Monday, December 7, 2020

मूर्ती मालिका -१४


श्रीधर विष्णु
मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला "मेधा" असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
परभणी)



अनंतशयन विष्णु
(मूर्ती व्रताचा ५० वा दिवस म्हणजेच सुवर्ण महोत्सव)
मूर्तीबद्दल सांगण्याआधी नकळत सहज घडलेल्या या व्रताबद्दल सांगतो. घटस्थापनेच्या दिवशी (१७नोव्हेंबर) माझ्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीपासून याची सुरवात झाली. नवरात्राप देवीच्या मूर्तींपुरतं ठरवलं होतं. पण दसर्याच्या दूसर्या दिवशी
Sai Chapalgaonkar
ने तिच्या घरच्या पुजेतील व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीचा फोटो पाठवला. मग त्यावर लिहिलं. आणि मग लिहितंच गेलो. पन्नास दिवस लिहायचे ठरवले कारण माझे पन्नासावे वर्ष चालू आहे. ही मी मलाच दिलेली भेट आहे. पुढेही लिहित राहिन पण असं व्रत म्हणून रोजच लिहिन असं नाही. आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आश्चर्यकारक माझ्यासाठी अभूतपूर्व असा राहिला.
सुरवात घरच्या मूर्तीने केली आता शेवटही घराजवळच्या मूर्तीनेच करतो आहे. (उद्या ५१वा दिवस. समापन म्हणजेच काल्याचे किर्तन म्हणतात तसे एका अप्रतिम भव्य मूर्तीवर लिहिणार आहे. या देखण्या मूर्तीने आपण भैरवी करू.)
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
उद्या या मूर्ती व्रताचे उद्यापन करूया. आपणा सगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मूर्ती संवर्धनाचा जागृतीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
(अष्टदिक्पाल संदर्भ "भारतीय मूर्तीशास्त्र" या
प्रदीप म्हैसेकर
च्या पुस्तकातून)
(छायाचित्र सौजन्य मल्हारीकांत देशमुख, परभणी)



सर्वांगसुंदर भव्य देखणा शार्ङगधर बालाजी
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते."
साडेअकरा फुटाची ही भव्य काळ्या पाषाणातील मूर्ती शिल्पकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आयुधांचा क्रम बघितला तर उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. विष्णुच्या या रूपाला त्रिविक्रम म्हणतात. पण मेहकरला या मूर्तीला शार्ङगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात.
मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. डावीकडून क्रमाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या नंतर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. त्या वर वामन अवतार आणि मध्यभागी सर्वात वर शिखरावर विष्णु प्रतिमा आहे. खाली उतरताना दूसर्या बाजूने परशुराम, महेश, राम, बलराम, बौद्ध आणि कल्की अशा दशावतार अधिक ब्रह्मा विष्णु महेश १३ प्रतिमा आहेत.
डाव्या उजव्या बाजूला जय विजय आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला खाली भुदेवी आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी आहे.
मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकरण याचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ही मूर्ती ७ डिसेंबर १८८५ रोजी मेहकरच्या एका गढीत खोदकाम करताना सापडली. इंग्रज अधिकार्यांनी रितसर पंचनामा करून मूर्ती इंग्लंडला पाठविण्याचे ठरवले. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला. तातडिने तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
आठ वर्षात मंदिराचे बांधकाम लोकांनी पूर्ण केले आणि मग ही मूर्ती तिथे स्थापित केली. उद्या ७ डिसेंबरला मूर्ती सापडली त्या घटनेला १३२ वर्ष पूर्ण होतील. त्या लोकांनी शिकस्त केली म्हणून मूर्ती वाचली. म्हणूनच ही सर्वांगसुंदर मूर्ती आज आपल्या देशात आपल्या डोळ्यासमोर आहे. या मूर्तीचा चांगला फोटो मला भेटू शकला नाही. कदाचित शार्ङगधराचीच इच्छा तूम्ही त्याला प्रत्यक्ष पहावे अशी असेल. मूर्ती व्रताची सांगता करताना माझा आग्रह नव्हे हट्ट आहे. ही मूर्ती एकदा पहाच.
मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो.
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
- ना.घ. देशपांडे
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)
सर्व वाचकांचे शतश: आभार. मूर्ती व्रत येथे समाप्त झाले. मूर्तींवर वेळोवेळी लिहितच राहिन. मंदिर मूर्ती कोशाचे मोठे काम हाती घेतो आहोत त्यात तूम्हा सर्वांचा सहभाग राहू द्या सहकार्य करा. प्राचीन मंदिरे व मूर्तींचे जतन संवर्धन अभ्यास या चळवळीस सहकार्य करा.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575


Sunday, December 6, 2020

मराठी लेखक शेती स्वातंत्र्याच्या विरोधात

उरूस, रविवार 6 डिसेंबर 2020

दिल्लीत चालू असलेल्या पंजाबातील शेतकर्‍यांच्या आंदोलनास मराठी लेखकांनी पाठिंबा जाहिर केला आहे. समाज माध्यमांत आणि प्रस्थापित वर्तमानपत्रादी माध्यमांतून तशा बातम्या झळकल्या आहेत. 

मुळात सध्या चालू असलेले शेती आंदोलन जरा बाजूला ठेवू. महाराष्ट्रात 40 वर्षांपूर्वी शरद जोशींनी शेतकरी आंदोलनाची मुहर्तमेढ रोवली. हे सर्व मराठी लेखक तेंव्हा या चळवळीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधीत होते. केवळ आंदोलन उभं केलं असे नव्हे तर शेती प्रश्‍नाची साधार सविस्तर अर्थशास्त्रीय मांडणी शरद जोशींनी करून दाखवली. दोन चार वर्षांतच म्हणजे 1982 पासून पंजाब आणि इतर प्रदेशांत शरद जोशी यांच्या आंदोलनाचा वैचारिक दबदबा पसरला. उत्तर प्रदेशात महेंद्रसिंह टिकैत किंवा कर्नाटकांत नंजूडा स्वामी यांनी उभारलेल्या आंदोलनास कधीच वैचारिक आधार नव्हता. उलट शरद जोशी यांच्या मांडणीला भारतभरांतून पाठिंबा मिळत गेला.

हे सर्व मराठी लेखक ज्यांच्या प्रदेशांतील एक शेतकरी नेता किंबहुना शेती प्रश्‍नाची मांडणी करणारा विचारवंत अनुभवत होते. त्याचे लिखाण वाचत होते. बंगाली लेखकांच्या कादंबर्‍यांत 1985 पासूनच शरद जोशी यांची मांडणी आणि आंदोलनाची दखल यायला सुरवात झाली होती (तिस्तेकाठचा वृत्तांत). खुद्द या लेखकांनीही त्या काळात आपल्या कथा कविता कादंबर्‍यांत शेतकरी आंदोलनाची वैचारिक मांडणी कलात्मक पद्धतीने मांडली होती. आज पत्रक काढणार्‍या पाच प्रातिनिधीक लेखकांच्या कलाकृतींचेच उदाहरण आपण येथे पाहूया.

पहिला लेखक आहे इंद्रजीत भालेराव. त्यांच्या ‘काबाडाचे धनी’ या दीर्घकाव्यात आडतीवर कापूस विक्रिचे वर्णन आलेले आहे. कापसाला न मिळालेल्या भावाची वेदना त्यांनी शब्दांत मांडली आहे. ती वाचून शरद जोशींनी असे लिहीले की ‘शंभर भाषणं करून आकडेवारी मांडून जे सांगता येणार नाही ते इंद्रजीतने चार ओळीत मांडले आहे.’

