Tuesday, April 28, 2020

भाऊ तोरसेकरांनी काढले वागळेंचे वाभाडे !


उरूस, 28 एप्रिल 2020

पत्रकार निखिल वागळे यांना पालघर प्रकरणी केलेला व्हिडिओ आणि त्यानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी वर केलेली चिखलफेक महागात पडताना दिसत आहे. एक तर काहीच कारण नसताना वागळे पालघर प्रकरणांत वचावचा बोलून बसले. त्यात परत त्यांनी केलेले खोटे ट्विट त्यांना अडचणीत आणणारे ठरले. हे कमी होते म्हणून की काय त्यांनी लगेच अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका करणारा त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीवर ‘प्रकाश’ टाकणारा व्हिडिओ केला.

अर्णब गोस्वामी सोनिया गांधींवर केलेल्या टीकेसाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांची सरशी झाली असून न्यायालयाकडून त्यांना तीन आठवडे संरक्षणही मिळाले आहे. अर्णब यांनी वागळेंचा व्हिडिओ पाहिला असल्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी वागळे यांना उत्तर दिले नाही. मात्र ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी स्वत:चे नविन यु-ट्यूब चॅनेल प्रतिपक्ष यावरून निखिल वागळेंवर दोन व्हिडिओ काढून त्यांचे वाभाडे काढले आहेत. शिवाय पोस्टमन या दुसर्‍या चॅनेलवर पण एक व्हिडिओ टाकून वागळेंना अजूनच धूतले आहे.

पालघर प्रकरणापुरते स्वत:चे विवेचन वागळेंनी मर्यादीत ठेवले असते तर चालले असते. पण अर्णब गोस्वामीवर घसरण्याची वागळेंना काहीच गरज नव्हती. पण बुडत्याचा पाय खोलात तशी अवस्था वागळेंची झाली आहे.

आपल्या व्हिडिओत वागळेंनी काही चुका केल्या आहेत, खोटे संदर्भ सांगितले आहेत, घटनांची उलटा पालट केली आहे. वागळे स्वत:च्यात आधीच्या व्हिडिओत काय बोलतात हे ते स्वत:च लक्षात ठेवत नसावेत.

उदा. अर्णब गोस्वामी यांचा खटला तातडीने सर्वोच्च न्यायालयात कसा काय चालतो? गरिबांना सर्वोच्च न्यायालयात उभेही राहणे मुश्कील आहे. अर्णब यांच्यासाठी पैसे कोण उभे करतो? वगैरे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. वागळे हे विसरले की नुकतेच त्यांनी संशयीत शहरी नक्षलवादी म्हणून आरोपी असलेले आनंद तेलतुुंबडे यांच्यावर एक व्हिडिओ केला आहे. त्यात आनंद तेलतुंबडे हे गरिबांचे दलितांचे शोषितांचे कसे प्रतिनिधी आहेत वगैरे वगैरे त्यांनी प्रतिपादन केले. पण याच तेलतुंबडे यांना नोव्हेंबर 2018 मध्ये तातडीने सर्वोच्च न्यायालयाने जामिन प्रश्‍नी दिलासा दिला. एकदा नव्हे तर दोनदा त्यांची याचिका या दीड वर्षांत सर्वोच्च न्यायालया समोर आली. आणि इतर कुठल्याही सामान्य माणसाला उपलब्ध होणार नाही अशी संधी तेलतुुंबडेंना मिळाली व दीड वर्ष तपास यंत्रणांना हुलकावणी देत त्यांना अटक टाळता आली.

आता वागळे यांनी अर्णब यांना प्रश्‍न विचारताना याचेही उत्तर द्यावे की तेलतुंबडें यांच्यासाठी सर्वोच्य न्यायालयात खटला चालविण्यासाठी कोणी पैसा पुरवला?

अर्णब यांचे रिपब्लिक चॅनेल चालविण्यासाठी उद्योजक राजीव चंद्रशेखर यांचा पैसा असल्याचे वागळे सांगत आहेत. खरं तर हे भांडवल कुणाचे आहे हे नेटवरून कुणालाही शोधता येते. त्यासाठी वागळेंसारख्या पत्रकाराची गरज नाही. भाउ तोरसेकर यांनी वागळे यांची आत्तापर्यंतची पत्रकारिता कुणाच्या पैशावर चालली असा रोख सवाल विचारत काळ्या पैशावर चाललेल्या या पत्रकारितेचे ढोंग उघड केले आहे.

वागळेंच्या निमित्ताने भाउ कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, प्रणव रॉय सर्वच पुरोगामी पत्रकारांची पत्रकारिता कशी काळ्या पैशावर चालते याची कुंडली मांडत आहेत.

पुरोगामी म्हणवून घेणार्‍या पत्रकारांचे ढोंग भाउ उघड करत आहेत हे फार महत्त्वाचे आहे. आनंद तेलतुंबडे प्रकरणात त्यांची तपास यंत्रणेसमोर शरणागती प्रसंगी प्रकाश आंबेडकरांच्या बरोबरीने आमदार कपिल पाटील दिसत असतात. हेच कपिल पाटील निखिल वागळेंवर काय आरोप करत होते? वागळे-कपिल पाटील हे भांडण काय आणि कसे होते? पुरोगाम्यांचे वकिल कपिल सिब्बल आणि पुरोगामी पत्रकार बरखा दत्त यांचे तिरंगा चॅनेलवरून कसे वाजले, कपिल सिब्बल यांनी कर्मचार्‍यांचे पैसे कसे बुडवले आणि त्याबद्दल आरडा ओरड बरखा दत्त यांनीच कशी केली असे कितीतरी मुद्दे भाउंनी मांडले आहेत.

जे रविशकुमार जगाला तत्त्वज्ञान शिकवतात, वागळेंसारखे त्यांना आदर्श प्रमाणपत्र देतात त्या एनडिटिव्ही चे मालक प्रणव रॉय यांच्यावर सध्या आर्थिक कारवाई चालू आहे. कर बुडविल्या प्रकरणी एनडिटिव्ही गंभीर आरोपांना तोंड देतो आहे. याची कुठलीही वाच्यता हे इतरांना शहाणपण शिकवणारे पत्रकार करत नाहीत.

पालघर प्रकरणांत ज्या पद्धतीनं सोनिया गांधी, कॉंग्रेस आणि सर्वच पुरोगामी म्हणवून घेणारे पत्रकार बुद्धिजीवी विचारवंत वागले ते सर्वच संशयास्पद आहे. आता जी नावे या प्रकरणांत समोर येत आहेत ती ख्रिश्‍चन मिशनर्‍यांची आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी अजूनही या प्रकरणी चकार शब्द काढला नाही. पालघर आरोपींमध्ये एकही मुसलमान नाही हे वागळे सांगतात पण आहेत कोण ते सांगत नाहीत. भाजपच्या सरपंच यात आहेत असे खोटे ट्विट वागळे करतात पण त्यांचे नाव पोलिसांच्या यादीत नाही हे दिसताच वागळेंची बोबडी वळते व दोनच तासात ट्विट वरून ते नाव काढून टाकतात.

