Wednesday, October 30, 2013

का उतरावं लागतं साहित्यीकाला रस्त्यावर....?

उरूस, दैनिक पुण्य नगरी, बुधवार 30 ऑक्टोबर 2013  

अपल्या हस्तीदंती मनोर्‍यात कवी-साहित्यीक-कलावंत बसून असतात असा आरोप नेहमी होतो. तो काही प्रमाणात खराही आहे. पण जेंव्हा सभोवतालची परिस्थिती अतिशय स्फोटक बनते, जगणेच अशक्य करून टाकते तेंव्हा काय करायचे? महान साहित्यीकाच्या घरासमोरचा रस्ता खराब झाला आणि त्याची बायका पोरे किंवा इतर कुटूंबिय त्यावर पडून जायबंदी झाले तर त्याचे पुरस्कार कामाला येणार आहेत का? भारतरत्न मिळालेल्या गायिकेच्या घरासमोर पावसाचे पाणी तुंबले आणि तिला घराबाहेर निघणे अशक्य झाले तर त्या भारतरत्नची नाव करून पाण्यावरून तरून जायचे का? पद्मश्री मिळालेल्या नटाच्या घराचा वीज पुरवठा 8 दिवस खंडित झाला. तर त्यानं काय प्रकाशाचा अभिनय करून अंधारावर मात करायची?
माझ्या घराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. त्याबद्दल काय करता येईल याची आम्ही चर्चा करत होतो. अर्ज विनंत्या निवेदनं सर्व सर्व करून झालं. आणि सगळ्यात शेवटी काहीच होत नाही हे पाहून गुरूवारी (दि. 24 ऑक्टोबर 2013) रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी मी रस्त्यावरच उतरलो. माझी मोटार सायकल रस्त्याच्या मध्यभागी लावली, माझा मित्र जीवन कुलकर्णी याने  आपले  वाहन रस्त्यात लावले. बघता बघता लोक गोळा होत गेले. महाविद्यालयातील तरूण आणि शाळेतील मुलांचा उत्साह प्रचंड होता. त्या भागातील नगरसेवक तिथे आले पण त्यांनी काही ठोस आश्वासन देण्यास नकार दिला. आम्ही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी लेखी आश्वासन मिळेपर्यंत बसून रहायचं ठरवलं. महानगर पालिकेच्या अभियंत्याने आम्हाला अकरा वाजता रस्ता दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिले. आणि हे आंदोलन मिटले.
हे आंदोलन मिटले असे आम्हाला वाटले पण ते मिटले होते फक्त आमच्यापुरते. सामान्य नागरिकांचा रोष स्थानिक नेत्यांवरती होता. तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांवरही होता. या शिवाय न हलणारी निगरगट्ट नोकरशाहीसुद्धा सामान्य माणसाने आवाज उठवला म्हणून अस्वस्थ झाली होती. त्यांनी कधी नव्हे तर काहीतरी कृती करायला सुरवात केली. पण हे सगळं जनक्षोभ वाढविणारे ठरेल याची त्यांना कल्पना नव्हती.
तब्बल चोविस तासांनी आमच्यावर पोलिस ठाण्यात बोलावून गुन्हे नोंदविण्यात आले. माझ्यासोबतच्या दोन मित्रांनी जामिन घेतला. त्यांची लागलीच सुटकाही झाली. मी जामिन नाकारला आणि ती नोकरशाही हादरली. कारण याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. सामान्य माणसापाशी असहकाराचे हत्यार असते. आणि ते त्याने वापरले तर काय करावे याचे उत्तर नोकरशाहीपाशी नसते.  
मला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तिथेही मी जामिन घेण्यास नकार दिला. न्यायधीश एक महिला होत्या म्हणूनही असेल कदाचित त्यांनी वैयक्तिक पातळीवर मला जामिन घेण्याची विनंती केली. पण मी ते नाकारले आणि तुरूंगात जाणे पसंद केले. 
खरं तर या व्यवस्थेने हे माझ्यावर लादले होते. मी एका खड्ड्यासाठी छोटेसे माझ्यापुरते आंदोलन केले. ते बघता बघता मला तुरूंगात घेवून गेले. एक कवी साहित्यीक आंदोलन का करतो तर त्याला तसे करण्यास व्यवस्था भाग पाडते. 