भावामधी काट्यामधी पस्तोरीत उणीपूरी

ज्यानं त्यानं जिथं तिथं देल्या हातावर तुरी

पट्टी घेवून येतानी त्याचा उतरला नूर

जनू वाहून गेलाय उभ्या झाडावून पूर

कापसाची सरकारी खरेदी व्यवस्था आपल्या बापाला लुटते हे लिहीणारे इंद्रजीत भालेराव आज शेतकर्‍यांच्या गळ्या भोवती सरकारी धोरणाचा पाश आवळणारी मागणी करणार्‍या आंदोलनास पाठिंबा का देत आहेत? ही कापुस एकाधिकार योजना कधीच कापसाला पुरेसा भाव देवू शकलेली नाही हा त्यांच्या आजूबाजूचा अनुभव नाही का? परभणी आणि परिसरांतील सर्व प्रदेश काळ्या मातीचा म्हणजेच कापसाचा प्रदेश आहे.

दुसरे लेखक कवी अकोल्याचे नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या ‘मागील पानावरून पुढे चालू’ या कविता संग्रहात अशी ओळ लिहीली आहे

अस्मानीतून सुटशील 

तर सुलतानीत अडकशील

टाकांच्या निभांनी 

तूझी कणसं खुडतील

म्हणजे सरकारी धोरण शेतकर्‍याला मारते याची पूर्ण कल्पना नारायण कुलकर्णी कवठेकर यांना आहे. शरद जोशी ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या आहे’ ही घोषणा आधीपासून देत आले होते. इतकंच नाही तर ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशीही मांडणी करत होते याचीही कल्पना अनुभव या मराठी लेखकांना येत होता आणि त्याचे त्यांच्या साहित्यकृतीत प्रतिबिंब दिसून येते.

या पत्रकावर सही करणारे कथाकार भास्कर चंदनशीव यांनीही आपल्या ‘लाल चिखल’ या कथेत भाव न मिळाल्याने टमाटे रस्त्यावर ओतून परतणार्‍या शेतकर्‍याचे दु:ख मांडले होते. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्था आपल्या बळीराजाला न्याय देवू शकत नाही याची पूर्ण कल्पना भास्कर चंदनशीव यांना होती.

राजन गवस यांनी आपल्या अकादमी पुरस्कारप्राप्त ‘तणकट’ कादंबरीत गावातील पतपेढीचे राजकारण रंगवताना डबकं बनलेल्या गावगाड्यातील अर्थप्रवाहाचे वर्णन केले आहे. ही सहकारी सरकार आश्रीत व्यवस्था बळीराजावर अन्याय करते हे नीट माहित आहे. 

आसाराम लोमटे यांच्या इडा पीडा टळो या कथासंग्रहात भर दिवाळीत बलीप्रतिपदा म्हणजे शेतकरी विरोधी सण आहे तेंव्हा तो साजरा करायचा नाही या शेतकरी संघटनेच्या मांडणीचा पाठपुरावा करणार्‍या महिलेची कथा आहे. कथा वाङमयीन दृष्ट्या अतिशय दर्जेदार आहे. वर्षोनुवर्षे सत्ताधारी मग ते कुठल्याही काळातील कसे असो शेतकर्‍याला लुटतात हे सत्य कलात्मक रित्या मांडता येते.  मग त्याच आसाराम लोमटे यांना आजचे सरकारी धोरण पोषक आंदोलन शेतकर्‍यांच्या हिताचे कसे काय वाटते?

 हे जर यांच्या कलाकृतीतून स्पष्टपणे दिसून येते तर मग आता यांची नेमकी भूमिका बदलण्याचे कारण काय? आताचे शेतकरी आंदोलन हे पूर्णत: डाव्यांच्या प्रभावातील मागण्या पुढे करत आहे. सरकारशाही बळकट करत आहे. शेतकर्‍या हाती वाडगा घेवून भीकवादी बनवत आहे. सरकारी खाटीकखान्याकडे शेतीप्रश्‍नाची गाय घेवून जात आहे. मग हे मराठी लेखक त्या गायीच्या गळ्यात हार घालण्यासाठी, तिला कुंकूम तिलक लावण्यासाठी, पुरणाचा गोग्रास भरविण्यासाठी पुढे का निघाले आहेत? 

शेतकर्‍यांचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयास होतो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. असे या लेखकांनी म्हटले आहे. कुठलेच आंदोलन दडपून टाकू नये. त्यावर वाद करण्याचे कारणच नाही. पण या शेतकर्‍यांनी त्यांच्या मागण्याासाठी अवैध पद्धतीने रस्ता अडवून ठेवावा याचे समर्थन ही लेखक मंडळी का करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत आंदोलन करताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे हे यांना माहित नाही का? का हे सर्व लेखक न्यायालयाच्या विरोधात जाणार आहेत?

शरद जोशींनी केलेले सर्व लिखाण मराठीतून उपलब्ध आहे. त्यात विविध आकडेवारीही वेळोवेळीची दिलेली आहे. सरकारी पातळीवर विश्वनाथ प्रतापसिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील दोन अहवाल उपलब्ध आहेत.  आणि तरीही हे काहीच न वाचता ही लेखक मंडळी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ही कमाल आहे. 

आसाराम लोमटे यांनी आजच (रविवार 6 डिसेंबर 2020) लोकसत्तामध्ये ‘भूमी आणि भूमिका’ असा लेख लिहीला आहे. संपूर्ण लेखात एकाही ठिकाणी या कायद्यांतील शेतकर्‍यांवर अन्याय करणारे कलम कोणते? हे सांगितलेले नाही. नेमका विरोध कोणत्या कारणासाठी पंजाबचे शेतकरी करीत आहेत याचाही उल्लेख लोमटे करत नाहीत. याला काय म्हणावे? 

डंकेल प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांना असाच कडवा विरोध समाजवादी चळवळीच्या प्रभावातील शेतकरी नेत्यांनी केला होता. तेंव्हाही काही लेखक त्याला बळी पडले होते. 

शेतकर्‍याचा पोरगा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अधिकारी बनून गेला की धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही असे शरद जोशींनी लिहून ठेवले होते. तसेच आज शेतकर्‍याचा पोरगा लेखक झाला की बापाचा गळा आवळणारी धोरणं राबविण्यासाठी आग्रह धरणार्‍या आंदोलनाला पाठिंबा दिल्याशिवाय रहात नाही असेच दूर्दैवाने म्हणावे लागेल. शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. तशी संपूर्ण वैचारिक मांडणी करून ठेवली. आणि त्याच शरद जोशींच्या प्रदेशातील त्यांच्याच मराठी भाषेत लिहीणारे लेखक याच शेतकर्‍यांला भीकारी बनविणार्‍या आंदोलनाची पालखी वहात आहेत. 

शेतकर्‍यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्याची अतिशय स्वच्छ मागणी शरद जोशींनी केलेली होती. बाजार स्वातंत्र्य, तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यांपासून मुक्ती या त्रिसुत्रीशिवाय शेतकर्‍यांचे भले होणे शक्य नाही. हे जर मराठी लेखकांना समजूनच घ्यायचे नसेल तर त्यांना समजावून सांगणे मुश्किल आहे. 

  

    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575   

      


Saturday, December 5, 2020

डोंगरमाथा बाभुळझाड । होतच नाही नजरेआड ॥

  


उरूस, 1 डिसेंबर 2020 

औरंगाबाद शहराला टेकड्यांनी वेढलेले आहे. दक्षिणेकडच्या म्हणजेच सातारा परिसरांतल टेकडीवर एक सुरेख झाड आहे. टेकडीवरील हे एकटेच झाड कुठूनही उठून दिसते. ही टेकडी ‘वन ट्री हील’ म्हणूनच ओळखली जाते. हे झाड जवळून पाहण्याची फार दिवसांची इच्छा होती. 

