Tuesday, October 1, 2013

‘नॉट रिचेबल’ मुलीवर कविता लिहीणारा मुलगा

उरूस, दैनिक पुण्यनगरी मंगळवार 1 ऑक्टोबर 2013 

   लेखाचे शिर्षक कदाचित एखाद्या कवितेचे शिर्षक वाटू शकेल. स्त्री अत्याचाराबाबत सध्या जे भयावह वातावरण माध्यमांतून दाखवले जात आहे त्या पार्श्वभूमीवर चांदवडच्या सागर संजय जाधव या मुलाची कविता खरेच उठून दिसते. 
   
 नॉट रिचेबल

वासनांनी भरलेल्या 
‘डिजिटल’ कॅमेर्‍याच्या भितीने
बदलून घेतलाय तिने
स्वत:चा ‘वॉलपेपर’
अन् गुणगुणती ‘रिंगटोन’ बदलून
बसलीय ‘व्हाईब्रेट मोड’वर
तिला जायचंय
नेटवर्क नसलेल्या ठिकाणी..
‘कनेक्टेड पिपल्स’ च्या जगातून
व्हायचंय ‘नॉट रिचेबल’..
तिनं झाकून घेतलंय स्वत:ला
एका ‘क्रिस्टल कव्हर’ मध्ये,
‘स्क्रिन टच’च्या बचावापासून
अन् मनाला घातलाय 
बहुआयामी ‘पासवर्ड’
सावधानतेचा...
स्वत:वर ओढलंय
एकलेपणाचं ‘स्क्रिन सेव्हर’
ती आतल्या आत
स्वत:ला ‘डायल’ करते!
आणि ऐकत असते
‘‘इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है !’’
    
