Tuesday, September 13, 2011

योद्धा शेतकरी नेता


शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना अलीकडेच चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने- शेतकरी चळवळीच्या अनुषंगाने शरद जोशी यांच्या लिखाणावर आधारित ‘समग्र शरद जोशी’ प्रकल्प सिद्ध करणाऱ्या प्रकाशकाचे मनोगत..

-----------------------------------------------------------------
दै. लोकसत्ता , लोकरंग दि. ११ सप्टेंबर २०११ मध्ये प्रकाशित झालेला लेख..
-----------------------------------------------------------------

 रद जोशींच्या वयाला नुकतीच ७६ वष्रे पूर्ण झाली. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आठवतो आहे तो त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा आणि त्यानिमित्ताने हाती घेतलेला व पूर्णत्वास नेलेला ‘समग्र शरद जोशी’ प्रकल्प! शरद जोशी आपला वाढदिवस साजरा करीत नाहीत. त्यानिमित्त एखादा कार्यक्रम ठेवला तर त्याला नकार देतात हे माहीत होते. त्यांची पुस्तकं मी प्रकाशित करीत होतो. त्यांना पंच्याहत्तरावे वर्ष लागते आहे, हे समजल्यावर काय कार्यक्रम आखावा, यावर विचार करत होतो. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे यांनी एक चांगला मार्ग सांगितला. तिथीप्रमाणे त्यांचा जन्म ऋषीपंचमीचा आहे. ही तारीख २००९ मध्ये होती २४ ऑगस्टला. औरंगाबादला शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या निमित्ताने ते येणारच होते. तेव्हा २४ ला त्यांच्या एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन ठेवले तर त्याला शरद जोशी नकार देणार नाहीत! मग मी तसा घाट घातला. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित करण्याची तयारी केली.
शरद जोशींचे ‘स्वातंत्र्य का नासले?’ हे पुस्तक १९९८ मध्ये प्रकाशित करून मी प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली होती. पण तेव्हा मी पूर्णवेळ प्रकाशक म्हणून काम करत नव्हतो. त्यांची याच नावाची लेखमाला पाक्षिक ‘शेतकरी संघटक’मध्ये छापून आली होती तेव्हाच मला ती आवडली होती. माझ्यावर आजही तिचा विलक्षण प्रभाव आहे. ‘याचं पुस्तक करा,’ असा लकडा मी म्हात्रे सरांच्या मागे लावला. म्हात्रे सर मोठे वस्ताद! त्यांनी, ‘आता तुमच्यासारख्या तरुणांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे,’ असं म्हणत माझे दात माझ्याच घशात घातले. मला आनंद तर वाटला, परंतु ‘शरद जोशी परवानगी देतील का?,’ असं मी भीत भीत म्हात्रे सरांनाच विचारलं. सरांनीही ‘त्यांनी परवानगी दिली. तू छापतोस का?,’ असं म्हणत मला टोलवलं. आणि अमरावतीला साजऱ्या झालेल्या जनसंसदेच्या भव्य कार्यक्रमात हे पुस्तक माझ्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलं. चित्रकार चंद्रमोहन यांनी त्यासाठी अतिशय सुंदर मृखपृष्ठ करून दिलं होतंशेतकरी संघटक’मधून प्रसिद्ध झालेले मुक्त अर्थव्यवस्थेवरील शरद जोशींचे लेखही मला आवडले होते. त्यांचंही चांगलं पुस्तक होऊ शकेल असं मला वाटलं. एव्हाना मी ‘जनशक्ती वाचक चळवळ’ नावानं पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय पूर्णवेळ सुरू केला होता. ‘खुल्या व्यवस्थेकडे.. खुल्या मनाने’ या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध केलं. सोबत शेतकरी संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे असलेलं माझ्या वडिलांचं (अ‍ॅड्. अनंत उमरीकर) यांचं ‘वेडेपीर’ हे  पुस्तकही प्रकाशित केलंशेतकरी संघटनेचा कार्यक्रम असला की आम्ही पुस्तकांचे गठ्ठे घेऊन विक्रीला बसायचो. सोबत संघटनेचे बिल्ले, संघटनेत लोकप्रिय असलेले कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितासंग्रह, तसेच शेतकरी प्रकाशनाची जुनी पुस्तकंही असत. शरद जोशींचं सगळं वाङ्मय प्रकाशित करावं असं मनापासून वाटायला लागलं. कार्यकत्रे कार्यक्रमाच्या वेळी ही भावना वेळोवेळी व्यक्त करायचे. शरद जोशींनी आत्मचरित्रात्मक असे काही लेख साप्ताहिक ‘ग्यानबा’मध्ये लिहिले होते. आपली आई, बाबुलाल परदेशी, शंकरराव वाघ अशी काही व्यक्तिचित्रं त्यांनी लिहिली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेलं पत्रही ललित साहित्याचा एक उत्तम नमुना होता. हा सगळा मजकूर एकत्र करून त्याचं पुस्तक करायचं ठरवलं. प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी या पुस्तकासाठी माझ्यामागे लकडाच लावला. ‘अंगारमळा’ या नावानं हे पुस्तक शरद जोशी यांच्या वाढदिवशी- ३ सप्टेंबर २००८ रोजी प्रसिद्ध केलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा प्रथम पुरस्कारही मिळालाशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेलं शरद जोशींचं ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाचे पुनर्मुद्रणही ‘अंगारमळा’नंतर लगेचच औरंगाबाद येथे झालेल्या संघटनेच्या अधिवेशनात प्रकाशित केलं. एव्हाना त्यांची चार पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा करण्याचं ठरलं. त्यांचं जुनं पुस्तक ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ (पूर्वी दोन भागांत असलेलं) आणि ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’ यांची तयारी केली. ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘शतकाचा मुजरा’, ‘शेतकरी कामगार पक्ष- एक अवलोकन’ आणि ‘जातीयवादाचा भस्मासुर’ या छोटय़ा पुस्तिका ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’मध्ये समाविष्ट केल्या. या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते शरद जोशींचा सत्कारही केला. इंद्रजीत भालेराव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. अतिशय मनोज्ञ असं भाषण शरद जोशींनी याप्रसंगी केलंशरद जोशींची सहा पुस्तकं तोवर झाली होती. त्यांचं यापूर्वी ग्रंथरूपात प्रकाशित झालेलं सर्व लिखाण पुनर्मुद्रित झालं, पण शिल्लक लिखाणाचं काय? त्याची वर्गवारी कशी करायची? त्याचं स्वरूप कसं ठेवायचं, हा यक्षप्रश्न होता. औरंगाबादच्या या कार्यक्रमात महिला आघाडीच्या नेत्या शैलजा देशपांडे यांनी एक बाड माझ्या हाती दिलं. शरद जोशी यांनी दै. ‘देशोन्नती’मध्ये ‘जग बदलणारी पुस्तके’ या नावानं लेखमाला लिहिली होती. त्यांचे मूळ लेख असलेलं ते बाड शैलाताईंनी बऱ्याच वर्षांपासून जपून ठेवलं होतं. ‘याचं पुस्तक करा,’ असा त्यांचा प्रेमळ आग्रह होता. मी आधी ते वाचले नव्हते. अधाशासारखं ते बाड वाचून काढलं. याचदरम्यान ‘सातारा भूषण’ पुरस्कार शरद जोशींना जाहीर झाला. त्या कार्यक्रमात ९ जानेवारी २०१० रोजी हे पुस्तक प्रकाशित करण्याचं निश्चित केलं. त्याचवेळी इंद्रजीत भालेरावांचे शरद जोशींवरचे आणि त्यांच्या पुस्तकांवरचे लेख एकत्र करून ‘मळ्यातील अंगार’ हे पुस्तकही प्रकाशित करायचं ठरवलं. विजय कुवळेकरांच्या हस्ते ही दोन्ही पुस्तके साताऱ्याच्या त्या कार्यक्रमात प्रकाशित झालीदै. ‘लोकमत’मध्ये ‘अन्वयार्थ’ या नावानं शरद जोशींनी लेखमाला लिहिली होती. १९९२ ते ९४ आणि २००० ते २००१ या काळात हे लेख प्रसिद्ध झाले होते. त्यांचं पुस्तक आधी करा, असं स्वत: जोशींनीच सुचवलं. मी त्यादृष्टीनं काम सुरू केलं. मध्यंतरीच्या काळात आपल्या खासदार निधीतून त्यांनी परभणीच्या गणेश वाचनालयास दहा लाख रुपये दिले होते. त्या निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचं काम पूर्ण होत आलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी जोशींनी यावं, असं संस्थाचालकांना वाटत होतं. पण शरद जोशी परभणीच्या कार्यकर्त्यांवर काही कारणानं नाराज होते. त्यामुळे ते परभणीला यायला तयार नव्हते. माझ्या वडिलांनी मला पुस्तक प्रकाशनाचं निमित्त करून त्यांना बोलवू, असं सुचवलं. ‘अंगारमळा’ला शासनाचा पुरस्कार मिळाला, त्या समारंभासाठी ते जाणार नव्हते. मी तो पुरस्कार, रकमेचा धनादेश व स्मृतिचिन्ह त्यांना द्यायला अंबेठाणला गेलो. त्यांचा चांगला मूड बघून हळूच परभणीला यायचं पिल्लू सोडून दिलं. ‘अन्वयार्थ’चं प्रकाशन असेल तर येतो, अशी अट त्यांनी घातली. मी ‘हो’ म्हणून तारीखही ठरवून टाकली. मला औरंगाबादला परत आल्यावर लक्षात आलं की, मजकूर फारच मोठा झालेला आहे. इतका मजकूर एका पुस्तकात मावणं शक्य नाही. दोन खंड करावे लागतील. पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. मग ‘अन्वयार्थ-१’ आणि ‘अन्वयार्थ-२’ अशी दोन पुस्तकं प्रकाशित करायचं ठरवलंयाचदरम्यान शरद जोशींचा अमृतमहोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याच्या हालचाली शेतकरी संघटना आणि त्यांचे हितचिंतकांकडून सुरू झाल्या. बघता बघता त्याला गती आली. ६ जूनला औरंगाबाद येथे साहित्य मेळावा, २ ऑक्टोबरला रावेरीला महिला मेळावा आणि १० नोव्हेंबरला शेगाव येथे शेतकरी महामेळावा असा कार्यक्रमाचा तपशीलही ठरला. ही बठक परभणीला गणेश वाचनालयाच्या नव्या सभागृहात संपन्न झाली. त्या बठकीनंतर माझ्या मात्र पोटात गोळा उठला. कारण या तोकडय़ा कालावधीत मला त्यांचं उर्वरित लिखाण प्रसिद्ध करायचं होतं आणि लेखांची फाईल तर अवाढव्य झाली होती. १९९० पर्यंतचं त्यांचं लिखाण सुरेशचंद्र म्हात्रे यांनी ग्रंथबद्ध केलं होतं. त्याचं पुनर्मुद्रण ‘शेतकरी संघटना- विचार आणि कार्यपद्धती’, ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ व ‘शेतकऱ्याचा राजा शिवाजी आणि इतर लेख’ या पुस्तकांतून आम्ही पूर्ण केलं होतंलेखांची अवाढव्य कात्रणं लावता लावता त्यांच्या भाषणांचा एक वेगळा विभाग होऊ शकतो असं लक्षात आलं. खुल्या अधिवेशनातील, कार्यकारिणीच्या बठकीतील, सभांमधील ही भाषणं होती. ती एकत्रित केली. पुस्तकाला ‘माझ्या शेतकरी भावांनो, मायबहिणींनो’ असं समर्पक नाव दिलं. कारण हेच संबोधन शरद जोशी नेहमी वापरतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चांदवडच्या ऐतिहासिक अधिवेशनातील भाषण करतानाचा शरद जोशींचा फोटो जशाचा तसा वापरला आणि अक्षरंही कवीमित्र दासू वैद्य यांच्या हस्ताक्षरात करून घेतली. त्यासोबत विजय परूळकरांचं गाजलेलं ‘योद्धा शेतकरी’ची नवी आवृत्तीही प्रकाशित केलीशरद जोशींनी शेतकरी आंदोलनविषयक जे लिखाण केलं होतं त्याचं संकलन ‘बळीचे राज्य येणार आहे’ या नावानं केलं. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ ही मांडणी शरद जोशींनी पहिल्यांदा केली आणि रुजवली. याशिवायचं जे लिखाण होतं त्याचं संकलन ‘भारता’साठी’ या नावानं कर, असं महापारेषणमधील माझा अभियंता मित्र शशांक जेवळीकर याने सुचवलं. अर्थसंकल्पावर दरवर्षी शरद जोशी एक लेख जरूर लिहीत. त्या संकलनास ‘अर्थ तो सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं. मििलद बोकिल यांनी विनोबा भावेंच्या पुस्तकाला ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं होतं, त्यावरून हे नाव सुचलं. राजकीय लेखांचं संकलन करताना त्याला काय नाव द्यावं, कळत नव्हतं. त्यांच्या लेखात ‘पोिशद्यांची लोकशाही’ हा शब्द सापडला आणि हेच नाव योग्य वाटलं.चांदवडचं महिला अधिवेशन ही एक मोठी ऐतिहासिक घटना होती. त्यावेळी ‘चांदवडची शिदोरी’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. तिचं लिखाण महिला कार्यकर्त्यांच्या मदतीनं शरद जोशींनीच केलं होतं. त्यानंतरचे या प्रश्नावरचे लेख एकत्र करून त्याच नावानं हे पुस्तक रावेरीच्या महिला मेळाव्यात सिद्ध केलंशेगावला शरद जोशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त शेतकरी महामेळावा आयोजिण्यात आला होता. शरद जोशी येतात की नाही, अशी शंका सगळ्यांनाच होती. पण ते आले. त्यांनी सत्कार मात्र स्वीकारला नाही. फक्त वयोवृद्ध शेतकऱ्याच्या हस्ते मानपत्र स्वीकारलं. तरुण कार्यकर्त्यांच्या हस्ते ‘समग्र शरद जोशी प्रकल्पा’तली शेवटची दोन पुस्तके ‘पोिशद्यांची लोकशाही’ आणि ‘भारता’साठी’ प्रकाशित करण्यात आली. लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही पुस्तके प्रकाशित झाली. आपण योजिलेला प्रकल्प पूर्ण झालेला पाहताना मला खूप भरून आलं.माझ्यावर शेतकरी संघटनेची आंदोलने, सभा आणि भाषणांपेक्षा शरद जोशींच्या लिखाणानं विलक्षण प्रभाव पाडला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी माझ्या घरात ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिक यायला लागले. तेव्हापासून मी त्यांच्या लिखाणाने प्रभावित होत आलेलो आहे. प्रत्यक्ष त्यांचं भाषण मात्र नंतर दहा वर्षांनी मी ऐकलंराष्ट्रीय कृषिनीती’ नावानं एक छोटी पुस्तिका शरद जोशींनी लिहिली होती. व्ही. पी. सिंहांच्या काळातील कृषी समितीचा तो अहवाल होता. त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळातील कृषी कार्यदलाचाही एक अहवाल आहे. या दोन्हींचं पुस्तक मराठीत करणं शिल्लक आहे. ‘शेतकरी संघटना : आठवणी, आस्था, अपेक्षा आणि आक्षेप’ हे पुस्तक सध्या मी संपादित करतो आहे. शरद जोशी आणि शेतकरी संघटनेवर अनेक मान्यवरांनी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं लिखाण यानिमित्तानं संपादित करून ते प्रसिद्ध करण्याची योजना आहे. सदा डुंबरे आणि राजू परुळेकर यांनी घेतलेल्या शरद जोशींच्या मुलाखतींचाही त्यात समावेश आहे. अलीकडेच शरद जोशी यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्या सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मानस आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. . ना. धनागरे, विजय कुवळेकर, मििलद मुरुगकर, दत्तप्रसाद दाभोळकर, सतीश कामत, भानू काळे, विद्युत भागवत, हेरंब कुलकर्णी, आसाराम लोमटे यांचे लेख त्यात आहेत. चंद्रकांत वानखेडे, तुकाराम निरगुडे, अमर हबीब, राजीव बसग्रेकर, रमेश चिल्ले, बाबुलाल परदेशी या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या आठवणीही त्यात असतीलशरद जोशीचं समग्र साहित्य अभ्यासकांसाठी आता उपलब्ध असताना एकच अपेक्षा आहे की, या साहित्याचा किमान अभ्यास न करता कुणी शेतकरी चळवळीवर टीका करू नये.
- श्रीकांत अनंत उमरीकर 


