Saturday, June 8, 2019

आधुनिक बियाणे-तंत्रज्ञानापासून शेतकरी का वंचित ?


विवेक, उरूस, जून 2019


घटना हरियाणातील आहे. आपल्या शेतात वांग्याचे आधुनिक बियाणे (जी.एम. वांगे) पेरणारा शेतकरी जीवन सैनी याला भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. हरियाणाच्या कृषी विभागाने त्याच्या शेतातील आधुनिक वांग्यांची रोपे चक्क उपटून टाकली. याचं कारण म्हणजे ही आधुनिक बियाणे विषारी आहेत. ही खाल्ल्याने शरिरावर वाईट परिणाम होतो. आधुनिक जी.एम. बियाणे नव्हे तर विषच आपल्या शरिरात जात आहे असा प्रचार सर्रास केला जात आहे. 

सरकारने तर यावर अजबच उपाय योजला. या बियाण्यांची कुठलीही तपासणी न करता यांच्यावर बंदी घालण्यात आली. याचा परिणाम म्हणजे जीवन सैनी यांना आपल्या शेतीतील पिकाचे नासडी उघड्या डोळ्यांनी पहावी लागली. 

शेतकरी संकटात आहे हे आता परत समजावून सांगायची पटवून द्यायची काही गरज शिल्लक राहिलेली नाही. जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या स्पर्धेत शेतकर्‍याला पुढे रहायचे असेल तर त्याला आधुनिक बी-बियाणे, खते, अवजारे यांची साथ आवश्यक आहे. जूनी शस्त्र घेवून आधुनिक पद्धतीची लढाई लढता येत नाही. घोड्यावर बसून हातात तलवार ढाल घेवून आता युद्ध करायला कुणी निघाला तर त्याला सगळे हसतील. दूर डोंगरातील किल्ल्यावर  जावून मुख्य दरवाजा बंद करून आत भाला घेवून तूम्ही बसाल तर तूमच्याकडे कुणी लक्षही देणार नाही. कारण आता संदर्भ बदलले आहेत. 

याच पद्धतीनं आताच्या शेतकर्‍याला जगातील शेतकर्‍यांशी स्पर्धा करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. पण हेच नेमकं लक्षात घेतलं जात नाही. बी.टी. कापसाचे आधुनिक बियाणे असो की आता जी.एम. वांगे असो विरोधक नेहमीच पारंपरिक पद्धतीनं युक्तिवाद करताना दिसतात. त्यांना आधुनिक काळाचे संदर्भ पण नकोसे वाटतात. 

या सगळ्याबाबत शेतकरी संघटनांनी एक शास्त्रशुद्ध अशी भूमिका सरकारपुढे सातत्याने ठेवली आहे. पण सरकार तिचा विचार करायला तयार नाही. कुठलेही नविन वाण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले असेल तर त्याची संपूर्ण शास्त्रीय तपासणी केली जावी. शास्त्रज्ञांनी सामान्य लोकांसाठी ते उपयुक्त आहे असे सांगितले तर अशा वाणांना परवानगी दिली गेली पाहिजे. जागतिक पातळीवर एखादे बियाणे वापरले जात आहे, त्याची निर्मिती आधुनिक तंत्रज्ञानातून झालेली आहे तर त्याचा वापर करण्याची परवानगी आपल्या देशातील शेतकर्‍यांनाही मिळाली पाहिजे. 

एक अतिशय ढोबळ आणि शास्त्रीय दृष्ट्या बाळबोध वाटेल असा आरोप केला जातो की ही बियाणी मानवी शरिराला घातक आहे. आत्तापर्यंत शास्त्रीय पातळीवर असा एकही पुरावा वांगे, कापुस, सोयाबीन, मोहरी, मका यांच्या बाबत पुढे आलेला नाही. बी.टी. कापसाची सरकी गेली 15 वर्षे खाद्यतेलाच्या निर्मितीसाठी वापरली जात आहे. मग हे बियाणे पहिल्यांदा आले तेंव्हा त्याला विरोध का केला गेला होता? 

आज जी परिस्थिती हरियाणा मध्ये उद्भवली आहे तीच गुजरातमध्ये तेंव्हा निर्माण झाली होती. शेतकर्‍यांच्या शेतातील पर्‍हाट्या उपटून टाकल्या गेल्या होत्या. शेतकर्‍यांवर गुन्हे नोंदवले गेले होते. आज जे पंतप्रधान आहेत ते नरेंद्र मोदी नंतर गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी ह्या आधुनिक बियाणे वापरणार्‍या शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याचा निर्णय घेतला. बघता बघता कापूस आयात करणारा भारत जगातील प्रथम क्रमांकाचा कापूस निर्यातदार देश बनला. सगळा भारत बी.टी. कापूस वापरायला लागला. मग हे तेंव्हाचे विरोधक कुठे गेले? ते जो आरोप करत होते तो कुठे सिद्ध झाला? मोदींनी तेंव्हा या शेतकर्‍यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला नसता तर गुजरात राज्य शेती उद्योगाची विक्रमी वाढ करू शकले असते का? 

भारतात 1991 च्या जागतिकीकरणा नंतर टप्प्या टप्प्याने पर्यावरणवादी, स्वदेशीवाले आणि झिरो बजेट शेतीवाले यांनी शेतीच्या विकासाला नख लावण्याचा कार्यक्रम राबवला आहे. हा जणू काही जागतिक कटच आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. पर्यावरणवादी गुजरातच्या नर्मदा आंदोलनातूनच आपला शेतीविरोधी चेहरा घेवून समोर आले होते. त्यांना तेंव्हाही ठामपणे विरोध करत मोदी शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहिले होते. सरदार सरोवराचा प्रकल्प मार्गी लागला म्हणून गुजरातच्या पश्चिमेकडील कोरड्या दुष्काळी पट्ट्यात पाणी पोचू शकले व शेतकर्‍यांना आपली पीक पद्धती बदलता आली. नफा कमावता आला. 

याच अनुभवातून मोदींनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात 2022 मध्ये शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आखली होती. या योजनेतला एक मोठा अडथळा म्हणजे शेतीविरोधी व्यापार विषयक नियम, शेतीविरोधी कायदे आणि  झिरो बजेट शेतीसारखी कल्पना पुढे रेटणारी अर्थशास्त्र न कळणारी सुमार बुद्धीची माणसे.

दुष्काळाच्या काळातही शेतर्‍यांनी शेती उत्पादन विक्रमी करून दाखवले आहे. हे साध्य झाले ते केवळ त्याला जे काही थोडेफार तंत्रज्ञान उपलब्ध झाले त्याच्या जीवावर. 

आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काही आंतरराष्ट्रीय कट आहे असे सागितले जाते. पण असा आरोप करणार्‍यांना हे माहीत नाही की जी.एम. मोहरीचे बियाणे तर प्रत्यक्ष सरकारी प्रयोगशाळेतच तयार झाले आहे. त्यात कुठल्याच जागतिक कंपनीचा सहभाग नाही. तरी त्याला अजून परवानगी मिळालेली नाही. हे पर्यावरणवादी, स्वदेशीवाले, झिरोबजेट शेती वाले हे सगळे झारीतील शुक्राचार्य बनून विकासाचा मार्ग अडवून बसले आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे सरकार 2019 मध्ये पहिले पाच वर्षे पूर्ण करून निर्णायक स्पष्ट बहुमताने परत भारतीय जनतेने निवडून दिले आहे. आता या सरकारची जबाबदारी आहे की आपल्या आधीच्या कार्यकाळात शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्याचे. 

शेतीचे उत्पादन वाढते पण उत्पन्न मात्र वाढत नाही. हे वाढवायचे असेल तर शेतीला आधुनिक तंत्रज्ञान द्यावेच लागेल. शेती उत्पादनांवर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांना चालना द्यावी लागेल. शेतीचे व्यापार विषयक धोरण आपल्या बाजूने शेतकर्‍यांना फायदेशीर राहील असेच ठरवावे लागेल. भारतीय वस्त्रोज्ञोगाला सुत स्वस्त मिळावे म्हणून कापसाला निर्यात बंदी घालायची असले शरद पवारांच्या काळातील तुघलकी निर्णय आता घेवून चालणार नाही.

सहकारी साखर कारखाने चालू ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा गळा घोटण्याच्या योजना आता चालायच्या नाहीत. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करून शेतकर्‍यांच्या उसाला जास्त भाव मिळण्याचा रस्ता मोकळा करावा लागेल.  डाळींचे भाव चढताच डाळींचे साठे जप्त करण्याचे धोरण बदलून आता आधुनिक पद्धतीनं ही बाजारपेठ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फुलू दिली गेली पाहिजे. 

आज खाद्य पदार्थांची बाजारेपठ जगभरात फुलत फळत आहे. शेतीतला कच्चा माल जशाला तसा बाजारात येणे आता मागास कल्पना ठरत आहे. त्यावर किमान प्रक्रिया करून, गुणवाढ करून (व्हॅल्यु ऍडिशन), चकचकीत स्वरूपात आकर्षक वेष्टनात हा माल बाजारात आला पाहिजे. यासाठी शेतकरी पूर्णपणे तयार आहे. त्याला सहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी माणसे उत्सुक आहेत. खाद्य पदार्थांच्या चवीसाठी, रंगांसाठी, त्याच्या स्वादासाठी विविध प्रयोग करून पाहिले जात आहेत. 

अशा काळात आधुनिक जी.एम. वांगे पेरले म्हणून जर कुणाची रोपे सरकार उपटणार असेल तर याचे परिणाम भयानक होतील. एक तर संतापून शेतकरी रस्त्यावर उतरतील किंवा आत्महत्यांचे प्रमाण वाढेल किंवा शेतीतून प्रचंड लोकसंख्या बाहेर पडून इतर क्षेत्रांत घुसून समस्या तयार करतील. हे सगळे टाळायचे असेल तर शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणे इष्ट नाही. 