    ही अप्रतिम कविता भेटण्यासाठी निम्मित्त घडले ते ‘प्रतिभा संगम’ साहित्य संमेलनाचे. याच कवितेला महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कवितांमधून पहिला क्रमांक देण्यात आला. पद्मश्री ना.धो.महानोर यांच्या हस्ते या मुलाचा सत्कार झाला. 
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने महाविद्यालयीन युवकांसाठी 1996 पासून हे संमेलन भरविण्यात येते. या वर्षी 12 वे प्रतिभा संगम जळगावला भरविण्यात आले होते. एरवी साहित्य संमेलन म्हणजे जो साहित्य बाह्य झगमगाट दिसतो, लाल दिव्यांच्या गाडीतील हासर्‍या तूपकट चेहर्‍यांवरची माजोरडी राजकीय नजर, कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरचे लाचारीचे ओघळ असं काहीच या संमेलनात नव्हतं. अतिशय साधेपणाने सजवलेलं व्यासपीठ, महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणारी 350 तरूण मुलं मुली, साधेपणानं तीन दिवस त्यांच्यात मिसळणारे निमंत्रीत मान्यवर  आणि या सगळ्यांची व्यवस्था आत्मियतेने पाहणारे कार्यकर्ते असं एरवी दुर्मिळ दिसणारं दृश्य या संमेलनात पहायला मिळतं.
एवढ्या मोठ्या संख्येने आलेले हे मुलं मुली तीन दिवस एकमेकांच्या हातात हात घालून मिळून मिसळून वावरत होते. सभागृहात मुलांची आणि मुलींची वेगळी बसायची व्यवस्था नव्हती. ‘गट-चर्चेत’ या तरूणांशी बोलताना त्यांनी जी मतं मोकळेपणाने मांडली ती थक्क करणारी होती. जे एक विचित्र मत समाजानं स्त्री अत्याचाराबाबत करून घेतलं त्याला पूर्ण छेद देणारी मतं मुलं मुली मोकळेपणानं मांडत होती. 
प्राजक्ता नावाची मुलगी आपलं धाडसी मत मांडताना म्हणाली, ‘‘बलात्कार करणार्‍यांचे विचार जुन्या काळाचे आहेत. माझ्या पिढीची मुलं असा विचार करत नाहीत.’’ चंद्रकांत नावाचा मुलगा आपल्या कवितेत मैत्रिणीला व्हॅलेंटाईन डेला हक्कानं घरी नेतो आणि घरच्या सामान्य स्थितीचा परिचय करून देतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आणि त्यातही परत ग्रामीण भागातून आलेली ही मुलं मुली विचार करताना पाहून खरंच फार समाधान वाटत होतं.
रात्री कविसंमेलन संपलं तेंव्हा दीड वाजला होता. पण इतक्या उशीराही सर्व मुलींना इतर महिलांना त्यांच्या निवासापर्यंत तरूणांनी कार्यकर्त्यांनी सुखपरूप पोंचवले. गडचिरोलीतील देसाईगंज असो, नंदूरबार असो, महाराष्ट्राच्या मध्यबिदूंपाशी असलेलं अंबाजोगाई असो अशा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मुलंमुली यात सहभागी झाली होती. पाहुण्यांची व्यवस्था करणारा समीर किंवा अजिंक्य सारखा विद्यार्थी कार्यकर्ताही पुस्तकं खरेदी करून त्यावर मान्यवर साहित्यीकांची स्वाक्षरी घेत होता. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा.डॉ.उषा तांबे यांनीही प्रमाणिकपणे अशी कबुली दिली की ‘‘जितकी काळी डोकी इथं दिसतात तितकी मोठ्या संमेलनातही दिसत नाहीत.’’
शिवाय एक मुद्दा सर्वच मान्यवरांना विचारात पाडणारा होता. महानगरांतून जी मराठीची ओरड ऐकू येते तिचा मागमुसही या ग्रामीण मुला-मुलींमध्ये आढळला नाही. खान्देशची अहिरणी असो की गडचिरोलीची आदिवासींची भाषा असो त्यात कविता लिहून ही मुलं समर्थपणे आपल्या भावना व्यक्त करत होती. मुलांना वाचन संस्कृतीकडे ओढण्यासाठी ‘‘आठवड्याचे काही दिवस टिव्ही बंद ठेवला पाहिजे’’ असं मत मंचावरून मान्यवर वक्त्यांनी मांडताच बहुतांश मुलं एकमेकांकडे पहात राहिली. त्यांना परिसंवाद संपल्यावर आम्ही आवर्जून विचारलं की यावर तूमचं मत काय. मुलं आमच्याकडे ‘काहीही विचारता का..’ असल्या भावनेतून पहात म्हणाली, ‘‘सर एरवीच आमच्याकडे 12 तास लोडशेडींग आहेच की.’’ त्यांच्या उत्तरानं शहरात बसून कृत्रिम समस्या आणि त्यांची कृत्रिम उत्तरं शोधणार्‍यांची फार मोठी पंचाईत झाली. 
ग्रामीण भागात मुलामुलींची वाचनाची भुक प्रचंड आहे. त्यांच्या लेखनात नवनव्या उर्मी आढळून येतात. आपणच ते जाणून घ्यायला कमी पडतो. 
संमेलनाच्या आयोजकांनी कुठल्याच पाहूण्याचे स्वागत फुलांनी केलं नाही. सर्वांना पुस्तकेच भेट दिली. मग ते साहित्य अकादमी प्राप्त विश्वास पाटलांचे ‘झाडाझडती’ असो, नाहीतर शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ असो, नाही तर जयंत पवार यांचे ‘फिनिक्सच्या राखेतून उडाला मोर’ असो. मंचावर एकाही अगंतुक माणसाला बसायला खुर्ची ठेवलेली नव्हती. अगदी जळगावचे खासदारही पाहुण्यांचे स्वागत करण्यापुरते मंचावर आले आणि समोर रसिकांच्या सोबत बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत राहिले. सर्व निमंत्रित आणि प्रतिनिधी मुलामुलांची खाण्याची व्यवस्था एकत्रच होती. पाहुण्यांसाठी कुठलीही ‘खास’ सोय केलेली नव्हती हे विशेष. 
आजच्या तरूणांच्या मनात काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर ते अशा निकोप आणि साध्या वातावरणातच शक्य आहे.अन्यथा राजकारण्यांनी नासून टाकलेल्या आणि साहित्य महामंडळाच्या लाचारीने ग्रासून टाकलेल्या संमेलनातून काय चांगलं निष्पन्न होवू शकते? 12 संमेलने आजपर्यंत आयोजित करणारे प्रा.नरेंद्र पाठक यांनी कदाचित मुलांमधील ही सांस्कृतिक भूक ओखळली आणि त्याला प्रतिसाद देत ही चळवळ उभी केली. फक्त तरूणांपुरतेच नाही पण संमेलनाचे आयोजन कसे करावे यासाठी हे प्रारूप विचार करायला लावणारे आहे. 
आता अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणुक चालू आहे. सासवड येथे हे संमेलन होणार आहे. त्या संयोजकांनी हा आयोजनातला साधेपणा समजून घेतला तर शासनानं दिलेल्या 50 लाखात अतिशय नेटके आणि चांगले संमेलन होवू शकते. शिवाय यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याच्या पायाशी लाळ घोटायची गरज नाही. आणि असं आपण करू शकलो तरच सागर जाधव सारख्या मुलाची कविता बाहेर येवू शकेल. नसता असे कित्येक तरूण गावोगावी उपेक्षा सोसत तसेच राहतील. नुसते वाङ्मयच नाही तर एक प्रगल्भ सामाजिक दृष्ठि सामोरी येते तीही येणार नाही.