प्रस्थापित पत्रकार सत्याची बाजू दडपून टाकत आहेत. अर्णब गोस्वामी सारखा पत्रकार पालघर हत्याकांडाला वाचा फोडत आहे तर हे सर्व त्याच्यावर तुटून पडले आहेत. भाऊ तोरसेकरांनी या ढोंगी पुरोगाम्यांना उघडं पाडण्याची सरळ स्वच्छ भूमिका घेतली आहे. अर्णब सारखा पत्रकारही चुकेल तिथे त्यालाही उघडं पाडूत असंही त्यांनी म्हटलं आहे ही भूमिका अतिशय योग्य अशी आहे.

आपल्या व्हिडिओला उत्तर देण्याचे तोरसेकरांचे आव्हान वागळे स्विकारतील असे दिसत नाही. भाउंचे तीन व्हिडिओ आले आहेत पण वागळेंचे अजून एकही उत्तर नाही. आपण वाट पाहू वागळे काय आणि कसे उत्तर देतात याची.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, April 24, 2020

अर्णब यांचा आक्रस्ताळेपणा पुरोगामी ढोंगाची प्रतिक्रिया!


उरूस, 24 एप्रिल 2020

पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी  बुधवारी रात्री 12.30 वा. स्टुडिओतून कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दोन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तशी रीतसर तक्रार अर्णब यांनी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली.

या प्रकरणांवर जशी प्रतिक्रिया पुरोगामी गँग कडून उमटायला हवी होतीच तशीच ती उमटली. बहुतांश जणांनी अर्णब यांच्या आक्रस्ताळेपणावर टीका केली. पण ही टीका करत असताना त्यांनी उपस्थित केलेल्या मुळ प्रश्‍नाला मात्र सोयीस्करपणे बगल दिल्या गेली. अर्णब आक्रस्ताळे आहेत यात काही वाद नाही. त्यांचा कार्यक्रम त्यामुळे बघवला जात नाही. मी स्वत: हा कार्यक्रम फारसा पहात नाही. यु-ट्यूबवर रात्री उशीरा या कार्यक्रमातील इतरत्र न आलेला एखादा मुद्दा असेल तर तेवढं कधी कधी पाहतो. अर्णब यांच्यावर कालपासून जी टीका होते आहे त्याच्या मुळाशी आहे पालघर हत्याकांड.

दोन साधूंची 200 जणांच्या जमावाकडून क्रुर हत्या होते आणि हे प्रकरण दाबल्या जाते. याची कुठलीही दखल महत्त्वाच्या वाहिन्या अथवा वृत्तपत्रांकडून घेतली जात नाही. कुठल्याही मॉब लिंचिंगवर आकांडव तांडव करणारे पुरोगामी या प्रकरणी चिडीचूप आहेत. अर्णब यांनी विचारलेला प्रश्‍न हा सोनिया गांधींवर आहे. कॉंग्रेस आणि सोनिया गांधी यांनी या प्रकरणात निषेध का केला नाही असा अर्णब यांचा साधा प्रश्‍न आहे.

अर्णबवर टीका करणारे नेमके याच प्रश्‍नाचे कसलेही उत्तर द्यायला तयार नाहीत. सोमवारी दुपारी 2 वा. 40 मि. निखील वागळे सारखे पत्रकार खोटे ट्विट करतात, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, कम्युनिस्ट सुधीर सुर्यवंशी त्याला प्रतिसाद देतात. मग जेंव्हा हा खोटेपणा उघड होतो त्यावर मात्र काहीही प्रतिक्रिया यांच्याकडून येत नाहीत. माध्यमे यावर चुप बसतात.

हे जे पुरोगामी ढोंग आहे त्या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी यांचा आक्रस्ताळेपणा उफाळून येतो. हे समजून घ्यायला हवे.  इतर मॉब लिंचिंगच्या प्रसंगी सोनिया गांधींना दु:ख होते. कॉंग्रेसकडून याचा निषेध केला जातो. मग आता हे सगळे मौनात का जातात? असा हा प्रश्‍न आहे. आणि याचे उत्तर पुरोगामी द्यायला तयार नाहीत.

गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणाचे राजकारण करून नका असे सांगत आहेत. पत्रकार भाउ तोरसेकर यांनी एक प्रश्‍न अनिल देशमुखांच्या या उद्गारावर उपस्थित केला आहे. दिल्लीच्या तबलिग मरकज प्रकरणी परवानगी कुणी दिली असा गैरलागू प्रश्‍न उपस्थित करून राजकारण कुणी सुरू केलं? जाणते राजे शरद पवार यांनीही हा परवानगीचा अनावश्यक अनाठायी प्रश्‍न उपस्थित केला होता. केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्‍न विचारणारे एक खोटे पत्र सोशल मिडियात व्हायरल केल्या गेले. मग जर हे राजाकरण शरद पवार आणि अनिल देशमुख करत असतील तर पालघर प्रकरणी हेच लोक चुप्पी साधून का आहेत?

सरकारच्या वतीने गृहमंत्री यांनी खुलासा केला की पालघर आरोपी पैकी कुणीही मुसलमान नाही. या खुलाश्याने गैरसमजात अजूनच  भर पडली आहे. जर कोण नाही हे आवर्जून सांगितल्या जाते तर कोण आहे हे का नाही सांगितल्या जात? पालघर हत्याकांडातील आरोपी कोण आहेत ही नावे समोर का नाही आणली जात? अखलाख, तबरेज यांच्या मॉबलिंचिंग बाबत अशीच भूमिका तेंव्हा घेतल्या गेली होती का?

केवळ महाराष्ट्राचाच विचार केला तर एक दोन नव्हे तर तीन घटना या आधी लॉकडाउनच्याच काळात घडल्या आहेत. कपिल वाधवान प्रकरणी सरकारी पातळीवर असेच घडले. हे प्रकरण दाबण्याचाच प्रयास झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे बाहेर पडले. स्थानिक लोकांनी वाधवान यांच्या गाडीच्या ताफ्यावर प्रचंड आक्षेप घेतला. मग अपरिहार्यपणे सरकारला कारवाई करणे भाग पडले. त्यातही परत अमिताभ गुप्ता हा अधिकारी कसा संघाचाच माणूस आहे. आणि ही चुक कशी भाजपचीच आहे असाही खोटा आरोप केला गेला. दुसरे प्रकरण वांद्रे येथे जमा झालेल्या दोन एक हजाराच्या जमावाचे. या बाबतही अतिशय खोटे अविश्वसनीय वक्तव्य सत्ताधारी पक्षाकडून आणि पुरोगामी पत्रकारांकडून समोर आले. युपी बिहारचे मजूर आहेत असं म्हणायचं तर दुसरीकडून त्यांच्या हातात सामान दिसत नाही, हे सगळे जमा होतात ते मस्जिद समोर आणि सांगितलं जातं की स्टेशनवर गाडीसाठी जमा झाले आहेत. बातमी मराठी वाहिनीवर येते आणि जमा झालेले सगळे अमराठी. तिसरं प्रकरण अनंत करमुसे या अभियंत्याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाणीचे आहे. सातत्याने अशा विविध  प्रकरणांत पुरोगामी ढोंगाचे पुरावे समोर येत जातात. यामुळे अर्णब गोस्वामी सारख्यांनी अक्रस्ताळेपणा केल्यावर तो सामान्य लोकांना खटकत नाही उलट योग्यच वाटतो.