कुठल्याही बियाण्याचे परिणाम काय आणि कसे होतील हे तपासणारी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञांची यंत्रणा काम करत असतेच. तिने जर एखादे बियाणे बॅन केले तर त्या बाबत शेतकरी कधीच आग्रह धरणार नाहीत. पण केवळ काही लोकांना शंका आली, त्यांच्या मनात संशय तयार झाला म्हणून ज्याला की कुठलाच शास्त्रीय आधार नाही तर त्या  पोटी शेतकर्‍यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा गळा घोटला जाणे निषेधार्ह आहे.  

   श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Tuesday, June 4, 2019

सार्वकालिक सत्याचा पुनश्च शोध : 'माझी गीता'


अक्षर मैफिल, जून २०१९ 

देवदत्त पटनायक हे नाव आता भारतीय आणि मराठी वाचकांना चांगलेच परिचित झाले आहे. पुराणविषक, आर्ष महाकाव्य विषयक त्यांच्या ग्रंथांना चांगला वाचक वर्ग लाभला. त्यांच्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत. 

त्यातही महाभारतावर त्यांनी लिहीलेल्या ‘जय’ पुस्तकाचा ऍड. अभय सदावर्ते यांनी केलेला अनुवाद विशेष उल्लेखनिय आहे. उल्लेखनिय यासाठी की सदावर्ते यांनी पटनायक यांचे भाषावैभव मराठीत संपूर्ण न्याय देत आणले. आताही गीतेवरचे देवदत्त पटनायक यांचे ‘माझी गीता’ हे पुस्तकही सदावर्ते यांनीच अनुवादले आहे. 

पटनायक यांनी त्यांच्या गीतेवरच्या पुस्तकाला ‘माझी गीता’ असं नाव दिले नसते तरी त्याला त्यांची गीता असंच समजले गेले असते. कारण आत्तापर्यंत ज्या ज्या वेळी गीतेवर भाष्य लिहील्या गेले तेंव्हा तेंव्हा त्या प्रतिभावंताचा एक दृष्टीकोन त्याला प्राप्त झालाच. त्यामुळे अगदी शंकराचार्यांपासून ते मराठीतील ज्ञानेश्वरांपर्यंत अगदी लोकमान्य टिळकांपासून ते विनोबा भाव्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी गीतेवर लिहीले त्याला त्या त्या व्यक्तिमत्वाचा रंग प्राप्त झाला आहे. 

पटनायक यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आधुनिक काळात लिहीत असताना नविन वाचकांना, नविन पिढीला आपल्या लोभस साध्या पण आकर्षीत करून घेणार्‍या ओघवत्या शैलीत बांधून ठेवले आहे. केवळ नविन पिढीच नव्हे तर आत्तापर्यंत जो वाचकवर्ग या विषयांकडे वळत नव्हता असा एक आधुनिक वर्गही पटनायक यांनी खेचून घेतला आहे. मराठीपुरतं म्हणायचे झाले तर वारकरी संप्रदाय किंवा इतर धार्मिक संप्रदायांच्या संतांनी अभ्यासकांनी भरपूर ग्रंथ निर्मिती करून ठेवली आहे. पण त्याचा वाचकवर्ग त्यांच्या प्रभावातील शिष्यांच्या बाहेर दिसत नाही. 

स्वातंत्र्यानंतर एक आधुनिक असा वाचकवर्ग संपूर्ण भारतभर तयार झाला. त्याच्या परिभाषेत त्याला समजेल अशा पद्धतीने हे विषय मांडण्याची गरज होती. पटनाक यांनी ही गरज काही प्रमाणात दूर केली. 
पहिल्याच प्रकरणात गीतेविषयी आपली वेगळी भूमिका पटनायक यांनी कमी शब्दांत पण नेमकेपणाने मांडली आहे. गीतेतील श्लोकांचा आधार घेत मानवी शरिराला नऊ छिद्र आहेत. प्रकृती आणि पुरूष असे दोन मिळून ही संख्या 18 होते. गीतेचे अध्याय अठराच आहेत. महाभारतातील पर्वही अठराच आहेत. या अनुषंगाने मांडणी करत गीताही तपस्व्यांपेक्षाही गृहस्थांसाठीच कशी आहे अशी एक ठसठशीत गृहस्थधर्म अधोरेखीत करणारी मांडणी पटनायक हे करतात. 

दुसर्‍या प्रकरणात लेखकाने गीतेआधीच्या व्याधगीतेचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख फारच कमी ठिकाणी केल्या गेला आहे. पांडवांच्या विजनवासातील ही कथा आहे. एका तपस्व्याला एका पारध्याने केलला उपदेश म्हणजेच ही व्याधगीता होय. गीतेशी या व्याधगीतेचा धागा जोडताना पटनायक यांनी दोन्हीची पार्श्वभूमी कशी हिंस्र होती हे तर नोंदवले आहेच. पण आपल्या मूळ गृहस्थाधर्मी विचाराकडे आणताना, ‘या दोन्ही गातोपदशांमध्ये भौतिक जगाकडे पाठ फिरवून रानावनातील एकांतात संन्यस्त आयुष्य कंठण्यापेक्षा समाजात राहून गृहस्थाधर्माचे आचरण करणे हेच श्रेष्ठ आहे, असे सांगितलेले आढळते.’ (पृ. 16,17). 

याच प्रकरणात एका रेखाचित्राद्वारे वेदकाळापासून ते आगमांच्या मंदिर कालखंडापर्यंतची एक मांडणी नेमक्यापद्धतीने आली आहे. गीतेच्या निमित्ताने पटनायक आपल्या संस्कृतिचा एक आख्खा पटच उलगडून दाखवू पहात आहेत. हे मला फार महत्त्वाचे वाटते. शिवाय इतिहासाकडे पाहण्याचा पाश्चात्यांचा आणि आपला दृष्टीकोन अशी एक तूलना करतही त्यांनी या विषयाला समकालीन वास्तवापर्यंत आणून ठेवले आहे. 
जे रेखाचित्र या प्रकरणात आले आहे ते असे आहे. कालक्रमाने हे टप्पे लेखक नोंदवत जातो. 

ऋग्वेद (ऋचा/स्तोत्रे)- सामवेद (नादमधुर सुरावटी)- यजुर्वेद (कर्मकांड)-उपनिषदे (तर्कविलास)-गीता (गाणे)- पुराणे (कथा)-आगम (मंदिर). केवळ एक कालपट्टीवर या गोष्टी ठेवत बर्‍याच वैशिष्ट्यांचा उलगडा लेखकाने केला आहे.

गीतेवर भाष्य करणारे अभ्यासक यांच्यावर लिहीताना पाच टप्प्यांचा उल्लेख केल्या गेला आहे. इस्लामचे भारतातील आगमन आणि पहिली मशिद पैगंबरांच्याच हयातीत स्थापन झाली तो काळ आणि लगेच त्याच केरळात आदी शंकराचार्यांनी गीतेवर केलेले भाष्य हा संदर्भ जोडून एक वेगळाच पैलू पटनायक समोर आणतात. एकेश्वर वादी धर्म भारतात यायल्या लागल्यानंतर गीतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि त्याचा वेगळा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न आठव्या शतकात आदिशंकराचार्य सारख्यांनी केला. त्यांच्या नंतर अकराव्या शतकातील तमिळनाडूतील रामानुजाचार्य, तेराव्या शतकातील कर्नाटकातील मध्वाचार्य यांनी गीतेवरील भाष्ये लिहीली. या तिघांनाही परमेश्वराचे स्वरूप आणि त्याचे माणूसकिचे असणारे नाते समजून घेण्याची गरज होती.

दुसरा टप्पा लेखक जो नोंदवतो तो प्रादेशीक भाषांतील गीतेवरील रचनांचा आहे. ज्यात सगळ्यात जूनी रचना मराठीतील ज्ञानेश्वरांचीच आहे. निरमण पण्णीकर (तमिळ-14 वे शतक), पेदा तिरूमलाचार्य (तेलगू-15 वे शतक), बलरामदास (ओरिया-15 वे शतक), गोविंद मिश्रा (असामी-16 वे शतक), दासोपंत (मराठी-17 वे शतक) अशी यादीच दिली गेली आहे. ही सगळी निरूपणे कविंनी लिहीलेली असल्याने ती रसाळ व भक्तीगीतांसाठी पोषक व सोयीची आहेत. 

तिसरा टप्पा हा युरोपातील गीतेच्या भाषांतराचा व त्या अनुषंगाने मांडणी करणार्‍यांचा आहे. चौथा टप्पा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडातील आहे. योगी अरविंद, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी गीतेवर केलेली भाष्ये यात पटनायकांनी गृहीत धरली आहेत. 

पाचवा टप्पा हा जगाच्या पुनर्रचनेचा कालखंड आहे असे समकालीन आकलन लेखकाने मांडले आहे. गीतेची सध्या तीन हजार भाषांतरे जगातील 50 भाषांत उपलब्ध आहेत. 

या सगळ्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेताना प्रकरणाच्या शेवटी लेखक म्हणतो, ‘सार्वकालिक सत्याचा पुनश्च एकदा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘माझी गीता’ होय !

इथून पुढे पटनायक यांनी ‘तू’ आणि ‘मी’ हा संवाद मांडत अठरा प्रकरणे दिली आहेत. त्यांची रचना काहीशी विषानुरूप आहे. ती गीतेच्या अठरा अध्यायांप्रमाणे नाही. मागचे पुढचे श्लोक एकत्र करून एक विषय अर्थाप्रमाणे मांडत जाण्याची एक विलक्षण अशी वेगळी रचना इथे केलेली आढळते. त्याचा सामान्य वाचकाला आकलनासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. उदा. पहिल्याच प्रकरणाचे शिर्षक ‘तू आणि मी न्यायधीश होण्याची गरज नाही’ असे आहे. ख्रिश्‍चन किंवा इस्लाम प्रमाणे जजमेंट डे किंवा कयामत ही संकल्पना हिंदू धर्मात नाही. त्यामुळेच कृष्ण हा निवाडा करणार्‍याच्या न्यायाधिशाच्या भूमिकेत नाही. तो कुणाकडेही बळी म्हणून पहात नाही. आयुष्य म्हणजे या रंगभूमीवरचा प्रवेश आहे. इतरांच्या आनंदात आपण आनंद मानायचा आहे. अशी अवघड तत्त्वज्ञानाची सुलभ मांडणी पटनायक यांनी केली आहे. दुसर्‍या प्रकरणांत पुनर्जन्माचा विचार मांडला आहे. अशी अठरा प्रकरणे विषयानुरूप दिली आहेत. 