4 comments:

  1. Very true; nice , should be followed by SASVADKAR

    ReplyDelete
  2. श्रीकांत सर, आपला लेख वाचून मला कळले कि असे हि संमेलन आयोजित होते म्हणून. पुढच्या वर्षी येण्याचा नक्की प्रयत्न करणार (प्रयत्न करणार हे ह्यासाठी कि हल्ली बरेच प्लान फिसकटतात :-( …. ) . आयोजकांचे आभार… संजय जाधव याच्याशी फोन करून बोलणारच आहे…

    ReplyDelete
  3. माफ़ करा सर तिथे हिंदी कविकडे ल् क्षय दिले नाही नाहीतर आमच्या कविता ही काही कमी नव्हत्या . भूल गए हम भूल गए अपनी संस्कृती भूल गए

    भूल गए हम भूल गए अपनी संस्कृती भाषा भूल गए

    कोलगेट पेप्सोडेंट याद रहा ,नीम का दातोंन भूल गए

    गुड मोर्निंग याद रहा पर शुभ प्रभात कहना भूल गए

    जींस टी-शर्ट याद रहे धोती कुर्ता भूल गए

    अंग्रेजी स्कूल याद रहे पर मराठी स्कूलों को भूल गए

    भूल गए हम भूल गए अपनी संस्कृती भाषा भूल गए



    इडली डोसा याद रहा बाजरे की रोटी भूल गए

    फ्रीज का वाटर याद रहा पर मटके का पानी भूल गए

    कालेज कैंटीन याद रही पर गाँव की पाठशाला भूल गए

    अंग्रेजी गाने याद रहे पर हिंदी की सौ तक गिनती भूल गए

    भूल गए हम भूल गए अपनी संस्कृती भाषा भूल गए



    महँगी बिजली याद रही पर दिया बाती भूल गए

    टेलीविजन के चैनल याद रहे पर रेडिओ सुनना भूल गए

    माइकल जैक्सन याद रहा पर अमीर खुसरो को भूल गए

    हैलो हाय तो याद रही नम्र प्रणाम कहना भूल गए

    भूल गए हम भूल गए अपनी संस्कृती भाषा भूल गए





    पार्लर जाना याद रहा पर लंबी चोटी भूल गए

    स्पाईडरमेन सुपरमेन याद रहे पर श्रवणकुमार को भूल गए

    शहर का सीमेंट का जंगल याद रहा गाँव की हरियाली भूल गए

    रिक्रिएसन गार्डन याद रहा पर घर का आंगन भूल गए

    भूल गए हम भूल गए अपनी संस्कृती भाषा भूल गए



    दोस्त मित्र सब याद रहे खुद के भाई को भूल गए

    साली का जन्मदिन याद रहा पर मा बरसी भूल गए

    मोटर कार तो याद रही पर पैदल चलना भूल गए

    आतंकी नक्सली याद रहे पर देश भक्तो को भूल गए





    दगा लोटन पाटील

    ReplyDelete