Monday, April 25, 2016

न होता ‘शकिल’ तो गीतों के दिवाने कहा जाते !!







उरूस, दै. पुण्यनगरी, 25 एप्रिल 2016


अमर चित्रपटात एक सुंदर गाणं निम्मीच्या तोंडी आहे. 

मिलता गम, तो बरबादी के अफसाने कहा जाते
अगर दुनिया चमन होती, तो विराने कहा जाते

नौशादच्या संगीतातील या गाण्याला लताच्या स्वरांनी अमरामर करून ठेवलं आहे. हे गाणं लिहीणारा शायर होता शकिल बदायुनी. 20 एप्रिल हा शकिलचा स्मृती दिन. हे वर्ष म्हणजे शकिलचे जन्मशताब्दि वर्ष आहे. (जन्म 3 ऑगस्ट 1916, मृत्यू 20 एप्रिल 1970) शकिलने अनेक सुंदर अजरामर लोकप्रिय गाणी हिंदी चित्रपटांतून दिली. त्याच्याच वरच्या ओळींमध्ये जरासा फरक करून म्हणावेसे वाटते
न होता ‘शकिल’ तो गीतों के दिवाने कहा जाते

नौशादचे संगीत असलेला दर्द (1947) हा शकिलचा पहिलाच हिंदी सिनेमा. यातील उमादेवीच्या (टूनटून) आवाजातील ‘अफसाना लिख रही हू दिले बेकरार का’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. नौशाद बरोबर शकिलची जोडी इतकी जमली की अगदी दोन चित्रपटांचा अपवाद वगळता नौशादने शकिल शिवाय कुठलाच गीतकार कधी वापरला नाही. शकिलच्या 66 चित्रपटांपैकी 30 चित्रपट नौशाद बरोबर आहेत. यावरूनच त्याच्या कारकिर्दीतील नौशादचे महत्त्व लक्षात येते. दर्द (1947), मेला (1848), दिल्लगी (1949), बाबुल (1950), बैजू बावरा (1952), अमर (1954) उडन खटोला (1955), मदर इंडिया (1957), कोहिनूर (1960), मोगल-ए-आझम (1960), गंगा जमूना (1960) लीडर (1964)  असे ओळीनं यशस्वी चित्रपट नौशाद-शकिल जोडीचे येत राहिले.

सुरवातीच्या 14 वर्षांच्या काळात नौशाद सोबतच गुलाम मोहम्मद यांनीही शकिलची गाणी आपल्या चित्रपटांत वापरली. त्यांनाही बर्‍यापैकी लोकप्रियता लाभली. विशेषत: शेर (1949), लैला मजनू (1953) मिर्झा गालिब (1954). शकिल -गुलाम मोहम्मद जाडीचे 9 चित्रपट आहेत. 

या दोघांशिवाय ज्याच्या सोबत शकिलची जोडी हिट ठरली तो संगीतकार म्हणजे रवी.  घुंघट (1960), चौदहवी का चांद (1960), घराना (1960), दूर की आवाज (1964), दो बदन (1966) अश्या जवळपास 13 चित्रपटांतून या जोडीने मधूर गाणी दिली. 

नौशाद, गुलाम मोहम्मद आणि रवी या तीन संगीतकारांसोबत अतिशय लोकप्रिय मधूर गाणी देणार्‍या शकिलने अगदी थोड्या चित्रपटांतून इतर संगीतकारांसोबतही स्मरणीय गाणी दिली आहेत. वरील संगीतकारांशिवायच्या गाण्यांवर हा लेख रसिकांसाठी मुद्दाम देतो आहे.

अगदी सुरवातीच्या काळात 1950 मध्ये खेमचंद प्रकाश यांनी ‘जान पेहचान’ चित्रपटात शकिलची गाणी वापरली. राज कपुर आणि नर्गिस ही जोडी नुकतीच ‘बरसात’ मुळे हिट ठरली होती. हीच जोडी या चित्रपटात होती. अजून राज कपुरसाठी मुकेशचा आवाज आणि नर्गिस साठी लता असं काही समिकरण तयार झाले नव्हते. त्या वेळी तलत मेहमुद आणि गीता दत्त यांच्या आवाजात ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिये है’ हे गोड गाणे पडद्यावर आले. हे शकिलचे नौशाद शिवायचे पहिले गाजलेले गाणे. 

सरदार मलिक हा अतिशय कमी संगीत देणारा गुणी संगीतकार. 1954 मध्ये चोर बाजार चित्रपटात लताच्या आवाजात एक अतिशय मधुर गाणे आहे. शम्मी कपुर सुमित्रा देवी यांनी या चित्रपटात काम केले आहे. ‘हुयी ये हमसे नादानी, तेरी मेहफील मे आ बैठे, जमी की खांक होकर आसमान से दिल लगा बैठे’ असे शकिलचे शब्द आहेत. या काळात शैलेंद्र, साहिर, मजरूह, कैफी आजमी डाव्या विचारांना आपल्या गीतात प्रकट करत होते. प्रदीप राष्ट्रभक्ती मांडत होते.  तेंव्हा शकिल केवळ कलात्मक भावनेने गीत लिहीत होता. अगदी शेवटपर्यंत त्याच्या गाण्याचा बाज जीवनवादापेक्षा कलावादीच राहिला.