या सगळ्या मांडणीत महाभारत रामायण काळातील गोष्टी लेखकाने सुलभतेने पेरल्या आहेत. त्यामुळे अर्थ बोध होण्यासाठी सामान्य वाचकाला मदत होते. अकराव्या प्रकरणात हनुमंताची आणि भीमाच्या गर्वहरणाची गोष्ट येते आणि त्यासोबतच , ‘आपल्या आजूबाजूला असणार्‍या कुणाच्याही सुप्त सामर्थ्याला कमी लेखू नकोस असा कानमंत्रही भीमाला दिला.’ असे वाक्य येवून जाते (पृ. 197).

बाराव्या ‘तू आणि मी जूवळून घेवू शकतो’ या प्रकरणांत गीतेनंतर जवळपास एक हजार वर्षांनंतर भक्तिसंप्रदाय कसा विकसित होत गेला हे सांगताना भक्तिमार्गाला दोन वाटा फुटल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतो. या दोन वाटा पुरूषी आणि स्त्री वृत्तीचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या उपास्य देवतेपुढे शरणागती, ब्रह्मचर्य आणि संयम याचे मूर्तरूप म्हणजे हनुमंत. तर ममत्त्व, विषयासक्ती आणि अपेक्षा या स्त्री भावनेचे प्रतिनिधीत्व म्हणजे यशोदा व राधा. याच्यापुढे एक वेगळा मुद्दा येतो. भक्तीच्या तत्त्वज्ञानातील पुरूषी मार्ग हा हिंदू मठवासियांनी निवडला. तर भक्तीच्या स्त्रीभावनेला प्राधान्य देणारा मार्ग देवदासी, देवळातले नर्तक आणि नर्तिका यांनी अनुसरला. कलेच्या बाबतीत ही मांडणी कुणीतरी पहिल्यांदाच ठळकपणे केली आहे. 

भक्तिसंप्रदायात कृष्ण कसा महत्त्वाचा ठरतो हे सांगताना शिव तपस्वी भूकेपासून मुक्त होतो तर राम त्राता भूक भागवतो. पण कृष्ण  प्रेमिक आणि जिवलग बनून भूक भागवतो आणि अन्नही मागतो. शिव व राम एकतर्फी आहेत तर कृष्ण दुतर्फी आहे अशी एक विलक्षण मांडणी पटनायक करतात. 

अठराही प्रकरणांत फार वेगळ्या पद्धतीनं, विज्ञानाच्या मार्गानं काही आलेख रेखाचित्र मांडत, सारणीचा प्रयोग करत (टेबल) विषय प्रतिपादन करण्याची पटनायक यांची पद्धत मोहक आहे. 

समारोपात गीतेत सांगितलेले एक महान सत्य पटनायक आजच्या काळातील वाचकाला पटावे असे सोप्या आणि संयुक्तिक पद्धतीनं मांडतात. ही सगळी परिभाषा अगदी आजच्या काळाला लागू पडते. 

गीतेतील तीन मार्ग सांगताना पटनायक लिहीतात, ‘... कर्मयोगाचा अवलंब केल्याशिवाय आपल्याजवळ इतरांना देण्यासारखे किंवा आपण अन्य कुणाकडून काही घेण्यासारखे असणार नाही.  आयुष्यात भक्तियोग नसेल तर आपले एखाद्या यंत्रात रूपांत होईल. यंत्रांना जसे इतरांबद्दल काहीही वाटत नाही तशी आपलीही अवस्था होईल. ज्ञानयोगाची उपासना नसेल तर, आपले मूल्य शुन्यावर येईल, आपले आयुष्य अर्थहीन होईल, कुठलेही उद्दिष्ट डोळ्यांसमोर नसल्यामुळे ते भरकटेल.’

इतक्या मोजक्या ओळीत गीतेचे सार पटनायक समोर ठेवतात तेंव्हा वाचकाच्या मनात समाधानाची उत्तरे मिळाल्याची भावना निर्माण होते. हे फार मोठे श्रेय लेखकाचे आहे. रेखाचित्रांचा वापर तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असा वापर पूर्वी कधी झाल्याचे आढळत नाही. इतिहासाकडे पाहण्याचा पुरूषी दृष्टीकोन सांगण्यासाठी उलट सुलट त्रिकोण एकमेकां समोर ओळीने ठेवले आहेत. पण स्त्री दृष्टीकोन मांडताना एकमेकांच्या केंद्राशी जूळलेली वतुळे काढत अतिशय नेमका अर्थ समोर ठेवला आहे. 

हा अनुवाद करताना नेमके शब्द हूडकून त्यांचा वापर सदावर्तेंनी केला आहे. त्यामुळे या अनुवादाला एक मराठमोळा पेहराव प्राप्त झाला आहे. आता आत्मा हा शब्द वापरत असताना त्याऐवजी ‘मन’, ‘चैतन्य’, ‘प्राण’, ‘देही’, ‘ब्रह्मन’, ‘पुरूष’ असे शब्द कसे येतात हे सगळं भाषांतराच अगदी अचुक सदावर्ते घेतात हे विशेष. मुळ इंग्रजी शब्दांसाठी सदावर्तेंनी प्रयत्न पूर्वक निवडून हे शब्द घेतले आहेत. अशी अनेक उदाहरणे पुस्तकात विखुरली आहेत. एक फार महत्त्वाचे पुस्तक मराठीत आणले म्हणून अनुवादकाला विशेष धन्यवाद. गीतेवरची सगळ्यात पहिली प्रादेशीक भाषेतील टीका मराठीतच उपलब्ध आहे. या आपल्या महान परंपरेत अनुवादकानेही आपले योगदान दिले आहे.

पुस्तकाची बांधणी साधी आणि अक्षरांची रचना, वापरलेला टंक याबाबत जास्त सौंदर्यपूर्ण विचार व्हायला हवा होता. पण अर्थात हा प्रकाशकाशी संबंधीत विषय आहे. किंवा पुस्तकाची पेपर बॅक आवृत्ती व डिलक्स आवृत्ती असेही करता आले असते.  

(माझी गीता- देवदत्त पटनायक, पॉप्युलर प्रकाशन मुंबई, पृ. 322, किं. 375.)
                   
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Monday, June 3, 2019

गालिब चा प्रतिभावंत पूर्वज 'सिराज औरंगाबादी'



संबळ, अक्षरमैफल, जून 2019

सिराज औरंगाबादीचा उल्लेख संबळ सदरात एप्रिल महिन्यातील अंकात केला होता. योगायोगाने याच सिराज औरंगाबादीवर असलम मिर्झा यांचे एक पुस्तक नुकतंच प्रकाशीत झाले आहे. भारतभर उर्दूचा एक फार मोठा चाहतावर्ग असा आहे की ज्याला अरबी लिपी वाचता येत नाही. स्वाभाविकच हा वर्ग चांगल्या उर्दू साहित्यापासून वंचित राहतो. अलीकडच्या काळात लिप्यांतर करून (इंग्रजी शब्द ट्रान्सक्रिप्शन) उर्दू साहित्य देवनागरी लिपीत प्रसिद्ध केले जात आहे. याचा एक मोठा फायदा म्हणजे मोठ्या वाचकवर्गापर्यंत हे पोचू शकत आहेत. 

ऍड. असलम मिर्झा गेली 50 वर्षे सातत्याने मराठी-उर्दू असा पूल बांधण्याचा प्रामाणिक प्रयास करत आहेत. उर्दू मध्ये गालिबच्या शंभर वर्षे आधी ज्याने पहिल्यांदा गझल लिहीली तो वली औरंगाबादी हा शायर मराठवाड्याच्या मातीतलाच. त्याच्या नंतरचा महत्त्वाचा शायर म्हणजे सिराज औरंगाबादी. 

असलम मिर्झा यांच्या पुस्तकाचे नाव ‘सिराज औरंगाबादी- जीवन, व्यक्तित्व एवं संकलित गजले’ असं आहे. यात सिराजच्या चरित्राची माहिती आहे, त्याच्या कवितेची चिकित्सा आहे सोबतच त्याच्या निवडक अशा शंभरएक गझला दिल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण गजला देवनागरी लिपीत आहेत. सोबतच कठीण शब्दांचे अर्थ कवितेच्या खाली दिले आहेत. यामुळे या पुस्तकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

सिराजच्या चरित्रविषयक तपशीलाचा भाग पुस्तकात सुरवातीला आला आहे. साउदी अरेबियातील पवित्र मदिना शहरातील सिराजचे पूर्वज मुगल सम्राट जहांगीरच्या काळात भारतात आले. उत्तर प्रदेशमधील मुझफर नगर परिसरात सिराज यांच्या काजमी सय्यद वंशाचे बरेच लोक वस्ती करून होते. सिराज यांचे पूर्वजही याच ठिकाणी स्थिरावले.  मुगलांची दक्षिणेतील राजधानी म्हणून औरंगाबाद एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. औरंगजेबाच्या काळात सिराज यांचे वडिल सय्यद मोहम्मद दरवेश औरंगाबादला स्थलांतरित झाले. इथे ते शिक्षक म्हणून काम करायचे. याच परिसरात 21 मार्च 1712 मध्ये (13 सफर, 1124 हिजरी) सिराज यांचा जन्म झाला. सिराज यांचा जन्मदिवस तिथी प्रमाणे रमझानच्या पवित्र महिन्यानंतर येणार्‍या महिन्यात येतो. 

सिराज यांना घरातूनच ज्ञान घेण्याची प्रेरणा मिळाली पण त्यांना खरी ओढ होती ती सूफी तत्त्वज्ञानाची. औरंगाबाद जवळचे खुलताबाद हे सूफी संप्रदायाचे एक फार मोठे केंद्र म्हणून मान्यता पावलेले आहे. याच ठिकाणच्या हजरत शाह अब्दूल हमान चिश्ती हुसैनी यांचे शिष्यत्व स्विकारले. यावेळी सिराज केवळ 20 वर्षांचे होते. 