पर्यावरणप्रेमी तरूणांच्या एका गटाने पावसाळ्यात तिथे वृक्षारोपण केले. दोन तीन दिवांपूर्वी वणव्यात ही सर्व झाडे होरपळली. जी वाचू शकतील अशा झाडांना पाणी देवू या, त्यांच्या मुळाशी पाण्याच्या बाटल्या ठेवून ठिबकच्या माध्यमातून तेथे ओल जपली जाईल. या झाडांना वाचविण्यासाठी आज शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी पहाटे सुर्योदय होताना उत्साही तरूण तरूणींच्या गटासोबत मी या टेकडीवर पोचलो. 

ज्या झाडाला जवळून पहायची ईच्छा होती ते दृष्टीपथास पडल्यावर आश्चर्य वाटलं, आनंद झाला. आश्चर्य यासाठी की बाकी काहीच त्या बोडक्या डोंगरावर टिकू शकले नाही पण हे झाड मात्र तग धरून चिवटपणे टिकून आहे. आणि आनंद यासाठी की हे तर एक साधं आपलं गावठी बाभळीचे झाड आहे. नेहमी आढळणारी अशी ही आपल्या जवळची बाभूळ इथे इतक्या उंचावर औरंगाबाद शहराच्या माथ्यावर अभिमानाने तुर्‍यासारखी डौलात उभी आहे. 

झाडांना पाणी द्यायचे काम थोडावेळ करून नविन आलेल्या उत्साही गटाच्या हाती सोपवले आणि झाडाजवळ येवून बसलो. कधीपासून हे झाड आपल्याकडे खेचून घेत होतं. गर्द हिरवी पाने, त्यावरची पिवळी सुंदर फुले, काळे अस्सल भक्कम  खोड मला बापटांची कविता आठवली


अस्सल लाकुड भक्कम गांठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे


देहा फुटले बारा फांटे

अंगावरचे पिकले कांटे

आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे


अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे


बापटांच्या कवितेत या झाडाचा टणकपणा स्पष्टपणे आला आहे. इथे बाकी कुठलेच झाड टिक़ले नाही. आहेत ती झुडूपे. नविन लावलेली झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी धडपडत आहेत. 

बापटांच्या कवितेपेक्षा काहीतरी अजून वेगळे या झाडात आहे असे मला वाटले. भोवती फिरून पाहताना झाडावर पडलेले कोवळे ऊन, पिवळ्या फुलांची आकर्षक झळाळी, काळ्या फांद्यांच्या जाळीतून पलीकडे दिसणारे शहराचे सुंदर चित्र हे मला ‘माथ्यावरची हळद विटली’ या ओळीशी विसंगत वाटायला लागले. 

मार्गशीर्षातली पहाट आहे. शिसवी शिल्पासारखे खोड, कोवळ्या उन्हात पिवळ्या फुलांची झळाळी उठून दिसते आहे, फांद्यांच्या जाळीतून पलीकडचे शहर खुप सुंदर दिसते आहे. मला इंदिरा संतांची कविता आठवली. हे झाडही इंदिरा संतांच्या कवितेतील बाभळीसारखे गावाबाहेर एकटे उभे आहे. त्यांनी बांधावर म्हटले इथे हे डोंगरावर आहे.



लवलव हिरवी गार पालवी

काट्यांशी वर मोहक जाळी

घमघम करती लोलक पिवळे

फांदी तर काळोखी काळी


झिलमिल करती शेंगा नाजूक

वेलांटीची वळणे वळणे

या सार्‍यांतून झिरमिर झरती

रंग नभाचे लोभसवाणे


अंगावरती खेळवी राघू

लाघट शेळ्या पायाजवळी

बाळ गुराखी होउनिया मन

रमते तेथे सांज सकाळी


संध्याकाळी येते परतून 

लेउन हिरवे नाजुक लेणे

अंगावरती माखुन अवघ्या

धुंद सुवासिक पिवळे उटणे


कुसर कलाकृती अशी बाभळी

तिला न ठावी नागररीती

दूर कुठेतरी बांधावरती

झुकुन जराशी उभी एकटी


औरंगाबाद शहराचा मानाचा तुरा असणारी अशी बाभळी. ही टेकडी म्हणजे बाभुळ टेकडी असेच म्हणायला पाहिजे. जशी गोगाबाबा टेकडी आहे, हनुमान टेकडी आहे तशीच ही बाभुळ टेकडी. हे झाड नजरेआड होताच नव्हते. म्हणून मला ओळ सुचली "डोंगरमाथा बाभूळ झाड | होताच नाही नजरेआड ||"

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

Friday, December 4, 2020

शाश्‍वत पर्यटन : आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाच पाऊल

 


सत्यवेध दिवाळी 2020

कोरोना काळात पूर्वीच्या खुप संकल्पना बदलून गेल्या आहेत. पर्यटनातही आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आपल्याला शाश्‍वत पर्यटनाचा विचार अगत्याने अग्रक्रमाने करावा लागेल. शाश्‍वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ही संकल्पना जास्त करून समोर आली युरोपातून. आपला देश, आपली संस्कृती, चालिरीती, रितीरिवाज, संगीत, खाद्य पदार्थ यांबाबत त्यांना जास्त आस्था राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात व्यापाराला आणि त्या सोबतच पर्यटनाला विशेष गती मिळाली. या पर्यटनाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे शाश्‍वत पर्यटन. त्यात या स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाते.
कोरोना आपत्तीनंतर भारतात आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचाही आपण या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो. आत्तापर्यंत पर्यटन म्हणजे उंची महागडे हॉटेल्स, खाण्यापिण्याची मौजमजा आणि यासोबतच जरा जमले तर बाहेर फिरणे. गोव्या सारख्या प्रदेशाने मौजमजेलाच पर्यटन म्हणा असा गैरसमज पसरवला. पण आता सगळीकडेच पैशाच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचा आघात पर्यटनावरही पडत आहे. मग यातून पर्याय काय? तर शाश्‍वत पर्यटन एक चांगला पर्याय समोर येतो आहे.

1. वेगळी ठिकाणे :
जी अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू. तसेही त्यांच्याकडे पर्यटक येत असतातच. अतिशय उत्तम पण पर्यटकांना ज्ञात नसलेली स्थळं शोधून पर्यटकांसमोर असे पर्याय ठेवता येतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुद्दाम वेगळी न करता आधीच अस्तित्वात असलेल्या घरांमधून शक्य आहे.  ज्या गावांमधून जूने वाडे आहेत त्यांची जराशी डागडुजी करून घेतली तर पर्यटक विशेषत: परदेशी पर्यटक अशा जागी मुद्दाम रहायला जातात. पर्यटन स्थळाजवळ स्थानिक लोकांना हाताशी धरून अशा सोयी करता येणे सहज शक्य आहे. त्यांनाही रोजगार मिळेल, पर्यटकांचे पैसेही कमी खर्च होतील आणि यातून एका वेगळ्या व्यवसायाला चालना मिळेल.
उदा. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा आपण विचार करू. गौताळा अभयारण्याजवळ अंतुरचा किल्ला आहे. तसेच अजिंठा लेणी जवळ हळदा घाटात वेताळ वाडीचा किल्ला आहे. वाडीच्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. अंतुर किल्ल्यासाठी मुख्य सडकेपासून 6 किमी. कच्या खराब रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची कसलीही व्यवस्था नाही. स्थानिक गावकर्‍यांशी बोलून खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. (असा अनुभव आम्ही वाडिच्या किल्ल्या जवळ घेतला आहे. अगदी शेतात बसून जेवण केले आहे.) परदेशी पर्यटक असा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम तयार असतात. या किल्ल्यांवर साहसी पर्यटकांना चांगली संधी आहे.
काही अतिशय चांगली मंदिरे दुर्गम ठिकाणी आहेत, काही मंदिरे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यांची माहिती होत नाही. पाटणादेवी सारखे ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे. घाटात आहे. तिथे चांगला धबधबा आहे. त्याला लागून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. जवळच वाघळी गावात महाराष्ट्रातील एकमेव असे प्राचीन सुर्यमंदिर आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा गावात छोट्याशा टेकडीवर त्वरिता देवीचे मंदिर आहे.  हे मंदिर शिवकालीन असून उत्तम दगडी बांधणीचे आहे. टेकडीवर असल्याने येथे निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच अंबडच्या जवळ जामखेड म्हणून गाव आहे. येथील टेकडीवर असलेले जांबुवंताचे मंदिरही असेच उत्तम पर्यटन स्थळ आहे. अशा कितीतरी जागा महाराष्ट्रभर शोधता येतील. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तम संधी आहेत. गड किल्ले लेण्या जून्या वास्तू येथे पर्यटनास चालना देणे सहज शक्य आहे. जी ठिकाणं चांगल्या स्थितीत आहेत तेथे पर्यटन वाढू शकते.
शाश्‍वत पर्यटनातील पहिला मुद्दा येतो तो अशा फारशा परिचित नसलेल्या स्थळांबाबत. शिवाय काही निसर्गरम्य ठिकाणं शोधून तिथेही पर्यटनाला चालना देता येते.