आचार्य विनोबा भावे यांनी ‘जशास तसे’ याचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. जशास तसेचा अर्थ तलवारीला उत्तर तलवारीने द्यावे असा होत नाही, तलवारीला ढालीने उत्तर द्यायचे असते, अंधाराला प्रकाशाने उत्तर द्यायचे असते. जसे आव्हान समोर उभे राहते त्याला त्याप्रमाणे उत्तर देणे म्हणजे जशास तसे असे विनोबा सांगतात. लॉकडाउन काळात महाराष्ट्रात ज्या तीन घटना घडल्या त्यावर पुरोगाम्यांच्या समंजस उचित प्रतिक्रिया आल्या असत्या तर चौथ्या पालघर प्रकरणी अर्णब सारख्यांचा आक्रस्ताळेपणा असा उफाळून वर आला नसता. जशी समस्या आहे तशी त्यावरची समंजस प्रतिक्रिया उमटायला हवी होती.

आज अर्णबवर टीका करताना मुळ कारणाकडे मात्र लक्ष दिल्या जात नाही. यामुऴे पुढेही यावरच्या प्रतिक्रिया अशाच उमटू शकतात. सामान्य माणसांना आधी याची फारशी दखल घ्यावी वाटत नसायची. पण परत परत पुरोगामी त्याच पद्धतीनं वागणार असतील तर मग मात्र सामान्य मतदार अजूनच मोदींकडे झुकत जाईल. 2014 मधील 272 जागा 2019 मध्ये 303 वर पोचल्या. 2024 मध्ये मग त्या 350 झाल्यातर आश्चर्य वाटायला नको. मग पुरोगामी अजूनच छाती बडवत बसतील.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 22, 2020

पालघर झुंडबळी। आळीमिळी गुपचिळी॥


उरूस, 22 एप्रिल 2020

शुक्रवारी 17 एप्रिल रोजी रात्री 200 लोकांचा जमाव मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर पालघर मध्ये तीन लोकांची हत्या करतो. आणि ही बातमी दोन दिवस कुणाला कळतही नाही. कायद्याचे संरक्षक समोर असताना कायदा हातात घेवून हत्या केली जाते आणि याची जराही चाहूल कुणाला लागत नाही. कोरोनामुळे लॉकडाउन चालू आहे. अशा वेळी 200 चा जमाव गोळा होतोच कसा? आणि हे सगळं चालू असताना पोलिस बघ्याची भूमिका घेवून शांत बसतात कसे काय?

तिसर्‍या दिवशी या हत्याकांडाला वाचा फुटली ती सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे. कुठल्याही जागृत पत्रकाराने ही बातमी समोर आणली नाही. कुठल्याही छोट्या मोठ्या माध्यमांना याची दखल घ्यावी वाटली नाही. जेंव्हा समाजमाध्यमांतून ही बातमी समोर आली तेंव्हा अपरिहार्यपणे सर्वांना तिकडे वळावे लागले.

पुरोगामी पत्रकार माध्यमे विचारवंत चित्रपट कलावंत यांची तर कमाल आहे. उशीरा का होईना ही बातमी बाहेर आली तरी यापैकी कुणीच यावर काही बोलायला तयार नाही. तातडीने निखिल वागळें सारखे पत्रकार या प्रकरणी भाजपच्या सरपंचाला अटक़ असे खोटे ट्विट करून मात्र मोकळे होतात. यातील खोटेपणासाठी त्यांच्यावर तक्रार दाखल होते तेंव्हा ते माघार घेतात.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेबाबत तातडीने पत्रक काढणार्‍या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला या हत्याकांडाबाबत चकार शब्दही काढावा वाटत नाही. जे मुख्य 6 आरोपी या प्रकरणांत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यातील 5 तर प्रत्यक्ष कम्युनिस्टच आहेत. आणि एक राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधीत आहे.

यथावकाश याचा तपास पूर्ण होईल. कायदेशीर कारवाई होईल. सत्य बाहेर येईल. पण या प्रकरणांत पुरोगाम्यांचे मौन भयानक आहे. जर तूम्हाला एखाद्या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर येईपर्यंत बोलणे उचित वाटत नाही तर मग इतर वेळी तातडीने निषेध का केला जातो? आनंद तेलतुुंबडेंवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाते तरी त्या विरोधात मोठा आरडा ओरडा केला जातो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच कशी अटक करतात? असे प्रश्‍न उद्धटपणे विचारले जातात. पोलिस, सरकार, न्यायालय यांच्यासाठी अपशब्द वापरले जातात. पण हेच पुरोगामी पालघर हत्याकांडाबाबत मात्र आळीमिळी गुपचिळी बाळगतात. हे नेमके काय गौडबंगाल आहे?

मुख्यमंत्री दोन दिवस उशीरांनी तोंड उघडतात आणि सांगतात याला कसलाच सांप्रदायिक पैलू नाही. जाणते राजे शरद पवार सांगातात पालघर प्रकरणी राजकारण करू नये. गृहमंत्री अनिल देशमुख तर गायबच आहेत. या सगळ्यांनी याचे उत्तर द्यावे की हे प्रकरण तीन दिवस दाबून का ठेवल्या गेले?

मुंबईहून सूरतच्या दिशेने अंत्ययात्रेसाठी निघालेले दोन साधू रात्रीच्यावेळी 200 जणांच्या जमावात सापडतातच कसे? ही माहिती कुणी कुणाला दिलेली असते? आणि हे सगळे झाल्यानंतर माध्यमं, सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा हे सगळे मौनात कसे काय जातात?

या निमित्ताने पुरोगामी विचारवंत आणि माध्यमांतील तथाकथित  पुरोगामी पत्रकार यांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याची आत्महत्या ही या लोकांना हत्याच वाटते आणि त्याचे देशभर भांडवल केले जाते. दादरी येथील अखलाख याची हत्या तातडीने देशव्यापी विषय बनतो. पुरस्कार वापसी अभियान सुरू होते.