1739 पर्यंत सिराज यांच्या नावाचा दबदबा तयार झाला होता. वली औरंगाबादी नंतर त्यांचे वारस म्हणून सिराज यांचे नाव सर्वातोमुखी झाले होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी सिराज यांचा कविता संग्रह (दिवान) ‘अन्वारूल सिराज’ या नावाने प्रसिद्ध झाला. यात त्यांच्या 500 च्या वर गझला समाविष्ट आहेत. 

असलम मिर्झा यांनी सिराज यांच्या कवितांचे वैशिष्ट्य सांगताना, ‘अपनी गजलों की मिठास, कोमलता और अलंकारिक शैली के कारण वह श्रोताओं मे बहुत लोकप्रिय थे.’ असे नोंदवून ठेवले आहे. सिराज यांच्या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे त्यांचा संगीताचा व्यासंग. त्यांच्या सोबत वादक नेहमी असायचे. परिणामी सिराज यांच्या गजला साग्रसंगीत सादर व्हायच्या. याचा परिणाम त्यांची लोकप्रियता वाढण्यास झाला. 

औरंगजेबाचा मुलगा असफजहा आणि त्याच्या मुलाच्या काळात औरंगाबाद साहित्य संगीताचे एक महत्त्वाचे केंद्र बनले होते. संगीत मैफिली व मुशायरे इथे सतत होत असत. दिल्ली शहराचे जे वर्णन केले जाते त्या प्रमाणेच ‘दख्खन की दिल्ली’ अशी ओळख औरंगाबादची त्या काळात बनली होती. या वातावरणाचा एक मोठा फायदा सिराज यांना झाला. 

सिराज आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आजारी पडले. त्या आजारातच त्यांचे निधन झाले. 16 एप्रिल 1764 मध्ये त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षी आपली जिवन यात्रा संपवली.  सिराज यांचे शिष्य जियाउद्दीन ‘परवाना’ यांनी त्यांचा अंत्यसंस्कार संपूर्ण इतमामात पार पाडला. त्यांच्या कबरीवर एक घुमट बांधला. आजही सिराज यांची मजार औरंगाबादेत नौबत दरवाजा परिसरात पंचकुवा कबरस्तानात उभी आहे.

सिराज यांनी सांसरिक पाश स्वत:भोवती बांधून घेतलेच नव्हते. त्यांचे शिष्यच त्यांना सांभाळायचे. औरंगजेब पुत्र आझम शहा च्या दरबाराचा राजाश्रयही त्यांनी कधी स्विकारला नाही. परिणामी त्यांच्या अभिव्यक्तीवर कुठलाही दबाव आला नाही. पुढच्या पिढीच्या गालिबसारख्या महाकवीला जी राजदरबारी उपेक्षा सहन करावी लागली ती शोकांतिका सिराजची कधी झाली नाही. सिराजच्या फकिरी वृत्तीचा फायदा त्यांच्या काव्याला झाला हे मिर्झा यांचे बारीक निरीक्षण खरंच मार्मिक आहे. 

फारसी काव्याचा अभ्यास सिराज यांनी केला होताच पण मिर्झा यांच्या मते दक्षिणेतील लोकांच्या बोलीभाषा, रितीरिवाज, श्रद्धा यांच्या अभ्यासामुळे सिराज यांच्या शायरीला एक अनोखा रंग प्राप्त झाला. आज आपण ज्याप्रमाणे ‘जितके लोकल तितके ग्लोबल’ असं म्हणतो ते सिराजसारख्या प्रतिभावंताला मध्ययुगीन कालखंडातही लागू पडतं हे फार महत्त्वाचे आहे. मराठी संतांनी लोकभाषेत आपल्या रचना केल्या याचा मोठा प्रभाव सिराज यांच्यावर झाला. याचा परिणाम म्हणजे त्यांच्या काव्यात स्थानिक बोलीभाषेतील शब्द येत राहिले.

तुकारामांचा एक अभंग आणि त्याचा सिराजवर पडलेला प्रभाव मिर्झा यांनी दाखवून दिला आहे. तुकाराम महाराजांचा तो अभंग असा आहे, ‘ऐके कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥ अंगी लावूनियां राख । डोंळे झांकुनि करिती पाप ॥ ( अभंग क्र. 3247, सार्थ तुकारामाची गाथा, संपादक :विष्णुबुवा जोग महाराज) आता सिराज यांनी असे लिहीले आहे

लगा के खाक बदन पर जो कुई लिया बैराग
वह अपने बर में अजब जाम-ए-हरिर किया
(जाम-ए-हरिर म्हणजे शरिरावर रेशमी वस्त्र)

तुकाराम महाराजांचा काळ हा सिराज यांच्या आधीचा आहे. त्यावरून हा अनुबंध लक्षात येतो.  

सिराज सूफी होते पण त्यांना सूफी शायर संबोधण्यास मिर्झा नकार देतात. कारण त्यांच्या कवितेतील शृंगार, जीवनाप्रतीचा रसरशीत उत्साह, निसर्गाबद्दलची ओढ या बाबी त्यांना वेगळं ठरवतात. जीवनातील वास्तवाकडे ते एका प्रेमीच्या नजरेने पाहतात. आपल्या प्रिय व्यक्तीला स्त्री रूपात संबोधण्याची एक पद्धत देशी भाषांमध्ये आढळते ती तशीच सिराज आपल्या अविष्कारात वापरतात. सिराज यांच्या शायरीत प्रेयसी साठी जी संबोधने येतात ती भारतीय भाषांमधली आहेत. उदा. मनहरन, जादूनयन, मोहन इ. 

दोन शब्दांना जोडण्यासाठी एक अनोखी पद्धत उर्दूत आहे. त्याचा वापर ज्यांनी सुरवातीच्या काळात करून या शब्दकळेला सौंदर्य प्राप्त करून दिले त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सिराज. ‘दिल का दर्द’ असे न म्हणता ‘दिल-ए-दर्द’ किंवा ‘गम की शाम’ न म्हणता, ‘शाम-ए-गम’. यामुळे सिराजच्या काव्याला एक अप्रतिम असे सौंदर्य प्राप्त झाले आहे. केवळ दोन शब्दांनाच नाही तर तीन किंवा प्रसंगी चार चार शब्दांनाही असे जोडत सिराज एक वेगळी रचना तयार करतात. उदा. ‘आराम-ए-जान-व-दिल’, ‘खयाल-ए-हलक-ए-जुल्फ-ए-दराज’. सिराज यांची अतिशय गाजलेली गजल ‘खबर-ए-तहय्युर-ए-इश्क सुन’ यातही या प्रकारची सुंदर शब्दरचना आढळून येते.

सिराज हे सूफी होते यामुळे त्यांच्या कवितेला एक गुढ अध्यात्मिक असा रंग आहे. खबर ए तहय्यूर-ए-इश्क याच कवितेतील मतल्यातील (धृवपद) दुसरी ओळ उदा. म्हणून बघता येईल. तो शेर असा आहे

खबर-ए-तहय्यूर-ए-इश्क सुन, न जूनूं रहा न परी रही
न तो तू रहा न तो मै रहा, जो रही सो बेखबरी रही

आता ही ओळ गाताना कव्वाल ‘न तो तू रहा’ म्हणत असताना थांबतात. आणि यात थोडासा बदल करून या ओळीतील अध्यात्मिक गुढ अर्थ श्रोत्यांसमोर उलगडतात. ते असं गातात, ‘न तो तू ‘तू’ रहा, न तो मै ‘मै’ रहा’. यामुळे सिराज यांच्या काव्याचे सौंदर्य अजूनच झळाळून उठते. 

जसे आपल्याकडे संत काव्यात विविध अर्थ दडलेले असतात. किर्तनकार ते उलगडून दाखवतो तस तसा त्यावर प्रकाश पडतो. म्हणून ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे काव्य वाचताना त्यावर कुणी भाष्य केलेले असेल तर त्याचे सौंदर्य उलगडण्यात मदत होते. याच पद्धतीनं सिराजसारखे जे सूफी प्रवृत्तीचे कवी आहेत त्यांच्या कवितांवर सभाष्य टिपणीसह ग्रंथ प्रसिद्ध झाले पाहिजेत. म्हणजे त्यांच्या अर्थाकडे नीटपणे पाहता येईल. 

सिराजच्या शायरीचा फार वेगवेगळ्या अंगाने अभ्यास मिर्झा यांनी केला आहे. बोली भाषेतील शब्द वापरण्यात सिराज माहिर आहेत. उदा. ‘ले कर जाता’ असं न म्हणता ते सरळ ‘लिजाता’ म्हणतात. ‘मुझको’ असं न म्हणता ते ‘मुझकुं’ असं लिहीतात. ‘समझ’ असा उर्दू शब्द न वापरता ते सरळ मराठी ‘समज’ असाच शब्द लिहीतात. दगडाला उर्दूत पत्थर म्हणतात पण सिराज मात्र ‘फत्तर’च लिहीणार.

या सगळ्यांतून सिराज यांच्या निमित्ताने भाषिक अस्मितेचाही एक वेगळाच पैलू मोठ्या अग्रहाने मिर्झा आपल्यासमोर ठेवतात. आजही औरंगाबाद ते हैदराबाद या परिसरातील दखनी भाषेला उर्दूचे विद्वान पंडित नावे ठेवतात. आजही या भाषेत लिहीणार्‍यांना उपेक्षा सहन करावी लागते. अशा काळात या दख्खनी भाषेला मानाचे स्थान देणार्‍या सिराज औरंगाबादीची भलावण मिर्झा करतात त्याला बरीच सांस्कृतिक कारणे आहेत.
दक्षिणेत औरंगाबाद जवळील खुलताबाद हे सूफी संप्रदायाचे एक मोठे केंद्र राहिलेले आहे. जवळपास 700 वर्षांपासून येथे सूफी तत्त्वज्ञानाची चर्चा चालत आली आहे. सूफी संतांनी यात मोठे योगदान दिले आहे. या सगळ्याचा प्रभाव निश्चितच सिराज यांच्यावर आहे. या परिसरातील सूफींवर हिंदू चालीरिती, सण समारंभ, प्रतिके, प्रतिमा यांचाही प्रभाव पडलेला दिसून येतो. सिराज यांच्या काव्यातील अशी स्थळे मिर्झा यांनी शोधून दाखवली आहेत. 

