Sunday, August 25, 2013

संमेलन निवडणुकीत अर्धीमुर्धी लोकशाही का?


सालाबादप्रमाणे साहित्य संमेलनाची निवडणूक जाहीर झाली आहे. साहित्य संमेलनाची गरज , संमेलनाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया याबद्दलच्या जुन्याच चर्चा पुन्हा रंगात आल्या आहेत. मात्र , यातील केवळ त्रुटी शोधून भागणार नाही , तर त्यात सुधारणा सुचवून त्यासाठी मजबूत पर्यायांचा शोध घेणे आवश्यक आहे. याच मुद्द्यांवर लेखक-प्रकाशक आणि औरंगाबादच्या जनशक्ती चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांच्याशी केलेली बातचित

राजीव काळे

> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या निमित्ताने नेहमीच्या चर्चांनाही आता जोर येईल...

खरं आहे. ही अशी निवडणूक पद्धत गेली कित्येक वर्ष प्रचलित आहे.

> त्यासाठीची मतदारांची रचना कशी आहे ?
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चार घटकसंस्था आहेत. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ,मुंबई मराठी साहित्य संघ , मराठवाड्यातील मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भातील विदर्भ साहित्य संघ. या चार संस्थांकडे प्रत्येकी १७५ मतं आहेत , तर संलग्न संस्थांकडे प्रत्येकी ५० मतं आहेत. हे एकूण मतदार ११६०च्या घरात जातात.
ही रचना योग्य आहे , असं वाटतं ? अजिबातच नाही. या संस्थांची मतांच्या हिश्शानुसार केलेली मांडणी कुठल्याही तर्काला धरून नाही. म्हणजे , घटकसंस्थांकडील आजीव सदस्य व त्यांच्याकडील मतांचा हिस्सा आणि संलग्न संस्थांकडील आजीव सदस्य व त्यांच्याकडील मतांचा हिस्सा यांच्यातील परस्परप्रमाण अतिशय तर्कविसंगत आहे. मुदलात हा मतांचाही जो हिस्सा ठरवून दिलेला आहे , तो कुठल्या निकषावर , या प्रश्नाचं उत्तर महामंडळाकडे नाही.

> अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी , असं तुम्हाला वाटतं ?

नाही. निवडणुकीस माझा पूर्ण विरोध आहे.

> पण लोकशाही व्यवस्थेत अशी निवडणूक असायला हरकत काय ?
याचं उत्तर दोन भागांत देता येईल. पहिला मुद्दा आकड्यांचा. आधी उल्लेख केल्याप्रमाणे घटकसंस्था , संलग्नसंस्था यांच्याकडील मतहिस्सा कुठल्याही तर्काला धरून नाही. आणि लोकशाही म्हणता तर मग ही लोकशाही मर्यादित स्वरूपात कशासाठी ? घटकसंस्थांची संख्या वाढवत का नाही ? कोकणासाठी , दक्षिण महाराष्ट्रासाठी , उत्तर महाराष्ट्रासाठीही प्रत्येकी एक स्वतंत्र घटकसंस्था असायला हरकत काय ? त्यातून या सगळ्या प्रक्रियेचं विकेंद्रीकरण होईल. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आता असलेल्या मतदारांची संख्या. सध्याच्या सगळ्या घटकसंस्था व संलग्नसंस्था यांच्याकडील आजीव सदस्यांची एकत्रित आकडेवारी जवळपास २० ते २२ हजार एवढी आहे. हा आकडा इतका मोठा असताना मतदान करण्याचा हक्क केवळ ११६० जणांनाच का ? बाकीच्यांना का नाही ? या प्रश्नाचे कोणतेही सयुक्तिक उत्तर महामंडळाकडे नाही. निवडणुकीसाठी तुम्ही लोकशाहीची साक्ष काढता ना , मग ती अशी अर्धीमुर्धी असून कशी चालेल ? लोकशाही हवी तर ती पूर्ण स्वरूपाचीच हवी ना. ती अधिक व्यापक स्वरूपाची हवी. निवडणुकीस विरोध असण्यामागील दुसरं कारण बहुमतासंदर्भातले. मुळात साहित्यादी कलेला बहुमताचं तत्त्व लागू करणंच चुकीचं आहे. बरं , ज्यातून बहुमत ठरतं ती मंडळी कोण आहेत ? याच अल्पमताच्या-बहुमताच्या गलबल्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंदिरा संत पराभूत झाल्या आणि रमेश मंत्री निवडून आले. हा काय प्रकार ?

> मग निवडणुकीला पर्याय काय असू शकतो ?

पर्याय शोधायचा म्हटलं तर सहजशक्य आहे. आपल्याकडच्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी, इतकेच काय , साहित्य महामंडळाच्याच विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही निवडणूक होत नाही. मग याच संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा आग्रह कशासाठी ? निवडणूक घेण्यापेक्षा माजी संमेलनाध्यक्षांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करून त्याद्वारे अध्यक्ष निवडला जावा.

पण तिथेही मतभेद होण्याची शक्यता आहेच की. कुणाची पसंती एकाला असेल , तर कुणाची दुसऱ्याला.

> होऊ देत की मतभेद. चर्चा होऊ दे त्यांच्यात. अगदी वादही झाले तरी चालतील. पण अशी चर्चा करताना , वाद घालताना आपण एखाद्या साहित्यिकाच्या नावाचे का समर्थन करीत आहोत , याची तार्किक कारणं त्यांना द्यावी लागतील ना. मग त्यांच्यातील बहुमताच्या गणितावर होऊ दे संमेलनाध्यक्षांची निवड.
> या सगळ्यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागेल...

देशाच्या घटनेत दुरुस्ती होऊ शकते , तर महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करणं काय अशक्य आहे ? विश्व मराठी साहित्य संमेलनाची तरतूद महामंडळाच्या घटनेत नव्हती. पण त्यासाठी दुरुस्ती केलीच ना. मग याबाबत काय अशक्य आहे ? वास्तविक पाहता साहित्यिकांनी जोर लावला तर अशी घटनादुरुस्ती शक्य आहे. ती प्रक्रिया थोडी किचकट आहे , हे खरं. पण करायचं म्हटलं तर करता येईल. त्यासाठीची इच्छाशक्ती कुणाकडे दिसत नाही.

> संमेलनाच्या आगेमागे सगळेच साहित्यिक निवडणुकीला पर्याय हवा , असं म्हणतात. प्रत्यक्षात करत काहीच नाहीत. असं का ?

खरं सांगायचं तर महामंडळाशी दोन हात करण्याची कुणाचीही तयारी नाही. बहुतांश मंडळींचे कुठेना कुठे , काही ना काही हितसंबंध गुंतलेले असतात. मग कुठे त्यांच्याशी दोन हात करून वाईटपणा पदरात पाडून घ्या , असा त्यामागचा ' व्यवहारी ' विचार येतो. हे लोक ज्या व्यासपीठावर टीका करीत असतात , त्यांचा मोह मात्र त्यांना सुटत नाही.

> या सगळ्यातून साहित्य संमेलन नामक जो उत्सव उभा राहतो , त्याबाबत तुमचे मत काय ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचं स्वरूप पूर्णपणे जत्रांसारखं झालेले आहे. लोक जत्रेला जसे मौजमजेसाठी जातात , तसंच आहे हे. लोक येतात मनोरंजनासाठी आणि साहित्यिक येतात ते मिरवण्यासाठी. एकंदर संमेलनांचं स्वरूपच असं झालं आहे की त्याकडे कुणी गांभीर्याने पहात नाही. खुद्द साहित्य महामंडळच त्याकडे पुरेशा गांभीर्यानं बघत नाही , तर इतरांची कथा काय सांगणार. आपल्याकडे पुरस्कारप्राप्त असे किती लेखक संमेलनांत दिसतात ? तेच ते लेखक येणार , तेच ते कवी कविता म्हणणार. तेच ते दर्जाहीन परिसंवाद.

> संमेलनांचा दर्जा वाढवण्यासाठी काय करता येईल ?

साधी गोष्ट आहे. संमेलनांमध्ये लेखकांचा , कवींचा थेट सहभाग वाढायला हवा. नॅशनल बुक ट्रस्ट घ्या , साहित्य अकादमी घ्या. वास्तविक या दोन्ही सरकारी संस्था. पण संमेलनादरम्यान त्यांच्यात ताळमेळ कुठे असतो ? तसा मेळ घालून संमेलनात काही भरीव असं करता येणं शक्य आहे. पण प्रत्येकाचे स्वतंत्र असे सुभे निर्माण झाले आहेत.

> साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ही फार महत्त्वाची व्यक्ती. मात्र संमेलनाचा दोन-तीन दिवसांचा काळ सोडला तर इतर वेळी त्यांचं अस्तित्व फारसं जाणवत नाही. असं का ?

खरं तर संमेलनाध्यक्ष म्हणजे संमेलनाचा , साहित्याचा एक रीतीचा ब्रँड अँबेसिडरच. पण तो पूर्णपणे मिरवण्यापुरता गुळाचा गणपती ठरतो आहे. संमेलनाध्यक्ष ही बाब महामंडळच गांभीर्याने घेत असल्याचं दिसत नसल्याने पुढे सारेच खुंटते. संमेलनाध्यक्षांशी चर्चा करून मराठी साहित्याच्या प्रसारासाठी , विकासासाठी काही कार्यक्रम महामंडळाने आखायला हवेत , ते राबवायला हवेत. तसं काही होताना दिसत नाही. संमेलनाध्यक्षपदावर निवडून आलेली काही कमअस्सल माणसं सोडा ; पण वसंत आबाजी डहाके , नागनाथ कोत्तापल्ले यासारख्या ,साहित्याकडे अतिशय गांभीर्याने पाहणाऱ्या अध्यक्षांकडून काही अपेक्षा होत्या. ते काहीतरी काम करतील , असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही.