2. स्थानिक अन्न :
दुसरा मुद्दा यात पुढे येतो तो अन्नाचा. आपण पर्यटकांचा विचार करताना त्यांना जे पदार्थ खायला देतो ते त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे असावेत असा विचार केला जातो. पण स्थानिक जे पदार्थ आहेत, जे अन्नधान्य आहे त्याचा विचार होताना दिसत नाही. आपण जिथे जातो आहोत तेथील धान्य आणि तेथील पदार्थ यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांच्या चवी समजून घेतल्या पाहिजेत. नसता कुठेही जावून आपण तंदूर रोटी आणि दाल मखनी पनीरच खाणार असू तर त्याचा काय उपयोग?  बारीपाडा हे गाव महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर धुळे जिल्ह्यात आहे. या गावात दरवर्षी रानभाज्यांची स्पर्धा भरते. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. निसर्ग पर्यटन आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण तिथे जावू शकतो. पर्यटनांत अशा ठिकाणांचाही विचार झाला पाहिजे.
विविध पदार्थ करण्याची पण एक प्रत्येक प्रदेशातील एक पद्धत असते.  तिचा अनुभव घेतला पाहिजे. अशामुळे स्थानिक आचार्‍यांना एक संधी उपलब्ध होते. त्यासाठी बाहेरून माणसे आणायची गरज उरत नाही. अगदी जेवणासाठी त्या त्या भागात मिळणारी केळीची पानं, पळसाच्या पत्रावळी यांचा उपयोग झाला पाहिजे. तोही एक वेगळा अनुभव असतो. हैदराबादी पदार्थात ‘पत्थर का गोश’ म्हणून जो मांसाहारी पदार्थ खाल्ल्या जातो तो खाताना कसे बसावे कसे खावे याचेही नियम आहेत. अशा रितीने पर्यटनाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार यात केला जातो.

3. लोककला, जत्रा, उत्सव :
खाण्यापिण्या सोबतच अजून एक मुद्दा शाश्‍वत पर्यटनात येतो. तो म्हणजे त्या त्या प्रदेशातील संगीत, रितीरिवाज, सण समारंभ, जत्रा, उत्सव, उरुस. आपल्याकडे देवस्थानच्या जत्रा असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ ठरलेला असतो. त्याच काळात तिथे जाण्यात एक वेगळा आनंद असतो. उदा. अंबडच्या मत्स्योदरी मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या दगडी पायर्‍यांवर हजारो दिवे लावले जातात. (मागील वर्षी सात हजार दिवे लावले होते.) हा दिपोत्सव पाहणे एक नयनरम्य सोहळा असतो. काही ठिकाणी रावण दहन केले जाते दसर्‍याच्या दिवशी. त्याही प्रसंगी पूर्व कल्पना दिली तर पर्यटक येवू शकतात. गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. हा एक वेगळा पैलू आहे. शिवरात्र आणि श्रावणातील सोमवारी बहुतांश महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त जमा होतात. शिवरात्रीला रात्रभर भजन चालते. हे दिवस ओळखून त्या प्रमाणे पर्यटकांच्या सहली आयोजीत करता येतात.
कोल्हापूरजवळ खिद्रापूर येथे कोप्पेश्वर शिवमंदिर आहे. या मंदिराला वैशिष्ट्यपूर्ण असा गोलाकार उघडा मंडप आहे. कोजागिरी पौर्णिमेला या मंडपाच्या अगदी मध्यावर संपूर्ण चंद्राचे दर्शन होते. हे निमित्त साधून या दिवशी येथे मोठा सांस्कृतिक उत्सव नियोजीत केला जावू शकतो.  
नवरात्रीत बहुतांश देवी मंदिरांत गर्दी होते. निसर्गरम्य असलेली ठिकाणं निवडुन अशा ज़त्रांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तिथे पर्यटकांना आवर्जून बोलावता येवू शकते.
काही दर्ग्यांमधून उरूस भरतात. उरूस म्हणजे त्या सुफी संताची पुण्यतिथी. अशा वेळी कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असतो. त्यासाठी पर्यटकांना पूर्वकल्पना असेल तर तेही येवू शकतात. (खुलताबाद येथील दर्ग्यात अशा कव्वालीसाठी आम्ही परदेशी पर्यटकांना घेवून गेलो आहोत. तो अनुभव अतिशय आगळा वेगळा आहे.)
कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. रात्रीची जागरणं अशावेळी केली जातात. त्या जागी काही सांस्कृतिक सांगितीक कार्यक्रम करणे सहज शक्य आहे. अशा निमित्तानेही पर्यटकांना आणता येवू शकते.

4. पर्यटन वाढीसाठी संगीत महोत्सव/ सांस्कृतिक कला महोत्सव :
ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरांत संगीत महोत्सव आयोजीत करण्यासाठी शासकिय पातळीवर काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले जायचे. लालफितीच्या कारभारामुळे ते जवळपास सगळे बंद पडले. या शिवाय काही मंदिरे आणि मठ, दर्गे यांच्या संस्था यासाठी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या परिसरांत संगीत महोत्सव छोट्या प्रमाणात घेणे सहज शक्य आहेे. यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू समोर येवू शकतो. शाश्‍वत पर्यटनात याचाही विचार केला जातो.
लोककला नृत्य लोकसंगीत यांचा अतिशय चांगला वापर पर्यटनाच्या वाढीसाठी करता येवू शकतो. शिवाय या कलांना प्रोत्साहन देण्याचेही काम यातून होवू शकते. तेलंगणात दलित किन्नरी वादक कलाकारांना शासन स्वत: प्रोत्साहन देवून विविध ठिकाणी पाठवते. त्यांचा कलाविष्कार लोकांच्या समोर यावा म्हणून धडपड करते. अशा काही योजनांतून पर्यटनाला चालना मिळू शकते.
शाश्‍वत पर्यटनात हस्तकलांचाही विचार केला जातो. हातमागावर कापड विणणारे, हॅण्डमेड कागदवाले, धातूवर कोरिवकाम करणारे (बिदरी कला), मातीची/लाकडाची खेळणी तयार करणारे असे कितीतरी कलाकार आपल्या जवळपास असतात. यात परदेशी पर्यटकांना विशेष रस असतो. समोर बसून चित्र काढून देणारे. किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळी तिथेच बसून त्या जागेचे चित्र काढणारे यांचाही विचार शाश्‍वत पर्यटनांत केला जातो. त्या त्या जागची चित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरवता येवू शकते. त्या त्या भागातील वस्त्र विणण्याची परंपरा हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. अशा वस्त्रांचे प्रदर्शन भरवता येवू शकते. उदा. पैठणी, हिमरू, महेश्वरी, पाटण पटोला, कांचीपुरम, बालुचेरी, बनारसी इ.इ.

