच्या उजव्या खांद्यावर आहे. उजवा हात हातात घेतला आहे. पार्वती सलज्ज अशी जराशी मान खाली झुकवून उभी आहे. दोघेही ललित मुद्रते सहजतेने उभे आहेत. सुख दू:खात हीला सोबत घेवून धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ मी प्राप्त करेन, हीला सुखात ठेवेन, ही माझी सहधर्मचारीणी आहे अशा आशयाचे हे संस्कृत मंत्र आहेत. हे आजही उच्चारले जातात. शिव पार्वती जसे उभे आहेत अगदी तसेच आजही जोडप्याला उभे केले जाते. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते. म्हणूनच तीला "वामांगी" असा शब्द आहे. उजव्या बाजूला आई, बहिण, मुलगी, सुन अथवा पुरूषाची शक्ती दर्शविलेली असते.

खाली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. जे की या विवाह सोहळ्याचे पौराहित्य करत होते. कैलास लेणे या दृष्टीनेही पहायला पाहिजे.
छायाचित्र
Travel Baba Voyage



विष्णुची शक्ती रूपे - सरस्वती
अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावर विष्णुची शक्तीरूपे शिल्पांकीत आहेत. त्यातील काहींचा परिचय या मालिकेत पूर्वी आला आहे. छायाचित्रातील मूर्तीच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने (डावीकडून उजवी कडे, घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे) गदा, शंख, पद्म आणि चक्र अशी आहेत. या विष्णुला संकर्षण म्हणून संबोधले जाते. प्रतिभाशक्ती किंवा वाणी ही संकर्षण विष्णुची वैशिष्ट्ये मानली जातात. स्वाभाविकच या विष्णुची जी शक्ती आहे तिला सरस्वती हे नाव आहे. वीणा पुस्तक धारिणी म्हणून ज्या सरस्वती देवतेची पुजा होते ती सरस्वती वेगळी. ही केवळ शक्ती रूप आहे.
या शक्तीच्या चेहर्यावर शांत भाव आहेत. प्रतिभेच्या पाठिशी बळ असावे लागते. नुसती दूबळी प्रतिभा कामाची ठरत नाही. संकर्षण विष्णुला बलाची देवता मानले जाते. साहजिकच त्याची शक्ती असलेली सरस्वतीही सामर्थ्यवान समजली जाते. ज्या प्रतिभेच्या पाठिशी सामर्थ्य आहे तिथे स्थिरता येते. आणि त्या स्थिरतेतून समाधान. म्हणूनच ही मुर्तीच्या चेहर्यावरील भाव शांत समाधानी दिसून येतात.

२४ पैकी १७ शक्ती रूपाच्या मुर्ती आजही अन्वा मंदिरावर शाबूत आहेत. अभ्यासकांनी जाणकार पर्यटकांनी त्या आवर्जून नजरेखालून घालाव्यात.

विष्णुच्या हातात आयुधांचा जो क्रम आहे त्या प्रमाणे जी नावे दिली आहेत व त्या सोबत शक्तीची जी नावे आहेत ला तक्ता अभ्यासकांसाठी देत आहे. पद्म, गदा, शंख, चक्र यांच्यासाठी प-ग-श-च ही लघु नावे वापरली आहेत. हा क्रम प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे आहे.
१. केशव-किर्ती (पशचग) २. नारायण- कांती (शपगच) ३. माधव - तुष्टी (गचसप) ४. गोविंद - पुष्टी (चगपश) ५. विष्णु - ध्रती (गपशच) ६. मधुसुदन - शांती (चशपग) ७. त्रिविक्रम - क्रिया (पगचश) ८. वामन - दया (शचगप) ९. श्रीधर - मेधा (पचगश) १०. ऋषिकेश - हर्षा (गचपश) ११. पद्मनाभ-श्रद्धा (शपगच) १२. दामोदर-लज्जा (पशगच) १३. वासुदेव-लक्ष्मी (गशपच) १४. संकर्षण - सरस्वती (गशपच) १५. प्रद्युम्न - प्रीती (चशगप) १६. अनिरूद्ध - रती (चगशप) १७. पुरूषोत्तम - वसुधा (चपशग) १८. अधोक्षज - त्रायी (पगशच) १९. नरसिंह - विद्युत (चपगश) २०. अच्युत - सुगंधा (गपचश) २१. उपेंद्र - विद्या (शगचप) २२. जनार्दन - उमा (पचशग) २३. हरी - शुद्धी (शचपग) २४. श्रीकृष्ण - बुद्धी (शगपच)
(संदर्भ : Temple Architecture and Sculpture of Maharashtra - Dr. G.B. Deglurkar - page no. 362)
( इंग्रजीत ही यादी आहे. संस्कृत उच्चार वेगळे असतील तर कृपया चुक लक्षात आणून द्या. वामन आणि अच्युत शक्तींची नावे क्रिया आणि दया अशीही दिलेली आहेत. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. त्रिविक्रम विष्णुचा आयुधक्रम मुळ पुस्तकात चुकला आहे. तो इथे दूरूस्त करून दिला आहे)