> संमेलनाध्यक्षांना त्यांच्या कार्यकालासाठी एक लाख रुपये देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा खरोखर उपयोग होईल ?

मला नाही वाटत तसं. प्रवासाचा वाढता खर्च लक्षात घेतला तर हे एक लाख रुपये किती पुरणार ? आणि असे पैसे देण्यापेक्षा महामंडळाने त्या त्या ठिकाणच्या साहित्य संस्था , वाचनालये यांच्या सहकार्याने काही साहित्यिक उपक्रम हाती घेऊन त्यात संमेलनाध्यक्षांना सहभागी करून घ्यायला हवं. ते फारसं होताना दिसत नाही.

> संमेलनास मिळणाऱ्या सरकारी मदतीचं काय ?

५० लाख रुपये अनुदानासाठी सरकारने अर्थसंकल्पीय तरतूदच केली आहे. पण खरं तर सरकारने जागा , वीज ,पाणी अशा मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत सहकार्य करायला हवं असं वाटतं.

> संमेलनांवरील अवाढव्य खर्च कमी करणं आणि सरकारी मदतीशिवाय ती साजरी करणं खरोखर शक्य आहे ?

का नाही ? नक्कीच. वायफळ खर्चाला आळा घालता येईलच की. पण तुम्ही गर्दी खेचण्यासाठी म्हणून अमिताभ बच्चनला बोलावणार. तो आला की वाढत्या गर्दीसाठी तुम्हाला मांडवाचा आकार वाढवावा लागणार. आकार वाढला की खर्च वाढणार. असलं काहीतरी दिखाऊ करण्यापेक्षा संमेलनातून खरोखरच काही साध्य होईल , याकडे लक्ष द्यायला हवं ना. ते होताना दिसत नाही , ही खेदाची गोष्ट.

Sunday, August 18, 2013

दु:ख 14 आणि 15 ऑगस्टचे

उरूस, दैनिक पुण्य-नगरी,  रविवार 18 ऑगस्ट 2013 


कवी भ.मा.परसवाळे यांनी फाळणीवर अप्रतिम अशा दोन ओळी लिहील्या आहेत. आत्तापर्यंत मराठीत फाळणीवर इतकं नेमकं भाष्य नाही. त्यांच्या ‘जागजागी’ या कवितेत ते लिहीतात
बेसुमार फाडले फाडताना वेडेवाकडे
आता शिवताना चोळ येताहेत जागजागी !

पाच भारतीय जवानांची हत्या नुकतीच करण्यात आली. नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर परसवाळेंच्या ओळी तपासून पहा. फाळणी करताना जो काही प्रदेश आम्ही फाडून ठेवला ते सारे शिवताना चोळ येत चालले आहेत जागजागी. फाळणीची जखम बूजतच नाही. त्यावर खपली धरतच नाही.
बोरकरांसारखा ‘आनंदयात्री’ कवी स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या भारतमातेचे वर्णन करताना लिहीतो
सगळा यज्ञ संपल्यानंतर 
उरली हाती राखच कशी
कुंकू भाळी लागताच कशी 
आई झाली वेडीपिशी

खरं तर बोरकरांची भूमिका ही 
मलाही दिसती व्यथा जगाच्या 
परी परिसतो कथा निराळ्या 
कसे उद्याच्या फुलपाखरा 
म्हणून किड्याच्या ओेंगळ आळ्या 

अशी राहिलेली आहे. असे लिहीणार्‍या बोरकरांनाही स्वातंत्र्यमिळाल्यावर आनंदाच्या ओळी नाही सुचल्या.
भीष्म सहानी यांच्या ‘तमस’ कादंबरीतून फाळणीचे दु:ख भळभळत राहिले आहे. दूरदर्शन वर गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे काळीज हलवून गेली होती.
1965 च्या पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा म्हणून काही सांगितिक कार्यक्रम दोन्ही देशांमध्ये आयोजित केले होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांचा एक कार्यक्रम वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानात आयोजित केला होता. पाकिस्तानी सैनिकांसाठी आयोजिलेल्या या कार्यक्रमांत अख्तरीबाईंनी नियोजीत गझल सोडून दिली व अचानक एक दादरा गायला सुरवात केली. त्यांच्या शब्दांनी आणि सुरांनी  पाकिस्तानी सैन्याची  ती अख्खी बटालीयन रडायलाच लागली. त्या दादर्‍याचे बोल होते,
हमरी अटरीया पे आवो सजनवा
सारा झगडा खतम हो जावे ।

फार जणांना असे वाटत रहाते की पाकिस्तानात जे गेले ते खुप आनंदात होते किंवा आजही आहेत. एखाद्या मोठ्या वाड्यातील भावाभावांची वाटणी झाल्यावर लहाना भाऊ वेगळं घर करतो. तेंव्हा मोठ्या वाड्यातील लोकांना वाटत रहातं की त्यानंच भांडण काढलं होतं, त्यानंच वाटणी मागितली होती, आता तो वेगळा झाला तेंव्हा खुप खुष असेल. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तो लहान भाऊही दु:खी होवून बसलेला असतो. एक अपरिहार्य म्हणून वाटणी झालेली असते पण वेदना दोन्ही बाजूला सारखीच असते.
ज्या कवीला वेगळ्या पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक समजण्यात येते त्या अल्लामा इकबाल यांना फार लवकरच धर्मपिसाट लोकांची वृत्ती लक्षात आली आणि त्यांनी आपल्या कवितेतून आपल्या खर्‍या भावनेला वाट करून दिली.
मस्जिद तो बना दी शब भर मे, 
ईमां की हरारत वालों ने ।
मन अपना पुराना पापी है, 
बरसों से नमाजी बन न सका ॥

पुढे इकबाल म्हणतात नुसते बोलण्यापुरते आम्ही धर्मयोद्धे झालो पण प्रत्यक्ष कृतीत काही उतरलंच. आमची कृती ही जून्याच रीतपरंपरांप्रमाणे राहिली.   1875 ला सियालकोट पंजाब इथे जन्मलेले इकबाल हे मुळचे काश्मिरी ब्राह्मण. इकबाल लिहीतात
‘इकबाल’ बडा उपदेशक है 
मन बातों मे मोह लेता है ।
गुफ्तार का यह गाजी तो बना 
किरदार का गाजी बन न सका ॥ 

(गुफ्तार-वार्ता, गाजी-धर्मयोद्धा, किरदार-आचरण, कर्म, चरित्र) 
गालिब नंतरचा उर्दूतला दुसरा मोठा कवी म्हणजे फैज अहमद फैज. फैज यांची जन्मशताब्दि नुकतीच झाली. फैज पाकिस्तानातच राहिले. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. ही पहाट कशी होती? आपण वेगळा पाकिस्तान मिळवला आहे मग तिथल्या सर्वात मोठ्या कवीला काय वाटत होते? फैजच्या ओळी आहेत
ये दाग दाग उजाला ये शब गझिदा सहर
वो इंतिजार था जिसका ये वो सहर तो नही
ये वो सहर तो नही जिसकी आरजू लेकर
चले थे यार की मिलेगी कही ना कही

(शब गझिदा म्हणजे काळोख डसलेली)
एम.जे.अकबर यांची ‘ब्लडब्रदर्स’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. तिचा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. अकबर आपल्या वडिलांना एकदा विचारतात, ‘तूम्ही तेंव्हा पाकिस्तानात गेला होतात. मग परत कशाला भारतात आलात?’ अकबर यांच्या वडिलांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक आणि भारतीय मुसलमानांच्या मानिकसतेवर नेमके बोट ठेवणारे आहे. अकबर यांचे वडिल म्हणाले, ‘पाकिस्तान फारच मुसलमान झाले होते.’
पाकिस्तानइतकेच मुसलमान भारतात आहेत. भारतातील मुसलमानच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश येथील मुसलमानही हे सगळे एका मोठ्या परंपरेचा हिस्सा आहेत. आजही जगात भारतीय उपखंडातील मुसलमान यांची एक वेगळी ओळख आहे. अगदी त्यांची उर्दू ही भाषासुद्धा. ही भाषा दिल्ली आणि अवतीभोवतीच्या प्रदेशात जन्मली वाढली. जी जगात इतर कुठल्याच देशातल्या मुसलमानांची भाषा नाही. कट्टर समजल्या जाणार्‍या या मुसलमानांनी धर्मापेक्षा आपल्या परंपरा, आपली वेगळी भाषा हीच्याशी निष्ठा जपली. बांग्लादेश बांग्ला भाषेच्या आणि संस्कृतिच्या मुद्द्यावर वेगळा झाला. इतकेच नाही तर बांग्लादेशी मुसलमानांनी रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेले गीत आपले राष्ट्रगीत म्हणून निवडले. पण आपण हे समजून न घेता ‘हाकलून द्या यांना तिकडे’ वाली भाषा वापरत रहातो. 
कुणाची काय भूमिका असायची ती असो पण लेखक कवींनी मात्र ही फाळणी म्हणजे एक जखम आहे असेच मानले आणि आपल्या साहित्यकृतीतून ही वेदना मांडून ठेवली. 
कबीर प्रोजेक्ट म्हणून बेंगलोरची एक संस्था एक अतिशय अतिशय आगळे वेगळे काम करते. कबीरावरती जिथे कुठे काही आढळते त्याचे चित्रीकरण, त्याची माहिती ते घेवून ठेवतात. त्याचे माहितीपट बनवून ठेवतात. त्यांनी ‘कबीर इन पाकिस्तान’ नावाची एक सुंदर सीडी काढली आहे. कराचीचे सुफी कव्वाल फरिदुद्दीन अय्याज यांनी गायलेला कबीर यात आहे. कबीराने सहाशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले गाताना हे कव्वाल आजच्या सामान्य पाकिस्तानी आणि भारतीय नागरीकांची भावना किती खरी सांगितली आहे
कबीरा कुवा एक है पानी भरे अनेक
भांडा ही मे भेद है पानी सबमे एक. 

