Sunday, September 29, 2019

कुमार केतकर- राजदीप सरदेसाईंचे सर्वपित्री अमावस्येचे बुद्धिभ्रम..


29 सप्टेंबर 2019

काल सर्वपित्री अमावस्या होती. एक तर अमावस्या आणि तीही परत सर्वपित्री शनिवारीच येणे हा योग अतिशय दुर्मिळ. नेमका हाच दिवस ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू यांच्या स्मृती व्याख्यानमालेसाठी निवडला गेला होता. त्या निमित्त राजदीप सरदेसाई यांचे ‘आजची माध्यमे आणि राजकारण’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे होते. सर्वपित्री अमावस्येचा मुहूर्त खरं म्हणजे कुठल्याही पुरोगाम्यासाठी चांगलाच कारण ते असल्या अंधश्रद्धा मानत नाहीत. त्यामुळे ‘मुहूर्त’ वगैरे काही मानण्याचाही प्रश्‍नच नाही. पण या अमावस्येच्या प्रभावामुळेच असेल कदाचित केतकर सरदेसाई यांच्या भाषणांतून बुद्धीभ्रम प्रकट झाले.

अपेक्षा अशी होती की या निमित्ताने काही एक विचारमंथन झाले पाहिजे. आणि तेही दोन्ही पाहूणे ‘पद्मश्री’ पत्रकार असल्याने तटस्थपणे झाले पाहिजे. स्वत: राजदीप सरदेसाई यांनीच तशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली. पण प्रत्यक्षात राजदीप यांनी बोलताना मात्र हे पथ्य पाळले नाही. केवळ भाजप मोदी यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमार केतकर होते. ते तर काय ‘छोटे मियां तो छोटे मियां, बडे मियां सुभानल्ला !’ त्यांनीही उरली सुरली कसर आपल्या भाषणात भरून काढली. पुढे घडलेल्या प्रश्‍नोत्तराच्या कार्यक्रमातही स्वत:ची जात सांगून केतकरांनी सर्व कार्यक्रमावर कळस चढवला.

राजदीप सरदेसाई यांनी माध्यमांनी कसं तटस्थ असलं पाहिजे हे सांगितलं. मनमोहन सिंग यांनी 38 वेळा कशा पत्रकार परिषदा घेतल्या हे सांगत मोदी कसे घेत नाहीत किंवा कुणाची त्यांना प्रश्‍न विचारायची कशी हिंमत नाही हे सांगितलं. आता हा बुद्धीभ्रम जाणीवपूर्वक का पसरवला जातोय? मोदींनी पत्रकार परिषदा बंद केल्या त्याला काय कारण होते? गुजरात प्रकरणावर वारंवार मोदींना त्याच त्याच प्रश्‍नावर छेडल्या जात होतं. सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यावरही मोंदींना दोषी समजून पत्रकार प्रश्‍न विचारत होते. तेंव्हापासून मोदींनी अधिकृत म्हणता येईल अशी पत्रकार परिषद घेतली नाही. आता दुसरी बाजू म्हणजे मोदी विविध प्रश्‍नांना सामोरे गेले नाहीत का? तर मोदींनी ‘मन की बात’ हा थेट सामान्य माणसाशी संवाद साधणारा उपक्रम आकाशवाणी वर सुरू केला. हे काय आहे? हे आपण जनतेचे उत्तरदायीत्व मानतो असेच आहे ना? का फक्त पत्रकारांच्या माध्यमांतूनच काहीतरी सांगितले तरच लोकांना कळते?

केवळ पत्रकार परिषद घेतली नाही हा दोष कसा? मोदींनी दीर्घ पल्ल्याच्या मुलाखती विविध पत्रकारांना दिल्या आहेत. देशीच नव्हे तर परदेशी पत्रकारांनाही मोदींनी मुलाखती दिल्या आहेत. मग हे सगळं बाजूला ठेवून केवळ पत्रकार परिषदेत विविध पत्रकार प्रश्‍न विचारत आहेत आणि मोदी उत्तर देत आहेत हे घडलं नाही म्हणून किती वेळ टीका करणार? भाजपे प्रवक्ते सर्वच माध्यमांतून आपल्या पक्षाची भूमिका सविस्तर मांडत असतात. उलट सगळ्यात जास्त बोलघेवडे भाजपचेच प्रवक्ते आहेत अशीही टीका केली जाते. मग परत मोदी पत्रकार परिषद का नाही घेत हा आरोप का?

