Tuesday, October 28, 2014

आंदोलनास वर्ष उलटले । रस्त्याचे ना भाग्य पलटले ॥



                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 ऑक्टोबर 2014 


बरोबर एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते हे न समजल्यामुळे औरंगाबाद शहरातील सामान्य नागरिक वैतागुन शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले. एकाही राजकीय पक्षाने जनतेच्या गंभीर समस्यांकडे लक्ष दिले नव्हते परिणामी आपणच काही तरी करू म्हणून हे नागरिक रस्ता रोको करण्यासाठी पुढे आले. या आंदोलनास लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पोलिसांनी आंदोलन करणार्‍यांना समज दिली. महानगरपालिकेच्या सबंधित अधिकार्‍यांनी रस्ता चांगला करण्याचे कागदोपत्री आश्वासन दिले. सगळ्यांना वाटले आता रस्ता दुरूस्त होईल. 

आंदोलनाचा खरा धसका घेतला राज्यकर्त्यांनी. त्यांनी पोलिसांवर दबाव वाढवला. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या तिघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्यावर कार्रवाई करण्याचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा पुरूषार्थ दाखवला. एरव्ही मोठ-मोठ्या गुन्ह्यांबाबत आणि गुन्हेगारांबाबत लेचीपेची भूमिका स्वीकारणार्‍या पोलिसांनी या सामान्य माणसांवर कार्रवाई करताना मोठाच उत्साह दाखवला. यातील एकाने जामिन नाकारून तुरूंगात जाणे पसंद केले. त्याला तुरूंगात घालून शासनाने स्वत:चीच आब्रू घालवून घेतली. 

स्वातंत्र्याची साठी उलटून गेली आणि अजूनही चांगला रस्ता नागरिकांच्या नशिबी नाही. उलट या मागणीसाठी आंदोलन करणार्‍याला सरकार जेलमध्ये टाकते. यावर इतर सामान्य नागरिकांनी, समाजातील प्रतिष्ठीतांनी, माध्यमांनी सरकारला धारेवर धरले. परिणामी या नागरिकाची बीनशर्त सुटका करावी लागली. निवडणुका तोंडावर होत्या. जनतेला वाटले आता काहीतरी होईल. 

रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, कायदा हातात घेणे याला काही विचारवंत पत्रकार विरोध करतात. त्यांचे म्हणणे असते कायद्याचे राज्य आहे. तेंव्हा जे काय व्हायचे ते कायद्याच्या मार्गाने व्हावे. हे आंदोलन होण्याच्या 1 महिना आधीच रूपेश जयस्वाल या तरूणाने उच्च न्यायालयात रस्त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लगायच्या आत रस्त्याची कामं सुरू झाली पाहिजेत असा आग्रह याचिकेत करण्यात आला होता. महानगरपालिकेने थातूर मातूर पद्धतीने 13 रस्त्यांची कामं सुरू करू असं आश्वासन त्यावेळी न्यायालयात दिलं. काही रस्त्यांची कामं सुरूही झाली. आज यालाही सात महिने उलटून गेले. एकाही रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालं नाही.

मधल्या काळात लोकसभेची निवडणुक झाली. जनतेने दिल्लीतील सरकार बदलून दाखवले. आता विधानसभेचाही निकाल लागला आहे. जे मुंबईत सत्तेत होते त्यांची तर औरंगाबाद शहरात अमानत रक्कमही जप्त झाली. निवडणुकीच्या माध्यमातून शांतपणे सरकार बदलून जनतेने आपली ताकद दाखवून दिली. वैध मार्गाने जनता न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे तर त्यांना अजून न्याय मिळत नाही. रस्त्यावर उतरत आहे तर त्यांना तुरूंगात घातले जात आहे. इतकं झालं तरी अजूनही ज्या रस्त्यावर आंदोलन झाले तो रस्ता तसाच आहे.

आता करावे तरी काय? आता औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यांची आचारसंहिता केंव्हाही लागू शकते. परत आचारसंहितेचे नाव पुढे करत काहीही न करण्याचा जन्मसिद्ध अधिकार बजावायला सरकार मोकळे.

भर दिवाळीत शहरात कचर्‍याचे मोठ मोठे ढिग साठले होते. कारण काय तर जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते संपावर गेले होते. त्यांना दिवाळीचा बोनस हवा होता शिवाय सुट्टीच्या दिवशी न केलेल्या कामाचे पैसेही हवे होते. या कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करत कसा बसा संप मिटवला गेला. आज कुठल्याही शहरात कचर्‍याचे ढिग जिथे साठलेले असतात त्या ठिकाणी काही बायका आणि लहान मुले कचर्‍यात काही तरी वेचत बसलेले आढळतात. हे लोक काय गोळा करत असतात? फेकुन दिलेल्या गोष्टीमध्ये यांना काय मिळतं?

उस्मानपुर्‍यात कचरा वेचणार्‍या कोंडाबाई नावाच्या महिलेला विचारले, ‘मावशी तुम्ही काय वेचता अहात? याचा तुम्हाला काय फायदा?’ ती बाई म्हणाली, ‘बाबा आम्ही प्लॅस्टिक, कागद, काच, लवा-लोखंड असं काही मिळालं तर ते शोधतो.’ ‘मग त्याचे काय करता?’, ‘हे आम्ही भंगारवाल्या मोहसिनभाईला विकतो.’ ‘तूम्हाला त्याचे किती पैसे मिळतात?’, ‘शंभर दोनशे कसे बसे मिळतात भाऊ.’ मावशी यापेक्षा भिक मागीतली तर काय वाईट? कशाला इतकी मरमर करता? इतक्या घाणीत हात घालता? 

त्या कोंडाबाईने या प्रश्नावर जे उत्तर दिले ते समाजाच्या तोंडात मारणारे होते, ‘भाऊ, भीक मागायचे कशाला सांगतूस. त्याला तरी मेहनत करावी लागतीया. छिनाली केली तर जास्तीचा पैसा फुकटच मिळतो. आमी इज्जतीची रोटी खातो भाऊ. पोटापुरतं भेटलं की बास झालं. पोटाखालचे बेकार धंदे करायची नियत नाही आपली.’ 

एक सामान्य बाई शहरातला कचरा वेचून त्यातून भंगार वेगळं काढते. ते विकून आपलं पोट भरते. तीला कुठलाही बोनस भेटत नाही. तिच्यासाठी कुठलीही योजना काम करत नाही. आज कोंडाबाईसारखी शेकडो बायका आणि मुले कचरा वेचित आहेत. कुणापाशीही भीक न मागता, कुठल्याही अनुदानाची मागणी न करता, कुठलीही सवलत न मागता स्वत: तर जगत आहेतच, आपले कुटूंब पोसत आहेत आणि शिवाय मोठ्या समस्येचा डोंगर उचलण्यासाठी जीवतोडून आपली करंगळी लावत आहेत. 

रस्ता, पाणी, कचरा यांसारख्या समस्या प्रचंड पैसा खर्च करून सुटता सुटत नाहीत. आंदोलन करून सुटत नाहीत. कायदेशीर मार्गाने गेलं तरी लवकर निकाल लागण्याची आशा नाही. अशावेळी जी माणसं आपल्या आपल्या छोट्यामोठ्या क्षमतेने या समस्या सोडविण्यासाठी पुढे येतात त्यांच्या पाठीशी जनतेने उभं राहिलं पाहिजे. 

एखाद्या गावात, वसाहतित, सहनिवासात (अपार्टमेंट) धार्मिक कार्यक्रम होतात, जेवणं घातली जातात त्याला काय सरकारच्या निधीची कोणी वाट पहाते काय? लोक वर्गणी गोळा करतात आणि हे उत्सव होतात. त्याप्रमाणे आता इतर समस्यांसाठी लोकांनी पुढाकार घेवून त्याची सोडवणुक केली पाहिजे. खरं तर यासाठीच लोकशाही व्यवस्था आपण स्विकारली होती. पण राजकीय पक्षशाही आणि त्यांना अनुकूल अशी नोकरशाही  यांनी सामान्यांच्या वाटेचा निधी आपल्या पोळीवर ओढून घेतला. आणि हे सगळं परत मतदानाद्वारे लोकांचा पाठिंबा मिळवून. 
एखाद्या घरात चोरी करायची असेल तर चोर कुत्र्याला एखादे हाडूक टाकतो. पण तूझ्या घरात चोरी करायची परवानगी दे म्हणून घरमालकाला हाडूक दाखवत नाही. इथं निवडणुकीत मतदाराला दिलेली लाच मग ती पैशाच्या स्वरूपात असो, आश्वासनाच्या स्वरूपात असो, जाहिराती करून दाखविलेल्या स्वप्नांच्या स्वरूपात असो  किंवा कुठल्याही अन्य स्वरूपात असो ही लाच म्हणजे प्रत्यक्ष घरमालकालाच दिलेले हाडूक आहे. हे हाडूक चघळत बस आणि आम्ही तूझे घर लुटत असताना शांत बसून रहा. असा हा कावा आहे.

काहीही कुठलीही मदत न घेता आपण आपला कचरा वेचून पोटही भरावे आणि समाजाची समस्या सोडविण्यास हातभारही लावावा अशी कोंडाबाईची साधी भूमिका इतर सामान्य माणसांनी स्विकारली पाहिजे. गेली साठ वर्षे आपल्या समस्या न सोडविणार्‍या आणि स्वत:च समस्या बनलेल्या शासनाला हळू हळू मर्यादित करून टाकलं पाहिजे. आवश्यक तेवढा शासकीय हस्तक्षेप ठेवून बाकीच्या अमरवेलीसारख्या वाढलेल्या आयतखाऊ फांद्या कापून टाकायची वेळ आली आहे. इज्जातीचे खाणारी सामान्य कोंडाबाई डोळ्यासमोर ठेवून आम्हीही गैर मार्गाने काम करणाऱ्या नेत्याला, अधिकाऱ्याला मुकपणे पाठींबा देऊन पापात सहभागी होणे नाकारले पाहिजे.

एका साध्या खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनाला वर्ष उलटलं तरी काहीही परिणाम होत नाही. तेंव्हा मोठ मोठी आंदोलन करणे आणि त्यामागे शक्ती खर्च करण्यापेक्षा जास्त डोकं लावून परिणामकारक उपाय शोधले पाहिजेत. 
      
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 21, 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे : चित्रपट नव्हे अनुभूती !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 ऑक्टोबर 2014 

चित्रपटातील प्रसंग आहे. हेमलकसा या आदिवासी भागात मलेरियाची साथ येते. भराभर आदिवासी मृत्यूमुखी पडायला लागतात. एक आदिवासी बाई कडेवर छोटं लेकरू घेवून ‘माझ्या पोराला वाचवा’ म्हणत रडत ओरडत येते. प्रकाश आमटे तिला शांत करतात. तिच्या बाळावर उपचार चालू करतात. पोराला लावायला सलाईन नसते. आता काय करायचे असा विचार करत असताना त्यांचा सहकारी एक सलाईनची बाटली घेवून येतो. ही कुठून आणली? असा प्रश्न विचारताच तो उत्तरतो की ज्या म्हातार्‍याला ही लावली होती तो मेला आहे. आता हीचा त्याला काय उपयोग? 

रात्रभरच्या वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत तो मुलगा वाचतो. त्याची आई पहाटे म्हणायला लागते, ‘याच्याकडे थोडावेळ लक्ष द्या. मी जरा जावून येते.’ आमट्यांचा सहकारी तिला जाऊ देत नाही. आत्ताच कुठे मुल वाचले आहे. आता तू कुठू निघालीस. पण ती बाई अस्वस्थपणे चुळबुळ करत राहते. शेवटी न राहवून ती प्रकाश आमटेंच्या टेबलापाशी येते. तेही दोन रात्रींपासून न झोपता रूग्णांची सेवा करत थकून गेले असतात. ही बाई भकास डोळ्यांनी उदास स्वरात सांगते, ‘साहेब मला जावून येवू द्या. जरा या लेकराकडे लक्ष ठेवा. माझा नवरा आधीच मेला होता. दोन लेकरं वाचावी म्हणून त्यांना घेवून पळत निघाले. एक लेकरू वाटेतच मेलं. त्याला झाडाखाली ठेवून आले. जनावरांनी खावू नये म्हणून त्याच्यावर काटे कुटे टाकून आले. आता जावून त्याला मातीआड करून येते. तोवर तूमी याकडे लक्ष द्या.’

या प्रसंगावर काय भाष्य करणार? अशाप्रसंगी व्यक्त करायची भाषा अजून जन्माला यायची आहे. आपण चित्रपट पाहतो आहोत, आजूबाजूला इतके लोक बसलेले आहेत हे सारे विसरून आपल्या डोळ्यातून अश्रुच्या  धारा वहायला लागतात. चित्रपट म्हणून या प्रसंगाची काय चिकित्सा करायची ते समीक्षक करो पण एक सामान्य प्रेक्षक मात्र या दृश्याने हादरून जातो. 

डॉ. प्रकाश बाबा आमटे : अ रिअल हिरो’ हा चित्रपट सामान्य प्रेक्षकांना हलवून सोडतो. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, आरडा ओरडीची भाषा न वापरता, भडकपणा न करता दिग्दर्शक समृद्धी पोरे हीने ही किमया साधली आहे.

नाना पाटेकर यांच्यावर विचित्रपणाचा, आक्रस्ताळी भाषा वापरण्याचा जो आरोप एरव्ही केला जातो तो पूर्णपणे खोडून काढत आपण कसे उच्च दर्जाचे अभिनेते आहोत हेच त्यांनी सिद्ध केले आहे. याचा उत्तम पुरावा म्हणजे चित्रपटातील एक प्रसंग. आपल्या आईवर अत्याचार करणार्‍या पोलिस अधिकार्‍याचा खुन करून सुड उगवणारा पुरू हा छोटा मुलगा आमटे दांपत्याच्या हाती लागतो. या मुलाला त्याचे आयुष्य या मार्गाने वाया जाईल म्हणून ते समजून सांगतात.  आमटेंच्या घराबाहेर नक्षलवादी येवून बसतात आणि मागणी करतात की हा मुलगा आमच्या ताब्यात द्या. तो आम्हाला जगू देणार नाही. या सगळ्या प्रसंगात नाना पाटेकर केवळ एकच वाक्य बोलतो ‘समझो वा मर गया’. ते नक्षलवादी निघून जातात. पुढे हा मुलगा मोठा होतो, परदेशात मोठ्या नौकरीवर लागतो. हा सगळा प्रसंग नाना पाटेकरने एका वाक्यावर तोलला आहे.
प्रकाश आमटे यांनी हेमलकश्यात उभे केलेले काम त्यांना मॅगेसेस पुरस्कार देवून गेले. तेंव्हा इतर सर्व गोष्टींना फाटा देवून नेमकेपणाने हाच विषय परिणामकारक पद्धतीने समृद्धी पोरे यांनी चित्रपटातून समोर आणला आहे.

आदिवासींसाठी काम करण्यासाठी एनजीओ चालविणे यावर मोठी टिका बर्‍याचदा केली जाते. अशा एनजीओजना मिळणारा मोठा परदेशी निधी या या टिकेचा मुख्य विषय असतो. बर्‍याच एनजीओ बाबत हे खरेही आहे. पण प्रत्यक्षात असे काम किती अवघड आहे. एक तर पुरेसा पैसा मिळत नाहीच, शिवाय सरकारी पातळीवरही अशा कामांची कशी उपेक्षा होते, अडवणूक होते याचे फार चांगले चित्रण चित्रपटात केल्या गेले आहे. 

काही अनाथ, जखमी झालेले प्राणी आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पात गोळा होतात. त्यांचे एक अनाथालय आपसुकच तयार होते. त्याची पहाणी करायला आलेला सरकारी अधिकारी मठ्ठ शासकीय व्यवस्थेचा नमुनाच असा दाखवला आहे जे की वास्तव आहे. ज्याला डिअर म्हणजे हरिण हे स्पेलिंगही कसे माहित नसते. ज्याची भाषा कशी अरेरावीची असते हा प्रसंग फार चांगला रंगवला आहे.

आदिवासींसाठी काम करताना अनंत अडचणी येतात तसे आनंदाचे क्षणही येतात. एका जख्ख म्हातारीच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असतो. ती महिनाभरापासून उपचारासाठी चकरा मारीत असते. पण शहरातून कोणी डॉक्टर तिच्यावर उपचारासाठी येत नाही. आणि तिला बाहेर नेणे शक्य नसते. शेवटी डॉ. प्रकाश आमटे स्वत: नेत्ररोग तज्ज्ञ नसताना तिच्यावर उपचार करण्याचे धाडस करतात. तिचे ऑपरेशन होते. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढताना सगळे श्वास रोखून पहात राहतात.आणि जेंव्हा ती सुरकूतल्या चेहर्‍याची म्हतारी दृष्टी आल्याच्या आनंदाने आपल्या हातातील लाकडी चमचा उचलून माडिया भाषेत काहीतरी उद्गार काढते तेंव्हा प्रेक्षकही त्या आनंदात सहज सामिल होवून जातात.

आजूबाजूचा निसर्ग आणि त्यात राहणारे अदिवासी यात रमणारे आमटे दांपत्यही निसर्गात मिळून मिसळून जातात. त्यांचे जे घर चित्रपटात दाखवले आहे ते फार सुंदर आणि त्यांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देणारे आहे. त्यांची मुलंही पुढे यातच रमून जातात. आमटेंच्या नातवाने शाळेत पाळीव प्राणी कोणते असा प्रश्न विचारल्यावर ‘वाघ, सिंह’ असं लिहीलं आणि मास्तरांनी त्याला कसे गुण दिले नाहीत. मग आमटे यांनी शाळेत जावून सांगितलं की खरंच आम्ही हे प्राणी पाळले आहेत असं नव्हे तर ते आमच्या कुटूंबाचाच कसा भाग आहेत. हा प्रसंग मोठा मजेदार उतरला आहे.  