याच फरिदूद्दीन अय्याज यांची कव्वाली माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे. 

Sunday, August 11, 2013

पुरोगामीत्वाला टांग । कॉम्रेड अण्णा भाऊ फक्त मांग ॥


उरूस, दैनिक पुण्य नगरी   रविवार 11 ऑगस्ट 2013 


अण्णा भाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला सर्वत्र साजरी झाली. त्यांच्यावर विविध वर्तमानपत्रांतून लेख प्रसिद्ध झाले. हे लेख वाचताना मोठी विसंगती मात्र जाणवत राहिली. इतका काळ निघून गेला. उदारीकरणाचे मोठे पर्व त्याचे नाविन्य संपवून इथे रूळले तरी आपली मानसिकता मात्र अजूनही मध्ययुगीनच राहिली आहे.

अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात बहुतांश ठिकाणी पुढाकार घेतला तो त्यांच्या मांग जातीच्या विविध संघटनांनी. अण्णा भाऊंचे लेखन हे फक्त मांगांसाठी होते काय? (मी जाणीवपूर्वक मांग हाच शब्द वापरतो आहे कारण मातंग हा संस्कृत शब्द त्याच जातीचे लोक अग्रहाने नाकारतात. शिवाय शासन दरबारी नोंद मांग अशीच आहे.)

उलट अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्डधारक होते. स्वाभाविकच पक्षाची जी ध्ययेधारेणे त्यांची सर्वोच्च समिती (पॉलिट ब्युरो) ठरवेन ती अण्णा भाऊंना बंधनकारक होती. सर्व कम्युनिस्ट चळवळ वर्गलढ्याच्या सिद्धांतावर उभी आहे. या डाव्या चळवळीनी जातीय प्रश्नांना कधीच हात घातला नाही. अण्णा भाऊंनीही आपली सगळी वाङ्मय निर्मिती सामंतशाहीच्या विरोधात केली. किंवा त्यांच्यावर प्रभाव असलेल्या तमाशाच्या रंजनप्रधान शैलीप्रमाणे केली. 

ज्येष्ठ लेखक बाबूराव बागुल यांनी अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे स्पष्ट शब्दांत विश्लेषण केले आहे. ‘..अण्णा भाऊंच्या कथांत अस्पृश्यतेतून आलेली कथा कमी प्रमाणात होती. त्यांची कादंबरी तर मोठ्या संख्येने मराठावर्गात, श्रीमंत शेतकर्‍यांत घडली गेली. वर्गकलहाचे तत्त्वज्ञान त्यांनी हिंदूंच्या नैतिक मूल्यावर नेले. अन्याय, अत्याचार करणारे आणि त्याचा प्रतिकार करणारे असे त्यांच्या कादंबरीला ‘राम रावण पार्टीचे’ रूप आले. खेडे, खेड्यांची जातीयवादावर असलेली उभारणी आणि अस्पृशतेसंबंधी असंतोष त्यांच्या कथांत कमी होता. सामंतशाहीच्या गुणावगुणावर, त्यांच्या कथेचा लोभ जडलेला होता.’ (मराठवाडा दिवाळी अंक 1969)

कम्युनिस्ट पक्षाने अण्णा भाऊंची जयंती धोरण म्हणून तरी का होईना साजरी करण्याचा निर्णय कधी घेतला नाही. कम्युनिस्टांच्या पोस्टरवर कधी अण्णा भाऊंचा फोटोही दिसत नाही. त्याचे एक कारण असेही असावे की अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट विचार आपल्या लेखनात मांडले पण स्वतंत्रपणे कुठले विचार प्रकट केले नाहीत. आणि शिवाय आपल्याकडची  कम्युनिस्ट चळवळ तशी व्यक्तीला महत्त्व देणारी नाही. ज्योती बसूंसारख्या ज्येष्ठ नेत्याला पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याच पक्षाने परवानगी नाकारली होती. मग तिसऱ्या आघाडीचे पुढे काय झाले हा इतिहास आहे.   

मग प्रश्न असा पडतो की कम्युनिस्ट असलेले अण्णा भाऊ पूर्णपणे मांग अस्मितेचा विषय बनले कसे? अण्णा भाऊंचे मुळ वाक्य असे होते, ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तोलली नसून ती कष्टकर्‍यांच्या तळहातावर पेललेली आहे.’ अण्णा भाऊंवर लेख लिहीताना सर्वांनी कष्टकरी हा शब्द काढून तिथे दलित हा शब्द घुसडला. 18 जूलै 1969 ला अण्णा भाऊ गेले त्यावेळी त्यांच्याच मांग समाजाचे बाबुराव भारस्कर हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मांग समाजाची अस्मिता आणि त्या निमित्ताने दलित जातीत आंबेडकरांशिवाय अजून एक अस्मिता निर्माण करता येवू शकते हे त्यांना जाणवले. 

बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे एक अढी सवर्ण हिंदू समाजात निर्माण झाली. पण आश्चर्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारेतर इतर दलित जातींतही झाली. त्यांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध होणे नाकारले. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी पूर्वाश्रमीच्या महारांनी गावगाड्याची कामे नाकारली ती त्यावेळी मांगांनी पुढे होऊन स्विकारली. खरे तर सगळी दलित अस्मिता जोरकसपणे बाबासाहेबांच्या प्रतिमेत एकवटली असती तर मोठेच परिवर्तन झाले असते. पण हे घडले नाही. कॉंग्रेसने असे धोरण ठरवले की पूर्वाश्रमीच्या महार जातीतील इतर नेत्यांना पाठबळ द्यायचे त्याप्रमाणेच इतर दलित जातीतील लोक शोधून त्यांनाही मोठे करायचे. 

यात अस्मितेचा विषय म्हणून अण्णा भाऊ हाती लागले. आणि त्यांचे पुतळे गावोगावी उभारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. बरं हे कॉंग्रसने केले असे नाही तर भाजप-शिवसेनेनेही मांग समाजाच्या नेत्यांना उचलून धरले. युती सरकारच्या काळात तर सर्वात जास्त मांग आमदार निवडून आले होते.

हे सगळं होत असताना अण्णा भाऊंच्या साहित्याचा कोणी विचार केला असेही नाही. त्याची कुणाला गरजही वाटत नाही. काळ बदलला असताना आजही आपला समाज केवळ जातीचा आणि त्यातही परत आरक्षणाची सोय म्हणून अण्णा भाऊंचा वापर करू पहाताना बघणे हे केवळ वेदनादायक आहे.   

मांग समाज हा खरे तर कलाकार समाज. अजय अतूल सारखी आजची आघाडीची संगीतकार जोडी याच मांग जातीतून आलेली आहे. पण तिला कुठेही आपल्या जातीय अस्मितेचा वापर करण्याची गरज वाटत नाही. उलट संगीताच्या मुख्य प्रवाहात मिसळून जात त्यांनी तो प्रवाह समृद्ध केला आहे. आज संगीत कलेची बाजारपेठ मोठ्याप्रमाणात विस्तारली आहे. या विस्तारलेल्या बाजारपेठेत मांग समाज खुप मोठे योगदान देवू शकतो. पण आपण हे विसरून त्याला जातीत अडकून टाकतो. दलित साहित्यात आत्मकथनाशिवाय सकस काही नाही असा जो आरोप केला जातो त्याला नामदेव कांबळे आणि उत्तम बंडू तुपे सारखी दोन महत्त्वाचे अपवाद मांग जातीतूनच आलेले आहेत. 

जागतिकीकरणाचा काळात सगळ्यात जास्त फायदा दीन दुबळ्या दलितांना झाला कारण ते जून्या व्यवस्थेत नाडल्या गेलेले होते. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. ज्या प्रमाणे महात्मा फुले म्हणाले, ‘बरे झाले इंग्रज आले. नसता या भटा बामणांनी आमच्या पोराबाळांना शिकूच दिलं नसतं.’ याच धर्तीवर आता असं म्हणायची पाळी आहे, ‘बरं झालं जागतिकीकरणामुळे मोकळे वारे खेळायला लागले. नसता या जून्या व्यवस्थेनं आम्हाला संधीच दिली नसती.’

