Sunday, December 22, 2013

पाडगांवकरांनी फेडली महाभारताची वस्त्रे !

रविवार दि. २२ डिसेंबर  दै. म.टा. "संवाद" पुरवणी मधील लेख… 

राजहंस प्रकाशनाने त्यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त (60 वर्षे पूर्ण) महत्वाकांक्षी योजना म्हणून कथारूप महाभारताचे  दोन खंड प्रकाशीत केले आहेत. या कथारूप महाभारताची जाहिरात ‘‘पाडगांवकरांचे महाभारत’’ अशी ठळक स्वरूपात करण्यात आली. ज्या मुळ पुस्तकावरून हे महाभारत पाडगांवकरांनी बेतले आहे त्या कमला सुब्रह्मण्यम यांचे नाव बारीक अक्षरात टाकण्यात आले आहे. स्वाभाविकच राजहंसला या कथेतले पाडगांवकरांचे मोठे योगदान अधोरेखित करावयाचे असावे. 

या महाभारताच्या पहिल्याच पानावर ‘‘तिच्या मनातली लज्जा व्यक्त करणारे तिचे हात राजाने आपल्या हातात घेतले...’’ हे वाक्य वाचताच मी अडखळलो. कमला सुब्रह्मण याचे मूळ पुस्तक मिळवले. आणि लक्षात आले की पाडगांवकरांनी अक्षरश: शब्दश: भाषांतर केले आहे. शाळकरी मुलांनी इंग्रजी उतार्‍याचे ओळींवरून मराठी भाषांतर करावे असा हा प्रकार आहे. 

बरं हे भाषांतरही बर्‍याच ठिकाणी मुळ शब्दांना सोडून गेले आहे. ‘reluctant  चे भाषांतर लज्जा व्यक्त करणारे हात असं होईल की ‘आढेवेढे घेणार्‍या तिचे हात’ असे होईल?

गंगा अदृश्य झाल्यावर शंतनू राजाची मनस्थिती व्यक्त करताना पाडगांवकर लिहीतात, ‘ वेदनेने भरलेले क्षण अनेक घटका मनाने पुन्हा जगत राहिला राजा शंतनू : गंगेच्या सहवासातले अखेरचे काही क्षण !’ आता ही वाक्यरचना काय आहे? अशा पद्धतीने मराठी भाषेत वाक्यरचना संभवते का? 

आदिपर्वात ‘भीष्मप्रतिज्ञा’ नावाचे छोटे प्रकरण आहे. शीर्षकात प्रतिज्ञा हा शब्द वापरणारे पाडगांवकर संपूर्ण प्रकरणात मात्र ‘शपथ’ वापरतात. आता शपथ आणि प्रतिज्ञा यातला फरक पाडगांवकरांना कळत नाही का? ही प्रतिज्ञा तर हास्यास्पदच करून टाकली आहे. ‘‘ स्वर्ग  आणि पृथ्वी यांची, माझे गुरू भगवान भार्गवांची, माझी माता गंगा हीची, धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, मी लग्न करणार नाही!’’ 

आता मुळ पुस्तकात जो उतारा आहे त्यानुसार ‘‘स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यातील सर्वांच्या साक्षीने, माता गंगा, े गुरू भार्गव व धर्माला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की...’’ असे भाषांतर व्हायला हवे होते. पुढे सभापर्वात द्रौपदीवस्त्रहरण प्रसंगी.. ‘अर्जूनाने भीतीदायक शपथ घेतली. तो म्हणाला, मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की....’ असा शपथ व प्रतिज्ञेचा घोळ पाडगांवकरांनी घातला आहे.  यातच पुढे अंबेची ‘शोकात्मिका’ असा शब्द आला आहे. पाडगांवकरांना शोकांतिका म्हणायचे  आहे का? पाडगांवकरांच्या समोर कोण गणपती बसला होता कोणास ठाऊक कारण त्यानं काहीही शंका न विचारता सारं निमूटपणे लिहून घेतलं आहे असं दिसतं आहे. 