हेमंतकुमार सोबत शकिलची जोडी तीन चित्रपटांत चांगली जमली. बीस साल बाद (1962) मधील ‘निशाना चुक ना जाये, जरा नजरोंसे कह दो जी’ हे हेमंतकुमारने गायलेले गाणे बिनाका गीतमालात हिट ठरले. याच चित्रपटातील ‘कही दिप जले कही दिल’ या लताच्या गाण्यानेही प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजही लताचे हे गाणे रसिकांच्या ओठावर आहे. बिनाकातही हे गाणे त्यावर्षी होते. याच चित्रपटातील ‘बेकरार करके हमे यु न जाइये’ हे हेमंतकुमारचे गाणेही सुरेल होते. याच चित्रपटातील ‘सपने सुहाने लडकपन के’ या गाण्यातून लताच्या अल्लड गाण्यांची शंकर जयकिशन, एस.डी.बर्मनची परंपरा हेमंतकुमारनेही पुढे चालवली. शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी किंवा मजरूह लिहायचा त्याच ताकदीनं शकिलनंही हा भाव ओळखून शब्द या गीतात पेरले आहेत. 

याच वर्षी गुरूदत्तचा गाजलेला चित्रपट ‘साहिब बीबी और गुलाम’ आला. त्याला हेंमत कुमारचे संगीत होते आणि गीतकार अर्थातच शकिल. आशा भोसलेच्या आवाजातील ‘भवरा बडा नादान है’ हे गाणे तर बिनाका हिट गाण्यांच्या यादीत होतेच. या चित्रपटातील इतर गाणीही आज अभिजात म्हणून गणली जातात. गीताचे ‘ना जाओ सैंय्या’, ‘पिया एैसो जिया मे’ आणि दु:खाचे आर्त गाणे ‘कोई दूर से आवाज दे’ किंवा आशाचे ‘साकिया आज मुझे’ हे मुजर्‍याचे गाणे आजही लक्षात राहते. 

हेमंतकुमार सोबतचा शकिलचा तिसरा चित्रपट म्हणजे बीन बादल बरसात (1963). यातील बिनाकात हिट ठरलेले गाणे म्हणजे ‘जिंदगी कितनी खुबसुरत है, आइये आपकी जरूरत है.’ हेमंतकुमारच्या आवाजात हे गाणे आहे. लता आणि हेमंतकुमारच्या आवाजातील ‘एक बार जरा फिर कह दो, मुझे शरमा के तूम दिवाना’ या लडिवाळ गाण्याला चालीसोबत शब्दांमुळेही रंगत आली आहे. हे श्रेय अर्थातच शकिलचे. 

एस.डी.बर्मन यांच्याही दोन चित्रपटांत शकिलची गाणी आहेत. कैसे कहू (1964) मध्ये ‘मनमोहन मन मे हो तूम’ हे शास्त्रीय संगीताच्या बाजाचे गाणे रफी, एस.डी.बातीश आणि सुधा मल्होत्राच्या सुरांत आहे. पण यातील दुसरे जे लाडिक गाणे आहे नंदावर चित्रीत झालेले ‘हौले हौले जिया डोले’ यातील काव्य फार सुंदर आहे. प्रेमाची भावना निसर्गाच्या माध्यमातून शकिलने व्यक्त केली आहे. 

हौले हौले जिया डोले, 
सपनों के वन मे 
मन का पपिहा पी पी बोले,
मिले मुझे रसिया बलम मन बसिया
खुशियों के दिन आ गये
आयी मेरी दुनिया मे झुमती बहारे
रंग अनोखे छा गये
लागे रे जैसे मन मे मदिरा

एक कविता म्हणूनही ही रचना उत्तम आहे. 

रोशन सोबत शकिलने बेदाग (1965) आणि नुरजहां (1968) असे दोन चित्रपट केले. पण यातील गाणी फारशी विशेष नाहीत. सी. रामचंद्र सोबतही दोन चित्रपट केले. त्यातील जिंदगी और मौत (1965) मधील महेंद्र कपुर आणि आशा भोसले ने गायलेले गाणे खुप गाजले. आजही ते रसिकतेने ऐकले जाते. त्यातील काव्यही दर्जेदार आहे. ‘चौहदवी का चांद हो या आफताब हो’  लिहीणारा शकिलच असे लिहू शकतो

दिल लगा कर हम ये समझे जिंदगी क्या चिज है
इश्क कहते है जिसे और आशकी क्या चिज है

हाय ये रूखसार के शोले ये बाहे मरमरी
आपसे मिलकर ये दो बाते समझमे आ गयी
धूप किसका नाम है और चांदनी क्या बात है

शकिलने प्रेमाची कविताच जास्त लिहीली. नौशाद, रवी, गुलाम मोहम्मद यांच्या शिवाय इतर संगीतकारांसोबत अगदी मोजकीच गाणी देवून आपली प्रतिभा सिद्ध केली. रोशनच्या नूरजहां मध्ये सुमन कल्याणपुरच्या तोंडी जे शब्द शकिलने दिले आहेत ती कदाचित त्याची स्वत:चीच भूमिका असणार

शराबी शराबी ये सावन का मौसम
खुदा की कसम खुबसुरत ना होता
अगर इसमे रंगे मुहोब्बत ना होता

आणि म्हणूनच शकिल आपल्या शायरीत प्रेमाचा रंग भरत राहिला. या प्रतिभावंत शायरची जन्मशताब्दि  ऑगस्टपासून सुरू होते आहे. त्याच्या स्मृतीला अभिवादन !
  
  

 श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.

No comments:

Post a Comment