आपल्याकडची बरीच तालवाद्ये ही कातड्याची बनवलेली असतात. म्हणून त्यांना स्पर्श करणेही सवर्ण पाप समजायचे. ही वाद्ये मांग समाजाने बनविली, त्यांचा विकास केला व आपल्याकडे संगीत जिवंत ठेवले. आता तर त्याला जगभरातून मागणी येत चालली आहे. म्हणजे ज्या उदारीकरणावर टिका  डाव्या/परिवर्तनवादी/दलित चळवळी करत राहिल्या त्याच उदारीकरणाच्या काळात या वर्गाला मोठी संधी प्राप्त होताना दिसत आहे. 

एकेकाळी ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असे म्हणत जागतिकीकरणाचे समर्थन करणारे आता मात्र ‘जगातील ग्राहकांची एक बाजारपेठ’ अशी धोरणं सुरू झाली की विरोध करायला लागले. कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा भाऊ बदलत्या काळात एक चांगले प्रतिक होवू शकत असताना त्यांना जातीय अस्मितेचे प्रतिक करून आपण काय मिळवत आहोत?

Sunday, August 4, 2013

महामंडळाची घटना बदला : अबब ! महानोर काय बोललात !!

दै. पुण्यनगरी, उरूस सदरातील लेख  रविवार 4 ऑगस्ट 2013 

रेल्वे स्थानकावर एकदा आम्ही गाडीची वाट पहात होतो. गाडी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते.  हेमंत पार्डीकर हा आमचा मिश्किल मित्र अचानक म्हणाला, ‘‘चला, आता गाडी येती!’’ कशावरून असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘ते काय, भजेवाल्यानं भजे तळायला घेतले आहेत. म्हणजे आता गाडी येते.’’ गंमत म्हणजे गाडी खरेच आली. असंच काहीसं सध्या साहित्य संमेलनाच्या बाबतीत झालं आहे. वर्तमानपत्रांनी महानोरांच्या अध्यक्षपदाचा विषय तळायला घेतला की साहित्य संमेलन जवळ आलं आहे असं खुशाल समजावं
सासवडच्या साहित्य संमेलनाची घोषणा होताच महानोरांच्या अध्यक्षपदाचा विषय लगेच सुरू झाला. 4 थ्या विश्व संमेलनाचे अध्यक्षपद महानोरांना देण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. संमेलनाचे सगळे नियोजन झाले. महानोरांच्या पदराखाली लपून फुकटची परदेश वारी आपल्या पदरात पाडून घेण्याचा महामंडळाचा डाव टोरांटोच्या संयोजकांनी उधळून लावला आणि महानोरांची संधी हुकली. बरं दुसर्‍या वर्षी परत लंडनची चर्चा सुरू झाली. परत महानोरांच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली. आणि ‘फिर वही फुकट परदेश वारी लाया हू’ हे गीत महामंडळाच्या सदस्यांनी गायला सुरवात केली. पण लंडनचे संयोजकीही चतूर निघाले. ते काही यांच्या तिकीटाचे पैसे देईनात. आता विश्व संमेलनाचा नाद सोडून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे का होईना अध्यक्षपद महानोरांना देऊत म्हणून त्यांच्या अध्यक्षपदाची चर्चा परत सुरू करण्यात आलेली दिसते आहे.
ना.धो. महानोर तसे नशिबवान. त्यांना संमेलनाचे अध्यक्षपद स्वत:ला मिरवण्यासाठी आणि त्या निमित्ताने आपली महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळविण्यासाठी भुषविण्याची गरज नाही. महानोरांना फार मोठी लोकप्रियता समिक्षकप्रियता लाभली. महानोर बारा वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. आपली आमदारकीची ही मोठी कारकीर्द त्यांनी गाजवली. त्यामुळे महानोरांना संमेलनाच्या अध्यक्षपदाची तशी गरज नाही. नाहीतर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे तीन दिवसांचा गणपती. अलीकडच्या काळातील या पदावर बसलेल्या चांगल्या आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी कुठलेही भरीव काम या काळात साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात केले नाही. सध्याचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी महाराष्ट्रभरच्या वाचनालयांना भेटी देण्याचा संकल्प जाहिर केला होता. अर्धे वर्ष संपले पण कोत्तापल्लेंनी कुठल्या वाचनालयांना भेटी दिल्या हे कुणालाच माहित नाही. त्याआधी वसंत आबाजी डहाके यांनीही महाराष्ट्रभर फिरण्याचे जाहिर केले होते. त्याचे काय झाले तेच जाणे. म्हणजे अध्यक्ष होवून कुणी काही करू शकतो हे आज तरी दिसत नाही. त्यामुळे महानोर हे अध्यक्षपदासाठी त्याअर्थाने उत्सूक असतील हे शक्य नाही.
जेंव्हा अशा बातम्यांचा धुराळा उडाला तेंव्हा महानोरांनी संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने एकमताने निवडणुकीशिवयाय बहाल करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी महामंडळाची घटना बदलण्याची सुचनाही त्यांनी केली. खरं तर महानोर स्वत: महामंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना महामंडळाची काम करण्याची पद्धत पूर्ण माहित आहे. पण तरी त्यांनी महामंडळाची घटना बदलण्याची सुचना केली. हे म्हणजे फारच झाले. एकवेळ भारताची घटना बदलणे सोपे आहे. एकवेळ धर्मग्रंथांमध्ये काही बदल होणे सोपे आहे. पण महामंडळाची घटना बदलायची म्हणजे केवढे पाप!! ती बदलायची कशी आणि कोणी?
नाही नाही म्हणत तेलंगणाचे वेगळे राज्य करण्याचा निर्णय झाला पण महामंडळाची घटना बदलून बिनविरोध अध्यक्ष निवडायचा हे काय भलतेच... जून्या नाटकांच्या भाषेत सांगायचे तर, ‘मुुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना! सुर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना!!’’
अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे शासनाच्या पैशावर स्वत:चा छोटा मोठा स्वार्थ साधून घेण्यार्‍या फुकट फौजदारांचा अड्डा झाला आहे.महामंडळाचे अध्यक्षपद निवडणुका शिवाय मिळवता येते, विविध घटक संस्थांच्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद निवडणुकी शिवाय बहाल करण्यात येते, जे तीन विश्व संमेलनं पार पडली (घटना बाह्य असली तरी) त्यांचेही अध्यक्षपद निवडणुकी शिवायच त्या त्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यीकाला बहाल करण्यात आले होते. इतकंच काय पण महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत त्यांच्या कार्यकारीणीचे अध्यक्षपदही ‘म्यानेज’ केले जाते पण त्यासाठी निवडणुक होत नाही. मग निवडणुकीचा हा अट्टाहास अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच का? याचे मात्र उत्तर देण्यास महामंडळ तयार नाही.
महामंडळाचे कार्यालय तीन तीन वर्षाच्या बोलीवर पुणे-नागपूर-औरंगाबाद-मुंबई असे फिरत राहते. हे असे का? सगळ्यांनी मिळून वाटून खायची जर ‘उदात्त’ भूमिका असेल तर हे वाटून ‘खाणे’ समप्रमाणात का नाही? महाराष्ट्राची महसुलाच्या दृष्टिने 6 विभागात वाटणी करण्यात आली आहे. मग महामंडळाच्याही 6 घटक संस्था करण्यात काय अडचण आहे? महाराष्ट्रातील 10 सर्वसाधारण विद्यापीठांच्या मराठी विभागांचा सहभाग नोंदवून घ़टक संस्थांचा विस्तार का केला जात नाही? महाराष्ट्रात दहा हजार सार्वजनिक वाचनालयांपैकी अ/ब वर्गाच्या दीड हजार वाचनालयांना सहभागी कसे करून घेता येईल असा व्यापक विचार का केला जात नाही?     
  महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत त्या सगळ्यांची मिळून (मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व बृहन्महाराष्ट्रातील संलग्न संस्था) आजीव सभासद संख्या जवळपास वीस हजार आहे. या सगळ्यातून एक हजार लोकांना निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदविण्यात येते. आणि यातून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला जातो.
आजतागायत मतदार कुणाला केले आणि का केले जाते याचे एकही संयुक्तीक कारण महामंडळ देवू शकलेले नाही. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 10 हजार आजीव सभासदांपैकी फक्त 175 जणांना मतदार केले जाते. पण हैदराबादच्या मात्र 120 जणांतून 40 जणांना मतदार केले जाते. हे असे का? याचे उत्तर नाही. परत विचारायचेही नाही.
 आता महानोर म्हणतात की महामंडळाची घटना बदला. आता ही घटना बदला म्हणजे हे सगळे वाटून खाण्याचे हिशोब संपून जाणार की. तूमचं काय महानोर तूम्हाला या कशाचीच काही गरज नाही. पण महामंडळाच्या ‘सह्याजीराव’ पदाधिकार्‍यांचा मात्र पूर्ण जीवच महामंडळाचे ‘सदस्य’ असण्यातच आहे. ते कसे काय घटना बदलणार...
तेंव्हा महानोर हा खुळा हट्ट सोडा.....तूम्हाला मराठी काव्यरसिकांनी त्यांच्या हृदयात बिनविरोध कायमस्वरूपी पद देवून ठेवले आहे....तूमची भावना खरी आहे पण....पण लक्षात कोण घेतं? 
  
    मो. 9422878575.
     