आणि या टीकेचा सामान्य माणसाशी काय संबंध? पत्रकारांना शासकीय खर्चाने सोबत परदेशी नेणं मोदींनी बंद केलं. याबद्दल सामान्य माणसांना कशाला खंत वाटेल? उलट सामन्य करदात्यांचा पैसा वाचला अशीच भावना सामान्य माणसाची होणार ना?

दुसरा एक मुद्दा सोशल मिडीयाचा. यावर राजदीप यांनी प्रचंड टीका केली. ती टीका योग्यच होती. पण एक सामान्य माणूस जेंव्हा त्यांना किंवा कुणाही ज्येष्ठ पत्रकारांना हे विचारू लागला की काही एक गोष्टी तूम्ही आम्हाला दाखवतच नव्हते, काही पैलू आमच्या समोर आणलेच जात नव्हते, काही विचार कायमस्वरूपी दाबले जात होते ते जर या नव्या माध्यमांतून आमच्या समोर येत असतील तर काय वाईट आहे? याचे काय उत्तर सरदेसाई देणार आहेत? यात मोदी भाजप संघ असा कुठलाच विषय आणायची गरज नाही. दिग्विजय सिंह यांचे तरूण मैत्रिणी बरोबरचे फोटो सोशल मिडीयावर आले तेंव्हा कुठे याचा बभ्रा झाला. आणि ते शेवटी आपले संबंध मान्य करत दिग्विजय सिंह यांना त्या तरूणीशी विवाह करावा लागला.

प्रस्थापित माध्यमांनी हे कधीच केले नसते. हे केवळ उदाहरण म्हणून सांगितले. हे काही फार महत्त्वाचे नाही पण सामाजिक दृष्ट्या खुप महत्त्वाचे विषय आजही प्रस्थापित माध्यमे दाखवत नाहीत. तेंव्हा सोशल मिडीयाच त्याला तोंड फोडतो. हे एक पत्रकार म्हणून राजदीप यांनी लक्षात घ्यावे. ‘व्हाटसअप युनिव्हर्सिटी’ म्हणून हिणवणं सोपे आहे. त्यात सत्यांश आहेच. पण मुख्य माध्यमे वारंवार काही बातम्या दाबून टाकतात त्याचे काय? सोशल मिडियाचा एक दबाव मुख्य माध्यमांवर आता येत चालला आहे हे राजदीप यांनी लक्षात घ्यावे. केवळ टीका करून बुद्धिभ्रम पसरवू नये (हा लेखही सोशल मिडीयावरूनच तूम्ही वाचत अहात).

कश्मिरबाबत एक मुद्दा राजदीप यांनी असाच तथ्य तोडून मोडून मांडला.कश्मिरात केवळ 7 हजार मोबाईल आता चालू झाले आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. आणि हे फोनही पत्रकारांचे नसून सरकारी अधिकार्‍यांचे किंवा सरकारच्या जवळच्या लोकांचे आहेत असे राजदीप म्हणाले. पत्रकारांचे मोबाईल बंद आहेत कारण पत्रकार बातम्या बाहेर पाठवतील. आणि सरकारला ती भिती आहे. आता राजदीप यांना कुणीतरी हे विचारायला पाहिजे की जो खरा पत्रकार आहे तो इतर कुणाच्या चालू फोनवरून बातमी पाठवू शकतो की नाही? त्याला कुणी रोकले आहे? आणि ठरवून ठरवून काही मोबाईल बंद आणि काही चालू असे करता येते का?

मोबाईल बंद आहेत पण मोबाईलचे कॅमेरे चालू आहेत ना. कुठल्याही ठिकाणच्या हिंसाचाराचे अन्यायाचे चित्रण करता येणे सहज शक्य आहे. ते करून कुठल्याही माध्यमांतून बाहेर पाठवता येते. मग असं असताना बंदीबाबत राजदीप का बुद्धिभ्रम पसरवत आहेत?