तुरूंगातला माझा अनुभव मोठा मजेशीर होता. सामान्य कैद्यांना कळेना हा वेगळा दिसणारा व्यवस्थीत दाढी केलेला बर्‍यापैकी कपड्यातला माणूस तुरूंगात का आला. एका कैद्याची प्रतिक्रिया तर मोठी बोलकी आणि आपल्या व्यवस्थेवर ताशेरे उडविणारी होती. तो सरळ म्हणाला, ‘‘साहेब कोणत्या डिपार्टमेंटमधले तूम्ही? करप्शन मध्ये आला असाल.’’ त्याला जेंव्हा मी माझी सर्व माहिती सांगितली आणि तुरूंगात येण्याचे कारण सांगितले तेंव्हा ते सगळे कैदी आश्चर्य करीत राहिले. जामिन नाकारून कोणी तुरूंगात कसे काय राहू शकतो? हेच त्यांना कळेना.
माझ्यासोबत महाभारताचे पुस्तक होते. ते मी रात्री वाचायला सुरवात केली. सोबतचा दुसरा कैदी पत्नीचा खुन करून आलेला होता. त्याला दुसरा एक हात पाय तोडण्याच्या गुन्ह्यातील कैद्याने बोलावले आणि म्हणाला, ‘‘देख बे हरामी. तू औरत की वजह से अंदर आया. ये बॉस पढ रहे वो महाभारत भी औरत की वजहसेही हुआ है.’’
पहाटे सुर्याची किरणे बराकीत आली तेंव्हा ती बराक असूनही छान वाटले. बाकी जो काही रात्रभर त्रास झाला ते जावू द्या. जेवणाचे जे हाल झाले ते काय सांगणार. बराकीचा एक भाग प्रस्थापित कैद्यांचा होता. त्यातील एकाकडे सगळी वर्तमानपत्रे येत होती. त्याने इंग्रजी दैनिकातील माझी बातमी वाचली. मला खुणेनं स्वत: जवळ बोलावून घेतलं. मराठी वृत्तपत्रांतील माझी छायाचित्रे आणि मोठ मोठ्या बातम्या वाचल्या. मला तो गांभिर्याने म्हणाला, ‘‘साहेब तूम्ही रहाच इथे जास्त दिवस. बाहेरच्या गोष्टीसाठी तूम्ही आंदोलन करता आता जरा इथल्या समस्यांसाठीही करा. हे पोलिस फार ***** (ही पाच अक्षरी शिवी मी सांगायची गरज नाही सगळ्यांना माहित आहे) आहेत.’’
जो कैदी हात पाय तोडून आत आला होता तो दलित होता आणि त्याची बायको सवर्ण होती. यामुळे त्याच्याशी भांडण समोरच्याने काढले होते. याने कंटाळून त्याच्यावर हल्ला केला आणि आत आला. आता काय करावे याचा सल्ला तो मला मागत होता. वास्तविक त्याचा भाऊ नगरसेवक होता. मोठ मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्याचे जवळीकीचे संबंध होते. पण ही सगळी व्यवस्था आपल्याला काहीच न्याय देवू शकत नाही. एक साधा प्रामाणिक माणूस आपल्याला खरं खरं काही तरी सांगू शकेल असे त्याला वाटले. 
चोरीची गाडी खरेदी प्रकरणी एक तरूण पोरगा घरचा एकूलता एक उगाच आतमध्ये आला होता. त्याने माझे ताट मला धुवू दिले नाही. नियमित जेलची वारी करणार्‍या एका कैद्याने माझ्यासाठी जास्तीचं दुध, केळं राखून ठेवली. मला तुरूंगातले जेवण जाणार नाही याची त्याला कल्पना होती.
एक साधा माणूस आपल्या हक्कासांठी आग्रह धरतो आणि व्यवस्था हादरते. त्यातही तो कवी साहित्यीक असेल तर त्याला याचे विविध पैलू चटकन लक्षात येतात. आणि त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे कवी-साहित्यीक-कलावंत यांच्याभोवतही असलेले अलिप्ततेचे आवरण गळून पडते. वास्तवाची हवा त्याला स्पर्शते आणि त्याच्यातील कलाकारालाच हादरून सोडते. त्याच्या जगण्याची मुळं सुस्त-सुखवस्तू मातीतून ती उपटून तपासते. तेंव्हा त्याचे डोळे उघडतात.  मी 25 वर्षांपूर्वी एक कविता लिहीली होती
बंद करून घ्याव्यात दारं खिडक्या
तर भिंतीच कोसळत चालल्या आहेत
हवेत विष भिनून 
श्वासांपर्यंत येवून पोंचले आहे
स्फोटाचे परिणाम पोंचत आहेत
गर्भातल्या बाळापर्यंत
आता कुठल्या आवरणाखाली जपून ठेवावा
माणूसकीचा कोवळा कोंब
आता रस्त्यावर यावंच लागेल
एखाद्या ओंडक्यामागे 
सगळी शक्ती एकवटून
माराव्या लागतील धडका 
बंद दरवाज्यावर