Monday, July 29, 2013

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....

दैनिक कृषीवल च्या उरूस सदरातील माझा शेवटचा लेख. १४ मार्च २०१२ पासून ते २७ जुलै २०१३ पर्यंत मी हे सदर लिहिले. कृषीवल चे संपादक संजय अवटे, त्यांचे सर्व सहकारी आणि या लिखाणाला प्रतिसाद देणारे सर्व वाचक या सर्वांचे मनपुर्वक आभार! हे सदर याच नावाने दैनिक "पुण्य नगरी" मध्ये ४ ऑगस्ट पासून चालू होते आहे.

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....


वसंत बापटांची मोठी सुंदर कविता आहे
तूमी जीव लावला मैत्र आपुलं जूनं
तूमी माफ केल्याती शंभर आमूचं गुन्हं
ही मैफल तूमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....
एखाद्या मैफिलीचा शेवट करताना मी आवर्जून ही कविता सांगायचो. समोरच्या श्रोत्यांकडे पाहून ‘ही मैफल तुमची अखंड चालो अशी...’ असं म्हणायचं.  मंचावर बसलेले सर्व कवी किंवा गायक वादक त्यांच्याकडे बोट दाखवून ‘आम्ही जाणारच कवातरी पट्दिशी’ असं म्हणायचं. फार जणांना ही कविता आवडते.
मग ग.दि.माडगुळकरांची एक कविता सापडली. म्हणजे चारच ओळी माहित झाल्या. मैफल संपल्यानंतरचे वातावरण त्यात सुचित केले होते.
कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
गालिच्या दुमडला तक्के झुकले खाली
तबकात राहिल्या देठ लवंगा साली.
या ओळींना तर श्रोत्यांची दाद हमखास ठरलेली असायची. मला या ओळी एखाद्या कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत असं वाटायचं. नंतर कळालं की ग.दि.माडगुळकरांच्या ‘जोगिया’ या सुंदर कवितेच्या या सुरवातीच्या ओळी आहेत.
कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गायक वादकांना शेवटची भैरवी म्हणायचा आग्रह मी करायचो. सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान औरंगाबादला जवाहरलाला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात 20 वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी  आलेले होते. त्यांनी त्यांचे वादन अतिशय सुंदररित्या सादर करून कार्यक्रम संपवत असल्याची घोषणा केली. त्यांची सुंदर भटियाली धून मी कॅसेटवर ऐकली होती. ती ऐकायची इच्छा होती. वाद्य संगीतात भैरवीच्या सुरावटीच्या धुनने समारोप केला जातो. बर्‍याचजणांना कार्यक्रम संपवू नये असे मनोमन वाटत होते. पण इतक्या मोठ्या कलाकाराला कोण सांगणार? मी मोठ्या धैर्याने उठून उभा राहिलो आणि त्यांना भटियाली धून वाजविण्याची विनंती केली. आश्चर्य म्हणजे अमजद अलींनी ती मान्यही केली. आणि 45 मिनीटे अप्रतिम अशी भटियाली धून वाजवली. त्या निरोपाच्या सुरावटीत श्रोते अक्षरश: नाचत होते.
भैरवीचा महिमाच मोठा विलक्षण. माझा अधिक्षक अभियंता मित्र शशांक जेवळीकर शास्त्रीय संगीताचा मोठा दिवाना. नुसताच दिवाना नाही तर त्याचा त्या विषयावरचा अभ्यास अतिशय चांगला व नेमका. त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी मी त्याच्या घरी जावून रात्री उशीरा गप्पा मारत  बसलो होतो. किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल यांचा अप्रतिम बागेश्री त्यानं ऐकलवला. गंगुबाईंचा आवाज अप्रतिम लागलेला. कुठल्याही सप्तकात स्थिर लागलेले स्वर. त्यांच्या गाण्यानंतर काय ऐकावं तेच कळेना. किशोरी अमोणकरांची भैरवी त्यानं ऐकवली. त्या भैरवीच्या सुरावटीतच आधीच्या गाण्यातून आम्हाला बाहेर काढण्याची ताकद होती. 
अशा भैरवीच्या कितीतरी सुंदर आठवणी आहेत. ‘उरूस’ या सदराची आज भैरवी सादर करताना माझ्याही मनात आर्त सुर दाटून आले आहेत. मे महिन्यात माझे जवळचे स्नेही असलेल्या दिवाकर कुलकर्णींच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नात मला अलिबागचे डॉ. कुमठेकर भेटले. ‘उरूस’ सदरातील माझ्या लेखनाची आठवण करून देऊन, ते सदर लिहीणार्‍याशी माझी प्रत्यक्ष भेट झाली याचा किती आनंद वाटतो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची पत्नी जया ही मला लहानपणापासून ओळखते. अनोळखी अशा वाचकांनीही खुप चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
माझे हे लिखाण मी सातत्याने माझ्या ब्लॉगवर देत आलो. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांची संख्या 7000 चा टप्पा पार करून गेली. त्यात मोठा वाटा ‘उरूस’ सदरातील लेखांचा आहे. सहित्य-संस्कृती-कला या क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करावं अशी अपेक्षा संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विविध विषयांवरील लेख या सदरात मी लिहीले. बर्‍याचदा ‘सदर’ लिखाण हे मोठी अडचण किंवा अवघड जबाबदारी वाटते असं मत माझ्या काही लेखक मित्रांनी व्यक्त केलं आहे. काही मित्रांनी यामूळे  चालू असलेली सदरं बंदही केली आहेत. किंवा काही जणांची सदरं रखडत चालली. माझ्याबाबत मात्र हे घडलं नाही. या लिखाणातून मला खुप आनंद  मिळाला. मला कुठलाही त्रास या लिखाणाचा झाला नाही. मनात विषयाची जूळणी तयार असायची. लिहीताना हे सगळं जुळून यायचं. आणि सलग कागदावर उमटायचं.
साहित्य संस्कृती कला यांचं जीवनात काय स्थान आहे? या गोष्टी हव्यातच कशाला? असे प्रश्न व्यवहारिक पातळीवर काहीजणांना पडत असतात. कशाला लिहायचं? कोण वाचणार आहे? काही अडलं आहे का? अशी भावना  बळावताना दिसते. पण याचं अतिशय सुंदर उत्तर ज्ञानेश्वरांनी दिले आहे
जैसे भ्रमर भेदी कोडे । छेदी कठीण काष्ट कोरडे ।
पै कलिकेमाजी सापडे । कोवळीया ॥
अतिशय कठीण लाकूड पोखरणारा भुंगा कोवळ्या कमळाच्या कळीत मात्र अडकून पडतो. त्याला काय ती कळी पोखरून बाहेर पडता येत नाही? पण ती पोखरायीच नसते. कलेचे तसेच आहे. हे जे आपल्या भोवती कोवळं सुंदर जग कला तयार करते त्यात अडकूनच त्याचा आनंद घ्यायचा असतो. असा आनंद मला स्वत:लाही घेता आला आणि मला खात्री आहे माझ्या वाचकांनीही तो घेतला असावा.
जयपूर घराण्याचे महान गायक पंडित मल्लिकार्जून मन्सूर हे बसवेश्वरराचे एक सुंदर भजन गायचे. त्यात गायकाने देवाकडे एक अपेक्षा व्यक्त केली आहे. माझ्या मस्तकाचा भोपळा बनू दे, देहाचा दांडा बनव, शिरांच्या तारा बनवून आपल्या बोटांनी त्या छेडत हे परमेश्वरा तू मला हृदयी जवळ घेवून गा. या ओळींचा अर्थ ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते साहित्यीक विनय हर्डीकर यांनी त्यांच्या लेखात दिला होता. मला कानडी येत नाही. या अर्थावरून मी त्याचा मराठीत भावानुवाद केला
मस्तक भोपळा । शिरा जणू तारा ।
दांडी या शरिरा । बनव गा ॥
बोटांनी छेडित । अशी एकतारी ।
लावुनिया उरी । गा तू देवा ॥
ही झाली एका गायकाने व्यक्त केलेली भावना. एक लेखक काय भावना व्यक्त करेल? मी आज या भैरवीत माझ्या वाचकांप्रती ही भावना व्यक्त करतो आणि तूम्हा सर्वांचा निरोप घेतो.
जगण्याचा आशय
शब्दांत मांडून ठेवला आहे तूमच्या समोर
डोळ्यांतून तो शिरो तूमच्या मेंदूत
   माझ्या शब्दांतील कंपने जुळू देत
   तूमच्या हृदयातील कंपनांशी
आणि उमटू देत झंकारांचा पदन्यास
तरच पूर्ण होईल
माझ्या काळजापासून
तूमच्या काळजापर्यंतचा हा प्रवास

