Tuesday, February 18, 2020

चारठाणकर पुरस्काराच्या निमित्ताने


उरूस, 18 फेब्रुवारी 2020
(चारठाणकर पुरस्कार वितरण प्रसंगी डावीकडून सौ. वरुणा कुलकर्णी, सौ. वर्षा देशपांडे, प्रा. मधु जामकर, डॉ. जगन्नाथ दिक्षीत, अभिनेते गिरीश कुलकर्णी, पत्रकार धनंजय लांबे, ऍड. श्रीकांत वाईकर)

पैसे देवून पुरस्कार मिळविले जात असतानाच्या काळात सामाजिक कृतज्ञता नोंद म्हणून एक पुरस्कार स्वातंत्र्य सैनिकाच्या वतीने सुरू करण्यात येतो. 32 वर्षे हा उपक्रम उत्साहात चालवला जातो. स्वातंत्र्य सैतिकाच्या माघारीही यातील सातत्य कायम राहते ही एक मोठी महत्त्वाची आणि विलक्षण अशी घटना आहे.

सेलू येथील स्वातंत्र्य सैनिक कै. विनायकराव चारठाणकर यांनी त्यांच्या स्वनिधीतून आपल्या परिसरांतील विविध व्यक्तीमत्वांची दखल घेण्यासाठी या पुरस्काराची सुरवात केली. 1988 ला चारठाणकर प्रतिष्ठानची स्थापना झाली. आणि आजतागायत प्रतिष्ठानचे काम चालूच आहे.

या वर्षी अभिनेते गिरीष कुलकर्णी, आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत आणि ज्येष्ठ लेखक समीक्षक प्रा. मधु जामकर यांना हा पुरस्कार दै. पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्काराच्या निमित्ताने काही मुद्द्यांचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विविध संस्थांद्वारे आजकाल पुरस्कार देण्याचे पेवच फुटले आहे. बरेच पुरस्कार हे प्रायोजीत स्वरूपाचे असतात. काही पुरस्कार माध्यमांनी सुरू केले असून त्यांद्वारे घावून सामाजिक प्रतिष्ठा पैसे घेवून विकली जाते. आणि अशा पुरस्कारांनी आपल्याला प्रतिष्ठा मिळते असाही काही लोकांचा समज आहे. या सगळ्या समजूतींना चारठाणकर पुरस्कार पूर्णपणे छेद देतो.

प्रत्येक गोष्टींचे व्यवसायीकरण करून काही एक मिळवता येते असा समज पसरला आहे. त्यामुळे आपणच पुरस्कार सन्मान यांची अवहेलना करतो आहोत हे लक्षातच येत नाही.

गावोगाव कित्येक वर्षांपासून जत्रा उत्सव उरूस भंडारे लोकांच्या उस्त्फुर्त योगदानातून अखंडपणे साजरे होत आले आहेत. यातून आपली सामाजिक सांस्कृतिक जाण आपण दाखवून देत असतो. आधुनिक काळात हाच जनसहभाग विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमधून आवश्यक आहे. पण तेच आपण विसरून चाललो आहोत. सगळे काही सरकारनेच करावे या भूमिकेतून किमान क्षमता असलेला सामान्य माणूस हातावर हात धरून बसून राहतो.

चारठाणकर पुरस्काराने याच सामान्य माणसाच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवले गेले आहे. सर्वसामान्य माणसे उत्स्फुर्तपणे एकत्र येवून काही करू शकतात हे परत एकदा समोर येण्याची गरज आहे. सेलू हे त्यासाठी इतरांना आदर्श ठरावे असे गाव आहे. अजूनही या गावात सामाजिक पुरूषार्थाची जपणून केली जाते. हरिभाऊ चारठाणकरांच्या नावाने भरणारा संगीत महोत्सव असो की विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता नोंद सोहळा असो कुठलेही झगमगीतपण टाळून साधेपणाने हे उपक्रम लोकसहभाग आणि लोगवर्गणीतून साजरे होतात हे अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रत्येक गोष्ट सरकारी अनुदान, मोठे प्रायोजक, आमदार खासदारांचा निधी, कर्मचार्‍यांकडून सक्तिच्या कपातीतून साजरे होणारे उत्सव हे सगळं टाळून साधेपणाने स्वेच्छेने काटकसरीने सांस्कृतिक सामाजिक उपक्रम संपन्न होवू शकतात हे आदर्श समोर येण्याची नितांत गरज आहे.

एकेकाळी चांगली सभागृह, उत्तम ध्वनीव्यवस्था, चांगली प्रकाशव्यवस्था यांचा अभाव असतानाही कला जपल्या जायची. सामाजिक कामं देवा धर्माच्या नावावर का होईना केल्या जायची. आता स्वातंत्र्यानंतर अनुकुलता येत गेली तस तशी सर्वच सामाजिक सांस्कृतिक कामाचं एनजीओ करण होत गेलं. सर्वच कार्यकर्ते उत्स्फुर्तपणा विसरून अनुदान निधी सरकारी देणग्या परदेशी देणग्या याकडे आशाळभूतपणे पाहत बसून राहिले. परिणामी या कामांमधून सळसळता उत्साह निघून गेला आणि एक औपचारिकता यायला लागली. दहा वर्षांपूर्वी ठाण्याच्या साहित्य संमेलनाचा लेखाजोखा त्या आयोजक संस्थेने लोकांसमोर मांडला होता. एक कोटी दहा लाखांपैकी केवळ साडेचार लाखाचा निधी लेखकांच्या मनधनावर आणि पाचलाखाचा निधी स्मृतीचिन्हे वगैरेवर खर्च झाला होता. बाकी सर्व निधी इतर अनावश्यक बाबींवर खर्च झाला होता. 

आजकाल अगदी छोट्यातला छोटा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर प्रत्यक्ष कलाकार, वक्ते, पुरस्कारार्थी यांच्यावर खर्च झालेल्या रकमेच्या दसपट रक्कम इतर अनावश्यक बाबींवर खर्च झालेली आढळून येते.

संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव असो स्वातंत्र्य सैनिक विनायकराव चारठाणकर सामाजिक पुरस्कार सोहळा असो यांच्या निमित्ताने सेलूकरांनी एक आदर्श घालून दिला आहे. तो समोर ठेवून इतर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी काही एक पायंडे नव्याने घालून दिले पाहिजेत. तरच समाजाला आवश्यक असणार्‍या सामाजिक सांस्कृतिक चळवळींना खर्‍या अर्थाने चालना मिळेल. या चळवळी सरकारी कारभारासारख्या अनुदानाच्या लाचारीत अडकून पडणं चांगलं नव्हे. साधेपणाने पण सातत्याने आणि मुख्य उद्देश न गामावता या चळवळी चालल्या पाहिजेत.

   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

No comments:

Post a Comment