Tuesday, January 28, 2014

भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014


भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय हर्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.
इतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती.  आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना? मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’
म्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत? आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे?
 आर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उसने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे.  हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.
नेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’
नेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय?’
आता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.
रा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड? आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत? तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.
यानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.
ह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली.  नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.
दुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे? आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.
इतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे.  (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकर vinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, January 21, 2014

मराठी कवितेचे ‘रसाळ’ निरूपण

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 जानेवारी 2014 

प्रसिद्ध समिक्षक प्रा.डॉ. सुधीर रसाळ यांना परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा ‘शब्द सह्याद्री साहित्य सन्मान’ ज्येष्ठ कथाकार प्रा.तु.शं.कुलकर्णी यांच्या हस्ते 14 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला. मराठी कवितेसाठी व्रतस्तपणे काम करणार्‍या एका ऋषीतूल्य व्यक्तिमत्वाचा गौरव या निमित्ताने झाला. निरलस अशा व्यक्तीमत्त्वाचा गौरव करण्याचे सुचले त्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचेही कौतुक करायला हवे. 

‘संथ वाहते कृष्णामाई’ हे ग.दि.माडगुळकरांचे गाणे ऐकले की मला हमखास रसाळ सरांच्या संथ बोलण्याची आठवण येते. पुरस्कार स्विकारतानाही सरांनी आपल्या संथ लयीत कवितेवरील अप्रतिम भाषणांने श्रोत्यांना मुग्ध केले. सुधीर फडक्यांनी गायलेल्या या गाण्यासोबतच मला आठवण येते ती उस्ताद अमीर खॉं यांच्या संथ लयीतल्या ख्याल गायनाची. संथ लयीत शांतपणे सर एखादा विषय मांडत जातात. त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी जरा वर येते आणि बाकीची बोटे अंगठ्याकडे झुकतात. ऐकणार्‍यावर त्यांच्या बोलण्याचा, देहबोलीचा असा काही प्रभाव पडतो की या शांत प्रवाहात आपण कधी वाहून गेलो हे कळतच नाही.

प्रत्यक्ष त्यांच्या वर्गातील इंद्रजित भालेराव, दासू वैद्य हे विद्यार्थी असो की वर्गाबाहेरील मी, रेणू पाचपोर, धनंजय चिंचोलीकर, श्याम देशपांडे -या सगळ्यांना कमी अधीक प्रमाणात हाच अनुभव आलेला आहे. सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या शांत शैलीवरून लगेच लक्षात येत नाही पण संपर्कात आल्यावर काही दिवसातच उमगत जाते की सर अतिशय ठामपणे आपली मतं मांडत असतात. 

त्यांचे ‘कविता आणि प्रतिमा’ हे पीएच.डी.च्या संशोधनाचे जाडजुड पुस्तक माझ्या हाती आले तेंव्हा माझी छाती दडपुनच गेली होती. हे पुस्तक आत्तापर्यंत फक्त तीन लोकांनी पूर्ण वाचले आहे एक रसाळ सर स्वत:, दुसरे प्रकाशक श्री.पु.भागवत व तिसरे या पुस्तकाचे मुद्रीत शोधन करणारे असं आम्ही विनोदाने म्हणायचो. पण त्यांचे दुसरे पुस्तक ‘काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली’ हाती आले आणि माझा गैरसमज पार धुवून गेला. हे पुस्तक माझे अतिशय आवडते आहे. 

आपली मतं स्पष्टपणे मांडणे हे एक सरांचे वैशिष्ट्य. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेबाबत तीस वर्षांपूर्वी सरांनी लिहून ठेवले होते, ‘‘विशाखात ज्या जातीचा प्रत्यय त्यांची कविता देत होती, त्या जातीचा प्रत्यय नंतरच्या काळातील त्यांच्या कवितेने क्वचितच दिला. विशाखा नंतर त्यांच्या कवितांचा विकास थांबला.’’ किंवा नारायण सुर्व्यांवर लिहीताना, ‘‘सुर्व्यांजवळ सांगण्यासारखे खुप आहे. पण हे सांगण्यासारखे सतत गुदमरून जात आहे हे जाणवते.’’

मराठीच्या प्रांतात मोठ्या लेखकांनी स्वत:ला साहित्यीक संस्थांपासून कायम दूर ठेवलेले मोठ्या प्रमाणात आढळते. रसाळ सर मात्र याला अपवाद आहेत. थोडी थोडकी नाही तर जवळपास 50 वर्षे सरांनी मराठवाडा साहित्य परिषद व तिचे मुखपत्र प्रतिष्ठान यासाठी खर्ची घातली आहेत. संपादनापासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भुषविण्यापर्यंत त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या निभावली आहे. 

आजही एखाद्या पुस्तकाला प्रस्तावना तर सोडाच पण पाठराखण म्हणून मलपृष्ठावर छोटा मजकूर लिहायचा म्हटले तरी सर ते सगळे पुस्तक वाचून त्यावर सांगोपांग विचार करून मगच लिहून देतात.

आपल्यापेक्षा मोठ्यांशी गप्पा मारताना बहुतांश वेळा नाळ जूळतच नाही. पण रसाळ सरांचे तसे नाही. आम्ही कोणी साहित्यप्रेमी त्यांच्या कडे गेलो तर सर दिलखुलास गप्पा मारतात, घरात इतर कोणी नसेल तर आपल्या हाताने चहा करून पाजतात. समोरचा कितीही लहान असो त्याला ‘आहो जाहो’ करून संबोधतात. सरांचा कवितेवरचा अभ्यास पाहून बर्‍याचजणांना असे वाटते की ते फक्त कविताच वाचतात की काय. सरांचे वाचन मराठी, इंग्रजी अगदी अद्यायावत आहे हे त्यांच्या निकटवर्तीयांखेरीज फारसे कुणाला माहित नाही. विशेषत: सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे आकलन तर अतिशय उच्च दर्जाचे आहे. मागील वर्षी बब्रुवान रूद्रकंठावार यांना बी.रघुनाथ पुरस्कार सरांच्या हस्ते देण्यात आला. सामाजिक उपरोध लिहीणार्‍या बब्रुवानच्या पुस्तकावर सर काय बोलतात याची आम्हाला खुप उत्सुकता होती. ज्वलंत विषयावर राजकीय भाष्य करण्याची बब्रुवानची नेमकी ताकद हेरून सरांनी मोजक्या शब्दांत अशी काही मांडणी केली की सगळे सभागृह भारावून गेले. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘गांधी विरूद्ध गांधी’ लिहीणारे प्रतिभावंत नाटककार अजीत दळवी नंतर आम्हाला म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्नांबाबत सरांची मांडणी फार महत्त्वाची आहे. सरांनी या विषयांवर लिहीलं पाहिजे.’’

समिक्षा लिहीणार्‍या सरांनी ललित लेखनही फार मोजके पण अप्रतिम केले आहे. त्यांची व्यक्तिचित्रे एकत्र करून एक पुस्तक तयार करावे यासाठी फार दिवसांपासून मी त्यांच्या मागे आहे. अनंत भालेराव यांच्या ‘मांदियाळी’ या पुस्तकाला सरांनी लिहीलेली प्रस्तावना याची साक्ष आहे. आपल्या वडिलांचे तसेच गुरू वा.ल.कुलकर्णी यांचे त्यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्रही फारच उत्कट आहे. सरांचे वडिल न.मा.कुलकर्णी हे उत्कृष्ठ शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या शिकविण्याच्या कामासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रकाशन संस्था काढून मोलाचे काम त्या काळी केले. वा.रा.कांतांचा रूद्रवीणा हा पहिला कवितासंग्रह सरांच्या वडिलांनी स्वत: प्रकाशित केला होता. 

त्यांच्या अशातच प्रसिद्ध झालेल्या ‘वाङ्मयीन संस्कृती’ या महत्त्वाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला हवा होता अशी भावना कित्येक रसिकांची आहे. बा.सी.मर्ढेकर यांच्या कविता व कादंबर्‍यांवर त्यांनी विस्तृत लिखाण केले आहे. जवळपास 900 पानांचा हा मजकूर आता तीन पुस्तकांच्या मधून प्रकाशित होतो आहे. 

वैयक्तिक संबंधांबाबत सरांचे वागणे मोठे अकृत्रिम व सच्च्या माणुसकीला जागणारे आहे. नरेंद्र चपळगांवकर हे त्यांचे जवळचे मित्र. चपळगांवकरांच्या मुलीच्या लग्नात सकाळी पाहुण्यांना नाष्टा द्यायचा होता. काम करणारे लोक येईपर्यंत त्यांनी वाट न पाहता रसाळ सरांनी भरा भर उपम्याच्या ताटल्या भरून पाहुण्यांना द्यायला सुरवात केली होती. कोणीतरी ते पाहून त्यांना थांबवले आणि ते काम आपल्या हाती घेतले. आपल्या पदाचा तेंव्हा सर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते कोणताही दबाव सरांनी स्वत:वर येवू दिला नव्हता. 

आपल्या लेखणीने समिक्षेचे नवे मापदंड निर्माण करणारे आणि कृतीने साहित्यीक संस्थांच्या व्यवस्थापनाचा आदर्श समोर उभे करणारे सरांसारखे लोक आज फार दुर्मिळ झाले आहेत. साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती देवून सन्मानिले, त्यांच्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार मिळाले, आज हा शब्द सह्याद्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे पण या कशाचाच सरांवर परिणाम होत नाही. आजही ते शांतपणे सकाळी बागेत झाडांना पाणी देणे असो, स्वत:चा चहा स्वत: करून घेणे असो सोडत नाहीत. आपल्या लिखीत मजकूराचे वाट्टोळे डि.टी.पी.करताना होते हे पाहून सर स्वत: उतरत्या वयात डि.टी.पी. शिकले. आज सर स्वत:चे सगळे लिखाण स्वत:च संगणकावर टाईप करतात. पार्श्वभूमीवर किशोरी आमोणकरांचा एखादा राग चालू असतो. आणि सरांची बोटे की बोर्डवर लयीत चालत असतात.