Saturday, July 13, 2013

पंढरीची वारी । ब्राह्मण/जैनही माळकरी ॥

दै. कृषीवल दि. 13 जूलै 2013 मधील लेख


सध्या सगळ्या महाराष्ट्राचे डोळे विठोबाच्या चरणी लागले आहेत. लाखो पाय पंढरपुरच्या वाटेने निघाले आहेत. सातशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या वारकरी संप्रदायाने अनेक विचारवंतांची मोठी गोची करून ठेवली आहे. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना ‘फुले-शाहू-आंबेडकर’यांचा महाराष्ट्र म्हणायची पद्धत आहे. असं म्हणण्यानं त्यातून ब्राह्मण जातीत जन्मलेले पण ब्राह्मण्य नाकारणारे समाजसुधारक आपण जाणिवपूर्वक वगळतो. ही प्रतिक्रिया आपल्या शेकडो वर्षांच्या इतिहासातील सामाजिक घटनांवरची प्रतिक्रिया आहे हे सहज समजून येते. पण सामान्य माणसांच्या पातळीवर काय वस्तूस्थिती आहे हा विचार केल्यास मात्र अगदी वेगळेच चित्र पहायला मिळते. कुणी कितीही विरोध केला, निषेध केला, अतिशय वाईट शब्दांत टिका केली तरी उभ्या महाराष्ट्राने आणि तमाम जाती जमातींनी विठ्ठलाची भक्ती सोडली नाही. ‘ग्यानबा-तुकाराम’ हा नामघोष महाराष्ट्राच्या मुखातून अटला नाही.
खरे आश्चर्य तर हे आहे की ज्या ब्राह्मणी वैदिक धार्माविरूद्ध ही प्रतिक्रिया उमटली होती त्याच ब्राह्मण जातीतही मोठ्या प्रमाणात विठ्ठलाची भक्ति सुरू झाली. बाकीच्या देवांबरोबरच विठ्ठल रूक्मिणीची मुर्तीही ब्राह्मणांच्या देवघरात स्थानापन्न झाली.
वारकरी संप्रदायाची सुरूवात लौकीक अर्थाने ज्ञानेश्वरांपासून झाली असे मानण्यात येते. ज्ञानेश्वरांची गुरू परंपरा ही नाथपंथाची आहे. आदीनाथ-मत्सेंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ अशी ही गुरूपरंपरा आहे. या नाथ परंपरेतील बरेच सिद्ध पुरूष हे ब्राह्मण नाहीत. म्हणजे ज्ञानेश्वरांसारख्या ब्राह्मणाने आपल्या जातीपुरता संकुचित विचार न करता व्यापक अशा बहुजनांच्या परंपरेला स्विकारले. नाथपरंपरेचा जो योगमार्ग आहे तो सामान्य लोकांसाठी उपयुक्त नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग सामान्य लोकांना दाखवला. त्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ सारखी त्यांच्या भाषेत ग्रंथरचना करून दिली.
ज्ञानेश्वरांनंतरचे वारकरी संप्रदायातील दुसरे ब्राह्मण संत एकनाथ. एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करून घेतली हे बर्‍याच जणांना माहित नसते. आजूबाजूला पसरलेल्या शेकडो हस्तलिखित पोथ्यांमध्ये पाठभेद होते. चुका होत्या. त्या सगळ्या दुरूस्त करून ज्ञानेश्वरीची प्रमाण प्रत कुठल्याही विज्ञापीठाची फेलोशीप न मिळवता, विद्यापीठातील ‘ज्ञानेश्वर’ अध्यासनाची खुर्ची न मिळवता एकनाथांनी तयार केली. त्यासाठी 10 वर्षे इतका मोठा कालावधी लागला. एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’ नावाचा जो ग्रंथ सिद्ध केला तो वारकरी संप्रदायात प्रमाण मानला जातो.
वारकरी संप्रदायाने ज्या तीन ग्रंथांना ‘प्रस्थान त्रयी’ म्हणून मानाचे स्थान दिले आहे त्यातील ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘एकनाथी भागवत’ हे दोन ग्रंथ ब्राह्मणांनीच लिहीले आहेत. तिसरा ग्रंथ म्हणजे ‘तुकाराम गाथा’.
महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठी नावे आणि घटना जवळपास सगळ्यांनाच माहित असतात. काशीहून गंगेची कावड घेवून नाथ निघाले. पैठणला आपल्या गावी आले. ही कावड रामेश्वरला नेउन महादेवाच्या पिंडीवर घातली की महान पुण्य लाभते अशी अख्यायिका. त्यांनी ही कावड तहानेने तडफडणार्‍या गाढवाच्या मुखात रिती केली व खुळचट अख्यायिकेचा अंत केला. ही कथा बर्‍याचजणांना माहित आहे.
पण आजच्या काळात एका घराण्याने काशीची यात्रा सोडून पंढरपुरची यात्रा सुरू केली व त्याचा संप्रदायच तयार केला हे मला कळाल्यावर आश्चर्य वाटले. गोपजी पंडित गोसावी हे काशी क्षेत्रातील अत्यंत विद्वान पंडित. यांच्या घराण्यात काशीची यात्रा असायची. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यात अनवा या गावी त्यांच्या वंशजांनी ‘विठ्ठल रूक्मिणी संस्थानाची’ स्थापना केली. (श्री विठ्ठल दादामहाराज चातुर्मास्ये हे या संस्थानच्या आद्य महाराजांचे नाव) माघ शु. 10 शके 1655 मध्ये (सध्या शके 1935 चालू आहे) म्हणजे जवळपास 280 वर्षांपूर्वी विठ्ठल रूक्मिणी यांच्या मूर्तीची स्थापना केली. काशीची वारी सोडून दिली. पंढरपुरची वारी सुरू केली. चातुर्मासाचे चार महिने या संस्थानचे महाराज हे पंढरपुरला असतात. त्यामुळे यांना चातुर्मासे महाराज अशीच उपाधी आहे. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घराणे. यांच्याकडे गळ्यात तुळशीची माळ घालणे ही अट आहे. दर महिन्यातील एकादशीला उपवास करण्याचा नेम आहे. अगदी बाळंतिणबाईलाही हा उपवास करावा लागतो. घरात आलेल्या प्रत्येक सुनेला तुळशीची माळ घालूनच घरात घेतले जाते. या संस्थानच्या संप्रदायात ‘तुकाराम गाथे’चे पारायण करण्याची परंपरा आहे. एरव्ही ब्राह्मणांच्या संस्थानात बहुजनांचे ग्रंथ निषिध्द मानले जातात असा समज आहे. हा समज खोटा ठरविणारे हे उदाहरण.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर इतर बहुजन समाजाबरोबरच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज या संस्थानचा शिष्य आहे. माझे लेखक मित्र धनंजय चिंचोलीकर (बब्रुवान रूद्रकंठावार) यांच्या गावी चिंचोलीला (ता. कन्नड) मी गेलो असताना त्यांच्या घरात या संस्थानचे नाव असलेलो पांडुरंगाचा फोटो मला दिसला. तो फोटोही वैशिष्ट्यपूर्ण आहे. विठ्ठलाची दसर्‍याच्या दिवशी धनगराच्या वेशात पुजा मांडली जाते. खांद्यावर घोंगडी, हातात काठी, डोक्याला शिंदेशाही पगडी असा खास बहुजनांच्या जिवनाशी निगडीत पोशाख असतो. धनंजयच्या वडिलांना मी या संस्थानाबाबत विचारले. त्यांनी त्यांच्या मोठ्या वहिनींशी माझी गाठ घालून दिली. त्या 90 वर्षांच्या काकूंनी खणखणीत आवाजात संस्थानच्या परंपरांची माहिती दिली. मी त्या गादीवरील महाराजांचीही भेट घेतली. संप्रदायाची माहिती करून घेतली.
या संस्थानचे अनुग्रहित पालोदकर कुटूंबियांनी मोठी वेगळी माहिती दिली. धनंजयच्या मोठ्या बहिणीचे (ऍड. प्रभाकरराव पालोदकर) यमजान हे पालोदचे (ता सिल्लोड, जि. औरंगाबाद)  मोठे जमिनदार. ही सगळी ब्राह्मण घराणी पारंपारिक वैष्णवपंथाची अनुयायी. या संप्रदायात तप्त मुद्रा शरिरावर उमटून दिक्षा घेण्याची परंपरा आहे. या घराण्याला गुरूस्थानी असलेल्या मध्वाचार्यांनी अनव्याच्या महाराजांची गाठ घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. द्वैत विचारांना मानणार्‍या या वैष्णव मध्वाचार्यांनी आपल्या या परिसरातील अनुयायांना सांगितले की तूम्ही सगळे आता यांचे अनुग्रहीत व्हा. तप्त मुद्रा घेउन दिक्षा घेण्याची आता आवश्यकता नाही. हे सांगतात त्याप्रमाणे दीक्षा म्हणून माळ धारण करत जा.
तेंव्हापासून ही सगळी मंडळी इतर बहुजनांप्रमाणे माळ धारण करतात. एकादशीचे उपवास करतात. मला हे सगळे फार महत्त्वाचे वाटले. शंकराचार्यांनी शैव व वैष्णव हे भांडण मिटवले व अद्वैतवादाचा हिरीरीने पुरस्कार केला. हे आपण इतिहासात ऐकलेेले असते. आपल्या कर्मठपणाने सगळ्या समाजाला विभागणार्‍या ब्राह्मणांच्या कथा दंतकथा बनून आपल्या जिभेवर नाचत असतात. पण याच जातीतील मोठावर्ग हा कुठलीही कट्टरता न बाळगता समाजातील मुख्य धारेचा भाग बनतो नव्हे त्यातच सामावून जातो हे लक्षात घेतले जात नाही.  वै.धुंडामहाराज देगलुरकरांसारखी मोठी नावं माहित असतात. पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरलेली छोटी मोठी संस्थाने आणि त्यांच्यातील वारकरी परंपरा परिवर्तनवाद्यांच्या लक्षात येत नाहीत.
माझी आजी आणि नंतर आई परभणीचे सत्पुरूष रंगनाथ महाराज यांच्याबद्दल सांगायची. माझ्या आजोबांच्या काळातील हे सत्पुरूष. त्यांना आजोबा गुरूस्थानी मानायचे आणि वयाने लहान असूनही त्यांच्या पाया पडायचे. हे रंगनाथ महाराज हे आर्यवैश्य (कोमटी) समाजातील होते. महाराष्ट्रातल्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर परिसरात हा समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे. हे मुळचे जैन धर्मिय. ते परत वैदिक धर्माकडे वळले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्विकार केला. वारकरी संप्रदायाची खुण अशी तुळशीची माळ गळ्यात धारण केली. पण मुळच्या गोमटेश्वराला ते विसरले नाहीत.  परिणामी गोमटेश्वर-गोमटी-कोमटी असे नाव या समाजाला पडले. (संदर्भ- मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास, डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन)   रंगनाथ महाराज हे या समाजातील वारकरी परंपरेतले मोठे नाव. आज खाण्यापिण्याबाबत आणि आपल्या परिसरात दुसर्‍या जातीधर्माच्या लोकांना राहू न देण्याबाबत जैन ओळखले जातात. त्यांच्यातही जूना वैदिक धर्म परत स्विकारण्याची उदारमतवादी परंपरा होती. या समाजातील रंगनाथ महाराजांना गुरू मानण्यात ब्राह्मण जातीतील माझ्या आजोबांना कमीपणा वाटला नाही. याचे साधे कारण म्हणजे आपल्याकडे ज्ञानाची परंपरा ही नेहमीच उदारमतवादी राहिली आहे.
ज्या शेतकरी चळवळीत मी काम करतो, या चळवळीत बहुतांश लोक हे वारकरी संप्रदायाचेच आहेत. गंमत म्हणजे शरद जोशींनी जेंव्हा पढरपुरच्या वारीची ‘भीकमाग्यांची दिंडी’ असे म्हणून संभावना केली ती या लोकांनी शांतपणे ऐकून घेतली. संघटनेच्या सभांना गर्दी केली. शरद जोशींचा जयजयकार केला. ‘शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. पण कार्यकर्त्यांनी आषाढीची वारी काही सोडली नाही. तीन वर्षांपूर्वी मी नगर जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांचे बरोबर दौर्‍यावर होतो. असेच आषाढीचे दिवस होते. त्या कार्यकर्त्याच्या घरात शरद जोशींचा मोठा फोटो लावलेला. आणि शेजारीच विठ्ठलाचा फोटो त्याला तुळशीची माळ घातलेली. सारे घरदार आषाढीचा उपवास करत होते. मला या विरोधाभासाची गंमत वाटली.
आपली परंपरा मोठी विचित्र आहे. फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणताना या महापुरूषांनी देव देवतांबद्दल काही म्हटलं तरी ते आम्ही फारसं मानलं नाही. कितीही टिका केली तरी आमच्यावर तसा फारसा फरक पडला नाही. ब्राह्मणी धर्माविरूद्ध प्रतिक्रिया म्हणून भक्तिमार्गावरील वारकरी पंथ आम्ही स्विकारला इतकंच नाही तर ब्राह्मणांनाही हा स्विकारायला भाग पाडलं. आज सगळ्या टिका टिपण्या करून ‘फुले-शाहू-आंबडकरां’चा महाराष्ट्र थकला पण सर्वसामान्यांच्या पायाला लागलेली पंढरीची ओढ आम्हाला नाही कमी करता आली. हिंदू धर्मावर प्रखर टिका करणार्‍या बाबासाहेबांना सगळा समाज सोडाच पण सर्व दलितही बौद्ध धर्माच्या झेंड्याखाली आणता आले नाहीत. इतकंच काय तर हिंदू धर्मानेच गौतम बुद्धाला नववा अवतार म्हणून आपल्यात सामावून घेतले.
शंकराचार्यांना अतिशय कमी आयुष्य भेटले. जर अजून जास्त आयुष्य भेटले असते आणि थोडे नंतरच्या काळात त्यांचा जन्म झाला असता तर माझी खात्री आहे की महावीर जैन 11 वा अवतार, येशु ख्रिस्त 12 वा अवतार, महंमद पैंगबर 13 वा अवतार असं काहीतरी करून टाकलं असतं.  
अतिशय प्रामाणिकपणे असं वाटतं की आता पूर्णपणे उलटे फिरून या पंढरीच्या वारीकडे आणि वारकरी संप्रदायाकडे डोळसपणे पाहण्याची वेळ स्वत:ला परिवर्तनवादी म्हणून घेणार्‍यांवर आलेली आहे.
           

