Monday, September 23, 2019

रसिकांनी यशस्वी केलेला बी. रघुनाथ महोत्सव !



‘आज कुणाला गावे’ अशी सार्वकालीक कविता लिहून अजरामर झालेले बी. रघुनाथ हे महत्त्वाचे मराठी लेखक. बी. रघुनाथ यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक कोटी रूपये खर्च करून शासनाने मोठे स्मारक परभणी येथे उभे केले आहे. बी. रघुनाथ यांच्या सुवर्ण स्मृती वर्षांत (7 सप्टेंबर 2002). या स्मारकाचे उद्घाटन कवी ग्रेस यांच्या हस्ते झाले.

अपेक्षा अशी होती की बी. रघुनाथ यांच्या स्मृतीत दरवर्षी या दिवशी (7 सप्टेंबर) काही एक समारंभ साजरा होईल. पण तशा काहीच हालचाली शासकीय पातळीवर 2003 मध्ये दिसून येईनात. 7 सप्टेंबर जवळ येत चालला आणि नगर पालिका काहीच करायला तयार नाही. तेंव्हा परभणी शहरातील साहित्यिक संस्था, ग्रंथालय, प्रकाशक, लेखक, रसिक यांनी पुढाकार घेवून स्मारकाची जागा उपलब्ध करून द्या बाकी कार्यक्रम आम्ही आमचे घेतो असा प्रस्ताव नगर पालिकेकडे मांडला. चार दिवसांच्या उत्सवाला परवानगी प्राप्त करून घेण्यात यश आले. आणि हा उत्सव बी. रघुनाथ स्मारक परिसरात 2003 मध्ये इतर संस्थांच्या वतीने संपन्न झाला.

परत पुढच्या वर्षी तोच सगळा नन्नाचा पाढा. तीच लालफितशाही. राजकीय नेत्यांची अनास्था. या सार्‍याला कंटाळून महोत्सव इतरत्रच घ्याचा असे आयोजकांना वाटू लागले. त्यावेळी गणेश वाचनालय या शंभरवर्षे जून्या संस्थेने आपणहून आपल्या परिसरात महोत्सव घेण्याचा प्रस्ताव ठेवला. शिवाय सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. (आणि आजतागायत ते मनोभावे पाळलेही.)

2004 पासून गणेश वाचनालय, शनिवार बाजार, परभणी हा महोत्सवाचा आता कायमचा पत्ता बनला आहे. या ठिकाणी महोत्सव घेण्याचे एक औचित्यही आहे. 7 सप्टेंबर 1953 ला बी. रघुनाथ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले ते याच परिसरात. सध्याच्या गणेश वाचनालयाच्या मागे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जूने विश्रामगृह आहे. याच परिसरात त्या काळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय होते. याच कार्यालयात बी. रघुनाथ काम करत असत.  तेंव्हा त्यांच्या स्मृती याच परिसरात जागविण्यालाही एक वेगळे महत्त्व आहे.

2004 पासून ते 2019 पर्यंत 16 महोत्सव याच ठिकाणी रसिकांच्या सहकार्याने साजरे झाले. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही अतिरिक्त झगमगाट केला जात नाही. कुठलेही प्रायोजकत्व राजकीय अथवा खासगी या महोत्सवाला नाही. अतिशय साधेपणाने महोत्सव भरवला जातो. बी. रघुनाथ गणपती उत्सवात मेळ्यांसाठी गीते लिहून द्यायचे. त्या गीतांना अण्णासाहेब गुंजकर चाली द्यायचे. असा उल्लेख अनंत भालेराव यांच्या मांदियाळी पुस्तकात परभणी वरच्या लेखांत आलेला आहे. याचे स्मरण ठेवून एक सांगितिक कार्यक्रम ठेवला जातो. चार किंवा पाच कविंचे एक कविसंमेलन आयोजीत केले जाते. एरव्ही कवी संमेलनांत कविंची भरमसाठ संख्या असल्याने एका कविच्या जास्त कविता ऐकायला मिळत नाहीत. पण बी. रघुनाथ महोत्सवात मात्र कविला भरपूर कविता सादर करता येतात आणि जाणकार रसिकांकडून त्यांचा आस्वादही चांगल्या पद्धतीने घेतला जातो.