भव्य द्वारपाल
कैलास लेणं (वेरूळ, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ट्य आहे भव्यता. ही भव्यता कलात्मक आहे. केवळ प्रचंड मोठी एखादी ओबडधोबड वास्तु आहे असे नव्हे.
कैलास लेण्यातील दर्शनी भागातील हे दोन द्वारपाल. सामान्य मानवी आकारापेक्षा जरा मोठेच आहेत. हातातील गदा जमिनीवर रोवून द्वारपाल अतिशय रिलॅक्स असे उभे आहेत. त्यावर त्यांची ढोपरं विसावली आहेत. त्यांच्या गळ्यातले दागिने, पायातले तोडे, कमरेची मेखला संपन्नता दर्शवतात. या भव्य मंदिरात प्रवेशणार्या भक्तांकडे ते कौतूकाने पहात आहेत.
राष्ट्रकुटांची सत्ता या काळात शिखरावर होती. त्यामुळे संपन्नता भव्यता शांतपणा असा भाव आपल्याला इथे पहायला मिळतो. ज्या ८ व्या शतकात लेणं कोरल्या गेलं त्या काळाचाही विचार केला पाहिजे.
कैलास लेण्याचा विचार असा विविध पैलूंनी करता येतो. प्रत्येकवेळी भेट दिली की काहीतरी वेगळंच लक्षात येतं. सौंदर्याची प्रचिती प्रत्येकवेळी नव्याने येते.
Travel Baba Voyage
thanks for pic.
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका -२१



लाकुड नव्हे हा दगड आहे
वेरूळ लेण्यातील ३२ क्रमांकाच्या लेणीत स्तंभावरील हे नक्षीकाम नजरेस पडले आणि पाय अक्षरश: थिजलेच. पर्णयुक्त घटाचे शिल्प खुप ठिकाणी पहायला मिळते. त्यावर उत्तम नक्षीकामही केलेले असते. पूर्ण कलशास स्त्री गर्भाचे प्रतिक मानले जाते. हे मंगल प्रतिक आहे. पूर्ण कलश म्हणजेच पाण्याने भरलेला, त्यावर पर्ण आणि या कलशास हार, रत्नांच्या माळांनी शृंगारलेले असते.

वेरूळच्या या स्तंभावर प्राचीन मांगल्य संकल्पना प्रमाणे शिल्पांकन आहेच. पण मुख्य म्हणजे शिल्पकाराने कलाविष्कारासाठी स्वातंत्र्य घेत ज्या अप्रतिम पद्धतीने बारकावे कोरले आहेत ते थक्क करणारे आहेत. कलशाच्या मुखातून खाली लोंबलेली पाने आणि त्यांना समतोल करण्यासाठी सोन्याचा मोत्याचा गोफ अशा माळा बघत रहाव्यात अशा आहेत.

कलशावर पण नक्षी कोरलेली आहे. हे सगळं एका अखंड स्तंभाचा भाग आहे. सगळं दालनच एका दगडात कोरलेलं. चुकीला जागाच नाही. मंदिराच्या उभारणीत तरी एखादा दगड शिल्पकामात डावा वाटला तर बाजूला काढता येतो. लेणीत म्हणजेच लयन स्थापत्यात चुकीला जागाच नाही. हे लक्षात घेतलं म्हणजे या कामाचे मोल कळते. कलशाच्या चारही बाजूला खाली यक्ष किन्नरही कोरलेले आहेत. वेरूळचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यता. पण कुठेही बोजडपणा नाही. कवेत येणार नाहीत असे रूंद आणि उंच खांबही विलक्षण सुंदर आहेत. कलात्मक दृष्ट्या नाजूक कलाकुसरीने मढलेले आहेत.
या लेण्यांच्या शिल्पकलेने वेडे होवून परत परत भेट देणार्यांची संख्या प्रचंड आहे. वेरूळ अजिंठ्याचा नाद लागला की माणूस "आषाढी कार्तिकी" वार्या करत राहतो.
Vincent Pasmo
हा आमचा वेडावलेला फ्रेंच मित्र वर्षातून किमान एकदा तरी वेरूळची वारी करतोच. काही परदेशी पर्यटक तर तिथेच मुक्काम ठोकुन असतात. भारतीय भावा बहिणींना हात जोडून विनंती तूम्ही कैलास लेण्याशिवाय बाकीच्या सुंदर लेण्यांना किमान एकदा भेट द्या. शांतपणे लेण्या बघा. कुठून कुठे जाताना रस्त्यात वेरूळ लागलं म्हणून वचावचा पाहून पळून जावू नका.