मला खात्री आहे हा लेख वाचल्यावर, प्रत्यक्ष भेटीत सर मजेदार हसून फक्त एवढंच म्हणतील, ‘‘चांगला लिहीलात लेख...’’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, January 14, 2014

कडूबाईने कडू केली दारूवाल्यांची तोंडे

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 जानेवारी 2014


कोण ही कडूबाई? औरंगाबाद नाशिक जून्या रस्त्यावर कसाबखेड्याच्या पुढे पिंपळगांव दिवशी म्हणून गाव आहे (गंगापुर तालूका). त्या गावातील ही एक दलित विधवा. या गावात एका शेतकरी मेळाव्यासाठी महेश गुजर पाटील यांच्या सह्याद्री युवा प्रतिष्ठानने मला बोलावले होते. कार्यक्रमात बोलायचे जे ठरले होते ते राहिले बाजूला. सत्कार हार शाली नारळ सगळं राहिलं बाजूला. महेश पाटील म्हणाले या महिलांची एक समस्या आहे ती समजून घेणार का? मी तातडीने होकार दिला. त्यांचे म्हणणे आम्ही ऐकू लागलो. कडूबाईने दारूच्या विषयाला तोंड फोडले. फुटाण्यासारखी ही बाई ताड ताड बोलत राहिली. ऐकणारे सगळे आवाक. त्या गावात अवैध दारूचे दुकान आहे. त्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता. या विरूद्ध आवाज कोण उठवणार? हाच कळीचा प्रश्न होता.  ‘‘सांगा भाऊ काय करायचे? आम्ही गरीबानं कसं जगायचं?’’ या तिच्या प्रश्नावर कोणालाच काय बोलावे ते कळेना. मी म्हणालो तूम्हीच सांगा मावशी काय करायचे ते. ती म्हणाली ‘‘आत्ता तूम्ही सगळे चला आपण दारू विकणारीला समजावून सांगू.’’
खरं तर अशावेळी आलेला पाहूणा काहीतरी कारणे सांगून चालढकल करतो. आपले भाषण पूर्ण करतो. शाली श्रीफळ मानधनाचे पाकिट (मिळणार असेल तर) स्वीकारून आपल्या गावी सटकतो. पण मी पडलो चळवळीतला कार्यकर्ता. मी लागलीच सारं बाजूला सारून तिच्यासोबत उठलो. तूम्ही पुढं व्हा मी गावातून बायका घेवून येते म्हणून कडूबाई निघाली. तिच्या सोबत इतरही बायका उठल्या आणि मोठ्या उत्साहाने आता काहीतरी होवू शकेल या आशेने निघाल्या.
बघता बघता त्या दारूच्या दुकानासमोर पन्नास एक महिला आणि जवळपास शंभर पुरूष, तरूण पोरं गोळा झाले. कडूबाईने तिला दुकान बंद कर म्हणून समजावून सांगितले. सगळा गाव गोळा झाला तरी दारू विकणारी बाई मात्र ताठ होती. ती गावापुढे वाकायला तयार नव्हती. तीच कडूबाईला म्हणाली, ‘‘अगं खुशाल जा पोलिसाकडे. मीच तूला भाड्याचे पैसे देते. माझ्या कडून हप्ते घेणारे काय तूझी कंप्लेन ल्येहून घेत्येत. मी बघतेच...जाय तू खुशाल जाय..’’ कडूबाई भडकली. तिच्यासोबतच्या बायका दुकानात शिरल्या. बायकांनी सगळ्या दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. आम्ही बायकांच्या मागेच उभे होतो. माझ्याकडे वळून कडूबाई म्हणाली, ‘‘सांगा भाऊ आता काय करायचे?’’
मी म्हटलं ‘‘आता आपण इथेच रस्त्यावर बसून राहू. पोलिस येतील आणि जी काही कारवाई करायची ती करतील. तोपर्यंत आपण हा रस्ता आडवू.’’ आणि बघता बघता वातावरण आंदोलनाचे बनले. सगळ्या बायका दारूच्या बाटल्या घेवून रस्त्यावर बसल्या. मी सोबतच्या मंगेश पाटील या पाहूण्यासोबत आणि गावच्या तरूण पोरांसोबत बायकांच्या पाठीशी रस्त्यावर बसलो.
तासाभरात रस्त्यावर वाहनांची रांग लागली. आपोआपच रस्ता रोको झाला. पोलिस लगेच धावत पळत आले. पोलिसांना वाटले काही तरी पक्षाचे संघटनेचे लोकं आहेत. ते शहरातून आले आणि गावच्या लोकांना त्यांनी भडकावले व रस्ता रोको आंदोलन घडले. पण पोलिसांचे आकलन चुक होते. आंदोलन गावच्या महिलांमधून अचानकपणे उभे राहिले होते. आम्ही फक्त त्याला दिशा दिली. आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची कृती केली.
दारूच्या दुकानाविरूद्ध पोलिसांना जनरेट्यामुळे कारवाई करावी लागली. हा तूमचा मार्ग चुक आहे. रस्त्यावरून उठा. कायदा हातात घेवू नका असे पोलिस इन्स्पेक्टर सांगत होते. त्यांना वाटले हे शर्ट पँटवाले इनवाले शहरी लोक म्हणजे नेते असणार तेंव्हा ते आम्हालाच बोलायला लागले. मी त्यांना सांगितलं साहेब तूम्ही हे सगळं या बायकांना सांगा. आंदोलन त्यांचे आहे. आम्ही फक्त भाऊ म्हणून त्यांच्या पाठिशी आहोत. कायदा हातात घेवू नका असे पोलिस बायकांना सांगताच बायका भडकल्या.
कडूबाई पोलिसांना म्हणाल्या, ‘‘साहेब ही बाई ढवळ्या दिवसा दारू विकून राहिली. हीच्या दुकानाला लायसेन बी नाय. तीला तूमी काही बोलना झाले. आनी आमाला कायद्याचं शानपन कामून शिकविता? आगूदर तिला बंदी घाला. आन् आज नाय तर कवाच हीतं दारू विकली जानार नाय असं कागदावर लिवून द्या. मग आमी उठतो.’’
पोलिसांना लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. जनता खरंच भडकली आहे. तरी सरकार म्हणजे इतकी सोपी गोष्ट नसते. त्यांनी त्यांचे डोके लावून आम्हा दोघा तिघांना त्यांच्या दृष्टीनं नेते वाटणार्‍यांना 20 कि.मी. अंतरावरील लासूरच्या पोलिस स्टेशनला बोलावले. आम्ही तिकडे गेलो की इकडे पोलिस इन्स्पेक्टर गावात शिरले. त्यांना जाणून घ्यायचे असावे की हे आंदोलन काय आहे. कोणी भडकावले. इकडे आम्हाला फुकटची वारी झाली. पोलिस स्टेशनला कोणीच नाही पाहून परत गावात आम्ही आलो. तोपर्यंत गावात बायकांनी पोलिसांना गराडा घालून अडकवून ठेवले होते.
आम्ही पोचताच बायकांना हायसे वाटले. आम्ही पोलिसांना समजावून सांगितले, ‘‘साहेब हा जनक्षोभ आहे. आम्हाला या बायकांची नावे माहित नाही. त्यांनाही आमची नावे माहित नाहीत. ही जी तूमची विचारसरणी असते की एखादा पक्ष संघटना चळवळ काहीतरी शहरात बसून ठरवते आणि मग गावात येवून आंदोलन उभं राहते. तसं काहीच नाही. आम्हाला इथे येईपर्यंत काहीच माहित नव्हते. बघता बघता हे आंदोलन उभं राहिलं आहे. लोकांना कायदा हातात घ्यायचा नाही. पण ज्यांनी घेतला त्यांच्यापर्यंत तूमचा हाता पोंचत नाही .’’ पोलिस इन्स्पेक्टरना ही सगळी परिस्थिती कळली असावी.
कडूबाई त्यांना म्हणाली,‘‘साहेब मी तर जयभीम हाय. पन दारू विकनारी तर मोठ्या घरची हाय ना. तीनं असं कामून करावं? माझा नवरा दारू प्यायचा मला मारायचा. तो मरून गेला. मी रांडमुंड बाईनं पोराला मोठं केलं. पोरगा दारू प्यायला लागला. सुनेला बडवायला लागला. सुन आता रॉकेल ओतून मरायची मला धमकी देती. असं कायी इपरित घडलं तर तूमीच मला बेड्या घालताल की नाय?’’ कडूबाईच्या प्रश्नावर पोलिसांपाशी काहीच उत्तर नव्हते. पोलिस सांगत होते,‘‘हे बघा काळजी करू नका. पुढं असं होणार नाही. काही घडलं तर आम्हाला सांगा. फोन करा.’’ पोलिसांना वाटलं आता हा विषय संपेल. पण बायका मोठ्या वस्ताद. अनुसया बाई आता पुढे सरसावल्या. त्या म्हणाल्या, ‘‘साहेब तूम्हाला संागितलं की तूमचा हवालदार येईन. त्यो तर कायी दारू बंद करनार नायी. पन उलटा हप्ता घेईन आनी वरून दारूबी पिउन जाईन.’’
दारूचे दुकान बंद झाले. पोलिसांनी कारवाई केली. आंदोलन संपले. गावातल्या बायकांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे मोठा हुरूप आला. पोलिसांना वाटले यात दलित सवर्ण असा काही रंग दिसतो का ते तपासावे. पण आश्चर्य म्हणजे दारू दुकानाविरूद्ध बोलणार्‍या दलित कडूबाईच्या पाठिशी गावातील सवर्ण तरूण आणि बायका मोठ्या प्रमाणात उतरल्या होत्या. 
थोडीशी चौकशी केल्यावर या सगळ्या प्रश्नाचा वेगळाच पैलू समोर येत गेला. महेश गुजर मला सांगत होते की गंगापुर साखर कारखाना चालू होता तेंव्हा या गावातील बर्‍याच जणांना रोजगार मिळाला होता. कारखाना सहकारी तेंव्हा तो का बंद पडला हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. ज्याचे दारूचे दुकान होते त्याची कारखान्यातली नोकरी गेली. मग साहजिकच तो दारूच्य धंद्याकडे वळला. गावाकडे दारू पिणार्‍यांची जी संख्या वाढली त्यात या कारखान्याने बेरोजगार केलेल्या बर्‍याच लोकांचा समावेश आहे. आज ग्रामीण भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे पुरते शोषण केल्यामुळे रोजगार निर्मिती बंद पडली आहे. आणि दुसरे जे शहरी रोजगार आहेत त्यांची मर्यादा आता स्पष्ट झाली आहे. परिणामी गावोगावी बेकार तरूणांचे तांडे कोपर्‍या कोपर्‍यावर पडून आहेत. असा मोठा वर्ग दारू आणि मग इतर अवैध धंदे, अस्मितेचे राजकारण यांना बळी पडतो.
सकाळी गेलेलो आम्ही. परतायला आम्हाला संध्याकाळ झाली होती. दिवस मावळताना कडूबाईच्या डोळ्यात मात्र सुर्य उगवताना दिसला. काळीसावळी सुरकूतल्या चेहर्‍याची विधवा कडुबाई देवगिरी किल्ल्याच्या परिसरात राहणारी, तिला कल्पनाही नसेल पाचशे वर्षांपूर्वी नाथांनी याच ठिकाणी लिहीलं होतं, ‘दार उघउ बया दार उघड । नवखंड पृथ्वी तूझी चोळी । सप्त पाताळी पाउले गेली । एकवीस स्वर्गे मुकूटी झळाळी । दार उघड बया दार उघड ॥ प्रस्थापित व्यवस्थेला पुरूष लवकर शरण जातो पण बाई नाही हे नाथांना माहित होतं. म्हणूनच पुढे पंचवीस वर्षातच जिजाउने स्वराजाच्या धडा महाराजांकडून गिरवून घेतला. आताच्या काळात बाहेरच्या नाही तर आपल्यातच असलेल्या राक्षसांविरूद्ध लढण्यासाठी आता सामान्य स्त्री मधल्या महाकालीला जागे व्हावे लागणार आहे हे नाथांना कुठे माहित होते. पण कडुबाईला मात्र ते निश्चितच कळले आहे.  