बरं हे भाषांतर शब्दश: करता करता काही परिच्छेद पाडगांवकर कदाचित वृद्धापकाळामुळे असेल सहज विसरून जातात. सत्यवती भीष्माला लग्न करण्याचा आग्रह धरते या प्रसंगात भीष्माला  भूतकाळ आठवतो असे जे वर्णन आहे ते पाडगांवकर गाळून टाकतात. सुरवात एका परिच्छेदाची आणि बघता बघता दूसर्‍या परिच्छेदातील काही वाक्य जोडून ते शेवट करतात. (इंग्रजी महाभारत पृ. 18-19) 

लहान पाच पांडव हाती घेवून कुंती हस्तीनापूरला परत येते. कौरवांसोबत आता पांडव खेळायला लागतात या प्रसंगाचे वर्णन करताना दुर्योधनाच्या मनस्थितीचे वर्णन करणारा सुंदर परिच्छेद असाच पाडगांवकरांनी केवळ दुर्लक्षामुळे गाळला आहे (इंग्रजी महाभारत पृ. 36). या गाळा गाळीचा कहर ‘लाक्षागृह’ प्रकरणात झाला आहे. वारणावत नगरातील गोर- गरिबांसाठी कुंती अन्नदानाचा संकल्प करते. त्यासाठी लोक गोळा होतात. त्यात एक निषाद स्त्री आपल्या पाच पुत्रांसह येते. तिला भरपूर खाऊ पिऊ घालण्यात येते. ते सगळे तिथेच झोपी जातात. मग रात्री पांडव या घराला आपणच आग लावतात. आता अन्नदानाचा प्रसंग मूळ पुस्तकात आहे. पांडगांवकर मात्र तो गाळून पुढे जातात. बरं पुढे युद्धिष्ठिराच्या बोलण्यात हे मागचे संदर्भ येतात आणि तेही पाडगांवकर तसेच ठेवतात. (इं.म. पृ. 70)

गुरू द्रोणाचार्यांबद्दल सांगताना, ‘...द्रोण यांचे गुरू भार्गव. भार्गव हे महान ऋषी भारद्वाज यांचे पुत्र.’’ आणि लगेच पुढच्यात प्रकरणाच्या पहिल्याच परिच्छेदात, ‘ द्रोण भार्गवांना म्हणाले, माझे नाव द्रोण, मी भारद्वाजांचा पुत्र.’’ आता पाडगांवकर चुकले का राजहंस च्या संपादक मंडळाला डुलकी लागली?

या महाभारतात धनुष्याला ‘दोरी’ असते. ‘प्रत्यंचा’ हा जो शब्द मराठीत त्यासाठी खास करून वापरला जातो याची कल्पना कदाचित पाडगांवकर आणि संपादक मंडळाला नसावी. पुढे जरासंध प्रकरणात चंडकौशिक ऋषींचा उल्लेख चंद्रकौशिक असा आहे. आता चंड म्हणजे सूर्य. चंड आणि चंद्र सारखे कसे होतील? 

द्रौपदीस्वयंवराच्या प्रसंगी जे धनुष्य वापरले त्याचे नाव ‘किंधूर’. त्याची दोरी पोलादाची होती असं लिहीलं आहे. आता पोलादाचा शोध कधीचा? बरं याच स्वयंवरात कर्ण पाच बाण मारतो पण केसाच्या अंतराने त्याचे पाचही नेम हुकतात असं लिहीलं आहे. मुक्तेश्वरांनी आपल्या महाभारतात कर्णाची फजिती झाली असंच लिहीलं आहे. याचा समाचार घेताना डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी आक्षेप घेत असं नोंदवले आहे की ‘‘कर्ण पण जिंकू शकेल अशी खात्री होती, त्याने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण मारणात तितक्यात द्रौपदी म्हणते, नाऽहं वरयामि सूतम् (मुळ महाभारत 1/187/23). जर मुक्तेश्वर म्हणतात तसे असते तर द्रौपदीच्या वाक्याला काही अर्थच राहत नाही. आणि मग पुढचे सगळे नाट्यच संभवत नाही.’’ हा जो आक्षेप 70 वर्षांपूर्वी मुक्तेश्वरांवर नांदापुरकरांनी घेतला तो तसाच आज पाडगांवकरांवर घ्यायचा का? 
पुढे मयसभेच्या प्रसंगात, ‘आंधळ्या राजाचे पुत्रही अंध’ असे वाक्य द्रौपदीच्या तोंडी प्रसिद्ध आहे ते पाडगांवकरांनी घेतले नाही. बरं पाडगांवकर दंतकथा टाळत आहेत असं म्हणावं तर तसंही नाही. द्रौपदी वस्त्राहरणाच्या वेळेस मात्र कृष्ण वस्त्र पुरवल्याची दंतकथा घेतली आहे. पितामह भीष्म रणांगणात असेपर्यंत मी शस्त्र हाती घेणार नाही ही कर्णाची प्रतिज्ञा पाडगांवकरांनी गाळली आहे. म्हणजे काही एक धोरण पाडगांवकर अवलंबितात असेही नाही. काही घेतलं आणि काही गाळलं असंच हे प्रकरण आहे.