Saturday, June 29, 2013

केदारनाथ आपत्तीची व्याधी । बुडाली शंकराचार्यांची समाधी ॥

दै. कृषीवल, उरूस सदरातील लेख 29 जून 2013 
-----------------------------------------------

केदारनाथच्या महाआपत्तीने प्रचंड मोठी हानी घडून आली आहे. मोठ्या प्रमाणात यावर चर्चा चालू आहे. याच ठिकाणी असलेली आदी शंकराचार्यांची योग समाधी बुडून गेली. शंकराचार्यांनी केदारनाथला योग समाधी घेतली असे काही जण मानतात तर काही जण याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात त्यांनी देह सोडून दिला असंही समजतात. पण शंकराचार्यांचा शेवट केदारनाथला झाला यावर सर्वांचे एकमत आहे.

केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दूरवर डोंगराच्या उतरणीवर (सध्याच्या हेलिपॅडच्या पलिकडे) एक छोटासा चौथरा होता. त्यावर महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ही जागा म्हणजे शंकराचार्यांनी योगसमाधी घेतली ती जागा असे सांगण्यात येते. आता तो चौथरा बुडून गेला. शिवाय मंदिराला लागून उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरच शंकराचार्यांच्या नावानं एक मंदिर उभारलेलं होतं. त्यात त्यांची छोटी मूर्ती स्थापन केलेली होती. आता तेही सगळं बुडून गेलं. नष्ट झालं.
दोन वर्षांपूर्वी मी केदारनाथला सहकुटूंब गेलो होतो. त्या ठिकाणचे अद्भूत रम्य भिषण रौर्द्र आणि म्हणूनच कदाचित आकर्षित करून घेणारे सौंदर्य पाहिल्यावर मनाला पटले की शंकराचार्यांना या ठिकाणी समाधी का घ्यावी वाटली असेल. बहुतांश यात्रेकरू घाईघाईत केदरानाथ मंदिरात जावून दर्शन घेवून परतायच्या मागे असतात. आणि तेथील वातावरण पाहता ते स्वाभाविकच आहे.

दिवसभराचा पायी प्रवास करून मी अतिशय थकलेल्या अवस्थेत केदारनाथ मंदिराजवळ पोंचलो. डोंगर चढून मंदिरासमोरच्या सपाटीवर आल्यावर जे अप्रतिम दृश्य दिसले त्याने पाय खिळूनच गेले. तसेही ते श्रमाने थांबलेच होते. पावसाची भूरभूर संपून गेली होती. आभाळातले पांढरे ढगांचे पुंजके विरळ झाले होते आणि डाव्या बाजूच्या डोंगर कड्यावरून सुर्याची किरणं मंदिरामागच्या मेरूपर्वतावर पडले होते. पर्वताचा शिखराचा भाग अर्धचंद्राकृती आहे. मावळत्या सूर्याच्या किरणांनी तेवढाच भाग झळाळत होता. मागे निळसर आकाश. डोंगर पूर्ण पांढरा शुभ्र. हे वर्णन शिवतांडव स्तोत्रातील वर्णनाशी अतिशय जूळणारे होते.

जटाकटाह संभ्रम भ्रमन्नीलिम्पनिर्झरी । 
विलोलवीचिवल्लरी विराज मान मूर्धनी । 
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके ।
किशोर चंद्र शेखरे रति प्रतिक्षणं मम ॥

(शंकराच्या तसराळ्यासारख्या आकारलेल्या जटांमधून गुरफटून फिरणार्‍या नदीतील चंचल लाटा वेलीसारख्या दिसत आहेत. अशा शोभिवंत मस्तकाने युक्त, धगधगणार्‍या जाज्वल्यमान अग्नीने ज्याचे ललाट प्रकाशित आहे, त्याने मस्तकावर चंद्राची किशोर कोर धारण केली आहे त्या शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती जडली आहे)

रात्री मी या डोंगरातून खळाळत येणार्‍या मंदाकिनी नदीच्या काठावर जावून बसलो. स्वच्छ चांदणे पडले होते. या चांदण्यात हा डोंगर अद्भूत दिसत होता. आभाळातले ढग कोणते आणि बर्फाळ डोंगर कोणता हे कळू नये असे बेमालूम ते एकमेकात मिसळले होते.

संध्याकाळ आणि रात्र या दोन्ही वेळी या परिसराची अद्भूतता मी अनुभवली होती. शंकराचार्यांंनाही याचा अनुभव आला असेल का? नक्कीच आला असणार. ते  तर अतिशय प्रज्ञावान, शिवाय कवी. या सगळ्या पसार्‍यात मानवी देहाची नश्वरता त्यांना याच ठिकाणी जाणवली असणार.