नैन रावन है, अर्जून बाल, पलकें भव घनक भीम की
हमारे दिल की दुख नगरी के राजा रामचंद्र हो

किंवा केशरी रंगांबद्दल लिहीताना आणि धुळधाण हा अगदी खास मराठी शब्दप्रयोग करताना सिराज लिहून जातो

केसरि जामा बदन में उसके देख
दिल हमारा धुलधानी हो गया

एके ठिकाणी तर सिराज यांनी कमाल केली आहे. वेदाध्यायन करण्यासाठी बसलेला ब्राह्मण त्याच्या वेदपठणाची लय, ते एक नादबद्ध संगीत हे सगळं चालू आहे आणि गळ्यात मात्र जानवे प्रेमाचे दिसते आहे म्हणजे 

वेद ख्वानी नाला-व-फरियाद की है सुबह शाम 
जिस ब्रहमन कुं गले का हार है जुन्नार-ए-इश्क
(नाला-व-फरियाद चा अर्थ रडणे ओरडणे, जुन्नार म्हणजे जानवे)

मीरेची भक्ती भारतीय संस्कृतिक संदर्भात एक अतुलनीय असे उदाहरण आहे. असे उदाहरण आपल्या शायरीत घेताना सिराज यांनी आपल्या प्रदेशातील हिंदू मानसिकतेचा उत्तम अभ्यास केलेला आढळून येतो. 

दान-ए-अश्क मीरा तर-ए-पलक में मोहन
रोज समरन है तिरे नाम की माला करने

सिराज यांच्या काव्यातील असे कितीतरी पैलू मिर्झा आपल्या लिखाणात सहज दाखवून जातात. खरं तर त्यांनी या पुस्तकाला जोडलेली ही प्रस्तावना अपुरी आहे. सिराजच्या शायरीवर सविस्तर असे भाष्य त्यांनी देवनागरीत लिहावे. 

सिराज सारख्यांच्या दख्खनी भाषेतील शायरीचा अभ्यास भारतीय संस्कृतीच्या दक्षिणेतील एका पैलूचा अभ्यास होय. हे समजून घ्यायला पाहिजे. मूळात उर्दू ही मुसलमानांची भाषा म्हणून आपण तीच्याकडे दूर्लक्ष करतो. पण ही भाषा दिल्लीत जन्मलेली आणि 100 टक्के भारतीय भाषा आहे. जगातील भारत उपखंड वगळला तर कुठलाच मुलसमान उर्दू बोलत नाही. केवळ अरबी लिपी स्विकारल्याने एक मोठा गहजब माजवला जातो. याला उत्तर म्हणून आता उर्दू साहित्याचे देवनागरीत लिप्यांतर अशी एक मोठी मोहिमच चालविण्याची गरज आहे. 

सिराज यांचे महत्त्व भावी पिढ्यांतील गालिब सारख्या महाकविंच्या संदर्भात कसे आणि काय होते समजून सांगताना असलम मिर्झा यांनी उर्दूचे अभ्यासक समीक्षक विचारवंत डॉ. जमील जालीबी यांचा एक फार महत्त्वपूर्ण संदर्भ आपल्या पुस्तकात दिला आहे. डॉ. जमील लिहीतात,

‘पूरी उर्दू शायरी के पसमंझर मे ‘सिराज’ की शासरी को रख कर देखा जाए तो वह उर्दू शायरी के रास्ते पर एक मर्कजी जगर पर खडे नजर आते है. जहां से मीर, सौदा, दर्द, मुसहफी, आतिश, मोमिन, गालिब और इकबाल की रचायत के रास्ते साफ नजर आते है. सिराज ने उर्दू शायरी के बुनयादी राग को जगाया है.  इसीलिए उन की आवाज  सारे बडे शासरों की आवाज, लय और लहजे में मौजूद है. 

सिराज यांचे मोठेपण आणि महत्त्व यापेक्षा वेगळ्या शब्दांत काय मांडणार?

(सिराज औरंगाबादी-जीवन, व्यक्तित्व एवं संकलित गजले, प्रकाशक-मिर्झा वर्ल्ड बुक, कैसर कॉलनी, औरंगाबाद, मो. 9325203227, पृ. 203, किंमत रू. 300)

Monday, May 27, 2019

मराठी 'कालिदासा'ची हिंदीत चोरी !



विवेक, उरूस, मे 2019

महाकवी कालिदास याला आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘मेघदूत’ हे काव्य स्फुरले. हा दिवस त्याच्या आठवणीत ‘कालिदास दिन’ नावाने साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस  बुधवार 3 जूलै रोजी येतो आहे. या दिवशी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ नावाच्या सुंदर निसर्गवर्णनपर काव्यावर एका कार्यक्रमाचे नियोजन आम्ही करणार आहोत. त्यासाठी कालिदासावरील ग्रंथांचा शोध घेत होतो. ‘कालजयी कालिदास’ हे डॉ. बी.के. शुक्ल यांचे हिंदी पुस्तक समोर आले. पुस्तक अतिशय चांगले असल्याचे लक्षात आले. कालिदासाचा काळ, त्याच्या चरित्राबद्दल माहिती, त्याच्या एकूण साहित्यकृती, त्यावरील वाद, कालिदासच्या काळातील इतर लेखक अशी सर्व सविस्तर माहिती या ग्रंथात आहे. 


हा ग्रंथ चाळत असतानाच अचानक डो़क्यात किडा आला की मराठीत वा. वि. मिराशी यांचे ‘कालिदास’ या नावाचे एक चांगले पुस्तक आहे. ते कधीतरी चाळले होते. हिंदीत वाचण्यापेक्षा मराठीतील पुस्तक वाचावे म्हणून परभणीच्या गणेश वाचनालयाचे ग्रंथपाल आमचे मित्र संदीप पेडगांवकर यांच्याकडे मागणी केली. अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची सगळ्यात जूनी पहिली आवृत्ती आमच्या या ग्रंथालयात सापडली. दूर्मिळ पुस्तकांच्या कपाटात हा अनमोल खजिना होता. हातात असलेले  डॉ. शुक्ल यांचे हिंदी पुस्तक बाजूला ठेवून मिराशी यांचे जूने पुस्तक हाती घेतले. त्यावरची तारीख पाहूनच हरखून गेलो. मिराशी यांचे हे पुस्तक आहे इ.स.1934 चे.

नागपुरच्या ‘सुविचार प्रकाशन मंडळाने’ हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. या पुस्तकाची आता नविन आवृत्तीही प्रकाशीत झाली आहे. मिराशी हे ‘कालिदास’ विषयातील भारतातील एक फार मोठे तज्ज्ञ मानले जातात. आत्तापर्यंत त्यांच्या मांडणीला प्रमाण मानल्या गेले आहे. मिराशींचे पुस्तक वाचत असताना अचानक मला ही सगळी वाक्यरचना ओळखीची वाटायला लागली. मी तर पुस्तक पूर्वी वाचले नव्हते. फक्त चाळले होते. मग हे  वाक्यं मला का आळखीचे वाटत आहेत? मी समोरचे दुसरे पुस्तक बघितले. आणि अक्षरश: उडालोच. शुक्ल यांनी मिराशींच्या पुस्तकातील ओळ न ओळ भाषांतरीत केलेली आढळून आली. 

मी जो संदर्भ शोधत होतो तो ‘ऋतुसंहार’ चा. तेंव्हा त्याच्यापुरती ही चोरी असेल असे वाटले. मग पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली. ती सुद्धा शब्दश: चोरी केलेली. मिराशींच्या पुस्तकात 1. कालिनिर्णय 2. कालिदासकालीन परिस्थिती 3. जन्मस्थानाचा वाद 4. चरित्रविषयक अनुमाने 5. कालिदासची काव्यें 6. कालिदासाची नाटके 7. कालिदासीय ग्रंथांचे विशेष 8. कालिदासीय विचार 9. कालिदास व उत्तर कालीन ग्रंथकार अशी एकूण 9 प्रकरणे आहेत. 

आता ‘कालजयी कालिदास’ या डॉ. शुक्ल यांच्या हिंदी पुस्तकाची अनुक्रमणिका बघा- 1. काल-निर्णय 2. कालिदासकालीन परिस्थिती 3. जन्मस्थान की समस्या 4. चरित्रविषयक अनुमान 5. कालिदास के काव्य 6. कालिदास के नाटक 7. कालिदास के ग्रंथों की विशेषताएँ 8. कालिदास के विचार 9. कालिदास और उत्तरकालीन ग्रंथकार. 

पहिल्या प्रकरणातील पहिलीच ओळ मूळ पुस्तकातील अशी आहे- ‘आपले संस्कृत वाङ्मय अनेक विषयांत अत्यंत समृद्ध आहे.’ हिंदी कालिदास पुस्तकातील पहिलीच ओळ बघा- ‘हमारा संस्कृत साहित्य अत्यन्त संपन्न और अगाध है.’ 