सगळ्या चित्रपटभर प्रकाश आमटेंच्या थटेखोर स्वभावाची छाया पसरली आहे. हे श्रेय अर्थातच नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे आहे.  मंदा आमटेंचे काम करताना सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या हसतमुख चेहर्‍याने चांगली साथ दिली आहे. सगळ्या चित्रपटभर सोनाली कुलकर्णीच्या स्वच्छ परिटघडीच्या साड्या मात्र थोड्याशा खटकतात. थंडीत कुडकुडणार्‍या लहान मुलाला पाहून बीनबाह्याची बंडी आणि खाली चड्डी अशा साध्या वेषातच राहण्याचा संकल्प करणार्‍या प्रकाश आमटेंसोबत काम करताना आणि त्यातही वीजही न पोचलेल्या हेमलकश्यात वावरताना मंदाताईंचे कपडेही मळले असतील किंवा त्यांना एक साधेपणा आपोआपच आला असणार. पण ही फार छोटी गोष्ट आहे. आमटे नदीत आंघोळ करताना त्यांच्या बरोबर वाघही आंघोळ करतो. हा वाघ खरा नसून तो ऍनिमेशनने बनवला आहे. हे लक्षात येतं. पण यानं फार काही बिघडत नाही. खरं तर या चित्रपटाकडे चिपटाचे निकष लावून पाहता येणारच नाही. आमटेंच्या जिवनाची सामाजिक बाजू प्रकर्षाने मांडण्याचा काम हा चित्रपट करतो हेच महत्त्वाचे आहे. 

एरवी काही करत नाही म्हणून ज्याच्यावर टिका होते त्या महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला करमुक्त करून एक चांगले काम केले आहे. मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठी गर्दी करून आपल्या सामाजिक जाणिवांवर शिक्कामोर्तब केले आहे.

चांगले चरित्रात्मक चित्रपट मराठीत फार कमी आहेत. नुकताच जब्बार पटेल यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर आणि चंद्रकात कुलकर्णी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर  सुमार दर्जाचा चरित्रपट काढून मराठी प्रेक्षकांना  नाराज केले आहे. अतिशय ताकदीच्या या दिग्दर्शकांनी अपेक्षाभंग केला असताना समृद्धी पोरे या नविन तरूणीने एक अतिशय चांगला चरित्रपट द्यावा हा अनपेक्षीत सुखद असा धक्का आहे. चित्रपटात एकच गाणे आहे. लहान मुलांना शिकविण्याचा प्रयास करताना हे गाणे चित्रित झाले आहे. ही खरं म्हणजे एक प्रार्थना आहे. ती चांगली आणि समर्पक अशीच आहे. बाकी चित्रपटात गाण्यांना फारसा वावही नाही. बर्‍याचदा चरित्रपट कंटाळवाणे होत जातात. पण इथे तसं काही दिग्दर्शकिने होवू दिलं नाही. प्रकाश आमटे यांच्या जिवनातील निवडक प्रसंग घेवून चित्रपटाची गती चांगली ठेवली आहे. 

साध्या भाषेत आदिवासींच्या प्रश्‍नांची दाहकता आपल्यासमोर हा चित्रपट मांडतो. नक्षलवाद्यांची समस्या अतिशय त्यांची बाजू न घेता पण त्यांच्या बाजूचा विचार करून इथे मांडली आहे. शासनाने करमुक्त केलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी जरूर पहावा.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 14, 2014

लता गाते शमशाद, गीता, आशा सोबत तेंव्हा...

                       दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 ऑक्टोबर 2014 

(राज कपूरच्या  चित्रपटासाठी गीता चा आवाज कधीच वापरला गेला नाही. जिस देश मे गंगा बेह्ती हे या चित्रपटात मात्र गीता चा आवाज होता. त्या प्रसंगी लता गीता आणि राज कपूर असे दुर्मिळ छायाचित्र ....) 


लता मंगेशकर यांचा उल्लेख नुसता लता करण्यात कुणाला लेखकाचा उद्धटपणा दिसू शकेल. पण ही सलगी लता मंगेशकर नावाच्या व्यक्तीसाठी नसून त्या स्वर्गीय सुरांसाठी आहे. जसे की तुकारामाबद्दल आपण बोलतो ते त्या शब्दांशी आपला जिव्हाळा असतो म्हणून. आईच्या नातेवाईकांना नाही का आपण हक्कानं अरे तूरे म्हणतो तसेच या सलगीचे- जिव्हाळ्याचे स्वरूप आहे. 

नुकताच लताचा वाढदिवस होवून गेला. (जन्म 28 सप्टेंबर 1929). लताबद्दल प्रचंड प्रमाणात लिहीलं गेलं आहे. तिच्या आवाजाचे विश्लेषण बर्‍याचजणांनी केलं आहे. हे सगळं करत असताना काही एक दंतकथा खर्‍याखोट्या पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या. यात एक मुद्दा नेहमी मांडला जातो तो म्हणजे लताने राजकारण करून सोबतच्या गायिकांना कसे पुढे येवू दिले नाही. खरं तर गाणं ही सादरीकरणाची कला आहे. लताच्या समकालीन सर्वच गायिकांचा आवाज आपल्याला ऐकायला उपलब्ध आहे. तेंव्हा दुसर्‍या कोणी काही सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष ऐकून काय ते ठरवू शकतो. 

लताने आपल्या काळात जी गाणी गायिली त्यात या समकालीन गायिकांसोबत गायिलेली गाणीही आहेत. ती ऐकताना लता आणि समकालीन गायिका यांची आपण तूलना सहज करू शकतो. पण अशी तुलना करण्यापेक्षाही यातील काही सुंदर गाणी निवडून त्यांचा आनंद घेणे हे जास्त चांगले. 

हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची पद्धत खर्‍या अर्थाने रूजविणारी पहिली मोठी गायिका म्हणजे शमशाद बेगम (जन्म १४ एप्रिल १९१९). त्या काळात नुरजहा, सुरैय्या यांसारख्या अभिनेत्री-गायिका होत्या नुसत्या गायिका नव्हत्या. पुरूषांचेही तसेच सैगल, श्याम सारखे गायक-नट होते. लताच्या आधीपासून शमशाद गात होती आणि पार्श्वगायनास प्रतिष्ठा मिळवून देण्यात तीचा मोठा वाटा होता. लता आणि शमशाद यांचे मिळून जवळपास तीस तरी गाणी आहेत. 

1949 मध्ये शंकर जयकिशनने संगीताचा बाज बदलला. नवीन नायिकासाठी नवीन आवाजांची गरज होती. नर्गिस, वैजयंतीमाला, मधुबाला या नव्या नायिकांना शमशादचा आवाज शोभून दिसत नव्हता. तिथे लता-आशा-गीताचाच आवाज आवश्यक वाटायला लागला. पण शमशादच्या आवाजाला एक विशिष्ट पोत आहे. लोकसंगीतासाठी लागणारा खडा आक्रमक असा हा आवाज त्या  शैलीतील गाण्यात फारच शोभून दिसतो. लता-शमशाद यांचे सर्वोत्तम गाणे मोगल-ए-आजम (1960) मधील ‘तेरी मेहफील मे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ हे आहे. या लोकप्रिय कव्वालीत प्रेमाचे शारिरपातळीवर समर्थन करताना निगार सुलातासाठी शमशाद आणि प्रेमाचे मानसिक पातळीवर समर्थन करताना मधुबालासाठी लता असे आवाज वापरून शकिल बदायुनीच्या शब्दांचे चीज नौशाद यांनी केले आहे. खडा खणखणीत मोकळा आवाज आणि पातळ कोवळा स्वरांची बारीक कलाकुसर करणारा आवाज यांची एक जुगलबंदीच आपल्याला अनुभवायला मिळते. यात कोण मोठे कोण छोटे असं काही आपल्या मनात येतच नाही.

लताची समकालीन दुसरी गायिका गीता दत्त (जन्म 23 नोव्हेंबर 1930). गीता  आणि लता यांनी जवळपास 19 गाणी सोबत गायली आहेत. या दोघींच्या गाण्यातील चार गाणी फारच सुंदर आहेत. पहिले गाणे लडकी चित्रपटातील (1953) मधील आहे. आर सुदर्शन व धानीराम या अपरिचित संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. या चित्रपटातील जास्त गाणी सी. रामचंद्र यांच्या नावावर आहेत. पण त्यांनी मात्र गीताचा आवाज वापरला नाही. ‘मन मोर मचावे शोर घटा घनघोर छायी घिर घिरके’ असे राजेंद्र कृष्ण यांचे गीताचा गोडवा वाढविणारे बोल आहेत. तरूण कोवळ्या वयाची दोन वेण्या घालणारी डोक्याशी रिबीनीचे फुल बांधणारी वैजयंतीमाला हीच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे.  