5. घरगुती निवास  व्यवस्था (होम स्टे) :
प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी जाताना वाटेत घरगुती राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार असेल तर बर्‍याच जणांना ते हवे असते.  कोकणात तर मुद्दाम समुद्रकिनार्‍या जवळ घरांत जावून राहणे पर्यटक आजकाल पसंद करत आहेत. कर्नाटकांत हंम्पी हे गांव असे आहे की तिथे एक पन्नास शंभर घरांचे खेडेच संपूर्णत: पर्यटन व्यवसायावर चालते. तुंगभद्रा नदीच्या काठी छोट्या घरांतून लोक राहतात. तिथेच जेवायची चहापाण्याची व्यवस्था केली असते. काही परदेशी पर्यटक तर तिथे केवळ शांततेसाठी येवून राहतात.
काही दिवसांनी जंगलात, दूरवरच्या खेड्यात, एखाद्या तळ्याच्या काठी जावून आठ दिवस राहणे  हा प्रकारही लोकप्रिय होत चाललेला आपल्याला दिसेल. निसर्गरम्य वातावरण, शांतता, पक्ष्यांचे मधुर आवाज, चुलीवरचे जेवण, जवळपासच्या शेतांत डोंगरात फेरफटका, रात्री खुल्यावर बसून चांदण्याचा आनंद घेणे अशा गोष्टी लोक आवर्जून करताना दिसून येतील.

6. उपसंहार :
शाश्‍वत पर्यटनांत सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ती संसाधने आहे ते मनुष्यबळ याचा सुयोग्य उपयोग करून घेण्यावर भर दिला जातो. तेथील लोककलाकार, कारागिर यांचाही विचार यात केला जातो. तिथील जनजिवनाशी जूळवून घेण्यावर भर दिला जातो. अन्यथा इतर वेळी आपण पर्यटक म्हणून आपल्या आवडीनिवडी त्या प्रदेशावर तेथल्या माणसांवर लादत असतो. तेथील निसर्गाची हानी करत असतो.
कोरोना आपत्तीमधुन एक आर्थिक पेच समोर आला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काटकसरीने सर्व काही करण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी स्थानिकांना संधी, स्थानिक संसाधनांचा वापर यामुळे बचतही होवू शकते व रोजगाराच्या वेगळ्या संधीही निर्माण होवू शकतात.
याची सुरवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या अशा एखाद्या कधी न गेलेल्या थोडेफार माहिती असलेल्या ठिकाणी  गेलं पाहिजे. तेथील अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. सध्या समाज माध्यमे (सोशल मिडिया) अतिशय प्रभावी पद्धतीनं काम करत आहे. त्यावरून हे अनुभव इतरांना समोर आले तर या पर्यटनाला चालना मिळू शकते. सहजपणे अर्थकारणाला गती येवू शकते.      

(वरचे छायाचित्र शेंदूरवादा ता. गंगापूर जि. औरंगाबाद  येथील गणेश मंदिरा जवळ खाम नदीच्या पाण्यात त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब पडले त्याचे आहे. २९ नोव्हेंबर रोजी तेथे साहित्य संगीत कला मंच च्या वतीने  सांस्कृतिक कार्यक्रम झाला. औरंगाबाद शहरातून ४९ रसिक गाडी करून गेले होते. शाश्वत पर्यटनाचे जिवंत उदाहरण. खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था स्थानिक लोकांनी केली.)  

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, December 3, 2020

मूर्ती मालिका -१३

लोभस पुत्रवल्लभा

गुप्तेश्वर मंदिर धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) मंदिरावरील हे अतिशय लोभस असे शिल्प. कडेवर मुल असलेले जे सुरसुंदरी चे शिल्प असते त्याला "पुत्रवल्लभा" असे नाव आहे. यातही विविध पद्धतीनं आई आणि बाळाचे नाते दाखवले आहे. बाळाला ती खुळखुळा वाजवुन खेळवते आहे, नुसतेच कडेवर घेतले आहे, स्तनपान करतानाची अप्रतिम शिल्पे आहेत. पण हे जरा हटके आहे. यात हे बाळच आईचा मुका घेते आहे. आईने डाव्या हाताने त्याची कंबर सावरून धरली आहे. उजवा हात बाळाच्या मानेला सांभाळत आहे. या स्वर्गसुखाने दोघांनीही डोळे मिटून घेतले आहेत.
बाळाच्या पायातला वाळा विशेष उल्लेखनीय आहे. हे बाळ नुकतेच चालायला लागले असावे. म्हणून हा चांदीचा वाळा पायात आहे.
प्रेमचंद यांची एक सुंदर लघुकथा आहे. आईच्या बोटाला धरून जत्रेत फिरणारे मुल खेळणी, मिठाई, रहाटपाळणा असे विविध गोष्टींसाठी हट्ट करते आहे. पण गरिब आई त्याला फारसे काही घेवून देवू शकत नाही. पोराचा हट्ट वाढत जातो. तो हात झटकतो आणि मिठाईच्या आकर्षणाने कुठेतरी ओढला जातो. पोर जत्रेत हरवते. आई बाजूला नाही हे ध्यानात येताच त्याला रडू फुटते. आजूबाजूचे लोक त्याला समजावू लागतात. खेळणी देतात, मिठाई देतात, फुगे देवू करतात,रहाटपाळण्याचे आमिष दाखवतात. पण आता पोराला फक्त आईच हवी असते.. बाकी काहीच नको असते. फ.मुं. शिंदे यांनी आपल्या कवितेत लिहिल्या प्रमाणे
आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेले गाव असते
केवळ गावच नाही तर लहानपणी आई म्हणजे बाळाचे सर्व विश्वच असते. आसा गोड मतितार्थ या शिल्पात अनामिक कलाकाराने १००० वर्षांपूर्वी कोरून ठेवला आहे. मराठवाडा हा मातृसत्ताक प्रदेश असल्याचे भरपुर ऐतिहासिक पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे. गौतमीपूत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी अशी चांदिची नाणीच सापडलेली आहेत. शिळालेखही आहेत.
मातृशक्तीचा हा एक लोभस आविष्कार, "पुत्रवल्लभा". मला एक शंका आहे. हे शिल्प निर्माण करणारी स्त्रीच असली पाहिजे. इतका नेमका क्षण पुरूषाला पकडता नसता आला. पण दूसरीकडून दासू वैद्य च्या कवितेप्रमाणे पण शक्य आहे
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी
त्याची आई एक कविता असते
हे शिल्प जर पुरूषाने घडवले असेल तर त्याची भावना दासूच्या कवितेसारखीच राहिली असेल.