            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, January 7, 2014

इंदिरा संतांच्या जन्मशताब्दीची दखलही नाही... !

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 जानेवारी 2014

कवियत्री इंदिरा संत यांची जन्मशताब्दी 4 जानेवारील 2014 ला संपली. ‘माजघरातील मंद दिव्याची वात’ असं कुसूमाग्रजांच्या कवितेची ओळ घेवून ज्यांचं वर्णन करावं लागेल अशा या श्रेष्ठ कवियत्रीचा जन्म 4 जानेवारी 1914 ला झाला. (मृत्यू 13 जूलै 2000) इंदिराबाइंची जन्मशताब्दी (जानेवारी १३ ) सुरु झाली तेंव्हा  चिपळूणला साहित्य संमेलनाचे पडघम वाजत होते. इंदिरा संतांची दखल घ्यावी असं साहित्य महामंडळाच्या लोकांना तेंव्हा वाटलं नाही. साहजिक आहे कारण इंदिरा संत काही महाराष्ट्रात राहत नव्हत्या. त्या होत्या बेळगावला. एरव्ही बेळगावच्या नावाचं वारंवार गळा काढणं आम्हाला आवडतं. बेळगाव महाराष्ट्रात आला पाहिजे असं आजही घसा कोरडा करून आम्ही ओरडतो. प्रत्येक साहित्य संमेलनात तसा ठरावही केला जातो. पण याच बेळगावच्या प्रतिभावंत कवियत्रीची जन्मशताब्दी मात्र आम्ही विसरून गेलो. 
इंदिरा संतच काय पण बर्‍याच साहित्यीकांच्या जन्मशताब्दीला आम्ही विसरत चाललो आहोत. बी.रघुनाथ आणि त्या पाठोपाठ वा.रा.कांत यांची जन्मशताब्दीही नुकतीच संपून गेली. साहित्य संमेलनांत यांची कुणाला आठवण झाली नाही. बी.रघुनाथ तसे या तिघांत नशिबवान. त्यांचे स्मारक परभणीला उभारले गेले. तिथे दरवर्षी त्यांच्या नावाने साहित्य उत्सव भरतो.  परभणीची माणसे त्यांची आठवण जागी ठेवतात. पण ते भाग्य वा.रा.कांत आणि इंदिरा संत यांच्या वाट्याला नाही.
जुन्या कवींची नावे काढली की काही जणांच्या कपाळाला आठ्या चढतात. आता या जुन्यापान्या कवींची झेंगटं आमच्या गळ्यात कशाला असा तो भाव असतो. इंदिराबाईंची शरदातील दुपारचे वर्णन करणारी एक अतिशय सुंदर अशी कविता आहे. 

ही निळीपांढरी शरदांतील दुपार :
तापल्या दुधापरि ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी

त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल
सुस्तीत लोळतो खाली हिरवा माळ
अन् बसल्या तेथे गाई करित रवंथ
वारीत शेपट्या कोणी चरती संथ

आता ही कविता आजच्या काळात समजून घ्यायला, जवळची वाटायला काय अडचण आहे? आज गायी नाहीत का? आज दुधाचा वापर नविन मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात होत नाही का? आजच्या फेसबुकच्या काळात निळा पांढरा हे रंग फेसबुकच्या पहिल्या पानावर जे दिसतात ते आभाळात दिसत नाहीत का?
सध्या साहित्य संमेलनाचे दिवस आहेत. बरोबर 20 वर्षांपूर्वी परभणीला साहित्य संमेलन भरलं होतं. त्या संमेलनासाठी इंदिरा संत यांनी उभं रहावं असा प्रस्ताव घेवून मी व इंद्रजित भालेराव इंदिरा संतांना भेटायला गेलो. कवियत्री ललित लेखिका वासंती मुझुमदार यांच्या दादर, शिवाजी पार्क मुंबई येथील घरी इंदिराबाई उतरल्या होत्या. ‘तूम्ही फक्त अर्जावर सही करा. बाकी आम्ही सगळं करतो. तूम्हाला निवडून आणतो.’ या आमच्या अग्रहाला इंदिराबाईंनी मुळीच भीक घातली नाही. जळगांव साहित्य संमेलनातला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता.  त्यांनी शांत पण ठामपणे आपला नकार दिला. ‘तेवढा विषय सोडून काय बोलायचे ते बोला’ असं त्या म्हणाल्या. आम्ही काहीसे नाराज झालो. पण मग बघता बघता कवितेचा विषय निघाला. साहित्यीक विषय निघाले. त्यात संमेलनाचा विषय वाहून गेला. शुभ्र केस, पांढरे फिक्या-जांभळ्या फुलांचे पातळ, बारीक लुकलुकते डोळे, हळू बोलणे. वासंती मुझुमदारांच्या कलात्मक सजवलेल्या दिवाणखान्यात दिमाखदार सोफ्यावर बसलेल्या इंदिरा बाई स्वत:च एक कविता भासत होत्या.मी सोबतच्या ‘मृण्मयी’ या त्यांच्या निवडक कवितांच्या संग्रहावर त्यांची स्वाक्षरी घेतली. 18 फेब्रुवारी 1994 अशी त्यावर तारीख आहे. म्हणजे त्यांचे वय तेंव्हा 80 होते. सहस्रचंद्र त्यांनी आयुष्यात पाहिले होते. कष्टमय आयुष्य भोगलेल्या इंदिराबाईंनी आपली कविताविषक भूमिका साध्या शब्दांतून पण किती समर्पकपणे व्यक्त केली आहे 

रक्तामध्ये ओढ मातिची
मनात मातीचे ताजेपण
मातीतुनी मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

इंदिरा संतांबद्दल बर्‍याच जणांनी लिहून ठेवलं आहे. पण त्यांचं एक अतिशय सुंदर आणि मनोज्ञ चित्रण त्यांच्या मुलाच्या प्रकाश नारायण संत यांच्या लिखाणात उमटलं आहे. प्रकाश संतांच्या चारही कथा संग्रहातून लंपनची आई दुर्गा हीचे जे वर्णन आहे ते सर्व इंदिरा संत यांच्यावरच बेतलेले आहे. इंदिरा संत आणि त्यांच्या भगिनी ना.सी.फडके यांच्या पत्नी कमला फडके या दोघीच अपत्य त्यांच्या आईवडिलांना. मग इंदिरा बाईंच्या आईने आपलाच नातू इंदिरा संत यांचा मुलगा दत्तक घेतला. भालचंद्र दिक्षीत असं नाव या मुलाला मिळालं. पुढे चालून जेंव्हा त्यानं सुंदर असे कथा लेखन केले तेंव्हा परत आपले जुने नाव ‘प्रकाश नारायण संत’ धारण केले व लेखक आई वडिलांचे ऋण फेडले.
बोरी बाभळीची झाडे सर्वत्रच फोफावली असतात. पण त्यातले सौंदर्य कुणाला जाणवत नाही. इंदिराबाईंची बाभळीवरची एक सुंदर कविता पूर्वी अभ्याक्रमाला होती. बाभळीच्या झाडातही एक सौंदर्य असते हे त्यांच्या कवितेतूनच प्रथमच व्यक्त झाले.

लवलव हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी

कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागर रिती
दूर कुठेतरी बांधवरती
झुकून जराशी  उभी एकटी.

गावाबाहेर दूर उभं राहणार्‍या बाभळीचे सौंदर्य आणि उपेक्षा झाल्याची वेदना जशी इंदिरा बाईंनी ओळखली तशी अजून एका  मनाची वेदाना त्यांनी ओळखली. प्रेम म्हटलं की राधा-कृष्ण ही जोडी भारतीयांच्या मनात पहिल्यांदा येते. कुष्णाचीच दुसरी जोडी रूक्मिणीच्या सोबतची. ती तर आम्ही विठ्ठल-रूक्मिणी रूपात पूजतोही. उत्तर भारतात मीरेच्या कृष्णप्रेमाची मोठी महती गायली जाते. पण इंदिरा बाईंना जाणवलेले कृष्णासोबतचे हे प्रेम कुणाचे आहे?