छायाचित्र
Travel Baba Voyage




विष्णुचे शक्तीरूप - शांती

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्तीरूपे विशेष आहेत. मुर्तीशास्त्र अभ्यासकांत या मंदिराची ओळखच त्यामुळे आहे. या पूर्वी या सदरांत काही शक्तीरूपांचा परिचय दिला होता. सोबतच्या छायाचित्रात जे शक्तीरूप आहे त्याच्या हातातील आयुधांचा क्रम उजव्या खालच्या हातात चक्र, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात पद्म आणि डाव्या खालच्या हातात गदा असा आहे. अशा विष्णुला मधुसूदन संबोधले जाते. मधुसूदन विष्णुच्या या शक्तीरूपाला शांती म्हणतात. (देगलुरकरांच्या पुस्तकांत santi असे लिहिले आहे. सांती असाही याचा उच्चार होतो. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा)

शास्त्राप्रमाणे मुर्ती कोरल्यावर शिल्पकाराने पुढे जावून जो कलाविष्कार घडवला आहे तो विलक्षण आहे. चक्र असलेला हात आणि गदेवरचा हात यात नृत्याची मुद्रा वाटावी असा समतोल आहे. शंख व पद्म धारण केलेल्या हातांची बोटे विलक्षण कलात्मक अशी वळवलेली आहेत. दोन्ही पाय दूमडलेले वक्राकार आहेत. डाव्या पायाचा तळवा संपूर्ण मुडपून समोरच्या बाजूला दिसतो आहे. गदाही सरळ नसून तिरपी आहे. कानातील कुंडले चक्राच्या आकाराची आहेत. गळ्यात एक हार मानेजवळ तर दूसरा दोन वक्षांच्या मधुन कलात्मकरित्या खाली ओघळला आहे. ठाम सरळ रेषा शिल्पात कुठेच नाही. अगदी बाजूच्या नक्षीतही नाही. मुर्तीच्या बाजूचे दोन उभे भक्कम स्तंभ जन्म आणि मृत्युचे प्रतिक मानले तर बाकी सगळ्याच शिल्पात लालित्य भरून राहिले आहे. कदाचित जन्म आणि मृत्यु या दोन बिंदूमध्य लालित्यपूर्ण आयुष्य जगले तर "शांती" लाभते असंही शिल्पकाराला सुचवायचे असेल.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



भैरव मूर्ती - वालूर
वालूर (ता. सेलू जि. परभणी) येथे वाल्मिकेश्वर मंदिर आहे. मंदिर आता नव्याने बांधलेले आहे पण हा परिसर प्राचीन अवशेषांनी भरलेला आहे. शेषशायी विष्णु, हात जोडलेला गरूड, आसनस्थ शिव पार्वती, विष्णुच्या हातातील चक्र, रिद्धी सिद्धीसह गणेश असे कैक अवशेष या परिसरात विखुरलेले मंदिरा समोरच्या वडा खाली आढळून येतात. एक प्राचीन बारव आहे जी आता जवळपास बुजली आहे.

मंदिराच्या भिंतीला टेकून ही भैरवाची मूर्ती ठेवलेली आहे. याच्या वरच्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू आहे. डोक्यावरचे केस मुंड माळेने बांधलेले आहेत. मस्तकामागे ज्वालेप्रमाणे गोलाकार प्रभा मंडळ आहे. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात नरमुंड आहे. डाव्या बाजूला खाली या नरमुंडातून टपकणारे रक्त चाटणारा कुत्रा आहे. नग्न भैरवाच्या कमरेला साखळी असून मांड्यांवर घंटा लोंबत आहेत. डाव्या बाजूला गण आहे. उजव्या बाजूस भुतनाथ आहे. गुडघ्यावरून खाली मुंडमाला लोंबते आहेत.