Wednesday, August 31, 2011

शरद जोशी तुमचं आता काय करायचं?

 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या ६ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला  अग्रलेख


आदरणीय शरद जोशी,
सा. न.
तुमच्या 76व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा! खरं तर तुम्हाला काय संबोधावं याचाच मोठा प्रश्र्न आहे. शेतकरी संघटनेचे लाखो पाईक तुम्हाला आदरणीय साहेब म्हणतात... पण हे संबोधन काहीसं सरंजामी वृत्तीचं द्योतक, जे तुम्हालाच फारसं पसंत नाहीत. वैयक्तिक संबंधांचा फायदा घेऊन जवळीक दाखविणारं एखादं संबोधन वापरावं तर संयुक्तिक वाटत नाही... म्हणून आपलं नुसतं शरद जोशी असंच म्हणतो. तुम्हाला चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आणि आम्हाला मोठाच आनंद झाला... पण या निमित्ताने एक वेगळाच आणि गंमतशीर विचार मनात येतोय... परवाच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाने बर्‍याच विद्वानांना खरंचच असा प्रश्र्न पडला असावा, ‘शरद जोशी तुमचं काय करायचं?’
शेतकरी संघटनेच्या आंदोलनावरती बर्‍याच विद्वानांनी टीका करत असताना फार मोठा वैचारिकतेचा आव आणला होता. खरं तर अतिशय शास्त्रशुद्ध अशा पायावर, अभ्यासावर आणि अनुभवांवर तुम्ही आंदोलन उभारलं होतं. तरीही तुमच्यावर टीका करताना बुद्धिवंतांच्या जिव्हा मोकाट सुटायच्या... सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत शेतीच्या शोषणाचा संदेश अतिशय सोपेपणानं तुम्ही पोहोचवलात आणि हे करत असताना कुठेही वैचारिक चौकट ढळू दिली नाही. इतकं करूनही लाखोंच्या संख्येने शेतकर्‍यांचे मेळावे भरवून दाखविले, यशस्वी केले... तुम्ही कधीही काळजाला हात घालणारी भाषा करून हुकमी रडू आणलं नाही; पण तरीही शेतकर्‍यांच्या डोळ्यातून जन्मोजन्मीचं दु:ख घळाघळा वाहत राहिलं. निखळ अर्थशास्त्रावरती आधारलेलं आंदोलन करताना कुठेही लोकांचा प्रतिसाद भेटला नाही, असं घडलं नाही. मोठ्या प्रमाणात लोकं यायला लागले, तेव्हा आपसूकच बुद्धिवंतांच्या पोटात गोळा उठायला लागला आणि त्यांनी ठरवून टाकलं... ज्या अर्थी लोकं येतात त्या अर्थी या आंदोलनात कुठलाही विचार नसणार! आता इतकी वर्षे उलटून गेलीत. तुमच्यावर टीका करणारे सामान्य कार्यकर्तेही नेते बनून फिरायला लागले. त्यांनीही स्वतंत्रपणे आंदोलनं करायला सुरुवात केली; पण तुमच्यासारखं यश, तुमच्यासारखा सर्वसामान्य शेतकर्‍याचा विश्र्वास कुणालाच कमावता आला नाही. तुमचे फोटो शेतकर्‍यांनी देवघरात मांडले. हे भाग्य कुठल्याही नेत्याच्या  वाट्याला आलं नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भल्याभल्यांनी चित्रविचित्र टीका अण्णांवर करायला सुरुवात केली. बुद्धिवंतांना तर अण्णा म्हणजे सगळ्यांत सोपी शिकार! कारण या आंदोलनात खरंचच वैचारिकतेचा अभाव! त्यांच्यावर टीका करणं त्यामुळे सोपं... या आंदोलनावरती बोलतानाही आपली बुद्धी स्थिर ठेवून तुम्ही शांतपणे विश्र्लेषण केलंत. आंदोलनातील लोकांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे हे ऐतिहासिक जनआंदोलन आहे हे नि:शंकपणे मान्य केलंत. स्वत:च्या आंदोलनातल्या मर्यादा स्पष्टपणे सांगितल्या. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील कोरडेपणा आणि त्यामुळे शेतकरी आंदोलनाला आलेलं गद्यपण हेही मान्य केलंत; पण हे सगळं मान्य करत असताना अण्णांच्या मर्यादा सांगायला तुम्ही चुकला नाहीत. इतकंच नाही, ज्या आंदोलनाशी अण्णांच्या आंदोलनाची तुलना होते, त्या महात्मा गांधी यांच्या आंदोलनाच्या मर्यादाही तुम्ही सांगितल्या आणि ही सगळी चर्चा कुठे खासगीपणे नव्हे तर दूरदर्शनवर स्पष्टपणे करोडो लोकांसमोर केलीत. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचंच तुम्ही दर्शन सगळ्यांना दिलंत आणि म्हणूनच म्हणतो, आमचे  विद्वान मोठे बावचळून गेले आहेत. त्यांना प्रश्र्न पडला आहे - ‘शरद जोशी तुमचं काय करायचं?’
सगळ्या पातळ्यांवरती सगळी हत्यारं वापरून झाली. कधी परिस्थितीची, कधी जातीची, कधी निवडणुकांच्या वेड्यावाकड्या तंत्राची, कधी वैचारिकतेचा आव आणत सगळ्या सगळ्या पद्धतींनी तुमच्यावर चढाई करून झालं... पण सगळ्यांतून तुम्ही स्वच्छपणे बाहेर पडून दोन बोटं वरतीच उरलात. आता तुमचं काय करायचं? तुमचा रस्ता भारतीय परंपरेतला तसा नवा रस्ता नाही. गौतम बुद्ध असो, आदि शंकराचार्य असो, किंवा अगदी अलीकडच्या काळातील महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर असोत या मार्गांनी तुम्ही चालायचं ठरवलंत आणि त्यावर चालत असताना कुणालाच माफ केलं नाहीत... अगदी स्वत:लासुद्धा! जे काही निर्णय घेतले त्याची किंमत सगळ्या परीने मोजलीत आणि म्हणूनच तुम्ही स्वच्छपणे आजही करोडो लोकांसमोर 76व्या वर्षी बुद्धि स्थिर ठेवून स्वत:च्याही चळवळीचं कठोर विश्लेषण करू शकता. स्वत: बुद्धिवंत म्हणवून घेताना अण्णा हजारेंवर टीका करणं ही फार सोपी आणि सोयीची गोष्ट असते; पण शरद जोशींवर टीका करताना आपण हळूहळू नि:संदर्भ, निस्तेज आणि नि:सत्व होत जातो हेच बर्‍याच जणांना कळत नाही. तुम्ही 93 साली म्हणालात - ‘नोकरशाही हा प्रचंड मोठा भस्मासूर आहे’ आणि अण्णांच्या आंदोलनावर  चर्चा करताना नोकरशाहीचा विषय येतो आणि परत तुमच्याच मुद्यापाशी येऊन थांबावं लागतं. कापसाचे भाव 7 हजारांच्या पुढे गेल्यावर निर्यातबंदीची कुर्‍हाड सरकार चालवतं आणि त्याचा झटका बसताच मोठी तीव्र प्रतिक्रिया उमटते. परत विषय येतो तो तुम्ही सांगितलेल्या खुल्या निर्यातीचा... खताच्या अनुदानाचा खेळखंडोबा होत राहतो, ग्रामीण दारिद्य्राचा प्रश्र्न कुठलीही रोजगार योजना, कुठलीही निराधार मदत योजना, कुठलीही धान्य वितरण व्यवस्था सोडवू शकत नाही आणि परत येऊन थांबावं लागतं तुम्ही सांगितलेल्या शेतीमालाच्या रास्त भावापाशीच. शेतकरी आंदोलनाला उलटलेली 31 वर्षे आणि तुमच्या वयाची उलटलेली 76 वर्षे परत आम्ही तुम्ही सांगितलेल्या उत्तरांपाशीच येऊन थांबतो. सांगा शरद जोशी तुमचं आता काय करायचं?