मयसभा प्रकरणांत मयासुर संपत्ती आणण्यासाठी कैलास पर्वताजवळील मैनाक पर्वताच्या हिरण्यश्रृंग पर्वतशिखराकडे जातो. तिथे त्याने संपत्ती पुरून ठेवली होती असा उल्लेख महाभारतात आहे. पाडगांवकरांचा मयासुर पर्वतशिखराच्या कपारीत संपत्ती पुरून न ठेवता सरोवरात पुरून ठेवतो. आता सोने नाणे रत्ने एकवेळ सरोवरात पुरता येतील पण बांधकामाचे साहित्य रंग हे सरोवरात कसे पुरणार?

या चुका मुळ कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारतातही आहेत. दुर्योधनाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना त्यांना अचानक शेक्सपिअरच्या वाङ्मयातले उतारे आठवतात. (इं.म. पृ.155) नशिब पाडगांवकरांनी त्याचेही भाषांतर करून या पुस्तकात दिले नाही.

जसंच्या तसं भाषांतर करण्याच्या नादात मराठीतील वाक्यरचना वेगळी असते हेही विसरल्या गेलं आहे.  Let them wait. Let them just wait ’ याचे भाषांतर ‘त्यांना थांबू द्या. त्यांना फक्त थांबू द्या.’ असं कसं होईल? (पृ.285)
‘खरखरीत सालीचे कपडे’ असं वर्णन करण्याऐवजी वल्कले असा शब्द वापरता आला असता नं! बरं परत ‘आपल्या  वस्त्राच्या खरखरीत कापडाने त्याने तिचे नाजूक डोळे पुसले’ असंही लिहीलं आहे. पुढे कर्णाला सूर्य भेटून इंद्राचा कट सांगतो आणि ‘तूझ्या शरिराची राख झाल्यावर तूझी ही राख उरेल’ असं म्हणतो. ही शब्दरचना कशासाठी? ‘सुगंधाची झुळूक’ का ‘सुगंधी झुळूक’? ‘तो वेगवेगळ्या राजांशी युद्ध करून त्यांना जिंकण्याच्या दौर्‍यावर गेला होता’(पृ.408). विराटपर्वात- ‘तो आपल्या बहिणीच्या राजवाड्यात गेला’ आता राजा आणि राणी यांचा राजवाडा वेगळा असतो का? इथे बहिणीच्या महालात गेला असं तरी हवं. ‘आपले हात घट्ट हातात घेतले गेले आहेत हे कीचकाला कळले’(पृ.420), ‘वासनांधतेमुळे त्याला दुबळीक आली होती’ (पृ. 421),  ‘त्यांची घबराट सुरूवात झाली आहे’ (पृ. 541). ‘युद्धिष्ठीर आपल्या सिंहासनावरून राज्य करीत होता’. (पृ. 481) मग कुठून राज्य करणार? ‘तू तूझ्या मातेच्या हृदयाला दु:ख करू नकोस’ (पृ. 568). मग काय मातेच्या फुफ्फुसाला दु:ख होत असतं? उद्योगपर्वात पांडवांच्या भेटीसाठी शल्य जातो. पांडवांचा मुक्काम उपप्लाव्य नगरीत असतो. आता ‘शल्य उपप्लाव्याकडे’ गेला असा शब्दप्रयोग कसा करता येईल? शल्य उपप्लाव्य नगरीकडे गेला असा करावा लागेल ना. ‘..माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू सांगितल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’ (पृ. 603), ‘माझं हृदय आज युद्धिष्ठीराकडे जाऊन भाऊ म्हणून त्यचा स्वीकार करायला ओढ घेतं आहे.’ (पृ.604) अशा कैक विचित्र वाक्यरचना या पुस्तकात विखुरल्या आहेत. 