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजूळ

मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन

विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे
‘‘हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव....’’

कुब्जेचे प्रेम कुणाला समजले नव्हते ते इंदिराबाईंच्या कवीमनाने टिपले. आता या सगळ्या कवितां आज जुन्या वाटतात का? अशा रसरशीत, काळावर टिकणार्‍या कविता लिहीणार्‍या कवियत्रीची जन्मशताब्दी आम्ही विसरून जातो हे त्यांचे का आमचे दुर्दैव? संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘‘सल असल्याशिवाय अस्सल कविता लिहीता येत नाही’’ हे म्हणणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात अस्सल कविता लिहीणार्‍यांना आम्ही विसरतो ही सल कुणाला सांगायची फ.मु.शिंदे...बोला जरा...

 
            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, December 31, 2013

रिक्क्षावाल्याचे 3 चाकी दु:ख : गाडी-बॉडी-इज्जत

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 31 डिसेंबर 2013


तांबूस वर्णाचा मध्यमवयीन, कुटूंबप्रमुख असलेला एक रिक्क्षावाला बोलत होता, ‘‘साहेब माझ्या रिक्क्षाला पकडून पोलिसांनी दंड लावला. मी माझा गुन्हा नाही हे परोपरीनं सांगत होतो. माझ्याजवळ दंडाचे पैसे नव्हते. शेवटी मी म्हणालो आम्हा दोघा रिक्क्षावाल्यात मिळून एक पावती फाडा. तर तो पोलिस मला म्हणाला, ‘साल्या दोघात मिळून पावती फाडा म्हणतो, दोघात मिळून एक बायको करशील का?’ सांगा साहेब आमची काही इज्जत उरली आहे का? आम्हाला का घरदार पोरंबाळं नाहीत का? गिर्‍हाईक तर खवळलेलंच राहतं आमच्यावर. अन् हे पोलिस. ’’
हा कुठलाही काल्पनिक प्रसंग नाही. प्रत्यक्ष माझ्या कार्यालयात माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे. हे सांगणारे सोमनाथ पेरकर हे औरंगाबादचेच रिक्क्षा चालक आहेत.  रस्त्यांवरच्या खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे हे लोक माझ्या संपर्कात आले. माझे वडिल रिक्क्षाने जात होते. रिक्क्षावाल्याने आपले दुखणे त्यांना सांगितले व म्हणाला, ‘वो खड्डेवाला आदमी किधर रहात मालूम नही’. माझे वडिल अभिमानाने म्हणाले तो माझा मुलगाच आहे. मी तूम्हाला त्याचा पत्ता फोन नंबर सांगतो तूम्ही जावून भेटा. रिक्क्षा चालक संघटनांचे पदाधिकारी आणि त्यांचे सभासद मला भेटले आणि एक वेगळेच विश्व माझ्या समोर उलगडत गेलं. चालकांची संघटना कुठलीही असो डाव्या चळवळीतील लाल बावटा असो, उजव्या चळवळीतील रिक्क्षा सेना असो, की विविध छोट्या मोठ्या संघटनांची मिळून तयार झालेली संयुक्त संघर्ष कृती समिती असो. सगळ्यांच्या दु:खाची ठणक सारखीच.
संयुक्त कृती समितीच्या निसार अहमद खान यांनी तर याचा फार व्यवस्थित अभ्यास केला आहे. सामान्य नागरिकांची अशी भावना असते की हे सगळे आपल्याला लुटायला बसले आहेत. हे रिक्क्षावाले सिटी बस बंद पाडतात. हे रिक्क्षावाले मीटर लावून घेत नाहीत. पत्रकार परिषदेत आम्ही रिक्क्षा चालक संघटनेचे पदाधिकारी, ग्राहक पंचायतीचे सदस्य, राजकीय पक्षाचे लोक, सामान्य नागरिक यांना समोरा समोर आणले. आश्चर्य म्हणजे आम्हाला मीटर बसवा, आम्हाला सचोटीने व्यवसाय करायचा आहे, गिर्‍हाईकाची किरकिर ऐकून घ्यायची आम्हाला अजिबात इच्छा नाही, आम्हाला इज्जतीनं जगायचं आहे ही मागणी खुद्द रिक्क्षावालेच करत होते. म्हणजे जो आरोप त्यांच्यावर केला जातो तो खरा नाही हेच सिद्ध होतं.
रिक्क्षा विकत घेतल्यानंतर त्याची नोंदणी परिवहन कार्यालयात होते. (आर.टी.ओ.) त्यावेळेस एकरकमी रस्ता कर (वन टाईम रोड टॅक्स) घेतला जातो. रिक्क्षावाले आमच्यापाशी त्यांची व्यथा सांगताना म्हणाले. ‘बघा साहेब आमच्याकडून रोडसाठी पैसे घेतले जातात. आणि रोड तर दुरूस्त होत नाही. रोड दुरूस्त नाही म्हणून आमचे परत नुकसान. बोले तो पैसे गये, गाडी गयी, बॉडीभी गयी, इज्जतका तो कचरा.’ रिक्क्षावाल्यांकडून गोळा केलेला रस्ता कर रस्त्यावर खर्च का होत नाही? हा अतियश साधा बाळबोध प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण या साध्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी रिक्क्षावाल्यांना कोणीच द्यायला तयार नाही. (सगळ्या तथाकथित विद्वानांना, याचे उत्तर द्यावे आसे  माझे आवाहन आहे.)
रिक्क्षावाल्याला कुठल्याही कारणाने बाजूला घेवून त्याच्याकडून दंड लावणारे आणि हप्ता वसूल करणारे पोलिस, रस्त्याचा निधी रस्त्यावर खर्च झाला नाही म्हणून कोणाची कॉलर पकडणार आहेत? पेट्रोलच्या प्रत्येक लिटर मागे दोन रूपये वेगळा कर रस्त्यांसाठी वसूल केला जातो. मग तो कुठे जातो? मिलींद मगरे या रिक्क्षावाल्याच्या  प्रश्नाला कुठे उत्तर आहे.
अजून एक आश्चर्यचकित करणारी बाब रिक्क्षावाल्यांशी केलेल्या चर्चेतून समोर आली. शहराची वाहतूक कशी असावी, त्यात सिटी बससाठी कोणते मार्ग असावेत, सहा आसनी रिक्क्षा कुठे चालवाव्यात, तीन आसनी रिक्क्षा कुठे चालवाव्यात याचा सगळा आराखडा खुद्द रिक्क्षा चालक संघटनेनेच तयार केलेला आहे. तो शासनाला सादरही केला. आजतागायत त्यावर विचार करायला शासनाला वेळ मिळाला नाही.
सहा आसनी रिक्क्षावाल्यांचीही बाजू या निमित्ताने समोर आली. काही कुठलाच धरबंध नसलेले लोक कुठूनही चोरीच्या गाड्या घेवून कुठल्याही परवान्याशिवाय धंदा करू लागतात याची खंत अजिनाथ नलावडे यांनी व्यक्त केली. त्यांची औरंगाबादला हडकोला सहा आसनी रिक्क्षा आहे. अतिशय कष्टाने त्यांनी आपलं घर पुढं आणलं. मुलगी पॉलिटेक्निकला तर मुलगा परदेशात तैवानला अभियांत्रिकीला शिकतोय. तेही शिष्यवृत्तीवर. दोन वर्षांपूर्वी लाखात मिळणारी रिक्क्षा आता दीड लाखांवर गेली आहे पण रिक्क्षाची दरवाढ गेली तीन वर्षे झालीच नाही हे त्यांचे निरिक्षण नेमकं आहे.
या सर्व रिक्क्षा चालकांची अस्थीरोग तज्ज्ञांकडून आम्ही तपासणी केली. सगळ्यांनाच पाठीचे मानेचे मणक्याचे कमरेचे आजार असल्याचं विदारक सत्य त्यातून बाहेर आलं. रिक्क्षा चालकांना बोलावून त्यांच्या रांगा लावून त्यांना क्रमाने तपासणीसाठी सोडणारा तरूण रिक्क्षा चालक शेख अकील असं म्हणाला, ‘साब टू व्हिलर वाला तो कैसा भी छूट सकता है. पर रिक्क्षावाला बोले तो उसका एक पहिया खड्डेमेच रेहता है ना !’ वाक्य अतिशय साधं होतं पण त्यातून रिक्क्षावाल्याचं दु:ख  ठणकत होतं. अजून एक जण सांगत होता की पाठीवर झोपताच येत नाही. एका अंगावर झोपावं लागतं.
सामाजिक समस्यांच्या संदर्भात काम करताना काय केलं पाहिजे? कुठली काळजी घेतली पाहिजे? असं मी  माझे वैचारिक गुरू, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना एकदा विचारलं होतं. त्यांनी साध्या शब्दांत सांगितलं, ‘काहीच नाही फक्त त्या समस्याग्रस्त लोकांपर्यंत जावून सरळ त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी स्वत: शेतकरी झालो. शेतकर्‍यांशी बोलायला लागलो तेंव्हा मला शेतीची समस्या उमजली.’ मला स्वत:ला रिक्क्षाचालक होणे शक्य नव्हते. पण त्यांच्यापाशी मी गेलो. त्यांची वेदना समजावून घ्यायचा प्रयत्न केला. एखाद्या जखमेवरची खपली काढताच रक्त उसळावं तसं समाजानं पांघरलेली ही खपली निघाली आणि रिक्क्षावाल्यांच्या समस्येचे रक्त वाहायला लागलं.
का सुटत नाहीत साध्या साध्या माणसांचे प्रश्न? मोठ मोठे समुह त्यांच्या मोठ मोठ्या समस्या सोडून द्या. कुठल्याही साध्या प्रश्नाला आपण प्रामाणिकपणे भिडलो की लक्षात येतं शासन नावाचा एक मोठा अक्राळविक्राळ  निगरगट्ट राक्षस सर्वांना व्यापून बसला आहे. रिक्क्षा चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना घेवून एक समिती शासनाने तयार केली आहे. त्याचे अध्यक्षपद अर्थात जिल्हाधिकार्‍यांकडे आहे. पण त्यांना वर्षानुवर्षे ही बैठक घ्यायला वेळच नाही. आज औरंगाबाद शहरात पंचेवीस हजार रिक्क्षाचालक आहेत. म्हणजे जवळपास पंचेवीस हजार कुटूंब रिक्क्षावर अवलंबून आहेत. आणि त्यांच्या समस्या सोडवायला शासनाला वेळ नाही. खड्डा रस्त्याला पडलाय का धोरणाला हे कळायला मार्गच नाही.
आज मोठ्या शहरांची एक  विचित्र समस्या होवून बसली आहे. खराब रस्त्यांमुळे संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक  वाहने चालवू शकत नाहीत. शहर वाहतूकीचे तीन तेरा वाजल्यामुळे व स्वतंत्र ऑटो परवडत नसल्यामुळे बाहेर पडता येत नाही. म्हणजे संध्याकाळ झाली की आपण आपल्या घरात स्थानबद्ध व्हायचं. आपलं घर म्हणजे आपल्यासाठी तुरूंग अशी स्थिती म्हातारा म्हातारीची झाली आहे. ही परिस्थिती एकीकडे आणि दुसरीकडे रिक्क्षावाले बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत रस्ते दुरूस्त करा, वाहतुकीला शिस्त लावा, रिक्क्षाला मीटर लावा, आम्हाला इज्जतीनं व्यवसाय करू द्या.
शेतकरी चळवळीत एक घोषणा फार लोकप्रिय होती, ‘सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार खुद समस्या है !’ ही घोषणा रिक्क्षांच्या बाबतीतही खरी ठरली आहे. म्हणजे काल ग्रामीण ‘भारत’ अन्यायाविरूद्ध आंदोलन करत होता, आज शहरी ‘इंडिया’ही त्याच स्थितीत येवून पोचला आहे.
खड्ड्यामुळे गाडी, बॉडी आणि इज्जत गेल्याची तीनचाकी वेदना रिक्क्षावाल्याच्या मनात ठसठसत आहे आणि आपण  मात्र ‘वाट माझी बघतोय रिक्क्षावाला’ गाण्यावर कुठल्याही लग्न समारंभात निर्लज्जपणे नाचत रिक्क्षावाल्यांच्या समस्यांची वाट लावतो आहोत.