या उलट दोन साधूंची 200 च्या जमावाने केलेली हत्या मात्र यांना दखल न घेण्याची बाब वाटते. हे भयानक बौद्धिक कारस्थान आहे. मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या त्या सर्वांच्या मुळाशी काही एक सकृत दर्शनी दिसणारे कारण तरी होते. त्या त्या व्यक्तीची काही एक कृती इतरांना पसंद नाही असे समोर आले होते. पण या प्रकरणांत तर असे काहीही नाही. या साधूंचा त्या गावातील लोकांशी काहीही संबंध नाही.

शहरी नक्षलवादाचा इथे परत एकदा संबंध येतो. कुठल्या तरी कारणाने लोकांमधील अस्वस्थता हेरून त्याचा वापर करून हिंसाचार घडवून आणायचा. एल्गार परिषद, भीमा कोरेगांव दंगल, शाहिनबाग आंदोलन, जेएनयु व जामिया मिलीयांतील हिंसाचार, दिल्ली जाफराबाद दंगल या सगळ्यांतून नागरी भागांत कसल्यातरी कारणांनी हिंसाचार पेटविणे हा एक सामायिक अजेंडा समोर येतो आहे. आता पालघर प्रकरणांतही असलेच काही तरी शहरी नक्षलवादाचे कारस्थान आहे का याचा शोध घेतला गेला पाहिजे. कारण या प्रकरणांत पकडल्या गेलेले आरोपी कम्युनिस्ट पक्षांशी संबधीत आहेत.

शहरी नक्षलवादावर कडक कारवाई सुरू झालेली आहे. कायद्याचा मार्ग अवलंबून एक एक संशयीत ताब्यात घेणं चालू आहे. 14 तारखेला आनंद तेलतुुंबडे व गौतम नवलखा हे दोन संशयीत शहरी नक्षलवादी तपास यंत्रणेला शरण येतात आणि  लागलीच दोन दिवसांत हे हत्याकांड घडते हा योगायोगही तपासून घ्यावा लागेल. कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर सुर्यवंशी, पत्रकार निखिल ळागळे, काॅग्रेसचे सचिन सावंत यांनी खोट्या बातम्या ट्विट केल्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही अशीच दिशाभुल केली गेली आहे.

पालघर भागात आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या आदिवासींमध्ये कम्युनिस्टांची दादागिरी प्रचंड आहे. एखाद्या विषयात बुद्धीभेद करून लोकांचे लक्ष वळविण्याचे उद्योग दोनच वर्षांपूर्वी ‘किसान लॉंग मार्च’ या नावाने पालघर नाशिक या आदिवासी पट्ट्यातूनच झाले होते. आदिवासी प्रश्‍नावर प्रचंड जनमत तयार होवू शकत नाही म्हणून त्याला शेतकर्‍यांच्या हिताचा मुद्दा जोडला गेला. एक वर्ष हा लॉंग मार्च निघाला. दुसर्‍या वर्षी जागच्या जागीच जिरला. नंतर परत कुणी किसान लॉंग मार्चचा विषयच काढला नाही. शेतकर्‍यांचा संप घडवून शेतकरी व शहरी ग्राहक यांच्यातील कटूता याच डाव्यांनी वाढविण्याची खेळी केली होती.

पालघरच्या आदिवासी पट्ट्यात अफवा पसरवून हे हत्याकांड घडवून आणले गेले असा निष्कर्ष काढला जातो आहे. हीपण एक दिशाभूलच आहे. हे हत्याकांड अफवा पसरवून नव्हे तर जाणिवपूर्वक घडवून आणलेले आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून हे भीषण हत्याकांड समोर आले. सर्वसामान्य जनतेने सोशल मिडियाची ताकद लक्षात घ्यावी. आणि हीचा वापर सत्यसंशोधनासाठी करावा. प्रस्थापित माध्यमे जनसामान्यांच्या व्यथांना न्याय देतीलच असे नाही. नक्षलवादी कारस्थानाची पाळेमुळे कायद्याच्या आधाराने उखडली जात आहेतच. आपण सोशल मिडियाच्या सहाय्याने या अभियानात सरकारला मदत करू.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, April 21, 2020

कोरोना आपत्तीत वृत्तपत्रांना डिजीटल संधी !


उरूस, 21 एप्रिल 2020

कोरोना आपत्तीत वृत्तपत्रांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एरव्ही वृत्तपत्रे कागदावर छापून ग्राहकापर्यंत पोचविणे हे एक किचकट, वेळखावू, पैसेखावू काम होवून बसले होते. कोरोनात वृत्तपत्रांच्या वितरणावर बंदी आली आणि हीच वृत्तपत्रे डिजिटल स्वरूपात कुठल्याही मोबाईलवर मोफत पाठवायला सुरवात झाली.
यामुळे एक नविन संधी आता वृत्तपत्रांना उपलब्ध झाली आहे. काही इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांच्या डिजीटल आवृत्त्या सशुल्क उपलब्ध करून दिल्या आहेत. मराठीत मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. आता कोरोनात ही संधी आहे. वृत्तपत्रांची छपाई, तो मोठा खर्च, वितरणातील प्रचंड अडचणी, वितरणासाठी मनुष्यबळाची कमतरता या सगळ्यांवर मात करणे आताच शक्य आहे.

ही सेवा मोफत असावी का सशुल्क यावर मतमतांतरे असू शकतात. पण ही सेवा मोफत असावी अशा मताचा मी आहे. तसेही सध्या वृत्तपत्रांचा सगळ्यात मोठा महसुल जाहिरातीतूनच येतो आहे. वृत्तपत्रांचे वितरण करण्यासाठी येणारा खर्चही खुप मोठा आहे. तेंव्हा महसुल सगळा जाहिरांतीतून गोळा करणे आणि ही वृत्तपत्रे डिजीटली मोफत उपलब्ध करून देणे हे व्यवहार्य वाटत आहे.

दुसरा एक फायदा डिजीटल किंवा ऑन लाईन आवृत्तीला मिळू शकतो. व्हिडिओंची जोड या बातम्यांना देता येवू शकते. किंवा खरे म्हणजे या संधीचा फायदा घेवून एका वेगळ्यात स्वरूपात वृत्तपत्रे देता येवू शकतात.
तंत्रज्ञानाचा फायदा घेवून तळागाळापर्यंत पोचण्याची हीच संधी आहे. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात जगभरातील व्यापार खुला होण्यास सुरवात झाली, जगभरांतील तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचण्यास सुरवात झाली. भारतात दोन ठळक उदाहरणं याची आपण अनुभवतो आहोत. पहिलं उदाहरण मोबाईलचे. 2010 नंतर मोबाईलचे सार्वत्रिकीकरण होण्यास सुरवात झाली. ऍण्ड्रॉइड मोबाईलने तर मोठी क्रांतीच केली. अगदी छोट्यातल्या छोट्या गावात जिथे जिथे नेटवर्क आहे तिथपर्यंत या मोबाईलच्या माध्यमातून आपण जग हाताच्या  तळव्यावर आणून ठेवू शकलो. भारतासारख्या देशात जिथे संपर्क हीच मोठी अडचण होती तिथे किमान तेवढे एक काम या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाले.