लता-गीताचे दुसरे सुंदर गाणे ‘तुफान और दिया’ या चित्रपटातले आहे. वसंत देसाई यांनी लहान बहिण भावांवरती बेतलेले हे गाणे भरत व्यास यांनी लिहिले आहे. याचे शब्दच किती लयबद्ध आहेत-‘मेरी छोटीसी बहन, देखो गहने पहन, ससूराल चली रे बन ठन के’ वसंत देसाई यांनी एका ठिकाणी मुलाखतीत सांगितले की भरत व्यास यांचे शब्द स्वत:च एक चाल घेवून येतात. खरंच भरत व्यास यांच्यासारखा अनुप्रास कुणीच वापरला नाही. 

मदन मोहनने संगीतबद्ध केलेल्या ‘देख कबीरा रोया’ (1957) मधील ‘हम पंछी मस्ताने’ हे मस्तीखोर गाणे लता-गीताच्या आवाजात आहे. शुभा खोटे आणि अमिता यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे. साड्यांचे पदर कमरेला खोचलेले, शुभा खोटे माऊथ ऑर्गन वाजवित आहे, वेण्यांचे शेपटे उडत आहेत, बाजूला समुद्राच्या लाटा खळाळत आहेत आणि इकडे लता-गीताचे सुरही हिंदकळत आहेत. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीतातील एक ओळ बघा, लता गाते आहे ‘धरती को छोड के पिछे बादल के पार जाना है’ आणि त्याला गीता उत्तर देते ‘चुन चुन के शोख तारोंको एक आशिया बनाना है’. रसिकांच्या मनात या दोघीं स्वरांचा सुंदर आशिया निर्माण करतात. लता-गीताचे सर्वात सुंदर गाणे वसंत देसाई यांच्या ‘गुंज उठी शहनाई’ मध्ये आहे. या गाण्याचे शब्द भरत व्यास यांचे आहेत. ‘आखिया भूल गयी है सोना, दिल पे हुआ है जादू टोना, शहनाईवाले तेरी शहनाई रे कलेजवा को चीर गयी चीर गयी ची ऽऽऽऽ र गयी..’ या शब्दांमध्ये जो खट्याळपणा आहे तो गीता दत्त च्या आवाजात जास्तच उठून दिसतो. गाण्याची सुरवातही गीताच्याच आवाजाने झाली आहे. लताचा आवाज हा गीताच्या खट्याळपणाला पोषक असा आहे. इतरवेळी गीताचा आवाज पोषक भूमिकेत वापरला आहे. इथे उलटे झाले आहे. 

लता-आशा या तर आवाजाची जातकुळी तपासली तरी बहिणी आहेत हे सिद्धच होते. दोन स्त्रीयांच्या आवाज वापरायचे तर त्यातील एक आवाज पुरूषी तत्त्वासारखा वापरायची त्या काळात पद्धत होती. म्हणजे तो थोडा जाडसर, मोकळा, टिपेचा वगैरे असावा. त्याप्रमाणे शमशाद, मुबारक बेगम अगदी गीताचाही वापरला आहे. पण लता किंवा आशा यांचा आवाज असा कधीच कुठल्याच संगीतकाराने पुरूषी तत्त्वाने वापरला नाही. लता आणि गीता यांच्या आवाजातील मोहकता गोडवा खट्याळपणा चपळपणा असं सगळं घेवून तयार झालेलं एक अफलातून मिश्रण म्हणजे आशाचा आवाज. लता-आशा अशी जवळपास साठ गाणी हिंदी चित्रपटांत आहेत. त्यातील सर्वांत सुंदर गाणं म्हणजे उत्सव (1985) मधील ‘मन क्यु बहेका रे बहेका आधी रात को’ हे होय. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वसंत देव यांच्या शब्दांना जे काही रूप दिलं आहे त्याला तोडच नाही. रेखा आणि अनुराधा पटेल यांनी हे गाणं पडद्यावर साकार केलं आहे. एका कडव्यात रेखा संपूर्ण दागिन्यांसह असते तर सोबत अनुराधा साध्या वेशात आणि पुढच्या कडव्यात अनुराधा संपूर्ण साजशृंगारात तर रेखा साध्या कपड्यांत. तसाच लता आणि आशाचा सूर लागलेला आहे. या गाण्याचे ध्वनीमुद्रणही अप्रतिम झाले आहे. राजन साजन मिश्रा यांचे गाणे म्हणजे कसे तर एक जिथे सोडतो तिथून दुसरा उचलतो. दुसरा जिथपर्यंत आणून सोडता तिथून पहिला पुढचा प्रवास चालू करतो. लता-आशा यांच्या आवाजाचे असेच स्वरूप आहे. गरज आहे तिथे हे आवाज मिसळून जातात, गरज आहे तिथे आपले वेगवेगळे अस्तित्व स्पष्टपणे सिद्ध करतात. 

मुबारक बेगम सोबत लताचे एकच गाणे आहे. बारादरी (1955) चित्रपटात शौकत देहलवी नाशाद या संगीतकाराने या दोघींचा आवाज वापरला आहे. पण हे गाणे फार काही विशेष नाही. सुमन कल्याणपुर आणि लता यांचेही एकच गाणे आहे. चांद चित्रपटात (1959) हेमंतकुमार यांच्या संगीताने नटलेले हे एक नृत्य गीत आहे. सारख्या वेशातील दोन नर्तिकांवर हे गाणे चित्रित केले आहे. लताच्या आवाजाची छायाच सुमन कल्याणपूर आहे हे जणू संगीतकाराला सुचवायचे आहे. हे गाणेही फारसे विशेष नाही. ममता (1966) मध्ये रोशन ने लता-सुमन-रफी असे एक सुंदर गाणे ‘रहे ना रहे हम’ गावून घेतले आहे. पण यातही लताच्या आवाजात हे गाणे स्वतंत्र आहे. तर सुमन-रफी असे द्वंदगीत आहे. कदाचित त्या काळी लता रफी सोबत गात नसल्यामुळे अशी तडजोड करण्यात आली असावी. प्रत्यक्षात लता व सुमन एकसाथ असे या गाण्याचे स्वरूप नाही. 

लताच्या 85 व्या वाढदिवशी तिच्या जून्या गाण्यांचा धांडोळा घेणे फारच आनंददायी आहे. प्रत्यक्षात हिंदी चित्रपट संगीतातील राजकारण जे असायचे ते असो, रसिकांच्या कानात मात्र सुरांचे माप सर्वच कलाकारांनी भरभरून टाकलं आहे. 1949 ते 1965 हा काळ हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ. या काळातील सर्वात प्रभावी आवाज लताचा आणि सर्वात प्रभावी संगीत शंकर जयकिशनचे होते हे दर्जा आणि संख्या दोन्हीच्या पातळीवर खरे आहे.  
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
तेरे मेहफिल मे, अखिया भूल गायी हे सोना, मन क्यू बेहाका या तीन गाण्याची link.....
http://www.hindigeetmala.net/song/teri_mahafil_men_kismat_aazamaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/akhiyan_bhul_gayee_hain_sona.htm
http://www.hindigeetmala.net/song/man_kyon_bahakaa_re_bahakaa.htm

Tuesday, October 7, 2014

बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात


                    दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 ऑक्टोबर 2014 

औरंगाबाद शहरातील प्रसंग आहे. कवी वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सादर करीत असताना ‘बगळ्यांची माळ फुले’ हे गाणे मरावाड्यातील सुरेल गायक संजय जोशी यांनी गायला सुरवात केली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांतांना जावून 23 वर्षे उलटून गेली.  6 ऑक्टोबर 1913 हा कांतांचा जन्मदिवस. आज कांत असते तर ते 101 वर्षांचे असते. कांतांच्या कविता त्यांच्या 9 कवितासंग्रहातून मराठी वाचकांच्या समोर आहेत. पण त्यांची आठवण रसिकांना सारखी येत राहते ती ‘त्या तरूतळी विसरले गीत’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’, ‘सखी शेजारणी तू हसत रहा’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले’ आणि अर्थातच ‘बगळ्यांची माळ फुले’ सारख्या गीतांमुळे.

नांदेडात जन्मलेल्या कांतांनी निजामी राजवटीत शेतकी खात्यात साधा कारकून म्हणून आपल्या नौकरीची सुरवात केली. पुढे आकाशवाणीच्या मराठी विभागात हैदराबाद व नंतर औरंगाबाद येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कांत निवृत्त झाले. ही झाली त्यांची साधी व्यवहारीक माहिती. पण साहित्याच्या क्षेत्रात कविता, अनुवाद, नाट्य-काव्य अशी किमान 18 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शासनाचे पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरव वृत्ती, साहित्य-कवी संमेलनाची अध्यक्षपदे असे कितीतरी सन्मान कांतांच्या वाट्याला आले. सतत लिहीत राहिलेल्या या कविने एका ठिकाणी मोठं विलक्षण लिहून ठेवलं आहे. 