Tuesday, December 24, 2013

जमीन विकून पुरस्कार दिला। प्रेमे गौरविला कार्यकर्ता॥

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 24 डिसेंबर 2013
                                                                   पुरस्कार प्रदान सोहळा
डावीकडून - श्रीरंगनाना मोरे, शरद जोशी, ब.ल.तमासकर, भास्कर चंदनशिव, वामनराव चटप

कुठलाहि पुरस्कार म्हणजे कसे चित्र उभे राहते? एखादे अण्णासाहेब, दादासाहेब, रावसाहेब, नानासाहेब यांची शासकीय अनुदानावर पोसलेली संस्था असते. त्यातील कर्मचार्‍यांच्या पगरातून कपात करून हे दादासाहेब, रावसाहेब एखाद्या पुरस्काराचा जंगी फड लावतात. शिवाय यालाच समाजसेवा म्हणून सगळीकडे मिरवले जाते. पुरस्काराला येणारा पाहुणा या शासकीय पैशावर पोसलेल्या बांडगुळांच्या झगमगाटाला भुरळतो. आणि समाजाला अशा समाजसेवकांची कशी गरज आहे हे कंठशोष करून सांगतो. आपल्या मानधनाचे जाडजुड (त्याच्या दृष्टीने जाडजूड अन्यथा दादासाहेब, रावसाहेबांना ही रक्कम म्हणजे चिल्लर- एका रात्रीत उधळण्याइतकी) पाकिट स्विकारत आपल्या गावी परत जातो.
अंबाजोगाईच्या ज्ञानश्री प्रतिष्ठानचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार मात्र अतिशय वेगळ्या जातकुळीचा. जातकुळीचा म्हणायचे कारण मंचावरून प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीरंगनाना मोरे आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आम्ही तीन भावू. त्यातला मी थोरला.’’ ऐकणार्‍यांना वाटले नाना आपल्या कौटूंबिक बाबींबद्दल बोलत आहेत. ‘‘ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी धाकले भास्कर भावू, आणि त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी धाकले शरद जोशी.’’ एक मराठा, एक माळी, एक ब्राह्मण हे तीन भावू. नुसती जातकुळीच नाही तर ‘‘माझे सहकारी अमर हबीब’’ म्हणत नानांनी धर्मकुळीही ओलांडली.
श्रीरंगनाना मोरे यांनी अंबाजोगाईला शरद जोशींच्याही आधी शेतकरी संघटना सुरू केली. त्यांनी शरद जोशींचे विचार ऐकले  आणि मोकळेपणाने, मोठ्या मनाने आपली संघटना शेतकरी संघटनेत विलीन केली. नानांनी आपली दोन एकर जमीन विकली. ती रक्कम बँकेत ठेवली आणि तिच्या व्याजावर दरवर्षी एक लाख रूपयांचा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार सुरू केला. नाना वारकरी घराण्यात जन्मले. ‘‘आजच्या काळात वारकरी म्हणजेच शेतकरी हे माझ्या लक्षात आले. आणि शेतकर्‍यांच्या दु:खाला वाचा फोडणारा शरद जोशी हाच आमचा विठ्ठल’’ इतकी स्वच्छ नितळ भावना नानांनी मनी बाळगली. पहिला पुरस्कार अर्थातच शरद जोशींना दिला. रा.रं.बोराडे यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार कोणाला देणार हा प्रश्न बोराडे सरांनी तेंव्हाच विचारला होता.
गेली तीस वर्षे तन (शरिर फाटके) मन(खंबीर) धनाची (खिसा फाटका) खर्‍या अर्थाने पर्वा न करता शेतकरी संघटनेत झोकून देणार्‍या ब.ल.तामसकर यांचे नाव निश्चित झाले आणि सर्वच कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. मी ज्या ‘जातकुळीचा’ उल्लेख सुरवातीला केला आहे. त्याच पंगतीतले पुढेच नाव म्हणजे ब.ल.तामसकर. आजतागायत त्यांची जात जवळच्या लोकांना कळली नाही. अमर हबीब यांनी या संदर्भात मोठी करूण आठवण मला सांगितली. ब.ल. यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी अमर हबीब औंढा नागनाथला ब.ल.च्या गावी गेले होते. अंत्यसंस्काराच्यावेळी ब.ल.ची जात उघडी पडली असं अमरनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. ब.ल. तामसकर यांचे नाव बब्रुवान आहे हेही कुणाला माहित नाही. त्यांना सगळे ब.ल. असंच म्हणणार.
कुणाला कार्यकर्त्याची व्याख्या करायची असेल तर मराठवाड्यात ब.ल.पेक्षा लायक माणूस कोणीच सापडणार नाही. ब.ल. यांच्याकडे चारचाकी तर सोडाच पण दोन चाकीही गाडी नाही. सायकलही नाही. कोणालाही झापू शकणारी झणझणीत जीभ हे ब.ल. यांचे खरे भांडवल. भाषणात शरद जोशी यांनीही त्यांना विचारले, ‘‘तूम्ही सगळ्यांना शिव्या देता, कुत्र्या म्हणता. मलाही कदाचित कधी माघारी म्हणाला असाल.’’ निर्मळ मनाचा क्षोभक कार्यकर्ता असे वर्णन शरद जोशी यांनी त्यांचे केले आहे.
मंचावर पाहुण्यांच्यामध्ये चांगल्या कपड्यात बसलेले  ब.ल.खुप अवघडल्यासारखे दिसत होते. मला तर भिती वाटत होती की कुठल्याही क्षणी ते उठून सरळ चालायला लागतील.
1983 साली ब.ल.पहिल्यांदा माझ्या घरी आले तेंव्हा त्यांचे वर्णन कुसुमाग्रजांच्या कवितेमधल्या सारखेच होते, ‘‘कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी’’. बरं परत पैश्याच्या बाबतीतही कवितेत शोभणारीच स्थिती, ‘‘खिश्याकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला...वगैरे’’ अर्थात त्यांच्या बाबतीत एकटेपणाला जराही संधी नाही कारण ब.ल. सतत कशात तरी पूर्णपणे गुरफटलेलेच राहिले आहेत. ब.ल.यांना मिळालेला हा एक लाख रुपयांचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार पद्मश्री पेक्षाही मोठा आहे असं गुणवंत पाटील म्हणाले ते खरंही आहे. ब.ल.यांना तसे पैशाचे महत्त्व नाही. त्यांनी पोट भरण्यासाठी काय उद्योग केला हे कुणालाही माहित नाही. त्यांचे मराठवाडा विकास आंदोलनातले सहकारी नरहर कुरूंदकरांचे जावाई दीपनाथ पत्की यांनी मला एकदा सांगितलं होतं, ‘‘ब.ल.हा माझा जुना मित्र. त्याची नेहमी अडचण असायची. पण त्यानं मलाच काय पण कुणालाही पैसे मागितल्याचे माहित नाही.’’ माझी आजी तेंव्हा माझ्या वडिलांना गमतीने म्हणायची, ‘‘तूझ्या ब.ल.ला दोन दिवस सर्फ मध्ये बुडवून ठेव. म्हणजे जरा स्वच्छ होईल.’’ ब.ल. हे भणंग कार्यकर्त्यासारखे पायी, मिळेल त्या वाहनाने, कशाचीही पर्वा न करता फिरणार. मग कपड्यांना इस्त्री करायची कुठून? सर्वसामन्य जनतेत कायम रमणार्‍या माणसाने घामाचा वास आणि धुळीचा सहवास टाळायचा कसा?
मराठवाडा विकास आंदोलनात वसमत येथे 1974 रोजी लिपीकाच्या भरतीसाठी प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात पोलिसांनी गोळीबार केला आणि 2 युवक ठार झाले. तेंव्हा या गर्दीचे नेतृत्व करीत होते ब.ल.तामसकर. त्यांच्या जहाल भाषणाने पोलिसांची डोकी भडकली. खरं तर ब.ल. तेंव्हा सर्वसामान्य बेरोजगार युवकांच्या काळजातील वेदना आपल्या शब्दांत मांडत होते.
‘शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत आलो आणि मला मोठा कॅनव्हास मिळाला.’ असे मोठे अभिमानाने पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात उभं राहून भाषण न करू शकणारे शरद जोशी यांनी आज ब.ल.यांच्या पुरस्कार सोहळ्यात मात्र उठून भाषण केलं. त्यात श्रीरंगनाना यांच्याबद्दल जी आदराची भावना होती त्या सोबतच ब.ल.सारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या निष्ठेचाही भाग होता.
एरवी मोठी जहाल भाषणं करणार्‍या ब.ल.यांना यावेळेस मात्र बोलता आलं नाही. गहिवर दाटला म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच मंचावर दिसत होतं. शरिरात रक्त असेपर्यंत मी चळवळीचा झेंडा खाली ठेवणार नाही अशी घोषणाच त्यांनी केली. खरं तर ब.ल.यांच्याकडे पाहिल्यावर यांच्या शरिरात रक्त असेलच किती असा प्रश्न सहजच मनात येतो. कारण दिसतात ती फक्त हाडं. पण अशा कार्यकर्त्यांमध्ये उर्जा प्रचंड असते.
आज कार्यकर्ता म्हणजे नेत्यासाठी हप्ते वसूल करणारा आणि त्याचे हप्ते दुसर्‍यांना पोचविणारा दलाल असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर साक्षात आपल्या नेत्याला शरद जोशींना, ‘‘तूम्ही तूमच्या गाडीनं जा. मला यायचे नाही. मी आपला माझ्या पद्धतीनं पायी फिरून प्रचार करतो आहे.’’ असं सुनावणारा ब.ल.तामसकर सारखा कार्यकर्ता ठसठशीतपणे उठून दिसणारच.
श्रीरंगनाना मोरे सारख्या एका निष्ठावान शेतकर्‍याला, वारकर्‍याला असं मनापासून वाटलं की आपण ज्या चळवळीत खस्ता खाल्ल्या, हाल सहन केले, कुठल्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही त्या चळवळीतील कार्यकर्त्यासाठी कृतज्ञता म्हणून एक पुरस्कार सुरू करावा. ही भावना आजच्या काळात खरंच फार महत्त्वाची आहे.
सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे काम करणारे कार्यकर्ते आज मिळणं मुश्किल गोष्ट होवून बसली आहे. आणि समाजातील प्रश्न तर वाढतच आहेत. शेतकरी चळवळीनं भारत वि.इंडिया अशी मांडणी केली होती. इंडिया म्हणजे सगळे शहरी तोंडवळ्याचे नोकरदार लोक भारतातील शेतकर्‍याला लूटत आहेत. आज परिस्थिती अशी आली आहे की भारत तर लूटून कंगाल झाला. आता या नोकरदारांनी इंडियालाही लुटायला सुरवात केली आहे.
मला एका गोष्टीचे कोडे उलगडत नाही. 25 वर्षांपूर्वी कापुस आंदोलनात सुरेगाव (जि.हिंगोली) येथे गोळीबार झाला होता. 3 शेतकरी हुतात्मा झाले. त्यात माझ्या वडिलांना 10 दिवसांचा तुरूगवास परभणीला झाला होता. आज शहरात आलेला मी त्यांचा मुलगा शहरातल्या रस्त्यांसाठी आंदोलन करतो आणि मला हर्सूल तुरूंगात पाठविण्यात येते. काल जी स्थिती भारताची होती ती आज इंडियाची झाली आहे. अशा काळात ब.ल.सारखे कार्यकर्ते हवे आहेत. छोटं मोठं आंदोलन केलं की सगळ्यांना वाटतं, ‘‘कशासाठी केलं? आता निवडणुकीला उभं राहणार का? याला यातून काय भेटणार?’’ आणि वर्षानुवर्षे आंदोलन करणारे, तुरूंगात जाणारे, लाठ्या काठ्या खाणारे ब.ल.सारखे लोक पायी भणंग फिरत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की आपली आपल्यालाच लाज वाटते.