दुसरे उदाहरण छोट्या लोडिंग ऍटो आणि दुचाकी मोटारसायकलचे आहे. गेल्या 20 वर्षांत यांचे सार्वत्रिकीकरण झाले व किमान रस्ता जिथे आहे तिथपर्यंत आपण ही वाहने पोचवू शकलो. अगदी दुर्गम भागांतील आदिवासी वस्ती वगळ्यास सर्वत्र (जवळपास 130 कोटी लोकसंख्या) ही सुविधा आता उपलब्ध आहे.

त्यामुळे ग्रामीण भागांतील माल बाजारपेठेत पोचविणे सुलभ झाले. छोटी वाहने आणि दुचाक्या यांच्यामुळे अगदी छोट्या गावांतून वस्त्यांमधून मोठ्या गावांना प्रवास करणे तुलनेने सोपे आणि स्वस्त झाले.

ऑनलाईन बँकिंगचे पण असेच उदाहरण आहे. अगदी छोट्या भागांत जिथून पैशाचे व्यवहार करणे अवघड असायचे तिथे डिजिटल बँकिंगने खुप मोठे काम केले आहे. विशेषत: ग्रामीण भागात या सुविधेचा लाभ मोठा झाला आहे.

याच पद्धतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेवून तळागाळापर्यंत वृत्तपत्र पोचविले पाहिजे. अगदी छोट्या गावात वृत्तपत्रांचे प्रतिनिधी कधी नेमले जायचे नाहीत. या निमित्ताने ही पण एक संधी आता उपलब्ध आहे. थोडेफार शिकलेला आणि चांगला मोबाईल हाती असणारा आता वृत्तपत्रांचा प्रतिनिधी बनू शकतो. वेब मालिकांच्या माध्यमांतून ग्रामिण भागांतील प्रतिभा समोर येते आहे. तिला मोठा प्रेक्षकवर्गही लाभतो आहे. हेच वृत्तपत्रांच्या बाबतीत पण घडू शकते. अगदी छोट्या भागांतील वाचक यापूर्वी गृहीत धरला गेलाच नव्हता. तिथपर्यंत वृत्तपत्रे पोचविणे व्यवहार्य नव्हते. पण आता डिजिटल माध्यमांतून हे सहज शक्य आहे.

परदेशस्थ भारतीयांचाही एक फार मोठा वर्ग जो संपूर्णत: या डिजिटल आवृत्त्यांवरच अवलंबून आहे. आजही हा वर्ग ही वृत्तपत्रे ऑनलाईनच वाचतो. त्याच्यापर्यंत पोचायला दुसरा सक्षम व व्यवहार्य पर्याय नाही. माझा स्वत:चा असा अनुभव आहे की गेली माझ्या ब्लॉगच्या 1 लाख 85 हजार दर्शकांपैकी 35 हजार इतकी मोठी संख्या ही परदेशी वाचकांची आहे. म्हणजे हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळ जाते. आपण मराठी वृत्तपत्रांचा विचार करू. परदेशातील सोडा पण भारतात सर्वत्र पसरलेली जी मराठी माणसे आहेत त्यांच्यापर्यंत आपण छापील वृत्तपत्र पोचवू शकतो का?

डिजिटल तंत्रज्ञान एक मोठे वरदान आहे. आपत्ती जशी आली आहेत तसेच त्यातून बाहेर पडण्याची पण संधी आहे. एरव्ही पर्यावरणवादी कागद वाचवा पर्यावरण वाचवा असा नारा देतातच. या डिजिटल माध्यमामुळे पर्यावरणाची हानी पण होणार नाही.

केवळ वृत्तपत्रेच नाहीत तर इतरही बर्‍याच क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर कोरोना नंतर वाढलेला दिसून येईल. त्यामुळे कितीतरी पैशांची बचत, वेळेची बचत पर्यावरणाचे रक्षण अशा बाबी घडून आलेल्या दिसतील. यासाठी आपण या तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. यावर नकारात्मक दृष्टीकोनातून शंका उपस्थित करत राहिलो तर हाती काही लागण्याची शक्यता नाही.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Sunday, April 19, 2020

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!


काव्यतरंग, रविवार १९ एप्रिल २०२०  दै. दिव्य मराठी

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!

कोणते आकाश हे? तू आम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे.. पिंजरे गेले कुठे?
या भरार्‍या आमुच्या.. ही पाखरांची वंदना!

कालचे सारे मुके आज बोलू लागले
अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले
हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!

तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना!

धम्मच्रकाची तुझ्या वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा अम्ही घेतलेला सोबती
ऐक येणार्‍या युगांच्या आदरांची वंदना!
-सुरेश भट

(एल्गार, पृ. 17, सुपर्ण प्रकाशन, आवृत्ती 2)
(मूळ कविता 7 कडव्यांची आहे.)

14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी झाली. लॉकडाऊनमुळे ही जयंती सार्वजनिक रित्या समारंभपूर्वक साजरी करण्यास बंदी होती. त्यामुळे घरोघरीच लोकांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन केले.  

सुरेश भटांची कविता या पार्श्वभूमीवर समजून घेतली पाहिजे. लाखो कराडो दीन दलितांच्या मनात बाबासाहेब आज देव बनून राहिले आहेत. भटांनी ही नेमकी भावना ओळखून त्या अनुषंगाने हे गीत लिहीले.
गुलामांना गुलामिची जाणीव करून द्यावी लागते. ‘कोणते आकाश हे?’ या ओळीत आम्हाला स्वातंत्र्य माहितच नव्हते. तू पंख दिल्यावर आम्हाला कळले आपल्याला पण उडता येते. आणि आजच्या दुबळ्या दीन दलितांच्या या उंच आकाशातील भरार्‍या तूला वंदना करत आहेत. ही भावना व्यक्त होते.

पुढच्या कडव्यात सुरेश भटांनी दलितांची मानसिकता कशी बदलत गेली याचे वर्णन केले आहे. ‘कालचे मुके आज बोलू लागले’ हे खरं आहे. पण हे बालणे म्हणजे साधेसुधे नव्हे. बाबासाहेबांनी दाखविलेल्या ‘सत्यासवे शब्द तोलू लागले’ या ओळीमध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे. 

बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्विकारला तो आंधळेपणाने नाही. जशाचा तसा बुद्ध त्यांनी स्विकारला नाही. बाबासाहेबांचा बुद्ध धम्म जरा वेगळा आहे. उदा. पूनर्जन्म बाबासाहेब नाकारतात. ‘बुद्धा ऍण्ड हिज धम्मा’ या पुस्तकात राजपुत्र गौतमाच्या आयुष्यातील तीन प्रसंग वृद्ध दिसणे, प्रेतयात्रा दिसणे, रोगी दिसणे हे सगळे बाबासाहेबांनी कठोरपणे नाकारले आहे. अतिशय प्रखर बुद्धिवादी तर्क करून गौतमाच्या सन्यासाची चिकित्सा केली आहे. आठ वर्षे प्रस्थापित राज्यव्यवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर राजपुत्र गौतम सन्यास घेवून बाहेर पडतो याची त्यांनी केलेली मिमांसा अपुर्व अशी आहे. त्यामुळे सुरेश भटांनी ‘अन् तूझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले’ अशी ओळ लिहीली आहे. 

बाबाहसोबांचा जन्म 14 एप्रिलचा. हा काळ वसंत ऋतूचा. हा संदर्भ कसा काय कळत नाही पण बहुतेक लेखकांच्या  लिहीण्यात येत नाही. पण सुरेश भटांनी मात्र याचा अतिशय चपखल उपयोग या कवितेत करून घेतला आहे. वसंत ऋतूत बाबासाहेबांचा जन्म आहे. सोबतच या काळात सर्वत्र झाडांच्या मोहराचा घमघमाट पसरलेला असतो. दलितांच्या मोहरलेल्या मनांची सुंदर प्रतिमा इथे येते. शिवाय दुसराही एक अर्थ आहे. बाबासाहेब नावाचा वसंत आयुष्यात प्रवेशल्याने ही सर्व झाडं मोहरली आहेत. 

प्रखर बुद्धीवादी असा एक धम्म बाबासाहेबांना अपेक्षीत होता. भारतीय दर्शन परंपरेत एकूण 9 प्रमुख दर्शनं मानली गेली आहेत. सहा दर्शनं ही आस्तिक  (न्याय, योग, वैशेषिक, पुर्व मिमांसा, उत्तर मिमांसा, सांख्य) तर उर्वरीत 3 दर्शनं ही नास्तिक (जैन, बौद्ध, चार्वाक) मानली गेली आहेत. वेद मानतो तो आस्तिक आणि वेद नाकारतो तो नास्तिक असा हा दर्शन परंपरेतील अर्थ आहे. (देव मानतो तो आस्तिक आणि न मानणारा नास्तिक अशा चुक पद्धतीनं हे शब्द आपण वापरतो). बाबासाहेबांना नास्तिक दर्शनांची परंपरा पुढे न्यायची आहे. म्हणून ते बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. बुद्धीचा वापर करून हाती येणारे ज्ञान हे प्रखर सुर्यासारखे तेजस्वी आहे. नविन पिढीवर आपली बुद्धी वापरण्याचा संस्कार होवो. केवळ वाडवडिलांनी सांगितलं म्हणून त्यांनी ऐकू नये. यासाठी ‘तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा?’ ही ओळ येते. ‘मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना’ ही ओळ पुढच्या प्रखर बुद्धिवादी पिढीसाठी आहे. 

भारतात एक मोठी बुद्धीवादी परंपरा राहिलेली आहे. या सगळ्याचे प्रतिक म्हणून धम्मचक्र हा शब्द येतो. तो केवळ बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठीच येतो असे नाही. भारतीय परंपरेतील सर्वात मोठा शेवटचा दार्शनिक म्हणून गौतम बुद्ध येतो. तर्काची ही परंपरा अजूनही पुढे चालू राहिली पाहिजे. परंपरेने चालत आले आहे म्हणून पुढे चालू ठेवायचे हे आपल्या वैचारिक विश्वात अपेक्षीत नाही. जो काही विचार ज्याने कुणी मांडला त्याची दखल घेत पुढे पुढे जाणे ही आपली परंपरा राहिली आहे. 

बाबासाहेब या परंपरेचे निष्ठावान पाईक होते. सुरेश भटांनी हे ओळखून केवळ दलितांसाठीच नव्हे तर बुद्धीचा वापर करू पाहणार्‍या सर्वच दबल्या गेलेल्या पिचल्या गेलेल्यांसाठी ही रचना केली आहे. आपण दुर्दैवाने त्याला केवळ निळ्या रंगात रंगवून टाकतो आणि आपला काहीच संबंध नाही अशा आविर्भावात राहतो. 

श्री.दि. इनामदार यांनी अतिशय प्रसादिक शैलीत बाबासाहेबांवर लिहीताना असे शब्द वापरले होते

ग्रंथ थकले गे माय, संत थकले ग माय
नाही थकला भीमाचा काटे तुडविता पाय

दीन दलितांच्या उद्धाराचा हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. हा मार्ग कठिण आहे. मोठं अंतर कापायचे आहे. यासाठी थकून चालणार नाही. हे अंतर कापण्यासाठी धम्मचक्राची गती वाढविली पाहिजे.
14 एप्रिल बाबासाहेबांची तर 15 एप्रिल सुरेश भटांची जयंती. या महाकवीने बाबासाहेबांसारख्या महामानवाला वाहिलेली ही श्रद्धांजली. बाबासाहेबां सोबतच आपण रसिक सुरेश भटांनाही श्रद्धांजली अर्पण करू.

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Saturday, April 18, 2020

मौलाना मिर्झा तबलिगवर टिका करून देशप्रेम सिद्ध करा!


उरूस, 18 एप्रिल 2020

तबलिग आणि शाहिनबाग यावर टीका केली की आमचे औरंगाबादचे मित्र मौलाना मिर्झा अब्दूल कय्युम नदवी हिंदूंच्या विविध बातम्यांची कात्रणं क्लिप फेसबुक पोस्ट टाकून याचा तूम्ही निषेध करणार का असा प्रश्‍न विचारत होते. त्यांनी पाठवलेल्या बातम्यांत बहुतांश फेक न्युज असल्याने त्याची दखल घेण्याची मला कधी आवश्यकता वाटली नाही.

पण काल दोन मोठ्या हिंदूंशी निगडीत घटनांची सत्यता पटली. त्यावर बहुतांश हिंदू पत्रकारांनीही टीका केली. पहिली घटना होती माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाच्या लग्नाची. ज्याला किमान 200 ते 250 लोक जमा झाले होते. दुसरी घटना कर्नाटकातीलच आहे. कलबुर्गी येथील सिद्धलिंगेश्वर स्वामी रथयात्रेत मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. या दोन्ही घटनांचा निषेध मी स्वत: केला. माझ्या फेसबुक पोस्टवर तात्काळ निषेध करण्यासाठी बहुतांश हिंदू मित्र तातडीने पुढे आले. 

कुणीही या देशविघातक कृत्याला पाठीशी घालू पहात नव्हता. कुणीही याची वकिली केली नाही. माझ्या मित्र यादीतील आणि त्यांच्याही यादीतील कुणीही या दोन घटनांचे समर्थन करण्यासाठी पुढे आला नाही. सर्वांनीच एकजात निषेध केला.