राजदीप यांनी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रम भाजपवाल्यांनी कसा घेतला हे सांगत असताना कॉंग्रेसवाले तोही घेत नाहीत असे सांगितले. खालून एकाना ‘ईद मिलाप’ घेतात असं सांगताच मग राजदीप यांनी ‘हो मी ईद मिलाप बाबतपण बोलतो आहे’ अशी दुरूस्ती केली. ‘कश्मिरला स्वातंत्र्य पाहिजे’ या मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीची बाजू तूम्ही कशी लावून धरता? या प्रश्‍नावर त्यांना पळवाट शोधावी लागली. देश कसा सगळ्यांचाच आहे. सगळ्यांनाच कसे विचाराचे स्वातंत्र्य आहे. केवळ राष्ट्रगीतासाठी उभं राहणं म्हणजे कशी देशभक्ती नाही. वगैरे वगैरे ते सांगत राहिले. केवळ राष्ट्रगीत गाणं म्हणजे देशभक्ती नाही हे एकवेळ मान्य पण जाणीवपूर्वक राष्ट्रगीताचा अपमान करणं किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान करणं किंवा भारतात राहून कश्मिरच्या स्वातंत्र्याची मागणी करणं हा कोणता राष्ट्रवाद आहे हे राजदीप यांनी सांगितले नाही. 

सत्तेच्या विरोधात पत्रकारांनी बोलले पाहिजे हे राजदीप यांनी ठासून सांगितले. पण हे झालं अर्धसत्य.  ते स्वत: २०१४ पूर्वी कधी सत्तेच्या विरोधात बोलले होते? हे नाही स्पष्ट केलं. दाभोळकर, कलबुर्गी, अखलाख, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या त्या राज्यांमध्ये कोण सत्तेवर होतं? रोहित वेमुलाच्या आत्महत्येला हत्या म्हणून संबोधताना हैदराबाद ला कोण मुख्यमंत्री होतं? याचं उत्तर राजदीप कधी देणार?

राजदीप यांच्यावर कडी करणारे भाषण कुमार केतकरांनी केले. त्यांना तर आपल्या भाषणात नथुराम गोडसेंचे नाव आणल्या शिवााय करमत नसावे. काहीच कारण नसताना केतकरांनी गोडसेला आपल्या भाषणांत ओढला. गोडसे भक्त म्हणजे मोदी भक्त, कारण दोन्हीही एकच आहेत. असाही शोध केतकरांनी लावला. परत पुढे  गांधींचे गुरू गोखले हे कसे पगडीधारी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण, गांधींचा खुन करणारा गोडसे हाही कसा चि.को.ब्रा. आणि आपणही कसे सदाशिवपेठेत जन्मलेले चि.को.ब्रा. आहोत हे सांगितले.  गोडसे हा विषय काढला नाही तर केतकरांची खासदारकी जाणार होती का? नोटेवरून गांधींऐवजी गोडसेचे फोटो छापले जातील असा एक तर्क केतकरांनी मांडला.

2014 ला पहिल्यांदा मोदी भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2019 मध्ये परत अजून जास्त खासदार व मते मिळवून पंतप्रधान झाले. आजतागायत कुठल्याही नोटेवरून गांधींचा फोटो हटवला गेला नाही. मग नोटेवर गोडसेचे छायाचित्र येईल असला तर्क ते काय म्हणून मांडत आहेत? आजतागायत भाजप संघ किंवा मोदी यांच्या कुठल्या भाषणांत मांडणीत नथुरामाचे पुतळे उभारणार असल्याचे कुणी घोषित केले आहे का? नथुराम जयंती सरकारी पातळीवर साजरी करण्याचा काही अध्यादेश निघाला आहे का? मग काय म्हणून केतकर असले आरोप करत आहेत?

उलट 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीला स्वच्छता अभियान मोदींनी सुरू केलं आणि येत्या 2 ऑक्टोबरला सिंगल युज  प्लास्टिकमुक्ती अभियान सुरू होते आहे. 2014 पासून गांधींशी संबंधीत स्मारकांच्या निधीत काही कपात झाली आहे का?    गांधी जयंती पुण्यतिथीच्या सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे का? मग केतकर कशाच्या आधारावर हे आरोप करत आहेत? राजदीपही आपल्या भाषणात काटकुळ्या गांधींचीच छाती कशी 56 इंचांची होती हे बोलून गेले. पण मोदींनी गांधींचे मोठेपण नाकारले असं 2014 पासून किंवा त्याच्याही आधी गुजरातचे ते मुख्यमंत्री असल्यापासून कुठे घडलंय?