Sunday, December 22, 2013

पाडगांवकरांनी फेडली महाभारताची वस्त्रे !

रविवार दि. २२ डिसेंबर  दै. म.टा. "संवाद" पुरवणी मधील लेख… 

राजहंस प्रकाशनाने त्यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त (60 वर्षे पूर्ण) महत्वाकांक्षी योजना म्हणून कथारूप महाभारताचे  दोन खंड प्रकाशीत केले आहेत. या कथारूप महाभारताची जाहिरात ‘‘पाडगांवकरांचे महाभारत’’ अशी ठळक स्वरूपात करण्यात आली. ज्या मुळ पुस्तकावरून हे महाभारत पाडगांवकरांनी बेतले आहे त्या कमला सुब्रह्मण्यम यांचे नाव बारीक अक्षरात टाकण्यात आले आहे. स्वाभाविकच राजहंसला या कथेतले पाडगांवकरांचे मोठे योगदान अधोरेखित करावयाचे असावे. 

या महाभारताच्या पहिल्याच पानावर ‘‘तिच्या मनातली लज्जा व्यक्त करणारे तिचे हात राजाने आपल्या हातात घेतले...’’ हे वाक्य वाचताच मी अडखळलो. कमला सुब्रह्मण याचे मूळ पुस्तक मिळवले. आणि लक्षात आले की पाडगांवकरांनी अक्षरश: शब्दश: भाषांतर केले आहे. शाळकरी मुलांनी इंग्रजी उतार्‍याचे ओळींवरून मराठी भाषांतर करावे असा हा प्रकार आहे. 

बरं हे भाषांतरही बर्‍याच ठिकाणी मुळ शब्दांना सोडून गेले आहे. ‘reluctant  चे भाषांतर लज्जा व्यक्त करणारे हात असं होईल की ‘आढेवेढे घेणार्‍या तिचे हात’ असे होईल?

गंगा अदृश्य झाल्यावर शंतनू राजाची मनस्थिती व्यक्त करताना पाडगांवकर लिहीतात, ‘ वेदनेने भरलेले क्षण अनेक घटका मनाने पुन्हा जगत राहिला राजा शंतनू : गंगेच्या सहवासातले अखेरचे काही क्षण !’ आता ही वाक्यरचना काय आहे? अशा पद्धतीने मराठी भाषेत वाक्यरचना संभवते का? 

आदिपर्वात ‘भीष्मप्रतिज्ञा’ नावाचे छोटे प्रकरण आहे. शीर्षकात प्रतिज्ञा हा शब्द वापरणारे पाडगांवकर संपूर्ण प्रकरणात मात्र ‘शपथ’ वापरतात. आता शपथ आणि प्रतिज्ञा यातला फरक पाडगांवकरांना कळत नाही का? ही प्रतिज्ञा तर हास्यास्पदच करून टाकली आहे. ‘‘ स्वर्ग  आणि पृथ्वी यांची, माझे गुरू भगवान भार्गवांची, माझी माता गंगा हीची, धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, मी लग्न करणार नाही!’’ 

आता मुळ पुस्तकात जो उतारा आहे त्यानुसार ‘‘स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यातील सर्वांच्या साक्षीने, माता गंगा, े गुरू भार्गव व धर्माला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की...’’ असे भाषांतर व्हायला हवे होते. पुढे सभापर्वात द्रौपदीवस्त्रहरण प्रसंगी.. ‘अर्जूनाने भीतीदायक शपथ घेतली. तो म्हणाला, मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की....’ असा शपथ व प्रतिज्ञेचा घोळ पाडगांवकरांनी घातला आहे.  यातच पुढे अंबेची ‘शोकात्मिका’ असा शब्द आला आहे. पाडगांवकरांना शोकांतिका म्हणायचे  आहे का? पाडगांवकरांच्या समोर कोण गणपती बसला होता कोणास ठाऊक कारण त्यानं काहीही शंका न विचारता सारं निमूटपणे लिहून घेतलं आहे असं दिसतं आहे. 

बरं हे भाषांतर शब्दश: करता करता काही परिच्छेद पाडगांवकर कदाचित वृद्धापकाळामुळे असेल सहज विसरून जातात. सत्यवती भीष्माला लग्न करण्याचा आग्रह धरते या प्रसंगात भीष्माला  भूतकाळ आठवतो असे जे वर्णन आहे ते पाडगांवकर गाळून टाकतात. सुरवात एका परिच्छेदाची आणि बघता बघता दूसर्‍या परिच्छेदातील काही वाक्य जोडून ते शेवट करतात. (इंग्रजी महाभारत पृ. 18-19) 

लहान पाच पांडव हाती घेवून कुंती हस्तीनापूरला परत येते. कौरवांसोबत आता पांडव खेळायला लागतात या प्रसंगाचे वर्णन करताना दुर्योधनाच्या मनस्थितीचे वर्णन करणारा सुंदर परिच्छेद असाच पाडगांवकरांनी केवळ दुर्लक्षामुळे गाळला आहे (इंग्रजी महाभारत पृ. 36). या गाळा गाळीचा कहर ‘लाक्षागृह’ प्रकरणात झाला आहे. वारणावत नगरातील गोर- गरिबांसाठी कुंती अन्नदानाचा संकल्प करते. त्यासाठी लोक गोळा होतात. त्यात एक निषाद स्त्री आपल्या पाच पुत्रांसह येते. तिला भरपूर खाऊ पिऊ घालण्यात येते. ते सगळे तिथेच झोपी जातात. मग रात्री पांडव या घराला आपणच आग लावतात. आता अन्नदानाचा प्रसंग मूळ पुस्तकात आहे. पांडगांवकर मात्र तो गाळून पुढे जातात. बरं पुढे युद्धिष्ठिराच्या बोलण्यात हे मागचे संदर्भ येतात आणि तेही पाडगांवकर तसेच ठेवतात. (इं.म. पृ. 70)

गुरू द्रोणाचार्यांबद्दल सांगताना, ‘...द्रोण यांचे गुरू भार्गव. भार्गव हे महान ऋषी भारद्वाज यांचे पुत्र.’’ आणि लगेच पुढच्यात प्रकरणाच्या पहिल्याच परिच्छेदात, ‘ द्रोण भार्गवांना म्हणाले, माझे नाव द्रोण, मी भारद्वाजांचा पुत्र.’’ आता पाडगांवकर चुकले का राजहंस च्या संपादक मंडळाला डुलकी लागली?