मला कल्पना नव्हती की माझी कविता माझ्या मेंदूतून माझ्या हातापायात उतरेल. मी खरंचच रस्त्यावर उभा राहीन. बघता बघता लोकं जमा होतील. माझ्यामागे जनशक्ती उभी राहून मला व्यवस्थेला धडक मारण्याचे बळ येईन. 
आता साहित्यीकालाच नाही तर सगळ्यांना रस्त्यावर उतरून व्यवस्थेला धडक मारण्याची गरज निर्माण झाली आहे. 
          
      
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

5 comments:

  1. श्रीकांतजी आपले अभिंनदन... आपण केलेले धाडस औरंगाबादकरांना नागरी प्रश्नांविषयी कृती करण्यास प्रेरणा देईल. ज्या भाजपमुळे देशात काहीतरी बदल होईल, अशी आशा निर्माण झाली आहे, त्या पक्षाची आणि त्याच्या मित्रपक्षाची दीर्घकाळ सत्ता असेलल्या शहरात रस्त्यांचेही सुख नागरिकांना मिळू शकत नाही, हे फारच वाईट आहे. विकासकामे विचारसरणी किंवा पक्ष कोणता आहे, यानुसार ठरत नाहीत ती व्यवस्था कशी आहे, यानुसार ठरतात, हे लक्षात आल्यावर आपण व्यवस्था परिवर्तनासाठी काम करतो. ते परिवर्तन अर्थक्रांती सांगते. प्रश्नांच्या मुळाशी गेले पाहिजे आणि त्यासाठी अर्थक्रांतीसारख्या औरंगाबादेतच जन्म झालेल्या
    बदलाचा आग्रह धरला पाहिजे. आपणास तात्पुरत्या समाधानात रस नाही, असे मी समजतो...
    अर्थात आपल्या पुढाकाराचे मोल त्याने कमी होत नाही. (www.arthakranti.org)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. प्रिय श्रीकांत,
    ७-८ दिवसांपूर्वीच डॉ आनंद देशपांडे ,सुनील पोटेकर व माझ्यासकट काही जनांचे फेसबुक वर परभणी व परभणीचे गुण वैशिष्ठे ह्या विषयावर भरपूर वैचारिक आदान प्रदान झाले त्यात हा हि विषय होता कि परभणीकर नेहमीच कोणत्याही हक्काच्या विषयावर सर्व समाजाच्या हक्काच्या लढ्यात नेहमीच सर्वस्वाचा त्याग करत सर्वांच्या समोर छातीचा कोट करून नेहमीच पुढाकार घेत असतो … हे परभणी चे गुण वैशिष्ट्य मित्रा … तू आणि मिलिंदने अगदी रास्त ठरवले आहे … ह्या कारणाने जो काय तुम्हाला त्रास भोगावा लागला असेल तो तुम्हालाच माहित आहे परंतु मित्रा… चांगले रस्ते ह्या सुधारित शहराच्या रक्तवाहिन्या आहेत व प्रत्येक कर भरणाऱ्या शहराच्या प्रत्येक नागरिकाची हक्काची बाब आहे … जी गोष्ट न मागता मिळावयास हवी ती रस्त्यावर उतरून एका सभ्य नागरिकाला जो कि कवी विचारवंत लेखक आहे त्याला त्यासाठी लढा द्यावा लागतो हि खरे तर स्थानिक प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे …तो खजीलपना लपवण्यासाठी तुझ्यावरची पोलिस कारवाई हि त्या प्रशासनाची तुझ्या प्रयत्नांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे … म्हणून फक्त एकच म्हणणे आहे ह्या लढ्यात तू एकटा नाहीस आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत… आणि तुझ्या ह्या लढ्यास मनःपूर्वक सलाम मित्रा …. कधीही मनात आणशील त्यावेळेस मी व आमचा सर्व कंपू तुझ्यासोबत असेल …. तुझ्या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुझे अभिनंदन …। नितीन ताडलिंबेकर (देशपांडे)