मोदींना राष्ट्रपिता हे संबोधन ट्रंम्प यांनी वापरले. त्यासाठी मोदी कसे काय जबाबदार? आणि मोदी किंवा भाजप संघ यांनी अधिकृतरित्या मोदी राष्ट्रपिता आहेत अशी काही मांडणी केली आहे का?

देशाची परिस्थिती वाईट असाताना लोक परत मोदींना भाजपलाच का निवडून देतात? हा प्रश्‍न केतकरांना विचारला गेला. यावर केतकरांनी जो काही बौद्धिक पट्टा सोडला तो तर त्यांच्या अफाट प्रतिभेचा आणि मोदी भाजप संघ द्वेषाचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल.

केतकरांनी मुळात बहुसंख्य लोकांनी मोदींना मतदान केले हे मान्यच केले नाही. त्यांनी लोहियांच्या जुन्या मांडणीचा हवाला देत, ‘भाजपला केवळ 37 टक्के मते मिळाली आहेत. तेंव्हा 63 टक्के लोक मोदींच्या विरोधातच आहेत.’ अशा पद्धतीनं मांडणी केली. केतकरांचा बौद्धिक कावा असा की ते केवळ भाजपला मिळालेली मते मांडताना निवडणुक पूर्व युती करून भाजपसोबत इतर सहयोगी पक्षांना मिळालेली मते वगळतात. ही संख्या 8 टक्के इतकी आहे. म्हणजे आज घडीला सत्ताधारी आघाडीला 45 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. मग पुढचा प्रश्‍न असा येतोे की आजपर्यंत कुठल्याही सत्ताधारी पक्षाला किती मते मिळत होती? अगदी नेहरू इंदिरा गांधींच्या काळातही सत्ताधारी कधीच 45 टक्क्यांच्या पुढे गेले नाहीत. हे ही परत केतकरांनीच सांगितले. (अपवाद राजीव गांधींना 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत 49 टक्के मते मिळाली होती.) मग आत्तापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांच्या विरोधातच मतदारांनी कौल दिला होता असे मानायचे का?

अजून जे बौद्धिक तारे केतकरांनी तोडले ते तर अवाक करणारे होते. केतकर म्हणतात केवळ 37 टक्के इतकीच मते मिळवूनही मोदी 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करतो असा दावा कसा काय करतात?

भारतीय लोकशाहीची अगदी प्राथमिक माहिती असणारा कुणीही शाळकरी पोरगाही हे सांगू शकेल की निवडणुक झाल्यानंतर जो कुणी प्रतिनिधी निवडून आलेला असतो तो त्या मतदारसंघांतील सर्वांचेच प्रतिनिधीत्व करत असतो. आणि या प्रतिनिधींतून जे मंत्रीमंडळ तयार होते ते सर्वच भारताचे प्रतिनिधीत्व करत असते. केवळ आपल्याला मतदान केले इतक्याच लोकांचा मी प्रतिनिधी अशी भूमिका कुणालाच अधिकृतरित्या घेता येत नाही.

हे केतकरांना माहित नाही का? पण केवळ बुद्धिभ्रम करणारी मांडणी करायची इतकाच एककल्ली कार्यक्रम केतकरांचा दिसतो आहे. त्यांची ओळख करून देताना किंवा उल्लेख करून देताना कुणीही कॉंग्रेसचे खासदार असे म्हटले नाही. कारण ते तसं गैरसोयीचे ठरते. स्वत: केतकरही मी कॉंग्रेसचा खासदार म्हणून बोलत नाही अशीही सारवा सारव करत राहिले.  कारण एका प्रश्‍नात नथुराम गोडसेचे योगदान काय? असे जर तूम्ही म्हणता तर सोनिया गांधींचे तरी भारतासाठी योगदान काय? असे विचारले गेले. केतकरांनी सोनिया गांधींचे भारतासाठीचे योगदान सांगण्यां ऐवजी प्रश्‍नाला बगल देणेच पसंद केले.