Friday, August 19, 2011

राहूलबाबा हे काय केले !



.............................................................
21 ऑगस्ट २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
.............................................................



उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांच्या जमिनीसंदर्भात राहूल गांधी काहीतरी करायला काय गेले आणि त्यातून भलतेच काय निघाले? मायावतींच्या विरोधात आंदोलन छेडत सामान्य शेतकर्‍यांची बाजू आपण घेतो आहोत असं दर्शविणार्‍या राहूल गांधींना ही कल्पना नव्हती, भारतभर नेमकी उलटी परिस्थिती आहे. कॉंग्रेसचं शासन आहे त्या सर्व राज्यांतही शेतकर्‍यांवरती जमिनींबाबत असाच अन्याय वर्षानुवर्षे होत राहिला आहे. परवाच्या मावळच्या गोळीबारात बळी पडलेल्या शेतकर्‍यांच्या रक्ताने ही गोष्ट परत एकदा अधोरेखित झाली आहे. मुख्यमंत्री मायावतींनी दिलेलं उत्तर राजकीय असलं तरी मोठं मार्मीक आहे. जमिनीशी संबंधित सर्व कायदे ही केंद्राच्या अखत्यारितली बाब आहे आणि केंद्रात कॉंग्रेस आघाडीचं सरकार आहे. आता राहूलबाबा काय करणार? निघाले होते चोर पकडायला आणि चोरीचा मुद्देमाल आपल्याच घरात सापडावा, चोराला प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही आपल्याच घरातून व्हावी आणि पुढे चोराला अभयही आपल्याच घरात दिलं जावं असं मोठं विचित्रच घडलं की!
राहूल गांधींचे जे कोणी सल्लागार असतील त्यांचं कदाचित कायद्याचं ज्ञान अपूरं असेल किंवा त्यांनी मुद्दामच चूक सल्ला राहूल गांधींना दिला असणार. एकतर जी गोष्ट कॉंग्रेसने आधीपासून करायची होती, तिचा नेहरूंपासून सगळ्यांनाच विसर पडला. ती म्हणजे सर्वसामान्यांशी जवळीक साधत संवाद साधणे! म्हणून तर 14 ऑगस्टच्या मध्यरात्री लाल किल्ल्यावर नेहरूंच्या हस्ते तिरंगा फडकत असताना महात्मा गांधी मात्र दिल्लीपासून शेकडो मैल दूर होते. पश्र्चिम बंगालात नौआखालीमध्ये दंगलग्रस्तांचे अश्रू पुसणारे त्यांचे हात कोणालाच दिसत नव्हते. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे याने तमाम कॉंग्रेसजणांची मोठ्या धर्मसंकटातून सुटका केली. गांधीजींचा नैतिक दबाव कोणालाच नको होता. त्यांचा खून परस्पर झाला हे बरेच झाले, असं कॉंग्रेसजणांना वाटत असणार. सत्ता गेली अथवा डळमळली की कॉंग्रेसच्या धुरिणांना आणि विशेषत: गांधी कुटुंबियांना लोकांचा उमाळा येतो. त्यामुळेच इंदिरा गांधी बिहारमध्ये पुराने वाहणारी नदी हत्तीच्या पाठीवर बसून ओलांडतात. राजीव गांधी उन्हातान्हात ओरिसाच्या आदिवासी भागात दौरे काढतात; पण हे सगळं फक्त सत्ता नसताना! आताही जेव्हा मोठमोठे घोटाळे समोर यायला लागले, अडकलंय कोण याचा शोध घेण्यापेक्षा अडकलं कोण नाही हे शोधणं सोपं जावं अशी परिस्थिती आणि राहूल गांधी अशावेळी सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे नाटक करण्यासाठी का होईना; पण प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत आहेत. भलेही यातून काहीही निष्पन्न न होवो. राहूलबाबांनी त्यांच्याही नकळत त्यांच्या पणजोबाच्या एका विचित्र कायद्याला हात घातला आहे. जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये अतिशय जुलमी आणि केवळ सुलतानशाहीतच शोभावा असा इंग्रजांनी केलेला जुनाट कायदा आजही आपल्या देशात चालू आहे. याचा साक्षात्कार राहूल गांधींना कॉंग्रेसच्या कुठल्याही राज्यात झाला नाही. झाला तो उत्तर प्रदेशात! गेल्या 21 वर्षांपासून जिथल्या सत्तेत कॉंग्रेसला वाटा राहिलेला नाही. म्हणजे परत एकदा केवळ राजकारणासाठी राहूल गांधी यांनी या प्रकरणाला हात घातला; पण त्यातून निघालं ते भलतंच. आता या निमित्ताने एकूणच जमीन अधिग्रहण कायद्याचा केंद्रीय शासनाला विचार करावा लागणार आहे. राहूल गांधींच्या निमित्ताने का होईना हा विषय ऐरणीवर आला हे बरेच झाले. आता गरज आहे ती प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची. या प्रश्र्नावर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काहीही फरक नाही. भाजपच्या राजवटीतही हा विषय त्यांनी चर्चेला घेतला नव्हता. किंबहुना, घटनेच्या नवव्या परिशिष्टाला कोणीच हात लावू इच्छित नव्हते. हे सगळं घडतं आहे. ते कॉंग्रेसला सर्वसामान्यांचा कळवळा आला म्हणून नव्हे, जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठमोठ्या उलाढाली आपल्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकत आहेत. आम्ही मांडलेल्या समाजवादी संरचनेतल्या कचकड्याच्या बाहुल्या या नवीन रेट्यात पार कोलमडून गेल्या आहेत. आम्हाला बदल करणं भागच आहे; पण तो आम्ही आतापर्यंत करत नव्हतो. कुठल्याही कारणाने का होईना काहीएक बदल करण्याची निदान तयारी तरी आम्ही दाखवली हेही खूप झालं; पण यातून जे काही बाहेर येईल त्याचा कुठलाच फायदा कॉंग्रेसला होण्याची शक्यता नाही, कारण हे त्यांचंच गेल्या 50 वर्षांतलं पाप आहे. आरक्षण चित्रपटात प्रतिक बब्बर शेवटच्या प्रसंगात आपल्या भ्रष्ट बापाच्या विरोधात उभं राहतो आणि त्याला संस्थेवरून निष्काशित करण्याची विनंती हेमामालिनीला करतो. तसंच काहीसं राहूल गांधी यांना करावं लागणार आहे आणि ही विनंती त्यांना त्यांच्या आईलाच करावी लागेल. माझ्या वडिलांनी नाही त्यांच्या आईनेही नाही, तर तिच्याही वडिलांनी केलेली पापं आपण धुवून टाकूयात आणि असं केलं, तर आणि तरच आपला निभाव लागू शकेल. अन्यथा आपला निभाव लागणे कठीण आहे. 
पण असे होणार नाही. भारतीय राजकारणाचा दिग्दर्शक प्रकाश झा नाही. खरे तर ही परिस्थिती कॉंग्रेसच्याही ताब्यात उरलेली नाही. एक विचित्र अशी अवस्था आज प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळेच स्पष्टपणे मर्यादा कळत असूनसुद्धा सर्वसामान्य लोक अण्णा हजारेंना प्रतिसाद देत आहेत. राहूलबाबा हे तुम्ही काय केलंत? नको त्या विषयाला हात घातलात आता बघूत त्याची काय फळं मिळतात!!

