Wednesday, October 17, 2018

युवा प्रतिभेचा उत्कट आविष्कार : प्रतिभा संगम


(संमेलनाचे उद्घाटन करताना कवयित्री सिसिलिया कार्वलो )
सा.विवेक, ऑक्टोबर 2018

गेली दोन दशके प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांसाठीचे असलेले साहित्य संमेलन महाराष्ट्रात विविध गावांमध्ये संपन्न होते आहे. 17 वे प्रतिभासंगम नुकतेच लातुर मध्ये (29-30 सप्टेंबर) संपन्न झाले.

या संमेलनात सादर झालेल्या काही कवितांत प्रगल्भ सामाजिक जाणीव दिसून आली. शामल दिपा शंकर ही जळगांवची मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थीनी. आपल्या ‘स्वप्नातही आजकाल’ या कवितेत असं लिहीते

स्वप्नातीही आजकाल
दगड उचलले जातात 
तेही रंगांवर
क्षितीजावरचा ‘निळा’ यांना दिसत नाही
मावळतीचा ‘भगवा’ ते पहात नाही
माळरानातला ‘हिरवा’ त्यांना नकोसा वाटतो
आणि आता तर ‘पांढर्‍या’ रंगावरही आक्षेप
असे दगड खावे लागतील म्हणून
कदाचित सगळीकडे
हवा आणि पाणी 
रंगहीन आहेत

इतकी प्रगल्भता या अगदी 18-19 वर्षाच्या मुलीकडे येते हे फार आाशादायी चित्र आहे. याच कवितेला या वर्षी पहिला क्रमांक प्राप्त झाला. कविता आणि गाणं यातील फरक सांगणारी एक गोड कविता गिरीश पाटील या जळगांवच्याच तरूणाने सादर केली. 

कर्म म्हणून यमक जुळवलं तर गाणं
मर्म म्हणून यमक जुळवलं तर कविता
काहीतरी सुचलं म्हणून लिहीलं तर गाणं
काहीतरी साचलं म्हणून लिहीलं तर कविता

अशी गोड मांडणी करत हा तरूण शेवटी लिहीतो

तळहातांवर घे सप्तरंग
डोळे मिटून उधळून टाक दाही दिशांत
डोळे उघडून न्याहाळ
तळहातांच्या रेषांवर 
उरलेल्या रंगांची नक्षी म्हणजे गाणं
दाही दिशांत 
उधळलेल्या रंगांचे पक्षी म्हणजे कविता

अतिशय तरल अशी भावना हा तरूण व्यक्त करतो. या कवितेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.

तरूणांनी सामाजिक आशयाची किंवा निसर्गाच्याच कविता सादर केल्याअसे नाही. निखळ विशुद्ध अशी प्रेमाची भावना उत्कटतेने तरूणांच्या कवितेत येणारच. नितीन लोहार या तरूणाला आपली प्रेम भावना व्यक्त करताना असाच शब्दांचा आधार घ्यावा वाटला. तो उत्कटपणे लिहीतो

अशा पडत्या पाण्यात 
धीर जातोय जरासा
तूझ्या भिजल्या केसाला 
गंध मातीचा जरासा
तू गवताची पात
तूझ्या ओठात कात
तूझ्या डोळ्यात जागते
एक उबदार रात
तू पावसाची सर
काळजाच्या देशात
अन् मी उगतो मातीत
हिरव्या वेशात
तू गुलाबाची कळी
पावसात चिंब
तुझ्या मोकळ्या केसात 
मी ओघळता थेंब

ही निखळ प्रेमभावना व्यक्त करणारी कविता तिसर्‍या क्रमांकाला पात्र ठरली.

उत्तेजनार्थ बक्षिस मिळवणार्‍या गणेश गायकवाड या तरूणाने स्त्रीचे सनातन दु:ख आपल्या कवितेत मांडले होते.

दिल्या घरी तू सुखी रहा
असा आईनं शब्द दिला म्हणून ती
गिळत राहिली आयुष्यभर
न पचणारा घास ही..
उसासारखं आयुष्य सोलून निघालं तरी
नाही सोडलं तीनं
साखरेसारखं गोडपण

कवितेचा शेवट करताना गणेश लिहीतो

पण आता तिला एल्गार  करावाच लागेल
करपून गेलेल्या वावरात
नव्यानं उगवावंच लागेल
मग ते बी आता आपण पेरूयात
त्याला खतपाणी घालूयात
आणि माणुस होवूयात..
 