गाते कोण मनात कळेना 
गाते कोण मनात ॥
जरी शतावधि कविता लिहिल्या
शंभरदा वाचिल्या गाइल्या
शब्द कुणाचा सूर कुणाचा 
अजूनी मला अज्ञात ॥
अभिमानाने कधी दाटता
रचिले मी हे गाणे - म्हणतां
गीतच रचिते नित्य तुला रे - 
फुटे शब्द हृदयांत ॥
मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 58)

कलेच्या प्रांतातील एक शाश्वत सत्यच कांतांनी लिहून ठेवलंय. आपण कला निर्माण करतो असे नाही तर कलाच आपल्याला कलाकार म्हणून घडवित असते. कलेविषयी एक जाणिव कायम त्यांच्या मनात ताजी असायची. मावळते शब्द या आपल्या शेवटच्या काव्यसंग्रहात त्यांनी सुरवातीला ऋग्वेदातील एक ऋचेचा (ऋग्वेद, 2-28-5) भावार्थ दिला आहे.
 
मी विणितो गाणे तंतु नको रे तोडू
सम येण्याआधी ताल नको रे सोडू

कुठल्याही कलाकाराची परमेश्वराचरणी हीच प्रार्थना असते की मी विणित असलेल्या गाण्याचे धागे तुटू देऊ नकोस. सम येण्याआधी म्हणजेच परिपूर्तता होण्याआधीच हा जो ताल जुळून आला आहे तो सोडायला लावू नकोस. 

कांतांचे आयुष्य तसे परिपूर्ण होते. 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. (मृत्यू 8 सप्टेंबर 1991) त्यांचे कवितासंग्रह मौजेसारख्या मान्यवर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले. वसंतराव देशपांडे, अरूण दाते, सुधीर फडके सारख्यांनी त्यांच्या गीतांना स्वर दिला. यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यासारखे प्रतिभावंत संगीतकार त्यांना लाभले.

कुठलाही प्रतिभावंत निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने हरखून जातो. कांतही याला अपवाद नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता आजही किती ताजी टवटवीत वाटते. 

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हांत
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे  
(मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 33)

आभाळाचे गाणे झाल्याचा अनुभव आपलं काळीज कलाकाराचं असेल तरच येतो. बा.भ.बोरकर, पांडगांवर, महानोर यांच्यासारख्यांनी मराठीत खुप समृद्ध अशी निसर्ग अनुभवाची कविता लिहीली आहे. कांतांची ही कविता याच समृद्ध परंपरेतली आहे.

अनुवादाचे फार मोठे काम कांतांनी केले. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यशपाल शर्मा यांची  ‘मनुष्याची रूपं’  ही हिंदी कादंबरी, मौलना अब्दूल हलीम शर्र यांची उर्दू कादंबरी ‘कालचे लखनौ’, रफिक झकेरिया यांची इंग्रजी कादंबरी ‘सुलतान रझिया’, राजेंद्रसिंह बेदी यांची कादंबरी ‘एक चादर मैलीसी’असे महत्त्वाचे अनुवाद कांतांनी मराठीत केले. मिर्जा गालिबवरच्या हैदर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही त्यांनी मोठ्या रसाळतेने केला. गालिबच्या बर्‍याच कविता त्यांनी मराठीत आणल्या. नाट्यकाव्य हा एक अतिशय दुर्लक्षित काव्यप्रकार कांतांनी मोठ्या ताकदीने हाताळला. पंचेविसच्या जवळपास नाट्यकाव्य त्यांनी लिहीली. मराठीत इतकी नाट्यकाव्य कुणाच्याच नावावर नाहीत.

आज कांतांच्या माघारी आपल्या हातात आहे ती त्यांची कविता, गाणी, नाट्यकाव्य आणि त्यांचे अनुवाद. कुठल्याही कलाकाराला आपण आपल्या कलेच्या रूपाने रसिकांच्या स्मरणात राहू याचा विश्वास असतो. कांतांनीही आपल्या दोनुली या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ नावाने छोटेसे चिंतन या संदर्भात लिहून ठेवले आहे. ते मोठे समर्पक आहे. 

साठविता डोळा । सूर्यनारायण ।
उडावे हे प्राण । अचचित ॥
जळात उन्हात । पाखरांच्या माळा ।
बिंबाचा सोहळा । प्रतिबिंबी ॥
सहज गळावे । देहाचे या भान ।
पिकलेले पान । तळ्यामध्ये ॥
बिंबतात झाडे । तीरीची पाण्यात ।
तसे कवितेत । नांदो आम्ही ॥
(दोनुली, मौज प्रकाशन, पृ. 16)

त्यांच्या कवितेत कांत अजूनही नांदत आहेत. कांतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता एकत्रित प्रकाशीत होण्याचा संकल्प करण्यात आला होता. हे पुस्तक लवकरच प्रकाशीत होते आहे. 6 ऑक्टोबर या कांतांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे छोटेसे स्मरण. 
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात ।
अजूनही कांत तूम्ही आमच्या स्मरणात । 
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, September 30, 2014

संगीत बारी - ‘ती’ची कथाच न्यारी

 
दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 30 सप्टेंबर 2014 

मोहनाबाई म्हाळंग्रेकर, सानिया श्रीराम कोलते पाटील, इरफान अब्दूल सत्तार पठाण ही तीन नावं वेगवेगळी आहेत असं कुणालाही वाटू शकेल. प्रत्यक्षात मोहनाबाई या आईच्या पोटी जन्मलेले सानिया आणि इरफान ही सख्खी भावंडं आहेत. दोघांचेही वडिल एकच आहेत. असं सांगितलं तर ऐकणारा बावचळून जातो. पण हे वास्तव आहे. बीनकामी नवर्‍याला धिक्कारून स्वत:च्या जिवावर पोरं मोठं करणार्‍या, आपल्यासोबत कितीतरी नाचणार्‍या मुलींना पोटपाण्याला लावणार्‍या कळवातणी समाजात जन्मलेल्या मेहरून्नीसा उर्फ मोहनाबाई म्हाळंग्रेकर या लावणी कलावंतीणीची ही कहाणी भूषण कोरगांवकर या व्यवसायानं चार्टर्ड अकौंटंट असलेल्या तरूणानं तळमळीनं लिहीली. त्या निमित्तानं मोहनाबाई कार्यरत असलेल्या ‘संगीत बारी’ या कलाक्षेत्राबद्दल इतरही माहिती गोळा केली. कित्येक लावणी कलावंतीणीना ते भेटले. त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले. या सगळ्यातूनच ‘संगीत बारी’ या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

मोहनाबाईंच्या निम्मीताने भूषण कोरगांवकर यांनी संगीत बारीची सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती मराठी वाचकांना दिली आहे. लावणी, तमाशा, वेश्या व्यवसाय यांत नेहमीच गोंधळ घातला जातो. तमाशात नाचणारी बाई ही नक्कीच वेश्या व्यवसाय करणारी असणार असा समज सर्वत्र पसरलेला आहे. या स्त्रीयांनाही घरदार आहे, त्यांच्या जातीत (कळवातू, भातू कोल्हाटी, डोंबारी आदी..) त्यांना इज्जत आहे.  त्यांचे त्यांचे म्हणून काही नितीनियम आहेत (उदा. डोंबारी समाजातील मुलींना लग्न करता येते पण ते डोंबारी जातीतील माणसाशीच करावे लागते) हे फारसे कुणाला माहित नाही.

‘‘संत कान्होपात्रा, मस्तानी या सार्‍यांचे आम्ही वंशज, आम्ही कळवात समाजातले. आम्ही धर्मानं मुसलमान असलो तरी हिंदू धर्माचे सगळे रीतिरिवाज पाळतो. रोजची देवपुजा, श्रावणातली पुजा, गणपती सगळं करतो सोबत दर्ग्यात जावून नमाज बी पढतो. नऊवार नेसून टिकली लावून नाचतो. दर 7-8 हिंदू मुलीमागं एक आमची मुलगी आहे. पण आमच्यात तसे भेदभाव नाहीत. ’’ मोहनाबाईंच्या या साध्या शब्दांमध्ये मोठ मोठ्या समाजसुधारकांना जे व्यक्त करता आलं नाही ते सांगायची ताकद आहे. 

आपले वडिल अब्दूल सत्तार पठाण यांनी कव्वाली शैलीत बांधलेली गझल मोहनाबाई सादर करतात

मुझे फुंकने से पहले 
मेरा दिल निकाल लेना
ये किसी और की है अमानत 
कही साथ जल ना जाये..

श्रोत्यांना वाहवा, माशाअल्लाह अशी दाद देताच त्या थांबतात, ‘‘मला जाळणार नाहीत, दफनच करणार हैत, तरीसुद्धा तूम्हाला सांगते..’’