निव्वळ शब्दश: भाषांतर करण्याच्या नादात आपण मुळ मराठी पुस्तकांचे संदर्भ या पुस्तकात जसे घेतले आहेत तसेच ते हिंदीतही घेत आहोत हे डॉ. शुक्ल विसरून गेले. कारण ते हे भाषांतर बुद्धी बाजूला ठेवून ठोकळेबाजपणे करत होते. आपल्या मुर्खपणाचे कित्येक पुरावे डॉ. शुक्ल यांनी पुस्तकात जागोजागी सोडले आहेत. जन्मस्थानाचा वाद या  तिसर्‍या प्रकरणात मूळ पुस्तकात मिराशी यांनी शि. म. परांजपे यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘साहित्यसंग्रह भाग 1’. या पुस्तकातील 96 व्या पानावरील एक परिच्छेद मिराशी यांनी आपल्या पुस्तकात वापरला. डॉ. शुक्ल यांचे हे काम होते की त्यांनी हे मूळ पुस्तक कोणते त्याचा पहिले शोध घ्यायचा. पण त्यांनी ते कष्ट घेतले नाहीत. त्यांनी हे आपल्या आपल्या पुस्तकात हा  परिच्छेद जशाला तसा घेतला.  शिवाय कंसात पुस्तकाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक देताना (साहित्य संग्रह भाग 1, पृ. 16) असे करून लिहीले. वस्तुत: मूळ मराठी पुस्तकाचा पृ. क्र. 96 असताना केवळ हा 9 आकडा न समजल्याने त्यांनी तो 1 करून टाकला. कारण यात कुठेच कसलाच विचार डॉ. शुक्ल करत नाहीत. 

आपण कुठल्या पुस्तकांचे संदर्भ वापरले आहेत ते शेवटी परिशिष्टात नोंदविण्याची पद्धत असते. मिराशी यांनी आपल्या पुस्तकात ‘कांही संदर्भ ग्रंथ व लेख’ या नावाने सविस्तर परिशिष्ट दिले आहे. त्यात कालिदासाचे ग्रंथ, मराठी भाषांतरे, मराठी चर्चात्मक ग्रंथ, संस्कृत ग्रंथ, इतर भाषांतील ग्रंथ, शिवाय खालील नियतकालिकांतील कोरीव व चर्चात्मक लेख असे सगळे सविस्तर नोंदवले आहे. म्हणजे मुळात मिराशी यांनी किती कष्ट उचलले हे लक्षात येते. 

डॉ. शुक्ल यांनी मात्र उचला उचली करताना हे सगळं विसरून केवळ ‘इतर भाषांतील ग्रंथ’ इतकीच यादी आपल्या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट म्हणून जोडली आहे. आणि नेमकी इथे त्यांची चोरी अजूनच उघडी पडली आहे. इतर भाषांतील ग्रंथांची यादी देताना 1 ते 17 असे क्रमांक वा. वि.मिराशी यांनी दिले आहेत. चोट्टेपणा करताना शुक्ल यांनी ‘संदर्भ ग्रंथावलि’ असे नाव देत पृ. क्र. 255 वर एक चारच पुस्तकांची यादी दिली आहे. स्वाभाविकच कोणीही हे क्रमांक 1 ते 4 असेच देईल ना. पण हा माणूस मुळातच निर्बुद्ध चोर असल्याने त्याला ही चोरी पण नीट जमली नाही. त्याने 12 पासून 15 क्रमांकांची जी चार इंग्रजी पुस्तकांची नावे जशाला तशी कॉपी करत त्यांना क्रमांकही मुळ पुस्तकातीलच 12 ते 15 दिले आहेत. आता काय म्हणावं अशा वृत्तीला? 

संपूर्ण पुस्तकात मिराशी यांच्या पुस्तकाचा कुठेही काहीही संदर्भ नाही. मिराशीच कशाला पण कुठल्याच मराठी लेखकाचा काहीही संदर्भ नाही. मिराशी यांनी जागोजागी आपल्या पुस्तकात ज्या मराठी पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत ते जशाला तसे हिंदीत शुक्ल देतात. पण या पुस्तकांची यादी परिशिष्टात देण्याचे मात्र सोयीस्कररित्या विसरून जातात. अगदी एक ना एक शब्द एक ना एक ओळ भाषांतरीत करून घेतली आहे. पण कुठेही मुळ लेखकाला जराही श्रेय दिले नाही. 

यापुस्तकावरचा जास्त मोठा आरोप पुढचा आहे. शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालयासाठीच्या राजा राम मोहनराय ग्रंथ खरेदी योजनेत या पुस्तकाचा समावेश झालेला आहे. हे पुस्तक सदर प्रकाशकाकडून खरेदी करून महाराष्ट्रातील ग्रंथालयांना भेट म्हणून पाठविण्यात आले आहे. ही तर जास्त गंभीर बाब आहे. 2016 साली या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. निदान पुस्तकावर तरी तशी तारीख छापली गेली आहे. 

वासुदेव विष्णु मिराशी हे अतिशय विद्वान असे संस्कृत पंडित. नागपुरच्या मॉरिस कॉलेजमध्ये ते प्राध्यापक राहिलेले आहेत. नागपुरपासून जवळच असलेले रामटेक हे कालिदासाच्या मेघदुतचे जन्मस्थान. तेथे कालिदास विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील या ठिकाणाचा अभिमान बाळगत एक मराठी माणूस कालिदासावर अतिशय मोलाचा असा ग्रंथ 85 वर्षांपूर्वी लिहीतो. या ग्रंथाची इंग्रजीत आणि इतरही भाषांत लेखकाला पुरेसा सन्मान देवून भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. आणि असं असताना डॉ. बी.के.शुक्ल नावाचा एक कुणी उपटसुंभ हिंदी लेखक या पुस्तकाचे शब्दश: हिंदीत भाषांतर करून आपल्याच नवाने छापतो. आणि हा ग्रंंथ एका शासकीय योजनेद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांसाठी खरेदी करून भेट म्हणून पाठवला जातो हा प्रकार आपल्या ग्रंथालय संस्कृतीला लांच्छन आहे. भारतातील इतर प्रदेशांत हाच ग्रंथ गेला असेल तर ते याच माणसाला कालिदासाचा अभ्यासक मानून याचेच संदर्भ देत बसतील. मुळ संशोधन करणार्‍या वा. वि.मिराशींचे श्रेय नाकारले जाईल. 

याची तमाम मराठी माणसांनी संबंधीतांनी गंभीर दखल घेवून या पुस्तकावर योग्य ती कार्रवाई केली पाहिजे.

(मुळ पुस्तक :  कालिदास, लेखक- वासुदेव विष्णु मिराशी, प्रकाशक-सुविचार प्रकाशन मंडळ, लिमिटेड, नागपूर, 1934,
हिंदी पुस्तक : काजजयी कालिदास, लेखक : डॉ. बी.के.शुक्ल, प्रकाशन- राष्ट्रीय साहित्य सदन, यमुना विहार, दिल्ली 110053. प्रकाशन वर्ष 2016.
लेखकाचा पत्ता. डॉ. बी.के. शुक्ल, देवभूमि, राजनगर, पालमपुर-176062 हिमाचल प्रदेश.)  
             
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Saturday, May 18, 2019

गिरीश कुबेर : एक अर्टिकल तो तबियत से लिखो यारो !



गिरीश कुबेर यांचे लोकसत्तातील ‘अन्यथा’ हे सदर माझ्या आवडीचे आहे. मी ते आवर्जून वाचतो. परदेशातील असे संदर्भ ते नेमके हूडकून काढतात ज्यातून मोदी-अंबानी-भाजप-संघ यांच्यावर नेमका निशाणा साधला जावा.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे ट्रंप यांच्याशी साम्य कसे आहे हे कुबेरांना आडून आडून सुचवायचे असते. खरं तर त्यांनी ते सरळच लिहावे. पण कुबेर तसे करत नाहीत. त्यांनी टीका जरूर करावी. पण ती करताना ते कधी कधी असं काही लिहून जात आहेत की त्यातून त्यांच्या हेतूबद्दलच शंका यावी.

आज शनिवार 18 मे 2019 रोजी त्यांनी ‘एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...’ या नावाचा लेख लिहीला आहे. अमेरिकेत व्हर्जिनिया राज्यात लेक्सिग्टन शहरातील रेड हेन नावाचे रेस्तरॉं आहे. येथे ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख सारा हकबी सँडर्स आपल्या कुटूंबियांसमवेत गेल्या होत्या. रेस्तरॉंच्या मालकाने त्यांना खाद्यपदार्थ देण्यास नकार दिला. हकबी यांना अपमानित होवून बाहेर पडावं लागलं. अशी ही कथा आहे. पुढे या रेस्तरॉंच्या मालकावर लोकांनी कसा बहिष्कार टाकला, पत्रं पाठवली, धमक्या दिल्या असं एक ट्रंप यांना खलनायक बनविणारे चित्र कुबेर यांनी रंगविले आहे. शेवटी हे रेस्तरॉं बंद ठेवावे लागले. आणि काही दिवसांनी ते उघडणार त्या दिवशी लोकांच्या रांगा लागल्या होत्या, मालकाला वाटले की परत निषेध वगैरे की काय? पण तसे नव्हते लोकांनी धन्यवाद देण्यासाठी फुले देवून स्वागत करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. शिवाय पाकिटात घालून पैसे या मालकाला देवू केले होते वगैरे वगैरे...

कुबेरांचा लाडका सिद्धांत लोक हुकूमशाहीच्या विरोधात कसे रस्त्यावर आले, आणि त्यांनी कशी ट्रंप यांची दादागिरी एका रेस्तरॉं पुरती संपवली तो त्यांनी रंगवला आहे.

मला लेख आवडला. पण काहीतरी खटकत होते. परत वाचताना पहिल्या परिच्छेदातील एका गोष्टीचा अर्थच लागेना. ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख हकबी यांचा नेमका गुन्हा काय? केवळ त्या ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख आहेत हा त्यांचा अपराध कसा काय होवू शकतो? अमेरिके सारख्या लोकशाही असलेल्या देशात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रेस्तरॉं मध्ये कुणाही ग्राहकाने खाद्य पदार्थ मागितल्यावर त्याला नकार देण्याचे कारण काय? किंवा काही कारणाने आम्ही सेवा देवू शकत नाहीत म्हणून नम्रपणे नकारही देता येतो. ते स्वातंत्र्य रेस्तरॉं मालकाला आहेच. पण अपमानित करण्याचे कारण काय?