या महाभारतात धनुष्याला ‘दोरी’ असते. ‘प्रत्यंचा’ हा जो शब्द मराठीत त्यासाठी खास करून वापरला जातो याची कल्पना कदाचित पाडगांवकर आणि संपादक मंडळाला नसावी. पुढे जरासंध प्रकरणात चंडकौशिक ऋषींचा उल्लेख चंद्रकौशिक असा आहे. आता चंड म्हणजे सूर्य. चंड आणि चंद्र सारखे कसे होतील? 

द्रौपदीस्वयंवराच्या प्रसंगी जे धनुष्य वापरले त्याचे नाव ‘किंधूर’. त्याची दोरी पोलादाची होती असं लिहीलं आहे. आता पोलादाचा शोध कधीचा? बरं याच स्वयंवरात कर्ण पाच बाण मारतो पण केसाच्या अंतराने त्याचे पाचही नेम हुकतात असं लिहीलं आहे. मुक्तेश्वरांनी आपल्या महाभारतात कर्णाची फजिती झाली असंच लिहीलं आहे. याचा समाचार घेताना डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी आक्षेप घेत असं नोंदवले आहे की ‘‘कर्ण पण जिंकू शकेल अशी खात्री होती, त्याने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण मारणात तितक्यात द्रौपदी म्हणते, नाऽहं वरयामि सूतम् (मुळ महाभारत 1/187/23). जर मुक्तेश्वर म्हणतात तसे असते तर द्रौपदीच्या वाक्याला काही अर्थच राहत नाही. आणि मग पुढचे सगळे नाट्यच संभवत नाही.’’ हा जो आक्षेप 70 वर्षांपूर्वी मुक्तेश्वरांवर नांदापुरकरांनी घेतला तो तसाच आज पाडगांवकरांवर घ्यायचा का? 
पुढे मयसभेच्या प्रसंगात, ‘आंधळ्या राजाचे पुत्रही अंध’ असे वाक्य द्रौपदीच्या तोंडी प्रसिद्ध आहे ते पाडगांवकरांनी घेतले नाही. बरं पाडगांवकर दंतकथा टाळत आहेत असं म्हणावं तर तसंही नाही. द्रौपदी वस्त्राहरणाच्या वेळेस मात्र कृष्ण वस्त्र पुरवल्याची दंतकथा घेतली आहे. पितामह भीष्म रणांगणात असेपर्यंत मी शस्त्र हाती घेणार नाही ही कर्णाची प्रतिज्ञा पाडगांवकरांनी गाळली आहे. म्हणजे काही एक धोरण पाडगांवकर अवलंबितात असेही नाही. काही घेतलं आणि काही गाळलं असंच हे प्रकरण आहे.

मयसभा प्रकरणांत मयासुर संपत्ती आणण्यासाठी कैलास पर्वताजवळील मैनाक पर्वताच्या हिरण्यश्रृंग पर्वतशिखराकडे जातो. तिथे त्याने संपत्ती पुरून ठेवली होती असा उल्लेख महाभारतात आहे. पाडगांवकरांचा मयासुर पर्वतशिखराच्या कपारीत संपत्ती पुरून न ठेवता सरोवरात पुरून ठेवतो. आता सोने नाणे रत्ने एकवेळ सरोवरात पुरता येतील पण बांधकामाचे साहित्य रंग हे सरोवरात कसे पुरणार?

या चुका मुळ कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारतातही आहेत. दुर्योधनाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना त्यांना अचानक शेक्सपिअरच्या वाङ्मयातले उतारे आठवतात. (इं.म. पृ.155) नशिब पाडगांवकरांनी त्याचेही भाषांतर करून या पुस्तकात दिले नाही.

जसंच्या तसं भाषांतर करण्याच्या नादात मराठीतील वाक्यरचना वेगळी असते हेही विसरल्या गेलं आहे.  Let them wait. Let them just wait ’ याचे भाषांतर ‘त्यांना थांबू द्या. त्यांना फक्त थांबू द्या.’ असं कसं होईल? (पृ.285)
‘खरखरीत सालीचे कपडे’ असं वर्णन करण्याऐवजी वल्कले असा शब्द वापरता आला असता नं! बरं परत ‘आपल्या  वस्त्राच्या खरखरीत कापडाने त्याने तिचे नाजूक डोळे पुसले’ असंही लिहीलं आहे. पुढे कर्णाला सूर्य भेटून इंद्राचा कट सांगतो आणि ‘तूझ्या शरिराची राख झाल्यावर तूझी ही राख उरेल’ असं म्हणतो. ही शब्दरचना कशासाठी? ‘सुगंधाची झुळूक’ का ‘सुगंधी झुळूक’? ‘तो वेगवेगळ्या राजांशी युद्ध करून त्यांना जिंकण्याच्या दौर्‍यावर गेला होता’(पृ.408). विराटपर्वात- ‘तो आपल्या बहिणीच्या राजवाड्यात गेला’ आता राजा आणि राणी यांचा राजवाडा वेगळा असतो का? इथे बहिणीच्या महालात गेला असं तरी हवं. ‘आपले हात घट्ट हातात घेतले गेले आहेत हे कीचकाला कळले’(पृ.420), ‘वासनांधतेमुळे त्याला दुबळीक आली होती’ (पृ. 421),  ‘त्यांची घबराट सुरूवात झाली आहे’ (पृ. 541). ‘युद्धिष्ठीर आपल्या सिंहासनावरून राज्य करीत होता’. (पृ. 481) मग कुठून राज्य करणार? ‘तू तूझ्या मातेच्या हृदयाला दु:ख करू नकोस’ (पृ. 568). मग काय मातेच्या फुफ्फुसाला दु:ख होत असतं? उद्योगपर्वात पांडवांच्या भेटीसाठी शल्य जातो. पांडवांचा मुक्काम उपप्लाव्य नगरीत असतो. आता ‘शल्य उपप्लाव्याकडे’ गेला असा शब्दप्रयोग कसा करता येईल? शल्य उपप्लाव्य नगरीकडे गेला असा करावा लागेल ना. ‘..माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू सांगितल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’ (पृ. 603), ‘माझं हृदय आज युद्धिष्ठीराकडे जाऊन भाऊ म्हणून त्यचा स्वीकार करायला ओढ घेतं आहे.’ (पृ.604) अशा कैक विचित्र वाक्यरचना या पुस्तकात विखुरल्या आहेत. 

उद्योगपर्वात पुढे संजय पांडवांच्या भेटीसाठी जातो. त्याला युद्धिष्ठीर म्हणतो, ‘दुर्योधन आणि त्याचे मित्र आमची जशी आठवण त्यांनी केली पाहिजे तशी करताहेत, अशी मला आशा आहे.’ (पृ.505) आता ही वाक्यरचना मराठीत कशी शोभून दिसणार?  मग ही अशी वाक्यरचना आलीच कशी? कारण मुळ इंग्रजीत, ‘ I only hope Duryodhana and his friends remember us as we ought to be remembered’ लिहीलेलं आहे म्हणून. याच उद्योगपर्वात दुर्योधन म्हणतो, ‘भीम म्हणजे गाय आहे.’ मुळ पुस्तकात ‘cow’ हा शब्द अवतरणात दिला आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे की गायीसारखा भित्रा किंवा अत्यंत भयभीत झालेला. 
व्याकरणाची तर पार एैशी तैशी केली आहे. वनवसात युद्धिष्ठिर द्रौपदीला म्हणतो आहे, ‘संयम हा स्वच्छंदी स्त्री सारखा आहे. आपलं राहण्याचं ठिकाण म्हणून ती काही माणसांची निवड करते. तिची तूझ्यावर मर्जी नाही.’ आता यात संयम हा  पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? संयम ही स्त्री निवड करते म्हणावे तर इतकी गुंतागुंतीची वाक्यरचना कशाला? याच प्रसंगात भीम युद्धिष्ठीराला आदारार्थी  संबोधून सुरवात करतो आणि बोलता बोलता मग एकेरी संबोधू लागतो. कृष्ण शिष्टाईसाठी हस्तीनापुरात आला असता विदूराला भेटतो तेंव्हा - 

‘आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी कृष्णाचे स्वागत केले. कुंतीचे पुत्र कसे काय आहेत याची त्याने कृष्णाकडे चौकशी केली.’ (पृ. 557) पहिल्या वाक्यात ‘त्यांनी’ आणि दुसर्‍या वाक्यात ‘त्याने’.  पांडवांचा निरोप धृतराष्ट्राला देण्याचे जेंव्हा युद्धिष्टीर सांगतो तेंव्हा संजय म्हणतो, ‘आमच्या राजाचं विचारांचं मी केवळ वाहन आहे.’ (पृ. 516) म्हणजे संजय हा राजाचंपण वाहन आहे का? राजाच्या विचारांचे मी वाहन आहे असे वाक्य हवे होते.  