ललित मुद्रेत भैरव उभा आहे. एरव्ही उग्र दाखवला जाणारा हा भैरव इथ शांत चेहर्याचा दाखवलेला आहे.
या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

Sunday, January 3, 2021

कलाविषयक जागृती करणारे व्यक्तिमत्व पार्वती दत्ता




दै. लोकसत्ता 3 जानेवारी 2021 (विशेष पुरवणी)

(सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार पार्वती दत्ता यांना आज औरंगाबाद येथे प्रदान करण्यात येतो आहे.) 

कलाकारांच्या चारित्र्यात नेहमी आढळणारी बाब म्हणजे त्यांनी मेहनतीने कला कशी आत्मसात केली. गुरूकडे राहून कष्टाने ज्ञान मिळवले. प्रचंड रियाझ केला. आणि त्यांच्या कलेला रसिकांनी कसा प्रचंड प्रतिसाद दिला. विविध पुरस्कार कसे प्राप्त झाले. पण आपल्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच कलेबाबत प्रशिक्षण देणारी, डोळसपणे अभ्यास करणारी, या क्षेत्रातील विद्वानांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचे भांडार रसिकांसाठी अभ्यासकांसाठी खुले करणारी एखादी संस्था स्थापन करणे आणि ती चिवटपणे दीर्घकाळ चालवणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. 

औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेत असा प्रयोग ‘महागामी’ गुरूकुलाच्या रूपाने सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता गेली 23 वर्षे चालवित आहेत. 

मुळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या पार्वती दिदी (त्यांना त्यांच्या शिष्या आणि या गुरूकुलाशी संबंधीत सर्व याच नावाने ओळखतात) वडिलांच्या नौकरीनिमित्त भोपाळला आल्या. भोपाळच्या वास्तव्यात एक फार चांगली गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली. त्यांची हिंदी भाषा अतिशय वळणदार, शुद्ध, माधुर्यपूर्ण बनली. अन्यथा बंगाली भाषिक किंवा हिंदी खेरीज अन्य भाषिकांची हिंदी कानाला इतकी गोड वाटत नाही. सुप्रसिद्ध नर्तक पद्मविभुषण गुरू केलूचरण महापात्रा यांच्याकडून त्या ओडिसी आणि नर्तक गुरू पं. बिरजू महाराज यांच्याकडून त्या कथ्थक शिकल्या.

वयाच्या अगदी 3 वर्षांपासून दिदींच्या नृत्यशिक्षणाला सुरवात झाली. दहाव्या वर्षी त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर नृत्य सादर करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या नृत्याविष्काराने इंदिरा गांधी इतक्या प्रभावीत झाल्या की या छोट्या मुलीला त्यांनी दूसर्‍या दिवशी सकाळी आपल्या निवासस्थानी बोलावले. तिचे कौतुक केले. प्रेमाचा हात पाठीवरून फिरवला. 

नृत्य शिक्षणासोबत संस्कृत गणित विज्ञान या विषयांतही दिदींना गोडी राहिलेली आहे. मॅथ्स टूडे साठी त्यांनी नियमित लेखनही केलं आहे. नृत्यासोबतच सतार व तबला यांचीही तालिम त्यांनी घेतली हे विशेष. 

कथ्थक आणि ऑडिसी यांतील पदव्युत्तर शिक्षणासोबतच विज्ञानांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राविण्यासह प्राप्त केले आहे. दिल्लीतील आपल्या नृत्यशिक्षणांत त्यांनी सर्वोच्च यश प्राप्त केले. पद्मविभुषण डॉ. कपिला वात्सायन यांच्या नेतृत्वाखालील संशोधन प्रकल्पांत त्यांनी सहायक म्हणूनही काम केले.  

विविध 40 देशांत पार्वती दिदींनी दौरा करून संगीत विषयक प्रचार प्रसार तर केलाच पण आपल्या सांस्कृतिक वारश्याबद्दल जगभरांत जागृती घडवून आणण्यात योगदान दिले.

आपले शिक्षण चालू असतांनाच त्यांच्या मनात संगीत शिक्षण देणारी आगळी वेगळी संस्था असावी असे विचार चालू झाले. संगीताचे आद्य ग्रंथ अभ्यासत असताना त्यांच्या हातात शारंगदेवाचा ग्रंथ ‘संगीत रत्नाकर’ लागला. मुळचे कश्मिरचे असलेले शारंगदेव देवगिरीच्या यादवांच्या दरबारात संगीतज्ज्ञ म्हणून होते. देवगिरी किल्ल्यावर या ग्रंथाची रचना झाली. या परिसरांतील वेरूळ, अजिंठा लेण्यांमधील मूर्तींच्या नृत्यमुद्रा पार्वती दिदींना मोहवत होत्याच. औरंगाबाद शहराला लागून विद्यापीठ परिसरात ज्या लेण्या आहेत त्यात आम्रपालीचे नृत्य-वादन-गायन असे एक शिल्प आहे. भारतातातील नृत्य-गायन-वादनाचा हा सगळ्यात जूना शिल्पांकित पुरावा मानला जातो. हा जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे.   