मौलाना मिर्झा यांनी आवाहन केले होते की तूम्ही हिंदूंच्या अशा घटनांचा निषेध करून दाखवा. तो आम्ही करून दाखवला. आता मौलाना अब्दूल कय्युम नदवी यांना आवाहन आहे की त्यांनी तबलिगचा जाहिररित्या निषेध करून दाखवावा. त्यांना मी रात्रीच मेसेज पाठवला. त्यांनी अजूनही त्याची दखल घेतली नाही. 12 तास त्यांच्या उत्तराची मी वाट पाहून ही फेसबुक पोस्ट टाकत आहे.

काही पुरोगामी मुसलमान मित्रांनी तबलिगचा निषेध केला आहे. आपल्या कृतीतून आपण कधीच असल्या कट्टरपंथीयांच्या पाठीशी नाहीत हा स्पष्ट संदेश दिला आहे. पण ही संख्या अतिशय अल्प आहे. बहुसंख्य मुसलमान हा शांत बसून या तबलिगी कट्टरवादाला पाठीशी घालत आहे.

याचा सगळ्यात मोठा तोटा मुसलमानांनाच होणार आहे. तबलिगी प्रवृत्तीमुळे मुसलमान जगाच्या मागे पडत जातील. विज्ञान तंत्रज्ञान विरोधी ठरतील. त्यांच्या विकासाचा मार्ग खुंटून जाईल. आज तबलिगींनी पसरवलेल्या कोरोना महामारीचा धोका तर मुस्लीम वस्त्यांनाच जास्त आहे. कुठलाच तबलिगी काही मंदिरात जावून लपून बसणार नाही. तो लपतो आहे तो मस्जीदमध्येच अथवा मुस्लीम वस्तीमध्येच. तेंव्हा हा धोका ओळखून सारासार विचार करणार्‍या मुसलमान बंधू भगिनींनी पुढे यावे. या सगळ्या लपलेल्या तबलिगींना समोर आणावे. त्यांची वैद्यकिय तपासणी करून घ्यावी. स्वत:ला असलेला धोका दूर करावा. तसेच देशाला असलेला धोकाही दूर करावा.

आम्ही कायम तबलिगी जमात असाच शब्द वापरत आलो आहोत. तबलिगींमुळे सर्व मुसलमान बदनाम होत आहेत. आणि ही चूक त्यांचीच आहे. तेंव्हा आता या धोक्यापासून देशाला वाचविण्यासाठी विवेकी मुसलमानांनी पुढे येण्याची गरज आहे.

मौलाना मिर्झा अब्दूल कय्युम नदवी तबलिगचा जाहिर निषेध करून तूमचे देशप्रेम सिद्ध करा.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Thursday, April 16, 2020

तेलतुंबडे शरणागती । पुरोगामी गुंग मती॥


उरूस, 16 एप्रिल 2020

संविधान बचाव म्हणून आंदोलन करत असताना पुरोगामी स्वत: मात्र कायद्यातील पळवाटा शोधून मार्ग काढत राहिले आहेत. याचे अतिशय ताजे उदाहरण म्हणजे आनंद तेलतुंबडे यांची राष्ट्रीय शोध यंत्रणेसमोर शरणागती. (शरणागती असाच शब्द आहे. अटक नाही.)

शहरी नक्षलवाद हा विषय 2005 पासून अधिकृतरित्या पोलिस खात्यात ऐरणीवर आला. म्हणजे प्रत्यक्षात ही ‘फाईल’ तयार झाली आणि शोध सुरू झाला. त्यावेळी कुठले लोक सत्ताधारी होते दिल्लीत आणि महाराष्ट्रात हे समजून घ्या. म्हणजे या विषयात सध्या निखील वागळे सारखे पत्रकार जो आरडा ओरडा करत आहेत तो किती निष्फळ आणि चुक आहे हे सहजच लक्षात येईल. मुळात हा शब्दच पहिल्यांदा कुणी वापरला? तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘अर्बन नक्षलवाद’ हा शब्द संसदेत वापरला. त्यानंतर गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनीही हा शब्द वापरला. आणि तेंव्हापासून हा शब्द सर्वत्र वापरण्यात आलेला आढळतो आहे.

आंबेडकर जयंतीच्या दिवशीच बाबासाहेबांच्या नात जावायाला अटक असला तर्कही वागळे आणि तेलतुंबडे यांचे समर्थक हितचिंतक वापरत आहेत.

मुळात तेलतुुंबडे यांच्यावर प्रत्यक्ष खटला उभा राहिला नोव्हेंबर 2018 मध्ये. तेंव्हापासून सर्वोच्च न्यायालयात दोन वेळा, उच्च न्यायालयात दोन वेळा आणि जिल्हा न्यायालयात एक वेळा अशी पाच वेळा तेलतुंबडेंना स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली. जी एरव्ही कुठल्याही सामान्य माणसाला मिळणे अवघड असते. दीन दलित दुबळ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे तेलतुंबडे ही दीर्घ न्यायालयीन लढाई कुणाच्या पैशावर लढले हे पण एकदा त्यांच्या पाठिराख्यांनी दीन दलित दुबळ्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे.

6 एप्रिल 2020  रोजी सर्वोच्च न्यायालयाने शेवटची एक आठवड्याची मुदतवाढ तेलतुंबडे यांना दिली. या नंतर शोध यंत्रणेसमोर शरणागती पत्करण्यास सांगितले. आता सर्वच मार्ग खुंटले असल्या कारणाने तेलतुुंबडे आणि त्यांच्या सोबतचे दुसरे संशयीत आरोपी गौतम नवलखा यांना शरणागती पत्करावी लागली.

यांना नेमकी 14 एप्रिललाच अटक करण्यात आली असा कांगावा वागळे प्रभृती करत आहेत. मुळात दीड वर्षांपासून तेलतुंबडे शोध यंत्रणेशी कायदेशीर लपंडाव खेळत आहेत. त्यांना दिलेली मुदत 13 एप्रिलला संपली. त्यांना जर 14 एप्रिल या बाबासाहेबांच्या जयंतीचे इतके पावित्र्य होते तर त्यांनी ही शरणागती आधीच पत्करायची. त्यांना कुणी रोकले होते?

जनतेला एक पत्र लिहून त्यांनी आवाहनही केले आहे. शिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सी.पी.आय.) यांनी 11 एप्रिलला पत्रक काढून यांना अटक करू नये अशी मागणी केली आहे.