या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे साहित्य प्रकारानुसार गटचर्चा घेतल्या जातात. कविता, कथा, वैचारिक लेख, अनुदिनी (ब्लॉग लेखन) यांच्या गटचर्चा यावेळी घेतल्या गेल्या. ज्या मुलांनी कविता लिहून आणल्या त्यांचे गट करून मान्यवर लेखकाला या कविता ऐकवल्या जातात. हे मान्यवर त्यांच्याशी त्या कवितांवर चर्चा करतात. त्यातील उणीवा बलस्थानं दाखवून देतात. या चर्चेतून ज्यांची कविता सादर करण्याजोगी आहे असे निवडक कवी आणि मान्यवर कवी असे एक अतिशय दर्जेदार कविसंमेलन सादर केलं जातं.

एकूण प्राप्त कवितांचा सगळा आढावा घेवून (सादरीकरणाचा विचार न करता) केवळ साहित्य गुणांवर कवितेसाठीचे क्रमांक काढले जातात. याच पद्धतीनं इतरही साहित्य प्रकारांबाबत केलं जातं. 

तरूणांच्या एकणुच सळसळत्या साहित्य उर्जेला इथे मोकळी वाट सापडते. आज विद्यापीठ पातळीवर युवक संमेलनं होत आहेत. त्यांच्यामधूनही अशीच उर्जे उसळत असलेली दिसते. 

एक विचार मोठ्या गांभिर्याने केला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या युवक महोत्सवात असे चांगले वाटणारे लेखक कवी निवडुन त्यांना एकत्र केलं गेलं पाहिजे. याची एक कार्यशाळा घेतली जावी. त्यासाठी मान्यवर साहित्यीक तेथे निमंत्रीत केले जावे. या मुलांमधील प्रतिभा हेरून चांगलं साहित्य वाचकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जावे. 

महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच, वाङ्मय मंडळं सक्रिय केली गेली पाहिजेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र  न करता ज्यांना किमान गोडी आहे असे विद्यार्थी निवडून त्यांचाच समावेश यात केला जावा. सरधोपट सर्वच्या सर्व विद्यार्थी निवडले की त्याचे व्यवस्थापन कठीण जातं. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना चांगली पुस्तकं वाचायला दिली गेली पाहिजेत. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर त्यांना छोट्याशा गटात बोलतं केलं पाहिजे. काही जणांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर सविस्तर लिहून आणावं. अशा लेखांचं सर्वांसमारे वाचन व्हावं. 

आज घडीला महाराष्ट्रात 10 विद्यापीठं आहेत. शिवाय चार कृषी विद्यापीठं आहेत. तंत्रज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय विद्यापीठ, विधी विद्यापीठ यांचाही यात समावेश केला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं या विद्यापीठांमधून चांगले लिहीणारे शोधून त्यांना एकत्र केलं गेलं पाहिजे. साधारणत: प्रत्येक विद्यापीठांतील दहा ते वीस विद्यार्थी निवडून अशा दोनशे तीनशे जणांचे जर काही एक संमेलन आपण घेणार असू तर तो खरा प्रतिभेचा शोध ठरेल. आणि त्यासाठी घेतलेले श्रम कारणी लागतील. 

प्रतिभा संगमच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने पुढाकार घेवून काही एक पायवाट तयार करून ठेवली आहे. आता या पायवाटेचा हमरस्ता बनविण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी परिषदेच्या खांद्यावर जास्तकाळ हे ओझं न ठेवता स्वतंत्रपणे युवा प्रतिभेचा शोधणे, तिचे संवर्धन होण्यासाठी कष्ट घेणे, या युवा प्रतिभेचा आविष्कार समाजासमोर घडवून आणणे यासाठी दीर्घकालीन धोरण आखावे लागेल. 

ज्ञानेश्वरांच्या सप्तशताब्दीचे औचित्य साधून तरूणांमधले ज्ञानेश्वर शोधण्याची सुरवात ‘प्रतिभा संगम’ ने अंमळनेर या साने गुरूजींच्या भूमीतून केली होती. आता याच वाटेवरचा पुढचा मुक्काम सर्व विद्यापीठांमधून युवा प्रतिभा शोधणे आणि तीचे संवर्धन करणे. 

प्रतिभा संगम मध्ये सादर झालेल्या व क्रमांक मिळविलेल्या कवितांचे एक चांगले पुस्तक तयार होवू शकते. त्यासाठी पण प्रयत्न झाले पाहिजेत.  

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment