Tuesday, January 28, 2014

भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014


भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय हर्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.
इतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती.  आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना? मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’
म्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत? आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे?
 आर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उसने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे.  हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.
नेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’
नेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय?’
आता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.
रा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड? आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत? तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.
यानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.
ह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली.  नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.
दुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे? आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.
इतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे.  (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकर vinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

6 comments:

  1. वा ! श्रीकांतभाऊ , तुमचे मन:पूर्वक अभिनंदन ! एका तथाकथित मोठ्ठ्या दिग्ग्जाला हात घातला . राजन खान तर किती वर्षांपासून हेच सांगत आहेत . आता मंगेश काळे व् देवेन्द्र इंगळे सुद्धा लिहू , बोलू लागले आहेत.
    - अशोक थोरात . अमरावती.

    ReplyDelete
  2. वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही.उथळ पाण्याला खळखळाट फार हे सिध्द होते बहुधा या उदाहरणावरून.

    ReplyDelete
  3. धन्यवाद श्रीकांतजी. आभाळाला बोट टेकल्याचा आविर्भाव ज्यांचा असतो, त्यांचेही पाय मातीचेच असतात, एवढी निष्पत्ती मात्र खरी.
    राजन साने

    ReplyDelete
    Replies
    1. आहो मी तेच सांगतो आहे. शिवाय सर्व पत्रव्यवहार वाचा असेही नेमाडे यांच्या भागत गणाला सांगतो आहे. पण कोणी वाचत नाही. शिवाय नेमाडे यांच्या साहित्याबद्दल मी काही टिप्पणी केली नाही. त्यांची पुस्तके गाजवली जातात हा आरोप आहे. आणि तोही नेमाडे यांच्यावर सरळ नसून त्यांचे पंटर जे आहेत त्यांच्यावर आहे...

      Delete
  4. As Human He is very ordinary person. at all time He seems he is great but actually he tel the people look what I am i

    ReplyDelete
  5. फेसबुकवरील तुमच्या कमेंटवरून लिंक घेऊन हा ब्लॉग वाचला. नेमाडे बद्दल पेपरमध्ये आलेल्या बातम्या वाचून आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे आदर होता. पण त्यांच्या विरोधात जे वाचण्यात आले आणि तुमची माहिती यावरून ते विक्षिप्त असावेत असे वाटते.
    अ.भा.म.सा.सं. बद्दल त्यांचे वक्तव्य " बिनकामाचे लोक " पटले नव्हते. शेवटी वर एक आणि आंत दुसरेच हे समजले.

    ReplyDelete