वनवासात द्रौपदीला सुगंधी फुलांचा मोह होतो व भीम तीच्यासाठी ती फुलं तोडून आणतो. ही फुलं म्हणजे ‘सौगंधी’ नावाचे कमळ. तसा उल्लेख मुळ महाभारतात आहे. पण इंग्रजी पुस्तकात नदीच्या पाण्यावरची फुलं असं लिहीलं आहे. आता नदिच्या पाण्यावर कुठलेच फुल येत नाही. मग भाषांतर करताना पाडगांवकरांनी नदीच्या काठावरची फुलं अशी तडजोड केली आहे. खरं तर ही सरोवरातील कमळं आहेत. 
विराटपर्वात राजपुत्र उत्तर याला अर्जून लढण्यास तयार करतो. तो त्याला आपण अर्जून असल्याचे सांगतो. लपवून ठेवलेली शस्त्रे दाखवतो. या शस्त्रांवर पांडवांच्या नावाची ‘अद्याक्षरे’ कोरली आहेत असं पाडगांवकर लिहीतात. म्हणजे अर्जूृनाच्या धनुष्यावर ‘A P ’ अर्जून पंडूराव पांडव असं लिहीलं असेल का? इंग्रजी पुस्तकांत monogram हा शब्द आहे. याचे भाषांतर अद्याक्षरं होईल का बोधचिन्ह होईल? 

याच विराटपर्वात आणि इतरत्रही दिवाणखाना, जनानखाना, कत्तल, बुरखा, मशहुर, सन्नाटा असे शब्द आलेले आहेत. हे शब्द महाभारत लिहीताना चालतिल का?  ‘शाब्बास ! उत्तम !! हे शब्द पांडवांच्या तंबूत घुमले.’ (पृ. 551) आता युद्धच सुरू झाले नाही तर मग तंबू कुठून आला?

कृष्ण शिष्टाईसाठी हस्तीनापुरला जातो तेंव्हा ‘विदूरा घरचं अन्नच मी खाईन’ (पृ. 560) असं म्हणतो. आता इथे ‘विदूराच्याच घरचं अन्न’ असं तरी हवं किंवा ‘विदूराने दिलेले अन्नच’ असं तरी हवं. 

या पुस्तकात फक्त वाक्यरचनेच्याच चुका आहेत असं नाही तर मजकुराच्याही मोठ्या चुका आहेत. मुळ 18 पर्वाचे महाभारत कमला सुब्रह्मण्यम यांनी 10 पर्वात बसवलं आहे असं संपादकियात सदानंद बोरसे हे लिहीतात. आता उर्वरीत जी 9 पर्व आहेत ती सर्व उपसंहारात गुंडाळली आहेत. त्यांच्या नावांचे उल्लेख तरी करायचे. ही गाळलेली नावे अशी- सौप्तिक पर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व, अनुशासन पर्व, आश्वमेधिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व, स्वर्गारोहण पर्व. 

शांतीपर्वास महाभारताचे सार मानले गेले आहे. मग या पर्वावर स्वतंत्र प्रकरण का लिहावे वाटले नाही? महाभारत म्हणजे फक्त युद्ध नसून प्रचंड मोठी अशी तत्त्वचर्चा त्यात केलेली आहे. जशी गीता महाभारताचा भाग आहे तसंच भीष्मानी मृत्यूपूर्वी म्हटलेले विष्णुसहस्रनामही आहे. युद्धाची वर्णनं तर अतिशय साचेबद्ध पद्धतीनं केलेली आहेत. प्रत्येकजणच शुरपणे लढतो आणि प्रत्येकजणच दुसर्‍याच्या धनुष्याचे दोन तुकडे करतो. 

युद्ध संपल्यानंतरच्या शेवटच्या रात्री अश्वत्थामा पांडवांच्या शिबीरात शिरतो. धृष्ट्यदुम्नाला लाथ मारून उठवतो. त्याचा गळा दाबून प्राण घेतो. त्याच्या शवाला लाथ मारून पुढे जाते. असे वर्णन आहे. या पुस्तकातला अश्वत्थामा, ‘अश्वत्थाम्याने धनुष्याची दोरी धृष्टद्युम्नाच्या गळ्यातभोवती आवळून त्याचा जीव घेतला. त्याचा जीव जाईपर्यंत तो त्याच्यावर लाथांचा प्रहार करीत होता.’ (पृ. 982) आता गळा दाबताना लाथा कशा मारायच्या? जीव गळा दाबल्याने जाणार आहे का लाथा मारल्याने? 

वाक्यरचनेच्या ज्या चुका आहेत त्या मुळात पाडगांवकरांच्याच आहेत कारण त्यांनी केलेली इतर भाषांतरेही अशीच दोषास्पद आहेत. ज्यूलिअस सीझर मधील या ओळी पहा, ‘खरंच ब्रूटस, थोर आहेस तू, तरी मला वाटतं, जरी उंची धातूची तुझी थोरवी असली तरी तिला ज्याची संगत त्या हीणकस धातूचा आकार देता येईल.’ (ज्यूलिअस सिझर, पृ. 107, मौज प्रकाशन गृह). पाडगांवकरांचा कबीराचा अनुवादही असाच फसला आहे. बायबलचे त्यांनी केलेले भाषांतर तर इतके रूक्ष आहे की वाचवत नाही. त्याऐवजी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी राजहंस साठीच केलेले बायबल वाचावे. ते अतिशय रसाळ व चांगले उतरले आहे. कदाचित राजहंस च्या संपादकांची ‘नजर’ त्यावरून फिरली नसावी म्हणून ते चांगले उतरले. 
पाडगांवकरांनी मनोगतात असे लिहीले आहे की कॉलेजमध्ये असतांना त्यांना महाभारतकार व्यास आणि नाटककार शेक्सपिअर ने अक्षरश: भारून टाकले होते. त्यांनी त्याच वयात हे भाषांतर केले असते तर निदान ते प्रामाणिकपणे तरी उतरले असते.

मराठीत अनुवाद/भाषांतराची अतिशय चांगली पुस्तके आहेत. राम पटवर्धन (मार्जोरी रोलिंग्ज- पाडस), जी.ए.कुलकर्णी (कॉनराड रिश्टर-रान,गाव,शिवार), उमा वि.कुलकर्णी (भैरप्पांची पुस्तके), भारती पांडे (काळी-पर्ल बक) ही चांगल्या अनुवादाची काही सहज आठवली ती नावे. मग पाडगांवकरांनी असा खडबडीत अनुवाद का केला असावा?
महाभारतावरची तर कितीतरी पुस्तके मराठीत आहेत. मुक्तमयुरांची भारते-डॉ.ना.गो.नांदापुकर, व्यासपर्व-दुर्गा भागवत, युगांत-इरावती कर्वे, व्यासांचे शिल्प-नरहर कुरूंदकर, महाभारताचे वास्तव दर्शन-अनंत महाराज आठवले, महाभारत : संघर्ष आणि समन्वय- रवींद्र गोडबोले,  धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे- विश्वास दांडेकर ही काही ठळक नावे. शिवाय रा.शं.वाळिंबे यांनी सिद्ध केलेले महाभारताचे 11 खंड, प्राचार्य द.गो. दसनूरकर यांचे दहा खंडाचे ‘आपले महाभारत’ ही संपूर्ण महाभारताची कथा सांगणारे बृहत ग्रंथही आहेत. या सगळ्यांचा आधार घेवून पाडगांवकरांना एक महाभारत लिहीता आले असते.    

पण तसे न घडता या पुस्तकाच्या निर्मितीकडे ‘मोठ्या माणसांची गद्य अमर चित्रकथा’ या दृष्टीने पाहण्यात आले आहे असे जाणवते. पुस्तकाचे मुखपृष्ठ रवी परांजपे यांनी अतिशय बाळबोध केले आहे. महाभारत म्हणजे सिंहासन, धनुष्य बाण, सारीपाट-सोंगट्या, पडदे त्यांना संगीत नाटकासारखे गोंडे, मोडलेला रथ, बाणांचा भाता, ज्वाळा, ढाल इतकी ढोबळ संकल्पना सामान्य रसिकांची असावी असा समज रवी परांजपे यांचा दिसतो आहे. शिवाय महाभारताचे सिंहासन गुलाबी, निळ्या रंगात रंगवून महाभारताचा संघर्ष फारच ‘रोमँटिक’ होता असे वाटते. आतली चित्रेही याला पुरक आहेत. 
महाभारतावर अतिशय चांगली पुस्तके मराठीत होती आणि आताही येत आहेत. नुकतेच देशमुख आणि कंपनीने रवींद्र गोडबोले यांचे ‘महाभारत- संघर्ष आणि समन्वय’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. अतिशय चिकित्सकपणे त्यांनी महाभारताचा अभ्यास यात मांडला आहे. द्युत म्हणजे काय? ते कसे खेळले जाते? याची वेगळी माहीती यात दिली आहे. बेहड्याच्या टणक बियांच्या सहाय्याने हा द्युत खेळल्या जातो. याचे एक अतिशय मोलाचे विश्लेषण रवी गोडबोले देतात. हे सगळं कदाचित पाडगांवकरांच्या गावीही नाही. त्यांच्याच काय पण चित्रकार रवी परांजपेंच्याही गावी नाही. मग सापशिडी, किंवा ल्युडो खेळताना ज्या सोंगट्या वापरतात तसा काहीसे ठोकळेबाज चित्र या महाभारताच्या मुखपृष्ठावर रंगवले गेले आहे.

अतिशय पोरकटपणे हे महाभारताचे प्रकरण पाडगांवकरांनी हाताळले आहे. आणि पाडगांवकरांचा शब्द म्हणजे देवाचा शब्द असे प्रमाण मानून संपादकांनी त्यावरून नुसतीच नजर फिरवली आहे असे दिसते. 

असले पोरकट महाभारत जे की पोरांनाही समाधान देवू शकत नाही प्रकाशीत करून राजहंस ने आपल्या हिरक महोत्सवात आणि पाडगांवकरांनी आपल्या सहस्रचंद्रदर्शन वयात काय मिळवले तेच जाणो.

(कथारूप महाभारत, राजहंस प्रकाशन, मुळ इंग्रजी- कमला सुब्रह्मण्यम, अनुवाद -मंगेश पाडगांवकर, पृष्ठे 1080, मुल्य 600.)