या सगळ्या वातावरणांने भारून जावून पार्वती दिदींना असे वाटले की ज्या परिसरात गेली दोन हजार वर्षे संगीताचे वातावरण राहिलेले आहे, जिथली सांगितीक परंपरा खुप समृद्ध आहे त्याच परिसरात संगीत शिक्षण देणारे आगळे वेगळे गुरूकुल स्थापन केले पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी चाचपणी सुरू केली. महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेच्या अंकुशराव कदम यांना त्यांचा प्रस्ताव पसंत पडला. त्यांच्या परिसरात त्यांनी ‘महागामी’ गुरूकुलाला जागा दिली शिवाय सर्व सहाय्य केले. 

वारली चित्रांनी सजलेल्या आकर्षक भिंती, उंचच उंच वाढलेल्या वृक्षांची घनदाट छाया, प्लास्टिक सारख्या कृत्रिम  वस्तुंचा वापर न करता लाकुड, धातू यांपासून तयार केलेले फर्निचर, नृत्य करतांना वापरावयाची सुती वस्त्रे, जून्या परंपरेतील दागिने, केशभुषेचे अस्सल भारतीय बाज अशा कितीतरी बाबींतून या गुरूकुलाचे वैशिष्ट्य न सांगताही पाहणार्‍यांच्या डोळ्यात मनांत ठसते. इथल्या विद्यार्थ्यांची सुंदर संस्कृत मिश्रीत शुद्ध हिंदी हे पण एक वैशिष्ट्यच आहे. 

ओडिसी आणि कथ्थक शिकवत असतांना केवळ नृत्यच नाही तर एकूणच वागण्यांत सुसंस्कृतपणा  रूजविण्यात दिदींचा कल असतो. या परिसरांत एक बंदिस्त आणि एक खुले असे दोन रंगमंच आहेत. जेंव्हा रसिकांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेंव्हा सगळ्या परिसरात पणत्या पेटवल्या जातात. दगडी बाकांवर सुती सतरंज्या अंथरल्या जातात. पुरूषांसाठी कपाळाला गंध आणि स्त्रियांसाठी फुलांचे गजरे यांची व्यवस्था केली जाते. मंचावर कधीही कुठलेही भडक बॅनर पाठीमागे लावले जात नाही. नृत्याच्या मोठ्या कार्यक्रमांसाठी रेकॉडेड संगीत न वापरता वादकांना खास आंमंत्रित केले जाते. कथ्थकसाठी सारंगी-तबला तर ओडिसी साठी बांसरी-पखावज वादकांना सन्मानाने बोलावून प्रत्यक्ष वादनाचा आस्वाद रसिकांना नृत्यासोबत दिला जातो. 

केवळ मनोजरंजनाच्या हेतूने अथवा शृंगाराचा उद्देश समोर ठेवून सादर केल्या जाणार्‍या कलांना आणि कलाकारांना इथे बोलाविले जात नाही. तर आपल्या प्रदीर्घ तपश्चर्येने रियाझाने ज्यांनी कलेची जोपासना केली आहे, अभ्यास केला आहे अशा कलाकारांनाच ‘शारंग देव समारोहा’त आमंत्रित केले जाते. मग यात बाऊल संगीतासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या पार्वती बाऊल असो, की दुर्मिळ अशा वीणा वाजविणार्‍या ज्योती हेगडे असो की मार्गनाट्यसारखा हजार वर्षापूर्वीचा कलाप्रकार जपणारे पियल भट्टाचार्य असो. 

पार्वती दिदींनी स्वत:चा कलात्मक विकास करत असताना या परिसरांतील कलेचा जो अभ्यास सुरू ठेवला आहे तो पण फार महत्त्वपूर्ण आहे. ओडिसा आणि महाराष्ट्र यांच्यात हजारो किमी चे अंतर. पण वेरूळमधील शिल्पांत मूर्त्यांमध्ये ज्या मुद्रा आहेत त्या ओडिसी नृत्य प्रकारातील मुद्रांशी कशा जूळतात याचा त्या बारकाईने अभ्यास करत आहेत. या दोन ठिकाणच्या राजवटींतील कलाकारांमध्ये आदानप्रदान होत असणार असे त्यांचे प्रतिपादन आहे. 