रूसलेली पार्वती आणि शांत शिव
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या बाजूला शिव मंदिराच्या मंडोवरावर हे अतिशय वेगळं मनोज्ञ असं शिल्प आहे. डमरूआणि नाग दोन हातात असून पायाशी नंदी आहे, गळ्यातही नागबंध आहे. त्यावरून हा शिव आहे हे स्पष्ट होते. पार्वती डोळ्यात काजळ भरत आहे. तिच्या दूसर्या हातात आरसा आहे. लक्ष वेधण्यासाठी शिवाच्या डाव्या हातात दंडासारखे दिसणारे जे आयुध आहे त्याला पार्वतीने आपला उजवा पाय लावला आहे. शिवाच्या उजव्या खालच्या हातात बीजपुरक आहे.
हे शिल्प अलीकडच्या काळातले असल्याने फारसे बारीक नक्षीकाम त्यावर आढळून येत नाही. पार्वतीचे वस्त्र, त्याचा मागे दाखवलेला पदर सुंदर आहे. साधेच पण प्रमाणबद्ध आकर्षक असे हे शिल्प. यात कुठला पौराणीक संदर्भ न दाखवता नवरा बायकोच्या नात्यातील सहज भाव दाखवला म्हणून वेगळे उठून दिसते.
गौरी रूसली असं म्हणण्यापेक्षा शिवच रूसला आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी खालील ओळीतील भावना पार्वती व्यक्त करत आहे.
दर्पण देखू रुप निहारु
और सोला सिंगार करू
फेर नजरीया बैठा बैरी
कैसे अखिया चार करू
(प्रसन्न माळेकर या मित्राने सुचवलेल्या समर्पक ओळी)
नाशिकचे मित्र
Ashok Darke
यांनी हा फोटो पाठवला. असे शिल्प कुठे आढळत नाही. याचा काही वेगळा संदर्भ असेल तर तज्ज्ञांनी विषद करून सांगावा. एरव्ही सामान्य दर्शकांसाठी "तूम रूठी रहो मै मनाता रहू" असं एका ओळीत या शिल्पाचे वर्णन करता येईल. देव असला म्हणून काय झालं आहेत तर नवरा बायकोच ना..


देखणा द्वारपाल
प्राचीन मंदिरांवर विविध शिल्पे आढळून येतात ती केवळ सहज म्हणून कोरलेली नसतात. त्यांची एक परिभाषा असते. ते शिल्प तिथेच का कोरले याचे विशिष्ट कारण असते. छायाचित्रातले हे जे शिल्प आहे ते द्वारपालाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतानाच्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर अतिशय कलात्म नक्षीकाम असते. त्याला द्वारशाखा म्हणतात. या द्वारशाखा एक दोन तीन अगदी माणकेश्वर मंदिर (ता. भुम जि. उस्मानाबाद) इथे तर तब्बल सात द्वारशाखा आहेत. या द्वारशाखेच्या तळाशी द्वारपालाचे शिल्प कोरलेले असते. हे शिल्प होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपालाचे आहे.
या द्वारपालाच्या हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. यावरून हा शैव द्वारपाल असल्याचे अनुमान काढता येते. म्हणजे हे मंदिर शैव देवतेचे आहे हे ठरवता येते.
आक्रमकांच्या भितीने बहूतांश मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती भक्तांनी मुळ जागेवरून दूसरीकडे नेवून ठेवल्या. मग बराच काळ लोटल्यावर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर रिकामा गाभारा पाहून स्थानिक भाविकांनी घडवायला सोपी म्हणून महादेवाची पिंड आणून बसवली. मग मंदिर मुळ कुठल्या देवतेचे? हे ओळखणं अवघड होवून बसले. अभ्यासकांनी हे दाखवून दिले की जी मुख्य देवता मूर्ती आहे त्या अनुषंगाने द्वारपाल, ललाटबिंबावरील देवता, बाह्य भागातील देककोष्टकांतील देवता यावरून काही अनुमान काढता येते.
गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी प्रणाल असते तिलाही अर्थ आहे. तिथे गोमुख कोरले आहे किंवा मकर प्रणाल आहे याचेही अर्थ आहेत.
अतिशय देखणी अशी ही शैवद्वारपालाची मूर्ती आहे. आजूबाजूला इतर भक्तगणांची शिल्पे आहेत. सर्वच नृत्याच्या ललित मूद्रेत आहेत. भोवती सुरेख नक्षी आणि किर्तीमुखही कोरलेले आहे.
मंदिराचा मुख्यमंडप आणि गाभारा यांना जोडणार्या जागेला अंतराळ असा शब्द आहे. या ठिकाणी अंधारच असल्याने इथली शिल्पकला दूर्लक्षीत राहते. प्राचीन मंदिरात गेलात तर गर्भगृहाच्या द्वारशाखा आवर्जून बारकाईने न्याहाळा. खुप सुंदर कलाकृती इथे दिसतील.
फोटो सौजन्य.
Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

Wednesday, December 2, 2020

शेतकरी आंदोलनाची ‘शाहिनबाग’ !


उरूस २ डिसेंबर २०२० 

पंजाबच्या शेतकर्‍यांनी सुरू केलेले शेती प्रश्‍नावरचे आंदोलन एक वर्षापूर्वीच्या ‘शाहिनबाग’ आंदोलनाच्या वाटेवर निघाले आहे. अगदी त्याच पद्धतीने घटना घडताना दिसत आहे. दिल्लीच्या दिशेने येणारे तीन प्रमुख रस्ते शेतकर्‍यांनी अडवून ठेवले आहेत. हजारो शेतकरी ट्रक ट्रॅक्टर्स ट्रॉली घेवून रस्त्यावर बसून आहेत. त्यांना कुठलीही चर्चा करायची नाही. पोलिसांनी दिलेल्या जागेवर बसून आंदोलन करायचे नाही. कृषी कायदे वापस घेतलेच पाहिजेत अशी अडमुठी मागणी करत ते हट्टाने बसून आहेत. 

नेमकी ही आणि अशीच मागणी याच पद्धतीने एक वर्षापूर्वी शाहिनबाग आंदोलनात मुस्लिम महिलांनी केली होती. वास्तविक सी.ए.ए. कायद्याशी त्यांचा किंवा कुठल्याच भारतीय नागरिकाचा काहीच संबंध नव्हता. 

अगदी असेच आत्ताच्या कृषी कायद्याचे झाले आहे. पंजाबातील जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांच्यावर कुठलाच अन्याय या कायद्याने होत नाही. पंजाबातील गहु आणि तांदळाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे शासकीय खरेदी होते. त्या धोरणाला कुठेच हात लावण्यात आला नाही. दरवर्षीप्रमाणे किमान आधारभूत किंमत (एम.एस.पी.) जाहिर झालेली आहे. त्याप्रमाणे अगदी आत्ताही खरेदी चालूच आहे. मग नेमकी अडचण काय आहे? 

शाहिनबाग प्रकरणांत आपण बघितले की पत्रकारांशी बोलण्याची आंदोलकांची भाषाही विचित्र होती. कुठल्याच नेमक्या प्रश्‍नावर ते उत्तर देत नव्हते. त्यांनी काय बोलावे याचे धडे तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्यासारखे उठपटांग सामाजिक कार्यकर्ते देत होते.

आताही शेतकरी आंदोलनात असेच घडताना दिसत आहे. या शेतकर्‍यांच्या आंदोलनात सगळे पुरोगामी घुसू पहात आहेत. शेतकर्‍यांनी काय बोलावे हे सांगितले जात आहे. पत्रकारांनी जेंव्हा या शेतकर्‍यांना मागण्या नेमक्या काय आहेत हे विचारले तेंव्हा त्यांना कसलेच तर्कशुद्ध उत्तर देता येत नाही. ‘कनून क्यूं बनाया? इसको वापिस लो.’ बस्स इतकी एकच मागणी ते लावून धरत आहेत. जे की शक्य नाही हे कुणालाही कळत आहे. 

प्रशासनाने दिलेल्या जागी जावून आंदोलन करण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यांना रस्ताच अडवून ठेवायचा आहे. कृषी मंत्री तोमर यांनी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीस मोठ्या प्रमाणावर हे शेतकरी गेले. तूमचे प्रतिनिधी निवडा आम्ही त्यांच्याशी बोलणी करायला तयार आहोत असे सरकार कडून स्पष्ट केल्यावर शेतकर्‍यांनी नकार दिला. तूम्हाला सर्वांशीच बोलणी करावी लागेल अशी हटवादी भूमिका घेतली. शिवाय आंदोलन मागे घेणार नाही हे पण ठासून सांगितले. आता सर्वांशी बोलणार म्हणजे किती जणांशी आणि कुठे बोलायचे? आंदोलनाच्या जागी बसून सरकारने हजारो शेतकर्‍यांसमोर चर्चा करायची अस अपेक्षीत आहे का?  