Wednesday, August 3, 2011

मूठभरांचे ‘मजा’सत्ताक । सामान्यांचे ‘सजा’सत्ताक


हे स्वातंत्र्य कुण्या प्रजासत्ताकाचे?


.............................................................
६ ऑगस्ट २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
.............................................................


14 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री 12 वाजता लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकला. आपल्या देशात प्रत्यक्ष घटना लागू झाली ती 26 जानेवारी 1950 ला. तेव्हापासून आपण प्रजासत्ताक झालो. 15 ऑगस्ट 2011 च्या पार्श्र्वभूमीवर असं विचारावंसं वाटतं, ‘हे कुणाचे प्रजासत्ताक आहे?’ एकमय राष्ट्र या अर्थाने नेशन कुठे अस्तित्वात आहे असा प्रश्र्न महात्मा फुले यांनी विचारला होता. त्याच पातळीवर आज कुणाचे प्रजासत्ताक हे विचारावं वाटतं आहे. देशाची वाटणी 4 रंगांमध्ये झालेली स्वच्छपणे दिसते आहे. आपल्या तिरंग्यातले रंग घेऊनच याचं विश्लेषण करता येईल.

हिरवा रंग : मातीतील पोषक द्रव्ये घेऊन झाडाला हिरवेपण प्राप्त होते. त्याचप्रमाणे देशातही मूठभर राजकीय नेते, सरकारी नोकरशहा, त्यांच्याभोवतीचे लाभार्थी, उद्योगपती, व्यापारी, ठेकेदार, दलाल आदींनी या देशाचं पुरेपूर शोषण करून घेतलं आणि स्वत:ला समृद्धी मिळवून घेतली. प्रत्यक्ष देशाच्या प्रति कर्तव्य करायची वेळ आली, की आजही हे लोक कचरतात. सगळे नियम कायदे हवे तसे मोडून, वाकवून आपल्या सोयीने सगळी व्यवस्था यांनी करून घेतली आहे. स्वीस बँकेतल्या काळ्या पैशांबाबत जी चर्चा चालते तो सगळा पैसा याच वर्गाचा आहे. हे लोक नेहमीच सर्वसामान्यांचा कळवळा दाखवतात आणि प्रत्यक्षात कृती करत असताना सर्वसामान्यांचं शोषण केल्यावाचून राहत नाहीत. आजही हजारो कोटींचे गैरव्यवहार इतक्या सहजपणे घडत आहेत, की जणू काही या लोकांनी देशच विकायला काढला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तथाकथित सर्व राजकीय पक्ष समाजातील बहुतांश धुरीण यांमध्ये सारखेच दोषी आहेत.