संगीत बारी म्हणजे स्वत: गाऊन त्यावर नाच करणे. आर्यभुषण थिएटर, पुणे येथे मोहनाबाईंची पार्टी नियमित नाचण्यासाठी असायची. तेथे वेगवेगळ्या संगीत पार्ट्या आपली कला सादर करतात. तिकीट काढून येणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी जशी ही कला खुली आहे तशीच छोट्या बैठकासुद्धा येथे होतात. त्यासाठी ठराविक रक्कम मोजली जाते. त्या बैठकी मर्यादित लोकांनाच प्रवेश असतो. या सगळ्या प्रकारात कुठेही शरिरविक्रीचा व्यवसाय केला जात नाही. शिवाय एखादा ‘मालक’ ठेवला तर त्याशिवाय दुसर्‍या कुठल्याही पुरूषाशी त्या स्त्रीचा संबंध येत नाही. अशा कितीतरी स्त्रियांनी आपल्या आपल्या पुरूषासोबत संबंध ठेवून आपली कला जपली आहे. 
लावणी नृत्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते. कुठल्याही कलाकाराला रियाजासाठी जे काही करावं लागतं तसंच लावणीसाठीही करावं लागतं. मोहनाबाईंनी आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना लालबागच्या हनुमान थिएटरच्या आठवणी सांगितल्या आहेत. ‘‘त्या काळी कलेला किंमत होती. त्यामानाने रूपाला कोणी फारसे मोजीत नव्हते. मधु कांबीकरचा अपवाद वगळात या क्षेत्रातील बाकी स्त्रीया यमुनाबाई, ताराबाई, लक्ष्मीबाई, सरोजाबाई, शोभाबाई या काही फार सुंदर वगैरे नव्हत्या. पण एकदा का त्या गायला, नाचायला उतरल्या की त्यांचं रूपच पालटून जायचं.’’

नाचणार्‍या मुली म्हणजे स्वत:ची काळजी घेत नाहीत, काहीही खातात, त्यांना कसलेली रोग होतात आणि त्या हलाखीत मरून जातात असे एक चित्र रंगवलेले असते. याला  कोरगांवकरांच्या लिखाणाने तडा दिला आहे. त्वचा, केसांची निगा या मुली कशा उत्तम घेतात, वैयक्तिक स्वच्छता उत्तम राखतात हे त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा हवाला देवून लिहीलं आहे. भाकरी, चपाती, भात, डाळ, दोन भाज्या, उसळी, कोशिंबिर, चटणी असं चारीठाव साधं पण सकस जेवण या मुली नियमित घेतात. अन्यथा दारू, मांसाहार, तिखट आणि मसालेदारच त्या खात असतील असा गैरसमज पसरलेला आहे.

नाचगाणी करणार्‍या मुलींची लग्न होतात का? त्यांचे संसार सुखाचे होतात का? असला प्रश्न सामान्य माणसांना नेहमीच पडतो. वर्षा संगमनेरकर यांचे ठसठशीत उदाहरण या पुस्तकात सांगितलं आहे. सीआयडी ऑफिसरचा मुलगा असलेला पराग चौधरी या युवकाशी त्यांचे प्रेम जुळले. त्याने घरच्यांशी वर्षाबाईंशी लग्न करण्याचा निश्चय सांगितला. त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं रहायचं ठरवलं. गेली पंचेवीस वर्षे वर्षाताई वैवाहिक आयुष्य जगत आहेत शिवाय कलेची सेवाही करत आहेत. 

लावणी कुठे कुठे सादर केली जाते? संगीत बारी, ढोलकी फडाचा तमाशा, बॅनर शो आणि टीव्ही-चित्रपटात अशा चार ठिकाणी लावणी सादर होते. ढोलकी फडाचा तमाशा हा सर्वात जुना प्रकार. त्याला एक मोठी परंपरा आहे. शहरी प्रेक्षकांसाठी बॅनर शो हा सोयीचा प्रकार आहे. जगदीश खेबुडकरांनी गावरान मेवा नावाने बंदिस्त सभागृहात लावणीचे कार्यक्रम सुरू केले 1970 मध्ये. त्यातूनच बॅनर शो हा प्रकार सुरू झाला. मीना नेरूरकर यांनी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नावाने लावणीचे भरपूर प्रयोग करून लावणी लोकप्रिय केली. ‘नटरंगी नार’, ‘सोळा हजारात देखणी’, ‘ढोलकीच्या तालावर’ अशा कार्यक्रमांतून सुरेखा पुणेकर, माया जाधव यांना अफाट लोकप्रियता मिळाली. 

या क्षेत्रातील मुली आता कलाक्षेत्रात स्थिरावू लागल्या आहेत. लावणी म्हणजे गायन आणि नृत्याचे अप्रतिम मिलन.  नुसतं गाणं येवून किंवा नुसता नाच येवून भागत नाही. पण आजकाल गाणं आणि नृत्य वेगवेगळं होवू पहात आहे. नाचणार्‍या मुलींना चांगली प्रतिष्ठा मिळू लागली आहे. आरती अंकलीकर सारख्या शास्त्रीय संगीतातील प्रतिष्ठीत गायिका ‘उगवली शुक्राची चांदणी’ म्हणतात तेंव्हा लावणीच्या प्रतिष्ठेत भरच पडते असे निरिक्षण कोरगांवकर यांनी नोंदवले आहे.

संगीत बारी पुस्तकात पारंपरिक लावण्यांची काही उदाहरणं दिली आहेत. मारूबिहाग रागावर आधारीत 

पाहूनिया चंद्रवदन 
मला साहेना मदन
ओळखली खचित खचित 
खूण तुमच्या नेत्राची

किवा मिश्र पिलू रागावर आधारलेली साध्याभोळ्या मराठा शिपायाचं वर्णन करणारी ही लावणी

पंचबाई मुसाफिर अलबेला
भरजरी पोषाख हातामधी भाला
शिपाई सजला, रंगिला फाकडा, 
शोभे गुलाबी पटका

शाहिर परशुराम यांची अध्यात्मिक लावणीही यात दिलेली आहे. 

दहा शिंदळक्या करीन परंतु 
एक लग्नाचा नको नवरा 
माहेरी माझे चितमन रमले
माहेरचा नलगे वारा

कोरगांवकर यांनी पारंपरिक लावण्यांसोबत आधुनिक लावण्याही आवर्जून दिल्या आहेत. 
कुठलीही शब्दबंबाळ भाषा न वापरता अतिशय वस्तुनिष्ठपणे कोरगांवकर यांनी संगीत बारी मराठी वाचकांसमोर शब्दांतून उभी केली आहे. अकलूजची लावणी स्पर्धा या क्षेत्रात मोठी मानाची समजली जाते. मंदाकिनीबाई डिंगोरेकरांनी आपल्या या कलेबद्दल एक मोठी सुंदर लावणीच सादर केली होती. 

मराठमोळी कला ही न्यारी
बिचकून जाऊ नका
लावणी विसरू नका हो पाव्हणं
लावणी विसरू नको

मराठी माणूस लावणी कला विसरणार नाही याची खात्री या क्षेत्रातील नविन कलाकारांना पाहून वाटते असे निरिक्षण भूषण कोरगांवकरांनी मांडले आहे. संगीत बारी हे पुस्तक वाचून लक्षात येते, ‘संगीत बारी... ‘ती’ची कथाच न्यारी !’

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Tuesday, September 23, 2014

प्लॅस्टिकचा कचरा... परत वापरा !!


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 23 सप्टेंबर 2014 

एक तिशीतला तरूण मोटारसायकलवरून चालला आहे. मागे त्याची बायको बसली आहे. समोर छोटे मुल आहे. आपली गाडी तो थोड्याश्या मोकळ्या जागी थांबवतो. एक प्लॅस्टिकची खच्चून भरलेली पिशवी मोकळ्या जागेत फेकून देतो आणि वेगाने निघून जातो. या प्लॅस्टिकच्या पिशवीत काही नाही निव्वळ कचरा भरलेला असतो. एका साध्या कृतीने पुढे न सुटणारी प्लॅस्टिकच्या कचर्‍याची समस्या तयार होते हे त्या तरूणाच्या किंवा आपल्या कुणाच्याच गावी नसते.

आज जगभरात आणि विशेषत: भारतात कचरा ही एक फार मोठी समस्या होवून बसली आहे. आणि त्यातही परत प्लॅस्टिक हा विषय जास्त गंभीर आहे. पर्यावरणवादी तर प्लॅस्टिक हे नाव जरी काढले तरी डोक्याला हात लावून बसतात. या प्लॅस्टिकचे काय करावे हे भल्या भल्या माणसांना उमजेनासे झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य माणसाला परवडते म्हणून त्याचा वापर वाढतो आहे हे खरे आहे. आणि दुसरीकडे या प्लॅस्टिकचे कचर्‍यात रूपांतर झाले की त्याची न सुटणारी समस्या तयार होते हेही खरे आहे. 

छोट्या गावांमध्ये त्या मानाने प्लॅस्टिकचा कचरा कमी तयार होतो. शिवाय गावची एकूण लोकसंख्या, रहदारी, सांड पाण्याचे मर्यादीत प्रवाह हे सारे पाहता कचर्‍याची समस्या तेवढी गंभीर बनतही नाही. पण शहरांमधून मात्र चित्र भयावह बनत चालले आहे. जाग-जागी कचर्‍याचे ढिग साठलेले. प्लॅस्टिच्या पिशव्यांमुळे अडून बसलेले सांडपाणी, मोठ्या नाल्यांचा प्रवाह तुंबून पाणी पुलावरून वहात आहे, नाक आणि जीव मुठीत घेवून लोक आपल्या गाड्या असल्या रस्त्यांवरून नेत आहेत. या कचर्‍यामुळे डासांचे प्रमाण वाढणार आणि डेंग्यूसारखे रोग होणार. औरंगाबादसारख्या शहरातील रूग्णालये डेंग्यूच्या रोग्यांनी तुडूंब भरली आहेत.