जगप्रसिद्ध कैलास लेण्यात शिवाची नटराज मुर्ती आहे. ही मूर्ती सर्वत्र पूजल्या जाणार्‍या तंजावरच्या  ‘उल्लोलीतपाद नटराज’ मुर्तीपेक्षा जूनी आहे. ही मुर्ती ‘लोलीतपाद’ नटराज असून आपण याचीच पुजा कलेच्या सादरीकरणापूर्वी कशी केली पाहिजे. अशा बाबी त्या अभ्यासाने अग्रहपूर्वक ठासून सांगतात तेंव्हा त्यांचा या प्रदेशाबद्दलचा अभिमान जाणवत राहतो.

शिष्यांना ओडिसी व कथ्थक शिकविण्याची त्यांची पद्धतही अभिनव अशीच आहे. पहिल्यांदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा घेवून त्यांतून त्यांची निवड केली जाते. त्यांना काय शिकवायचे कथ्थक की ओडिसी याचा निर्णय गुरूकुलाच्यावतीनेच घेतला जातो. गुरूपौर्णिमेला या गुरूकुलाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होते. वर्षभर शिष्यांना शिकवत असताना पालक सभा म्हणून पालकांसमोर त्यांना सादरीकरण करायला सांगितले जाते. स्वत: पार्वती दिदी प्रत्येक शिष्याचे नृत्य पाहून पालकांसमोरच सुचना करतात. उणिवा दाखवून देतात. पालकांनाही आपण वर्षभर काय आणि कसे शिकवले हे समजावून सांगतात. त्या स्वत: उत्कृष्ट नृत्यांगना आहेतच पण शिष्यांना शिकवताना त्या ज्या पद्धतीनं स्वत: मुद्रा करून दाखवतात ते फारच परिणामकारक ठरते. शिवाय वर्षांतून किमान दोन तरी मोठे वाटणारे सादरीकरण त्या आमंत्रित हजारो रसिकांसमोर करून एक वस्तुपाठच शिष्यांसमोर ठेवतात.

शारंगदेव समारोहात 2018 मध्ये त्यांनी ‘धृपदांगी कथ्थक’ हा अभ्यासुन स्वत:  विकसित केलेला नृत्य प्रकार सादर करून रसिकांना अभ्यासकांना आणि शिष्यांना चकित केले. कथ्थक हे केवळ मोगलांच्या दरबारातून पुढे आले विकसित झाले असे नसुन त्याचे धागे पूर्वीच्या ग्रंथांत परंपरात कसे सापडतात, इतकेच नाही तर महाभारत कालीन संदर्भही कथ्थकचे कसे आहेत हेही त्यांनी अभ्यासातून उलगडून दाखवले आहेत. 

लोककलांच्या बाबतीतही दिदी जागरूक आहेत. शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर मध्ये उल्लेख असलेल्या ‘किन्नरी विणा’ या वाद्याचा शोध घेत त्यांनी तेलंगणातील एकमेव कलाकार शोधून काढला. त्याचे सादरीकरण रसिकांसमोर करण्यात आले. याच पद्धतीनं डवरी गोसावी वाजवतो त्या छोट्या सारंगीचा शोध या गुरूकुलाला नुकताच लागला आहे. त्याचेही सादरीकरण इथे आता होणार आहे.

संगीत नाटक नृत्य कलाविषयक चित्रपट ध्वनीमुद्रक प्रकाश योजनाकार आदी या क्षेत्रातील विविध अभ्यासक, ज्येष्ठ कलाकार, समीक्षक यांना शारंगदेव समारोहात आमंत्रीत करून ही जागा संगीत विषयक सर्वांग चर्चा करण्याचे सादरीकरणाचे एक प्रगल्भ व्यासपीठ आहे हेच सिद्ध केले आहे. हा समारोह गेली 12 वर्षे अव्याहतपणे चालू आहे. चार दिवस सकाळी चर्चासत्रं, दुपारी कार्यशाळा आणि रात्री सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम इथे आखलेला असतो.

संगीत परंपरा डोळसपणे अभ्यासत असताना आपल्या या परंपरांचा प्रभाव इतरांवर कसा पडतो याचाही शोध पार्वतीदिदी घेतात. चीनमध्ये भरतनाट्यम शिकवणार्‍या इशा दिदी (जीन शान शान) यांच्या परदेशी छोट्या शिष्यांचे भरतनाट्यमचे सादरीकरण या गुरूकुलात झाले आहे. मलेशियाचे ओडिसी नर्तक रामली इब्राहीम यांनी 2018 मध्ये त्यांची कला शारंगदेव महोत्सवात सादर केली आणि दुसर्‍याच दिवशी त्यांना भारत सरकारने पद्मश्री जाहिर केले. देश परदेशांत आपल्या संगीत परंपरेचा धागा गुंफत जागतिक पातळीवर एक कलात्मक वस्त्र विणण्याचे मोठे कामही पार्वती दिदी करत आहेत. स्वत:ची कला जपताना विकसित करताना याच कलेचा सम्यक विचार करत प्रत्यक्ष कृती करण्यातही शक्ति खर्च करावी ही वृत्ती खरेच गौरवास्पद आहे.

विद्यारण्य नावाने एक शाळा औरंगाबाद शहरालगत गांधेली गावा जवळ पार्वती दत्ता यांनी सुरू केली आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने शिक्षणविषयक दृष्टीकोन बाळगून ही शाळा चालवली जाते. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचा आदर्श हा शिक्षण विषयक उपक्रम चालवताना समोर ठेवल्या गेला आहे.

आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार्वती दत्ता यांना डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. !

(सा. विवेक फेब्रुवारी 2018 मध्ये प्रकाशीत झालेल्या लेखात वाढ करून हा लेख तयार करण्यात आला आहे.)

(छायाचित्र सौजन्य महागामी गुरुकुल) 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      


Saturday, January 2, 2021

विद्यापीठाचे नामांतर चालते तर शहराचे का नको?



उरूस, 2 जानेवारी 2021 

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे अशी एक अतिशय जूनी मागणी आहे. शिवसेनेने औरंगाबाद महानगर पालिकेची पहिली निवडणुक झाली तेंव्हापासून (1987 पासून) ही मागणी लावून धरली आहे.

औरंगाबादचे नामकरण हा विषय पेटता राहण्याचे कारण अगदी सरळ साधे स्वाभाविक आणि अस्मितेचे आहे. मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची हाल हाल करून हत्या करण्यात आली. याची वेदना सर्वच मराठी माणसांना आहे. त्यामुळे औरंगजेबाचे कुणी कितीही गोडवे गावो मराठी माणूस त्याला हृदयात किंचितही जागा देवू शकत नाही.  औरंगजेबाचे नाव मराठी माणूस सहनच करू शकत नाही. आणि ही भावना शिवसेनेनेच अलीकडच्या काळात तीव्रतेने जागवली आहे. तेंव्हा त्यांची यापासून सुटका नाही. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचे स्वप्न होते तर औरंगाबादचे नामंतर हा तर त्यांचा ध्यासच होता. तो कधी पूरा करणार? 

पुरोगामी जेंव्हा विकासाच्या गोष्टी करतात तेंव्हा एका गोष्टीचे हसू येते. हे सर्व पुरोगामी मराठवाडा विद्यापीठाच्या नामंतराच्या वेळी काय भूमिका घेत होते? हा प्रदेश निजामाविरूद्ध लढला आहे. या प्रदेशाची म्हणून एक अस्मिता आहे. तेंव्हा मराठवाडा हे नाव बदलू नका अशी भूमिका अतिशय पुरोगामी असलेले, समाजवादी चळवळीत आख्खे आयुष्य झोकून दिलेले अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, नरहर कुरूंदकर यांनी घेतली होती. तेंव्हा त्यांच्यावर बाकी सर्व पुरोगामी तुटून पडले. या पुरोगामी धुरीणांना खड्यासारखे बाजूला ठेवल्या गेले. यांचा पदोपदी अपमान झाला. दै. मराठवाड्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला गेला. यांच्या पुरोगामीत्वावर शंका घेतल्या गेली. 

विद्यापीठाचे नामांतर करण्याचा ठराव विधीमंडळात झाला तेंव्हा 1978 ला शरद पवार मुख्यमंत्री होते. पण प्रत्यक्षात हा ठराव अमलात येवू शकला नाही कारण लोकांचा विरोध होता. पुढे शरद पवारच मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये मधला मार्ग काढण्यात आला. मराठवाड्याची शैक्षणिक दृष्ट्या विभागणी करण्यात आली. परभणी-नांदेड-हिंगोली-लातूर या चार जिल्ह्यांसाठी वेगळे विद्यापीठ तयार करण्यात आले. त्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्यात आले. मराठवाडा विद्यापीठाचे नामंतर न करता त्याचा नामविस्तार करण्यात आला. आंबेडकरांच्या नावासोबत मराठवाडा हे नाव कायम ठेवल्या गेले.