उद्योगपर्वात पुढे संजय पांडवांच्या भेटीसाठी जातो. त्याला युद्धिष्ठीर म्हणतो, ‘दुर्योधन आणि त्याचे मित्र आमची जशी आठवण त्यांनी केली पाहिजे तशी करताहेत, अशी मला आशा आहे.’ (पृ.505) आता ही वाक्यरचना मराठीत कशी शोभून दिसणार?  मग ही अशी वाक्यरचना आलीच कशी? कारण मुळ इंग्रजीत, ‘ I only hope Duryodhana and his friends remember us as we ought to be remembered’ लिहीलेलं आहे म्हणून. याच उद्योगपर्वात दुर्योधन म्हणतो, ‘भीम म्हणजे गाय आहे.’ मुळ पुस्तकात ‘cow’ हा शब्द अवतरणात दिला आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे की गायीसारखा भित्रा किंवा अत्यंत भयभीत झालेला. 
व्याकरणाची तर पार एैशी तैशी केली आहे. वनवसात युद्धिष्ठिर द्रौपदीला म्हणतो आहे, ‘संयम हा स्वच्छंदी स्त्री सारखा आहे. आपलं राहण्याचं ठिकाण म्हणून ती काही माणसांची निवड करते. तिची तूझ्यावर मर्जी नाही.’ आता यात संयम हा  पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? संयम ही स्त्री निवड करते म्हणावे तर इतकी गुंतागुंतीची वाक्यरचना कशाला? याच प्रसंगात भीम युद्धिष्ठीराला आदारार्थी  संबोधून सुरवात करतो आणि बोलता बोलता मग एकेरी संबोधू लागतो. कृष्ण शिष्टाईसाठी हस्तीनापुरात आला असता विदूराला भेटतो तेंव्हा - 

‘आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी कृष्णाचे स्वागत केले. कुंतीचे पुत्र कसे काय आहेत याची त्याने कृष्णाकडे चौकशी केली.’ (पृ. 557) पहिल्या वाक्यात ‘त्यांनी’ आणि दुसर्‍या वाक्यात ‘त्याने’.  पांडवांचा निरोप धृतराष्ट्राला देण्याचे जेंव्हा युद्धिष्टीर सांगतो तेंव्हा संजय म्हणतो, ‘आमच्या राजाचं विचारांचं मी केवळ वाहन आहे.’ (पृ. 516) म्हणजे संजय हा राजाचंपण वाहन आहे का? राजाच्या विचारांचे मी वाहन आहे असे वाक्य हवे होते.  

वनवासात द्रौपदीला सुगंधी फुलांचा मोह होतो व भीम तीच्यासाठी ती फुलं तोडून आणतो. ही फुलं म्हणजे ‘सौगंधी’ नावाचे कमळ. तसा उल्लेख मुळ महाभारतात आहे. पण इंग्रजी पुस्तकात नदीच्या पाण्यावरची फुलं असं लिहीलं आहे. आता नदिच्या पाण्यावर कुठलेच फुल येत नाही. मग भाषांतर करताना पाडगांवकरांनी नदीच्या काठावरची फुलं अशी तडजोड केली आहे. खरं तर ही सरोवरातील कमळं आहेत. 
विराटपर्वात राजपुत्र उत्तर याला अर्जून लढण्यास तयार करतो. तो त्याला आपण अर्जून असल्याचे सांगतो. लपवून ठेवलेली शस्त्रे दाखवतो. या शस्त्रांवर पांडवांच्या नावाची ‘अद्याक्षरे’ कोरली आहेत असं पाडगांवकर लिहीतात. म्हणजे अर्जूृनाच्या धनुष्यावर ‘A P ’ अर्जून पंडूराव पांडव असं लिहीलं असेल का? इंग्रजी पुस्तकांत monogram हा शब्द आहे. याचे भाषांतर अद्याक्षरं होईल का बोधचिन्ह होईल? 

याच विराटपर्वात आणि इतरत्रही दिवाणखाना, जनानखाना, कत्तल, बुरखा, मशहुर, सन्नाटा असे शब्द आलेले आहेत. हे शब्द महाभारत लिहीताना चालतिल का?  ‘शाब्बास ! उत्तम !! हे शब्द पांडवांच्या तंबूत घुमले.’ (पृ. 551) आता युद्धच सुरू झाले नाही तर मग तंबू कुठून आला?

कृष्ण शिष्टाईसाठी हस्तीनापुरला जातो तेंव्हा ‘विदूरा घरचं अन्नच मी खाईन’ (पृ. 560) असं म्हणतो. आता इथे ‘विदूराच्याच घरचं अन्न’ असं तरी हवं किंवा ‘विदूराने दिलेले अन्नच’ असं तरी हवं. 