‘एक पुस्तक एक दिवस’ हा उपक्रम गेली 20 वर्षे हे वाचनालय चालवित आहे. बी. रघुनाथ महोत्सवातही एका पुस्तकावर कार्यक्रम आयोजीत केला जातो. वेगळ्या विषयावरची व्याख्यानं हे पण महोत्सवाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.  तसेच गेली 5 वर्षे दृकश्राव्य व्याख्यानांचाही समावेश बी. रघुनाथ महोत्सवात केला गेला आहे.

महाराष्ट्रभर वाङमयीन मुल्यांची खर्‍या अर्थाने जोपासना करणारे असे महोत्सव साजरे होण्याची नितांत गरज आहे. सर्वच महोत्सवांचा इव्हेंट करून त्याचे ‘डिजीटल’ अवतार सर्वत्र आपल्याला पहायला मिळतात. त्यातून साहित्य संगीत कलांसाठी फार काही भरीव घडेल अशी शक्यता नाही. या उलट बी. रघुनाथ महोत्सवाचे प्रारूप जर सर्व़त्र स्विकारल्या गेले तर जास्त सकारात्मक काही घडेल.

15-18 सप्टेंबर 2019 या कालावधीत हा महोत्सव या वर्षी यशस्वीरित्या पार पडला. सर्व आमंत्रित पाहुण्यांचे मन:पूर्वक आभार. हा महोत्सव आपल्याच घरचे कार्य आहे असं समजून त्यात सहभाग नोंदवला त्या सर्व रसिकांचे आभार.  गणेश वाचनालय ही तर माझीच संस्था. पण तेथील सर्व कर्मचारी, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सर्व या वार्षिक उत्सवात आनंदाने योगदान देतात. त्यांचे आभार मानणं कुटूंबाचाच भाग असल्याने अवघड आहे.

महोत्सवाचे आयोजनाबाबत काही सुचना असतील तर जरूर कळवा. नविन लेखक, नविन वाङ्मयीन उपक्रम यांची माहिती कळवा. गणेश वाचनालयाच्या एकुणच वार्षिक नियोजनाबाबत काही सुचना असतील तर जरूर कळवा. ही संस्था सार्वजनिक संस्था असल्याने सर्वांसाठी खुली आहे. सर्वांच्या मतांचा सुचनांचा इथे आदर केला जाईल.

संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथालयांना केंद्रभागी ठेवून साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांची आखणी करता येवू शकते. त्या द्वारे एक अतिशय चांगले सांस्कृतिक वातावरण तयार होवू शकते, वाचन संस्कृतीला चालना मिळू शकते.

(वरील रेखाटन सुप्रसिद्ध लेखक चित्रकार ल.म.कडु यांनी काढलेले आहे. 2015 मध्ये त्यांना बी. रघुनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे चित्र काढून भेट दिले होते.) 
 

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575 ˆˆ   

3 comments:

  1. खुप महत्वपूर्ण कार्य

    ReplyDelete
  2. उत्तम उपक्रम.
    बी. रघुनाथ यांचे साहित्य प्रताधिकारमुक्त झाले आहे का? तसे असल्यास ते एखाद्या वेबसाईट (उदा archive.org किंवा gutenberg.com ) मार्फत किंवा इ पुस्तक स्वरूपात लोकांना उपलब्ध करून देता येईल का? त्या निमित्ताने त्यांचं लिखाण मराठी वाचकांपर्यंत(महाराष्ट्रातील एवढंच नव्हे तर जगभरातील) पोहोचण्यास मदत होईल.

    ReplyDelete
  3. हे साहित्य २०१३ सालीच मुक्त झाले आहे...

    ReplyDelete