Tuesday, June 18, 2019

पराभवाचे खापर इ. व्हि.एम. च्या माथ्यावर



19 मे ला सतराव्या लोकसभेचे शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले आणि लगेच संध्याकाळी मतदानोत्तर चाचण्या (एक्झिट पोल) चे निकाल यायला सुरवात झाली. हे निकाल समोर येत असतानाच लगेच इव्हिएम मध्ये कश्या गडबडी आहेत, मशिनच पळवल्या जात आहेत, या मशिन कुठे कुठे दुसर्‍याच ठिकाणी कशा आढळून आल्या, खासगी वाहनातून यांची वाहतूक कशी होते आहे असे व्हिडीओ व्हायरल व्हायला सुरवात झाली. अगदी तेजस्वी यादव यांच्यासारख्या जबाबदार विरोधीपक्ष नेत्याने कुठलीही खातरजमा न करता आपल्या ट्विटर हँडलवर हे व्हिडिओ शेअर केले. 

याबद्दल निवडणुक आयोगाकडे तक्रार गेल्यानंतर अगदी चार ते पाचच तासात आयोगाकडून सविस्तर खुलासा करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि बिहार येथील या चारही व्हिडीओ बद्दल त्या त्या ठिकाणच्या निवडणुक अधिकार्‍यांनी पुराव्यासह योग्य ती माहिती देवून सगळ्या शंकाखोरांचे समाधान केले. पण असे असतानाही देशभर चॅनेलवर आणि समाजमाध्यमांवर हे व्हिडिओ काहीकाळ धुमाकूळ घालत राहिले. निवडणुक आयोगाने सविस्तर समाधानकारक खुलासा केल्यावरही असे संशयास्पद व्हिडिओ पसरत ठेवण्याचे कारण काय?

दुसरा प्रसंग घडला तो मतमोजणीच्या आधी. इव्हिएमला व्हिव्हिपॅट मशिन जोडली व आपले मत नेमके आपण दिले त्याच उमेदवाराला जात आहे का हे पाहण्याची सोय करण्यात आली होती. या व्हिव्हिपॅटची मते मोजण्यात यावी अशी विरोधकांची मागणी होती. ती आयोगाने मंजूर केली व प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मशिन्सची अशा प्रकारे कागदावरची मतेही मोजून ती मूळ इव्हिएमशी जूळतात का हे पाहण्याचे ठरविण्यात आले. पण विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांनी मागणी केली की  पाच नव्हे तर किमान 50 टक्के व्हिव्हिपॅटची मोजणी केली जावी. ही मागणी सर्वौच्च न्यालयाने फेटाळली. 

मतमोजणीच्या वेळी 21 हजार व्हिव्हिपॅट मधील कागदावरील मतांची मोजणी करून ती मूळ इव्हिएम शी ताडून पाहिली गेली. कुठेही चुक आढळली नाही.

इतकं सगळं झाल्यानंतर तरी विरोधकांची माघार घेत मिळालेला जनादेश खुल्या मनाने स्विकारायला हवा होता. पण तसा कुठलाही विश्वास त्यांनी लोकशाहीवर दाखवला नाही. 

किती आश्चर्य आहे. हेच विरोधक संविधान बचाव म्हणून घोषणा देत होते, लोकशाही बचाव म्हणून सभा घेत होते. आणि प्रत्यक्ष त्याच घटनेप्रमाणे लोकशाही चौकटीतच निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगाल वगळता कुठेही हिंसाचार झाला नाही. लोकांनी शांततेच्या मार्गाने 67.4 टक्के इतके विक्रमी मतदान केले. तरीही विरोधक हा निकाल स्विकारायला तयार नाही.  जर सत्ताधार्‍यांचा पराभव झाला असता आणि विरोधक निवडून आले असते तर त्यांनी अशा पद्धतीचे इव्हिएम विरोधी अभियान चालवले असते का?

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी वेगळीच कुजबूज सुरू केली. निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर जी आकडेवारी दिलेली आहे त्यात झालेले मतदान आणि मोजलेली मते या आकड्यांत काही फरक दिसतो आहे. खरे तर अशी आकडेवारी परस्पर न घेता अधिकृतरित्या निवडणुक आयोगाकडून ती मागवता आली असती. आणि मग तिच्यावर जो काही आक्षेप आहे तो नोंदवता आला असता. पण तसे काही न करता वेबसाईटवरच्या आकड्यांवरून इव्हिएम वर संशय पसरविण्याचे काम लगेच सुरू झाले. वाहिन्यांवरील मुलाखतीत असा आरोप तूम्ही करता अहात तेंव्हा तूम्ही न्यायालयात जाणार का? असे विचारले तर प्रकाश आंबेडकर काहीच उत्तर द्यायला तयार नाहीत. केवळ संदिग्ध अशी भाषा ते करत आहेत. विधानसभेच्या निवडणुका कागदी मतपत्रिकांवरच घ्या असा आग्रह त्यांनी धरला आहे. जर निवडणुका इव्हिएम वरच झाल्या तर तूम्ही बहिष्कार टाकणार का? या थेट प्रश्‍नावर त्यांना काहीच थेट आणि स्पष्ट उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी कबुल केले की इव्हिएम वर निवडणुका झाल्या तरी आम्ही लढवणार. 

खोटं बोलून पराभवाचे खापर इव्हिएम वर फोडण्याचे असं धोरण विरोधक का राबवत आहेत? त्यांना आपला पराभव का झाला हे पण समजून घ्यायचे नाही का? प्रकाश आंबेडकरांसारखे जाहिर रित्या धडधडीत खोटे आरोप करतात हे सामान्य जनतेला कळत आहे. 

भीमा कोरेगांव दंगल प्रकरणी मनोहर भिडे (त्यांचा चुकूनही उल्लेख संभाजी भिडे किंवा भिडे गुरूजी असा आंबेडकर करत नाहीत) यांना अटक करा अशी मागणी करत त्यांनी मुंबईला मोठी सभा घेतली. प्रत्यक्ष चौकशी आयोगा समोर जेंव्हा त्यांना विचारले तेंव्हा त्यांना भिडेंचे नाव घेताच आले नाही. कारण काहीच पुरावा नव्हता. मग असे हवेतले आरोप जाहिर सभांमधून ते का करत राहिले?  आज याच पद्धतीनं ते इव्हिएम वर शंका घेत आहेत. व्हिव्हिपॅटवरचा आरोप खोटा सिद्ध झाला. इव्हिएम पळवल्या, बदलल्या हा आरोप खोटा सिद्ध झाला आहे. मग विरोधक याचे कुठले प्रायश्‍चित घेणार आहेत? 

कुठल्याही तंत्राज्ञानाला विरोध करत आपण काळाच्या रेषेवर उलट दिशेने जावू शकत नाहीत. इव्हिएम चा वापर  सुरू झाल्यापासून मतपत्रिकांवरचा खर्च प्रचंड प्रमाणात वाचला आहे. ही आधुनिक यंत्रणा वापरण्यासाठी, मतमोजणी साठी अतिशय सोपी आणि सुटसुटीत ठरली आहे. ही सगळी यंत्रणा आपल्या भारतीय तंत्रज्ञांनीच विकसित केली आहे. वारंवार यावर या विषयातील तज्ञांनी खुलासे केले आहेत. निवडणुक आयोगाने जेंव्हा हॅकिंग करून दाखवा असे खुले आवाहन केले होते ते कुणीही स्विकारले नाही. कुणीही हॅकिंग सिद्ध करू शकले नाही.

यावर आक्षेप घेताना मोठा अजब तर्क प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. पण त्या मानाने आम्हाला मते मिळाली नाहीत. खरे तर हा तर्कच लावायचा तर निवडणुक आयोगाने मतदान घेण्याची तरी काय गरज आहे? देशभरात विविध नेत्यांच्या सभा झाल्या त्यांचे उपग्रहाद्वारे चित्रण करून घ्यावे. या सभेला किती माणसे होती हे मोजणे आधुनिक यंत्रांद्वारे शक्य आहे. ते आकडे जाहिर केले की संपले. आता जर परत हीच माणसे दुसर्‍या नेत्याच्या सभेला गेली तर काय करायचे? याचे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे. 

1989 पासून सातत्याने भाजपला मिळालेली मते आणि त्यांच्या जागा यांच्यावर सुहास पळशीकर यांच्यासारख्या अभ्यासकांनी सविस्तर मांडणी केली आहे. तेंव्हाचे मतदान तर कागदावरच होते. कॉंग्रेसची मते सातत्याने कशी घटत गेली आहे हे पण त्यांनी दाखवून दिले आहे. केवळ कॉंग्रेसच नव्हे तर इतरही विरोधी पक्ष संघटनात्मक पातळीवर कसे कमी पडत आहेत हे पण अभ्यास करणारे दाखवून देत आहेत. केवळ हीच निवडणुक नाही तर सर्वच निवडणुकीचे आकडे जोडून त्याचे आलेख काढले जात आहेत. हे सगळं समोर असताना केवळ इव्हिएमवर पराभवाचे खापर फोडून विरोधक रडीचा डाव विरोधक खेळत आहेत. 

महाराष्ट्रात येत्या तीनच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी तयारीला लागणे सर्वच पक्षांना आवश्यक आहेत. सत्ताधारी लगेच या तयारीला लागले आहेत. पण विरोधक अजूनही पराभवातून बाहेर आलेले दिसत नाहीत. मुंबईमध्ये निरंजन टकले आणि सहकारी इव्हिएम विरोधी परिषद भरवित आहेत. या सरकारला इव्हिएम सरकार असे नाव दिल्या जात आहे. याच निरंजन टकले यांनी कुठलाही आधार नसताना सत्ताधार्‍यांविरोधात अपप्रचार कसा केला याचे पुरावे समोर आले आहेत. असं असताना ही मंडळी हाच खेळ परत खेळत आहेत. विरोधक हारले इतके नसून का हारले ते समजून घ्यायला तयार नाहीत ही लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की सत्ताधार्‍यांनीच विरोधक निवडुन यावेत याची काळजी घेतली पाहिजे. विरोधक पराभवातून काहीही शिकणार नसतील तर त्यांचे अस्तित्व अजून संपत जाईल. आणि याला तेच जबाबदार असतील. 

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575ंं

No comments:

Post a Comment