या पुस्तकात फक्त वाक्यरचनेच्याच चुका आहेत असं नाही तर मजकुराच्याही मोठ्या चुका आहेत. मुळ 18 पर्वाचे महाभारत कमला सुब्रह्मण्यम यांनी 10 पर्वात बसवलं आहे असं संपादकियात सदानंद बोरसे हे लिहीतात. आता उर्वरीत जी 9 पर्व आहेत ती सर्व उपसंहारात गुंडाळली आहेत. त्यांच्या नावांचे उल्लेख तरी करायचे. ही गाळलेली नावे अशी- सौप्तिक पर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व, अनुशासन पर्व, आश्वमेधिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व, स्वर्गारोहण पर्व. 

शांतीपर्वास महाभारताचे सार मानले गेले आहे. मग या पर्वावर स्वतंत्र प्रकरण का लिहावे वाटले नाही? महाभारत म्हणजे फक्त युद्ध नसून प्रचंड मोठी अशी तत्त्वचर्चा त्यात केलेली आहे. जशी गीता महाभारताचा भाग आहे तसंच भीष्मानी मृत्यूपूर्वी म्हटलेले विष्णुसहस्रनामही आहे. युद्धाची वर्णनं तर अतिशय साचेबद्ध पद्धतीनं केलेली आहेत. प्रत्येकजणच शुरपणे लढतो आणि प्रत्येकजणच दुसर्‍याच्या धनुष्याचे दोन तुकडे करतो. 

युद्ध संपल्यानंतरच्या शेवटच्या रात्री अश्वत्थामा पांडवांच्या शिबीरात शिरतो. धृष्ट्यदुम्नाला लाथ मारून उठवतो. त्याचा गळा दाबून प्राण घेतो. त्याच्या शवाला लाथ मारून पुढे जाते. असे वर्णन आहे. या पुस्तकातला अश्वत्थामा, ‘अश्वत्थाम्याने धनुष्याची दोरी धृष्टद्युम्नाच्या गळ्यातभोवती आवळून त्याचा जीव घेतला. त्याचा जीव जाईपर्यंत तो त्याच्यावर लाथांचा प्रहार करीत होता.’ (पृ. 982) आता गळा दाबताना लाथा कशा मारायच्या? जीव गळा दाबल्याने जाणार आहे का लाथा मारल्याने? 

वाक्यरचनेच्या ज्या चुका आहेत त्या मुळात पाडगांवकरांच्याच आहेत कारण त्यांनी केलेली इतर भाषांतरेही अशीच दोषास्पद आहेत. ज्यूलिअस सीझर मधील या ओळी पहा, ‘खरंच ब्रूटस, थोर आहेस तू, तरी मला वाटतं, जरी उंची धातूची तुझी थोरवी असली तरी तिला ज्याची संगत त्या हीणकस धातूचा आकार देता येईल.’ (ज्यूलिअस सिझर, पृ. 107, मौज प्रकाशन गृह). पाडगांवकरांचा कबीराचा अनुवादही असाच फसला आहे. बायबलचे त्यांनी केलेले भाषांतर तर इतके रूक्ष आहे की वाचवत नाही. त्याऐवजी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी राजहंस साठीच केलेले बायबल वाचावे. ते अतिशय रसाळ व चांगले उतरले आहे. कदाचित राजहंस च्या संपादकांची ‘नजर’ त्यावरून फिरली नसावी म्हणून ते चांगले उतरले. 
पाडगांवकरांनी मनोगतात असे लिहीले आहे की कॉलेजमध्ये असतांना त्यांना महाभारतकार व्यास आणि नाटककार शेक्सपिअर ने अक्षरश: भारून टाकले होते. त्यांनी त्याच वयात हे भाषांतर केले असते तर निदान ते प्रामाणिकपणे तरी उतरले असते.

मराठीत अनुवाद/भाषांतराची अतिशय चांगली पुस्तके आहेत. राम पटवर्धन (मार्जोरी रोलिंग्ज- पाडस), जी.ए.कुलकर्णी (कॉनराड रिश्टर-रान,गाव,शिवार), उमा वि.कुलकर्णी (भैरप्पांची पुस्तके), भारती पांडे (काळी-पर्ल बक) ही चांगल्या अनुवादाची काही सहज आठवली ती नावे. मग पाडगांवकरांनी असा खडबडीत अनुवाद का केला असावा?
महाभारतावरची तर कितीतरी पुस्तके मराठीत आहेत. मुक्तमयुरांची भारते-डॉ.ना.गो.नांदापुकर, व्यासपर्व-दुर्गा भागवत, युगांत-इरावती कर्वे, व्यासांचे शिल्प-नरहर कुरूंदकर, महाभारताचे वास्तव दर्शन-अनंत महाराज आठवले, महाभारत : संघर्ष आणि समन्वय- रवींद्र गोडबोले,  धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे- विश्वास दांडेकर ही काही ठळक नावे. शिवाय रा.शं.वाळिंबे यांनी सिद्ध केलेले महाभारताचे 11 खंड, प्राचार्य द.गो. दसनूरकर यांचे दहा खंडाचे ‘आपले महाभारत’ ही संपूर्ण महाभारताची कथा सांगणारे बृहत ग्रंथही आहेत. या सगळ्यांचा आधार घेवून पाडगांवकरांना एक महाभारत लिहीता आले असते.    