आणि याचे नेमके कुठले समर्थन कुबेर करत आहेत? कुबेरांना हे सगळे संदर्भ भारताशी जोडायचा छंद आहे. आपण भरतातील परिस्थितीचा विचार करू. समजा उद्या कॉंग्रेसचा विजय झाला (हे वाचूनच कुबेरांना केतकरांना गुदगुल्या होतील). कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे प्रसिद्धी प्रमुख दिल्लीतील एखाद्या भाजप समर्थक व्यक्तीच्या उपहारगृहात गेले. त्या मालकाने राहूल गांधी यांच्या प्रसिद्धी प्रमुखाला मला तूझ्या मालकाबद्दल राग आहे म्हणून अपमानित करून हाकलून लावले तर कुबेर कुणाची बाजू घेतील?

ट्रंप यांच्या प्रसिद्धी अधिकारी हकबी यांनी काही गैर वर्तन केले का? कुणाला शिवीगाळ केली का? मद्यमान करून अनैतिकतेचे काही प्रदर्शन केले का? त्यांनी मागितलेले अन्न नाकारण्याचे कारण काय?

या सगळ्या प्रकरणाचे कुबेर नेमक्या कोणत्या बाजूचे आणि का उदात्तीकरण करत आहेत? खरं तर या प्रकरणाला अजून काही पैलू असू शकतील जे की आपल्याला माहित नाही. त्याच्याशी आपल्याला सध्या फारसे कर्तव्य नाही. एखाद्या लोकशाही देशातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जाते. तिथे वैध मार्गाने आपल्याला हवे त्याची ऑर्डर देते. आणि तो मालक काहीच सबळ कारण नसताना केवळ ट्रंप यांच्या कार्यालयातील अधिकारी म्हणून अपमान करतो? आणि कुबेर सारखा लोकशाही देशातील संपादक त्याचे समर्थन करतो. हा तर मोठा अजब प्रकार झाला.

भारतात मंदिरांमधून सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून ओरडणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने बोंब करणारे हेच लोक आहेत ना? मग सार्वजनिक उपहारगृहात सर्वांना प्रवेश असावा. प्रत्येकाला त्याने मागितलेले आणि उपलब्ध असलेले अन्न मिळावे असं यांना वाटत नाही?

गिरीश कुबरे ‘एक अर्टिकल तो तबियत से लिखो यारो‘. मोदीभक्त अंधळे आहेत म्हणून टीका करताना मोदी विरोधकही आंधळे होत चालले आहेत की काय? 
                 
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Friday, May 17, 2019

पाकिस्तानी सुफी दर्ग्यांत का होतात बॉंबस्फोट ?



विवेक, उरूस, मे 2019

बुधवार दिनांक 8 मे रोजी पाकिस्तानातील लाहोरच्या सुप्रसिद्ध दाता दरबार सुफी दर्ग्यात कट्टरपंथियांनी बॉंबस्फोट केले. त्यात दहा जण मृत्यूमुखी पडले असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला तालिबान्यांनी केला आहे. तशी त्यांनी कबुलीही दिली आहे. हे तेच तालिबानी आहेत ज्यांनी अफगाणिस्तानातील बामियानातील सर्वात मोठ्या प्राचिन बुद्ध मुर्ती मिसाईल्स लावून उडवल्या होत्या. हेच कट्टरपंथी तालिबान आता पाकिस्तानातील सुफी संप्रदायाच्या विविध श्रद्धा स्थानांवर हल्ले करत आहेत. 

याच ठिकाणी यापूर्वीही आयसिस या कट्टरपंथीय गटाने 2010 मध्ये आत्मघाती हल्ला केला होता. त्यात50 जण ठार झाले होते.

11 व्या शतकातील सुफी संत अबुल हसन अली हुजविरी जे दाता गंज बक्ष या नावाने ओळखले जातात यांचा हा दर्गा आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठा दर्गा म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. ‘दाता दरबार’ या लोकप्रिय नावाने हा दर्गा ओळखला जातो. भारतातील सर्वात प्रसिद्ध अजमेरचे सूफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांनी पण या दाता दरबार मध्ये दाता गंज बक्ष यांच्या कबरीपुढे माथा टेकवला होता. त्यांचे आशिर्वाद घेतले होते. अगदी आत्ता आत्तापर्यंत नवाज शरीफ, इमरान खान पर्यंतचे पंतप्रधान इथे माथा टेकवत आले आहेत.   

या दर्ग्यात कव्वाल्ली महोत्सव भरवला जातो. जगभरातील कव्वाल इथे आपली हजेरी लावणे प्रतिष्ठेचे समजतात. इथे संगीत परंपरा मोठ्या निष्ठेने जतन केली जाते. या परिसरातील कव्वाली गायनाची एक वेगळी शैली आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेली ही कव्वाली आज फारच थोड्या गायकांनी आत्मसात केली आहे. भारतातील हैदराबादचे कव्वाल या शास्त्रीय परंपरेत गातात.   

या सुफी संतांबाबत अजून एक मुद्दा इतरांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. दाता गंज बक्ष यांनी ‘कश्फुल महजूब’ या नावाचा  लिहीला. सूफी प्राचीन तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ अरबी भाषेत उपलब्ध होते.  हा फारसी भाषेतील सूफी तत्त्वज्ञानाचा पहिलाच ग्रंथ होय. म्हणून याला अतोनात महत्त्व आहे. मोगल दरबाराची अधिकृत राजभाषा फारसी होती. मोठ-मोठ्या विद्वानांना चर्चा करण्यासाठी सगळ्यात जूना फारसी ग्रंथ म्हणून हाच उपयोगी पडत आला आहे. सम्राट अकबराने तर केवळ तत्त्वचर्चा करण्यासाठी वेगळी इमारत बांधली होती.  तिथे हा ग्रंथ सन्मानाने प्रतिस्थापीत करण्यात आला होता. पाश्चात्य विद्वान निकलसन यांनी 1914 मध्ये या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद प्रसिद्ध केला. पुढे रशियन अभ्यासक झोकोसिस्की यांनी 1920 मध्ये याची रशियन आवृत्ती सिद्ध केली. या ग्रंथात सूफी साधनेच्या श्रद्धा, तत्त्वे, पहिल्या युगापासून ते समकालीन सूफींची संक्षिप्त चरित्रे यांचा समावेश आहे. विभिन्न सुफी संप्रदाय आणि त्यांच्याशी संबंधीत साधकांची परिस्थिती, सूफींचे नियम, त्यांची प्रगतिस्थळे आणि पारिभाषिक शब्दावलींचे विवेचन या ग्रंथात समाविष्ट आहे. (सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन, लेखक-डॉ. मुहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. पृ. 346)

इथले संगीत व सूफी तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ हा कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांना सगळ्यात खटकणारा मुद्दा आहे. त्यामुळेच या दर्ग्यावर हल्ले केले जातात. या दर्ग्यात ज्या प्रमाणे कव्वाल्यांमधून संगीताचे जतन केले जाते तसेच इथे मोठे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात विविध तत्त्वज्ञान विषयक जूने-पुराणे ग्रंथ सांभाळून ठेवले आहेत.

धार्मिक श्रद्धांसोबतच संगीत कला तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून हा दर्गा प्रसिद्ध आहे. ही सगळी समृद्ध अशी ज्ञानाची- कलेची परंपरा नष्ट करणे हे कट्टरपंथीय इस्लामचे पहिले उद्दीष्ट आहे. भारतात शेकडो वर्षे मंदिरे शिल्पकला ग्रंथ यांच्यावर हल्ले होत गेले. इस्लामधील सुफी हे सुद्धा कट्टरपंथियांच्या रडारवर आलेले आहेत. त्यांच्यावर कठोर हल्ले केले जात आहेत. आणि नेमकी हीच जागतिक चिंतेची बाब आहे. 

जगभरात विविध देशांतील तत्त्वज्ञान, कला, शिल्प, संगीत याबाबत एक मोठ्या प्रमाणावर जनजागृती होताना दिसत आहे. जगभरचे संशोधक अभ्यासक आपल्या आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इतर देशांतील अशा बाबींचा अभ्यास करताना दिसून येत आहेत. अभ्यासकां सोबतच जगभरचे पर्यटक अशा धार्मिक श्रद्धा ठिकाणांना आवर्जून भेट देतात. तेथील परंपरा श्रद्धा समजून घेतात. तत्त्वज्ञानाची तोंड ओळख करून घेतात. युरोपमध्ये अशा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात सामान्य लोक उत्सूक आहेत. 

जेंव्हा दाता दरबार दर्ग्यावर हल्ला होतो तेंव्हा त्याची वेदना जगभर उमटते त्याचे कारण हेच आहे. जगभरच्या सामान्य श्रद्धाळू रसिक कलावंत वर्गाला अशा ठिक़ाणांबाबत आस्था वाटत असते. भौतिक प्रगती साधलेला एक बर्‍यापैकी मध्यमवर्ग आता अशा बाबींकडे वळला आहे. त्यासाठी तो जगभर पर्यटक म्हणून फिरतो आहे. त्याला जगभरातील कला संस्कृती धार्मिक समजूती यांना डोळसपणे समजून घेण्यात रस आहे. त्याचा नव्याने अन्वयार्थ लावण्यात आपली बुद्धी तो खर्च करू पाहतो. 

कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या या पूर्वी पाकिस्तानात करण्यात आली, शाहबाज कलंदर दर्ग्यात बॉंबस्फोट करण्यात आले आणि आता दाता दरबार दर्ग्यात बॉंब स्फोट झाले. याचा आपण कडाडून निषेध केला पाहिजे. ही जी तालिबानी वृत्ती आहे तीचा नायनाट केला गेला पाहिजे. 

पाकिस्तानात संगीतावर मोठे हल्ले होत आहेत. यामूळे संगीतकार, गायक, रसिक, वादक कलाकार हे भयभीत चिंताग्रस्त झाले आहेत. पाकिस्तानातील संगीतावरील हल्ल्यांचा विषय घेवून जवाद शरीफ नावाच्या तरूणाने एक सुंदर माहितीपट ‘इंडस ब्लूज’ नावाने तयार केला. सध्या विविध जागतिक चित्रपट महोत्सवात तो दाखवला जात आहे. त्याला कैक पुरस्कारही मिळाले आहेत. जूनी पुराणी वाद्ये सिंधू नदीच्या खोर्‍यात कशी संपूष्टात येत चालली आहेत. वादकांना किमान प्रतिष्ठा तर सोडाच खायला पण भेटायची मारामार आहे. शिवाय त्यांच्यावर हल्ले होत आहेत. वाद्य जाळून टाकली जात आहेत. सध्या आख्ख्या पाकिस्तानात एकच सारंगी वादक जिवंत शिल्लक राहिला आहे. अशा 24 दूर्मिळ वाद्यांपैकी 9 वाद्यांचा वेध या माहितीपटात घेतला आहे. 