पांढरा रंग : अख्ख्या अमेरिकेची लोकसंख्या जितकी आहे. तितका जवळपास भारतात उच्चवर्ग, उच्च मध्यमवर्ग, मध्यम वर्ग आहे. संख्येने हा वर्ग कमी असला तरी याची ताकद प्रचंड आहे. हा वर्ग कधीही स्वत: भ्रष्टाचार करत नाही; पण हे नेहमीच भ्रष्टाचाराला साथ देत आले आहेत. त्याचे मूक साक्षीदार राहिलेले आहेत. तसेच त्याचे अप्रत्यक्षरीत्या लाभार्थीही आहेत. अगदी पैशांच्या स्वरूपातला भ्रष्टाचार सोडा; पण साधी गॅस सिलेंडरची बाब विचारात घेतली तरी पन्नास लाखांचा फ्लॅट खरेदी करणारा या वर्गातला माणूस गरिबांसाठी असलेली गॅसवरची सबसिडी तशीच राहावी म्हणून आग्रही असतो. कमकुवत आर्थिक गटासाठी शासनाच्या गृहनिर्माण योजना बहुतांश याच वर्गाने गिळंकृत केल्या आहेत. पेट्रोलचा सगळ्यात जास्त वापर हाच वर्ग करतो; परिणामी पेट्रोलमधली दरवाढ यांच्याच क्षोभाला कारणीभूत ठरते. एकीकडे 200 रुपयांचं सिनेमाचं तिकीट काढताना 350 रुपयांचं गॅस सिलेंडर महाग आहे म्हणण्याची यांना लाजही वाटत नाही. यांची मुलं चुकूनही जिल्हा परिषद अथवा महानगर पालिकांच्या शाळांमध्ये शिकत नाहीत, तर ती खासगी शाळांमध्ये शिकतात. ज्या शाळांना शासनानं अनुदान दिलेलं असतं. बोटावर मोजता येतील इतक्या शाळा विनाअनुदानित आहेत, त्यांनाही अनुदान द्यावं असा आग्रह याच वर्गाने धरलेला असून राज्यकर्त्यांना कायम विनाअनुदानित यातील ‘कायम’ हा शब्द काढायला लावला आहे. हिरव्या गटातल्या लोकांशी यांचे हितसंबंध पूर्णपणे अडकलेले आहेत. सर्वसामान्य म्हणवणारे हे लोक अण्णा हजारेंच्या आंदोलनात मेणबत्त्या घेऊन सहभागी होतात; पण हे कधीही शेतकरी, गिरणी कामगार, आदिवासी यांच्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढत नाहीत.

भगवा रंग : हिंदू संस्कृतीमध्ये भगवा रंग हा त्यागाचं प्रतिक आहे. भारतातल्या तमाम गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गाने आतापर्यंत किमान सूखसुविधांचा त्यागच केलेला आहे. तळागाळातल्या वर्गांचं तर काही विचारायलाच नको. शिवाय आपली संस्कृतीही त्यागच आपल्याला शिकवते आणि ही संस्कृती टिकवण्याचं ओझं पूर्णपणे याच वर्गावर लादल्या गेलेलं आहे, परिणामी या वर्गाला भगवा रंग या कप्प्यात टाकणं योग्य होईल.

निळा रंग : प्रशासकीय यंत्रणा नावाची एक निगरगट्ट संवेदनाहीन अशी व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे. झेंड्यावरती निळं अशोक चक्र असावं तशी ही व्यवस्था आपला निळा शिक्का या देशाच्या सगळ्याच घटकांवर करकरीतपणे उमटवून उभी राहिलेली दिसते. हिला कुणाशीही देणं घेणं नाही. ज्या हिरव्या घटकाशी तिचे हितसंबंध अडकलेले असतात तिच्यावरही प्रसंगी उलटायला ती कमी करत नाही. पदावरून उतरलेला एखादा मंत्री अथवा आमदार, खासदार समोरून गेला तर एरवी सलामीसाठी झुकणार्‍याची पापणीही हलत नाही.

1991 पासून आपण नवीन अर्थव्यवस्थेचे धोरण अवलंबायला सुरुवात केली त्यालाही आता 20 वर्षे उलटून गेली. आपली जी पारंपरिक मानसिकता होती, ज्या अडचणी होत्या, त्यावर शोधण्यासाठीचे जे उपाय होते, जी धडपड होती ते सगळं आता केव्हाच बदलून गेलंय. जागतिक पातळीवर युद्धखोरी आणि बढाईची भाषा करणार्‍या अमेरिकेचे हातसुद्धा प्रचंड मोठ्या कर्जाखाली दबलेले आहेत. यातच सर्व काही आलंय. आपल्याला आता खूप वेगळ्या पद्धतीने विचारा करावा लागेल. या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन काळाला सुसंगत अशी नीती आखावी लागेल तरच आपल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला गवसेल, अन्यथा स्वातंत्र्य दिवस म्हणजे लाल किल्ल्यावर झेंडा या पलीकडे काहीही सांगता येणार नाही.