पण तसे न घडता या पुस्तकाच्या निर्मितीकडे ‘मोठ्या माणसांची गद्य अमर चित्रकथा’ या दृष्टीने पाहण्यात आले आहे असे जाणवते. पुस्तकाचे मुखपृष्ठ रवी परांजपे यांनी अतिशय बाळबोध केले आहे. महाभारत म्हणजे सिंहासन, धनुष्य बाण, सारीपाट-सोंगट्या, पडदे त्यांना संगीत नाटकासारखे गोंडे, मोडलेला रथ, बाणांचा भाता, ज्वाळा, ढाल इतकी ढोबळ संकल्पना सामान्य रसिकांची असावी असा समज रवी परांजपे यांचा दिसतो आहे. शिवाय महाभारताचे सिंहासन गुलाबी, निळ्या रंगात रंगवून महाभारताचा संघर्ष फारच ‘रोमँटिक’ होता असे वाटते. आतली चित्रेही याला पुरक आहेत. 
महाभारतावर अतिशय चांगली पुस्तके मराठीत होती आणि आताही येत आहेत. नुकतेच देशमुख आणि कंपनीने रवींद्र गोडबोले यांचे ‘महाभारत- संघर्ष आणि समन्वय’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. अतिशय चिकित्सकपणे त्यांनी महाभारताचा अभ्यास यात मांडला आहे. द्युत म्हणजे काय? ते कसे खेळले जाते? याची वेगळी माहीती यात दिली आहे. बेहड्याच्या टणक बियांच्या सहाय्याने हा द्युत खेळल्या जातो. याचे एक अतिशय मोलाचे विश्लेषण रवी गोडबोले देतात. हे सगळं कदाचित पाडगांवकरांच्या गावीही नाही. त्यांच्याच काय पण चित्रकार रवी परांजपेंच्याही गावी नाही. मग सापशिडी, किंवा ल्युडो खेळताना ज्या सोंगट्या वापरतात तसा काहीसे ठोकळेबाज चित्र या महाभारताच्या मुखपृष्ठावर रंगवले गेले आहे.

अतिशय पोरकटपणे हे महाभारताचे प्रकरण पाडगांवकरांनी हाताळले आहे. आणि पाडगांवकरांचा शब्द म्हणजे देवाचा शब्द असे प्रमाण मानून संपादकांनी त्यावरून नुसतीच नजर फिरवली आहे असे दिसते. 

असले पोरकट महाभारत जे की पोरांनाही समाधान देवू शकत नाही प्रकाशीत करून राजहंस ने आपल्या हिरक महोत्सवात आणि पाडगांवकरांनी आपल्या सहस्रचंद्रदर्शन वयात काय मिळवले तेच जाणो.

(कथारूप महाभारत, राजहंस प्रकाशन, मुळ इंग्रजी- कमला सुब्रह्मण्यम, अनुवाद -मंगेश पाडगांवकर, पृष्ठे 1080, मुल्य 600.)

3 comments:

  1. श्रीकांत, आवडलंय. पाडगावकरांच्या अन्यथा सत्य असणाऱ्या ज्येष्ठत्वाचे दडपण न घेता लिहिलेस त्याबद्दल अभिनंदन. 'राजहंस' वाल्यांनी अजून काळजी घ्यायला हवी होती.

    ReplyDelete
  2. चांगल्या ग्रंथनिर्मितीची परंपरा जपणारा प्रकाशक कधीकधी मोठ्या नावांनी दबून जातो का?
    अधिक विश्वासून थोडा शिथिल होतो का ?
    हा अनुवाद-ग्रंथ असल्याने ही त्रुटी राहिली का?
    मोकळेपणा आणि धिटाईने लिहिलेत ते योग्यच आहे.
    याची योग्य वळणाने ( वैयक्तिक मानापामानापलीकडे जाउन ) चर्चा व्हावी.
    -प्रमोद बापट

    ReplyDelete
  3. अतिशय परखड समीक्षण.

    ReplyDelete