आता या पूर्वी ज्या कुणा तथाकथित हिंदूत्ववादी नेत्यावर न्यायालयाने अशी कारवाई केली तेंव्हा कायदेशीर प्रक्रियेत कुणी बाधा आणली होती का? अगदी शंकराचार्य यांना भर दिवाळीत हिंदूंच्या मोठ्या सणाच्या वेळी अटक करण्यात आली तेंव्हा कुणी आक्षेप घेतला होता का? राम जन्मभूमी प्रकरणात 28 वर्षे इतकी दीर्घ न्यायालयीन लढाई चालली. अगदी ताजे उदाहरण साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांचे आहे. त्यांची कायदेशीर लढाई ते लढले. 8 वर्षांनी त्यांना जामिन मिळाला. यासाठी कुणी अशी पत्रकबाजी करून आकांडव तांडव केले होते का?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावेच लागले होते. ज्या पद्धतीनं नजिकच्या काळात पी. चिदंबरम, कन्हैया कुमार आणि आता तेलतुंबडे आदींनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत तपास यंत्रणेसमोर अडचणी उभ्या केल्या तशा इतर कुणीही केल्या नाहीत. म्हणजे एकीकडे संविधान बचाव असे आंदोलन करायचे आणि दुसरीकडे आपल्यावर कायद्याला सामोरे जायची वेळ आली की होईल तेवढ्य पळवाटा शोधून अडथळे निर्माण करायचे. ही नेमकी कुठली प्रवृत्ती आहेत?

बर जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोर येतो तेंव्हा हे पुरोगामी तो मोकळ्या मनाने स्विकारतात का? राम जन्मभुमी  प्रकरणात यांचे पितळ उघडे पडले आहे. न्याय मिळाला नाही म्हणून ओवेसी यांनी ओरड केली आणि त्यांच्या सुरात सर्व पुरोगाम्यांनी सूर मिसळला.

तेलतुंबडे बाबासाहेबांचे जावाई आहेत हा शोध आत्ताच नेमका कसा काय लागतो? मग ते फरार असलेल्या जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडे याचे भाउ आहेत हे का नाही सांगितले जात?

गोरगरिबांचा कळवळा असणारे कामगारांच्या हितासाठी काम करणारे तेलतुंबडे परराष्ट्रीय कंपन्यांत उच्च पदस्थ अधिकारी कसे काय असतात? मग हेच पुरोगामी भांडवलदार म्हणून टीका कशी काय करतात? तेलतुुंबडे स्वत:ला कम्युनिस्ट मानतात की नाही? का विचार वेगळा आणि व्यवहार वेगळा असंच त्यांना सुचवायचं आहे?
 यवतमाळ जिल्ह्यांत वणीमध्ये शाळेत जात असतांना अंगात घालायला कपडे नसणारे तेलतुंबडे सिनेमाचे पोस्टर रंगवून पैसे गोळा करतात आणि खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून शाळेत जाणार्‍या दलित मुलांसाठी निळ्या टोप्या तयार करून आणतात व बंड करतात. कारण काय तर तथाकथित संघावाल्यांनी इतर कांही मुलांना काळ्या टोप्या घालायला लावल्या असतात. आता साधा प्रश्‍न आहे की शाळेचा गणवेश खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असेल तर तेलतुुंबडे पांढरी टोपी का नाकारतात? संघाच्या लोकांनी काही मुलांना काळी टोपी घालायला लावली म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी पांढर्‍या टोप्यांची संख्या वाढविण्याऐवजी तेलतुंबडे निळ्या टोपीचा वेगळा मार्ग का स्विकारतात? गणवेशचा भाग असलेली पांढरी टोपी का नको? (सुषमा अंधारे यांनी याबबत एक तयार व्हिडीओ करून यु ट्यूबवर टाकला आहे. इच्छुकांनी तो पहावा.)

आता परत विषय आजच्या शरणागतीपाशी येवून थांबतो. अहिंसेच्या मार्गाने आपले आदांलन चालविणार्‍या मेधा पाटकर या तेलतुंबडे यांच्यावरील कारवाई विरोधात आवाज उठवतात. त्यांनी हे जाणून घेतले का की तेलतुंबडे गांधींची टोपीच काय पण अहिंसा हे तत्त्व मानत नाहीत?

बाबासाहेबांच्या विचारापेक्षा माओच्या विचारांची आज जास्त गरज आहे हे तेलतुंबडे यांचे प्रतिपादन त्यांची भलावण करणार्‍या आंबेडकरवाद्यांना मंजूर आहे का? महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलना नंतर सवर्णांनी दलितांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दलितांनाही हिंसेचाच मार्ग हाताळायचा होता हे तेलतुंबडे सांगतात. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना हा मार्ग हाताळण्यापासून रोकले ही चुकच झाली अशी मांडणी ते करतात. हे आजच्या तेलतुंबडेंसाठी आरडा ओरड करणार्‍या पुरोगाम्यांना मान्य आहे का?

आंबेडकरवादी, गांधीवादी, समाजवादी पुरोगामी या सर्वांनी हे स्पष्ट ध्यानात घ्यावे की तेलतुुंबडे कितीही आव आणत असले तरी ते या मार्गाने जाणारे नाहीत. त्यांचे सर्व लिखाण आणि आता तपास यंत्रणेनेने गोळा केलेले पुरावे पाहता त्यांचे नक्षलवादाला असलेले समर्थन स्पष्ट दिसून येते.

तेलतुंंबडे यांनी कायदेशीर प्रक्रियेत दीडवर्ष तपास यंत्रणेला झुलवले. पण बाबासाहेबांच्या जयंतीलाच नेमकं शरणागती पत्करण्याची वेळ तेलतुंबडे यांच्यावर आली. जे लेाकशाहीला मानत नाहीत, अहिंसेला मानत नाहीत अशा नक्षलवादी आंदोलनाचे पाठिराखे कायद्याच्या बळकट पकडीत सापडतात हेच आपल्या संविधानाचे मोठे यश आहे.

तेलतुुंबडे यांचे जे पाठिराखे संविधान लोकशाही मानतात त्यांनी हे ध्यानात घ्यावे प्रक्रियेचा भाग म्हणून तेलतुंबडेंना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून कायदेशीर लढाई लढण्यास कुणीही रोकलेले नाही. आजही त्यांना त्यासाठी पूर्ण मोकळीक आहे. तसेही त्यांनी दोनदा सर्वोच्च न्यायालयात केवळ अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी धडपड करून आपले कायदेशीर हात किती ‘वर’ पर्यंत पोचले आहेत हे सिद्ध केलंच आहे. चिदंबर, कन्हैय्या कुमार प्रकरणीही पुरोगाम्यांनी कायदेशीर लढाईतील आपली कालव्यय करण्याची ताकद दाखवून दिली आहेच.

तेलतुुंबडेंसोबत गौतम नवलखाही दिल्लीत शरण झाले आहेत. आधीच तुरूंगात असलेल्या त्यांच्या इतर सहकार्‍यां सोबत आता यांनाही गजाआड रहावे लागणार आहे.

बाबासाहेबांच्या संविधानापुढे आपली सगळी शस्त्रं बनावट ठरल्याने पुरोगाम्यांची मती गुंग झाली आहे. नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याची तपास यंत्रणेचे एक पाउल पुढे पडले आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575