आपली एक साधी कृती आपल्याला भयानक समस्येच्या कडेवर नेऊन उभी करते. प्लॅस्टिकचा वापर कमी करा म्हणत सर्वचजण कानीकपाळी ओरडत असतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जर वापर कमी होत नसेल तर निदान निर्माण होणारा कचरा तरी कमी करा. त्याचे नीट व्यवस्थापन करा इतकाच उपाय हाती उरतो. 

अतिशय भयानक समस्या निर्माण करणार्‍या या प्लॅस्टिकचा एक गुणधर्म म्हणजे त्याचा पुनर्वापर करता येवू शकतो. याबाबीकडे औद्यागीक विश्वाने लक्ष दिले आणि आपल्या क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा परत वापरायला सुरवात केली आहे. मोठ मोठ्या उद्योगांमधून कचर्‍याचा, भंगाराचा लिलाव केला जातो. त्याची वर्गवारी करून त्यातून प्लॅस्टिक वेगळे काढले जाते. या प्लॅस्टिकचे बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यांना वितळून त्याचे दाणे बनविले जातात. या दाण्यांपासून परत प्लॅस्टिकच्या हव्या त्या वस्तू साच्याचा वापर करून बनविल्या जातात. एक्सट्रूजन (extrusion) असे नाव या प्रक्रियेचे आहे. 

सार्वजनिक पातळीवर मात्र या प्रक्रियेचा फारसा विचार केला गेला नाही. आपल्या घरातील कचरा आपण दारात नेवून ठेवतो. तो महानगर/नगर पालिका/पंचायत जसा जमेल तसा उचलते. नाही कोणी उचलला तर आपण दुसरीकडे नेवून टाकतो. कचरा उचलणार्‍या बायका/मुले अशा कचर्‍यातून आपल्या कामाचे काय सापडते याचा शोध घेतात.

कचर्‍यातील वस्तूंची कागद, धातूचे तुकडे, काच आणि प्लॅस्टिक अशी वर्गवारी केली जाते. या सगळ्याला छोटी मोठी किंमत देवून भंगार व्यापार करणारे विकत घेतात. त्यांच्यातही गट पडलेले असतात. प्लॅस्टिकचा व्यापारी, पुठ्ठ्यांचा व्यापारी, खताच्या पिशव्यांचा व्यापारी, कागदाचे व्यापारी, लवालोखंडवाले असे प्रकार आहेत.

कचर्‍याला जर किंमत आहे, त्याची खरेदी होते तर मग कुणालाही साधा प्रश्न पडेल- रस्त्यांवर कचर्‍याचे ढिग तेही विशेषत: प्लॅस्टिकच्या पिशव्या का दिसतात? याचे साधे कारण म्हणजे त्यांना लागलेली घाण. प्लॅस्टिकची भंगारमध्ये खरेदी केली जाते हे खरे आहे. पण हे अर्धसत्य आहे. स्वच्छ केलेले कोरडे प्लॅस्टिक असेल तरच ते स्विकारले जाते. खराब प्लॅस्टिक आणि तेही विशेषत: पिशव्या गोळा करून त्यांना स्वच्छ करून मग ते भंगारवाल्यांना विका इतका वेळ कचरा वेचणार्‍यांजवळ नसतो.  ते सारे झेंगट गळ्यात घेण्यापेक्षा तसेच टाकून दिलेले बरे म्हणून त्याला कोणी हात लावित नाहीत. 

यासाठी एक साधी वाटणारी पण कोणीच न करणारी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. आपल्या घरातील बाकीच्या कचर्‍याचे जे करायचे ते करा. तो कचरा कुजतो, त्याचे विघटन होते त्यामुळे ती समस्या तेवढी गंभीर नाही. पण प्लॅस्टिक जे आपल्या घरात आपण वापरून फेकून देतो त्याची जरा काळजी घेतली पाहिजे. विशेषत: प्लॅस्टिकच्या पिशव्या स्वच्छ कोरड्या करून घडी करून ठेवून द्याव्यात. प्लॅस्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात घरात येतात. त्याही नीट विसळून एखाद्या पोत्यात घालून ठेवल्या पाहिजेत. असा स्वच्छ आणि कोरड्या प्लॅस्टिकचा कचरा एका गल्लीमधून, अपार्टमेंटमधून, सोसायटीमधून एकत्र गोळा करण्यात यावा. हे करण्यासाठी जो माणूस काम करतो त्याचा वर्षाचा पगार निघावा इतकी किंमत वर्गवारी केलेल्या स्वच्छ कोरड्या कचर्‍याला मिळू शकते. हे सांगायची गरज आहे. कारण जोपर्यंत एखाद्या बाबीचे अर्थचक्र फिरत नाही तोपर्यंत असे उपाय तात्पुरते बनतात. एकदा का त्याचा खर्च निघावा इतका जरी पैसा मिळू लागला की तो उपक्रम आवर्जून टिकतो. साधं उदाहरण आहे. गावो-गावी, शहरो-शहरी छोटी मोठी मंदिरं उभी राहीली आहेत. त्यासाठी पैसा गोळा होतो. तिथे पुजा करायला पुजारी मिळतो, तिथे गोळा होणारे भाविक आपल्या आपल्यापरीने देणग्या देवून ही सगळी व्यवस्था चालवितात. लोकांची भावनिक अध्यात्मिक गरज आहे म्हणून मग स्थानिक पुढारीही मागे पुढे न पाहता अशा उपक्रमांमध्ये पैसे ओतायला तयार होतात. आजतागायत महाराष्ट्रातील एकही मंदिर पैसे नाहीत, पुजारी नाहीत म्हणून बंद पडलं नाही. याला जसं भावनिक कारण आहे तसेच आर्थिक कारणही आहे हे आपण नजरेआड करतो. 

याचप्रमाणे एकदा का प्लॅस्टिक कचर्‍याचे आर्थिक गणित बसले की ती समस्या सुटायला सुरवात होईल. आज प्लॅस्टिक पिशवी शिवाय इतर भंगार वस्तुंचे गणित बर्‍यापैकी बसले आहे. हे गोळा करणारी, वर्गवारी करणारी, किरकोळ आणि घावूक व्यापार करणारी आणि प्रक्रिया करणारी अशी सगळी यंत्रणा गावोगावी सिद्ध झाली आहे. आपल्या भागात कचरा भंगार गोळा करणार्‍या कुणाही फाटक्या माणसाशी किमान पाच मिनीटं बोलून पहा तूम्हाला लक्षात येईल की ही यंत्रणा कुठल्याही सरकारी मदतीशिवाय कशी सक्षमपणे काम करत आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणून स्वत:ची टिमकी गाजवून घेणार्‍या पुढार्‍यांना, नेत्यांना, बोलघेवड्यांना कल्पनाही नाही की भंगार/कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आजच्या काळात जवळपास सगळेच मुस्लिम आणि दलित आहेत. 

दलितांच्या नावानं गळे काढणारे आणि मुसलमानांना निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचे गाजर दाखविणारे भंगार गोळा करणारे आणि त्यावर प्रक्रिया करून जनतेची सेवा करणारे यांच्यासाठी मदतीची काहीच योजना का राबवित नाहीत? मला तर उलट असे वाटते की आत्तापर्यंत सरकारने यात लक्षच न घातल्यामुळे जे काही काम चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. एकदा का यात सुट सबसिडीचा कली शिरला की याही क्षेत्राची वाट लागायला काही उशीर नाही. 

सरकारने नाही पण लोकांनी छोटे छोटे गट करून यात लक्ष देण्याची नितांत गरज आहे. निदान आपल्या घरातील कचरा व्यवस्थित वेग-वेगळा करून आणि कोरडा ठेवून आपण त्यांना मदत करू शकतो. भंगार प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणार्‍या उद्योगावर लक्ष दिले गेलं पाहिजे. रिसायकल प्लॅस्टिक उद्योगाला करमुक्त करून त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कचरा गोळा करणार्‍यांना किमान सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि हे लोकांच्या पातळीवर व्हावे, सरकारच्या नव्हे. यात जिथे कुठे सरकार अडथळा बनून पुढे येईल त्याविरूद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. 