पाकिस्तानवर अणूबॉंब टाकला पाहिजे या सुब्रमण्यम स्वामींच्या कुठल्याशा विधानाचा अर्धवट आधार घेत केतकरांनी भाजपवर तुफान फटकेबाजी केली. वस्तुत: 2014 ला सत्तेत आल्यापासुन मोदी, संबंधीत खात्याचे मंत्री किंवा कुठलाही जबाबदार सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी कुणीही पाकिस्तानवर अणुबॉंब टाकण्याबाबत चुकूनही काही बोललेलं नाही. या सरकारने अतिशय सुनियोजित पद्धतीनं कश्मिर व पाकिस्तान हे विषय हाताळले आहेत. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडलं आहे. 370 हटवून कश्मिर प्रश्‍नावर अतिशय मोठं पाऊल उचलत धोरणात्मक विजय मिळवला आहे. लवकरच पाकव्याप्त कश्मिरबाबतही भारताच्या बाजूने सकरात्मक निर्णय लागण्याची शक्यता आहे.

असं असताना केतकर कशाच्या आधारावर अणूबॉंबच्या विषयावर मोदींना झोडपत आहेत?

इ.व्हि.एम. बाबत तर आता काय आणि कसं बोलावं हेच विरोधकांना उमगत नाहीये हेच केतकरांनी दाखवून दिलं. कुठल्या तरी तथाकथित अमेरिकन हॅकरने इ.व्हि.एम. कसे हॅक होते हे सप्रमाण दाखवून दिल्याचे केतकर छातीठोकपणे कपिल सिब्बल यांचा हवाला देत भाषणात बोलले. खरं तर याच सिब्बल यांना सर्वोच्च न्यायालयाने जे काही फटकारले ते उभ्या देशाला माहित आहे. आजही केतकरांना घटनेच्या चौकटीत बसणारे सर्व मार्ग आक्षेप घेण्यासाठी खुले आहेत. इतकं असतानाही परत केतकर यावर टीका करतात. हा जाणीवपूर्वक बुद्धिभ्रम पसरविण्याचाच कार्यक्रम नव्हे काय?

कुमार केतकर आणि राजदीप सरदेसाई इतर पत्रकारांना अमित शहा भाजपच्या दावणीला बांधलेलं म्हणत असताना  हे कोणाच्या दावणीला बांधलेले आहेत हे पण यांनी प्रमाणिकपणे सांगावे. केतकरांनी तर कॉंग्रेसच्या नावाने उघड उघड कुंकू लावून घेतलेलेच आहे. राजदीप यांनी पण जाहिर करावे की ते कुठल्या गोठ्यात कुणाच्या दावणीला आहेत.     

        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. केतकर काँग्रेसचे खासदार, सरदेसाईंना काँग्रेसने पदमश्री दिली आहे ... तर हे दोघेही काँग्रेसला पूर्ण अनुकूल आणि भाजपच्या पूर्ण बाजूने लढणार, बोलणारच ना .. दोघेही पूर्वीपासून भाजप आणि संघ आणि मोदीचे कट्टर, एकदम कट्टर विरोधक आहेत ना...

    ReplyDelete
  3. ज्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे असे पूर्णपणे एकांगी असलेले हे पत्रकार आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत विरोधाभास असतो जो त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ती त्यांची अपरिहार्यता असते. उदा. मोदींना पत्रकारांनी प्रश्न विचारणे हा त्यांना त्यांचा ‘हक्क’ वाटतो पण वाचकांनी पत्रकारांना सोशल मेडीयावरून प्रश्न विचारले तर तो ‘अधिक्षेप’ आणि ‘थिल्लरपणा’ वाटतो ! हा दुतोंडीपणा जनतेच्या आणि केवळ व्यावसायीक दृष्टीकोनातून चालणाऱ्या मेडीया हाऊसच्याही लक्षात आला आहे. त्यामुळे, या दुतोंडी पत्रकारांना आता थारा उरलेला नाही. (वि.सु. - केतकर ह्या ‘महान’ व्यक्तीबद्दल काहीही लिहीण्यात अर्थ नाही ह्या निष्कर्षाला मी फार पूर्वीच आलोय)

    ReplyDelete