    ReplyDelete
  4. श्रीकांतजी,
    हे अस्वस्थ करणारे वर्तमान आहे. तुम्ही घेतली तशी भूमिका अन्य साहित्यिकांनी वेळोवेळी घ्यावी असे मी म्हणणार नाही. पण कधीतरी गरजेच्या वेळी समाजहीत पाहून तरी आपले मौन सोडवेना. तसे होत नाही. मध्यंतरी जाणता राजा जेव्हा एका कार्यकर्त्याची जात विचारात होते. तेव्हा सारे विचारवंत आणि साहित्यिक मुग गिळून गप्प होते. तुमच्या धाडसाला सलाम.
    मालकर सर म्हणतात तसं पाहिलं तर गुंता सुटत नाही याचेही दु:ख आहेच.

    ReplyDelete
  5. सामान्यतः असा रूढ समज आहे, की संप, आंदोलन, सत्याग्रह, मोर्चे, रस्ता रोको इ. आंदोलने करतो; तो वर्ग एक विशिष्ट प्रकारचा असतो. कर्मचारी, शेतकरी, मजूर, अत्याचारित स्त्रीवर्ग, राजकीय पक्ष इ. बहुतेक सर्व प्रकारांना पाठींबा अथवा ती आयोजित केलेली असतात राजकीय पक्षांनी. स्वतःच्या लाभासाठी, पक्षा-पक्षातील राजकारणासाठी. अशा संप, मोर्चे, आंदोलनात नुकसान होते; ते मात्र सामान्य जनतेचे आणि जनतेच्या मालमत्तेचे. अशा प्रकारातून फायदा काय होतो ; ते नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांनाच माहीत.
    सामान्यतः असा समज आहे, की अशा आंदोलनापासून दूर म्हणा, अलिप्त म्हणा अथवा तटस्थ म्हणा असतो तो मध्यम वर्ग, साहित्यिक वर्ग, सिने-नाट्य मंडळी आणि अन्य. या वर्गांना सुद्धा काही प्रश्न त्रासदायक वाटतात. पण त्याविरुद्ध उभेराहण्याची, लढण्याची, त्यापायी होणारा त्रास सहन करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यांच्या मागे जनता येईल,की नाही याची शाश्वती वाटत नाही. हे आणि इतर अनेक कारणे असतील...
    पण अद्भुत घडले. प्रत्येक व्यक्तीला रस्त्यातील खड्ड्यामुळे होणारा त्रास, प्रत्येकाच्या मनात खदखदणारा राग उफाळून बाहेर आला; तो तुम्ही [ एक कवी, साहित्यिक ] केलेल्या आंदोलनामुळे. तुमच्या सोबतच असलेले तुमचे सहकारी मीरा बुक्स आणि पब्लिकेशनचे प्रकाशक जीवन कुलकर्णी आणि इतरांच्या सहभागामुळे. तुम्ही या प्रकरणात जामीन नाकारून फार मोठी हिम्मत दाखविलीत. कारावास पत्करून तेथला, तेथील कैद्यांचा अनुभव घेतलात हेही महत्वाचे. तेथील कैद्यांमध्ये जी माणुसकी दिसली; ती बाहेर असलेल्या जनतेच्या प्रतिनिधींनी आणि सरकारी यंत्रणेने दाखविली नाही हे दिसून आले. उलट न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तुमच्या सारख्या कवी, साहित्यिकाची मुस्कटदाबी करण्याचेच प्रयत्न झाले.
    तुम्ही २५ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आजही तितकीच; किंबहुना अधिक तीव्रतेने लागू पडते. म्हणजे विकास पुढे जात आहे, की मागे हा प्रश्नच आहे.

    ReplyDelete