ही सगळी राजकीय सामाजिक उठाठेव का करण्यात आली? हा काही विकासाचा प्रश्‍न होता का? नामांतरा नंतर विद्यापीठाचा दर्जा सुधारला का? हे विद्यापीठ जगातल्या सोडा, भारतातल्या सोडा, राज्यातल्या विद्यापीठात तरी अव्वल ठरले का? आज कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात किंवा कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे जेंव्हा विकासाचे प्रश्‍न महत्त्वाचे मानतात तेंव्हा त्यांनी याचे स्पष्टीकरण करावे की मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्‍नी कॉंग्रेसची काय भूमिका होती? प्रत्यक्ष कॉंग्रेस सत्तेत असतानाच नामांतर झाले आहे ना? 

तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर हा विषय अस्मितेचा होता. बाबासाहेबांनी पहिल्यांदा या भागात महाविद्यालय काढले असे सांगितले जाते. मग याच प्रदेशातील वेरूळ हे शिवाजी महाराजांचे मुळ गाव आहे. तेथील पाटीलकीचे वतन त्यांच्या घराण्यात आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची समाधी वेरूळला घृष्णेश्वर मंदिरासमोर आहे. शिवाजी महाराजांचे काका शरिफजी राजे भोसले यांचीही समाधी वेरूळला आहे. तेंव्हा भोसले कुळातील हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबादला देण्यास विरोध कसा काय असू शकतो? 

औरंगाबादसाठी दुसरे नाव विचारार्थ घ्यावे लागेल ते देवगिरी. शिवाय महाराजांचे आजोबा (जिजाबाईंचे वडिल) लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज आहेत. याच यादवांची देवगिरी ही राजधानी होती. आजही महाराष्ट्रातील एक अतिशय अप्रतिम बेजोड असा हा किल्ला. मराठी साम्राज्याचे संपन्न बलशाली प्रतिक. हा किल्ला एकेकाळी संपूर्ण भारताची राजधानी होता. तेंव्हा औरंगाबादचे नामकरण करताना दुसरा पर्याय म्हणून देवगिरी या नावाचा विचार झाला पाहिजे.

तिसरे नाव विचारार्थ पुढे येते ते म्हणजे प्रतिष्ठान. सर्वात जास्त काळ संपूर्ण महाराष्ट्रासह मध्यभारत आणि दक्षिणेपर्यंत ज्याचे साम्राज्य टिकलेले होते असा राजवंश म्हणजे सातवाहन. सातवाहन राजे सर्वात जास्त काळ म्हणजे 450 वर्षे सत्तेवर होते. गोदावरीच्या काठावर इतके संपन्न राजकुल दुसरे नव्हते असा अभिमानाने उल्लेख गाथा सत्तसई मध्ये आला आहे. या सातवाहनांची राजधानी पैठण हीचे मुळ नाव प्रतिष्ठान नगरी असे आहे. त्यावरूनच औरंगाबादचे नाव प्रतिष्ठान करावे ही मागणी अस्मितेचा विचार करता योग्य ठरते. 

चौथे नाव समोर येते ते खडकी. देवगिरी किल्ल्याच्या जवळ लष्कराची छावणी जेथे बसायची ते खाम नदी काठचे खेडेगाव म्हणजे खडकी. मलिक अंबरने या गावाला मोठ्या नगरीचे रूप दिले. तेंव्हा मुळ खेडेगावचे जे नाव आहे खडकी तेच नाव औरंगाबाद ऐवजी कायम ठेवावे. असाही एक विचार पुढे येतो आहे. 

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर कराताना जसा विकासाचा मुद्दा मागे सारून दलित अस्मितेचा विचार पुढे आणण्यात आला होता तसाच आताही या प्रदेशाची अस्मिता असलेली नावे समोर आणून नामांतर करण्यात यावे. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर-देवगिरी-प्रतिष्ठान-खडकी असा विचार झाला पाहिजे. विकासाचे मुद्दे समोर आणणार्‍या सगळ्या पुरोगाम्यांची भूमिका मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्यावेळी काय होती हे तपासून पहायला पाहिजे. जे कोणी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या बाजूने होते त्या सर्वांना सध्याच्या शहर नामांतर प्रकरणी बोलण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. याच्या शिवाय औरंगाबाद नावाचे समर्थन करणार्‍यांनी औरंगजेब आमच्या अस्मितेचा जिव्हाळ्याचा विषय का आणि कशासाठी असू शकतो हे पटवून द्यावे. या प्रदेशातील जनतेच्या अस्मिता ज्याने पायदळी तुडवल्या त्या औरंगजेबाचे नाव त्वरीत हटवले गेले पाहिजे. त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नये. 
           
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575