पूर्वीच्या काळी आपल्या शेतातील करडी देवून तेल काढून आणायचे. घरातील जुने  कपडे देवून बोहारणी कडून भांडे घेतले जायचे. आताही जुने कपडे देवून संतरंजा घेतल्या जातात. तसं आता प्लॅस्टिकचा कचरा देवून एखादी वस्तू घेण्याची व्यवस्था तयार व्हायला पाहिजे. 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, September 16, 2014

बी. रघुनाथांची सरकारी उपेक्षा !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 16 सप्टेंबर 2014 

ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांचा 7 सप्टेंबर हा स्मृतिदिन. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दि साजरी झाली. गेली 12 वर्षे परभणी शहरात गणेश वाचनालय ‘बी. रघुनाथ महोत्सव’ साजरा करीत  आहे. गेली 25 वर्षे औरंगाबाद शहरात ‘नाथ संध्या’ साजरी केली जाते आहे. बी रघुनाथ यांच्या नावे साहित्य पुरस्कार दिला जातो आहे. बी. रघुनाथ यांच्या मृत्यूनंतर लगेच तीनच वर्षात परभणी शहरात सामान्य नागरिकांनी त्यांची आठवण जपण्यासाठी 1957 साली बी.रघुनाथ हॉल बांधला. या वेळी त्यांचे सुरेख तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार त्र्यंबक वसेकर यांनी काढले होते. कार्यक्रमासाठी ते नांदेडहून आणायचे तर चित्राचे रंग ताजे होते. मग थोर विचारवंत नरहर कुरूंदकर यांनी दुसर्‍या कुणाच्या हाती ते न सोपवता स्वत: ओल्या रंगांना जपत नांदेडहून परभणीला आणले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्याचे अनावरण झाले. 

परभणीला 1995 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. बी. रघुनाथांचे दुर्मिळ झालेले सर्व साहित्य  सव्वाशे कविता, एकोणसाठ कथा आणि सात कादंबर्‍या तीन खंडांत प्रकाशित करण्यात आल्या. मग बी. रघुनाथांच्या सहित्यावर एक परिसंवाद घेवून मराठीतील मान्यवर समिक्षकांकडून लेख लिहून घेण्यात आले. त्या सर्वाचे एक संदर्भ पुस्तकही तीन वर्षांनी प्रकाशित झाले. परभणी शहरात बी रघुनाथ यांच्या नावे महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. 

बी. रघुनाथ मेळ्यांसाठी गाणी लिहून देत. गानमहर्षि अण्णासाहेब गुंजकर त्याला चाली लावून देत. ही गाणी परभणी परिसरात मोठी लोकप्रिय होती. आजही सुरमणी कमलाकरराव परळीकर यांनी बी. रघुनाथांच्या कवितांना दिलेल्या चाली  परभणीचे गायक मोठ्या उत्साहाने गातात. 

हे सगळं घडले आणि पुढेही घडत राहिल ते सामान्य रसिकांनी आपल्या काळजात बी. रघुनाथांना स्थान दिले म्हणून.  म्हणजे बी. रघुनाथांना या रसिकांनीच खर्‍या अर्थाने जतन करून ठेवले. पण शासकीय पातळीवर काय घडले? 

2002 साली बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारण्यात आले. बी. रघुनाथांचा पुतळा, त्या भोवती आकर्षक बाग, कारंजे, छोटेखानी सभागृह आणि वाचनालयासाठी इमारत अशी रचना करण्यात आली होती. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशी अमावस्या होती. बी. रघुनाथ गेले त्या दिवशीही अमावस्याच होती. कवी बा.भ.बोरकर यांनी आपल्या एका कवितेत लिहीले होते

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरिती प्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री

बी. रघुनाथ यांच्या स्मारकावर धुळीत विखुरल्या त्यांच्या कवितांनी चंद्रफुलांची छत्री धरली असे चित्र 7 सप्टेंबर 2002 साली होते. आता मात्र परिस्थिती बिकट झाली आहे. पुतळ्या मागच्या भिंतीच्या फरश्या निखळुन पडल्या आहेत. कारंजे तर केंव्हाचेच बंद पडले आहे. ज्या इमारतीत वाचनालय व्हावे असे अपेक्षित होेते तिथे आजतागायत एकाही पुस्तकाला कुठल्याच निम्मित्ताने प्रवेश मिळाला नाही. पहिले वर्ष स्थानिक संस्था आणि प्रकाशक यांनी एक पुस्तक प्रदर्शन त्या इमारतीत भरवले होते. आजही एक कायमस्वरूपी प्रदर्शन त्या परिसरात चालू आहे. पण ते पार्किंगच्या चिंचोळ्या गैरसोयीच्या जागेत. 

सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळत नाही कारण सरकारी बैठका तिथे होतात. तारीख रिकामी असेल तर जागेचे भाडे सांस्कृतिक उपक्रमांना परवडणे शक्य नाही. स्वत: महानगरपालिकेने काही उपक्रम घ्यावा तर राजकीय इच्छाशक्तिचा पूर्णपणे अभाव. महापौर किंवा कुणीतरी सरकारी प्रतिनिधी 7 सप्टेंबरला आठवण झाली तर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. जे कोणी सोबत त्यांचे सगे सोयरे दोस्त मंडळी असतील त्यांना चहा पाजविला जातो. इतर राजकीय कार्यक्रमाच्या घाईने आणि ओढीने महापौर किंवा इतर कुणी राजकीय नेते निघून जातात. बी. रघुनाथांवर प्रेम करणारे मोजके साहित्यप्रेमी आपले काही तरी हरवले असावे अशा अविर्भावात पुतळ्या भोवती काही काळ रेेंगाळत राहतात. शेवटी उन चढत जाते तशी माणसे पांगतात. त्या परिसरातील शिपाई मुख्य दरवाजा लावून घेतो. परत बी. रघुनाथ वाळत चाललेल्या हिरवळीकडे पहात विमनस्कपणे बसून राहतात. नाही तरी त्यांनीच आपल्या कवितेत लिहीले होते

राउळी जमतो भाविक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

बी. रघुनाथांना केवळ मठ मंदिरांमधील भक्त अपेक्षित नव्हते. साहित्याचा मंदिरातील भक्तही अपेक्षीत होते. आणि त्यांचेही वर्तन आज तसेच आढळते.

बी. रघुनाथांचे शासनाच्या साहित्य पुरस्काराला देण्यात आले होते. नंतर पुरस्कारांची संख्या कमी झाली. तसे ते नावही उडाले. बी. रघुनाथांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा जन्मशताब्दि वर्षात परभणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. आता तीचाही सोयीस्कर विसर सगळ्यांना पडला. बी. रघुनाथांच्या कन्या सुधा नरवाडकर यांनी साहित्य परिषदेला काही देणगी उपक्रमासाठी दिली होती. त्याचेही पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. 

मराठवाड्यात दोन विद्यापीठं अस्तित्वात आहेत. 1995 नंतर बी. रघुनाथ यांचे समग्र साहित्य चांगल्या स्वरूपात उपलब्ध झाले. नंतर 2005 साली नांदापुरकरांचे साहित्य उपलब्ध झाले. पण एकाही विद्यापीठाला ते अभ्यासक्रमाला लावावे वाटले नाही. आता अभ्यासक्रमाला जे काही लावले गेले आहे ते पाहता जे झाले ते बरेच झाले म्हणावयाची पाळी आहे. 

या सरकारी अनास्थेच्या उलट सामान्य रसिकांच्या पाठिंब्यावर आजही बी. रघुनाथ महोत्सव साजरा होतो आहे. एक चांगला पायंडा या निमित्ताने पडला आहे त्याचा विचार केला पाहिजे. साहित्यकी सांस्कृतिक उपक्रमांमधील राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून निखळ वाङ्मयीन स्वरूपात साधेपणात हे उपक्रम साजरे केले पाहिजेत. महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अ वर्ग वाचनालय आहेत. किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृपेने महाविद्यालयांच्या इमारती बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. या ठिकाणी जिल्ह्याभरच्या साहित्यप्रेमी रसिकांच्या आश्रयाने हे उत्सव, उपक्रम साजरे होवू शकतात. यासाठी लागणारा निधीही सामान्य रसिकांमधून, प्रस्थापित संस्थांमधून सहज उभा राहू शकतो. प्रत्येकवेळी मोठ मोठ्या रकमा उभ्या करायच्या. त्या खर्चाच्या ओझ्याने साहित्यीक कार्यकर्ते बाजूला पडतात. आणि भलतेच उपटसुंभ पुढे येतात. ते मग त्या उपक्रमाचा काय बट्ट्याबोळ करतात हे परत वेगळे सांगायची गरज नाही. खरं तर कुठलाच राजकीय पुढारी साहित्यीक संस्थांच्या दाराशी येवून लुडबूड करू इच्छित नसतो. साहित्य क्षेत्रातील सामान्य कुवतीचे साहित्याची खरी जाण नसणारे गणंगच राजकीय नेत्यांच्या दाराशी पडून असतात. मग स्वाभाविकच या क्षेत्राचा वापर करण्याची राजकीय नेत्यांची वृत्ती बळावते. यात त्यांचा दोष कमी आणि साहित्यीकांचा दोष जास्त आहे.

साधेपणाने साजरा होणार्‍या बी. रघुनाथ महोत्सवाने एक आदर्श समोर ठेवला आहे. त्याचे डोळसपणे अवलोकन या क्षेत्रातील मान्यवरांनी रसिकांनी करावे ही अपेक्षा.    

   


     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575