दाता दरबार दर्ग्यावरील हल्ला हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय यामुळे आहे की सूफी तत्त्वज्ञान, संगीत, मोगल स्थापत्य या सगळ्या गोष्टी ज्यावर हे हल्ले होत अहोत हे सगळं आपल्याशी निगडीत आहे. नव्हे आपल्यात पूर्णपणे मिसळून गेले आहे. इतकंच नव्हे तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा ते एक अभिन्न असे अंग बनून आहे. त्यामुळे हा हल्ला स्वाभाविकच आपल्यावरचाच हल्ला असतो. 

कराची मधील सिंधी संस्कृती, पंजाबातील संस्कृती या भारतापासून वेगळ्या काढताच येत नाहीत हे कट्टरपंथीय इस्लामचे खरे दुखणे आहे. ज्या भारतीयांबद्दल ते द्वेष करतात त्या भारतीय परंपरेची पाळेमुळे या प्रदेशातील इस्लाममध्ये खोल रूजलेली आहेत. ती उपटून कशी काढणार? 

जगाला असे वाटत होते की इस्लामने भारतावर आक्रमण केले आणि येथील कित्येक लोकांना धर्मांतर करायला लावून मुसलमान केले. वरवर हे खरेही आहे. जगात इंडोनेशियाच्या खालोखाल मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. इतके तर लोक बाहेरून येणे शक्यच नाही. तेंव्हा भारतातील मुसलमान हे मूळचे इथलेच आहेत. आता हळू हळू काळावर मात करून या प्रदेशातील इस्लामवरच येथील समृद्ध संस्कृती परंपरा यांचा प्रभाव पडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. त्यांना नष्ट करता येणं शक्य नाही हे कट्टरंपंथियांनी ओळखले पाहिजे. भारत आता सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही देश आहे. आधुनिक देश आहे. येथे आता मध्ययुगीन कालखंडातील धर्मांधपणा शक्य नाही. पण पाकिस्तानसारखा देश जो गेली 7 दशके चाचपडतच आहे तेथे हे हल्ले अजून चालूच आहेत. हड्डप्पा मोहेंजदरो सारख्या प्रचीन संस्कृतीची ओळख सांगणारी शहरे या भागात सापडली. सिंधू नदीचा समृद्ध संस्कृतीचा हा प्रदेश. कट्टरपंथीयांना येथील खाणाखुणा नष्ट करण्याची दुष्टबुद्धी होते आहे.

केवळ भारतच नव्हे तर जगभरच्या पत्रकार, लेखकांनी या हल्ल्यांचा कडक निषेध केला आहे.  
                
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Sunday, May 12, 2019

केतकरांची अभद्रवाणी : 23 मे ला दंगे होणार !



मॅक्स महाराष्ट्र या न्यूज पोर्टलच्या रवी अंबेकरांना मुलाखत देताना केतकरांनी जे तारे तोडले आहेत त्याला खरोखरच तोड नाही.

महाभारतात युद्ध संपल्यावरचा एक प्रसंग आहे. सरोवराच्या पाण्यात दुर्योधन शेवटच्या घटका मोजत निपचीत पडून आहे. त्याला शोधत अश्वत्थामा तिथे जातो. शेवटच्या क्षणी दुर्योधन त्याला सेनापतीपदाचा अभिषेक करतो आणि सूड घ्यायला सांगतो. त्या प्रमाणे अश्वत्थामा पांडवाच्या शिबीरात मध्यरात्री शिरतो. पांडवांचा सेनापती धृष्ट्यद्युम्न (हे नांव राहूल गांधींच्या तोंडून केतकरांनी वदवून दाखवावे.) द्रौपदीच्या पाच मुलांना (पाच पांडवांपासून झालेली पाच मुले. या शिवाय प्रत्येक पांडवाला इतर पत्नीपासून झालेली अपत्ये होतीच.) जवळ घेवून झोपलेला असतो. झोपेत त्या सर्वांची हत्या करून अभिमन्यूची पत्नी उत्तरा हीच्या गर्भावर तो ब्रह्मास्त्र सोडतो. या सगळ्या पापासाठी त्याला शाप मिळतो. त्याच्या कपाळावरचा तेजस्वी मणी देव काढून घेतो. आणि ती भळभळती जखम घेवून अश्वत्थामा फिरत राहतो. अशी ती  कथा आहे.

केतकरांना निकालाचा आधीच अंदाज आलेला असावा. कॉंग्रेसचे सगळे बौद्धिक सेनापती एका पाठोपाठ एक अपयशी ठरल्यावर आता शेवटचा बौद्धिक सेनापती म्हणून केतकरांना नेमल्या गेले असावे. त्यांनी भाजपवर सूड उगवायचा म्हणून अश्वत्थाम्या कृतीसारखी दळभद्री भाषा आत्तापासूनच करायला सुरवात केली आहे. 23 मे नंतर केतकरांना हरलेल्या कॉंग्रेसच्या राज्यसभेतील खासदारकीची भळभळती जखम कपाळावर घेवून जगत राहावं लागणार असं दिसतं आहे.

केतकर असं म्हणाले की मोदी काहीही झाले तरी सत्ता सोडणारच नाहीत. 23 मे ला दंगल होईल. विजय मिळाला तर भाजपवाले विजयाच्या उन्मादात माज आल्याने दंगा करतील. पराभव झाला तर निराशेत दु:खात दंगल करतील. पण दंगल करतील हे निश्‍चित.

केतकरांना असे विचारायला पाहिजे की तूम्ही हे भाकित कशाच्या आधारावर करत आहात? भारतीय लोकशाहीसाठी इतकी दळभद्री भाषा तूमच्या तोंडून कशी काय निघत आहे?

आत्तापर्यंत निवडणूक निकालावर भारतात कधी दंगल झाली आहे का? लोकसभेची 17 वी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. केवळ पन्नास जागांची निवडणूक राहिली आहे. जवळपास शांततेत मतदान झाले आहे. आधीपेक्षा एखाद दोन टक्के जास्तच मतदान होण्याची शक्यता आहे.  जो काही हिंसाचार मतदानाच्या वेळी झाला तोही पश्चिम बंगाल मध्ये जिथे की भाजपची सत्ता नाही. मग केतकर हा आरोप कोणत्या आधारावर करत आहेत?

2014 ते आजतागायत ज्या ज्या राज्यांत विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्या त्या ठिकाणी सत्ताबदल सहज झाला. भाजपचा पराभव झालेल्या राज्यांमध्ये भाजप मुख्यमंत्र्याने सत्ता सोडण्यास नकार दिला असे एक तरी उदाहरण आहे का? मोदी 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालखंडात गुजरात राज्यात ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या त्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला तिथे इतर पक्षांना सत्तेत येण्यापासून रोकल्या गेले आहे का?

केतकर इतका बौद्धिक थयथयाट का करत आहेत?

याआधी ते असे म्हणत होते की मोदी परत पंतप्रधान होणारच नाहीत. मग आता असं म्हणत आहेत की ते सत्ता सोडणारच नाहीत. मोदीचे पंतप्रधानपद एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे.

केतकर कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. केतकरांनी कॉंग्रेस पक्षाला निवडणुकाच लढवू नका असा सल्ला का नाही दिला? केवळ कॉंग्रेसच कशाला सगळ्या विरोधी पक्षांना त्यांनी असे का नाही सांगितले की मोदी सत्ता सोडणार नाहीतच. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमुक अमुक इतक्या वर्षांंसाठी मोदींचे पंतप्रधानपद पक्के आहे. मग निवडणुका लढवताच कशाला? सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकूत. जगाला एक मोठा संदेश जाईल की मोदींच्या हुकूमाहीच्या विरोधात विरोधी पक्षांनी अतिशय कडक पाऊल चलले आहे.

भाजपला 281 जागा मिळाल्या तरी आपला नैतिक पराभव समजून मोदींनी राजीनामा दिला पाहिजे असे एक विधान केतकरांनी या मुलाखतीत केले आहे. मोदी-भाजप आणि जनता काय करायचे त्यांचे ते पाहून घेतील. जर भाजपला आधीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर केतकर काय करतील? किंवा राहूल गांधी काय करतील? केतकरांमध्ये ही हिंमत आहे का की कॉंग्रेसचा पराभव झाल्यास राहूल गांधींचा राजीनामा मागायची?

न्यायालयाचा निकाला विरोधात गेल्यानंतर सत्ता न सोडण्याची खेळी केतकरांच्या प्रिय नेत्या इंदिरा गांधींनी केली होती. ते कदाचित केतकरांच्या इतके डोक्यात घुसून बसले असावे की त्यांना आता वाटते आहे की मोदीही त्यांच्या प्रिय नेत्यांप्रमाणेच पदाला चिकटून राहतील.

कॉंग्रेसचे सगळे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, शल्य (हे सगळे कौरवांचे सेनापती होते) एकट्या दुर्याधनाच्या (राहूल गांधींच्या) अहंकारापोटी धारातीर्थी पडले आहेत. शेवटचा  बौद्धिक सेनापती कुमार केतकर अश्वत्थाम्या सारखी सुडाची भाषा बोलतो आहे. 23 मे ला दंगे होण्याची ग्वाही देतो आहे.

निकाल काहीही लागो पण लोकशाहीवर असले दळभद्री आरोप करणार्‍या केतकरांना त्यांच्या वयाच्या किंवा त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ एका तरी विचारवंतांने खडसावून विचारले पाहिजे ‘केतकर तूमचे डोके ठिकाणावर आहे काय?’ 
                 
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575