आज जे आंदोलनाचे समर्थन करत आहेत त्यांनी याचे उत्तर द्यावे की जर चर्चाच करायची नसेल तर हा पेच सुटणार कसा? उद्या सर्वोच्च न्यायालयाने परत पूर्वीसारखी फटकार लगावल्यावर हे सुधरणार आहेत का? 

शेतकर्‍यांची मागणी आहे एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत याचा कायदा करावा. जो की अर्थशास्त्रीय चौकटीत किंवा कायद्याच्याच चौकटीत बसतच नाही. मग हा कायदा करणार कसा? सरकारने खरेदी करावी ही मागणी का केली जाते आहे? कारण ही तर खरेदी चालूच आहे. मग अडचण काय आहे? 

एकूण 23 धान्यांचे भाव सरकार जाहिर करते. त्यापैकी केवळ गहू आणि तांदूळ या दोघांचीच खरेदी सरकारी पातळीवर होते. ही खरेदीही सरकारची जी धान्य साठवणूक क्षमता आहे तेवढीच केली जाते. त्यानंतर खासगी व्यापार्‍यांना गहू तांदळाची खरेदी करण्याची मुभा दिली जाते. सरकारची रॅशनिंग साठीची जी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त धान्य बाजारात आले तर तेही सरकारने खरेदी करावे असा आग्रह आहे का? आणि हे जास्तीचे धान्य सरकारी गोदामात सडले तरी चालेल पण सरकारने खरेदी केलीच पाहिजे असा अट्टाहास आहे का? 

 जी काही खरेदी होते ती गहू आणि तांदूळ यांचीच. इतर धान्याची सरकारी खरेदी होणारच नसेल तर हमीभाव जाहिर करून नेमका काय फायदा होतो? यापूर्वीही तूरीचे हमीभाव जाहिर झाले. त्याची खरेदी करावी असे धोरण ठरले. सरकारी गोदामांसमोर रांगा लागल्या. पण सरकारी यंत्रणेला तूरीसारखे एक धान्य खरेदी करायचे म्हटले तर तोंडाला फेस आला. शेवटी ती यंत्रणा सगळी कोलमडली. व्यापार्‍यांनी कमी भावात ही तूर खरेदी केली आणि शेतकर्‍यांचचे सातबारे घेवून त्या आधारे सरकारी भावात सरकारला विकली. मधली रक्कम अधिकारी व्यापारी नेते यांनी फस्त केली. अशी ही सरकारी खरेदीची कथा आणि व्यथा. एकूण शेतमाला पैकी (त्यातही केवळ धान्येच) फक्त जेमतेम 6 टक्के इतकीच सरकारची साठवणूक क्षमता आहे. ती करतानाच सरकारच्या तोंडाला फेस येतो. बाकी 94 टक्के शेतमालाची खरेदी विक्री ही खासगी क्षेत्रातच होते. मग नेमके हे आंदोलन कशासाठी आहे? खासगी क्षेत्रासाठी काही मार्गदर्शक तत्त्व लागू करता येतात. पण त्यावर संपूर्णत: सरकारी नियंत्रण ही बाब कदापिही शक्य नाही. जगातले कुठलेच सरकार आपल्या प्रदेशातील संपूर्ण शेतमाल खरेदी करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रणही ठेवू शकत नाही. 

मग ही नेमकी सरकारी खरेदीची आणि किमान आधारभावाची मागणी का लावून धरली जात आहे? जेंव्हा की त्याचा फायदा परत काळाबाजारासाठीच होतो. सामान्य करदात्याचा पैसा याच खर्च होतो. परिणामी विकास कामांसाठी निधी कमी पडतो. उलट सगळ्यांनी मिळून सरकारने शेतमाला बाजारातून पूर्णपणे बाजूला सरका असे ठामपणे सांगायची गरज आहे. पण इथे तर उलट परत सरकारच्याच गळ्यात पडण्याचा सल्ला दिला जात आहे. 

शेतमाल विक्रीसाठी खासगी क्षेत्र खुले करून दिले जात आहे. कृषी कायद्याने शेतमाल बाजाराचा श्वास मोकळा होतो आहे. शेतकर्‍याला बाजार स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने उचललेले हे एक पाउल सिद्ध होत आहे. असं असताना परत शेतकर्‍याच्या गळ्या भोवती सरकारी पाश आवळण्याची मागणी हे शेतकरी आंदोलन करत आहे?

या आंदोलनाची वाटचाल शाहिनबाग सारखीच होताना दिसत आहे. काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयाचा बडगा उगारल्या जाईल. शेतकर्‍यांना रस्ता मोकळा करून द्यावाच लागेल. नसता लष्कराला पाचारण करून रस्ता मोकळा करून घेतला जाईल. जसे ते शाहिनबाग आंदोलन विस्कळीत झाले आणि संपूनच गेले तसे हे पण आंदोलन काही दिवसांतच संपून गेलेले दिसून येईल. 

याला पाठिंबा देणारे सर्व पुरोगामी परत एका नव्या आंदोलनाच्या शोधात भटकत राहतील. विक्रम आणि वेताळ सारखी यांची अवस्था झाली आहे. मोदी संघ अमितशहा भाजप  म्हणेच एम.एस.ए.बी. विरूद्ध काहीतरी करत राहणे ही यांची मानसिक गरज आहे. प्रत्यक्षात जी राजकीय शक्ती उभी करायला पाहिजे त्यासाठी कुणी मेहनत करायला तयार नाही. 1980 नंतर इंदिरा गांधींनी एन.जी.ओ. जे जाळे फेकले त्यात बहुतांश पुरोगामी चळवळी अडकून संपून गेल्या आहेत. त्यांची राजकीय लढाई लढण्याची मानसिकताच संपून गेली आहे.  हे केवळ पेपरबाजी करून (आता नविन परिभाषेत सोशल मिडियाचा वापर करत) लेख लिहून चॅनल वर चर्चा करून समाधान मानत आहेत. प्रत्यक्षात भाजप विरूद्ध राजकीय ताकद उभी करण्याचे आव्हान कुणी स्विकारत नाहीये.  बिहारचे निकाल लागून महिना होत आला. पण अजून यांना त्यातिल मतितार्थ समजला नाही. 

शेतकरी आंदोलन पूर्णत: डोंगरकड्यावर दरीच्या टोकला जावून पोचलेले आहे. त्याचा कडेलोट निश्‍चित आहे. त्यातून वाचायचे असेल तर चार पावले मागे येवून आपला चुकलेला रस्ता शोधावा लागेल. पण तो शोधण्याची कुणाची तयारी दिसत नाही. आणि आंदोलक शेतकरी तो प्रमाणिकपणे शोधू लागलेच तर त्यांना हे पुरोगामी सुधरू देणार नाहीत. आंदोलनाची तर दिशाभूल झाली आहेच पण ती तशीच अजून व्हावी यासाठी त्यांना पाठिंबा देणारे प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी तर धूर्त चाणाक्ष आहेतच. त्यांनाही हे आंदोलन लांबत लांबत थकून संपून गेलं तर हवेच आहे. शेतकरी आंदोलनाची पूरती ‘शाहिनबाग’ झाली आहे.  

               श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

  

Tuesday, December 1, 2020

दिवे लागले रे दिवे लागले । प्राचीन मंदिर उजळून निघाले ।।


  उरूस, 1 डिसेंबर 2020 

 त्रिपुरारी पौर्णिमेला मराठवाड्यात प्राचीन मंदिरांवर दिपोत्सव करण्याची संकल्पना देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने काही गावांमध्ये मांडली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या अगदी तालूकाही नसलेल्या गावांची निवडी यासाठी केली होती. चार गावांत प्रातिनिधीक स्वरूपात हा दिपोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. 

शेदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या ठिकाणी खाम नदीच्या काठावर प्राचीन गणेश मंदिर आहे. तिथे नृत्य, गायन वादन असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता. खाम नदीच्या पात्रात दिवे सोडून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गिरीजा गोळे ही गुरू मुक्ता सोमण यांची विद्यार्थीनी. तिने भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर सचिन नेवपुरकर आणि वर्षा जोशी यांनी विविध भक्तिगीते गाउन श्रोत्यांना चिंब भिजवले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रेषित रूद्रवार याने केले. 

औरंगाबादहून खास या कार्यक्रमासाठी आलेले रसिक गणेश मंदिर, छोटी बारव, नदीचा घाट आणि मध्वमुनीश्वर समाधी परिसर फिरून पाहताना ‘इतकी सुंदर जागा आपल्या शहराच्या अगदी जवळच आहे आणि आपल्या माहित नाही हे दुर्दैवी आहे’ अशी भावना व्यक्त करत होते. शेंदूरवाद्याच्या ग्रामस्थांना आपल्या छोट्या गावात असा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होवू शकतो आणि त्यासाठी रसिक 30 किमी दूर अंतरावरून गाड्या करून येवू शकतात याचेच अप्रूप वाटत होते. 

चाराठाणा हे औरंगाबाद नांदेड महामार्गावर जिंतूरच्या अलीकडे असलेले छोटे गाव. या गावाला अतिशय उज्वल अशी परंपरा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या गावाला महत्व आहे. हेमाडपंथी मंदिरांनी गाव नटलेले आहे. भव्य अशी दगडी ओवर्‍यांची सुरेख बारव (पुष्करणी) गावात आहे. या गावी असलेल्या प्राचीन मानस्तंभ परिसराची स्वच्छता गावकर्‍यांनी मेहनतीने केली. स्त्रीयांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या. जमिनीवर मानस्तंभाची प्रतिकृती केली. त्याप्रमाणे दिव्यांची रचना केली. 

आपल्या गावच्या प्राचीन स्थळांबाबत अभिमान, स्थानिकांमध्ये जागृती ही सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे. त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधणे, पर्यटकांना तिथपर्यंत आणणे ही कामे स्थानिक लोकांनी पुढाकार घेवून केली पाहिजेत.  चारठाणा या गावात गेली 3 वर्षे गावकरी पुढाकार घेवून इतिहास विषयक जागृती अभियान चालवत आहेत. विविध निमित्ताने उपक्रम हाती घेतले जात आहेत. जानेवारी महिन्यात सांस्कृतिक पदयात्रेचे  (हेरिटेज वॉक) आयोजन करण्यात आले होते. आताही पर्यटकांसाठी नियोजन केले जात आहे.

तिसरं ठिकाण होतं धारासुर. या ठिकाणी पूरातत्त्वीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले गुप्तेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्व खात्याकडून सुरू होत आहे. शिखर शिल्लक असलेले महाराष्ट्रातले हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्वच्छता दिवसभर गावकर्‍यांनी केली. रात्री मंदिरावर अक्षरश: दिवाळीच वाटावी अशी रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या जोत्यावर समोर दिवे लावले होते. गावकर्‍यांनी यात उत्सुर्त सहभाग नोंदवला. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम विविध निमित्ताने घेण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम जलद गतीने व्हावे ही गावकर्‍यांची तळमळ आहे. 

चौथे ठिकाण होते परभणी तालूक्यात असलेले जाम. या गावी जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांवरील शिल्पांची दखल तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात घेतली आहे. पण सखोल अभ्यासाची अजूनही गरज आहे. गावकर्‍यांना मंदिराचे महत्त्व पटल्याने त्यांनी परिसराची साफसफाई व मंदिराचा जिर्णाद्धार केलेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरावर दिपोत्सव घेवून त्यांनी गावकर्‍यांत जागृती निर्माण केली. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत सकारात्मकता गावकर्‍यांनी दाखवली आहे.

या चार गावांत झालेला दिपोत्सव आणि सांगितिक कार्यक्रम याचे महत्त्व यासाठी आहे की ही गावे अगदी तालूकाही नसलेली छोटी गावे आहेत. सहसा आपण सगळे सांस्कृतिक नियोजन करत असताना मोठी शहरे केंद्रभागी ठेवतो. त्यासाठी मोठे प्रयोजक मिळतात. पण लहान गावांतील प्राचीन स्थळांपाशी सांस्कृतिक उपक्रम करण्याला वेगळे महत्त्व आहे. एक तर आपली जी अतिशय अभिमानास्पद उज्वल परंपरा आहे तिचे जतन या निमित्ताने केले जाते, लहान गावांतील वातावरण सांस्कृतिक कलात्मकतेला पोषक आहे त्याचीही दखल घेतली जाते. पूर्वीच्या काळी मंदिरे ही कलेची आश्रयदाती होती. म्हणूनच चित्र संगीत शिल्प साहित्य मंदिर परिसरांत फुलले. आज मंदिरांवर धार्मिक अंगाने टिका करणारे हे विसरतात की ही ठिकाणं कलेची स्फुर्ती स्थळे आहेत. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. त्याची बूज या निमित्ताने राखली जाते आहे. भरतनाट्यम शेंदूरवाद्याला सादर झाले. प्राचीन मंदिरं लेण्या आहेत त्यावरील नृत्य मुद्रा आजही अभ्यासकांना खुणावतात. त्याची दखल घेतल्या शिवाय पुढे जाताच येत नाही. जी वाद्ये या मंदिरांवर दर्शविली आहेत त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. लेण्यांमधील चित्रांवर तर जगभरचे अभ्यासक काम करत आहेत. 

नदीच्या काठी संस्कृती निर्माण झाली असं मानलं जातं. तसे पुरावेच मंदिरांच्या रूपाने उपलब्ध आहेत. मग याची आठवण म्हणून या मंदिरांच्या ठिक़ाणी सांस्कृतिक उपक्रमांचा विचार का केला जात नाही? 

सरकारी पातळीवर वेरूळ महोत्सव अयोजीत केला जात होता. त्या आयोजनाचे पुढे काय झाले ते आपण बाजूला ठेवू. पण असा विचार सर्वच प्राचीन मंदिर परिसरांत छोट्या प्रमाणात करण्याचा विचार आपण का करत नाही? त्यासाठी फारश्या निधीची गरजही नाही. अगदी छोट्या प्रमाणात अभिजात कलांसाठी काम करणारे झटणारे कलाकार कार्यकर्ते रसिक आणि स्थानिक गावकरी यांच्या सहकार्याने प्रत्येक मंदिर परिसरांत, नदीच्या घाटांवर, प्राचीन बारवांच्या परिसरांत सांस्कृतिक उपक्रम सहज शक्य आहेत. त्या निमित्ताने या स्थळांकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. पर्यटकांचे पाय इकडे वळतील. अभ्यासकही इथे येतील. या ठिकाणांचा अजून सखोल अभ्यास होईल. 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यासाठी पुढाकार घेत आहे. आपल्या परिसरांतील अशा वास्तुंबद्दल आम्हाला जरूर कळवा. त्यांचे फोटो पाठवा. त्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करा. आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहोत. इतिहास प्रेमी मंदिर मुर्ती प्रेमी रसिकांनी जरूर संपर्क साधावा. या चळवळीत सहयोग नोंदवावा. 

(हे केवळ हिंदूंसाठी आहे असे नाही. औरंगाबाद परिसरांतील शेकडो मजारी धुळखात पडून आहेत. बौद्ध लेण्याची अवस्थाही अतिशय वाईट आहे. त्यावर मी सविस्तर लिहीणार आहेच नंतर. तेंव्हा हा उपक्रम सर्वांसाठीच आहे.)    

     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575