पहाटेला उठून मी मंदिराच्या पलिकडे असलेल्या त्यांच्या समाधी ठिकाणाजवळ एकटाच चालत गेलो. तिथे कुणीही नव्हते. अलिकडच्या गढवाल मंडलच्या विश्रामगृहाच्या चौकीदाराला मी या ठिकाणाबाबत विचारले होते. त्याने सांगितले ते पलिकडे दिसते आहे तेच शंकराचार्यांचे समाधीस्थळ. मी तिथे गेलो. उजवीकडच्या डोंगराआडून सुर्याची कोवळी किरणे गवतावर पडली होती. त्या प्रकाशात पोपटी गवताने त्या सगळ्या परिसराला नितांत सुंदरता प्राप्त करून दिली होती. त्यावरची छोटी छोटी पिवळी जांभळी गवतफुले तर केवळ अप्रतिम दिसत होती. मंदाकिनी नदीचे छोटे मोठे प्रवाह खळाळत होते. संध्याकाळचे दृश्य, रात्रीच्या चांदण्यातील अद्भूतता आणि आता पहाटेच्या उन्हातील जीवनरसाने  भरलेले वातावरण याचे गारूड नक्कीच शंकराचार्यांवर झालेले असणार.

शंकराचार्य या ठिकाणी का आले याचीही एक कथा आहे. केदारनाथ हे ठिकाण पांडवांच्या स्वर्गरोहणाचे ठिकाण मानण्यात येते. पांडवांना असे वाटले की आपण आपल्याच लोकांची हत्या केली महायुद्धात. ते पाप कसे फेडायचे? आयुष्याच्या शेवटच्या पर्वात स्वर्गरोहण करताना पांडव केदारनाथच्या पायाशी आले आणि तिथे त्यांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली मंदिर उभारलं व आपल्या पापातून मुक्ति मिळवली. या मंदिरात महादेवाची पिंड  घडवित असताना ती घडेचना. तेंव्हा साक्षात शिवाने त्यांना सांगितले की या ठिकाणी ही पिंड घडणार नाही. इथली माती ठिसूळ आहे. (आताच्या आपत्तीच्या संदर्भात हे लक्षात घ्या) हा जो मागचा पर्वत दिसतो आहे तो म्हणजेच मी स्वत: शिव आहे. तेंव्हा वेगळी पिंड घडवायची गरज नाही. मग त्यांनी त्या डोंगराच्या अकाराचीच ओबडधोबड रचना केली. तिचीच पुजा पिंड म्हणून करण्यात येते. या पिंडीवर अहिल्याबाई होळकरांनी सोन्याची छत्री करून बसवली. या ओबडधोबड रचनेला चांदीचा कठडा करून दिला. त्यावर सुंदर नक्षिकाम केलेले आहे.

शंकराचार्यांनी चार पिठांची स्थापना केली. ती ठिकाणं अशी-कर्नाटकातील शृंगेरी, गुजरातधमील द्वारका, ओडिशातील जगन्नाथ पुरी, उत्तराखंडयेथील बद्रीनाथ. बद्रीनाथ व केदारनाथ मिळून एक ज्योर्तिलिंग मानण्यात येते.

शंकराचार्य भारतभर फिरले त्यामागे एक विशिष्ट सुत्र होते. त्यांचे जन्मगाव कालडी हे केरळात आहे. हा सगळा परिसर जगातील विविध धर्ममतांसाठी भारतातील प्रवेशद्वार मानण्यात येते. इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी इथूनच भारतात आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला होता. हा काळ शंकराचार्यांचाच काळ आहे. (शंकराचार्य जन्म इ.स.788-समाधी 820). त्या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांना विविध मतमतांमध्ये विभागलेला हिंदू समाज अद्वैताच्या एका धाग्यामध्ये  गुंफायचा होता. आणि आपल्या 32 वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी हे प्रचंड मोठे काम केले. (महाराष्ट्रासाठी या अद्वैताचा संबंध म्हणजे आपला वारकरी संप्रदाय याच अद्वैत मतावर आधारलेला आहे.)

अभ्यासकांनी शंकराचार्यांनी केलेल्या प्रवासाचा मार्ग संशोधनाने आता निश्चित केला आहे. कालडी (जन्मस्थान, केरळ)- ओंकारेश्वर (मध्यप्रदेश-गुरूमंत्र गोविंद भागवद्पाद यांचेकडून)-वाराणसी (उत्तर प्रदेश, वेदांवरील भाष्याचे लिखाण)-बद्रीनाथ (उत्तराखंड, बादरायणाच्या वेदांत सुत्रावरती भाष्य तसेच उपनिषद, भगवद् गीता यांच्यावरील भाष्य, विष्णु सहस्त्रनामाचे लिखाण)-प्रयाग (अलाहाबाद-उत्तरप्रदेश, कुमारील भट्ट यांच्याशी भेट)-महिष्मती (बिहार, मंडन मिश्रांची भेट व वादविवादात त्यांचा पराभव)-श्रीशैल (आंध्रप्रदेश)-गोकर्ण (गोकर्ण महाबळेश्वर महाराष्ट्र)- मुकांबिका (कर्नाटक)- शृंगेरी (कर्नाटक)- कालडी (केरळ, आईचा अत्यंविधी केला)-रामेश्वर (तामिळनाडू)-तिरूपती (आंध्रप्रदेश)-अमरावती (विदर्भ महाराष्ट्र)-द्वारका (गुजरात)-उज्जैन (मध्यप्रदेश)-कामरूप (आसाम, नवगुप्त या शाक्तपंथिय पंडिताला हरवले व व्यास सुत्रांवर भाष्य केले)- जगन्नाथ पुरी (ओडिशा)- श्रीनगर (कश्मिर)-बद्रीनाथ (शेवटचे दिवस)-केदारनाथ (योगसमाधी)

हा नुसता प्रवास बघितला तरी आचंबित व्हायला होतं. त्या काळचं वातावरण बघता सर्व प्रकारचे धर्मविषयक विचार भारतात प्रसार पावत होते व या सगळ्यांवर इथल्या मातीचा एक वेेगळा रंग चढत होता. अगदी आजही कोल्हापुरच्या क्रिश्चन वस्तीत ‘‘॥ श्री येशु ख्रिस्त प्रसन्न ॥ ’’ असं लिहीलेलं आढळतं. शंकराचार्यांच्या काळात केरळात एक चेरामन जामा मशीद या नावाची मशीद आहे. तिचे तोंड पूर्वेकडे आहे. या मशीदीत रोज दिवा लावला जातो. ही मशीद महंमद पैगंबर यांच्या हयातीत बांधली गेलेली भारतातील पहिली मस्जिद आहे. इथल्या प्रथेप्रमाणे प्रार्थना स्थळांचे तोंड पूर्वेला असते मग आमच्याही प्रार्थना स्थळाचे तोंड पूर्वेलाच ठेवा असं तेंव्हाचे धर्मप्रसारक म्हणाले.

हे सगळे शंकराचार्यांच्या आसपास घडत होते. बृहडेश्वराच्या मंदिरावर बुद्धाची अतिशय मोहक अधि पद्मासनातील मुर्ती याच परिसरात आहे. सेंट थॉमसने ख्रिश्चन धर्मप्रसाराला सुरवात याच परिसरातून शंकराचार्यांच्या काळात केली. हे सगळं समजून घेत शंकराचार्य भारतभर फिरले.

अशा या प्रतिभावंताला आपल्या प्रवासात शेवटी केदारनाथला तेथल्या वातावरणात मोक्षाचा आनंद प्राप्त झाला. तिथली धार्मिक महती (पांडवांचे स्वर्गरोहण) पाहता आपण येथेच येागसमाधी घ्यावी असे त्यांना वाटले असणे स्वाभाविक आहे. आयुष्यभर पांडित्यपूर्ण विवेचन करत फिरणार्‍या, तत्त्वज्ञानविषयक वादविवादात सर्वांना पराजित करणार्‍या या महान प्रतिभावंताने आयुष्याच्या शेवटी फक्त सहा श्लोकांचे  निर्वाणषटक लिहीले व आपली जिवन यात्रा संपवली.

शंकराचार्यांच्या समाधीजवळ मला जी प्रसन्नता अनुभवायला मिळाली त्यावरून मला असं वाटलं की नेमकी समाधी कुठे घेतली ते सांगता यायचं नाही पण त्यांनी निर्वाणषटक याच जागी बसून लिहीलं असणार हे नक्की. (शेवटी निर्वाणषटक व त्याचा अर्थ दिला आहे.)

आज ही समाधी वाहून गेली आहे. पूनर्निर्माण करताना शंकराचार्यांच्या या योगसमाधीस्थळाचीही सुंदर रचना केली जावी आणि तीही बंदिस्त नसावी. उघड्यावरती त्यांची सुंदर मूर्ती बसवून भोवती बाग करावी. मूर्तीपाशी निर्वाणषटक दगडात कोरून ठेवावे. कुणीही इथे बसला तर त्याला ती अनुभूती यायला हवी.        

निर्वाणषटकम्

मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही; तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही; आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही (चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, मी शिव आहे

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पश्चकोश: ।
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही; रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ; वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही; लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मंत्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही, मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही; मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही

न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही, जातिविषयक भेदभाव मला नाही; मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही, कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.

अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे, मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे, मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.